वर जो करबंदीचा उपाय सांगितला तो निर्वाणाचा आहे. उठल्या सुटल्या त्याची वाच्यता पूर्वतयारीविना बाष्कळपाणाचें आहे. ती तयारी करणें म्हणजेच सौम्य आणि कष्टाळूपणाचे उपाय होत. असा एकहि उपाय हिंदुस्थानांतल्या शेतक-यांनीं बार्डोलीशिवाय इतर कोठें अजूनपर्यंत अंशतः देखील केला नाहीं, किंवा करण्यास त्यांना कोणीं इतर शहाण्यांनीं मदत केली नाहीं. पहिली गोष्ट तालुकानिहाय शेतकरी संघ निघाले पाहिजेत; इतकेंच नव्हे तर तालुकानिहाय कामकरी संघहि निघाले पाहिजेत. आणि ह्या जोडसंघाचें निरंतर सहकार्य चाललें पाहिजे. साता-यांतील खेडवळ म्हणजे वर्षांतील सहा महिने शेतकरी आणि दुसरे सहा महिने गिरणींतील अथवा गोदींतील कामकरी किंवा मजूर असतो. संघ कसे करावेत व आपल्याच बळावर आणि पैशावर चालवावेत ह्याचा श्रीगणेशा आतां त्या खेडवळाला अगदींच नवा नाहीं. शेतक-यांच्या व कामक-यांच्या जोडसंघाच्या वर्षभर घडणा-या सहकार्याविना बहुजनसमाज पाठकुळीवर बसून, पुन्हा त्यांचेंच रक्त शोषणारी जी भांडवलशाही तिला आळा कधीं बसणार नाहीं. खेड्यांत राहून जमिनीवर श्रम करून कच्चा माल उत्पन्न करणारे शेतकरी आणि शहरांत राहून त्याचा पक्का नग उत्पन्न करणारे गिरण्या, गोद्या आणि आगगाड्यांवरचे कामकरी हेच खरे राष्ट्राचे धारक आणि चालक; पण त्यांना भांडवलदारांच्या बुद्धीचें आणि युक्तीचें साह्य पाहिजे. ही तात्त्विक गोष्टहि विसरून चालावयाचें नाहीं. हा भांडवलदार इंग्लंड, अमेरिकेंतल्याप्रमाणें सावकार तरी असेल किंवा हल्लींच्या रशियाप्रमाणें सरकारचे रूपानें तरी राहीलच. अजीबात नष्ट होईल हें शक्यच नाहीं. पण ह्यापैकीं तो भांडवलासूर कोणत्या कां रूपानें राहिना तो शेतक-यांच्या व कामक-यांच्या मांडीखालील तट्टाप्रमाणें चालला पाहिजे. त्याची चंदी जर वर बसणा-या शेतकरी कामकरी ह्यांच्याच हातीं आहे तर त्याच्या ओठांतील लगामहि त्यांच्या हातांत नको काय ? ज्याची चंदी त्याचाच लगाम हें तत्त्व विसरल्याबरोबर भांडवलासूर ताबडतोब बादशाह बनून साक्षात विष्णूचा अवतार म्हणवूं लागतो. पण उलट ज्या हातांत चंदी त्याच हातीं लगाम आला, म्हणजे हाच भांडवलासूर उग्र रूप टाकून आपसुखानेंच अध्यक्षाचें गरीब रूप धारण करणारच. पण त्याचे अगोदर शेतकरी व कामकरी ह्या दोघांचे संयुक्त संघ (Federal Union) ठीक झाले पाहिजेत. ही मांजराच्या गळ्यांत घाट बांधावयाची ती शेतक-यांनीं आणि कामक-यांनींच बांधली पाहिजे. त्यांनीं ह्यापुढें ह्या कठीण, पण स्वतःच्या कामाकरितां येरागबाळांच्या तोंडाकडे पाहात राहूं नये. संप आणि करबंदी हे दोन केवळ तात्पुरते आणि शेवटचे उपाय आहेत. पण ते मधून मधून केवळ हुलकावण्या दाखविण्यासाठींच योजावयाचे असतात. त्यांना कायमपणा नाहीं. मांजराच्या गळ्यांत घाट बांधण्याची ज्यांनीं इतर सर्व तयारी केली असेल, त्यांनींच हे उग्र उपाय कांहीं काळ नाइलाजानें करावयाचे असतात. मिळून मुद्दा इतकाच कीं, वरील संयुक्त संघाची तयारी केल्याशिवाय, इतर सर्व वल्गना व्यर्थ आहेत. अशा संघाचीं सर्व तपशिलें ठरविण्याकरितां अशा परिषदा भरविणें अवश्य आहे.
सामाजिक सुधारणेच्या कार्याचें पाऊल जितक्या जोरानें पुढें पडावयास पाहिजे तितकें न पडण्याचें दुसरें कारण असें कीं सामाजिक सुधारणा या शब्दाची व्याप्ति अद्यापहि अगदीं मर्यादित समजली जाते हें होय. सामाजिक सुधारणा म्हणजे जुन्या कर्मठ धार्मिक भावना व जुन्या रूढी यांचेविरुद्ध चाललेला झगडा आहे एवढें सांगितल्यानें त्या शब्दांची निम्मीअर्धीहि व्याप्ति सांगितल्यासारखें होत नाहीं. अफाट हिंदु समाजाच्या सामाजिक पुनर्घटनेच्या विस्तृत प्रश्नांपैकीं बराच मोठा भाग धार्मिक भावना अगर सामाजिक दर्जाविषयींच्या भावना यांशीं कोणत्याहि प्रकारचा संबंध नसलेला असा आहे. त्याचें आर्थिक दृष्ट्या आणि इतर दृष्टीनेंहि महत्त्व आहे. पाश्चात्य देशांमध्यें सामाजिक प्रश्नांचा व्यापक दृष्टीनेंच विचार करण्यांत येतो. आणि त्यामुळेंच त्या देशांतून सामाजिक सुधारणेस फारसा विरोधहि होत नाहीं; आणि सर्व देशाची सहानुभूति व साहाय्य थोडक्याच अवधींत कोणत्याहि सामाजिक सुधारणेच्या कार्यास मिळूं शकतें. उलटपक्षीं आमच्या देशांत मात्र गेल्या दोन पिढ्यांमध्यें सामाजिक सुधारणा म्हणजे एका बाजूस इंग्रजी शिक्षण मिळालेले सुबुद्ध व उत्साही पण विशिष्ट कार्यक्षेत्र व धोरण ठरवून अनुयायांना निश्चित दिशा लावण्यास समर्थ नसलेले थोडेसे सुशिक्षित व दुस-या बाजूस बहुतेक सर्व देश (विशिष्ट वर्ग व बहुजनमसाजसुद्धां). यांच्यामधील असमान झगडा असा अर्थ होऊन बसलेला आहे आणि हा बहुजनसमाज ज्यांना राष्ट्रीय हिताची व्यापक दृष्टि नाहीं अशा शास्त्री-पंडितांच्या धोरणानें केव्हां केव्हां चालत असला तरी वस्तुतः कार्यविन्मुखता व शिथिलता यांचाच पगडा पुष्कळ वेळां त्यांच्या मनावर बसलेला असतो, व त्या योगानेंच आमचें राष्ट्र मागासलेलें राहिलेलें आहे. याकरितां सामाजिक सुधारणा या शब्दाच्या अर्थाची व तिच्या कार्यक्षेत्राची व्याप्ति वाढविण्याची वेळ आलेली आहे. अशा त-हेची व्याप्ति वाढविण्याच्या कार्यास सुरुवात झालेली आहे हें नमूद करण्यास मला संतोष वाटतो. कांहीं थोड्या दिवसांपूर्वीं आमच्यामधील सार्वजनिक कार्यकर्त्यांमध्यें ‘सामाजिक सुधारणा आधीं कीं राजकीय सुधारणा आधीं’ असा एक अर्थशून्य वाद चालू होता; जणूं कांहीं या दोन महत्त्वाच्या व परस्परमिश्र अंगांपैकीं प्रथम एकाचा परिपोष करतां येऊन नंतर दुस-याचा करतां येणेंच शक्य आहे ! परंतु कालांतरानें ही वृत्ति आतां पालटली असून कट्टर राजकीय सुधारणावादी व कर्मठ व रूढ धार्मिक मतांचे कट्टे अभिमानी हेहि थोड्याफार स्वखुषीनें सामाजिक सुधारणेच्या कार्याची उपासना करण्यांत गढून गेलेले दिसत आहेत; त्याचप्रमाणें समाजसुधारक म्हणविणारे लोकहि जुन्या कर्मठ वृत्तीच्या विचारांची कोंडी कशी फोडावी एवढ्यापुरतीच पहिली संकुचित वृत्ति न ठेवतां खेडेगांवांतील आरोग्यसंवर्धन, शहरांतील मजूर वर्गाची सुधारणा, शिशुसंगोपन, वगैरे समाजसुधारणेच्या इतर बाबींचा झपाट्यानें पुरस्कार करूं लागलेले आहेत.
“प्रिपॉनंट नांवाचे सरकारी धर्मोपदेशक केव्हां केव्हां दोनशें तीनशें अर्भकांना व लहान मुलांना आपल्या जिल्ह्यांतील दौ-यांवर बाप्तिस्मा देत असत व वाटेनें जाणा-या कोणाहि वाटसरांना स्पॉन्सर्स किंवा गॉडफादर्स म्हणून घेत असत. ह्या दत्तक पित्यांना ख्रिस्ती धर्माची कसली गंधवार्ताहि नसे. ह्या प्रांतांतील बहुतेक सर्व बौद्ध भिक्षूंवर, त्यांच्या लहानपणीं ह्या नाटकी बाप्तिस्म्याचा प्रयोग घडलेला असे.” (हा प्रयोग अलीकडच्या बॉया स्काउट्स व गर्लगाईड्सप्रमाणेंच करण्यांत येत असे म्हणावयाचें.) “मूर्तिपूजेसंबंधानें ब्रिटिश सरकारचें धोरण डच सरकारच्या अगदीं उलट असे. डच ही पूजा उखडून टाकीत तर ब्रिटिश प्रथम तिची गय करीत व पुढें तिला पाठिंबा देत असत... सन १८१५ त जेव्हां कँडीचें राज्य ब्रिटिश सत्तेखालीं आलें तेव्हां असें उघड धोरण जाहीर करण्यात आलें कीं बुद्धाचा धर्म हा अभंग आहे. त्याचे विधी-संस्कार, आचार्य, व देवस्थानें हीं सरकारी खर्चानें संरक्षिलीं जातील.” History of Missions by Rev. W. Brown Vol. I Page 17-18. मौंटस्टुअर्ट एलफिन्स्टननें आपल्या Rise of the British Power in the East ह्या पुस्तकांत म्हटलें आहे कीं, “पूर्वखंडांत पोर्तुगीज, डच, फ्रेंच राष्ट्रांच्या प्रसाराला अखेरीस मागें टाकून इंग्रजानेंच सर्वांवर जय मिळविला, तो त्या सर्वांच्या अपात्रतेमुळें व ब्रिटिशांच्या पात्रतेमुळें.” ती पात्रता म्हणजे ही संधिसाधुपणाचीच अपूर्व कारागिरी होय ! असो.
सन १७७३ पर्यंत चांचे, लुटारू, ह्यांच्यांशीं व्यापारी मंडळ्यांनीं सहकार्य करून व नंतर चांच्यांना बंदोबस्त झाल्यावर ख्रिस्ती धर्मप्रचारकांशीं लागेबांधे राखून, ब्रिटिश मुत्सद्द्यांनीं पूर्वखंडांत विशेषतः ह्या भरतभूमींत विश्वधर्मघटनेचा पाया जाणून किंवा नेणून घातला आहे. कोणी म्हणेल, धर्मघटनेच्या पवित्र कार्यांत चांचे, भामटे, संधिसाधूंचा संपर्क कां लावतां? “लंडे गुंडे हिरसे तट्टू ह्यांची संगत धरूं नको” असें लावणीकार सांगोत बिचारे. पण इतिहासकाराला असें सोंवळें नेसून चालावयाचें नाहीं. त्याला सगळ्यांचाच परामर्श घ्यावा लागतो. प्लांटेन नांवाच्या समुद्रावरील एका वाटमा-यानें तर मादागास्कर बेटावर आपली राजरोस वसाहत स्थापिली होती. त्याचीं सात आठ लढाऊ गलबतें होतीं. सन १७१९ मध्यें तर त्यानें मलबार किना-यावर हल्ला चढवून, गोव्याचा व्हाइसरॉय त्या वेळीं स्वदेशीं परत जात असतां त्याला गिरफदार केलें; व कंपनीच्या जहाजांना पिटाळून लावलें. शेवटीं त्याचा बंदोबस्त झाल्यावर तो मराठा सरदार आंग्रे ह्यांच्या आश्रयाला राहिला पण त्यानें आपला सनातन धंदा सोडला नाहीं. (एलफिन्स्टन : सदर पान ७५ भाग २) ह्या प्लँटन गुंडापासून, सुधारक लॉर्ड बेंटिकपर्यंत, सिरामपूरच्या ख्रिस्ती प्रचारापासून तों ब्राह्मसमाज, रामकृष्ण मिशनच्या वगैरे थोर पुरुषांपर्यंत सर्वांनींच धर्मक्रांतीची तळी उचलण्याला आपापल्या परीनें हात लावला आहे. मग पक्षपात कां?
विश्वधर्माचें जगड्व्याल सत्कार्य, आदर्शवादी साधुसंत आणि वास्तववादी मोठे मोठे जग जिंकणारे अलकंदर, चेंगिजखान इ. आणि त्यांचे गुंड भैरव ह्या सर्वांच्याच कृतीचें फळ आहे. जीवनशास्त्रांत नानाप्रकारच्या वनस्पतींचे फुलाफळांच्या गर्भाधान संस्कारांत जीवित पराग वाहून नेण्याचें कार्य म्हशीचे केस, डुकराचे दांत, भुंग्याचे पाय, हरिणाचीं शिंगें हीं बिनबोभाट करीत असतात. मोठ्या राजसूययज्ञांत महान् अध्वर्यु व ऋग्विजांबरोबर, समिधा आणण्याचे काबाडकष्ट कोळ्या कातक-यांवर पडतात. एकादा व्हाइसरॉय एकाद्या मोठ्या संस्थानिकाकडे पाहुणा आला तर शिकारीच्या सोहोळ्यांत रान तोडणारे व हांके ह्यांची कामगिरी विसरून चालत नाहीं. तसेंच विश्वधर्माचे निरीक्षणांत इतिहासकाराला गीतेंत सांगितलेली समदृष्टि ठेवावी लागते. ह्या दृष्टीनेंच पुनः आपली सांखळी ओढूं या.
सन १७७३ च्या रेग्युलेशन ऍक्टमुळें बेबंदशाही मिटून सुरळीत राज्ययंत्र चाललें. सन १७८३ त हिंदुस्थानांतील रणभूमीवर फ्रेंचांचा कायमचा पाडाव होऊन ब्रिटिश अजातशत्रू झाले. ह्या दुस-या कोणी युरोपियनचा त्यांना हेवादावा उरला नाहीं असें व्हर्सायच्या तहानें ठरलें. पुढच्या लढाया ब्रिटिशांना हिंदुस्थानांतल्या राजवटीशींच निर्वेधपणें करावयाला वेळ मिळाला इतकेंच नव्हे, तर हिंदुस्थानांतील राज्यकारभार-यंत्र नवीन घडवून समाजरचनेंत पुनर्घटना करावयाला अपूर्व संधि मिळाली म्हणून हा संधिकाळ महत्त्वाचा ठरतो. ह्या कामीं राममोहनाचें अवतारकार्य सुरू झालें. तें ३० वर्षें चाललें. हे सन १८०३ मध्यें सरकारी नोकरी सोडून स्वतंत्र सार्वजनिक सेवा करून ब्रिटिशसत्तेशीं विधायक सहकार्य करूं लागले. ते १८३३ मध्यें इंग्लंडांत ब्रिस्टल शहरीं वारले. ह्या अवतारकार्याचा तपशील सांगण्याचें हें स्थळ नव्हे व वेळहि नाहीं. ह्या पुढचा टप्पा १८३३ पासून सन १८५८ पर्यंतचा २५ वर्षांचा काळ, देवेंद्रनाथ ठाकूरचा होय. तोहि लवकरच नजरेवेगळा केला पाहिजे. राममोहनानें ब्राह्मसमाजाचा नुसता पाया रेखाटला. ठाकूर महर्षीनें त्यांत रंग भरून ओटाहि भरून काढला. बेंटिकनें समाजसुधारणा केली. मेकॉलेनें शिक्षणाचे आराखडे बांधले; आणि डलहौसीनें बहुतेक सर्व एतद्देशीय रियासतीवर वरवंटा फिरवून भरतभूमींत ब्रिटिशसत्ता जवळ जवळ एकजिनशी केली ह्यानंतर विकास नाटकाचा पडदा पाडून थोडा वेळ १८५७ च्या बंडाची नाट्यछटा दाखविण्यांत आली. पुनः पडदा उघडला, तों अकस्मात आमचे चरित्रनायक ब्रह्मानंद केशवचंद्र सेन सज्ज होऊन पुढें उभे राहतात.
केशवचा काळ १८५८ पासून १८८३ अखेर अवघा २५ वर्षांचा आहे. कोठें धर्मविकासाचें अनंत कार्य ! कोठें केशवचंद्रांचीं हीं २५ वर्षे ! गेल्या ५ शतकांतील कार्यांत केशव लहानगा भासतो. इ. स. १५५६ सालीं जिनीवाहूनहि पहिलें प्रॉटेस्टंट स्विस मिशन ब्राझिल देशास निघालें म्हणून वर सांगितलेंच आहे. त्याचवर्षीं हिंदुस्थानच्या सरहद्दीवर महात्मा अकबर जन्मला. पूर्व व पश्चिमेला जोडणारा तो एका दिव्य सांखळीचा अपूर्व दुवाच होता. अबुल फजल ह्या विद्वान मित्राच्या साहाय्यानें अकबरानें ह्या आधुनिक काळांत धर्माला पहिला उजाळा दिला. केशवच्या प्रवर्तक (Apostalic) दरबाराप्रमाणें अकबर हा हिंदु, मुसलमान, पार्शी, ख्रिस्ती, बौद्ध, यहुदी वगैरे सर्व तज्ञांची दर शुक्रवारीं एक उलेमा भरवीत असे. त्यानें विश्वधर्माची एक प्रत्यक्ष स्थापनाच केली (दिने इलाही). पण ती टिकली नाहीं. भयंकर प्रतिक्रिया मात्र घडली. अबुल फजलच मारला गेला. औरंगजेबाच्या हट्टाग्रहानें १५० वर्षांचें मोंगलांचें राज्यहि धुळीस मिळालें. त्या धुळींतून ब्रिटिशांची सत्ता उभी राहिली. पुनः पूर्व आणि पश्चिमेचें संघर्षण कितीतरी मोठ्या प्रमाणावर चालू झालें. त्यांतून राममोहनाचें सर्वधर्मसमन्वयाचें कार्य नांवारूपास आलें. ब्राह्मसमाज १८२८ मध्यें उघडला जाऊन प्रसिद्ध ट्रस्ट-डीड १८३० त प्रथम मंदिरप्रवेशाचे वेळीं घोषित झालें. राममोहनाचा अस्सल वारसा केशवचंद्रानें १८५८ मध्यें उचलला.
राममहोन राय महापंडित होता, तसाच शतक्रतूहि होता. सर्व कांहीं होता, पण त्याला वेळ पुरला नाहीं. अकालीं वारला. केशवचंद्र पंडित नव्हता. त्याचें बळ प्रेरणा व प्रार्थना ह्यांतच होतें. तेंच खरें धार्मिक बळ. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे केशव म्हणून एक प्रेरणेचा ज्वालामुखी पर्वतच होऊन गेला. तो २५ वर्षें टिकला हीच मोठी गोष्ट. जेथें ख्रिस्त ३ वर्षांत पडद्याआड झाला, तेथें केशव २५ वर्षें काळोखाशीं झगडत होता. ह्याचें कारण काळ त्याला अनुकूल होता. विश्वधर्माचा बार भरून तयार होता. केशवनें नुसती यशस्वी गोलंदाजी केली. प्रेरणा जें एका क्षणार्धांत व प्रार्थना ५ मिनिटांत चमत्कार घडविते तें शब्दपांडित्य आणि बाह्यघटना संबंध १०० वर्षांतहि घडवूं शकत नाहीं हें ब्राह्मसमाजाच्या इतिहासावरून उघड होतें.
केशवनें कल्पिलेला धर्मसंघ अदृश्य होता. (Invisible Church). ह्या अदृश्य संघावर त्याची अमोघ इंग्रजी वैजयंती वाहूं लागली, म्हणजे दृश्य संघाचे डोळ्यापुढें तारे चमकूं लागत ! तरुणांची, वृद्धांची, स्त्रियांची, मुलांची, मित्रांची, शत्रूंची त्याच्या वाकयज्ञांत आहुति होत असे. महर्षी देवेंद्रनाथ ठाकूरचें व केशवचें फार दिवस पटण्यासारखें नव्हतें. त्यांचें कोणाशीं पटलें? शेवटीं त्यानें १८५६ त स्वतंत्र भारतवर्षीय ब्राह्मसमाज काढला. त्याच्यापेक्षां कितीतरी मोठा, बुद्धीचा खंदक राजा राममोहन राय ३० वर्षें सारखा शोध, युक्तिवाद आणि आर्जव करून मस्तिष्क रोगानें वारला. उलट केशवानें हुकूम करावा, इतरांनीं ऐकावें हा क्रम होता, तोंपर्यंत ब्राह्मसमाजाची ऊर्फ दृढ विश्वधर्माची स्थापना व वाढ झाली. जेव्हां हा क्रम ढिला पडला तेव्हां सर्वच जणूं थंडावलें. त्याच्या चरित्राच्या शेवटीं “नवविधान” संघाची घोषणा झाली (१८७७). पण त्याचें कार्य अगोदरच संपलें होतें. असलें कार्य कधीं रेंगाळत नाहीं.
राममोहनाच्या महत्कार्याचीं दोन मुख्य अंगें होतीं. पहिलें धर्मसमन्वय, दुसरें भारतीय लोकसमाजाची पुनर्घटना. दोन्हीला केशवनें स्पष्ट मूर्त स्वरूप दिलें. पहिल्याचें कार्य वरिष्ठ वर्गांत अद्याप चाललें आहे. दुस-याचा परिणाम बहुजनसमाजावर घडत आहे. ह्यांतच केशवाचें वैशिष्ट्य आहे. केशवचाच वारस हल्लीं महात्मा गांधीकडे आला आहे. त्याच्या ब्राह्मसमाजाला काँग्रेस हें नांव पडलें आहे.
भरतभूमि ही पुरातन काळापासून सर्व जाणत्या जगाची आध्यात्मिक माता होऊन राहिली आहे. १५ व्या शतकापासून जडवादी पाश्चात्य जगाचें लक्ष ह्या पुण्यभूमीकडे लागलें. राममोहन राय व केशवचंद्र आणि त्याचे अनुयायी प्रतापचंद्र मुजुमदार व वेवेकानंद वगैरे जे इंग्लंड-अमेरिकेला गेले. तें शिकण्यासाठीं नसून शिकविण्यासाठींच गेले असें म्हणण्यांत कांहीं आत्मश्लाघा नाहीं. त्यांचें स्वागत त्याच थाटानें झालेंहि. राममोहन रायला ब्रिटिश पार्लमेंटमध्यें (Ambassador) पौरस्त्य प्रतिनिधीची खुर्ची मिळाली. केशवचा सत्कार डॉ. मार्टिनो, मेक्समूलर, जॉन स्टुअर्ट मिल, फ्रॅन्सिस न्यूमन, प्रधान ग्लॅडस्टन, मिस मेरी कार्पेंटर व प्रत्यक्ष महाराणी व्हिक्टोरिया ह्यांनीं केला. तरी पण तो गर्वानें फुगून गेला नाहीं. तो मनानें दीनच होता. वरून तो हुकूमशहा दिसत होता तरी, अंतरांत फार लाजाळू होता. ह्यामुळेंच त्याची छाप वरिष्ठ वर्गावर तशीच जनतेवरहि पडली. त्यामुळें धर्मसमन्वयाचे धडे त्यानें भारतीय उच्च वर्णीयांना, पाश्चात्य पंडितांना व धर्माधिका-यांनाहि दिले. हें प्रो. मॅक्समूलरसारख्या जगविख्यात पंडितानेंहि कबूल केलें आहे. राममोहन हा तुलनात्मक धर्माध्ययनाचा आद्य प्रवर्तक अशी ज्यांनीं घोषणा केली त्या मॅक्समूलरनेंच पाश्चात्य विद्यालयांतून ह्या शास्त्राची पुढें पूर्तता केली.
जी गोष्ट मॅक्समूलरनें विद्यालयाच्या ध्येयांत केली ती केशवानें लौकिक पूजेंत व सहानुभूतींत केली. त्याला त्यानें “नवविधान” हें नांव ठेविलें.
असा दिग्विजय संपादून सन १८७१ सालीं केशवचंद्र विलायतेहून परत आल्यावर आपलें दुसरें कार्य जनता संपर्काचें (Mass Contact) त्यानें मोठ्या धडाडीनें सुरू केलें. धर्मविषयाला ही नवीनच कलाटणी मिळाली म्हणावयाची. स्वस्त वाङ्मय, स्त्रीविमोचन, लौकिक शिक्षण, मद्यपानबंदी व अपंगांची सेवा ह्या पंचसूत्री समाजसुधारणेचा पाया घातला. त्यावरच भावी राष्ट्रीय सुधारणेची इमारत आतां दिसत आहे. ह्यांत हिंदुस्थानचे व्हाइसरॉयसारखे बडे अधिकारीहि त्याचें सहकार्य मागत असत व स्वतः देत असत. ब्राह्मसमाज म्हणजे केवळ डोळे मिटून प्रार्थना करणारी मंडळी नव्हे, हें राममोहनापासून नुकतेच दिवंगत झालेल्या श्री. कृष्णकुमार मित्रापर्यंत प्रत्येक ब्राह्मानें सिद्ध केलें आहे. हें सर्व कशानें झालें? धर्माचीं दोन अंगें, अंतःसाधन व बाह्यसेवा ह्या दोन्हीला केशवानें आपल्या आयुष्याचें सर्वस्वी अर्पण केलें होतें. उरी ठेवली नव्हती. अनासक्तीनें प्रपंच त्यानें केला, तो धर्मसाधनासाठीं समाजोन्नतीसाठीं केला. शेवटचा काळ जरी शारीरिक व मानसिक क्लेशांत गेला तरी सन १८८४ च्या जानेवारी ८ तारखेस त्यांचा जो अंत झाला तो अकालीं निधन मात्र म्हणतां येत नाहीं ! त्याचें कार्य संपलें होतें. पुढें मनूहि पालटला.
वर उल्लेख केलेला गांवगाडा दुरुस्त करणें म्हणजेच शेतक-यांची संघटना करणें होय. शिक्षण, व्यसनाची बंदी, वाहतुकीचीं साधनें, सामाजिक सुधारणा, ख-या व भरीव धर्माचरणाची जबाबदारी, वगैरे पुष्कळ गोष्टींचा मी वेळोवेळीं आजन्म टाहो फोडीत आलों आहें. ह्या सर्व तपशिलाच्या गोष्टी आतां लांबणीवर टाकणें राष्ट्रहिताला घातुक आहे व त्याचा विचार आजच्या सभेंत झाला पाहिजे. ह्या तपशिलाची अंमलबजावणी करण्यासाठीं तालुक्यांतील म्युनिसिपालिट्या, बोर्डें व इतर स्थानिक संस्था प्रत्यक्षपणें, शेतक-यांनो, तुमच्या हातीं आल्या पाहिजेत. चळवळे लोक अशा संस्थांतून जागा पटकावण्यापुरतेच तुम्हांला आपल्या नादीं लावतात, व आश्चर्य हें कीं, तुमच्यांतलेच पुढारी म्हणविणारे ह्या चळवळ्यांच्या नादीं लागून तुमचें नुकसान करतात. ह्या गोष्टी आतां शाळेंतल्या विद्यार्थ्यालाहि कळूं लागल्या आहेत.
(१६) आपण वर सिद्ध शब्दांचा विचार केला. ह्यापुढें आपण व्याकरणांत शिरणार आहों. म्हणून प्रथम साधित शब्दांचा विचार करूं. कोंकणींतील व मराठींतील धातुसाधितांमध्यें साम्यभेद खालील कोष्टकावरून सहज दिसेल.
मराठी कोंकणी सकर्मक अकर्मक (PDF साठी येथे क्लिक करा)
वरील कोष्टकावरून वाचकांच्या ध्यानांत सहज येईल कीं, कोंकणीचें मराठीशीं जितकें साम्य आहे तितकें इतर कोणत्याहि मृत अथवा जिवंत भाषेशीं नाहीं; आणि जेथें भेद आहे तेथें तो केवळ उच्चाराचा आहे; किंवा कोंकणींत कांहीं साधितांचीं रूपेंच वेगळीं आणि जास्त आहेत. हाच प्रकार खालील कोंकणी प्रत्ययांवरून नामांच्या विभक्तींसंबंधानें आणि क्रियापदांच्या काळांच्यासंबंधानेंहि दिसून येत आहे. तो असा :
तक्ता (PDF साठी येथे क्लिक करा)
वरील कोष्टकावरून दिसून येईल कीं, द्वितीया आणि चतुर्थीशिवाय बाकी प्रत्यय बहुतेक मराठीसारखेच आहेत. मात्र कोंकणींत कांहीं विभक्तींत निराळे जास्त प्रत्यय आहेत ते मराठींत नाहींत. पंचमीचे प्रत्यय ‘च्यानं’, ‘ज्येन’ हे व्यावहारिक मराठींत आढळतात; जसें, माझ्येंन किंवा माझ्याच्यानं हें काम होत नाहीं. मराठीच्या लिखाणांत जरी ‘रामानें’ अशी तृतीया होते, तरी बोलण्यांत कोंकणीप्रमाणें ‘रामानं’ असेंच रूप होतें. ह्याशिवाय विशेष महत्त्वाचें साम्य म्हणजे नामाचीं सामान्यरूपें बहुतेक सर्व मराठीप्रमाणेंच कोंकणींतहि होतात.
(१७) क्रियापदांच्या काळांचीं रूपें पाहिलीं असतां कोंकणीचें इतर कोणत्याहि चालू प्राकृतांपेक्षां मराठीशीं विलक्षण साम्य आहे. इतकेंच नव्हे, तर गुजराती, सिंधी, अगर हिंदीपेक्षांहि, बंगाली अथवा ओरिया भाषेंतील काळांच्या आणि प्रयोगांच्या रूपांकडे तिच्या रूपांचा अधिक कल झुकत आहे, आणि तसाच मराठीच्याहि रूपांचा झुकत आहे. ह्या गोष्टीवरून मराठी भाषा, बंगालचा पश्चिम भाग आणि ओरिसा ह्या प्रांतांतून प्रवास करून दक्षिणेंत आल्यावर तिचें जें रूप बनलें, तें रूप सारस्वतांनीं कोंकणांत नेलें असावें असें अनुमान होतें. उदाहरणार्थ, भूतकाळचा ‘ल’ आणि भविष्यकाळचा ‘न’ अथवा ‘ल’ हा आदेश बंगालींत, ओरियेंत आणि मराठींत आहे. तो गुजरातींत, सिंधींत किंवा हिंदींत नाहीं. पण तोच नेमका कोंकणींत मात्र आढळतो. ह्या भविष्यकाळच्या ‘ल’वरून आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा सुगावा लागत आहे, तो असा. व्याकरणकार रा. भि. जोशी ह्यांनीं आपल्या प्रौढबोध व्याकरणांत ( पानें १६१, १६२ कलम (ई)) मराठींतील जुन्या आणि नव्या भविष्यकाळाचा विचार करीत असतांना म्हटलें आहे कीं, जुन्या मराठींत म्हणजे इसवी सन १२०६ ह्या वर्षापर्यंत जुन्या वर्तमानकाळाप्रमाणेंच भविष्यकाळाचीं रूपेंहि असत. इसवी सन १२८६ च्या परळ येथील मराठी शिलालेखांच्या “जो कोणी हुवी ए शासन लोपी”, ह्या वाक्यांतील हुवी आणि लोपी हे वर्तमानकाळीं प्रयोग भविष्यकाळीं योजिले आहेत. तसेंच इसवी सन १२०६ च्या पाटणच्या मराठी शिलालेखांतील “येथें जें मविजे तें मढीचेन मापें मवावें” ह्या वाक्यांत मविजे हें वर्तमानकाळाचें रूप भविष्यकाळीं योजिलें आहे. पण ज्ञानेश्वरींत (इसवी सन १२९०) आणि त्याच्यापुढील काळांत ह्याच रूपापुढें ‘ल’ हा प्रत्यय लागून भविष्यकाळाचा प्रयोग होऊं लागला. हा मराठीचा ‘ल’ प्रत्ययच कोंकणींत ‘लो’ ह्या रूपानें आहे. जोशी आपल्या ह्याच (ई) कलमाचे आरंभीं म्हणतात “हा भविष्यकाळाचा ‘ल’ कसा आला, कोठून आला हें सांगतां येत नाहीं.” परंतु कानडीच्या भविष्यकाळाच्या रूपांत नु, लु, रु असे प्रत्यय आहेत, त्यावरून मराठींत व कोंकणींतहि हे कानडी ‘न’ आणि ‘ल’ हे प्रत्यय अगर आदेश आले असावेत; किंवा खुद्द जोशी आपल्या त्याच पानावरील (आ) ह्या कलमांत हा भविष्यकाळचा ‘ल’ जुनी मारवाडी, गरवाली, कमाउनी आणि नेपाळी ह्यांमध्यें एकवचनी ‘लो’ आणि अनेकवचनी ‘ला’ असा आहे.” असें जें म्हणतात, त्यावरूनच सारस्वतांच्या द्वारां हा ‘ल’ मराठींत आला असें म्हणण्यास काय हरकत आहे ? इतकेंच नव्हे तर ह्या ‘ल’ ला जरी मराठींत जोशी म्हणतात त्याप्रमाणें “ लिंग आणि वचन ह्या दोहोंचाही भेद नाहीं,” तरी कानडी आणि कोंकणी ह्या दोन्ही भाषांत ह्या दोहोंचाहि भेद आहे. ह्या विलक्षण साम्यावरून, मराठीचा आणि सारस्वत ब्राह्मणांचा समागम इ. स. १२०६ आणि १२९० च्या दरम्यान घडला असावा व त्यानंतर हे लोक ही नवीन अर्धवट संपादलेली ज्ञानेश्वरीच्या काळची जुनी मराठी घेऊन कोंकणांत गेले असावेत. त्यानंतर त्यांचा आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील मराठीचा संबंध तुटल्यामुळें, आणि कानडीचा संबंध जास्त जडत चालल्यामुळें, त्यांच्या भाषेंत कानडी शब्दांचाच नव्हे तर, कांहीं क्रियापदांच्या रूपांचीहि भर पडत चालली. उदाहरणार्थ, “मला माहीत नाहीं” ह्या अर्थी कोंकणींत “माका गोत्त ना” असें म्हणतात. हा “गोत्त” शब्द निव्वळ कानडी आहे. आणखी पुष्कळशा शब्दांवरून, नामाच्या विभक्तींवरून आणि क्रियापदांच्या काळांवरून कोंकणीचें जुन्या मराठीशींच साम्य नवीन मराठीपेक्षा किती तरी जास्त दाखवितां येतें. पण पुढच्या काळांत मात्र तिचें कानडीशीं साम्य आढळतें. संयुक्त प्रांत, बिहार आणि बंगाल ह्या प्रांतांवर इ. स. १३०० शतकांत मुसलमानांनीं अनेक स्वा-या करून तेथील लोकांचा अनन्वित छळ केला; बौद्ध धर्माचा आणि मठांचा उच्छेद केला; म्हणून ते लोक उत्तरेस नेपाळांत व दक्षिणेंत ओरिसा प्रांतांत जीव घेऊन पळाले. त्याच धांदलींत गौडसारस्वत ब्राह्मणहि त्याच मार्गानें प्रथम गोदावरीच्या तीरावर आणि नंतर कोंकणांत उतरले असावेत. तेथें विजयनगरच्या कानडी साम्राज्यछत्राखालीं, पोर्तुगीजांची धाड येईपर्यंत, त्यांनीं आपल्या वसाहती सुखानें चालविल्या असाव्यात. ही उपपत्ति त्या काळीं घडलेल्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील राज्यक्रांतीला अगदीं सुसंगतच आहे.
(१८) कोंकणीचा दुस-या कोणत्याहि चालूं प्राकृतापेक्षां मराठीशींच संबंध असल्याचें व त्यांतल्यात्यांत, बंगाली व ओरियाशीं संबंध असलेल्या मराठीशींच अधिक संबंध असल्याचें खालील गोष्टीवरून आणखी सिद्ध होतें. मराठींतील पंचमी विभक्तीचे “ऊन”, “हून” हे, “होऊन” ह्या धातुसाधितावरून आले आहेत. जुन्या मराठींत ‘घर होऊन’ (घराहून) असें जें रूप क्वचित् आढळतें तें बंगालींतील घर “होइते” ह्या रूपाबरहुकूम आहे. हिंदी भाषेंत द्वितीया आणि चतुर्थीचे प्रत्यय कु, को असे आहेत. आणि बंगालींत पंचमी “होइते” (होऊन) ह्या धातुसाधितावरून होते; ह्या दोन कारणांवरून सारस्वतांनीं ही भाषा उत्तरेकडून आणिली म्हणावी, तर इतर बहुतेक सर्व विभक्तींचे प्रत्यय-विशेषतः तृतीयेचे प्रत्यय दुस-या कोणत्याही भाषांशीं जुळते नसून मराठीशींच जुळतात. ह्यावरून सारस्वतांनीं दक्षिणेंत आल्यावरच ही भाषा घेतली असेंहि होतें. इतर भाषांतून एकेका विभक्तीचा बहुशः एकेकच प्रत्यय आहे. संस्कृताचाहि हाच प्रकार आहे. पण मराठीचे प्रत्यय एकेका विभक्तीला तीन चार आहेत आणि कोंकणींत तर त्याहूनहि जास्त आहेत. क्रियापदाचे काळहि ह्या दोन भाषांचे इतरांपेक्षां जास्त आहेत. ह्यावरून ह्या दोन्ही भाषा फिरत्या स्थितींतल्या लोकांच्या आहेत, आणि कोंकणी तर त्यांतल्यात्यांत जास्त आहे, हें उघड दिसतें. कोकणींतलें कांहीं काळ किंवा अर्थ हल्लींच्या नव्या मराठींत जरी प्रचारांत फारसे नाहींत तरी पूर्वीं जुन्या मराठींत ते होते. हांव निजं = मी निजें, हांव मारीं = मी मारीं; तो करी = तो करी; ते करीत = ते करीत; हीं रीतिभूतकाळाचीं रूपें कोंकणींतलीं जुन्या मराठीसारखींच आहेत. हांव चालों, आमी करूं, तो करों, ते करोत हा कोंकणी विध्यर्थ जुन्या मराठींतहि होता. “चालों वाटे आम्ही तुझाचि आधार” (तुकाराम) “ सदाहि हित नायकों, बहु अपाय केले, करूं” (मोरोपंत). आणखी एक बारीक पण विलक्षण साम्य कोंकणींत आणि मराठींत आहे, तें दुस-या कोणत्याहि भाषांत आढळत नाहीं. तें असें : सकर्मक क्रियापदाच्या रूपांत “इ” हा आदेश होतो तो अकर्मकांत होत नाहीं. जसें, “हांव निजतां” = मी निजतों, “हांव मारीन” = मी मारीन. चमत्कार हा कीं, मराठींत हा “इ” आदेश विकल्पानें होतो, तसा कोंकणींतहि तो विकल्पानेंच होतो !
(१९) हे सर्व प्रकार, व्याकरणाच्या ज्या रूपांनीं मराठी आणि कोंकणीमधील साम्य सिद्ध होतें, त्यासंबंधी झाले. आतां मराठींत जीं रूपें आहेत ती कोंकणींत नाहींत, आणि कोंकणींत आहेत तीं मराठींत नाहींत त्यांची वाट काय? आणि तींच तर वादाचा मुख्य विषय आहेत. कारण त्यांवरूनच दालगादोसारख्या पंडितांना, मराठीपासून कोंकणी भिन्न आणि स्वतंत्र असावी, अशी शंका येत आहे. वर निर्दिष्ट केलेल्या ऐतिहासिक परिस्थितीवरून आणि व्याकरणाच्या समान रूपांवरून कोंकणी ही मराठीपासून भिन्न नाहीं हें सिद्ध झालें, तरी तिचा कांहीं भाग मराठीपासून स्वतंत्र आहे, तो कशामुळें ह्याचा उलगडा करणें आवश्यक आहे. हें परस्पर स्वातंत्र्य ह्या दोन्ही भाषांतील जीं भिन्न भिन्न कालांचीं व अर्थांचीं रूपें आहेत त्यांवरून मुख्यतः दिसून येतें. ह्यांचा उलगडाहि ह्या भाषांच्या घटनेच्या इतिहासांतच सांपडणें शक्य आहे. ह्या दोन्ही भाषा उत्तरेकडून खालीं आलेल्या लोकांच्या आहेत. हे लोक निरनिराळ्या वेळीं आणि विध्यांद्रीच्या पूर्व आणि पश्चिम टोकाला वळसा घालून दक्षिणेंत उतरले आहेत. इतकेंच नव्हे, तर हे लोक म्हणजे सारस्वत ब्राह्मण आणि मराठे हे कांहीं काळ एकत्र राहून पुनः वेगळे राहूं लागले आहेत, व पुनः त्यांच्यामध्यें सह्याद्रि आडवा पडला आहे. नर्मदेच्या उत्तरेकडील अथवा पूर्वेकडील दुस-या कोणत्याही चालू भाषांचा असा प्रकार घडलेला नाहीं. त्या, जुन्या पैशाची, शौरसेनी, मागधी, अर्धमागधी अथवा महाराष्ट्री ह्यांपैकीं कोणत्या तरी एका प्राकृतांतून निर्माण होऊन, पुढें निश्चल आणि निर्विंघ्न वाढत गेल्या, पण मराठीला मात्र विंध्याद्रीच्या दोन्ही टोकांला वळसे घालावे लागले आहेत, म्हणून हिच्यांत वरील चारपांचहि प्राकृतांची भेसळ झाली आहे. इतकेंच नव्हें तर तिचें बाळपण, मी ‘केसरीं’तील उपरिनिर्दिष्ट लेखांत सिद्ध केल्याप्रमाणें कानडीच्या तालमींत वाढलें आहे. निराळ्या वेळीं पण अगदीं असाच प्रकार कोंकणीचाहि घडला आहे. ह्या परिस्थितीमुळेंच ह्या दोन्ही चालू भाषा इतर उत्तरेकडील किंवा पूर्वेकडील भाषांपासून जशा अगदीं भिन्न आहेत तशाच किंचित् अंशानें परस्परांपासूनहि अगदीं भिन्न नसल्या तरी स्वतंत्र असल्याचा भास होण्याइतक्या वेगळ्या आहेत. हें स्वातंत्र्य स्पष्ट करून दाखविण्यासाठीं खालीं कांहीं उदाहरणें देतों.
(२०) राव. सा. चव्हाण ह्यांनीं आपल्या व्याख्यानाच्या १४ व ३२ पानांवर कोंकणी आणि मराठी शब्दांची तुलना करून, कोंकणी शब्द मराठी शब्दापेक्षां संस्कृताला जवळ आहेत असें ध्वनित केलें आहे. हांव = मी; उदक = पाणी; गीम = उन्हाळा; आयदन = भांडें; कुकड = कोंबडा, इ.; उलटपक्षीं, कुणबाऊ मराठींतील खालील उदाहरणें, नागर मराठींतल्या शब्दांपेक्षां संस्कृताला अधिक जवळ हें ध्यानांत घेण्यासारखें आहे. कुणब्यांच्या भाषेंत “घ्या” म्हणजे दिवसा असा शब्द आहे. ऋग्वेदांत वरुणाच्या स्तोत्रांत “यचिद्धि ते विशो यथा प्रदेव वरुण व्रतम् | मिनिमसि द्यवि द्यवि ||” यांतील द्यवि ह्याचा दिवसा असा अर्थ आहे, त्याला वरील “ध्या” हा शब्द फार जवळ आहे. पुण्याकडील ‘कुणबी’ बघ न म्हणतां ‘पघ’ म्हणतात; हा शब्द प्रेक्ष-पेख ह्याला नागर मराठींत बघ पेक्षां अधिक जवळ आहे. करून शानी, देऊन शानी, हा कुणबी प्रयोग वेदांतील संस्कृतांत आढळतो, असें राजवाडे सांगतात. मराठींतील “हो” हाहि धातु संस्कृत “भू” चा अपभ्रंश आहे. पण कोंकणींत “जा” म्हणजे “हो” ह्या अर्थाचा शब्द संस्कृत जनपासून झालेला ह्याच अर्थीं आहे. “मुई जासी, साखर खासी” = मुंगी होशील तर साखर खाशील. ह्याच धातूपासून “जाय” असें एक साधित “पाहिजे” अशा अर्थीं कोंकणींत आहे. “दिवुळान् रिक्तोंच शेण काढूंक जाय”= देवळांत शिरतांच शेणहि काढावयाला (तयार असलें) पाहिजे. “तुका जाय”? = तुला पाहिजे काय? हिंदी व गुजरातीप्रमाणें मराठींत “चोर पकडला जातो” असा कर्मकर्तरी प्रयोग होतो. हा प्रयोग मराठींत नवा आहे. जुन्या मराठींत “धरिजे,” “देखिजे” असा प्रयोग होतो. ह्याच रीतीनें कोंकणींत हा प्रयोग आहे. जसें :- “सोंदीर आणि संसार कोणाच्यान् चिंतून काढून न जो”= समुद्र आणि संसार कोणाच्यानेंहि चिंतून काढला जात नाहीं (थांग लागत नाहीं). ह्यांत “जो” हा शब्द मराठींतल्याप्रमाणें “जा” ह्या अर्थीं नसून इंग्रजी कर्मकर्तरि प्रयोगाप्रमाणें असू = is ह्या अर्थीं (is caught) असा आहे. अव्वल आर्यभाषेंत कर्मकर्तरि प्रयोग होता कीं नाहीं ह्याची शंका आहे. तो प्राकृतांत मात्र राजरोस आढळतो. संस्कृतांत तो आत्मनेपदींच आढळतो, व पदाचे प्रत्यय कानडीशीं अधिक जवळ आहेत म्हणून हा कर्मकर्तरि प्रयोग कदाचित् द्राविड असावा अशी शंका येते. असो. हें प्रकरणच स्वतंत्र आहे. तूर्त कोंकणींतला प्रयोग इंग्रजींतल्या प्रयोगाला किती जवळ आहे एवढें कळलें कीं पुरे. इंग्रजी भाषा सर्वस्वीं आर्य नाहीं हेंहि ध्यानांत ठेवणें आवश्यक आहे.
(२१) वर ज्या शब्दांवरून कोंकणी ही मराठीपासून स्वतंत्र आहे असा भास होतो असे पुष्कळ शब्द इतरहि देतां येतील. हे सर्व संस्कृत तद्भव आहेत. पण असले पुष्कळ संस्कृत तद्भव हल्लींच्या कुणबाऊ मराठींत किंवा जुन्या महानुभावींत आढळतात. ते नागर मराठींत किंबहुना कोंकणींतहि आढळत नाहींत. ह्यावरून ही जुनी महानुभावी अगर आतांची कुणबाऊ देखील मराठीपासून स्वतंत्रच म्हणावयाची कीं काय? मात्र एवढें खरें कीं, कोंकणींत जे असे स्वतंत्र तद्भव सांपडतात त्यांवरून ती मूळ मराठीपासून कधीं फुटून वेगळी झाली हें ठरविण्याच्या कामीं कांहींसा अंधुक पुरावा मिळतो. उदाहरणार्थ “वेगुवि” हें कोंकणी क्रियाविशेषणच घेऊं. हा शब्द जुन्या मराठींत “वेगोवित्तर” अशा रूपानें होता. आतां नाहीं. श्रीपतिकृत “रत्नमाला” नांवाचा एक त्रुटित ज्योतिषग्रंथ, शालिवाहन शके ९६१ सालांतला अगदीं जुना, भारत इतिहाससंशोधक मंडळानें आपल्या अहवालांत प्रसिद्ध केला आहे, त्याची भाषा अगदीं महानुभावी वळणावर आहे. त्यांतील प्रकरण ३, श्लोक १० मध्यें “वेगोवित्तर” असा मराठी शब्द आढळतो. संशोधक राजवाडे, ह्याचा अर्थ लागत नाहीं, असें कां म्हणतात हें कळत नाहीं. हा ग्रंथ म्हणजे मूळ संस्कृत श्लोक व त्यावरील त्याच वेळच्या मराठींतील टीका मिळून झाला आहे. “...अषिल (अखील) भोगानुभवं नृणां तैलाभ्यंगात् सपदि कुरुते सूर्यतनय: ||१०||” ह्या आपल्या संस्कृत श्लोकाचें भाषांतर, ग्रंथकार श्रीपती आपल्याच तत्कालीन मराठींत असें करीत आहे :- “शनिश्चरे (शनिवारीं) पुरुषा(ला) तैलाभ्यंगास्तव वेगोवित्तर सकळभोग प्राप्ती” (१०) ह्यावरून “सपदि” ह्या संस्कृत शब्दाचें “वेगोवित्तर” ह्या तत्कालीन मराठी शब्दानें भाषांतर झालें आहे, हें उघड आहे. हाच शब्द ‘वेगुवि’ ह्या अपभ्रंशरूपानें हल्लींच्या कोंकणींत आहे व त्याच अर्थीं, (वेगानें) असा क्रियाविशेषणवाचक आहे असें म्हणावयाला काय हरकत आहे? एकंदरींत हल्लींची कोंकणी ही मराठीपासून स्वतंत्र नसून तिच्यांतील कांहीं तद्भव व देश्य शब्द आणि व्याकरणाचीं रूपें जशीं सारस्वत ब्राह्मणांनीं आणिलीं आहेत तशींच कांहीं क्षत्रिय मराठ्यांनीं किंवा कुणब्यांनीं आणिलीं आहेत, असेंच अनुमान निघतें. शालिवाहन शके ९६१ त (इ. स. १०४०) जे सारस्वत ब्राह्मण व मराठे गोदावरीच्या आसपास मिळूनच होते, तेच वरील कलम (१७) मध्यें दर्शित केल्याप्रमाणें इ. स. १२०६-१२९० च्या दरम्यान विभक्त होऊन सारस्वत हे कोकणांत शिरून त्रावणकोरपर्यंत खालीं उतरले, आणि कुणबी व क्षत्रिय मराठे पुढें देशावरूनच खालीं तंजावरापर्यंत द्राविड देशांत उतरले, असें मानण्यास काय हरकत आहे? असें न मानतां उलट कोंकणी ही मराठीच नव्हे असें मानण्यास काय काय हरकती आहेत, त्यांचें विवरण वरील ऐतिहासिक विवेचनांत कलम ५ पासून १२ पर्यंत करण्यांत आलेंच आहे.