1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

विनययोग

अलीकडे नीती आणि धर्मशिक्षण ह्यांची चोहोकडे मोठी हूल उठली आहे. ह्या महत्त्वाच्या विषयासंबंधी आमच्या राष्ट्रामध्ये जागृती होत आहे, ही बरी गोष्ट आहे. पण अशा सनातन विषयाचा ऊहापोह केवळ प्रासंगिक कारणावरून आणि आनुषंगिक हेतून हल्लीच्याप्रमाणे होत आहे ही मात्र त्यातल्या त्यात गौण गोष्ट आहे. म्हणून आपण हे लक्षात आणून आपल्या मनावर जे काही प्रासंगिक आणि तात्पुरते संस्कार झाले असतील ते दूर सारून अगदी निर्लेप अंत:करणाने ह्या विषयाकडे वळूया.

मनुष्याचा स्वभाव आणि त्याचे शील ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. खाणीतून जसा दगड काढावा तसा हा मनुष्य ह्या सृष्टीत निर्माण होत नाही. अनेक अज्ञात आनुवंशीक कारणांनी मनुष्याच्या मनामध्ये संचिताचे ठसे जन्मत:च उमटलेले असतात. ह्या ठशामुळे मनुष्याच्या व्यक्तिस्वभाव बनलेला असतो. ह्या स्वभावाचा विकास आणि रूपांतरे व्यक्तीला स्वप्रयत्नांनी तिच्या भावी शीलामध्ये करावयाची असतात. ह्यावरून स्वभाव हा ईश्वरदत्त वारसा आणि शील ही स्वकष्टार्जित मिळकत असे म्हणावयास हरकत नाही. कारागिराने तयार केलेला विणा आणि गायनाच्या पूर्वी गवयाने लावलेला विणा ह्यांमध्ये जो फरक आहे, तोच स्वभाव आणि शील ह्यांमध्ये आहे. गायन व्हावयाचे असल्यास गवयास बराच वेळ आपल्या वाद्याची जुळवाजुळव करावयाची असते. लाकडाचा गुण, भोपळ्याचा गुण, तारांचा गुण इत्यादिकांची जोड कारागिराने केलेली असते. ती त्या विण्याचा एक स्वभावच म्हणावयाचा; पण गवयाने एवढ्याने भागत नाही. त्याला प्रसंगानुसार व आपल्या आवाजाच्या आटोक्याप्रमाणे तारा कमीअधीक खेचाव्या लागतात. मृदंगाचे तंग ताणावे लागतात. ह्यास त्या विण्याचे शील म्हणता येईल. तद्वतच व्यक्तीलाही आपल्या उपजत मानसिक गुणांची ओढाताण ह्या जगिक व्यवहारात करावी लागते. गवयाचाही गाण्यापेक्षा केव्हा केव्हा विणा लावण्यातच जास्त वेळ जातो, तर संसारातील साधकास आपले व्यवहारोपयोगी शील पूर्ण बनविण्यास पुष्कळ दिवस आणि पुष्कळ अनुभव सोसावे लागतात ह्यात नवल ते काय? शिवाय, संसारात व्यवहार करणे म्हणजे नुसते विणा लावून ठेवण्याप्रमाणे नाही, तर त्या विण्याच्या साहाय्याने आपल्या स्वरांचे आलाप काढून गवई ज्याप्रमाणे श्रोत्यांच्या मनामध्ये निरनिराळे इष्ट भाव उत्पन्न करतो त्याप्रमाणे सांसारिक जनांसही इतरांस निरनिराळ्या प्रकारचे शासन अथवा वळण द्यावयाचे असते.

ह्यावरून आपल्या शीलाचे अथवा चारित्र्याचे दोन मुख्य भाग होतात हे उघड आहे. एक आपण दुस-याशी कसे वागावे हा आणि दुसरा दुस-यास कसे वागवावे हा होय. आपल्या विषयविवेचनाच्या सोयीसाठी पहिल्या भागास आपण विनययोग म्हणू आणि दुस-यास शासनयोग हे नाव देऊ. शासनयोगाचा विचार पुढे केव्हा तरी करता येईल. आज विनययोगाचे विवेचन करू. गवई आपले गाणे सुरू करण्यापूर्वी प्रसंगाला अनुलक्षून विवक्षित रागदारीची योजना करून प्रसंगातील रसानुरूप आपल्या मनाची भावना करून गाणे गाऊ लागतो, त्याप्रमाणेच ह्या जगामध्ये मार्गक्रमण करू इच्छिणा-यांनी आपली मनोभावना ठरवून तदनुरूप विनययोग साधावा ही भावना कशी असावी ह्याविषयी भगवान श्रीगौतमबुद्धांनी आपल्या विनयपीठकामध्ये स्पष्ट सांगितले आहे:

अतूपमाय सब्बेस सत्तानं सुखकामतम्|
पस्सित्वा कमतो मेत्तं सब्बसत्तेसु भावये||

[आपल्याप्रमाणेच सर्व प्राणिमात्र सुखाची इच्छा करितात, असे जाणून क्रमक्रमाने त्या सर्वांविषयी प्रेमभाव उत्पन्न करावा.]

सुखी भवेय्यं निदु:क्खो अहं निच्चं अहं विय|
हिताच मे सुखी होन्तु मज्झता चथ वेरिनो||

[सदासर्वदा मी सुखी असावे, मी निर्दु:खी असावे, माझ्याप्रमाणे माझे मित्रही सुखी होवोत, मध्यस्थही सुखी होवोत आणि माझे वैरीही सुखी होवो.]

हमह्मि गामक्खेत्ताह्मि सत्ता होन्तु सुखी सदा|
ततो परं च रज्जेसु चक्कवाळेसु जंतुनो||

[ह्या आसपासच्या देशातील आणि ह्या गावातील सर्व प्राणी सर्वकाळ सुखी होवोत. ह्या राज्यातील प्राणी सुखी होवोत. ह्या विश्वातील (सर्व) प्राणी सुखी होवोत.]

तथा इत्थी पुमा चेव अरिया अनरियापि च|
देवा नरा अपायठ्ठा तथा दसविदासु च||

[त्याचप्रमाणे स्त्रिया आणि पुरूष, आर्य आणि अनार्य, देव आणि मनुष्य हे सर्व सुखी होवोत. दुर्गतीप्रत गेलेले प्राणीही सुखी होवोत. दाही दिशांला सर्व प्राणी सुखी होवोत.]

बुद्ध देवांनी वर सांगितल्याप्रमाणे मनुष्यमात्रांनी ह्या जगामध्ये आपली सुखाची आणि मैत्रीची भावना सदोदित ठेवावी असे सांगितले आहे. ही भावना पुढील सर्व विनययोगाचा पाया होय. वरील श्लोकात गौतमाने तीन गोष्टी सांगितल्या आहेत:

(१) आपण नेहमी सुखी असण्याचा प्रयत्न करावा. दु:खी राहण्यात कोणताही धार्मिकपणा किंवा मोठेपणा नाही. (२) दुस-यामध्येही हीच सुखवृत्ती वाढवावी. (३) सर्वांमध्ये सर्वकाळ आणि दशदिशा हे सुखाचे वर्तुळ पसरावे.

हे करण्यास खालील मार्ग साधावा:- (१) आपल्यामध्ये काही उपजतच दुर्गुण असतात आणि आपण जन्मल्यावर आपल्या अज्ञानामुले किंवा दुर्बलतेमुळे काही दुष्कृत्ये आपल्या हातून होतात. ह्या संचित दुर्गुणांपासून आणि क्रियमाण दुष्कृत्यांपासून जर आपली खरी सुटका व्हावयाची असेल तर हे दुर्गुण आणि ती दुष्कृत्ये आपण होऊनच उघडकीस आणिली पाहिजेत. ह्यासाठीच कित्येक धर्मांमध्ये स्वकृत पापनिवेदनाची (Confession) आणि प्रायश्चित्ताची योजना असते आणि ही अवश्य आहे. अशा रीतीने आपणच आपल्या दुर्गुणांचा आणि दुष्कृत्यांचा पुकारा केल्यास दुस-यास ती उघडकीस आणण्यास वावच उरणार नाही आणि उभयपक्षी बरीच तळमळ निवारली जाईल. (२) पण सर्वच काळ आपण आपल्या पापाचा पुकारा करीत राहणे हे व्यवहारात शक्य नसते. अशा वेळी निदान आपण आपली दुरिते अन्य कोणत्या रीतीने उघडकीस येत असली तर लपविण्याचा तरी निदान प्रयत्न करू नये. जो जो छपविण्याचा जास्त प्रयत्न होतो तो तो ती उघडकीस आल्यावर जास्त क्लेशकारक होतात. (३) तसेच आपले काही संचित सदगुण आणि क्रियमाण सत्कृत्येही असतात. ती आपण नेहमी छपविण्याचा प्रयत्न करावा. आपल्यास ज्ञान अथवा कला प्राप्त झाली तर किंवा एकादा नवा शोध लागला असता तर तो छपविण्याचा प्रयत्न करू नये. पण सत्कृत्याची गोष्ट निराळी. (४) हे सदगुण आणि ही सत्कृत्ये सर्वकाळ लपवून ठेवणे शक्य नसले तरी ती निदान आपण होऊन उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रयत्नाने ती कमी परिणामकारी होतात. (५) आपले दुर्गुम आणि दुष्कृत्ये ही ज्याप्रमाणे उघडकीस आणावी त्याचप्रमाणे उलटपक्षी दुस-याचे दुर्गुण आणि दुष्कृत्ये नेहमी छपविण्याच प्रयत्न करावा. जेव्हा कारणच पडेल, किंवा अशा रीतीने दुस-याची दुष्कृत्ये उघडकीस आणणे ही आपली सार्वजनिक नेमलेली कामगिरी किंवा नैतिक कर्तव्य असेल तेव्हाच आणि तेव्हाही ती मोठ्या नाइलाजाने आणि अनुकंपेने उघड केली तरच आपल्यास कर्तव्य बजाविल्याचे श्रेय मिळून दुस-याचे हित होते. (६) एरवी दुस-याची दुरिते सर्वकाळ छपविणे शक्य नसले तरी ती आपण होऊन उघडकीस आणण्याची वरील कारणाशिवाय कधीही उठाठेव करू नये. (७) तसेच दुस-याचे सदगुण आणि सत्कृत्ये ही होता होईल तो उघड करण्याचा प्रयत्न करावा. (८) ती निदान छपविण्याचा प्रयत्न करू नये.

विनययोगाचा असा अष्टांगमार्ग आहे. त्या मार्गाने वर गौतमबुद्धांनी उपदिष्ट केलेल्या मैत्रीभावनेची चिरकाल वृद्धी होवो.

विनययोगाची मीमांसा करताना आपल्या आणि दुस-याच्या चांगल्या आणि वाईट गुणांसंबंधी आणि कृत्यासंबंधी आपली वृत्ती कशी राखावी ह्याविषयीच्या अष्टांगमार्गाचे दिग्दर्शन वर केले. आज आपल्यावर आणि दुस-यांवर सुखाचे आणि दु:खाचे जेव्हा प्रसंग येतात त्या त्या वेळी आपली वृत्ती कशी राखावी ह्याविषयी विचार करू.

सुखाचा आपल्यावर एकादा व्यक्तिविषयक प्रसंग आला तर त्याविषयी सूज्ञ माणसाने आपल्या मित्राजवळ देखील वाच्यता करीत बसू नये, ते सुख कोणत्याही दर्जाचे असो, ते जर केवळ आपल्या व्यक्तिपुरते असेल तर दुस-यांनी वाटल्यास आपले अभिनंदन करावे आणि तेव्हाही आपण होता होईल तो थोडक्यात त्यांचे आभार मानून मोकळे व्हावे, हाच सुविनितपणा होय. पण कित्येक अभिनंदनाची वाटही न पाहाता आपल्या व्यक्तिसुखाचा पाल्हाला लावितात आणि ह्यात अविनय आहे हे त्यास कळत नाही. समुद्रकिना-यावर हिंडत असता आपल्या चिमुकल्याला एकादे फुटके शिपले सापडले आणि त्याबद्दल मोठा उल्हास दाखवीत तो आपल्याकडे आला तर आपण त्याच्या उल्हासाचे कौतुक करणे साहजिक आहे. परंतु जगामध्ये सर्वच ठिकाणी माणसाचा संबंध पितापुत्राचा नसतो आणि एकाच्या व्यक्तिसुखाचे कौतुक दुसरा करीलच ह्याचा नियम नाही.

आपल्यावर दु:खाचा प्रसंग येतो, तेव्हाही मनुष्याने आपल्या तोंडाला ‘दृढतर मौनकुलुपच’ लाविले पाहिजे. त्यासंबंधाने हळहळ किंवा हायहाय दुस-यापुढे करणे हे दुर्बलपणाचे लक्षण आहे. पुरूष अथवा स्त्री ज्या मानाने दुबळी असते त्या मानाने ही हळहळ आणि हायहाय अधिक दिसून येते. आपली खासगी दु:खे दुस-यास सांगून तादृश फायदाही होत नाही, असा पुष्कळ वेळा आपणांस अनुभव येतो. आपली दु:खाची कहाणी संपण्याची तर गोष्ट दूरच राहो, पण ती सुरू होते न होते तोच ऐकणारा आपल्या स्वत:ची दु:खे सांगू लागतो आणि ती इतका वेळ सांगत बसतो की, त्यामुळे आपण आपले दु:ख सांगितले ह्याबद्दल आपणांस पश्चात्तापच व्हावा असा कित्येकांना तरी अनुभव आला असेल. यद्यपि दुस-याने स्वत:ची दु:खे न सांगता आपली सर्व दु:खे ऐकून घेतली तरी त्यास ती ऐकून बरे वाटते असेच नेहमी होते असे नाही. शिवाय जरी आपल्या मित्रामध्ये आपणाविषयी अनुकंपा उत्पन्न होण्याचा संभव असला तरी हलक्यासलक्या प्रसंगी आणि वेळोवेळी हा संभव कसास लावून पाहणे हे योग्य नाही.

आपण आपली दु:खे दुस-यास सांगू नये इतकेच नव्हे, तर आपल्या व्यक्तिविषयक व घरगुती गरजा ह्यांचीही चर्चा विनाकारण कधीही न करण्याची जितकी खबरदारी घेववेल तितकी हितकारक आणि भूषणास्पद आहे. ह्याबाबतीत गंभीर मौन धारण केल्याने आपल्या गरजा जितक्या लवकर भरून येतील तितक्या वाच्यतेने भरून येणार नाहीत आणि त्या गरजा आपल्या प्रयत्नाच्या जोरावर भरून काढण्यात स्वत:स भूषण आणि इतरांस शिक्षण जितके मिळेल तितके आपल्या ख-या मित्रांच्या अकंपेनेही मिळणार नाही. ह्यावरून मित्रांच्या सहानुभूतीची किंमत कमी होते असे नाही. उलट तिचे प्रसंग अधिकाधिक कमी झाल्याने तिचे मोल अधिक वाढेल ह्यात संशय नाही. सहानुभूती मुळीच अनावश्यक किंवा अनिष्ट आहे असे नाही, ती अति स्वस्त होऊ नये एवढाच विनयाचा उद्देश आहे.

पण अलीकडे आपल्या राष्ट्रात काही बाबतीत उलटाच प्रकार चाललेला दिसतो. आपल्याला विवाह करावयाचा असल्यास ‘वधू पाहिजे’ अशी जाहिरात वर्तमानपत्रात देणारी मंडळी जेथे आढळते तेथे विनयाची भवति न भवति करीत बसणे हे कदाचित अरण्यरूदनासारखे होणार आहे. स्वयंवराची चाल आपल्या राष्ट्रात पूर्वी असो किंवा नसो, ती काही पाश्चात्य देशांमध्ये पूर्वापार चालत आलेली आहे, पण तेथेही वर्थमानपत्राच्याद्वारे स्वयंवर करण्याची पद्धती अद्याप चालू झाली नसता आमच्यासारख्या पुराणप्रिय लोकांनी ती इतक्या लवकर उचलली ह्यास काय म्हणावे! मर्यादा राखण्याविषयी आमची प्रसिद्धी असून असे का व्हावे? ज्याप्रमाणे आम्ही आपली अंगे वस्त्रांनी झाकावी त्याचप्रमाणे आम्ही आपल्या खासगी गरजाही झाकाव्या. निदान विनाकारण चव्हाट्यावर पाठवू नये ही खरी मर्यादा आहे.

ह्याप्रमाणे आम्ही आपल्या खासगी सुखदु:खाची चर्चा दुस-यापुढे वेळी अवेळी करू नये असे म्हटले, ह्यावरून आम्ही दुस-यांची सुखदु:खे ऐकू नयेत असे होत नाही. ह्यावर कदाचित असा आक्षेप येईल की जर आम्ही दुस-यास सांगू नयेत तर दुस-यांनीही आम्हांस सांगू नये हे योग्य, आणि जर आम्ही ऐकू तर दुस-यांस सांगावयास उत्तेजन दिल्याप्रमाणे होणार; म्हणून आपण ऐकण्याचेही वर्ज्य करावे हा उत्तम मार्ग; पण हा आक्षेप योग्य नाही. दुस-यास विनय शिकवावयाचा तो आपल्या विनयानेच चांगला शिकविला जाईल. आम्ही स्वत:च्या दु:खाची चर्चा कधीच न करून उलट दुस-यांची सुखदु:खे ऐकावयास तयार आहो हे ध्यानात येऊन दुसरे जितके लवकर विनयवान होतील तितक्या लवकर आम्ही त्यांच्या कहाणीचा अनादर केल्याने होणार नाही. उलट आम्ही कठोर अंत:करणाचे आहो असा मात्र दुस-यांचा गैरसमज होईल. शिवाय प्रसंगविशेषी परस्पर सहानुभूती अवश्य-निदान इष्ट आहे असे पूर्वी सांगितलेच आहे.

आतापर्यंत आमच्या साधारण लौकिक सुखदु:खाचा विचार झाला, पण ह्याशिवाय आपल्यास आध्यात्मिक सुखदु:खाचा अनुभव येतो. त्याविषयी आपली वागणूक वरच्याहून अगदी वेगळी असली पाहिजे. ती कधीच आम्ही आपल्याशी झाकून ठेवू नये. योग्य अवसर पाहून त्याचा फायदा दुस-यास द्यावा. आध्यात्मिक दु:खे तीन प्रकारची असण्याचा संभव आहे. पहिला प्रकार कृतकर्माबद्दल केव्हा केव्हा आपणास होणारा पश्चात्ताप होय. केव्हा केव्हा आपल्या आध्यात्मिक जीवनक्रमात निराशा वाटू लागते, हा दुसरा प्रकार व केव्हा केव्हा आपल्या अत्यंत प्रिय आदर्शासंबंधीदेखील संशय उत्पन्न होतो. ह्या तीनही अनिष्ट प्रकारांमुळे आपल्यास थोर वेदना आणि यातना होतात. त्यावेळी आपल्या वडील माणसांजवळ किंवा सुहृदजनांजवळ विसावा, शांती आणि नवीन मार्ग शोधण्यास आपण अवश्य जावे. श्रद्धादृष्टीने पाहता वरील तीनही अनिष्ट प्रकार अंती आपल्यास हितावहच होतात. मात्र एवढी सावधगिरी घेतली पाहिजे की, अशा प्रसंगी आम्ही लपवालपव किंवा उडवाउडव न करता मन अगदी आरशाप्रमाणे मोकळे ठेवावे आणि आपल्या शत्रूसही आत येण्यास द्वार खुले करावे. पण जनरूढी पाहता लोक साधारणत: अशा प्रसंगी अनुभव नसताना उगीच पोकळ सुखवादाच्या आणि आशावादाच्या गोष्टी सांगत असतात. आध्यात्मिक बाबतीत असा औपचारिकपणा करू नये. आपल्या मनास संशयाचा स्पर्श झाला किंवा त्यावर निराशेची छाया पडली की आम्ही खात्रीने अपवित्रच झालो असे समजू नये. केव्हा केव्हा प्रामाणिक संशयाची योग्यता आणि पवित्रता प्रामाणिक श्रद्धेइतकीच असते, मग ती अंधपरंपरागत श्रद्धेहून अधिक आहे हे सांगावयास नकोच. संशय ही मनोविकाराची एक पायरीच आहे, इतकेच. ह्या पायरीवर पोहोचलो असतो तेथेच थबकण्याची किंवा खाली पाहण्याची चुकी करू नये. कोणी आसपासचा सांगाती किंवा कोणी वरच्या पायरीवरचा गुरू ह्यांची कास धरण्यास धावावे. अशा संशयस्थितीचा संसर्ग आपल्याहून कमी अधिकाराच्या माणसास न लागेल अशी खबरदारी घ्यावी.

विठ्ठ्ल रामजी शिंदे व महात्मा गांधी

[विठ्ठल रामजी शिंदे आणि महात्मा मोहनदास करमचद गांधी ह्यांनी परस्परांस लिहिलेली पत्रे खाली दिली आहेत. त्यांतील विषय ‘अस्पृश्योद्धाराचा कार्यक्रम व तो पार पाडण्याची पद्धती’ हा प्रामुख्याने आहे. शिंदे ह्यांनी त्या संबंधीच्या आपल्या विचाराचे एक टिपण गांधीजींना पाठविले होते. त्या टिपणावरून झालेला हा पत्रव्यवहार आहे..........संपादक]

Poona, 25-11-1924

My dear mahatmaji,

Mr. patade who saw you in the All Party Conference, tells me that the very brief note I sent to you through him, was described by you as too bad. I was painfully surprised to hear this message from a good and frank soul as yourself. It was not at all a personal note to you. It was an official note from a very humble servant of the Depressed as myself to an almost divinely inspired leader of India as you are. The views and fears I expressed in my note wre generally of the depressed classes and specially of this Mission and not particularly my own.

Khadi occupies the first place, Hindu-Mahomedan Unity second and untouchability perhaps third at the highest in your heart. But in mine, it occupies the very first. Certainly I do not presume to compare myself with you. Very likely I may be wrong and you right in practical politics. I wrote that note in great haste yet in loyalty to my heart and had to send it to you as a leader and not as an individual merely.

You know the gulf between professions and practices of the Congress even under you towardsthese unfortunate untouchables, the so-called Hindus! In the Nagpur congress subject committee I took part but to no purpose; of course, I am not a leader. But since then no leader worth mentioning ever found time to look into the grievances of these people except yourself, and Mr. Rajagopalachari. In spite of you, the Satyagriha in Southern India which I have been myself personally studying on the spot is beautifully neglated by our leaders. You could not go to vykome and Pandit Malawiyaji would not go. While Shraddhanandji who met me at Mangalore in perhaps now made to repent for his activities in this unfashionalbe field!

Last eight months I spent in Malabar and South Kananra in quiet work, I am convinced that not only the orthodox but even the most vocal liberals, not even the no-changes, with all their “constructive” premises have any serious thought yet to give to this problem. No organized body. Alien, or Indian, in yet prepared to give to the Depressed Classes any recognition as a political asset at all.

Mr. Patade reports that he approached about a dozen highest All-India leaders who were last week in Bombay, but they all declined to accept the presidentship of the coming All-India AntiUntouchability Conference in Belgaum. You remember you kindly presided over it at Nagpur. But now after all these years of  sympathetic talk almost everybody secms to be too busy for this “third rate” cause!

At present I don’t want to trouble you with any appeal, except that you should be good enough to let me know at your earliest as to how my note to you was “too bad”. Mr. Patade has already explained to you the differences of this Mission with the Parent Society at Bombay.

P.S.:

If in writing this, I have done anything wrong, I trust you will foregive me in your goodness. I am very happy to hear that you have recovered your health.

Sabarmati,
12-12-1924

Your letter has followed me on my travels. I called your previous letter too bad because it contained a threat. I made the remark as I knew you as a worker in the same fields. You wrong in saying that untouchability occupies the third place in my heart. It occupies an equal place with the rest. You are superior because for you, it is the sole concern.
Yours sincerely,
M. K. Gandhi

विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड

[विठ्ठल रामजी शिंदे ह्यांजकडून त्यांच्या आयुष्यात एकेश्वरी मताचा व तदनुसार चालणा-या प्रार्थना समाज व ब्राह्मसमाज ह्यांच्या तत्त्वप्रणालीचा प्रचार, त्याचप्रमाणे अस्पृश्योद्धार व शिक्षण प्रसार हीच कार्ये प्रामुख्याने झाली असावी, व त्यामुळे निष्ठावंत ब्राह्मधर्मप्रचारक व उदारवृत्तीचे त्यागी अस्पृश्योद्धारक म्हणून सामान्यत: ओळखले जात असले तरी ते त्याहून आणखी काही वेगळे होते. त्यांचे व्यक्तित्व हे अनेक पैलूंचे होते. त्यांची बुद्धी अनेक विषयसंचारी होती. धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र राजकारण इ. अनेक विषयांचे आलोडन करण्यात त्यांचे मन रमे. ते त्यावर सूक्ष्मपणे विचारही करीत. “बाबा वाक्य प्रमाणम” असे न मानता प्रत्येक विषयाच्या किंवा विचाराच्या मुळाशी जाऊन त्याची जात व त्याचे स्वरूप ते नीट समजून घेत. मगच त्याविषयी बोलत किंवा लिहीत. कोणी केवढाही विद्वान असो, त्याने केलेले विधान किंवा प्रतिपादिलेला सिद्धांत कितपत साधार व सत्येतिहासास धरून आहे हे चिकित्सापूर्वक तपासल्याशिवाय त्यांचा स्वीकार वा धि:कार करण्यास ते तयार होत नसत. ‘मराठ्यांची पूर्वपीठिका’ ‘भागवत धर्माचा विकास’, ‘भागवत धर्म आणि महाराष्ट्र धर्म,’ कोकणी व मराठी, कानडी आणि मराठी, राधामाधवविलास चंपू आणि राजवाडे, हे त्यांचे लेख किंवा ‘अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा त्यांचा ग्रंथ वाचल्यास ह्याची प्रचीती येईल. ‘भारतीय समाज, त्याचे उत्थान, पतन व पुनरूत्थान’ ह्या विषयाचा शिंदे ह्यांनी सखोल अभ्यास केला होता. ह्या अभ्यासाचा फायदा आपल्या देशबांधवास ग्रंथरूपाने करून द्यावा, असे त्यांस त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात फार वाटे. त्यानुसार त्यांनी ‘प्राचीन व अर्वाचीन भारताचा सामाजिक इतिहास’ लिहिण्याची एक योजनाही आखली होती. ह्यासंबंधी शिंदे ह्यांनी आपल्या इतहास लेखनाच्या योजनेविषयी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्यास लिहिलेले पत्र खाली दिले आहे.................

Poona,
27-10-1922

May it please Your Highness,

In the Sahitya Conference held under the distinguished Presidentship of Your Highness at Baroda last year, I had the honour of a private interview with Your Highness when I discussed personally the question of State records at Baroda and how far would they be open for my research. I have a mind to bring out a Social History of India ancient and modern. It was your Highness who kindly enabled me to take a two years course in comparative Religion and Sociology at the Manchester College. Oxford, in 1901-1903. Since my return home I devoted my life to practical social work throughout India. Whereby I could add the benefit of practical experience to that of my studies in the Bombay and Oxford Universities. This is my humble equipment for the above literary venture. I have already approached a few prominent and enlightened rulers of other States also, and hope that if I be enabled to devote the remaining part of my life to literary work. I may contribute my mite to the Sociological Literature in India.

With this end in view. I  most respectfully beg to request if I be appointed the curator of the Central Library and the Records of the Baroda State as an independent officer directly under Your Highness’ kind guidance and patronage. If Your Highness be pleased, I should like to conduct a magazine in Marathi under the name “ITIHAS” whereby I may publish in instalments the material of the proposed History before the whole is published ultimately in a consolidated form. I may also be allowed to deliver occasional lectures in the Baroda College by way of popularizing the subject-matter of this History. I beg to enclose herewith osme copies of my correspondence and printed matter in this connection, for Your Highness’ Kind perusal.

Awaiting Your Highness’ kind orders.

I beg to remain Your Highness,

Most obedient servant,
V.R. Shinde

विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती

[१९१९ च्या राजकीय सुधारणांच्या कायद्यानुसार प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका १९२० च्या नोव्हेंबरात  व्हावयाच्या होत्या. त्या जिंकण्यासाठी निरनिराळ्या राजकीय पक्षांनी कंबरा कसल्या. राष्ट्रीय पक्ष, नेमस्त पक्ष, ब्राह्मणेतर पक्ष ह्यांची खलबते सुरू झाली. अशा समयी अस्पृश्योद्धाराचे कार्य करीत असलेले विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी आपण पुणे शहराच्या जागेकरिता  निवडणुकीस उभा राहणार असल्याने जाहीर केले. ते कळल्यावर, सरकारने मराठ्यांसाठी ज्या सात राखीव जागा ठेविल्या होत्या, त्यांपैकी एका जागेसाठी ब्राह्मणेतर पक्षातर्फे त्यांनी उभे रहावे असे त्यास मराठा मंडळीकडून सुचविण्यात आले. पण, त्यांनी “त्या राखीव जागेसाठी मी उभा रहाणार नाही. त्यातील जातीयवाचक तत्त्वाच्या मी विरूद्ध आहे.” असे स्पष्टपणे बोलून दाखवून मराठे मंडळीची सूचना मान्य केली नाही. ‘ब्राह्मणेतर पक्ष’ हे नाव त्यांना पसंत नव्हते. सर्व पक्षांचे साहाय्य मिळवून ‘उघड्या जागे’साठी आपण उभे रहावे असा त्यांचा मनोद्य होता. त्याप्रमाणे त्यांनी आपण ‘बहुजनां’साठी उभा राहू इच्छितो, असे जाहीरही करून टाकले. आपल्या जाहिरनाम्यात त्यासंबंधी त्यांनी खालीलप्रमाणे लिहिले होते.

“हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीय दृष्ट्या दोन मुख्य भाग पडत आहेत. (१) विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबल ह्याने पुढारलेला वर्ग, (२) आणि दुसरा ह्यातील कोणतेच बळ अंगी नसल्याने व नाइलाजाने मागासलेला वर्ग किंवा बहुजनसमाज. ह्या दुस-या वर्गातच अत्यंत तिरस्कृत अशा अस्पृश्य वर्गाचा अंतर्भाव होतो. हल्लीच्या राजकीय सुधारणांचा अरूणोद्य होतो न होतो तोच ह्या दोन भागांत मोठा विरोध भासू लागला. आणि ह्या विरोधानुसार बहुजन समाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाचा एक नवीन पक्षच होऊन चुकला आहे. ह्यालाच ब्राह्मणेतर पक्ष असे नाव दिले जाते. पण नाईलाज आणि बलहीनता ही जी मागासलेल्या वर्गाची मुख्य लक्षणे ती ह्या वर्गाच्या पक्षास ‘ब्राह्मणेतर पक्ष’ असे जातिविशिष्ट नाव दिल्याने अगदी काटेकोर रीतीने सार्थ होत नाहीत. म्हणूनच ह्या नवीन पक्षास ‘बहुजन पक्ष’ अथवा ‘जनपद पक्ष’ असे अगदी सार्थ व निर्विकल्प नाव दिल्याने त्यावर कसलाही आक्षेप आणण्यास जागा नाही.”

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्या उमेदवारीस पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुण्याच्या भवानी पेठेत बडोद्याचे खासेराव जाधव ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक जाहीर सभा भरली. तीत प्रांतिक कायदेमंडळातील ह्याच जागेसाठी उभे राहिलेले नरसिंह चिंतामण केळकर ह्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी भाषण केले. त्यात ते ...... “माझे वाडवडील शेतकरी होते. मी ‘मराठा’ पत्राचा संपादक होतो. म्हणून मी मराठाच आहे.” असे बोलले. केळकरांचे हे बोलणे कोल्हापूरचे शाहू महाराज ह्यांच्या कानावर गेले. केळकरांच्या ह्या बोलण्याचा शाहू महाराजांना राग आला. त्यांनी शिंदे ह्यास खालील एक विस्तृत पत्र व लगोलग दुसरे दिवशी आणखी एक छोटे पत्र धाडले......
संपादक]
रायबाग, कंप
२९/८/२०.

सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही वि. की मला मनापासून आपले अभिनंदन करण्याची परवानगी द्या. आपण पुणे शहरातर्फे निवडून यावे अशी माझी आशा आहे व खरोखरच यावे. आपले ध्येय व माझे ध्येय एकच आहे. जात नसावी पण वर्ग जरूर पाहिजेत व वर्ग जरूर राहणारच. सर्व पाश्चिमात्य देशांतही ते आहेत. नरसिंह चिंतामण केळकर म्हणतात की, “मी मराठा आहे. मी शेतकरी नाही व शइपाईही नाही तर वि. रा. शिंद्यांना न निवडता मला निवडून द्यावे. कारण माझी आणि त्यांची सामाजिक स्थिती एक आहे.” कोठे विठ्ठल रामजी शिंदे व कोठे नरसिंह चिंतामण केळकर? कहां राजा भोज व कहां गंग्या तेली? कुठे इंद्राचा ऐरावत व कुठे शामभटाची तट्टाणी? वि. रा. शिंदे जातिभेद व जातिमत्सर विसरून आपली धनदौलत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जे का रंजले गांजले| त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा| तोचि साधु ओळखावा||१|| शिंदे (असे) आपले वर्तन आहे. मी स्तुती करतो असे नाही. इलेक्शनमध्ये निवडू येण्याकरिता केळकरांसारख्या मनुष्याने वि. रा. शिद्यांचे किंवा डोमकावळा व मोराची पिसे ह्या गोष्टीतल्याप्रमाणे वि. रा. शिंद्यांचे सोंग काढू पाहिले तर निदान आता तरी लोक इतके धूर्त व चतुर आहेत की, हे शिंद्यांचे सोंग आहे असे ओळखतील. मग इतक्या नित्कृष्टावस्थेत जाऊन एन. सी. केळकरांना असे वाटते का की, आपण कट्टे चातुर्वर्ण्यं धर्मवादी असून रोटीबेटी व्यवहारास कबूल नव्हे, तर स्पर्शास्पर्शास कबूल आहे असे म्हणण्यास लाज वाटते.

त्यांनी शिंद्यांची बरोबरी कशी करावी? बरोबरी होणे शक्य नाही. मी म्हणे ‘मराठा’ वर्तमानपत्र चालविले. त्यांच्यावर मी म्हणतो की, माझ्या बैलाचे नाव मी ‘ब्रिटानिया’ ठेवले. माझ्या आवडत्या घोड्याचे नाव ‘टर्किश फ्लॅग’ ठेवले. माझ्या गार्डचे नाव ‘जपान’ ठेवले. म्हणून मी जपानी अगर तुर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल? किंवा ते मला कबूल करतील कां? अर्थातच नाही. वि. रा. शिंदे मराठा वर्गापैकी आहेत. जपानातील लोकांप्रमाणे व त्यातील सामुराई वर्गाने आपले उच्चस्थान सोडून सर्व लोकांना आपल्या बरोबरीने केले व देशोन्नती केली, त्याप्रमाणे अवलंबन केले आहे. एन. सी. केळकर रोटीबेटी व्यवहार करण्यास कबूल नाहीत. इतकेच नव्हे तर स्पशास्पर्श करून गरीब लोकांशी बोलण्यातही त्यांना कमीपणा वाटतो. अशा स्थितीत मी ‘मराठा’ वर्तमानपत्र चालवितो म्हणून लोकांना फसविण्यास प्रवृत्त होणे किती तरी शरमेचे आहे. “ज्याचे त्याला व गाढव ओझ्याला” ह्या नियमाप्रमाणे ‘मराठा’ हे नाव वर्तमानपत्रात देऊन मराठा व ब्राह्मणेतर ह्या वर्गाचे काय कल्याण केले? मुळीच नाही. मग कशाला ‘मराठा’ ह्या पत्राचे नावाखाली दडायचे? इतकी मी आपली स्तुती केली ही काही कारणाने केली असे आपल्याला वाटत असेल, परंतु, तसे मात्र नाही. परंतु एक विनंती आपल्याला करणेची आहे. इतके दिवस गणेश उत्सव, शिवाजी महाराज ह्यांच्या नावाखाली दडून टिळकांनी आपला नावलौकिक केला. गणेश उत्सव काढून काही वर्षापूर्वी मोहरमच्या छातीवर बसविला. शिवाजी उत्सव करून ब्राह्मणेतरात थोरवी मिळविली. परंतु त्या शिवबाचे मात्र कोणीही चरित्र लिहिले नाही. शिंदे, आपण त्या शिवबाचे गोड व सुरस चरित्र लिहून त्या शिवाजीची सेवा केल्याबद्दलचे यश आपण घ्यावे अशी माझी इच्छा आहे. माझे वडील चौथे शिवाजी यांच्याबद्दल टिळक-आगरकर तुरूंगात गेले. परंतु त्या दुर्भागी राजपुत्राचे कोणी पुस्तक लिहून छापले काय? नाही. ते मेले व टिळक आगरकर लोकप्रिय झाले. आपल्यास पाहिजे ती रेकॉर्डची माहिती देऊन ह्या दोन राजपुत्रांचे पुस्तक लिहिण्यास मी विनंती केल्यास आपल्याला फार त्रास दिल्यासारखा होणार नाही असे वाटते. मी पुण्यास लवकरच येणार आहे. भेटीअंती सर्व खुलासा. परमेश्वर आपल्याला ‘इलेक्ट’ करो अशी परमेश्वराची प्रार्थना करून पत्र पुरे करतो.

जहाल असोत किंवा मवाळ असोत, जपानी असोत किंवा टर्किश असोत, आमचे धोरण असेच असणेचे की, ज्यात जनतेचे धोरण त्याशी आम्ही साहाय्य करणेचे. हेच ना आम्ही आमचे ध्येय ठेवणेचे? ह्यात काय चूक असल्यास लिहून कळवावे. “सत्यंच सत्यंच” ह्या म्हणीप्रमाणे सत्य पक्षाला आमच्या पक्षाची नेहमी मदत करणेचे हेच ध्येय. असेच ना खरे? आपण वृद्ध अनुभवशीर आहात. म्हणून आपल्या उपदेशाची अपेक्षा मी करीत आहे. पत्राचे उत्तर जरूर येईल अशी आशा आहे. पत्र श्रीपतराव शिंदे, जेधे, काळभोर ह्यांना वाचून दाखवावे. कळावे बहुत काय लिहिणे लोभ असावा ही विनंती.

आमचा पक्ष सत्याचा आहे. आमच्या पक्षाचे सत्यपक्ष हे ध्येय आहे. आम्ही कुणातच मिळू इच्छित नाही. सत्य असेल तेथे मिसळल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हेच ना आम्ही मुलांनी ध्येय ठेवणेचे? कळावे बहुत काय लिहिणे लोभ करावा ही विनंती.
शाहू छत्रपती,
कोल्हापूर, ३०/८/१९२०

सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही वि. वि.

आपण आम्हा सर्वांचे विनंतीकडे लक्ष देऊन इलेक्शनला उभे रहाण्याचे कबूल केले ह्याबद्दल आम्हास आपले मोठे उपकार वाटत आहेत. आपल्यासारखे मोठे योग्य पुरूष मराठा समाजालाच काय तर कोणत्याही समाजाला लाभले तर फारच उत्तम आहे. इलेक्शनच्या कामी माझ्या हातून जी सेवा होईल ती मो मोठ्या आनंदाने करीन. कळावे लोभ करावा ही विनंती.
शाहू छत्रपती.

[शाहू महराजांनी शिंदे ह्यांस असे आश्वासन दिले असले, तरी त्याप्रमाणे त्याजकडून प्रत्यक्ष कृती घडली नाही. स्वतंत्र म्हणून उभे राहिलेले वासुदेवराव गुप्ते (दिवाण सर सबनीस ह्यांचे मेहुणे) ह्यास त्यानी पाठींबा दिला. स्वत:, महाराज आणि त्यांचे दिवाण रावबहूदूर सबनीस हे पुण्यास निवडणुकीच्या दिवसांत तळ देऊन बसले होते. शिंदे ह्यास दिलेल्या आश्वासनाप्रमाणे न वागता त्यांच्या प्रतिस्पर्ध्यास साहाय्य करण्यास महाराजांनी उभे रहावे, हे पाहून आश्चर्यच वाटते. पण त्याला तसेच एक निमित्त कारण झाले होते. महाराजांनी त्या सुमारास मराठा क्षात्रजगतगुरू नेमण्याचा विचार चालविला होता. शिंदे ह्यांचा ह्या नेमणूकीस विरोध होता. तो महाराजांस मानवला नाही. त्यांनी शिंद्यांकडे पाठ फिरविली व ते गुप्ते ह्यास पाठींबा देण्यास पुढे सरसावले. शिंदे ह्यास अपयश आले..... संपादक.]

शिरोळ कँप, १७/७/१९२१
सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही विनंती विशेष.

मी कोल्हापुरास असताना आपण एकदा इकडे येऊन जावे. हल्ली कोल्हापूर म्युनिसिपालिटीचे चेअरमन हे अस्पृश्य जातीचे असून, म्युनिसिपालिटीत एक व्हटकर नावाचा क्लार्क वीस रूपये पगारावर अस्पृश्य जातीतील आहे. काम्युनल रिप्रेझेंटेशन अस्पृश्यांना व ब्राह्मणेतरांना दिल्याने हा त्यांना चान्स मिळाला आहे. सॅनिटेशनच्या पॉईंटवर आजवर ब्राह्मणाकडून अस्पृश्य मानलेल्यांना जो त्रास होत असे तोही आता नाहीसा झाला आहे. तेव्हा ही सर्व परिस्थिती आपम येऊन अवलोकन करून जाल, अशी आशा आहे.
कळावे, लोभाची वृद्धी व्हावी ही विनंती.
शाहू छत्रपती

विजापूर येथील धर्मकार्य, विजापूर

(उदार धर्माची सभा-विजापूर प्रांतिक परिषद या सभेत प्रार्थना व ब्राह्मसमाजाची बाजू मांडताना.....)

राजकीय प्रांतिक परिषदेसाठी हा भव्य मंडप उभारला जात असताना तिचे अधिवेशन होण्यापूर्वीच अवांतर गोष्टीचा विचार करण्यासाठी ह्या धर्मसभेचे पिलू ह्या मंडपात का सोडण्यात आले असा प्रश्न तर्कप्रिय लोकांकडून करण्यात आलेला माझ्या कानावर आला आहे. व त्याचे उत्तर देण्याला हाच प्रसंग योग्य आहे. आम्हा पौरस्त्य लोकांच्या विशेषत: सनातन म्हणून गाजलेल्या हिंदू धर्मीयांच्या कीर्तीचा नगारा असा आहे की, आम्ही कोणतेही काम ईश्वराचे नाव आणि धर्माचा संस्कार केल्याशिवाय करीत नाही. जेवणाचा घाससुद्धा नारायण असे नाव घेऊन घेतो. उद्या तर ह्या ठिकाणी मोठमोठे राष्ट्रीय निश्चय होणार आहेत, त्यापूर्वी ईश्वरस्मरण न करणे हे आपल्या सनातन धर्माभिमानास शोभेल काय? ह्यावरून आजची ही धर्मसभा उद्याचे राष्ट्र कार्याचे पुण्याहवाचन म्हटल्यास हरकत नाही आणि त्याच्याविषयी कुतर्क काढणे म्हणजे आमच्या पूर्वपरंपरेला झुगारून देणेच होय. ज्या प्रार्थना समाजाचा एक सभासद म्हणून मी आता बोलत आहे, त्याने पूर्वपरंपरेला धरून सनातन धर्माचेच कार्य आजवर केले आहे. त्याच्या ध्येयावर ऐक्य, श्रेय, आणि सामाजिक उन्नती आणि त्याच्या पायावर राष्ट्राची प्रगती ही तत्वे फडकत आहेत. ज्या धर्माला ही तत्त्वे मान्य नाहीत. त्याला धर्म म्हणण्याची माझी तरी तयारी नाही. केवळ व्यक्तीची उन्नती करणे हे प्राचीन हिंदू धर्माचे लक्षण होते आणि केवळ समाजाच्या उन्न्तीसाठी झटणे हे आधुनिक खिस्ती धर्माचे ब्रीद आहे. ह्या दोहोंचा गोड मिलाप करण्याची हाव प्रार्थनासमाज बाळगीत आहे. आणि त्या ध्येयाच्या आड येणे म्हणजे अधर्म अशी माझी अल्पमती आहे. इतकेच नव्हे तर परवा मुंबईस भरलेल्या अस्पृश्यता निवारक सभेमध्ये प्रत्यक्ष रा. टिळकांनीही असे सांगितले की, हल्ली अस्पृश्य समजलेल्या लोकांची अस्पृश्यता जावी हा पवित्र हेतू देवालाही प्रिय असला पाहिजे. आणि तसे नसेल तर तो देवच मला मान्य नाही. वरील चार तत्वे ज्या पंथाला मान्य नाहीत, तो धर्मपंथच नाही, असे म्हणण्यात प्रार्थनासमाज तरी काय धाडस करीत आहे? असे सांगून रा. शिंदे ह्यांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगी कोणाही पुढा-यांनी अथवा अनुयायांनी आपल्या जातीच्या मताच्या किंवा पंथाच्या सबबीवर आमच्या ह्या हतभागी देशात दुहीचे, द्वेषाचे किंवा भ्रांतीचे साम्राज्य माजवू नये, अशी विनंती केली.

विजापूरसारख्या ठिकाणी इतक्या लोकांना प्रार्थना व ब्राह्मसमाजाची माहिती करून देण्याची संधी आमच्या बंधूंना साधता आली हे फार ठीक झाले. हा योग मुख्यत: रा. शिंदे यांनी जुळवून आणिल्याचे कळते.

  1. वि. रा. शिंदे व राजाराम छत्रपती
  2. वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
  3. वाई प्रार्थना संघ मंदिरप्रवेश
  4. व-हाड मध्यप्रांतील सत्यशोधक हीरक महोत्सव
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
Page 8 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी