1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

शिंदे आणि ब्राह्मणेतर पक्ष

विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९०३च्या अखेरीपासून धर्मप्रचाराच्या कार्याला सुरुवात केली व अस्पृश्यतानिवारणाचे कार्यही धर्मकार्यच आहे असे समजून दोन-तीन वर्षांनंतर त्याही कार्याला जोरदार प्रारंभ केला. मिशनची स्थापना केल्यानंतर पाच-सहा वर्षांतच मिशनच्या कामाचा प्रसार महाराष्ट्रात आणि गुजरात, कर्नाटक, मद्रास ह्या प्रांतांमध्ये वेगाने झाला. शिंदे यांचे अस्पृश्यवर्गासाठी जोमाने कार्य चालू होते. त्या सुमारास म्हणजे विसाव्या शतकाच्या दुस-या दशकामध्येच महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या राजकारणाचे चित्र झपाट्याने बदलू लागले.


छत्रपती शाहूमहाराज कोल्हापूर संस्थानच्या गादीवर आल्यापासून संस्थानच्या कारभारामध्ये लक्ष घालू लागले. त्यांच्या असे लक्षात आले की, आपल्या संस्थानातील महत्त्वाच्या अधिकारपदांवर, त्याचप्रमाणे नोकरीच्या जागांवर ब्राह्मण जातीतीलच लोक आहेत. शाळा-कॉलेजातील शिक्षकवर्ग ब्राह्मणच व शिकणा-या विद्यार्थ्यांत बहुसंख्य आणि नाममात्र बहुजन समाजातील विद्यार्थी असत. हे चित्र बदलून टाकणे आवश्यक आहे असे शाहूनहाराजांना वाटू लागले व त्यांनी कोल्हापूर संस्थानात व शहरात बहुजन समाजाला शिक्षणविषयक सवलती उपलब्ध करून दिल्या. बहुजन जमाजाच्या विविध जातींसाठी बोर्डींगे काढून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार अधिकाधिक प्रमाणात व्हावा यासाठी जोराने प्रयत्न सुरू केले. न्यायाच्या दृष्टीने हे करणे आवश्यकच होते. परंतु भावी काळात आपण अधिकारपदांना व सोयीसवलतींना आचवणार या कल्पनेने ब्राह्मणवर्गाने शाहूमहाराजांवर ब्राह्मणद्वेषाचा आरोप करावयास सुरुवात केली. तशातच कोल्हापुरात वेदोक्त प्रकरण उदभवले व त्यातून ब्राह्मणांचा अहंकार उफाळून आल्याचे चित्र दिसले. त्यात भर म्हणून लो. टिळकांनी कोल्हापुरातील ब्राह्मवर्गाची बाजू उचलून धरली. केवळ केसरीनेच नव्हे तर सातारचे विश्ववृत्त, नाशिकचे प्रकाश इत्यादी ब्राह्मणी वृत्तपत्रे शाहूमहाराजांवर अन्याय्य स्वरूपाची टीका करू लागली. ह्या सा-याचा परिणाम होऊन महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे दोन तट पडले. १९११ नंतर सत्यशोधक समाजाची अधिवेशने महाराष्ट्रातील लहानमोठ्या गावांमध्ये भरू लागली. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार थोडाफार वाढला व ब्राह्मणेतरांच्या जातीनिहाय परिषदा भरू लागल्या. एकंदरीत बहुजन समाजात, निदान सामाजिक पातळीवर जागृतीचे चिन्ह दिसू लागले. लो. टिळकांनी तुरुंगातून सुटून आल्यानंतर १९१५च्या सुमारास होमरूल चळवळीस आरंभ केला. ही चळवळ आपल्या विरोधात आहे असे ब्राह्मणेतरवर्गातील लोकांना वाटू लागले. ह्या सगळ्या बाबींचा परिणाम होऊन ब्राह्मणेतरांची राजकीय चळवळ सुरू झाली.


शाहूमहाराजांच्या प्रोत्साहनाने पुण्यामध्ये बाबुराव जेधे व अन्य मराठा समाजातील पुढारी सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते बनले. परंतु या चळवळीला केवळ सत्यशोधक समाजाची चळवळ एवढेच स्वरूप न राहता ब्राह्मणविरोधाची धार अधिक तीव्र होऊ लागली. भास्करराव जाधवांसारखे बुद्धिमान नेते चळवळीला मिळाले. त्याचप्रमाणे वा. रा. कोठारी हेही काही काळ म्हणजे १९१६ ते १९२३ पर्यंत पाच-सात वर्षे ह्या चळवळीशी संबंध ठेवून होते. मराठा, जैन व लिंगायत ह्या जातींतील पुढारी प्राधान्याने ब्राह्मणेतर पक्षाचे कार्य करू लागले. सत्यशोधक समाजाचे सामाजिक सुधारणेचे व्यापक विचारसरणीचे अधिष्ठान ढळून प्रखर ब्राह्मणविरोधी असे काहीसे स्वरूप ह्या चळवळीला येत गेले. अर्थात ह्याचा दोष मात्र सर्वस्वी ब्राह्मणेतरवर्गाकडे जात नाही. विठ्ठल रामजी शिंदे यांनीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, “ब्राह्मणेतरांचा जातिवाद हा ब्राह्मणांच्या जातिवादाची प्रतिक्रिया असतो.”


विठ्ठल रामजी शिंदे यांना म. जोतीबा फुले यांच्या विचारसरणीबद्दल आदर वाटत होता. जोतीबा फुले यांचा पहिला उल्लेख त्यांनी डिसेंबर १९०५ मध्ये इंडियन मेसेंजरमध्ये लिहिलेल्या इंग्रजी लेखात केलेला आहे. फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्मात प्रकट झालेली उन्नत धर्मदृष्टी हीही शिंदे यांना जवळची वाटत असणार. मात्र १९१६च्या सुमारास सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर मंडळी यांनी एकत्र येऊन जी ब्राह्मणेतर चळवळ सुरू केली तिच्यातील सगळे धोरण शिंदे यांना मान्य होण्याजोगे नव्हते. ब्राह्मणेतर पक्षातील आत्यंतिक राजनिष्ठेचा भाग शिंदे यांना मंजूर नव्हता. त्या वेळेला राजकीय पटलावर चित्र असे होते की, टिळकपक्षीयांना अथवा राष्ट्रवादी जहालांना (यामध्ये प्रामुख्याने शिकलेले ब्राह्मण होते) स्वराज्य पाहिजे आहे व ब्राह्मणेतर मंडळींना मात्र इंग्रजांचे राज्य चालू राहण्यात आपले म्हणजे बहुजन समाजाचे हित आहे व त्यासाठी इंग्रजांचीच सत्ता येथे चालू राहावी अशी त्यांची धारणा बनलेली होती. नेमस्त मंडळी व ब्राह्मणेतर यांच्यामध्ये इंग्रजनिष्ठा व सामाजिक सुधारणा ह्यामध्ये सारखेपणा होता. मात्र सगळ्याच सामाजिक सुधारणेबद्दल जी आच ब्राह्मणेतरांना होती ती त्या प्रमाणात नेमस्तांना नव्हती. वा. रा. कोठारी हे एक प्रकारे ब्राह्मणेतर व नेमस्त यांच्यामधील दुवा होते. परंतु ब्राह्मणेतरांच्या एक-दोन सभांमध्ये येऊन प्रा. वा. गो. काळे यांनी तेवढी भाषणे केली. प्रा. केशवराव कानिटकर, हरिभाऊ लिमये, काकासाहेब लिमये, बापूराव आंबेकर, एस्. जी. वझे ह्या नेमस्त मंडळींचा ब्राह्मणेतर पक्षाला प्रत्यक्ष कार्यरूपाने फारसा पाठिंबा मिळाला नाही.


महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतरांबद्दल व विशेषतः मराठ्यांबद्दल ते स्वातंत्र्यविरोधी आहेत असे जे चित्र निर्माण झाले होते, ते रास्त नाही व वस्तुस्थितीला धरूनही नाही असे शिंदे यांना वाटत होते. अमरावतीच्या जाहीर सभेत शिंदे यांनी प्रथम ह्या बाबीची स्पष्टता करून मराठे हे स्वातंत्र्यप्रेमी व राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या बाजूचे आहेत असे स्पष्टपणे सांगितले व १९१७ साली पुण्यास शनिवारवाड्यासमोर त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जातींची सभा भरून राष्ट्रीय स्वातंत्र्याला पाठिंबा जाहीर करण्यात आला. ह्या घटनेचा प्रतिक्रियात्मक परिणाम म्हणून ब्राह्मणेतर पक्ष अधिक संघटित होऊ लागला.


राष्ट्रवादी टिळपंथी हे स्वराज्याला अनुकूल होते व सामाजिक सुधारणेला विरोधी होते. सामाजिक सुधारणेचा पाठपुरावा केला तर शिकलेल्या उच्चवर्णीयांचे आपल्याला पाठबळ राहणार नाही व त्यामुळे स्वराज्याची चळवळ कमकुवत होईल असे त्यांना वातट होते. हा केवळ स्वराज्याविषयक धोरणाचाही भाग असेलच असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. ह्या पक्षात असलेल्या बहुतेक उच्चवर्णीय ब्राह्मणांना अन्य मगासवर्गीयांची उन्नती व्हावी व ते आपल्या दर्जाचे बनावेत असे मनोमन वाटत नसले पाहिजे असे सातारच्या दादासाहेब करंदीकरांच्या वेळोवेळी प्रकट झालेल्या प्रतिक्रियांवरून वाटते. एक प्रकारचा तुच्छताभाव उच्चवर्णीयांच्या ठिकाणी इतर जाती व अस्पृश्यवर्ग यांच्याबद्दल असला पाहिजे. म्हणून सामाजिक सुधारणेची उपेक्षा करून स्वराज्याच्या प्राप्तीला ते अग्रक्रम देत होते. उलट ब्राह्मणेतर पक्षातील मंडळींना असे वाटत होते की, स्वातंत्र्य मिळाले तर केवळ उच्चशिक्षित ब्राह्मवर्गाचाच फायदा होईल आणि शिक्षणाच्या अभावी ब्राह्मणेतरवर्ग मात्र तसाच अवनत स्थितीत राहील व ब्राह्मणी वर्चस्वाखाली त्यांचे हाल होत राहतील. राजकीय पारतंत्र्यापेक्षाही सामाजिक पातळीवरील नीचत्वाची दशा ही ब्राह्मणेतरांच्या चिरंतन दुःखाचे मूळ ठरू शकेल. म्हणून इंग्रजांना विरोध न करता त्यांच्या राज्यात बहुजन समाजाची जास्तीतजास्त सुधारणा करून घ्यावी, इंग्रजी राज्यात आपला फायदा करून घ्यायचा असेल तर इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, ह्या धोरणानुसार ब्राह्मणेतर पक्ष वागत असे.


राष्ट्रवादी जहाल आणि इंग्रजानुकूल ब्राह्मणेतर पक्ष यांच्यापेक्षा विठ्ठल रामजी शिंदे यांची भूमिका वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी होती. शिंदे हे अस्पृश्यादीवर्गाच्या आणि बहुजन समजाच्या शिक्षणाला जरून महत्व देत होते. परंतु स्वातंत्र्याची वृत्ती शालेय शिक्षणाच्या अभावीसुद्धा असू शकते अशी त्यांची धारणा होती. मराठा समाज तर इतिहासकाळापासून स्वातंत्र्यप्रेमी व स्वातंत्र्यासाठी लढणारा व स्वातंत्र्य उपभोगणारा म्हणून प्रसिद्ध आहे. ह्यासाठी ब्राह्मणेतरांनी अथवा बहुजन समाजाने स्वराज्यविरोधी असण्याचे मुळीच कारण नाही. शिंदे हे विद्यार्थिदशेपासूनच राष्ट्रवादी विचारसरणीचे होते. ऑक्सफर्ड युनिटेरियनांच्या स्नेहसंमेलनात तेथील इंग्रज श्रोतुवर्गासमोर त्यांनी आपले जहाल राष्ट्रवादी विचार प्रकट केले होते हे आपण पाहिले आहेच. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हाती घेतल्यानंतर आपली राजकीय मते ह्या कार्याच्या आड येऊन नयेत यासाठी आपल्या राजकीय मतांच्या प्रकटीकरणाच्या संदर्भात शिंदे एक प्रकारे संयम दाखवीत आले होते. परंतु १९१६-१७च्या सुमारास राजकीय चित्र बदलल्यानंतर मराठे हे राष्ट्रीवृत्तीचे आहेत हे स्पष्टपणाने सांगणे व त्यासाठी ‘मराठा राष्ट्रीय संघा’ची स्थापना करणे त्यांना गरजेचे वाटले. या काळातील विविध पक्षांच्या भूमिकांपैकी शिंदे यांना कोणत्याही एका पक्षाची भूमिका पूर्णपणे मान्य करम्याजोगी वाटत नव्हती. राजकीयदृष्ट्या जे जहाल होते त्यांचा सामाजिक सुधारणेबद्दलचा प्रतिगामीपणा त्यांना मंजूर नव्हता. राजकीय मवाळ सामाजिक सुधारणेबद्दल निदान शाब्दिक पाठिंबा का होईना प्रकट करत होते तो शिंदे यांना योग्य वाटत असला तरी मवाळांची इंग्रजांचा अनुनय करण्याची वृत्ती त्यांना मंजूर नव्हती. राजकीय जहाल असो की, मवाळ असो बहुजन अथाव ब्राह्मणेतर यांची सुधारणा व्हावी अशी खरीखुरी तळमळ ह्या दोघाच्याही ठिकाणी नव्हती. शिंदे यांना बहुजन समाजाची सर्वांगीण उन्नती होणे महत्त्वाचे वाटत होते. ब्राह्मणेतर पक्षाचा बहुजन समाजाचा कैवार आणि ब्राह्मणेतरांची सुधारणा करण्याची भूमिका शिंदे यांना मान्य होती, मात्र त्यांचा इंग्रजधार्जिणेपणा व स्वराज्यविरोधी दृष्टिकोण त्यांना पसंत नव्हता. कोठारींसारख्या ब्राह्मणेतर चळवळीती प्रारंभीच्या नेत्यांना अस्पृश्यांच्या शिक्षणाबद्दल व सुधारणेबद्दल कळकळ होती. (निदान वा. रा. कोठारी आपल्या आठवणींमध्ये ही बाब पुनःपुन्हा उल्ले खितात) मात्र स्वतः कोठारींनी ह्याबाबत कोणतेही भरीव काम केले नाही की, ब्राह्मणेतर पक्षातील आपल्या सहका-यांना अशा प्रकारचे काम करण्यास प्रवृत्त केल्याचे दिसत नाही. शिंदे यांचा स्पष्ट आक्षेप ऐकून तो खोटा पाडावा ह्या भूमिकेतून सोलापूर जिल्ह्यातील आपल्या बावी या गावी कोठारींनी अस्पृश्यांसाठी एक बोर्डिंग उभारले, व शिंदे यांच्यावर डी. सी. मिशनच्या बाबतीत अस्पृश्यवर्गांनी टीका करावयास सुरुवात केली त्या वेळेला डॉ. मॅन यांच्या अध्यक्षतेखाली शिवराम जानबा कांबळे यांच्या सहकार्याने अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी एक संस्था काढली. परंतु तिची एकही बैठक न होता सात वर्षांनी ती त्यांना विसर्जित करावी लागली. १९२३ पासून ते कायदेकौन्सिलात असतानाही अस्पृश्यवर्गासाठी त्यांनी काही केल्याचे दिसत नाही. अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दल वारंवार शाब्दिक सहानुभूती प्रकट करणा-या वा. रा. कोठारींची ही स्थिती होती. इतर ब्राह्मणेतर पुढा-यांबद्दल मग विचारावयास नको. अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दल त्यांच्यापैकी कोणाला कळकळ होती असे दिसत नाही. मग त्यांच्या कार्यक्रमात ह्या बाबीचा अंतर्भाव होणे दूरच.


सत्यशोधक आणि ब्राह्मणेत्तर पक्षातील पुढारी ह्यांना अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेबद्दल कळकळ वाटत नव्हती याबद्दलचे स्पष्ट विधान त्याच काळात शिंदे यांनी केलेले पाहावयास मिळते. १९१६ साली निपाणी येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनास विठ्ठल रामजी शिंदे उपस्थित राहिले होते. भास्करराव जाधवांनी ह्या परिषदेत पुढाकार घेतला होता. पुष्कळसे लिंगायत व जैन गृहस्थ तसेच माळी, तेली वगैरे जातींतील लोक ह्या परिषदेस हजर होते. त्यामानाने अस्सल मराठे म्हणविणारे लोक संख्येने कमी होते. सर नारायणराव चंदावरकरांनी “ह्या परिषदेस अस्पृश्यवर्गाच्या प्रतिनिधींना येण्याची परवानगी होती का”, अशी पृच्छा केली असता शिंदे यांनी उत्तर दिले की “त्यांचेकडून परवानगी मिळणे शक्य नाही हे जाणूनच त्या व्रागातील कोणी लोक आले नव्हते.” चंदावरकरांनी पुढे शिंदे यांना स्पष्ट विचारले, “पण ह्या लोकांना अस्पृश्यांसंबंधी काही सहानुभूती तरी वाटते काय?” शिंदे उत्तरले, “त्यांना काही सहानुभूती वाटते असे मला वाटत नाही. माझा तर असा अनुभव आहे की, मागासलेले म्हणून आपल्याला म्हणविणा-या लोकांपेक्षा अस्पृश्यांच्या उद्धाराविषयी ब्राह्मणांनाच अधिक कळकळ वाटत असून त्यांचीच ह्या कार्यी अधिक सहानुभूती आहे.”१


सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर पक्षाच्या ह्या भूमिकेमुले शिंदे त्यांच्याशी सहमत होऊ शकत नव्हते.


तात्पर्य, स्वराज्यवादी राहावयाचे आणि सामाजिक सुधारणांचाही पुरस्कार करावयाचा व प्रत्यक्ष कार्यही करावयाचे, बहुजनांच्या उन्नतीचा विचार करावयाचा व त्यासाठी कार्यप्रवण राहावयाचे अशी शिंदे यांनी खास त्यांचीच म्हणता येईल अशी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका होती.


विठ्ठल रामजी शिंदे यांची अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याबद्दल अविचल निष्ठा होती, तर ब्राह्मणेतर पक्षातील विविध गट हे अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याबद्दल सामान्यतः उदासीन असणारे लोक होते. या कारणेही विठ्ठल रामजी हे ब्राह्मणेतर पक्षात सदस्य म्हणून कधी गेले नाहीत अथवा त्यांच्या ध्येयधोरणाशी समरस झाले नाहीत. य. दि. फडके यांनी असे म्हटले आहे, “ब्राह्मणेतर पक्षात राहून त्याला आपल्याला हवे तसे वळण देण्याचा प्रयत्न करणा-या अशा मंडळींम्ध्ये कर्मवीर विठ्ठल रामजी ऊर्फ अण्णासाहेब शिंदे हे एक होते.”२ पुढे फडके यांनी असे म्हटले आहे, “विठ्ठल रामजी शिंदे ब्राह्मणेतर पक्षात असेल तरी शाहू छत्रपती किंवा भास्करराव जाधव यांचे इंग्रज राज्यकर्त्यांना खूश राखण्याचे धोरण त्यांना मंजूर नव्हते.”३ फडके यांनी शिंदे यांच्या धोरणाबद्दल केलेले विधान रास्त असले तरी ‘शिंदे हे ब्राह्मणेतर पक्षामध्ये होते’ हे त्यांचे विधान वस्तुस्थितीला धरून नाही. ब्राह्मणेतर या वर्गीकरणात मोडणारे लोक हे सत्ता-संपत्ती, विद्या-अधिकार यांपासून वंचित असलेले व वरिष्ठवर्गाकडून नाडविले जाणारे, शोषण केले जाणारे लोक असल्यामुळे त्यांच्याबद्दल शिंदे यांना ममत्व व आपुलकी जरूर वाटत असे. १९२० सालच्या त्यांच्या बहुजन पक्ष या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये अशा लोकाच्या उन्नतीसाठीच आपण प्रयत्न करणार असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र ब्राह्मणेतर अथवा मराठेतर अशा प्रकारचा शब्दप्रयोग करून कोणाला तरी वगळण्याची भूमिका त्यांना सर्वस्वी नापसंत होती. काही विशिष्ट बाबतीत ब्राह्मणेतरांची अथवा मवाळांची भूमिका त्यांना मान्य असेल तर ते तेवढ्या बाबीपुरता आपला पाठिंबा प्रकट करीत, परंतु आपण मवाळ पक्षाचे अथवा ब्राह्मणेतर पक्षाचे आहोत असे कुणी गृहीत धरू नये, याबद्दलही योग्य ती दक्षता घेत असत. याचा पडताळा एका विशिष्ट प्रसंगी विशेषत्वाने आला.


चिराल खटल्याचे काम संपवून टिळक इंग्लंडहून २७ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईस परतले. ७ डिसेंबरला पुणेकरांच्या वतीने टिळकांना मानपत्र देण्याचा समारंभ होणार होता. ४ डिसेंबरला रँग्लर परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली टिळकांच्या मानपत्राला विरोध करणा-यांची जेधे मॅन्शनमध्ये सभा झाली. विरोध करणा-यांत रँग्लर परांजपे, काळे, देवधर वगैरे मवाळ ब्राह्मण पुढारी जसे होते, तसेच श्रीपतराव शिंदे, वालचंद कोठारी, केशवराव बागडे, जेधे बंधू, जवळकर वगैरे ब्राह्मणेतर पुढारी आणि शिवराम जानबा कांबळे यांच्यासारखे दलित नेतेही होते. या पुढा-यांनी कालेल्या पत्रकावर सही करताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिले, “सामाजि बाबतीत रा. टिळकांचे धोरण समतेच्या व स्वयंनिर्णयाच्या तत्त्वास विघातक असल्याने त्यांना पुण्याच्या सर्व नागरिकांतर्फे मानपत्र देणे योग्य नाही. या वैगुण्यामुळे ते माझ्यामते खरे राष्ट्रीय पुढारी नाहीत.”४ शिंदे यांनी विरोधाचे आपले कारण नमूद केले ते सहेतुकपणे असणार. टिळकांच्या नेतृत्वातील नेमक्या उणिवेवर त्यांनी बोट ठेवले. त्याचवेळी आपली भूमिका सरसकट मवाळ वा ब्राह्मणेतर पुढा-यांसारखी नव्हे हे दर्शविण्याकरिता टिळकांच्या राजकीय नव्हे, तर त्यांच्या सामाजिक धोरणाचाच केवळ निर्देश केला आहे.


ब्राह्मणेतर समाजातर्फे त्यांना २३ एप्रिल १९२५ रोजी पुण्यामध्ये मानपत्र देण्याचा समारंभ झाला. ह्या मानपत्राला उत्तर देताना त्यांनी जे भाषण केले, त्यामधून ब्रह्मणेतर समाजाबद्दल त्यांना आस्था वाटत असल्याचे प्रकट होत असले तरी ते ब्राह्मणेतर पक्षामध्ये नव्हते हेही स्पष्ट होते. ब्राह्मणेतर पक्षाबद्दल आत्मीयता आणि दुरावा असा जो ताण त्यांच्या मनामध्ये होता तो प्रकट होतो. दूर राहून पण आत्मीयतेने ब्राह्मणेतर पक्षाला उपदेशाच्या दोन गोष्टीही सांगितल्या आहेत. ह्या उत्तरादाखल केलेल्या भाषणातून अस्पृश्यतानिवारणकार्यावरील त्यांची अविचल निष्ठ व तळमळ प्रकट होते.


ब्राह्मणेतर समाजाच्या वतीने द्यावयाच्या ह्या मानपत्राचे वाचन मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर काँग्रेस कमिटीचे चिटणीस के. सी. बागडे यांनी केले. मध्य भागाचे कमिशनर मि. मॅकी यांनी एका सुंदर चांदीच्या पात्रातून हे मानपत्र शिंदे ह्यांना अर्पण केले. याप्रसंगी उत्तरादाखल विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढीलप्रमाणे भाषण केलेः


“अध्यक्ष महाराज आणि मित्रहो!,
“माझा त्रेपन्नावा वाढदिवस आपण याप्रकारे साजरा केला व मानपत्र देऊन माझा गौरव केला याबद्दल माझे अंतःकरण भरून आले आहे. मात्र मी आपल्यासमोर स्पष्टपणाने सांगू इच्छितो की, आपण केलेल्या बहुमानाला मी अजिबात पात्र नाही. कारण ब्राह्मणेतरांसाठी मी जवळ जवळ काहीही केलेले नाही, असे म्हटले तरी चालेल. जी काही अल्पशी सेवा मी माझ्या आयुष्यात करू शकलो ती कोणत्याही विवक्षित जातीची अथवा पंथाची नव्हे. याला फक्त अपवाद आहे तो म्हणजे ज्या जातिसमूहाला अथवा समाजाला अत्यंत अन्यायीपणे अस्पृश्य मानले जाते त्यांचा. त्या समाजाची मी काही सेवा करू शकलो. वस्तुतः माजे आयुष्य म्हणजे अस्पृश्यता निवारकार्याच एक प्रदीर्घ ध्यास होय. याचा परिणाम म्हणून इतर अनेक महत्ताचे विषय आणि माझ्या आयुष्यातील कर्तव्ये यांकडे दुर्लक्ष करून अन्याय केलेला असणार. मला असे वाटते की, माझ्यावर हा कर्जाचा मोठा बोजा आहे व मला कितीही दीर्घ आयुष्य मिळाले तरी तो मी फेटू शकणार नाही. मला नेहमी असे वाटत आले आहे की एखाद्या उचितप्रसंगी तुम्हा सर्वांची आणि माझ्याबद्दल आस्था असणा-या मित्रांची एकदा सपशेल माफी मागावी. कारण तुमच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्याकडे मी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. माझ्या अंतःकरणावरील हा भार कमी करण्याची आपण मला संधी दिली याबद्दल मी आपला ऋणी आहे. मी आतापर्यंत केवळ एकांगीपणे प्रयत्न करीत राहिलो ह्याचे समर्थन केवळ एका मुद्यावरून शक्य आहे. तो म्हणजे अस्पृश्यतेच्या प्रश्नाची प्रचंड व्याप्ती आणि तो सोडविण्याची निकड. मला आणकी शंभर जन्म मिळाले तरी नरबळी घेणा-या अस्पृश्यतेच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही.


“ज्या ब्राह्मसमाजाचा मी एक नम्र पाईक आहे, त्या ब्राह्मधर्माने मला हे कार्या करण्याची प्रेरणा दिली. अधूनमधून मी राजकारण आणि सामाजिक सुधारणा, शिक्षण, स्वच्छता आदी नागरिक महत्त्वाच्या बाबींमध्ये जरूर भाग घेतला आहे. परंतु अस्पृश्यतानिवारण करणे हा माझा कायमचा ध्यास राहिला आहे. अस्पृश्यतेचे निवारण अद्यापि झाले नाही याची मला अन्य काणापेक्षाही तीव्र अशी जाणीव आहे. ह्या वास्तवापेक्षा माझी श्रद्धा अधिक कणखर आहे आणि ही श्रद्धा माझ्या कानात गुणगुणत आहे की, अस्पृश्यता निश्चित नष्ट होणार केवळ ह्या श्रद्धेवरच माझ्या मनाची शांती टिकून आहे.


“आपण मला अर्पण केलेले मानपत्र हे एका पक्षाला प्रमाण मानून केल्यासारखे वाटते. परंतु मी माझ्या मुख्य अथवा आनुषंगिक कार्यामध्ये कोणत्याही एका पक्षाच्या अथवा पंथाच्या अधीन झालो नाही. माझा पक्ष केवळ परमेश्वराचा आणि माझी सदसदविवेबुद्धी माझा प्रतोद. मला माहीत आहे की, अशा प्रकारचा मनुष्य कोणालाही खूष ठेवू शकत नाही. अशा परिस्थितीत माझा आपण आत्मीयतेने गौरव करण्यासाठी पुढे आलात ही वस्तुस्थिती, माझ्यात विशेष काही असण्यापेक्षा तुमचेच सहनशील औदार्य प्रकट करते.” असे सांगून आपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधीन नसतो ही आपली भूमिकाच त्यांनी स्पष्ट केली आहे.


मात्र एक प्रकारच्य आत्मीयतेमधून ब्राह्मणेतर पक्षाला पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहे. ते करीत असताना त्या पक्षामधील उणिवांचाही स्पष्टपणे निर्देश करून कोणत्या प्रकारची नैतिकदृष्ट्या उन्नत भूमिका असावी हे सुचविले आहे.


शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “ब्राह्मणेतरांमध्ये जागृती करणे; त्यांचे संघटन करणे हे जे तुमचे उद्दिष्ट आहे ते अतिशय कठीण आहे. दलितवर्गासंबंधीचे उद्दिष्ट निश्चितच कठीण आहे. तरीही त्याला जमेची एक बाजू अशी आहे की, जिवंत अंतःकरणाच्या माणसाटी सहानुभूती त्यासाठी मिळविता येते. तुमच्या कार्यासाठी मात्र सहजासहजी अशी सहानुभूती मिळणार नाही. परंतु तुम्ही कोणत्याही प्रकारच्या दयेची अथवा कृपेची अपेक्षाही करू नये. संपूर्ण भविष्यकाळ तुमचा आहे. त्याचा काही भाग तुमच्या ताब्यातही आला आहे.


“तुमच्यापुढे जे धोके आहेत त्याकडेही मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. तुमचे उद्दिष्ट न्याय्य स्वरूपाचे नसेल आणि तुमच्या वृत्ती निर्मळ नसतील; सूड घेण्याची अथवा द्वेषाची भावना जोपर्यंत तुम्ही समूळ काढून टाकणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही व मिळूही नये. मी स्वतः अस्वच्छ हातांनी मिळविलेल्या सहज यशापेक्षा वारंवार मिळणारे अपयश पसंत करीन.”


भाषणाच्या अखेरीस आपल्या अंतःकरणातील कृतज्ञतेची भावना प्रकट करताना शिंदे म्हणाले, “मी पुण्यातच राहावे ही आपण केलेली विनंत ऐकून माझे हृदय भरून आले. माझीही हीच इच्छा आहे हे मी आपणास खात्रीपूर्वक सांगतो. तुम्ही जे अंतःकरणपूर्वक प्रेम प्रकट केले, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. माझ्या भगिनीने केलेली सेवा आपण ध्यानात ठेवली याबद्दलही मी आपले आभार मानतो. आपल्या प्रेमास आम्ही दोघांनी सदैव पात्र राहावे, अशीच आमची प्रार्थना राहील.”


आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मि. मॅकी यांनी शिंदे ह्यांनी केलेल्या मूलभूत स्वरूपाच्या कामाचा गौरव करून ते उदगारले, “श्रीयुत शिंदे यांनी आपल्या ऑक्सफर्ड येथील अभ्यासानंतर जीवितकार्य म्हणून जे निवडले ते कार्य कठीणतम स्वरूपाचे आहे. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी काहीएक स्वतःपुरते काम निवडेल असते तर त्यामध्ये त्यांनी उत्तम प्रकारचे यश संपादन केले असते. परंतु त्यांनी उदात्त समर्पणशीलतेने आपले आयुष्य घालवावयाचे ठरविले. श्रीयुत शिंदे हे मोठे भाग्यवान आहेत. अत्यंत कठीण स्वरूपाचे कार्य जरी त्यांनी निवडले असले तरी त्यांना त्यामध्ये मिळालेले यश आपल्या डोळ्यांनी पाहता आले. अस्पृश्यतेचा प्रश्न नीट सोडविण्यासठी त्यांनी उत्तम प्रारंभ केला. उत्तम नैतिक गुणांचा निर्देश केला.५


शिंदे हे ब्राह्मणेतर पक्षाच्या भूमिकेशी सहमत होऊ शकत नसले तरी या पक्षाशी प्रसंगोपात साहचर्य ठेवीत असत. त्यांची दोन कारणे संभवतात. एक, अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाच्या हिताचा त्यांना अखंड ध्यास लागला असल्यामुले ब्राह्मणेतरवर्गाची भूमिका अस्पऋश्यवर्गाच्या हिताकडे वळविण्याचा प्रयत्न करावा असे त्यांना वाटत असणार व दुसरे, बहुजनवर्गाचे हित साधण्यासाठी ब्राह्मणेतर पक्षाचा उपयोग करून घ्यावा, असे त्यांना वाटत असणार. शब्दांचा कधी कधी वक्र प्रयोग करून विनोदात्मक बोलण्याची अण्णासाहेब शिंदे यांची शैली होती. त्यामुळे ते गैरसमजाच्या आपत्तीतही सापडत. पुण्यास लँड लीगच्या स्थापनेच्या वेळी शिंदे यांनी भाषण करताना, “मी ब्राह्मणेतर पक्षात मतलबाकरिता जातो,” असे विधान केल्याचे ज्ञानप्रकाशात प्रसिद्ध झाल्यामुळे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वृत्तपत्रांत त्यांच्यावर टीका येऊ लागली. तेव्हा त्यांनी खुलासा केला की, “मी हे विधान विनोदाने केले होते आणि माझा ‘मतलब’ केवळ अस्पृश्यांची बाजू मांडण्याकरिता मला इतर ठिकाणांप्रमाणे ब्राह्मणेतर पक्षातही जावे लागते एवढाच असतो; हे त्याच सभेत मी स्पष्ट बोलून दाखविले होते. कल्याणच्या ब्राह्मणेतर परिषदेत तर मुंबई इलाखा शेतकरी परिषदेस अखिल ब्राह्मणेतरांचा पाठिंबा मिळविण्यासाठीच मला जावे लागले.”६


म्हणजे ब्राह्मणेतर पक्षाशी अण्णासाहेब शिंदे जो संबंध ठेवीत होते तो प्रामुख्याने अस्पृश्यवर्गाच्या हितासाठी. दुसरे कारण म्हणजे बहुजनांबद्दल त्यांना वाटणारा कळवळा.


संदर्भ
१.    द्वा. गो. वैद्य, नारायण गणेश चंदावरकर, नर्नाटक पब्लिशिंग हाऊस, मुंबई, १९३७, पृ. ५२३-२४.
२.    य. दि. फडके, केशवराव जेधे, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८२, पृ. ९.
३.    तत्रैव, पृ. ९.
४.    माधवराव श्रीपतराव शिंदे, विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे, युवराज प्रकाशन, औरंगाबाद, १९७३, पृ. ३२.
५.    दि इंडियन मेसेंजर, ४ एप्रिल १९२६.
६.    ज्ञानप्रकाश, ११ ऑगस्ट १९२९.

व्हायकोम सत्याग्रह

विठ्ठल रामजी शिंदे हे मंगलोर येथे ब्राह्मधर्मप्रचारक म्हणून जाईपर्यंतच्या काळात तेथील ब्राह्मसमाजी मंडळी राजकारणाच्या बाबतीत मोठी सोवली होती. शिंदे हे धर्मविषयक विवेचन करताना, आपल्या  प्रतिपादनाला व्यापक बैठक देत असताना स्वाभाविकपणे राजकारणाचा निर्देश करीत असत. म. गांधींचा उल्लेख मोठ्या गौरवपूर्ण रीतीने करीत असत. राजकारणाच्या संदर्भातील शिंदे यांचे नवे विचार ऐकून विशेषत्वाने तेथील तरुणांचा वर्ग ब्राह्मसमाजाकडे आकृष्ट होऊ लागला. ब्राह्मधर्मप्रचारक म्हणून शिंदे यांचा प्रभाव वाढत होता. मात्र त्यांचे राजकारणविषयक नवे विचार प्रतिष्ठित बिल्लव मंडळीना रुचत नव्हते. त्यांच्याबद्दल एक प्रकारची असंतुष्टपणाची अविश्वासाची भावना प्रतिष्ठित बिल्लव मंडळींत निर्माण झाली. मंगलोर ब्राह्मसमाजाचे वातावरण असे अंत:स्थपणे खदखदत असतानाच केवळ ब्राह्मसमाजच नव्हे तर मंगलोर, कालिकत हा ब्रिटिश अमलाखालचा भाग व त्रावणकोर, कोचीन हा संस्थानी मुलूख सामाजिक व राजकीयदृष्टया ढवळून निघावा अशी एक घटना घडली. ती म्हणजे, व्हायकोम येथील मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह.


उत्तर व मध्य भारताच्या तुलनेत दक्षिण भारताचा भाग आचारविचारांच्या बाबतीत अत्यंत सोवळा होता. त्यातल्या त्यात पूर्वीच्या मलबार प्रांतात तर अस्पृश्य गणल्या गेलेल्या लोकांवर फारच जाचक निर्बंध लादलेले होते. त्रावणकोर संस्थानच्या व्हायकोम गावातील देवळातच नव्हे, तर देवळात जाण्या-येण्याच्या वाटेवरही अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना, मग ते कितीही प्रतिष्ठित असोत, जाण्यास कायदेशीर मनाई होती. हिंदुस्थानात अन्यत्र दिसून येणारी विसंगती येथेही तीव्र स्वरुपात आढळून येत होती. ती विसंगती म्हणजे देवळाच्या वाटेवर जाण्याला ख्रिस्ती, मुसलमान वगैरे परधर्मीयांना कोणतीही मनाई नव्हती. एवढेच नव्हे तर देवळाच्या बाहेरच्या व आतील मंडपात अशा परकीयांना मोठ्या प्रतिष्ठितपणे नेण्यात येत असे. म्हणजे मंदिरप्रवेशाबाबात असलेला हा निर्बंध केवळ हिंदू धर्मात असलेल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीपुरताच मर्यादित होता. हा अन्यायकारक निर्बंध उठवावा म्हणून व्हायकोमला १९२४च्या ३० मार्च रोजी मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रहाला प्रारंभ झाला होता. लाहोरचे स्वामी श्रद्धानंद हे आर्यसमाजाच्या वतीन सत्याग्रह करण्यासाठी आले होते. कालिकतेच मंजिरी रामय्या हे थिऑसॉफीच्या वतीने सत्याग्रहात भाग घेण्यासाठी आले होते. हा सत्याग्रह होण्यापूर्वी कित्येक वर्षांपासून ब्राह्मसमाज, आर्यसमाज व थिऑसॉफी ह्या उदारमतवादी धर्मपंथांमध्ये कित्येक अस्पृश्यवर्गीय मंडळी सभासद महणून दाखल झाली होती. त्यांनादेखील देवळाच्या रस्त्यावरुन जाताना अटक होऊ लागली होती. अस्पृश्यवर्गीयांवरील हा अन्याय दूर करावा म्हणून या तीनही उदार धर्मपंथांच्या अग्रणींनी या सत्याग्रहामध्ये भाग घेण्याचे ठरविले होते. ब्राह्मसमाजाच्या वतीने हे धुरीणत्व विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडे आले.


साधू शिवप्रसाद ह्या नावाचे पूर्वीच्या अस्पृश्य समजल्या जाणा-या तिय्या या जातीचे तरुण ब्राह्मसमाजामध्ये दाखल झाले होते, एवढेच नव्हे तर ते मलबार प्रांतात धर्मप्रचारक म्हणूनही काम करीत होते. साधू शिवप्रसादांनादेखील इतर अस्पृश्यांप्रमाणे व्हायकोम येथील मंदिराच्या वाटेवर जाण्यासाठी बंदी करण्यात आली. त्यांनी हा वृत्तान्त कलकत्याच्या साधारण ब्राह्मसमाजाच्या कमिटीकडे लिहून कळविला. साधारण ब्राह्मसमाजाचे त्या वेळचे अध्यक्ष डॉ. प्राणकृष्ण आचार्य यांनी त्रावणकोर दरबाराकडे जाहीर विनंतीपत्र पाठवून ह्या बाबतीत दाद मागितली आणि या पत्राची प्रत विठ्ठल रामजी शिंदे हे या भागातील मुख्य धर्मप्रचारक असल्यामुळे त्यांच्याकडे पाठविली व त्यांनी व्हायकोम येथे जाऊन या बाबतीत शक्य असेल तो प्रयत्न करावा असे सुचविले. साधू शिवप्रसाद यांचीही विठ्ठल रामजी शिंदे यांना वारंवार पत्रे येऊ लागली व व्हायकोम येथेच नव्हे तर त्या प्रांतात प्रचारकार्यासाठी त्यांनी मदत करावी अशी निकडीची विनंतीही त्यांनी चालविली होती. शिंदे यांनी हे सर्व प्रकरण मंगलोर समाजाच्या कमिटीपुढे ठेवले. कमिटीची मोठीच पंचाईत झाली. शिंदे यांच्या या प्रयत्नाला अनुमती देणे हे त्यांना रुचेना व नाही म्हणण्याचे धैर्यही त्यांना होईना. दौ-याच्या खर्चाचा प्रश्न असेल तर तो आपण पाहून घेऊ असे शिंदे यांनी कमिटीस सांगितले. म्हणजे व्यावहारिक अडचण कोणतीच उरली नव्हती. प्रश्न तेथील मंडळीच्या इच्छाशक्तीचा होता. त्यांच्या दृष्टीने मंदिरप्रवेशाचा हा प्रश्न केवळ धार्मिक अथवा सामाजिक स्वरुपाचा प्रश्न नव्हता. त्याला राजकारणाचेही एक अंग होते. अशा प्रकारच्या सत्याग्रहात भाग घेणे म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या तसेच संस्थानी अंमलाच्या विरोधात जाणे होय अशी त्यांची धारणा होती. म्हणून त्यांना शिंदे यांच्या संकल्पित दौ-याला व सत्याग्रहातील सहभागाला हो म्हणण्याचे धाडस होत नव्हते. शिंदे यांनी अखेरीस कमिटीचा असे सांगितले की, ज्या अर्थी कलकत्याच्या ब्राह्मसमाजाच्या अध्यक्षांनी आपण व्हायकोमला जावे म्हणून सुचविले या अर्थी हा दौरा काढणे आपले कर्तव्य आहे. शिंदे यांच्या या म्हणण्याला मंगलोर ब्राह्मसमाजाच्या कमिटीचा हरकत घेता आली नाही व शिंदे यांनी व्हायकोमला जाण्याचा निश्चय केला.


कालिकत ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी डॉ. गोपालन् हे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य होते. त्यांना शिंदे यांचा दौरा एकदम पसंत पडला. त्यांनी शिंद्यांना कालिकतला बोलावले  खर्चाची तजवीज केली. साधू शिवप्रसाद यांनाही त्यांनी कालिकतला बोलावून घेतले. दौ-याला कार्यक्रम निश्चित करुन मे महिन्यात शिंदे व सादू शिवप्रसाद व्हायकोमला गेले. व्हायकोमला प्रयाण करण्याच्या आधी कालिकत येथे व्हायकोम येथील सत्याग्रहाविषयी प्रचंड जाहीर सभा झाली. तीत अनेक स्तानिक पुढा-यांनी भाषणे झाली. त्याचप्रमाणे शिंदे यांचेही भाषण झाले. त्यांचे हे भाषण मद्रास येथील वर्तमानपत्रांतून जाड मथळ्याखाली प्रसिद्ध झाले. ते पाहून मंगलोर येथील सोवळ्या ब्राह्मसमाजी बिल्ल्व मंडळींमध्ये विलक्षण अस्वस्थता निर्माण झाली. इकडे व्हायकोम येथे हजारो सत्याग्रहींचा प्रचंड तळ पडला हता. आर्यसमाजाचे आणि शीख समाजाचे जथ्थे तेथे येऊन थडकत होते. शिखांनी तर एक मोफत भंडारा सत्यग्रहींसाठी चालविला. ह्या सत्याग्रहांमध्ये केवळ अस्पृश्यच नव्हेत तर नायर लोकांचाही भरणा होता व काही नबुंद्री तरुणही होते. अस्पृस्याविषयक प्रश्नाबद्दल विलक्षण जागृती झाल्याचे हे चिन्ह होते. शिंदे व साधू शिवप्रसाद तेथे गेल्यावर सत्याग्रह्यांनी त्यांचे मोठे उत्साहाने व आनंदाने स्वागत केल.


दुस-या दिवशी साधू शिवप्रसाद यांना घेऊन शिंदे सत्याग्रहासाटी मंदिराकडे निघाले. शिंदे तेथे पोहोचण्याआधीच त्यांची सविस्तर वर्णने फोटोसहित पोलिसांकडे गेलेली होती. मुख्य पोलीस कमिशनर सत्याग्रहाच्या स्थानी सज्ज उभे होते. त्यांनी शिंदे यांना ओळखले. सत्याग्रहाच्या ठिकाणी शंभर शंभर सत्याग्रहींचे जथ्थे रस्त्यातील कुंपणाजवळ आडवे बसत. वाव मिळाला की आत घुसण्याचा प्रयत्न करीत असत व पोलीस त्यांना पिटाळून लावीत, असा संघर्ष तेथे चालू होता. एका वेळी एका माणसालाच प्रवेश करता येईल इतके अरुंद फाटक ह्या कुंपणास ठेवण्यास आले होते व फाटकाच्या दोन्ही बाजूस पोलीस अधिकारी उभे असत. शिंदे हे शिवप्रसादांना आपल्यासमवेत नेऊन सत्याग्रह करणार हे आधीच प्रसिद्ध झाले होते. शिंदे यांनी शिवप्रसादांच्या बगलेत हात घातला व फाटकात प्रवेश केला. पण पोलीस कमिशनरनी शिंदे व शिवप्रसाद यांच्यामध्ये दांडके घालून हसत हसत शिंदे यांना म्हटले, " आपण खुशाल जा, पण यांना जाता येणार नाही," शिंदे म्हणाले, "आम्ही दोघे ब्राह्मधर्माचे प्रचारक बंधू आहोत. आम्हा दोघांनाही न ओळखता तुम्ही असा पंक्तिप्रपंच का करता." ते म्हणाले, "आम्ही आपणाला पूर्ण ओळखतो." शिंदे यांनी त्यांना बजावले की, "मी येथून त्रिवेंद्रम येथे दरबारला भेटावयास जाणार आहे. तुम्ही आम्हाला बेकायदेशीर अटक करीत आहात याची पूर्ण जबाबदारी घेत आहात ना?" अधिकारी म्हणाले," आम्ही जे करीत आहोत ते दरबारच्याच आज्ञेने करीत आहोत. आपल्याला आम्ही अटक केली नाही; उलट पोलीस बरोबर देऊन तुम्हा एकट्यालाच सन्मानपूर्वक देऊळ दाखविण्याची आमची तयारी आहे. मात्र तुमच्या बंधूस तसे करता येणार नाही. कारण पूर्वाश्रमीचे ते कोण आहे ते आम्ही ओळखतो."


त्यानंतर शिंदे साधू शिवप्रसादांना बरोबर घेऊन त्रिवेंद्रम येथे गेले व संस्थानचे दिवाण राघवय्या यांची त्यांनी भेट घेतली. "ब्राह्मसमाजाच्या धर्मप्रचारकावर व्हायकोम येथे होणा-या अन्यायासंबंधीची दाद मागणारा अर्ज आपणास मिळाला काय," असे शिंदे यांनी दिवाणांना विचारले व "त्याचे उत्तर अद्यापि का मिळाले नाही." असा प्रश्न केला. दिवाणांनी उत्तर केले की, "त्या प्रश्नाचा विचार चालू आहे." त्यावर शिंदे म्हणाले, "आपला इकडे विचार चालू आहे. तर तिकडे व्हायकोमला परवा आम्हाला अटक झाली याची वाट काय?" ते म्हणाले, "झालेल्या प्रकरणात थोडी कसूर झाली हे खरे आहे. पण ज्या अस्पृश्यांनी ब्राह्मसमाजाची दीक्षा घेतली आहे त्यांनी आपण हिंदू नाही असे जाहीर करावे, म्हणजे त्यांची वाट खुली होईल." शिंदे यांनी १९०८ साली बडोद्यास दिलेल्या आपल्या सुप्रसिद्ध 'बहिष्कृत भारत" या व्याख्यानात जी विदारक विसंगती दाखवून दिली होती तिचाच पडताळा याही प्रसंगी त्यांना आला. त्या भाषणात शिंदे यांनी असे म्हटले आहे की, "अस्पृश्य मानलेल्यांनी धर्मांतर केले, म्हणजे तो ख्रिस्ती किवा मुसलमान झाला, तर आपण त्याला शिवून घेतो, तो हिंदू म्हणून राहिला तर शिवून घेत नाही. याचा अर्थ ह्या लोकांमध्ये असणारे हिंदूपण हेच आपण अस्पृश्य ठरवीत आहोत." शिंदे दिवाण राघवय्यांना पुढेल म्हणाले, "ब्राह्मसमाज हिंदू आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. ब्राह्मसमाज कुणीही असो. हिंदू नसलेल्या परधर्मीय गृहस्थास मज्जाव नाही आणि ब्राह्मसमाजी आपण हिंदू नाहीत असे जाहीर करेपर्यंत त्यांना मज्जाव असा तुमच्या कायद्याचा अर्थ आहे काय? असे असेल तर मी स्वत: महाराजांना भेटून खुलासा विचारणार आहे." त्यावर दिवाण म्हणाले, "महाराजांनी सर्व अधिकार दरबारकडे दिले आहेत. ते तुम्हाला भेटणार नाहीत." यापुढे हुज्जत घालीत बसण्यात अर्थ नाही असे ध्यानात घेऊन शिंदे यांनी दिवाणांना नम्रपणे सांगितले, "या सर्व विसंगत प्रकाराचा पुकारा मी ठिकठिकाणी जाहीर सभा भरवून करणार आहे. आपली हरकत असल्यास कळवा." तेव्हा ते म्हणाले, "तुमचे व आमचे मार्ग भिन्न आहेत व ते दोघांनाही मोकळे आहेत. यापेक्षा जास्त काही मी सांगू शकत नाही."


सत्याग्रहाचा हा अध्याय अशा त-हेने संपवून विठ्ठल रामजी शिंदे साधू शिवप्रसादांना बरोबर घेऊन कोचीन व त्रावणकोर संस्थानात ब्राह्मसमाजाच्या प्रचारासाठी निघाले. कोचीनची राजधानी असलेल्या अर्नाकुलम येथे प्रेस असोसिएटेडच्या एजंटने बॉम्बे क्रॉनिकल पत्राचा एक अंक शिंदे यांच्या हाती देऊन एक बातमीकडे त्यांचे लक्ष वेधले. ती बातमी अशी होती, "पुण्याचे प्रसिद्ध पुढारी श्री. व्ही.आर. शिंदे हे व्हायकोम येथे गेले असता त्रावणकोर पोलीस अधिका-यांनी त्यांना देवळाच्या वाटेवर जाण्यास मनाई केली हे बरे झाले नाही. श्री. शिंदे यांच्यामागे संबंध महाराष्ट्र आहे हे त्रावणकोर दरबारने पक्के ध्यानात ठेवावे"  बातमीतील मजकूर सर्वांशी खरा नाही हे ध्यानात घेऊन शिंदे यांनी बॉम्बे क्रॉनिकललला दुरुस्तीचे पत्र तात्काळ लिहिले. "व्हायकोमला मला स्वत:ला मनाई झाली नाही. उलट सन्मानाने देऊळ दाखविण्याची पोलीस खात्याने तयारी दाखविली. मात्र माझे ब्राह्मप्रचारक बंधू शिवप्रसाद यांना ते पूर्वाश्रमीचे अस्पृश्य म्हणून अशी बंदी झाली." प्रेस असोसिएटेडच्या ज्या एजंटने चुकीची बातमी पाठविली होती त्याने आपल्या चुकीबद्दलचे दिलगिरी पत्र शिंदे यांना दिले.
अस्पृश्यतेच्या प्रश्नाबद्दल थोडीफार जाणीव झाली, एवढेच व्हायकोमच्या सत्याग्रहाचे फलित म्हणावे लागेल. मंदिरात किंवा मंदिराच्या वाटेवर कोणाही स्पृश्य हिंदूला तसेच खिश्चन, मुसलमान अशा परधर्मीयाला जाण्याला परवानगी होती; मात्र हिंदू असणा-या अस्पृश्याला तेवढी अशी परवानगी नव्हती. शिंदे यांना वाटले की ह्या सर्व धर्मातील लोकांनी अस्पृश्यांविरुद्ध केलेली ही एकी असून ह्या एकीला त्रावणकोर व कोचीन या संस्थानांचा पाठिंबा आहे व ब्रिटिश सरकार ह्या प्रश्नाकडे डोळेझाक करीत आहे.


विवेकानंदांनी ह्या दक्षिणेकडील प्रांतांना तेथील अजब चालीरीती व मागासलेपणाचा कडेलोट पाहू वेड्याचे हॉस्पिटल म्हटले होते असा उल्लेख शिंदे यांनी १९०३ साली लिहिलेल्या एका लेखात केली होता. वीस-एकवीस वर्षांनंतर शिंद्यांना विवेकानंदांच्या त्या शे-याचे पुन्हा स्मरण झाले असणार.

विविध प्रार्थनासमाजांतील सहभाग

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे धर्मप्रचाराचे कार्य मुंबईत तर जोराने चालले होतेच, शिवाय अन्य ठिकाणीही स्थानिक समाजाच्या निमंत्रणावरून त्यांना जावे लागे. मुंबई शहराशिवाय महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर येथे, गुजराथेत अहमदाबाद, बडोदे, नवसारी येथे आणि मध्यप्रदेशात इंदूर येथे प्रार्थनासमाज होते. त्यांचे वार्षिक उत्सव आठवडाभर चालत. त्यांत भाग घेण्यासाठी शिंदे ह्यांना जावे लागे. ब्राह्मधर्माचा प्रसार करण्याची ही चांगली संधी आहे असे समजून शिंदेही मोठ्या उत्साहाने जात असत. अशा उत्सवाच्या प्रसंगी शिंदे ब्राह्मसमाजाच्या मूलभूत तत्त्वांचे व्याख्यानांच्याद्वारा विवरण करीत असत. त्याशिवाय धर्मप्रसाराचे कार्य जोमाने कसे चालेल ह्यासंबंधी नवनवीन विचार मांडून ह्या कामास प्रेरणा देत.

१९०४च्या २७ व २८ ऑगस्ट या तारखांना बडोदा संस्थानातील नवसारी येथे प्रार्थनासमाजाचा वार्षिक उत्सव साजरा झाला. नवसारी येथील लक्ष्मण हॉल ह्या प्रशस्त सार्वजनिक इमारतीमध्ये २७ तारखेस गुजराथीमध्ये उपासना झाली. २८ तारखेस सकाळी शिंदे ह्यांनी ‘अहमदाबाद प्रार्थनामाला’ ह्या पुस्तकातून उपासना चालविली आणि त्यानंतर हरिकीर्तन केले. पुन्हा संध्याकाळी त्यांनी त्याच पुस्तकामधून उपासना चालविली व व्याख्यान दिले. ‘उदार धर्मचळवळीची आवश्यकता’ असा त्यांनी व्याख्यानासाठी विषय घेतला व नवसारी येथील प्रार्थनासमाज त्यामध्ये कोणत्या प्रकारे आपला वाटा उचलू शकेल तेही सांगितले. उपासनेला व व्याख्यानाला गावातील नागरिक आणि पारशीधर्मीय श्रोतेही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते व नवसारीचे जिल्हाप्रमुख अधिकारी सुभासाहेब रा. ब. खासेराव जाधव हे अध्यक्षस्थानी होते. शिंदे ह्यांनी व्याख्यानाच्या प्रारंभीच सांगितले की, संस्थानातील अधिकारी, नवसारी, सोनगड यांसारख्या ठिकाणी धर्मकार्यात भाग घेतात ही गोष्ट संस्थानाधिपतीचा धर्मकार्याविषयक दृष्टिकोण पुढे नेतात ह्याची द्योतक आहे. व्याख्यानाच्या ओघात त्यांनी असे दाखवून दिले की, धर्मसुधारणा ही केवळ एक सुधारणा नसून सर्व चांगल्याच्या मुळाशी असणारी ही एक गोष्ट आहे. जगातील आधुनिक उदार धर्मविषयक चळवळ ही विवेचक व समावेशक स्वरूपाची आहे. उदार धर्म हा आता विश्वधर्म होऊ पाहत आहे असेही व्याख्यात्यांनी अखेरीस सांगितले.

अध्यक्ष सुभासाहेब रा. ब. खासेराव जाधव ह्यांनी उत्तम भाषण करून धार्मिक शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादली. शिंदे ह्यांनी समाजाला एक ग्रंथालय असावे अशी सूचना केली व मुंबई येथून काही पुस्तके पाठविली. म्हणून तेथे ग्रंथालयाची स्थापना झाली.१

नवसारी जिल्ह्यामध्येच जंगलातील भागात सोनगड या गावी प्रार्थनासमाज चांगल्या प्रकारे चालला होता. १९०५ साली सोनगड येथील समाजास शिंदे ह्यांनी भेट दिली. ह्या भागामध्ये ढाणके नावाची जंगली जात राहत असे व त्यांच्या शिक्षणाची श्रीमंत सयाजीरावांनी चांगल्या प्रकारे सोय केली होती. मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी एक एक वसतिगृह स्थापन केले. प्रत्येक वसतिगृहात ५० विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलेली होती. मागासलेल्या लोकांना शिक्षण देताना श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्यांनी मुलांप्रमाणेच मुलींनाही शिक्षण देण्याची व्यवस्था केली. हा त्यांच्या व्यापक दृष्टिकोणाचा भाग होता. वसतिगृहाचे सुपरिटेंडेंट म्हणून रा. फत्तेखाँ नावाचे मुसलमान गृहस्थ मोठ्या कळकळीने काम करीत होते.

२७ मार्च १९०४ पासून इंदूर येथील प्रार्थनासमाजाचा उत्सव सुरू झाला. शिंदे हे ह्या उत्सवाला उपस्थित राहिले व त्यात सहभागी झाले. शिदे ह्यांची उपस्थिती प्रार्थनासमाजाच्या कार्याला प्रेरक, उत्साहवर्धक व दिशा देणारी ठरली. शिंदे हे किती वेगवेगळ्या पातळीवरून व रास्त दृष्टिकोणातून धर्मप्रसाराचे कार्य साधीत होते ह्याची कल्पना त्यांच्या सहभागावरून येऊ शकते. ह्या उत्सावत त्यांनी प्रौढ मंडळी तसेच अमराठी श्रोते ध्यानात घेऊन त्यांच्यासाठी दोन व्याख्याने इंग्रजीमधून दिली. १) ‘प्राच्य व पाश्चात्त्यांकडील आधुनिक उदार धर्माच्या काही कार्यपद्धती’ व २) ‘ब्राह्मसमाज आणि जगातील संतमंडळी’ हे त्यांच्या व्याख्यानाचे विषय होते. सर्वसामान्य श्रोत्यांसाठी त्यांनी वर्डस्वर्थचे चरित्र मराठीत सांगितले. त्यांच्या कविता वाचून दाखविल्या. त्यांचा सरळ, सोप्या भाषेत अर्थ विशद केला. विशेषकरून ‘वुई आर सेव्हन’ या कवितेतील साधे पण महत्त्वाचे तात्पर्य- आत्म्याचे अमरत्व-फार हृदयंगमपणे सांगितले. पुन्हा एकदा पूजनानंतर सभासद, हितचिंतक, गृहस्थ, गृहिणी ह्यांच्या मेळ्यासमोर शिंदे ह्यांनी बेळगाव, मद्रास, कलकत्ता इकडे नुकत्याच केलेल्या प्रवासातील अनुभव चटकदारपणे सांगितले. समाजातील मुलांचा मेळा झाला. त्यांच्यासमोर ह्या लहान लहान मुलांना नेहमी सत्य बोलत जाण्यासंबंधी त्यांच्याच भाषेत लहानशी गोष्ट सांगितली व ख्रिस्ताचा व कन्फ्युशियसचा माणसांनी कसे वागावे यासंबंधीचा सुबोध उपदेश केला. अधिक मोठ्या वयाच्या मुलांना “ज्ञान अधिकाधिक वाढू दे पण त्याबरोबर पूज्यबुद्धीही अंतःकरणात अधिकाधिक पोहचू दे” ह्या टेनिसनच्या वचनानुसार उपदेश केला. स्त्रियांच्या मेळ्यासमोरही शिंदे ह्यांनी भाषण केले. आभारप्रदर्शन भाषण करतेवेळी सौ. उमाबाई केळकर म्हणाल्या, “रा. शिंद्यांप्रमाणे प्रत्येकाची समजूत होईल तर स्त्रियांची स्थिती सुधारण्याच्या बाबतीत काहीतरी होईल.” शिंदे ह्यांचा स्त्रिविषयक दृष्टिकोण हा सौ. उमाबाई केळकर ह्यांच्यासारख्या स्त्रियांना अत्यंत महत्त्वाचा वाटला. उत्सवाच्या अखेरीस नगरसंकीर्तनानंतर रात्री १० वाजता मंडळी परत आल्यानंतर शिंदे ह्यांनी समाजबंधूस फार कळकळीने, अश्रूपूर्ण नेत्रांनी, मोठ्या निश्चयाच्या शब्दांत नगरसंकीर्तनाचा प्रसंग प्रत्येक वर्षी उत्सवात ठेवीत जा व लहानथोरांनी लाज सोडून आजच्याप्रमाणे नेहमी भक्तिरस लुटीत जावा असा उपदेश केला. त्यानंतर त्यांनी ईश्वरप्रार्थना केली व सभेची सांगता झाली.२

सातारा येथील प्रार्थनासमाज हा एक उत्तम प्रकारे चाललेला महाराष्ट्रातील समाज होता. रा. सीतारामपंत जव्हेरे हे प्रामुख्याने समाजाचे काम कळकळीने चालवीत असत व रावबहादूर काळे, रा. मोरोपंत जोशी व त्यांची कन्या मथुराबाई वगैरे मंडळी त्यांना मदत करीत असत. १९०५ सालच्या एप्रिलअखेरीस समाजाचा वार्षिक उत्सव उत्साहाने साजरा झाला. विठ्ठल रामजी शिंदे हे त्यामध्ये सहभागी झाले. त्यांचे ‘निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतार व विकास’ ह्या विषयावर अत्यंत उद्बोधक व प्रेरक असे मुख्य व्याख्यान झाले.३ त्यांनी व्याख्यानामध्ये प्रवृत्तिवादाचा जोरदार पुरस्कार केला. माणसाने आपल्या अहंकाराचा परिघ विश्वाइतका मोठा करावा असे प्रतिपादिले. व्यक्तीने स्वतःची सर्वांगीण उन्नती करणे आवश्यक आहे. तशा प्रकारची क्षमता तिच्यामध्ये येण्यासाठी विभूतीच्या अवतारावर विसंबून राहू नये. व्यक्ती अवताराच्या प्रभावाने एकदम खालून वर उचलली जाण्यापेक्षा तिचा स्वाभाविक, क्रमिक विकास होणे हे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. व्यक्तीच्या प्रतिष्ठेला, व्यक्तीच्या प्रयत्नाला व स्वाभाविक विकासाला महत्त्व देण्याची शिंदे यांची भूमिका होती. आध्यात्मिक विकासातही ते याच भूमिकेचा पुरस्कार करताना दिसतात.

उत्सवसमाप्तीच्या वेळेस समारोपादाखल केलेल्या भाषणात रा. सीतारामपंत जव्हेरे ह्यांनी शिंदे ह्यांच्या अहंकार सोडण्याच्या मुद्दयाचा आवर्जून उल्लेख केला. सातारा प्रार्थनासमाजाची एक विशेष गोष्ट म्हणून त्यांनी आपल्या समाजामध्ये उपासना वगैरेस येण्यास महारमंडळींना मुक्तद्वार आहे ह्याचा आवर्जून उल्लेख केला व ह्या लोकांसंबंधी आपले जे कर्तव्य आहे ते पार पाडणे आवश्यक असल्याचे सांगितले.

शिंदे हे उत्तरादाखल बोलले. प्रार्थनासमाजाच्या कामासंबंधी तीव्र स्वरूपाची आत्मीयता सर्वांच्या ठिकाणी निर्माण होणे आवश्यक आहे असे त्यांनी आवाहन केले. अन्यत्र कोठेही आढळून न येणा-या सातारा प्रार्थनासमाजातील दोन गोष्टींचा शिंदे ह्यांनी आवर्जून उल्लेख केला. १) महार जातीचा प्रार्थनासमाजामध्ये काहीएक प्रमाणात झालेला प्रवेश व दुसरी गोष्ट म्हणजे एका कुमारी स्त्रीने (कुमारी मथुराबाई जोशी) भर समाजात येऊन उपासना चालवून आपल्या धर्मानुभवाचा बंधू-भगिनींस मोकळेपणे लाभ करून देणे ही होय.४

अस्पृश्य समजल्या जाणा-या वर्गासंबंधी काहीएक कार्य व्हावे व आपल्या समाजव्यवस्थेत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावे ह्या दोन्ही विषयासंबंधी शिंदे ह्यांना फार कळकळ होती व त्या दोन गोष्टी साता-यास दिसून आल्यामुळे शिंदे ह्यांना स्वाभाविकच आनंद झाला.

उत्सवाच्या समाप्तीनंतर शहराच्या लष्कर भागामध्ये अस्पृश्यवर्गातील सैनिकांकरिता शिंदे ह्यांचे ‘धर्मजागृती’ ह्या विषयावर एक विशेष व्याख्यान झाले. “हल्ली इंग्रजांच्या राज्यात जर हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिस्ती ह्या प्रकारचा भेद पाळण्यात येत नाही तर ईश्वराचे राज्य, जे खात्रीने अधिक पवित्र असणार, त्यात कसा पाळण्यात येईल” असा प्रश्न उपस्थित करून सर्व धर्माच्या मुळाशी असणा-या तत्त्वाचा त्यांनी निर्देश केला.

ह्या व्याख्यानाकरिता मंडळी जमविणे व सभास्थानाची व्यवस्था राखणे हे काम एका मुसलमान पेन्शनर सद्गृहस्थाने व त्याच्या जातीतील काही मंडळींनी केले. व्याख्यानाची जागा चव्हाट्याच्या कोप-यावरील पोलीसचौकीमध्ये होती व रस्त्यात बाके मांडली होती. पोलीसचौकीतील खांब वेलीफुलांनी सुशोभित केले होते व मराठा लाईट इन्फंट्रीतील सुभेदार, जमादार वगैरे अंमलदार, हवालदार, शिपाई, मुसलमान, पारशी व इतर लोक असा सर्वधर्मीय श्रोतृवर्ग होता.

शिंदे ह्यांच्या व्यक्तिगत दृष्टीने दुसरी एक महत्त्वाची घटना घडली. साता-याहून जवळ असलेल्या वर्णे ह्या खेड्यातील सबरजिस्ट्रार रा. बापूजी बच्चाजी शिंदे ह्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. गपणपतराव शिंदे ह्यांनी विठ्ठल रामजींना मुद्दाम आपल्या गावी बोलावून नेले. खेड्यातील लोकांसाठी शिंदे ह्यांनी भजन केले व उपासना चालविली. ह्या लोकांना देण्यासाठी पोस्टल मिशनचे वाङमय पाठविण्याचेही शिंदे ह्यांनी कबूल केले; नंतर तशी व्यवस्था केली.

उदार धर्माचा प्रसार खेड्यात होणे तर जास्तच आवश्यक आहे ही शिंदे ह्यांची धारणा ते बी. ए. चा अभ्यास करीत होते तेव्हापासूनच होती. त्यांच्या ह्या आस्थेच्या विषयाबाबत कार्य करण्याला प्रारंभ ह्या निमित्ताने ह्यावेळी झाला. शिंदे ह्यांचा व्यक्तिगत लाभ म्हणजे श्री. गणपतराव शिंदे ह्या कविमित्राशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध ह्या प्रसंगी निर्माण झाला व त्यांच्या आयुष्याच्या अखरेपर्यंत टिकून राहिला.

१९०५ पासून विठ्ठल रामजी शिंदे अहमदनगर येथील प्रार्थनासमाजास वारंवार भेटी देत असत. तेथील साळी समाजाचे पुढारी रा. सहदेवराव बागडे हे प्रार्थनासमाजाचे काम आस्थेवाईकपणाने चालवीत असत. त्यांच्या वजनामुळे साळी जातीतील अनेक लोक प्रार्थनासमाजामध्ये जात. १९०६ सालच्या अहमदनगर समाजाच्या उत्सवासाठी शिंदे तेथे गेले. नेहमीप्रमाणे उत्सव चांगल्यीत रीतीने पार पडला. १९०५ सालापासून शिंदे ह्यांचा संबंध तेथील अस्पृश्यवर्गाच्या पुढा-यांशी आला. त्यांनी सहदेवराव बागडे ह्यांच्या साहाय्याने स्पृश्य मुलांसाठी एक व अस्पृश्य समाजातील वर्गासाठी एक अशा दोन रात्रीच्या शाळा काढल्या. मुंबईत ज्याप्रमाणे समाजाच्या रात्रशाळा चालू होत्या त्याच धर्तीवर शिंदे ह्यांनी पुणे, नगर येथे अशा प्रकारच्या रात्रशाळा सुरू केल्या व समाजाने आरंभिलेल्या ह्या कार्याचा विस्तार केला.

१९०४ नंतर पुन्हा १९०७ साली शिंदे हे इंदूर येथील प्रार्थनासमाजाच्या वार्षिक उत्सवासाठी गेले. त्यांच्याबरोबर पत्नी सौ. रुक्मिणीबाई आणि सहकारी स्वात्मानंद हे होते. इंदूर येथील प्रार्थनासमाज उत्साहाने चालला होता. डॉ. प्रभाकरपंत भांडारकर, होळकर कॉलेजचे प्रोफेसर देसाई, तेथील सुप्रसिद्ध पाटकर-जाधव ह्यांचे कुटुंब, चित्रकार रामचंद्र मिटबावकर ह्यांचा उत्तम सहभाग असे. शिवाय प्रार्थनासमाजाचे आधीचे प्रचारक रा. सदाशिवराव केळकरही तेथेच होते. उत्सवामध्ये नगरसंकीर्तन थाटाचे झाले व नगराबाहेर वनोपासनेत प्रीतिभोजनाचा समारंभही आनंददायी रीतीने पार पडला. शिंदे ह्यांचे लक्ष अस्पृश्यवर्गासाठी काहीएक कार्य करावे इकडे लागलेले होते.

१९, २४ एप्रिल १९०७ रोजी तेथील काही पुढारी मंडळींच्या मदतीने एक कमिटी स्थापन करून अस्पृश्यांसाठी ५ मे १९०७ रोजी एक संस्था उघडण्यात आली.

उत्सव ओटोपल्यानंतर जाधवमंडळींसमवेत शिंदे ह्यांनी पत्नीसह सफर काढली व धार, मांडवगड येथील प्रेक्षणीय स्थळे पाहिली. त्यांनी आपली पत्नी रुक्मिणीबाई ह्यांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी काही महिने जाधवमंडळींकडे ठेवले. अस्पृश्यवर्गाची सेवा करण्यासाठी त्यांनी उघडलेल्या निराश्रित सेवासदनामध्ये ह्या शिक्षणाचा आपल्या पत्नीला उपयोग होईल अशी त्यांची धारणा होती.

१९०७च्या ऑक्टोबर अखेरीस मंगळूर शहरातील ब्राह्मसमाजाकडून शिंदे ह्यांना तिकडे घेऊन जाण्यासाठी त्या समाजाचे रा. व्यंकटाप्पा कांतप्पा नावाचे सभासद मुंबईस आले. शिंदे हे भगिनी जनाबाईबरोबर आगबोटीने मंगळुरास निघाले. त्यांच्या स्वागतासाठी बंदरावर फार मोठा समुदाय उन्हामध्ये तिष्ठत वाट पाहत जमलेला होता. त्यांचे हे हार्दिक स्वागत पाहून शिंदे ह्यांना गहिवर आला. समाजाचे अध्यक्ष वृद्ध उल्लाळ रघुनाथय्या व सेक्रेटरी के. रंगराव हे होते. त्याशिवाय खजीनदार कृष्णराव गांगुली, कर्नूल सदाशिवराव व आणखी काही सारस्वत घराणी समाजामध्ये होती. बाकीचा मोठा वर्ग बिल्लव ह्या जातीचा होता. ही जात पूर्वी अस्पृश्यवर्गात मोडली जात असे. ब्राह्मसमाजात प्रवेश केल्यानंतर हे सर्व सभासद वरिष्ठवर्गात मोडले जाऊ लागले. ब्रह्मानंद केशवचंद्र सेनच्या अमदानीत प्रतापचंद्र मुझुमदार ह्यांनी मंगळूर येथे ब्राह्मसमाज स्थापण्यात पुढाकार घेतला होता. बिल्लव जातीचे आलसाप्पा नावाचे वजनदार पुढारी होते. त्यांच्या पुढाकाराने सुमारे ५ हजार बिल्लव जातीतील लोक दीक्षा घेण्यास तयार झाले होते.

बापू प्रतापचंद्र मुझुमदार यांचे इंग्रजीतील अमोघ वक्तृत्व आणि प्रेमपूर्ण प्रचार ह्याच्या जोरावर त्यांनी लवकरच वरिष्ठ आणि कनिष्ठवर्गावर छाप बसविली व ब्राह्मसमाजाची स्थापना केली. विठ्ठल रामजी शिंदे व त्यांची बहीण जनाक्का ह्यांना कानडी भाषा येत असल्यामुळे समाजातील मंडळींना त्या दोघांबद्दल फार आपुलकी वाटू लागली. प्रार्थनासमाजाचे उत्साही सेक्रेटरी के. रंगराव ह्यांना अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेबद्दल फार आस्था असल्याने शिंदे ह्यांच्या मुंबईतील मिशनच्या आधीच १९व्या शतकाच्या अखेरीस १८९७ मध्ये अस्पृश्यवर्गाच्या उद्धारासाठी त्यांनी शाळा सुरू केली होती. शिंदे ह्यांचे मिशनचे कार्य समजल्यामुळे के. रंगराव ह्यांना त्यांच्याबद्दल विशेष आस्था वाटली. त्यांनी शिंदेंना मंगळूर येथे बोलावून घेतले. के. रंगराव अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठी एकटेच झटत होते. शिंदे ह्यांनी त्या कामी त्यांना साहाय्य केले. शिंदे ह्यांनी त्या कामी पुनर्घटना केली. गावातील ५ प्रमुख पुढा-यांची एक कमिटी नेमली. ती के. रंगराव ह्यांच्या जोडीला दिली आणि अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची ही मंगळूर शाखा म्हणून तिच्याशी संलग्न केली. पुढे त्या संस्थेची झपाट्याने वाढ झाली.

ब्राह्म झालेल्या, शहरात राहणा-या बिल्लव जातीच्या लोकांच्या परिस्थितीमध्ये फरक पडला होता, तरी जंगलामध्ये राहणारे बिल्लव अद्यापि रानटी अवस्थेतच होते. ह्या लोकांचे निरीक्षण करण्यासाठी शिंदे ह्यांनी सफर केली व बिल्लव जातीच्या स्थितीचे निरीक्षण केले. मोठमोठ्या जमिनीवर हे लोक वंशपरंपरागत कुळे म्हणून खपतात. त्यांची स्थिती जवळ जवळ जनावरासारखी झाली आहे असे त्यांच्या ध्यानात आले. ह्या लोकांची मुले दिवसभर कुठेतरी झाडावरील चिंचा, बोरे व झाडपाला खाऊन पोट भरीत रात्री थोडीश कांजी मिळाल्यास ती चाटून चाटून खात. अशा लोकांची सुधारणा करावी, ह्या हेतूने के. रंगराव ह्यांनी मिशन काढले ते अगदी स्वाभाविकच होते. मंगळूर येथील प्रेमळ वातावरणात अण्णासाहेब शिंदे व त्यांची बहीण जनाक्का ह्यांनी एक महिना काढला व समाजाची आपल्या परीने सेवा केली.

विलायतेतून आल्याबरोबर कोल्हापूर येथे शिंदे ह्यांनी धर्मप्रचाराच्या कार्याला सुरुवात केली होती. कोल्हापूरबद्दल त्यांच्या मनाला विशेष जवळीक वाटत होती. कारण त्यांचे मित्र गोविंदराव सासने हे कोल्हापूरचे. विलायतेस जाण्याआधीही ते त्यांच्याकडे जात असत. केळवकरांशीही त्यांचा स्नेहभाव जुळला होता. कृष्णाबाई केळवकर ह्या प्रार्थनासमाजाच्या सभासद झालेल्या होत्या. इंग्लंडमधील वास्तव्यात १९०२ साली कृष्णाबाईंची त्यांची भेट झाली होती व त्यांना मिळालेले राजा राममोहन रॉय ह्यांचे केस कृष्णाबाईंच्या बरोबर कलकत्त्याच्या ब्राह्मसमाजाकडे पाठविण्यासाठी दिले होते.५ श्रीमंत शाहू छत्रपती ह्यांच्याशीही त्यांचा लोभ जडला होता. शाहूमहाराजांकडून विलायतेस जाण्यासाठी त्यांना ३००/- रुपये मदत मिळाली होती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये प्रार्थनासमाजाची स्थापना करावी व समाजाचे कार्य तेथे चालू राहावे असे शिंदे ह्यांना वाटणे स्वाभाविकच होते. शाहूमहाराजांचीही ह्या कामी अनुकूलता दिसून आली. आर्यसमाजाला त्यांनी भरपूर साहाय्य केले होते व आपल्या समाजकार्यात प्रार्थनासमाजाचाही प्रयोग त्यांना करून पाहावयाचा होता. म्हणून त्यांनी प्रार्थनासमाजाचे काही प्रसिद्ध पुढारी घेऊन कोल्हापुरास येऊन प्रचारकार्य करावे अशी शिंदे ह्यांना सूचना केली होती. त्यानुसार सिंधचे प्रोफेसर टी. एन्. वासवानी, भक्त डॉ. रुबेन, कलकत्त्याचे प्रमथलाल सेन व मुंबईचे प्रसिद्ध प्रो. वेलिनकर ह्या चौघांना घेऊन १९०९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात शिंदे कोल्हापुरास गेले. तेथील गणपत कृष्णाजी कदम वकील ह्यांचे प्रार्थनासमाजाकडे लक्ष लागले होते. राजाराम कॉलेजातील दिवाणखान्यात प्रो. वासवानी व वेलिनकर ह्यांची व्याख्याने, बाबू प्रमथलाल सेन ह्यांची उपासना आणि शिंदे ह्यांचे हरिकीर्तन वगैरे कार्यक्रम झाले. डॉ. रुबेन ह्यांच्या एकतारी भजनाने सर्वसामान्यांना आकृष्ट केले.

श्री. कदम ह्यांनी बळवंत कृष्णाजी पिसाळ ह्या तरुण गृहस्थाला बरोबर घेऊन प्रार्थनासमाजाच्या कार्याला हळूहळू सुरुवात केली. बॅरिस्टर खंडेराव बागल, डॉ. कृष्णाबाई केळवकर, गोविंदराव सासने ह्या मंडळींचे त्यांना ह्या कामास प्रोत्साहन मिळाले.

पुढे १९११ सालच्या मे महिन्यात शिंदे हे पुण्याचे गणपतराव कोटकर, गणपतराव आंजर्लेकर वगैरे मंडळींसह पुन्हा कोल्हापुरास गेले. कोल्हापूर प्रार्थनासमाजाच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. सरकारातून योग्य ती मदत प्रार्थनासमाजास मिळाली. ह्या मुक्कामात करवीर मठाचे जुने शंकराचार्य ह्यांनी शिंदे ह्यांचे हरिकीर्तन आपल्या मठात करविले. शंकराचार्य स्वतः श्रवणास उपस्थित होते. शिंदे ह्यांचे हरिकीर्तन त्यांच्या पसंतीस उतरले. त्यांनी नारळ आणि धोतरजोडी देऊन शिंदे ह्यांची संभावना केली बॅ. बागल व त्यांचे नातेवाईक बाबासाहेब सावंत वकील ह्यांच्या घरी कौटुंबिक उपासना झाल्या. डॉ. कृष्णाबाई केळवकर ह्यांच्या पुढाकाराने गावाबाहेरील एका सृष्टिसौंदर्याच्या ठिकाणी वनोपासना झाली. पिसाळ ह्यांनी विश्वबंधू नावाचे साप्ताहिक काही वर्षे चालविले व पोस्टल मिशनचेही काम त्यांनी केले.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, ४ सप्टेंबर १९०४.
२.    तत्रैव, १० एप्रिल १९०४.
३.    तत्रैव, २१ मे १९०५ व २८ मे १९०५.
४.    तत्रैव, ७ मे १९०५.
५.    (i) वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १३७.
      (ii) डॉ. सरोजिनी वैद्य यांचा पत्रसंग्रह.
शिंदे यांनी इंग्लंडमध्ये असताना ब्रिस्टल येथे जाऊन राजा राममोहन रॉय यांच्या तेथे असलेल्या समाधीचे भक्तिभावपूर्वक दर्शन घेतले. रॉयना आपल्या लहानपणी पाहिलेल्या मिस कॅसल या वृद्ध बाईने शिंदे यांना रॉयचे केस असलेले लॉकेट भेट दिले. ते त्यांनी डॉ. कृष्णाबाईची तेथे भेट झाली असताना त्यांजजवळ दिले. डॉ. कृष्णाबाईंनी या संदर्भात ७ फेब्रुवारी १९५७ रोजी मुंबई प्रार्थनासमाजाचे श्री. ग. ल. चंदावरकर यांना पत्र पाठविले व नंतर ते लॉकेटही त्यांच्याकडे पाठविले. सध्या ते पत्र व लॉकेट डॉ. सरोजिनी वैद्य यांच्या संग्रही आहे.

विचारविश्व

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विचारवंत, लेखक आणि संशोधक म्हणून जे लेखनकार्य केले, त्याचा सांगोपांग परामर्ष घेणे विस्तारभयामुळे शक्य होणार नाही, मात्र त्यांच्या जीवनचरित्रग्रंथास परिपूर्णता येण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले वैचारिक स्वरुपाचे लेखन,ललित स्वरुपाच्या साहित्याची निर्मिती व संशोधनकार्य यांचा साररुपाने का होईना परिचय करुन देणे आवश्यक वाटते.


महर्षी शिंदे यांचे जीवन प्राधान्याने कृतिरुप होते. धर्मप्रसारकार्य व त्यातूनच उद्भूत होणारे विविध प्रकारचे सामाजिक कार्य, राजकीय चळवळी आणि सांस्कृतिक उपक्रम यांमध्ये भाग घेण्यात त्यांच्या आयुष्याचा बहुतेक काळ गेला. मुंबई प्रार्थनासमाजाचे १९०३ साली ते प्रचारक झाल्यापासून १९२३ सालापर्यंत मिशनच्या कामाच्या जबाबदारीपर्यंत ते अखंडपणे कार्यव्यापृत राहिले. त्यानंतरच्या काळात त्यांनी राजकारणात भाग घेतला. शेतकरी चळवळीला तसेच संस्थानी प्रजापरिषदेला मार्गदर्शन करण्याच्या कामी ते सहभागी होत होते. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य असो, की धर्मप्रसाराचे कार्य असो, त्यामधून संपूर्णपणे निवृत्ती ही त्यांना शक्यच नव्हती. म्हणून या विविध प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कामामध्ये ते अखंडपणे गुंतून राहिले होते. मात्र शिंदे यांचा ह्या कामाकडे जसा ओढा होता, तसाच सामाजिक प्रश्नसंबंधी चिंतन करण्याकडे, संशोधन करण्याकडेही त्यांचा ओढा होता. धर्म आणि धर्माचे तत्त्वज्ञान या विषयात तर त्यांना आंतरिक स्वरुपाची आस्था वाटत होती. त्यांच्या ठिकाणी असणा-या स्वाभाविक रसिकतेमुळे साहित्यकडेही त्यांचा ओढा होता. मात्र सदैव कोणत्या ना कोणत्यातरी धार्मिक, सामाजिक वा राजकीय कार्यात ते गुंतलेले असल्यामुळे संशोधन वा साहित्यानिर्मिती यांकडे त्यांना जितके लक्ष देणे आवडले असते तेवढे देता आले नाही. असे असूनही विविध प्रकारच्या कार्याच्या अखंड धावपळीतसुद्धा त्यांनी जे वैचारिक स्वरुपाने ललित स्वरुपाचे व संशोधनात्मक वाड्मय निर्माण केले आहे ते उपेक्षणीय तर नाहीच उलट गुणवत्तेच्या आणि व्याप्तीच्या दृष्टीने भरघोस म्हणता येईल असे आहे. सुमारे ती हजार पृष्ठे भरतील एवढे लेखन त्यांच्या हातून झाले आहे.


ह्या प्रकरणामध्ये त्यांच्या वैचारिक स्वरुपाच्या लेखनाचा तर पुढील प्रकरणात त्यांच्या ललित स्वरुपाच्या व संशोधनपर लेखनाचा आपण परिचय करुन घेऊ.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या एकंदर लेखनापैकी त्यांच्या वैचारिक वाड्मयाची व्याप्ती पुष्कळच मोठी आहे. मराठी साहित्यिकांमध्ये लेखक म्हणून शिंदे यांचा वेगळेपणा अनेक बाबतीत जाणवतो. ते केवळ पेशाने लेखन असणा-यापैकी एक नव्हते. ते मूलत: एक धर्मपुरुष होते. धर्म हा त्यांच्या जीवनाचा गाभा होता आणि धर्मप्रेरणा ही त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा होती मात्र याचा अर्थ असा नव्हे की ते व्यक्तिगत पातळीवर स्वत:ची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी एकांतात धर्मसाधना करणारे पुरुष होते. धार्मिक जीवन आणि ऐहिक जीवन अशी फारकत त्यांच्या धर्मविषयक धारणेत नव्हती. धर्मसाधना करणे, धर्मप्रचार करणे आणि समाजाची धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक उन्नती करणे या गोष्टी त्यांच्या धर्मविचारामध्ये एकरुप झालेल्या होत्या. त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणेला आणि त्यांच्या राजकारणातील सहभागाला अधिष्ठान होते ते त्यांच्या उन्नत अशा धर्मविचाराचे. या कारणाने त्यांची धार्मिक भूमिका, त्यांचे जीवन आणि त्यांनी केलेले सामाजिक-राजकीय स्वरुपाचे कार्य यांमध्ये पूर्णतया सुसंगती दिसून येते. त्यांच्या जीवितात या सा-याचा एकमेळ झालेला आहे असे प्रत्ययाला येते. या कारणाने समकालीन लेखकांनी मांडलेले धर्मविषयक तसेच सामाजिक, राजकीय स्वरुपाचे विचार यांच्यापेक्षा शिंदे यांचे विचार वेगळे आहेत, मूलगामी स्वरुपाचे आहेत असे जाणवते.


शिंदे यांच्या वैचारिक स्वरुपाच्या लेखनामध्ये त्यांनी केलेला धर्मविचार, अस्पृश्यतेसंबंधी सामाजिक अंगाने केलेला विचार, शेतक-यांच्या समस्येबद्दल मांडलेले विचार, त्याचप्रमाणे स्त्रियांचा प्रश्न, जातीयतेचा प्रश्न आणि शिक्षण या संबंधी केलेले वैचारिक स्वरुपाचे लेखन यांचा समावेश होतो.


ईश्वर व धर्मकल्पना

प्रथमतः आपण शिंदे यांच्या ईश्वर व धर्मविषयक विचारांचे स्वरुप ध्यानात घेऊ. लहानपणी घरातच त्यांच्यावर वारकरी ऊर्फ भागवत संप्रदायातील विचारांचे संस्कार झाले होते. विषमतेवर आधारलेल्या जातिजमातींमधील श्रेष्ठ-कनिष्ठभावाचा निषेध करणारा आणि निरर्थक कर्मकांड त्याज्य मानून नैतिक पातळीवर सदाचरणाला महत्त्व देणार असा हा धर्मपंथ.


शिंदे यांच्या घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे उदार स्वरुपाचे होते. वारकरी संप्रदायाला पहिला धार्मिक संस्कार शिंदे यांच्या धर्मविषयक विचाराच्या घडणीत प्रभावी ठरला. १८९२ मध्ये ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकावयास गेले असता मिल्, स्पेन्सर आणि आगरकर यांच्या नास्तिक्यवादी विचाराकडे ते काही काळ आकृष्ट झाले. परंतु नास्तिकपणाच्या वाळवंटात आपल्या मनाची तहान भागणे शक्य नाही हे त्यांना जाणवले. प्रो. मॅक्समुल्लरच्या धर्मविषयक वाड्मयाचे वाचन केल्यामुळे आणि मुळातील वारकरी संप्रदायाच्या बळकट प्रभावामुळे, काही काळ त्यांच्या मनावर पडलेले नास्तिकवादाचे पटल दूर झाले. १८९५ मध्ये रेव्ह. जी. टी संडरलॅंड या अमेरिकन युनिटेरियन धर्मनिष्ठाने व्याख्यान ऐकून व त्यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर युरोपातील युनिटेरियन या उदार धर्ममताचा त्यांना परिचय घडला. वैचारिकदृष्ट्या वारकरी संप्रदायाशी व युनिटेरियन धर्मप्रणालीशी जुळणा-या प्रार्थनासमाजाकडे ते आकृष्ट झाले. प्रार्थनासमाजातील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर, का.बा. मराठे इत्यादी वडीलधा-या मडळींच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. एकनाथ, तुकारामादी संतांच्या वचनांच्या आधारे रानडे, भांडारकर करीत असलेले प्रतिपादन त्यांच्या मनाला भावले व उदार धर्माचे स्वरुप त्यांना अधिक सुस्पष्ट होत गेले.


इंग्लंडमध्ये मॅचेस्टर कॉलेजात त्यांनी विविध धर्मांचा ऐतिहासिक भूमिकेतून तुलनात्मक दृष्टीने व्यासंग केल्यामुळे सर्व धर्मांतील मूळ तत्त्वांचे उदार स्वरुप स्वाभाविकपणे त्यांच्या ध्यानात आले. तसेच हेगेल, कांट, बर्गसाँ यांच्या तत्त्वज्ञानाचे त्यांनी परिशीलन केले. स्पेन्सरच्या तत्त्वज्ञानातील उत्क्रांतिवाद त्यांच्या मनाला भावला होता, तरी त्याचा अपुरेपणाही त्यांना जाणवत होता. बर्गसाँच्या 'क्रिएटिव्ह इव्होल्यूशन'मधील विचाराने ही उणीव भरुन काढली व स्पेन्सरच्या जडवादी यांत्रिक स्वरुपाच्या उत्क्रांतिवादाऐवजी बर्गसाँच्या निर्माणक (क्रिएटिव्ह) विकासवादाचा प्रभाव त्यांच्यावर विशेषत्वाने पडला. विवेचकबुद्धी(रीझन) ही समग्र आकलन करण्याच्या बाबतीत अपुरी पडते, तिच्यापलीकडे जाऊन भावना (इमोशन्स) आणि उपजतबुद्धी (इन्सिंटक्ट) यांचे महत्व मानणे आवश्यक आहे अशी त्यांची धारणा झाली. एकंदरीत धर्माचाच नव्हे, तर जीवनाच्या सगळ्याच अंगांचा विचार करता विवेचकबुद्धीच्या पलीकडे जाऊन भावनेला महत्त्व देणे योग्य होय अशी त्यांची धारणा होती.


ऑक्सफर्ड येथे ते अध्ययनाला गेले तेव्हापासून त्यांच्या धर्मविषयक लेखनाला प्रारंभ झाला. आयुष्याच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते, म्हणून आयुष्यभर ते धर्मचिंतन करीत राहिले, धर्मप्रसार करीत राहिले. धर्मविषयक लेखन हा त्यांच्या धर्मप्रसारक कार्याचा भाग होता. प्रार्थनासमाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेसाठी त्यांनी इंग्लंडहून लिहून पाठविलेले लेख, नंतर भारतात आल्यावर प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद पत्करल्यानंतर त्यांनी वेळोवेळी दिलेली व्याख्याने, कौटुंबिक उपासनेच्या वेळी तसेच सार्वजनिक नित्य आणि नैमित्तिक उपासनेच्या वेळी केलेले उपदेश असे एकंदर शहाऐंशी लेख समाविष्ट करुन बी. बी. केसकर यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश हे पुस्तक १९९२ साली प्रसिद्ध केले. नंतरच्या काळातही त्यांचे या प्रकारचे विपुल धर्मविषयक लेखन वेळोवेळी प्रसिद्ध झाले असून एकंदरीत त्यांचे धर्मपर सर्व लेखन धर्म, जीवन व तत्त्वज्ञान या पुस्तकामध्ये एकत्रित केले आहे.


शिंदे यांच्यावर ऐतिहासिक विचारपद्धतीचा मोठाच प्रभाव पडला होता. धर्माचा आणि ईश्वराचा तात्त्विक विचार ते या भूमिकेतून करतात असे दिसून येते. मात्र ईश्वराचे तात्त्विक स्वरुप ते केवळ बौद्धिक पातळीवर समजून घेतात व प्रतिपादन करतात असे नव्हे. ते त्यांनी स्वत:च्या प्रेरणाबळाने व भावनाबळाने अनुभवले आहे, आत्मसात केले आहे असेच आपल्या प्रत्ययाला येते. अशा प्रकारे आत्मसात केलेल्या ईश्वरकल्पनेनुसार, धर्मकल्पनेनुसार ते आपले आयुष्य जगत राहिले. भले मग त्यांना कितीही यातना झालेल्या असोतl; त्यांचा ईश्वरी तत्त्वावर व ख-याखु-या धर्मावर विश्वास असल्यामुळे ते त्यांना शक्य झाले असावे असे दिसते.


मानववंशशास्त्र तसेच तुलनात्मक धर्मशास्त्र यांची ईश्वरविषयक विचार करण्याची दिशा शिंदे यांना मान्य आहे. "ईश्वर हा कोणी शरीरविशिष्ट व्यक्ती नसून सर्वव्यापी शुद्ध चैतन्य आहे; तो भोगायतन नसून केवल गुणाश्रय आहे. मनुष्यही स्वतः गुणाश्रय आहे, परंतु त्याच्या गुणाला शरीराची अपेक्षा आहे तेव्हा या त्यांच्या दोषामुळे तो कितीही ज्ञानी झाला तरी तो आपला स्वतःचा देहभाव सूक्ष्म मानाने नकळत का होईना, ईश्वरावर आरोपितोच. तो देहभाव (अँथ्रॉपॉमॉर्फिझम) पूर्ण नाहीसा करुन ईश्वर हा केवळ गुणाश्रय आहे, असे जाणणे ही त्याविषयी सम्यक भावना होय. म्हणजे ईश्वर आमच्यासारखा सुखी किंवा दुःखी नसून केवळ सुखस्वरुपच आहे, आमच्याप्रमाणे दयाळू किंवा निर्दय नसून दयेचा प्रेरक आहे, आमच्यासारखा प्रेमी किवा द्वेषी नसून प्रेमाचा प्रवर्तक आहे, हे आम्ही उत्तरोत्तर अधिक जाणिले पाहिेज."


गुण आणि दुर्गुण असे विरोधात्म द्वैत मानवी जीवनव्यवहारात दिसत असता ईश्वर मात्र चांगल्या गुणाला कारण आणि मनुष्य मात्र वाईटाला कारण असे म्हणणे म्हणजे ईश्वरावर ही मोठी मेहेरबानी करु पाहणे होय, असे सांगून ते या विरोधात्म मानल्या गेलेल्या चांगल्य-वाईट गुणांची वेगळी संगती लावतात. ते सांगतत, "मनुष्य प्रेमामुळे दुस-यावर उपकार करतो व लोभामुळे दुस-याला अपकार असतो असे दिसते, पण प्रेम आणि लोभ हे परस्परविरोधी पदार्थ नाहीत, तर उत्क्रांतीच्या निरनिराळ्या पायरीवरचे गुण असून दोन्ही सत्कार्याची साधनेच आहेत. प्राणिमात्रांनी आत्मसंरक्षण करावे, यासाठी ईश्वर लोभाचा प्रवर्तक होतो; आत्मसंरक्षणाचे खालचे कार्य चांगले स्थापित झाल्यावर त्याहून उच्च दर्जाचे जे परहितपोषण-उत्क्रांतीचे कार्य-त्यासाठी प्रेमाचा प्रवर्तक ईश्वरच होतो. आपण मात्र वरच्या पायरीवर पोहोचूनही वरच्या प्रेरणांना न जुमानता खालच्या प्रेरणांना वश झालो, तर आपल्याला दिलेल्या स्वतंत्रतेचा आपण दुरुपयोग केला असे होते. ईश्वर दुर्गुणांचा प्रवर्तक होत नाही. कारण दुर्गुण असा कोणताच नाही. याचप्रमाणे शौर्य आणि भीती, सहिष्णूता आणि क्रोध, जितेंद्रियता आणि काम, या सर्व गुणांचे प्रयोजन समजावे."


अशा सत्त्वप्रेरक ईश्वराचा आणि आपला संबंध जडतो कसा? तो बुद्धीपेक्षा विश्वासाच्या द्वारे अधिक जडतो अशी शिंदे यांची धारणा होती. बुद्धी आणि विश्वास यांचे स्वरुप सांगताना ते म्हणतात, " बुद्धी म्हणजे पुष्कळ प्रयत्नानंतर पुष्कळ सामग्रीच्या साहाय्याने अल्पज्ञान करुन देणारी शक्ती आणि विश्वास म्हणजे काहीच प्रयत्न न करता अल्पशा सामग्रीने पुष्कळसे ज्ञान प्राप्त करुन देणारी शक्ती. माणसामध्ये विश्वास म्हणून अधिक मोलाची आणि नवलाची शक्ती आहे. विश्वामध्ये सत्त्वाचा, शुभाचा आणि मांगल्याचा प्रसार करणारी ईश्वर ही शक्ती भरली आहे हे ज्ञान प्राचीन काळापासून कमी-अधिक मानाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे अवगत झाले आहेच. "थोडा कोठे एक विशेष प्रकारचा अंगस्पर्श होतो न होतो तोच नूतन बालकाचा आईवर केवढा दृढ आणि कायमचा विश्वास बसतो ! थोडी खुणेला खूण पटली की तरणी आपल्या माहेरचा सर्व वारसा सोडून देऊन परक्या तरुणावर आपल्या सर्व आयुष्याचा भार टाकते. ही विश्वासाची जादू होय. 'आकारैरिंगितैर्गत्या गृह्मतेsन्तर्गतं मनः' मनुष्याचा आतला मतलब समजण्याला आकार, हावभाव, बसणे, उठणे इत्यादीवरुन सहज उपजणारा विश्वास हा कारण होतो. येथे तर्काची प्रमाणे पंगू पडतात आणि मनुष्याप्रमाणेच अखिल विश्वाचा मतलब समजण्यालाही बुद्धीच्या कृत्रिम खटपटीपेक्षा उपजत विश्वासच कामाला येतो."


विश्वामध्ये सत्त्वाचा प्रवर्तक ईश्वर आहे असे केवळ अस्तित्वबोधक ज्ञान बुद्धीच्याही द्वारे मिळू शकते. मात्र सत्याचा आग्रह धरुन राहायला हे आयते ज्ञान उपयोगी पडत नाही, भाग पाडीत नाही किवा त्यांना धीरही देत नाही. तेथे विश्वासाची आवश्यकता असते असे ते आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात. "ईश्वर सत्त्वप्रवर्तक आहे असे नुसते मत असून चालत नाही तर तो सत्त्वाचा आणि शुभाचा प्रवर्तक आहे म्हणून मी सत्याचा आग्रह धरुन राहिलो तर माझे कितीही हाल झाले तरी माझी किवा कुणाचीही हानी मुळीच होणार नाही असा विश्वास पाहिजे आहे. अशा विश्वासामुळेच ईश्वराचा व आपला खरा किंवा निकट संबंध जडतो. बुद्धीचे जडत नाही."


आपल्या आत्म्याचा विकास करणे म्हणजे मीपणाचा सर्वस्वी नायनाट करणे नव्हे तर मीपणाला अमर्याद विस्तार करणे होय. त्याला कुटुंबाची, राष्ट्राचीसुद्धा मर्यादा पडणे संकुचितपणाचे ठरते, असे त्यांचे मत आहे. अहंकाराचा परीघ अमर्याद करणारा जो पुरुष असतो त्याला अवतार म्हणणेच योग्य. सर्वसामान्य माणसाचा हे कसे शक्य होणार, ही शंका शिंदे यांना रास्त वाटत नाही. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असणा-या आध्यात्मिक क्षमतेवर त्यांचा विश्वास आहे व प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. ते म्हणतात, "जी काय आमच्यात आत्मकला अंशभूत आहे; इच्छाशक्ती, बाहुबल, एक एक पाऊल स्वतः पुढे टाकण्याची शक्ती आहे; ती जाऊन, अवतारी व्यक्तीच्या विद्युदाकर्षणाने एकदम फार कामे होणार असतील, तर तो अवतार नको, व ती कामेही नकोत ! विकास विकासच झाला पाहिजे अवतारवादाने प्रदर्शित केलेला एक फार उंच व इतर सर्व अत्यंत नीच, खालावलेले असा विषम भाव मला पसंत पडत नाही. तर सर्वांची सर्व बाजूंनी व तीही स्वतःचे प्रयत्नांनी उन्नती होत जावी," हे शिंदे यांना श्रेयस्कर वाटते.


शिंदे यांनी हिंदू धर्मात सांगितलेल्या चार पुरुषार्थाचा आपल्या भूमिकेतून अर्थ सांगितला असून आत्म्याने परमात्म्याशी ऐक्य कसे साधावायाचे हे स्पष्ट केले आहे. अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी अर्थ हा केवळ साधनीभूत आहे आणि काम व धर्म या पुरुषार्थाचा स्वाभाविक घडणारा परिणाम म्हणजे मोक्ष हा आहे. म्हणजे खरे पुरुषार्थ दोनच राहतात. ते म्हणजे काम आणि धर्म हे होत. "काम म्हणजे विवादित दुष्ट वासना आणि धर्म म्हणजे देवाविषयी आणि परमार्थाविषयी काही गोष्ट," हा संकुचित आणि रुढ अर्थ त्यांना मान्य नाही. काम याचा अर्थ इच्छा किंवा मनाची भूक आणि धर्म याचा अर्थ कर्तव्यबुद्धी असा ते करतात. माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकपणे दोन प्रवृत्ती दिसून येतात. अमुक एक गोष्ट रुचकर आहे, अमुक एक हितकर आहे, अमुक एक सुंदर आहे, ती आपणास पाहिजे अशी इच्छा होणे ही एक प्रवृत्ती. अमुक गोष्ट रुचकर असो वा नसो, सुंदर दिसो वा न दिसो, किबहुना आपल्या स्वत:स हितकर असो वा नसो ती योग्य आहे म्हणून आचरलीच पाहिजे किवा अयोग्य आहे म्हणून टाकलीच पाहिजे अशी आतून प्रेरणा होणे ही दुसरी प्रवृत्ती. पहिलीचे नाव कामना व दुसरीचे नाव कर्तव्यबुद्धी. या दोन्ही प्रवृत्तींना अनुसरुन आत्म्यांना दोन भिन्न पुरुषार्थ साधावयाचे असतात. कामना आणि कर्तव्यबुद्धी वा दोन भिन्न प्रवृत्ती असल्या तरी प्रत्येकीचा विकास परस्परांवर अवलंबून आहे. कर्तव्यजागृतीच्या मुळाशी कामनेचा हव्यास असल्यामुळे जगाचे कल्याण झालेले आहे. संगीत, चित्रलेखन, शिल्प, वाड्मय इत्यादी कलांचा विकास कामनेमुले झालेला आहे. कामना आणि कर्तव्यबुद्धी या दोन्ही पुरुषार्थांचे आचरण करता करता त्यामधील अलगपणा नाहीसा होऊन त्यांची सांगड जुळते आणि कर्तव्यबुद्धी हीच एक कामना आणि कामना हेच एक कर्तव्य असे या दोन्ही पुरुषार्थांचे ऐक्य भासू लागते. असे झाल्यावर तेच एक पूर्णतेचे किंवा मोक्षाचे लक्षण होय, असे शिंदे यांनी प्रतिपादन केले आहे.

माणसाचा अहंकार, त्याची एकदेशीयता नष्ट होऊन अनंतत्वाची प्रचिती येणे, विश्वचैतन्याचा अनुभव येणे यालाच शिंदे ईश्वरी तत्त्वाचा अनुभव येणे, साक्षात्कार होणे असे मानतात. या भूमिकेवरुन ते मरणाचा आणि जीवनाचा तात्त्विक अर्थ लावतात. जीवनात सारभूत असणारी वस्तू प्रेम ही आहे. या प्रेमावीण जीवन जीवनत्वास मुकते आणि मागे केळव अस्तित्व उरते. "आम्ही व इतर आत्मे यांमध्ये असणारे उपाधीचे पडदे बाजूला सारणे म्हणजे प्रेम करणे होय. ईश्वराचे ठिकाणी आम्हा सर्वांचा जो ऐक्यसंबंध आहे व जो या संसारात अनेक अदृष्ट कारणांमुळे तुटलेला असतो तो पुन्हा जोडणे म्हणजे प्रेम होय." या मॅक्समुल्लरच्या वचनाचाही ते आधार घेतात. व्यक्तीच्या जीवनाचा विकास जसजसा अधिक होतो तसतसा व्यक्ती आणि कुटुंब, व्यक्ती आणि जात, व्यक्ती आणि राष्ट्र आणि अखेरीस व्यक्ती आणि विश्व यांमधील पडदा क्रमाक्रमाने गळून पडतो. अशा प्रकारे व्यक्तीची मर्यादा अनंतत्वाप्रत पावल्यावर तिच्या आतापर्यंतच्या मर्यादित जीवनाचा शेवट अगर कळस होऊन तिच्या अमर्याद जीवनास सुरुवात होते. या दृष्टीने मरण म्हणजे मर्यादित अथवा एकदेशीय जीवनाचा अंत अथवा आत्म्याचे पूर्णपणे जागे होणे. या भूमिकेतून ते तुकाराममहाराजांच्या 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' या अंभगाचा अर्थ लावतात. अथवा हा अभंग मनात वागवून वरील विवेचन करतात असेही म्हणता येऊ शकेल.


अशा प्रकारे मनुष्य आणि त्याच्याभोवतीचे मानवी जग, मनुष्य आणि ईश्वर, आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध ते स्पष्ट करतात. या एकत्वाची आणि अनंतत्वाची प्रचिती येणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने ईश्वरी साक्षात्कार होय.

परमेश्वरी साक्षात्काराच्या बाबतीत असणारे गुढतेचे वलय शिंदे यांच्या भूमिकेमध्ये नाही.श्रद्धा आणि भावना यांच्या बळावर या प्रकारचा साक्षात्कार होतो. निसर्गाचे अति भव्य, अति सुंदर स्वरुप पाहिल्यानंतर अथवा एकांतामध्ये चिंतनावस्थेत असताना अंतःकरणातील श्रद्धा अतिशय उत्कट झाल्यानंतर अशा प्रकारचा साक्षात्काराचा अनुभव येऊ शकतो असा शिंदे यांचा स्वतःचाही अनुभव आहे. मॅंचेस्टर कॉलेजातील ग्रंथालयात ते बसले असताना, स्कॉटलंड येथील बेन लोमंड पर्वतावर आसमंत न्याहाळताना त्यांना हा अनुभव आला होता. तसेच इंग्लंडमध्ये असताना प्रो. कार्पेंटर या गुरुकडे वास्तव्य करीत असताना एकदा रात्री भोजनोत्तर ते बॉरोडेल दरीत शतपावलीस गेले होते त्यावळी त्यांना जो अनुभव आला तो या प्रकारचा होता, हे आपण यापूर्वी एका प्रकरणात पाहिले आहेच.


जगातील सर्व प्रमुख धर्माचा अभ्यास ऐतिहासिक व तुलनात्मक दृष्टीने त्यांनी केलेला असल्यामुळे त्यांच्या आकलनाला सखोलपणा व दृष्टिकोणाला व्यापकपणा आलेला होता, हे विविध धर्म अथवा धर्मपंथ यांचे त्यांनी जे आकलन प्रकट केले आहे त्यांमदून आपल्याला जावणते. भारतातील ब्राह्मधर्म म्हणजे पाश्चात्त्य युनिटेरियन धर्ममताची नक्काल नसून हिंदू धर्माची ती स्वाभाविक उत्क्रांती आहे असे मत ते मांडतात, मात्र मागील शतकारंभीच्या हिंदू धर्माचे वास्तव स्वरुप सांगताना हिंदुस्थानात खरे जुलमी साम्राज्य चालू आहे ते आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ यांच्यापैकी कुणाचे नसून रुढीचे आहे, असे त्यांनी प्रतिपादले आहे. हिंदू धर्मातील उन्नत धर्मविचारावर रुढीने कशी मात केली आहे ते त्यांनी नेमकेपणाने सांगितले आहे. शास्त्र, तत्त्वज्ञान, मीमांसा व इतिहास यांनी मानवी विचाराची व शोधाची जी प्रगती केली तिचे फळ युनिटेरियन पंथाच्या उत्क्रांत धर्मविचारात सापडले, म्हणून ते युनिटेरियन समाज म्हणजे सुधारलेल्या पाश्चात्य जगाचे 'प्रबुदध अंतर्याम' (एन्लायटन्ड कॉन्शन्स) होय असे मानतात. भेदापेक्षा अभेद पाहण्याची त्यांची दृष्टी असल्यामुळे ब्राह्मसमाज आणि आर्यसमाज या दोन धर्मपंथांतप्रधान गोष्टींमध्ये कसे साम्य आहे ते दाखवून देतात. "ईश्वर हे सर्वत्र जिवंत, जागृत, व्यापारमय, केवळ चिन्मय तत्त्व आहे म्हणून त्याला अवयवाची जरुरी नाही. आम्हा सर्व जीवांमध्ये जो अहंकारमूलक आत्मा आहे, तोही वस्तू आहे, केवळ भास नव्हे. ईश्वराच्या ठायीच त्याची वसती आणि वाढ आहे. ईश्वराची जी उपासना करावयाची ती बाह्योपचारिक नसावी. त्याच्या उपासनेत कल्याही जड साधनाची गरज नाही. याप्रमाणे एक ईश्वर, सतत विकास पावणारा आत्मा. आध्यात्मिक उपासना इत्यादी धर्माच्या पारमार्थिक तत्त्वासंबंधी ब्राह्म आणि आर्य या दोघांचे साम्यच नव्हे तर ऐक्य आहे." इतकेच नव्हे तर धर्म म्हणजे हे शुद्ध विचार इतके ठरवून स्वस्थ न बसता त्यांच्या पायावरच आपले ऐहिक आचरण करण्याचा दोघांचाही आग्रहपूर्वक यत्न आहे असे ते सांगतात. ब्राह्मसमाज आणि जोतीराव फुल्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज यांचा गाथा एकच आहे, हेही ते दाखवून देतात.


शिंदे यांनी आपल्या आयुष्यात अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व इतर सुधारणेची जी कामे केली ती धर्मभावनेनेच. लौकिक जीवन आणि धार्मिक जीवन यांमध्ये ते एकात्मताच पाहतात. लैकिक व्यवहार करण्याच्या पाठीमागे जर उन्नत भावना असेल तर अशी भावना आणि धर्मभावना या एकच होत. ते लिहितात, "लहानपणी मुलांची खेळाची आवड, तरुणपणी तरुणीसंबंधी उदात्त रस आणि म्हातारपणी एखाद्या ऐहिक बाबतीतीत सात्त्विक चिंतामग्नता या तिन्ही भावनांहून भक्तीची भावना तत्त्वत: अगदी भिन्नच आहे असे म्हणता येणार नाही. ह्या भावनांत जी वयपरत्वे अंत:करणाची परिणती होत जाते तीची किंचित आणकी थोडी जास्त शुद्ध, जास्त व्यापक आणि जास्त जोरदार झाली की, तिला आम्ही भक्ती हे नाव देतो, ज्या सहज आनंदाने मूल खेळते, तरुण रमतो आणि वृद्ध सात्त्विक चिंतेने व्याकूळ होतो तोच आनंद ईश्वराच्या उत्तमोत्तम भक्तीत आहे, हे माझे मत कित्येकांना विपरीत वाटेल. ऐहिक रस आणि पारमार्थिक रस यांना मी एकच माळेत गोवतो." रसिकता, भक्ती आणि प्रेम या गोष्टी त्यांच्या दृष्टीकोन एकरुप आहेत. ते म्हणतात, "माझ्या जीवनात सहज रसिकता ऊर्फ प्रेम ऊर्फ भक्ती ऊर्फ Love- कोणी काही म्हणोत, कोणी निंदोत, कोणी वानोत - प्रत्यक्ष ईश्वरही कृपा करो न करो - माझे प्रेमच मला खरे आणि म्हणूनच मला ते पुरे. त्यांच्या धर्मकल्पनेत निवृत्ती नसून प्रवृत्ती आहे व ते श्रद्धेच्या जोडीनेच निर्लोभ प्रेमाचा समावेश धर्मकल्पनेत करतात. प्रेमाचे स्वरुप सांगतात ते म्हणतात, "प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे, प्रेम म्हणजे जीवन, जीवनाचा कंटाळा नव्हे." समाजसेवेलाही या प्रेमाचेच अधिष्ठान असल्याचे ते सांगतात. त्यांच्या दृष्टीने प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधना होय. द्वा. गो. वैद्यांच्या लेखसंग्रहाला संपादकांनी दिलेल्या 'संसार आणि धर्मसाधन' या नावाला आक्षेप घेतातना ते म्हणतात, "धर्मसाधन म्हणजे काय? पोथी वाचणे, प्रार्थना करणे, स्तब्ध बसणे, तप करणे म्हणजेच धर्मसाधन काय? मुळीच नव्हे ब्राह्मसमाज म्हणतो, प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधन होय. एखादा प्रामाणिक सुतार, हुशार न्हावी, विशेषत: प्रेमळ भंगीदेखील पोटभरू पुरोहितापेक्षा शतपटीने धार्मिक म्हणता येणार नाही काय? असे जर आहे, तर संसार म्हणजेच धर्मसाधन ठरते."


अस्पृश्यताविषयक विचार
अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाचे व अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचे प्रत्यक्ष कार्य करण्याच्या बाबतीत शिंदे जसे अग्रेसर ठरतात त्याप्रमाणे अस्पृश्यताविषयक संशोधन करण्याच्या बाबतीत आणि अस्पृश्यतेचा प्रश्न सामाजिक पातळीवरुन मांडण्याच्या बाबतीतही हे प्रथमारंभीचे विचारवंत ठरतात.


माणसामाणसांत भेद पाळणे हे अमंगळ आहे अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाचा संस्कार त्यांच्या मनावर बालपणीच झाला होता. ज्या प्रार्थनासमाजाचे अथवा ब्राह्मणसमाजाचे ते अनुयायी झाले होते, त्याचे एक तत्त्व हे आहे की, सर्व मनुष्ये परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून भेद न राखता परस्परांशी बंदुभावाने वागावे, विठ्ठल रामजी शिंदे हे ब्राह्मधर्माचे सच्चे अनुयायी होते. म्हणून या तत्त्वाचे पालन केवळ व्यक्तिगत पातळीवरील व्यवहारात करुन त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते. या दुबळ्या आणि पीडितवर्गाच्या उन्नतीसाठी आपण आपले आयुष्य वाहून कार्य करावे अशी त्यांना प्रेरणा झाली व त्याचप्रमाणे आयुष्यभर त्यांनी कार्य केले व त्यानुसार विचार मांडले. त्यांच्या अस्पृश्यताविषयक संशोधनाचा अन्यत्र विचार केला आहे. येथे आपण त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी सामाजिक पातळीवरुन कोणते विचार मांडले हे ध्यानात घेऊ.

अस्पृश्यताविषयक कार्य करती असताना त्यामागे त्यांची जी वैचारिक भूमिका होती तिचाही आपण आवशयक तेथे निर्देश करु. कारण या कार्यामधूनही त्यांची वैचारिकता दिसून येते.


डिसेंबर १९०५ मध्ये सुबोधपत्रिकेतून त्यांनी 'इलेव्हेशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस' या शीर्षकाचा निबंध लिहून तीन भांगात प्रसिद्ध केला. त्यामध्ये सामाजिक पातळीवर अस्पृश्यता मानण्यामुळे या वर्गावर कसा अन्याय होतो याचे वर्णन करुन त्यांची उन्नती करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. १९०६ साली 'इंडियन सोशल रिफॉर्मर'मध्ये 'ए प्ली फॉर दि मिशन फॉर डिप्रेस्ड क्लासेस' या शीर्षकाचा निबंध लिहून त्यामध्ये अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या अडचणी, त्यांची प्रांतवार संख्या, त्यांच्या निवारणार्थ वरिष्ठवर्गाकडून आणि स्वतः त्या लोकांकडून होणारे प्रयत्न यांची प्रथमच पद्धतशीर मांडणी केली. लेखाच्या अखेरीस या अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या उद्धारासाठी नुसती शिक्षणसंस्था, मग ती कितीही मोठ्या प्रमाणावर असो, स्थापून चालवयाचे नाही, तर ज्यामध्ये जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे असे मिशन तयार झाले पाहिजे. अशा मिशनने ख्रिस्ती मिशन-यांप्रमाणे या लोकांच्या जीवितांमध्ये क्रांती घडवून न आणता विकास घडवून आणला पाहिजे, असे प्रतिपादन केले. या भूमिकेनुसारच पुढे त्यांनी ऑक्टोबर १९०६ मध्ये देशी मिशनच्या स्वरुपाची संस्थाही स्थापन केली, हा वृत्तान्त मागील एका प्रकरणात आपण पाहिल आहेच.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे मिशन स्थापन करताना ते एतद्देशीय असावे, ख्रिस्ती मिशनप्रमाणे या लोकांच्या जीवनात क्रांती करण्याची भूमिका न ठेवता या वर्गातील व्यक्तींचा विकास घडवून आणावा ही भूमिका ठेवली. ख्रिस्ती मिशनचा सेवाभाव त्यांना अनुकरणीय वाटत होता व त्याबद्दल त्यांना अशा मिशनबद्दल आदरभावही होता. परंतु बहुधा धर्मांतराच्या मार्गाने ते या लोकांच्या लौकिक स्थितीमध्ये, राहाटीमध्ये एकदम क्रांती घडवून आणू पाहतात. ही मिशन-यांची भूमिका शिंदे यांना योग्य वाटत नव्हती. ख्रिस्ती मिशनच्या धोरणामुळे या वर्गातील काही लोकांच्या स्थितीमध्ये बाह्यात्कारी पालट घडेल,परंतु या मार्गाने त्यांचा खराखुरा सर्वांगीण विकास होणार नाही, अस्पृश्य मानलेल्या समाजामध्ये स्वाभिमानाची व आत्मोन्नतीची जाणीव निर्माण होणार नाही असे शिंदे यांना वाटत होते. या वर्गातील लोकांचा क्रमशः विकास घडवून आणल्यामुळेच त्यांच्यात खरीखुरी सुधारणा होणार आहे अशी त्यांची धारणा झाली होती.


अशी धारणा होण्याला त्यांची पक्की वैचारिक बैठक कारणीभूत होती. त्यांच्या आध्यात्मिक विचारात आणि समाजसुधारणाविषयक विचारात सुसंगती आढळून येते. आध्यात्मिक बाबतीत अवतारवाद त्यांना मान्य नव्हता. त्याचप्रमाणे सामाजिक सुधारणेच्या बाबतीत विभूतिवाद त्यांना मंजूर नव्हता. म्हणूनच क्रांतीपेक्षा ते उत्क्रांतीला महत्त्व देतात.

समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने थॉमस कार्लाइलचा विभूतिवाद आणि हर्बर्ट स्पेन्सचा सामान्य माणसाचा प्रयत्नवाद या दोहोंची तुलनात्मक मीमांसा केल्यानंतर विभूतिवादावरील त्याचा विश्वास कमी होऊन सामान्य माणसाच्या विधायक प्रयत्नाकडे त्यांचा कल झालेला होता. त्यांच्या प्रयत्नवादाला श्रद्धेचे आध्यात्मिक पाठबळ होते. त्यांनी लिहिले आहे, "अस्पृश्यतानिवारणाच्या कामी आधुनिक काळात कोणी विभूती पुढे येत नाहीत आणि मी तर स्वत: अत्यंत सामान्य माणूस. ही वस्तुस्थिती पाहून ती हताश झालो नाही. श्रद्धेने पर्वत हलतात या ख्रिस्तोक्तीची प्रचिती पाहण्याची वेळ आली होती. श्रद्धा, मग ती एखाद्या विभूतीची असो वा सामान्य माणसाची असो, श्रद्धा ती श्रद्धाच ! तिने पर्वतही हलले पाहिजेत."

Read more: विचारविश्व

लेखकाचे मनोगत

आधुनिक महाराष्ट्राची आणि भारताची सामाजिक पुनर्घटना विवेकाच्या आणि न्यायाच्या आधारे करण्याचा प्रयत्न करणा-या मोजक्या विभूतींपैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे होत. ते मूलतः धर्मनिष्ठ पुरुष होते. मात्र उन्नत भूमिकेवरील धर्मकार्य आणि सामाजिक-राजकीय कार्य एकरूपच आहेत, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांच्या जीवनात अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्याला मध्यवर्ती स्थान होते. हे कार्य त्यांनी धर्मकार्य म्हणूनच केले. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हा त्यांचा आयुष्यभराचा ध्यास होता.

महात्मा जोतीबा फुले यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला युगप्रवर्तक प्रारंभ केला. मात्र समकालीन पांढरपेशा समाजाकडून त्यांच्या या कार्याला प्रतिसाद न मिळाल्याने ते खंडित झाले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये माणुसकीला कलंकभूत असणारा अस्पृश्यतेसारखा एक भयंकर प्रश्न अस्तित्वात आहे, याची फारशी कोणाला जाणीव नव्हती. अशा काळात महर्षी शिंदे यांनी अस्पृश्य मानलेल्या वर्गाची उन्नती करण्याचे व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य संस्थात्मक प्रयत्नाच्या द्वारा अखिल भारतीय पातळीवर करण्याचा द्रष्टेपणा आणि कर्तेपणा दाखविला. या कामासाठी त्यांनी अतुलनीय स्वार्थत्याग केला, अविश्रांत परिश्रम घेतले व अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याबद्दल पंचवीसएक वर्षांत भारतभर अपूर्व अशी जागृती केली.

अस्पृश्यतानिवारण कार्याची दोन महान पर्वे आहेत. पहिले पर्व जागृतीचे. त्याचे धुरीण महर्षी शिंदे होत. दुसरे पर्व संघर्षाचे. त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. महर्षी शिंदे यांच्या कार्यामुळे पुढच्या संघर्षपर्वाची स्वाभाविकपणेच पूर्वतयारी झाली.

अशा प्रकारचे असाधारण कार्य करणा-या महर्षी शिंदे यांचे जीवन व कार्य साधार व विस्तृतपणे चित्रित करणारा चरित्रग्रंथ सिद्ध करावा असे मला उत्कटत्वाने वाटले.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी या ग्रंथाच्या संपादनापासून मी महर्षींच्या जीवनकार्याविषयक अभ्यासाकडे वळलो. मी संपादित केलेल्या प्रस्तुत रोजनिशीचे प्रकाशन एप्रिल १९७९ मध्ये पुण्यास मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते, मा. शरदराव पवार हे समारंभाचे मुख्य पाहुणे असताना झाले, हा माझ्या आयुष्यातील अभिमानाचा व संस्मरणीय प्रसंग होय. मा. यशवंतरावजींचा परिचय झाल्यापासून ते मला म. शिंदे यांच्यासंबंधी संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित करून साहाय्य करीत होते, याचा मी कृतज्ञतापूर्वक निर्देश करतो.

महर्षी शिंदे यांच्याबद्दल चाललेल्या माझ्या संशोधनकार्याबद्दल मा. शरदराव पवार यांनीही विशेष आस्था दाखविली. हे संशोधन पूर्ण करून चरित्रलेखन करण्याच्या प्रस्तुत प्रकल्पासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने मला आर्थिक साह्म केले याबद्दल 'प्रतिष्ठान'चे अध्यक्ष मा. शरदराव पवार यांचा मी फार आभारी आहे. तसेच 'प्रतिष्ठान'चे आधीचे कार्याध्यक्ष मा. अण्णासाहेब शिंदे व विद्यमान कार्याध्यक्ष मा. मोहन धारिया यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचाही आभारी आहे.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९०१ ते १९०३ अशी दोन वर्षे धर्मशिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्ड येथे वास्तव केले होते व इंग्लंडमध्ये व अन्य देशांत प्रवास केला होता. त्यासंबंधी माहिती मिळविणे त्यांच्या चरित्रलेखनाच्या दृष्टीने आवश्यक होते. विद्यापीठ अनुदान मंडळाने मला त्यांच्या एका योजनेनुसार इंग्लंडमध्ये जाऊन महर्षी शिंदे यांची चरित्रविषयक साधनसामग्री गोळा करण्यासाठी सहा आठवड्यांची प्रवासवृत्ती मंजूर केली होती. त्यामुळे मी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड, लंडन, एडिंबरो, ब्रिडपोर्ट इत्यादी शहरांतून तसेच युरोपमधील पॅरिस, ऍम्स्टरडॅम, रोम, पाँपी या शहरी जाऊन शिंदे यांच्या चरित्राला अत्यंत उपयुक्त ठरेल, अशा प्रकारची माहिती मिळवू शकलो. विद्यापीठ अनुदान मंडळाने उपलब्ध केलेल्या आर्थिक साह्याबद्दल मी आभारी आहे.

महर्षी शिंदे यांच्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी अनेक गावांतील ग्रंथालयांचा व व्यक्तींचा अतिशय उपयोग झाला. पुणे येथील विद्यापीठाचे बॅरिस्टर जयकर ग्रंथालय, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेचे ग्रंथालय, शासकीय ग्रंथालय, मंगलोर येथील विद्यापीठातील कन्नड विभागातील ग्रंथालय, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील बॅरिस्टर खर्डेकर ग्रंथालय व तेथील धनंजय कीर संग्रह, बडोदा येथील सरकारी दप्तरखाना, मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालय व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, सचिवालय ग्रंथालय, मुंबई तसेच ऑक्सफर्ड, लंडन, एडिंबरो व कॉरिंडेल येथील ग्रंथालयांचा माहिती मिळण्याच्या दृष्टीने मोठा लाभ झाला. मंगलोर विद्यापीठातील कन्नडचे प्राध्यापक डॉ. विवेकराय यांनी कन्नड वृत्तपत्रातील शिंदे यांच्यासंबंधीच्या मजकुराचा शोध घेऊन तो मला इंग्रजीत सांगितला. ऍम्स्टरडॅम येथील तरुण संशोधक व्हॅन ह्यूब वेर्ख यांनी शिंदे यांच्या आंतरराष्ट्रीय युनिटेरियन जागतिक परिषदेत केलेल्या भाषणासंबंधीचा डच वृत्तपत्रात आलेला वृत्तान्त माझ्यासाठी इंग्रजीमध्ये यथातथ्य स्वरूपात करून दिला. मँचेस्टर कॉलेजच्या ग्रंथपाल मिसेस् बार्बरा स्मिथ यांचेही फार साह्म झाले. त्याशिवाय पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमधील प्रा. डॉ. आर. एस. देशपांडे, मुंबईतील सचिवालय ग्रंथालयाचे श्री. दि. श्री. चव्हाण, लंडन विद्यापीठातील डॉ. इअन रेसाइड, पॅरिस येथील डॉ. पियर लॅशियर यांनी विशेष साहाय्य केले. मी या सर्व ग्रंथालयांतील पदाधिका-यांचा व वर नमूद केलेल्या व्यक्तींचा विशेष आभारी आहे.

प्रस्तुत चरित्रलेखनासाठी आवश्यक ती माहिती मिळविण्यासाठी अनेक व्यक्तींचे मला साहाय्य झाले. महर्षी शिंदे यांच्या कुटुंबीयांपैकी महर्षींचे चिरंजीव श्री. प्रतापराव शिंदे व महर्षींच्या सूनबाई सौ. लक्ष्मीबाई शिंदे यांनी मोठ्या विश्वासाने महर्षी शिंदे यांच्या संग्रही असलेली साहित्यसामग्री माझ्या स्वाधीन केली. श्री. प्रतापरावांचे चिरंजीव श्री. अशोक, दिलीप व शंतनू शिंदे व कन्या सौ. सुजाता ह्यांनी प्रस्तुत लेखनाच्या कामी सदैव आस्था दाखवून साहाय्य केले व उत्तेजन दिले. महर्षी शिंदे कुटुंबीयांचा मी अत्यंत ऋणी आहे.

महर्षी शिंदे यांच्या प्रत्यक्ष सहवासात आलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांच्याबद्दलची पुष्कळशी महत्त्वाची माहिती मिळविणे शक्य झाले. श्री. रा. ना. चव्हाण, वाई; रा. कृ. बाबर, वाई; ए. के. घोरपडे, पुणे; भाई ए. के. भोसले, सोलापूर; श्री. भाऊराव देशपांडे, तेरदाळ; श्री. नरहर के. कानिटकर व म. म. दत्तो वामन पोतदार, पुणे यांच्या भेटी व मुलाखती घेता आल्या. श्रीमती लक्ष्मीबाई शिंदे व शकुंतलाबाई जमदग्नी यांनी महर्षी शिंदे यांच्याबद्दलच्या आठवणी लिहून मला उपलब्ध करून दिल्या. ह्या सर्व व्यक्तींचा मी आभारी आहे.  

मजबद्दल लोभ असणारे श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. कृ. भ. पवार आणि ज्येष्ठ मित्र प्रा. गंगाधर गाडगीळ यांनी प्रस्तुत चरित्रग्रंथाच्या पूर्ततेसंबंधी वारंवार आस्था दाखविली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

माझे मित्र डॉ. चंद्रशेखर जहागिरदार, डॉ. नागनाथ कोतापल्ले, श्री. सदा डुंबरे, श्री. अनंत दिक्षित आणि डॉ. विलास खोले यांनी प्रस्तुत चरित्रग्रंथाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे साह्म केले हे मी मोठ्या आनंदाने नमूद करतो.

या ग्रंथाची सुवाच्य प्रत तयार करण्याचे काम माझे विद्यार्थी डॉ. विजया वाडकर व प्रा. रणधीर शिंदे यांनी मोठ्या आत्मीयतेने केले याचाही मी आवर्जून उल्लेख करतो.

प्रस्तुत चरित्रग्रंथाला प्रा. राम बापट यांची प्रस्तावना लाभावी असे मला वाटले व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननेही त्यांना तशी विनंती केली; व ती त्यांनी मान्य केली. त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याचा मला फारच उपयोग झाला. त्यांच्या व्यासंगपूर्ण व विचारप्रवर्तक प्रस्तावनेमुळे प्रस्तुत चरित्रग्रंथाचे मोल निश्चितच वाढले आहे. मी प्रा. राम बापट यांचा फार आभारी आहे.

'लोकवाङ्मय गृहा'चे श्री. प्रकाश विश्वासराव यांनी प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशन करण्याचे मान्य करून आपल्या लौकिकाला शोभेल अशा देखण्या स्वरूपात त्याची निर्मिती केली, याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.

गो. मा. पवार
मुदिता,
१० अ, भगवंत हा. सोसायटी,
विजापूर रस्ता, सोलापूर – ४१३ ००४

  1. लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरियन परिषद
  2. राष्ट्रीय प्रवाहात मराठा समाज
  3. येरवड्याच्या तुरुंगात
  4. मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
  • 108
  • 109
  • 110
  • 111
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117
Page 113 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी