1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

इंग्लंडांतील आधुनिक धर्मविषयक चळवळ

आणि लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरिअन परिषद

(सुबोधपत्रिका ता. २४-५-१९०३)

सर्व सुधारलेल्या जगातील अत्यंत प्रमुख जे इंग्रजी राष्ट्र, त्याचा गेल्या चार शतकांचा इतिहास वाचून, एकादा परकीय गृहस्थ ह्या राष्ट्राच्या निरनिराळ्या संस्था आणि जीवन प्रत्यक्ष पाहण्यास येथे आल्यावर काही काळाने त्याच्या मनाची विलक्षण स्थिती होते. त्याचे बाहेरचे इतिहाससाध्ययन व येथील प्रत्यक्ष निरीक्षण, ही दोन्ही जर केवळ फावल्या वेळची असतील, तर त्याचा ग्रह ह्या देशासंबंधी फारसा अनुकूल न होता, उलट तो स्वदेशी गेल्यावर सा-या आधुनिक सुधारणेसही नावे ठेवीत सुटण्याचा संभव आहे. त्यात विशेष त्याचा कटाक्ष धर्मसंबंधी असतो. पण वरील अध्ययन व प्रवास निर्मळ मनाने, केवळ शिकण्याच्या व साधनाच्या हेतूने, व कळकळीने कोणत्याही बाजूस तोल न जाऊ देता, घडेल तर मनासच नव्हे तर आत्म्यासही मोठी मिळकत मिळेल अशी माझी खात्री आहे. इतकेच नव्हे तर जगाच्या इतिहासात वेळोवेळी ज्या सुधारणा झाल्या, जी मन्वंतरे घडली आणि एकंदरीत पाहता मानवी प्राण्यांची जी सारखी उन्नतीच होत आहे त्या सर्वांच्या तळाशी, मानवतेचे मुख्य लक्षण जी धर्मबुद्धी, तिचेच मंगल आणि सतत कार्य घडत आहे. ह्या साधारण सिद्धांताची प्रत्यक्ष साक्ष ह्या अध्ययनात व प्रवासात पटते !

सोळाव्या शतकाच्या आरंभी युरोपात जी प्रचंड धर्मक्रांती झाली तिच्यानंतर आधुनिक युगास आरंभ झाला. वरील शतकात इंग्लंडात सुधारलेल्या धर्माची पूर्ण संस्थापना झाल्यावर धर्माचे कार्य संपले असे नव्हे तर उलट तेव्हापासून त्याचा आरंभ झाला. पोपच्या कचाट्यातून इंग्लंड सुटले खरे, म्हणून ते स्वतंत्र झाले असे नव्हे. पोपचे स्थान इंग्लंडच्या राजाने घेतले. संस्थापित चर्च नावाच्या राष्ट्रीय धर्माची संस्थापना झाली. आणि त्या उलट खरे स्वातंत्र्य मिळविण्यास पुन: एक शतकभर ह्या राष्ट्रास थोरांच्या रक्ताची सारखी आहुती द्यावी लागली. सतराव्या शतकाचे अखेरीस (१६८९) (Toleration Act) सहिष्णुतेचा कायदा पास झाला. लोकांस आपल्या मताप्रमाणे आपल्या हुकमतीने व आपल्या बळावर, पंथ, समाज व मंदिरे स्थापण्याची मोकळीक झाली. अठराव्या शतकात प्रेस्बिटेरिअन (गुरूजनसत्तात्मक), काँग्रिगेशनल (लोकसत्तात्मक) बाप्टिस्ट, वेस्लीयन इत्यादी अनेक पंथांचा प्रसार झाला. पण अद्यापि लोकांत विचारांचे स्वातंत्र्य व औदार्य आले नव्हते. चौथ्या पाचव्या शतकांत ख्रिस्ती धर्माची जी एकदा मते व सिद्धांत बनून गेले होते त्याच्या उलट ब्र काढल्यास डोके फुटण्याची अद्यापि भीती होतीच. १९ व्या शतकाच्या आरंभी ती भीती समूळ नाहीशी झाली. १८१३ साली युनिटेरिअन लोकांसही पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.

ह्याप्रमाणे १६ व्या शतकात पोपची सत्ता झुगारून दिल्यावर ह्या राष्ट्राने सतराव्या अठराव्या शतकांत, धर्मबाबतीत राजकीय सत्तेपासूनही स्वतंत्र होण्याचे प्रयत्न केले, आणि ते बहुतांशी सफळ झाले. हल्ली राष्ट्रातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या नॉनकनफार्मिस्ट म्हणजे स्वतंत्र सत्तेची आहे. बाकीची जी राष्ट्रीय संस्थेत आहे तीही केवळ आपखुषीने आहे. १९ व्या शतकात धर्मचळवळीची दिशा अगदीच बददली. आधुनिक शास्त्राचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार होऊ लागल्यापासून धर्माच्या मुळाशीच कु-हाडीचे घाव बसू लागले. ख्रिस्तीधर्मपंथांचे शास्त्रीय व ऐतिहासिक पद्धतीने संशोधन, निरनिराळ्या राष्ट्रांचे आचारविचारात दळणवळण वाढल्यामुळे निरनिराळ्या धर्माची होऊ लागलेली तुलना, विश्वविद्यालयात चाललेले सर्व धर्मांचे तुलनात्मक अध्ययन इत्यादी अनेक कारणांमुळे निरनिराळ्या पंथांतील लोकांच्या मतांत परस्पर अधिकाधिक सहानुभूती, सहिष्णुता व औदार्य वाढू लागले, इतकेच नव्हे तर युनिटेरिअन, ह्युमेनिटेरिअन, पॉझिटेव्हिस्ट इ. नवीन विचाराला अनूकूल अशा नवीन पंथांचा उदय व प्रसार होऊ लागला.

हल्ली स्थिती कशी आहे? राष्ट्रीय संस्था, तद्विरोधी निघालेले नाना स्वतंत्र पंथ, आणि ह्या सर्वांसही न जुमानता स्वतंत्रपणे व उदारपणे धर्माचरण करणारे युनिटेरिअनादी समाज ह्या सर्वांचेही कार्य सारखे जोराने चालले आहे. साप्ताहिक उपासना, रविवारच्या धर्मशिक्षणाच्या शाळा, मासिक आणि वार्षिक सभा, गरिबांकरिता स्वदेशातील मिशने आणि परकीयांकरिता चारी खंडांतील परदेशांत जगडव्याळ मिशनची योजना इ. निरनिराळी कामे सर्व पंथांतून चढाओढीने होत आहेत.

हा सर्व प्रकार पाहून परकीयांचे मन प्रथमदर्शनी गोंधळून जाते. धर्मासारख्या पवित्र बाबतीत ह्या राष्ट्राने ३-४ शतके इतकी डोईफोड व रक्तस्त्राव का केला? आताच्या ह्या शांततेच्या व समजुतीच्या काळीदेखील ह्यांच्यात इतके भिन्नभिन्न पंथ व इतक्या चुरशीची चढाओढ का आहे? नवे पंथ आणि नव्या संस्था निघाल्या आहेत त्यांत जुन्यांचा लय का होत नाही? उलट दोहोंचेही कार्य इतक्या नेटाने चालणे येथे कसे शक्य आहे? इ. प्रश्नांमुळे बिचा-या नवख्याची त्रेधा उडते आणि अखेर इंग्लंडातील प्रॉटेस्टंट धर्माचे खरे लक्षण काय, त्याची मुख्य बळकटी कशात आहे हे नीट कळेपर्यंत त्याचे समाधान होत नाही.

आजपर्यंत धर्मबाबतीत आमची दोन भिन्न प्रकारची स्थिती होत आली आहे ती अशी: जगाच्या सांसारिक उपाधीचा शीण आणि वीट येऊन आम्ही एकदम विरक्त होतो आणि जगातून उठतो. मानवी आत्म्याची अंतिम अवस्था काय होणार तिचा ठाव घेण्यात आणि अखिल विश्वाची पाळेमुळे शोधून काढण्यात आमच्या बुद्धीचा लय लागतो. ह्याप्रमाणे आमचे बंड म्हणजे सा-या विश्वाविरूद्ध, आमची स्वतंत्रता म्हणजे निस्संगता, आमचे जय म्हणजे व्यक्तीचे जय, आमचा मोक्ष आमच्यापुरताच, आमचे अनुभव, आमचे शोध व आमची भारती ही जगाच्या वाड्मयात कालवशाने अत्यंत उच्च स्थान घेतात. पण आमच्या समाजाची काय वाट! गोरगरीब, तडीतापडी ह्यांस शांतीचे व शेवटचे वाक्य कोण सांगतो? त्यांची धार्मिक भूक निवारण्याची काय योजना आहे?

उलट पक्षी, आमची भव्य व पुरातन देवस्थाने, बारा ज्योतिर्लिंगे, तीर्थे, यात्रा, पूजेचे संभार, विधीचे अवडंबर, ब्राह्मण, बडवे, पुजारी व सेवेकरी, वर्णव्यवस्था आणि मठस्थापना, शंकराचार्य आणि जगदगुरू, वेदकालापासून चालत आलेले आचार, नवीन नवीन निघणारे धार्मिक उत्सव आमि वेदोकक्तासारख्या नव्या सुधारणा इ. एक का दोन अनेक त-हेने धर्माच्या दुस-या बाजूची आमची जय्यत तयारी आहे. असे असून आमच्यात धर्म नाही असे कोण म्हणेल?

पण वर जी धर्माची दोन लक्षणे सांगितली त्यांतील एकही इंग्लंडातील धर्मास मुळीच लागू पडत नाही. येथेही नाना पंथ, नाना मते, धार्मिक कलह आमि वैमनस्य ही आहेत. केव्हा केव्हा दंगे, क्वचित खूनही होतात. पण ह्या सगळ्यांचे एक सामान्य लक्षण आहे. एक प्रकारचे राष्ट्रीय ऐक्य आहे आणि त्यातच नव्याजुन्या सा-यांची बळकटी आहे. हे लक्षण दोन शब्दांतच सांगता येते ते असे. स्वातंत्र्य आणि व्यावहारिकता. ह्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्र पोपविरूद्ध उठले. प्रजा राजाचे ऐकत नाही, फार काय, मुलगा बापाची पर्वा ठेवीत नाही! हे स्वातंत्र्य म्हणजे एक नुसते खूळ नाही. सर्व योजना व सर्व खर्च राष्ट्राकडून मिळत असता त्या सर्वांवर पाणी सोडून उलट अत्यंत कष्टमय छळ सोसूनही लोकांनी आपापले पंथ स्थापले. इतकेच नव्हे, तर सुंदर आणि टोलेजंग मंदिरे बांधली, मंडळ्या स्थापिल्या, धर्मशिक्षणाच्या शाळा व कॉलेजे उभारली आणि परदेशी प्रचंड मिशने पाठविली. हे सर्व केवळ स्वातंत्र्याचे खूळ नव्हे तर स्वत:ची हिम्मत व कळकळ. दुसरा मोठा गुण म्हणजे व्यावहारिकता. लोकशिक्षण आणि गरिबाची दाद ह्या बाबतीत ह्या पंथानी आजवर अविश्रांत परिश्रम केले आहेत व अद्यापिही करीत आहेत. लोकोपयोगी कृत्ये करण्यात नाना प्रकारच्या लालुची व करमणुकी दाखवून गरीब व उनाड लोकांस व्यसनापासून दूर ठेवण्यात ह्या निरनिराळ्या पंथांची एकमेकांवर ताण होत असते. अगदी लहान लहान कंगाल खेड्यांत जाऊन काही एक वेतन न घेता, अडाणी लोकांच्या कानांवर येथूच्या सदबोधाची चार वाक्ये ठेवण्याचे कामी गृहस्थ उपदेशकांची योजना करण्याची मेथॉडिस्ट पथाची हातोटी, लंडनसारख्या मोठ्या शहरी कुमार्गात पडून सर्वतोपरी भ्रष्ट झालेल्या तरूण बालिकांचा उद्धार करून पुन: त्यांच्याकडूनच तशा दुस-या पतितांस हातभार देण्याचे मुक्तिफौजेचे प्रयत्न, क्वेकरपंथाची सात्विकता, काँग्रिगेशनल पंथाचे स्वातंत्र्य आणि स्वावलंबन इत्यादी अनेक बाजूंनी अनेक पंथांकडून देशाचा व्यावहारिक फायदाच होत आहे. ह्या विरोधी पंथात परस्पर भिन्नता आहे तरी राष्ट्रहिताच्या कामी ह्यांचा तात्काल एक दिल होतो.

गेल्या पाचपंचवीस वर्षांत धर्माची नवी चलबिचल चालली आहे ती ही की ह्या विरोधी पंथाच्या मोठमोठ्या वार्षिक परिषदा जमू लागल्या आहेत आणि त्या सर्वांचे एक साधारण सम्मेलन स्थापन झाले आहे. ह्या जुटीमुळे ह्यांना अधिकाधिक बळ येत चालले आहे, व संख्या वाढत आहे. ह्याप्रमाणे सुमारे अर्ध्या राष्ट्राचा विरोध पडल्यामुळे धर्माची जी राष्ट्रीय संस्था तिला राजकीय मदत मिळते ती बंद करण्याची खटपट चालू आहे.

पण वरील साधारण सम्मेलनात युनिटेरिअन पंथाचा मात्र अद्यापि शिरकाव होऊ शकत नाही. कारण ह्या पंथाची मते इतकी उदार आहेत की जुन्या ख्रिस्ती लोकांच्या आग्रहास ती पटत नाहीत. म्हणून युनिटेरिअनांस अद्यापि वाळीतच रहावे लागत आहे. त्यांचीही लिव्हरपूल येथे थोड्या दिवसांपूर्वी एक मोठी त्रैवार्षिक सभा भरली होती.

इंग्लंडातील युनिटेरिअन चळवळीचे वास्तविक स्वरूप वाचकांच्या मनात नीट भरविण्याकरिता गेल्या आठवड्याच्या पत्रात इंग्लंडात हल्ली धर्माचे कार्य कसे चालले आहे, ह्याचा साधारणपणे विचार केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी लिव्हरपूल येथे युनिटेरिअन लोकांची आठवी त्रैवार्षिक परिषद भरली होती, तिजसंबंधी एक-दोन विचार ह्या पत्री कळविण्यात हेतू आहे.

युनिटेरिअन मताचा आणि समाजाचा पूर्वापार इतिहास आणि हल्ली हा समाज, धर्मात कोणती व कशी सुधारणा घडवीत आहे, ह्यासंबंधी मी मागे एका पत्रात त्रोटक माहिती दिली आहे. इंग्लंड देश सुधारणेच्या शिखरास पोहोचला आहे, विद्येची व लोकशिक्षणाचा अत्यंत प्रसार झाला आहे व अद्यापि झपाट्याने होत आहे, व्यक्तिस्वातंत्र्यास पूर्ण मुभा आहे आणि उलटपक्षी युनिटेरिअन समाजही, ऐतिहासिक ख्रिस्तीधर्मात जी शुद्ध व सार्वत्रिक तत्त्वे आहेत ती कायम राखून त्यांवर मध्ययुगात जी धूळ साचली आहे ती झाडून टाकण्याचा सावधपणे व सादरपणे प्रयत्न करीत आहे. इ. गोष्टी मनात आणता कोणाही परकीयास सहज असे वाटण्याचा संभव आहे की, इंग्लंडात सर्वत्र नाही तरी बहुसंख्या तरी ह्याच मताची असेल. पण आश्चर्याची गोष्ट ही की, प्रकार अगदी उलट आहे. इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड येथील एकंदर मिळून ३६४ च युनिटेरिअन मंदिरे आहेत. इतकेच नव्हे तर ह्याहून आश्चर्याची गोष्ट ही की, १८४० त ह्या समाजाची जी स्थिती होती त्याहून हल्ली केवळ संख्येच्या मानाने पाहता मुळीच प्रगती झालेली नाही. ह्यास पुष्कळ कारणे आहेत, ती सर्व येथे लिहिण्यास स्थळ नाही. तथापि ही परिषद कशी अस्तित्वात आली ह्याचा वरील गोष्टीशी बराच संबंध असल्यामुळे त्याचा थोडक्यात उल्लेख करणे इष्ट आहे.

सन १८१३ त युनिटेरिअन लोकांस कायद्याने पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यावर १८२५ त ब्रिटिश अँड फॉरेन युनिटेरिअन असोसिएशन नावाची, हल्ली मोठ्या प्रमाणावर काम करणारी मंडळी स्थापण्यात आली. ठिकठिकाणच्या गरीब समाजास मदत करणे, मंदिरे बांधून देणे, पुस्तके छापून वाटणे, बाहेर देशी मिशन पाठविणे आणि बाहेर देशी उदार धर्माची चळवळ करणा-याशी स्नेहसंबंध जोडणे इत्यादी महत्त्वाची कामे ही मंडळी आजपर्यंत करीत आली आहे. पण ही मंडळी केवळ व्यक्तिविषयक सभासदांची बनलेली आहे आणि हिची कमिटी अर्थात ह्या सभासदांकडूनच नेमण्यात येते. उलपक्षी ठिकठिकाणच्या समाजांची सर्व अंतर्बाह्य व्यवस्था लोकसत्तात्मक पायावर, तेथील सभासदांकडून होत असते. स्थानिक समाजाची सर्व व्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी त्या त्या समाजांच्या सर्व सभासद व्यक्तींवर आहे तशीच अशा सा-या समाजांची एक मध्यसंस्था स्थापून तिच्याकडून मध्यव्यवस्थेचे व प्रसाराचे काम करविण्याची जबाबादारीही ह्या ठिकठिकाणच्या समाजांच्या कमिटीवरच आहे हे उघड आहे. पण आजपर्यंत हे काम ब्रिटिश अँड फॉरेन ह्या थोड्या व्यक्तींच्या मंडळीकडूनच होत असल्यामुळे, समाजात यावा तितका जोर अद्यापि आला नाही. ही स्थिती लक्षात आणून सन १८८२ साली सर्व समाजांच्या प्रतिनिधींची ही परिषद स्थापण्यात आली. दर तीन वर्षांनी तिची एक बैठक होते. गेल्या पंधरवड्यात तिची आठवी बैठक लिव्हरपूर शहरी झाली. उपदेशकांचा पगार वाढविणे, त्यांना पेन्शन देणे, मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड येथे आणणे, वगैरेसाठी मोठमोठे फंड जमविणे आणि इतर बरीच कामे ह्या परिषदेमुळे ह्या २१ वर्षांत झाली आहेत. ही आठवी परिषद भरण्यापूर्वी गेल्या सबंध वर्षात एका महत्त्वाच्या प्रश्नासंबंधी वाटाघाट होत होती, ती अशी की, आजपर्यंत परिषदेने नुसते ठराव पास केले आहेत, तर ह्यापुढे तिच्या कमिटीची एक मोठी कार्यकारी संस्था बनावी, तिच्या सेक्रेटरीने नेहमी देशभर हिंडून सर्व समाजाचा प्रत्यक्ष समाचार घ्यावा व लागेल ती मदत करावी, ह्या कामास त्याने आपणास वाहून घ्यावे व त्यास भरपूर पगार द्यावा, थोडक्यात सांगावयाचे म्हणजे युनिटेरियनांचा एक मोठा संघ (Church) स्थापावा.

ह्याप्रकारे आज वर्षभर चर्चा होऊन शेवटी परवा एकसारखे चार दिवस ह्या परिषदेचे काम लिव्हरपूल येथे झाले. ह्याची साद्यंत हकीकत इन्क्वायर पत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यातील अध्यक्षांचे भाषण व उपदेश, मुख्य कामासंबंधी रेव्ह. वुड ह्यांचा कागद, जाहीर सभेतील रेव्ह. जॅक्स व विक्सटीड ह्यांची भाषणे फार मनन करण्यासारखी आहेत. परिषद मला कशी दिसली हे थोडक्यात लिहितो.

लिव्हरपूल हे शहर अत्यंत श्रीमंत आणि सा-या इंग्लंडात पुढारलेले आहे. तेथील परिषदेच्या व्यवस्थापक मंडळीने बाहेरून आलेल्या सुमारे ६०० प्रतिनिधींची उत्तम व्यवस्था सर्व आपल्या खर्चाने केली होती. टाऊन हॉलातील सुंदर आणि भव्य गायनशाळेत चार दिवस सकाळी १० पासून तो रात्री १० पर्यंत सभेचे काम चालत असे. नेहमी सुमारे १००० चा श्रोतृवृंद शांतपणे बसून ऐकत असे. मध्यंतरी एका जवळच्या मोठ्या हॉटेलात सर्व प्रतिनिधींचा व पाहुण्यांचा एकाच स्थळी मोठ्या समारंभाने भोजनविधी होत असे. तिस-या प्रहरी चहासाठी एकदा बैठक उठे तेव्हाही निरनिराळ्या भागांतून आलेल्या बंधुभगिनींची परस्पर ओळख होऊन अगत्याची संभाषणे होत. ह्या समाजात स्त्रीपुरूषांची संख्या बहुतेक समसमानच होती. मुख्य दिवसाचे काम बरेच महत्त्वाचे आणि वादग्रस्त असूनही वादविवाद अगदी सुरळीतपणे झाला. पहिले दिवशी परिषदेच्या उपासनेच्या वेळी फिलार्मोनिक हॉल नावाच्या अत्यंत भव्य सार्वजनिक मंदिरात सुमारे १३०० स्त्री-पुरूषांची गर्दी जमली होती. प्रार्थनेच्या आरंभी (Awake our souls! Away our fears!) ह्या पद्याचा टाहो एकदम जेव्हा १३०० कंठांतून फुटून बाहेर आला, तेव्हा इमारतीच्या दगडांनाही जणू हुरूप येऊन ते प्रतिध्वनीच्या मिषाने आम्हांस हाक देऊ लागले. जाहीरसभेत श्रोतृवृंद १६०० वर हजर होता. मी मागे एकदा युनिटेरिअन समाज म्हणजे सुधारलेल्या जगाचे प्रबुद्ध अंतर्याम असे म्हटले होते. त्याची मला येथे चांगली प्रचीती आली. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ह्या सर्व बाजूंनी जरी जहाल सुधारकी भाषणे झाली, तरी चहूंकडून टाळ्यांचा गजरच झाला. जणू वॉकर्स आर्ट ग्यालरी नावाच्या एका अफाट चित्रसंग्रहालयात परिषदेचा सामाजिक मेळा (Conversazione) जमला, त्यावेळी इकडील रिवाजाप्रमाणे सायंकाळचा प्रेक्षणीय पेहराव करून येथील कुलीन व प्रमुख कुटुंबातील सुमारे दोन हजार स्त्री-पुरूषे जमली होती. अखेरीस शहरच्या कंगाल वस्तीत गरीबांसाठी स्थापलेल्या एका मिशन-मंदिरात मद्यपान निषेधाची एक टोलेजंग सभा होऊन परिषदेचे काम आटपले. मुख्य काम जे मध्यसंघ स्थापण्याविषयीचे त्याविषयी सर्व समाजांच्या मतानुरूप सविस्तर विचार करून अखेर निकाल लावण्याचा अधिकार परिषदेच्या कमिटीस देण्यात आला.

असो. वाचकहो, आणि विशेषत: ब्राह्मबंधूंनो, ह्या सातासमुद्रांपलीकडच्या सात हजार मैलांवरच्या परदेशी गप्पा तुम्हांला सांगण्यात काय तात्पर्य बरे! आज आम्ही ब्राह्मबंधू युनिटेरिअनांप्रमाणे सारख्याच नावेत बसून संगतीने एकाच तीराकडे निघालो आहो. त्यांच्यासारख्याच पण शतपट अधिक आम्हांपुढे अडचणी आहेत. त्यांच्यासारखीच पण सहस्त्रपट अधिक आमच्यावर जबाबदारी आहे. पण ते करीत आहेत त्या खटपटी, नजरेने पाहून त्यांच्या अंशमात्रही खटपट करण्यास आम्ही कचरतो, ह्याला काय म्हणावे! इंग्लिश लोकांचे युनिटेरिअन चळवळीवाचून विशेषसे अडतेच असे नाही. येथे कोणी नव्या पंथाचा असो की जुन्या पंथाचा असो, मानवी प्रगतीच्या प्रत्येक बाबतीत हरत-हेने तो आपले पाऊल पुढेच टाकीत असतो. आमचे तसे आहे काय? नवीन घोडे जुंपलेल्या गाडीप्रमाणे आमच्या राष्ट्राची ओढाताण होत आहे. आम्ही एकीकडे ओढावे तर ब्राह्मसमाजाबाहेरचे आमचे बंधू अगदी उलट दिशेने ओढ घेतात. फार काय तर समाजातीलच आमचे बंधू वेळेला अंग चोरतात ! सपशेल जूं टाकून मोकळे होतातही केव्हा केव्हा! प्रत्येकाने आपली शिकस्त केली तरी आमच्या अवजड राष्ट्राची गाडी हालेल की नाही ह्याची भीती असूनही आम्ही धरसोड चालविली आहे! आमचे समाज थोडे, आमचे सभासद कमी, ह्याबद्दल वाईट वाटावयाला नको. आहेत. त्याच समाजांचा परस्पर संबंध समाधानकारक नाही, आहेत त्याच सभासदांच्या कर्तव्याची वाटणी न्यायाची नाही, ह्याबद्दल मात्र अवश्य वाईट वाटले पाहिजे, वाटत नसेल तर मग सभासदांची संख्या कशी वाढेल? आणि वाढून तरी काय फळ! आमच्या युनिटेरिअन मित्रांना मध्यसंघाची आवश्यकता वाटून तिच्या तयारीला ते लागलेदेखील. पुढील त्रैवार्षिक परिषदेच्या आधीच ते काम उरकून जाईल. पण आमची वाट काय? आम्ही आमचा प्रसार का होत नसावा ह्याबद्दल नुसते आश्चर्य मानीतच बसणार काय?

आवड आणि प्रीति

(ता. १४-७-१९०८ रोजीं रा. रा. भास्करराव तर्खड यांच्या येथें कौटुंबिक उपासनेच्या वेळीं झालेल्या उपदेशाचा सारांश.)

।। गोड तुझें नाम दयाळा आवडतें मज ||

आवड आणि प्रीती हे दोन शब्द व्यवहारात बहुधा आपण समानार्थीच योजीत असतो पण ह्यांचे अर्थ व संकेत परस्परांशी ताडून पाहून त्यांची किंचित परीक्षा केली तर लवकरच कळून चुकेल की ते परस्परांहून भिन्न आहेत, इतकेच नव्हे तर अगदी उलट आहेत. आपण म्हणतो की आपल्याला एकादी वस्तू आवडते, जशी एकादे दिवशी रूचकर झालेली ताटातली चटणी, अंगावरचा अलंकार किंवा पहाडातला अगर समुद्रकाठचा देखावा, अथवा कालिदासासारख्याच्या काव्यातील एकादा उतारा. दुस-या पक्षी आम्ही म्हणतो की एकाद्या प्राण्यावर प्रेम आहे, जसे आपले लाडके कुत्रे अथवा सलगीचा मित्र किंवा एकुलता एक पुत्र ह्यावर आम्ही करतो ते. ताटातल्या चटणीपासून तो कविराजाच्या काव्यापर्यंत परंपरेने उंच उंच होत जाणारे हे सर्व पदार्थ एक पक्षी आपल्या आवडीचे विषय होतात तर दुस-या पक्षी कुत्र्यापासून तो पोटच्या गोळ्यापर्यंत प्राणी आपल्या प्रीतीचे विषय होतात. आता व्यवहारात यद्यपि प्रीती आणि आवड ह्या शब्दांची योजना करिताना आपण अगदी सहज गोंधळ करून टाकतो, तरी वरील उदाहरणावरून सहज लक्षात येण्यासारखे आहे की आवडीचे सारे विषय आमच्या केवळ थोड्याबहुत उपभोगास कारण होतात, तर प्रीतीचे विषय मात्र आम्हांस कमी अधिक मानाने स्वार्थत्याग करावयास लावतात म्हणजे आवडीचे लक्षण उपभोग आणि प्रीतीचे लक्षण ह्याच्या उलट स्वार्थत्याग हे होय. आवडीचा विषय कोणताही अचेतन पदार्थ असू शकतो, पण प्रीतीचा विषय होण्याला चैतन्याचीच जरूरी असते, मग ते चैतन्य कुत्र्यामांजरातल्याप्रमाणे झाकलेले बद्ध चैतन्य असो किंवा साधुसंतातल्याप्रमाणे प्रकाशणारे मुक्त चैतन्य असो. एका पक्षी आमच्या आवडीच्या विषयाला आम्ही आपल्या सुखासाठी त्याचा अंत होईपर्यतही झिजविण्यास किंवा एकदम गट्ट करण्यासही तयार असतो, तर दुस-या आमच्या प्रतीच्या विषयासाठी आम्ही स्वतःचा अगदी अंत होईतोपर्यंत तनमन झिजून जातो. आता असेही काही विक्षिप्तराव आढळतात की जे आपल्या फाटक्या जोड्यासाठीही प्राण धोक्यात घालतील. ह्या उत्पटांग भावनेला आवडही म्हणता येत नाही व प्रीतीही म्हणता येत नाही. ती केवळ कृपणत; व तिचा विचारही येथे करावयास नको. पण वरील उदाहरणावरून आवड व प्रीती हे केवळ पर्यायवाचक शब्द नाहीत हे सिद्ध झाले. आणि म्हणून जरी आम्ही दिवाणखान्यतल्या आपल्या एका आवडीच्या सुबक आरामखुर्चीवर आपली प्रीती आहे असे केव्हा केव्हा व्यवहारात सहज म्हणून जातो तरी खरे पाहता हा अगदी चुकीचा व्यवहार आहे हे उघड आहे.

पण प्रस्तुत समयी मला केवळ भाषेची मीमांसा किंवा दुरूस्ती करावयाची नाही. आवड आणि प्रीती ह्यांचे खरे अर्थ ह्या प्रसंगी स्पष्ट करण्याचा उद्देश निराळाच आहे. आवड आणि प्रीती ह्यांची, भोग आणि त्याग अशी परस्पर विरूद्ध लक्षणे आहेत असे सांगितले. असे असूनही संसारात निरनिराळ्या माणसांशी आमचे जे स्नेहाचे संबंध जडतात त्यांना सरसकट प्रीती हेच नाव देण्यात येते. पण वस्तुत: बहुतेक प्रकार केवळ आवडीचेच असतात. एका मित्राने मला स्पष्ट सांगितले की, त्यांना लहान मुलांवर प्रीती करावीशी वाटते पण ती मुले मात्र सुंदर असली पाहिजेत. रस्त्यात जर एकादे गोजिरवाणे मूल पाहिले तर ते कोणाचेही असो उचलून त्याचे चुंबन घ्यावेसे त्यांना वाटते. स्पष्ट सांगितल्याबद्दल मित्राची मी तारीफ केली. पण ज्या गोड बालकाविषयी ह्या मित्राची अशी स्थिती होते त्याच्या आईची त्या बालकासंबंधी भावना व ह्या मित्राची भावना किती जमीनअस्मानाचा भेद. परवा एका वर्तमानपत्रात वाचले की दार्जिलिंगकडे एक आगगाडी धावत चालली असता एकाएकी गाडीबाहेर एक मूल पडले, त्यासरशी त्याच्या आईने खाली उडी टाकली. तिचा परिणाम असा झाला की गार्डाने गाडी थांबविली व दोघांचेही प्राण वाचले. कुठे कौतुकाचे नुसते चुंबन आणि कुठे हा कडेलोट. संसारात आम्ही परस्परांवर स्नेह करितो (ह्या मासिक कौटुंबिक उपासनांचा उद्देशही परस्पर स्नेह वाढविण्याचाच आहे.) तेव्हा आम्ही आपापल्या स्नेहाची आपल्याशीच पारख करावयाला पाहिजे आणि त्यात आवडीचा भोग किती आहे व प्रीतीचा त्याग किती आहे हे वेळोवेळी ठरविले पाहिजे. नाहीतर ही एक नित्यनैमित्तिक फसवणूक चालली आहे ती तशीच कायम राहील.

ह्यावरून कोणी कोणाच्या गुणावर लुब्ध होऊन त्याचे कौतुक करू नये असे म्हणणे नाही. उलट एकाची दुस-यावर आवड बसमे हा उदात्त आत्मिक व्यापार आहे हे खरे. तथापि ह्या व्यापाराचा प्रीतिरूपी याहून अत्यंत उदात्त आत्मिक व्यापाराशी विपर्यास होऊ न देण्याची खबरदारी घेतली पाहिजे हेच सांगण्याचा हेतू आहे.

आता आवड आणि प्रीती ह्या आमच्या भिन्न भावना ईश्वराचे ठायी कशा असतात ह्याचा विचार करू. आणि आजच्या विषयाचा हाच मुख्य उद्देश आहे. कोणताही अचेतन पदार्थ आमच्या आवडीचा विषय होऊ शकतो. पण प्रीतीचा होत नाही, म्हणजे तो पदार्थ कितीही आवडता असला तरी आम्ही त्याच्यासाठी कधी काही स्वार्थत्याग करीत नाही. मनुष्यप्राणी म्हणजे एक जड आणि चैतन्याचे मिश्रण आहे. तो केव्हा आवडीचा, केव्हा प्रतीचा, केव्हा दोन्हींचाही विषय होत असतो. एकाद्या आपल्या जिवलग मित्रावर आपले पुष्कळ प्रेम व आदर असतो पण काही मतभेदामुळे अगर रूचिवैचित्र्यामुळे अथवा दुस-या असल्या क्षुल्लक उपाधीमुळे त्याच्यावर आपली तितकी आवड नसते. तसेच एकाद्या खुशमस्क-या सोबत्याचा आपल्याला मोठा शोक लागून जातो तथापि त्याच्यावर तितकी प्रीती नसते, तसे आम्हा अपूर्ण मानवांचे संबंध असतात. पण शुद्धचैतन्य परिपूर्ण परमात्मा ह्याच्याशीदेखील आवड असल्यास प्रीती नाही, किंवा प्रीती असून आवड नाही, अशी अर्धवट धरसोडीची भावना असू शकेल काय?

अगोदर ईश्वरावर आमची नुसती आवडही जडणे दुर्मिळ. वेळोवेळी विषयाकडेच ओढ घेणारे आमचे मन त्याने विषयातील निराकार ज्योतीकडे धाव घेणे म्हणजे अपवादच. तथापि असे अपवादक पुरूष बरेच आढळतात. किंबहुना आमच्या सा-यांची ही अशी अपवादक स्थिती थोडीबहुत केव्हाना केव्हा तरी होत असते. विशेषत: एकांतात भजन, प्रार्थना, चिंतन हे करू लागलो असताना, आत्मपरीक्षण जोराने चालले असता, पश्चात्तापशुद्धीचा अनुभव घेत असता, भूत, भविष्य, वर्तमान विशाल विश्वातील सर्व चांगल्या आणि सामर्थ्यवान वस्तू एकवटून जणू आकारालाच येते आणि भक्तीच्या योगे मृदू झालेले आमचे मन त्या आकाराला साक्षी होते. अशा स्थितीत ईश्वर आपल्याला आवडू लागतो. ही वेळ अमोल सुखाची आणि उदात्त अनुभवाची हे सर्व खरे, पण अशा वेळी ईश्वरावर आम्ही प्रीती करतो किंवा त्याच्या अपार मंगल गुणांचे केवळ कौतुक करितो बरे? अशा वेळी सुख होत असते पण काही त्याची सेवा घडत असते काय? आध्यात्मिक सुख पुष्कळसे अनुभवून सेवेची पाळी आल्याबरोबर आम्ही चुकवाचुकवी करीत नाही काय? जसे आपल्या अडचणीत पडलेल्या मित्रासाठी किंवा मरणोन्मुख झालेल्या बालकासाठी अथवा आपल्या प्रिय मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक दु:खे सोसतो, तसे ईश्वराच्या इच्छेसाठी काही झीज सोसतो काय? असे जर होत नसेल तर ईश्वरावर आपली प्रीती नसून केवळ केव्हा तरी आवड मात्र बसते असे होते. पण किंचित सूक्ष्म विचार केला तर कळून चुकेल की ईश्वराची आवड लागणे आणि त्याजवर प्रीती न करणे, किंवा त्याजवर प्रीती करणे पण त्याची आवड न लागणे, ह्या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. ह्या धरसोडीचे प्रकार आम्हा मनुष्यांच्या परस्पर संबंधात असणे शक्य आहे. पण शुद्ध चैतन्याशी असा अर्धवट संबंध जडणे मुळीच अशक्य आहे. तसा अर्धवट अनुभव येत असल्यास आपण आपली फसवणूक करून घेत आहो असे खास समजावे.

।। गोड तुझें नाम दयाळ आवडतें मज ।।
असें वाटल्याबरोबर
।। काया वाचा मन हें चरणीं डुल्ललें गहाण ।।
।। कृपा ऋण नचि फिटे अर्पिताही प्राण ।।

असाही अनुभव, नुसता आपल्यालाच नव्हे तर दुस-यालाही आला पाहिजे, नाहीं तर दोन्ही अनुभव खोटे आणि पोकळ समजावेत.

आपुलिया बळें घालावी हे कास

 (ता. १४-६-१९१० रोजी रा. रा. सत्यवंत वासुदेव नवरंगे यांच्या घरीं त्यांचे वडील प. वा. वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या तिस-या पुण्यतिथिनिमित्त केलेल्या हरिकीर्तनाचा सारांश.)

विषयोपक्रम :- ह्या मानवी संसारामध्ये मनुष्याची बुद्धी उत्तरोत्तर जसजशी जास्त विकसित होत जाते, तसतसा त्याच्या कर्तव्याचा प्रदेश विस्तृत होऊन त्याची बुद्धी संकीर्ण होते व अशा वेळेस काय करावे असा त्याला भ्रम होत असतो. त्याची चित्तशुद्धी आणि समाजहित ह्या दोन कर्तव्यांचा कलह लागून बुद्धी व्यामिश्रित होते. प्राचीन काळी वेदांतात समष्टी, व्यष्टी ह्या दोन भावना जरी अवगत होत्या तरी अर्वाचीन काळाप्रमाणे तेव्हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नव्हता. आता प्रत्येकाची जात, समाज, राष्ट्र, जग अशा उत्तरोत्तर समष्टी सुधारणेकडे ध्यास लागतो आणि अंतःकरणशुद्धी ह्या व्यष्टी सुधारणेची हयगय होते आणि त्यामुळे समष्टी सुधारणेलाही बाध येतो. तुकाराम म्हणतात, अशा वेळेस एक गोष्ट करा ती ही की –

आपुले स्वहित करावे पै आधी । विचारुनी बुद्धी समाधान ।।
नये मागे पाहो वाट फिरोनिया । दुसरा संगिया साहाकारी ।।
आपुलिया बळे घालावी हे कास । न घेणेचि आस आणिकाची ।।
तुका म्हणे ब्रह्मरसी द्यावी बुडी । वासना हे कुडी सांडुनिया ।।

आपल्या स्वतःच्या बद्धीला ज्यायोगे समाधान वाटेल अशी गोष्ट करा. स्वतःच्या बुद्धीला सोडून दुस-याच्या बुद्धीचे समाधान पाहू नका. जितकी त्वरा करवेल तितकी करून आपले हित साधून घ्या. कारण –

जरा टुक सोच ये गाफील, । के दमका क्या ठिकाना है ।
निकल जब ये गया तनसे । तो सब आपना बेगाना है ।।१।।
मुशाफिर तूं है, यह दुनिया । सराहे भूल मत गाफील ।
सफर परलोकका आखिर । तुझे दरवेश आना है ।।२।।

तुमचे जीवित फार थोडे आहे, त्याचा प्रदेश फार आकुंचित आहे, तुमचे ठिकाण कोठे आहे ? पर्यवसान कशात आहे ह्याचा विचार करा. ह्या तनूतून दम निघून गेला म्हणजे जे आपले म्हणून समजतो ते परकीय बनेल. आपण ह्या जगामध्ये मुशाफर असून आपली वसती तात्पुरती आहे. ही सराई-धर्मशाळा आहे, कायमची वसती नाही. सध्या आपण ज्या पायरीवर आहो त्याच्या वरच्या पायरीवर जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बुद्धीचे बदलत जाणारे आपले कर्तव्य करीत असता, आपल्या बुद्धीचे समाधान केले पाहिजे, कारण –
न जाने कौनसी बीरया । बजेगा कूच नक्कारा ।।
विषयसुख देख मत भूलो । वृथा जंजालमें फूलो ।।
जगत है रैनका सुपना । समज मन कोई नही अपना ।।
तजो मन लोभ चतुराई । भजो हरिचरण सुखदाई ।।

कोणत्या वेळेस ह्या पाय-या आपटतील ह्याचा नियम नाही, ह्या प्रवासाचा आदी व अंत अनिश्चित आहे, हे सर्व जगत् क्षणभंगुर आहे व नेहमी बदलत जाणारे असून रात्रीच्या वेळी पडलेल्या स्वप्नाप्रमाणे आहे. आपले मत स्थापित करण्याकरिता प्रयत्नाने बहुमत आपणाकडे मिळविण्याची चतुराई आपण करू नये. त्यायोगे आपणाला खरे सुख प्राप्त होणार नाही. ते मिळविण्यास हरीचे चरण घट्ट धरले पाहिजेत. नाही तर-

चामडेकी पूतली तूं करले भजन ।।धृ।।
चामडेकी पूतली चांवलेवे पान ।
आछे आछे कपडे पहिरे करत गुमान ।।
चामडेका बछा चामडेकी गाय ।
चामडेका दूध दही चामडेमें जाय ।।
चामडेका हाथीघोडा चामडेका उंठ ।
चामडेका बाजा बाजे बाजे चारो खूंट ।।
चामडेका बादशहा चामडेका वजीर ।
चामडेकी सारी दुनिया बोले दास कबीर ।।

मनुष्ये कातड्याच्या बाहुल्या आहेत, त्या बाहुल्या तरी सुंदर असाव्या तशा नसून बहुतेक कुरूप आहेत. शंभरामध्ये एकादी दुसरी सुंदर असते. अशी स्थिती असूनही मनुष्य कितीतरी गर्व वहातो ! पानसुपारी खाऊन कृत्रिम सौंदर्याने कुरुपतेचे तो प्रदर्शन करीत असतो. एका राष्ट्राचे सौंदर्य दुस-या राष्ट्रास हसावयास लावते, एकाद्याची टोपी, जोडा किंवा अंगरखा दुस-यास हास्यास्पद वाटतो. दुस-याला बरे वाटावे म्हणून आपण चांगला पेहराव करतो. ह्याप्रमाणे आपण ह्या कातड्याच्या देहाचा विनाकारण गर्व वाहतो. जिचे आपण दहीदूध खातो ती गाय चामड्याचीच आहे, तिचे वासरू, दही, दूध देखील कातड्याचेच आहे, आणि ते दूधही कातड्याच्याच पोटात जाते. हत्ती, घोडे, उंट, वजीर व बादशहादेखील कातड्याचाच आहे. अशी ही सर्व दुनियाच कातड्याची बनलेली आहे. तथापि आपल्या आदर्शाच्या मागे लागून आपण जर उच्चपद संपादन करून आपले हित साधून घेतले तर ह्या चामड्याच्या देहाचे सार्थक होते. जेथे जेथे भजन होत असते तेथे तेथे आत्माराम येत असतो, नाही तर निसते चामडे रहाते. आपण जर स्वहित लवकर साधून घेतले नाही तर आपण काळाच्या जबड्यात जाऊ. काळ कसा आहे तर-

पुरंदरसहस्त्राणि चक्रवर्तिशतानि च ।
निर्वापितानी कालेन प्रदीपा इव वायुना ।।
अद्यैव हसितं गीतं पठित यैः शरीरिभिः ।
अद्यैव ते न दृश्यन्ते कष्ट कालस्य चेष्टितम ।।
म्रियमाणं मृतं बंधुं शोचन्ते परिदेविनः ।
आत्मानं नानुशोचन्ति कालेन कवलीकृतम ।।

मोठमोठी शहरे काबीज करणारा सोनापती, एवढेच नव्हे तर सार्वभौम राजासुद्धा काळाच्या एका फुंकाराने नाहीसा होतो. थोड्या वेळेपूर्वी वाचीत असलेला किंवा सुस्वर गायन गात असलेला मनुष्य एकदम काळाच्या तावडीत सापडतो. ह्या काळाने सर्वांना आपल्या मुठीत धरलेले आहे. परंतु हा कालवादसुद्धा खरा नाही. कर्म हेच सर्वांपेक्षा बलवत्तर आहे. महाभारतातील अनुशासनपर्वामध्ये अशी गोष्ट आहे की, गौतमी नावाच्या एका वृद्ध बाईचा एकुलता एक मुलगा साप चावून मेला, तेव्हा अर्जुनका नावाच्या व्याधाने त्या सापास जिवंत धरून आणून, ह्यास कोणती शिक्षा करू म्हणून गौतमीस विचारले. त्यावर तिने सापासच ती गोष्ट विचारण्यास सांगितले. सापास विच्यारल्यावरून त्याने उत्तर दिले की, ह्यात माझा काही एक अपराध नाही, मी मरणाचा दास आहे, मरणाने सांगितलेले काम मी बजावतो एवढेच. त्यावरून व्याध्याने मरणास जिवंत पकडून आणून हे दुष्कृत्य तू का केलेस म्हणून त्याला विचारले. मरणाने उत्तर दिले, “बाबा, मी सापासारखाच काळाचा नोकर आहे. त्याच्याच आज्ञेवरून मी पडशाकडे, खोकल्याकडे, तापाकडे वगैरे अनेक रोगांकडे जाऊन मनुष्यांना घेऊन येतो.” पुढे व्याधाने त्या काळासही पकडून आणिले, तेव्हा काळाने पुढीलप्रमाणे उत्तर दिले –

कर्मदायादवौल्लोकः कर्मसंबंधलक्षणः ।
कर्माणि चोदयन्तीह यथान्योन्यं तथा वयम् ।।
यथा मृ त्पिंडतः कर्ता कुरुते यद्यदिच्छति ।
एवमात्मकृतं कर्म मानवः प्रतिपद्यते ।।
यथाच्छायातपौ नित्यं सुसंबंद्धौ निरंतरम् ।
तथा कर्मच कर्ता च संबंद्धावात्मकर्मभिः ।।
एवं नाहं नवैर्मृत्युर्नसर्पो न यथा भवान् ।
न चेयं ब्राह्मणी वृद्धा शिशुरेवात्र कारणम् ।।

मी काही एक करीत नसतो. जे काही घडते ते ज्याच्या त्याच्या कर्मामुळे घडत असते. कर्मसंबंधहीन अशी कोणतीच वस्तू नाही. सर्व भाव मात्र कर्मसंबंधलक्षण आहे. एका कर्मामुळे दुसरे कर्म उद्भवते. अशी ही मालिका सारखी चालू आहे. आम्ही सर्वजण छकड्याला जुंपलेले बैल आहो. कर्म वा कर्ता ह्यांचा अन्योन्य संबंध आहे. आज असे कर्म नाही की जे स्वयंभू आहे. कर्ता अगोदर की कर्म अगोदर हे एक मोठे कोडे आहे. बीजांकुरन्यायाप्रमाणे कर्ता, कर्माचा बाप, किंवा कर्म कर्त्याचा बाप हे काही सांगता येत नाही. कर्त्याच्या इच्छेच्या बीजाभोवती कर्माची जमीन, कर्माचे खत, कर्माचे पाणी व कर्माची हवा असते. त्यांतून जो अंकुर येतो त्याचा भाग कर्माकडे किती व कर्त्याकडे किती हे कोणी सांगावे ? कुंभार ज्याप्रमाणे आपल्या इच्छेनुरूप मडके बनवितो, त्याप्रमाणे मनुष्य स्वेच्छेने कर्म करीत असतो व कर्मही मनुष्येच्छेला आपल्यापरी वळवीत असते. ज्याप्रमाणे ऊन व सावली एकमेकांवर अवलंबून असतात त्याप्रमाणे कर्म व कर्ता एकमेकांवर अवलंबून असतात. परस्परांची परस्परांवर सूक्ष्म क्रिया, प्रतिक्रिया (Interaction) होत असते. व्याध, साप, मरण, काळ, किंवा गौतमी ह्यांपैकी कोणीही जबाबदार नाही तर त्या मुलाचेच जे कर्म त्याने त्यास नेले आहे. कर्मच सर्वांत श्रेष्ठ आहे. असे आदर्शमय कर्म आपल्या बुद्धीचे समाधान साधून आपण करावे, व आपली बुद्धी स्थिर करावी. भलताच वाद माजवू नये, नाही तर तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘वादे ब्रह्मवृंदे गेली वायां’ असे होईल. आपल्या जीवनपथापासून आपण एक अंगुलीभरही दूर जाऊ नये. नानाप्रकारच्या मतांचा व जीवनपथांचा काही एक संबंध नाही. आपल्या समाधानाचे जितक्या प्रमाणाने हित असेल तितक्या प्रमाणाने आपले शरीर, शील, समाधानरूपी संपत्ती खर्च करावी. जीवनपथास धरून आपण जर कर्म केले नाही तर आपली स्थिती वेड्यापेक्षाही कठीण होईल.

स्थाल्यां वैडूर्यमय्यां पचति तिलखलीमिन्धनैश्चन्दनाद्यैः ।
सौवर्णे लांगलाग्नैर्विलिखति वसुधामर्कमूलस्य होतोः ।।
छित्या कर्पूरखण्डा न्यृतिमिह कुरुते कोद्रवाणां समन्तात् ।।
प्राप्येमां कर्मभूमि न चरति मनुजो यस्तपो मन्दभाग्यः ।।

जो मनुष्य कर्मभूमीला प्राप्त होऊन व्रत आचरीत नाही तो रत्नजडित भांड्यामध्ये तिळाची पेंड घालून खाली मलयपर्वतावरील चंदन हे सर्पण लावून ती पेंड शिजविणा-या ह्या मनुष्याप्रमाणे किंवा रुईची मुळी काढण्याकरिता सोन्याच्या नांगराचा उपयोग करणा-या मुलाप्रमाणे, किंवा कोद्रवाच्या भोवती कापराचे आळे करणा-या मनुष्याप्रमाणे मूर्ख आहे. जो मंदभागी आहे तो कर्म कोणते, कर्माचे काय महत्त्व आहे हे समजल्यावरही त्या संधीचा दुरुपयोग करतो. ह्याकरिता आपण नेहमी भजन केले पाहिजे. भजन म्हणजे नुसते टाळ कुटीत बसणे नव्हे तर भजन म्हणजे आपल्या मनाला जे उच्च वाटले त्या आदर्शाचा पाठलाग करणे होय. असे भजन करून आपले उद्दीष्ट मनाला कळले अशी जरी खात्री झाली तथापि आदर्शाच्या बाजूने एक अडचण आहे ती कोणती म्हणाल तर –

आवडतो प्रिय परी गवसेना ।।धृ।।
स्वजनाहुनि प्रिय देह आपला ।
तोहि विटे परि आपण विटेना ।।
ज्यावरी धांवति इंद्रिय मन ही ।
सर्वही पाहुनि आपण दिसेना ।।
श्रीगुरुदासा अनन्य घडे जरी ।
अनुभवतंतू कधीही तुटेना ।।

आपणास आदर्श प्रिय वाटतो पण तो गवसत नाही. आपल्या स्वजनाहून प्रिय असा देह विटतो पण आदर्श विटत नाही. आपल्या सर्व गात्रांचे भाव ईश्वर पाहातो पण तो स्वतः काही दिसत नाही. असे जरी आहे तरी आपण निराश होता कामा नये. एका आदर्शाने दुसरा आदर्श मिळतो. हिमालय पर्वतावरची सर्व शिखरे एकदम दिसत नाहीत. एक चढून गेल्यावर दुसरे, दुसरे चढल्यावर तिसरे दिसते. ह्याचप्रमाणे आदर्शाचीही गोष्ट आहे. डावपेच नसेल तर आपला अनुभवतंतू कधी तुटत नाही.

प्रेम पियाला जो पिये शीस दक्षिणा देय ।
लोभी शीस न देसके नाम प्रेमका लेय ।।
जो घट प्रेम न संचरे, सो घट जान मसान ।
जैसी खाल लुहारकी, श्वास लेत बिन प्राण ।।

ज्याला प्रेमाची गोडी लागली आहे तो प्रेमाकरिता आपले डोकेही कापून देण्यास तयार असतो, पण ज्याला ती गोडी नसते तो नुसते प्रेमाचे नाव घेत बसतो, अनुभव यावयास प्रेमाचा प्याला प्यावयास पाहिजे. नाही तर लोहाराच्या भात्याप्रमाणे प्राणाशिवाय नुसता श्वास घेणारी आम्ही यंत्रे होऊ. केशवस्वामी सांगतात -

ऐसी फकिरी नही रे भाई । ये तो सालिम बेशरमाई ।।धृ.।।
चेलेके घर हात पसारे । दुनियादारकु मानत प्यारे ।।
मै घर लडके मनमे घरना । बाहेर निजाम रोजे करना ।।
कान खोलकर केशव बोले । गाफिल अलबत खावे झोले ।।

चेल्याने फकिराजवळ भिक्षा मागावयाची, ती हल्ली संध्याकाळी फकिरांची गर्दी चेल्यांचे घरी दृष्टीस पडते. बाहेरून परमार्थ पण आतून स्वार्थ बरा नव्हे, ह्याकरिता तू आपल्या बुद्धीला संतुष्ट करून आपले हित साधून घे व खालीलप्रमाणे ईश्वराची प्रार्थना कर –
प्रभू मज देई तुझी खरी शांति ।।धृ.।।

जगशांतीने मन मळमळते ।
होत असे मज वांति ।।
तव शांतीने बहु सुख वाटे ।
नेई वरी ती अंती ।।
शांति दे स्थिर करि मन माझे ।।
काढ मनाची भ्रांति ।।
शांति आपुली दिली त्वां ज्यांना ।
काय तयांची कांति ।।

आपला व खालील प्राण्यांचा संबंध

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
(सुबोधपत्रिका ता. ५-१०-१९०२)

मुलांनो, आमच्यापेक्षां खालील प्राण्यांस बुद्धी नाही, अक्कल नाही असे आम्ही नेहमी मोठ्या तो-याने बोलत असतो. पण, आज मी तुम्हांस ह्या प्राण्यांबद्दल दोन तीन गोष्टी सांगणार आहे. त्यासंबंधाने तुम्ही आपल्याशीच विचार करा.

डेव्हन पोर्ट शहरी एके दिवशी मी आपल्या खोलीत वाचीत बसलो होतो. जवळच घरचे मांजर घुरघुरत बसले होते. काही वेळाने त्यास बाहेर जावेसे वाटले. पण दार घट्ट झाकले होते. ह्या देशात थंडीमुळे घराची सर्व दारे आणि खिडक्या सुमारे ६ महिने बंद ठेवावी लागतात. ते दोन तीनदा ओरडले. पम माझे लक्ष तिकडे गेले नाही. शेवटी मी जेव्हा तिकडे पाहिले तेव्हा मांजर आपल्या पायांवर ताठ उभारून मजकडे पहात पहात दाराच्या कडीकडे आपले रेशमी हात पोहोचविण्याचा प्रयत्न करू लागले. एवढी खूण मला पुरे झाली. मी दार उघडल्यावर मांजर मुकाट्याने बाहेर चालते झाले ! बोलता आले असते तर मांजर ‘थँक यू’ म्हणून आभार मानल्याशिवाय राहते ना !  

पण एवढ्यावरून सर्वच प्राणी ह्या मांजरासारखे मुके आहेत असे समजू नका. थोड्या वर्षांपूर्वी तुम्हा सवतःला जितके बोलता येत होते त्यापेक्षा अधिक व जास्त स्पष्टपणे आणि तेही इंग्रजीत माझ्याशी एक पक्षी बोलला त्याची हकीकत अशी :-

स्कॉटलंड देशाची राजधानी एडिंबरो ह्या शहराजवळ ‘फर्थ ऑफ फोर्थ’ नावाच्या खाडीवर एक भला जंगी पूल बांधला आहे. तो पाहाण्यास मी एके दिवशी गेलो होतो. पाहून झाल्यावर पुलाखालच्या खेड्यातील एका गृहस्थाने मला चहाला बोलाविले. कोणी नवीन पाहुणा घरी आल्यास त्याची आधी घरातील सर्व मंडळींशी शिष्टसंप्रदायाप्रमाणे हात हालवून ओळख करून देण्याची इकडे (फुट नोट – सुबोध पत्रिका ता. ५-१०-१९०२) चाल आहे. पण, ह्या वेळी घरातील सर्व मुली बाहेर गेल्या असल्यामुळे घरधनिणीने आपला आवडता पोपट मजपुढे आणिला. पोपटबुवांची मुद्रा गंभीर आणि अति संभावित दिसली. पुढे आल्याबरोबर पॉलपंतानी मला ‘हाऊ डू यू डू’ (कसे काय आहे ?) असे इंग्रजीत स्पष्ट कुशल विचारले आणि लगेच आपला उजवा पंजा पुढे केला ! ही असाधारण सभ्यता पाहून मी जरी चकित झालो होतो, तरी आपले बोट स्वारीच्या पंजात घालून त्याच्याशी मला सख्य करावे लागले. आम्ही सर्वजण बसल्यावर पॉलसाहेबही खिडकीतून पुलाचा देखावा पाहत बसले. धनीणीने त्यास गावयास सांगितल्यावर ‘आय हॅव्ह गॉट कोल्ड’ (मला थंडी झाली आहे) अशी थाप ठेवून दिली ! स्वारीस गावयास येत होते की नाही , ह्याची शंकाच होती !  पण त्याच्या गाण्यापेक्षा त्याची थाप ऐकून मला विशेष कौतुक वाटले. शेवटी टेबलावर चहाची तयारी झाल्यावर ‘आय वॉन्ट ए कप ऑफ टी’ (मला एक चहाचा पेला आणा) असे कितीदा तरी म्हटले. निरनिराळ्या देशांच्या चालीरीतीसंबंधाने बोलणे निघून आम्ही मध्ये जेव्हा जेव्हा हासू तेव्हा तेव्हा पोपटही जणू कळल्याप्रमाणे हुबेहूब माणसासारखेच हासे. त्याचे खोटे हासू ऐकून आम्हांला अधिकच हासू येई, तरी तिकडे त्याचाच गोंगाट अधिक ! स्वारी लहरीत आल्यास केव्हा केव्हा पुष्कळ वक्तृत्व दाखविते असे त्याच्या धनिणीने सांगितले.

मुलांनो, खालील प्राण्यांत केव्हा केव्हा दिसणा-या ह्या चमत्कारिक गुणांचे आम्ही घटकाभर करमणुकीपलीकडे विशेष महत्त्व मानीत नाही, का तर ह्यांहून पुष्कळपट मोठे गुण आमच्या स्वतःमध्ये किती तरी आहेत ! बरे असो. मी आता तुम्हांस तिसरी गोष्ट सांगतो.

इंग्लंडच्या उत्तरभागी सरोवर प्रांती हेलव्हेलन नावाच्या एका उंच पर्वतशिखरावर मी एके दिवशी चढत होतो. चढण बरीच कठीण होती. चढून गेल्यावर शिखरावर मला एक सुंदर संगमरवरी शिळा उभी केलेली दिसली. अशा कठीण व एकांत स्थळी कोणातरी थोर साधूचे हे स्मारक असावे असे वाटून मी त्यावरील लेख वाचण्यासाठी जवळ गेलो. लेख पुढील अर्थाचा होता. इ. स. १८०५ साली चार्लस गाऊ नावाचा कोणी गृहस्थ ह्या पर्वतावरून हिडत असताना खाली पडून बर्फात गोठून मरण पावला. त्याचा प्रामाणिक कुत्रा त्याच्या प्रेताचे रक्षण करीत तीन महिने त्या ओसाड डोंगरात होता. शेवटी धन्याची वाळलेली हाडे राखीत असताना हा कुत्रा एका धनगरास आढळला ! ह्या एकनिष्ठ दैवी पशूच्या स्मारकार्थ प्राण्यांची कनवाळू प्रसिद्ध फ्रान्सिस पॉवर कॉबभाई हिने हा सुंदर शिलालेख सन १८९० मध्ये रोविला. ह्या दगडांच्या स्मारकाहून अधिक महत्त्वाचे स्मारक वर्डस्वर्थ कवीने (Fidelity) म्हणजे एकनिष्ठा ह्या नावाने कवितेच्या रूपाने करून ठेविले आहे ! मुलांनो, ह्या भयाण व निर्जन प्रदेशात कडक हिवाळ्याच्या बर्फात तीन महिने ह्या कुत्र्याने आपली उपजीविका तरी कशी केली असेल ! ह्याचे उत्तर वर्डस्वर्थने आपल्या कवितेच्या शेवटी दिले आहे ते असे –

How nourished there through such long time –
He knows that gave that love sublime;
And gave that strength of feeling great;
Above all human estimate !

मुलांनो, तुम्हांस इंग्रजी येत नसेल कदाचित तर वरील ओळींचा अर्थ इंग्रजी जाणणा-या तुमच्या वडिलांस विचारा. आणि नुसता शब्दार्थच नव्हे तर खोल अर्थ—व तो तुम्हांस स्वतःला नीट उमजेपर्यंत वडिलांची पाठ सोडू नका.

चिमुकल्यांनो, ह्या तीन गोष्टी झाल्या. अशा आणखी किती तरी सांगता येतील ! पुष्कळ तुम्ही स्वतःच पाहिल्या असतील, पण त्या तुम्हांला दिसल्या नसतील—म्हणजे कळल्या नसतील. आता तुम्हांला घरातील कुत्री, मांजरे, गोठ्यांतील गाई, घोडे, बागेतील चिमण्या, राघू ह्यासंबंधाने काय वाटते ? त्यांस ईश्वराने केवळ आमच्या काबाडकष्टांकरिता व तुमच्या खेळाकरिताच उत्पन्न केले असेल काय ? ईश्वर आम्हांवर जशी प्रीती करतो तशी त्यांच्यावरही करितो. आम्हांस जसे गुण दिले आहेत तसेच थोडेबहुत त्यांना दिले आहेत, ही गोष्ट आता आम्ही कबूल करावीच काय ! देवाच्या मोठ्या कुटुंबात हे प्राणी आमची लहान भावंडे आहेत असे म्हणण्याची अद्यापि थोडी लाज वाटते नव्हे ! एकेकाळी कमी दर्जाच्या माणसास मोठ्या दर्जाच्या माणसाच्या उपयोगासाठीच केले आहे, असा समज होता, पण आता हा अडाणी समज कमी होऊन सर्व मनुष्यजात एकाच बापाची लेकरे आहोत असे हळूहळू वाटू लागले आहे.

हलक्या मनाच्या मनुष्यास दैवाने संपत्ती मिळाली की तो आपल्या पूर्वीच्या गरीब नातलगांस तुच्छ मानू लागतो. मुलांनो, तुम्ही खालील प्राण्यांशी आपले खरे नाते विसराल तर तुमच्यावरही वरील दोष येईल. तर कुत्र्यामांजरांत तुमचे जे खेळगडी असतील, त्यांच्याशी आतापासून प्रेमाने व गोडीने वागाल ना ?

आनंदवाद

(ता. १-५-१० रोजीं केलेल्या उपदेशाचा सारांश.)

ब्रह्मज्ञान नव्हे लेंकराच्या गोष्टी | तेथे व्हावा पोटीं अनुताप ||
दगडाहूनि जीव करावा कठीण | अंतरीचा शीण तेव्हा जाय ||
मेल्या मनुष्याची न धरिती आस | तैसा हो उदास संसारासी ||
तुका म्हणे येथे कराराचे काम | मग सुखधाम जवळींच ||

मागील खेपेस आपण नैराश्यवादाचें विवेचन करून तो कसा व्यर्थ आहे आणि आपणांस कसा पटत नाही हे पाहिले. ह्या खेपेस आनंदवादाचे विवेचने करून त्याचे साधन काय आहे ते पाहू. सुदैवाने जे स्वभावत:च सुखी, जन्मत:च आनंदी, आणि उल्हासी असे असतात, संसारातल्या कोणत्याही प्रसंगाने ज्यांच्या उपजत सुखमय स्थितीला बाधा येत नाही, अशांना आनंदावर निराळा उपदेश करण्याची गरज नाही. लहान मुलास मद्यपाननिषेधसंबंधी व्याख्यानाची जरूरी नाही, किंबहुना त्यामुळे धोकाच आहे. कारण त्याच्या कोवळ्या मनाला मद्य म्हणजे काय ह्याची कल्पनाही नसते. ती कल्पना कदाचित अशा प्रकारच्या व्याख्यानामुळे येऊन त्याच्या उच्छृंखळ बाळस्वभावानुसार मद्याविषयी अनिष्ट जिज्ञासाही उत्पन्न होण्याचा संभव आहे. तद्वत वरील स्वाभाविक उल्हासवृत्तीच्या लोकांची स्थिती होण्याचा संभव आहे. उलटपक्षी, जे लोक स्वभावत: दु:खी आणि उदास असतात, ज्यांच्या मनाची मूस जणू काय उद्वेगाच्या धातूनेच ओतलेली असते, अशांनाही केवळ असल्या उपदेशापासून विशेष फायदा होण्याचा संभव नाही. त्यांच्याशी उल्हासी माणसाचा निरंतर समागम घडावयाला पाहिजे आणि त्यांच्या आनंदी मित्रांनी मनाचे आकर्षण करून त्यांच्या मनाची मूळ रचना बदलण्याचा सतत प्रयत्नच केला पाहिजे. पण तुम्ही आम्ही साधारण माणसे अशा वरील दोन अपवादक आणि अतिरेकाच्या स्थितीतील नसतो. उल्हास आणि उदासीनता ह्या दोन्ही भिन्न भिन्न स्थितींची परिवर्तने, प्रसंग, समागम आणि अभ्यास ह्यांच्यायोगे आमच्या मनात चालली असतात. तेव्हा अशा साधारण बहुसमुदायासाठीच आजचा उपदेश आहे. असा साधारण माणसाच्या विचारामध्ये जो निराशावाद आलेला असतो तो त्यांना दुस-याच्या विचारामुळे, अनुभवामुळे, दूषित वाङ्मयामुळे, अपुरत्या किंवा खोट्या तत्त्वज्ञानामुळे आलेला असतो. तो घालवावयाचा झाल्यास ज्या कारणांनी तो आलेला असतो त्याच कारणांनी, तो काढला पाहिजे. एकदा एका वेड्याचे मनाने असे घेतले की, आपण मेलो आहो. ह्या भ्रमामुळे त्याने जेवण मुळीच सोडून दिले. त्याचा हा भ्रम एका कुशल डॉक्टराने जाणून तो काढून टाकावयासा त्याने पुढील उपाय केला. सुमारे दहाजणांस आपण मेल्याचा पूर्ण भास त्या वेड्यास करून देण्यास त्या डॉक्टराने सांगितले. त्याप्रमाणे बराच वेळ अगदी मेल्यासारखे पडल्यावर व आपण मेलो आहो अशी त्या वेड्याची खात्री पटविल्यावर हे दहाजण आपआपसांत बोलू लागले, खेळू लागले व काही वेळाने त्यांच्यासाठी भोजनगृहात उत्तम तयारी करून ठेविली होती तिकडे निघाले. हे सर्व त्या वेड्याच्या देखतच चालले असल्यामुळे मृत मनुष्येही आपल्या परीने चालतात, बोलतात व जेवतात असा त्याचा दुसरा भ्रम होऊन त्यामुळे त्याच्या पहिल्या भ्रमाचे निरसन झाले, आणि तोही त्या दहाजणांबरोबर यथेच्छ जेवला. असाच उपाय आम्हांला ह्या वरील दु:खवाद्यासंबंधी करावयास पाहिजे. आम्हांला आमच्यात स्वदेशी वाङ्मयातून व विचारातून आनंदाची बीजे शोधिली पाहिजेत. पण आमचे वाङ्मय एककल्ली असल्यामुळे तसे करणे थोडे कठीण जाईल. तथापि एकच पागोटे असले तरी ते मोठे असल्यास आलटूनपालटून बांधल्यास साजरे करता येते तसाच प्रकार आमच्या वाङ्मयाचा करता येईल. आपण आज नुसत्या तुकारामाच्याच अभंगातून आनंदवाद कसा निघतो ते पाहू.

“हरीचिया भक्ता नाही भय आणि चिंता | दु:ख निवारिता नारायण ||”

असे तुकारामाने म्हटले आहे. पण भक्तीच्या ह्या लक्षणामुळे आळस वाढण्याचा संभव आहे असे कोणास वाटेल पण-

'पोशा आळशी पातकी | एक आहे मी त्रिलोकी |' व
'झालो कासावीस वेढिलों आळसें | शरीराचा त्रास आला मज ||
तुका म्हणे धाडी पाडिलें आळसें | तुझें नाम कैसे राहे आता ||'

यावरून तुकारामाला आळसाची किती चीड होती ते दिसून येते. दुसरे ठिकाणी तर त्यांनी म्हटले आहे की,

“नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे | आणूनि निराळे द्यावे हाती ||
इंद्रियांचा जय साधूनिया मन | निर्विषय कारण असे तेथे ||
उपास पारणी अक्षरांची आटी | सत्कर्मा शेवटी असे फळ ||
आदरे संकल्प वारी अतिशय | सहज ते काय दु:ख जाण ||
स्वप्नीच्या धाये विवळसी वाया | रडे रडतियासवे मिथ्या ||
तुका म्हणे फळ आहे मुळापाशी | शरण देवासी जाय वेगी ||”

ह्यात तुकारामाने म्हटले आहे की, ‘रडे रडतियासवे मिथ्या’ म्हणजे रडणा-याबरोबर आपण रडणे हे वेडेपणाचे आहे. दुस-याला दु:ख झाले आणि तो आपल्या दु:खाचा अनुभव सांगतो तेवढ्यानेच आपण दु:खी होण्याचे कारण नाही. आपल्या मनामध्ये धीर आणि समाधान ठेविल्यास ईश्वर जवळच आहे. पण तोही मोक्षाचे आयतेच गाठोडे देतो असे नाही. त्याला घोर यत्न केला पाहिजे. प्रथम मन निर्विषय आणि निर्वासन करण्याचा निषेधात्मक यत्न करून नंतर सत्कर्माचा विध्यात्मक यत्न करावयास पाहिजे, म्हणजे दु:ख हे पोकळ आहे असे कळून येईल. अशा प्रयत्नान्ती परमेश्वर आहे आणि तो सुखस्वरूप आहे हे कळून येईल.

झाला प्रेतरूप शरीराचा भाव | लक्षियेला ठाव श्मशानीचा ||
रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया | म्हणती हायहाय यमधर्म ||
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळीला दीप गुरूकृपा ||”

यामध्ये बौद्धांचें निर्वाण,

“आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां | तो झाला सोहळा अनुपम्य ||
एकदेशीं होतों अहंकारें आथिला | त्याच्या त्यागें झाला सुकाळ हा ||”

यामधील ब्रह्मवाद्यांचा अभेद साक्षात्कार,

“सरले आता नाही | न म्हणे वेळ काळ काही ||
विठ्ठल कृपाळु माउली | सदा प्रेम पान्हायेली ||
शीण न विचारी भाग | नव्हे निष्ठुर नाही राग ||”

ह्यामध्ये ईश्वरवादाचे रहस्य सांगितले आहे. पण हे तिन्हीही प्रकारचे ब्रह्मज्ञान झाले तरी शेवटी तुकाराम म्हणतात की त्याच्या साक्षात्काराला प्रयत्न हे मुख्य कारण आहे. त्या केवळ लेकराच्या गोष्टी नव्हेत. ते कराराचे काम आहे आणि अशा करारानेच सुखाचे माहेरघर आपल्या जवळ आहे, ती आपली सहज स्थिती आहे असे कळून येणार आहे, तर आपल्या दु:खाची कारणे एक तर दुस-यांनी सांगितलेले दु:ख किंवा आपला आळस हीच होत. ह्या दोहोंचा त्याग करून आपण सुखी आहो हे समजून घेतले पाहिजे.

  1. आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
  2. आत्म्याची वसति
  3. आत्म्याची यात्रा
  4. 'नॉटर डेम् ड ला गार्ड' देऊळ व तें पाहून सुचलेले विचार.
  • 105
  • 106
  • 107
  • 108
  • 109
  • 110
  • 111
  • 112
  • 113
  • 114
Page 110 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी