1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

ब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें)

व्याख्यान तिसरें
मूळ ब्राह्म समाज राजा राममोहन रॉय यांनीं कलकत्त्यास इ. स. १८२८ सालीं स्थापन केला. त्याचा शवसांवत्सरिक उत्सव सर्व हिंदुस्थानभर येत्या ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. ब्राह्म समाजाची स्थापना अनेक विघ्नांना तोंड देऊन राममोहननीं केली व ते लवकर विलायतेस सन १८३० सालीं गेले व तिकडेच वारले. ह्या निराश्रित अर्भकाची जोपासना पुढें महर्षि देवेंद्रनाथांनीं केली. तसेंच सन १८५८ सालीं पुढें ईश्वरचंद्र सेन ह्या अत्यंत प्रतिभाशाली तिस-या पुढा-याचा लाभ ह्या समाजास घडला.
ह्या वेळीं हिंदुस्थानांत अवघ्या १२ ठिकाणीं ब्राह्म समाजाच्या शाखा होत्या. त्या साधारण ब्राह्म समाज स्थापन झाल्या वर्षीं म्हणजे १८७८ (मे महिन्याच्या १५ तारखेस) सालीं १२४ शाखा हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांतून व भाषेंतून झाल्या. ह्या तिस-या पुढा-यानें केवळ संख्येच्या दृष्टीनेंच समाजाची अशी असामान्य वाढ केली असें नव्हे, तर त्यानेंच ह्या धार्मिक सुधारणेस हिंदुस्थानांत प्रत्यक्ष सामाजिक जीवनाचें स्वरूप दिलें. त्याच्या वेळीं हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांत इतरहि स्वामी रामकृष्ण, दयानंद सरस्वती, ईश्वरचंद्र विद्यासागर, म. ज्योतिबा फुले, ज. रानडे, तेलंग इत्यादि धार्मिक व सामाजिक सुधारक होते. पण ते केवळ पुरुषांच्याच सभा करीत आणि त्यांच्याशींच वादविवाद करून सुधारणा घडवूं पाहात, पण केशवचंद्रानें आबालवृद्धांना, बायकापुरुषांना, सुशिक्षितांना फार तर काय, पण स्वकीय परकीयांनाहि हालवून जागें केलें, व त्यांचा ब्राह्म समाज स्थापिला !
मग इतक्या प्रभावशाली पुढा-याच्या उलट साधारण ब्राह्म समाज नांवाची अधिक विकसित स्वरूपाची ब्राह्म समाजाची तिसरी आवृत्ति कां काढावी लागली? हा मोठा चित्ताकर्षक प्रश्न आहे खरा ! कोणत्याहि चळवळीच्या आरंभीं एकाच प्रेरित विभूतीचें प्राधान्य असतें. तसेंच ब्राह्म समाजाच्या पहिल्या ५० वर्षांत बहुतेक एकतंत्रीपणाच होता. मग त्या एकतंत्राचें अधिष्ठान राजा राममोहन राय असो, देवेंद्रनाथ असो, किंवा केशवचंद्र असो, एका धीरोदात्त व्यक्तीनें हालवावें, व इतरांनीं हालावें, असा प्रकार होता. पण ब्राह्म समाज ही प्रधानतः स्वातंत्र्यजनक संस्था होती. अर्थात ह्या ५० वर्षांत ब्राह्म समाजांतच नव्हें, तर अखिल भारतांत धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विचाराच्या स्वातंत्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली होती. ह्या पूर्वतयारीचें श्रेय राममहोन, देवेंद्र आणि केशवचंद्र आणि त्यांच्या प्रभावळींतील निकट अनुयायांस देणें अवश्य आहे. पण ५० वर्षांनंतर ह्या स्वातंत्र्योन्मुख चळवळीचीं सर्व सूत्रें एकाच हातांत राहणें शक्य नव्हतें. मग तो हात कितीहि पराक्रमी असो, कीं पूज्य असो, कीं पवित्र असो ! वर वर पाहणा-यांस साधारण ब्राह्म समाजाची स्थापना कुचबिहारच्या लग्नाच्या वादामुळें झाली, असें वाटणें साहजिक आहे, पण तें चुकीचें आहे. केशवचंद्रांना ब्राह्मवधूचें वय किमान पक्षीं १४ वर्षांचें असावें, असा आपणच सरकारी कायदा पास करून घेतला आणि स्वतःचीच मुलगी कुचबिहारच्या तरुण राजकुमाराला दिली. तिचें वय १४ वर्षांहून किंचित कमी आणि राजकुमाराचें वय १८ वर्षांहून कमी होतें, म्हणून घनघोर वाद उपस्थित झाला. इतकेंच नव्हे तर त्यामुळेंच त्यांच्या अनेक प्रिय अनुयायांनीं त्यांचें पुढारीपण झुगारून देऊन आपली ब्राह्म समाजाची निराळी शाखा काढली हें खरें, परंतु ही लढाई केवळ व्यक्तींची नसून तत्त्वांची होती. मताप्रमाणें वागणूक झालीच पाहिजे पण ती व्यक्ति कर्तूम् अकर्तूम् अन्यथा कर्तूम् समर्थ केशवचंद्र झाली म्हणून काय झालें? प्रश्न केवळ ब्राह्म मताचाच नव्हता, तर त्याच्या अनुष्ठानाचा होता. शिवाय आतांपर्यंत समाजाचें कार्य केवळ भावना आणि प्रेरणा ह्या दैवी तत्त्वांवरच चाललें होतें. सर्वांचीं मतें घेऊन युक्तायुक्ततेचा विचार करून एखादी कार्यपद्धतीची सनद आंखण्यांत आली नव्हती. त्यामुळें ह्या पदाला अत्यंत तीव्र व कडू स्वरूप आलें. आणि शेवटीं स्वातंत्र्य तत्त्वाचें शरीर जो सनदशीरपणा त्याचाच विजय झाला. आणि कलकत्त्याच्या टौन हॉलमध्यें प्रचंड जाहीर सभा भरून केशवचंद्रांच्या विरुद्ध साधारण ब्राह्म समाजाची जोरदार स्थापना झाली ! त्या गोष्टीला आज ५० वर्षें झालीं !
ह्यानंतर ब्राह्म समाजांत स्त्रिया, तरुण, लहान मुलें, वृद्ध, विद्वान, गृहस्थ आणि कामकरीवर्ग ह्या सर्वांचा समान दर्जानें कसा प्रातिनिधिक तत्त्वानें समावेश होऊं लागला आणि हिंदुस्थानभर ह्याच शाखेचा विस्तार केशवचंद्रांच्या नवविधान नांवाच्या शाखेहूनहि कसा अधिक झाला, ह्याचें सविस्तर वर्णन श्री. अण्णासाहेबांनीं केलें. नंतर ते म्हणाले कीं, ब्राह्म समाज व बौद्ध धर्म ह्यांत एक फरक ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. ब्राह्म धर्मांत मनुष्यजातीच्या सर्व धर्मपंथांचा समन्वय होतो, ही गोष्ट खोटी नाहीं. अर्थात् ब्राह्म धर्म म्हणून एक निराळा नवाच धर्म आहे, असें मुळींच नव्हे. पण बहुतेक जुने धर्म पंथ – विशेषतः बौद्ध धर्म हा व्यक्तिविशिष्ट स्वरूपाचा आहे. बौद्ध धर्माचाहि संघ प्रत्यक्ष सिद्धार्थाच्या काळापासून पुरातन आहे. तरी हा बौद्धसंघ म्हणजे केवळ भिक्षुसंघच म्हणजे केवळ संन्याशांचा संघच होता. गृहस्थाश्रमालाच मुळीं बौद्ध धर्मांत गौणस्थान आहे. मग धर्माच्या कौटुंबिक व सामाजिक स्वरूपाकडे ह्या धर्मांत दुर्लक्ष्य झाल्यास नवल काय? आदले दिवशीं प्रत्यक्ष धर्मानंद कोसंबी ह्यांनींच बौद्ध धर्माची अवनति कां झाली, ह्याचीं कारणें सांगतांना स्पष्ट एक कारण असें सांगितलें कीं बौद्ध भिक्षू व प्रत्यक्ष गौतमबुद्धानेंहि जातिभेदाच्या मुळावर कितीहि आघात केले तरी, बौद्ध गृहस्थाश्रमीयांनीं हिंदुस्थानांत तरी ह्या जातिभेदाचें निरसन करावें तितकें केलें नाहीं, म्हणून शेवटीं चार वर्णांच्या आतां चार हजारांवर जातींची आणि असंख्य पोटजातींची बजबजपुरी आज ह्या अभागी देशांत माजली आहे. ब्राह्म धर्माचें स्वरूप आणि कार्य ह्याचें उलट आहे. ह्या धर्मांत जगद्गुरु तर नाहींच पण उलट साध्या पुरोहिताचेंहि बंड नाहीं. ज्याचा तोच पुरोहित. धर्माच्या सर्व तत्त्वांना सामाजिक प्रत्यक्ष स्वरूप यावयाचें झाल्यास केशवचंद्रांसारख्या प्रतिभाशाली गुरूलाहि केवळ त्यांच्या आसनावरून खालीं आणावें लागतें; इतकेंच नव्हे तर आपल्या घरांतील मावशीबाई व आजीबाई, तरुण बाबू आणि लहान बेबी ह्यांचेंहि सहकार्य सामाजिक अनुष्ठानांत साधावें लागतें. हें शेवटचें काम अत्यंत कठीण आहे. आणि ह्याशिवाय तर कोणतीहि शुद्धि अथवा कसलेंहि संघटन होणें केवळ अशक्य आहे. हा सामाजिक स्वर्ग जर कोणी गेल्या शतकांत ह्या पृथ्वीवर आणिला असेल, तर तो एका साधारण ब्राह्म समाजानेंच, ह्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं.
बौद्ध धर्माविषयीं श्री. अण्णासाहेबांचा अलोट आदर आहे. आजकाल त्यांचें लक्ष्य बहुतेक बुद्धाच्या ध्येयाकडे गुंतलें आहे, असें त्यांनींच स्पष्ट सांगितलें. आणि ते म्हणाले कीं, ध्येय सामाजिक स्वरूपांत आणावयाचें झाल्यास, पंडित शिवनाथशास्त्री, विजयकृष्ण गोस्वामी, नवद्वीपचंद्रदास अशाच आधुनिक भिक्षूंची जरूरी आहे आणि त्यांनीं झालें तरी शहरांतल्या अर्धवट सुशिक्षितांपेक्षां बहुजनसमाजांतल्या बायकामुलांचेंच साहाय्य संपादिलें पाहिजे. येरवीं जेथें बौद्ध धर्माची अवनति झाली तेथें नवशिक्या ब्राह्म समाजाची काय कथा?

ब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान

आजचा विषय केवळ केशवचंद्र सेन असा नाहीं, कारण सेन या विषयावर आज वर्षभर चहूंकडे भाषणें व लेखांचा वर्षाव चालला आहे. ‘सुबोध पत्रिके’नें तर अमूल्य काम केलें आहे. विश्वधर्म विकास हाहि विषय आजचा नव्हे. तो सनातन आहे. आजच्या तास दीड तासांत तो मावणारा नव्हे. म्हणून ह्या दोन विषयांची मर्यादा परस्परांवर घालून तो आटोपशीर करण्यांत येणार आहे. तरी सेनपेक्षां विश्वधर्माचें महत्त्व जास्त असल्यानें त्याला जागा व वेळ जास्त घ्यावी लागत आहे, ह्याबद्दल माफी असावी.
सुविशाल मिदं विश्वं पवित्रं ब्रह्म-मंदिरम् |
चेतःसुनिर्मलं तीर्थं सत्यं शास्त्रमनश्वरम् |
विश्वासो धर्म मूलंहि प्रीतिः परमसाधनम् |
स्वार्थ नाशस्तु वैराग्यं ब्राह्मेरेवं प्रकीर्त्यते ||
ह्या बीजमंत्रांत केशवाचें हृदय व सर्व कार्याची घोषणा होत आहे. केशवाच्या प्रेरणेनें त्यांचे शिष्य गौरगोविंद राय ह्यांनीं हें सूत्र रचिलें आहे. पण ह्यांत नवीन काय आहे? राममोहन रायांनीं प्रथम ब्राह्म मंदिराची स्थापना केली, त्याच्या ट्रस्ट-डीडमध्यें हाच भावार्थ आहे. वैष्णव व ख्रिस्ती धर्मांचें तात्पर्य हेंच आहे.फार काय प्राचीन वैदिक उपासनेचे शेवटीं मंत्रपुष्पांजलीचा जयघोष होतो,तोहि असाच आहे:- 
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं
पारमेष्ट्यं राज्यं महाराज्य माधिपत्यमयम् |
समंतपर्या ईस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आंतादा
परार्धात पृथिव्यै समुद्र पर्यंताया एकराळिति |
तदप्येषश्लोकोsभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसन् गृहे |
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वदेवाः सभासद इति ||
ह्यांत तर विश्वधर्माची केवळ उपासनाच नव्हे तर एकांतिक राजाचा (देवाचा) हा स्तोम आहे ! आणि हा घोष सर्व देवांनीं मिळून पृथ्वील परिवेष्टणा-या वायुदेवतेच्या घरीं बसून गावयाचा आहे. ह्यांत किती आदर्श व किती काव्य आहे ! असें असून ह्या धर्माचे पुढे किती तुकडे व कशी अवनति झाली ! तेंच आज पाहावयाचें आहे. त्यांतच पुनः विकासाचे वळसे काय दिसतात तें पाहावयाचें आहे.
ह्या मंत्रपुष्पाचा सनातन देवाची पूजा हा मीं केलेला अर्थ चुकला असला तर कोणी भोजकुलोत्पन्न सार्वभौम सम्राटाचा स्तोम असावा जसा हिटलरचा गौरव होत आहे. ह्या वैदिक प्रार्थनेला अनुसरून ख्रिस्तानें प्रार्थना केली -
Our father in heaven Thy Kingdom come.
Thy will be done on earth as it is in heaven.

अंतराळांतल्या एक राजा तुझें स्वराज्य पृथ्वीवर येवो. महमुद पैगंबरानेंहि हेंच एक राळ् आळविलें. गौतमबुद्धानें जो नैतिक साम्राज्याचा दिग्विजय केला त्याची सर तर कोणलाच येत नाहीं; ह्यापूर्वीं व नंतरहि आंतरराष्ट्रीय पुष्कळ चलन वळणें झालीं, पण ह्या सर्व गत गोष्टी झाल्या. मध्य युगीन काळोखांत सर्व स्वप्नवत झालें. गेल्या पांच शतकांत विश्वामित्रानें पुनः जणूं एक नवीनच सृष्टी निर्माण केली आहे. ह्या आधुनिक विकासांत केशवचंद्राचें स्थान कोठें आहे तें पाहूं या.
पंधराव्या शतकाच्या अखेरीस युरोपांत एका प्रचंड दिग्विजयाच्या चळवळीस सुरुवात झाली. ती म्हणजे जलमार्गानें प्रवास करून नवीन जगाचा शोध लावणें, विशेषतः भरतभूमीचा मार्ग हुडकून काढणें ही होय. ह्या वेळीं इंग्लंड किंवा फ्रान्स देशाची आरमारी शक्ति उद्यास आली नव्हती. ह्या बाबतींत पहिला प्रयत्न पोर्तुगाल देशाचा होता. कोलंबसानें अमेरिका शोधून काढण्याच्याहि पूर्वीं इ. स. १४८६ चे सुमारास पोर्तुगालच्या बार्थालोम्यू डायास ह्या धाडशी पुरुषानें आफ्रिकेचा पश्चिम किनारा जवळजवळ १००० मैल लांब शोधून काढला व ह्या खंडाचें अत्यंत दक्षिणेकडचें टोंक गांठलें. त्यानंतर इ. स. १४९८ सालीं ह्या केप ऑफ गुड होपास वळसा घालून वास्को ड गामा ह्यानें हिंदुस्थानच्या नैर्ऋत्य कोप-यांत असलेलें कालीकत हें प्रमुख बंदर गांठलें. ह्यापुढें युरोपांतील धाडशी पुरुषांना नवीन मुलूख शोधून काढण्याचें व्यसनच लागलें. शेवटीं १५७७ मध्यें फ्रॅन्सिस डेक नांवाच्या इंग्रज दर्यावर्दीनें अटलांटिक मार्गानें निघून दक्षिण अमेरिकेस व नंतर केप ऑफ गुड होपलाहि वळसा घालून परत इंग्लंड गांठण्याचा दिग्विजय केला. ह्याप्रमाणें जुन्या जगाइतक्याच एका मोठ्या नवीन जगाची भर पडली. पुराणांत अमृताचा शोध करण्यासाठीं देवदानवांनीं समुद्रमंथन केलें त्याहूनहि हें मंथनाचें दिव्य अधिक परिणामीं झालें आहे. पोर्तुगाल, स्पेन, डच, फ्रेंच, इंग्रज राष्ट्रांच्या धाडशी पुरुषांची व मंडळ्यांची ह्या मंथनांतून निघालेलें एक अलभ्य रत्न भरतभू ह्या लक्ष्मीचा अभिलाप धरून हिंदी महासागरांत घिरट्या घालण्याची रीघच लागली. शेवटीं ही लक्ष्मी इंग्लंडरूपी विष्णूनें एकट्यानेंच पळविली !
पहिल्या टोळ्या चांचे, लुटारू, वाटमा-यांच्या, नंतर व्यापारी मंडळ्यांच्या, नंतर मिशन-यांच्या, शेवटीं साम्राज्यप्रसारक मुत्सद्द्यांच्या घिरट्या, असा ह्या आंतरराष्ट्रीय घटनेंत क्रम लागतो. बाजाराच्या अगोदर उचल्यांची तयारी, ही म्हण ह्या विशाल राजसूययज्ञांतहि खरी ठरते. स. १५९९ त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. लवकरच इतर राष्ट्रांच्या कंपन्या निघाल्या, त्याबरोबर इतर राष्ट्रांच्या सनदशीर कंपन्याच नव्हत तर इतर लहानमोठ्या बेसनदशीर, बेजबाबदार चळवळ्यांचा सुळसुळाट सारखा चालूं होता, त्यांना “इंटरलोपर्स” हें नांव मिळालें होतें. हल्लीं अमेरिकेंत जसे सनदशीर सरकाराबरोबरच गुन्हेगारांचे एका दुस-या पॅरलल गव्हर्नमेंटचें राज्य चालू आहे तसाच ह्या इंटरलोपर्सचा गडबडगुंडा अगदीं सन १७७३ सालीं रेग्युलेशन ऍक्ट पास होऊन वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला जबाबदार गव्हर्नर जनरल नेमला जाईपर्यंत चालूं होता. ह्याच सालीं, ह्याच मुहूर्तावर उत्क्रांति क्षितिजवर राममोहन राय हा तारा उदय पावला. हा एक अपूर्व योगायोग आहे !
पंधराव्या शतकाचे शेवटीं नवीन जगाच्या शोधाच्या ऐहिक प्रकाशानें युरोपचे डोळे दिपून गेले आहेत, तोंच ख्रिस्ती धर्मांत सुधारणेची मोठी क्रांति घडून सोळाव्या शतकाच्या आरंभीं युरोपचे आध्यात्मिक डोळेहि चक्क उघडले, व रोमच्या पोपशाहीची (पापशाही) अंधारी रात्र संपून नवीन ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. या नव्या ख्रिस्ती धर्माचें राजकारण कांहीं असो, सर्वांमागून निघावयाचें; अखेरीस शिखर गांठून सर्वांवर शिरोमणी व्हावयाचें. १७९२ च्या ऑक्टोबर महिन्यांत नॉर्थ्याम्पटन शहरीं बॅपटिस्ट पंथानें हिंदुस्थानाकरितां पहिलें मिशन काढलें. त्या वेळीं त्यांची पुंजी अवघी १३ पौंड २ शिलिंग ६ पेन्स होती, पण ईस्ट इंडिया कंपनीची मूळ पुंजी ३०,००० पौंडांची होती. जॉन टॉमस व वुइल्यम केरी हे दोनच प्रचारक लाभले. दोघेहि अर्धवटच होते. टॉमस हा उडाणटप्पू व दिवाळखोर, आणि केरी हा आपदग्रस्त, अशी ही जोडी अजब होती. ईस्ट इंडिया कंपनीला अशा मिशनचें मोठें वावडेंच होतें. चांचे पुरवले पण त्या काळीं मिशनरीची कंपनीला व्याद नको होती ! ह्यांत ब्रिटिश आत्मा दिसून येतो.
निरनिराळ्या “सुधारलेल्या” ख्रिस्ती मिशनचीं धोरणें परस्परांशीं किती विघातक होतीं व सर्वच मिळून ख-या धर्मापासून किती दूर होतीं ह्याचें एकच उदाहरण पुढें दिलें आहे.

ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग

ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचें मनांत आणून मी जेव्हां गेल्या फेब्रुवारींत कलकत्त्याहून निघालों तेव्हां माझे मनांतील मुख्य उद्देश केवळ बौद्ध धर्माचें साधन प्रत्यक्ष पाहण्याचाच होता. हा निर्वेधपणानें साधावा म्हणून इतर माझे व्यवसाय कांहीं काळ तरी बाजूस ठेवावेत असें मला वाटत होतें. पण मी जेव्हां या विचित्र देशांत संचार करूं लागलों तेव्हां प्राचीन वस्तुशास्त्रें, तुलनात्मक भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादि ज्या माझ्या आवडीच्या गोष्टी त्यांनीं मजवर एकदम हल्ला चालविला. ब्राह्मधर्माचा प्रचारक ह्या नात्यानें तुलनात्मक धर्मशास्त्राचें अवलोकन मला आजन्म करणें भाग आहे. वरील शास्त्रें तौलनिक धर्मशास्त्राच्या अगदीं हद्दीवरतीं व त्याशीं सजातीय असल्यानें त्यांच्या अध्ययनापासून विशेषतः इतक्या भिन्न परिस्थितींत आल्यावर स्वतः अलिप्त राहणें मला फार कठीण पडलें.
ब्रह्मदेशांत हिंदुस्थानांतला जातिभेद मुळींच नाहीं, ही गोष्ट अगदीं खरी आहे. तेवढ्यावरून येथें कोणत्याहि प्रकारचा बहिष्कृत वर्ग मुळींच नाहीं किंवा पूर्वीं नव्हता असा माझा समज होता. इतकेंच नव्हे तर ह्या देशांत पुष्कळ वर्षें राहून वरवर पाहणारांचाहि असाच समज असलेला मला दिसून आला; पण खरा प्रकार असा नसू अगदीं अलीकडच्या काळापर्यंत ह्या देशांत बहिष्कृत स्थितींत निदान एक हजार वर्षें तरी खितपत पडलेले चार पांच तरी मानववर्ग मला आढळले ! श्वेयो ह्या टोपणनांवाच्या एका इंग्रजानें लिहिलेल्या Burma-His Life Nations ह्या इंग्रजी ग्रंथांत मीं जेव्हां ह्या बहिष्कृत दासवर्गाचें वर्णन वाचिलें तेव्हां मला त्याचें फारच आश्चर्य वाटलें आणि जातिभेद नसतांनाहि बहिष्कृत वर्ग असूं शकतो हें अमेरिकेंतील अत्यंत सुधारलेल्या संयुक्त संस्थानांतील सामान्य लोकांचें तेथील सुधारलेल्या संयुक्त संस्थानांतील सामान्य लोकांचें तेथील निग्रोंशीं जें वर्तन घडतें व दक्षिण आफ्रिकेंतील गौरकायांचें इतर वर्णियांशीं जें वर्तन घडतें तें ज्यांनीं पाहिलें आहे त्यांना सहज पटण्यासारखें आहे.
गेल्या वर्षीं भारत इतिहास संशोधक मंडळापुढें अस्पृश्यतेचें मूळ आणि तिचा हिंदुस्थानांतील विकास ह्या विषयावर मी माझा निबंध वाचला. तेव्हांपासून अधिकच ह्या विषयाचा मी शोध करीत आहे. ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गांची मला जी माहिती शोधान्तीं मिळाली व जी हल्लींची वस्तुस्थिति जागोजागीं जाऊन मी प्रत्यक्ष निरखिली तिच्यामुळें माझ्या स्वीकृत विषयावर अधिक प्रकाश पाडणार आहे, म्हणून मी पुढील माहिती संक्षेपानें देतों.
ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गांचा उगम ब्रह्मदेशांतील गुलामगिरीच्या संस्थेंत आहे. ब्रिटिश राज्याची संस्थापना ब्रह्मदेशांत इ. स. १८८५ सालीं पूर्णपणें झाली. ह्या पूर्वींच्या स्वराज्यांत ह्या देशांत गुलामगिरीची संस्था होती. ती तेथें किती पुरातन होती हें ठरविण्याची निश्चित साधनें तूर्त उपलब्ध नाहींत. अनेक सामुग्री जमवून जी. ई. हार्वे आय. सी. एस. ह्यांनीं नुकताच एक ब्रह्मदेशाचा नमुनेदार आमूलाग्र इतिहास दिलेला आहे. त्यांत त्यांनीं इसवी सनाच्या चालू सहस्त्रकाच्या आरंभीं सुरू झालेल्या पगान येथील राजघराण्यापासून विश्वसनीय इतिहास दिला आहे. हें घराणें अनिरुद्ध या नांवाच्या पराक्रमी थोर पुरुषानें स्थापिलें. ह्या घराण्यानें या देशांत जें मोठें मन्वंतर घडवून आणण्यासाठीं अनेक राष्ट्रीय हिताचीं कामें केलीं, त्यांत देशांतील बौद्ध धर्माची सुधारणा करून मोठमोठीं बौद्ध देवस्थानें बांधिलीं हें एक काम होय. हीं देवळें बांधण्यासाठीं खेड्यांतून शेतकीवरील पुष्कळशा लोकांना जबरीनें धरून आणून गुलाम करून त्यांच्याकडून काम घेतलें. ह्याशिवाय, कायमच्या गुलामगिरीचें दुसरें एक कारण ब्रह्मदेशांत असें आहे. देवस्थानांत झाडलोट व इतर राखणदारीचीं कामें करणें हें गुलामांचेंच काम आहे. कित्येक भाविक लोक ही गुलामगिरी आपण होऊन पत्करीत असत. पण साधारणपणें राजाज्ञेनें हा जबरीचा गुरवपणा खेड्यांतून धरून आणिलेल्या लोकांवर किंवा लढाईंत जिंकून आणिलेल्या लोकांवर लादण्यांत येत असे. हार्वे ह्यांनीं पान ३३१ वर एक इ. स. ११७९ चा शिलालेखाचा उतारा दिला आहे. त्यांत अभिनंदयू नांवाच्या एका श्रीमंत दरबारी गृहस्थानें एक मोठें देऊळ बांधून त्याच्या साफसफाईसाठीं स्वतःला, आपल्या बायकोला व मुलांना गुलाम म्हणून वाहिलें असा उल्लेख आहे.

अशा देवळी गुलामांना व त्यांतल्या त्यांत लढाईंत जिंकून आणिलेल्या गुलामांवर वंशपरंपरेचा बहिष्कार पडत असे. त्यांच्याशीं इतर साधारण स्वतंत्र समाज मिळून मिसळून राहत असे. म्हणजे ब्रह्मदेशांत जातिभेद मुळींच नसला तरी स्वतंत्र आणि गुलाम असे दोन मुख्य सामाजिक भेद असत. घरकामाकरितां ठेविलेल्या गुलामांना जरी समाजांत वावरावयास मुभा असली, तरी देवळी गुलामांना फारच हीन व तिरस्करणीय समजण्यांत येत असे त्याप्रमाणें गुलामगिरींतून ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गाचा उगम झाला असावा. एकंदरींत ब्रह्मदेशांतील हल्लींची धार्मिक संस्कृति व कांहीं अंशीं घरगुती व सामाजिक संस्कृतीहि हिंदी संस्कृतींतून आली आहे असें दिसतें. निदान कांहीं वर्गांची ग्रामबहिष्कृतता तरी हिंदुस्तानांतूनच गेली असावी असें म्हणण्यास हिंदी बौद्ध संस्कृतीचाच पुरावा नसून इतरहि असा पुरावा आहे कीं, हल्लींहि जे दोन स्थितींतले बहिष्कृत वर्ग तेथें आढळतात त्यांची संडाला, डूनसंडाला, तुबायाझा अशीं जीं नांवें आहेत तीं हिंदी भाषेंतून तिकडे गेलीं आहेत. तीं नांवें चंडाल, डोम चंडाल, अशुभराजा ह्या हिंदी नांवांचेंच अपभ्रंश होत ह्यांत संशय नाहीं. संस्कृत अथवा पाली भाषांतील शब्दांचें उच्चार ब्रह्मी लोकांना नीट न करतां आल्यामुळें या भाषेंतीलच श, र ह्या अक्षरांच्या उच्चाराचा ब्रह्मी भाषेंत अनुक्रमें स, त, य असा विपर्यास व्हावा असा ब्रम्ही अपभ्रंशाचा नियम आहे. त्याबरहुकूम ब्रह्मी बहिष्कृत वर्गांचीं नांवें हल्लीं तेथें प्रचारांत आहेत. अशुभराजा ह्यांतील पहिल्या अचा लोप झाला व इतर नियमांप्रमाणें तुबायाझा असें शेवटलें नांव सिद्ध झालें आहे.
ब्रह्मदेशांत ब्रिटिश राज्य स्थापन होईपर्यंत खालील चार प्रकारचे बहिष्कृत हीन वर्ग आढळत असत.
(१) युद्धांत जिंकलेले कैदी आणि त्यांचे वंशज यांना देवळांतील सेवेला वाहिलेले गुलाम करण्यांत आलेलें असे. ह्यांना फयाचून् हें नांव आहे. फया हा शब्द बुद्ध ह्या शब्दाचा चिनी भाषेंतून आलेला अपभ्रंश आहे. बृद्ध – बुढ – भुर – फुर - फया अशी ही अपभ्रंश परंपरा आहे. फया हा शब्द ब्रह्मदेशांत बुद्ध, त्याची मूर्ति, देऊळ आणि कोणी मोठा सन्माननीय माणूस ह्या सर्वांबद्दल उपयोजिला जातो. चून म्हणजे नोकर असा अर्थ आहे.
(२) स्मशानांतील मार्तिकादि अशुभ संस्काराशीं संबंध असलेली, थडगीं खणण्यांचीं व तीं संभाळण्याचीं वगैरे हीन कामें करणारे ग्रामबाह्य वर्ग ह्यांना तुबायाझा (अशुभराजा) संडाला, डूनसंडाला अशीं नांवें आहेत.
(३) केवळ भिक्षेवर निर्वाह करणारे महारोगी व इतर असाध्य रोगांनीं पछाडलेले, हातपाय किंवा दुसरा एकादा महत्त्वाचा अवयव तुटून अपंग बनलेले ह्यांना केबा असें नांव आहे. केबा हें नांव आतां तुबायाझांनाहि लावण्यांत येतें. कारण, तेहि भीकच मागतात. के = मदत, बा = हो (संबोधन) मला मदत करा असें म्हणत भीक मागणारे असा ह्या नांवाचा मूळ अर्थ आहे.
(४) माफीचे भयंकर गुन्हेगार. अशा गुन्हेगारांना पूर्वीं स्वराज्यांत राजाच्या कृपेनें किंवा इतर कारणांनीं माफी मिळून, पोलिसची, जेलरची, फांशी देण्याची वगैरे तिरस्कृत कामें आणि अधिकार मिळत असत. त्यांना पॅगवे = पोलिस, लेयाटाँ - चोपदार, छडीदार अशीं नांवें असत. अशा
अधिका-यांचा जनतेमध्यें मोठा दरारा असला तरी त्यांच्याविषयीं सर्वत्र तिरस्कार असून ते समाजबाह्य मानले जात.
ह्याशिवाय तु – डै – डो म्हणजे राजे लोकांचे हलालखोर म्हणून एक वर्ग पूर्वीं असे; व ह्यांचा एक लहान गांव मंडालेपासून १०-१२ मैलांवर आहे असें माझें ऐकण्यांत आलें. पण मला प्रत्यक्ष जाऊन पाहण्यास वेळ मिळाला नाहीं. ह्यांचा समावेश वरील दुस-या वर्गांत मीं केला असता पण हल्लीं फारसे हे ग्रामबाह्य नाहींत असेंहि मीं ऐकलें.
वरील चारी बहिष्कृत वर्गांतील लोकांची हल्लींची संख्या हिंदुस्थानांतील बहिष्कृतांच्या मानानें फारच थोडी, म्हणजे सा-या ब्रह्मदेशांत ५|६ हजार असेल. ह्यांची स्थितीहि येथल्याइतकी करुणास्पद नाहीं. हें आपलें ठिकाण सोडून, धंदा सोडून व मूळ लपवून सर्वसाधारण समाजांत छपून गेल्यास हल्लींच्या राज्यांत कोणी पर्वा करीत नाहींत. हे जरी आपल्या मूळ गांवींच बहिष्कृत स्थितींत राहिले तरी पूर्वीं देखील, हिंदुस्थानांतल्याप्रमाणें ह्यांना अस्पृश्य मानण्यांत येत नसे; तरी पण ह्यांना गांवांत येण्याला व इतर धंदे करण्याला व लोकांत मिसळायला परवानगी नसे. म्हणून अजूनी हे मागासलेल्या विपन्नावस्थेंत खितपत पडलेले मी प्रत्यक्ष गांवोगांवी मुद्दाम जाऊ पाहिले. ब्रह्मदेशांत अस्पृश्यता नव्हती निदान हल्लीं नाहीं हें खरें असलें तरी देखील बहिष्कृतांचा व अंतःकृतांचा बेटीव्यवहार पूर्वीं होत नसें व आतांहि होत नाहीं. मग रोटीव्यवहार व बेटीव्यवहाराची गोष्टच नको. हल्लींदेखील कोणी उघडपणें आपलें मूळ वरील चार पांच प्रकारांपैकीं एकांत आहे असें सांगितलें तर त्यांच्याशीं ब्रह्मदेशांतील पुराणमतवादी बहुसंख्या नुसता भेटीव्यवहार करण्यासहि तयार नाहीं. म्हणजे गृह्य आणि सामाजिक प्रसंगीं समानतेनें बहिष्कृतास आमंत्रण करण्यास अंतःकृत वर्ग अद्यापि तयार नाहीं. ब्रह्मदेशांतील पुराणमतवाद हिंदुस्थानांतल्यापेक्षां कमी दृढमूल आहे व जो आहे तो झपाट्यानें मावळत आहे, तरी पण तो मुळींच नव्हता किंवा नाहीं असें नाहीं म्हणून तेथील बहिष्कृत वर्ग हा एक संशोधनीय विषय आहे.
वरील चारी प्रकारच्या बहिष्कृतांचा इतिहास माझ्या अल्पशा संशोधनांत जो आढळला तो संक्षेपानें पुढें देत आहे. ब्रह्मदेशाचा इतिहास अद्याप तयार व्हावयाच आहे. साधनसामुग्री मुबलक आहे. ह्या साधनसामुग्रीचा भारतीय सामाजिक इतिहासाशीं निकट संबंध आहे आणि तो रंजक व तसाच बोधकहि आहे.

बौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध

स्वत: बुद्धमुनि अनात्मवादी होता, निदान जीव, ईश्वर, ब्रह्म इ. आत्मवादांचा मोक्षाशीं कांहीं संबंध नाहीं असें सांगत असे. त्यानें अशा अनेक वादांचें जें त्याच्या काळीं शुष्क बंड माजविण्यांत आलें होतें, त्याचा प्रसार आपल्या अनुयायांत माजूं दिला नाहीं, हें सर्व खरें आहे तरी त्याच्या मागून लवकरच त्याच्या अनुयायांत हा आत्मवाद कोणत्याना कोणत्या तरी रूपानें शिरलाच. पाली भाषेंतील जातक कथांच्या द्वारां बुद्धाला देव मानण्यांत येऊन त्याचे अनेक अवतार कल्पण्यांत आले. बुद्धानें आपल्या मागें आपल्या अनुयायांचा कोणी शास्ता नेमला नव्हता. केवळ आपलें स्मरण आणि आपल्या शिकवणीचें अनुपालन तेवढेंच करण्याविषयीं त्यांनीं सांगितलें होतें, त्यामुळें बुद्धाच्या अनुस्मरणासाठीं मूर्ति आणि मंदिरें उद्भवलीं. पुढें क्रमप्राप्त महायानाचा विकास होऊन प्रत्यक्ष बुद्धालाच परब्रह्म प्राप्त झालें. तेव्हां बुद्ध, धर्म आणि संघ ह्या तीन तत्त्वांच्या पृथक् पृथक् तीन देव आणि त्यांच्या तीन मूर्तीहि बनल्या. अहिंसावाद, अवतारवाद, मूर्तिपूजा, मंदिरस्थापना, उपोसथ किंवा उपासनेचे दिवस, उपासादि व्रतें, गुरुभक्ति, इतकेंच नव्हे तर रथयात्रेसारखे सार्वजनिक उत्सवाचे प्रकार आणि तीर्थ स्थळें वगैरे जीं लौकिक भागवत धर्माचीं अनेक उपांगें आतां सर्वमान्य होऊन बसलीं आहेत, तीं सर्व जैन व बौद्ध ह्या धर्मांतूनच प्रचलित हिंदु धर्मांत हळूहळू शिरलीं आहेत, यांत शंका नाहीं. तीं वेदांच्या संहिता काळांतहि नव्हतीं, इतकेंच नव्हे तर बुद्धापूर्वींच्या प्राचीन उपनिषत्काळांतहि नव्हतीं. महाभारतांत नारायणीय पर्वांत प्रथम अवतारवाद दिसतो, पण हें पर्व निखालस बुद्धानंतरचें आहे. भारतांत मूर्ति आणि देवळें नाहींत. क्वचित् उल्लेख असले तरी ते बुद्धोत्तरकालीनच समजले पाहिजेत. विष्णुपुराणांत स्वत: बुद्धालाच विष्णूचा अवतार बनविलें आहे. फार तर काय पण वेदान्ताचें तिसरें व विष्णुभागवताचें मुख्य प्रस्थान म्हणून ज्या भगवद्गीतेची प्रसिद्धि आहे तिच्यांतील शिकवणिवरहि बुद्धाच्या मुख्य तत्त्वाचे कसे संस्कार झालेले आढळतात, यांचा उल्लेख पहिल्या व्याख्यानांत केला आहेच.

वरील विवेचनावरून विष्णु-भागवतांच्या मतावरच नव्हे तर उपासना, भक्ति आणि आचारावरहि बौद्ध सांप्रदायाचा कसा संस्कार घडला आहे किंबहुना बौद्ध सांप्रदायिक तपशिलांवरच वैष्णव सांप्रदायिक बहुतेक तपशिलांची उभारणी केली आहे, हें सूक्ष्म आणि निर्विकार दृष्टीनें पाहिल्यास दिसून येईल. इतकेंच नव्हे तर पुढें वैष्णव अथवा शैव सांप्रदायांत ज्या अनेक अनिष्ट गोष्टी शिरून त्यांची अवनति झाली, त्यांनाहि कांहीं अंशीं कारण बौद्ध महायान धर्माचें जें पुढें तांत्रिक धर्मांत रूपांतर झालें तेंच होय, हें पुढील व्याख्यानांत सांगण्यांत येईल. बौद्ध महायानाशीं शैव मतांचा आणि उपासनांचा वैष्णवांच्याहूनहि अधिक निकट संबंध आहे. शैवमत बौद्धाहून अगोदरचें असल्यामुळें कदाचित् शैवांचाच महायान बौद्धांवर परिणाम झाला असणें अधिक संभवनीय आहे. नेपाळ, बंगाल, ओरिसा प्रांतांत ह्या दोन्ही सांप्रदायाची फारच भेसळ झालेली दिसते. इतकेंच नव्हे तर पुढें इ. स. १००० नंतर जो मच्छिंद्रानें नाथपंथ उभारिला तो तर ह्या भेसळीचाच एक उघड पुरावा होय. मच्छिंद्राचा तेजस्वी शिष्य गोरखनाथ हा तर स्वत: बौद्ध योगी होता. शाक्तांमध्यें जो वाम मार्ग अद्यापि गाजत आहे, त्याचा संबंध तिबेटातूंन आलेल्या बौद्धांच्या वज्रयानाशीं विशेषत: त्यांच्या तंत्रभागाशीं आहे, हेंहि पुढील व्याख्यानावरून कळेल. तूर्त इतकेंच ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, जैन आणि बौद्ध धर्म हे “हिंदु” म्हणविणा-यांना पूर्वींपासून कोणत्याहि कारणांनीं आणि कितीहि नकोसे झाले असले, तरी वैदिक धर्माच्या आर्ष स्वरूपाला मागें टाकून हल्लीं गाजत असलेले शैव आणि वैष्णव सांप्रदाय जे बहुजन समाजापुढें आहेत, त्यांचें प्रत्यक्ष नाहीं तरी पर्यायानें बरेंच श्रेय आणि कांहीं अंशीं अपश्रेयहि जैन बौद्धांकडेच आहे.

बोल्शेव्हिझमचा बागुलबोवा

येथें जमलेल्या पांढरपेशे पुढा-यांना माझें येथवर भाषण ऐकून, मी कोणी एक नुकताच रशियांतून आलेला बोल्शेव्हिक आहे काय अशी भीति अथवा शंका येण्याचा संभव आहे. माझ्या संचारांत माझ्या कित्येक प्रेमळ मित्रांनीं ही शंका मला निर्भीड प्रश्न करून फेडून घेतली आहे. मी आपल्यास स्पष्ट विचारतों कीं मीं जर बोल्शेव्हिक असतोंच तर तुमच्यांशीं विचार विनिमय करायला आणि तुमच्या सहकार्याची अतिशय नम्र याचना करावयाला आलों असतों काय ? खोटी धास्ती घेऊ नका. बोल्शेव्हिकांचा मार्ग आणि उपाय आमच्याहून अगदीं भिन्न आहेत. ते भांडवलदारांशीं विचारविनिमय किंवा सहकार्य करण्यांत आपला वेळ गमावीत नाहींत. आम्हांला तर अद्यापि भांडवलदार व त्यांच्याच दाबाखालीं असलेले इतर पांढरपेशे ह्यांच्याच उदार व विवेकी साह्यानें खेड्यांतल्या मुक्या, झोपाळू पण कष्टाळू जनतेला जागें करावयाचें आहे. तेव्हां पांढरपेशांनो, कृपा करून, तुम्ही आमच्या कार्याविषयीं विनाकारण गैरसमजूत करून घेऊं नका. समजून उमजून तुम्ही खोटी हूल उठवाल असें आम्ही समजत नाहीं. अशा अप्रामाणिक हुल्लडखोर माणसांना येथपर्यंत येण्याची देखील तसदी घ्यावयाला नको. त्यांचें कार्य येथें न येतां व आमचें म्हणणें न ऐकतांहि करतां येईल ! त्यांचेकडे जसें आम्ही लक्ष देत नाहीं तसेंच तुम्हीहि दुर्लक्षच करा.

  1. प्रांतिक सामाजिक परिषद, सातारा
  2. पूर्वपीठिका
  3. पूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति
  4. पुराणिक आणि हरिदास
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72
  • 73
  • 74
Page 70 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी