1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

शक्ति अथवा देवी भागवत

ह्याचें मूळ हिंदुस्थानांतच होतें कीं बाहेरून आलें हें सांगणें इतिहासाच्या आळोक्याबाहेरचें काम आहे. कारण हा विषय वेदांहिपेक्षां इतका पुरातन आहे, कीं त्याला लेखी पुरावा नाहीं, ह्यांत कांहींच आश्चर्य नाहीं. मार्कंडेय पुराण व देवी भागवत अशीं पुस्तकें आहेत, पण तीं वैदिक धर्मियांनीं व अगदीं अलीकडच्यांनीं लिहिलीं असल्यानें अशा लेखी पुराव्यांत फारसा राम नाहीं. तुलनात्मक भाषा आणि लोकरूढी (Folk Lore) ह्यांवरून कांहीं अनुमानें काढतां येतील, पण कालनिर्णयाच्या बाबतींत हीं प्रमाणें अगदीं पंगू ठरतात. दुर्गा हें नांव वेदांतील रात्री ह्या देवीला होतें; काली, कराली, केशिनी, रुद्राणी, रोदसी इत्यादि नांवे अग्नि अथवा रुद्र ह्या वैदिक देवतांवरून जरी पडलीं असावीं, तरी ही देवी वैदिक नाहीं अशी स्पष्ट कबुली मॅक्समुल्लरनें दिली आहे. कदाचित् ही देवी ईशान्येकडून आली असावी असा मॅक्समुल्लरचा तर्क आहे. तिबेटांतून आलेल्या मोंगलांनीं (मुद्‍गलांनीं) किंवा ब्रह्मदेश सयामांतून आलेल्या ऑष्ट्रिकांनीं ही देवी आणिली असावी. देव अथवा सैतान वाचक मारू असा एक शब्द अथवा नांव पाली भाषेंत आहे, आणि मारी असें अत्यंत प्राचीन नांव ह्या देवीला आहे. त्यावरून ही देवी ईशान्येकडून आली असावी असा संभव दिसतो. मध्य प्रांतांतील डोंगरी प्रदेशांत, तेलंगणांत, महाराष्ट्रांत आणि सर्व द्रावीड देशांत विशेषतः ग्रामदेवता ह्या नात्यानें ह्या मरीआईची पूजा अद्यापि बलवत्तर आहे. हिचा संबंध पटकी, गोवर, देवी इत्यादि सांसर्गिक आजाराशीं विशेषतः लहान अर्भकांच्या आरोग्याशीं निकट आहे. गृह्यसूत्रांत शूलगव नांवाचा विधि आहे; त्यांत रुद्राच्या नांवाने बैलाचा बळी द्यावा लागत असे व त्याची वपा गांवाबाहेर फिरवून बैलांच्या गोठ्यांत पुरण्यांत येत असे, व जनावरांच्या आजारावर हा एक तोडगा करण्यांत येई. इंद्राणी, रुद्राणी, भवानी, अर्वीणी वगैरे देवींच्या नांवानें ह्या विधींत स्वाहा करावा लागत असे. हल्लीं मरीआईची जी रेडा मारून भयंकर गांवजत्रा दक्षिण महाराष्ट्र, तेलंगण आणि द्राविड देशांत करण्यांत येते, ती आर्यांनीं वरील शूलगज विधीच्या रूपानें किती प्राचीन काळीं घेतली हें दिसतें. चंडी, मुंडी, मातंगी अशीं जीं नांवें ह्या देवीचीं आहेत त्यांवरून चंड, मुंड आणि मातंग - खरें नांव मांग किंवा माँग हें आहे - ह्या ईशान्येकडून आलेल्या राष्ट्राची ही देवी असावी. सर्व हिंदुस्थानांत उत्तरेपेक्षांहि विशेषतः दक्षिणेंत आणि पूर्वेस, हिचें अधिक साम्राज्य आहे. ह्यावरून ही देवता कदाचित् हिंदुस्थानांत मूळचीच असावी, असाहि बराच संभव आहे. कित्येक मानववंशशास्त्रवेत्त्यांचें असें मत आहे कीं, ही देवी असीरिया किंवा बाबिलोनिया देशांतून आलेल्या असुर लोकांनीं ह्या देशांत आणिली असावी. असुर अथवा द्राविड आर्यांप्रमाणेंच वायव्येकडून, परंतु आर्यांपूर्वी हजारों वर्षें येथें आले असावेत. आर्यांनी जसा घोडा हा प्राणी हिंदुस्थानांत प्रथम आणिला, तसा द्राविडांनीं बैल प्रथम आपल्याबरोबर आणिला; त्याच्याहि अगोदर आलेल्या किंवा येथेंच मूळचे असणार्‍या कोल, मांग वगैरे लोकांजवळ म्हैस, रेडा हा प्राणी होता. ह्या असिरियांनीं ऊर्फ द्राविडांनीं आपल्या देवीच्या साह्यानें ह्या म्हैस पाळणार्‍या कोल (माँग) जातींचा पराजय केला, म्हणून त्या देवीला महिषासुरमर्दिनी हें नांव पडलें. अगदीं दक्षिणेकडच्या तिनेवल्ली जिल्ह्यांत आदिचिन्नलूर गांवीं संशोधकांना नुकतेच कांहीं अत्यंत प्राचीन स्मशानघाट सांपडले आहेत त्यांत कांशाचीं चित्रें आणि मूर्ति मिळाल्या, त्या मद्रास म्यूझियममध्यें हल्लीं ठेविल्या आहेत. ह्या मूताअत कुत्र्याच्या आणि रेड्याच्याच आकृति आहेत, इरत प्राण्यांच्या नाहींत. ह्यावरून दक्षिण हिंदुस्थानांतील कोल, मांग इ. मूळच्या म्हैसवाल्यांच्या आणि उत्तरेकडून आलेल्या द्राविड बैलवाल्यांच्या लढाया होऊन बैलवाल्यांची सरशी होऊन महिषासुरमर्दिनीचा उदय झाला असावा. महिषासुरमर्दिनीच्या सुंदर मूर्ति जावा आणि सुमात्रा बेटांतील जुन्या हिंदु देवळांतहि आढळतात.

चंडी, मुंडी, काली, कराली इ. देवींचीं जशीं उग्र रूपें आहेत, तशींच त्रिपुरसुंदरी, सरस्वती, अन्नपूर्णा, वरदा, शीतला वगैरे सौम्य रूपेंहि आहेत. विशेषतः बंगाल्यांतील नामशूद्रादि खालील शेतकरी वर्गांत ह्या सौम्य देवीच्या मूर्ति मीं घरोघरीं धान्याच्या संचयावर ठेविलेल्या पाहिल्या आहेत. सरस्वती व अन्नपूर्णा ह्यांचा संबंध जमिनींतील पिकांशीं अधिक दिसला. अशाच प्रकारच्या उग्र आणि सौम्य स्वरूपाच्या देवी इष्टार अथवा ऍस्टोरेथ ह्या नांवाच्या प्राचीन बाबिलोनिया आणि फिनिशिया देशांत होत्या; आणि फिनिशिअनांचें हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍याशीं जलमार्गानें तसेंच बाबिलोनियाचें सिंध देशाशीं खुष्कीनें दळणवळण होतें. तरी पण द्राविड राष्ट्र हें बाहेरून आलें व त्यांनीं बैल हा प्राणी प्रथम हिंदुस्थानांत आणिला, ह्या विधानाच्या उलट जे सिंध प्रांतांत अत्यंत क्रांतिकारक शोध लागले आहेत, त्यांवरून पुरावा मिळतो. सिंधमध्यें उकरून काढलेल्या ४०००।५००० वर्षांमागच्या शहरांतून ज्या प्राचीन संस्कृतीच्या असंख्य वस्तु पुणें येथील ऑर्किऑलॉजिकल ऑफिसमध्यें ठेवल्या आहेत, त्यांत हिंदी बैलांच्या अत्यंत सुबक आणि सुंदर आकृति आहेत. ही संस्कृति आर्यांपूर्वी हजारों वर्षे येथें असलेल्या द्राविड अथवा सुमेरियन सुमेरुवंशी राष्ट्रांची आहे. मुंबई इलाख्याचे ऑर्किऑलॉजिकल सुपरिंटेंडंट रा. दीक्षित ह्यांनीं सांगितलें कीं, बाबिलोनिया देशांत ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षापूर्वी बैल हा प्राणी नव्हता. तें कसेंहि असो. काली, कराली, चंडी इ. उग्र आणि सरस्वती, त्रिपुरसुंदरी, अन्नपूर्णा इ. सौम्य अशीं देवींचीं दोन्हीं रूपें हिंदुस्थानांतील मूळच्या देवीचींच आहेत, असें मानण्यासहि अद्यापि विशेष हरकत दिसत नाहीं. स्त्रीजननेंद्रियाला संस्कृतांत भग असा शब्द आहे. त्यावरून किंवा भग ह्याचा भौमिक संपत्ति किंवा ऐश्वर्य असाहि अर्थ आहे. त्यावरून देवीला भगवती अशी संज्ञा मिळाली. देवी भागवत हें पुराण प्रसिद्धच आहे. अठरा पुराणांत त्याची गणना आहे. श्रीमत्भागवत हें फारच अलीकडचें म्हणजे सन १२०० नंतरचें आहे.

शब्दकोश

(१३) वर सांगितल्याप्रमाणें कोंकणी ही भाषा कोंकणांतल्या मूळ रहिवाशांची नसून, तेथें फार तर हजार बाराशें वर्षांपूर्वीं गेलेल्या उप-या लोकांची असल्यामुळें तिच्या शब्दकोशांत मराठीशिवाय इतर स्वदेशी परदेशी, प्रचलित आणि मृत, इ. अनेक भाषांतील शब्दांची भेसळ मराठींतल्यापेक्षांहि फार झाली आहे. ह्याचें एक मुख्य कारण असें कीं, हिंन्दुस्थानचा सबंध पश्चिम किनारा कराचीपासून कन्याकुमारीपर्यंत पाश्चात्त्य धाडशी लोकांच्या स्वा-या, व्यापार, प्रवास इत्यादि अनेक प्रकारच्या दळणवळणाला अत्यंत प्राचीन काळापासून अगदीं मोकळा होता. हें दळणवळण सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रांतांशीं तसें नव्हतें. ह्या
किना-याला विशेषतः ठाण्यापासून खालीं कन्याकुमारीपर्यंत परशुरामक्षेत्र असें पौराणिक नांव आहे. प्रस्तुत कोंकणी भाषा ह्या परशुरामक्षेत्रभर पसरली आहे. तरी तिचा खरा भर रा. सा. डॉ. चव्हाण म्हणतात त्याप्रमाणें उत्तरेकडील सोपारें गांवाजवळील वैतरणीपासून तों दक्षिणेकडील कारवार जिल्ह्याच्या सीमेवरील गंगावली नदीपर्यंत आहे. त्यांतल्या त्यांत तिचें खरे वैशिष्ट्य राजापूर तालुक्यांतील खारेपाटण पासून खालीं कारवाराजवळील शिवेश्वर गांवापर्यंतच आहे. ह्याच्या उत्तरेकडील भागांत मराठीचा व दक्षिणेकडील भागांत कानडीचा व त्याच्याहि खालीं मल्याळीचा, वरचष्मा भासत आहे; आणि मधल्या भागांतील हल्लींच्या कोंकणींत शेंकडा निदान दहा तरी शब्द पोर्तुगीज भाषेंतून आले आहेत असें दालगादो यांचें मत आहे. तें खरें आहे. पोर्तुगिजांच्या अमलानंतर कोंकणी भाषेंत किंवा कोंकणी भाषेसंबंधी पोर्तुगीज भाषेंत जे कांहीं ग्रंथ झाले आहेत ते केवळ ख्रिस्ती पंडीतांच्याच श्रमांमुळें झाले आहेत. ह्या पंडीतांमध्यें पाश्चात्य धर्माचाच नव्हे तर पाश्चात्त्य भाषा आणि पेहरावांचाहि अभिनिवेश फार असतो. त्यामुळें पोर्तुगीज भाषेचें हें एकदशांश शब्दांचें ऋण मात्र त्यांना तत्काळ पटतें; त्याचप्रमाणें कोंकणीचा संस्कृताशीं ऋणानुबंधहि त्यांना सहज झुगारून देतां येत नाहीं. परंतु कोंकणीचा द्राविड भाषेशीं किती ऋणानुबंध आहे हें कबूल करण्याची पाळी येते, तेव्हां मात्र ह्यांचें पांडित्य विरघळूं लागतें. कानडी व इतर द्राविडी भाषेविषयीं लिहितांना कांहीं ख्रिस्ती विद्धानांचा जो चमत्कारिक प्रतिकूल ग्रह झालेला दिसतो तो रा. सा. चव्हाण यांच्या “कोंकण आणि कोंकणी” ह्या पुस्तकांतील खालील उता-यावरून स्पष्ट दिसत आहे.
“The Konkani language was at one time known as Lingua (Canarin or Canarina. Whatever may be the consideration that led early Portuguese to call it Lingua Canarin, the following comparative table from Mr. Saldana’s Notes on Goan language will show at a glance that Canarese or any of the Dravidian language had no hand whatsoever in building up of the Konkani dialect. The latter in fact shows a special affinity not only for Marathi and Sanskrit but also for Latin. (Page 14).
गोवें येथील “हेरल्डो” पत्राच्या ४४५१ अंकांत Mr. Stuarts Gomes लिहितात — “From the times of the Portuguese domination of Goa, the Goan Christians are dubbed as Canarians, and this term is considered offensive at present. The fact is that the Goans have nothing in common with Canarese or the Canarese people.”
शतकांचीं शतकें परधर्म व परराज्याच्या वातावरणांत वाढलेल्या अभिनिविष्टांचा कानडीवरील राग आणि लॅटिनवरिल प्रेम पाहून वाईट वाटण्याचें कारण नाहीं. पण अशांनीं दिलेल्याच तुलनात्मक शब्दावलीवर विसंबून रावसाहेब डॉ. चव्हाणांसारख्यांनीं कोंकणी ही कानडीपासूनच नव्हे तर प्रत्यक्ष तिची आई किंवा थोरली सख्खी बहीण मराठी हिच्याहूनहि भिन्न आहे किंवा स्वतंत्र आहे असें म्हणावें, हें मात्र आश्चर्य आहे. त्यांनीं आपल्या व्याख्यानांत कोंकणीहून मारठीची भिन्नता दाखविण्यासाठीं ज्या दोन चार शब्दांचीं कोष्टकें दिलीं आहेत, त्यांतील निदान तीनचतुर्थांश तरी शब्द मराठीहून मुळींच भिन्न नाहींत. त्या ख्रिस्ती मंडळींना, कदाचित् मराठी येत नसल्यास ही चूक शोभते, पण चव्हाणांना शोभत नाहीं. शब्दकोशाच्या दृष्टीनें पाहतां खुद्द चव्हाणसाहेबांनींच आपल्या चौदाव्या पानावर “हांव ताका नंबूना” = मी त्यावर विश्वास ठेवीत नाहीं, “कुडले यो” लवकर ये; वगैरै कानडीचा प्रभाव दाखविणारे प्रयोग कबूल केले आहेत, अशीं उदाहरणें आणखी विपुल देतां येतील. पण ही गोष्ट द्राविड द्वेषापासून मुक्त असलेल्यांनाच मात्र पटण्यासारखी आहे. कोंकणी ही मराठीच असल्यानें तिच्यांत मराठी शब्द किती आहेत हा प्रश्नच उरत नाहीं पण तिच्यांत संस्कृत तत्सम, मराठी तद्भव, आणि पोर्तुगीजशिवाय दुस-या भाषांचे इतके शब्द आहेत कीं, ते द्राविड अगर आर्येतर भाषांतूनच आले असणें शक्य आहे. खालीं कांहीं कोंकणी म्हणी देतों. त्यांत ज्या शब्दांखालीं टिंबें दिलीं आहेत त्यांच्याशीं संस्कृताचा फार दूरान्वय लागतो; व ज्यांच्याखालीं रेघ आहे त्यांचा संस्कृताशीं मुळींच संबंध लागत नाहीं, म्हणून ते आर्येतर शब्द असले पाहिजेत. हा संबंध कानडीच्या द्वारा लागतो, कीं तुळूच्या द्वारा, किंवा इतर कोणत्याहि आर्येतर भाषेच्या द्वारा हें तूर्त ठरविणें फारच कठीण आहे. तरी ते बहुतकरून द्राविड शब्द असावेत असें अनुमान करण्याला पंडितांनीं इतकें नाखुष कां असावें हें कळत नाहीं.
१ तोण्णी थोडी पूण खोंड वळो = तण (गवत) थोडें पण खड्डा मोठा. ह्यांतील तण थोडी व खड्डा हे शब्द मराठींत आहेत. थोडी आणि वळ्ळे हे शब्द कानडींत आहेत. पूण हा शब्द पुनः ह्याचा अपभ्रंश आहे. अपभ्रंश महानुभावी मराठींतच सर्वत्र आढळतो. पूण हा एक शब्द वगळला तर ही सर्व म्हण आर्येतर शब्दांची आहे हें उघड दिसतें.
२ दुवेक तेल आमास पुणवेक सुनेक दिवाळीचे दिवाळीक. मुलीला अमावस्येला व पौर्णिमेला तेल व सुनेला दिवाळीस. दूव = दुहिता हा संस्कृत शब्द मराठीपासून स्वतंत्र आहे. आमास आणि पुनव हे शब्द कानडीचे द्वारा अपभ्रंश पावलेले, संस्कृत तद्भव आहेत.
३ वकाल गोरे खायना, वाण भरलें बिकनांनीं = वधू (नवीन सून) (फणसाचे) गरे खात नाहीं (असें दिसतें मात्र), उखळ मात्र बियांनीं भरलें. ती चोरून खात असावी असा अर्थ. ह्यांत वकाल (वक्कल) हा कानडी शब्द आहे. वाण ह्याचें निरुक्त लागत नाहीं. बिकन हें बी ह्या अर्थीं मराठी शब्दाहून निराळें रूप आहे.
(१४) अशा दृष्टीनें शोध करून कोंकणींतल्या असंख्य शब्दांचा माग लावल्यास ते दूरान्वित तद्भव आहेत किंवा कोंकणांतलेच मूळ देश्य आहेत हें दिसून येईल; आणि हे शब्द इतके विपुल आणि कोंकणीशीं इतक्या जुन्या काळापासून एकजीव झालेले आहेत कीं, कोणाहि परप्रेरित पंडिताला कोंकणी ही आमूलाग्र आर्य भाषाच आहे आणि तिचा एक वेळ लॅटिनशींहि संबंध पोंचेल, पण द्राविड भाषांशीं पोंचणार नाहीं, असा तोरा मिरविण्याला मुळींच अवकाश सांपडेल असें दिसत नाहीं. माझा मुख्य मुद्दा असा आहे कीं, खुद्द मराठीचा जसा कानडीशीं निकट संबंध आहे, तसा शब्दकोशाच्या दृष्टीनें तरी किंबहुना जास्तच कोंकणीचाहि कानडी, तुळु, मल्याळी इत्यादि भोंवतालच्या द्राविडी भाषांशीं संबंध आणि ऋणानुबंध खास आहे.
कोंकणींत मराठींतल्याहून भिन्न अशा कांहीं देश्य शब्दांचाच भरणा नसून तिच्यांत कांहीं स्वतंत्र संस्कृत तद्भवांचाहि बराच भरणा आहे; त्यावरून ती भाषा कित्येक परकीय पंडितांना मराठीपासून स्वतंत्र असावी आसा भास होण्याचा संभव कसा आहे, पण ही खरी स्वतंत्रता कशी नव्हे वगैरे गोष्टींचा खुलासा खालीं २० व्या व २१ व्या कलमांत केला आहे.

व्यापाराचा इतिहास

या निषिद्ध व्यापाराचा इतिहास फार मनोरंजक आणि बोधपर आहे. ह्या व्यापाराचा उगम आधुनिक पाश्चात्य राजकारणाशिवाय इतरत्र कोठें शोधून काढणें अत्यंत कठीण काम आहे. ख्रिश्चन आणि झोरोऑस्ट्रियन धर्मांखेरीज इतर कोणत्याहि आधुनिक सुधारलेल्या धर्मांमध्यें दारूचा पूर्ण तिटकारा व्यक्त करण्यांत आलेला आढळतो. इतकेंच नव्हे, कोणत्याहि ख्रिस्ती अगर पार्शी सहृदय सभ्यगृहस्थास या व्यापाराचा मनापासून तिटकारा आल्याशिवाय राहणार नाहीं अशी माझी समजूत आहे. असें असून सुधारलेल्या देशांतील आधुनिक राजकारणांत या व्यापाराचा व्यभिचार कसा शिरला, हा एक मोठा मनोरंजक प्रश्न आहे. हें कोडें मुळींच नाहीं. आधुनिक राजकारण म्हणजे भांडवलवाल्यांचा धुडगुस होय. जगांत अद्याप खरी लोकशाही कोठेंच अवतीर्ण झाली नाहीं, आणि ती बसल्या बसल्या कोणाच्याहि खाटल्यावर लौकरच उतरणार आहे अशांतलाहि भाग नाहीं. परचक्राची भीति वाटल्यावरून अमेरिकेसारख्या सुधारलेल्या किंवा रशियासारख्या मागासलेल्या देशांतील मुत्सद्द्यांनीं जरी थोडाबहुत हा व्यभिचारसंन्यास केलेला आढळतो तरी तेथेंही परचक्राची भीति नष्ट होतांच हा संन्यासहि अस्तंगत होण्याची भीति उदय पावत असलेली आढळत आहे. याचें कारण एवढेंच कीं, जबाबदार मुत्सद्द्यांचे पाठीवर भांडवलवाल्यांचा सवाई सोटा उगारलेला असतो. आणि ह्या दोघांच्या संगनमतामुळें हे व्यभिचार पुन्हा पूर्वींहून अधिक दुणावतो. त्यापुढें धर्माच्या किंवा नीतीच्या वायबारांचें कांही चालत नाहीं.

व्याख्यान दुसरें

‘सनातन भागवतधर्माचा विकास’ ह्यावर श्री. शिंदे ह्यांनीं इ. स. १९२५ च्या पावसाळ्यांत पुण्यांत एक व्याख्यानमालिका गुंफली, तिच्या उत्तरार्धाची प्रस्तावना म्हणून हीं दोन प्रवचनें झालीं. त्यांनीं सासवड येथें भागवत धर्माच्या चालू सहस्त्रकांतील हिंदुस्थानांतल्या इतिहासाचें अगदीं संक्षिप्त सिंहावलोकन केलें.
इ. स. च्या १२ व्या शतकांत व-हाडकडे महानुभाव व दक्षिण हैदराबादकडे लिंगायत पंथाची स्थापना झाल्यावर तेराव्या शतकांत पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाचा उदय झाला. त्यानंतर उत्तरेस वाराणशीस समानंदी, पंजाबांत नानक आणि बंगाल्यांत चैतन्य पंथाची प्रतिष्ठा झाली. वारकरी आणि महानुभाव पंथ लौकिक दृष्ट्या जितका अप्रिय तितकाच दुसरा म्हणजे वारकरी पंथ प्रिय आहे; हा एक मोठाच ऐतिहासिक चमत्कार कां व कसा आहे, तें रा. शिंदे ह्यांनीं स्पष्ट करून सांगितलें. मूर्तिपूजा, जातिभेद, कर्मठ सोवळें वगैरे अधार्मिक गोष्टी दोन्ही पंथांत प्रथम नव्हत्या, तरी पण मागाहून शिरल्या. इतकेंच नव्हे तर धार्मिक वाङ्मयाचा प्रसार मराठींत करण्याचा अग्रमान निःसंशय महानुभावांचा आहे. आणि त्या धर्माचा प्रसार बहुजनसमाजांत करण्याची अपूर्व कामगिरी तो पंथ आजहि करीत आहे, तरी तो अप्रिय आहे; ह्यावरून “जनपदहित” कर्ता ‘द्वेष्यते पार्थिवेंद्रैः’ ह्या म्हणीचा तात्पर्यार्थ म्हणजे डोईजडांचें राजकारण हेंच ह्या चमत्काराच्या तळाशीं असणें संभवनीय आहे, असें रा. शिंद्यांनीं अनुमान केलें.
तुकारामानंतर वारकरी पंथाची आत्मिक वाढ संपली. निळोबांनीं तुकोबाच्या कामगिरीला त्यांची इच्छा नसतां सांप्रदायिक स्वरूप दिलें. ह्यावरून ही वाढ खुंटलेली दिसते. पण ह्या सांप्रदायिकपणामुळेंच ह्या वारकरी पंथाचें व त्यांचें उत्तरेकडील व पूर्वींच्या महानुभावांशीं व्यापारी मात्सर्य वाढून ते एकमेकांचा उलट हेवादेवा करू लागले असावेत, असा शिंद्यांनीं तर्क केला.
महिपतीनें आपला भक्तिविजय ग्रंथ पानिपतच्या लढाईनंतर इ. स. १७६२ सालीं (शकें १६८४ वैशाख वद्य द्वादशीस) प्रवरेच्या दक्षिणेस ताहराबाद येथें प्रसिद्ध केला. महिपतीनें मूर्तिपूजा, वर्णाश्रमधर्म, कर्मठ सोवळेपणा, ब्राह्मण, संस्कृतचें बंड, धार्मिक मध्यस्थांचा जुलूम इत्यादि गोष्टींची उघडउघड निंदा हल्लींच्या सत्यशोधकांहूनहि किती तरी अधिक स्पष्ट व फटकळ भाषेंत केली आहे. त्यावरून तुकारामांच्याहि मागें १०० वर वर्षें ख-या भागवतधर्माची ज्योत अगदींच मावळलेली दिसत नाहीं. अशा प्रकारच्या ह्या भागवतधर्माचें मुख्य कार्य सांगतांना रा. शिंदे म्हणाले, “(१) धर्मभेद, (२) जातिभेद, (३) मूर्तिपूजा, (४) अतिवैराग्य, (५) अतिकर्म, (६) अतिज्ञात, (७) ग्रंथप्रामाण्य, (८) गुरुपुजा, (९) राजकारण, (१०) तर्कवाद, (११) तात्पुरता हितवाद, ह्या ११ बाह्य गोष्टींचा ख-या धर्माशीं घटस्फोट भागवतधर्मानेंच केला.” हें शिंदे ह्यांनीं महिपतीच्या ग्रंथांतील उतारे देऊन सिद्ध केलें. “ज्ञानदेवें घातला पाया | तुका झाला कळस ||” ही वारकरी म्हण कांहीं अंशीं दुरुस्त करण्यासाठीं वारकरी पंथाचा महाराष्ट्रांतच नव्हे तर अखिल हिंदुस्थानांत प्रसार करण्याच्या कामीं श्रीनामदेवांनीं जो भाग उचलला तो श्रीज्ञानदेवांसच काय, पण प्रत्यक्ष श्रीतुकोबांनाहि उचलणें शक्य झालें नाहीं; म्हणूनच नामदेवांचें अवतारकृत्य श्रीतुकोबांनीं आटोपलें, हें महिपतीचें काव्यमय मत यथार्थ आहे, असें शिंदे ह्यांनीं आपलें मत दिलें.
आम्ही वैकुंठवाशी | आलों ह्याच
कारणाशी | बोलीले जे ऋषी |
साच भावें वर्ताया ||

हा तुकारामांचा सात्त्विक दावा हल्लींचा वारकरी अगर तदनुषंगी कोणताहि पंथ किती सिद्ध करीत आहे हा प्रश्न अलाहिदा आहे. मात्र हाच दावा हल्लींचे ब्राह्मसमाज, आर्यसमाज व सत्यशोधक समाज ह्यांचा आहे, असें शिंदे म्हणाले. अगोदरच्या उदार पंथांनीं हा दावा सिद्ध केला असता, तर हे नवीन समाज निघावयाला अवकाशच उरला नसता. पण भागवतधर्माचें क्षेत्र सनातन व सार्वत्रिक असल्यानें, तें पूर्णपणें आक्रमण्याला हे नवे समाज अपुरे पडल्यास कोणी आश्चर्य मानण्याचें कारण नाहीं. जेथें श्रीचक्रधर महानुभाव, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, नानक, कबीर, चैतन्य, राममोहन राय, दयानंद, ज्योतिबा फुले अशांनीं हात टेकले, तेथें पूर्ण यशाचा चंग कोण बांधिल? अहंकाराचा नाश ह्यांतच भक्तीचा विजय आहे. आणि तेथेंच भागवतधर्माची ध्वजा फडकत आहे, असा निर्वाळा देऊन रा. शिंदे ह्यांनीं सासवड येथील प्रवचन आटोपलें.

व्याकरण (कानडी)

येथपर्यंत शब्दांचा विचार झाला; परंतु व्याकरणांतील साम्य ह्याहूनहि अधिक महत्त्वाचें आणि मनोहर आहे. त्यावरून तर मराठीचा कानडीशीं गूढ आनुवंशिक संबंध असावा अशी शंका येते. मराठीच्या पूर्वीं बरींच शतकें कानडीची घटना झाली आणि ही नवी घटना करणार जैन आणि बौद्ध प्रचारक संस्कृतज्ञ आणि प्राकृतज्ञ असल्यामुळें कानडीची मूळ पीठिका जरी तामिळ होती तरी व्याकरणांत कांहीं प्राकृताचें आणि किंचित् संस्कृतचेंहि वळण दिसणें साहजिक आहे. पुढें प्राकृतामधून निघालेल्या मराठीची घटना ह्याच कानडीच्या निकट सान्निध्यांत होऊं लागल्यामुळें कानडीच्या व नवीन मराठीच्या व्याकरणामध्यें थोडेंबहुत साम्य दिसून येणें हेंहि साहजिक आहे. हें साम्य विशेषतः नामाच्या आणि क्रियापदाच्या अशा दोन्ही विभक्तींमध्यें आढळतें, ही विशेष लक्षांत घेण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीची आणि तिच्यापूर्वींची जी मराठी तिला जुनी व त्यानंतरच्या मराठीला नवी म्हणण्याचा जो परिपाठ आहे तो केवळ ह्या भाषांतील शब्दांच्या नव्याजुनेपणावरूनच नव्हे तर ह्या दोन्ही विभक्तींच्या नव्याजुनेपणामुळेंहि पडला आहे. कानडींतहि नवी आणि जुनी असे भेद आहेत. ते कशामुळें पडले हें सांगणें मला तूर्त शक्य नाहीं. तरी नवीन मराठीच्या आणि नवीन कानडीच्या दोन्ही विभक्तींच्या घटना आणि सामान्यरूपें ह्यांमध्यें विलक्षण साम्य आहे ही गोष्ट आश्चर्यकारक आहे यांत शंका नाहीं.

  1. व्याकरण
  2. व्यभिचाराचा सांवळागोंधळ
  3. वैदिक धर्म
  4. वेदोक्त कीं पुराणोक्त?
  • 53
  • 54
  • 55
  • 56
  • 57
  • 58
  • 59
  • 60
  • 61
  • 62
Page 58 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी