1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

धर्मसेवा

माझी मनोरचना  :  माझ्या सार्वजनिक कामाच्या आठवणी आणि अनुभव देण्यापूर्वी माझीं ध्येयें आणि मनोरचना यांविषयीं थोडासा सामान्य विचार करणें जरूर आहे.  त्याशिवाय पुढील आयुष्यामध्यें ज्या क्रांत्या झाल्या आणि जे वळसे पडले त्यांची वाचकांना नीटशी कल्पना येणार नाहीं.  कोणाही व्यक्तीच्या सार्वजनिक जीविताचा जो परिपोष होतो त्याचे दोन अगदीं भिन्न प्रकार आहेत.  एकाचा उदय विश्वात्मकतेमध्यें होऊन हळूहळू स्थानिक प्रश्नाकडे उतरत जातो, तर दुसर्‍याचा उदय अगदींच स्थानिक प्रयत्‍नांत होऊन त्याचें वलय विश्वात्मकतेकडे विस्तृत होऊं लागलें.  उदाहरणार्थ, एखादा आपल्या जातीच्या सुधारणेडे लक्ष घालतो किंवा जातिभेदावर त्याचा मुळींच विश्वास नसला तर नागरिक सेवेंत लक्ष घालतो व हळूहळू राष्ट्राकडे आणि अखेरीस विश्वाकडेही त्याचा लय लागतो.  याच्या उलट दुसरी व्यक्ति एकदम धर्मसुधारणेकडे वळते, म्हणजे विश्वधर्मापासून सुरुवात करून त्याचीं भिन्न भिन्न प्रतीकें, समाजसुधारणा, समाजसेवा, राष्ट्रोद्धार, त्यांतील निरनिराळ्या वर्गांची उन्नति किंवा अखेरीस आपल्या स्वतःच्या कुटुंबांतील आप्‍तांची काळजी इकडे उतरूं लागते.  माझा जीवितविकास यांपैकीं दुसर्‍या प्रकारें घडला.  पहिल्या भागांत (पृष्ठ १२९) 'जागृतींतलें स्वप्न' म्हणून जें सदर आहे तें फार अर्थपूर्ण आहे.  लंडन येथील पॅस्मोर एडवर्ड इन्स्टिट्यूटमधील चित्रें पाहून व व्याख्यानें ऐकून माझ्या विश्वव्यापक ध्येयाला जी चालना मिळाली त्याचें हें स्वप्न द्योतक आहे.  ह्या स्वप्नाप्रमाणें जरी माझ्या हातून जगभर प्रवास घडला नाहीं, तरी माझ्या जीवितकार्यांत माझें विश्वध्येय ध्रुवाच्या तार्‍याप्रमाणें माझ्या नजरेपुढें कायमचें राहिलें.

पहिल्या भागांत माझ्या मनोविकासाचें वर्णन करीत असतांना मीं म्हटलें आहे कीं, मी ब्राह्मसमाजांत गेल्यानें सुधारक झालों असें नसून मी सुधारक होतों, म्हणून ब्राह्मसमाजांत गेलों.  माझ्या उदार ध्येयामुळें मीं मनामध्यें जीं वेळोवेळीं मानवी आयुष्याचीं चित्रें रेखाटलीं तिला तंतोतंत जुळेल अशी ब्राह्मसमाजाची ठेवण मला दिसली.  त्यामुळें मी एकदम ब्राह्मसमाजांत (मुंबई प्रार्थनासमाजांत) शिरलों.  एवढेंच नव्हे, तर लवकरच त्याच्याशीं मी इतका तादात्म्य पावलों कीं, स्वतःला पूर्णतः वाहून घेऊन त्याचें प्रचारकार्य हीच तळमळ मला लागली.

दोन पक्ष  :  त्या वेळीं हिंदुस्थानांत, विशेषतः महाराष्ट्रांत, सार्वजनिक चळवळ करणार्‍यांचे दोन भिन्न पक्ष होते.  एक स्वतःला राष्ट्रीय ऊर्फ जहाल म्हणवीत असे, तर दुसरा स्वतःला प्रागतिक ऊर्फ उदार म्हणवीत असे.  पण एकाचा जहालपणा आणि दुसर्‍याचा उदारपणा प्रतिपक्ष्याच्या कार्यांत मात्र दिसून येत नसे.  म्हणून हे एकमेकांच्या कार्यांचा हेवादावा आणि वेळप्रसंगीं एकमेकांस उघडउघड विरोध करण्यासही कचरत नसत.  दोघांचें एकच कार्य म्हणजेच राष्ट्रीयता व प्रागतिकता पूर्णांशानें होतें हें कांहीं दोघांना पटत नव्हतें.  त्यामुळें त्या वेळच्या माझ्यासारख्या तरुणांची फार ओढाताण होत असे.  मोठमोठीं धेंडें मोठमोठ्यानें ओरडून काय सांगतात आणि वागतांना किती आकुंचन पावतात ह्याविषयीं निर्णय घेतांना माझ्यासारख्याला लहान तोंडीं मोठा घास घेतल्यासारखें होई.  मग सार्वजनिक सेवेंत पदार्पण केल्यावर प्रत्यक्ष काम चालविण्यांत मला फार जड जाऊं लागलें.  उदाहरणार्थ, सर डॉ. भांडारकर व नामदार गोखले हे दोघेही प्रागतिक पक्षाचे मेरुमणि होते.  पण डॉ. भांडारकरांचा आपले सर्व प्रयत्‍न धर्माच्या पायावर करण्याचा अट्टाहास, तर गोखल्यांना धर्माबद्दल पूर्ण औदासिन्य असून राजकारणाचा जेथें तेथें मोह पडत असे.  विलायतेहून परत आल्यावर एकदां नामदार गोखल्यांनीं, ''आपण आस्तिक झालेलें बरें'' असे उद्‍गार मजजवळ काढले.  उलटपक्षीं मी प्रार्थनासमाजाचा प्रचारक असूनही वेळोवेळीं राजकारणांत डोकावतों हें पाहून डॉ. भांडारकर मला प्रेमानें आणि विनोदानें टोमणा मारीत कीं, ''अरे, तूं कांहीं झालें तरी गोखल्यांचाच शिष्य.''  मीही मग तितक्याच विनोदानें उत्तर देत असें कीं, ''दादासाहेब, नामदार गोखले आपले शिष्य.  मग मी आपला नातशिष्य ठरत नाहीं काय ?''

भांडारकर व गोखले ह्यांच्यामध्यें जर अशी तेढ तर चंदावरकर आणि टिळक ह्यांच्यामध्यें किती सलोखा असावा ह्याची कल्पनाच केलेली बरी.  मला तर माझ्या कामासाठीं या दोघांशींही जोड राखावी लागत असे.  म्हणजे अगोदरच अवघड असलेलें काम ह्या नव्या मानसिक उपाधीमुळें जवळजवळ अशक्य, निदान अत्यंत क्लेशकारक होऊन जात असे.  पण ही ओढाताण अखेरपर्यंत राहिली नाहीं.  भारतीय चळवळीचा विकास होऊन आज ही ओढाताण महात्मा गांधींच्या अष्टपैलुत्वामुळें बरीच कमी झाली आहे.

गंगा व यमुना ह्या दोन्ही नद्यांचा उगम हिमालयांत आहे; पण त्या मोठ्या प्रदेशावरून एकमेकांपासून अलग वाहात येऊन प्रयाग येथें पुन्हां एकत्र होतात.  तोच प्रकार आमच्या भारतीय चळवळीचा झाला आहे.  ह्या दृष्टीनें पाहातां राजा राममोहन राय हे हिमाचलाप्रमाणें आणि महात्मा गांधी हे प्रयागप्रमाणें भारतीय इतिहासांत अखंड शोभत राहतील.  राष्ट्रीयतेची यमुना आणि प्रागतिकतेची गंगा ही राजा राममोहन रायच्या चरणापासून निघून महात्माजींच्या अंजलीमध्यें पुन्हां एक झाल्या आहेत, हें किती गोड दृश्य !  पण हें दृश्य मला माझ्या कार्याच्या सुरुवातीला दिसण्यासारखें नव्हतें.  कारण ह्या गंगा व यमुना त्या वेळीं एकत्र झाल्या नव्हत्या.  म्हणून मला वाजवीपेक्षां अधिक त्रासाला तोंड द्यावें लागलें.

प्रयोगाचें नाविन्य  :  १९०३ च्या नोव्हेंबरमध्यें मुंबई प्रार्थनासमाजानें एकमतानें ठराव करून मला आपला प्रचारक नेमलें.  अल्लड तरुण असतांना ज्या मुंबई प्रार्थनासमाजाला मी वरवर पाहून इतरेजनांप्रमाणें नांवें ठेवीत होतों त्याच्याच मी आतां एकनिष्ठ सेवक झालों.  त्यावरून अंगांत थोडासा पोक्तपणा येऊं लागला असा अंदाज करण्यास हरकत नाहीं.  प्रार्थनासमाजाचें प्रचारकार्य हा त्या वेळीं एक अननुभूत प्रयोग होता.  माझ्यापूर्वी श्री. सदाशिवराव केळकर व श्री. शिवरामपंत गोखले ह्या दोघांनीं हें प्रचारकार्य केलें होतें.  तथापि ह्या प्रचाराची घटना माझ्या वेळीं अगदीं नवीन होती, असें म्हणावयास हरकत नाहीं.  प्रचारकार्यासाठीं योग्य संस्थेंतून तयार होऊन येणें, आल्यावर तें कार्य जीविताचा एकमेव हेतु म्हणून पत्करणें, आपल्या व कार्याच्या योगक्षेमासाठीं केवळ ईश्वराशिवाय इतरांवर अवलंबून न राहणें, कार्याचा विस्तार जसजसा होईल तसतशी साधनसामग्री हातास कशी येते याची प्रचीति घेणें वगैरे गोष्टी अगदीं नवीन होत्या.  हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध यांचीं तत्त्वें आणि ध्येयें जशीं निरनिराळीं आहेत तशीच त्यांची प्रचारकार्यपद्धतिही तत्त्वानुसार वेगवेगळी आहे.  ब्राह्मसमाजानें ह्या निरनिराळ्या धर्मतत्त्वांचा व ध्येयांचा ज्या अर्थी समन्वय केला आहे त्या अर्थी कार्यपद्धतींतही त्याला समन्वयच करणें भाग आहे.  ह्यासाठीं त्याला कोणी वंदो अथवा निंदो.

पद्धतीचे भेद  :  मुसलमान पद्धति लोकसत्तात्मक (Democratic), तर ख्रिस्ती पद्धति पितृवात्सल्याची, मेंढपाळाची (Pastoral), हिंदुप्रचारपद्धति भिन्न जाती व वर्ग यांच्यामध्यें विभागलेली, राजकारणी (Political), तर बौद्धांची निस्संग उदासीन वृत्तीची (Supreme Indifference).  ब्राह्मसमाजानें ह्या आवळ्यांची आणि भोपळ्यांची मोट कशी बांधावी ?

बंगाल्यांतील ब्राह्मसमाजाचें कार्य मोठ्या प्रमाणावर चाललें असल्यामुळें राममोहन राय, देवेंद्रनाथ, केशवचंद्र सेन ह्या विभूतींच्या अवतारकार्यामुळें गेल्या शतकांत त्या प्रांतीं आजीव प्रचारकांची वाण भासली नाहीं.  केशवचंद्रांच्या प्रभावळींत घरदार टाकून किंबहुना तें घेऊनही लहानथोर ताकतीचीं माणसें बेहोष होऊन पडत असत.  त्या मानानें गेल्या शतकाच्या शेवटापर्यंत ब्राह्मधर्माचें प्रचारकार्य तेजस्वीपणानें पार पडलें.  केशवचंद्रांचे दोन प्रभावी शिष्य पंडित शिवनाथशास्त्री आणि प्रतापचंद्र मुझुमदार यांनीं त्यांच्या मागूनही प्रचारकांची उणीव भासूं दिली नाहीं.  पण बंगाल्यांतला प्रकार वेगळा आणि बंगाल्याबाहेरचा प्रकार वेगळा.  बंगाल म्हणजे ब्राह्मधर्माचें सरोवर आहे.  त्यांतील पाणी कालव्यानें काढून अखिल भारतावर बागाईत करावयाची आहे.  बंगाल-बिहार प्रांतांत साक्षात् बौद्धधर्माचा उदय आणि प्रसार झाला असल्यानें जातिभेद आणि मूर्तिपूजा यांचें विष इतर प्रांतांप्रमाणें रुजलें नाहीं.  हा प्रांत आर्यावर्ताच्या बाहेरचा, मोंगली सीमेजवळचा, अर्धमोंगली असल्यामुळें ह्याच्यावर आर्यांचे राजकारणी हल्ले दक्षिण दिशेप्रमाणें झाले नाहींत.  रामायणाचें कार्यक्षेत्र द्राविड देशांत सताड पसरलें; पण रामानें पूर्वेकडे महाकोसलाची सीमा देखील ओलांडली नाहीं.  मध्ययुगांत मद्रासेकडे अळवार नांवाच्या भक्तांनीं वैष्णवधर्म पसरविला.  महाराष्ट्रांत तो वारकर्‍यांनीं वाढविला.  तें काम चैतन्यानें बंगाल्यांत केलें.  ब्राह्मसमाजाची वाढ इतर प्रांतांपेक्षां बंगाल्यांतच अधिक खुली कां झाली त्याचीं कारणें वर दिलीं आहेत.  ब्राह्मसमाजाची उपासनापद्धति देवेंद्रनाथानें घालून दिली ती ख्रिश्चनपद्धतीप्रमाणें आहे, अशी निंदाव्यंजक टीका होत असते.  ती टीका विशेष निरीक्षण करून केली जाते असें नाहीं.  देवेंद्राचें इंग्रजी शिक्षण विशेषसें न झाल्यानें व हिंदुस्थानाबाहेर प्रवासही न घडल्यानें त्यानें प्रणीत केलेल्या उपासनापद्धतीला वेदोपनिषदांचेंच आवरण फार पडलें.  त्याच्यामागें केशवचंद्र सेनावर चैतन्याच्या भक्तिमार्गाचें दडपण पडल्यानें टाळ, मृदंग आणि पताका यांचा कहर ब्राह्मसमाजांत झाला.  तरी टीकाकार म्हणतो कीं, ब्रह्मोपासना ख्रिस्ती पद्धतीचीच.  उपासनेचें कसेंही असो, प्रचारकपद्धतींत ख्रिस्तांचा जोरकपणा, सहानुभूति आणि व्यावहारिकता हे गुण येतील तितके कमीच म्हणायचे.  व्यापार करण्याच्या पद्धतींत जर ख्रिस्त्यांची व्यावहारिकता आम्ही मुकाट्यानें उचलतों, तर धर्मप्रचाराबाबत ती कां हेटाळावी ?

माझ्या वेळची परिस्थिति  :  १९०३ सालच्या अखेरीस प्रत्यक्ष कार्यास सुरुवात कशी करावी या बाबतींत मला आकाश फाटल्याचा अनुभव येऊं लागला.  मी जरी एका प्रांतिक समाजाचा प्रचारक होतों, तरी मुं.प्रा. समाजाचें कार्य मुंबई शहरापुरतेंच चाललेलें होतें.  पुणें, नगर, सातारा ह्या ठिकाणीं जरी समाज होते तरी आर्थिक दृष्ट्या हे समाज मुंबई समाजापासून स्वतंत्र आणि तुटक वागतात.  परस्पर मदतीची देवघेव होत असली तरी मध्यवर्ती घटना नाहीं आणि तिला कोणी अनुकूलही नाहीं.  तशी सूचना मीं वेळोवेळीं करूनही कांहीं लाभ झाला नाहीं.  त्या वेळीं इकडील प्रांतांत आणखी एक क्रांति घडून आली होती.  मुंबई समाजाची १८६७ सालीं स्थापना झाली.  एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं मुंबई समाजाची पहिली पिढी कालवश झाली होती.  डॉ. आत्माराम पांडुरंग, मामा परमानंद, वासुदेव बाबाजी नवरंगे, वामन आबाजी मोडक, महादेव गोविंद रानडे वगैरे वृद्ध मंडळी धर्मसंस्थापनेच्या दृष्टीनें खरोखर वरच्या दर्जाची होती.  म्हणूनच त्यांचे हातून समाजस्थापनेचें महत् कार्य झालें; पण चालू युगाच्या आरंभीं डॉ. भांडारकरांखेरीज आद्य प्रवर्तकांपैकीं कोणी उरला नाहीं.  सर नारायण चंदावरकर हे पहिली पिढी व दुसरी पिढी यांना सांधणारा महत्त्वाचा दुवा होते.  त्यांची गणना वृद्धापेक्षां तरुणांतच करणें बरें.  भांडारकर पुण्यास येऊन राहिल्यामुळें मुंबई समाजाच्या नेतृत्वाचें जूं चंदावरकरांच्याच मानेवर पडलें.  त्यांना अनुयायांचा भरणा अगदीं तरुणांचाच मिळाला.  स्टुडंट्स ब्रदरगुड (विद्यार्थ्यांचें भ्रातृमंडळ) या नांवाची केवळ कॉलेजांतील तरुण विद्यार्थ्यांची सभा प्रोफेसर वेलणकरांच्या नेतृत्वाखालीं चालली होती.  सर नारायणरावांच्या नेतृत्वाला ही संस्था एक अत्यंत अनुकूल क्षेत्रच मिळालें.  समाजाच्या अप्रत्यक्ष प्रचारकार्याचें हें एक उज्ज्वल उदाहरण होतें.  प्रो. वेलणकर हे ख्रिस्ती असून शेवटीं ते प्रार्थनासमाजांत लय पावले.  त्यांच्यामागें किती तरी तरुण लोक आले.  त्यांचा उघड निर्देश करणें जरूर नाहीं.  सांगण्याचा मतलब एवढाच कीं, सर नारायणराव हे तरुणच होते.

Read more: धर्मसेवा

दौरा

नाशिक  :  अशा वेळीं माझ्या मुलाच्या मृत्यूमुळें वैतागून मीं मनःशांतीसाठीं महाराष्ट्रांत व कर्नाटकांत दौरा काढला.  'केवळ विश्वासासाठीं' या मथळ्याखालीं हा दौरा सुबोध-पत्रिकेंत प्रसिद्ध झाला आहे.  बरोबर मीं डॉ. रुबेन व स्वामी स्वात्मानंदजी यांना घेतलें.  प्रथम ठाण्यास उतरलों.  तेथें डॉ. संतुजी रामजी लाड यांचे घरीं राहून उपासना चालवली.  जाहीर व्याख्यान झालें.  त्यांत तेथील सभासद रा. गुप्‍त यांनीं भाग घेतला.  त्यानंतर नाशिक येथें तेथील सुप्रसिद्ध वकील माझे मित्र रा. नीळकंठराव पाटणकर यांचेकडे उतरलों.  जाहीर व्याख्यानें व खाजगी संभाषणें सुरू झालीं; पण सर्वांत डॉ. रुबेनचें भजन लोकप्रिय ठरलें.  भजनमार्गांत फारसा शुष्क बुद्धिवाद किंवा खरा प्रयत्‍नवाद आम्हां हिंदु लोकांना मानवत नाहीं.  भक्तिरसाच्या पुरांत वाहात जाणें आम्हांला आवडतें.  रुबेननें एकतारीवरील भजनांत कांहींही मत प्रतिपादलें तरी चालेल, एरव्हीं खटखट नको, असें एका पुढार्‍यानें स्पष्ट सांगितलें.  रा. पाटणकरांचे ओळखीनें व सुचनेवरून नाशिक जिल्ह्यांतील आसवलें येथें राहणार्‍या अस्पृश्यवर्गांतल्या एका श्रीमंत पुढार्‍याकडे गेलों, पण आम्हां तिघांचा विचित्र वेष पाहून आम्ही कांहीं तरी मागावयाला भिकार-बैरागीच आलों, अशी समजूत करून घेऊन मुख्य मालक आम्हांस घराबाहेर भेटावयासच आला नाहीं.  आम्ही कंटाळून नदीवर जाऊन स्नान वगैरे उरकलें.  खावयास आमच्याजवळ उन्हाशिवाय कांहींच नव्हतें.  मुकाट्यानें आम्हीं अहमदनगरची वाट धरली.  पुढें रा. पाटणकरांनीं या गृहस्थाची चांगलीच हजेरी घेतली.  वर्तमानपत्रीं याची चर्चा झाली; पण सर्व व्यर्थ !  अहमदनगरचें काम आटोपून आम्ही बारामतीस आलों.  डॉ. रुबेननीं अहमदनगराहूनच कामाची रजा घेतली आणि त्यांची जागा रा.लक्ष्मण मनकू सत्तूर यांनीं घेतली.  बारामतीला ब्राह्मधर्माचा प्रसार अगदीं नवीन होता.

एक पंढरीमाहात्म्य  :  बैलगाडीनें आम्ही तिघे पंढरपुरास गेलों.  येथें प्रार्थनासमाजाच्या बालहत्या-प्रतिबंधक गृहांत उतरलों.  तेथील हायस्कूलचे प्रमुख रा. मोडक आमच्या परिचयाचे होते.  स्वात्मानंदजींचें व माझीं अशीं दोन व्याख्यानें या दोन दिवशीं स्वारीनें जाहिराती लावून आपल्या शाळेंत केलीं; पण आयत्या वेळीं पाहातों तों या स्वारीचा डाव भलताच होता.  अर्धा तास उलटून गेला, तरी शाळेंत एक चिट्पांखरूंही आलें नाहीं.  हेडमास्तांनीं आपल्या विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणीं नाकेबंदी केल्यामुळें आमचा हा कोंडमारा झाला.  अक्षरशः रिकामीं बाकें आमच्याबरोबर दिसूं लागलीं.  स्वामी स्वात्मानंदजी मोठे करारी.  ''शिंदेजी, आज हम व्याख्यान करेंगे.  आप सुनीये.  कल आप कीजिये और मैं सुनोगा.''  असें म्हणून त्यांनीं संपूर्ण व्याख्यान दिलें.  दुसरे दिवशीं मींही तसेंच केलें.  हें पंढरीमाहात्म्य.  'हा तो कांहीं नव्हे निराशेचा गांव ।  भले पोटीं वाव राखिलीया  ॥

पुढें सोलापुरास सरकारी वकील रा. नागेश पै यांचेकडे उतरलों.  तेथील रिपन क्लबांत व्याख्यान झालें.  येथें पंढरपुराच्या उलट प्रकार घडला.  व्याख्यानावर चांगली चर्चा झाली.  विजापुरांत रा. आजरेकर वकिलांच्याकडे उतरलों.  तेथील एका थिएटरांत व्याख्यान झालें.  आमच्याबरोबर ब्राह्मो पोस्टल मिशनच्या पत्रिकांचा व पुस्तकांचा गठ्ठा होताच.  ही सामुग्री आम्ही सढळ हातानें वांटीत चाललों.  हुबळीस सर नारायण चंदावरकरांचे व्याही रा. नारायणराव शिरूर यांचा कळकळीचा पाहुणचार घेतला.  म्युनिसिपल हॉलमध्यें व्याख्यान झालें.  धारवाडांत उतरण्याची विवंचना पडली.  तेथील माझे बालमित्र रा. जनार्दन सखाराम करंदीकर यांची गांठ पडली.  त्यांनीं उतरण्याची व कामाची उत्तर सोय केली.  बेळगांवास आम्ही मणेरीकर यांचेकडे उतरून त्यानंतर पुण्याहून मुंबईंत आलों.

तातंडीची तार  :  घरीं परत येईतोंपर्यंत मंडळीचा आजार वाढला होता.  अशा घाईंत काशी येथील भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेची कामगिरी अंगावर घ्यावीच लागली. पुढील नाताळांत तें काम आटोपून बंगाल-बिहार-आसामच्या लांब दौर्‍यावर निघालों.  शेवटीं बदरीसाल येथें जाहीर व्याख्यान करीत असतां घरून एक तांतडीची तार हातीं आली.  मुंबईस सौ. रुक्मिणीबाई हिच्यावर कामा हॉस्पिटलमध्यें एक कठीण ऑपरेशन झालें आणि अहमदनगर येथें बहीण चंद्राबाई मृत्युशय्येवर पडली आहे, असा मजकूर तारेंत होता.  डॉ. वैकुंठ कामत ह्यांनीं ही तार केली होती.  जवळजवळ तीन हजार मैलांचा दौरा टाकून मी तांतडीनें घरीं निघालों.  रात्रीं १२ वाजतां मी अहमदनगर येथें पोंचलों.  प्रिय भगिनीचें शेवटचें दर्शन घेऊन मी पुन्हां येतों असें आश्वासन देऊन पत्‍नीच्या समाचारास मुंबईला गेलों.  दुसरे दिवशीं चंद्राबाईच्या निधनाची बातमी आली.  १९०६ चा फेब्रुवारी ता. २ हा दिवस.  ह्याचें नांव प्रचारकार्य !

उदार धर्म वाचनवर्ग  :  ता. १२ फेब्रुवारी १९०४ रोजी ब्रिटिश ऍंड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचे सेक्रेटरी यांचेकडून पत्र आलें.  त्यांत सेंट्रल पोस्टल मिशन, लंडन या संस्थेनें प्रार्थनासमाजामार्फत ह्या मिशनचें कार्य यशस्वी रीतीनें चालविल्याबद्दल शिंदे आणि सुखटणकर यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला.  यानंतर ता. १८ आक्टोबर १९०४ रोजीं वरील संस्थेकडून दुसरें पत्र येऊन त्यांत ह्याच कामाचा विस्तार करण्यासाठीं उदार धर्मवाचक ग्रंथांचा एक विशेष वर्ग वालवून त्यांत विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना पारितोषिकें देण्याची व्यवस्था केल्यास तूर्त १०० रु. ची देणगी पाठवूं काय, असें विचारलें होतें.  कलकत्त्यास हेमचंद्र सरकारनें असा वर्ग काढला होता व त्यांना अशी देणगी देण्यांत आली होती.  उदार धर्मवाङ्‌मयाचा प्रसार हिंदुस्थानांत अधिक प्रमाणावर करण्यासाठीं ब्रिटिश ऍंड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचा प्रतिनिधी या नात्यानें काम चालवल्यास माझीं इतर कामें संभाळून मीं तयार आहें कीं नाहीं हें विचारलें होतें.  तयार असल्यास वाङ्‌मयाचा सांठा गरजेप्रमाणें अधिक पुरवण्याची हमी घेतली होती.  त्यासाठीं जो खर्च होईल तोही वेळोवेळीं रोख पाठविण्याची कबुली दिली होती.  त्यांना मीं उत्तर कळवलें कीं, 'मी हा विशेष वर्ग चालवण्याचें कार्य आधींच सुरू केलें आहे.  ह्या वर्गांतील हजेरीपटावर सुमारें ३० अंडरग्रॅज्युएटस्चीं नांवें आहेत.  तूर्त विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेंत गुंतले असल्यामुळें हा वर्ग बंद ठेवण्यांत आला आहे.  योग्य वेळीं सालोसाल तो पुढें चालू होईल, ही व्यवस्था कित्येक वर्षे चालू ठेवण्यांत आली.  त्यामुळें तरुणांचें लक्ष समाजाचे कामाकडे विशेष लागलें.

दुस-या गटाची तयारी

१९२१ साल सुरू झालें.  दुष्काळाच्या आपत्तींत सांपडलेल्या हजारों माणसांचे प्राण वांचले आणि भोकरवाडींतील भव्य पटांगण दुसर्‍या इमारतीचा पाय खणण्यासाठीं मोकळें झालें.  पाया खणूनही तयार झाला.  होळकर सरकारनें २०००० रु. दिले तेव्हां भावी आश्रमाला ''अहल्याश्रम'' हें नांव देण्याचें त्यांनीं कबूल केलें.  म्हणून सर तुकोजीराव होळकर यांचेकडे 'पाया घालण्यास या' असें आमंत्रण करण्यास मी इंदुरास गेलों.  पण त्या वेळीं श्रीमंत महाराजांवरच आकाश कोसळलें होतें.  त्यांना पदच्युत करण्याची धामधूम चालली होती.  माझें काम झालें नाहीं.  मी इंदुराहून मातृसंस्थेच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीला माझ्या जनरल सेक्रेटरीशिपचा राजीनामा पाठवला.  वाटेवरचें युद्ध घरीं आलें होतें, आणि ज्यांच्यासाठीं मीं जिवाचें आणि घरादाराचें रान केलें होतें तेच माझ्यावर असंतुष्ट होते.  कारण काय, तर आतां मोठमोठ्या इमारती होऊं लागल्या, देशभर स्वराज्याची भाषा चालूं लागली, मग ह्या मिशनमध्यें अस्पृश्यांना स्वराज्य कां मिळूं नये ?  मातृसंस्थेंतील लोक या वादाच्या मुळाशीं जाईनात.  या लोकांचे व्यर्थ लाड पुरवूं नयेत असा वरवरचा उपदेश करून वेळींअवेळीं ते मलाच दोघ देऊं लागले.

विरोधक चळवळींत पुण्याचे शिवराम जानबा कांबळे यांचा हातखंडा असे.  रा. हरिश्चंद्र नारायण नवलकर यांनीं शिवराम जानबा कांबळे यांचें चरित्र लिहिलें आहे.  त्यांत पान ४३ वर खालील मजकूर आहे :-

अस्पृश्योद्धारक मंडळी  :  रा. वि. रा. शिंदे ह्यांच्या नि. सा. मंडळीकडून अस्पृश्यांत जितक्या जोरानें विद्येचा प्रसार होईल अशी जी त्या समाजाची अपेक्षा होती ती निष्फळ होत चालली.  अशा परिस्थितींत रा. किसन मुक्ताजी सोनवणे ह्या तरुण गृहस्थांनीं शिवराम रामजी कांबळे यांच्या घरीं जाऊन त्यांना असें सुचवलें कीं, आपण एक नवीन संस्था स्थापन करूं आणि ह्या कामीं श्री. वालचंद रामचंद्र कोठारी, बी.ए. संपादक 'जागरूक' यांचा सल्ला घेऊं.  ह्याप्रमाणें हे उभय गृहस्थ रा. कोठारी ह्यांना जाऊन भेटले.  त्यांना हा विचार पसंत झाला आणि हे तीन गृहस्थ डॉ. मॅनसाहेबांच्या घरीं जाऊन भेटले.  डॉ. मॅनसाहेबांनाही हा विचार मान्य झाला आणि चौघांच्या संमतीनें ता. १६।४।२१ रोजीं वरील संस्था स्थापली.  डॉ. मेनसाहेबांनीं रा. कोठारी यांना अस्पृश्योद्धारकमंडळीची रचना कशी करावयाची यासंबंधानें एक मसुदा तयार करण्यास सांगितलें.  रा. कांबळे यांनीं ता. १७।४।२१ रोजीं डॉ. मॅनसाहेबांना एक पत्र पाठविलें.  त्यांत वरील मंडळीसाठीं ३००० रु. ची रक्कम जमवावी आणि तत्प्रीत्यर्थ १०० रु. रा. कांबळे यांनीं आपल्यातर्फे आगाऊ दिले.  डॉ. मॅननीं कांबळे यांस आभाराचें पत्र पाठविलें.''

भोकरवाडींत आमच्या मोठ्या इमारतीचा पाया एका बाजूस पडत होता तर दुसरीकडे मिशनला विरोधी संस्था अस्पृश्यवर्गाच्यातर्फे निघून तिचा पाया येणेंप्रमाणें घातला जात होता.  कांहीं कारणामुळें डॉ. मॅन हे पुणें शाखेच्या कमिटीवर नव्हते.  ही संधि साधून वरील अस्पृश्यमंडळींनीं त्यांना आपल्याकडे खेंचलें.  अस्पृश्यांच्या संस्थेनें काय काम केलें हें कळत नाहीं.  पण रा. शिवरामभाऊंच्या चरित्राच्या प्रस्तावनेच्या आरंभीं त्यांच्याच हस्ताक्षरांतील खालील पत्र प्रसिद्ध झालेलें आहे.  


कामाठीपुरा, ५ वी गल्ली
पुणें, ता. २-४-२८

रा. रा. वा. रा. कोठारी यांस :-

सा. न. वि. वि. आपला ता. २७-३-२८ चा जोडकार्ड पोहचला.  डिप्रेस्ड क्लासेस कमिटीच्या असलेल्या शिल्लक रक्कमेचा व्यय पुढें कसा करावयाचा असें डॉ. मॅन यांनीं आपणांस विलायतेहून विचारलें आहे, आणि त्याप्रमाणें आपण ही रक्कम अस्पृश्य विद्यार्थिगृहाला व येथील चांभार विद्यार्थी मंडळाला द्यावी असें आपलें मत व्यक्त केलें आहे.  तरी आपण दोघांनींच या रक्कमेची विल्हेवाट लावणें हें मला बरें दिसत नाहीं.

आपली संस्था स्थापन होऊन आज सुमारें ७ वर्षे होऊन गेलीं आहेत.  एवढ्या अवधींत जमाखर्चाचा हिशोब कमिटीपुढें एकदांही ठेवण्यांत आला नाहीं.  तेव्हां आतां आपणांला संस्था बंद ठेवायची असेल तर तिच्या सभासदांची मीटिंग बोलावून ह्या गोष्टीचा विचार करावा अशी माझी सूचना आहे.

आपला,
शिवराम जानबा कांबळे


ह्या सुमारास मिशनच्या वसतिगृहांतून बरेच वरिष्ठ दर्जाचे शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी, वर्‍हाडांतील रा. गणेश अक्काजी गवई व पां. ना. भटकर, अस्पृश्योद्धारार्थ स्वतः झटूं लागले.  पण अस्पृश्यांच्या उच्च शिक्षणाच्या कामीं हयगय करून विद्यार्थिगृहें व उद्योगशाळा काढण्यांत मिशन वेळेचा व पैशाचा उगाच व्यय करीत आहे अशा तक्रारी वरील पुढार्‍यांकडून येऊं लागल्या आणि अशा तक्रारींस मिशनच्या प्रचारकार्यांतून रिकामे झालेले रा. जी. के. कदम ह्यांच्याकडून आश्चर्यकारक पाठिंबा मिळूं लागला.  ता.३० मे १९२० च्या सु. पत्रिकेंत या प्रकरणीं खालील मजकूर आहे.

''रा. पां. वा. भटकर १९१८ सालच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेंत नापास झाले.  नंतर बोर्डिंग सोडून मिशनच्याच प्रयत्‍नानें नोकरीस लागले.  १९१९ मध्यें पुन्हां कॉलेजच्या पहिल्या परीक्षेस बसले व पास झाले.  आपल्याला कॉलेजकोर्स पुरा करावयाचा असेल तर मिशन मदत करावयास तयार आहे. मग चार सोडून ८ वर्षे लागलीं तरी हरकत नाहीं.  फक्त बोर्डिंगांत राहून अभ्यास केला पाहिजे.  (रा. भटकर यांना रा. शिंदे यांनीं स्वतः श्रीमंत सयाजीरावमहाराजांकडे नेऊन २५ रु. ची दरमहा स्कॉलरशिप देवविली; पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं.)

''मिशन स्थापन झाल्याला आज अवघीं १३ वर्षे झालीं.  इतक्या अवकाशांत ज्यांची मजल मॅट्रिकपर्यंत पोंचली अशा विद्यार्थ्यांची माहिती वर थोडक्यांत दिलेली आहे.  तीवरून उच्च शिक्षण झेंपण्याइतकी ताकद सदर विद्यार्थ्यामध्यें कितपत आहे हें दिसून येईल.  आज मुंबई बोर्डिंगांत ९।१० मुलें हायस्कूलचें शिक्षण घेत असून लवकरच मॅट्रिकच्या परीक्षेला बसतील अशी त्यांची तयारी आहे.  ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे मिशन उच्च शिक्षणाचे किपत विरुद्ध आहे या आरोपाचा निकाला लागेल.  रा. गवई व रा. भटकर ह्या मॅट्रिक पास झालेल्यांची रा. शिंदे यांच्याच खटपटीनें सेंट झेवियर आणि फर्ग्युसन कॉलेजांत पुढील अभ्यास करण्याची सोय झालेली असून तिचा त्यांनीं फायदा घेतला नाहीं.  बोर्डिंगें, शाळागृहें इत्यादिकांची किती जरूरी आहे हें आंधळ्यालाही दिसण्यासारखें आहे.  असें असून आमच्या अस्पृश्यबांधवांना या गोष्टी निरर्थक वाटतात व ह्या गोष्टींवर पैसा खर्च करणें म्हणजे 'खराबी' करणें वाटतें.  पैसा कोणाचा, खर्च करतो कोण, निषेध करतो कोण ?  सर्वच कांहीं चमत्कार !

'' ... आज उच्च वर्णाच्या लोकांनीं नीच मानलेल्या लोकांचा जो पक्ष घेतला आहे तो त्यांच्यामध्यें जागृति करण्यासाठीं व त्यांना मार्ग दाखविण्यासाठीं आहे, हें सर्वांनीं लक्षांत ठेवलें पाहिजे.  अस्पृश्यांनीं स्वतःचा उद्धार आपला आपणच केला पाहिजे.  स्वतः त्यांनीं आपल्या पायांवर उभें राहिलें पाहिजे, असें आम्हीं आजपर्यंत पुष्कळ वेळां म्हटलें आहे.  परंतु ही मंडळी स्वतः थोडी चळवळ करूं लागली कीं, तीस प्रारंभ उच्च वर्णाच्या द्वेषाच्या द्वारें होत असतो.  हें जें एक नवीनच विघ्न उपस्थित होतें तें त्यांच्या उद्धाराच्या चळवळी उच्चवर्गीय असल्यानें कमी प्रमाणानें भासेल असा आमचा अनुभव आहे.  दुसरी एक खेदाची गोष्ट आम्हीं अनुभवली आहे कीं, अस्पृश्यवर्गीयांपैकीं कांहीं मंडळी पुढें गेली म्हणजे मग त्यांना आपल्या मागासलेल्या बंधूंची आठवण पडत नाहीं.  ते आपल्यापैकींच आहेत हें ते विसरतात.  पुढें गेलेल्यांमध्ये मागें राहिलेल्यांच्या संबंधानें जागृत सहानुभूति कशी उत्पन्न करतां येईल हा फार महत्त्वाचा प्रश्न नीच मानलेल्या जातींची कळकळ बाळगणारांपुढें आहे.''

येणेंप्रमाणें अस्पृश्यांत वादाचें रण माजलें असतां भोकरवाडींतील मुख्य इमारतीचा पाया घालण्यांत येऊन कोनशिला बसविण्याची वेळ येऊन ठेपली.  होळकर महाराज न आल्यामुळें मला म्हैसूर येथें जाऊन तेथील युवराजसाहेबांना या समारंभास येण्यासाठीं आमंत्रण करावें लागलें.  तें त्यांनीं आनंदानें पत्करलें.  ता. ५ सप्टें.१९२१ रोजीं गणेशचतुर्थीचा मुहूर्त होता.  त्या दिवशीं कोनशिला बसविण्याचें ठरविलें होतें.  पहिल्या गटांतील इमारतीच्या समोरील पटांगणांत भव्य मांडव घालण्यांत आला होता.  म्हैसूरचे युवराज सर कांतिरव नरसिंहराज वाडियर बहादूर जी.सी. आय. ई. यांनीं अध्यक्षस्थान मंडित केलें होतें. गांवांतील प्रमुख मंडळींनीं उच्च स्थान चिक्कार भरून गेलें होतें.  प्रेक्षकांनीं मंडपही भरला होता.  या वेळीं सेक्रेटरी या नात्यानें मीं जी महत्त्वाची घोषणा केली ती अस्पृश्यांनीं मिशनमध्यें येऊन जबाबदारपूर्वक काम करण्याची जी चळवळ चालली होती तिच्या दृष्टीनें फार महत्त्वाची होती.  सु. सत्रिकेच्या ता. ११।९।२१ च्या अंकांत त्या घोषणेचा जो विस्तृत उल्लेख केला आहे तो मार्मिक आहे. तो असा :-

''गेल्या सोमवारीं पुणें शहरीं अहल्याश्रमाची कोनशिला बसविण्याचा समारंभ म्हैसूर युवराजांचें हस्तें झाला.  त्या वेळीं रा. शिंदे यांनीं फार सुंदर व जागृतिकारक भाषण केलें.  ज्यांस आज बहुजनसमाज अस्पृश्य समजत आहे त्यांच्या उद्धारकार्याला आपल्याला स्वतःला वाहून घेतलें व त्यांच्याच चळवळीचें मूळ म्हणून त्या लोकांमध्यें आतां जागृति उत्पन्न झाली असतां रा. शिंद्यांचे हेतूंचा अस्पृश्यांतीलच कांहीं लोक विपर्यास करूं लागले आहेत.  त्यांच्याविषयीं रा. शिंदे यांचे उद्‍गार सर्व अस्पृश्यांनीं लक्षांत घेण्यासारखे आहेत.  नि. सा. मंडळीचा उद्देश अस्पृश्यांत स्वाभिमान उत्पन्न करून त्यांस स्वावलंबी करण्याचा होता व आहे.  ही विचारजागृति होत असल्याचीं चिन्हें दिसत आहेत व त्याबद्दल शिंद्यांनीं संतोष प्रदर्शित केला आहे.  हें मिशन ह्याच मंडळींसाठीं आहे व त्यांनींच तें चालवावें हें केव्हांही योग्यच.  रा. शिंदे यांची त्यास तयारीही आहे.  पंरतु आम्हांला तर असें वाटतें कीं मिशनसारखी संस्था स्वतंत्रपणें चालविण्याची पात्रता अद्याप आमच्या अस्पृश्य गणलेल्या बांधवांत आली नाहीं.  हा त्यांचा दोष नव्हे.  बहुत काल अज्ञानाच्या स्थितींत राहिल्यामुळें त्यांस ही स्थिति प्राप्‍त झाली आहे.  ह्यासाठीं जागृतीचें कार्य वरिष्ठ वर्गाकडूनच होणें इष्ट व अगत्याचें आहे.  वरिष्ठ वर्गांनीं ह्या वर्गाविषयीं अन्याय केला आहे.  तो वरिष्ठ वर्गांच्याच गळीं उतरवला पाहिजे.  दुसरी एक गोष्ट अशी आहे कीं, निराश्रित साह्यकारी मिशनसारख्या संस्था सहकारी तत्त्वावर चालणें शक्य आहे; परंतु केवळ सर्व सत्ता आपल्या हातीं असावी व त्या संस्थेस वाहून घेतलेल्या माणसांनीं ह्या नव्या जागृत होऊं पाहणार्‍या लोकांच्या हाताखालीं वागावें असें कोणीं म्हटलें तर तें अत्यंत अप्रयोजक होईल.  ज्यांच्यासाठीं ही सर्व खटपट आहे.  त्यांच्यामध्यें जागृति झाली तर ही मंडळी स्वतःच्या पायावर उभी राहून कार्यक्षम होऊं लागली कीं, नि. सा मंडळी आपोआपच आपलें दप्‍तर आवरावयास लागेल.''

यावर गोपाळ कृष्ण देवधर वगैरे कांहीं वक्तयांचीं भाषणें झालीं.  मुलांचे प्रेक्षणीय खेळ झाले.  महाराजांनीं जाऊन कोनशिला बसविली.  पुनः स्वस्थानीं आल्यावर त्यांनीं सहानुभूतिपर भाषण केलें.  आभार मानल्यावर सभा बरखास्त झाली.

जवळच्या इमारतींत बर्‍याचशा खर्ुच्या ठेवून खास गुप्‍त बैठकीची व्यवस्था अगोदरच करून ठेवण्यांत आली होती.  या बैठकींत अस्पृश्यांच्या तक्रारी, मागण्या व सूचना काय आहेत त्या त्यांनीं युवराजांच्या कानांवर प्रांजळपणें घालाव्यात, असें माझें त्यांना स्पष्ट सांगणें होतें.  स्पृश्यवर्गापैकीं या सभेस कोणीही हजर राहूं नये आणि मिशनच्या चालकांपैकीं कोणीहीं या गुप्‍त सभेपासून होतां होईल तों दूर राहावें, असा कडेकोट बंदोबस्त अस्पृश्य स्वयंसेवकांकरवीं ठेवण्यांत आला होता.  अस्पृश्यांचें म्हणणें ऐकून युवराजांनीं आपल्यास पसंत वाटेल त्याप्रमाणें आपलें म्हणणें वर्तमानपत्रांतून जाहीर करावें अशी त्यांस विनंती करण्यांत आली होती.  पण ह्या योजनेमुळें अस्पृश्यांचा विरोध बहुतेक जागच्या जागींच विरला.

तृण नाहीं तेथें पडला दावाग्नी ।  जाय तो विझोनी आपसया ॥

बैठक झाली.  महाराजांनीं म्हणणें ऐकून घेतलें.  पण ''जाहीर करण्यासारखें कांहींच नाहीं.  सर्व ठाकठीक आहे.''  असा अहवाल हंसत हंसत महाराजांनीं मला येऊन सांगितला.

मातृसंस्थेकडे मी माझ्या जनरल सेक्रेटरीशिपचा राजीनामा मागेंच दिला होता.  कमिटीनें हें मंत्रिपद रा. गिरिजाशंकर त्रिवेदी यांजकडे दिलें होतें.  तरी पण ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणजे घटनामंत्र्याचें काम मींच करावें असा एक्झिक्युटिव्ह कमिटीचा ठराव होता; पण दगदगीचें काम तर हेंच होतें.  मी तर त्याला फार कंटाळलों होतों.  इमारतीचें कामही आतां सुसूत्र चाललें होतें.  म्हणून पुणें शाखेच्या स्थानिक सेक्रेटरीचाही अधिकार मी खालीं ठेवण्यांस तयार झालों होतों.  पण इमारतीचें काम प्रत्यक्ष संपूर्ण होण्यापूर्वी पुणें शाखा मला सोडण्यास तयार होईना.  म्हणून कसेंबसें एक वर्ष मला अत्यंत नाइलाजानें कंठावें लागलें.

ता. ३ मार्च १९१८ सु. पत्रिकेंत म्हणजे मुंबई येथें जी मोठी अस्पृश्यतानिवारक परिषद झाली, तिच्या पूर्वी एका सद्‍गृहस्थानें माझ्या उलट धोक्याची सूचना म्हणून इंग्रजींत खालील मजकूर लिहिला होता.

"From an announcement in the Local Papers it appears that under the auspicies of the D.C.M. Society an All India Conference will be held in Bombay.  I have also heard that efforts are being made to enlist the practical sympathies of Pandit Madan-Mohan Malwiya and even of Mr. B. G. Tilak.  It is good to enlist the sympathy of the nationalist Party in this cause since the Congress passed the sympathetic resolution in its last session.  It seems that the general secretary has lately been moving in that direction.  I understand that in his anxiety to secure the nationatist support the General Secretary has gone to the length of incorporating many leading nationatists in the executive committee of the Society.  At the recent election by removing old and experienced workers who have built up the Society none would be more glad than myself to see more of our public men taking interest in such philanthropic institution.  But enlisting sympathy and agitating vigorously to that end is one thing and to place your inachinery in the bands of Political agitators, is another.  I have many things to say against the methods of the General Secretary and his latest step has confirmed me in my belief that he is more fit to be a propagandist or an agitator for this cause than to be the executive head of an institution which had to be worked on recognised rules of business, specially as the Society "From an announcement in the Local Papers it appears that under the auspicies of the D.C.M. Society an All India Conference will be held in Bombay.  I have also heard that efforts are being made to enlist the practical sympathies of Pandit Madan-Mohan Malwiya and even of Mr. B. G. Tilak.  It is good to enlist the sympathy of the nationalist Party in this cause since the Congress passed the sympathetic resolution in its last session.  It seems that the general secretary has lately been moving in that direction.  I understand that in his anxiety to secure the nationatist support the General Secretary has gone to the length of incorporating many leading nationatists in the executive committee of the Society.  At the recent election by removing old and experienced workers who have built up the Society none would be more glad than myself to see more of our public men taking interest in such philanthropic institution.  But enlisting sympathy and agitating vigorously to that end is one thing and to place your inachinery in the bands of Political agitators, is another.  I have many things to say against the methods of the General Secretary and his latest step has confirmed me in my belief that he is more fit to be a propagandist or an agitator for this cause than to be the executive head of an institution which had to be worked on recognised rules of business, specially as the Society is a registered body."

या इंग्रजी मजकुराचा भावार्थ असा कीं, ''मिशनच्या कार्याला राष्ट्रीय पक्षाची मदत आणि सहानुभूति मीं मिळवली आहे हें बरें आहे.  पण मिशनच्या साधारण सभेच्या गेल्या निवडणुकींत एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्यें राष्ट्रीय पक्षाचीं कांहीं माणसें मीं घेतलीं हें बरें केलें नाहीं.  मिशनच्या कारभाराच्या मुख्य जागेवर काम करण्यापेक्षां प्रचाराची चळवळ करण्यास माझी लायकी आधिक आहे.  म्हणून मी यापुढें जनरल सेक्रेटरी म्हणून काम न करतां घटनामंत्री म्हणून काम करणें बरें.

आक्षेपास उत्तर  :   मिशनच्या कामाला सर्व पक्षांची सहानुभूति मिळाली पण कारभारांत मात्र राष्ट्रीय पक्षांचा हात शिरकुं द्यावयाचा नाहीं असा प्रकार किती दिवस चालूं शकला असता ?  वर्गणी घ्यावयाची, परिषदेंत काम करावयाचें आणि निवडणुकीच्या वेळीं मात्र विशिष्ट पक्षाला बाहेर ठेवावयाचें हें शक्य कसें ?  सुरुवातीला प्रा. समाजाच्याच पुढार्‍यांनीं मिशन चालविलें.  त्यांच्याच श्रमानें मिशन नांवारूपाला आलें, ही गोष्ट अगदीं खरी; पण म्हणून त्यांच्याच श्रमामुळें राष्ट्रीय पक्षाची सहानुभूति मिळून कमिटीवर काम करण्यास ते पुढें आले असतांना त्यांना दूर ठेवणें कसें शक्य होईल ?  सोसायटी रजिस्टर्ड आहे.  तिच्या सनदेचे नियम आहेत आणि ते पाळण्याला नवीन येणारे लोक तयार आहेत.  मग त्यांना बाहेर कसें ठेवावें  ?  साधारण सभेंतून एक्झिक्युटिव्ह कमिटीची निवडणूक तर उघड्यां पद्धतीनें आणि नियमानुसार होत होती.  नवीन निवडणुकीचें श्रेय किंवा अपश्रेय व तिची जबाबदारी एका जनरल सेक्रेटरीवरच कशी पडते ?  स्वतः जनरल सेक्रेटरीची निवडणूकही याच नियमान्वयें होत होती.  या वादाला कंटाळून त्यांनीं जनरल सेक्रेटरीशिपचा राजीनामा दिल्यावर पुन्हां त्यांना ऑर्गनायझिंग सेक्रेटरी नेमण्यासाठीं मिशननें नवीन नियम केले त्यांत तरी जनरल सेक्रेटरीचा हात नव्हता ना ?  सुबोध पत्रिकेमध्ये निनांवी तक्रार करणार्‍यांनीं या गोष्टीचा विचार करावयास पाहिजे होता.

असहकार  :   अस्पृश्यवर्गाचें लक्ष राष्ट्रीय जागृतीकडे आणि राष्ट्रैक्याकडे वळवतांना मिशनचे अध्यक्ष सर नारायणराव, मुंबई शाखेचे सेक्रेटरी वामनराव सोहोनी, इतर कार्यकर्ते रा. सय्यद वगैरे आणि मी ह्या सर्वांचें एकमत होतें.  ह्या वादाचे वेळीं आम्हीं सर्वांनीं समतोलपणा राखला होता.  अशा वेळीं महात्मा गांधींनीं आपली अहसकाराची व बहिष्काराची चळवळ सुरू केली.  शाळा-कॉलेजें, कोर्टांतील वकिली या सर्वच गोष्टींवर बहिष्कार पडूं लागला.  राष्ट्रीय शाळांनीं सरकारी ग्रँट घेण्याचें बंद केलें.  अशा वेळीं आमच्या मिशनपुढें प्रश्न उभा राहिला कीं, अस्पृश्यवर्गाला आम्हीं या असहकाराच्या चळवळीत ओढावें कीं काय ?  त्यासाठीं आमच्या शाळांना मिळणार्‍या मोठमोठ्या सरकारी ग्रँटस् सोडाव्यात कीं काय ?  असें करणें आम्हांला इष्ट आणि शक्य दिसलें नाहीं.  राष्ट्रीय सभेला मिळून तिच्याशीं एकजीव होऊन काम करण्यास अस्पृश्यवर्ग तयार नव्हता.  त्यांच्यावर जबरी करण्याचा अधिकार आम्हांला नव्हता.  १९१८ सालांत कर्नाटकांत अथणी या गांवीं राष्ट्रीय पक्षाच एक मोठी जिल्हा परिषद झाली होती.  तींत मीं भाग घेतला होता.  त्या वेळीं या बाबतींत लो. टिळकांचें स्पष्ट मत काय होतें याचा मीं सुगावा घेतला.  सरकारी मदत बंद केल्यास आमच्या अखिल भारतीय मिशनच्या खर्चाची सर्व जबाबदारी राष्ट्रीय सभा, लो. टिळक अथवा महात्मा गांधी घेऊं शकतील काय ?

टिळकांचें मत  :  आमच्या शाळांना सरकार ज उदार ग्रँट देतें तें सरकारचें कर्तव्यच आहे.  एरव्हीं अस्पृश्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च जो सरकारवर पडला असता त्याचा निम्मा भाग ग्रँट म्हणून देण्यांत सरकारचा फायदाच आहे.  राष्ट्रीय सभा अगर इतर कोणी हा निम्मा भाग आपण देऊन सरकारची त्यांतूनही सुटका करणार काय ?  सरकारी मदत न घेतली तरी विद्याखात्याच्या नियंत्रणाखालून आमच्या शाळा कशा सुटणार ?  ह्या सर्व गोष्टी नीट विचारांत घेऊन आमच्या मिशननें असहकाराच्या चळवळींत मुळींच पडूं नये आणि सरकारी ग्रँट अवश्य घ्यावी हें उभयपक्षीं शहाणपणाचें होईल.  व्यक्तिशः मी किंवा माझ्यासारखीं माणसें राजकारणांत स्वतंत्रपणें भाग घेतात हें पुष्कळ झालें.  आमच्यामागें मिशनला ओढणें शक्य नाहीं व इष्टही नाहीं असें लो. टिळकांनीं स्पष्ट मत दिलें.

गांधींचे मत  :  १९२१ च्या नाताळांत नागपूर येथें राष्ट्रीय सभा भरली.  असहकारितेच्या चळवळींत अस्पृश्यांना सामील करून घ्यावें कीं नाहीं या बाबतींत माझें मत काय पडतें हें महात्मा गांधींनीं अजमावून पाहण्याचें ठरवलें.  त्या वेळीं आमच्या मिशनची अखिल भारतीय परिषद जमवण्यासाठीं मी नागपूरला गेलों होतों.  याच संधीला माझें मत घेण्यास्तव राष्ट्रीय सभेच्या विषयनियामक कमिटींत महात्माजींच्या सांगण्यावरून माझी नेमणूक केली.  अथणीं येथें लो. टिळकांनीं जें सांगितलें तेंच नागपूर येथें महात्माजींना सांगितलें.  पोक्तपणें विचार करून पाहिल्यावर असहकार्यासारख्या कठिण बाबतींत अस्पृश्यांना गुंतवण्याचा तूर्त काळ आला नाहीं हें जाणून मिशनचें समतोल धोरण त्या वेळीं जें मीं ठरवलें होतें तेवढेंच पुरें आहे, सरकारी ग्रँट चालू ठेवावी असें महात्माजींचें म्हणणें पडलें.

सु. प. च्या ५ जाने. १९२१ च्या पानावरील मजकुराचा सारांश.

नागपूर परिषद  :   ''नागपूर येथें अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद गेल्या शनिवारीं ता. २५ डिसें. १९२० रोजीं रा. गांधी यांच्या अध्यक्षतेखालीं भरून पुढील आशयाचे ठराव पास झाले : (१) अस्पृश्यवर्गाची हिंदु धर्म व हिंदु राष्ट्र यांशीं एकनिष्ठा ध्यानांत घेऊन त्यांच्यावर असलेल्या नागरिकत्वाचे व धार्मिक प्रकारचे सर्व प्रतिबंध एकदम काढून टाकावे.  

(२)  हिंदुस्थानांतील उद्योगधंद्यांचा पूर्ण विकास व्हावा म्हणून अस्पृश्यांच्या मार्गांत अद्यापि स्वतंत्रपणें धंद्याची निवड करण्यांत आणि चालवण्यांत कांहीं अडथळे येत आहेत ते सर्व जाऊन त्यांच्यांत स्वयंनिर्णयाची वृत्ति विकसित व्हावी, अशा रीतीनें त्यांना हरएक सवलत देऊन मदत करावी.

वरील परिषद रा. विठ्ठल रामजी शिंदे यांनीं नागपूरच्या पांचपावलीजवळील मैदानांत अत्यंत घाईघाईनें भरवली.  तरी पण परिषदेस प्रचंड लोकसमूह हजर होता.  मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, जम्नालाल बजाज, सरोजिनी नायडू, राजगोपालाचारी वगैरे प्रांतोप्रांतींचे पुढारी हजर होते.  महात्माजींचें भाषण सर्वांनीं शांतपणें ऐकून घेतलें.  ते म्हणाले, ''मी वैष्णव आहें.  वरर््णाश्रमाचा अभिमानी आहे.  तरी सुद्धां हिंदु धर्मांत कोठेंही आधार सांपडत नाहीं.  अस्पृश्यत्व हें फार भयंकर पाप आहें.  मी वणाश्रमाचा अभिमानी आहें तरी मी एक अस्पृश्य मुलगी दत्तक घेतली असून तिजवर माझें अत्यंत प्रेम आहे.  ती मला पोटच्या मुलांप्रमाणें प्रिय आहे व तिला आपली असें म्हणवून घेण्यासाठीं मला आपल्या पत्‍नीशीं बरेंच झगडावें लागलें आहे.  मीं या मुलीला दत्तक घेतलें आहे तरी इतरांनींही तसेंच करावें असा माझा आग्रह नाहीं.''

महात्माजींनीं दत्तक घेतलेली ही लक्ष्मी नांवाची मुलगी आमच्या मिशनच्या मुंबई येथील वसतिगृहांतून नेली होती आणि पुढें तिचा विवाह मद्रासेकडील एका ब्राह्मण गृहस्थाशीं लावण्यांत आला असें ऐकिवांत आहे.  वर्णाश्रमाच्या अभिमानाचा हा अर्थ.

दुष्काळ व इतर कामें

दुष्काळाची आपत्ति   :   निवडणुकीची दंगल संपते न संपते तोंच दुसरी एक मोठी आपत्तिही येऊन पडली.  पुणें येथील डी. सी. मिशन शाखेचे सेक्रेटरी श्री. कृ. गो. पाताडे यांनीं १९२१-२३ सालचा जो अहवाल प्रसिद्धिला आहे, त्यांत पान ४१ वर खालील मजकूर आहे :-

''१९२० सालीं नगर व पुणें जिल्ह्यांतील कांहीं तालुक्यांतील दुष्काळामुळें कसेंही करून प्राण वांचवावें ह्या हेतूनें अस्पृश्यवर्गाची-मुख्यतः मातंग (मांग) जातीची सुमारें १००० मंडळी त्या सालच्या हिंवाळ्यांत आमच्या मिशनच्या मैदानांत येऊन दाखल झाली.  सदर मंडळींजवळ कपडालत्ता, खावयास अन्न किंवा राहण्यास जागा यांचा अभाव असून, कडक हिंवाळ्यामुळें जे आजारी पडूं लागले व कांहीं मृत्यूही पावले.  ही गोष्ट रा. वि. रा. शिंदे ह्यांच्या नजरेस येतांच त्यांनीं व रा. जी. जी. ठकार यांनीं या सर्व कुटुंबांची पाहणी करून प्रथमतः मिशनतर्फे अल्प मदत देण्यास सुरुवात केली.

पण तेवढ्यानें भागणार नाहीं असें दिसतांच पुणें शहर म्युनिसिपालिटीच्या दिवाणखान्यांत एक जाहीर सभा श्री. एल. जे. आपटे (म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष) यांचे अध्यक्षतेखालीं भरून त्यांचेच अध्यक्षतेखालीं दुष्काळ-आपत्तिनिवारक कमिटी स्थापन करून तिच्या स्वयंसेवकांतर्फे धान्य, कपडे, पैसे जमवण्यास जोरांत सुरुवात झाली.  मदत जमविण्याचे निरनिराळे सहा सेंटर्स ठरविले होते.  दुष्काळग्रस्तांस राहण्यासाठीं एक विस्तृत मांडव आणि कच्च्या भिंतीची एक चाळ बांधण्यांत आली.  धट्टयाकट्टया माणसांसाठीं सदर मांडवांत दिवसा तागाच्या आणि वाखाच्या दोर्‍या वळण्याचा कारखाना सुरू करण्यांत आला.  मुलें आणि वृद्ध माणसें ह्यांना ज्वारी, बाजरी व तांदूळ फुकट देऊन अगदीं अनाथांना तर स्वयंपाकही तयार करून वाटण्यांत येत असे.  औषधपाणी व कपडे मिळतील तसे दर दिवशीं क्रमानें वाटण्यांत आले.  असि. कलेक्टर श्री. जी. टी. गॅरेट. I.C.S. व मध्यभाग कमिशनर मि. प्रॅटसाहेब ह्यांनीं दुश्काळग्रस्तांची कमिटीच्या विनंतीवरून समक्ष पाहणी करून मिशन पसंत करील त्या गरीब लोकांना आठवड्यांतून दोन वेळां तांदूळ, बाजरी, ज्वारी फुकट वांटण्याचें (डोल) काम सुरू केलें.  गॅरेटसाहेबांच्या आज्ञेनें शहरमामलेदार मि. देशपांडे हे स्वतः डोल वांटीत त्या वेळीं मिशनचे अधिकारी समक्ष हजर राहून शिफारस करीत.

असोसिएटेड प्रेस व बॉम्बे क्रॉनिकलच्या बातमीदारांनीं व मुंबईचे शेठ एल. आर. तेरसी ह्यांनीं वेळोवेळीं सर्व प्रकार समक्ष येऊन पाहून कमिटीला फार उत्कृष्ट मदत केली.

ता. १५।३।२१ रोजीं कमिटीतर्फे मदत वांटण्याचें काम बंद करून त्याच दिवशीं डॉ. एच. मॅन् ह्यांच्या अध्यक्षत्वाखालीं जाहीर सभा करून कमिटीचा अहवाल वाचण्यांत आला व ती कमिटीही बरखास्त करण्यांत आली.  सदर कमिटी आणि शेठ तेरसी यांचे, त्याचप्रमाणें दुष्काळग्रस्त आजार्‍यांना तपासून दररोज तास दोन तास येऊन मोफत काम करणारे डॉ. यमकनमर्डी आणि त्यांचेबरोबर नर्सिंगचें काम करणार्‍या भगिनी जनाबाई, डॉ. गोखले, डॉ. मुदलियार, डॉ. पळसुले यांचे आभार मानण्यांत आले.  पुणें गर्ल्स हायस्कूलच्या लेडी सुपरिंटेंडेंट मिस. एच. एम. फील्डिंग, मिस् नवलकर, श्रीमती वारूताई शेवडे (हिंगणें बुद्रुक), सौ. सुंदराबाई ठकार यांनींही फार अमोल कामगिरी केली.  केसरी व ज्ञानप्रकाश ऑफिस, फ्री मराठा बोर्डिंग येथील स्वयंसेवक, पुणें सोमवंशीय समाज, डेक्कन व भारत व्हॉलंटियर कारे आणि व्यक्तिशः श्री. एस. एम. माटे, बाबूराव जेधे, एस. सी. दरंदले, (ट्रेनिंग कॉलेज, पुणें) व्ही. आर. गद्रे, बी. डी. वायदंडे व गावडे आदिकरून मंडळींनीं जें साहाय्य केलें त्याबद्दल मिशन फार आभारी आहे.''

विशेषतः माझे मित्र लक्ष्मीदास रावजी तेरसी ह्यांनीं वेळोवेळीं क्रॉनिकल वगैरे पत्रांत लिहून मुंबईहून हजारों रुपयांची मदत पाठवली आणि आपल्या गिरणीवाल्या मित्रांकडून नव्या कापडांचे गठ्ठेच्या गठ्ठे पाठविले.  त्यामुळें व सरकारनें दिलेल्या धान्याच्या मदतीमुळें ह्या हजारों गरीब जीवांचें रक्षण झालें.  ह्या मदतीमुळें भोकरवाडी येथील गरीब लोकांच्या मनावर मिशनविषयीं फार अनुकूल परिणाम झाला.  म्हातारीं माणसें आणि लहान मुलें पुढें कित्येक वर्षे ह्या सत्कृत्याची आठवण डोळ्यांत आंसवें आणून करीत होतीं.

कृष्णराव भाऊराव बाबरकृत 'कर्मवीर विद्यार्थी' या पुस्तकांतील ८८ पानावर खालील मजकूर आहे.

होलिकासंमेलन  :  ''शिमग्याच्या सणाला रूढीमुळें जें वाईट स्वरूप आलेलें आहे तें नाहींसें व्हावें म्हणून कर्मवीर विठ्ठलराव यांनीं १९०७ सालापासून प्रयत्‍न चालविले होते.  हल्लीं या सणाला शहरांतून व पुष्कळ खेड्यांपाड्यांतून बरेंच चांगलें स्वरूप प्राप्‍त झालें आहे.  ३० वर्षांपूर्वीच्या व आत्तांच्या शिमग्यांत फारच फरक पडला आहे हें कोणीही म्हातारा मनुष्य कबूल करील.  शिमग्याच्या सणाला आलेलें हिडिस स्वरूप धर्माला अनुसरून नाहीं आणि या गलिच्छ पद्धतीनें हिंदु माणसांची नीति बिघडते व राष्ट्राचीही परदेशांत नाचक्की होते हें लोकांना समजावून सांगण्यासाठीं सन १९०७ सालीं कर्मवीर विठ्ठलरावांच्या प्रयत्‍नानें मुंबईस पहिली सभा भरली.  अध्यक्षस्थान सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर यांनीं सुशोभित केलें होतें.  ग्लोब मिलच्या मैदानांत सभा झाली.  खालच्या जातीचे लोक व मजूर यांच्यासाठींच मुख्यतः ही सभा होती.  कारण शिमग्यांतील वाईट गोष्टींचा हे लोकच पुरेपूर फायदा घेत होते.  दारूसारख्या नाशकारक पदार्थाचें सेवन करणें, अंगाला शेण-राख फांसून विद्रूप बनणें आणि ऐकुं नयेत असले वाईट शब्द तोंडानें काढणें इत्यादि प्रकार या सणांत प्रामुख्यानें घडत.  म्हणूनच विठ्ठलरावांनीं या होलिकोत्सवाचे विरुद्ध चळवळ केली.  ही चळवळ पुढें सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीनें सोशन सर्व्हिस लीग नांवाची निराळी संस्था स्थापून रा. नारायण मल्हार जोशी यांचे मार्फत चालविली.  पुण्यास आल्यावर १९१३ सालापासून कर्मवीर विठ्ठलरावांनीं या चळवळीकडे जास्तच लक्ष दिले.  या सालीं त्यांनीं पुण्यास किलोस्कर थिएटरांत एक जंगी सभा भरविली.  त्या वेळीं मिरजेचे अधिपति बाळासाहेब पटवर्धन यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें.  फर्ग्युसन व शेतकी कॉलेजांतील प्रोफेसर्स व विद्यार्थी ह्यांनीं ह्या सभेंत प्रामुख्यानें भाग घेतला होता. पुढें सालोसाल हा प्रयत्‍न चालू ठेवून विठ्ठलरावांनीं अखिल महाराष्ट्रांत ह्या चळवळीचा प्रसार केला.  मुंबई इलाख्याचे विद्याधिकार्‍यांची भेट घेऊन खेड्यांपाड्यांतील शाळांमास्तरांपर्यंत या पद्धतीचें लोण पोंचवण्यांत आलें आहे.  हल्लीं प्रत्येक शाळेमार्फत शिमग्याच्या सणाचे वेळीं मुलांकरवीं सभा भरवून भाषणें व संवाद करवून आणि मर्दानी खेळ करवून शिमग्याच्या सणाला चांगलें स्वरूप देण्याचा प्रयत्‍न केला जात आहे.  त्यामुळें मोठ्या माणसांवरही चांगला परिणाम झालेला दिसून येत आहे.''

सदर पुस्तकांतील पान २५ वर खालील मजकूर आहे.

सक्तीचें शिक्षण  :  '१९१९ सालीं पुण्यास सक्तीच्या शिक्षणाची मोठी चळवळ झाली.  ह्या चळवळींतहि कर्मवीर विठ्ठलरावांनीं प्रामुख्यानें भाग घेतला होता. पुणें म्युनिसिपालिटीतर्फे प्राथमिक शिक्षण सक्तींचें करण्याबाबत चर्चा चालू होती.  पण तूर्त मुलांपुरतेंच सक्तीचें शिक्षण चालू करावें, मुलींचा इतक्यांत समावेश करूं नये, अशा प्रकारचें बहुमत करण्याचा प्रयत्‍न कांहीं पुढार्‍यांनीं चालविला होता.  टिळक पक्षाचे बरेच पुढारी या प्रयत्‍नांत सामील झाले होते.  या प्रयत्‍नाचे विरुद्ध विठ्ठलरावांनीं चळवळ सुरू केली.  मुलींनाही सक्तीचें शिक्षण ताबडतोब चालू केलें पाहिजे असें सांगण्याचा या चळवळीचा हेतु होता.  म्युसिनिपालिटीची साधारण सभा या प्रश्नाचा विचार करण्यासाठीं भरणार होती.  त्याच दिवशीं विठ्ठलराव यांनीं स्त्रियांची एक जंगी मिरवणूक पुणें शहरांतून काढली.  तिच्यांत सेवासदन व डि. सी. मिशनमधील स्त्रियांनीं प्रामुख्यानें भाग घेतला.  कै. रा. ब. महादेव गोविंद रानडे यांच्या पत्‍नी रमाबाई रानडे यांच्या नेतृत्वाखालीं सेवासदनांतून वरिष्ठ वर्गांच्या स्त्रियांचा एक छबिना पश्चिमेकडून आला आणि बहुजनसमाजांतील विशेषतः अस्पृश्यवर्गीय स्त्रियांचा दुसरा छबिना पूर्वेकडून ताबूत स्ट्रीटमधील डि.सी. मिशनमधून आला.  या दोघांची गांठ बुधवार चौकांत पडून हा अपूर्व देखावा पाहण्यासाठीं हजारों लोकांची गर्दी जमली.  हे दोन्ही छबिने रे मार्केटांत म्युनिसिपालिटीच्या ऑफिसांत गेले.  तेथें फार गर्दी झाल्यामुळें म्युनिसिपालिटीची सभा तहकूब करावी लागली.

''सक्तीच्या शिक्षणाच्या बाबतींत विचार करण्यासाठीं प्रि. राजवाडे यांच्या अध्यक्षतेखालीं एक खास कमिटी नेमली होती.  ह्या कमिटीनें अनुकूल मत दिलें होतें.  मुलींचाही सक्तीच्या शिक्षणाच्या क्षेत्रांत प्रवेश करावा असें या कमिटीचें मत होतें.  पण म्युनिसिपालिटीचीं सूत्रें ज्यांच्या हातांत होतीं त्यांना हें पसंत नव्हतें.  त्यांनीं लोकमत अजमावण्याचा बहाणा करून त्यासाठीं ग्रामस्थांची सार्वजनिक सभा भरविण्याचें ठरविलें.  लवकरच अशा प्रकारची जाहीर सभा किर्लोस्कर थिएटरांत भरविण्यांत आली.  चीफ ऑफिसर रा. शंकरराव भागवत यांची अध्यक्षस्थानीं निवड झाली होती आणि लोकांवर वजन टाकण्यासाठीं सिंहगडावरून लो. मा. टिळकांनाही मुद्दाम बोलावून आणलें होतें.  ह्या सभेस कर्मवीर विठ्ठलराव व त्यांचे सहकारी मित्र हजर होतेंच.  विठ्ठलरावांनीं लो. मा. टिळकांना विरोध केला आणि त्यांनीं सभेंत न बोलणेंच बरें म्हणून सांगितलें. पण त्यांचें न ऐकतां टिळक बोलावयास उभे राहिले.  लोकांनीं गडबड सुरू केली.  कोणी एकानें टिळकांच्या अंगावर अंडीं फेकलीं.  टिळकांना मार बसूं नये म्हणून विठ्ठलराव व त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रतापराव यांना मध्यें पडावें लागलें.  अखेरीस ही सभा कांहीं काम न होतां बरखास्त करावी लागली. पुढें टिळकांच्या गायकवाडवाड्यांत सभा करण्याचा प्रयत्‍न झाला.  पण तेथील सभाही तरुण मराठ्यांनीं उधळली.

''ही शिक्षणाची चळवळ पुढें दौरा काढून सर्व दक्षिण महाराष्ट्रांत विठ्ठलरावांनीं सुरू केली.  या चळवळींत प्रि. केशवराव कानिटकर यांची आणि हुबळी येथील मिशनच्या शाखेचे सेक्रेटरी रा. हा. ना. पटवर्धन यांची चांगलीच मदत झाली.  ह्याच वेळीं रा. विठ्ठलरावांनीं लो. मा. टिळकांच्या उलट 'ज्ञानप्रकाशांत' जोराची लेखमाला लिहिली ती पाहण्यासारखी आहे. पुण्याच्या सभेच्या वेळीं या चळवळींत कर्मवीर विठ्ठलरावांना पुण्यांतील तरुण मराठा वर्गाचें चांगलें साहाय्य झालें.  आज पुढारी म्हणून प्रसिद्ध झालेले रा. केशवराव जेधे, रामराव बर्गे वगैरे मंडळी या तरुण वर्गांतीलच होती.

''या सक्तीच्या शिक्षणाच्या चळवळीचा परिणाम पुढें होऊन विठ्ठलराव यांचे दुसरे एक स्नेही रँ. र. पु. परांजपे यांनीं कौन्सिलांत येऊन शिक्षणमंत्री होतांच त्यांनीं सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला.  ह्या कायद्याच्या आधारें कांहीं म्युनिसिपालिटीनीं आपल्या हद्दींत सक्तीचें शिक्षण सुरू केलें आहे.  तथापि अजूनही हा प्रश्न भिजत पडलेला आहे.  बहुजनसमाजावर सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची अमलबजावणी सरकारच्या दिरंगाईमुळें झालेली नाहीं.''

मद्यपानबंदी  :  ''कर्मवीर विठ्ठलरावांनीं मद्यपानबंदीच्या चळवळींतही बराच भाग घेतला होता.  आरंभीं लवाटे, टिळक इत्यादिकांचे बरोबर व नंतर म. गांधींच्या असहकारितेच्या काळांतही व्याख्यानें देऊन व पिकेटिंग करून विठ्ठलरावांनीं भाग घेतला.  डॉ. एच. मॅनसाहेब यांचेंही त्यांना बरेंच साहाय्य होतें.  ह्यासंबंधीं विठ्ठलरावांनीं पुणें वसंत व्याख्यानमालेंत मुद्देसूद आंकडेनिशी दिलेलीं व्याख्यानें प्रसिद्धच आहेत.''

मुरळी  :  ''महाराष्ट्रांत विशेषतः दक्षिण महाराष्ट्रांत खालच्या जातींतून मुरळी सोडण्याची चाल आहे.  ही चाल पुरातन आहे.  यासंबंधानें एक सविस्तर संशोधनात्मक लिहिलेला निबंध रा. बी. बी. केसकरकृत रा. रा. वि. रा. शिंदे यांचे लेख, व्याख्यानें, कीर्तनें या पुस्तकांत प्रसिद्ध झाला आहे.  मुंबईस निराश्रित बालसंरक्षक मंडळी (सोसायटी फॉर दि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन) नांवाची संस्था १९०८-९ च्या सुमारास स्वतंत्रपणें काम करीत होती.  लॉर्ड बिशप ऑफ बाँबे या संस्थेचे अध्यक्ष होते.  रा. बंडोपंत भाजेकर. मि. मिर्झा, एका ख्रिश्चन मिशन शाळेचे हेडमास्तर मि. विल्सन आणि मी स्वतः असें चौघे सेक्रेटरी होते.  अडचणींत सांपडलेल्या मुलांमुलींना शोधून काढण्यासाठीं रहिमतुल्ला खान या नांवाच्या गृहस्थांना वेतन देऊन वरील मंडळींनीं आपले एजंट नेमलें होतें.  ह्या मंडळीचें काम मुंबईंत बरेच दिवस चांगलें चाललें होतें.  अशा पतित स्त्रियांना चांगल्या देखरेखीखालीं ठेवून त्यांची उन्नति करण्यासाठीं सांताक्रूझ येथें प्रसिद्ध दयाराम गिडूमल यांच्या आश्रयाखालीं एक आश्रमही चालला होता.  या आश्रमाची देखरेख भगिनी जनाबाई शिंदे यांनीं कांहीं दिवस चालविली होती.  या अनाथ बालसंरक्षक मंडळीची शाखा पुणें येथें डॉ. एच. मॅन यांच्या नेतृत्वाखालीं बरींच वर्षे चालली होती.''

जिवावरचा प्रसंग  :  मी पुण्यास राहूं लागल्यावर मुरळीची चाल बंद करण्याचे बाबतींत रा. शिवराम जानबा कांबळे, श्रीपतराव थोरात वगैरे अस्पृश्यांचे सुधारणावादी पुढारी यांनीं पुढाकार घेतला होता.  तरुण मंडळींचीं मनें वळवून त्यांचीं होतकरू मुरळ्यांशीं रीतसर लग्नें लावून भावी हानींतून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्‍न ह्या सुधारणावादी मंडळींनीं बरेच केले.  असाच एका अस्पृश्य मुरळीचा विवाह खडकी येथें घडवून आणण्यांत आला.  तो व्यवहार रात्रीं बारा वाजतां झाला.  आमंत्रणावरून मी ह्या विवाहास हजर होतों.  त्या वेळीं माझ्या जिवावरचा प्रसंग गुदरला.  या विवाहास जातांना मी होळकर ब्रिजवरून गेलों.  येतांना मी तिकडूनच येईन अशा अंदाजानें विरुद्ध पक्षाकडून मला मारण्यासाठीं कांहीं मारेकरी पुलावर ठेवण्यांत आले होते, असें मागाहून कळलें; सुदैवानें मी परत येतांना बंडगार्डनच्या पुलावरून घरीं परतलों.  म्हणून ही अनिष्ट आपत्ति टळली.

इन्फ्लुएंझा  :  १९१८ सालीं मुंबईंत इन्फ्लुएंझाची मोठी सांथ सुरू झाली.  सांथ कसली दावाग्नीच तो !  वणव्यांत गवत जळावें त्याप्रमाणें माणसें जळूं लागलीं.  त्याची झळ पुण्यालाही लागली.  म्युनिसिपालिटीकडून इन्फ्लुएंझा मिक्श्चरच्या मोठमोठ्या बाटल्या भरून आणून आम्ही पुणें लष्करांत गरीब लोकांच्या घरोघरीं तें पाजूं लागलों.  माझ्या घरची मंडळी बहुतेक आजारी झाली.  थोडेंसें बरें वाटल्यावर तीं औषधें वांटण्याचीं कामें करीत.  मुंबईत माझे धाकटे बंधु एकनाथराव राहात होते.  त्यांची पत्‍नी मथुराबाई सांथीनें बीमार झाल्याचें पत्र आलें.  गरोदरपणीं ही सांथ फार घातक होते आणि मथुराबाई तर ८ महिन्यांच्या गरोदर होत्या.  म्हणून मी पुण्यास घरीं शुश्रूषेस राहावें कीं मुंबईला जावें हा मला मोठा पेंच पडला.  मुंबईस गेलों व मथुराबाई रुक्मिणी हॉस्पिटलमध्यें दुसरेच दिवशीं बाळंत होऊन त्यांचें मूल वारलें.  रात्रीं १२ वाजतां मुलास मीं आणि माझ्या भावानें नेलें.  तेथें प्रेतवाहकांची अशी गर्दी लोटली होती कीं आमचा आंत शिरकाव होईना.  त्या वेळेसच मुंबईचे मराठे व सोनापूरचे ट्रस्टी यांमध्यें कांहीं वाद माजून मराठ्यांचीं प्रेतें जाळण्याला हरकत येत होती.  मी मराठा आहें या सबबीवर मुलासाठीं तेथें खड्डा मिळेना.  रजिस्ट्रारकडे जाऊन मीं स्वतः सांगितलें कीं, ''मी प्रार्थना समाजिस्ट आहें.  या उप्पर जर प्रेतास हरकत घेत असाल तर अंगावर भयंकर जबाबदारी घेत आहांत याची याद राखा !''  खड्डा मिळाला.  मुलाचे अंत्यविधि करून अपरात्रीं घरीं आलों तों रुक्मिणी हॉस्पिटलांतून निरोप आला कीं सौ. मथुराबाई निवर्तल्या.  दुसरे दिवशीं त्यांचें प्रेत घरीं आणून प्रार्थना समाजांतून प्रेतयात्रेची गाडी आणून सोनापुरांस गेलों.  प्रार्थना समाजांतील कांहीं निवडक बंधु यात्रेला हजर होते.  पण सोनापुरांत त्या वेळीं जळणाचा मोठा तुटवडा होता.  हताश होऊन बसलों असतां माझे मित्र लक्ष्मीदास रावजी तेरसी यांची तेथें गांठ पडली.  सार्वजनिक सेवेंत एखाद्या पिशाच्चासारखी ही मूर्ति सर्वत्र आढळत असे.  माझी त्यांची खास मैत्री असल्यामुळें आमची भाषा एकेरीवर चाले.  ''अरे, तूं मोठा देशभक्त म्हणवतोस आणि म्युनिसिपालिटींतही आहेस; पण आम्हांला येथें वेळ नाहीं आणि मेलों तर जाळायाला सर्पण नाहीं.''  तेरसी ताबडतोब गेले आणि लांकडाच्या ओंडकेच्या ओंडके भरलेल्या लॉर्‍या सोनापुरांत धडकुं लागल्या.  एका लॉरीवर स्वतः तेरसी व दुसरीवर म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष सी. व्ही. मेहता गाडी हाकलीत होते.  ही खरी लोकसेवा.

ह्या सुमारास अशा अनेक अडचणी येऊन मी फार खंगून गेलों होतों.  मुंबईंत जनरल सेक्रेटरीचें काम आणि पुण्यास तेथील शाखेची सर्व जबाबदारी हीं दोन्हीं कामें चालविणें फार जड जाऊं लागलें.  ८ दिवस मुंबईस तर ८ दिवस पुण्यास अशा खेपा घालाव्या लागल्या.  माझ मुंबईंतल्या कार्यवाहकांस वाटावें कीं, मी पुण्यास फार वेळ घालवितों. पुणेंकरांना वाटावें कीं मला मुंबईचा मोह सुटेना.  अशा संधींत इमारतीचें काम जसजसें नांवारूपाला येऊं लागलें तसतसें पुणें शाखेचें बूड मातृशाखेहून जड होऊं लागलें.  स्थावर मिळकत म्हणजे भांडणाचें मूळ.  पुण्याच्या इमारतीच्या पायाखालीं हें भांडणाचें मूळ रोंवलें गेलें होतें.

ट्रस्टींचा गोंधळ

गुप्त कारस्थान  :   १२ नोव्हेंबर १९२२ रोजीं मातृसंस्थेच्या साधारण सभेनें माझ्या ट्रस्टीशिपविषयीं एक भानगड करून ठेवली होती.  ती तिनें मला कळवली नव्हती.  ती अशी होती कीं, श्रीयुत बॅ. मुकुंदराव जयकर, रा. लक्ष्मणराव नायक आणि मी हे तिघे ट्रस्टी असतां आमच्याऐवजीं रा. जी. बी. त्रिवेदी, मुंबई, जी. जी. ठकार, पुणें आणि रा. लक्ष्मणराव नायक, मुंबई हे नवीन ट्रस्टी नेमण्याचा ठराव केला होता.  बॅ. मुकुंदराव जयकर यांनीं कदाचित् आपल्या ट्रस्टीशिपचा राजीनामा दिला असेल म्हणून त्यांच्या ठिकाणीं जी. जी. ठकार यांची नेमणूक झाली असेल; पण मी माझ्या ट्रस्टीशिपचा राजीनामा दिला नसतांही माझ्याऐवजीं जी. बी. त्रिवेदी ह्यांना ट्रस्टी कां नेमलें हें कळलें नाहीं.  माझें नांव ट्रस्टीजमधून काढण्याचा जनरल बॉडीचा ठराव मला जवळ जवळ दोन वर्षे कळवण्यांतही आला नाहीं ह्याचें गूढ तर मला मुळींच कळेना.  पुढें मातृसंस्थेनें माझ्याविरुद्ध हायकोर्टांत फिर्याद केली आणि हायकोर्टानें मलाच ट्रस्टी ठेवावें असा अनुकूल निकाल दिला.  त्यावर मातृसंस्थेचे जनरल सेक्रेटरी लक्ष्मणराव नायक यांनीं ८ जुलै १९२५ रोजीं नं. ८६ चें सविस्तर खुलाशाचें पत्र पाठवलें.  त्यांत असें लिहिलें होतें कीं, मी पुणें शाखा हीच सर्व मिशनचें मुख्य ठिकाण करूं पाहात होतों आणि मुंबई शाखा व बाहेरील सर्व कामें पुण्याहूनच चालवावयाचीं असा माझा प्रयत्‍न चालला होता.  इतकेंच नव्हे तर मुंबई इलाख्याच्या विद्याखात्याच्या तत्कालीन पंचम वार्षिक अहवालांत असा उल्लेखही होता, असें सांगून रा. नायक त्याच पत्रांत म्हणतात कीं, ह्या खोट्या विधानाबद्दल कोण जबाबदार आहे हें कळत नाहीं.

पण ही सर्व माझ्या उलट चाललेली कारवाई, मातृसंस्थेनें १९२२ सालीं मला ट्रस्टींमधून कमी करण्याचा जो ठराव केला त्याच्यापूर्वी जर मला कळली असती, निदान झाल्यावर तरी लौकर कळवली असती तरी मी सलोख्यासाठीं चालवलेले प्रयत्‍न मातृसंस्थेला कळून तिनें माझ्याविरुद्ध हा ठराव केला नसता.  १९२४ सालीं मी मिशन सोडून मंगलोरास ब्राह्म समाजाचे कामासाठीं जाऊन राहिल्यावर मला ट्रस्टींमधून काढलें आहे याची गुणगुण माझ्या कानांवर आली.  माझ्या उलट हायकोर्टमध्यें फिर्याद करून माझ्या जागीं नवीन निवडलेल्या ट्रस्टीला कायम करून घेण्याबद्दलचा मातृसंस्थेचा प्रयत्‍न मला कळला.  मी लागलीच जी. बी. त्रिवेदी यांस मित्रत्वाचे नात्यानें तांतडीच्या पत्रद्वारें कळवलें कीं, माझ्या उलट केलेल्या फिर्यादीनें मिशनला धोका आहे, आणि माझ्यावर तर अन्याय होत आहे.  एखाद्या ट्रस्टीला ट्रस्टबोर्डवरून कमी करावयाचें असेल तर ट्रस्ट ऍक्टमध्यें सहा कारणें स्पष्ट सांगितलीं आहेत.  त्यांपैकीं एकही कारण मजकडून घडलें नसतांना हा उपद्व्याप कां करण्यांत येत आहे ?  दुसरा एक स्पष्ट अन्याय असा होत होता कीं, हायकोर्टपुढील खटल्याचें स्वरूप एका बाजूला मिशनसारखी सन्मान्य संस्था ही वादी होती आणि दुसर्‍या बाजूला मजसारखी एक गरीब व्यक्ति प्रतिवादी होती.  मी ट्रस्ट ऍक्ट पूर्णतः जाणत असल्यानें खटला मला अनुकूल होईल असा मला आत्मविश्वास होता आणि तसा जर तो अनुकूल झाला असता तर प्रतिवादी आणि वादीचा खर्च मातृसंस्थेच्या पैशांतून भागवावा लागला असता.  पण याउलट जर खटल्याचा निकाल माझ्याविरुद्ध लागला असता तर प्रतिवादी मी एक व्यक्ति आहें म्हणून तो व्यक्तिशः मला द्यावा लागला असता.  म्हणून हा खटला करण्याची भानगड उपस्थित होऊं नये म्हणून अत्यंत कळकळीची सूचना रा. त्रिवेदींच्या द्वारें मीं मातृसंस्थेकडे पाठवली; पण शेवटीं खटला करण्यांत आलाच आणि ता. ६ फेब्रुवारी १९२५ रोजीं हायकोर्टाचा निकाला माझ्यातर्फे लागला.  तो खालीलप्रमाणें :-

(१)  डि. सी. एम. सोसायटी ऑफ इंडिया ह्या मिशनच्या साधारणसभेनें श्रीयुत विठ्ठल रामजी शिंदे आणि गोपाळ गणेश ठकार ह्यांच्याबरोबर काम करण्यास तिसरा ट्रस्टी नेमावा.

(२)  १२ नोव्हेंबर १९२२ रोजीं मिशनच्या साधारणसभेनें जे नवीन ट्रस्टी निवडले त्यापूर्वीचे ट्रस्टी बॅ. मुकुंदराव जयकर, रा. नायक, आणि रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी बँकेला लिहून मिशनच्या नांवें असलेले बँकेंतील सर्व रोखे, विठ्ठल रामजी शिंदे व गोपाळ गणेश ठकार आणि हायकोरर््टाच्या हुकुमान्वयें मिशनच्या साधारणसभेनें निवडावयाचा तिसरा ट्रस्टी यांचे नांवें बदलून घ्यावेत.

(३) ह्यासाठीं रा. शिंदे, रा. जयकर आणि रा. नायक ह्यांनीं आपल्याकडे आलेले रोख नवीन ट्रस्टीला देण्यासाठीं बँक सेफ कस्टडीचे रिसीट्स् न मागतां घ्यावेत.

(४) बाँबे पोर्टट्रस्ट आणि ओरियंट क्लबच्या रोख्यांविषयीं अशीच तजवीज व्हावी.

(५) दोन्ही पक्षाचा कोर्टखर्च आणि खटल्याचा इतर खर्च मातृसंस्थेच्या फंडांतून व्हावा.

(६) कारण ह्या खटल्यांत वकिलांचा सल्ला घेण्याची जरूरी होती.

ह्याप्रमाणें ह्या अनिष्ट वादाचा निकाल लागून शेवटीं विनाकारण भूर्दंड मातृसंस्थेला पडणार ही माझी भीति खरी ठरली.  पण माझ्या नांवाला विनाकारण कलंक लागण्याचीही आपत्तीहि टळली म्हणून मी हायकोर्टाचा आभारी झालों.  पैसा जमवावा कोणी, गोंधळ माजवावा कोणी आणि शेवटीं आभार मानतो कोण ?  सर्वच चमत्कार !  जग हें असें आहे.

ह्या कामीं प्रतिवादी या नात्यानें माझ्या बचावाचें काम माझे मित्र रा. कृ. गो. पाताडे यांनीं सर्वस्वीं आपल्यावर घेतलें.  मुंबईची लालजी शहा आणि कंपनी ह्यांनीं हें काम रा. पाताडे यांच्या प्रयत्‍नानें अत्यंत सवलतीनें केलें.  वादी ह्यांचे वकील दुभाष आणि कंपनी यांनीं आपला खर्च १००० रु. घेतला तर प्रतिवादीच्या सॉलिसिटर्सनीं ५०० रु. त काम केलें.  पण या १५०० रु. ची खोट मिशनच्या माथीं बसली.

अहल्याश्रमाचें उद्धाटन  :  ता. २८ ऑक्टो. १९२४ रोजीं भोकरवाडींतील अहल्याश्रमाच्या नवीन इमारतीचें उद्धाटन झालें.  त्या वेळीं मुंबईचे गव्हर्नर ना. सर लेस्ली विल्सन ह्यांनीं ह्या समारंभाचें अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें.  त्यांचें स्वागत करण्यासाठीं आणि मिशनच्या तत्कालिन परिस्थितीसंबंधीं सविस्तर खुलाशाचें भाषण करण्यासाठीं मला मुद्दाम मंगलोरहून पुण्यास बोलावलें.  पुण्यांतील मोठमोठी मंडळी समारंभास हजर होती.  समारंभ यशस्वी रीतीनें पार पडला.  

इमारतींचें नांव                   पी.डब्ल्यू.डी. खात्यानें सर्टिफाय केलेली रक्कम
                                                               रु. आ. पै.
(१) मध्यवर्ती इंग्रजी मराठी प्राथमिक शाळा                  ३८,९२०-३-४
(२) उद्योग-शाळा                                           २०,१११-१४-८
(३) विद्यार्थी वसतिगृह                                       १४,२९२-१-६
(४) सुपरिंटेंडेंटची राहण्याची जागा                           १९,१०३-०-६
(५) स्नानगृहें, शौचकूप, ड्रेनेज वगैरे                            ८,५५१-८-०
(६) कांटेरी कुंपण, दगडी खांब, दरवाजे वगैरे                ४,९४५-१५-१०
(७) सरकारी पी. डब्ल्यू. डी. खात्यास दिलेला देखरेखीचा खर्च  २,११८-०-०
(८) मिशन एस्टॅबलिशमेंट्स                                      ४,२७५-०-२
                                                            --------------
                                                 एकूण खर्च - १,१२,३१८-८-०  
 
ह्या इमारतीबद्दल हिंदुस्थान सरकारच्या मार्फत बादशहाच्या ज्युबिली फंडांतून मिळालेले २० हजार रुपये, मुंबई सरकारांतून मिळालेले ६७००० रु. रक्कम इतकी होती.  बाकी उरलेली २५,१९७ रु. ८ आ. मिशनच्या फंडांतून देण्यांत आली.

  1. घरच्या अडचणी
  2. खेळकर वृत्ति
  3. खडतर पांच वर्षे
  4. कौटुंबिक उपासनामंडळ
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • 45
  • 46
  • 47
  • 48
  • 49
  • 50
Page 46 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी