1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

महर्षी शिंदे यांचे फोटो व काही हस्तलिखीते

-  महर्षी शिंदे यांच्या परिवारातील काही फोटो (पाहण्यासाठी इथे क्लीक करा) 

- मोडी हस्ताक्षरातील छत्रपती शाहू महाराजांना लिहीलेले पत्र   (पाहण्यासाठी इथे क्लीक करा)

 

- मराठी हस्ताक्षरातील कागद (पाहण्यासाठी इथे क्लीक करा)

 

- इंग्रजी हस्ताक्षरातील कागद (पाहण्यासाठी इथे क्लीक करा)

मनोगते

“मला राहून राहून एका गोष्टीविषयी दु:ख होते. अस्पृश्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला हात घातला रा. विठ्ठ्लरावांनी. त्या कामी कमालीचा स्वार्थत्याग करून त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी देशभर जागृती घडवून आणली. ह्या प्रश्नाला राष्ट्राची मान्यता मिळण्याचे श्रमही त्यांचेच. पण अलीकडे अस्पृश्यांच्या उन्नतीच्या प्रश्नाचा जेव्हा जेव्हा उल्लेख करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ज्यांनी ह्या बाबतीत केवळ वाचिक कार्य केले आहे अशांनाच जागृतीचे श्रेय अर्पण करण्यात येते व भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी व विठ्ठ्ल रामजी शिंदे ह्यांच्यावर पद्धतशीर बहिष्कार घालून त्यांचा चुकूनही नामनिर्देश केला जात नाही. अशा संघटित बहिष्काराने सत्याचा अपलाप होतो.”

वामन सदाशिव सोहोनी
आत्मनिवेदन
मुंबई - १९४०

 

“विठ्ठ्ल रामजी शिंदे हे माझ्या चार गुरूंपैकी एक होते. माझ्या जन्मदात्यानंतर मी त्यांनाच मानतो. त्यांच्या पायांशीच मी सार्वजनिक कार्याचे धडे घेतले. माझ्यापेक्षा ते वयाने लहान असले तरी राष्ट्रहितासाठी करावयाच्या चळवळीबाबतच्या अभ्यासात त्यांची फार मोठी प्रगती होती. ही गोष्ट सर्वज्ञात आहे की, मुंबईकडे प्रांताकडील अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे ते जनक होत. पंजाब व उत्तरप्रदेश सोडला तर सर्व भारतातील या प्रकरणाच्या कार्याचा प्रारंभ करणारे ते पहिले पुरूष व या कार्याचे अग्रदूत होते.”

अमृतलाल व्ही. ठक्कर उर्फ ठक्करबाप्पा
इंडियन सोशल रिफॉर्मर
८ एप्रिल १९४४

 

“स्वार्थावर लाथ मारून गळ्यात झोळी अडकवून संस्थेकरता- अर्थात् आमच्या लोकांकरिता- संस्थेचे जे चालक भिक्षांदेही करीत दारोदार फिरतात व त्यांना त्यात कितीही अल्प यश आले तरी ते पर्वा न करता चंदनासारखे स्वत: झिजून दुस-यांना- आम्हांला- सुख देण्याकरिता, आमची स्थिती सुधारण्याकरिता आपला प्रयत्न चालू ठेवतात त्या संतांची किंमत आजपर्यंत झालेल्या कोणत्याही संतापेक्षा आम्हांला यत्किंचितही कमी वाटत नाही. कित्येकांना ती जास्त वाटेल.”

श्री. गणेश आकाजी गवई
डी. सी. मिशनच्या महाराष्ट्र परिषदेत केलेले भाषण
पुणे, १९१२

 

“इतिहास असे सांगतो की, ज्यापासून राष्ट्राचा विकास होतो अशा सर्व प्रकारच्या चळवळींचा उगम थोड्याशा व्यक्तींच्या कार्यात सापडतो. प्रस्तुतच्या बाबतीत त्या व्यक्ती म्हणजे ज्यांची प्रथम हेटाळणी झाली ते डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे गृहस्थ होत. त्यांच्या कार्याने प्रचंड अशा हिंदू समाजाची सदसदविवेकबुद्धी जागृत झाली.”

न्यायमूर्ती सर नारायणराव चंदावरकर
डी. सी. मिशनची अस्पृश्यतानिवारक परिषद
मुंबई, १९१८

 

“मराठ्यांतील कार्यशक्ती काय करू शकते असा जर कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर अण्णासाहेब शिंद्यांच्या कार्याकडे बोट करा. मराठयांतील स्वार्थत्यागाचे उदाहरण दाखविण्याचा प्रसंग आला तर आपण अण्णासाहेब शिंद्यांचे नाव घ्या. परकीय सत्तेचा विध्वंस शिवाजीमहाराजांनी केला व अस्पृश्यतेच्या विध्वंसनाचे कार्य करण्याकरिता तितक्याच धडाडीने अण्णासाहेबांनी आपले आयुष्य वेचले.”

श्री. बाबुराव जेधे
मुंबई इलाखा शेतकरी परिषद
पुणे, १९२८

 

“शिंद्यांचा जिला भरीव हातभार लागला नाही अशी लोकसेवेची व समाजोन्नतीची चळवळ दाखवून देणे कठीण आहे. राजकारण, समाजकारण, धर्मकार्य, शिक्षणकार्य इतकेच नव्हे तर वाड्मयसेवा आणि इतिहास संशोधन या सर्वांत शिंद्यांचा भाग आहे, आणि फार महत्त्वाचा भाग आहे.

ज्या काळी विधवाविवाहासारखे साधे प्रश्न सुटणे दुरापास्त होते अशा त्या घनदाट धर्मवेडाच्या काळात अस्पृश्योद्धाराची चळवळ सुरू करणे, त्यासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढणे, इतकेच नव्हे तर अस्पृश्यांत जाऊन त्यांच्यापैकी एक झाल्याप्रमाणे त्यांच्यात वागणे या गोष्टीसाठी अतुल स्वमतधैर्याची, एवढेच नव्हे तर मूलमार्गी बुद्धीची व समाजाविषयी ख-या कळकळीचीही गरज होती. इतक्या व्यापक व सूक्ष्म दृष्टीच्या कार्यकर्त्याची दृष्टी सबंध देशाइतकी विशाल विस्तृत असावी लागते. म्हणूनच श्री. शिंदे सामाजिक चळवळीप्रमाणेच अनेक राजकीय चळवळीतही भाग घेताना दिसत.”

न्यायमूर्ती भवानीशंकर नियोगी
महाराष्ट्र साहित्य संमेलन
नागपूर, १९३३

 

मद्रासच्या परिषदा आणि हिंदुस्थानचा दौरा

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यारंभाच्या काळी प्रार्थनासमाजाच्या आद्य संस्थापकांपैकी डॉ. भांडारकर सोडल्यास कोणी हयात नव्हते. डॉ. आत्माराम पांडुरंग(१८९८), भास्कर हरी भागवत(१८९४), तुकाराम तात्या पडवळ(१८९८), शंकर पांडुरंग पंडित(१८९४), मामा परमानंद व वामन आबाजी मोडक(१८९७), न्यायमूर्ती रानडे(१९०१) ही मंडळी परलोकवासी झाली होती. डॉ. भांडारकरांचे वास्तव्य पुण्यास होते. त्यामुळे सर नारायण चंदावरकर यांच्याकडेच मुंबई प्रार्थनासमाजाचे नेतृत्व होते. जुन्या व नव्या पिढीचा मेळ साधण्याचे कौशल्य चंदावरांकडे असले तरी त्यांना तरुण पिढीचे प्रतिनिधी म्हणणेच रास्त होते.

दोन वर्षांपूर्वी विठ्ठल रामजी शिंदे हे मुंबई प्रार्थनासमाजात एक तरुण म्हणून वावरत होते. प्रार्थनासमाजाच्या रात्रशाळा तपासणे यांसारखे समाजाचे काम ते उत्साहाने करीत होते. क्वचित प्रसंगी प्रार्थनासमाजाच्या व्यासपीठावरून उपासना चालवीत होते. असे असले तरी अल्लड तरुणपणामुळे आणि स्वमताच्या अभिनिवेशात प्रार्थनासमाजाला ते नावे ठेवण्यास कचरत नसत. आता त्याच प्रार्थनासमाजाचे ते एकनिष्ठ सेवक झाले होते. मध्यंतरीच्या काळात घडलेल्या पद्धतशीर शिक्षणामुळे, युरोपातील धर्मसंस्थांचे कार्य बघितल्याने व मुख्य म्हणजे धर्मोपदेशकाची जबाबदारी पत्करल्यामुळे एक प्रकारचा विचारीपणा, पोक्तपणा त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. त्यांच्या आधी श्री. सदाशिवराव केळकर व श्री. शिवरामपंत गोखले ह्या दोघांनी हे प्रचारकार्य केले होते. परंतु शिंदे यांच्या वेळी प्रचारकपदाचे स्वरूप वेगळे होते. प्रचारकार्यासाठी योग्य संस्थेतून तयार होऊन आल्यावर ते जीवितकार्याचा एकमेव हेतू म्हणून पत्करणे, आपल्या कार्याच्या योगक्षेमासाठी समाज जी काही व्यवस्था करील केवळ त्यावरच निर्वाह करणे, कार्याचा विस्तार जसजसा होईल तसतशी साधनसामग्री हातास कशी येते याची प्रचिती घेणे वगैरे गोष्टी अगदी नव्या होत्या. हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध यांची तत्त्वे आणि ध्येये जशी निरनिराळी आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या प्रचारकार्यपद्धतीतही वेगळेपणा आहे, हे उमजून ब्राह्मसमाजाने ह्या विविध कार्यपद्धतींचा समन्वय साधलेला होता. ब्राह्मसमाजाला या प्रकारचा समन्वय साधणे भाग होते. मुसलमान पद्धती लोकसत्तात्मक तर ख्रिस्ती पद्धती पितृवात्सल्याची. हिंदू प्रचारपद्धती भिन्न जाती व वर्ग यांच्यामध्ये विभागलेली, राजकारणी; तर बौद्धांची निःसंग उदासीन वृत्तीची. वस्तुतः देवेंद्रनाथांनी घालून दिलेली ब्राह्मसमाजाची उपासनापद्धती ख्रिश्चन पद्धतीची आहे, अशी केली जाणारी टीका शिंदे यांना रास्त वाटत नव्हती. केशवचंद्रावर चैतन्याचा, भक्तिमार्गाचा प्रभाव पडल्याने टाळ, मृदंग आणि पताका यांचा कल्लोळ ब्राह्मसमाजात झाला होता. उपासनापद्धतीचा विचार जरी बाजूस ठेवला तरी ख्रिस्ती लोकांच्या प्रचारपद्धतीत दिसून येणारा जोरकसपणा, सहानुभूती आणि व्यावहारिकता हे गुण शिंदे यांना स्तुत्य वाटत होते. व्यापार करण्याच्या पद्धतीत जर ख्रिस्ती लोकांची व्यावहारिकता आम्ही मुकाट्याने उचलतो, तर धर्मप्रचाराबाबत ती का हेटाळावी असे त्यांचे मत होते.

१९०३ सालच्या अखेरीस आपण प्रत्यक्ष प्रार्थनासमाजाचे कार्य सुसंघटित कसे करावे असा शिंदे यांच्यापुढे प्रश्न पडला. ते जरी एका प्रांतिक समाजाचे प्रचारक झाले होते तरी मुंबई प्रार्थनासमाजाचे कार्य केवळ मुंबई शहरापुरतेच चाललेले होते. पुणे, नगर, सातारा ह्या ठिकाणी जरी समाज होते तरी आर्थिकदृष्ट्या हे समाज मुंबई समाजापासून स्वतंत्र होते. परस्पर मदतीची देवघेव होत असली तरी मध्यवर्ती घटना नव्हती आणि तशी ती करण्याला फारसे कुणी अनुकूल नाही असेच त्यांना दिसून आले.

ब्राह्मधर्माचे विश्वरूपी कार्य, मुंबई प्रांतातील त्याचे असंघटित क्षेत्र यांतून मार्ग कसा काढावा असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. व्यक्तिगत पातळीवरून त्यांनी उपासना चालविणे, धर्मविषयक व्याख्याने देणे या कार्याला आरंभही केला होता. एवढ्यात डिसेंबर महिना जवळ आला. काँग्रेसचे अधिवेशन मद्रास शहरी भरणार होते.

भारतीय राष्ट्रसभेच्या (काँग्रेसच्या) निर्मितीमागे न्यायमूर्ती रानडे यांची प्रेरणा होती. राजकारण हा तिचा प्रमुख उद्देश होता. मात्र न्यायमूर्ती रानडे यांची दृष्टी सर्वांगीण सुधारणेची होती. राजकीय विषयांचा खल करण्यासाठी हिंदी राष्ट्रीय सभा जशी आहे, त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह करण्यासाठी व सामाजिक सुधारणेचे पाऊल पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक प्रातिनिधिक संस्था असावी असे त्यांना वाटले व त्यांनी सामाजिक परिषदेची स्थापना करून राष्ट्रीय सभेच्या वेळीच तिचे अधिवेशन भरविण्याचा प्रघात सुरू केला. उदार धर्माचा पाठिंबा राष्ट्रीय चळवळीस मिळणे आवश्यक आहे असे न्या. रानडे यांना वाटले व राष्ट्रसभेच्या चौथ्या अधिवेशनापासून म्हणजे अलाहाबादमध्ये १८८८ साली भरलेल्या अधिवेशनाच्या वेळेपासून भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद त्यांच्या प्रेरणेने भरविण्यास प्रारंभ झाला. १९०३ सालचा मद्रास येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या वेळी सामाजिक परिषद भरणार होती. तिचे अध्यक्ष न्या. सर नारायण चंदावरकर होते, तर एकेश्वरी धर्मपरिषेदच्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. सदाशिवराव केळकर होते. ब्राह्मधर्माचे प्रचारक या नात्याने प्रतिनिधी म्हणून या परिषदेस उपस्थित राहण्याची संधी विठ्ठल राजमी शिंदे यांना मिळाली होती. भारतातील एकेश्वरी धर्म परिषदेचे कार्य कसे चालावे याबद्दल त्यांच्या डोक्यात काही कल्पना घोळत होत्याच. शिवाय शिंदे हे नुकतेच अर्धा युरोप फिरून आले होते तरी महाराष्ट्रापलीकडचा भारत त्यांनी अगदी बघितला नव्हता. तो पाहून तेथील लोकस्थिती अजमावणे त्यांना आवश्यक वाटत होते. हिंदुस्थानातील वेगवेगळ्या प्रांती ब्राह्मधर्माची स्थिती कशी आहे याचेही अवलोकन करणे त्यांना जरुरीचे वाटत होते. तेव्हा भारतभर यात्रा करण्याची संधी ह्या राष्ट्रीय परिषदांच्या निमित्ताने आली होती ती त्यांनी आनंदाने पत्करली आणि खर्चाची तमा न बाळगता मद्रासला जाण्याचे ठरविले. “तत्त्वाने बेहोष झालेल्याला तपशिलाची कदर नसते अशांतला मी एक” असे त्यांनी या प्रसंगाच्या अनुरोधाने स्वतःबद्दल म्हटले आहे.

डिसेंबर १९०३च्या पहिल्या आठवड्यात शिंदे मद्रासला जाण्यासाठी निघाले. सुबोधपत्रिकेतल्या त्यांनी विलायतेहून लिहिलेल्या पत्रामुळे निदान महाराष्ट्रात तरी त्यांचा चांगला परिचय झाला होता. खानापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड, मंगलोर, कालिकत येथे व्याख्याने देत व उपासना चालवीत ते जाणार होते.

ब्राह्मसमाजाच्या धर्मविषयक विचाराच्या वेगळेपणामुळे विशेषतः ह्या धर्मात मूर्तिपूजेला स्थान नसल्यामुळे निदान काही मंडळींना हा भाग रुचणारा नसणार याची शिंदे यांना कल्पना होती. कर्मठ ख्रिस्ती लोकांकडून ब्राह्ममताला विरोध होतो याचा अनुभव त्यांनी मुंबईलाच घेतला होता. मुंबई प्रार्थनासमाजात ३० नोव्हेंबर १९०३ रोजी त्यांनी “तुकारामासारखी आपल्या अंतःकरणाची विकल स्थिती झाली पाहिजे” अशा प्रकारचा जो उपदेश केला होता त्याबद्दल एका ख्रिस्ती माणसाने शिंदे यांच्यावर ज्ञानोदयमधून टीका केली होती. ह्या टीकेचे खंडन सुबोधपत्रिकेने हिरिरीने केले. तीमध्ये असे म्हटले आहे, “हिंदुधर्मात भक्तिमार्गाच्या अनुयायांत जे भक्तशिरोमणी होऊन गेलेले आहेत त्यांची परमेश्वराबद्दलची निष्ठा, त्यांचे प्रेम, त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती यांचे मोजमाप मराठी बायबलातील शुष्क अर्थविरहित वाक्याने होणे नाही. जो खरा भक्त आहे त्यास आपण अत्यंत मलिन आहो, अत्यंत कुटिल आहो असेच सतत वाटत असते.”१ एरव्ही अतिशय संयमाने लिहिणा-या सुबोधपत्रिकेने “आम्ही रा. शिंद्यांचे वकीलपत्र घेतले नाही; व अशा प्रकारच्या टीकेकडे लक्ष देण्याचा आमचा विचार नाही,” असे म्हणत, ‘ख्रिस्तदासांवर’ कठोर शब्दात टीका केली आहे. संयत वृत्तीच्या सुबोधपत्रिकेच्या टीकेची दोन प्रमुख लक्ष्ये होती असे जाणवते. ती म्हणजे राजकीयदृष्ट्या जहाल असलेली मंडळी व कर्मठ ख्रिस्तोपदेशक.

खानापूर येथे वादाचे अथवा मतभेदाचे प्रसंग उपस्थित झाले. परंतु त्याचे स्वरूप वेगळे होते. खानापूर येथील मुक्कामात १० डिसेंबर रोजी शिंदे यांचे ‘ब्राह्मसमाज म्हणजे काय व त्याची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी श्री. तेलंग होते. शिंदे यांनी भाषण शांतपणे व सौम्य भाषेत केल्यामुळे सर्वांना ते पसंत पडले, तरी मूर्तिपूजेसंबंधी एकदोघांनी शंका विचारल्या. वादप्रसंग निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अध्यक्ष तेलंगांनी व्याख्यात्याची बाजू घेतली. वेदोपनिषदकालात मूर्तिपूजा अगदी नव्हती, मूर्तिपूजा ही हिंदू धर्माच्या अवनत दशेची द्योतक आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे विशेष वादप्रसंग झाला नाही.२

शनिवार दिनांक १२ डिसेंबर रोजी बेळगावास एका वृद्धाच्या क्लबामार्फत शिंदे यांचे व्याख्यान ठरले. अध्यक्षस्थानी श्री. रावजी खोत होते. शिंदे यांनी ‘ब्राह्मधर्म’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यावर बराच वादविवाद झाला. श्रोत्यांपैकी श्री. नातू वकील यांनी ब्राह्मधर्म हा धर्म आहे काय? तुमचे तत्त्वज्ञान काय? वगैरे प्रश्न विचारले. पुन्हा सोमवारी दिनांक १४ डिसेंबर रोजी शिंदे यांनी ब्राह्मसमाजाच्या सर्व अंगांसंबंधी सविस्तर व्याख्यान दिले. ब्राह्मधर्माचे सिद्धान्त द्वैतवादास अनुसरून कसे आहेत याचे विवरण केले. तसेच आधुनिक काळात तौलनिक धर्माच्या अध्ययनाने विचारी जगात काय फरक पडला आहे हे त्यांनी सप्रमाण व विस्तारपूर्वक सांगितले. या व्याख्यानानंतर कुणीही आक्षेप घेतले नाहीत. श्री. नातू वकिलांनी आभार मानते वेळी आपले सर्व गैरसमज दूर झाल्याचे सांगितले.

खानापूर-बेळगाव येथील व्याख्यानांवरून मराठी श्रोतृवर्गाला धर्मविषयक विचारांची मांडणी कोणत्या प्रकारे केली म्हणजे पेलवते व रुचते याची एक प्रकारे शिंदे यांना कल्पना होती, असे दिसून आले.

नंतर हुबळी, धारवाड, मंगलोर, कालिकत या ठिकाणी व्याख्याने देत व उपासना चालवीत ते बंगलोर येथे आले. बंगलोरला आल्यानंतर भाषा, संस्कृती या बाबतीत चित्र पालटल्याचे जाणवले. आर्य संस्कतीहून भिन्न असलेली द्रविड संस्कृती आणि तिच्यावरील पाश्चात्त्य संस्कृतीचा वरकरणी प्रभाव असे विचित्र दृश्य त्यांना दिसू लागले. “बाजारात भाजी विकणारी माळीण तुटक्या इंग्रजी शब्दात बोलते; कॉलेजातील एखादा अंडरग्रॅज्युएट तरुण इंग्रजी भाषाच तमिळ स्वरात बोलतो; पायात पाटलोण असली तरी तो अनवाणीच चालतो; गळ्यात कॉलर, नेकटाय असतानाही डोक्यावर काहीच न घेता शेंडीचा मोठा बुचडा तो मानेवर टाकतो अशी अनेक दृश्ये पाहून आपल्या निरीक्षणशक्तीवर फार ताण पडू लागला,” असे त्यांनी विनोदाने नमूद केले आहे.३

नाताळच्या प्रारंभी शिंदे मद्रासला पोहोचले. जॉर्ज टाऊन या भागातील ब्राह्म मंदिरात ते उतरले. ब्राह्मसमाजाच्या एकेश्वरी धर्मपरिषदेसाठी आलेल्या तमिळ, तेलगू, मल्याळ प्रांतातील ब्राह्मबंधूंच्या गाठीभेटी होऊ लागल्या. आंध्र साहित्यसम्राट वीरेशलिंगम पंतलू, कैलासम पिल्ले वगैरे धुरिणांसी त्यांच्या भेटी झाल्या. सामाजिक परिषदेचे अधिवेशन फार चांगले पार पडले. परिषदेसाठी न्या. चंदावरकर आले होते. त्यांचे वक्तव्य आणि भूमिका प्रभावशाली ठरली. न्या. रानडे यांच्यानंतर सामाजिक परिषदेचे पुढारीपण चंदावरकर यांच्याकडे आले होते. ही जबाबदारी ते उत्तम रीतीने पार पाडताहेत हे या अधिवेशनात दिसून आले.

परंतु राष्ट्रीय सभेच्या मुख्य अधिवेशनाच्या वेळी जोरदार वळवाचा पाऊस आला. ह्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे सभामंडप जणू काय वाहून गेला. आयत्या वेळी दुसरी व्यवस्था करणे शक्य नसल्याने राष्ट्रीय सभेचे काम काहीच होऊ शकले नाही.

ब्राह्मसमाजाचे कार्य ह्या दक्षिण प्रांती नीट चाललेले नाही, त्यामध्ये फारच विस्कळीतपणा आहे हे शिंदे यांना जाणवले. त्यामुळे आपले पहिले राष्ट्रीय कार्य म्हणून एकेश्वरी परिषदेची पुनर्घटना करावी ही प्रेरणा त्यांना मद्रासमध्ये झाली. पुढची काँग्रेस मुंबई येथे भरणार होती ही गोष्ट शिंदे यांच्या पथ्यावर पडली.

मद्रासच्या परिषदा आटोपल्यानंतर मुंबईस परत न येता आंध्र, ओरिसा या प्रांतातून दौरा करीत बंगालला जावे व तेथील ब्राह्मसमाजाचा वार्षिक सोहळा बघावा असे त्यांनी ठरविले.

मद्रासमधील त्यांचे वास्तव्य मात्र व्यक्तिगत दृष्टीने सुखाचे झाले नाही. युरोपातील दोन वर्षांच्या वास्तव्यात तिखट खाण्याची सवय त्यांना अगदी राहिली नव्हती. मुद्दाम सांगूनही तेथील गृहिणीकडून कमी तिखटाचे म्हणून मिळणारे जेवण त्यांना असह्य वाटत होते. त्यामुळे त्यांना अर्धपोटी राहावे लागत असे. तेथील हिवाळासुद्धा त्यांना युरोपातील उन्हाळ्यापेक्षा कडक भासत होता. युरोपातून परत आल्यावर स्वदेशाला चालतील असे नवीन कपडे करण्याचे आर्थिक बळ नसल्यामुळे तेच युरोपियन कपडे त्यांना काही काळ वापरावे लागले. “त्यामुळे वरून जरी मी मोठा साहेब दिसत होतो तरी आतून नेहमी पुढच्या प्रवासखर्चाची व प्रकृतीला न मानवणा-या अन्नाची धास्ती बाळगणारा एक कंगाल फकीर होतो,” असे त्यांनी आपल्या अवस्थेचे वर्णन केले आहे.

असा हा मद्रासमधील मुक्काम संपवून १९०४ सालच्या ३ जानेवारीस सकाळी ते बेजवाड्याकडे निघाले. शिंदे यांच्या मनात सदैव ब्राह्म समाजाचे, उदार धर्माचे काम कसे वाढविता येईल यासंबंधी विचार चालत असे. उत्तर मद्रासमध्ये अलीकडील आठ-दहा वर्षांत काही नवीन समाज स्थापन झाले आहेत आणि तेथील विद्यार्थ्यांमध्ये समाजधर्मासंबंधी विशेष आस्था व कळकळ आहे असे थिइस्टिक कॉन्फरन्सला आलेल्या काही तरुणांशी झालेल्या संभाषणावरूनही त्यांना जाणवले होते. म्हणून हे समाज स्वतः पाहावेत, तेथे व्याख्याने द्यावीत व तरुण मंडळींस धीराचे व सल्ल्याचे दोन शब्द सांगावेत या हेतूने ते बेजवाड्याकडे निघाले होते. दुसरा एक विशेष हेतूही त्यांच्या मनात होता. पुढच्या वर्षी मँचेस्टर कॉलेजमध्ये जो ब्राह्म विद्यार्थी जावयाचा तो मद्रास इलाख्यातून जाण्याची फार आवश्यकता होती. ह्या कामास दोन लायक तरुण त्यांच्या डोळ्यांसमोर होते. एक मसुलीपट्टणचे रामकृष्णराव व दुसरे बेजवाड्याचे राजगोपाळराव. हया दोघांशी समक्ष भेटून मँचेस्टर कॉलेजचा आपला अनुभव सांगून एकास तयार करण्याचा त्यांचा हेतू होता. बेजवाड्यापर्यंतच्या प्रवासात रामकृष्णराव सोबत होतेच. त्यांच्याशी संभाषण करून त्यांच्या ब-याच शंकांचे निरसन त्यांनी केले. दुस-या दिवशी सकाळी राजगोपाळराव यांच्याशी कळकळीचे संभाषण झाले. हे दोघेही तरुण त्यांना होतकरू वाटले. त्यांच्यापैकी एक मँचेस्टर कॉलेजला जाण्यास तयार होईल अशी आशाही त्यांना वाटली.

संध्याकाळी लायब्ररीत दहा-बारा विद्यार्थी उपासनेसाठी जमले होते. ब्राह्मसमाज म्हणजे काय?  ह्या संबंधी शिंदे यांनी तरुण विद्यार्थ्यांसमोर विवेचन केले. दुस-या दिवशी सकाळी गंतूरला निघून नऊ वाजता पोहोचले. संध्याकाळी तेथील अमेरिकन एव्हान्जेलिकल कॉलेजात उपासना चालवून ‘अनुष्ठान’ ह्यावर उपदेश केला. ‘नापिताचे परी वरी वरी बोडी। परी आंतरिची वाढी उणी नोहे’। या नामदेवाच्या अभंगाच्या आधारे विवेचन केले. दुस-या दिवशी संध्याकाळी तेथेच ‘रिफॉर्म ऑन रिलिजस लाइन्स’ ह्यावर व्याख्यान दिले.४

ह्या दौ-यात जगन्नाथपुरी आणि कलकत्ता येथील मंदिरांमध्ये आपल्या येथील तीर्थस्थानांना व देवळांना किती ओंगळ, गलिच्छ आणि बीभत्स रूप आलेले आहे हे त्यांना जवळून निरखता आणि अनुभवता आले. जगन्नाथपुरीच्या देवळातील महंत बडवे अत्यंत स्वार्थी, कठोर मनाचे आणि पैसे मिळविण्याच्या विद्येत तरबेज असे त्यांना दिसले. जगन्नाथजीला भोग म्हणून रोज एक मणाचा भात शिजविला जायचा. रांजणात भरून ठेवलेल्या शिळ्या भातातच ताजा भात मिसळला जायचा व तोच यात्रेकरूंना खापरांतून विकला जायचा. जगन्नाथजींचा प्रसाद म्हणून चढाओढीने विकला जाणारा हा भात तोंडात घालण्याच्याही लायकीचा नसे. देवळाच्या फरसबंदीवर ह्या सांडलेल्या भाताची पुटे चढून घसरगुंडी झालेली, असे ओंगळ दृश्य सर्वत्र पाहावयास मिळत होते. गाभा-यातील देवाची मूर्ती तर अत्यंत भेसूर, बायकामुलांच्या अंतःकरणात धडकी भरविणारी अशी दिसली. जगन्नाथजींचे मंदिर सुंदर नसले तरी द्राविड संस्कृतीमधील मदुराई वगैरे अन्य ठिकाणच्या देवळातल्याप्रमाणे येथेही सर्व भिंतीवर कानाकोप-यांत खालपासून वरपर्यंत बीभत्स चित्रे कोरलेली. मंदिरामध्ये अश्लील, बीभत्स चित्रे कोरण्यामागे द्राविडांची एक कल्पना त्यांनी नमूद केली. ती अशी की, काही वाईट माणसांच्या दृष्टीत सुंदर वस्तूंचा भंग करण्याची शक्ती असते म्हणून त्यांच्या दृष्टीची लालसा कुरूप वस्तूत लय पावून सुंदर वस्तु सुरक्षित राहावी.

देऊळ बघितल्यानंतर मनावर झालेला परिणाम नाहीसा करावा या हेतूने शिंदे
समुद्रकिना-यावरील सुंदर व विशाल वाळवंटावर गेले. अनंतत्वात परमेश्वराचे अस्तित्व जाणवून घेणा-या शिंद्याच्या मनात आले, ‘जगाचा खरा नाथ कोठे आणि हा तोतया जगन्नाथ कोठे!’

जानेवारीच्या मध्याच्या सुमारास शिंदे कलकत्त्यास पोहोचले. तेथे माघोत्सव चालू होता. बंगाली वर्षाचा माघ महिना आपल्याकडील पौष महिन्यात येतो. त्यांच्या संपूर्ण माघ महिन्यात हा उत्सव चालू असतो. साधारण, नवविधान आणि आदी हे ब्राह्मसमाजाचे तीन पक्ष स्वतंत्रपणे हा उत्सव चढाओढीने करीत असतात. मुख्य उत्सव साधारणपणे २४ जानेवारीला येतो. बंगाल्यातील लहानथोर स्थानिक समाजातून ब्राह्म कुटुंबे मोठ्या श्रद्धेने ह्या उत्सवासाठी कलकत्त्यास येतात. सर्वांची व्यवस्था एकत्र केली असल्यामुळे परस्परांच्या परिचयाचा लाभ त्यांना होतो. मुख्य दिवशी पहाटेपासून भजनाला सुरुवात होते. टाळ-मृदंगाचा घोष चालतो. लताफुलांनी मंदिर सुशोभित करण्याचे काम आदल्या दिवसापासून चालू असते. तीन तास प्रवचन चालते. एकंदर सात तास ही मुख्य उपासना चालते. ह्या वर्षी मुख्य उपासना पंडित शिवनाथशास्त्री यांनी चालविली. ती अत्यंत भक्तिरसपूर्ण अशी होती. शिंदे यांच्या मनावर तिचा मोठा परिणाम झाला. शास्त्री महाशयांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. शिंदे यांच्याजवळ प्रसिद्ध ब्राह्म पुढारी बॅरिस्टर आनंदमोहन बोस बसले होते. त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुधार चालली होती. कलकत्त्यातील ब्राह्मोत्सव कसा चालतो हे शिंदे यांना अनुभवण्यास मिळाले.

कलकत्त्याच्या मुक्कामातील शिंदे यांच्या दृष्टीने आणखी दोन संस्मरणीय घटना म्हणजे महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर व प्रतापचंद्र मुझुमदार यांच्या भेटी. ३० जानेवारी १९०४ रोजी
तिस-या प्रहरी पंडित शिवनाथशास्त्री यांनी शिंदे व लाहोरचे प्रचारक भाई प्रकाशदेव यांना महर्षी देवेंद्रनाथ यांच्या भेटीस नेले. ब्राह्मसमाजातील तीन प्रमुख विभूतींपैकी देवेंद्रनाथ हे एक गणले जात. (कविवर्य रवींद्रनाथ टागोर हे महर्षी देवेंद्रनाथांचे पुत्र). हे तिघेजण त्यांच्या भेटीस गेले त्या वेळेला ते आपल्या घराच्या दुस-या मजल्याच्या कोचावर बसले होते. पंडित शिवनाथशास्त्र्यांनी शिंदे यांची गौरवपूर्वक ओळख करून दिली व मुंबईला राममोहन आश्रमाची उभारणी झाल्याची हकिकत सांगितली. अशा रीतीने मुंबईकडे नवचैतन्य निर्माण झाल्याचे ऐकून महर्षींना गहिवर आला आणि त्यांनी शिंदे यांच्या अंगावरून हात फिरविला. ह्या महापुरुषाच्या दर्शनाने त्यांनाही फार धन्यता वाटली. महर्षी देवेंद्रनाथ शिंद्यांना उद्देशून म्हणाले, “मी आता फार थकून गेलो आहे. शिवनाथ आणि तू आमचे कार्य पुढे चालव.”५

दुसरी महत्त्वाची भेट म्हणजे ब्रह्मानंद केशवचंद्र सेन यांचे शिष्य प्रतापचंद्र मुझुमदार यांची होय. बाबू प्रतापचंद्र मुझुमदार यांनी लिहिलेले केशवचंद्र सेन यांचे इंग्रजी चरित्र यांनी बी. ए. चा अभ्यास करताना वाचलेले होते. त्यांच्या या चरित्राचा विलक्षण परिणाम शिंदे यांच्या मनावर त्या वेळी झाला होता. शिंदे ब्राह्ममंदिरात गेले त्या वेळी बाबू प्रतापचंद्र मुझुमदार उपासनेला बसले होते. “शुभ्र लोकरी शाल, त्यावर त्यांची शुभ्र व विपुल दाढी, भव्य कपाळ, पाणीदार डोळे” असे त्यांचे दर्शन शिंदे यांना मोठे प्रेरक वाटले. प्रतापबाबूंचे इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व अपूर्व असल्याचे त्यांना जाणवले. ‘ओ गॉड ऑफ ऑल नेशन्स!’ या शब्दांनी त्यांनी आपली गंभीर प्रार्थना इंग्रजीत सुरू केली. ती आत्म्याला हालवून जागी करणारी आहे असा त्यांना अनुभव आला. हे दोन्ही महापुरुष पुढच्या वर्षीच वारल्याची दुःखद बातमी शिंदे यांना ऐकावी लागली. या दुःखात शिंदे यांना एवढेच समाधान होते की, कलकत्त्याच्या फेरीत या दोघांच्याही भेटीचा योग साधता आला. त्यांचे प्रेरक शब्द ऐकावयास मिळाले.

जगन्नाथपुरीतील मंदिरापेक्षाही अत्यंत किळसवाणा आणि निर्दय देखावा त्यांना कलकत्त्यास कालिमातेच्या देवळात पाहावयास मिळाला. नारळाची दुकाने असावीत त्याप्रमाणे येथे लहान लहान कोकरांची दुकाने होती. कित्येक दिवस खावयास न मिळाल्याने हे प्राणी अत्यंत रोडावलेले दिसत होते. मंदिर हुगळी नदीच्या काठी आहे. कालिमातेची मूर्ती अत्यंत भेसूर असून तिच्या तोंडातून भली मोठी जीभ बाहेर आलेली पाहून नवख्याच्या पोटात धडकी भरावी असे ते दृश्य होते. भक्त लोक कोकराला नदीत बुडवून आपणही सचैल स्नान करून वधस्थानी येतात. तेथील ब्राह्मण पुजारी दोन लाकडांमध्ये त्या बिचा-याची मान घालून एका झटक्यासरशी शिर धडावेगळे करतो व गरम रक्ताचा टिळा भक्ताच्या कपाळाला लावून त्याचा नवस पूर्ण करतो. असे चाळीसएक बळी अंगणातून अस्ताव्यस्त पडलेले शिंदे यांना दिसले. अंगणभर रक्तामांसाचा चिखल साठला होता. जगन्नाथाच्या देवळातील वैष्णव शोभा असो की, कालिमातेच्या मंदिरातील शाक्तांच्या लीला असोत, हिंदू धर्माची पुरातन काळापासून चाललेली ही अखंड विटंबना पाहून यांचे मन उद्विग्न झाले. हिंदू धर्माची उज्ज्वल स्थाने अन्यत्र आहेत हे मनोमन मान्य करूनही मूर्तिपूजेच्या नावाखाली चाललेला हा भयंकर प्रकार त्यांना उद्वेगकारक वाटला. या क्षेत्रात हिंदू धर्मी सुधारणा करणा-या महात्म्यांना अद्यापि सनातन्यांकडून विरोध होत असावा ही वस्तुस्थिती दुःखदायक वाटली.

शिंदे यांनी आपल्या आयुष्याच्या कार्यकालात यापुढेही भारताच्या विविध प्रांतांचा दौरा केला. मात्र या पहिल्या दौ-यात प्रथम त्यांना भारतीय जीवनाचे, तेथील लोकस्थितीचे जे स्वरूप पाहावयास मिळाले ते त्यांना निश्चितपणे बोधकारक वाटले असणार. सर्वसामान्य माणसे धर्माच्या बाबतीत, मूर्तिपूजेच्या बाबतीत कसा विचार करतात हे व्याख्यानप्रसंगी उमजून आले. हिंदुस्थानातील लोकजीवनात झालेले विविध संस्कृतींचे मिश्रण व त्यावर पडलेले  पाश्चात्त्य संस्कृतीचे आवरण ध्यानात आले. हिंदुस्थानातील ब्राह्मधर्माच्या चळवळीतील विस्कळीतपणा जाणवला व तिला संघटित करण्याची आवश्यकता त्यांच्या मनावर ठसली. ब्राह्मधर्मप्रचाराबद्दल उत्साह वाटावा असे काही तरुणही भेटले. वैष्णव-शाक्तांच्या रूढ उपासनेचे उद्वेगकारक प्रकार पहायला मिळून उदार धर्ममताचा प्रसार जोमदारपणे करण्याची निकड त्यांना जाणवली आणि महर्षी देवेंद्रनाथ टागोर व बाबू प्रतापचंद्र मुझुमदार यांच्या भेटी उत्साहवर्धक व प्रेरक वाटल्या. कलकत्त्याला आपल्या
दौ-याची समाप्ती करून ते थेट मुंबईस परतले.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, ६ डिसेंबर १९०३.
२.    तत्रैव, १३ डिसेंबर १९०३
३.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘बंगळूरच्या रस्त्यातील एक फेरी,’ लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. ६९-७१.
४.    सुबोधपत्रिका, ७ फेब्रुवारी १९०४.
५.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १५८.

मद्यपाननिषेधाची चळवळ व अन्य सामाजिक कार्य

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात शिवाजीमहाराज, राजा राममोहन रॉय, जोतीबा फुले ह्या विभूतींबद्दल व भारताच्या राजकारणात नुकतेच देदीप्यमान होऊ लागलेले म. गांधी ह्या समकालीन पुढा-यांबद्दल अतीव आदराची भावना होती. त्याचे मुख्य कारण ह्या सगळया विभूती समग्र जीवनाचा विचार करणा-या होत्या व जीवनाच्या विविध अंगांशी संबंधित अशा सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला होता. शिंदे यांची दृष्टीही जीवनाचा सर्वांगीण विचार करणारी व नैतिक अंगाने त्याचे उन्नयन करणयाची होती. ह्या कारणानेच अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याच्या त्यांच्या मुख्य जीवितकार्याच्या जोडीने त्यांनी सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणा-या अन्य चवळवळींनाही आवश्यक तेवढा हात घातला. मुलींसाठी सक्तीचे शिक्षण असावे ह्या बाबीसंबंधी त्यांना जशी आस्था होती त्याचप्रमाणे मद्यपानाच्या व्यसनाचे दुष्परिणाम त्यांनी बघितलेले असल्यामुळे ह्या सुधारणेकडेही त्यांचे लक्ष प्रारंभापासूनच गेलेले होते.


मुंबईमध्ये त्यांनी धर्मप्रचाराचे कार्य सुरू केले त्याच वेळेला मुंबईतील अस्पृश्यवर्गाच्या दुःस्थितीचे त्यांचे अवलोकन चालूच होते. प्रार्थनासमाजातील आपले एक सहकारी व विल्सन हायस्कुलातील नामांकित शिक्षक श्री. वामनराव सोहोनी यांनी घेऊन ते १९०६ सालच्या होळीच्या दिवशी परळ भागातील अस्पृश्यांची स्थिती अवलोकन करण्यासाठी गेले. तेथे दिसलेल्या दृश्यांचा आपल्या मनावर कोणता परिणाम झाले हे सांगताना वामनराव सोहोनी यांनी म्हटले आहे, “आमच्या नजरेस जे करुणामय देखावे पडले त्यांची विस्मृती होणे शक्य नाही.”१ दारूच्या व्यसनाने खेडेगावातील असो की शहरातील असो, गरीब लोकांची पराकोटीची दुर्दशा होत असे व ही व्यसनासक्त माणसे मामुसकीला मुकून पशूप्रमाणे वर्तन करायला लागतात, हे त्यांनी पाहिले होते. होळीच्या दिवसात तर ह्या व्यसनाचा नीचतम स्वरूपाचा परिणाम दिसून येई.


१९०६-०७ सालापासूनच मद्यपानबंदीच्या चळवळीकडे विठ्ठल रामजींचे लक्ष गेले होते. पुण्यातही लो. टिळकांनी मद्यपाननिषेधाची चळवळ सुरू केली होती. ह्या चळवळीमध्ये डॉ. भांडारकर यांच्यासारखे पुढारीसुद्धा सहभागी होत होते. डॉ. मॅन व इतर ख्रिस्ती मंडळींचाही ह्या चळवळीला पाठिंबा व तीमध्ये सहभाग होता. लो. टिळकांच्या बरोबर विठ्ठल रामजी शिंदे ह्या चळवळीत भाग घेऊ लागले होते. त्यांच्याबरोबर सभेमध्ये जाऊन व्याख्यानेही देत होते. १९२० नंतर म. गांधींनी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये मद्यपाननिषेधाच्या कार्यक्रमाला स्थान दिले व असहकारितेच्या चळवळीच्या काळात ‘दारू पीना हराम है’ अशा प्रकारच्या घोषणा देत स्वयंसेवक पिंकेटिंग करीत असत. शिंदे यांनीही अशा चळवळीत भाग घेतला. १९३०च्या कायदेभंगातसुद्धा सत्याग्रह करीत असताना अन्य घोषणांबरोबर मद्यपाननिषेधाच्या घोषणा दिल्या जात असत.


१९२१-२२ सली असहकारितेच्या आंदोलनात मद्यपाननिषेधाच्या चळवळीलाही जोर आला होता. पुणे म्युनिसिपालटीने मुलींच्या सक्तीच्या शिक्षणाबाबत चालढकल चालवली होती व त्यासाठी आर्थिक अडचणीची सबब पुढे केली होती. पुणे शहरात या चळवळीचा झालेला परिणाम म्हणून मुंबई कायदेकौन्सिलातही एकंदर मुंबई इलाख्यासाठी मुले आणि मुली ह्या दोघांसाठी सक्तीचे शिक्षण सुरू करण्यासंबंधी बिल आणण्याचा प्रयत्न चालला होता. रँ. र. पु. परांजपे हे त्या वेळी शिक्षणमंत्री होते व ते सक्तीच्या शिक्षणाला अनुकूल होते. त्यांच्याच प्रयत्नाने हे बिल आणण्याचे प्रयत्न चालू होते. परंतु सरकार मात्र आर्थिक सबब पुढे करीत होते. सक्तीचे शिक्षण व मद्यपानवंदी ह्या दोन्ही मागण्या लोकांकडून पुढे केल्या जात असत. त्या वेळेला सक्तीचे शिक्षण सुरू करावयाचे तर दारूबंदी करता येणार नाही. दारू दुकानाचे परवाने आणि अबकारी कर यांपासून मिळणारे उत्पन्न सरकारला सोडता येणार नाही असा पेच सरकारच्या वतीने टाकण्यात आलेला होता. सरकारची भूमिका ही कशी गैर व अनैतिक आहे हे जाणून विठ्ठल रामजी शिंदे हे मद्यपानबंदीबाबत आपली आग्रही भूमिका मांडत होते. १९२२ साली वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ह्या प्रश्नावर ‘दारूचा व्यापर, सरकार आणि बहुजन समाज’ ह्या विषयावर एक व्याख्यान दिले व सरकारच्या दुटप्पी आणि दांभिक भूमिकेवर परखड शब्दांत टीका केली.२


आपल्या भाषणात ते म्हणाले, “सुशिक्षित वर्ग, भांडवलवाले वगैरे आपल्या हिताची काळजी घेण्यास समर्थ आहेत. या विषयाचा बहुजन समाजाच्या हिताच्या दृष्टीने आपल्याला विचार करावयाचा आहे. पुढारलेल्या वर्गात दारू पिणा-या काही अपवादात्मक व्यक्ती असू शकतात. उलटपक्षी बहुजन समाजात अशा कित्येक जाती आढळतील की या प्रकारची सक्ती केल्याशिवाय त्यांची दारूच्या व्यसनातून मुक्तता होणार नाही. दारूसारख्या निषिद्ध वस्तूचा उघड्या छातीने व्यापार चालविण्याचा अधिकार सरकारला आहे की नाही, असा माझा मुख्य मुद्दा आहे.” त्यावर आपले मत मांडताना ते म्हणाले, “प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दारूचे दुकान उघडण्याच अधिकार जसा कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला नाही तसाच तो सरकारलाही नाही. कारण सरकार ही केवळ एक मानवी संस्था आहे. एकाच्या दारूबाजीचा फायदा दुस-याने घेणे हे जर उघड उघड अनीतीचे आहे, तर ही अनीती राजकारणाच्या सबबीवर सरकारलाही आचरण्याच अधिकार नाही व असू नये. दुस-या प्रश्नाचे माझे उत्तर असे की, सरकार हा व्यापार ताबडतोब बंद करीत नसेल तर लोकांनी घनघोर प्रयत्न करून त्यास तसे करण्यात भाग पाडण्याचा अधिकार सर्व जनतेला, एवढेच काय कोणाही एका व्यक्तीस आहे. आधुनिक राजकारण म्हणजे भांडवलवाल्यांचा धुडगूस होय. जगात अद्याप खरी लोकशाही कोठेच अवतीर्ण झाली नाही आणि ती बसल्या बसल्या कोणाच्याही खाटल्यावर लवकरच उतरणार नाही. म्हणून आधुनिक राजकारणात दारूच्या व्यापाराचा व्यभिचार शिरला आहे. हल्ली दारूचे दुकान उघड मांडून त्याच्या बळावर सरकार दरबारात सरदारी पटवणारे लोकच सरकारचे मुख्य आश्रयदाते झाले आहेत.” ह्या प्रश्नाची आर्थिक बाजू स्पष्ट करताना चालू बजेटाचा आधार घेत शिंदे म्हणाले, चालू बजेटात एकंदर जमा सुमारे १४ कोटींची आहे. त्यात अबकारी खात्याची जमा सव्वाचार कोटींची, तर काळीचा वसूल म्हणजेच जमीन महसूल सुमारे सहा कोटी इतका आहे. मुंबई इलाख्याची लोकसंख्या आदमासे दोन कोटी आहे हे लक्षात घेतले तर दरमाणशी शेतकीचा कर अडीच रुपये तर दारूबाजीबद्दल दरमाणशी दोन रु. वसूल द्यावा लागतो. तरी सरकारी माहिती खात्याकडून मुंबई इलाखा ‘दारूबाज’ नाही अशी आरोळी ठोकण्यात येते. दारू पिऊन जे गुन्हे केल्याचे कोष्टक १९२०-२१ सालच्या अबकारी खात्याच्या रिपोर्टात सरकारने प्रसिद्ध केले आहे, त्यात कुलाबा जिल्ह्यात ३७, पुणे जिल्ह्यात १२०८ गुन्हे घडून त्यांना शिक्षाही ठोठावण्यात आल्याचे नमूद केले आहे. मुंबई सरकारचे जाहीर निवेदन आणि आकडेवारी यांतील विसंगती त्यांनी निदर्शनास आणून दिली व एक शेतकी सोडून दारूबाजी ही सर्वात अधिक उत्पन्नाची बाब सरकारने करून ठेवली आहे.”


आपल्या भाषणांत शिंदे पुढे म्हणाले, “विशेष दुःखाची गोष्ट ही की, दारूबंदी की शिक्षणाची सक्ती हा पेच बहुजन समाजाच्या गळ्याला पडला आहे. दिवसेंदिवस कर देण्याला लोक अधिक नाखूष होणार अशा साडेसातीच्या वेळेला शिक्षणाचे मंगळसूत्र सरकारने दारूच्या बाटलीच्या गळ्यात बांधले आहे. शिक्षण नको म्हणाल्यास जनतेचेच नुकसान आणि दारूची बंदी नको म्हटले तर तिचेच नुकसान, लंका जळली तरी मारुती सुरक्षित या न्यायाने जनता आणि त्यांचे दिवाण यांच्यात वरील मंगळसूत्राचा डाव टाकून पुन्हा आपण मोठी राजकीय सुधारणा केली असे सरकार सांगत सुटले आहे. वरवर पाहणारास सरकारचा त्यात मुळीच दोष नाही असे दिसून येते. कारण सरकार थोडेच दुकान मांडून बसले आहे. दुकाने आमच्याच लोकांनी उघडलेली व दारूही बहुजन समाजच अधिक पिणार, सरकारचे रिपोर्ट वाचावेत तर त्यात सालोसाल मद्यपाननिषेधाचे काम लोकांचे पुढारी मन लावून करीत नाहीत, अशा उलट्या बोंबा आणि नकाश्रू जागोजागी आढळून येतात... आता कलालासच सरदारी मिळते. पूर्वी कलालाची समग्र जात अस्पृश्य समजून बहिष्कृतवर्गात गणली जात असे.


“गरीब लोकांच्या आरोग्याची हानी आणि द्रव्याची हानी होते ह्याचा निर्देश करून मूळ दोन-चार आणे किमतीच्या दोरूवर कर बसवून सरकारने तिची किंमत दोन-चार रुपयांवर नेलेली असूनही दारूबाजीच्या विस्तार इतका अवाढव्य झाला आहे हे सरकार कबूल करीत आहे. सरकारने दारूची पैदाशीच बंद करावी म्हणजे विक्रीचा प्रश्नच राहात नाही. केवळ औषधोपचारासाठी लायन्सस देऊन इतर विषाप्रमाणे दारू हा एक पदार्थ विष समजून औषधापुरता त्याचा खप सरकारने चालू ठेवावा,” असे ही त्यांनी व्याख्यानाच्या शेवटी सुचविले. ह्या प्रश्नाची मांडणी त्यांनी प्राधान्याने बहुजन समाजाचे हित डोळ्यांसमोर ठेवून केली व ती करीत असताना सरकारचा दांभिकपणा, दुटप्पीपणा सडेतोडपणे उघडा पाडला.


शिमग्यातील अनिष्ट प्रथा

शतकाच्या आरंभी खेडेगावात तसेच शहरात प्रसृत असलेली एक अत्यंत अनिष्ट, ओंगळ चाल म्हणजे शिमग्याच्या दिवसात रूढीच्या नावाखाली होणारे अनाचार, अत्याचार. होळीच्या दिवशी तर अभद्र, अश्लील बोलण्याला व ओंगळपणाची घाणेरडी कृत्ये करण्याला जोर येई. मद्यपानाचा अतिरेक होऊन दारू पिणे हा केवढा अनिष्ट प्रकार आहे; माणसाचे माणूसपण नाहीसे करून त्याला तो पशुत्वाला केस नेतो याचे भयंकर दर्शन ह्या दिवसांत घडत असे. विठ्ठल रामजी लहान असताना जमखंडीसारख्या गावी शिमग्याच्या दिवसांत इतर मुलांसमवेत ह्या गोंधळामध्ये सामिल होत असत. त्याबाबतचा एक मजेदार प्रसंगही त्यांनी आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकात नमूद केला आहे. तेच विठ्ठल रामजी शिंदे मोठेपणी शिमग्यातले अनाचार व अत्याचार बंद करून त्या दिवसाला होलिका संमेलनाचे मंगल स्वरूप महाराष्ट्रभर देणारे सुधारक ठरले हा यातील गमतीचा विरोधाभास होय. शिमग्याच्या दिवसांत अस्पृश्यवर्गीयांच्या चाळीत तर किती ओंगळ, विदारक चित्र पाहावयास सापडते, हे त्यांनी स्वतः अनुभवले होते. म्हणून धर्माच्या व रूढीच्या नावाखाली शिमग्याच्या सणाला आलेले गलिच्छ, हिडीस व ओंगळ स्वरूप नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न आरंभिला. १९०७ साली विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्य वस्तीतील ग्लोब मिलच्या मैदानात पहिले होलिको संमेलन भरविले. त्यासाठी सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर ह्यांनी अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले. या प्रसंगी मुलांमध्ये खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या व इतर मनोरंजक कार्यक्रम घडवून आणले. सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने सोशल सर्व्हिस लीग ही संस्था स्थापन करून सुप्रसिद्ध कामगार पुढारी नारायण मल्हार जोशी यांच्यामार्फत ही चळवळ चालविली. १९१३ सालापासून म्हणजे शिंदे पुण्यात आल्यापासून त्यांनी या चळवळीकडे जास्त लक्ष दिले. ह्यावर्षी पुण्यास किर्लोस्कर थिएटरमध्ये मिरजेचे अधिपती बाळासाहेब पटवर्धन ह्यांच्या अध्यक्षतेखाली मोठी सभा भरविली. फर्ग्युसन व शेतकी कॉलेजातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी प्रामुख्याने या सभेत भाग घेतला. पुढे दरवर्षी शिंदे यांनी हा प्रयत्न चालूच ठेवला व महाराष्ट्रात होळीच्या दिवशी ओंगळ प्रकार करण्याचे बंद करून त्याला सुसंस्कृत कार्यक्रमाचे स्वरूप मिळावे अशा प्रकारची चळवळ महाराष्ट्रात चालवली. मुंबई इलाख्याचे विद्याधिकारी यांची त्यांनी भेट घेतली व त्यांच्यामार्फत खेड्यापाड्यांतील शाळेतील शिक्षकांपर्यंत ह्या चळवळीचे लोण पोहोचविण्यात आले. त्यामुळे शिमग्याच्या सणाच्या वेळी मुलांकरवी सभा भरवून, त्यात भाषणे व संवाद करवून, मर्दानी खेळाच्या स्पर्धा आयोजित करून शिमग्याच्या सणाला चांगले स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू झाला. शाळाशाळांमधून मुलांच्या द्वारा सुरू झालेल्या अशा प्रकारच्या प्रयत्नाचा परिणाम मोठ्या माणसांवरही चांगल्या प्रकारे दिसून आला व शिमग्याच्या या अनिष्ट चालीला क्रमशः आळा बसत गेला.


दुष्काळातील कार्य
निवडणुकीच्या दगदगीतून बाहेर पडल्याबरोबर दुस-याच एका निकडीच्या कामास विठ्ठल रामजी शिंदे यांना हात घालावा लागला. १९२०-२१ साली अहमदनगर व पुणे जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला. डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे अस्पृश्यवर्गातील लोकांच्या हिताचे कार्य करीत आहे, याची प्रसिद्धी झाली होतीच. त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे एक हजार मांग मंडळी पुण्याच्या मिशनचा आश्रय मिळवावा या हेतूने आली व मिशनच्या पटागंणात उतरली. ते कडक हिवाळ्याचे दिवस होते. ह्या लोकांची अन्नान्न दशा तर झाली होतीच, शिवाय बहुतेकांच्या अंगावर कपडेही नव्हते.


ह्या सगळ्या लोकांना दुष्काळाच्या खाईतून वाचविणे हे अण्णासाहेबांना आपल्यापुढचे स्वाभाविक कर्तव्य वाटले. प्रथमतः त्यांनी व जी. जी. ठकार यांनी या सर्व कुटुंबांची पाहणी करून मिशनतर्फे अल्पस्वल्प मदत देण्यास सुरुवात केली. पण तेवढ्याने भागणार नाही हे उघडच होते. तेव्हा पुणे शहर म्युनिसिपालटीच्या दिवाणखान्यात म्युनिसिपालटीचे अध्यक्ष श्री. ल. गो. आपटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरून त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘दुष्काळ आपत्ती निवारक कमिटी’ स्थापना करण्यात आली. ह्या कमिटीच्या वतीने तिच्या स्वयंसेवकांतर्फे धान्य, कपडे व पैसे जमविण्यास जोरात सुरुवात केली. मदत गोळा करण्यासाठी सहा केंद्रे निश्चित करण्यात आली व दुष्काळग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचे कार्य जोरात सुरू झाले.


दुष्काळग्रस्तांना राहण्यासाठी एक कच्चा विटांची झोपडीवजा चाळ बांधण्यात आली व भला मोठा मंडपही उभारण्यात आला. पुण्याचे कलेक्टर हडसन यांनी मामलेदारांना सूचना देऊन त्या दष्काळग्रस्त मांग लोकांना तांदूळ, जोंधळे, डाळ वगैरे मिळण्याची सोय करून दिली. विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईचे आपले मित्र देशभक्त शेठ लक्ष्मीदास तेरसी यांना सर्व परिस्थिती दाखविली. त्यांनी जमलेल्या लोकांचे फोटो घेऊन ते टाइम्स, क्रॉनिकल वगैरे वर्तमानपत्रांतून प्रसिद्धि केले. मदतीसाठी मिशनच्या वतीने आवाहन करण्यात आले. श्रीमंत आणि उदार लोकांचे लक्ष ह्या प्रश्नाकडे वेधले जाऊन पैशाच्या स्वरूपात त्यांच्याकडून मदत येऊ लागली. स्वयंसेवकांकडून गोळा करण्यात आलेले कपडे दुष्काळग्रस्तांना वाटण्यात येऊ लागले. धट्ट्याकट्ट्या माणसांसाठी मिशनच्या पटांगणात घातलेल्या मांडवात तागाच्या आणि वाखाच्या दो-या वळण्याचे काम सुरू करण्यात आले. वृद्ध माणसांना ज्वारी, बाजरी, तांदूळ मोफत पुरविण्यात आले; तर अपंग-अनाथांना स्वयंपाक करून अन्न पुरवण्यात येऊ लागले. आजारी दुष्काळग्रस्तांसाठी औषधपाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. असि. कलेक्टर जी. टी. गॅरेट, आय. सी. एस्. व मध्यभाग कमिशनर मि. प्रॅट ह्यांनी कमिटीच्या विनंतीवरून दुष्काळग्रस्तांची पाहणी केली व मिशनच्या द्वारा आठवड्यातून दोनदा धान्य फुकट वाटण्याचे काम शहर मामलेदार देशपांडे यांच्या साहाय्याने करण्यात आले.


कमिटीचे काम १५ मार्च १९२१ पर्यंत चालले. त्या दिवशीचे डॉ. हॅरॉल्ड एच्. मॅन यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होऊन कमिटीचा अहवाल वाचण्यात आला व कमिटी बरखास्त करण्यात आली. सदर सभेमध्ये दुष्काळग्रस्तांना विविध प्रकारचे साहाय्य करणा-यांचे आभार मानण्यात आले. शेठ तेरसी यांच्याप्रमाणेच दुष्कळाग्रस्त आजा-यांना तपासून दररोज तास दोन तास येऊन मोफत काम करणारे डॉ. यमकनमर्डी आणि त्यांच्याबरोबर नर्सिंगचे काम करणा-या भगिनी जनाबाई, डॉ. गोखले, डॉ. मुदलियार, डॉ. पळसुले यांचे आभार मानण्यात आले. पुणे गर्ल्स हायस्कूलच्या लेडी सुपरिटेंट मिस् एच्. एम्. फील्डिंग, मिस् नवलकर, श्रीमती वारुताई शेवडे, सौ. सुंदराबाई ठकार यांनीही फार अमोल कामगिरी केली. केसरी व ज्ञानप्रकाश कार्यालय, फ्री मराठा बोर्डिंगचे स्वयंसेवक, पुणे सोमवंशीय समाज आणि व्यक्तिशः श्री म. माटे, बाबुराव जेधे, एस्. सी. दरंदले, व्ही. आर. गद्रे, बाबुराव वायदंडे व गावडे ह्या मंडळींनी जे साहाय्य केले त्याबद्दल मिशनच्या वतीने आभार मानण्यात आले. पुणे येथील डी. सी. मिशन शाखेचे सेक्रेटरी कृ. गो. पाताडे यांनी १९२१-२३ सालचा जो मिशनचा अहवाल प्रसिद्ध केला त्यामध्ये ह्या दुष्काळात केलेल्या कार्यासंबंधी माहिती देण्यात आलेली आहे. सर्व स्तरांतील व्यक्तींचे साहाय्य घेतले. त्यांचे मुंबईचे धनिक मित्र शेठ लक्ष्मीदास तेरसी यांनी मुंबईहून हजारो रुपयांची आर्थिक मदत तर पाठवीलच, शिवाय आपल्या गिरणीवाल्या मित्रांकडून कापडाचे गठ्ठेच्या गठ्ठे पाठविले. कमिशनर व कलेक्टर यांच्या साह्यामुळे दुष्काळग्रस्तांना धान्याची मोठीच मदत झाली. शिवाय स्थानिक पुढा-यांनी व स्वयंसेवकांनी मिशनच्या आवाहनानुसार धान्य, कपडे, पैसे जमविण्याच्या कामी मोठेच साह्म केले. सगळ्या स्तरांतून मिळालेल्या ह्या मदतीतूनच हजारभर गरीब जीवांचे दुष्काळाच्या भयंकर आपत्तीतून रक्षण झाले.


अहल्याश्रमाची इमारत ही भोकरवाडीतील मांगवस्तीत आहे. अहल्याश्रमाची इमारत बांधली जात असताना व तेथे तारांचे कुंपण केले जात असता मिशन आपली जागा बळकावीत आहे की काय ह्या गैरसमजामुळे स्थानिक मांग मंडळी मिशनच्या चालकावर संतापली होती. त्यांचा हा गैरसमज वेळीच दूर झाला होता. शिवाय ह्या दुष्काळाच्या प्रसंगी मिशनचने मांग लोकांसाठी जे अभूतपूर्व कार्य अनेक प्रकारचे कष्ट सोसून केले, ते पाहून मिशनबद्दल व मिशनच्या चालकाबद्दल हया मांग मडंळींच्य लोकांचे मत चांगले झाले एवढेच नव्हे, तर त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना मांग मंडळींच्या मनात निर्माण झाली.


संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३३४.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, शिंदे लेखनसंग्रह, पृ. १२९-१३३.

मंगलोरमधील कार्य

अण्णासाहेब शिंदे यांनी १५ एप्रिल १९२३ रोजी पुणे शाखेच्या सभासदांच्या सभेत पुणे शाखेच्या नव्या घटनेनुसार बहुसंख्य अस्पृश्य सभासद असलेले पदाधिकारी निवडून मिशनचा सर्व कारभार ह्या नव्या पदाधिका-यांच्या स्वाधीन केला व आपण मिशनच्या मुख्य जबाबदारीतून मुक्त झाले. अण्णासाहेबांनी आधीच आपला मनोदय जाहीर केल्याप्रमाणे मिशन अस्पृश्यवर्गीयांच्या स्वाधीन केलेले पाहून ज्या अस्पृश्यवर्गीय पुढा-यांच्या मनात त्यांच्याबद्दल आशंका होत्या त्या दूर झाल्या. मिशन ताब्यात घ्यायला उतावीळ झालेले पुढारी मिशनची निंदा करीत होते ते आता मिशनचे कृतज्ञ अनुयायी व साह्मकर्ते बनले. शिंदे यांनी मिशन सोडल्यावर त्यांच्याबद्दलची प्रतिकूलता नाहीशी होऊन त्यांच्याबद्दल सद्भाव जागृत झाला. अर्थात घोगरे, कांबळे, थोरात, घाडगे, उबाळे ह्यांसारख्या पोक्त अनुभवी मंडळींनीच मिशनच्या पुनर्घटनेचा मनापासून मदत केली.


मात्र आयुष्यातील ऐन उभारीचा दीड तपाचा काळ अण्णासाहेबांनी मिशन स्थापन करुन ते नावारुपाला आणण्यात. अस्पृश्यवर्गाच्या ज्वलंत प्रश्नांची जाणीव अखिल भारतीयांना करुन देण्यात खर्च केला होता. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस जिवापाड परिश्रम केले होते. ते मिशन अशा प्रकारच्या वादंगानंतर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला म्हणून स्वाभाविकपणेच त्यांच्या मनाला वेदना झाल्या असणार. परंतु त्या आंतरिक वेदनेचा परिणाम अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबाबतच्या त्यांच्या कळकळीवर यत्किंचितही झाला नाही. ते काही असो ! ह्या अधिकारसंन्यासानंतर मिशनमधून ते व भगिनी जनाबाई जे अल्पस्वल्प वेतन घेत असत ते थांबले, एवढ्या थोर कर्तृत्ववान पुरुषापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या उभी राहावी हा केवळ दैवदुर्विलास. शिवाय आता वेळ मोकळा पडल्याने आपल्या वृत्तीला व ध्येयधोरणाला अनुसरुन काय करावे याचाही त्यांना निर्णय करणे आवश्यक होते.


संशोधन करावे ही एक अण्णासाहेबांच्या मनातील स्वाभाविक उर्मी होती. अलीकडे आर्य-द्रविड ह्या वादविषयाकडे त्यांचे लक्ष लागले होते. काही लेखही त्यांनी लिहिले. त्याहून व्यापक अशा विषयाची म्हणजे हिंदुस्थानच्या पुरातन इतिहासाची सामग्री जुळवून लेखन करावे असेही त्यांना वाटत होते. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांची त्यांनी या संदर्भात भेटही घेतली होती. इंदूर, ग्वाल्हेर, धार ह्या संस्थानांशी पत्रव्यवहाराही केला. परंतु एवढे मोठे काम आपल्या एकट्याच्या हातून होणे कठीण आहे, त्यासाठी आवश्यक ते साह्म मिळविणे दुष्कर आहे, हे त्यांच्या लक्षात आले व तो विषय त्यांनी मनावेगळा केला.


१९२३च्या मध्यावर अण्णासाहेब मुंबईस गेले असता राममोहन आश्रमांत त्यांचे जुने मित्र व कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजाचे प्रचारक बाबू हेमचंद्र सरकार यांची भेट झाली. अण्णासाहेबांनी चार महिने कलकत्याच्या साधारण ब्राह्म समाजाच्या साधनाश्रमात येऊन स्वस्थ राहावे असा त्यांचा फारच आग्रह पडला. त्याप्रमाणे अण्णासाहेब १९२३ च्या सप्टेंबरमध्ये पत्नी रुक्मिणीबाई व चिरंजीव रवींद्र यांना घेऊन तेथे राहिले.तेथील चार महिन्याच्या वास्तव्यात खेडोपाडी हिंडून बॅकवर्ड क्लासेसची कामगिरी त्यांना पाहिली. ह्या सुमारासच कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजाने अण्णासाहेबांनी मंगळूरच्या ब्राह्मसमाजाचे आचार्य म्हणून काम पाहावे असे त्यांना सुचविले व तसा ठराव केला.


हिंदुस्थानच्या नैऋत्य किना-याकडील मंगळूर जिल्हा तसेच ब्रिटिश मलबारमधील कालिकत जिल्हा आणि त्याच्या दक्षिणेस असलेला त्रावणकोर व कोचीन हा संस्थांनी मुलूख या भागातील प्रचारपदाची मुख्य जबाबदारी साधारण ब्राह्मसमाजाने अण्णासाहेब शिंदे यांच्यावर सोपवली. प्रचारकाचे मुख्य ठाणे मंगलोर हे ठेवावे असे ठरले. ह्या निर्णयाला अनुसरून अण्णासाहेब शिंदे हे १९२४च्या एप्रिल महिन्यात मंगळूरला आले. पत्नी रुक्मिणीबाई व दोन मुले यांना आपले कनिष्ठ बंधू एकनाथराव यांजकडे मुंबईस ठेवले व भगिनी जनाबाई आणि धाकटा मुलगा रवींद्र यांच्यासमवेत ते मंगळूर येथे आले.


मंगळूर येथील ब्राह्मसमाजाचा अण्णासाहेब शिंदे यांचा पहिला परिचय १९०७ साली झाला होता. त्या वेळी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अपूर्व स्वागत तेथील ब्राह्मसमाजी असलेल्या बिल्लव मंडळीनी केले होते. अस्पृश्यवर्गातील मुलांना शिक्षण देण्यासाठी के. रंगराव यांनी या ठिकाणी १९०४ पासूनच आरंभ केला होता. पंचमवर्गातील मुलांसाठी शाळा व उद्योगशाळा त्यांनाी चालविल्या होत्या. डी.सी. मिशनच्या स्थापनेनंतर के. रंगराव यांनी आपली संस्था मिशनशी संलग्न केली होती. ह्या मिशनच्या कामानिमित्तही अण्णासाहेबांचे जाणे-येणे मंगलोर भागामध्ये अधूनमधून होत असे. ह्या प्रांतातल्या ब्राह्मसमाजाच्या पुढा-यांशी त्यांचा चांगला व्यक्तिगत परिचय झालेला होता. ही पूर्वपीठिका असल्याने शिंदे यांना मंगलोर येथे राहून ब्राह्मधर्म प्रचारकाचे काम करणे आवडण्यासारखे होते. ब्राह्मधर्माचा ह्या प्रांतामध्ये प्रचार करण्याची निकड कलकत्ता येथील साधारण ब्राह्मसमाजाला जाणवली होती. हिंदुस्थानच्या या नैऋत्य भागात मंगलोर, कालिकत, कॅनानोर, कोईमतूर वगैर शहरांत लहानमोठ्या ब्राह्मसमाजाचे नव्हते. त्यामुळे ह्या प्रांतात ब्राह्मसमाजाचे काम अव्यवस्थित व विस्कळीतपणे चालले होते. हे काम सुसंघटितपणे, उत्तम त-हेने चालविण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यारुपाने एक सुयोग्य व्यक्ती आपली प्रतिनिधी म्हणून ब्राह्मसमाजाला मिळाली. शिंदे यांना कानडी भाषा उत्तम अवगत होती, ही बाबही त्यांच्या प्रचारकार्यात साह्मभूत ठरणारी होती. ब्राह्मसमाजाचे कार्यकर्ते त्यांच्या चांगल्या परिचयाचे होते. त्यामुळे मंगलोर येथे या भागासाठी मुख्य प्रचारक म्हणून काम करण्यास विठ्ठल रामजी शिंदे यांना उत्साह वाटला.


१९०७ साली अण्णासाहेब शिंदे ज्या वेळी प्रथम मंगलोर येथे आले, त्या वेळेला समाजबंधूंच्या प्रेमाचा त्यांना अपूर्व अनुभव आला होता. मंगलोरचा सर्व ब्राह्मसमाज त्यांच्या स्वागतासाठी बंदरावर लोटला होता. परंतु १९०७ मधील हे वातावरण आता १९२४ च्या एप्रिल महिन्यात राहिले नव्हते. राजकारणाने हिंदुस्थानमधील लोकांच्या मनात आणि ब्राह्म वातावरणात मोठाच पालट घडवून आणला होता. ही किमया महात्मा गांधींच्या राजकारणातील अपूर्व प्रभावामुळे घडून आली होती. लो. टिळकांनी त्यांच्या आधीच्या मवाळ काँग्रेसला जहाल स्वरुप प्राप्त करुन दिले होते. परंतु महात्मा गांधीनी बहिष्कार, सत्याग्रह इत्यादी चळवळींनी सा-या भारतवासीयांच्या मनावर विलक्षण प्रभाव टाकून त्यांना राजकारणाकडे आकृष्ट केले होते व राजकारणाला उग्र स्वरुप प्राप्त करुन दिले होते. म. गांधींच्या प्रभावाने देशाच्या कानाकोप-यांत जागृती झाली होती.


मंगलोर ब्राह्मसमाजात चार-पाच सारस्वत घराणी पूर्वीपासून प्रविष्ट झाली होती. पं. उल्लाळ रघुनाथय्या, पं. परमेश्वरय्या, रा. कृष्णाराव गांगोळी, वकील, समाजाचे अध्यक्ष असलेले के. रंगराव आणि समाजाचे सेंक्रेटरी असलेले तरुणांचे पुढारी व म. गांधीचें कट्टर अनुयायी के. सदाशिवराव, वकील ही पाच सारस्वत घराणी प्रमुख होती. बाकी सर्व सुमारे पाऊणशे सभासद मडळी बिल्लव जातीची होती. मंगलोर भागाकडील बिल्लव जातीची मंडळी अस्पृश्यवर्गात गणली जात होती व त्यांचा पारंपरिक व्यवसाय ताडी काढण्याचा होता. परंतु ह्या जातीचे लोक ब्राह्मसमाजात गेल्यापासून सामाजिक व आर्थिक दृष्टीने बदलून गेले होते. ब्राह्मणसमाजात गेल्यानंतर दोन-एक पिढ्यानंतर त्यांच्यामध्ये हा फरक स्पष्ट दिसू लागला. त्यांना शिक्षण मिळू लागले व सरकारी नोकरीत त्यांचा प्रवेश झाला. कलकत्यातील ब्राह्मांप्रमाणे जणू काय त्यांची स्वतंत्र जात झाली होती. मोठमोठ्या सरकारी हुद्यापर्यंत ही मंडळी पोहोचलेली असल्याने त्यांचा प्रभाव पडून मंगलोर शहरात ब्राह्मांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीही देण्यात आली होती. ही परिस्थिती भारतात अन्यत्र कुठेही नाही. बिल्लवांच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीत हा पालट झाल्याने आपले पूर्वीचे अस्पृश्यपण ती विसरुन गेली होती व सध्याच्या अस्पृश्यवर्गाला दूर ठेवीत असत. सरकारी नोकरीत व मोठमोठ्या युरोपियन कंपन्यांत ह्या वर्गातील लोक अधिकाराच्या जागांवर असल्यामुळे राजकारणापासून ती चार हाच दूर असत. इंग्रज सरकारबद्दल त्यांच्या मनात एकनिष्ठेची भावना तीव्रपणाने वसत होती, म्हणून राजकारण वगळून केवळ धर्मकार्य एवढीच गोष्ट आता त्यांच्या पसंतीची उरली होती.


मंगलोर येथील लोक विविध धर्माचे व विविध पंथाचे होते. रोमन कॅथॉलिक व प्रोटेस्टंट पंथाचे बरेच ख्रिस्ती लोक होते. काही काही भांगात तर खिश्चनांची बहुसंख्या होती. ही मंडळी ख्रिस्ती झाली असली तरी आपल्या पूर्वाश्रमातील हिंदू धर्मातील जातिभेद पाळीत असत व थोड्याशा बदललेल्या स्वरुपात मूर्तिपूजाही करीत असत. त्यामुळे हिंदूंचे व त्यांचे सख्यत्वाचे संबंध असत. मुसलमानांचीही थोडीफार लोकसंख्या या प्रांतात होतीच. ब्राह्मधर्माच्या उदार भुमिकेनुसार विठ्ठल रामजी शिंदे धर्मप्रचाराचे कार्य सर्व धर्मांच्या विविध पंथीयांत व मुले आणि स्त्रिया ह्या वर्गासाठीही जाणीवपूर्वक करीत असत. स्वदेशाभिमानी या मंगलोर येथून प्रसिद्ध होणा-या कन्नड साप्ताहिकामधून शिंदे यांची व्याख्याने, उपासना व अन्य उपक्रम यांबद्दलची निवेदने वेळोवेळी प्रसिद्ध होत असत. ह्या निवेदनावरुन शिंदे यांचे कार्य किती जोमदारपणे, व्यापकपणे व समाजाच्या सर्व स्तरांवर चालले होते याची कल्पना येऊ शकते. ४ मे १९२४ रोजी 'ब्राह्मसमाज आणि त्याचे कार्य', २९ जून १९२४ रोजी 'प्रार्थनेचे महत्त्व', ६ जुलै रोजी 'परमेश्वराचे सुगणत्व', १३ जुलै रोजी 'आत्म्याची अनश्वरता', २८ जुलै रोजी 'बौद्ध धर्म', २ ऑगस्ट रोजी 'प्रेमलक्षण', १७ ऑगस्ट रोजी 'अवतार' इत्यादी विषयांवर ब्राह्मधर्माच्या व्यापक भूमिकेवरुन त्यांनी प्रवचने केली.


त्यांनी सुरु केलेला एक विशेष उपक्रम म्हणजे ऑगस्ट १९२४ पासून भगवद्गीतेचे विवेचन करण्यासाठी उघडलेला वर्ग. हा वर्ग दर गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता व संध्याकाळी साडेसहा वाजता डोंगरकेरी ब्राह्मसमाज मंदिरात चालवीत असत. प्रत्येक गुरुवारी भगवद्गीतेतील दोन अध्यायांचे विवरण करुन बारा आठवड्यांमध्ये हे विवेचन संपविण्याचा त्यांचा इरादा होता. वेळेच्या बाबत अण्णासाहेब शिंदे मोठे दक्ष असत. या वर्गांना हजर राहणा-यांनी वेळेवर यावे, बरोबर अॅनी बेझंटनी केलेले भगवद्गीतेचे भाषांतर तसेच वही आणावी अशा सूचना त्यांनी निक्षून केल्या होत्या. मुलांप्रमाणेच स्त्रियांमध्ये धर्मप्रचारक्राय करण्याबद्दलची त्यांचा कटाक्ष होता. महिलांसाठी ते मुद्दाम व्याख्याने देत असत. बावटेकट्टे येथील महिला समाज मंदिरात 'समाजाच्या सुधारणेसाठी स्त्रियांची कर्तव्ये' या विषयावर २ ऑगस्ट १९२४ रोजी त्यांनी व्याख्यान दिले. १६ ऑगस्ट १९२४ रोजी त्यांनी महिलासभेत 'जनकसुलभासंवाद' ह्या विषयावर व्याख्यान दिले. शिंदे हे अन्य अधिकारी व्यक्तींची व्याख्याने आणि प्रवचने धर्मप्रचारकार्याचा भाग म्हणून आयोजित करीत. के. सदाशिवराव, बी. बाबू, कुमारी एम्. घोष, के. सुब्रह्मण्यम, के. रंगराव, के. लक्ष्मण इत्यादिकांची व्याख्याने व प्रवचने त्यांनी आयोजित केली. १२ ऑगस्ट १९२४ रोजी मोहरमच्या दिवशी के. सदाशिवराव यांचे 'पैगंबर महम्मद आणि मोहरम' या विषयावर व्याख्यान आयोजित केले. हिंदू, मुस्लीम, खिश्चन यांचे सण-उत्सव ब्राह्म मंदिरांमध्ये साजरे करण्याचा उपक्रम त्यांनी सुरु केला.


व्याख्यान-प्रवचनाशिवाय स्वत: अण्णासाहेब शिंदे हिंदू पद्धतीने कीर्तनेही करीत असत. २४ ऑगस्ट १९२४ रोजी कृष्णाष्टमीसंबंधी, १२ ऑक्टोबर रोजी केशवचंद्र सेन यांच्यावर, तसेच १२ मार्च १९२५ रोजी तुकारामबीजेच्या दिवशी तुकारामांवर इत्यादि कीर्तने त्यांनी केली. अण्णासाहेबांची कीर्तनाची पद्धत हिदू वा मराठी परंपरेतली असली तरी त्यांच्या निरुपणाचा विषय नवीन व दृष्टिकोण सुधारणावादी असल्याने ख्रिश्नच व मुसलमान श्रोतेदेखील त्यांच्या कीर्तनास हजर राहत असत. काही कीर्तने मराठीतून तर काही कीर्तने कानडी भाषेतून त्यांनी केली. त्यांच्या छोट्या रोजनिशीमध्ये अशा कीर्तनप्रसंगी म्हणावयाची अनेक कानडी पदे टिपून ठेवलेली आहेत. मंगलोरच्या सरकारी कॉलेजमध्ये एकदा त्यांनी सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी ह्या ख्रिश्चन संताचे आख्यान लावून इंग्रजीमध्ये कीर्तन केले.


शिंदे यांचे धर्मप्रचाराचे कार्य मंगलोर प्रांतात असे जोमदारपणाने चालले होते. एक नवे चैतन्य येथील ब्राह्ममंडळीत निर्माण झाले होते. मात्र असे असले तरी अण्णासाहेब शिंदे यांच्यावर ब्राह्मांचा एक वर्ग असंतुष्ट होता. तो म्हणजे बिल्लवांचा. वर नमूद केल्याप्रमाणे ही बिल्लव मंडळी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी एकनिष्ठ होती. स्वराज्यासाठी चाललेले चळवळीचे राजकारण त्यांना पसंत नव्हते. महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे स्वतंत्रपणे राजकारणात भाग घेत होते, याची जरी ह्या मंडळींना माहिती नव्हती तरी त्यांची राजकारविषयक मते जहाल असली पाहिजेत अशी शंका त्यांना ते डोक्यावर घालत असलेल्या गांधीटोपीवरुन आली होती व प्रवचनाच्या ओघात राजकारणाच्या संदर्बात त्यांची राजकारणविषयक मते ऐकून त्यांचा बाणा जहाल आहे याविषयी त्यांची खात्री होऊन चुकली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांची धर्मविषयक भूमिका ही केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नव्हती; तर राजा राममोहन रॉय यांच्याप्रमाणे राजकारण, समाजकारण, अर्थकारण ह्या सर्वांचा सामग्य्राने विचार करणारी व्यापक, समग्रलक्ष्यी अशी भूमिका होती. समाजकारण असो की, राजकारण, धर्माप्रमाणेच त्यांचा ते उन्नत भूमिकेवरुन विचार करीत असत. जीवनाची ही विविध अंगे त्यांच्या दृष्टीने एकमेकांपासून विभक्त असणारी नव्हती तर परस्परांचा संबंध ध्यानात घेणारी होती. ह्या भूमिकेमुळेच राजकारणाचा विचार त्यांना वर्ज्य नव्हता; उलट धर्मकारण, समाजकारण यांच्याप्रमाणे तो विषय त्यांना जिव्हाळ्याचा वाटत असे. त्यांची ही मते इंग्रजी सत्तेशी एकनिष्ठ असणा-या बिल्लव मंडळींना फारशी रुचणारी नव्हती. उदाहरणार्थ, मंगलोर येथील सरकारी कॉलेजात सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी ह्या ख्रिश्चन संतावर केलेल्या कीर्तनामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी असे प्रतिपादिले की, ब्रिटिश राज्यकतें हे राजकारण व धर्म वेगवेगळे ठेवतात. राजकारण करताना त्यामध्ये त्यांची धार्मिक दृष्टी नसते. महात्मा गांधीचे हे वेगळेपण आणि मोठेपण आहे की ते धर्माचे अधिष्ठान देऊन राजकारण करतात. मंगलोर ब्राह्म समाजाच्या ३४व्या वार्षिकोत्सवात विठ्ठल रामजी शिंदे यांनी ५ ऑक्टोबर १९२४ रोजी जे प्रवचन केले त्याचा विषयच मुळी ब्राह्मसमाज व उच्चतर राष्ट्रवाद (Brahm Samaj and Higher Nationalism ) असा होता. ब्राह्मसमाजाच्या तत्त्वाचे विवरण करण्याच्या ओघात त्यांनी असे म्हटले की, गांधीजी हे राजा राममोहन रॉय, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन ह्यांच्यानंतरचा चौथा अवतार होत. "मी जर कवी असतो तर सर्व राष्ट्राच्या परमेश्वराचे गौरवगीत लिहिले असते व त्यात महात्मा गांधी हे राजा राममोहन रॉयांचे केशवचंद्र सेन यांच्यानंतरचा चौथा अवतार होता असे वर्णन केले असते.. महात्मा गांधींनी कॉंग्रेसचे व्यासपीठ हे खालच्या पातळीवरील राष्ट्रवादावरुन उचलून ब्राह्मसमाजाच्या व्यासपीठापर्यंत उंचावले आहे. " याच प्रवचनात त्यांनी असेही म्हटले आहे की, "माझ्या मनात असे येते की आणि ही माझी श्रद्धा आहे, गांधीजी काँग्रेसचे व्यासपीट हे खालच्या पातळीवरील राष्ट्रवादावरुन उचलून ब्राह्मसमाजाच्या व्यासपीठापर्यंत उंचावले आहे." याच प्रवचनात त्यांनी असेही म्हटले आहे की, "माझ्या मनात असे येते की आणि ही माझी श्रद्धा आहे, गांधींजी काँग्रेस म्हणजे अखिल भारतीय ब्राह्मसमाजाचे कार्यकारी मंडळ आहे आणि काँग्रेसमध्येच अदृश्य स्वरुपात ब्राह्मसमाजरुपी परमेश्वराची धर्मसंस्था वसत आहे."


धर्म आणि राजकारण यांचे ऐक्य साधू पाहणारी, राजा राममोहन रॉय व म. गांधी यांच्या भूमिकांमध्ये आध्यात्मिक समानता पाहणारी विठ्ठल रामजी शिंदे यांची भूमिका त्या वेळच्या बिल्लव ब्राह्मांना रुचणारी नव्हती. कदाचित शिंदे यांची भूमिका त्यांना यथार्थ स्वरुपात समजलीही नसेल. पण याचा स्पष्ट रुपात परिणाम असा झाली की, शिंदे यांच्याबद्दल संशयाचे, अविश्वासाचे वातावरण तेथील बिल्लव मंडळींत निर्माण झाले व त्याचे पर्यवसान शिंदे यांच्याविरुद्ध कलकत्याच्या साधारण ब्राह्मसमाजाकडे तक्रार करण्यामध्ये झाले.


संदर्भ
१. स्वदेशाभिमानी या मंगलोर येथील प्रसिद्ध होणा-या कन्नड साप्ताहिकामधून अण्णासाहेब शिंदे यांनी चालविलेल्या उपक्रमाच्या सूचना व त्यांचे वृत्तान्त प्रसिद्ध होत असत. मंगलोर विद्यापीठातील कन्नड भाषा साहित्याचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. विवेकराय यांनी कन्नडमधील मजकूर मला भाषांतर करुन इंग्रजीमध्ये सांगितला.
२. शिंदे यांचे हे विचार सरकारी कॉलेजच्या इंग्रज प्रिन्सिपॉलला स्वाभाविकपणे पटेल नसावेत. या वर्षाच्या कॉलेजच्या वार्षिक अहवालामध्ये शिंदे यांच्या प्रस्तुत व्याख्यानाची नोंद आढळली नाही.
३. विठ्ठल रामजी शिंदे यांची मंगलोर येथील १९२४ मधील छोटी डायरी, शिंदे यांची कागदपत्रे.

 

  1. मँचेस्टर कॉलेज
  2. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
  3. ब्राह्मधर्मसूची ग्रंथ
  4. ब्रह्मदेशाची यात्रा
  • 112
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117
  • 118
  • 119
  • 120
  • 121
Page 117 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी