1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

व्यक्तित्वविकास

जगातील कोणत्याही प्रमुख धर्मामध्ये आत्मा, जग आणि ईश्वर ह्या तीन तत्त्वांविषयी विचार केलेला आढळतो. पैकी आत्मा हे तत्त्व इतरांपेक्षा अधिक महत्त्वाचे असते. परंतु त्याविषयीचा विचार फार सामान्य आणि तात्त्विक पद्धतीने झालेला असल्यामुळे, व्यक्तीच्या जीवनावर आणि लोकव्यवहारावर अशा मोघम विचारांचा व्हावा तसा परिणाम झालेला आढळून येत नाही. “नैनं छिदंति शस्त्राणि नैनं वहति पावकः ।” .. .. “य एनं वेत्ति हंतारं । यो वा मन्यते हतं” अशा प्रकारची आत्मविषयक वर्णने गीतेत सांगितलेली आहेत. तरी व्हावा तितका व्यावहारिक बोध ह्यावरून होत नाही. आज आत्मा म्हणजे व्यक्तित्व ह्या अर्थाने व केवळ व्यावहारिक दृष्टीनेच ह्या विषयाचा विचार कर्तव्य आहे.

प्रत्येक प्राणी म्हणजे एक व्यक्ती हे जरी एका दृष्टीने खरे आहे, तरी प्रत्येक प्राण्यामध्ये व्यक्तित्व असतेच असे नाही. किंबहुना मनुष्यप्राण्यातील बहुसंख्येमध्ये देखील हे व्यक्तित्व फारच अल्प प्रमाणाने विकसित झालेले असते, असे म्हणण्यास काही हरकत नाही. मी म्हणून कोणी आहे, माझे विचार, माझी सुखदुःखे आणि कृत्ये ह्यांचे, इतर कोणाचीही अपेक्षा न ठेवता, मला अत्यंत थोर महत्त्व आहे, अशी जाणीव राखून तदनुरूप वर्तन ठेवणे, ह्यातच व्यक्तित्व आहे, आणि दुस-याच्या कोणत्याही हितसंबंधास बाधा न आणिता ह्या व्यक्तित्वाचा शक्य तितका विकास करण्याचा मला पूर्ण हक्क आहे असे प्रत्येक व्यक्तीस वाटले पाहिजे. एका थोर ग्रंथकाराने म्हटले आहे की, ह्या जगात मनुष्य जी जी कामगिरी करीत आहे, त्या सर्वांत मोठी म्हणजे तो आपल्या स्वतःला बनवीत आहे हीच होय. (Among the works of man which human life is rightly employed in perfecting and beautifying the first in importance surely is man himself – J.S. Mill.) तथापि अगदी सुधारलेल्या आणि पुढारलेल्या राष्ट्रांतही ह्या व्यक्तित्वाचे महत्त्व ( फूट नोट पान क्र. ३८४ रविवार ता. १०-१२-१९११ रोजी केलेल्या उपदेशाचा सारांश. ) कळावे तितके अद्यापि मुळीच कळलेले नाही. ह्याला एक दोन उदाहरणेच पुरी आहेत. कोणी कोणाची हत्या केली असताना त्यास देहांत शिक्षा द्यावी असे जे मनुष्यांनी ठरविले आहे, त्यावरून मनुष्यजीविताचे महत्त्व मनुष्यास कळलेले आहे, असा क्षणमात्र भास होतो, परंतु देहांताची शिक्षा दिल्यामुळे हत्येच्या गुन्ह्यास पुनः हत्येचीच शिक्षा आहे, ह्यावरून हा भास खोटा आहे असे लागलेच कळून येते. शिक्षेचा उद्देश सूड हा नसून गुन्ह्याचा प्रतिबंध, गुन्हेगाराची सुधारणा, समाजाची सुरक्षितता आणि शक्य असल्यास ज्याचे अहित झाले असते, त्याची भरपाई इतकेच असताना त्यांपैकी एकही ह्या देहांत शिक्षेने साधत नाही. तथापि सुधारलेल्या देशांतून ह्या शिक्षेच्या रानटी पद्धतीविषयी ओरड चालली असूनही ती अजून बंद होत नाही. ह्याहून दुसरा चमत्कार असा आहे की, व्यक्तीस आपल्या जीविताची कशीही विल्हेवाट लावण्याचा पूर्ण हक्क असताही आत्महत्या हा एक बहुतेक सुधारलेल्या समाजामध्ये गुन्हा मानिला जात आहे, जणू काय व्यक्तीचे जीवित ही एक समाजाची मालमत्ता आहे. कोणा एकाने आत्महत्या खरीच केली तर मग शिक्षा देण्याचा प्रश्नच उरत नाही, परंतु त्याचा तो प्रयत्न सिद्धीस न जाता उघडकीस आला म्हणजे सामाजिक गुन्ह्याबद्दल त्याला जी शिक्षा भोगावी लागते, ती म्हणजे समाजाच्या अडाणीपणाचा एक मासलाच आहे. कित्येक अडाणी आईबाप आपले मूल जिन्यावरून खाली पडले किंवा त्यास ठेच लागली म्हणजे त्याला मायेने उचलून त्याची शुश्रूषा न करता किंवा त्यास काही दुखापत झालेली नसल्यास त्याच्याकडे केवळ दुर्लक्ष करून न राहता, त्याच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांना चीड येऊन त्यास दोन चार थपडा का मारतात, ही जी ह्या आईबापांची अडाणीपणाची माया आहे, तशातलाच समाजाचा वरील प्रकार आहे.

ही दोन विक्षिप्त उदाहरणे बाजूस ठेविली, तरी अर्धी मनुष्यजाती ज्या स्त्रिया, ह्याच्यामध्ये व्यक्तित्वाचा आजवर जो पूर्ण अभाव आहे, तिकडे अद्यापिही मनुष्यजातीचे लक्ष गेलेले नाही. काव्य आणि कादंब-या ह्यांमधून मुख्य नायकाचे जसे व्यक्तित्वपूर्ण चित्र रेखाटलेले असते तसे नायिकेचे नसते. सीता, तारा, दमयंती, मंदोदरी इत्यादी आमच्या पुराणातल्या ज्या पुण्यकन्यका प्रसिद्ध आहेत, त्यांचा जो आजवर गौरव होत आहे तो त्यांच्या सौम्य आणि निष्क्रीय गुणांबद्दलच होय. मराठी भाषेतले उत्तमोत्तम काव्य रघुनाथपंडिताचे नलदमयंती आख्यान, त्यात कवीने पुण्यश्लोक नळाचे चित्र किती सर्वांगसुंदर रेखाटले आहे आणि दमयंतीविषयी पहावे तर तिच्या केवळ शारीरिक सौंदर्याचीच बहार उडविली आहे.

ज्याची शब्दांवर एवढी मोठी सत्ता, ज्याच्यामध्ये एवढी मोठी प्रतिभा आणि प्रेरणा, त्याला दमयंतीच्या नैतिक आणि आध्यात्मिक भावनांचा किंचित तरी उल्लेख करता आला नसता काय ! पण क्रियात्मक व्यक्तित्वाची स्त्रियांमध्ये मुळी जरुरीच वाटत नाही, मग तशा प्रकारचे चित्र वठविणे म्हणजे त्यांची एक अमर्यादाच करणे असे पुरुष चित्रकारास वाटणे साहजिक झाले आहे. आपल्या स्त्रीजातीविषयी अत्यंत अभिमान बाळगणा-या एका तेजस्वी पाश्चात्य ग्रंथकर्तीने असे म्हटले आहे की स्त्रियांमध्ये अद्यापि व्यक्तित्वविकास न पावल्यामुळे त्यांच्यामध्ये मोठे कर्तृत्व आणि हिंमत दिसून येत नाही, एवढेच नाही तर, काव्य, चित्र, लेखन इत्यादी ललितकलांचीही जोराची प्रतिभा त्यांच्यात दिसून येत नाही, पण साधारणतः पुरुषांनाच व्यक्तित्वाचे महत्त्व अद्यापि कळून आले नाही तर स्त्रियांमध्ये त्याचा अभाव असल्याचे दिसून आल्यास त्यात नवल ते काय !

हल्लीच्या काळी निरनिराळ्या जातींच्या सुधारणेविषयी प्रयत्न होत आहेत. राष्ट्राच्या उत्कर्षासंबंधी व सर्व मनुष्यजातीच्या प्रगतीविषयी चळवळी निघत आहेत, परंतु प्रत्येक माणसातील व्यक्तित्वाची थोरवी किती आहे, तिचा विकास होण्याच्या मार्गामध्ये किती घनघोर अडचणी आहेत, सामाजिक हिताच्या दाबाखाली हे व्यक्तित्व कसे चिरडून जात आहे, इकडे विचारी माणसांचे जावे तितके लक्ष जात नाही, म्हणून आपण व्यक्तित्वाचा विकास करण्याची कोणकोणती साधने आहेत हे पाहू.

हा विकास होण्याला प्रथम तीन प्रकारचे स्वातंत्र्य पूर्णपणे प्रस्थापित व्हावयास पाहिजे. दुस-यला कोणत्याही प्रकारचे नुकसान न पोहोचविता व्यक्तीला स्वतंत्रपणे : (१) विचार करण्याचा, (२) प्रेम करण्याचा आणि (३) यत्न करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आपल्या शक्तीप्रमाणे राष्ट्राचा शोध लावणे, विचार करणे आणि मनात आलेले विचार लेखाने आणि भाषणाने प्रदर्शित करणे, हा विचारस्वातंत्र्याचा मनुष्याचा पहिला उपजत हक्क होय. अंत:करणाच्या प्रवृत्तीप्रमाणे आपली आवड, नावड ठरविणे, अभिरुचींचा उपभोग घेणे, आणि प्रेमाचा विषय संपादणे हा प्रेमस्वातंत्र्याचा दुसरा उपजत हक्क होय. आपल्या कर्तबगारीच्या जोरावर इष्ट पुरुषार्थासंबंधाने प्रामाणिकपणे यत्न करणे, किंवा यत्नापासून विराम पावणे हा यत्नस्वातंत्र्याचा तिसरा उपजत हक्क होय. ह्या तिन्ही हक्कांच्या आड सारे जग आले तरी तेवढ्यावरून हे आपले हक्कच नव्हते असा कधी कोणी गैरसमज करून घेऊ नये.

आज आपण प्रथम स्वातंत्र्याविषयी विचार करू. स्वातंत्र्याचा अगदी प्रमुख प्रवक्ता जॉन स्टुअर्ट मिल्ल ह्याने आपल्या स्वातंत्र्य नामक वेदप्राय ग्रंथामध्ये असे निक्षून सांगितले आहे की विचाराच्या बाबतीत एकच व्यक्ती एकीकडे आणि सर्व मनुष्यजात दुसरीकडे असा जर विरोध आला तर तद्विरहित सर्व मनुष्यजातीच्या एकवटलेल्या विचाराला दाबून टाकण्याला त्या एका व्यक्तीला जसा मुळीच अधिकार नाही तसाच सर्व मनुष्यजातीलाही त्या एका व्यक्तीच्या विचारालाही दडपून टाकण्याचा अधिकार नाही. सत्याचा स्वतंत्रपणे शोध करण्याचा आणि तद्नुसार आपले विचार लोकांत प्रदर्शित करण्याचा व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे. ह्यासंबंधी मिल्लसाहेबांनी आपल्या विचारांचा निष्कर्ष शेवटी सिद्धांतरूपाने असा दिला आहे की समाजाने व्यक्तीला ह्या बाबतीत अडथळा आणणे म्हणजे समाजाचे जे मत असेल ते सर्वांशी प्रमाणभूत आहे असे समजणे होय. सर्व मनुष्यजातीचे निश्चयात्मक जरी एकमत ठरले तरी तेही जर सर्वांशी प्रमाणभूत असू शकत नाही तर एक व्यक्ती शिवाय करून बाकीच्या सर्वांच्या मतांचे प्रामाण्य कमीच ठरणार. मग त्यास त्या व्यक्तीचे मत दाबून टाकण्याचा अधिकार कसा येईल ? एका व्यक्तीचे मत जरी सर्वांशी सत्य नसले तरी सत्याचा काही तरी अंश त्यामध्ये असण्याचा संभव आहेच आणि समाजाच्या मतात चुकीचा काही अंश असणे तितकेच संभवनीय आहे. अशा स्थितीत एका व्यक्तीचे मत मुळीच पुढे आणू न देणे योग्य होणार नाही. दुस-या पक्षी त्या एका व्यक्तीचे विचार सपशेल चुकीचे असले तरी ते दाबून टाकण्याने केणाचे हित होणार नाही, कारण, असत्याचा सत्याशी झगडा होण्यानेच सत्य पक्षाचे हित आहे. तिसरे पक्षी, समाजाचे मत सर्वांशी प्रमाणभूत असले तरी व्यक्तीने स्वत: काही विचार न करता ते जशाचे तसेच स्वीकारण्याने त्याचे हित होणार नाही.

आमच्या ब्राह्मसमाजात सर्व प्रकारे व्यक्तीला स्वातंत्र्य असणे हे एक पायाभूत मूलतत्त्व मानले आहे. वेदादी धर्मग्रंथांचे, गुरूंचे, परंपरांचे, इत्यादी कोणत्याही प्रकाराचे बाह्य प्रामाण्य ब्राह्मधर्माने मुळीच झुगारून दिले आहे. तथापि ही बाह्य प्रामाण्ये निराधार आहेत हे सत्य आमच्या समाजात जन्मास आलेल्या मुलांना आम्ही जर आयतेच देऊ तर ते त्यांना हितकारक नाही. स्टोअर्समध्ये मिळणा-या तयार केलेल्या कपड्यांप्रमाणे सत्याची ही आंगडी पांघरून समाजातील सभासदांच्याही मनाची खरी वाढ होणे शक्य नाही. कैद्यास तुरुंगात ठेविले काय किंवा राजवाड्यात ठेविले काय तो जसा कैदीच त्याप्रमाणे मनावर असत्याचा बोजा असला काय किंवा सत्याचा बोजा असला काय, जोपर्यंत ते स्वतंत्र नाही तोपर्यंत ते कैदीच समजावयाचे. भूमितीसारख्या गणितशास्त्रासंबंधी विचार करताना प्रमाणांची बहुतेक एकदेशीयताच असते. काही स्वयंसिद्ध गोष्टींचा स्वीकार केल्याबरोबर तर्कशास्त्राच्या नियमांप्रमाणे ह्या सामान्य शास्त्राचे ठराविक सिद्धांतांकडे आपले मन जाऊन पोहोचते. तेथे दुसरी तिसरी बाजू संभवत नाही. परंतु धर्म, नीती, राजकारण इत्यादी व्यावहारिक शास्त्रांची गोष्ट तशी नाही. ह्या बाबतीत जितकी विविध आणि विपुल मते आपल्यापुढे येतील आणि त्यांचे जितके घनघोर घर्षण होईल, तितके आपण सत्याच्या जवळजवळच जाण्याचा संभव आहे.

ग्रंथप्रकाशनाचे बाबतीत ज्या ग्रंथात नवीन विचार असतात, त्याला बाजारात अधिक किंमत येते, आणि एरवी नुसते भाषांतर किंवा इतर असेच संपादित ग्रंथ, त्यांची किंमत एकदम अर्ध्याहून कमी होते, आणि केव्हा केव्हा तर त्यांची कागद आणि शाईच्या किंमतीनेच विक्री होण्याची मारामार पडते. ह्याप्रमाणे जो प्रकार वाङमयामध्ये आढळतो तो जीवनव्यवहारामध्ये असू नये काय ? विद्यार्थ्याने एकाद्या शास्त्राचे अध्ययन आपल्या गुरूजवळ काही वर्षे केल्यावर त्याचे अंगी व्युत्पत्ती येते आणि तशी व्युत्पत्ती आल्याशिवाय त्याचे अध्ययन संपले, असे सजण्यात येत नाही. जशी विद्यार्थ्यास व्युत्पत्ती तसेच संसारात वावरणा-या माणसाचे व्यक्तित्व हे होय. मनुष्य बालवयात असतो तोपर्यंत आईबाप त्याला जे सांगतील ते ऐकून व त्याचे अनुकरण करून त्याचे चालते. परंतु मोठा झाल्यावर त्याला केव्हाना केव्हा तरी त्याच्यामध्ये व्युत्पत्ती आल्यावाचून त्याचे चालणार नाही. बाळपणी स्वाभाविक उत्साह आणि जीवनाचा ताजा जोम असतो म्हणून मुलाला अनुकरणाची बाधा होत नाही, पण मोठेपणी हा उत्साह संपून गेल्यावर व्यक्तित्वाचा आतून जोम आल्याशिवाय मनुष्य राहू लागल्यास जे अनुकरण आजपर्यंत त्याला तारक झाले, ते ह्यापुढे मारक होते. विद्या खात्याच्या आधुनिक शिक्षणक्रमाकडे पाहिले असतानाही हीच गोष्ट निदर्शनास येते. प्राथमिक शिक्षणात लहान मुलाला केवळ श्रवण आणि दर्शन ह्यांच्या द्वारा काही ज्ञानाच्या साधनांची वरवर प्राप्ती करून घ्यावयाची असते. दुय्यम प्रतीच्या शिक्षणात इतिहास, भूगोल, इत्यादी विषयांची स्मृतिद्वारा माहिती संपादन करावयाची असते. परंतु विद्यार्थी ह्या प्रकारे एकदा विश्वविद्यालयामध्ये प्रविष्ट झाला म्हणजे हे पारडे उलटते. तेथे त्याचे नियमित विषयांचे आवश्यक अध्ययन कमी होऊन निरनिराळ्या विषयांची आपल्या आवडीप्रमाणे निवड करावी लागते, आणि ह्याप्रकारे विषयाची पसंती करूनच चालत नाही, तर पसंत केलेल्या विषयांमध्ये त्याच्यापुढे मोठमोठे ग्रंथकार, कवी आणि शोधक ह्यांच्या कृती मांडण्यात येतात आणि त्यांवर त्याला स्वत:ची मखलाशी करावयाची असते. ह्या पायरीवर आल्यावर त्याने कोणतेही सत्य जशाचे तसेच स्वीकारावे अशी विद्यालयाची योजना नसते, तर त्याच्यापुढे ज्या गोष्टी मांडण्यात येतात त्यांची तुलना करून, स्वत:च्या मनाची शक्ती त्याने वाढवावी हा विद्यालयाच्या योजनेचा हेतू असतो. विद्यालयात प्रविष्ट झालेल्या उमेदवारावर जर ही जबाबदारी आहे, तर त्यातून पार उतरून संसार-समरांगणावर आरूढ झालेल्याची व्यक्तित्वासंबंधी जबाबदारी कमी असणे इष्ट आहे काय ? तथापि असे असताही वस्तुस्थिती अगदी उलट आहे. जडसृष्टीमध्ये ज्याप्रमाणे झाडांना कोट्यवधी पाने दरवर्षी लागून त्यांना थोडीच फुले येतात, कोट्यवधी फुलांतून थोडीच फळे येतात आणि बाकी सर्व वृथा गळून जातात, त्याचप्रमाणे चैतन्यसृष्टीमध्येही अत्यंत खेदजनक आणि वृथा व्यय चाललेला आहे. असंख्य कोटी प्राणी जन्मास येऊन व्यक्तित्वशून्य आणि व्यक्तित्वहीन असे मृत्युमुखी पडतात, त्यांची उत्पत्ती, स्थिती, लय ही जणू काय अहेतुक भासतात, आणि व्यक्तित्वपूर्ण प्राणी हे अपवादादाखल कोठे तरी टमकतात. असा प्रकार न व्हावा, प्रत्येक प्राण्यामध्ये व्यक्तित्व पूर्णत्वास यावे, अशी दैवी योजना असून तिला अनुकूल वर्तन ठेवणे हा प्रत्येक प्राण्याचा आद्य आणि अंतिम धर्म होय आणि ह्या मंगल हेतूस अडथळा आणणे ह्यापरता दुसरा कोणताही अधर्म नाही.

वृत्ती, विश्वास आणि मते

बहुता छंदांचे बहु वस जन| नये वाटू मन त्यांच्या संगे||
करावा जतन आपुला विश्वास| अंगा आला रस आवडीचा||
सुखाची समाधइ हरिकथा माउली| विश्रांती साउली सिणलियांची||
तुका म्हणे बुडे बांधोनी दगड| तेथे काय कोड धावायाचे||

धार्मिक जीवनामध्ये मुख्य साधावयाची गोष्ट कोणती आणि ती साधावयासाठी साधने कोणती आणि त्या साधनांची उपसाधने कोणती ह्याचा पृथक् विचार करून ती स्पष्टपणे धर्मसाधकांपुढे ठेवण्याची मुख्य जबाबदारी सर्व धर्मसमाजांवर आहे. म्हणून आपण ह्याविषयी थोडासा विचार करू.

धर्मजीवनामध्ये मुख्य साध्य गोष्ट साधकांची वृत्ती ही होय. कोणाचे लक्ष परंपरागत चालत आलेल्या विधीकडे असते, कोणाचे गुरूकडे, कोणाचे ग्रंथाकडे, कोणाचे धार्मिक मनोविकाराकडे, कोणाचे परोपकाराकडे, कोणाचे तत्त्वज्ञानाकडे दिसते. पण मुख्य गोष्ट साधकाने आपली स्वत:ची वृत्ती उत्तरोत्तर शुद्ध आणि उदात्त होत आहे की नाही, हे पाहाणे ही होय. कामक्रोधादी दुष्ट मळापासून आपले मन दूर आहे की नाही, सात्विक प्रेमाचा उदभव जास्त होत आहे की नाही, सत्प्रयत्नांचा जोर बळावत आहे की नाही आणि एकंदरीत अशा रीतीने आपला आतील भाव शुद्ध आणि भरीव होत आहे की नाही इकडे साधकाचे अगोदर लक्ष असले पाहिजे. सर्व धर्मांचे ध्येय वस्तुत: हेच असते. ह्याला साधने निरनिराळी असतात. त्यांतील पहिले साधन व्यक्तीचा विश्वास हे होय. विश्वास ह्याचा अर्थ माझ्या अल्पमतीने हा आहे की, एकाद्या व्यक्तीने कोणतेही कृत्य करण्यापूर्वी त्या कृत्याला कारणीभूत अशी जी त्या व्यक्तीच्या मनाची स्थिती ती. तहान लागली असता आपण पाणी पितो, कारण पाण्याने तहान जाईल अशी आमची श्रद्धा आहे. अग्नीत हात घालीत नाही, कारण हात जळेलच असा आमचा विश्वास आहे, ह्यावरून विश्वास ही एक मनाची जिवंत आणि कार्यकारी अवस्था होय. एरवी पुष्कळ गोष्टींवर आमचा विश्वास आहे. असे आम्ही तोंडाने म्हणू. पण त्या विश्वासाचे पर्यवसान कृतीत आणि वृत्तीत होत नसेल तर तो विश्वास नव्हेच. अशा विश्वासाचे आमच्या समाजात कितीही महत्त्व असले, तरी ईश्वर त्यास ओळखणार नाही.

वर सांगितलेल्या प्रकारचा जिवंत विश्वास ही प्रत्येक व्यक्तीची बाब आहे. तो त्या व्यक्तीत्चाय वृत्तीचे साधन आहे. त्या विश्वासाचे उपसाधन म्हणून धर्मसमाजातील वडील मंडळींनी आपले विश्वास आणि अनुभव ह्यांवरून धर्मसमाजातील सर्व साधकांसाठी काही विशिष्ट मते प्रणीत करावयाची असतात. त्या मतांच्या साहाय्याने साधारण सभासदाच्या विश्वासाला व तद्वारा त्याच्या वृत्तीला साहाय्य व्हावयाचे असते. ह्याप्रमाणे आम्ही धर्मजीवनातील तीन गोष्टी पाहिल्या. मुख्य वृत्ती, तिला साधनीभूत व्यक्तीचा जिवंत विश्वास, त्याची उत्पत्ती आणि वाढ होण्याकरिता धर्म समाजाची विशिष्ट मते, अशी ही साधनपरंपरा आहे आणि परस्पर ह्यांचा दर्जा आणि महत्त्व कमी कमी असते.

हे समजण्याला आपण अर्थशास्त्रातील दृष्टांत घेऊ या. अर्थशास्त्रात अर्थ म्हणजे संपत्ती अथवा ज्यांच्यामुळे प्रत्यक्ष सुख होते आणि उपजीविका चालते, अशा वस्त्र-धान्यादी उपभोग्य वस्तू. ह्या वस्तूंची देवघेव सुरळीत आणि सुलभ रीतीने व्हावी म्हणून निरनिराळ्या देशी आणि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या नाण्यांची योजना होत आली आहे. ज्या ज्या मानाने समाज अधिकाधिक सुसंस्कृत होत जातो, त्या त्या मानाने त्या समाजातील नाण्यांचे रूपांतरही अधिकाधिक सुधारणेकडे होत जाते. प्राचीन युगात आणि हल्लीही काही ठिकाणी न सुधारलेल्या समाजामध्ये पासोड्या, कांबळी, काठ्यांची जुडगी, कवड्या, शिंपली, हाडे इत्यादिकांचा नाण्यादाखल उपयोग होतो. सुधारणेमुळे ही नाणी उत्तरोत्तर अधिकाधिक व्यवहारोपयोगी होत जातात. पण पूर्वीपासून त्यांचा हेतू एकच आहे. तो हा की अर्थाची अदलाबदली व्हावी. पण नाणी ही स्वत:च अर्थ नव्हेत. कारण ती प्रत्यक्ष उपभोग्य नसतात. म्हणून ती अर्थाहून कमी दर्जाची. अर्थशास्त्रात अर्थाचा आणि नाण्यांचा जो संबंध आहे तसाच संबंध धर्मशास्त्रात वृत्तीचा आणि विश्वासाचा आहे. म्हणजे एक दुस-याचे साधन आहे, म्हणून एक दुस-याहून कमी महत्त्वाचे आहे.

तसेच धर्मशास्त्रात एकाद्या विशिष्ट समाजाने प्रणीत केलेली जशी मते असतात. तशीच अर्थशास्त्रातही निरनिराळ्या समाजापुरती तिसरी एक योजना करण्यात येत असते. ती नोटांची किंवा हुंड्यांची होय. ह्या नोटा किंवा हुंड्या विशिष्ट समाजातील संकेतावर आणि पतीवर अवलंबून असतात. त्या समाजाच्या बाहेर त्याच चालत नाहीत. नाण्यांच्या हेतूला मदत मिळावी म्हणून नोटांची संकेताने योजना केलेली असते म्हणून नोटांचे वस्तुत: महत्त्व नाण्याहून कमी आणि अर्थाहून तर फारच कमी. तसाच प्रकार मतांचा, विश्वासाचा आणि वृत्तीचा धर्मजीवनात आहे.

हे लक्षात घेऊन, कोणत्याही धर्मसमाजाच्या पुढा-याने अशी खबरदारी राखली पाहिजे की, आपण प्रणीत केलेली मते, साधकांच्या विश्वासास आणि वृत्तीला नेहमी साहाय्यकच व्हावीत, त्यांचा त्यांच्यावर कधीही दाब बसू नये. समाजमतांच्या योगे व्यक्तीच्या विश्वासास आणि वृत्तीस उज्ज्वलपणा येत नाही, असे दृष्टोत्पत्तीस आल्याबरोबर पुढा-यांनी आपल्या मतांची फेरतपासणी आणि मांडणी केली पाहिजे. एकदा केलेल्या जुन्या उल्लेखावरच हवाला ठेवून चालणार नाही, समाजमते ही हल्लीच्या वृत्तीसाठी होत. व्यक्तीची वृत्ती आणि विश्वास समाजाच्या मतासाठी नव्हेत, हे समाजचालकांनी नेहमी ध्यानात वागविले पाहिजे.

तुकारामाने वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने आपला विश्वास जतन करावा एवढेच नव्हे, तर आपली वृत्ती जतन करावी आणि वाढवावी व अशा प्रकारे व्यक्तीची वृत्ती आणि विश्वास ह्यांची वाढ होते की नाही हे समाजचालकांनी पहावे. पण ह्या बाबतीत प्रत्येकाने आपआपल्या वृत्तीकडे आपणच बारकाईने लक्ष देणे बरे. एकाने दुस-याच्या वृत्तीविषयी आक्षेप घेण्याने काही फायदा होत नाही. तशाने आपला धडा टाकून दुस-याच्या दुर्लक्षाकडे लक्ष देणा-या शाळेतील विद्यार्थ्यासारखा प्रकार होणार आहे. प्रत्येकाने आपल्या धड्याकडे पहावे, असे पंतोजीने सांगितले असता एका मुलाने शाबासकी मिळविण्यासाठी दुस-या एका मुलाविषयी पंतोजीकडे कागाळी केली, तेव्हा गूरूजीला कागाळी करणा-या मुलाचेच दुर्लक्ष अगोदर दिसून आले. आम्ही आपल्या वृत्तीकडे नर न देता दुस-याच्या वृत्तीची आणि विश्वासाची पंचाईत करू लागलो आणि त्यास शासन देऊ लागलो तर गुरूंचा गुरू जो परमेश्वर त्याच्या लक्षात आमचा हा उनाडपणा अगोदर येणार नाही काय? म्हणून व्यक्तीच्या वृत्तीच्या बाबतीत प्रत्येकाने आपल्यापुरते खबरदार असले पाहिजे, दुस-याविषयी क्षमा आणि औदासीन्य धारण केले पाहिजे, आणि समाजचालकांनी समाजाच्या मतांची मांडणी जेणेकरून निरनिराळ्या प्रकारे परिणामकारक होईल अशा प्रकारे व्यक्तीच्या विश्वासाची आणि वृत्तीची चाड बाळगळी पाहिजे. व्यक्तिविषयक वृत्तीसंबंधाने प्रत्यक्षपणे खल करून अथवा अप्रत्यक्षपणे उल्लेख करून तिला शासन देण्याच्या भानगडीत पडू नये.

अर्थशास्त्रात खोटी नाणी आणि रद्द केलेल्या नोटा जशा आढळतात, तसा धर्मशास्त्रातही एक प्रकार आढळतो. तो बुद्धिवादास आणि व्यक्तीच्या अनुभवास न पटणारी अशी जुन्या धर्मातील केवळ परंपरेच्या जोरावर चालत आलेली मते ही होत. अशा मतांच्या जोरावर जेव्हा एकाद्या धर्मसमाजामध्ये व्यक्तीचा छळ होऊ लागतो तेव्हा त्या समाजाचे दिवस भरले असे समजावे. अशा वेळी नवीन समाजाचा उदभव होतो, आणि जोपर्यंत जुन्या समाजातल्या चुका नवीन समाजाकडून होत नाहीत तोपर्यंतच तो चालू राहतो. एरवी तोही अस्तास जातो. अशा वेळेस अनुलक्षूनच “तुका म्हणे बुडे बांधोनि दगड| तेथे काय कोड घावायाचे||” ही वाणी निघाली आहे.

विसावे व्याख्यान

ता. २९ रोजी महाराष्ट्र धर्म ह्या विषयावर रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे व्याख्यान रा. शामराव देशपांडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली झाले. व्याख्यात्यांनी महाराष्ट्र धर्माचे विवेचनास आधारभूत अशी “मराठा तितुका मेळवावा| महाराष्ट्र धर्म वाढवावा” ही समर्थांची ओवी घेऊन तिच्या प्रत्येक पदावर विस्तृत प्रवचन केले. मराठा हा शब्द केवळ जातिवाचक न घेता महाराष्ट्रातील सर्व व्यक्तींना लागू पडेल असा व्यापक घ्यावा व ह्या लोकांचा संगटनापूर्वक संग्रह करून आपल्या महाराष्ट्राच्या उन्नतीस आवश्यक असलेली कर्तव्ये करावी असे समर्थांचे म्हणणे होते, असे व्याख्याते म्हणाले. रा. वामन गोपाळ जोशी म्हणाले की, “मुख्य हरिकथा निरूपण| दुसरे ते राजकारण” असे समर्थांनी सांगून परमेश्वराचे अधिष्ठान ठेवून राजकारण करणे हेच महाराष्ट्र धर्माचे लक्षण समर्थांनी केले आहे. मराठा ह्या शब्दाचा व्यापक अर्थ घ्यावयास हरकत नाही, पण असा अर्थ करून “मराठा तितुका मेळवावा” असे सांगताना महाराष्ट्रातील भटभिक्षुकांना किंवा तागडी तमाप्पांना एकत्र करण्यास समर्थांनी सांगितले नाही, तर महाराष्ट्रातील क्षात्रतेजयुक्त अशा वीरांचा-मग ते कोणत्याही जातीचे असोत-संग्रह करण्यास सांगितले व परकीयांनी ग्रासलेल्या मायभूमीची सोडवणूक करण्याकरिता अटकेपर्यंत झेंडे नेऊनसुद्धा परमेश्वरी अधिष्ठानयुक्त अशा महाराष्ट्र धर्माची वृद्धी करावी असा आदेश केला.

“गो ब्राह्मण प्रतिपालन” वैदिक धर्माचरण व स्वराज्य संस्थापन ह्या तीनही गोष्टींचा महाराष्ट्र धर्मात अंतर्भाव होतो असे समर्थांच्या ग्रंथावरूनच दिसून येते, असे अध्यक्ष म्हणाले.

विभूतीपूजा

असा कोण हतभागी आहे की ज्यास शेक्सपिअर माहीत नाही?’ आणि असा कोण त्याहूनही हतभागी आहे की ज्यास, शेक्सपिअरच्या काव्यांचे ‘भराभर पाठांतर’ करून अगर त्याची नाटके पाहून अनेकवार टाळ्या पिटूनही अखेर त्याची सार्वत्रिकता कळून आली नाही! असा कोणी दुर्दैवी असेलच तर त्याने आपल्या अंधारकोठडीतून बाहेर उजेडात यावे, म्हणजे तात्काळ ही गोष्ट दिसेल.

शेक्सपिअर ही विभूती आहे. इतर विभूतीप्रमाणे ती सर्व जगासाठी आहे अर्थात सर्व जगाची आहे. असे असून इंग्रज जर तिला केवळ स्वदेशीय आणि राष्ट्रीय देणगी असे समजून कवटाळतील तर ते जगाच्या हशास पात्र होतील. ड्रायडन्, पोप वगैरे त्यांचे राष्ट्रीय कवी होत, शेक्सपिअर नव्हे. त्याच्यात सर्व जगाचे प्रतिबिंब आहे. सर्व जगात त्याचे प्रतिबिंब आहे. सर्व जगात त्याचे प्रतिबिंब आहे म्हणून त्यास जग कळते, जगास तो कळतो. शेक्सपिअर जर नुसता इंग्रज ठरेल तर ख्रिस्त हा नुसता ज्यू ठरेल. आणि बुद्ध हाही शाक्य ठरेल. कोपर्निकसाचे सिद्धांत केवळ उलट पक्षास निरूत्तर करण्यासाठी, एडिसनचे शोध केवळ पेटंटसाठी असल्यास ह्या सगळ्या गोष्टींत सारखेच सत्य आहे.

शेक्सपिअर जर सर्व जगाची विभूती आहे, तर सर्व जगाने तिची पूजा केली पाहिजे. ‘दिक्कालाद्यन वच्छिन्न’ जी वस्तू तीच विभूतीपदाला पोहोचते.  म्हणजे देशी, विदेशी, राष्ट्रीय, प्रांतिक, प्राचीन अर्वाचीन हे गुण तिला फार थोटे होतात. शेक्सपिअरास इंग्रज राष्ट्रीय म्हणत असतील, किंवा नसतील, पण केवळ ते म्हणतात म्हणून इतरांनी शेक्सपिअरवरचा आपला हक्का सोडणे हा अस्सल मेषपात्रपणा होय. आणि ह्यास स्वदेशाभिमानाचे कारण असेल तर मात्र थट्टेची परमावधीच झाली म्हणावयाची! जगाच्या एका विभूतीस एका राष्ट्राने बळकाविले असे वाटल्यास इतर राष्ट्रांनी अभिमानास पेटून आपापल्या देशात असतील नसतील त्या विभूतींचीच फक्त पूजा करण्याचा हट्ट धरला तर ही विभूतीपूजा होणार नाही. केवळ मोहोरमी डोलेपूजा होईल. कारण हिच्यात पूजेपेक्षा हमरीतुमरीचा अंश अधिक असतो.

असो. जगाच्या ज्या सर्वसाधारण विभूती आहेत त्यांची सर्वांनी मिळून गोडीगुलाबीने पूजा केली पाहिजे. तरच पूजेचे श्रेय येईल. नाही तर हिंदुमुसलमानांसारखे दंगे होणार हे उघड आहे. कोठे शास्त्राचे, कोठे शिव्यांचे, कोठे सभ्य टीकेचे. कोठे आतल्यात धमसत असलेल्या विकारांचे निरनिराळे दंगे चालू राहतील. मानवी अंत:करणास विभूतीच्या पूजेची गरज आहे. कोण नाही म्हणेल? पण ती वरील दंगेधोपे न माजविता भागविणे साध्य आहे हे समंजस लोक तरी कबूल करतील.

कार्लाईलचे ‘विभूती आणि विभूतीपूजा’ हे पुस्तक ज्यांनी वाचले असेल-निदान वरवर तरी चाळले असेल-त्यास माहीत असेलच की विभूतीपूजेच्या आजपर्यंत तीन पाय-या झाल्या आहेत. पहिली पायरी विभूती म्हणजेच साक्षात देव मानण्याची. हिला साक्ष प्रत्यक्ष श्रीकृष्णाने गीतेच्या दहाव्या अध्यायात दिली आहे. ‘अर्जुना’ विभूती मग ती मनुष्यच नव्हे, पशू, पक्षी, प्राणी, पर्वत, हवा, देव दानव इ. इ. ‘काही असो, विभूती म्हणजे मीच स्वत:’ विभूतीचा अर्थ येथे बराच ताणला आहे. तथापि तात्पर्याला फारसा बाध आलेला नाही. नंतर दुसरी पायरी माणसांना जसा एकच कपडा नेहमी आवडत नाही, तसाच एकच विचारही फार दिवस आवडत नाही, म्हणून दुसरी पायरी, विभूती म्हणजे ज्यांच्याठायी ईश्वराची प्रेरणा होते ते थोर पुरूष असे मानण्याची. देशी भाषेत सांगावयाचे झाले तर हे पुरूष काही निव्वळ देव नव्हेत तर त्यांच्या अंगात केव्हा केव्हा देव येतो. उदाहरणार्थ शिवाजीच्या अंगात अंबाबाई येत असे, महमदाच्या कानांत कबूतर स्वर्गाचा निरोप सांगत असे, साधू पाल ह्यास ख्रिस्ताने उपदेशास बोलाविले वगैरे समजुती. कालांतराने हाही विचार जुना झाला. सर्वच माणसांच्या अंगात देव कमीअधिक प्रमाणाने प्रसंगविशेषी येतो असा अलीकडे शोध लागला आहे! पशूंच्या अंगात देव कधी येत नाही. अंगात देव येणे हेच मुळी माणूसपणाचे लक्षण. ज्यांच्यात हा माणूसपणाचे लक्षण. ज्यांच्यात हा माणूसपणा अत्यंत प्रबळ असतो त्या विभूती, ही तिसरी पायरी होय. मोठे कवी, मोठे मुत्सद्दी, मोठे जनपदहितकर्ते हे विभूती होत. हे देव नव्हेत किंवा माणूस आणि देव ह्यांमधील मिश्रजात देवमाणूसही नव्हेत. तर केवळ विशेष वाढलेली माणसेच होत असे समजण्याचा हल्ली प्रघात पडत चालला आहे. प्रथमपासून आजपर्यंत ज्या विभूती झाल्या त्या सर्व एकच जातीच्या. पण त्यांच्या पूजेच्या भिन्नभिन्न प्रकारांमुळे त्या आम्हास भिन्न भिन्न भासत आहेत.

शेक्सपिअर ही एक चालू पूजेची विभूती आहे. हिच्या पूजेचा प्रकार स्ट्रॅटफर्ड-ऑन-एव्हन ह्या गावी मला जो दिसला, तो थोडक्यात लिहीत आहे. ऑक्सफर्डहून स्ट्रॅटफर्ड हा सुंदर आणि टुमदार गाव ४० मैलांवर आहे. तिकडे निघालो असता वाटेने स्ट्रॅटफर्डचा रस्ता विचारल्यावर लोक कौतुकाने म्हणत. “कायहो, शेक्सपिअरचे घर पहावयाला निघाला? त्याची बायको अँना हातवेट हिची झोपडी पाहण्यास विसरू नका हो”,! ह्याचा अर्थ असा की, आपल्याकडे जसे देहूस जावयाचे झाले तर तुकोबासाठी, पंढरपुरास विठोबासाठी, तसे इकडे स्ट्रॅटफर्डला जाणे ते शेक्सपिअरसाठी. तेथे गेल्यावर तर शेक्सपिअर म्हणजे त्या गावचा कायमचा राजाच आहे असे दिसून आले. एलिझाबेथचे राज्य जाऊन ब्रिटनवर हल्ली एडवर्डचे राज्य आले आहे, पण स्ट्रॅटफर्ड येथील राजनिष्ठ प्रजेवर शेक्सपिअरच राज्य करीत आहे व करीत राहील. रस्त्यातील बायामाणसांनादेखील त्याच्या चरित्रातील खडानखडा माहिती विचारा. तो जन्मला ते घर जसेच्या तसेच राखून ठेविले आहे. तेथे गेल्याबरोबर तुमच्या भोवती कृष्णातटाकी संकल्प सांगणा-या ब्राह्मणाप्रमाणे रस्त्यातील भिकार मुलांची गर्दी जमते आणि ती सर्व एकदमच न विचारता परवचा म्हटल्याप्रमाणे शेक्सपिअरचे त्रोटक चरित्र ठेक्यात पाठ म्हणू लागतात! त्यात शेक्सपिअरने एकदा तरूणपणी एक हरीण कसे चोरले, त्याबद्दल त्यास कसे पकडले वगैरे वगैरे चटकदार वर्णन तर पुढे पुढे येऊन गातात. शेक्सपिअर जन्मला ते घर, तो रहात होता ते घर आणि त्याच्या बायकोची झोपडी ह्या तिन्ही ठिकाणांची उत्तम व्यवस्था शेक्सपिअरस्मारक मंडळीकडून ठेवण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाण ८|१२ आणे फी दिल्यास पहावयास मिळते. दाखविण्यास व त्यासंबंधाची माहिती सांगण्यास माणसे ठेविली आहेत. घराचा ३०० वर्षांचा जुनेपणा जितका शाबूद राखणे शक्य आहे, तितका राखिला आहे. हा कवी लहानपणी नेहमी चुलीजवळच्या कोनाड्यात बसत असे. तेही ठिकाण दाखविण्यास कोणी विसरत नाही.

ह्या घराचा अति महत्त्वाचा भाग म्हणजे कवी ज्या खोलीत जन्मला ती खोली होय. ती अगदी ओबडधोबड आहे. पण तिचे माहात्म्य किती! साधारण अजमासे किती लोक हे स्थळ पहावयास येतात म्हणून नोकरास विचारता त्याने सांगितले की, गेल्या वर्षी जगातील निरनिराळ्या ४० राष्ट्रांचे ३०,३७६ प्रेक्षक ही खोली पाहून गेले! तावदानावर, तुळईवर, भिंतीवर सर वॉल्टर स्कॉट, कार्लाईल, ब्राउनिंग, थॅकरे इत्यादि मोठमोठ्या दस्तुरखुद्द सह्या आहेत! परसातील बागेत शेक्सपिअरने आपल्या ग्रंथात ज्या ज्या वनस्पतींचा व फुलाफळांचा उल्लेख केला आहे, त्या सर्वांची लागवड आहे. घरात दुस-या एका बाजूस शेक्सपिअरच्या ज्या ज्या जिनसा मिळाल्या आहेत, त्यांचा संग्रह करून ठेविला आहे. घरातून बाहेर पडल्यावर रस्त्यातील एका दुकानाकडे पाहिल्यास चहाच्या चिनी पेल्यावर अगर एकाद्या लहानशा गुंडीवरही कवीच्या बायकोच्या झोपडीचा ठसा उमटलेला दिसेल. कवी राहत होता त्या घरातही त्याच्या जिनसांचा मौजेचा संग्रह आहे. चिलमी व दारूच्या पेल्यापासून तो बसावयाच्या खुर्चीपर्यंत. बागेत एके ठिकाणी शेक्सपिअरने स्वत: लाविलेल्या झाडाची एक फांदी लाविली आहे. तिचे आता जुने झाड झाले आहे. शेक्सपिअरबरोबरच त्याच्या झाडालाही अमर करण्याचा त्याच्या भक्तांचा विचार दिसतो. एवढ्यानेच त्यांची इच्छा तृप्त झालेली नाही. शेक्सपिअरस्मारक नाटकगृह नावाची एक भव्य आणि सुंदर इमारत व संस्था एव्हन नदीच्या काठी गावाबाहेर उभी केली आहे. ये पुस्तकालय, संग्रहालय आणि नाटकालय असे तीन भाग आहेत. शेक्सपिअरबद्दल जितके म्हणून वाड्मय अगर सामग्री उपलब्ध आहे, तिचा येथे संग्रह केला आहे. चोहोकडे कवीच्या जन्मापासून तो मरणापर्यंत निरनिराळ्या अवस्थांचे चित्रांनी व पुतळ्यांनी दिग्दर्शन केले आहे. दरवर्षी त्याच्या जयंतीचा उत्सव दोन तीन आठवडे मोठ्या थाटाचा व गर्दीचा होतो. त्यावेळी नाटकालयात प्रसिद्ध मंडळीकडून त्याच्या प्रसिद्ध नाटकांचे प्रयोग होतात. ते पाहण्यास गावोगावचे रसिक लोक येतात. मागच्या ज्युबिलीच्या वेळी तर ह्या गावी शेक्सपिअर पूजेची परमावधी झाली. तिचे मौजेचे वर्णन ऐकण्यात येते. तेव्हा ह्या कवीची मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. एक रथात कवीचा पुतळा बसवून त्याभोवती गावातील तरूणी देवदूतांचा पोषाक करून तुता-या वाजविण्यास उभ्या केल्या होत्या. एकंदरीत हा एक इंग्लंडासारख्या प्रॉटेस्टंट देशातला १९ व्या शतकातला शेक्सपिअरदेवाचा अपूर्व छबिना निघाला होता.

मनुष्यप्राण्याची स्वाभाविक उत्सवप्रियता वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या तरी वाटेने वर उफाळून येते. वर आल्यावर तिचा प्रवाह कोणीकडे वाहील ह्याचा नियम नसतो. समाजाचे खरे व कळकळीचे नायक असतात. ते ह्या प्रवाहास योग्य वळण लावून हित साधतात. धोरणी व व्यापारी लोक असतात ते ह्या वाहत्या पाण्यात हात धुऊन घेतात. जिवंत मासे प्रवाहातून उलट सुलट पोहून खेळतात. मेलेले मासे लाटांबरोबर वरवरच तरंगत जातात.

ह्या प्रकारे विभूतीपूजेचे माहात्म्य आहे.

विनोदाचे महत्त्व

स्थूल दृष्टीने पाहता जगामध्ये तीन प्रकारची माणसे आढळून येतात. अत्यंत मोठमोठे पुष्कळसे सदगुण अंगी असलेले काही महापुरूष असतात. त्याचप्रमाणे अत्यंत दुष्ट गुणांनी सडून गेलेले दुरात्मे असतात. पण ह्या दोन्ही कोटीतील माणसे अपवादात्मकच म्हणावयाची. तुम्ही आम्ही तिस-या साधारण कोटीतील माणसे, त्या आम्हांला वरील दोन्ही अपवादात्मक कोटीतील माणसाच्या गुणावगुणाविषयी विचार करून विशेष फायदा नाही. कारण, ती बोलून चालून अपवादात्मक कोटीतली. मनुष्यस्वभावरचनेचा जो साधारण इतिहास आणि नित्याचे नियम असतात त्यात काहीतरी ढवळाढवळ होऊनही अपवादात्मक माणसे उद्याला आलेली असतात म्हणून त्यांच्याविषयी आज आपल्यास काही कर्तव्य नाही.

साधारण कोटीतील माणसांचेही दोन प्रकार दिसतात. पहिल्या प्रकारची माणसे अशी असतात की त्यांच्यावर वेळोवेळी जे प्रसंग येतात त्याविषयी उगीच गंभीर विचार करीत बसण्याची त्यांना सवय असते. मागे आलेल्या आपत्ती आणि झालेल्या निराशा ह्यांविषयी ती ध्यास घेऊन बसतात, इतकेच नव्हे तर पुढे येणा-या अडचणीचीही त्यांना सारखी रूखरूख लागलेली असते. अशा त्यांच्या खोलगट स्वभावामुळे त्यांना रात्री अंथरूणात पडूनही जागण्याची व दिवसा कामाच्या वेळी पेंगण्याची पाळी येते. ह्या सर्वांचे कारण त्यांच्यातील विनोदाचा अभाव हे होय. विनोद ह्याचा अर्थ केवळ खुशमस्करी नव्हे. वेड्या-वाकड्या वाकुल्या दाखवून लोकांस हसविणे, किंवा कुत्र्याचे कान आणि माकडाचे शेपूट अशा काही तरी अकल्पित गोष्टी सांगून दुस-याचे मन रिझविणे हाही विनोद नव्हे, हा केवळ विदूषकपणा होय. विनोद म्हणजे संसारात येणा-या निरनिराळ्या प्रसंगांचा वाजवीपेक्षा जास्त चटका लावून न घेता, आपली संतोषित वृत्ती कायम ठेवणे हा होय. काही विशिष्ट प्रकारच्या वड्मयात दाखविलेला हा केवळ ग्रंथकाराचाच गुण नव्हे तर साधारण कोटीतील माणसांच्या नित्याच्या वृत्तीत कायमचा आढळून येणारा हा एक गुण आहे. ह्या गुणाने मंडित झालेली माणसे ही साधारण कोटीतील दुस-या प्रकारची होत.

ह्या गुणामुळे ही दुस-या प्रकारची माणसे नेहमी सुखी आणि आनंदी असतात. त्यांच्या मनोमंदिरामध्ये नेहमी विनोदाची हवा खेळून उबट ओलसरपणास जागा न राहिल्यामुळे क्लेश, चिंता इत्यादी कृमी त्यात साचत नाहीत. वरवर पाहताना ही माणसे केव्हा उथळ स्वभावाची दिसतात, परंतु खरा प्रकार हा असतो की त्यांना संसाराचे ओझे इतरांप्रमाणे वाटत नाही. ही माणसे स्वत:च सुखी आणि संतुष्ट असतात, इतकेच नव्हे, तर ह्यांच्याकडे जे जातील किंवा ही ज्यांच्याकडे जातील, त्यांच्याही सुखासमाधानास ही बरीच कारणीभूत होतात. हवेत उडणा-या आनंदी पाखराकडे पाहून जमिनीवर सरपटणा-या जड माणसाला जसे कौतुक आणि समाधान वाटते, तसेच ह्या दुस-या कोटीतील माणसाचे सुख पाहून पहिल्या कोटीतल्या माणसाचे दु:ख किंचित हलके होते. असा ह्यांच्या ह्या संतुष्ट वृत्तीच्या संसर्गाचा महिमा आहे.

पण ह्याहूनही थोर कामगिरी ह्या मंडळीकडूनच सहजच बजावली जाते, ती ही:- कोणतेही एकादे मोठे सत्कार्य निघाले तर त्याच्या सिद्धीचा पुष्कळसा अंश केवळ स्वयंसेवकावरच अवलंबून असतो. त्या कार्याचे उत्पादक, नेमिलेले अधिकारी आणि चालक ह्यांच्याकडूनच ते कार्य होण्यासारखे नसते. त्यांना हातभार लावावयास वेळोवेळी जी स्वयंसेवक मंडळी जमते ती ह्यावरील दुस-या कोटीतली विनोदी मंडळीच असते. मग हे सत्कार्य मोठे राजकार्य असो, किंवा एकादी सार्वजनिक हिताची गोष्ट असो, किंवा एकादा कौटुंबिक समारंभ असो त्याला मोठी मदत आणि शोभा येते, ती अशा विनोदी मंडळीकडूनच. ही जी मोठी मदत ह्या स्वयंसेवक मंडळीकडून होते ती इतक्या सहज रीतीने होते की, ती त्यांची त्यास देखील भासत नाही. सहज बसल्या बसल्या, बोलता बोलता जाता जाता ही मंडळी जो कार्यभाग उरकते, तो पहिल्या कोटीतल्या खोलगट माणसांच्या हातून पुष्कळ विचार करूनही होत नाही. दुस-याच्या कामी अशा रीतीने हात लावण्याच्या मार्गात ह्या खोलगट माणसांना स्वत:च्या स्वभावाचाच काय तो अडथला असतो. हा अडथळा विनोदी माणसांच्या मार्गात नसल्यामुळे त्यांच्या हातून नित्यश: लहानसहान सेवा भराभर कशी घडून येत असते हे त्यांचे त्यांना देखील समजून येत नाही.

आपण सुखी असणे, दुस-यास सुखी करणे, दुस-याच्या कामास हात लावणे आणि त्याचे मुळी श्रमही न वाटणे ह्या चार गुणांहूनही पाचवा मोठा गुण विनोदी माणसामध्ये आढळतो तो हा की, केव्हाही चालत्या गाड्यास जाणून अथवा नेणून त्याच्या हातून खीळ पडत नाही. हा गुण सर्वांत मोठा आहे. असे जामण्यापुरते ज्ञान आणि उघड म्हणण्यापुरते धैर्यही पुष्कळास नसते. जगाचे हित प्रत्यक्ष सत्कार्य करीत राहिल्यापेक्षाही कोणाच्या कसल्याही कामात अडचण आणि विरोधही न आणण्यात जास्त आहे हे थोडासा विचार केला असता कळण्यासारखे आहे, किंबहुना मनुष्यस्वभावामध्ये हा जो एकमेकांला अडथळा करण्याचा दुर्गुण जन्मत:च असतो, त्याचा प्रतिकार करण्यासाठीच आणि त्याचे दुष्परिणाम निवारण्यासाठीच जगातल्या मोठमोठ्या सुधारणांचा आणि परोपकारांचा उदय झालेला असतो. ह्या भाग्यवान विनोदी मंडळीने अशा प्रकारच्या अडथळ्यांना आपल्या वर्तनात कधीच वाव न ठेवल्यामुळे त्यांच्याकडून लोकहिताला मोठीच मदत होते असे म्हणावयास हरकत नाही. धर्म आणि कर्तव्य ह्यांविषयी आपली खोटीच समजूत करून घेऊन मनुष्ये वारंवार आपआपसांत तंटा माजवितात आणि त्यामुळे होणारे व्यक्तीचे आणि समुदायाचे नुकसान भरून काढण्यासाठी पुन: नवीन यत्न करावा लागतो, ह्या सर्वच खटाटोपाचे निवारण विनोदी माणसाच्या ह्या निर्विघ्नपणामुळे होते, ही गोष्ट एकदम कोणाच्या लक्षात भरण्याजोगी नसली, म्हणून तिचे महत्त्व कमी आहे असे नाही. एकाद्या महारोग्याला बरे केल्याबद्दल एकाद्या राजवैद्याची मोठी प्रसिद्धी होईल, एकादी दुष्ट चाल बंद केल्याबद्दल एकाद्या सुधारकाची कीर्ती पसरेल, परंतु शारीरिक आणि मानसिक रोगाला मुळी ठावच न दिल्याचे श्रेय ज्या कित्येक लहान माणसांना असते त्यांची नावे जगापुढे येण्यासारखी नसतात, तथापि ती कमी धन्य असे शहाण्यास म्हणता येणार नाही. ती जगापुढे आली नाहीत तरी देवापुढे येतातच.

नुकतेच परलोकवासी झालेले आमचे मित्र विश्वनाथपंत संत हे ह्यात दर्शविलेल्या दुस-या कोटीतील एक होते. त्यांच्यात तेथे सांगितलेले पाचही गुण ढळढळीत आणि नित्य आढळून येत असत. समाजात येणे जाणे, उपासना आणि अनुष्ठाने इत्यादी सभासदांची कर्तव्ये बजावणे, समाजाने प्रस्थापित केलेल्या मतांचा अभिमान बाळगणे आणि त्यांचा लोकांमध्ये प्रसार करणे इत्यादी गोष्टींच्या संबंधाने विश्वनाथपंतांचे वर्तन केवळ औपचारिक दृष्ट्या पाहू गेले असता मनात विशेष भरण्यासारखे होते असे मात्र म्हणता येणार नाही.

  1. विनययोग
  2. विठ्ठ्ल रामजी शिंदे व महात्मा गांधी
  3. विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
  4. विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
Page 7 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी