1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

घरच्या अडचणी

चंद्राक्का  :  समाजाच्या स्थानिक कामाला अशा रीतीनें रंग चढला; पण इकडे घरच्या मंडळींच्या हलाखीची स्थिति जास्त वाएत चालली.  जमखंडीसारख्या खुल्या हवेच्या आणि साध्या राहणीच्या आमच्या मंडळींना मुंबईची दाट वस्ती व कोंदट हवा नीट मानवेना.  माझी पत्‍नी सौ. रुक्मिणीबाई हिला १९०४ ऑक्टोबरचे सुमारास तिसरा मुलगा विश्वास झाला ह्या बाळंतपणापासून त्यांची प्रकृति खालावली.  आईबाप वृद्ध आणि बहिणी शाळेंत जाणार्‍या म्हणून घरकामाचा सारा भार माझ्या पत्‍नीवरच पडत असल्यामुळें तिची तारांबळ उडाली.  अशा स्थितींत माणी धाकटी बहीण चंद्राक्का हिला क्षयाची भावना जडली.  १९०१ सालीं माझे मित्र वासुदेवराव सुखटणकर यांची बहीण शांताबाई ही माझे बहिणीसह पुण्याचे हुजूरपागेच्या हायस्कूलमध्यें शिकत होती.  ती प्रकृतीनें फार अशक्त होती.  सुखटणकरांची आई वारल्यामुळें तिची काळजी घेण्यास घरीं कोणी नव्हतें.  पुढें तिला क्षयाची भावना झाली.  म्हणून आमच्या घरीं जमखंडी येथें तिला हवापालटीसाठीं नेण्यांत आलें.  पुढें ती त्याच रोगानें वारली.  माझी बहीण चंद्राबाई ही नेहमीं तिच्या सहवासांत व शुश्रूषेंत असल्यामुळें आणि पुढें मुंबईतील कोंदट हवेचा तिच्यावर परिणाम झाल्यानें तिला तोच रोग जडला.  माझ्या वृद्ध आईबाबांस ही एक नवीन चिंता उपस्थित झाली.

रात्रीची शाळा  :  १९०५ च्या उन्हाळ्याचे आरंभीं माझे बाबा चंद्राबाईला घेऊन खंडाळ्याला हवाफेरीसाठीं राहूं लागले.  तेथून त्यांनीं पुण्यास वेताळ पेठेंतील भाजेकरांच्या वाड्यांत स्थानांवर केलें.  मी मुंबईहून जऊन येऊन राहात होतों.  या वर्षी मी पुण्यांतच जास्त राहून तेथील समाजाचे कामांत मदत करूं लागलों.  ह्या सालांतील रामनवमीच्या दिवशीं मीठगंज पेठेंत अस्पृश्यांसाठीं एक रात्रीची शाळा मीं उघडली.  त्या वेळीं जनाक्का व तान्याक्का उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त घरीं आल्या होत्या.  शाळा उघडण्याचा समारंभ झाला.  त्यांत हुजुरपागेंतील बर्‍याच मुली हजर होत्या.  भिजलेली डाळ व उसाचा रस वांटण्यांत आला.  हा समारंभ भाजेकरांचे वाड्यांतच करण्यांत आला.  समारंभास कांहीं ख्रिश्चन मुली हजर होत्या.  त्यांतील एक उसाच्या रसांत थुंकली, अशी खोटी हूल उठविण्यांत आली.  समारंभाचा बराच विरस झाला.  या अपशकुनामुळें या शाळेंत पुढें वेळोवेळीं अडचणी येऊं लागल्या.  ही शाळा पुणें प्रार्थनासमाजाच्या स्वाधीन करण्यांत आली आणि अखेरीस पुढें निघालेल्या डिप्रेस्ड क्लास मिशनमध्यें सामील करण्यांत आली.

सुबोध-पत्रिकेच्या ता. १९-०३-१९०५ च्या अंकांत खालील इंग्रजी मजकूर आहे.

A friend writing from Poona says that the presence of Mr. V. R. Shinde there is infusing a new spirit in the Prarthana Samaj of that town.  He has within the short time that he has been there, organised a Sangat Sabha which meets on every Wednesday from 6 to 7 p.m.  The Liberal Religious Reading Class, which is conducted by him and where at present he is reading Armstrong's God and the Soul with the pupils, meets in the Prarthana Samaj every Friday evening and is attended on an average by 16 students from the Fergusson, Deccan and Science colleges.  Mr. Shinde has opened similar classes in the first two Colleges but they will have to be closed when the college classes break up from the Summer vacation.  Besides this as a result of his labour the Tukaram Society, presided over by Dr. Bhandarkar, has begun to meet regularly.  Mr. Shinde is trying to open an Arya Mahila Samaj on the lines of Bombay.  Altogether, Poona Prarthana Samaj affairs are showing a life which, our friend hopes, will continue for a long time to come.   -S.P.  19-3-05

नियमांची गडबड  :  चंद्राबाईच्या प्रकृतींत कांहीं केल्या उतार पडेना, म्हणून तिला अहमदनगरच्या कोरड्यां हवेंत न्यावें लागलें.  वासरामागील गाईप्रमाणें वृद्ध आई-बाप बरोबर होतेच.  नगरांत हा प्रकार तर मुंबईत सौभाग्यवतीची तब्येत अधिकाधिक बिघडत चालली होती.  तशांत तिसरा मुलगा ऑक्टोबर महिन्यांत वारला.  म्हणून चि.जनाक्कास मुंबईस आणावें लागलें.  तिलाही त्याच वेळीं प्यूरसीची (Pleurisy) व्यथा जडली.  अशा भौतिक अडचणींत माझें मन उद्विग्न होण्यास आणखी एक कारण घडलें.  माझ्या प्रचारकार्यावर नियंत्रण पडावें म्हणून स्वतंत्र नियमांची एक रचना करण्याचें घाटूं लागलें.  त्याचेसाठीं एक पोटकमिटी नेमून तिच्या तंत्रानें प्रचारकानें वागावें अशी वाटाघाट सुरू झाली.  हें माझ्या स्वतंत्र प्रकृतीला पटेना.  आधीं काम करावें, मग अनुभव घ्यावा आणि मग योग्य वेळीं नियम करावे, हा स्वाभाविक क्रम मला बरा वाटूं लागला.  एकीकडे पैशाची तरतूद नाहीं.  दुसरीकडे कामाचा अंदाज नीट नाहीं.  अशा स्थितींत शाब्दिक नियमांची गडबड मला अवेळीं आहे असें वाटूं लागलें.  सुखटणकरांचीं पत्रें याच बाबतींत मला अनुकूल अशीं जर्मनींतून येत असत.  समतोल बुद्धीनें प्रत्येक नियमावर त्यांनीं अभिप्राय दिला.  प्रचारकानें सभासदाच्या घरीं गृह्यसंस्कार चालविण्याचें काम समाजानें ठरविलेल्या संस्कारासंबंधानेंच करावें अशा अर्थाचा एक नियम होता.  ब्राह्मसमाजाच्या स्वातंत्र्याला हा नियम बाधक होता, म्हणून तो वगळावा असें सुखटणकरांचें मत पडलें.  मला तर हा सर्व घाटच अनावश्यक आणि उगाच चालू गाड्यांत खीळ घालणारा वाटून माझें मन उद्विग्न झालें.  मीं माझ्या कामाची डायरीच ठेवावी, वरचेवर अहवाल द्यावा वगैरे पिरपिर सुरू झाली.  माझ्या कामांच्या ओघांत मी हीं कामें स्वयंस्फूर्तीनें प्रथमपासूनच करीत होतों; पण अमक्याच वेळीं व अमक्याच पद्धतीनें तीं व्हावींत ह्या नियमांमुळें माझ्यावर अनावश्यक बोजा पडूं लागला.  पुढें हा मतभेद अधिक वाढीस लागला.

खेळकर वृत्ति

मँचेस्टर कॉलेजांतील विद्यार्थी पोक्त वयाचे पदवीधर व पुढे धर्मोपदेशकाचे गंभीर काम करणारे होते.  म्हणून हे नेहमीच गंभीरपणानें वागत असत असें मुळींच नाहीं.  ते बहुतेक खेळकर वृत्तीनें वागत.  केव्हां केव्हां तर ते लहान मुलांप्रमाणें दंगा माजवून सोडीत.

टोयोसाकी  :  जपानचे एक टोयोसाकी नांवाचे आमचे वर्गबंधु असत.  ते ठेंगू असून मोठे गमती होते.  त्यांच्याशीं इतर विद्यार्थ्यांच्या नेहमीं चेष्टा चालत.  ते कॉलेजच्या वसतिगृहांतच राहात.  एखादे दिवशी रात्रीं नाटकाला जाऊन उशिरां परत आले आणि दार ठोठावूं लागले म्हणजे दारावरील खिडकीवरून त्यांच्यावर पाणी ओतावें; तें असें कीं ते फार भिजूं नयेत अशाच बेतानें, असे चाळे चालत. एकदां एक अशी टूम निघाली कीं, सर्वांची उंची मोजावी.  टोयोसाकीला एका भिंतीजवळ उभें केलें.  त्याच्या उंचीची रेघ मारण्याच्या मिषानें हात वर करून वर असलेली पाण्याची तोटी खुली केली.  टोयो दचकून निसटला व सर्वत्र हंशा पिकला.  दर रविवारीं टोयो फार सभ्यतेचा पोशाक करी.  लाँग कोट, टॉप हॅट घालून स्वारी सडकून सभ्य गृहस्थ बने आणि शहरांतल्या मुख्य मुख्य रस्त्यांवरून हिंडून येई.  एकदां एका चावट मित्रानें त्याच्या पाठीवर कोटाला एक कागदाची चिठी लावली व त्यावर (Chase me girls)  असें जाड अक्षरांत लिहिलें होतें.  टोयो घरीं परत येईपर्यंत त्याला हें कळलेंच नव्हतें.  हें पाहून मोठा हंशा पिकला.

मलूल हिंदी  :  कॉलेजच्या इमारतींत विद्यार्थ्यांसाठी Common Room म्हणून एक मोठें दालन होतें.  त्यांत विद्यार्थ्यांनीं मोकळेपणानें वागावें, सिगारेट्स पुंफ्काव्यात, खेळावें, खिदळावें असा प्रकार चाले.  केव्हां केव्हां प्रोफेसरही या खोलींत येत.  त्यांच्यासमोर सिगारेट्स पुंफ्कणे, एखादी त्यांना देणें असेंही चाले.  या दालनांत मध्यभागीं एक मोठें गोल मेज होतें.  मी इतरांइतका खिदळत नसें, म्हणून मला Meek Indian म्हणजे 'ममूल हिंदी' असें नांव पडलें होतें.  माझा निरुपद्रवीपणा त्यांना जणूं उपद्रवच देत होता; म्हणून सूड उगवण्यासाठींच कीं काय दोघां धटिंगणांनीं मला सपशेल उचललें, गोल मेजावर आडवें ठेवलें आणि गाणें गात ते मला घाण्यासारखे फिरवूं लागले.  असा वात्रटपणा केलेल्या धटिंगणाला पुन्हां पुढच्या बुधवारी उपासनालयांत गंभीरपणें उपासना चालवतांना पाहून मला हंसें आवरत नसे.  अशा चाळ्यांपासून खुद्द प्रि. ड्रमंड हे सुरक्षित नव्हते.  तशांत त्यांचीं व्याख्यानें असल्यानें या चेष्टांना साहजिकच उत्तेजन मिळे.

इव्हर्ट  :  कॉलेजांत मी केव्हां केव्हां माझा आवडता पिवळा फेटा बांधून शेमला सोडीत असें.  इव्हर्ट नांवाचा एक स्कॉच विद्यार्थी नेहमींच माकडचेष्टेंत गुंतलेला असे.  त्यानें हळू हळू माझा शेमला ओढण्याला सुरुवात केली.  फेट्याचा खालचा एक विळखा सुटला, दुसरा सुटला तरी इव्हर्टची खोडी थांबेना.  सुटलेला भाग आपल्या ताब्यांत घेण्यासाठीं मी खालीं बाकाच्या पायाला तो गुंडाळूं लागलों.  असें होतां होतां माझ्या डोक्यावर एकच विळखा राहिला.  सगळ्या वर्गाला हंसें आंवरेना.  स्वतः  प्रि. ड्रमंड यांना तिकडे न पाहिलेंसें करून व्याख्यान चालवणें कठीण जाऊं लागलें.  ते फार गंभीर आणि शांत गृहस्थ असूनही त्यांच्यावरचा हा हल्ला अवर्णनीय होता.  माझ्या तारांबळीला उपमाच नव्हती.  स्कॉच लोकांस विनोद समजत नाहीं असा समज आहे, पण हें बाळ ह्या समजाला 'भयंकर' अपवाद होतें.  प्रोफेसर्स व्याख्यान देत असतांना देखील ह्या चावटपणाला आळा पडत नसे.  प्रो. अप्टन हे कानांनीं बहिरे व वृद्ध होते.  म्हणून ते खाली मेजावर बसून, मुलांना नातवंडाप्रमाणें भोंवतालीं घेऊन व्याख्यानें देत असत.  अप्टनचें व्याख्यान चाललें असतां तें एकाग्रतेनें ऐकत असलेल्यांच्या कानांत इव्हर्टची पेन्सिल शिरून तो दचकला नाहीं असा एकही विद्यार्थी नव्हता.  अर्थात् व्याख्यानापेक्षां त्या पेन्सिलीकडेच आम्हांला अधिक लक्ष पुरवावें लागे.

लॉकेट नांवाचा एक वेल्स विद्यार्थी कुलुंगी कुत्र्याप्रमाणें ओरडण्यांत प्रवीण होता.  नुसतें भुंकूनच आपली तृप्‍ति करून न राहतां तो केव्हां केव्हां पायाच्या पिंडरीला चावूनही आपली कुशलता प्रगट करी.

मर्कटलीला  :  सिगारेट न ओडणारा विद्यार्थी काय तो मीच एकटा होतों.  त्यामुळें मी सर्वांच्या डोळ्यांत सलत असें.  माझी बसावयाची खोली स्वच्छ, हवाशीर व टापटिपीची असे.  अर्थात् हा अपराध कॉलेजबंधूंच्या दृष्टीनें असह्य होता.  चिरुटाचा धूर, सिगारेटची थोटकें, कागदाच्या गोळ्या वगैरेंची खोलींतल्या सामानांत गणना झाली नाहीं तर ती विद्यार्थ्याची खोली कसली !  एकदां चार पांच विद्यार्थी चहासाठीं न बोलावतां आले.  प्रत्येकानें सिगारेटचे डबे बरोबर आणले होते.  माझ्या खोलींत येऊन प्रत्येकजण धुराचे लोळच्या लोळ सोडूं लागला.  खोली धुरानें इतकी गच्च भरली कीं जणूं काय ती बलूनप्रमाणें उडून जाते कीं काय असें मला वाटलें.  चहा देण्यासाठीं लँडलेडी जेव्हां आंत आली तेव्हां झालेला हा संपूर्ण प्रकार पाहून खोलीला आग लागली आहे कीं काय असें वाटून तिनें मीतीनें किंकाळीच फोडली.  तेव्हां कुठें या मर्कटांचा नवस फिटला.

पॉझ मॅगेझिन  :   उन्हाळ्याच्या सुटींत डॉ. कार्पेन्टर लेक डिस्ट्रिक्टमध्यें राहण्यास गेले.  तेव्हां आम्हां सर्व विद्यार्थ्यांना १५ दिवस आपला पाहुणचार व सरोवरप्रांताची शोभा दाखविण्यासाठीं बोलावून नेलें.  त्या सुट्टीच्या अनेक करमणुकींत 'पॉझ मॅगेझिन' नांवाचें एक तात्पुरतें हस्तलिखित पत्र विद्यार्थ्यांनीं काढलें.  त्यांत कार्पेन्टरसाहेबांना, 'चिप,' अप्टन साहेबांना 'अपी' आणि ड्रमंड साहेबांना 'डमी' अशीं व्यंग नांवें देऊन त्यापुढें त्यांच्या लक्षणांचें एकएक वाक्य लिहिलें होतें.

प्रो. कार्पेन्टरच्या नांवापुढें खालील कविता होती -
Each day he does a mountain climb
A ten mile row, three meals, a witicism.
And fills the intervening time with Pali
.................Texts and Hebrew Criticism.


प्रिन्सिपाल ड्रमंड यांना पांच सुंदर तरुण मुली होत्या.  त्यांच्या नांवांपुढें खालील वाक्य होतें -
Happy is the man whose quiver is full

टोयोसाकी -
There came from far Japan
To cheer this gloomy place
A merry little man
With mischief in his face.

He flirts like any boy
Although a married man
So we must send our Toy
Once more to far Japan.

शिंदे -
A meek and modest Indian
Who will, unless he faints,
Some day duly be worshipped
Among his country saints.

He is no vulgur fraction
As single student be
But he and Mrs. Shinde
Form one integrity.

 

खडतर पांच वर्षे

स्वभावदोष  :   येथपर्यंत घरांतील दारिद्र्याच्या मीं ज्या आठवणी दिल्या त्या केवळ माझ्या बाबांच्या व विशेषतः आईच्या स्वभावाचें वर्णन करण्यासाठीं दिल्या.  त्यांच्या स्वभावांतील दोष दाखविण्यासाठीं नव्हे.  ह्या दारिद्र्याचें कारण माझ्या बाबांचा आळशी स्वभाव असेल, पण कोणत्याही प्रकारची कोणाची फासवणूक किंवा अप्रामाणिकपणामुळें त्यांच्या उत्पन्नामध्यें आलेला तोटा हें नव्हतें.  आतां ह्यापुढेंही कांहीं आठवणी द्यावयाच्या.  त्यांत बाबांच्या स्वभावांतले कांहीं दोष दिसतील.  पण ते त्यांचे दोष नसून-निदान दोष दाखविण्याचा माझा हेतु मुळींच नसून- माझ्या आईच्या स्वभावांतला दैवी चांगुलपणा दाखविण्यासाठींच केवळ त्या आठवणी मी देत आहें.  माझ्या आईच्या सहिष्णुतेची पारख करण्याकरितां व आम्हां मुलांच्या भावी शिक्षणाकरितां देवानें आम्हांला दारिद्र्य हा मित्र दिला.  त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोंत.  पण त्याही पुढें आम्हां मुलांची नसली तरी आमच्या आईची पारख करण्याकरितां आम्हांवर जें दुर्धर संकट आलें, त्याबद्दल काय म्हणावें हें समजत नाहीं.  तें संकट म्हणजे माझ्या बाबांना निशा करण्याचें व्यसन लागलें हें होय !  बाबांना प्रथम गांजा ओढण्याचें व नंतर कांहीं दिवसांनीं दारू पिण्याचें व्यसन लागलें !

संस्थानी नोकरी  :  बाबा त्यांचे लहानपणापासून सुखांत व लाडांत वाढलेले.  पैशाचा लोभ त्यांच्यामध्यें मुळींच नव्हता.  लोभाचा इतका अभाव कीं त्यामुळें त्यांना पैशांची योग्य किंमतही कळत नव्हती, असें म्हटलें तरी चालेल.  त्यांचे शिक्षण बैठें आणि पांढरपेशी होतें.  ही स्थिति त्यांचें अर्धे वय म्हणजे जवळजवळ ते चाळीस वर्षांचे होईपर्यंत चालून मग त्यांना दारिद्र्य आल्यानें पुढें त्यांच्या स्वभावांत व धंद्यांत फरक पडणें कठीण झालें.  जमखंडीचे यजमानांशीं ते भांडून आपण होऊनच घरीं बसले होते व त्यावर यजमानांनीं दोनतीनदां बोलाविलें तरी ते गेले नाहींत.  मला समजूं लागल्यावर ते म्हणत असलेले मला आठवतें कीं, आपण कोणता धंदा नोकरीशिवाय केला नाहीं व आतां नोकरीही जमखंडीच्या यजमानांशिवाय दुसरीकडे करावयाची नाहीं.  आणि हा आग्रह-मग तो बरा असो कीं वाईट असो - त्यांनीं सोळा वर्षे चालविला.  माझ्या जन्माचे सुमारास म्हणजे इ.सन १८७३ चे सुमारास त्यांनीं नोकरी सोडली.  पुढें सोळा वर्षांनी त्यांचा हा करारी आग्रह पाहून यजमान श्रीमंत आप्पासाहेबांनीं आपणच इ.सन १८९० चे सुमारास त्यांना स्टोअरकीपरचें (हिशेबी) विश्वासाचें काम दिलें.  पण दरमहा पगार दहा रुपये होता.  १६ वर्षे घरीं अभिमानानें बसलेल्या नोकराला पुन्हां बोलावल्याबद्दल आप्पासाहेबांचे आभार मानायचे कीं इतक्या जुन्या अनुभवी माणसाला इतका लहान पगार दिल्याबद्दल त्यांच्या कंजूषपणाची तारीफ करावयाची हें ठरविणें कठीण.  पण कांहीं असो, बाबांचा हा पगार व माझी स्कॉलरशिप ह्यावर आमच्या आईनें आमच्या संसाराचें आझें हाकललें.  शिवाय ह्या वेळीं मी इंग्रजी ६ आणि ७ व्या इयत्तेंत गेल्यानें मला पुस्तकांचा खर्च येऊं लागला तोही भागला.  जमखंडी हायस्कुलांत शाळेची फी सातव्या इयत्तेअखेर दरमहा एकच आणा असल्यानें माझ्या दुय्यम शिक्षणांत खंड पडला नाहीं.

व्यसनी विराप्पा  :  इ.सन १८९० चे सुमारास बाबांना ही नोकरी लागली. इ.सन १८८५ सालांत माझा मोठा भाऊ वारल्यापासून ह्या पांच वर्षांत माझ्या आईनें काय दुःख व कष्ट सोशिले तें आमच्या डोळ्यांसमोर आहेत.  कारण नुसतें दारिद्र्यच नव्हें तर बाबांना निशाबाजी लागली ह्याचें तिला फार दुःख होई.  तरुणपणीं बाबांचे हातीं जेव्हां मुबलक पैसा खेळत होता, तेव्हां त्यांना नुसतें तंबाकूचेंही व्यसन नव्हतें.  पानांचा विडाही ते नेहमीं खात नसत.  उतारवयांत त्यांना हें गांजाचें व्यसन लागलें, ह्याचें कारण त्यांची दारिद्र्य-वेदनांमुळें उदासीनता आणि किंकर्तव्यता हीच होय.  बाबांना पुढें पुढें कांहीं सुचेनासें झालें.  अशांत त्यांच्या भाविकपणामुळें ते आल्या-गेल्या साधूजवळ, बैराग्याजवळ जाऊन बसूं लागले.  अर्थात् हे बैरागी म्हणजे निःसंग फिरस्ते, गांजेकसच असणार.  त्यांच्या बेजबाबदार व बेपर्वाईच्या गोष्टी ऐकत बसतांना बाबांना आपल्या संसाराच्या वेदनांचा विसर पडत असावा.  मग त्यांत गांजाच्या व्यसनाची भर पडण्यास काय उशीर !  तशांत ज्या दत्त सांप्रदायाच्या ते ह्या वेळीं नादीं लागले होते, त्यांतील बरीच मंडळी आळशी, उनाड व गांजेकस होती.  त्यांत विराप्पा नांवाचा एक कोष्टी गृहस्थ होता.  तो स्वभावानें फार चांगला होता.  तो कांहीं कानडी साधुसंतांची पदें फार रसिक तर्‍हेनें म्हणत असे.  पण त्याला गांजाचें व्यसन फार जबर होतें.  तो माझ्या बाबांचा मोठा सोबती होता.  माझ्या बाबांना व्यसन लागण्याचें हें एक कारण.  विराप्पा तर ह्या व्यसनापायींच शेवटीं वारला.  हा आपल्या मित्राचा नाश झालेला पाहून माझे बाबा मात्र शुद्धीवर येऊन निवळले !

बबलादीचे सिद्ध  :   पण इतक्यांत बाबांना दुसरी वाईट संगत लागली.  ती म्हणजे मागें सांगितलेल्या बबलादीच्या लिंगायत साधूंची.  बबलादीचे हे सिद्ध पुरुष त्या काळीं कानडी प्रांतांतले बरेच प्रसिद्ध देवर्षि होते.  जमखंडीच्या पूर्वेस सुमारें १२ मैलांवर कृष्णा नदीचे कांठीं विजापूर जिल्हांत बबलादी नांवाचें एक खेडेगांव आहे.  त्या गांवी ह्या सिंद्धांचा मठ आहे.  चंद्रगिरी नांवाच्या एका देवतेचा ह्या सिद्ध घराण्याच्या मूळ पुरुषाला प्रसाद होता.  ते मूळ पुरुष चांगले निःसंग साधु असावेत, असें त्यांनीं केलेलीं कांहीं अनुभवी कानडी पदें या सिद्धांच्या बरोबर हिंडणारे अनुयायी म्हणत, यावरून दिसतें.  ह्या सिद्धांच्या आशीर्वादानेंच पुन्हां नोकरी लागली, अशी आमच्या बाबांची समजूत होती.  बबलादीचा संप्रदाय त्या प्रांतांत तेव्हां वाढत होता.  त्यांपैकीं सर्वांत वडील सिद्ध शंकराप्पा, त्यांचे चिरंजीव सदाशिवाप्पा आणि त्यांचे दोन पुतणे गंगाप्पा व शिवरुद्राप्पा असे चौघेजण आळीपाळीनें कर्नाटकांत फिरतीवर भिक्षेस निघाले म्हणजे आमचे घरीं येऊन उतरत असत.  याशिवाय त्यांचे शिष्य पडसलगी नांवाच्या एका खेड्यांत (आईच्या माहेरगांवीं) आलगुरास तवनाप्पा नांवाचे एक पूर्वाश्रमींचे जैन जातीचे सिद्ध होते.  ह्यांच्याच मार्फत बाबांचा बबलादीशीं संबंध जडला.  हा इ.सन १८८९ सालीं जडला असावा.  इ.सन १८९० मध्यें बाबांना नोकरी लागली.  हे स्वामी उघड उघड अभेद-मार्गी असत, म्हणजे जातिभेद पाळीत नसत.  ते कोणाची पर्वा करीत नसत व निःस्पृह आणि धुंद असत.  ते दारू पीत व मांस खात.  तुळजापूरची देवी आमची कुळदेवता.  तिला मांसाचा नैवेद्य जरूर लागतो.  तुळजापूरचे भोपे भाऊराव कदम आमचेकडे भिक्षेला आले कीं हा नैवेद्य होत असे.  शिवाय एक रामदासी ब्राह्मण संन्यासी येत.  ते तर दारू व मांस दोन्हीही घेत.  अशा अनेकांच्या संगतींत बाबांना दारूची ही चटक लागली व मांसाचा प्रघात आमचे घरांत पडला असावा.  तरी पण आमच्या दारिद्र्यामुळें त्यांचें हें व्यसन अनावर होऊं शकलें नाहीं, हे आमच्या दारिद्र्यमित्राचे आम्हांवर मोठे उपकारच !

स्वभावांतील पालट  :  प्रथम प्रथम बबलादीच्या सिद्धावर माझीही चांगली श्रद्धा होती.  ते घरीं आले कीं त्यांची पूजा आमचे घरीं होत असे.  चहूंकडून सर्व जातींचे भक्त येत.  स्वामी तुळशी-कट्टयावर बसत व आम्ही ताटांत कापूर ठेवून आरती म्हणत ओवाळावयाचें व त्यांच्या पायांवर फुलें घालावयाचीं हीच काय ती त्यांची साधी पूजा होती.  आरती झाल्यावर भक्त लोक दारूच्या बाटल्या त्यांचेपुढें ठेवीत आणि आशीर्वाद मागत.  ती दारू सर्वजण पीत.  त्यांत मोठा वांटा ह्या सिद्धाचा असे.  दारूच्या निशेंत सिद्धाच्या तोंडून जीं भविष्यवाक्यें निघत तीं खरीं होत, अशी भक्तांची समजूत असे.  ही आरती करीत असतांना मीच ताट ओवाळीत असें व कानडींतील यांच्या संप्रदायाच्या आरत्या व इतरही चांगलीं पदें मी नीट चालीवर म्हणत असें.  शाळेंतला माझा चांगला अभ्यास, माझी श्रद्धा व निर्व्याज वर्तन वगैरेमुळें मीही त्या सर्व साधूंना आवडत असे.  पण पुढें माझी इंग्रजी हायस्कुलांतील मॅट्रिकची परीक्षा पास होऊन मी कॉलेजांत जाऊन पुणें-मुंबईकडचें मला नवें वळण लागल्यावर त्या प्रांतीं लोकांत सिद्धांपेक्षां माझीच प्रसिद्धि होऊं लागली.  तेव्हां मात्र ही सिद्धमंडळी मला पाहून चपापूं लागलीं.  मी मोठा विद्वान् होईन, हें त्यांच्या तोंडचें कानडी भविष्य मीं कित्येक वेळां प्रत्यक्ष ऐकलें होतें.  मॅट्रिक क्लासमध्यें असतांनाच मला या सिद्धांच्या लीला आवडेनाशा झाल्या होत्या.  बाबांवरही माझ्या सर्व वर्तनाचा दाब बसून हें बंड आमच्या घरांतून अजिबात बंद झालें.  इतकेंच नव्हें तर पुढें नोकरी लागल्यावर बाबांच्या भांबावलेल्या मनाला कांहीं व्यापार मिळाल्यामुळें म्हणा किंवा माझ्यामुळें म्हणा त्यांची निशाबाजी अगदीं बंद झाली !  इ.सन १८९१ चे डिसेंबरांत माझी मॅट्रिकची परीक्षा पास झाली आणि माझ्यांतच नव्हे तर माझ्या घराण्यांतही मोठाच पालट झाला !

कौटुंबिक उपासनामंडळ

१९२५ च्या एप्रिल महिन्यांत मी मंगलोरहून पुण्यास आलों.  त्यापूर्वी १० सप्टेंबर १९२४ रोजीं माझी पत्‍नी व चि. प्रतापराव व चि. विश्वास यांस घेऊन मुंबईहून पुण्यास अहल्याश्रमांत राहण्यास आली होती.  थोडे दिवस सर्वजण एकत्र राहून विश्रांति घेतल्यावर मी भावी धार्मिक कामाची योजना मनांत आंखूं लागलों.  अलीकडे बरेच दिवस ब्राह्म धर्माचाप्रचार साधारणपणें बहुजनसमाजांत आणि विशेषतः कुटुंबांत (बायकामुलांत) कसा होईल याची विवंचना मनाला लागली होती.  ब्राह्म समाजाची चळवळ म्हणजे सुशिक्षितांत, शहरांत राहणार्‍यांत आजवर गुंतून राहिली होती.  या समाजाची उच्च आणि शुद्ध बुद्धिवादाची शिकवण साध्याभोळ्या बहुजनसमाजाला सहज कळण्यासारखी नव्हती.  इंग्रजी आणि संस्कृत न जाणणार्‍या आणि खेड्यांत राहणार्‍या लोकांसाठीं ब्राह्म समाजाकडून विशेष प्रयत्‍न होणें फार मुष्किलीचें होतें; म्हणून आजपावेतों ते फार झाले नव्हते.  मग अशा लोकांच्या बायकामुलांसाठी प्रयत्‍न होणें दूरच राहिलें.  म्हणून पुणें येथें तूर्त एक कौटुंबीय योजना मी करूं लागलों.  या कामीं भगिनी जनाबाईंचें फार प्रोत्साहन मिळालें.  शुक्रवार पेठेत माझे मित्र श्री. बाबुराव जगताप हे जनतेस उच्च शिक्षण देऊन त्यांची उन्नति करण्यासाठीं श्रीशिवाजी मराठा हायस्कूलचें काम आज बरेच दिवस करीत होते.  ते आणि त्यांची इतर मित्रमंडळी रा. गणपतराव शिंदे, रामराव ज्योतीराव शिंदे, B.A., LL.B., जेधे, काळभोर वगैरे मराठा समाजाचे पुढारी धार्मिक बाबतींत प्रागतिक विचाराचे हेते.  बाबुराव जेधे व पुणें सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते.  ह्या मंडळींच्या घरीं मी आणि भगिनी जनाबाई जाऊन रविवारीं आणि इतर सुटीच्या दिवशीं ब्राह्म धर्माच्या कौटुंबिक उपासना चालवूं लागलों.  बायकामुलांस समजतील अशीं सोपीं भजनें व भक्तिपूर्ण प्रवचनें मंडळींना आवडूं लागलीं.  हें काम सुमारें एक वर्ष झाल्यावर आम्ही आपली वस्ती अहल्याश्रमांतून काढून शुक्रवार पेठेंत श्रीशिवाजी मराठा हायस्कूलला लागूनच पश्चिमेस असलेल्या छपरबंद आळींतील माळवदकराच्या वाड्यांत हलविली.  ह्या कामांत बरेंच यश येण्याचासंभव दिसूं लागल्यामुळें पुढील जाहीर विनंतीपत्र ता. १६ जून १९२६ रोजीं निघालें.  तें असें -

कौटुंबिक उपासना मंडळ

विनंतीपत्र

यं हि किच्चं अपविद्धं अकिच्चं पन कयिरती ।

उन्नलानां पमत्तानां तेसं वङ्ढानि आसवा ॥ धम्पपद अ. २१, श्लो. ३.

अर्थ -  जें करावयास पाहिजे त्याचा चुथडा होत आहे.  जें करूं नये तें पण केलें जात आहे.  उनाड आणि प्रमत्त जे, त्यांच्या वासना वाढत आहेत.

१.  हल्लीं लोकसमाजाची स्थिति अत्यंत कींव येण्यासारखी झाली आहे.  अध्यात्म म्हणजे काय हें लोकांना कळून त्याची थट्टा उघड उघड चालली आहे.  तरुण नास्तिक व वृद्ध निराश झालेले दिसतात.  मनुष्याचा मनुष्यावर विश्वास नाहीं.  कारण एकच कीं धर्माचा पाया ढांसळूं लागला आहे.

२.  धर्माविषयीं विचार अथवा उपासना करावयाची झाल्यास फार तर प्रौढ मंडळीच जमतात. तेही क्वचित.  अशा एकांगी विचारांचा आणि उपासनांचा परिणाम कुटुंबावर होत नाहीं, ह्यांत नवल नाहीं.  खरी धार्मिक उपासना सहकुटुंबच व्हावयास पाहिजे.  म्हणून खर्‍या श्रद्धेनें व प्रेमानें प्रेरित झालेली मंडळी नियमितपणें उपासनेसाठीं एकत्र होणें आवश्यक आहे.

३.  धर्म म्हणजे केवळ मत नव्हे.  तत्त्वज्ञान किंवा ब्राह्म कर्मेहि नव्हत.  धर्म ही बाब अंतःकरणाची व भावनांची आहे, म्हणून धर्माचा उदय आणि प्रसार कुटुंबाचे द्वारां होणेंच उचित आहे.  तसें इतिहास सांगत आहे.  कुटुंब म्हणजे केवळ बायकोच नव्हे.  आईबाप, बहीणभाऊ, नवराबायको, मुलें ह्यांच्या प्रेमाचें केंद्र म्हणजे कुटुंब.  हेंच धर्माचरणाचें व प्रसाराचें क्षेत्र.  केवळ व्यक्ति नव्हे.

४.  वरील गोष्टी ध्यानांत आणून अशा स्वतंत्र शुद्ध कार्यकारी उपासनेची एक घटना करण्याची मंडळाची इच्छा आहे.  ज्यांना हा उद्देश पटतो त्यांनीं ह्या घटनेंत सहकुटुंब यावें, असें आमंत्रण आहे.  ज्यांना हा उद्देश पटतो त्यांनीं ह्या घटनेंत सहकुटुंब यावें, असें आमंत्रण आहे.  ज्यांना कुटुंबच नसेल त्यानें एकटें आल्यास चालेल; पण तो अथवा ती सभासद होऊं शकणार नाहीं.  कोणाचीं खाजगी गतें अथवा कौटुंबिक परंपरा कशा आहेत हें पाहण्याची व तीं कशीं असावींत हें ठरवण्याची मंडळाची इच्छा नाहीं व अधिकारही नाहीं.  प्रत्येकाचें अंतर जाणणारा ईश्वर समर्थ आहे.  एकमेकांच्या अंतरांत डोकावण्यापेक्षां व वर्तनाविषयीं साशक राहण्यापेक्षां सर्वांनीं एकत्र जमून चित्तशुद्धि करणें म्हणजेच उपासना होय.

५.   कुटुंबें कोणत्याही दर्जाचीं, जातीचीं, राष्ट्रांचीं, अगर धर्माचीं असोत, अथवा ह्यांपैकीं कोणतीही उपाधि नसलेली असोत.  तिकडे पाहण्याचा मंडळाचा अधिकार नाहीं.  मंडळांत येणार्‍यांना उपासनेसंबंधीं खरी श्रद्धा आणि कळकळ पाहिजे आणि ती नियमितपणा, वक्तशीरपणा, स्थिरपणा आणि शांतपणा ह्या गुणांच्या द्वारांच दिसून आली पाहिजे.  एवढीच मंडळाची शर्थ आहे.

६.  मंडळाचा सर्व विचार आणि व्यवहार केवळ बहुमतानें ऐहिक कार्याप्रमाणें चालणार नाहीं.  योग्यायोग्यतेनुरूपच निकाल व अंमलबजावणी होईल.

कृष्णराव गोविंदराव पाताडे,
सेक्रेटरी कौ. उ. मंडळ, पुणें.
घ.नं. २९६ शुक्रवार पेठ, पुणें.


प्रथम ६ महिन्यांचा वृत्तांत

पुणें येथें हें मंडळ सुरू होऊन आज सहा महिने पुरे झाले.  ह्यांत सुमारें १०।१२ कुटुंबें सभासद झालीं आहेत. पुणें शुक्रवार पेठेंतील श्रीशिवाजी हायस्कुलांत मंडळाच्या सार्वजनिक साप्‍ताहिक उपासना व प्रासंगिक कीर्तनें होत असतात.  अशा ३० उपासना व पांच कीर्तनें झालीं.  शिवा रा. रा. अण्णासाहेब शिंदे, काळभोर, जेधे, जगताप आणि लाड ह्यांचे घरीं कौटुंबिक उपासना झाल्या त्या वेळीं स्त्रियांच्याच केवळ २३ संगत सभा झाल्या.  साप्‍ताहिक उपासनेच्या वेळीं श्रीशिवाजी बोर्डिंगांतील विद्यार्थी हजर असत.  आणि स्त्रियांच्या सभांतून सभासद नसलेल्या कुटुंबांतून देखील बर्‍याच स्त्रिया आपल्या सुना-लेकींसह हजर असत.  मंडळाचे उपासनेंत किंवा कोणत्याही कामांत जातींचा किंवा धर्माचा भेद मुळींच पाडण्यांत येत नाहीं.  अर्ध वर्ष येणेंप्रमाणें ईश्वरकृपेनें निर्विघ्नपणें काम झालें.  म्हणून मंडळानें २६ डिसें. १९२६ रोजीं रविवारीं हा सर्व दिवस गांवाबाहेर मुठा नदीचे कांठीं विठ्ठलवाडीजवळील आंबराईत आध्यात्मिक उत्सवांत घालविला.  तेव्हां सकाळी ६ पासून सायंकाळीं ६ पर्यंत भजन, प्रार्थना, उपदेश, संभाषणें आणि सहल इत्यादि कार्यक्रम व्यवस्थेनं पार पडला.  त्यांत लहानथोर स्त्री-पुरुष सुमारें ५० जणांनीं भाग घेतला होता.  गेल्या सहा महिन्यांतील कामाप्रमाणेंच हा शेवटचा एक दिवसाचा उत्सवही श्री. अण्णासाहेब शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखालीं सुरळीतपणें साजरा झाला.  अशा प्रसंगास वनोपासना म्हणण्यांत येतें.  मंडळ ईश्वराचें आभारी आहे.

कोणत्याही जातीच्या व धर्माच्या कुटुंबाला मंडळाचें सभासद होतां येतें.  आपले स्त्री-पुरुष आप्‍त असतांना एखाद्या स्त्रीस किंवा पुरुषास तुटकपणें व्यक्तिशः सभासद होतां येत नाहीं.  मंडळ व्यक्तीचें नसून कुटुंबाचे आहे.  तथापि सहानुभूति असल्यास एखाद्या आप्‍त नसलेल्या व्यक्तीसही मंडळाचा आध्यात्मिक फायदा घेण्यास हरकत नाहीं.

गणपतराव बापूजी शिंदे
पुणें, पेठ शुक्रवार, घ.नं. २९६
ता. १ जानेवारी १९२७


जिजाई ऊर्फ अवलाई   :   ता. २१ जुलै १९२६ रोजीं आषाढी महाएकादशी आली होती.  त्या दिवशीं रात्रीं ८ पासून १२ पर्यंत शिवाजी हायस्कूलमध्यें माझें हरिकीर्तन झालें.  श्रीतुकाराम महाराजांची पत्‍नी जिजाऊ ह्यांचे आख्यान लावण्यांत आलें होतें.  प्रपंचामध्यें पुरुषांबरोबर स्त्रियांचें सहकार्य बिनबोभाट चाललेलें असतें.  पुरुष ध्येयवादी असला तर बायका व्यवहारवादी असतात.  मोठमोठे पुरुष कर्तबगारीनें व्यावहारिक आणि अध्यात्मिक विषयांत पुढें येतात; पण त्यांच्या बायका सुशिक्षित म्हणून नांवाजल्यामुळें त्यांनीं केलेले सहकार्य जगाच्या नजरेंत भरत नाहीं.  तुकाराममहाराजंची पत्‍नी जिजाऊ ही कजाग होती, म्हणून तुकाराममहाराजांच्या तुलनेनें जिजाऊची जो तो निंदा करीत असतो.  ह्या अन्यायाचें निराकरण अंशतः तरी व्हावें म्हणून मीं हें खालील पद मुद्दाम रचून त्याचें निरूपण आख्यानांत केलें.


अवलाईची नवलाई
(एक उपनिषद)

पद  :-  (चाल - चला चला गड्यांनो जाऊ चला)

अशी कशी तुक्याची अवलाई ।  ऐका तो तिची नवलाई ॥ घ्रु ॥
भजनीं असतां भांडभांडते ।  संत आलिया वसवस करिते ॥
विठुला ''काळ्या, वैरी'' म्हणते ।  भली तिची ती मंगळाई ॥
काय ही नवलाई ॥१॥
खुद्द पुण्याचा अपपा चुव्वा ।  अस्सल मराठा माणूस बरवा ॥
साहुकार जगजाहिर सर्वा ।  कन्या त्याची जीजाई ॥
कीं अवलाई ॥२॥
तरुण तुकोबा शेठ समर्थ ।  संसारीं अंतरीं विरक्त ॥
परंपरेचा विठ्ठलभक्त ॥  बाइल त्याची दुसरी ही
ही नवलाई ॥३॥
दोन बाइला त्यां समवेतां ।  साधित असतां इहपर वृत्ता ॥
दुकाळ आला पुढें अवचितां ।  पहिल मेली रखुमाई ॥
राहिली अवलाई ॥४॥
तुक्याचे घरीं दिवा घ्या दिसां ।  अवली घरि तरी धीर भरंवसा
कर्ज काढिलें रुपये दहाविसा ।  अबला असूनी सबला ही
आईका नवलाई ॥५॥
तुक्या बैसला भंडार्‍यावर ।  पोट उपाशी, भजनीं निर्भर
अवलि हुडकने तया घरोघर ।  त्याविण न शिवे पाण्याही
विसरे अबोलाही ॥६॥
कोंडाकळणा भाकर मळली ।  भंडार्‍यावर त्वरित निघाली ॥
भर दुपारां तहान लागली ।  परि थांबेना ती बाई ॥
जाहली कशी घाई ॥७॥
तीक्ष्ण सडाने पाय विंधिला ।  वाहुं लागलें रक्त भळाळा ॥
भोंवळली, पडली धरणीला । ब्राह्मज्ञानी पति पाही
जिंकिलें त्यालाही ॥८॥
मोक्षाहुनिह प्रपंच बांका ।  तुक्या येतसे नवा अवांका
अवली झाली प्रति-सहायिका ।  उघडे त्याचा डोळाही
पहा हो नवलाई ॥९॥
तुकया आम्हां सर्वा संत ।  परि तुकयाला अवली संत ॥
नसे तियेला त्याची खंत ।  सोडूनि गेला तरि राही ॥
तीच ती अवलाई ॥१०॥
इतर सती त्या चितेंत जळल्या ।  संसाराच्या ज्वाळा गहिर्‍या ॥
अवलीनें पण त्याही गिळल्या ।  डगमगली ना केव्हांही ॥
कशी मग अबला ही ॥११॥
तुका पळपुटा, अवली वीटा ।  कर्मयोगी सत्याग्रही स्पष्टा ॥
पंढरिचा विठु केला खोटा ।  खरी ठरविली मंगळाई ॥
घ्या मनीं नवलाई ॥१२॥
परब्रह्म तें सुखीच राहे ॥  प्रपंच परि हा कठीण आहे
ह्या सगुणामधिं निर्गुण पाहे ॥  शिकविते अ, आ, ई ॥
ब्रह्मज्ञान्यांही !  ॥१३॥
आम्हि तुकाब्बा सदैव वंदूं ।  परि अवलाई कधीं न निंदूं ॥
हा तियेचा ॠणानुबंधु ॥  जगीं पसरो आख्याई
मागणे लइ नाहीं ॥१४॥
प्रकृतिपासुन पुरुष जन्मला ।  भोगुनि तिजला जागा झाला ॥
पुन्हां निगुणीं झोपीं गेला ।  बाइल त्याची ती आई
संपली नवलाई ॥१५॥

श्रीशिवनेरी जीर्णोद्धार कमिटीतर्फे श्रीशिवरायाचें जन्मस्थान जुन्नर येथें शिवनेरी किल्ल्यावर श्रीजिजामाता स्मारक होत आहे.  त्यांत सर्व जातींच्या स्त्रियांनीं विशेषतः महाराष्ट्रांतील स्त्रियांनीं आस्थेनं भाग घ्यावा म्हणून कौटुंबिक उपासना मंडळामार्फत मीं प्रयत्‍न करावेत म्हणून कमिटीनें विनंती केली.  त्यासाठीं ता. १३-८-१९२७  रोजीं पुण्यांतील सर्व जातींतील स्त्रियांची मोठी जाहीर सभा पुणें येथील श्रीशिवाजी हायस्कुलांत भरविण्यांत आली.  त्या वेळीं प्रथम माझें कीर्तन झालें.  आख्यान जिजामातेचें लावलें होतें.  शाळेचा ड्रॉइंगहॉल स्त्रियांनीं चिकार भरून गेला.  जागा नसल्यामुळें पुरुषांची निराळी सभा भरवावी लागली.  स्मारकास मदत म्हणून आरतीमध्यें रुपये, नोटा टाकण्यासाठीं बायकांची मोठी गर्दी झाली.  रुपयांची पोंच देण्यालाहि कठीण पडूं लागलें.  म्हणून देणग्या स्वीकारण्याचें काम बंद ठेवावें लागलें.  स्त्रियांची एक खास कमिटी करून वर्गणी जमविण्याचें काम पुढें ढकलण्यांत आलें.  जागच्याजागीं आरतींत २००हून अधिक रक्कम जमली.  या वेळीं मीं केलेला फटका म्हणण्यांत आला.


फटका

ऐका हो साजणी बायांनो, नवलाचा गातों फटका ।
नउ लाखांचा माझा फटका, घटकाभर लाविल चटका ॥घ्रु.॥
जिकडे तिकडे म्लेंच्छ मातला, हिंददेवी विधवा झाली ।
स्वराज्यसौभाग्याचें कुंकुं, पुसिलें अवकळा आली ॥
धर्म बुडाला, न्याय बुडाला, दुकाळ पडला दारुण ।
प्याया नसे पसाभर पाणी, कोठुन दाणावैरण ॥
दुःख दैन्य दारिद्रय पसरलें, जुलुमाचें चहुदिशीं रान ।
शत्रुमित्र सर्वत्र उदासिन, पुसे न कोणाला कोण ॥
महाराष्ट्राचा धर्म पुरातन, तोही झाला कीं लटका ।
नऊ लाखांचा फटका माझा घटकाभर लाविल चटका ॥१॥
सह्यचलाच्या खाकेमध्यें शिवनेरचें वारूळ ।
त्यांत एक नागीण बैसली, पिलूं तिचें कर्दनकाळ ॥
काळाचा वरवंटा फिरला, नाग लागला देशघडी
परि धीराची ढाल जणूं का नागिण वारुळ ना सोडी ॥
यवन गारुडी खोट्या नादें फितवाया तिजला टपला ।
स्वजन बाटले, बापहि फितला, नागिण जातीची चपला ॥
ध्यास तियेनें मर्नी घेतला, कधीं कशी होईल सुटका
नऊ लाखांचा फटका माझा, घटकाभर लाविल चटका ॥२॥
स्वातंत्र्य मंत्र जादूनें आपुल्या पिलास शिकवी भाराया ।
गडी मावळे साधे भोळे महाराष्ट्र-भू ताराया ॥
तुळजाई जणूं सजीव झाली राष्ट्रभूमिला रक्षाया ।
सह्याद्रीचे वेंचक मणके मागुं लागली भक्षाया ॥
पाषाणाच्या नैवेद्यावरि तृप्‍त न होतां फुरफुरली ।
दुष्मानाच्या महाबळीवर काळनजर तिची फिरली ॥
अफझुल्लासम मेष मातले, क्षणांत करवियला झटका ।
नइ लाखांचा फटका माझा घटकाभर लाविल चटका ॥३॥
गोदावरि कावेरी शिवेचें दंडकारण्य आवरिलें ।
हिंदुपदाचें गळित छत्र तें उजळ करोनी उद्धरिलें ॥
भटीं भिक्षुकीं यवन कीटकीं आक्रमिला क्षत्रियभानू ।
खुला करुनिया महाराष्ट्राचें प्रकाशिलें सारें गगनू ॥
तीन विसावरी दोन शतक वरुषें अवतार जिजानामा ।
महाराष्ट्राचा श्वासोश्वासहि व्यापुनि परते निजधामा ॥
महाराष्ट्रमायेचा कथिला संक्षेपानें हा चुटका
नऊ लाखांचा माझा फटका घटकाभर लाविल चटका ॥४॥

माझ्या कीर्तनांतून नेहमीं भक्तिज्ञानपर, धार्मिक किंवा सामाजिक असे विषय असतात.  पण केव्हां केव्हां सामान्य बायकांना, विशेषतः मुलांना कळण्यासाठीं त्यांचें विवेचन विनोदपरहि असतें.  ता. २९-८-२६ रोजीं कृष्णजन्मानिमित्त जेधे मॅन्शनमध्यें कीर्तन झालें.  विषय 'आजकालच्या सुधारणेचें दिवाळें' हा होता.  तेव्हां मीं स्वतः रचलेली प्रासंगिक लावणी महणून दाखवली.  जुनी श्रद्धा व नवीन सुधारणा यांचा हा झगडा आहे.  वरून दिसण्यांत ग्राम्य पण आंत विषय खोल असा आहे.


जुन श्रद्धा व नवीन सुधारणा यांचा संवाद
(मला मुंबईला जायचें - या चालवर)

श्रद्धा :-  अगे नवीनारी !  तूं चाललीस कुठं ?  जरा थांब ना ॥ध्रु.॥
सुधारणा :-  ताई, झाल कशि घाई, वेळ बोलायाची काइ, तुला ठावं कसं न्हाइ,
मला जायचं सेवासदना ॥१॥
श्रद्धा :-  वरखालीं झकपक, मागें पुढें टकमक, अशि कशी बहिर्मुख,
अंतरीं वाइच तरी बघ ना ॥२॥
सुधारणा :-  झालें परीक्षा पास, मतें मिळालीं खास, नेहरूदास,
उद्या कौन्सिल उघडेल बघ ना ॥३॥
श्रद्धा :-  नाक नाहीं तिथं, वरी करी काई नथ, नुसती चोळी नाहीं हात
खालीं डोळे, ना, वरती चष्मा ॥४॥
सुधारणा :-  मी युरोपला जाय, घरीन राष्ट्रांचे पाय, लोकसत्तेचा जय
मग तरी म्हणशिल होय ना ? ॥५॥
श्रद्धा  :-  १ पोर नेसली दाट, म्हून विसरली वाट, ही नवी वहिवाट,
कशी भटकते रानोराना ॥६॥

१ पोर भपकेदार लुगडें नेसली, म्हणून वाट विसरली.


वार्षिकोत्सव  :   रविवार ता. १७ जुलै १९२७ रोजीं मंडळाचा वार्षिकोत्सव श्रीशिवाजी हायस्कुलांत सर्व कुटुंबांना एक दिवसभर जमवून साजरा करण्यांत आला.  कोल्हापुराहून रा. गोविंदराव सासने व जळगांवहून सौ. आनंदीबाई शिर्के हे खास निमंत्रणावरून आले होते.  सकाळीं उपक्रम उपासना रा. बाबूराव जगताप यांनीं चालविली.  ९॥ वाजतां सकाळीं चहा, नंतर सहल, १२ वाजतां सहभोजन, ३ वाजतां मुलामुलींचे बैठे खेळ, सायंकाळीं ५॥ वाजतां जाहीर सभा वगैरे कार्यक्रम झाले.  गणपतराव शिंदे, गोविंदराव सासने, सौ. आनंदीबाई शिर्के, नाशिकचे भिकाजी नारायणराव गोडसे ह्यांचीं विचारपूर्ण व्याख्यानें झालीं.  अस्पृश्य कुटुंबासह सर्व मंडळींनीं भेदभाव न बाळगतां सहभोजनांत भाग घेतला.  सुमारें १०० हून अधिक पानें पडलीं होतीं.

ह्यापूर्वी १९२७ च्या एप्रिल महिन्यांत पुणें प्रार्थना समाजाचा ५६ वा वार्षिकोत्सव झाला.  ह्या वेळीं मुंबईहून बरीच पाहुणेमंडळी आली होती.  त्या समाजाचा व ह्या मंडळाचा परस्पर स्नेह व परिचय वाढावा म्हणून शुक्रवार ता. २२ एप्रिल १९२७ रोजीं कौ. उ. मंडळाच्या सर्व सभासदांनीं हिराबागेजवळील पुरंदरे यांच्या बागेंत सर्व दिवस वनोपासनेंत घालवला.  सकाळीं ८ वाजतां डॉ. ग. य.चिटणीस यांनीं उपासना चालवली.  तिसरे प्रहरीं श्रीशिवाजी हायस्कुलांत माझें व्याख्यान झालें.  ह्या वेळीं मी ब्रह्मदेशांतून नुकताच आलों होतों.  ब्रह्मदेशांतून आणलेल्या नवन चिजा दाखवून त्यांवर मीं सप्रयोग भाषण केलें.

वैशाख शुद्ध पौर्णिमेस श्रीगौतमबुद्धजयंति व ता. २५ डिसेंबर रोजीं ख्रिस्त जयंति ह्या मंडळाकडून गांवाबाहेर वनोपासना करून आतांपर्यंत साजर्‍या करण्यांत आल्या.  बुद्धजयंतीला दोनदां प्रो. धर्मानंद कोसांबी ह्यांचा लाभ घडला.  कलकत्त्याच्या ब्राह्म समाजाच्या शतसांवत्सरिक उत्सवाप्रीत्यर्थ अमेरिका व इंग्लंड वगैरेकडील स्त्रीपुरुष पाहुणेमंडळी, डॉ. आणि मिसेस् साउथवर्थ (चिकॅगो), मिसेस् वुडहाउस व मिस् नेट्लफील्ड ह्यांचा जाहीर सभा व संमेलनें करून सत्कार करण्यांत आला.

१९२७ सालांत ऑगस्टपासून डिसेंबरअखेर ५ महिने भगिनी जनाबाई शिंदे यांनीं श्रीशिवाजी शाळेंत मुलांमुलींचा विशेशतः मुलींचा एक गायनवर्ग चालवला.  उपासनेंतील भजनें मुलांना शिकवण्याचा मुख्य उद्देश होता.  मुली नियमानें येईनात, म्हणून हा वर्ग बंद करण्यांत आला.

मंडळाचें काम बाहेरगांवीं व्हावें म्हणून ब्राह्म समाज शतसांवत्सरिकानिमित्त १९२७ जुलै व त्यानंतर मीं कोल्हापूर, सातारा व अहमदनगर वगैरे ठिकाणीं सफरी काढल्या.  बरोबर सातार्‍यापर्यंत गणपतराव शिंदे व बेळगांव, निपाणी, गडहिंग्लज वगैरे ठिकाणीं रा. कृ.गो. पाताडे आले होते.  अहमदनगरच्या प्रा. स. च्या उत्सवांत रा. गणपतराव शिंदे तीनदां व रा. बाबूराव जगताप दोनदां आले होते.  १९३१ सालीं अहमदनगास अहल्याबाई शिंदे (सौ. गणपतराव शिंदे) ह्या भगिनी जनाबाई शिंदे ह्यांचेबरोबर आल्या होत्या.  कोल्हापूर येथें कौ. उ. मंडळाची स्थापना होऊन डॉ. कृष्णाबाई केळवकर, रा. भगवंतराव बारटक्के आणि विशेषतः रा. गोविंदराव सासने ह्यांच्या चिकाटीनें ह्या मंडळाचें काम १९२८ सालीं सुरू होऊन कांहीं वर्षे चाललें होतें.

१९३० सालापर्यंत हा कार्यक्रम व्यवस्थितपणें चालला होता.  १९३० सालीं मे महिन्यांत मीं कायदेभंग केल्यावरून मला ६ महिने कारावास घडल्यानें वरील कार्यक्रमांतील बरींच कामें बंद पडलीं.  तथापि साप्‍ताहिक उपासना, पाहुण्यांचें स्वागत, वनोपासना वगैरे कामें अद्यापि सुरळीत चालू आहेत.  १९३६ सालीं मी वेताळ पेठेंतील माझें भाड्यांचें घर सोडून शिवाजीनगर वसाहतींत माझ्या स्वतःच्या घरीं येऊन राहूं लागलों.  त्या वेळीं कौ. उ. मंडळाची भांबुर्डा उर्फ शिवाजीनगर शाखा नवीन उघडण्यांत आली.  प्रथम प्रथम ह्या मंडळाच्या उपासना प्रो. वि. के. जोग ह्यांच्या घरीं होत.  प्रो. जोग वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपॉल होऊन त्या कॉलेजांत राहूं लागल्यापासून ह्या उपासना 'राम-विहार' ह्या माझ्या राहत्या घरांत होऊं लागल्या असून त्या अद्याप चालू आहेत.  पण मंडळाचें काम अशा दोन शाखांमधून विभागल्यामुळें आणि माझें वार्धक्य आणि आजार यांमुळें ह्या मंडळाचें काम हल्लीं फार थोड्यां प्रमाणावर चाललें आहे.

कॉलेज-प्रवेश

इ.स. १८९३ चे आरंभापासून तों इ.स. १८९८ अखेर सहा वर्षे मी पुणें येथील फर्ग्युसन कॉलेजमध्यें होतों.  ह्या काळाचे दोन भाग पडतात.  प्रिव्हियन आणि इंटरमिजियट परीक्षांचा पहिला भाग आणि बी.ए. आणि एलएल.बी. या परीक्षांचा दुसरा भाग.  ह्या दोन भागांत माझ्या घरची स्थिति, सांपत्तिक स्थिति, मनःस्थिति व देशस्थिति वगैरे अनेक कारणांमुळें बराच भेद पडला आहे.

घरची अत्यंत गरिबी, निराधार होऊन मी पुण्यासारख्या विस्तीर्ण शहरांत कोणाची ओळख ना पाळख असा आलेला.  तशांत फर्ग्युसन कॉलेजमध्यें कसा प्रवेश मिळाला ह्याचें मला अद्यापि आश्चर्य वाटतें.  हायस्कुलांतील सहाव्या इयत्तेंतील माझे शिक्षक रा. वासुदेवराव चिरमुले, बी.ए. ह्यांनीं 'पुणें येथें गरीब मराठा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे बाबतींत मदत करणारी एक संस्था आहे,' असें सांगितलें, म्हणून केवळ माझे नशिबाची परीक्षा करण्याकरितां मी ह्या अफाट शहरांत येऊन पडलों.

त्या वेळीं मला विसावें वर्ष देखील पुरें झालें नव्हतें.  मॅट्रिकच्या परीक्षेकरितां मी पुण्यास इ.स. १८९१ चे अखेरीस फार तर एक आठवडा राहिलों असेन.  पण परीक्षेच्या घाईंत ह्या शहरांतील परीक्षेच्या मंडपापलीकडे अधिक माहिती होणें संभवनीय नव्हतें.  आमचे हायस्कूलचे हेडमास्तर रा. त्रिंबकराव खांडेकर ह्यांना मी आवडत असें.  त्यांचे एक बंधु पुण्यास वकील होते.  त्यांना एखादें माझ्या ओळखीचें पत्र दिलें असेल कीं काय हेंही मला आतां आठवत नाहीं.  ह्या वकिलांचा एक मुलगा जमखंडी हायस्कुलांत शिकण्यासाठीं आपल्या चुलत्यांकडे राहण्यासाठीं आला होता.  त्याचेशीं माझी थोडी ओळख होती.  पण त्याची भेट होऊन त्याच्याकडून किंवा त्याच्या वडिलांकडून मला विशेष मदत झाली असेल असें कांहीं मला वाटत नाहीं.  पुण्यास गरीब मराठ्यांना कॉलेजांत मदत करणारी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन नांवाची संस्था आहे व तिचे संस्थापक व सेक्रेटरी रा. गंगाराम भाऊ म्हस्के ह्या नांवाचे एक मराठा जातीचे इंग्रजी शिकलेले पुढारी गृहस्थ प्रसिद्ध वकील आहेत वगैरे माहिती रा. खांडेकर वकिलांनीं मला दिली असावी.  ह्या वेळीं सदाशिव पेठेंतल्या हौदाच्या रस्त्यावरील फडतरे यांच्या वाड्यांत मी थोडे दिवस होतों, एवढीच अंधुक आठवण मला आतां आहे.

गं. भा. म्हस्के  :  गंगाराम भाऊ म्हस्के ह्या गृहस्थाचे मराठा जातीवर मोठे उपकार आहेत.  त्या काळचे एक फरडे इंग्रजी शिकलेले, सुधारकी बाण्याचे हुशार वकील अशी त्यांची प्रसिद्धि होती.  पुणें लष्करांत मेन स्ट्रीटवर त्यांचें मोठें चांगलें स्वतःचें घर आहे.  रानडे, भांडारकर वगैरेसारखी त्या काळच्या सुधारक पक्षांत त्यांची चांगली मान्यता होती.  वकिलींत त्यांनीं बरेच पैसे मिळविले होते.  हिराबागेंत असलेल्या कॉस्मॉपॉलिटन क्लबच्या दिवाणखान्यांत पुण्याच्या तत्कालीन मोठमोठ्या माणसांच्या मोठमोठ्या तैल-तसबिरी टांगल्या आहेत, त्यांत त्यांचीही एक तसबीर अद्याप लटकत आहे.  त्यांची मराठा संस्थानिक, राजे व इतर जातींचे प्रागतिक शिक्षणप्रेमी श्रीमंत गृहस्थ यांच्यामध्यें त्या काळीं छाप होती.  त्यांच्याकडून मदत घेऊन त्यांनीं व लष्करांत राहणार्‍या राजन्ना लिंगो नांवाच्या वकिलांनीं ही 'डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन' संस्था काढली होती.

एके दिवशीं रा. म्हस्केसाहेबांना भेटावयाला मी पुणें लष्करांत गेलों.  मेन स्ट्रीटचा भव्य रस्ता, त्यांतील दोन तीन मजली घरें, परदेशी मालांनीं भरलेलीं तेथील बोहर्‍यांचीं दुकानें आणि लष्करांतील इतर रस्ते व शोभा पाहून माझे डोळे दिपले होते !  अशा स्थितींत मी रा. म्हस्के यांच्या दिवाणखान्यांत जाऊन पोंचलों.

स्कॉलरशिप  :  म्हस्केसाहेब त्या वेळीं आपल्या नेहमींच्या आरामखुचाअत पाय पसरून उताणे पडले होते.  दिवाणखान्यांत अगदीं अलीकडच्या पद्धतीची पूर्ण सजावट केलेली होती.  दिवाणखाना ऐसपैस, लांबरुंद व हवाशीर असून चांगल्या सतरंजीची व वरती कांहीं गालीच्यांची बिछायत होती.  मधोमध एक गोल टेबल आणि इकडे तिकडे बर्‍याच मऊ खुर्च्या व साध्या खुर्च्यांची चंगळ होती.  ह्यावरून म्हस्केसाहेब हे एक पुण्यांतील सुक्षिक्षित व संभावितं पुढारी होते, ह्याची खात्री झाली.  ते घरच्या पोषाखांत म्हणजे धोतर आणि सदरा ह्यांत होते; पण तोंडांत एक मोठा अस्सल विदेशी चिरूट होता.  त्याचा विपुल धूर सोडीत, खालीं पिकदाणींत थुंकत आणि चिरुटाची राख जवळच्या एका लहानशा टेबलावरील रक्षापात्रांत टाकीत स्वारी अगदीं एकटी आराम करीत होती.  चेहरा गंभीर व वागणूक खरोखर संभावीत होती.  मला खुर्चीवर जवळच बसावयास सांगून त्यांनीं सर्व भाषण इंग्रजींत केलें; पण तें सर्व ओठांतून-निदान दांतांतून चिरूट व सोडतांच-केलें.  माझें लक्ष बोलण्यापेक्षां त्या चिरुटाकडेच जास्त लागलें !  एकंदरींत म्हस्केसाहेबांनीं मला बरें वागविलें.  स्कॉलरशिप मात्र दरमहा दहा रुपयांचीच देणें शक्य आहे, असें त्यांनीं सांगितलें.  कॉलेजांत जाण्याची कशीबशी सोय होईल अशी आशा उत्पन्न झाली.  पण ह्यापलीकडे राहण्याची किंवा अभ्यासाची दुसरी कसलीही सोय म्हस्केसाहेबांनीं केली नाहीं किंवा कळकळ दाखविली नाहीं.  एखाद्या युरोपियन सभ्य गृहस्थाचें वर्तन ज्याप्रमाणें एखाद्या नेटिव्ह माणसाशीं बेतानेंच असतें तशीच त्यांची ढब दिसली.  रंगानें ते सावळे, जवळजवळ काळेच होते.  एरवीं सर्व थाट युरोपियन वळणाचा दिसला.

त्या काळांत मराठ्यांत इतका इंग्रजी शिकलेला गृहस्थ हा एकटाच होता.  इतकेंच नव्हें तर ते वकिलींतही बरेच पुढारलेले आणि तत्कालीन नागरिकांत मान्यता पावलेले होते हें माझ्या तेव्हां लक्षांत आलें नाहीं.  कारण ही तुलना करण्याइतकी मला पुण्याची माहिती नव्हती.  ज्या म्हस्केसाहेबांच्या प्रयत्‍नानें आज शेंकडों मराठे पदवीधर झाले, त्यांपैकीं एकही आज पुण्यांतल्या समाजांत अशा मान्यतेनें राहात नाहीं.  म्हस्केसाहेब त्या वेळीं कसे राहूं शकले ही एक मननीय गोष्ट आहे.

फर्ग्युसन कॉलेज  :  कॉलेजांत माझी हजेरी कशी तरी एकदां लागली.  फर्ग्युसन कॉलेज त्या वेळीं पुणें शहरांत शनिवार पेठेंतील गद्रे ह्यांच्या विस्तीर्ण जुन्या वाड्यांत होतें.  हें कॉलेज माझ्यासारख्या गरिबांकरितांच होतें.  हें नसतें तर डेक्कन कॉलेजसारख्या भारी खर्चाच्या संस्थेंत माझा प्रवेश अशा तुटपुंज्या स्कॉलरशिपनें झाला नसता.  फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल वामन शिवराम आपटे (संस्कृत कोशकार) हे मी जाण्यापूर्वीच वारले असल्यामुळें त्यांचे जागीं प्रसिद्ध सुधारक रा. गोपाळ गणेश आगरकर हे होते.  हे गांवांत न राहतां गांवाच्या पश्चिम बाजूस ज्या विस्तीर्ण जागीं हल्लीं कॉलेजच्या स्वतःच्या इमारती आहेत त्या जागेवर एक झोपडें बांधून राहात असत.  त्या झोपडीशिवाय आजूबाजूस त्या काळीं वसतीचें एकही चिन्ह दिसत नव्हते.  दरमहा दहा रुपये स्कॉलरशिपमध्यें माझ्या त्या वेळींही कॉलेजचा खर्च भागण्याचे मुष्किल होतें.  कारण कॉलेजची फी दरमहा ५ रु. वजा जातां माझ्या हातीं ५ रुपयेच उरत !  म्हणून कॉलेजची फी माफ करण्याबद्दल मी एक अर्ज घेऊन प्रिन्सिपॉल आगरकर ह्यांना भेटावयाला गेलों.

आगरकर मोठे सुधारकाग्रणी ही कीर्ति माझ्या कानावर जमखंडीस असतांनाच आली होती.  इ.स. १८९२ सालीं मी जमखंडी शाळेंत शिक्ष्क असतांना त्यांचे सुधारक पत्रांतले सणसणीत लेख माझ्या वाचनांत येऊन माझीं मतें झपाट्यानें सुधारणेच्या बाजूचीं बनत चाललीं होतीं.  रा. गंगाराम भाऊ म्हस्के हे सुधारक आणि वकीलही होते.  त्यांना पाहून पुणेरी सुधारक कसे असतात ह्याविषयीं मला कांहींशी कल्पना आली होती; पण आगरकरांना प्रथम पाहिल्यावर त्या देखाव्याचा माझ्या ह्या कल्पनेशीं नीट मेळ बसेना.

प्रि. आगरकर  :  माझ्या भेटीची वेळ सकाळीं नऊ वाजण्याच्या सुमाराची होती.  दिवस हिंवाळ्याचे होते.  आगरकर कायमचेच दमेकरी होते.  ते झोपडीच्या बाहेर अंगणांत उन्हांत उभे होते.  लोकरीचा जवळजवळ फाटलेला काळा मळकट कोट,चित्पावनी थाटाचें नेसलेलें धोतर, लहानशा शेंडीचे थोडेसे विखुरलेले केस, पायांत आगरकरी सुधारणेचा जोडा-म्हणजे ब्राह्मणी जोडाच; पण त्याचें टाचेवरचे कातडे टाचेच्या मागें वर उभें आलेलें, मुद्रा बरीच त्रासलेली, भिवयांचे केस दाट व डोळे किंचित् खोल व भेदक असें हें प्रथम दर्शन घडलें.  माझा अर्ज पाहून, मला डेक्कन मराठा असोसिएशनची स्कॉलरशिप मिळत आहे हें ऐकल्याबरोबर स्वारीनें मला फी माफ व्हावयाची नाहीं हें निर्भीडपणें सांगितलें.  उगाच नादाला लावण्यापेक्षां त्यांचें हें तडकाफडकी उत्तर एका रीतीनें योग्यच होतें; पण मजवर मात्र त्या उत्तराचा परिणाम बरा झाला नाहीं.  आधींच त्यांचा एकंदर पोषाख व मुद्रा पाहून, त्यांच्या सुधारकी कीर्तीमुळें मीं जी भलतीच कल्पना करून घेतली होती ती ढासळली होती आणि त्यावर हा नकाराचा बाँब मजवर आदळल्यामुळें आगरकरांविषयीं माझा ग्रह अनुकूल झाला नाहीं.  हा ग्रह कॉलेजच्या इतर प्रोफेसरांशीं माझा पुढें जो अत्यल्प प्रत्यक्ष संबंध आला त्यामुळें कांहीं म्हणण्यासारखा दुरुस्त झाला नाहीं.  खरोखर पाहतां ह्यांत आगरकरांचा, इतर प्रोफेसरांचा किंवा कॉलेजच्या इतर परिस्थितीचा कांहींच दोष नव्हता.  केवळ ह्या निराशेला माझा अजाणपणा व अननुभवीपणा हेंच कारण होय.

  1. कार्याची सुरुवात
  2. कार्यवाहकांची निवेदनें
  3. कांही संवयी आणि वागणूक
  4. कांही टिपणें
  • 42
  • 43
  • 44
  • 45
  • 46
  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
Page 47 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी