1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

वि. रा. शिंदे व राजाराम छत्रपती

[कोल्हापूरचे शाहू छत्रपती ह्यांचे चिरंजीव राजाराम महाराज ह्यांस लिहिलेले हे पत्र. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे चरित्र शिंदे ह्यांनी लिहावयास घ्यावे अशी शाहू महाराजांची फार इच्छा होती. परंतु ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ च्या कामाच्या धबडग्यात त्यांस, महाराज विद्यमान असता, सवड होऊ शकली नाही. १९२३ साली ते ‘मिशन’ च्या कामातून निवृत्त झाले. लेखनकार्य हाती घेण्यास त्यांस आता वेळ भरपूर होता. त्यांच्या डोक्यात ज्या काही ग्रंथांच्या योजना घोळू लागल्या होत्या त्यापैकी ‘श्री शिव छत्रपतींचे चरित्र’ लेखनाची योजना ही एक होती.........संपादक ]
पुणे, १९२३

श्रीमच्छत्रपती श्रीक्षत्रिय कुलावंतस राजाराम महाराज सरकार, कोल्हापूर, ह्यांचे चरण सेवेसी अत्यंत नम्रतापूर्वक विज्ञापना ऐसीजे.

मी केव्हातरी एकदा कोल्हापूरास यावे अशी महाराजांनी आज्ञा केली होती व परलोकवासी श्री शाहू महाराजांनी तशी इच्छा प्रदर्शित केली होती. परंतु अलीकडे माझ्या मिशनमध्ये काही ब्राह्मण सभासदांनी काय गोंधळ माजविला आहे हे ‘विजयी मराठा’ आणि ‘ज्ञानप्रकाश’ ‘लोकसंग्रह’ वगैरे पत्रांवरून सहज समजण्यासारखें आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे मला पुणे सोडून कोठेही बाहेर जाणे अगदी अनिष्ट झाले. येत्या १५ तारखेसच ह्या शाखेची साधारम सभा आहे. अस्पृश्य वर्गाच्या हातात मी मिशन देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला ब्राह्मण सभासद अकल्पित विघ्ने आणीत आहेत. त्यांच्या बाजूची वर्तमानपत्रे खोट्या बातम्या पसरवीत आहेत. व दुसरी बाजू दाबून ठेवीत आहेत. अशा वेळी कोल्हापूर येथील मराठा बोर्डिंगकडून शिवजयंतीचा मोठा उत्सव ता. १८ एप्रिल रोजी होणार आहे. त्यात व्याख्यान देण्यासाठी मला आमंत्रण आले आहे. पण ता. १५ एप्रिलच्या सभेचे काम न संपल्यास व काही गडबड झाल्यास माझे येणे होणार नाही. तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात सावचितपणे आपल्या दर्शनास येण्याचा विचार करीत आहे. त्याचवेळी दोन दिवस अधिक राहून महाराज फर्मावतील ती सेवा आनंदाने करीन.

सोबत कै. महाराजांच्या एका पत्राची प्रत पाठविण्याची परवानगी घेत आहे. त्यात श्री शिवाजी महाराजांचे चरित्र मी लिहावे अशी त्यांनी फार इच्छा दाखविली होती. महाराजांच्या विचारे तेही काम कसे काय होण्यासारखे आहे ते पाहीन. म्हणून मी कोल्हापूरास केव्हा आलो असता महाराजांचे निवांतपण दर्शन घडून सर्व गोष्टींचा नीट विचार होईल आणि महाराज फर्मावतील तर मी कोल्हापुरास काही दिवस राहवे काय, तेही सर्व मला लवकर पत्रोत्तरी कळेल तर मी महाराजांचा फार ऋणी होईन.

महाराजांचे उत्तर आल्यावर, कोल्हापूर येथील शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष रा. आर. पी. सावंत, बी. ए. ह्यांस लिहिणार आहे. म्हणून तातडीने उत्तराची वाट पहात आहे. अधिक लिहिल्याची सेवकाला क्षमा व्हावी. कृपेची वृद्धी व्हावी ही विज्ञापना.
आपला नम्र सेवक,
विठ्ठल रामजी शिंदे.

(विठ्ठलराव शिंदे हे जरी ब्राह्मसमाजाचे सभासद होते, तरी सांप्रदायिक वृत्तीचे नव्हते. जगातील प्रमुख धर्माचा अभ्यास ते पूर्वग्रहविमुक्त मनाने करीत व त्या त्या धर्मातील ज्या काही चांगल्या गोष्टी त्यास आढळत त्यांची ते मोकळेपणाने प्रशंसाही करीत. १९२५-२६ साली त्यांनी बौद्ध धर्माचा विशेष अभ्यास केला. ह्या अभ्यासामुळे त्यांच्या विचारात बरेचसे परिवर्तनही घडून आले. ‘माझ्या आठवणी व अनुभव’ (पृष्ठ ३७०) ह्या ग्रंथात ते लिहितात... पुढे पुढे ते स्वत:ला बौद्ध म्हणवून घेऊ लागले. अशाच एका जयंती समारंभाच्या प्रसंगी प्रसिद्ध बौद्ध आचार्य धर्मानंद कोसंबी यास निमंत्रण दिले ते.....)

वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख

सर्व व्यापक, सर्वशक्ती, सर्वज्ञ, परमपवित्र, दयानिधी, विश्वश्रेष्ठा, अव्यंग अनादिअनंत असा जो एकच अद्वितीय परमेश्वर त्याची उपासना ह्यास्थळी प्रतिदिवशी निदान प्रति आठवड्यास करण्यात येईल. कोणत्याही सृष्ट पदार्थाची उपासना येथे करता नये. कोणी मनुष्य अथवा इतर प्राणी किंवा बहिरींद्रिय गोचर पदार्थ हा ईश्वरच किंवा ईश्वरासारखा किंवा ईश्वराचा अवतार असे समजून येथे त्याची उपासना करिता नये आणि परमेश्वराशिवाय दुस-या कोणाचीही अथवा दुस-या कोणाच्याही नावे येथे प्रार्थना करण्यास अथवा गीत गाण्यात येऊ नये. कोणत्याही पंथाच्या  लोकांनी आजपर्यंत कधी पूजेसाठी अथवा कोणत्या एका गोष्टी (वृत्ता) च्या स्मरणार्थ जिचा उपयोग केलेला असेल किंवा ह्यापुढे करण्यात येईल अशी कोणतीही कोरीव किंवा रंगीत प्रतिमा अथवा बाह्यचिन्ह येथे बाळगू नये. कोणताही प्राणी येथे बळी देता कामा नये. जेवणखाण, मद्यप्राशन, अथवा कोणत्याही प्रकारची मौज किंवा चैन येथे करू देता नये. जी कोणतीही पंथाच्या लोकांनी पूजिला असेल अथवा यापुढे पूजिला जाईल त्याचा येथे होणा-या उपासनेत उपहास किंवा निंदा करिता नये. कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणित, सर्वांशी प्रमाण (निर्बाध) असे मानिता नये किंवा तसे मानून त्याविषयी पूज्यभाव धरिता नये. तथापि कोणताही ग्रंथ आजपर्यंत कधी कोणच्याही पंथाच्या लोकांनी सर्वांशी प्रमाण (निर्बाध) मानलेला असेल किंवा पुढे मानण्यात येईल. त्याचा उपहास किंवा निंदा करिता नये. ह्या स्थळी प्रार्थना, उपदेश किंवा भाषण करावयाचे अथवा गीत गावयाचे ते कोणत्याही प्रकारचे सृष्ट पदार्थ (मूर्ति) पूजन, मत, विशेषाभिमान किंवा पाप ह्यास उत्तेजन किंवा आश्रय मिळेल अशा प्रकारचे असू नये. परमेश्वराची उपासना ह्या ठिकाणी अशा वृत्तीने व अशा प्रकारे करण्यात आली पाहिजे
(महर्षी अण्णासाहेब शिंदे वाई ब्राह्मसमाजाचे ट्रस्टी होते, त्या ट्रस्टडीड मधील महत्त्वाचा उतारा पृ. ४ व ५ स. १९३६).

की, जेणे करून आपण सर्व एका कुटुंबातील माणसे आहोत. असा परस्पर भाव वागविणे, सर्व प्रकारची भ्रांति व पातक ह्यांपासून दूर रहाणे आणि ज्ञान, भाव, व पुण्यशीलता उत्तरोत्तर वृद्धिप्रत नेणे ह्यांविषयी सर्व पुरूष व स्त्रिया त्यांची जात, वर्ण, प्रापंचिक व पारमार्थिक स्थिती कोणतीही असली तरी समर्थ होतील. कोणत्याही जात, वर्ण धर्म आणि दर्जाच्या पुरूषास किंवा स्त्रीस वरील उद्देशास व वरील तत्वास बाध न येता होणा-या भजन, पूजन. उपासना प्रार्थनेच्या प्रसंगास हजर रहाण्याचा अधिकार आहे आणि ह्यास कोणी हरकत केल्यास ती सदरहू ट्रस्टींनी चालू देऊ नये.

वाई प्रार्थना संघ मंदिरप्रवेश

समाज बंधू व इतर मित्रहो,
सेक्रेटरीने आता जो अहवाल वाचला त्यामध्ये ह्या संघाच्या उगमाचा जो इतिहास सांगितला आहे तो फारच अलीकडचा आहे. त्याची पाळेमुळे त्याहून फार खोल आणि लांब आहेत. महाराष्ट्राची लोकस्वातंत्र्याबद्दल ख्याती बौद्ध, जैन काळापर्यंत मागे पोहोचते. अनेक राज्यक्रांत्या झाल्या. धर्मक्रांत्या झाल्या. संस्कृतीचे वळसे बसले. दैवाचे फेरे फिरले. परंतु महाराष्ट्रातील खेडवळ जनता (शेतकरी/कुणबी) अद्यापि तशीच शिरसलामत आहे. ब्रिटिश रियासत झाली. तिचा पहिला गव्हर्नर एलफिनस्टनसाहेब ह्याची दृष्टी मर्मदर्शी खोल होती. त्याने त्यावेळच्या मराठा कुणब्याचे पुढील वर्णन केले आहे. तो कुणबी तेव्हाच्या गव्हर्नरासारख्यांनासुद्धा साध्या अंतःकरणाने आणि मराठी बोलीने अरेतूरे असे संबोधित असे. गेल्या बादशाहीपुढे व येणा-या बादशाहीपुढे त्याने आपली मान वाकविली नाही. (Give Ceaser his due and have done with him) ‘राजाला जे देणे आहे ते दे आणि मोकळा हो’ अशा बायबलातील म्हणीप्रमाणे मराठा कुणबी, करापुरता राजा आणि एरव्ही मी माझा अशा बाण्याने वागत असे. आपल्या घरगुती व्यवहारात आणि धर्मात तो भूपतीला मोजीत नसे किंवा वर्णगुरूला ओळखीत नसे. महाराष्ट्रात ३०० वर्षांपूर्वी जो भागवत धर्माचा प्रसार झाला, त्याचे श्रेय अठरापगड जातींतील प्रत्येक संताने उचलले आहे. आणि ह्याची ग्वाही महिपती स्वामीनी आपल्या भक्तिविजय ग्रंथात पुरेपूर दिलेली आहे. गेल्या शतकाचे शेवटी उत्तरार्धात महाराष्ट्रात धर्मसुधारणेची जी लाट उसळली तीतही जनतेने आपला प्रतिनिधी उभा केलाच. रानडे, भांडारकर, मोडक आणि चंदावरकर ह्या विद्वानांप्रमाणेच किंबहुना त्यांचेआधी स्वतंत्रपणाने धर्मस्वातंत्र्याचा दिवा महात्मा जोतीराव फुले ह्यांनी लावला आणि आपले नाव व आडनाव सार्थ केले. ह्या जोतीबा फुल्यांच्या शिकविण्याचा ठसा (फुट नोट – वाई प्रार्थना संघ (ब्राह्मसमाज) मंदिरप्रवेश समारंभाचे अध्यक्ष म्हणून केलेले भाषण, वाई ता. २४ मे १९३७.) प्रस्तुत प्रार्थनासंघामध्ये स्पष्ट आहे. तेली, माळी, मराठा, कुणबी, महार, ढोर ह्या सर्व बहुजनातील पुढारी समाजाने ह्या संघाची तळी आज उचलली आहे. आजच दोन तासांपूर्वी एका ढोर गृहस्थाचे घरी कौटुंबिक उपासना होऊन त्या सबंध घराण्याने ब्राह्मधर्माची दीक्षा घेतली हाच जोतीबाचा जयजयकार होय.

ह्या संघाच्या चालू इतिहासामध्ये तीन मुख्य टप्पे पडतात ते असे : (१) वर सांगितल्याप्रमाणे सत्यशोधक समाजाच्या शिकवणीने सातारा जिल्ह्यातील खडकाळ जमीन नांगरली गेली. रूढीचे तण उपटले, भेदाचे खडक फोडले, अहंकाराची नांगी मोडली, नवीन पिकाची तयारी झाली; (२) अशा वेळी रिपोर्टात सांगितल्याप्रमाणे पुण्याकडील कौटुंबिक उपासनामंडळाने बी पेरले, आणि त्याचे अंकूर फुटल्यानंतर; (३) मुंबई व पुणे प्रार्थनासमाजाचे पुढा-यांनी योग्य वेळी पाणी शिंपले. ह्या तीन टप्प्यांचे महत्त्व सारखे आहे. आणि ज्यात आम्ही आज प्रवेश करीत आहो ते मंदिर ह्या तिन्ही टप्प्यांचे पहिले गोड फळ आहे. आपण येथे जमलेले वाईचे रहिवासी आणि बाहेरगावचे पाहुणे ह्या सर्वांचा ह्या फळावर आशीर्वाद असावा.

हे मंदिर केवळ वाई शहरापुरतेच नाही. सबंध तालुक्यातील खेड्याखेड्यातून ब्राह्मधर्माचा संदेश गाजवावा हा हेतू प्रथमपासूनच आहे. ह्या तालुक्यातील पंचक्रोशीचे हे केंद्र आहे. एका पिढीपूर्वी सातारा शहरामध्ये एक प्रार्थना समाज काम करीत होता. माझे मित्र परलोकवासी सीतारामपंत जव्हेरे व परलोकवासी रा. ब. काळे ह्यांची आज आठवण मला केल्याशिवाय रहावत नाही. त्यांचेप्रमाणे त्यांनी काढलेला समाजही आज स्मृतिवंश झालेला आहे. जिल्ह्याचे ठाणे हे आधुनिक संस्कृतीची पहिली पायरी. तेथून आधुनिक सुधारणेची इमारत वर सुरू होते. तालुक्याचे ठिकाण हे बहुजन समाजाच्या राहाटीची शेवटची पायरी होय, येथून खाली जनतेची राहाटी खेड्यापर्यंत पोहोचते. आमची महत्त्वाकांक्षा तूर्त तालुक्यापुरतीच आहे. ह्या आमच्या कार्यावर आपला आशीर्वाद असावा.

केंजळ खेड्यापासून मुंबई शहरापर्यंत, बेळगाव—कोल्हापूरापासून इंदूर—अहमदाबाद—बडोदा शहरापर्यंत बृहन् महाराष्ट्राची सहानुभूती आम्हांस मिळाली आहे. उच्चनीच सर्व जातीने आमच्याशी सहकार्य केले आहे. नाव ठेवण्यास कोठेच जागा नाही. हे मंदिर झाले नव्हते तेव्हा टिळकमंदिर व प्राज्ञपाठशाळा ह्यांच्या चालकांनी आम्हांला खुल्या दिलाने जवळ केले. टिळकमंदिरात भजन, व्याख्याने झाली. प्राज्ञपाठशाळेच्या पवित्र जागेत सहभोजने झाली. अस्पृश्यतानिवारण परिषदेच्या वेळी मंदिरप्रवेश झाला. महारमांगवाड्यात मुख्य कार्यक्रम झाले नाहीत असा आमचा एकही उत्सव झाला नाही. मग आम्हांला काय उणे पडले ? आज आपल्या येण्याने तर कळस झाला आहे.

पण जे आजवर झाले ती सुरुवातच आहे. कार्याचा डोंगर आता स्पष्ट दिसू लागला आहे. उपासनेला कायमचा आश्रय मिळाला. उपासनेच्या स्थळाला मुंबई प्रार्थनासमाजाच्या आद्य चालकांपैकी परलोकवासी वासुदेव बाबजी नवरंगे ह्यांचे नाव देण्याची सुसंधी आम्हांला मिळाली आहे, ह्याबद्दल त्यांच्या सूनबाई श्रीमती रमाबाई नवरंगे ह्यांचे आभार मानणे आमचे कर्तव्य आहे. ह्यापुढे ह्या विस्तीर्ण वाड्यामध्ये निरनिराळ्या कार्याची उठावणी करावयाची आहे. आपल्या येण्याने त्याची जबाबदारी आपणावर सहजच येत आहे. सर्वारंभी ज्यांनी हा वाडा विकत देऊ केला आणि कित्येक विघ्ने आली तरी ती शांतपणे निवारून काल रोजी खरेदीखत रीतसर पूर्ण केले ह्याबद्दल श्री. बाबूराव पंडितांचे आभार मानतो. एकदोन किरकोळ गोष्टीं करावयाच्या आहेत त्या ते योग्यवेळी करतील अशी पूर्ण खात्री आहे. निधी जमविण्याचे कामी माझे मित्र श्री. यज्ञेश्वरपंत भांडारकर ह्यांनी प्रथम कंबर बांधली व एक हजार रुपये मिळविले. त्यानंतर डॉ. टी. सी. खांडवाला ह्यांनी आपली वार्धक्याने वाकलेली काया निधी जमविण्याकडे लावली. गावोगाव, घरोघरी जाऊन कार्य पूर्ण केले. त्यांना श्री. बी. बी. केसकर विशेषतः त्यांची पत्नी सौ. आनंदीबाई केसकर, श्री. भाऊसाहेब वैद्य,  श्री. बी. बी. कोरगावकर ह्यांनी मदत केली. हया सर्वांचा आभारपूर्वक उल्लेख करणे भाग आहे.

शेवटी ह्या समाजाचे उत्साही तरुण सेक्रेटरी श्री. रामराव बाबर, श्री. शंकरराव जेजूरीकर आणि अनुभवी अध्यक्ष श्री. नारायणराव चव्हाण ह्यांच्या कामगिरीला तर दुसरी जोड नाही. खरे पहाता ह्या त्रिवर्गांना खरे श्रेय आहे. बाकी आम्ही सर्व सहाय्यक आणि हेच खरे कर्ते. परमेश्वर ह्यांना दीर्घायुष्य देवो आणि जोतीबा फुल्यांच्या इच्छेने पांग फिटो. सन १९३३ साली राममोहन रॉय शतसांवत्सरीच्या निमित्ताने मी व माझे मित्र श्री. केसकर येथे आलो होतो त्यावेळी ह्या संघाची पहिली घटना झाली. तेव्हाच ह्या संघाला ब्राह्मसमाज हे नाव द्यावे असा आग्रह येथील मंडळीचा पडला. मला त्यास थोपवून धरावे लागले ! ‘निदान पाच पाच तरी अनुष्ठानिक (मताप्रमाणे आचरणा-या) गृहस्थांची नावे मला मिळावीत म्हणजे...’ घटना करू असे म्हणताच पाच जणांनी आपली तयारी लेखी दिली. घटना झाली. अध्यक्ष नारायणराव चव्हाणांनी तेव्हा आपले नाव दिले नाही, पण परवाच त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवांचा ब्राह्मविधिप्रमाणे येथे विवाह संस्कार होणार आहे. आता त्यांच्या अनुष्ठानिकपणाबद्दल काय शंका राहिली ? आणि ह्या समाजाला ब्राह्मसमाज म्हणून नाव ठेवण्याला काय हरकत ? तथापि तो नामकरणविधी योग्य वेळी साजरा होईल, त्याला कोण आड येईल ? आणि तेव्हाच माझे वृद्धमित्र श्री. बी. बी. कोरगावकर ह्यांचे नामकरणासंबंधी जे पत्र आले आहे, त्यास योग्य उत्तर दिले जाईल.

इतके सांगून ज्या जगन्नियंत्याच्या कृपेने हे सर्व घडले त्याचे मनःपूर्वक आभार मानून आपण सर्व आपल्या समोरील मंदिरात प्रवेश करू या. अशी अध्यक्षांनी विनंती केली आणि सर्व मंडळीने प्रवेश केला.

व-हाड मध्यप्रांतील सत्यशोधक हीरक महोत्सव

स्वागत मंडळाचे सभासद व सन्मान्य बंधु भगिनींनो,

मी दौ-यावर असताना आपले उत्साही चिटणीस श्री. बाबूराव भोसले ह्यांनी मला सापळ्यात पकडले व मी हजर राहण्याची कबुली दिली. आजच्या त्या सामाजिक व धार्मिक प्रसंगी राजकारण टाळाल व त्यातही आपले स्थानिक राजकारण बाजूला ठेवाल अशी मी अपेक्षा करतो. सत्यशोधनाचे काम करणे फार कठीण झाले आहे. तरूणाला ते फार सोपे वाटेल, पण माझ्यासारख्या
म्हाता-याला मात्र ते कठीण आहे. समाजकार्य करणा-याला मोठ्या अडचणी असतात. जगाला सोडून धर्मकारण करणे सोपे व सहज आहे. पण तसे समाजकारण नाही.

सत्यशोधक समाजाचे पर्यालोचन

प्रथम सत्यशोधक समाजाच्या ऐतिहासिक पर्यालोचनाकडे पाहिल्याशिवाय या समाजाचे महत्त्व लक्षात येणार नाही. ब्राह्मोसमाज व सत्यशोधक समाज ह्यांचा संबंध फार जवळचा असा आहे. तसेच गेल्या तीन शतकांतील राजा राममोहन रॉय, महात्मा जोतीराव फुले व महात्मा गांधी ह्यांचे जन्मसाल व ह्यांच्या सामाजिक जीवनाच्या सनावळीत पुढील सर्व इतिहास घुटमळत आहे. हे निव्वळ विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात सनांचे असलेले महत्त्व म्हणून नव्हे. विकासवादाप्रमाणे एक व्यक्ती येते व ती जाते, मागून दुसरी व्यक्ती येते. प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचे महत्त्व कायम असून ते परस्परांना सहाय्यक असे असते. रॉय, फुले व गांधी ह्यांच्या सामाजिक जीवनाचाच मी येथे प्रामुख्याने विचार करणार आहे. ह्याचा अर्थ मी राजकारणाला भितो असा आपण गैरसमज करून घेऊ नका.

महात्मा जोतीराव हे आधुनिक महाराष्ट्राचे राजा राममोहन रॉय होत. रॉय, फुले व गांधी ह्या महापुरूषांच्या जीवनाचा इतिहास हा एक महान चमत्कार आहे. राममोहन १७७२ साली जन्मले. त्यांनी १८२८ साली ब्राह्मोसमाजाची स्थापना केली व ते १८३३ साली परलोकवासी झाले. ब्राह्मोसमाजाच्या स्थापनेच्या एक वर्ष पूर्वी म्हणजे १८२७ साली महाराष्ट्रात जोतीबा जन्माला आले, त्यांनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली व ते १८९० साली दिवंगत झाले. सत्यशोधक समाजाच्य स्थापनेपूर्वी केवळ तीनचार वर्षे अगोदर गुजरातेत महात्मा गांधींचा जन्म झाला.

राजा राममोहन रॉय हा आधुनिक भारताचा जनक व ती जागतिक कीर्तीची विभूती होती. रॉय व गांधी ह्या सुसंस्कृत विभूती होत. म्हणजे जोतीराव काही अशिक्षित व्यक्ती नव्हते. तर ते प्राकृत (Natural man) होते. नवभारताचा जनक जसा राममोहन रॉय तसा नवमहाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा आद्य प्रवर्तक जोतीबा फुले होय. सामाजिक चळवळीच्या कालमापनाची विभागणी करावयाची झाल्यास ती पुढीलप्रमाणे होईल. १७७२ ते १८३३ हा काळ राममोहन रॉय, देवेंद्रनाथ प्रभृती ब्राह्मोसमाजानुयायांचा. १८७३ ते १९३३ हा महात्मा फुले ह्यांच्या सत्यशोधकांचा व नंतर महात्मा गांधीचा काळ होय. म्हणजे रॉय युग, फुले युग व गांधी युग असे हे सुधारणेचे भाग पाडावे लागतील.

तिकिटाचा गलबला

वरील तीन महात्म्यांनी चालविलेला लढा फार जुना आहे. उच्चनीचपणा व भेदाभेद हे ह्या लढ्याचे मूळ होय. मोक्षाचे द्वार ब्राह्मणधर्माच्या उत्पातानंतर स्त्रिया, वैश्य व शूद्र ह्यांना बंद करण्यात येऊन ब्राह्मण व क्षत्रियवर्णापुरतेच ते मोकळे होते. पुढे नंदकाळानंतर क्षत्रियापासूनही हे मोक्षाचे तिकीट हिसकावून घेण्यात आले. म्हणजे मोक्षाचे धनी निव्वळ ब्राह्मण ठरले. हे मोक्षाचे तिकीट मिळविण्यासाठीच वारकरी, लिंगायत, जैन, शीख इ. व्यक्तिगत धर्मसंप्रदाय उत्पन्न झाले. प्रथम वैष्णव व शाक्त वगैरे धर्मपंथांना वेदबाह्य ठरविण्यात आले. पण आता ते हिंदुधर्मांतर्गत उपासनापंथी मानले जातात. हीनत्वाच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेमुळे हा तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला. भावना ही प्रत्येक मनुष्यात असतेच, जगाचा उद्धार अशा भावनाशील साधारण लोकांकडूनच होतो. ब्राह्म व प्रार्थना समाजासारखाच फुल्यांचा सत्यशोधक समाज हाही हिंदुसमाजात उत्पन्न झालेल्या विषमतेची कीडच काढून टाकणारा एक पंथ आहे.

सत्यशोधक समाज

जोतीबांच्या कार्याचे तीन भाग पडतात. पहिला भाग त्यांच्या कार्याला सुरूवात झाल्यापासून १८७३ पर्यंत. (सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपर्यंत) दुसरा १८७३ ते १९०० पर्यंत व तिसरा १९०० पासून चालू. पहिल्या काळात ब्राह्मण त्यांना मदत करीत असत, पण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेने परिस्थिती एकदम पालटली.

सत्यशोधक समाज सुंदर हार्मोनियम

सत्यशोधक समाज हा सुंदर हार्मोनियम आहे. त्यावर व्यवस्थित बोटे ठेविली तर सुंदर मधुर आवाज निघेल. पेटीतून गोड सूर काढणारा कलाभिज्ञ असला पाहिजे. स्वत:चे सूर काढण्याचे अज्ञान लपवून उगीच ओरडण्यात हाशील काय? Vested interested persons नी आडवे तिडवे नव्हे तर पायाची बोटे त्या हार्मोनियमवर ठेविली म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाला पाखंडी ठरविले. पण वस्तुस्थइती तशी नाही. सत्यशोधक समाज हा शिवराळ नाही. तो सुदंर, सुस्वर हार्मोनियम आहे. म्हणून त्यावर सावधगिरीने बोटे फिरविली पाहिजेत. त्याविरूद्ध ओरडण्यात काय अर्थ? रानडे, भांडरकर प्रभृती ब्राह्मण जोतीरावांचे सहकारी व मित्र होते. टिळक, आगरकरांना खटल्यात जोतीरावांनी मदत केली. ती ते ब्राह्मणद्वेष्टे असते तर केली असती काय? टिळक हेही जोतीरावांचे मित्र होते.

प्राकृत माणसांची शिवी

प्राकृत माणसाची शिवी ही संस्कृत माणसाच्या स्तुतीपेक्षा फार चांगली विधायक कार्य करीपर्यंत ठीक पण विध्वंसक, प्रक्षोभक कार्य सुरू झाले की, शिव्याशाप सुरू होतात. जोतीबांनी खालच्या वर्गाची हीनावस्था काढून टाकण्याचा प्रयत्न सुरू करताच वरच्या वर्गाचा सहानुभूतीचा झरा हळू हळू आटू लागला व सत्यशोधक समाज म्हणजे सवता सुभा निर्माण झाला असे त्यांना वाटू लागले. तेव्हा सत्यशोधकांची ठोकाठोकी सुरू झाली.

चिपळूणकरांची मोर्चेबंदी

विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेल्या मोर्चेबंदीमुळे ब्राह्मणांनी सहकार्य सोडून सत्यशोधक समाजावर चढाई केली. जोतीबांशी त्यांचा तत्वत: विरोध होता असेही म्हणता यावयाचे नाही. ब्राह्मण समाजाचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक वगैरे vested interest कायम टिकविण्यासाठी ही कोल्हेकुई होती. त्याचा परिणाम व्हावयाचा तोच झाला. विरोधकांस विरोध ह्या नात्याने जोतीबांच्या सत्यसमाजानुयायांनी आपल्या प्राकृत भाषेत उलट हल्ला चढविला. मोठ्या भावाने लहान भावास चिमटे घेतले नाहीत तर लहान भाऊ रडण्याचे कारण नाही. विक्षोभक कार्याबरोबरच विधायक कार्यक्रम जनतेसमोर ठेवावयाचा जोतीबांचा प्रयत्न अव्याहत चाललेलाच होता.

शाहूयुग
ह्या समाजाचा प्रसार विशेषत: साळी, माळी, कोळी इ. वर्गातच होता. पण १९०७ सालापासून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजास येऊन मिळताच उच्च वर्गात विशेषत: मराठ्यांत जोराने प्रसार झाला व अशा रीतीने शाहूयुग सुरू झाले.

सत्यशोधकांचे बायबल

जोतीबांचा सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ त्यांनी आपल्या डाव्या हाताने लिहिला आहे. हा ग्रंथ खरोखरीच सत्यशोधकांचे बायबल होय. ब्राह्मोसमाजाच्या संस्थापकास मरून शतक लोटले, तर ह्याच वेळी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस ६० वर्षे पुरी होतात. ह्यावरून ह्यात काही तरी परमेश्वरी संकेत आहे असे मला वाटते. आपण जर ह्या सत्यशोधक समाजाची पाळेमुळे दृढ केलीत तर महात्मा गांधींच्या सध्याच्या अस्पृश्यता निवारणास जो तीव्र विरोध होत आहे तो तितका खास होणार नाही. कारण अस्पृश्यता निवारण, अबलोन्नती व शिक्षणप्रसार हीच समाजाची मुख्य सूत्रे होत.

भटजी किंवा मध्यस्थ दलाल

ह्यानंतर सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचे विस्तृत विवरण केल्यावर महर्षी अण्णासाहेब शिंदे म्हणाले, “परमेश्वर एक आहे. ह्या सत्यशोधक समाजाच्या तत्त्वाबद्दल फारसा विरोध झाला नाही. कारण परमेश्वर एक असो वा हजारो असोत त्यात कोणाचे काही नडत नाही. पण भटजी किंवा मध्यस्थ दलालाची गरज नाही. ह्या जोतीबांच्या तत्त्वावर ब्राह्मण समाज चिडला. जेव्हा एकदा टिळकांनी शाळेतील शिक्षक आमचे गुरू नव्हेत असे म्हटले तेव्हा बरे वाटले. पण फुल्यांनी “कोणी गुरू नाही”, “मध्यस्थ दलाल नको,” असे म्हटले तर त्याज्य. ह्यामुळे दक्षिणा बुडते म्हणून भट बिथरले.

सत्यशोधक समाजाच्या संघटनेची जरूरी आहे. (१) सत्यशोधकांनी तत्त्वाकडे नि:स्वार्थपणे पाहिले पाहिजे. मी हे डिक्टेटर म्हणून सांगीत नाही. २) सत्यशोधक समाजाची घटना पाहिजे. ३) सभासदांची नोंद ठेविली पाहिजेत. ४) प्रतिज्ञापत्रक भरून घेतले पाहिजे. ५) प्रभावी प्रचारक नेमले पाहिजेत. ६) प्रचारकार्यार्थ एक जोमदार संस्था स्थापन केली पाहिजे व ६) वर्तमानपत्र नेटाने चालविले पाहिजे.

ब्राह्मोसमाजात जसे सर्व कुटुंब एक घटक असते त्याचप्रमाणे आपण सत्यशोधकांनी आपापल्या गृहिणीसह सत्यशोधक समाजाचे सभासद झाले पाहिजे. तरच आपण समानतेच्या पायावर खरोखरीच कार्य करितो असे होईल.

लुटूपुटूची पार्लमेंट

धर्म व नीतिशिक्षणावरील वाद

यंग थिइस्टस् युनिअन संस्थेने ह्या महिन्यापासून काही उपयुक्त विषयावर पार्लमेंटच्या पद्धतीने वादविवाद करण्याची पद्धत सुरू केली आणि असे प्रसंग तूर्त महिन्यातून एक वेळ घडवून आणण्याचे ठरले. ह्या उद्देशास अनुसरून तारीख २३ रोजी ह्या पार्लमेंटची पहिली बैठक झाली. बरीच मंडळी हजर होतो. ‘स्पीकर’ चे जागी युनिअनचे अध्यक्ष रा. रा. शिंदे ह्यांची योजना झाली होती. धार्मिक व नीतिशिक्षणाची आवश्यकता आहे किंवा नाही हा वादाचा विषय नव्हता. तर असे शिक्षण सार्वजनिक शाळांतून व कॉलेजांतून द्यावे किंवा कसे हा प्रश्न आज पार्लमेंटपुढे असल्याचे स्पीकरनी प्रथमच बजावून सांगितले. रा. रा. भांडारकर व रा. शिराजी ह्यांनी धर्मशिक्षण शाळातून दिले पाहिजे ह्या बाजूची भाषणे केली. अपोझिशनच्या वतीने रा. त्रिवेदी व रा. नाईक ह्यांची भाषणे झाली. पहिल्या पक्षाचे असे म्हणणे पडले की, आमची सर्व घडी जी बिघडली आहे ती धर्म शिक्षणाच्या द्वारे सुधारता येण्यासारखी आहे. उलट पक्षाचे म्हणणे असे की, धर्मशिक्षण हा शाळा व कॉलेजे ह्यांचा विषय नव्हे. त्याच्या योगे आम्ही भलत्याच अडचणी उपस्थित करू.

दोन्ही पक्ष अशा रीतीने पुढे आल्यानंतर विषय वादविवादास मोकळा झाला असे स्पीकरने ठरविले. प्रथम डॉ. सुखटणकरांचे भाषण झाले. त्याचा सारांश असा होता की, भारतधर्म महामंडळाने ह्या प्रश्नाची उचल जरी घेतली आहे तरी केवळ त्या मंडळास मान्य असणारा धर्म शाळांतून शिकवावा असे आमचे म्हणणे नाही. सर्वमान्य धर्मतत्त्वाचे शिक्षण द्यावयाचे ते लायक शिक्षकांच्या द्वारे द्यावयाचे आहे आणि आमच्या सुशिक्षित मंडळीतूनच अशी मंडळी निपजेल असा मला पूर्ण भरवंसा आहे. (अशी मंडळी निपजेपर्यंत ही व्यवस्था अंमलात येऊ नये असा सभागृहातून ध्वनी निघाला) आणि आम्ही ह्या मार्गाला लागल्यावाचून एकदम अशी लायक मंडळी निपजणार आहेत असे आपल्याला वाटते काय? अस्पृश्य वर्गाविषयी सहानुभूती नाही म्हणून ती ऐती तयार होऊन तिचा गठ्ठा हातात येईपर्यंत रा. शिंदे आपल्या कामास प्रारंभ करण्याचे थांबले काय? चांगले शिक्षक मिळत नाहीत म्हणून निराश्रितांसाठी शाळा उघडण्याचे त्यांनी थांबविले काय? नाही.

नंतर रा. केळकरांनी शाळांतून धर्मशिक्षण देणे केवळ अशक्य आहे म्हणून हा ठराव अगदी व्यर्थ आहे असे प्रतिपादले. रा. नाडकर्णी ह्यांचेही उलटपक्षास अनुकूल असे भाषण झाले.

स्पीकरच्या जागी थोडावेळपर्यंत रा. भांडारकर ह्यांची योजना झाल्यावर रा. शिंदे ह्यांचे भाषण झाले. त्याचा सारांश असा की, धर्मशिक्षण घरी मिळण्याची व्यवस्था होणे हा उत्तम पक्ष. निरनिराळ्या समाजाच्या खाजगी मंडळीनी ह्या शिक्षणाची जबाबदारी आपणावर घेणे हा गौप्पपक्ष आणि सार्वजनिक करावर चाललेल्या संस्थांतून ते द्यावे असे म्हणणे हा अशक्य व अनिष्ट पक्ष होय असे इतिहास सांगत आहे. हे शिक्षण शाळांतून शिकविताना परिणामकारक व्हावे असे जर वाटत असेल तर ते ऐच्छिक असून चालवायाचे नाही. आवश्यक केले पाहिजे. ऐच्छिक असल्यास ते बिनपरिणामी होण्याचा विशेष संभव आहे.

ह्यानंतर रा. भाजेकर वकील, डॉ. कामत व रा. केसकर यांची भाषणे झाली. अखेरीस मते घेण्यात आली. ९ सभासदांनी धर्मशिक्षण शाळा व कॉलेजे ह्यांत दिले पाहिजे असे मत दिले. २१ सभासदांनी विरूद्ध मत दिले व ९ सभासद तटस्थ राहिले. अशा रीतीने वादविवादात विरूद्ध पक्षाची सरशी झाली.

  1. हिंदुस्थानातील उदार धर्म
  2. लाहोर येथील धर्मपरिषद
  3. लाहोर येथील धर्म परिषद
  4. लंडन शहर
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
Page 9 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी