1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

साक्षात्कारी वाङ्मय

येथवर थोडक्यांत विचार झाला मराठींतील स्वतंत्र विचाराचा, किंवा मूळ ग्रंथनिर्मितीचा. यावरून जवळजवळ एक हजार वर्षांच्या मराठी वाङ्मयानें अगर महाराष्ट्रीय प्रासादिक वागभक्तांनीं महाराष्ट्राच्या मानसिक भांडवलांत कांहीं भरीव शिल्लक टाकली नाहीं, असें म्हणण्याला मात्र मी तयार नाहीं. पण या मुद्द्यावर अधिक चर्चा करण्यापूर्वीं मानसिक भांडवल किंबहुना तत्त्वज्ञान म्हणजेच काय ह्याचें किंचित् स्पष्टीकरण करणें अवश्य आहे.

द्वे विद्ये वेदितत्त्वे
इतिह स्म
यद्ब्रह्मविदो वदन्ति
परा चैवापरा च ।।४।।
तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः
सामवेदोSथर्ववेदः शिक्षा कल्प
व्याकरणं निरुक्तं
छन्दो ज्योतिषमिति ।।
अथ परा यया
तदक्षरमधिगम्य ते ।।५।।
मुंडकोपनिषद्-१ मुंडक. १ खंड.

वरील उता-यावरून अस्सल तत्त्वज्ञानाची गणना श्रौत वाङ्मयांत देखील होत नसे, असें दिसतें. पराविद्या ऊर्फ तत्त्वज्ञान हें अतिवाङ्मय असतें हेंच खरें.

“ यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह” असें प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचें लक्षण प्रसिद्धच आहे. त्या तत्त्वाचें ज्ञानहि अतिवाक् आहे असें मुंडकोपनिषद् म्हणतें. पण तें ज्ञान अतिमनस् आहे, असें मुंडक म्हणत नाहीं. तें शब्दज्ञानाचें पलिकडे असलें तरी मानवी हृदय आणि संकल्प ह्यांच्या पलीकडे नाहीं. म्हणून तें ज्ञान साक्षात्कारगम्य आहे खास.

“मनोवाचातीत तुझें हें स्वरूप||
म्हणोनिया माप भक्ति केली||१||
भक्तिचियें मापें मोजितो अनंता||
इतरानें तत्त्वतां न मोजावे||२||
ह्या उद्गारांत तुकारामानें भक्ति ही अतिमनस् आहे असें सहज म्हटलें ती त्याची केवळ नजरचूक आहे. तें कसेंहि असो. टाळ कुटणारे म्हणून ज्या वारक-यांची पावलोंपावलीं निंदा होते-आणि अशा निंदकांमध्येंच वामन पंडितासारख्या धेंडाचीहि भर पडत आली आहे ! त्या साक्षात्कारी कांहीं टाळकुट्यांनीं महाराष्ट्राच्या मानसिक भांडवलांतच नव्हे तर इतर पुरुषार्थामध्येंहि जी भर टाकली आहे, ती पंडितमन्य शाब्दिकांच्याहि हातून झाली नाहीं. ह्या भाविकांच्या अमूल्य कारागिरीची गणना तत्त्वज्ञासंबंधीं गद्य वाङ्मयांत करण्याऐवजीं काव्य वाङ्मयांतच केली असतां हा विषय अधिक निर्विवाद होईल.

सांप्रदायिक अस्पृश्यता

या विशिष्ट प्रकारच्या अन्यायाला जे बळी पडलेले आहेत, त्यांच्यामध्यें याबद्दलची जी जाणीव व जागृति उत्पन्न व्हावयास पाहिजे, ती उत्पन्न करण्याचें प्राथमिक काम बहुतेक यापूर्वींच होऊन चुकलें आहे. आतां आम्हांस सोडवावयाचा बिकट प्रश्न विचारप्रांतांतला नसून तो इच्छाप्रांतांतला आहे. आतां यापुढें या प्रश्नाचा आणखी ऊहापोह व्हावयास पाहिजे अशांतला प्रकार नाहीं. पण आमच्या विचारांचें प्रत्यक्ष कृतींत रूपांतर कसें व्हावें हाच काय तो प्रश्न आहे. यासंबंधींचे आमचे विचार कितीहि पूर्णत्वास पोहोंचले, तथापि त्यांच्या योगानें आमच्या हातून प्रत्यक्ष कृति घडण्यास जी इच्छाशक्ति अवश्य आहे, ती आमच्यांत प्रादुर्भूत होईल असें म्हणतां येत नाहीं. यासंबंधानें विचार करतां अत्यंत दुदैवाची गोष्ट ही कीं लाला लजपतराय यांच्यासारख्या प्रसिद्ध पुढा-यांच्या नेतृत्वाखालीं भरलेल्या हिंदु सभेंतहि हा प्रश्न निर्णयाकरतां अजूनहि शास्त्री-पंडितांकडे सोपविण्यांत यावा. या प्रश्नाच्या निर्णयाला जर कोणी अगदीं नालायक असेल, तर ते हे शास्त्री-पंडितच होत. यांच्या अंगचा मोठा गुण म्हटला म्हणजे यांची विद्वत्ता. पण हा प्रश्न तर पडला अत्यंत निकडीच्या व्यवहारांतला. तेथें नुसती विद्वत्ता काय कामाची ? शिवाय अशा प्रश्नांचा निर्णय करण्यास जी निःपक्षपात बुद्धि असावयास पाहिजे ती त्यांच्या अंगीं असणें शक्य नाहीं. त्यांच्या पोशिंद्यांच्या पसंतीवर त्यांची सारी भिस्त असणार. दुसरें सांप्रतचीं कायदेकानूनचीं पुस्तकें वेगळीं व ज्यांच्यावर या शास्त्रीपंडितांची सारी मदार ते स्मृत्यादि ग्रंथ वेगळे. हे स्मृत्यादि ग्रंथ म्हटले म्हणजे त्या प्राचीन काळीं जे जे प्रघात अथवा रूढी प्रचारांत असतां त्यांच्या नोंदीचीं पुस्तकें अथवा पोथ्या. त्यांचा अर्वाचीन कालाच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या उलगड्यास उपयोग होण्याचा संभव बहुतेक थोडाच असणार. शेवटची मुद्द्याची गोष्ट ही कीं, या दुर्दैवी अस्पृश्य वर्गाविषयीं यांना बिलकूल सहानभूती नसून उलट आपले अभिप्राय त्यांना प्रतिकूल असल्याचें त्यांनीं स्पष्टपणें बोलूनहि दाखविलें आहे. अर्वाचीन कालाचीं न्यायासनें निःपक्षपाती म्हणतात, पण तेथेंहि पाहावें तों न्यायाधिशाचा कल अनुकूल असल्याची शंका आल्यामुळें खटला वर्ग केल्याचीं उदाहरणें घडून आलेलीं आहेत. मी विचारतों कीं हा अस्पृश्यांचा प्रश्न जर शास्त्री-पंडितांकडे सोपवावयाचा तर, पतितपरावर्तन, हिंदुमुसलमानांतील एकी, हिंदूंची संघटना इत्यादि प्रश्नहि त्यांच्याकडेच निर्णयाकरितां कां सोपवूं नयेत ? आपला इतका छळ होत असूनहि आपल्याला आदि हिंदु म्हणवून हिंदु धर्माविषयींचा आपला आपलेपणा जे जाहीर करीत आहेत, त्यांना निदान ख्रिस्ती वगैरे अन्यधर्मांचा आश्रय करणा-यांच्या बरोबरीनें वागविणें हें आपलें कर्तव्य आहे, इतकेंहि हिंदु सभेला वाटूं नये काय ? धर्मांतर केलेले आदि हिंदु आणि आपणास अद्याप हिंदु म्हणविणारे आदि हिंदु यांच्या बाबतींत असा भेदाभेद कां करावा ? तात्पर्य, या सर्व प्रकारचें मूळ शोधूं गेल्यास, त्या बाबतींत आमच्या अंतःकरणांत उत्कट इच्छेचा पूर्ण अभाव आहे हेंच कबूल करावें लागेल.
गुलामांचा व्यापार, सतीची अमानुष चाल वगैरे बंद करण्याच्या कामीं जसें कायद्याचें साह्य मिळालें, तसेंच याहि बाबतींत मिळवूं म्हटलें, तर तोहि मनु बहुतेक पालटल्यासारखा दिसतो. इतकेंच नाहीं, तर वायकोम येथें घडलेला प्रकार मनांत आणतां कायद्याकडून नको त्या पक्षालाच साह्य मिळूं पाहात आहे. अशा स्थितींत अन्यायाला नाहक बळी पडत असलेला हा अस्पृश्यवर्ग व त्याचे प्रतिपक्षी यांच्यांतील लढा, ‘बळी तो कान पिळी’ या न्यायानुसार नुसत्या परस्परांच्या बाहुबलाच्या उणेंअधिकपणावरच निकालांत लावण्याचा प्रसंग आम्हीं येऊं देणार काय?
ब्राह्मणेतरांचा प्रश्न
या प्रश्नाचा विचार करतांना ब्राह्मणेतर पक्षाचे मद्रासचे प्रसिद्ध पुढारी व नायक सर त्यागराज चेट्टीआर यांच्या निधनानें कधींहि न भरून येणारें त्या पक्षाचें जें नुकसान झालें आहे.

समाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं?

गेल्या आठवड्यांत ज्या वेळीं आपल्या स्वागत मंडळाकडून मला विनंति करण्यांत आली त्या वेळीं माझी प्रकृति बरीच अस्वस्थ होती; यामुळें मी मोठें भाषण करीन अशी अपेक्षा आपण करूं नये. शिवाय समाजसुधारणेच्या विषयावर मोठें वक्तृत्वपूर्ण भाषण करण्याची आवश्यकता आहे असें कोठेंहि व केव्हांहि घडलेलें नाहीं. परिषदांमधून आपण भाषणें करण्यापलीकडे आपणांस कांहीं करतां येत नाहीं हें खरें, परंतु भाषणें, चर्चा किंवा ठराव यांच्या पाठीमागें कांहीं तरी भरीव असण्याचें परिषद हें एक दृश्य चिन्ह आहे हेंहि तितकेंच खरें आहे. आणि हें कांहीं तरी म्हणजे प्रत्यक्ष कृति हें होय. आपण हल्लीं प्रगतीच्या युगांत आहोंत; आणि कशाहि अडचणीच्या काळांतून चिकाटीनें व शांतपणें मार्ग काढणा-या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विशेषतः धार्मिक संस्था यांच्या योगानेंच राष्ट्राच्या प्रगतीस खरें सामर्थ्य प्राप्त होत असतें. आमच्या परिषदा या प्रकारच्या संस्थांच्या केवळ मदतनीस अशा असावयास पाहिजेत; अशा संस्था जर अस्तित्वांत नसतील तर नुसत्या परिषदा नसलेल्याच ब-या. पाठीमागें विधायक कार्य करणा-या संस्था नसतांना भरविल्या जाणा-या परिषदा ह्या नुसत्या आवाज करणा-या घंटांसारख्या किंवा पर्जन्यविरहीत वावटळीसारख्या विफळ होऊन त्यांच्या योगानें सार्वजनिक शांततेचा मात्र भंग होत असतो ! ज्याप्रमाणें एखाद्या यंत्रांत फाजील ताण पडूं नये म्हणून यांत्रिक योजना केलेली असते त्याप्रमाणें राष्ट्रीय सद्सद्विवेक बुद्धीवर पडणारा ताण कमी करण्याचा आभास उत्पन्न करण्याचें काम अशा प्रकारच्या परिषदा आजहि करीत असतात. कोणी म्हणतात कीं राष्ट्रीय सद्सद्विवेक बुद्धि निर्माण करण्याचें कार्य अशा परिषदांकडून होत असतें. कांहीं काळपर्यंत तसें कदाचित् होत असेल. परंतु हल्लीं मात्र अशा त-हेची सद्सद्विवेक बुद्धि निर्माण होण्याऐवजीं तिची तीव्रता कमी करण्याचें व ती अजिबात नाहींसें करण्याचें कार्य अशा परिषदांकडून होत आहे.
त्याखेरीज निरनिराळ्या परिषदांतून व राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनांतून, इतकेंच नव्हे तर ज्यांचें अस्तित्व केवळ मतदारांच्या संतुष्टपणावर अवलंबून आहे अशा कायदे कौन्सिलांतून सुद्धां इतके ठराव एकमतानें मंजूर होत असतां व त्यांचा वारंवार पुनरुच्चार केला जात असतांहि ते जितक्या लीलेनें पास होतात तितक्याच लीलेनें विसरलेहि जातात या गोष्टीची संगती लावतांच येणार नाहीं. उदाहरणार्थ, सक्तीचें प्राथमिक शिक्षण व सार्वजनिक जागांमधून अस्पृश्यतेचें उच्चाटण या दोन बाबतीकडेच पाहा, म्हणजे एखादा कायदा अगर वटहुकूम करून तो धूळ खात पडूं देणें हें प्रत्यक्ष दुष्कृत्य करण्याहूनहि कसें वाईट आहे हें दिसून येईल. कारण, दुष्कृत्यामुळें निदान विरोध तरी उत्पन्न होतो परंतु असल्या विफल कायद्यामुळें अगर हुकुमामुळें दुबळ्या अंतःकरणांस वाटणा-या संवेदना नष्ट होण्याचें कार्य मात्र हमखास घडतें. जर सतत तीन वर्षें करतां येईल इतकें तरी निदान प्रत्यक्ष कार्य आपणांपुढें आंखतां येण्याजोगें आहे असें जर आपणांस सिद्ध करतां येण्याजोगें असेल तरच आपण परिषदेची बैठक भरविण्याच्या भरीस पडावें, एरवीं परिषदा भरवूंच नयेत हें इष्ट आहे. आणि जर समाजसुधारणेस लोकप्रियता व वजन कशामुळें प्राप्त होणार असेल तर तें यामुळेंच होईल असें माझें नम्र मत आहे.

समाजशास्त्रीय विचार

आतांपर्यंत मराठ्यांच्या पूर्वपीठिकेचा केवळ भाषाशास्त्राच्या आधारें विचार झाला. आतां तो समजशास्त्राच्या दृष्टीनें कर्तव्य आहे. भाषाशास्त्राच्या दृष्टीनें निरनिराळीं नांवें आणि निरनिराळे धातु यांच्या संबंधांवरून ‘मराठा’ या नांवांत निरनिराळे वंश कसे मिसळले आहेत हें दाखविण्यांत आलें. आतां रीतिरिवाज, खाणेंपिणें, पेहराव, विवाह, धर्म आणि धंद्यांच्या परंपरा यांचा विचार करूं. ह्या दृष्टीनें पाहतां मराठा आणि कुणबी हे दोन शब्द अतिशय चिंतनीय आहेत. ह्या दोन शब्दांनीं गणले जाणारे जे दोन मनुष्यसमूह आजकाल ‘मराठा’ ह्या नांवाच्या जातींत जितके एकजीव झालेले दिसत आहेत तितके ते दोन हजार वर्षांपूर्वीं खास नव्हते. भाजें येथील शिलालेखांत जें महारथी अथवा महारथिनी हें जातिवाचक विशेषनाम आढळतें तें त्या वेळच्या कुणब्यांना खास लावलें जात नसावें. महारथीचा धंदा इतमामाने लढण्याचा व कुणब्याचा धंदा स्वतःची अगर दुस-याची जमीन इतमामानें वाहण्याचा. दोन्ही धंदे तेव्हां प्रतिष्ठित खानदानीचे होते. केवळ पोटार्थी मजुरी करण्याचे नव्हते.
कुणबी ह्या शब्दाची व्युत्पत्ति आणि व्याप्तिहि मनोरंजक आहे. कुणबी हा शब्द कूळ ह्या शब्दापासून झाला आहे. यांत कूड = एकत्र होणें, राहणें हा तामिळ धातु आहे. कुलू असा अपभ्रंश संस्कृत भाषेंत झालेला आहे. कूली = मजूर हा शब्द तामीळ भाषेंत प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ शेतावरचा मजूर असा कानडी भाषेंत प्रसिद्ध आहे. कुणबी हा मराठी शब्द कुटुंबी असा संस्कृतांत, कणबी असा गुजराथेंत, कुडमी अथवा कुरमी असा संयुक्तप्रांत आणि बिहारांत प्रतलित आहे. ह्या नांवाचेच नव्हे तर अर्थाचे व वृत्तीचे अफाट समाज महाराष्ट्राबाहेर, गुजराथ-बिहारपासून खालीं दक्षिणेंत पसरलेले आहेत; परंतु ह्या नांवाचे समाज महाराष्ट्राबाहेरील इतर सन्मान्य समाजांत न मिसळतां स्वतंत्रपणें आहेत. ते महाराष्ट्रांतील मराठ्यांत मात्र एकजीव झाले आहेत; तथापि हा मराठ्यांचाच विशेष आहे असें नाहीं. गुजराथेंत पाटीदार म्हणून जो एक वर्ग आहे तो कुणबी क्षत्रियांचा आहे; आणि उत्तरेकडील राजपुतांत जाटांचा समावेश तंतोतंत मराठ्यांतील कुणब्यांच्याप्रमाणेंच झाला आहे.
जाट पाटीदार आणि बिहारमधील कुर्मि क्षत्रिय हे वंशानें कोण आहेत हें ठरविणें आपल्या विषयाबाहेरचें आहे. महाराष्ट्रांतले कुणबी मात्र अस्सल द्रावीड आणि मराठ्यांचे दक्षिणेंतील आगमनापूर्वीं येथें आलेल्या किंवा येथेंच मूळचे असलेल्या कोणा इतर वंशाचे असतील, असें त्यांच्या चालीरीतींवरून दिसतें. ह्या चालीरीति मराठ्यांनीं यांच्याशीं सर्रास शरीरसंबंध ठेवल्यामुळें मराठ्यांतहि आतां दृढमूल झाल्या आहेत. मराठ्यांचे मुख्य धंदे दोन. कटकटीच्या काळीं मुलुखगिरी, किंबहुना प्रतिष्ठित लूट आणि एरवीं जमीनदारी. कुणब्यांची वृत्ति एकच आणि ती अधिक सात्त्विक . ती म्हणजे जमीनदारी व जमिनीची मशागत. इंग्रजींत Peasant Proprietor म्हणून जो शब्दप्रयोग आहे तो कुणबी शब्दाचा सोळा आणे अर्थवाहक आहे. रा. त्रिं. ना. अत्रे यांनीं आपल्या गांवगाडा या नमुनेदार पुस्तकांत या अर्थाचें यथार्थ वर्णन केलें आहे. महाराष्ट्राच्या वसाहतीचें मराठ्यांपेक्षांहि कुणब्यांकडे अधिक श्रेय जातें हें या बालबोध पुस्तकावरून उघड होतें.
हिंदुस्थानांत किंबहुना दक्षिणेंत येण्यापूर्वीं मराठे हे फिरत्या अवस्थेंत होते. त्या प्राचीन काळीं यांचा विकास शेतकींत झालेला नसावा. ते पशूचे पालक आणि लुटारू होते. ते रथी आणि अश्वी होते, ह्याचें कारण ते फिरते होते. हींच नांवें त्यांच्या जातीला पडलीं. अशी ह्या नांवाची शकांची जी एक प्रतिष्ठित शाखा होती, तिचेमुळेंच असिरिया, सीरिया, आशिया वगैरे देशवाचक आणि खंडवाचक नांवें प्रचारांत आलीं असावीं. मराठे हे फिरते आणि मुलुखगि-या ऊर्फ लुटालूट करणारे असल्यामुळें, खाण्यापिण्याचा व शरीरसंबंधाचा सोवळेपणा त्यांच्यांत शक्य नव्हता; आणि तो अद्यापि शक्य नाहीं. “राजे लोकांना जात नाहीं” ही म्हण ह्या वृत्तीवरूनच पडली आहे. परधर्मी आणि अस्पृश्य ह्यांना शिवायकरून मराठ्यांची रोटीलोटी आजहि राजरोस सर्व हिंदु जातींशीं चालूं आहे. हजार वर्षांपूर्वीं मिश्र बेटीव्यवहार निदान अनुलोमानें तरी ( Hypergamy ) चालू होता ही गोष्ट आतां लपूं शकत नाहीं. संशोधनामुळें ती दिवसेंदिवस अधिक उजेडांत येईल. जातिभेद मानणें व माजविणें हें धनलोलुप नेभळ्या भांडवलशाहीचें हीन लक्षण आहे. बुद्ध, महावीरादि सुधारकांनाहि न जुमानतां हे आजचे भेद वैश्यांच्या वृत्तिसंघांनीं (Trade Guilds) मधल्या पौरुषविहीन अडाणी युगांत माजविले गेले आहेत; आणि उप-या ब्राह्मणांनीं व क्षत्रियांनीं त्यांना हातभार लावला असला तर तोहि त्यांच्या वेदबाह्य बिनबुडाच्या मतलबामुळेंच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय ह्या जाती नव्हत, वृत्ति होत; आणि त्यांचा पाया जन्मावर नसून गुणकर्मावर आहे. ह्या विधानाला एका गीतेचाच नव्हे, तर सा-या इतिहासाचा पाठिंबा आहे. असो. ह्यामुळें मराठे व कुणबी हे भिन्न वंश वृत्तिसाम्यानें सहज एक झाले, असें मानण्यांत आम्ही मोठेंसें धाडस करितों असें नाहीं.
धर्म—धर्म म्हणजे उपास्यांची परंपरा व जन्म, विवाह, मृत्यु इ. गृह्यसंस्कारांची रूढि असा अर्थ घेतल्यास, शक, मराठे आणि त्यांचे पूर्वीं दक्षिणेंत आलेले द्रावीड कुणबी ह्यांच्यांत बरेंच वैषम्य असलें पाहिजे. पण समान वृत्ति आणि चिरसहवास ह्यांमुळें हें वैषम्य कमी कमी होत जाऊन हे दोघे आज एकजीव दिसत आहेत. तथापि त्यांच्यांत शारीरिक सादृश्य नव्हतें, हें शरीर, मस्तक, रंग, केस वगैरे गोष्टींवरून वंश ठरविण्याचें जें एक शास्त्र किंवा तंत्र आहे, त्यावरून दिसतें. उत्तरेकडील राजपुतांत जाटांची भेसळ झाली असली, तरी ते दोघे वंशाच्याच पोटशाखा असल्यामुळें शरीरतः त्यांची भिन्नता दिसत नाहीं; पण कुणबी भिन्न वंशाचा असल्यामुळें त्यांच्यांत मिसळलेल्या मराठ्यांचे रूपरंग विविध असणें साहजिक आहे. मराठ्यांचीं मूळ उपास्यें सूर्यचंद्रनागादि देवकें, त्यानंतर अधिक विकसित काळांत शिव आणि भूदेवी हीं दैवतें, नंतर बुद्ध जैनांची सुधारणा, त्यानंतर पुन्हा लिंगायतांची छाप, अगदीं अलीकडची लाट म्हणजे वारकरी-वैष्णव पंथ, असा ह्यांच्या धर्माचा विकास होत आला आहे. “ महाजनो येन गतः स पंथा ” ह्या न्यायानें मराठ्यांच्या गाड्याबरोबर कुणब्यांच्या मात्र नळ्यांची यात्रा चालली आहे. हाडाचा मराठा शैव आणि शाक्त आहे. कुणब्याचे मात्र नागनरसोबा अनंत आहेत. मराठा काय, कुणबी काय, ह्यांच्या धर्माची पृच्छा फार न केलेलीच बरी. ब्राह्मण पुराणिकासंबंधानें तुकाराम म्हणतात, “ पुढिला सांगे आपण न करी ”. सामान्य ब्राह्मणांचा धर्म जसा सांगण्यापुरताच, तसाच मराठ्यांचाहि ऐकण्यापुरताच ! हे देखल्या देवाला दंडवत करतील, वेळ पडली तर मुसलमानहि होतील; पण ह्यांच्या देव्हा-यांवर केव्हांहि टाक म्हणजे ह्याच्या पूर्वजांच्या मूर्तिच दिसतील. टाक = तक् नांवाची शक वंशाची एक प्रतिष्ठित शाखा होती. तिचेवरून ही टाकांची परंपरा आली असावी. तिचें नांव तक्षक. हे पांडवांचे मोठे शत्रु. जैमिनीनें ह्यांचा निःपात केला असें महाभारतांत रसभरीत वर्णन आहे. ह्या तक्षक नामक नागवंशांत पूर्वजपूजा विशेष होती असें वर्णन  Story of Parthian Nation या पुस्तकांत आहे. प्रागेतिहासिक काळांतील हीं देवकें मराठ्यांत म्हणा अगर कुणब्यांत म्हणा आतां केवळ लगीनसराईंतच आठवतात. येरवीं आजकाल ह्यांचें दैवत भूदेवी जगदंबा. हें प्रस्थहि आजकालचें नव्हे. सर्व उपास्यांत कालानुक्रमें ह्यांचा नंबर पहिला आहे. हें प्रकरण मी माझ्या भागवतधर्माचा विकास ह्या भागांत सांगोपांग व्यक्त केलें आहे. उत्तरेकडे राजपूत व राठी आणि दक्षिणेंतील रड्डी हे प्रसिद्ध शैव आणि शाक्त होत. तैलंगणांत हिंडत असतां मला रड्डी घराणीं मरीआई, शीतळादेवी वगैरे ग्रामदेवतांचे वतनदार पुजारी व मालक दिसलीं. रड्डी जसे पुढें पुढें व्यापारांत शिरले, तसे ते शाकाहारी आणि वैष्णव बनले. इकडेहि दुकानदार मराठे व कुणबी तुकारामाच्या काळापासून वारकरी होऊं लागले. तरी पण त्यांच्या देवता जाखाईजोखाई; आणि त्यांना नैवेद्य रक्ताभाताचा !  ह्याशिवाय त्यांच्या शेतांतला डाबरा म्हणा किंवा राजधानींतला अश्वमेध म्हणा कसा सिद्ध होणार ?  “धंदा तसाच देव” हेंच खरें.
शक, हूण इ. नांवांच्या मानवी टोळ्या वायव्येकडून पुरातन काळापासून, किंबहुना आर्य म्हणवणा-यांच्याहि पूर्वींपासून तों इ. सनाच्या ४।५ व्या शतकापर्यंत हिंदुस्थानांत आल्या आहेत. दक्षिणेंतहि इ. स. पूर्वीं ५।७ शतकांपासून त्यांचें अगमन वेळोवेळीं झालें असावें. तक्षक ह्या नांवावरून वर दर्शविल्याप्रमाणें हे लोक जसे नागवंशी असावेत असा तर्क वाहतो, तसेंच तौलनिक भाषाशास्त्राच्या अंतर्गत व्याकरण आणि शब्दकोशांच्या पुराव्यावरून शकांच्या, पल्लवांच्या, यवनांच्या (ग्रीकांच्या) टोळ्या आर्य, द्रावीड इत्यादि वंशाच्याहि असाव्यात असा तर्क होतो. ह्या जाती फार फिरस्त्या आणि मुलुखगिरी करणा-या असल्यानें यांनीं आपल्या पेहरावाप्रमाणें आणि भाषेप्रमाणें धर्महि वेळोवेळीं बदलला असल्यास मुळींच नवल नाहीं. उलट नसल्यासच महदाश्चर्य !  अगदीं अलीकडे म्हणजे शालीवाहन शतकाच्या आरंभीं दक्षिणेंत नहपान क्षत्रप नांवाच्या एका शक राजानें व त्याच्या घराण्यानें दोनतीन शतकें ब-याच वैभवानें राज्य केलें आहे. या राजांनीं बौद्धधर्म स्वीकारून ब्राह्मणांनाहि फार खुष राखिले होतें. नाशिक जिल्ह्यांतील चार शिलालेखांचा डॉ. सर भांडारकरांनीं आपल्या पुस्तकांतील पान १३ वर जो तपशीलवार उल्लेख केला आहे, त्यांत नहपानाचा जांवई उशवदात यानें लक्ष गाई दान केल्या, बारणासा या नदीला घाट बांधला, देवब्राह्मणांना सोळा गांवांचा अग्रहार दिला, ब्राह्मणाचीं लक्षभोजनें घातलीं, इतकेंच नव्हे; तर अस्सल ब्राह्मणी धर्माच्या रिवाजाप्रमाणें प्रभासक्षेत्रांत आठ ब्राह्मणांचीं लग्नें स्वखर्चानें करून दिलीं. इ. माहिती आहे. १८५७ सालच्या बंडानंतर ५।७ वर्षांनीं ग्वाल्हेरच्या शिंदेमहाराजांनीं पुण्यास येऊन बरेच दिवस तळ दिला होता, तेव्हां त्यांनींहि ब्राह्मणसंतर्पणाचीं अशींच शतकृत्यें केलीं होतीं. एकूण राजांचा धर्म लवचीक असणें साहजिक आहे.
धंदा—मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी व शिपाईगिरी, आणि कुणब्यांचा शेतकी एकच, असें आम्ही वर म्हणालों. ह्यावरून मराठे हे कसब्यांत राहणारे आणि कुणबी गांवखेड्यांत राहणारे हें सिद्ध होतें; पण ह्या दोघांचा इतका एकजीव झाला आहे कीं, धंद्यांच्या दृष्टीनें त्यांच्यांत भिन्नता कल्पिणें केवळ अशक्य झालें आहे. शंभर वर्षांत म्हणजे तिस-याच पिढींत मराठ्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा, म्हणजे शेतक-याचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्रांत तरी गेल्या दोन हजार वर्षांत बेमालूम चालू आहे. कोल्हापूरच्या श्रीशाहू राजांनीं मला स्वतः सांगितलें कीं, राणीपैकीं कोणी बाळंतीण झाली कीं, पहिल्या रात्रीं मुलाला वाळलेल्या गवतावर निजवावें, अशी चाल महाराजांच्या घराण्यांत होती. ह्या चालीचा अर्थहि स्वतः महाराजांनींच सांगितला कीं, आम्ही राजे लोक शेतकरी आहों, हें केव्हांहि विसरूं नये म्हणून ही चाल आहे. कुणबी हा बळी राजा कसा आहे, तो गाय व सर्व गांवठाण त्याचें वांसरूं कसें वगैरे गोष्टी रा. अत्रे ह्यांनीं आपल्या गांवगाड्यांत तपशीलवार वर्णिल्या आहेत. खेड्याचा राजा पाटील. गावडा (ग्रामठा) ह्यालाच कानडींत गौडा (पाटील) म्हणतात. ब्राह्मणापासून तों महारमांगापर्यंत सर्व जातींचें बलुतेंअलुतें ऊर्फ कारूनारू ह्यांचीं वांसरें. ही गांवगाड्याची घटना व ही सर्व परिभाषा फारच पुरातन आहे. समाजशास्त्राच्या दृष्टीनें ही अपूर्व घटना मराठ्यांच्याहि आगमनापूर्वींची असावी, असा माझा ह्या परिभाषेवरून तर्क होतो. शेतकीचीं उपकरणें, आउतें, चालीरीति, फार काय बलुतेंअलुतें हे शब्दहि अस्सल देशी, म्हणजे कानडींतले आहेत. एक हजार वर्षांपूर्वीं गोदावरीच्या दक्षिणेकडील सर्व देश, आणि ठाण्याच्या दक्षिणेकडील सर्व कोंकण थेट कावेरीच्या किना-यापर्यंत राजरोस कर्नाटकांत मोडत असें. बगळ म्हणजे कुटुंबाचा पसारा अथवा बल म्हणजे उजवी बाजू ह्या दोन शब्दांपासून बलुतें या शब्दाची व्युत्पत्ति असावी. बगळ + कूड अथवा बल + कूड (उड—ट-त) बलोत असा हा मूळ कानडी शब्द आहे. त्याचें कारूं ( कार, कृ धातूपासून ) हें आर्यन रूप होय. तसेंच अलोतें याचें नारु असें आर्यन भाषांतर होय. बलोतें अथवा कारूं म्हणजे हातानें (उजव्या हातानें) श्रम करणा-याला जें अव्वल दर्जाचें वेतन मिळतें तें; आणि नारु अथवा अलोतें म्हणजे देवांच्या अगर धर्माच्या नांवावर दुय्यम आणि गौण दर्जाची भिक्षा जी मिळते तो हक्क. नारु = नारायण असा देववाचक आर्य भाषेंतला अर्थ आहे. एल म्हणजे देव. ह्या अर्थाचा सेमेटिक आणि सुमेरियन भाषेंतला आहे. तो कानडींत किंवा कर्नाटकांत सिंध प्रांतांतून आला असावा. एल्लप्पा (यल्लाप्पा), एलापूर, एलूर व यल्लम्मा वगैरे माणसांचीं, गांवांचीं, दैवतांचीं नांवें शक मराठ्यांनीं दक्षिणेंत आणलीं किंवा द्रावीड कुणब्यांनीं त्यांच्या पूर्वींच तेथें नेलीं तें सांगतां येत नाहीं. तीं आज मराठा आणि कानडी कुणब्यांशीं एकजीव झालीं आहेत. बलुतें म्हणजे उजवीकडचा संघ असा अर्थ असल्यास त्याला जुळणारा एलुतें म्हणजे एर = दुय्यम अथवा एड = डावीकडचा संघ असाहि अर्थ लागतो. बल=उजवा, एड=डावा असे कानडी शब्द आहेत. व्युत्पत्ति कशीहि असो, हीं नांवें आणि ज्यांचीं हीं नांवें आहेत त्या संस्था मराठ्यांशीं आणि विशेषतः कुणब्यांशीं एकजीव आहेत; पण चमत्कार हा कीं, स्वतः मराठा किंवा कुणबी हा बलुतेदार नसतो. अलुतेदार तर कधींच नसावयाचा. बलुते अलुत्याचा तो दाता अगर धनी असतो. म्हणजे कारूंचा धंदा किंवा नारूंची भिक्षा मराठा अगर कुणबी कधीं स्वतः करणार नाहीं कीं मागणार नाहीं. असा हा परिपाठ पुरातन आहे.
संशोधक कै. राजवाडे ह्यांनीं “राधामाधवविलासचंपू” च्या प्रस्तावनेंत लिहितांना मराठ्यांचे दोन भेद कल्पून पुष्कळ टीका केली आहे. तिचें खंडण मीं मागें ‘विजयी मराठ्यां’त एक लेखमाला लिहून केलेंच आहे. उत्तरेकडच्या मराठ्यांना राजपुतांचे वंशज व आर्य असें कल्पून आणि दक्षिणेकडचे मराठ्यांना नाग असें कल्पून एकाची स्तूती व दुस-याची निंदा राजवाड्यांनीं केली आहे. वंशवाचक पुरावा देतांना दक्षिणेकडच्या मराठ्यांचें बिराठे ऊर्फ बेरड हें निंदाप्रचुर एक नसतें नांव कल्पून अतिप्रसंग केला आहे. बेरड = बेडर ह्या नांवाची जी एक हीन मानलेली जात कर्नाटकांत आहे तिच्या नांवाची राजवाड्यांनीं केलेली बिराठे ही व्युत्पत्ति म्हणजे एक अक्षम्य चुकी आहे. बेड हें कानडी व तेलुगु जातिवाचक नांव आहे. हिंचे मूळ व्याध हा संस्कृत शब्द आणि त्याचेंहि मूळ बेटे = शिकार हा अस्सल कानडी व तेलुगु शब्द आहे. मराठे ही शिकारी जात आहे; पण तेवढ्यावरून त्यांना बेडरांप्रमाणें कधीं कोणीं हीन मानलें आहे, असें राजवाड्यांशिवाय कोणी म्हणूं शकणार नाहीं. बेड या एकवचनाचें कानडी व्याकरणांत बेडर हें अनेकवचन आहे. कानडींत व तेलुगूंत जातिवाचकच नव्हे तर समाहारवाचक सर्व शब्द अनेकवचनांत असतात. जसे कुरूब = धनगर एकवचन. कुरुबर अनेकवचन = धनगर जात. जोन्ना = जोंधळा एक जोंधळ्याचा कण. जोन्नलु = जोंधळें (तेलुगू). बिराठ = बेडर ही व्युत्पत्ति कशीहि असो. मराठे हे मृगयाप्रिय असले तरी बेडर, हरिणशिकारी, कटबु, शिकलगार ह्याप्रमाणें हीन अशी एक गुन्हेगार जात खास नव्हत.
ह्याचसंबंधीं राजवाड्यांनीं मराठ्यांचा राजकीय व सामाजिक दर्जा ठरवितांना त्यांना गणराज पद्धतीचें (म्हणजे जिला इंग्रजींत Feudal = सरंजामी म्हणतात त्या पद्धतीचे) ठरविलें आहे. हा ठराव मराठ्यांना व कुणब्यांनाहि लागू आहे, हें खरें. उत्तरेकडचे राजपूत आणि युरोपांतले जर्मन-रशियनांतहि ही पद्धत मागें व आतांहि आढळते. ही सरंजामी पद्धत आणि रा. अत्रे ह्यांनीं वर्णिलेली गांवगाड्याची अति पुरातन पद्धत ह्या दोन्ही एकच नव्हत. सरंजाम ही मराठ्यांची लष्करी घटना आहे, आणि गांवगाडा ही कुणब्यांची मुलकी घटना आहे. मराठे हे धंद्यानें राजकारणी असल्यानें त्यांच्या परंपरेंतच नव्हे तर वैयक्तिक स्वभावांतहि अशा अनेक सामाजिक संस्थांचे अवशेष दडी मारून बसलेले संशोधकाला आढळतील.
विवाह — मराठा ओळखण्यांत त्याची पुरातन विवाहपद्धति एक मुख्य साधन आहे. वर म्हटलेंच आहे कीं, मराठा जात आणि धर्म यापेक्षां कुळ अधिक मानणारा आहे. तो वाटेल त्याच्याशीं जेवील, वाटेल त्या देवाला नवस करील, वाटेल त्याचें नांव आपल्या मुलास देईल; पण धंदा करतांना आपली तरवार व नांगर हींच स्मरेल व त्यांची पूजा करील, आणि लग्न करतांना – विशेषतः मुलगी देतांना, ( घेतांना तितकें नाहीं) प्रतिपक्षाच्या कुळाचा पदर शोधीत बसेल. लष्करी जात असल्यानें बहुपत्नीक बहाणा साहजिक वाढत गेला. त्यामुळें कोँणाचीहि मुलगी उचलून आणली तरी चालेल; पण आपल्या पोटचा गोळा दुस-याला देतांना मात्र त्याला कुळीचा पदर शोधावा लागतो. द्राविडी भाषेंत कुळीलाच जातकुला अशी संज्ञा आहे. आर्यवर्णाश्रमधर्म आर्येतरांमध्यें तंतोतंत नसणारच; पण आपल्या कुंळाचा अभिमान सर्व मानवमात्रांमध्यें आहे. मग स्वत:ला राजे म्हणविणा-या मराठ्यांत व कुणब्यांत तो अधिकच असणार. येवढ्यावरून मराठ्यांमध्यें आर्य म्हणविणारे वंश नाहींतच असें म्हणणें नाहीं. परंतु विवाहाच्यां दृष्टीनें पाहूं जातां त्यांच्या खानदानींत अनेक आर्येतरांच्या रूढि अद्यापि प्रमुखपणानें झळकत आहेत त्या खालीं दिल्या आहेत.
देवक : ब्राह्मणांच्या विवाहांत अग्नीचें प्राधान्य आहे. तसें मराठ्यांत किंबहुना राजपुतांतहि नाहीं. संसगामुळें होम, सप्तपदी, कन्यादान, जांवयाची पायपूजा वगैरे ब्राह्मविवाहाच्या रूढी जशा मराठ्यांनीं उचलल्या; तशाच हळदी, देवकार्य, राजभेटी, रासन्हाणी, गडगनेर, रुखवत वगैरे धार्मिक व केवळ सामाजिक रूढि मराठ्यांच्या ब्राह्मणांनींहि उचलल्या. या रीति कांहीं अंशीं हौसेनें व कांहीं अंशीं प्रतिष्ठा वाढविण्यासाठीं एकमेकांपासून उचललेल्या असणें साहजिक आहे. हल्लींचीं क्षुद्र देवकें हीं पूर्वींचीं आद्य उपास्यें. तीं मराठ्यांना लग्नांतच तेवढीं आठवतात. देवकें हीं गोत्राचीं द्योतकें होत. देवक जमलें कीं, गोत्र अथवा कूळ जमलें असें समजून, ब्राह्मणांत जसा सगोत्र विवाह त्याज्य तसाच मराठ्यांत सदेवक विवाह त्याज्य समजतात. देवक जसें मराठ्यांत आहे तसेंच दक्षिणेंतील रड्डीमध्येंच नव्हे, तर इतर आर्येतरांमध्येंहि आहेत. त्याला कानडींत बळि असें नांव आहे. याची व्युत्पित्ति बड्डी = मुळी किंवा बळ्ळी = वेल अशी असावी. कोणत्या तरी झाडाची मुळी अगर वेल हींच पूर्वींचीं विशेष देवकें होतीं. सूर्य, चंद्र, नाग, मच्छ, कच्छ, वराह हीं प्रतिष्ठित चिन्हें राजकीय निशाणांवरून पुढें मराठा वाघ्याच्या पाग्या झाल्यावर त्यांच्यांत झळकूं लागलीं. फार तर काय; कवडी, केरसुणी व फाटकी वहाण हींहि देवकें आहेत; पण कोणी क्षत्रियकुलावतंस असल्या देवकांचें देवकार्य आपल्या राजवाड्यांत आजकाल करील हें संभवत नाहीं. उलट होम, सप्तपदी आणि ऐरणीदान या आर्यपरंपरा अनार्य राजवाड्यांत वेदमंत्र म्हणूनहि जर कोणीं करूं म्हटल्यास, मराठ्यांच्याच काय; पण इतरांच्या मिश्रविवाहांतहि पौरोहित्य करण्यास प्रत्यक्ष शंकराचार्य म्हणविणारे आजकाल प्रसिद्धपणें पुढें येत आहेत ! येथें प्रश्न वंशाचा नसून दक्षिणेचा असतो हें उघड आहे.
एंथोव्हन आपल्या Tribes of Bombay Presidency या पुस्तकांत ऐशीं देवकें आणि ब्यायशीं बळींचा उल्लेख करून म्हणतो कीं, “या सर्वांचीं इंग्रजी नांवें देणें शक्य नाहीं. तीं सर्व कर्नाटक व म्हैसूर प्रांतांतील झाडें व वेली आहेत.” मग या देवकांचें देवकार्य करणारे मराठे व रड्डी यांनीं या वेली उत्तरेकडून येतांना बरोबर आणून त्यांची कर्नाटकांत लागवड केली कीं हें सर्व मूळ कर्नाटकांतलेच वंश? हें कोडें मराठे हे शक आणि कुणबी हे द्रावीड असें मानल्याशिवाय सुटण्याचा संभव दिसत नाहीं. खालील पदार्थ देवकांत आहेत व बळींतहि आहेत. या एकाच माळेंत प्राणी, वनस्पति व निर्जीव पदार्थांचीहि गणना झालेली आहे.

Read more: समाजशास्त्रीय विचार

सगाईन

निरीक्षण पहिलें : सोमवार ता. १४ मार्च १९२७ चौथे प्रहरीं ४ वाजतां सनाईन शहरांतून सगाईन टेकडीकडे जाण्यासाठीं आम्ही उमाँगाँचे मोटारींतून निघालों. ऐरावती नदीचे कांठीं मंडालेपासून ८-१० मैलांवर हें शहर आहे. माझेबरोबर रा. भिडे व वृद्ध ब्रह्मी पेन्शनर गृहस्थ उ पो विन हे तुबायाझा ह्या लोकांची वस्ती दाखविण्यासाठीं होते. ह्या शहराच्या स्मशानाजवळ आम्ही मोटारींतून उतरलो. तेथें सुमारें २०-२५ तुबायाझा लोकांची लहान वस्ती होती. हे लोक स्मशानांतील थडगीं खणण्याचा धंदा व इतर मार्तिकासंबंधीं कामें करितात. हे लोक आपणांस फयाचून लोकांपेक्षां श्रेष्ठ समजतात, कारण फयाचून हे देवळी, साधारण गुलाम. पण तुबायाझा हे राजवंशांतील आहेत, कारण याझा हें यांच्या नांवांतील शेवटलें पद राजा या शब्दाचा अपभ्रंश आहे. तुबा हें शुभ याचा अपभ्रंश आहे. पूर्वीं हा शब्द अशुभ असा होता, त्यांतील अ जाऊन शुभ तुबा हा अपभ्रंश उरला. याविषयीं खालील दंतकथा पुष्कळ ठिकाणीं मीं ऐकली : एक ब्रह्मी राजा होता. त्याची गर्भवती राणी वारली असें समजून स्मशानांत पाठविण्यांत आली. पण थडग्यांत पुरण्यापूर्वीं ती जिवंत झाली. राजानें तिला परत न नेतां थडगें खणणा-या चंडाल लोकांना तिला दिलें, व तिचे मुलास चंडालांचा राजा केला. मार्तिकविधींत फोंजी भिक्षूला जितकी दक्षिणा मिळेल तितकीच ह्या राजवंशालाहि पुढें मिळावी असा नियम घालून दिला. तेव्हांपासून हे नांव प्रचारांत आलें. ह्या राजवंशानें भिक्षेशिवाय दुसरा कोणताच धंदा करतां कामा नये ह्यामुळें ह्यांना केबा (मला मदत करा) हें नांवहि पडलें. वस्ती एकंदरींत स्वच्छ व नीटनेटकी दिसली. तरुण मुलींना लिहितां वाचतां येत होतें. वस्तीच्या मध्यावरील झोंपडी चांगली बंगलीवजा होती. ती म्युनिसिपालिटीनें बांधिली आहे. येथील म्युनिसिपालिट्या हिंदुस्थानांतल्यापेक्षां चांगल्या किंवा ह्या विवक्षित म्यु. टीचे अध्यक्ष हेच उदारात्मे आहेत याचा निर्णय करण्यास मला सुचलें नाहीं. या लोकांनीं वस्तींत आपलें स्वतःचें चांगलें देवस्थान उभारलें होतें. त्यांत म. गौतम बुद्धाच्या व नाटांच्या (भूत, यक्षांच्या) पुष्कळ मूर्ति होत्या. फोंजी (बौद्ध भिक्षू) ह्यांच्याकडे जेवणाला, भिक्षेला व धार्मिक कृत्याला येत आहेत. तरी यांच्यांत विशेष महत्त्वाकांक्षा दिसली नाहीं. एकंदर स्थिति मागासलेली व करुणास्पद दिसली. माझे बरोबरीचे उ पो विन हे वृद्ध व श्रीमंत गृहस्थ असूनहि ह्या लोकांबरोबर उघडपणें बसून जेवण्यासहि आपण तयार आहों असें म्हणालेय. ह्या लोकांना मीं विचारलें कीं, तुम्ही इतरांप्रमाणें सुशिक्षण मिळवून मोठीं हुद्द्याचीं कामें कराल काय ? तेव्हां ह्या प्रश्नाचा अर्थच त्यांना कळला नाहीं. कारण हें कसें कळेल ? हें अशक्य कोटींतलें त्यांना वाटलें. एकंदर स्थिति अज्ञानाची, आत्मविश्वासाच्या अभावाची व अल्पसंतुष्टतेची दिसली. पुष्कळ अंशीं हिंदुस्थानांतहि हल्लीं हाच प्रकार आहे !
निरीक्षण दुसरें : ऐरावती मेंढाई नदीकिना-यावरील अमरपुरा शहराजवळ केबाचा गांव ता. १८ मार्च १९२७ रोजीं शुक्रवारीं सकाळीं पाहिला. इरावती किना-यापासून पूर्वेकडे एक मैलाच्या आंत मेंढाई नांवाचा सुमारें २५० लोकवस्तीचा एक गांव आहे, त्याला लागून २-२ फर्लांगावर केबांची लहान वस्ती आहे. ह्या वस्तींत सुमारें ५-७ झोपड्या व त्यांत सुमारें २०-२५ बायका व पुरुष पाहिले. सर्व कोष्ट्याचा धंदा करितात. गुजराथेंत व नागपुराकडे धेड लोक नुसती खादी विणतात पण हे केबा उत्तम रेशमी कापडहि विणतात. खाऊन पिऊन स्वतंत्र आहेत. ते केबा हें आपलें नांव सांगत नाहींत म्हणून माझ्या दुभाष्याला त्यांच्या स्वतःविषयीं जातीवाचक माहिती विचारण्याचें धैर्यच होईना. तथापि ते केबाच होते ह्याची त्याला खात्री होती. पुढें आम्हीं मेंढाई गांवांत जाऊन चौकशी केली. मेंढाईचे लोकहि विणकराचा धंदा करीत होते. त्यांतील एका प्रमुख विणकराच्या घरीं गेलों. तो ब्रह्मी राष्ट्रीय शाळेंत थोड्याच दिवसांपूर्वीं शिक्षक होता. हा मनुष्य उ. उत्तमाच्या राष्ट्रीय पंथाचा आहे. त्यानें सांगितलें कीं जवळच्या केबांशीं मेंढाई लोक संबंध ठेवीत नाहींत. तरी त्यांच्यांत व मेंढाईचे लोकांत कांहीं फरक नाहीं. रोटीबेटी किंवा भेटीव्यवहार होत नाहींत याचा अर्थ ते अस्पृश्य आहेत असें मुळींच नव्हे. ब्रह्मदेशांत, अस्पृश्यता अशी पूर्वींहि नव्हती, आतां मुळींच नाहीं. तरी पण ह्या बहिष्कृत लोकांना कोणी लग्नमुंजीत किंवा अशा सामाजिक प्रसंगीं भेटीव्यवहाराचें आमंत्रण करणार नाहीं. पूर्वीं त्यांना गांवांत येण्याचीहि मनाई होती. भिक्षेपुरतें यावें पुनः बाहेर जावें; पण यांची स्थिति इतकी सुधारली आहे किंवा मनु पालटला आहे कीं, त्यांना कोणीहि उघड आमंत्रण करीत नसलें तरी त्यांना दूर सर म्हणण्याची छाती कोणाचीहि नाहीं. फौंजीच्या शाळेंत त्यांचीं मुलें जाऊं शकत. पण सरकारी शाळेंत कोठें कोठें जाऊं शकणार नाहींत. त्यांच्याकडे फौंजी भिक्षेलाहि येत नसत, पण आतां येतांना मींच पाहिलें. फार तर काय ग्रामबाध्यता आतां पुष्कळ ठिकाणीं नष्ट होत चालली आहे. धंद्यामुळें त्यांना पूर्वींच्या रिवाजाला चिकटून राहावें लागतें. स्थान व धंदा बदलला तर कोणी त्यांचे मूळ विचारीत नाहीं. ते साधारण समाजांत मिसळून जातात. हिंदुस्थानच्या व ब्रह्मदेशाच्या बहिष्कारांत हा विशेष फरक आहे कीं, हिंदुस्थानांत ह्याला धार्मिक स्वरूप आलें असून ह्याला केवळ लौकिक व सामाजिक रूप आहे. हिंदूंतील ब्राह्मणादि वरिष्ठ वर्ग बहिष्कार कडकडून पाळतात. पण ब्रह्मदेशांत फौंजी ह्यांची भिक्षा आतां सर्रास उघडपणें घेतात व त्यांना आपल्या शाळांतून शिकवितात. मात्र त्यांना पूर्वीं फौंजीची दीक्षा मिळण्यास अडचण पडे. कारण ती दीक्षा देण्यापूर्वी तो मनुष्य स्वतंत्र पुरुष असावयास पाहिजे, दास स्थितींत असून चालावयाचें नाहीं, असा नियम आहे. आतां हे लोक फौंजी होऊं शकतात. ह्यानंतर मिढाई येथील नाटाचें देऊळ पाहिलें. बौद्ध धर्मापूर्वीं ब्रह्मदेशांत नाट ऊर्फ नास ऊर्फ भूतपूजा चालत असे. खालील व पुष्कळशा वरील वर्गांतहि अद्यापि चालू आहे. ही नाथाचीं देवळें मी पुष्कळ ठिकाणीं पाहिलीं. ह्या देवळांत दोन मूर्ति आसनावर व एक घोड्यावर बसलेल्या पाहिल्या. हे पूर्वीं मुसलमान बंधु होते. किना-यावर यांची नाव बुडाली तेव्हां ते ब्रह्मी राजाच्या आश्रयाला राहिले. ते मेल्यावर त्यांचीं हीं क्षुद्र देवळें झालीं. मुसलमानांशिवाय सर्व लोक त्यांना भजतात. वार्षिक यात्रा होते तेव्हां ह्या गांवासाठीं रेल्वेचें स्वतंत्र स्टेशन करावें लागतें. ह्या (मुसलमान) नाथांचीं नांवें चेफिनी, श्वफिगले अशीं आहेत. नाट शब्दाचा अर्थ भूतपिशाच्च असा आहे. कोणी प्रसिद्ध पुरुष अपघातानें मेला तर त्याचें देऊळ होतें व त्याला नाट म्हणतात.
निरीक्षण तिसरें : २६ मार्च रोजीं शनिवारीं सकाळीं ९ वाजतां पगानचे दक्षिणेकडे एक मैलावर नदीकांठीं टाँववा नांवाचें तुबायाझांचें एक स्वतंत्र खेडें आहे. तें पगानच्या स्मशानालगतच आहे. मी प्रिन्सिपाल उसैन (लॅकरस्कूलचे) यांच्यासह तेथें गेलों. गांवांत सुमारें ७० घरें व लोकसंख्या आहे. ही तपासणी आम्हीं तीन तासांवर बारकाईनें केली. गांव नदीकांठावर असल्यामुळें पाण्याची व पायखान्याची सोय नैसर्गिक आहे. म्यु. शहरांतच विशेष सोय नाहीं मग ह्यांना कोठून मिळणार? स्वतंत्र शाळा नाहीं, पण फौंजीच्या शाळांत सर्वांबरोबर शिकण्यास हरकत नाहीं. तेथें मुलामुलींचा भेद नाहीं, पण फौंजी मठांत मुलींना शिकतां येत नाहीं. येथें भिक्षुणींचा मठ नसल्यानें मुलीं घरीं शिकतात. २|४ बायकांना लिहितां वाचतां येतें. ब्रिटिश राज्य होईपर्यंत ह्यांच्यावर कसलाहि कर नव्हता. कारण हे बहिष्कृतच होते. आतां कर आहेत, पण त्यांचा उपयोग मात्र त्यांच्या उन्नतीकडे होत नाहीं. हाच प्रकार हिंदुस्थानांत आहे. ब्रिटिश राज्याचा ‘घेऊं जाणें, परि देऊं ना जाणें’ हा भोळेपणा सर्वत्र प्रसिद्धच आहे ! माझ्या समक्ष फौंजींना भिक्षा शिजलेल्या भाताचीच मिळाली. थडगें खणणें, टेप विणणें, वैद्यकी करणें, शिवाय सर्वमान्य भिक्षा मागणें इ. यांचीं हक्काचीं कामें आहेत. कित्येक घरांचीं दारें लागलेलीं होतीं; कारण पुरुष, बायका, मुलें भिक्षेस गेलीं होतीं. भिक्षेचे तांदूळ स्वस्त दरानें विकून रोख पैसा करितात. मग त्यांनीं इतर काबाडकष्ट कां करावेत? राहणी आमच्याकडील चांभारापेक्षां पुष्कळ बरी दिसली; तरी गांवांत घाणेरडेपणा, बागबगीचे, टापटीप यांची मिसळ दिसली. सर्वसाधारण ब्रह्मदेशांत घराभोंवतीं पुष्कळ जागा असतेच, त्यांत कुंड्यांतून गुफा लावून, फुलझाडें आणि भाजीपाला करण्याची चाल चहूंकडे आहे. ब्रह्मी लोक (बहिष्कृतांसह) फुलामाळांचे मोठे शोकी; ह्या महारवाड्यांतील कांहीं स्वच्छ आंगणें व फुलावेलींचे मंडप मला हिंदुस्थानांतील खेड्यांतील ब्राह्मणांच्या परसांत आढळतील कीं नाहीं, याची शंकाच आहे ! तरी ह्या खेड्यांत मला कुजलेल्या माशांची दुर्गंधी येत होती. अशा खेड्यांतून डुकरें कोठेंच दिसलीं नाहींत, पण गांवगुंड कुत्रीं मात्र ब्रह्मदेशांत वतनदारांप्रमाणें वावरत आहेत. जेथें जावें तेथें त्यांचें स्वागत आहेच ! नंतर आम्ही खालील ७ घरें बारकाईनें पाहिलीं :-
१ लें घर – वृद्ध मालकीण बैलासाठीं सुती काढण्या वळीत बसली होती. इतरांप्रमाणें सर्व घर ६ फूट उंच खांबावर बांधिलें होतें, तें सर्व लांकूड व बांबूचें होतें. पक्ष्याच्या घरट्याप्रमाणें हवेचा तोटा नव्हता. पुढें पडवी, बाजूस सैंपाकाची खोली, नंतर माजघर, त्याचे बाजूस निजावयाची खोली अशी प्रशस्त सोय होती. प्रत्येक खोली अदमासें १२- १० फूट लांबरुंद होती. स्वयंपाकाचीं भांडीं मातीचीं, माजघरांत एक मोठा आरसा, भिंतीस पूर्वेकडच्या बाजूस बुद्धाचें चित्र, निजावयाच्या खोलींत मच्छरदाणी असें सामान होतें. भिंती व जमीन बांबूच्या कुडाच्याच होत्या. आई, मुलगा, सून अशीं तीन माणसें. पैकीं मुलगा व सून भीक मागावयास गेलीं होतीं ! हें मध्यम प्रकारचें घर म्हणावयाचें.
२ रें घर – मालक तरुण व धडधाकट होता. धंदा भीक मागण्याचा.
३ रें घर – मालकाचें वय ७३ वर्षें, त्याच्या बायकोचें वय ७७ वर्षें. त्याचा पहिला मुलगा वय ५५, बायको व तीन मुलें. दुसरा वय ४७, बायको व तीन मुलें. तिसरा वय ४०, बायको व दोन मुलें; अशा एकंदर सोळा माणसांचें हें कुटुंब होतें. म्हाता-याचा धंदा वैद्यकीचा, शिवाय भिक्षा ही आहेच. मधला मुलगा दुसरीकडे आपल्या बायकोच्या घरीं राहात होता. नवराबायकोशिवाय सर्व माणसें भिक्षेला गेलीं होतीं. कारण सकाळची भिक्षेची वेळ. चमत्कार हा कीं, स्वतः भिक्षा मागणा-या बहिष्कृतांच्या घरीं सर्वांस पूज्य व श्रेष्ठ मानिलेला फोंजीवर्ग सकाळीं भिक्षा मागायला येत होता. घराला स्वच्छ व प्रशस्त आंगण होतें. उजव्या बाजूस चांगला लतामंडप व व भोंवतालीं कुंड्यांतून फुलझाडें होतीं. मंडपांत एक लाकडी मंचक होता. बसावयाचीहि आरामवाटिका होती. डाव्या बाजूस स्वतंत्र स्वयंपाकाची जागा होती. हें पहिल्या प्रकारचें घर म्हणावयाचें.
४ थें घर – मालकाचें वय ५२. धंदा वैद्यकीचा, भिक्षा मागत नाहीं. घर दोन मजली व मजबूत लाकडी होतें. बायकोचें वय ४२. चार मुलें. कोणासहि लिहितां वाचतां येत नव्हतें.
५ वें घर – मुख्य मालकीण नवार विणीत बसली होती. नवराबायको, मुलें राहावयास एकच खोली. हें कनिष्ठ प्रकारचें घर.
६ वें घर – मालक तरुण ताजातवाना. धंदा वैद्यकीचा. बायको व तीन सुंदर मुलें. भिक्षा मागत नाहीं.
७ वें घर – हें सर्व खेड्यांत सुंदर होय. सागवानी लाकडाचें खालवर बांधिलेलें, वॉरनीश केलेलें अगदीं पेटीसारखें ! पण नवरा-बायकोंचा धंदा केवळ भिक्षेचा ! भिक्षेला गेल्यामुळें घर बंद होतें. प्रशस्त आंगणहि होतें. एक देवालय होतें, तें गांवक-यांनीं स्वतःच्या खर्चानें बांधिलेलें. पुढें सभामंडप होता. गाभा-यांत उच्च कट्ट्यावर १० लहानमोठ्या बुद्धाच्या मूर्ति होत्या, त्या सर्व सोनेरी वर्खानें मढविलेल्या होत्या, शिवाय दोन मूर्ति संगमरवरी दगडाच्या व सुंदर होत्या. चातुर्मास्यानंतर (नवंबरच्या सुमारास) वार्षिक महोत्सव होतो. त्या वेळीं मागान गांवांतील सर्व लोक देवास नैवेद्य आणितात. त्यांत मांस, मासे वगैरे सर्व प्रकार असतात; पण देवळापुढें बळी मारला जात नाहीं. गांवांत कॉलरा, देवी वगैरे आजार झाल्यास ह्यांतील एका मूर्तीचा छबिना शांतिप्रीत्यर्थ गांवांतून मिरविण्यांत येतो. येणेंप्रमाणें “मरीआईचें काम बुद्धाला” आणि महारमांगाचे अधिकार ह्यांना आहेत. हा सर्व हिंदू संस्कृतीचा परिणाम. फौंजी येऊन ह्या लोकांच्या मुलांचा उपनयन विधि ह्या सभामंडपांत करितात. हीं मुलें फौंजी चाँ शाळेमध्यें इतरांबरोबर समान दर्जानें राहतात. फौंजीच्या मठांत भेदभाव नाहीं. ह्या लोकांतील भिक्षुणी इतर भिक्षुणींच्या, संघांत राहूं शकतात, अशी एक भिक्षुणी आतां आहे.
प्रिन्सिपॉल सैन यांनीं दुभाष्याचें काम उत्तम कौशल्यानें व धोरणानें केलें म्हणून ह्या लोकांचा विश्वास आम्हांवर बसला. त्यांनीं आपला खरा वृत्तांत सांगितला. एरव्हीं उडवाउडवीच केली असली. आम्ही जाऊं तेथें स्त्रीपुरुषांचा घोळका जमत असे. नागडीं, उघडीं, शेंबडीं मुलें कांखेंत व जात्याच्या खुंट्याएवढा मोठा चिरूट तोंडांत धरून धुराचे लोट हवेंत सोडीत बायका भोंवतालीं जमत असत. प्रथम ज्यांनीं भुंकून हैराण केलें तींच कुत्रीं तपासणी चालली असतां पायाशीं स्वस्थ निजून राहात. जणूं काय, भुंकणारे वेगळेच होते.
शेवटीं मीं सभामंडपांत मंडळीस बसावयास सांगून ब्राह्मण समाज आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन ह्यावर सुमारें १५ मिनिटें व्याख्यान दिलें. तें प्रि. सैन यांनीं ब्रह्मी भाषेंत समजावून सांगितलें. मंडळींना तें आवडलें. असेंच मिशन ब्रह्मदेशांत काढावें, अशी त्यांनीं कळकळीची इच्छा दाखविली. प्रि. सैन ‘आपण ह्या कामीं मदत करूं’ म्हणाले. वेळवाच्या टोपल्यांवर लाख मढवून सुंदर भांडीं करण्याच्या सरकारी शाळेचे ते प्रिन्सिपॉल आहेत, पण त्या शाळेंत ह्यांच्या मुलांना घेण्यास मात्र ते तयार नव्हते. कारण यांची शाळा निघून तीन वर्षें झालीं, तरी ती अद्यापि प्रयोगाचे अवस्थेंत आहे. यांचीं मुलें आल्यास वरिष्ठ वर्गांचीं मुलें शाळा सोडतील ! ही त्यांना अद्यापि भीति आहे. ही सर्व तपासणी व आमचें मिशन प्रि. सैनच्या पत्नीला फार आवडलें. दोन प्रहरीं पत्ते खेळतांना तिनें जो पैसा जिंकला होता तो सर्व ह्या कामासाठीं घ्या, असें म्हणाली !

  1. संस्थापक कोण ?
  2. संस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ
  3. संप्रदाय
  4. संघटना
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56
  • 57
  • 58
Page 54 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी