1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

१ प्रस्तावना

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या या लेखसंग्रहाचें वैशिष्ट्य असें कीं इतक्या विविध प्रश्नांवरील त्यांचे संशोधनपर निबंध प्रथमच ग्रंथरूपानें प्रसिद्ध होत आहेत. यापूर्वीं १९१२ सालीं ‘विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्यानें आणि उपदेश’ या नांवाचा त्यांचा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला होता. परंतु त्यांतील लेख हे मुख्यत: इंग्लंडमधील त्यांचीं प्रवासवर्णनें, प्रार्थनासमाज व ब्राह्मोसमाज यांची शिकवण व तत्सम इतर कांहीं विषय यांच्यापुरतेच मर्यादित होते. या लेखसंग्रहामध्यें त्यांनीं केलेला धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, मराठ्यांचा इतिहास, समाजशास्त्र इत्यादि विषयांचा ऊहापोह समाविष्ट आहे. या लेखसंग्रहामध्यें विषयांची विविधता वैशिष्ट्यपूर्ण आहे.
लेखन मुख्यत: १९२३ ते १९३५ च्या काळांतील
कर्मवीर शिंदे यांचे या लेखसंग्रहांतील निबंध मुख्यत: १९२३ ते १९३५ या काळांत लिहिले गेलेले वा प्रसिद्ध झालेले आहेत. १९०६ पासून १९२३ पर्यंत ते ‘डिप्रेसड् क्लासेस मिशन’ या संस्थेच्या कामांत गढून गेले होते. १९२३ सालीं ते या संस्थेच्या कामांतून मुक्त झाले. त्यामुळें त्यांना स्वाभाविकच तुलनात्मक दृष्ट्या अधिक स्वास्थ्य मिळूं लागलें. १९३५ सालीं नंतर ते मधुमेह, गाऊट व इतर आजारानें अंथरूणाला खिळून होते, त्यामुळें १९३५ नंतरहि ते फारसें लेखन-वाचन करूं शकत नव्हते; म्हणून त्यांच्या आयुष्यांतील सर्व महत्त्वाचें लेखन १९२३ ते १९३५ या एका तपाच्या काळांतच झालेलें दिसतें. या लेखसंग्रहांतील कांहीं लेख विविधज्ञानविस्तार, रत्नाकर, केसरी, किर्लोस्कर, विजयीमराठा, सुबोध-पत्रिका यांतून प्रसिद्ध झालेले आहेत. तसेंच कांहीं लेख या संग्रहांत प्रथमच प्रकाशित होत आहेत. गेलीं अनेक वर्षें ते कर्मवीर शिंदे यांच्या खाजगी संग्रहांत हस्तलिखित स्वरूपांत पडून होते.
पिण्ड संशोधकाचा वा तत्त्वचिंतकाचा
श्री. विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्राला मुख्यत: समाजसुधारक वा कर्मवीर म्हणूनच परिचित आहेत. परंतु या लेखसंग्रहांतून व्यक्त होणारें त्यांचें व्यक्तिमत्त्व एका तत्त्वचिंतकाचें वा संशोधकाचें आहे असें दिसतें. कर्मवीर शिंदे यांचा पिंड हा जसा एका कर्मवीराचा होता त्याचप्रमाणें एका तत्त्वचिंतकाचा, संशोधकाचा होता, असें यामधून दिसत आहे. भागवत धर्माचें मूळ कशांत आहे, अस्पृश्यतेचें उगमस्थान कोणतें आहे, मराठ्यांची पूर्वपीठिका कोणती आहे, मराठी भाषेचें उगमस्थान कोठें आहे यासंबंधीं त्यांनीं केलेल्या विवरणामध्यें त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक मनाचा चांगला प्रत्यय येतो. महाराष्ट्राला त्यांचें हें दर्शन पुष्कळच वेगळें आहे. या दृष्टीनेंहि हा लेखसंग्रह उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.

आर्यपूर्व संस्कृतीचें महत्त्व
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनीं आपल्या लेखांतून भारतीय संस्कृतीवर आर्यपूर्व संस्कृतीची केवढी मोठी छाप होती हें दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अण्णासाहेर शिंदे ज्या काळांत हे विचार मांडीत होते त्या काळाची पार्श्वभूमि या दृष्टीनें विशेष उल्लेखनीय आहे. ज्या काळांत अण्णासाहेब शिंदे हे विवेचन करीत होते त्या काळांत महाराष्ट्रांतीलच नव्हे तर हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व विचारवंत भारतीय संस्कृति म्हणजे केवळ आर्यसंस्कृति आहे, असें समीकरण मांडीत होते. या विचाराचें मूलस्थान जर्मनींतील १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांतील विचारवंतांच्या मध्यें आहे. आर्यसंस्कृति हीच खरी संस्कृति, आर्यपूर्व संस्कृति अत्यंत रानटी, मागासलेली, जंगली होती, असा विचार जर्मनीमधून १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत जगभर पसरला. या विचारवंतांची छाप हिंदुस्थानांतील व पर्यायानें महाराष्ट्रांतील बहुतेक सर्व संशोधकांवर पडली होती. त्यामुळें स्वाभाविकच भारतीय संस्कृतीची सुरुवात ही केवळ आर्यांच्या आगमनानंतरच झाली, येथील आर्यपूर्व संस्कृति ही अतिशय मागासलेली, केवळ रानटी टोळ्यांची होती, असें गृहीत धरूनच ते सर्व विवेचन करतात. याचा प्रत्यय ज्ञानकोशकार केतकर, इतिहासाचार्य राजवाडे, डॉ. भांडारकर, न्यायमूर्ति तेलंग या सर्वच विचारवंतांच्याबाबत येतो. आपल्या देशांतील बहुतेक सर्वच विचारवंत वरील विचाराच्या छायेखालीं वावरत असतां भारतीय संस्कृतीवर आर्यपूर्व संस्कृतीची फार मोठी छाप आहे, असें अण्णासाहेब शिंदे आपल्या लेखांतून सांगत होते. त्यांच्या विचाराचें दुसरें वैशिष्ट्य असें कीं, भारतीय संस्कृति म्हणजे केवळ आर्य व आर्यपूर्व संस्कृति नव्हे. या आर्यपूर्व संस्कृतीच्याहि आधीं येथें जे मूळचे रहिवासी राहात होते त्यांच्या जीवनपद्धतीचा आर्यपूर्व व आर्यसंस्कृतीवरहि परिणाम झालेला होता. या सर्व संस्कृतींचा एकत्रित झालेला परिणाम म्हणजे भारतीय संस्कृति आहे. या तिन्ही संस्कृतींमधून तयार झालेली एकात्म जीवनपद्धति म्हणजे भारतीय संस्कृति आहे, असें ते आपल्या विवेचनांतून सूचित करतात. त्यांची ही अभ्यासपद्धति अधिक वस्तुनिष्ठ व समाधानकारक आहे असें वाटतें.
योग - भक्ति - तत्त्वें : आर्यपूर्व संस्कृतीचीं वैशिष्ट्यें
आर्यपूर्व संस्कृतीचा भारतीय संस्कृतीवर झालेला परिणाम ते अनेक पद्धतीनें दाखवितात. ‘भागवत धर्माचा विकास’ या लेखांत भक्तिमार्ग हा आर्यपूर्व आहे, असें त्यांनीं सांगितलें आहे. ज्ञान आणि कर्म हीं आर्यसंस्कृतीचीं वैशिष्ट्यें आहेत तर योग व भक्ति हीं आर्यपूर्व संस्कृतीचीं वैशिष्ट्यें आहेत, असें ते सांगतात. याला त्यांनीं वाङ्मयीन व पुरातन संशोधनाचे आवश्यक ते पुरावे दिलेले आहेत. अण्णासाहेब शिंदे यांचा हा मध्यवर्ती सिद्धान्त पुष्कळच विचारप्रवर्तक व नव्या ज्ञानाच्या कसोटीला उतरणारा आहे, असें वाटतें. सिंधमध्यें मोहेंजोदारो, हराप्पा येथें सांपडलेल्या उत्खननांतील पुराव्यांवरून शिवपूजा व लिंगपूजा आर्यपूर्व असावी असें वाटते. तेथें तर सांपडलेल्या नागपूजा व वृक्षपूजेच्या पुराव्यांवरून भक्तिमार्ग हा आर्यपूर्व असावा असें वाटतें. आर्यांच्या अगदीं प्रारंभींच्या वाङ्मयांत योग व भक्ति यांचे उल्लेख अगदीं तुरळख तुरळक आहेत. अगदीं प्रारंभींच्या या वाङ्मयाकडून अलीकडच्या काळांत जसजसें यावें तसतसें त्याचे पुरावे अधिकाधिक मिळूं लागतात. यावरूनही आर्यपूर्व संस्कृतीचा आर्यांशीं दीर्घकाळ सहवास आल्यानंतरच हीं दोन्हीं तत्त्वें आर्यसंस्कृतींत आलेलीं असावींत, असें वाटतें. शिवाय भक्तितत्त्व हें दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत गेलें आहे. हें तत्त्व आर्यसंस्कृतींत असतें तर तें उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत गेलें असतें. यावरूनहि भक्तितत्त्व हें आर्यपूर्व असावें, असेंच वाटतें.
अस्पृश्यता आर्यपूर्व संस्कृतींतच असली पाहिजे
भक्तितत्त्वाच्या मीमांसेप्रमाणेंच अस्पृश्यतेची मीमांसाहि मूलगामी व विचारप्रवर्तक आहे असें वाटतें. भारतीय अस्पृश्यतेचें मूळ शोधीत असतांनाहि अस्पृश्यता आर्यपूर्व असावी, असें अण्णासाहेब शिंदे यांना वाटतें. याला पुरावे म्हणून त्यांनीं दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. पहिला पुरावा असा कीं, आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जसजसे जातों तसतशी अस्पृश्यतेला अधिक धार प्राप्त होते. यावरून अस्पृश्यता ही मुळांत दक्षिणेकडे व आर्यपूर्व असावी, असें त्यांना वाटतें. शिवाय वाङ्मयीन पुरावे शोधिले तरी आर्यांच्या अगदीं प्रारंभींच्या वाङ्मयांत अस्पृश्यतेचा उल्लेख आढळत नाहीं. अगदीं प्रारंभींच्या वाङ्मयाकडून अलीकडे अलीकडे बुद्धकाळाकडे येऊं लागतों तसतसे यासंबंधींचे उल्लेख जास्त प्रमाणावर आढळूं लागतात. यावरूनहि अस्पृश्यता आर्यपूर्व असावी, असें त्यांनीं सूचित केलें आहे.
अस्पृश्यतेचें मूळ आग्नेय आशियांत असण्याचा संभव
भारतीय अस्पृश्यतेचें मुळ आर्यपूर्व संस्कृतींत असावें असें त्यांनीं म्हटलें आहे. परंतु भारतांत या आर्यपूर्व संस्कृतींतहि हें तत्त्व कोठून आलें असावें याचीहि त्यांनीं मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत ते म्हणतात, भारतीय अस्पृश्यता ही आग्नेय आशियांतील देशांतून आर्यपूर्व संस्कृतीमध्यें दक्षिणेकडे प्रथम आलेली असावी. याला पुरावा देतांना ते असें म्हणतात, कीं उत्तरेपेक्षां दक्षिणेंत अस्पृश्यता तीव्र प्रमाणांत आहे. परंतु दक्षिणेंतहि ती मलबारांत अधिक तीव्र स्वरूपांत आढळते. याचें कारण पूर्वीं दक्षिण हिंदुस्थानचा समुद्रमार्गें आग्नेय आशियांतील देशांशीं संबंध असावा, असें त्यांना वाटते. पुढें आर्यांच्या काळांत हिंदुस्थानचा संबंध वायव्येकडून मध्य आशियांतील संस्कृतीशीं मोठ्या प्रमाणावर आला. त्याचप्रमाणें आर्यपूर्वं काळांत हिंदुस्थानचा संबंध दक्षिणेकडून आग्नेय आशियांतील देशांशीं अधिक आला होता असें संशोधकांच्या संशोधनावरून दिसून येतें. हटनसारख्या विचारवंतानें याच गोष्टीवर विशेष भर दिला आहे. अस्पृश्यतेचें मूळ आर्यपूर्व संस्कृतींत व या आर्यपूर्व संस्कृतींतील अस्पृश्यतेचें मूळ आग्नेय आशियांतील बेटांत असावें, असेंच त्यानें आपल्या ‘Castes in India’ या ग्रंथांत सुचविलें आहे. अद्यापहि आग्नेय आशियांतील बेटांतून राहणा-या जंगली जातींच्या लोकांत ह्या अस्पृश्यत्वाचा व तद्दर्शक शब्दांचा प्रचार जास्त आहे. या दृष्टीनें भारतीय अस्पृश्यतेचें मूळ आग्नेय आशियांतील बेटांतून असावें हा अण्णासाहेब शिंदे यांनीं मांडलेला विचार अतिशय महत्त्वाचा आहे, असें वाटतें.
जातिव्यवस्थादेखील आर्यपूर्व असावी
हटन यांच्याप्रमाणेंच इतरहि कांहीं मानववंश शास्त्रज्ञांनीं केवळ अस्पृश्यताच नव्हे तर जातिव्यवस्था ही देखील आर्यपूर्व असावी, असें म्हटलें आहे. प्रत्येक जातिजातींत आढळणा-या चालीरीति, ल्गनपद्धति, अंत्यसंस्कार, त्यांच्या धर्मकल्पना, वेगवेगळ्या समजुती यांवरून या कल्पनेस पुष्टिच मिळते. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीं हा विचार प्रथम फार स्पष्ट स्वरूपांत १९०९ व १९११ सालीं प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘History of Caste’ या पुस्तकांतून मांडला. आधीं या देशांत चार वर्ण होते व त्यांतून वर्णसंकरानें व इतर कारणांमुळें या देशांत शेंकडों जाति निर्माण झाल्या अशी कल्पना अनेक वर्षें रूढ होती. डॉ. केतकर यांनीं याबाबत बरोबर उलटा सिद्धांत मांडला. त्यांनीं असें सांगितले कीं, या देशांत अगोदर शेंकडों रानटी टोळ्या होत्या. त्यांच्याच पुढें जाति निर्माण झाल्या. या शेंकडों जातींतून आर्यांनीं चार वर्ण निर्माण केले. या सर्व जातींचें त्यांनीं वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या वेळीं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या वर्णांत वर्गीकरण केलें. हें वर्गीकरण करीत असतांना निरनिराळ्या ठिकाणीं त्यांनीं निरनिराळे मानदंड वापरले. जाति या आर्यपूर्व होत्या हें सिद्ध करण्यासाठीं त्यांनीं कांहीं समाजशास्त्रीय पुरावे दिलेले आहेत. डॉ. केतकर यांच्यानंतर वेगवेगळ्या भूमिकेवरून याविषयीं संशोधन झालें आहे. त्यावरूनहि जाति या आर्यपूर्व असाव्या या कल्पनेला पुष्टिच मिळते. डॉ. इरावती कर्वे यांनीं पंचवीस-तीस वर्षें मानववंश शास्त्राच्या आधारें संशोधन करून जो निष्कर्ष काढला आहे तो वरील कल्पनेस पुष्टीच देत आहे. ‘Hindu Society-an Interpretation’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकांत डॉ. इरावती कर्वे ह्यांनीं हाच विचार समाजशास्त्रीय व मानववंशशास्त्रीय पुराव्यांच्या आधारें मांडला आहे. जातिव्यवस्था ही आर्यपूर्व असावी असें मानावयाला आतां पुष्कळ नवे पुरावे पुढें येत आहेत. जातिव्यवस्थाच आर्यपूर्व असेल तर अस्पृश्यताहि स्वाभाविकच आर्यपूर्व असावी असें समजावयाला अधिक बळकटी येते. या दृष्टीनें कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनीं यासंबंधीं केलेल्या विवरणाला पंचवीस-तीस वर्षांनंतर नव्या संशोधनानें पुष्टिच मिळत आहे, असें दिसून येईल.
अस्पृश्य एके काळचे राज-वैभव भोगलेले राजे
भारतीय अस्पृश्यांची मीमांसा करतांना ते असें म्हणतात कीं, येथील अस्पृश्य मूळचे येथील राजवैभव भोगलेले मोठमोठे राजे असले पाहिजेत. परंतु केवळ जेत्यांनीं त्यांचा पराभव केल्यामुळें त्यांच्या कपाळीं ही अस्पृश्यता आलेली असावी. आजचे अस्पृश्य हे एके काळचे मोठे राजे होते, असें त्यांना अनेक पुराव्यांवरून वाटते. ‘ब्रह्मदेशांतील बहिष्कृत जमाती’ या आपल्या लेखांतून त्यांनीं हाच विचार मांडला आहे. ब्रह्मदेशांतील बहिष्कृत जमातींचें संशोधन करतांना त्यांना वरील सिद्धान्ताला अगदीं अलीकडचा म्हणजे दहाव्या शतकांतला पुरावा मिळाला. त्यामळें त्यांच्या वरील संशोधनाला विशेष महत्त्व आहे, असें ते मानतात. भारतीय अस्पृश्यतेचें मूळ त्यामुळेंच राजकीय गुलामगिरींत असावें, असें त्यांनीं म्हटलेलें आहे. अस्पृश्य मानलेले वंश सारे संस्कृतिहीनच होते असें मुळींच नाहीं. ब्रह्मदेशांत तुहा याजा (अशुभ राजा) फया चुन वगैरे जे अस्पृश्य वंश आढळत आहेत ते जिंकले जाण्यापूर्वीं राजवंश होते असें अण्णासाहेब शिंदे आपल्या ‘अस्पृश्यांचें राजकारण’ या लेखांतूनहि सांगतात. (पान ९७)
अण्णासाहेब शिंदे यांनीं मांडलेला हा विचार पुढें डॉ. आंबेडकर यांनीं ‘Who were the Shudras ? How they came to be the furth in the Indo-Aryan Society’ या १९४६ सालीं प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथांत मांडलेला आहे. डॉ. आंबेडकरांनीं यासाठीं महाभारतांतील शांतिपर्वांत उल्लेख केलेल्या पैजवन राजाचा आधार आपल्या विवेचनाच्या पुष्ट्यर्थ दिलेला आहे. पिजवन राजाचा मुलगा सुदास् याचा पुरोहित वाल्मीकि होता असें निरुक्तांतील वचनावरून डॉ. आंबेडकर यांनीं वरील ग्रंथांत दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचे अस्पृश्य हे एकेकाळचे लढवय्ये शूर राजे होते हेंच सिद्ध करण्याचा प्रयत्न डॉ. आंबेडकर यांनीं आपल्या वरील ग्रंथांतून केला आहे. महाराष्ट्रांत हा विचार प्रथम महात्मा फुले यांनीं १८६७ सालीं आपल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकांतून मांडला आहे. म. फुले, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व डॉ. आंबेडकर यांनीं याबाबत एकच विचार मांडला आहे असें दिसतें. परंतु कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आणि महात्मा फुले व डॉ. आबेडकर यांच्या भूमिकेत कांहींसा फरक आहे. म. फुले व डॉ. आंबेडकर हे मुख्यत: आजचे अस्पृश्य एके काळचे माळी, कुणबी वगैरेसारखे शूद्र व क्षत्रिय होते. वंशानें ते सर्व आर्यच होते हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उलट कर्मवीर शिंदे हे अस्पृश्य हे आर्यपूर्व वंशाचेहि असण्याचा संभव आहे, असें सूचित करतात. त्यांच्या भूमिकेंतील वरील फरक लक्षांत घेऊनसुद्धां या संशोधकांची अस्पृश्यांबाबत भूमिका पुष्कळशी समान आहे, असें दिसतें.
मानवी समाजांतील अस्पृश्यतेचें मूळ
जगांतील अस्पृश्यतेचें मूळ कशांत आहे यासंबंधीं निरनिराळ्या समाजशास्त्रज्ञांनीं व मानववंशशास्त्रज्ञांनीं वेगवेगळे सिद्धान्त मांडले आहेत. होकार्ट, इमाइल सेनार्ट, डॉ. घुर्ये, डॉ. आंबेडकर, हटन यांनीं यासंबंधीं केलेली मीमांसा महत्त्वाची आहे. परंतु कर्मवीर शिंदे यांनीं या प्रश्नांची केलेली समीक्षा वरील सर्व समाजशास्त्रज्ञांपेक्षां वेगळी आहे. मानवाच्या प्राथमिक अवस्थेंत त्याचा जादूटोणा, मंत्रतंत्र यांवर विश्वास होता. रोग बरे करायचे झाले व इडापीडा टाळायची झाली तर तो या जादूटोण्याकडे वळे. या जादूचे दोन प्रकार होते. त्यांतील एका प्रकारची जादू संकटें दूर करण्यासाठीं वापरली जाई आणि दुस-या प्रकारची जादू शत्रूला त्रास देण्यासाठीं उपयोगांत आणली जाई. या जादूटोणा करणा-या वर्गाला कोणी स्पर्श करायचा नसे. एका अर्थानें ते अस्पृश्यच होते. ही अस्पृश्यता प्रथम प्रथम वैयक्तिक व प्रासंगिक होती. परंतु पुढें तिला गूढ आणि दृढ स्वरूप प्राप्त होऊं लागलें व पुरोहितांच्या द्वारें त्याची परंपरा व घटना बनत चालली तसतशी अस्पृश्यता वैयक्तिक आणि स्थानिक स्वरूपांत न राहतां तिला जातीचें व सार्वत्रिक स्वरूप प्राप्त होऊं लागलें. अस्पृश्यतेचें मूळ अशा प्रकारें मंत्रतंत्राच्या (Magic) कल्पनेंत आहे, असें कर्मवीर शिंदे यांनीं म्हटलें आहे. आपल्या या विचाराचा प्रपंच करतांना ते आपल्या ‘भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न’ या पुस्तकांत म्हणतात-
“अस्पृश्यता ही एक स्वतंत्र मानवी संस्था आहे. हिचा उदय मानवी जातीच्या अगदीं प्राथमिक स्थितींतच झाला असला पाहिजे. भूत, प्रेत, पिशाच्च, इत्यादि कल्पना मानवी जातीच्या प्राथमिक म्हणजे अगदीं रानटी स्थितींत सर्वत्र पसरलेल्या होत्या. तौलनिक धर्मशास्त्रांत ह्या कल्पनासमुच्चयाला भूतवाद (Animism) असें नांव आहे. हा भूतवाद व ह्याप्रमाणेंच इतर प्राथमिक धर्माच्या अडाणी कल्पना व त्यावरून बनलेल्या जादूटोणा, थातुरमातुर, इत्यादिकांना मीं पुढें अपधर्म असें नांव दिलें आहे. ज्या धर्माचा पाया मानवी प्रज्ञा आहे तो जरी निष्काळजीपणामुळें विकृत झाला तरी त्याला मी अपधर्म हें नांव देणार नाहीं. रागावलेल्या भुतांना संतुष्ट करणें किंवा एखाद्या भुताला लालूच दाखवून किंवा (एखाद्या भुताला भेडसावून त्याच्याकडून आपल्याला इष्ट असा अर्थ किंवा अनर्थ घडवून आणणें शक्य आहे, अशी प्राथमिक मानवाची समजूत असे. ह्या समजुतीप्रमाणें जादू, टोणा, मंत्र, तंत्र, यंत्र, वगैरे जे अपधर्माचे अनेक प्रकार असत त्याला अभिचार (Magic) असें एक सामान्य नागर नांव देतां येईल. ह्याचे कृष्ण अभिचार (Black magic) आणि भेषज (Medicinal) अथवा शुक्ल अभिचार (White magic) असे दोन मुख्य प्रकार सुधारलेल्या वैदिक काळांतहि होते..... जन्म, मृत्यु, सांथीचे रोग व इतर आकस्मिक आपत्ति ह्यांचा संबंध प्राथमिक जगांत भुताखेतांकडे आणि क्रुद्ध देवतांकडे लावण्यांत येत असे. त्याचें निवारण करण्यांत निष्णात असे पंचाक्षरी अथवा वैदु (Medicine men) होते. तेच पूर्वकाळचे ऋषि आणि पुरोहित असत. त्यांच्या
ब-यावाईट क्रियांना जादू किंवा अभिचार म्हणतां येईल. ह्याप्रमाणें ह्या जादूचा प्राचीन धर्मांत समावेश झाला, तो अद्यापि पुष्कळ ठिकाणीं सामान्य जनतेंत प्रचलित आहे. ह्या अपधर्मांतच अस्पृश्यतेचा उगम आहे.
प्रथम प्रथम ही अस्पृश्यता वैयक्तिक व प्रासंगिक उर्फ नैमित्तिक होती. बाळंतीण व तिची खोली, मृतांची जागा व आप्त, विशिष्ट रोगी, झपाटलेलीं माणसें, विक्षिप्त झाडें, खुनासारख्या अपघाताचीं ठिकाणें वगैरे बाबी अस्पृश्य आणि वर्जनीय ठरल्या. जादू करणारे जादूगार आणि पुरोहित हे देखील सोवळे म्हणजे एक प्रकारें अस्पृश्यच असत. देवपूजा करणा-या ब्राह्मणाला आणि यज्ञपरिषद् चालू असेतोपर्यंत सर्व ऋत्विजांना आणि इतर याज्ञिकांना नेहमीं सोवळ्यांत म्हणजे अस्पृश्य अथवा अलग स्थितींतच राहावें लागे. ... ... अशा अपधर्माला उत्तरोत्तर जसजसें गूढ आणि दृढ स्वरूप प्राप्त होऊन पुरोहितांच्या द्वारें त्याची परंपरा आणि घटना बनत चालली तसतशी ह्या अस्पृश्यतेच्या वैयक्तिक आणि स्थानिक स्वरूपाची परिणती जातीय आणि सार्वत्रिक उर्फ नित्य स्वरूपांत होऊं लागली........ आणि अस्पृश्यतेचें मूळ कारण हा जो अभिचारमूलक अपधर्म तो जरी पुढें लुप्त होऊन विस्मृत झाला तरी जातीय अस्पृश्यता शिल्लक उरलीच.”
(भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, पृ १२-१४)
अस्पृश्यता हिंदुस्थानांतच कां स्थिरावली?
अस्पृश्यता मानवाच्या प्राथमिक अस्थेंत सर्वत्रच उद्याला आली, परंतु ती हिंदुस्थानांतच शेंकडों वर्षें कां स्थिरावली व तिला इतकें घृणास्पद स्वरूप कां प्राप्त झालें हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासंबंधीं कर्मवीर शिंदे यांनीं वरील ग्रंथांत मीमांसा केली आहे. भारतीय समाजांत अस्पृश्यता शेंकडों वर्षें टिकून राहिली याचें मुख्य कारण हा समाज स्वयंपूर्ण ग्रामरचनेवर उभारला आहे, असें त्यांना वाटतें. आमच्या ग्रामसंस्थेबरोबर अस्पृश्यतेमागील तात्विक भूमिका महत्त्वाची आहे. कर्मविपाकाचा सिद्धान्त, पुनर्जन्माची कल्पना हा जातिव्यवस्थेचा व अस्पृश्यतेचा तात्त्विक पाया आहे. अस्पृश्यतेविरुद्ध शेंकडों वर्षें वैचारिक बंड होऊं शकलें नाहीं याचें प्रमुख कारण या तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठानांतहि असण्याचा संभव आहे. कर्मवीर शिंदे यांच्या विवेचनांतून हा विचार निसटलेला असावा असें वाटतें.
महाराष्ट्रांतील मराठे शकवंशाचे
‘मराठ्यांची उपपत्ति’ या लेखांत कर्मवीर शिंदे यांनीं महाराष्ट्रांतील मराठ्यांचें मूळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भाषाशास्त्र, समाजशास्त्र व लिखित पुरावे यांच्या आधारें मराठे हे शक वा पल्लव वंशाचे असावे असें त्यांनीं या लेखांत म्हटलें आहे. त्यांच्या वरील तीन प्रकारच्या पुराव्यांमध्यें समाजशास्त्रीय पुरावे विशेष महत्त्वाचे आहेत. शक वा पल्लव आणि मराठे यांच्या चालीरीति, आहार, पडदा-पद्धति, धर्मकल्पना, व्यवसाय, पोशाख-पद्धति, यांमध्यें मोठें साम्य आहे. यावरून मराठे हे शक वंशाचे असावे असें त्यांनीं सुचविलें आहे. गेल्या कांहीं वर्षांत महाराष्ट्रांतील लोकसमूहाचें मानववंशशास्त्रदृष्ट्या जें संशोधन झालें आहे त्यावरून कर्मवीर शिंदे यांच्या वरील निष्कर्षास पुष्टीच मिळते असें दिसतें. डॉ. इरावती कर्वे यांनीं महाराष्ट्रांतील वेगवेगळ्या जातींची मानवशास्त्रदृष्ट्या जी पाहणी केली त्यावरून त्यांनीं वरीलसारखाच निष्कर्ष काढला आहे. ‘मराठी लोकांची संस्कृति’ या ग्रंथांत त्या म्हणतात, “मराठे व इतर जाती आल्या कोठून हा प्रश्न शिल्लक राहतोच. मध्ययुगाच्या सुरुवातीस रजपुतांचें नांव प्रथम ऐकूं येतें. नंतर गुर्जरांचें ऐकूं येतें व गुर्जर रजपुतांपैकींच एक टोळी असावी असें दिसतें; पण त्यांच्याहि आधीं महाराष्ट्राच्या इतिहासांत अतिप्राचीन काळीं महाराष्ट्राचे पहिले राजे जे शातवाहन ते पश्चिमेकडून येणा-या शकांच्या आक्रमणाला तोंड देत होते असा इतिहास आहे. आर्यांच्या टोळ्या उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्याप्रमाणें शतकेंच्या शतकें येत होत्या व जुन्या स्थायिक आर्यांचें जसें नव्यांशीं युद्ध होत होतें, तसेंच शकांच्या बाबतींत झालें असणार. शक लोक उत्तरेकडून येऊन गुजरातेंतून महाराष्ट्रांत शिरले, ते एका लहानाशा कालखंडांत नसून त्यांचें वांशिक आक्रमण कित्येक शतकें चाललेलें असण्याचा संभव आहे. ह्या शकांपैकींच अगोदर आलेल्या वंशांतील शातवाहन राजे असावेत असें दिसते. ह्या राजांचें राज्य जरी प्रतिष्ठानीं होते तरी सर्व महत्त्वाचे शिलालेख पश्चिमपट्टींत आहेत, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे व त्या शिलालेखांत स्वत:स महारठी व महारठीजी म्हणविणारे लोक म्हणजेच मराठे असावे असा कयास करण्याजोगा आहे. रजपुत लोक हिंदुस्थानांत येण्याच्या आधीं कित्येक शतकें मराठी लोक महाराष्ट्रांत स्थायिक होऊन, राज्यें स्थापून, राहिले होते व ते इतिहासांत प्रसिद्ध पावलेल्या शक वंशापैकीं अगदीं पहिल्यानें आलेले वसाहतकार असावे असा तर्क करण्यास सध्यां हरकत दिसत नाहीं.” (मराठी लोकांची संस्कृति, पृ. १५३.)
कर्मवीर शिंदे आपल्या वरील लेखांत रजपूत व मराठे हे एकाच वंशाचे असावे असें भाषाशास्त्रीय पुराव्याच्या आधारें म्हणतात. परंतु डॉ. इरावती कर्वे यांनीं मानववंशशास्त्राच्या आधारें काढलेल्या निष्कर्षाशीं तो जुळतामिळता नाहीं. ‘रजपूत लोक दीर्घमस्तक आहेत’ व ‘मध्य महाराष्ट्रांतील बलाढ्य मराठा शेतकरी मध्यम कपाल आहेत’ व यावरून मराठे व रजपूत एकाच वंशाचे नव्हेत, असें डॉ. इरावती कर्वे म्हणतात. कोणताहि समाज पूर्णपणें एकाच वंशाचा आहे असें शास्त्रीय दृष्ट्या म्हणणें अवघड आहे. प्राचीन काळीं अनेक वंशांची परस्परांमध्यें मिसळ झाली आहे. त्यामुळें वरील विधान कांटेकोरपणें करतां येणार नाहीं. स्थूल अर्थानेंच तें आतां घ्यावें लागेल.

Read more: १ प्रस्तावना

ह्या व्यापाराचें पिलूं

आमच्या देशांत गेल्या शतकांत ह्या व्यापाराचें हें पिलूं कसें शिरलें, कसें मोठें झालें आणि आतां कसें डोईजड झालें आहे ह्या सर्व गोष्टी असणारास सहज दिसण्यासारख्या आहेत. पूर्वींच्या रामराज्यांतील गोष्ट राहो, पण परवांच्या आमच्या मराठी राज्यांत देखील दारूबाजी नव्हती असें विधान करण्याचें धाडस माझे हातून होत नाहीं. तरी पण हल्लींप्रमाणे दारूचें दुकान उघड मांडून त्याच्या बळावर सरकार-दरबारांत सरदारी पटकावणारे हल्लींचे बाटलीबहादूर शंभर वर्षांमागें निदान आमच्या देशांत तरी अत्यंत दुर्मिळ होते असें मला वाटतें. त्यांचा आतां आमच्यांत इतका सुळसुळाट झाला आहे कीं, ते आमच्या सरकारचे मुख्य आश्रयदाते झाले आहेत. मुंबई इलाख्याच्या चालू बजेटांत एकंदर जमा रु.१४,०१,२२,००० आहे. त्यांत अबकारी खात्याची जमा रु. ४,२४,५०,००० आणि काळीचा वसूल रु.५,८१,२८,०००. मुंबई इलाख्याची लोकसंख्या अदमासें २ कोटी आहे. ह्यांत तान्हीं मुलें, मोठीं माणसें व बायका या सर्वांचा समावेश होतो. ह्या इलाख्यांत दर माणशीं शेतकीचा कर २।। रुपये तर दारूबाजीबद्दल दर माणशीं दोन रुपये वसूल द्यावा लागतो. असें असूनहि “मुंबई इलाखा दारूबाज नाहीं” अशी सरकारी माहिती खात्याकडून आरोळी ठोकण्यांत आली आहे. या बाबतींत माहिती खात्याकडून जें एक तीन पानांचें पत्रक प्रसिद्ध झालें आहे तें वाचून सरकारची इज्जत वाढते कीं कमी होते हें कोणीहि आपल्याशींच ठरवावें. या पत्रकांत सरकारच्यातर्फेंच कबुली देण्यांत आली आहे कीं, मुंबई व लगतचा ठाणें जिल्हा ह्यांत गेल्या दहा वर्षांत दारूचा खप १४०००० गॅलननीं वाढलेला असून एका लहानशा कुलाबा जिल्ह्यांत तो २५००० गॅलननीं वाढला आहे. परंतु दारू पिऊन गुन्हे केल्याचें जें कोष्टक १९१९-१९२० सालच्या अबकारी खात्याच्या रिपोर्टांत सरकारनें प्रसिद्ध केलें आहे त्यांत कुलाबा जिल्ह्यांत ३७ आणि पुणें जिल्ह्यांत १२०८ गुन्हे घडून त्यांना शिक्षाहि ठोठावल्याची नोंद करण्यांत आली आहे. यावरून आमच्या स्वतःचे जिल्ह्याची दारूबाजीबद्दल जरी प्रसिद्धि नाहीं तरी आमच्या कपाळीं दारू पिऊन गुन्हे केल्याचा टिळा सर्वांपेक्षांहि अधिक ठळक लावण्यांत आला आहे. हें मात्र एक पुणेरी गौडबंगालच आहे. “मुंबई इलाखा दारूबाज नाहीं” आणि पुणें शहर दारू पिऊन गुन्हे करणारें आहे हें जें सरकार एकाच तोंडानें सांगत आहे तें आम्ही कोणत्या कानांनीं ऐकावें व कोणत्या मनानें विश्वासावें बरें ? तें कसेंहि
असो ! आमच्या देशांत शिरलेला हा दारूचा व्यापार ऊर्फ उंटाचें पिलूं आतां किती डोईजड झालें आहे आणि त्याला बाहेर काढणें म्हणजे सर्व घर पाडून नवीन बांधण्यासारखें कष्टमय झालें आहे. एक शेतकी सोडून दारूबाजी ही सर्वांत अधिक उत्पन्नाची बाब सरकारनें करून ठेवली आहे.

ही कोणत्या राष्ट्राची भाषा?

(८) कोंकणी भाषा ही केवळ मराठीचा एक प्रांतिक पोटभेद नसल्यास ती कोणत्या तरी एका वेगळ्या राष्ट्राची असली पाहिजे. तें राष्ट्र अगर ती जात एक सारस्वत ब्राह्मण तरी असली पाहिजे, नाहीं तर रट्ट, राठोड किंवा राष्ट्रकूट, मौर्य, कदंब इत्यादि जे मध्ययुगीन क्षत्रिय वंश मध्य हिमालयाच्या दक्षिण पायथ्यावरून गौतम बुद्धाच्या उदयकाळापासून तों सुमारें ख्रिस्ती शकानंतरच्या ५०० शतकांपर्यंत वेळोवेळीं दक्षिणेंत वसाहतीस आले, ते तरी असले पाहिजेत. ह्या सर्व क्षत्रिय वंशांना, मराठे हेंच एक सामान्य नांव देणें मुळींच अयोग्य होणार नाहीं. म्हणजे ही भाषा सारस्वत ब्राह्मणांची तरी असावी किंवा मराठ्यांची असावी. जर ब्राह्मणांची नसून मराठ्यांची आहे असें ठरल्यास, ती मराठीचीच एक शाखा, फार तर तिची एक प्राचीन शाखा किंबहुना हीच मराठीचें मूळस्वरूप, जिला वररुचि “महाराष्ट्री” म्हणतो, ती असावी असें होतें. पण उलटपक्षीं ती कोंकणांत प्रथम सारस्वतांनींच आणली म्हणावी, तर सारस्वतांहिपेक्षां पूर्वीं हजार-पांचशें वर्षें दक्षिणेंत आलेले मराठे कोणती भाषा बोलत होते हा प्रश्न उद्भवतो. ते जर सारस्वत ब्राह्मण येण्यापूर्वीं कानडी भाषा बोलत होते, तर सारस्वतांनीं ही नवी कोंकणी आणल्याबरोबर, ती हजार वर्षें अंगीं रुळलेली कानडी भाषा टाकून त्यांनीं ही नवीन भाषा स्वीकारणें शक्य आहे काय? बरें, वादासाठीं तूर्त तीहि असंभवनीय गोष्ट गृहीत धरल्यास, दुसराच एक प्रश्न उद्भवतो. तो हा कीं, सारस्वतांनीं ही भाषा उत्तर हिंदुस्थानांतून एकदम कोंकणांत नेली, कीं वाटेवर महाराष्ट्रांत कांहीं दिवस वस्ती केल्या वेळीं तेथें स्वीकारलेली भाषा त्यांनीं आपल्याबरोबर कोंकणांत नेली? पहिल्या तर्काला इतिहासांत मुळींच पुरावा नाहीं, आणि दुसरा तर्क खरा असेल, तर ही सारस्वतांची कोंकणी ही मराठीचीच शाखा ठरते व तिचा स्वतंत्रपणा नष्ट होतो. पण हा दुसरा तर्क आपणांस मानवेना म्हणून, दालगादो ह्यांनीं गौड सारस्वतांची एक निराळीच भाषा होती, ती आतां गोष्ट झाली आहे असा कांहीं पाश्चात्त्य पंडितांचा तर्क आहे वगैरे मोघम शंका प्रदर्शित करून वेळ मारून नेली आहे. दालगादो म्हणतात त्याप्रमाणें, गौडसारस्वत हे तिरहुतहून खालीं ओरिसाच्या बाजूनें दक्षिणेंत पैठण येथें कांहीं दिवस राहून मग खालीं कोंकणांत उतरले, कीं काश्मीरहून ब्रह्मावर्त, राजपुताना, भडोच, सुरतेवरून परस्पर कोंकणांत उतरले, ह्याविषयीं अद्याप निश्चित पुरावा नाहीं. कोंकणी भाषेच्या अंतर्गत पुराव्यावरून हे दोन्ही मार्ग सारखेच संभवनीय दिसतात. किंबहुना निरनिराळ्या वेळीं हे लोक दोन्ही मार्गांनीं आले असल्याचे पुरावे इतिहासांत धुंडाळल्यास मिळण्याच संभव आहे. पण त्यांची एक निराळीच भाषा होती व ती आतां लुप्त झाली, असें मानण्यास मात्र कांहीं निश्चित पुरावा नाहीं. उलट गौडसारस्वत ब्राह्मण तिरहुतहूनच आले असल्यास, त्यांची स्वतंत्र भाषा नसून ती दक्षिणेंत आल्यावर सिद्ध झालेली मराठीच होय असें म्हणणें भाग पडतें. इतकेंच नव्हे तर ह्या कोंकणी भाषेचें मूळ मराठी स्वरूप ब्राह्मणांनीं बनविलेलें नसून क्षत्रिय-मराठ्यांनींच बनविलेलें असावें. पण तें मूळ स्वरूप सारस्वत ब्राह्मणांनीं कोंकणांत नेल्यावर त्यांनीं त्याला कांहीं अंशीं संस्कृत वळणावर नेलें आणि कोंकण व देश ह्यांमध्यें आतांइतकें पूर्वीं दळणवळण नसल्यामुळें, एक जी कोंकणांतल्या सारस्वतांच्या वळणांतली कोंकणी मराठी, आणि दुसरी जी देशावरल्या ब्राह्मणांनीं पुढें लवकरच जिला ग्रांथिक स्वरूप देऊं लागल्यामुळें प्रौढ झाली ती देशी मराठी, अशा त्या मूळ मराठीच्या वाढीमुळें पुढें दोन भिन्न शाखा झाल्या, असें मानणें इतिहासाला जास्त धरून आहे, असें मला वाटतें.
(९) किना-यावर वसाहत करणा-या मौर्य, कदंब, शेलार इत्यादि क्षत्रिय मराठ्यांचा धर्म पूर्वीं बौद्ध किंवा जैन होता, हें कोंकणांतील त्या धर्मांच्या कोरीव लेण्यांवरून व शिलालेखांवरून दिसतें. पण पुढें शातवाहनाचें साम्राज्य इ. स. १५०० चे सुमारास नष्ट होऊन ३०० वर्षें बेबंदशाही चालली. ह्यापुढें चालुक्याच्या साम्राज्याचा उदय होऊं लागला. चालुक्य प्रथम शैव, नंतर वैष्णव होते. ह्यानंतर बौद्ध धर्माला हळूहळू उतरती कळा लागून अनुक्रमें जैन, शैव, आणि शेवटीं वैष्णव पंथाची चढती झाली. ह्यापुढल्या ५००|७०० वर्षांत मयूरवर्मा नांवाच्या एका मांडलीक राजानें सुमारें इ. स. ६|७ व्या शतकांत “नवीन कादंब” वंशाची गादी गोव्याकडे स्थापिली. तो वैष्णवपंथी होता. त्यानें राजपुतान्यांतून सुमारें दोन हजार ब्राह्मण आणविले, अशी दंतकथा आहे. सारा कोंकण प्रांत परशुरामानें समुद्र हटवून निर्माण केला, व तो त्यानें ब्राह्मणांस दान दिला; हे ब्राह्मण त्यानें कोंकणांतल्या कोळ्यांपासून निर्माण केले. त्यांचीं जाळीं तोडून त्यांच्यासाठीं जानवीं केलीं. पण ते आचारभ्रष्ट व कृतघ्न झाल्यानें पुनः दुसरे ब्राह्मण आणविले; इत्यादि पौराणिक दंतकथांचें तात्पर्य दक्षिण कानडा जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्यें वर्णिलें आहे. हे दुसरे ब्राह्मण कदाचित् मयूरवर्म्यानेंच आणिले असावेत व ते काठेवाडांतले सारस्वत असावेत. परशुरामानें आणिले, ही केवळ पौराणिक कल्पना असावी. पण ह्या तर्काला दंतकथेपलीकडे पुरावा नाहीं. स्कंद पुराणांतील सह्याद्रिखंडांत हविग, शिवल्ली इत्यादि नांवांच्या ब्राह्मण जाती तुळु भाषा बोलणा-या आहेत. मी मंगळूर येथें असतांना सन १९२४ सालीं ह्या ब्राह्मणांकडून त्यांच्या स्थळ-पुराणाची अस्सल हस्तलिखित प्रत मिळविण्याचा प्रयत्न केला; पण प्रत मिळाली नाहीं. कोंकणांतील ब-याचशा ब्राह्मणांविषयीं ह्या सह्याद्रिखंड नांवाच्या स्थळ-पुराणांतले कांहीं उल्लेख अनुकूल नसल्यामुळें अशी प्रत मिळणें कठीण आहे, असें कित्येकांचें मत पडलें. तथापि सारस्वतांविषयीं मात्र प्रतिकूल उल्लेख कोठेंच आढळत नाहीं. ते निश्चितपणें कोंकणांत केव्हां आले? कोणीकडून आले? मराठीहून निराली अशी त्यांची एक पूर्वीं भाषा होती काय? ह्यासंबंधीं कांहीं तरी विश्वसनीय पुरावा मिळेपर्यंत त्यांच्या तोंडीं हल्लीं असलेली कोंकणी भाषा ज्या अर्थी त्यांचीच अशी म्हणतां येत नाहीं, त्या अर्थीं हिचें मूळ हल्लींच्या महाराष्ट्रभर चालू असलेल्या मराठीपासून अगदीं भिन्न आहे, किंवा तिची वाढ स्वतंत्र आहे, असें म्हणतां येत नाहीं.
(१०) तें कसेंहि असो, उपरिनिर्दीष्ट “नवीन कदंब’ वंशाचा संस्थापक पहिला मयूरवर्मा ह्यानें आणिलेले ब्राह्मण सर्व सारस्वतच होते असें गृहीत धरिलें तरी त्यांचा काळ इ. स. पूर्वीं ६००-७०० च्या पलीकडे ज्या अर्थी जाऊं शकत नाहीं, आणि आधुनिक मराठीचा उगम ह्या काळाच्या पूर्वीं खास होऊं लागला होता असें ज्या अर्थीं संसोधक राजवाडे आणि वैय्याकरणीय रा. भि. जोशी ह्यांचें मत आहे त्या अर्थीं इतिहासाच्या दृष्टीनें तरी कोंकणीची मराठीपासून भिन्नता आणि स्वातंत्र्य सिद्ध होत नाहीं, हें स्पष्ट दिसतें.

हर्ष आणि चालुक्य

गुप्तांच्यानंतर उत्तरेकडे इ. स. ७ व्या शतकाचे आरंभीं हर्ष वर्धनाचें आणि दक्षिणेकडे चालुक्यांचें अशीं साम्राज्यें झालीं. हीं दोन्हीं घराणीं शैव होतीं, तरी बौद्ध आश्रय त्यांनीं बंद केला नाहीं. तथापि प्रथम शैवांचा आणि मागाहून वैष्णवांचा हल्ला दक्षिणेकडे व प्रथम वैष्णवांचा आणि मागाहून शैवांचा हल्ला उत्तरेकडे होऊं लागल्यामुळें जैन व बौद्ध धर्मांचा पाय एकसारखा मागेंच पडूं लागला. ह्या झटापटींत कोणाचा कसा काय जय झाला, हें ठरविणें कठीण आहे. बौद्धांनीं वैदिक धर्माला हुसकावून लावलें, पण ब्राह्मणांनीं मंदिरें, मूर्ति, तंत्रें, ध्यानें, उत्सव, पुराणें व तीर्थस्थळें इत्यादि बौद्धांच्याच सर्व साधनसामग्रीची हळूहळू आणि बेमालूमपणानें नक्कल करून त्यांचेंच सर्वस्व बळकावून त्यांना वाटेला लावलें; आणि अशा चातुर्यानें नवीन राजांच्या आश्रयाखालीं आपल्या शैव व वैष्णव संप्रदायांची उभारणी केली. “वैदिक देवतांना न मानणा-या व त्यांची पूजा न करणा-या लोकांची मनधरणी करण्यासाठीं नवीन दैवतकल्पनांना अनुसरून ब्राह्मणांना आपलें वाङ्मयच फिरवावें लागलें. जुन्या गोष्टींस नव्या कल्पनांना पटेल असलें काव्यमयरूप देण्याच्या भरांत ऐतिहासिक दृष्टि नष्ट झाली. ब्राह्मणांनीं यज्ञकार्याचें नेतृत्व टाकून देऊन लोकांच्या कल्पनांना काव्यमयरूप देण्याचें पतकरलें. त्यांच्या देवाचे जेव्हां त्यांनीं पोवाडे गाण्यास सुरुवात केली, तेव्हांच त्यांना आपलें वर्चस्व राखतां आलें.” (ज्ञानकोश विभाग ४ पान १८८) इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण इ. वैदिक देवांच्या आराधना बंद पडून त्यांच्या जागीं शिव, विष्णु, देवी, गणपति इ. लौकिक देवतांचे देव्हारे पसरून त्यांचीं पुराणें ब्राह्मणांना रचावीं लागलीं. वेदमंत्र व यज्ञयाग मागें पडून तांत्रिक मूर्तिपूजा माजली. गोमांस खाणारे व सोमरस पिणारे ब्राह्मण आतां कांदे-लसणासहि शिवेनातसे झाले. महायान बौद्धांचा धर्मपाल तोच शैव हिंदूंचा नटराजा, प्रज्ञापारमिता ती सरस्वती, मंजुश्री ती शीतला, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे वैष्णवांचे चार व्यूह ते बौद्धांचे ध्यानीबुद्ध वगैरे देवाणघेवाण होऊन, शैव, बौद्ध आणि वैष्णवांच्या उपास्य दैवतांची परस्पर सारखी सरमिसळ चालली होती. ह्या दंगलींत कोण जिंकला व कोण हरला हें ठरविणारानें कसें ठरवावें? जो आपलें रूप अधिक वेळां व अधिक लवकर पालटील, जनमनाचें अधिक रंजन करील, वेळोवेळीं बदलणा-या राजसत्तेचा रंग ओळखून उगवत्या सूर्याची उपासना नेहमीं करीत राहील, त्याला जय हा ठेवल्यासारखाच असतो! पण असल्या जयाचा धर्माच्या शुद्ध स्वरूपाशीं आणि त्याच्या ख-या विकासाशीं कसा संबंध पोंचतो, हें शोधून काढून त्याचा खरा अर्थ करणें, इतिहासकारांना फार जड जातें.

स्वरवैशिष्ट्य

(२२) अनुस्वार :- कोंकणींत अनुनासिकांची लयलूट आहे, तशी मराठींत नाहीं. सदर्न मराठा रेल्वेंतून गोव्याकडे जाऊं लागलें असतां, देशावरील माणसाला स्टेशनावरील नांवाच्या पाट्या वाचतांना अनुस्वारांची चंगळ पाहून मौज वाटते. तामिळ देशांत, रामेश्वरं, चिदंबरं, श्रीरंगं, वेंकटाचलं, मंडपं, अग्रहारं वगैरे पुल्लिंगी शब्दांवरहि अनुस्वार पाहून प्रथमदर्शनीं संस्कृत येत नसतांहि तें येतें असें दाखविण्याचा तामिळांचा हा मोह असावा असें वाटतें. पण बिशप कॉल्डवेलनें म्हटल्याप्रमाणें अशा शब्दांच्या पुढें पूर्वीं “न” हें अर्धाक्षर होतें, त्याचा हा अनुस्वार झाला आहे. पालींत हा प्रकार आहे. “निद्दरो होति निप्पापो धम्मपीतरसं पिबं ||९||” (धम्मपद, वग्ग १५ वा.) ह्यांत पिबन् ह्याचें पिबं असें रूप झालें आहे. असाच कांहीं तरी इतिहास ह्या कोंकणी अनुस्वाराचा असावा. त्यांत कोंकण्यांना गेंगाणे म्हणून हंसण्याचें कांहीं कारण नसून, उलट हा इतिहास त्यांनीं आपल्या अनुनासिकांच्या द्वारां कायम ठेविला ह्याबद्दल त्यांचे आभारच मानिले पाहिजेत.
(२३) रुंद स्वर :- इंग्रजींतील Bat, Ball ह्या शब्दांत असलेले ऍ, ऑ, ह्या स्वरांना अहमदाबादचें तौलनिक भाषाशास्त्री नरसिंगराव दिवाटिया हे रुंद स्वर असें म्हणतात. हे स्वर बंगालींत व कोंकणींत फार आहेत. हे स्वर नागर मराठींत नसले, तरी कुणबाऊ मराठींत आढळतात. यॅड (वेड) तॅल (तेल), शॅन् (शेण) हे स्वर रुंद आहेत. सर भांडारकर आपल्या “Wilson Phylological Lectures” मध्यें “The Law of Accentuation” संबंधीं बोलतांना, पाताळ, कापाड, वतान, जतान असे दीर्घ उच्चार कोंकणीचा विशेष म्हणून सांगत आहेत (पृष्ठ १५६). परंतु कुणबी मराठींत तर धोतार, मुस्काड, वराण असे उच्चार आहेतच. शिवाय त्वांड, ग्वाड, प्वाट, प्वार, असे रुंद उच्चारहि विपुल आहेत. हे रुंद उच्चार संस्कृतांत मात्र नाहींत. पण कानडी बाराखडींत ए, ऍ, ऐ; ओ, ऑ, औ; असे तीन तीन स्वर आहेत. म्हैसूरकडील नागर कानडींत बेसर = कंटाळा, कोण = रेडा, असे दीर्घ स्वर आहेत. त्यांचेच हुबळीकडील कुणबाऊ कानडींत बॅसर अथवा ब्यासर, कॉण अथवा क्वाण असे रुंद स्वर होतात. ह्यावरून कोंकणीचा हा कांहीं विशेष नसून, हे स्वर मूळ द्राविडींतील किंवा मोंगली भाषेंतले असावेत, ते कोंकणींत आणि कुणबाऊ मराठींत कायम राहिले आहेत, पण नागर मराठींतून आणि नागर कानडींतून ते मागाहून गेले असावेत, असा तर्क करण्यास जागा आहे.
 

  1. सौम्य उपाय
  2. सामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ
  3. सिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला
  4. सामाजिक व धार्मिक बाबी
  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56
Page 52 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी