1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

संस्थापक कोण ?

महाराष्ट्र भागवत धर्माचा खरा संस्थापक कोण ? ह्या प्रश्नाचा निर्णय करण्याइतके निश्चित पुरावे हल्लीं उपलब्ध नाहींत. नामदेवानें किंवा ज्ञानदेवानें, किंवा दोघांनीं मिळूनच हें कार्य केलें असावें. पुराव्याच्या अभावीं शेवटचेंच अनुमान तूर्त आम्हांला स्वीकारावें लागतें. “ज्ञानदेवें घातला पाया तुका झाला कळस”  ही भाविक उक्ति वारक-यांमध्यें प्रसिद्ध आहे. तरी पण महीपतिबाबांनीं आपल्या भक्तिविजय ग्रंथात १० व्या अध्यायांत, हा पाया कोणीं घातला, याविषयीं चांगला खुलासा केला आहे. ज्ञानदेव हे तीर्थयात्रेस निघण्यापूर्वीं पंढरपुरास येऊन देवाजवळ नामदेवास आपल्याबरोबर पाठविण्यास विनवीत आहेत. पण नामदेवाला आपल्याजवळून दूर पाठविण्यास देव नाखुष आहेत. अर्थात् देवाला ज्ञानदेवापेक्षां नामदेव अधिक प्रिय दिसतात. चुकविण्यासाठीं देव ज्ञानदेवाला विचारतात कीं, त्यांच्यासारख्या ज्ञान्याला तीर्थयात्रेची काय जरुरी ? देव विचारतात :- “तेवी ज्ञानदेवा तुजकारणें । कासया पाहिजे तीर्थाटन । वायां विचार करूनिया मनें । व्यर्थ कासया हिंडशी ।। येरू (ज्ञानदेव) म्हणे जी सत्यसत्य । तुम्ही सांगतां यथार्थ । परी नामया ऐसा प्रेमळ भक्त । घडवी संगत मज याची ।।३९।। याचे संगतीचें घेऊन सुख । देहाचें करावें सार्थक । ऐसें म्हणोनि चरणीं मस्तक । ठेविला देख निजप्रीति ।।४०।।” एकूण संस्थापनेची कल्पना जरी ज्ञानदेवांनीं काढली हें खरें धरिलें तरी नामदेवाशिवाय ख-या घटनेचें कार्य ज्ञानदेवाकडून होणें दुरापास्त होतें. ज्ञानदेव पंडीत होता, भक्त नव्हता. शिवाय संन्याशाचा मुलगा असल्यानें ब्राह्मणांवरहि त्याचें वजन नव्हतें, तर बहुजनसमाजावर कोठलें येईल ? ज्ञानेश्वरी जरी गीतेवर टीका होती तरी मूळ संस्कृतापेक्षांहि ही मराठी अधिकच दुर्बोध झाली होती. पुढें तिचा एकनाथानें जीर्णोद्धार करीतोंपर्यत ती अप्रसिद्धच होती. शिवाय ती टीका अद्वैतपर होती; म्हणून व्यासाला ज्याप्रमाणें वेद आणि पुराणें संपादन करून जडत्व आल्यामुळें भागवत लिहूनच भक्तिमार्गानें आपले मनाची शांति करावी लागली, तद्वतच ज्ञानदेवालाहि नामदेवाच्या भक्तिमार्गानेंच आपल्या
‘ देहाचें सार्थक’ शोधावें लागलें, असें महीपति म्हणतो. नामदेव हा भक्त आणि कीर्तनकारहि होता. त्याला मराठी, हिंदी आणि कांहिंसें कानडीहि येत होतें. पण पंडीत नव्हता, तरी ज्ञानदेवापेक्षां कर्ता पुरुष होता.  कारण पूर्वाश्रमीं तो प्रसिद्ध आणि यशस्वी लुटारू होता, असा एका अभंगरूपानें, त्याचाच कबुलीजबाब आहे. त्या वेळच्या राजानें ( रामदेवराव यादव ) त्याच्यावर पाठविलेल्या ८४ स्वारांची त्यानें कत्तल केली होती, हें त्याचेंच म्हणणें खरें असेल तर तो पूर्वाश्रमीं एक यशस्वी पुंड पाळेगार होता. ज्ञानदेव आणि नामदेव हे दोघेहि धर्मानें गोरखनाथपंथी शैव होते. पण महाराष्ट्रांत शैव-वैष्णवांचा कधींहि फारसा विरोध नव्हता. भागवत धर्माची घटना ह्या दोघांना जाणूनबुजून करावयाची होती, म्हणून त्यांनीं पंढरीचा वारकरीपंथ स्थापन केला असावा; आणि ह्या कामीं कदाचित् त्यांना देवगिरीच्या राजसत्तेचा आश्रय असावा, अशी जबर शंका येते. कारण ज्ञानदेव आणि नामदेव ह्यांनी ह्या नवीन पंथाच्या घटनेसाठीं हिंदुस्थानभर जी यात्रा केली त्या सुप्रसिद्ध यात्रेंत परसा भागवत, चोखामेळा, सांवता माळी आणि विसोबा खेचर वगैरे संत पुरुष होते (भावेकृत महाराष्ट्र सारस्वत, पान १६४). ही यात्रा प्रथम काशीला न जातां दिल्ली येथील बादशहाकडे जाते, तेथें त्यांचा छळ होतो, नंतर पंजाबमध्यें प्रचार करून भावी शीख धर्माच्या उदयाला ही यात्रा कारण होते; मग पुढें काशीला जाते आणि बराच पल्ला मारून पुढें ओढिया नागनाथाच्या शैव देवळांत बळेंच वैष्णव धर्माचें संकीर्तन करिते; वगैरे ह्या दोघांची कांहीं गूढ कारवाई त्या वेळच्या संदिग्ध काळांतून अस्पष्ट दिसून येत आहे. ह्या कारवाईचा उलगडा वरील कोणत्या तरी राजाच्या आश्रयाशिवाय होणें सोपें नाहीं. ही यात्रा परत आल्यावर पंढरीच्या देवाला आनंद होतो, आणि त्या आनंदाच्या भरांत देव, नामदेव शिंपी आणि बहिष्कृत ज्ञानदेव आणि वरील यात्रेंत सामील झालेल्या इतर हीन जातींच्या भक्तांबरोबर एकाच पंक्तीस जेवून स्वतःची आणि पंढरीच्या ब्रह्मवृंदाची जात बाटवितो. ह्या ‘भ्रष्टाकाराचें’ इंगित काय ?  पंढरीचें ठाणें पूर्वीं बौद्ध धर्माचें आणि नंतर शैव धर्माचें होतें. पांडुरंग हें नांव विष्णूचें नसून पूर्वीं शिवाचें होतें. अजून पंढरीस एक जुनें शिवालय आहे. प्रथम त्यांतील महादेवाचें दर्शन घेऊनच मग विठोबाच्या दर्शनाला जाण्याचा वारक-यांचा परिपाठ आहे (सर डॉ. भांडारकर V.& S. पान ८८). हा जो वारकरी पंथाचा दिग्विजय नामदेवाच्या प्रभावानें करण्यांत आला तो महाराष्ट्रांतील शैव धर्मावर किंवा बौद्ध धर्मावर ?  राष्ट्रकूट घराणें कांहीं काळ बौद्ध आणि नंतर शैव होतें; आणि चालुक्यांचा विशेष कल शैव धर्माकडे आणि केव्हां केव्हां वैष्णवांकडेहि होता. आतां पंढरीस ठाणें दिलेल्या श्रीनामदेवाच्या आश्रयाखालीं आणि देवगिरीच्या यादवांच्या आश्रयाखालीं हा वैष्णवांचा उठाव करण्यांत आला असावा.

संस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ

पहिल्या अधिवेशनाचें महत्त्व
ब-याच कारणांमुळें ह्या पहिल्या अधिवेशनाचें महत्त्व किती ध्यानांत घेण्यासारखें आहे, हें भावी इतिहासकार ठरवितील. पण तुमच्याहि ध्यानांत हें महत्त्व भरावें म्हणून अशा घाईंतहि खालील परिस्थितीजनक कांहीं कारणांचा थोडक्यांत विचार करतों.
शेतक-याची हीन स्थिति
साधारणपणें पाहतांना जगांत कोठेंहि गेलें तरी शेतकरी, म्हणजे प्रत्यक्ष शेतांत पोटासाठीं रात्रंदिन खपणारा रयत, हा अनादिकालापासून कंगालच दिसून येत आहे. ह्याचीं उघड कारणें म्हणजे त्याचा साधेपणा, भोळेपणा व अडाणीपणा हींच होत. ह्या व्यक्तिगत कारणांत, संघटनेचा अभाव ह्या सामुदायिक कारणाचा अलीकडच्या सुधारलेल्या ऊर्फ यांत्रिक युगांत भर पडल्यामुळें शेतकरी हा एक कायमच्या गुलामांचा वर्ग बनला आहे. पिढ्यानुपिढ्या तो सावलींत राहणा-या भांडवलवाल्यांकडे कसा गहाण पडला आहे हें स्पष्ट असूनहि, भांडवलवाल्याला मात्र तें कबूल नाहीं, आणि स्वतः शेतक-यालाहि स्वतःची गुलामगिरी जाणवत नाहीं, हें मोठें दुर्भाग्य !  अशा ह्या पिढीजाद दुर्गतीमुळें शेतक-याची दानतहि बिघडत चालली आहे. त्याच्यांतला रामराज्यांतला साधेपणा व सरळपणा टिकणें अशक्य होत आहे. मग त्याचीं पावलें वांकडीं पडूं लागल्यामुळें तीं अधिक  खोलांतच शिरतात; आणि त्याच्या मानगुटीवर अढळपद धारण करून बसलेल्या भांडवलशाहीला तर हीच स्थिति पाहिजे असते. ह्यांतच पुढें शेतक-यांच्या व्यसनांची, कायदेकोर्टांतल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अन्यायांची, वकिलांच्या कपटनीतींची वगैरें अनेक कारणांची भर पडून शेतकरी हल्लीं सुधारलेल्या नरकयातना भोगीत आहे ह्यांत काय आश्चर्य !
संस्थानी कारभाराची अवनति
इतर ठिकाणच्या शेतक-यांची ही शोचनीय स्थिती, तर हिंदुस्थानांतल्या आमच्या स्वतःला स्वतंत्र समजणा-या संस्थानांतील शेतक-याकडे पाहिलें तर गहिंवर आल्यावांचून राहात नाहीं. राजा परका असला तर त्याचा जुलूम परकेपणाच्या सबबीवर तरी एक वेळ सहन होईल. पण राजा आणि त्याची प्रभावळ स्वतःच्या धर्माची, जातीची, हितसंबंधांची – फार काय तर हाडामांसाच्या सोयेरसुतकाच्याहि संबंधाची असून, जेथें जुलूम परकियांपेक्षां जास्त होतो, तेथें बोलणा-यांनीं बोलावें काय आणि ऐकणा-यानें ऐकावें काय ! सगळीं संस्थानें आणि तेथील सगळेच लहानथोर अधिकारी सारखेच नतद्रष्ट आणि निर्ढावलेले असतात, असें कोण म्हणेल ? पण ह्या बाबतींत अपवाद किती नियम किती हें पाहिल्यावर ज्या मानवाची छाती फाटत नाहीं तो एक पशु किंवा मुक्तच असला पाहिजे. असो, नुसते संस्थानिकांवरच उठल्या बसल्या तोंडसुख घेणें साहजिक असलें तरी, योग्य होणार नाहीं. पुष्कळ वेळां आमचे वरून आढ्य दिसणारे संस्थानिक आपल्या बड्या बड्या अधिका-यासह निराळ्याच एका अदृश्य सासुरवासांत गुरफटलेले असतात. तरी पण संस्थानिक माहेरीं असला काय, सासरीं असला काय त्याचें सुखदुःख गरीब शेतक-याला समजत नाहीं. त्यामुळें तो आपल्या धन्याला नांवें ठेवण्यापेक्षां दैवालाच नांवें ठेवीत, पशूप्रमाणें संतुष्ट स्थितींत राहतो. पण असला विषारी संतोष परिणामीं हितकर ठरेल काय ?

संप्रदाय

(२४) संप्रदाय, लकब (Idiom) विषयीं मला विशेष सांगतां येत नाहीं. कारण कोंकणीचा व माझा प्रत्यक्ष परिचय अल्प, आणि तोहि केवळ व्याकरणावरून मिळविलेला आहे. ह्या भागाचें विवरण ज्यांना दोन्ही भाषांचा बाळपणापासून निकट परिचय आहे त्यांनाच नीट करतां येईल. दालगादो हयांनीं कोंकणी भाषेंतील म्हणींचा जो अपूर्व संग्रह केला आहे, त्यांतील कांहीं थोड्या म्हणी व त्यांचे अर्थ खालीं देऊन हें लांबलेलें पुराण आटपतों. त्यावरून कोंकणी ही कशी जोरदार आणि मार्मिक बोली आहे ह्याची थोडीशी कल्पना वाचकांस होईल.
१. बासांऊचें थोडें दिवचें चड, हें जब्बर गोड = बोलावें थोडें आणि द्यावें फार, हें बरें.
२. लोखंड उदक प्याल्यार आतां कधींच मिळ न = तापलेल्या लोखंडानें उदक शोषण केल्यावर, मगरीनें गिळलेल्या मण्याप्रमाणें तें पुनः मिळण्याची आशा नको.
३. वाटेची हर्याळी जगइना आणि मरइना = वाटेवरचें गवत जीर्ण होत नाहीं कीं मरतहि नाहीं - नम्र माणसें फार वेळ टिकतात.
४. गांवांतलो चोर व्हय, परगांवांतलो साव नय = स्वदेशी चोर बरा, पण परकीय साधु नको !
५. दुवेक मारून सुनेक बेंकडाउंक = लेकी बोले सुने लागे.
६. आडली सून काढले घरचे गुण = सुनेवरून माहेरची पारख.
७. मोनेक स्वपन पडल्या सांगूं नो कळो = मुक्याला स्वप्न पडल्यास तो तें कसें सांगूं शकणार !
८. ते फिरंगे गेले आणि ते उंडे काबार झाले =मोठे लोक उठले कीं, मेजवानीहि आटपतेच. लहानांनीं अर्धपोटींच हात धुतले पाहिजेत !
९. नेसली दांट विसरली वाट = भपकेदार लुगडें नेसलेली बया, त्या भरांत आपली वाट विसरून भलतीकडेच चालली !
१०. उडालो कोलो झाडळी शेपटी = खाणें संपल्याबरोबर कोल्हा आपली शेपटी झाडून पसार होतो !
असो. तज्ज्ञांनीं मराठीच्या भोंवतालच्या द्राविड भाषांचें अधिक अध्ययन करून तौलनिक भाषाविषयावर अधिक अधिकारयुक्त प्रकाश पाडावा, म्हणजे शेवटल्या म्हणींतल प्रकार न घडून लेखकाचें समाधान होईल.

संघटना

शेवटचें आणि खरें काम शेतक-यांची संघटना करणें हेंच आहे. ह्या घटनेचे सभासद केवळ शेतकरीच पाहिजेत. पण त्यांच्यांत हिंदु-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य किंबहुना संस्थानिक-खालसांतले हे व इतर आगंतुक भेद असावयाचेच. ह्या भेदांमुळेंच जर लंडन येथें गेलेल्या शेंकडों शहाण्यांच्या वाटोळ्या परिषदेची इतकी शोभा झाली, तर आमच्या कार्यांत तींच विघ्नें येणार नाहींत कशावरून ? येथेंच तुमची शेतक-यांना फार जरूरी भासणार. शिवाय द्रव्याची मदत तुम्हांकडूनच पाहिजे. शेतक-यांजवळ द्रव्य कोठून येणार ? तें तर सर्व तुम्हांजवळ येऊन चुकलें आहे. फूल नाहीं फूलाची पाकळी, तरी परत करून पडलेल्या शेतक-याला पुनः त्याच्या पायावर उभा करा. बळी राजा उभा राहील तरच स्वराज्याची आशा. येरवीं सर्वच गप्पा. परवां महात्मा गांधी मुंबई बंदरांत उतरल्यावर वेल्फेअर ऑफ इंडिया लीग नांवाच्या एका संस्थेनें महात्म्यांचें एक व्याखान करवून त्यांच्याशीं विचारविनिमय केला, असें ऐकतों. महात्माजींनीं त्यांना शेवटीं काँग्रेसनें चालविलेल्या धर्मयुद्धाबद्दल एकच निर्वाणीचें वाक्य सांगितलें तें ‘टाइम्स ऑफ इंडियां’त पुढीलप्रमाणे आहे :
“ To you (The League) the Welfare of India is a matter of leasure. For the Congress it is a matter for which it exists !”
ह्या लीगला हिंदुस्थानचें कल्याण करणें ही फावल्या वेळची गोष्ट आहे. पण काँग्रेस केवळ त्याचसाठीं जगते. हाच गांधींचा रोकडा संदेश, पांढरपेशांना मी नम्रपणें शेतकरी बंधूंच्या वतीनें आज येथें देत आहे. शेतक-यांची संघटना जरी तुमचे फावल्या वेळेचें काम आहे, तरी त्या घटनेवरच शेतक-यांचे व पर्यायानें तुम्हां आम्हां सर्वांचें जीवित अवलंबून आहे. येरवीं आम्हीं सर्व मृतप्रायच आहों !!

श्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता

अनेक दृष्ट्या हें उपनिषद् फारच महत्त्वाचें आहे.  ही एक शैवांची भगवद्‍गगीताच म्हणण्यास हरकत नाहीं; तथापि हा केवळ सांप्रदायिक ग्रंथ नसून ह्यांत उपनिषत्काळाचा ईश्वर धर्म अथवा एकन्तिक भागवत धर्म कसा कळसास पोंचला होता हें गुरुवर्य सर भांडारकरांनीं आपल्या (Vaishnavism & Shaivism पान १०६-११२) ग्रंथांत एका स्वतंत्र भागाच्या रूपानें फार मार्मिकपणानें दाखविलें आहे.  गुरुवर्यांचें स्वत:च्या भक्तिमार्गविषयक सात्त्विक अभिमानाचें ह्या भागांत अतिसुंदर प्रतिबिंबच दिसून येत आहे. प्रकृति, जीव, ईश्वर, परब्रह्म इत्यादि वेदान्तांतील तत्त्वांचा परस्पर संबंधच केवळ ह्या उपनिषदांत आहे, असें नव्हे, तर ह्याच्या कर्त्यानें भक्ताची शरणागति, भक्तीचें माहात्म्य, ईश्वरी कृपा आणि सर्वव्यापित्व वगैरे भागवत धर्माला प्राणभूत अशीं इतर तत्त्वेंदेखील थोडक्यांत पण स्पष्ट निरूपिलीं आहेत. रुद्र, शिव, ईशान, महेश्वर हीं नांवें आलीं असून शिव हेंच ह्या उपनिषदाचें मुख्य आणि एकान्तिक दैवत उपास्य आणि अंतिम आदर्श आहे. श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेंत “रुद्राणां शंकरश्चास्मि” (अ. १० श्लो. २३), “ब्रह्माणमीशं कमलासनस्थम्” (अ. ११ श्लो. १५), “सर्व लोकमहेश्वरम्’ (अ. ५ श्लो. २९) वगैरे शैव नांवें आढळतात. पण श्वेताश्वेतरांत विष्णु, कृष्ण अथवा वासुदेव अशीं वैष्णव नांवें चुकूनहि आलीं नाहींत. कृष्णगीतेंत अनेक मतांची कालवाकालव आहे, तशी ह्या उपनिषदांत नाहीं. हें साध्या शुद्ध आणि आटपसर रूपांत आहे, तर उलट पक्षीं भगवद्गीतेंत फार ढवळाढवळ झालेली स्पष्ट दिसत आहे. कृष्णगीतेनें आपल्या अध्याय १३ व्यांतील १३ वा सबंध श्लोक आणि १४ व्या श्लोकाचा पहिला अर्धा भाग ह्या उपनिषदांतून घेतला आहे. दुस-या अनेक अंतस्थ रचनांवरून व तत्त्वांच्या मांडणीवरून कृष्णगीता ही ह्या उपनिषदानंतरचीच नव्हे, तर ह्या उपनिषदांतील तत्त्वांच्या धोरणांवरून फक्त उपास्य दैवत तेवढें बदलून रचलेली असावी अशी शंका येते. गीतोपनिषद् असें ज्या अर्थीं कृष्णगीतेच्या प्रत्येक अध्यायच्या शेवटच्या समाप्तिवाक्यांत म्हटलें आहे, त्या अर्थीं न जाणो ती ह्याच उपनिषदाचें रूपान्तर असणेंहि अगदीं अशक्य नाहीं. तें कसेंहि असो, कृष्णगीतेचें हल्लींचें स्वरूप श्वेताश्वेतराच्या काळानंतरचें खास आहे. श्वेताश्वेतरोपनिषदाचा कर्ता श्वेताश्वेतर ह्या नांवांतहि रहस्य आहे. कृष्णार्जुनाची जोडी पुरातन आहे. ह्यांचेच अवतार नर आणि नारायण रूपानें बद्रिकाश्रमांत राहात होते. श्वेताश्व हें नांव अर्जुनाचें होतें, मग श्वेताश्वेतर हें नांव कृष्णाचें तर नसेल? आणि इतर म्हणजे अर्जुन असा अर्थ होईल. श्वेताश्वेतर म्हणजे कृष्णार्जुन हें जोडपें व कृष्ण हा शैव होता, वैष्णव असणें शक्यच नाहीं. भगवद्गीतेपेक्षां श्वेताश्वेतराचाच संबंध कृष्णाशीं अधिक प्रत्यक्ष नसेल
कशावरून ?

  1. श्रीशाहू व नाना
  2. शैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा
  3. शेतकरी व सरकार
  4. शेतकरी आणि भांडवलदार
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56
  • 57
  • 58
  • 59
Page 55 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी