ब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें)

व्याख्यान तिसरें
मूळ ब्राह्म समाज राजा राममोहन रॉय यांनीं कलकत्त्यास इ. स. १८२८ सालीं स्थापन केला. त्याचा शवसांवत्सरिक उत्सव सर्व हिंदुस्थानभर येत्या ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. ब्राह्म समाजाची स्थापना अनेक विघ्नांना तोंड देऊन राममोहननीं केली व ते लवकर विलायतेस सन १८३० सालीं गेले व तिकडेच वारले. ह्या निराश्रित अर्भकाची जोपासना पुढें महर्षि देवेंद्रनाथांनीं केली. तसेंच सन १८५८ सालीं पुढें ईश्वरचंद्र सेन ह्या अत्यंत प्रतिभाशाली तिस-या पुढा-याचा लाभ ह्या समाजास घडला.
ह्या वेळीं हिंदुस्थानांत अवघ्या १२ ठिकाणीं ब्राह्म समाजाच्या शाखा होत्या. त्या साधारण ब्राह्म समाज स्थापन झाल्या वर्षीं म्हणजे १८७८ (मे महिन्याच्या १५ तारखेस) सालीं १२४ शाखा हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांतून व भाषेंतून झाल्या. ह्या तिस-या पुढा-यानें केवळ संख्येच्या दृष्टीनेंच समाजाची अशी असामान्य वाढ केली असें नव्हे, तर त्यानेंच ह्या धार्मिक सुधारणेस हिंदुस्थानांत प्रत्यक्ष सामाजिक जीवनाचें स्वरूप दिलें. त्याच्या वेळीं हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांत इतरहि स्वामी रामकृष्ण, दयानंद सरस्वती, ईश्वरचंद्र विद्यासागर, म. ज्योतिबा फुले, ज. रानडे, तेलंग इत्यादि धार्मिक व सामाजिक सुधारक होते. पण ते केवळ पुरुषांच्याच सभा करीत आणि त्यांच्याशींच वादविवाद करून सुधारणा घडवूं पाहात, पण केशवचंद्रानें आबालवृद्धांना, बायकापुरुषांना, सुशिक्षितांना फार तर काय, पण स्वकीय परकीयांनाहि हालवून जागें केलें, व त्यांचा ब्राह्म समाज स्थापिला !
मग इतक्या प्रभावशाली पुढा-याच्या उलट साधारण ब्राह्म समाज नांवाची अधिक विकसित स्वरूपाची ब्राह्म समाजाची तिसरी आवृत्ति कां काढावी लागली? हा मोठा चित्ताकर्षक प्रश्न आहे खरा ! कोणत्याहि चळवळीच्या आरंभीं एकाच प्रेरित विभूतीचें प्राधान्य असतें. तसेंच ब्राह्म समाजाच्या पहिल्या ५० वर्षांत बहुतेक एकतंत्रीपणाच होता. मग त्या एकतंत्राचें अधिष्ठान राजा राममोहन राय असो, देवेंद्रनाथ असो, किंवा केशवचंद्र असो, एका धीरोदात्त व्यक्तीनें हालवावें, व इतरांनीं हालावें, असा प्रकार होता. पण ब्राह्म समाज ही प्रधानतः स्वातंत्र्यजनक संस्था होती. अर्थात ह्या ५० वर्षांत ब्राह्म समाजांतच नव्हें, तर अखिल भारतांत धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विचाराच्या स्वातंत्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली होती. ह्या पूर्वतयारीचें श्रेय राममहोन, देवेंद्र आणि केशवचंद्र आणि त्यांच्या प्रभावळींतील निकट अनुयायांस देणें अवश्य आहे. पण ५० वर्षांनंतर ह्या स्वातंत्र्योन्मुख चळवळीचीं सर्व सूत्रें एकाच हातांत राहणें शक्य नव्हतें. मग तो हात कितीहि पराक्रमी असो, कीं पूज्य असो, कीं पवित्र असो ! वर वर पाहणा-यांस साधारण ब्राह्म समाजाची स्थापना कुचबिहारच्या लग्नाच्या वादामुळें झाली, असें वाटणें साहजिक आहे, पण तें चुकीचें आहे. केशवचंद्रांना ब्राह्मवधूचें वय किमान पक्षीं १४ वर्षांचें असावें, असा आपणच सरकारी कायदा पास करून घेतला आणि स्वतःचीच मुलगी कुचबिहारच्या तरुण राजकुमाराला दिली. तिचें वय १४ वर्षांहून किंचित कमी आणि राजकुमाराचें वय १८ वर्षांहून कमी होतें, म्हणून घनघोर वाद उपस्थित झाला. इतकेंच नव्हे तर त्यामुळेंच त्यांच्या अनेक प्रिय अनुयायांनीं त्यांचें पुढारीपण झुगारून देऊन आपली ब्राह्म समाजाची निराळी शाखा काढली हें खरें, परंतु ही लढाई केवळ व्यक्तींची नसून तत्त्वांची होती. मताप्रमाणें वागणूक झालीच पाहिजे पण ती व्यक्ति कर्तूम् अकर्तूम् अन्यथा कर्तूम् समर्थ केशवचंद्र झाली म्हणून काय झालें? प्रश्न केवळ ब्राह्म मताचाच नव्हता, तर त्याच्या अनुष्ठानाचा होता. शिवाय आतांपर्यंत समाजाचें कार्य केवळ भावना आणि प्रेरणा ह्या दैवी तत्त्वांवरच चाललें होतें. सर्वांचीं मतें घेऊन युक्तायुक्ततेचा विचार करून एखादी कार्यपद्धतीची सनद आंखण्यांत आली नव्हती. त्यामुळें ह्या पदाला अत्यंत तीव्र व कडू स्वरूप आलें. आणि शेवटीं स्वातंत्र्य तत्त्वाचें शरीर जो सनदशीरपणा त्याचाच विजय झाला. आणि कलकत्त्याच्या टौन हॉलमध्यें प्रचंड जाहीर सभा भरून केशवचंद्रांच्या विरुद्ध साधारण ब्राह्म समाजाची जोरदार स्थापना झाली ! त्या गोष्टीला आज ५० वर्षें झालीं !
ह्यानंतर ब्राह्म समाजांत स्त्रिया, तरुण, लहान मुलें, वृद्ध, विद्वान, गृहस्थ आणि कामकरीवर्ग ह्या सर्वांचा समान दर्जानें कसा प्रातिनिधिक तत्त्वानें समावेश होऊं लागला आणि हिंदुस्थानभर ह्याच शाखेचा विस्तार केशवचंद्रांच्या नवविधान नांवाच्या शाखेहूनहि कसा अधिक झाला, ह्याचें सविस्तर वर्णन श्री. अण्णासाहेबांनीं केलें. नंतर ते म्हणाले कीं, ब्राह्म समाज व बौद्ध धर्म ह्यांत एक फरक ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. ब्राह्म धर्मांत मनुष्यजातीच्या सर्व धर्मपंथांचा समन्वय होतो, ही गोष्ट खोटी नाहीं. अर्थात् ब्राह्म धर्म म्हणून एक निराळा नवाच धर्म आहे, असें मुळींच नव्हे. पण बहुतेक जुने धर्म पंथ – विशेषतः बौद्ध धर्म हा व्यक्तिविशिष्ट स्वरूपाचा आहे. बौद्ध धर्माचाहि संघ प्रत्यक्ष सिद्धार्थाच्या काळापासून पुरातन आहे. तरी हा बौद्धसंघ म्हणजे केवळ भिक्षुसंघच म्हणजे केवळ संन्याशांचा संघच होता. गृहस्थाश्रमालाच मुळीं बौद्ध धर्मांत गौणस्थान आहे. मग धर्माच्या कौटुंबिक व सामाजिक स्वरूपाकडे ह्या धर्मांत दुर्लक्ष्य झाल्यास नवल काय? आदले दिवशीं प्रत्यक्ष धर्मानंद कोसंबी ह्यांनींच बौद्ध धर्माची अवनति कां झाली, ह्याचीं कारणें सांगतांना स्पष्ट एक कारण असें सांगितलें कीं बौद्ध भिक्षू व प्रत्यक्ष गौतमबुद्धानेंहि जातिभेदाच्या मुळावर कितीहि आघात केले तरी, बौद्ध गृहस्थाश्रमीयांनीं हिंदुस्थानांत तरी ह्या जातिभेदाचें निरसन करावें तितकें केलें नाहीं, म्हणून शेवटीं चार वर्णांच्या आतां चार हजारांवर जातींची आणि असंख्य पोटजातींची बजबजपुरी आज ह्या अभागी देशांत माजली आहे. ब्राह्म धर्माचें स्वरूप आणि कार्य ह्याचें उलट आहे. ह्या धर्मांत जगद्गुरु तर नाहींच पण उलट साध्या पुरोहिताचेंहि बंड नाहीं. ज्याचा तोच पुरोहित. धर्माच्या सर्व तत्त्वांना सामाजिक प्रत्यक्ष स्वरूप यावयाचें झाल्यास केशवचंद्रांसारख्या प्रतिभाशाली गुरूलाहि केवळ त्यांच्या आसनावरून खालीं आणावें लागतें; इतकेंच नव्हे तर आपल्या घरांतील मावशीबाई व आजीबाई, तरुण बाबू आणि लहान बेबी ह्यांचेंहि सहकार्य सामाजिक अनुष्ठानांत साधावें लागतें. हें शेवटचें काम अत्यंत कठीण आहे. आणि ह्याशिवाय तर कोणतीहि शुद्धि अथवा कसलेंहि संघटन होणें केवळ अशक्य आहे. हा सामाजिक स्वर्ग जर कोणी गेल्या शतकांत ह्या पृथ्वीवर आणिला असेल, तर तो एका साधारण ब्राह्म समाजानेंच, ह्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं.
बौद्ध धर्माविषयीं श्री. अण्णासाहेबांचा अलोट आदर आहे. आजकाल त्यांचें लक्ष्य बहुतेक बुद्धाच्या ध्येयाकडे गुंतलें आहे, असें त्यांनींच स्पष्ट सांगितलें. आणि ते म्हणाले कीं, ध्येय सामाजिक स्वरूपांत आणावयाचें झाल्यास, पंडित शिवनाथशास्त्री, विजयकृष्ण गोस्वामी, नवद्वीपचंद्रदास अशाच आधुनिक भिक्षूंची जरूरी आहे आणि त्यांनीं झालें तरी शहरांतल्या अर्धवट सुशिक्षितांपेक्षां बहुजनसमाजांतल्या बायकामुलांचेंच साहाय्य संपादिलें पाहिजे. येरवीं जेथें बौद्ध धर्माची अवनति झाली तेथें नवशिक्या ब्राह्म समाजाची काय कथा?