1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

प्रार्थनासमाजाची दीक्षा

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी प्रार्थनासमाजाची घेतलेली दीक्षा. मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना आगरकरांचा सुधारक वाचायला मिळू लागला होता. तेव्हापासून सुधारणावादी विचाराकडे त्यांचा कल जोराने होऊ लागला. त्यांचबरोबर बुद्धीलाच सर्वश्रेष्ठ मानून तिच्याच साह्याने देव आणि धर्म यांचा विचार करणे सयुक्तिक वाटून त्यांचा कल नास्तिकतेकडे झुकू लागला होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आल्यानंतर मिल आणि स्पेन्सर यांचे ग्रंथ मुळातून वाचल्यानंतर हा परिणाम तीव्र झालेला होता. १८९५ च्या अखेरीस त्यांचा परिचय रेव्ह. जे. टी संडरलॅंड यांच्यासशी होऊन पाश्चात युनिटेरियन अथवा एकेश्वरी धर्मपंथाची कल्पना त्यांना प्रथमतः आली. विठ्ठलरावांनी त्यांच्याशी चर्चाही केली. युनिटेरीयन पंथाचा परिचय झाल्यानंतर रूढ हिंदू धर्मातील बुद्धीला न पटणा-या कल्पना व आचार यांच्याशिवायही धर्मविचार असू शकतो याची त्यांना प्रथमतः स्पष्ट जाणीव झालेली असणार. स्पेन्सरसारख्यांनी सांगितलेल्या उत्क्रांतीसारख्या तत्त्वांचा अवलंब करून बुद्धिनिष्ठ पद्धतीने धर्माचा विचार करता येतो हे त्यांना जाणवले असावे. त्यामुळे विठ्ठलरावांच्या मनात धर्माचा फेरविचार सुरू झाला. ती त्यांची आतून जाणवणारी गरजही होती. कारण “मिलस्पेन्सरच्या विचारामुळे जो बंडखोरपणा माझ्या मनात व भोवताली माजला होता त्यांत माझ्या आत्म्याची भूक शमविण्याची शक्ती नव्हती. नास्तिकपणाच्या वाळवंटात मनाची तहान भागणे शक्य नव्हते,”१ असे त्यांनी नमूदही केले आहे. अशा मानसिक अस्वस्थतेच्या काळात त्यांनी प्रो. मॅक्सम्युलरचे ग्रंथ वाचले. धर्मावरील त्यांची विस्तृत व्याख्याने, भाषाशास्त्रचे अलोट ज्ञान व पौरस्त्य विचारांबद्दलची त्यांची समतोल वृत्ती यांमुळे ते त्यांना आप्तपुरूष वाटू लागले व धर्माकडे बघण्याची नवी दृष्टी त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली.

विठ्ठलरावांच्या मनाची घडणच अशी झाली होती की, त्यांच्या अंतःकरणामध्ये धर्माला मोठे स्थान होते. मुळात त्यांची धर्मप्रेरणा उत्कट आणि बळकट होती. त्यांच्या सश्रद्धतेवर मिल्-स्पेनरच्या विचारांचे काही काळ सावट आले तरी ते फार काळ टिकू शकले नाही. ह्या ओढाताणीच्या काळात ते गंभीरपणे आणि सखोलपणे धर्मचिंतन करीत होते व स्वतःची धर्मकल्पना सुस्पष्ट करून घेत होते. २२ मे १८९८ च्या रोजनिशीमध्ये त्यांनी लिहिले आहे, “आज संध्याकाळ किती थोर विचार मनात आले !... नेहमीप्रमाणे माझ्या धर्ममताच्या उत्कांतीची पाहणी चालली. आजपर्यंत अज्ञेयवादापर्यंत मजल पोचली होती. पण आज विचाराच्या तरंगात आमच्या अत्युच्च ब्रह्मतत्त्वाची कल्पना अगदी चित्तचक्षूपुढे सुबक झळकू लागली. होता होता मला, हल्लीच्या शास्त्रीय दृष्टीने पाहू लागलो तो ब्रह्मतत्वात व अज्ञेयवादात भेद दिसेना.”२

ह्या सुमारास बारामतीचे समाजसुधारक रामचंद्र अण्णाजी कळसकर यांची आणि विठ्ठलरावांची भेट झाली. २२ मे १८९८ रोजीच्या नोंदीमध्ये विठ्ठलरावांनी रा. कळसकर
बि-हाडी आल्याचा उल्लेख केला आहे. कळसकर यांनी ह्या सुमारास बारामतीच्या परिसरातील सहा खेड्यांमध्ये शाळा व उद्योगशाळा स्थापन करून महार, मांग या जातींमध्ये शिक्षणाचा फैलाव करण्याचे व या वर्गांमध्ये सुधारणा करण्याचे काम मोठ्या तळमळीने व त्यागपूर्वक चालविले होते. कळसकरांच्या वृत्तीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव विठ्ठलरावांवर जोरदार झाला. कळसकरांशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यासंबंधी लिहिले आहे, “त्यांचे साहस, उद्योग व स्वार्थत्याग ऐकतच होतो. त्यांचे स्वतःभाषण ऐकून तर ह्यांनी म्हार-मांग ह्या अतिनीच जातीची किती किती कळकळ दाखविली; त्यांनी काय काय केले पण आणखी कितीतरी करण्यासारखे आहे हे सर्व मनात येऊन मला स्वतःची मनःपूर्वक लाज वाचली व तिटकारा आला.”३

महात्मा जोतीबा फुल्यांनंतर अस्पृश्यांसंबंधी स्वार्थत्यागपूर्वक काम करणारे कळसकर हे एकमेव गृहस्थच एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस दिसतात. अस्पृश्यासंबंधी आपणही काही कार्य करावे ही प्रबळ प्रेरणा विद्यार्थिदशेतच विठ्ठलरावांच्या मनामध्ये कळसकरांच्या उदाहरणाने निर्माण झाली असावी. कळसकर ह्या कामी न्यायमृर्ती रानडे ह्यांचे साह्म घेत होते. त्यांच्या संस्थेसाठी पैशीची मदत  मिळण्यासाठी रानड्यांचा उपयोग होत होता. रानड्यांच्या सहवासामुळे कळसकर हेही पुण्याला आले म्हणजे प्रार्थनासमाजात जात असत असे दिसते. विठ्ठलरावांनी २९ मे १८९८ रोजी लिहिलेल्या रोजनिशीत पुढील नोंद आढळते: “आज सकाळी आठ वाजता रा. कळसकर, हुल्याळ व मी प्रार्थनासमाजातील उपासना पाहावयास गेलो होतो. पुण्यातील मंदिरातील उपासना मी आजच प्रथम पाहिली. गेल्या डिसेंबरात मुंबईतील देवळांतील ढंग पाहून मला मुळीच बरे वाटले नाही. पूज्यभाव दूर राहू समाजाविषयी तेव्हापासून माझा किंचित दुराग्रह झाला होता. समाजाचे उद्देश, भाषण व मेंबरांची कृती अथवा वागणूक यांमधील विरोध पाहून तर मला अद्यापही चीड येत आहे. समाजात कसल्याही प्रकारे जातिभेद असता कामा नये असे असता इतर सुधारकांत व समाजात मला काही. भेद दिसत नाही. म्हणजे दोघेही अद्याप जातिभेद उघड उघड झुगारण्यास तयार आहेतसे दिसत नाही.” मुंबई प्रार्थनासमाजाच्या तुलनेत पुणे मंदिरातील उपासना पाहून विठ्ठलरावांची अनुकूल भावना निर्माण झाली याचे कारण मुंबईच्या मंदिरापेक्षा पुण्यातील मंदिर साधे होते. मुंबईतल्या प्रार्थनामंदिरात ते प्रथमच गेले असल्यामुळे त्यांना तेथील ख्रिस्ती चर्चमधल्या प्रेयरची हुबेहूब नक्कल वाटली. तेथील भपकही त्यांच्या मनाला रूचला नाही. त्यांनी असेही म्हटले की, “माझ्यासाख्या गावंढळास जर नव्याने दीक्षा घ्यावयाची असली तर माझी खात्री आहे की तो मुंबईच्या रंगमहालात कधीच दीक्षा घेणार नाही.”४ विठ्ठलरावांच्या या विधानावरून मुंबई प्रार्थनामंदिराबद्दलची नापसंती आणि पुण्याच्या प्रार्थनामंदिराबद्दलचा अनुकूल भाव तर प्रकट होतोच पण दुसरी गोष्टही सूचित होते. ती म्हणजे प्रार्थनासमाजाची आपण दीक्षा घ्यावी असाही विचार या वेळेसच त्यांच्या मनामध्ये चाललेला होता. रावबहादूर का. बा. मराठे यांची पुणे प्रार्थनासमाजातील प्रार्थना आणि व्याख्यान त्यांना फार चित्तवेधक वाटले. त्यांचे मन श्रद्धेने भरून आले व प्रार्थनेची पदे इतरांबरोबर त्यांनी मनोभावे गाइली. प्रार्थनासमाजाच्या ह्या उपासनेमध्ये त्यांना हिंदू धर्माचे निर्मळ आणि उज्ज्वल स्वरूप दिसले. प्रपंच साधून परमार्थ कसा करावा ह्याचे मराठे यांनी केलेले विवरण त्यांना चित्तवेधक आणि पटण्यासारखे वाटले. वारकरी पंथाच्या आचाराविचाराला जुळणारीच ही भूमिका आहे असे त्यांना वाटले असणार.

जनाबाई आपल्या मैत्रिणीसमवेत उपासनेला गेल्या होत्या. खरे म्हणजे विठ्ठलरावांच्या आधीपासून त्या प्रार्थनासमाजात अधूनमधून जाऊ लागल्या होत्या. जनाबाई पुण्यात आल्यावर पहिल्यांदा खिश्चन शाळेतच चार-सहा महिने जात होत्या. तेथील खिश्चन शिक्षिका उठल्या सुटल्या हिंदू देवदेवतांना, धर्ममतांना एवढेच नव्हे तर पोशाखादी राहणीपद्धतींना हीन लेखून हेटाळणी करीत असत. नंतर त्या फिमेल हायस्कुलात म्हणजे हुजूरपागेत आल्या. डॉ. भांडारकर हे या हायस्कूलच्या मुख्य चालकांपैकी एक होते. म्हणूनही कदाचित असू शकेल की, हायस्कूलमधील काही मुलींना प्रार्थनासमाजात जावेसे वाटले. जनाबाईंनाही तसे वाटले होते. विठ्ठलरावांना त्यांनी परवानगी विचारली. त्यांचा स्वतःचा कल अद्यापही प्रार्थनासमाजाकडे झालेला नव्हता, तरी त्यांनी जनाबाईंना परवानगी दिली. तेव्हा जनाबाई, त्रिवेणीबाई भाटवडेकर, छोटूबाई तावडे, जानकीबाई पानसे, कावेरीबाई उल्लाळ, लिंबाबाई अशा चार-पाचजणी प्रार्थनासमाजात जाऊ लागल्या. निदान प्रारंभी तरी त्या धर्मसाधनेच्या हेतूने नव्हे तर नावीन्य म्हणून प्रार्थनासमाजात जात होत्या. परंतु डॉ. भांडारकरांसारख्या विद्वानांच्या उपासना ऐकून त्यांच्या मनामध्ये समाजाबद्दल गोडी उत्पन्न होऊ लागली होती. शिंदे यांच्या वर उल्लेखिलेल्या रोजनिशीमध्ये चि. जनाक्का ही आपल्या मैत्रिणीबरोबर आली होती व तिलाही उपासना आवडली, तिला दर रविवारी जावेसे वाटत असे त्यांनी नमूद केले आहे. आपलाही दर रविवारी जाण्याचा मनोद्य येथेच त्यांनी प्रकट केला आहे. हुल्याळ यास मात्र प्रार्थनासमाज रूचला नाही. अशा त-हेने प्रार्थनासमाजाकडे विठ्ठलरावांचा आढा वाढत चालला होता.

२९ मे १८९८ रोजी प्रार्थनासमाजामध्ये कळसकरांच्या समवेत विठ्ठलराव उपासना पाहावयास गेले. तेव्हापासून प्रार्थनासमाजाबद्दलचा ओढा त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यानंतर दर रविवारी उपासनेसाठी प्रार्थनासमाजात नियमाने व आवडीने जाऊ लागले. ३१ जुलै १८९८च्या रोजनिशीमध्ये त्यांनी नमूद केले आहे, “गेले ५-६ रविवार मी नियमाने व मोठ्या आवडीने जात आहे. जनाक्काचा भाव तर आगदी दृढ बसला आहे. प्रार्थनेत ती तल्लीन होते. आज तर ती परमानंदाने डुलत होती. माझेही लक्ष ते दोन तास धार्मिक विचारातच गुरफटले(ले) असते. गीते म्हणत असता व प्रार्थना ऐकत असता ब-याच वेळा मी श्रद्धाळू होतो. शुद्ध भावाने उपासना करणा-यास पाहून मला फार आनंद होतो. एकंदर त्या जागेत त्या वेळी माझी भावना काही विलक्षणच होते. कल्पनाशक्ती व उच्च मनोवृत्ती ह्या जोराने उचंबळतात. इतर बाबतीप्रमाणे धर्माबाबतीतही केवळ बुद्धीच्या जोरावरच विचरण्याचा माझा पूर्वीचा आग्रह थोडा ढिला पडत चालला आहे व त्यासरशी श्रद्धा बळावत आहे. पण ह्या धांदलीत मनाची शांतता वाढत आहे!”५ प्रार्थनासमाजाच्या उपासनेस उपस्थित राहू लागल्यानंतर विठ्ठलरावांमध्ये झालेला ठळक फरक ह्या तारखेस नोंदला गेला आहे. धर्मबाबतीतही केवळ बुद्धीच्या जोरावर विचरण्याचा त्यांचा पूर्वीचा आग्रह थोडा ढिला पडत चालला व त्याबरोबरच श्रद्धा बळावत चालली हा स्वतःच्या मनोवृत्तीत झालेला फरक विठ्ठलरावांनी येथे नमूद केलेला आहे.

कळसकर यांचे खेड्यातील समाजाच्या तसेच महार, मांग या अस्पृश्य समजल्या जणा-या वर्गाच्या शिक्षणासाठी जे प्रयत्न चालले होते ते विठ्ठलरावांच्या नजरेसमोर ठळकपणे होते. आपणही त्या प्रकारचे प्रयत्न करावे ही प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांनीच पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या त्यांच्या मंडळामध्ये चर्चा चालविली होती. विठ्ठलराव, माधवराव हुल्याळ, गोविंदराव सासने आणि केशवराव कानिटकर हे आपण भावी काळात सामाजिक कार्य करण्यासाठी एखादी मंडळी स्थापन करावी ह्यासंबंधी तासचे तास बसून वाटाघाट करू लागले.”६

विठ्ठलरावांचा प्रार्थनासमाजाकडील ओढाही वाढलेला असल्यामुळे ते समाजाच्या एका उत्सवाला रोज जाऊ लागले. तेथे श्री. गणपत भास्कर कोटकर या वृद्ध पेन्शनर गृहस्थाचा दाट परिचय घडला. त्यांच्या प्रेमळपणामुळे व कळकळीमुळे त्यांच्या उपासना विठ्ठलरावांना आवडू लागल्या. अधूनमधून समाजाचे प्रचारक श्री. शिवरामपंत गोखले यांचे अनुभव ऐकायला मिळत असत. त्यांच्या साधेपणाचाच प्रभाव चांगला पडत असे. समाजाचे सेक्रेटरी केशवराव गोडबोले यांचा नियमितपणा व कार्यतत्परता चोख होती. न्यायमूर्ती रानडे व डॉ. भांडारकर यांचाही थोडाफार समागम घडू लागला. विशेषतः डॉ. भांडारकरांचा प्रभाव सर्वात अधिक विठ्ठलरावांच्या मनावर झाला. समाजात गाण्याचा पुढाकार घेणारे वृद्ध पेन्शनर गणपतराव आंजर्लेकर यांची संगत घडू लागली.

प्रार्थनासमाजाच्या ह्या सर्व मंडळींचा आपल्यावर कसा परिणाम झाला हे सांगताना विठ्ठलरावांनी लिहिले आहे, “या सर्व वृद्ध मंडळींनी मला भारून टाकून तारुण्याचा आडमूठपणा, विचारांचा उच्छृंखलपणा व अनुभवाचा हिरवटपणा या भोव-यांतून माझी सुटका करून शुद्ध, उदार धर्माच्या शांत प्रवाहात मला आणून सोडले.”७

उत्सवाच्या शेवटी असणारे प्रीतिभोजन गणपतराव कोटकरांच्या राहत्या घरात झाले. बोटॅनिकल  गार्डनजवळ ‘शांतिकुटिर’ नावाची कोटकरांची साधी झोपडी होती. विठ्ठलराव प्रार्थनासमाजाचे सभासद नसताही त्यांना बोलावणे आले. ह्या भोजनात पुणे समाजातील सर्व वृद्ध मंडळी व मुंबई समाजातील सर्व तरुण मंडळी एकत्र जमली होती. फराळ, भजन, प्रार्थना, उपदेश, भोजन, संभाषण आणि सहल वगैरे प्रकार दिवसभर झाले. हे प्रत्यक्ष दृश्य अनुभवून विठ्ठलरावांना वाटले की, ही नुसती एक रविवारची सभा नसून देवाच्या कन्यापुत्रांचे एक शुद्ध कुटुंब आहे. समाजाविषयी त्यांच्या मनात असणा-या आशंका, संशय व तेढ दूर झाली. गणपतराव कोटकर आणि सातारच्या समाजाचे सीतारामपंत जव्हेरे यांच्या सहवासात समाजाचा इतिहास कळला व तत्त्वांचा परिचय घडला.

प्रार्थनासमाजाची आपण दीक्षा घ्यावी अशी विठ्ठलरावांच्या ठिकाणी तीव्र ओढ निर्माण करणारी घटना म्हणजे प्रतापचंद्र मुजूमदार यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या केशवचंद्र सेन यांच्या चरित्राचे त्यांनी केलेले वाचन. हे चरित्र वाचल्यानंतर विठ्ठलरावांची चित्तवृत्ती कमालीची उत्तेजित झाली. विशेषतः या चरित्राच्या अखेरीस जोडलेल्या केशवचंद्रांच्या जीवनवेद या आत्मचरित्राच्या भागाचे वाचन करताना व त्यातील बॅप्टिझम ऑफ फायर(अग्रिस्नान) हे प्रकरण वाचून तर आपण प्रार्थनासमाजाचे केवळ सभासद होऊ नये, तर समाजाला आजन्म वाहून घेणारा प्रचारक व्हावे, अशी अनिवार ओढ विठ्ठलरावांना लागून राहिली.

केशवचंद्र सेन यांच्या जीवनवेद या नावाच्या आत्मचरित्राच्या पहिल्या प्रकरणात आपल्या जीवनात असलेले प्रार्थनेचे महत्त्व त्यांनी विशद केलेले आहे. केशवचंद्रांनी म्हटले आहे, “जीवनरूपी वेदापासून मी घेतलेला पहिला धडा प्रार्थना हा होय. ज्या वेळेला मला कुणाचेच साह्य मिळाले नाही, मी कोणत्याच धर्मसंस्थेचा सदस्य झालो नव्हतो वा कोणत्याच धर्मव्यवस्थेच्या गुणाचा निवाडा केला नव्हता अथवा कोणत्याही धर्मसंस्थेचा स्वीकार केलेला नव्हता, अथवा कुणाही सश्रद्धांच्या अथवा भक्तांच्या जवळ गेलो नव्हतो, अशा त्या आध्यात्मिक आयुष्याच्या पहाटेच्या वेळी माझ्या अंतःकरणामध्ये एकच आवाज घुमला -तो म्हणजे ‘प्रार्थना.’ प्रार्थनेचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे. कारण एके काळी प्रार्थनेशिवाय आपल्याला अन्य कुणाकडून साह्य मिळाले नाही. आपल्याला प्रार्थनेच्या अंती स्फूर्तीच्या रूपात आदेश मिळत गेले. मी कोणता धर्म स्वीकारावा? मी सर्व व्यावहारिक काम सोडून मिशनरी बनावे काय? माझे पत्नीशी संबंध कशा प्रकारचे असावेत? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रार्थनेच्या अंती मिळत राहिली. मला त्या वेळी प्रार्थनेमागील सिद्धान्त असा माहीत नव्हता, परंतु माझी अशी खात्री होती जो कोणी प्रार्थना करतो त्याला प्रतिसाद मिळतो. प्रार्थनेमुळे आपली बुद्धी स्वच्छ झाली. क्रमशः आपण ब्राह्मधर्माचा स्वीकार केला व भक्त, मिशनरी आणि प्रचारक बनलो. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी घडल्या. आपली प्रार्थनेवर श्रद्धा असल्यामुळेच आपल्या आयुष्याला सध्याचा आकार प्राप्त झाला.” अशा प्रकारे प्रार्थनेचे महत्त्व केशवचंद्रांनी आत्मचरित्राच्या पहिल्या प्रकरणात विशद केले आहे. विठ्ठलरावांच्या मनावर याचा परिणाम होणे स्वाभाविक होते. पण अंतिम आणि जोरदार परिणाम झाला तो ह्या जीवनवेदाच्या ‘अग्निस्नान’ ह्या तिस-या प्रकरणाच्या वाचनाचा.

जलस्नानाने विधिसंस्कार करून ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली जाते त्याला ‘बॅप्टिझम’ अथवा ‘बाप्तिस्मा’ असे सांप्रदायिक नाव आहे. केशवचंद्र सेनांनी जलस्नानाच्या ऐवज ‘अग्रिस्नान (Fire of Baptism) असा शब्दप्रयोग करून अग्नी हा शब्द उत्साह या अर्थासाठी वापरला आहे. त्यांनी लिहिले आहे, “मी जेव्हा माझ्या आत्म्याला विचारतो की, जीवनारंभी तुला धर्मदीक्षा कशा प्रकारे दिली गेली, तर माझा आत्मा उत्तरतो, ‘अग्निस्नान घालून.’ मी अग्निधर्माचा पूजक आहे. मी उत्साहसिद्धान्ताचा पक्षपाती आहे. माझी धारणा अशी आहे की, सतत अग्निपरीक्षा होत राहणे, उत्साहपूरित अवस्थेत राहणे म्हणजेच मोक्षाची अवस्था अनुभवणे. हा अग्निसंप्रदाय म्हणजे काय?  मला कित्येकांची आयु्ष्ये अशी दिसतात की, त्यांच्यात केवळ थंडपणा असतो आणि अग्नी अगदीच नसतो. तर कित्येक माणसांची आयुष्ये अशी असतात की, त्यांच्यात अग्नी असतो आणि थंडगारपणा अजिबात नसतो. पहिल्या वर्गातील लोक सौम्य, कृतिविन्मुख असतात, जे काय करतील ते डोके थंड ठेवून करणारे असतात. त्यांची गती संथ असते. त्यांच्या शब्दात मनःपूर्वकतेची ऊब नसते आणि त्यांच्या अंतःकरणात उत्साहाचा लवलेश नसतो ह्याच्य विरुद्ध प्रकृतीचे लोक म्हणजे उत्साहरूपी अग्नि असणारे. उत्साहाने परिपूर्ण असणे हा त्यांचा जन्मजात स्वभाव असतो. तो क्षणिक पराक्रमाचा भाग नसतो. हा उत्साहरूपी अग्नि येणारा आणि जाणारा नसतो. धर्माच्या शब्दकोशातील व्याख्याः उष्णता म्हणजे जीवन, ह्या उष्णतेचा अभाव म्हणजे मरण. ज्या वेळेला वैद्याला आढळते की एखाद्या माणसाच्या शरीरातील उष्णता नष्ट होऊन ते थंडगार पडले आहे त्या वेळेला तो सांगतो, ह्या माणसाचा प्राण गेलेला आहे. धर्मजीवनातही तेच खरे आहे. म्हणून याच कारणाने आयुष्याच्या प्राथमिक अवस्थेपासून मी अग्नीचा (उत्साहाचा) पुरस्कर्ता आहे. जेव्हा माझ्यात थंडगारपणा निर्माण झाला आहे की काय अशी शंका येते, त्या वेळेला माझे हद्य भीतीने धडधडायला लागते. मी पापी आहे की नाही हे कळायला वेळ लागेल पण मी जिवंत आहे की मेलो आहे हे कळायला वेळ लागायचे कारण नाही. मी थंड आहे का उबदार आहे यावरून मी ते तात्काळ ठरवू शकतो. मी अग्नीमध्ये राहतो, मी अग्निला कवटाळतो, मी अग्नीला आलिंगन देतो, त्याला उच्च पदवी देतो... जिथे जिथे मला उबदारपणा आढळतो तिथे तिथे आशा, आनंद आणि धैर्य हेही आढळते. माझ्या अंतःकरणाभोवती, माझ्या समाजाभोवती मी सदैव उत्साहाचा अग्नी प्रज्जवलित ठेवला आहे. समाजाच्या एका घटकाची मी सेवा केल्यानंतर, अन्य समाजघटकाची सेवा करण्याची इच्छा माझ्यामध्ये उदभूत होते... मी सदैव नवीनाच्या पाठीमागे धावतो. नव्या गोष्टी, नवा आनंद, नव्या कल्पना यांची मी स्पृहा करतो... हा माझ्यातील गुण समजा की अवगुण, मला नेहमी उबदारपणा आवडतो. कृतिविन्मुख राहणे मला कठीण जाते. समाजापासून दूर जाऊन स्वतःला लपविणे मला केवळ अशक्य असते. मी आपादमस्तक अग्नीने परिपूर्ण आहे. या पद्धतीनेच मी धर्मसाधना केली आहे, धर्मसेवा बजावली आहे. जे थंड असतात ते सामान्यतः भित्रे असतात. पाच-दहा वर्षे काम केल्यानंतर ते पळ काढतात. म्हणून तुमच्यात अजून अग्नी आणि आवेग टिकून आहे की नाही हे लक्षपूर्वक पाहा... तुमच्या मुखातून निराशेचे थंडगार शब्द कधीही न निघोत. तुमच्यामध्ये इतका अग्नी असावयास पाहिजे की तुमच्या बोटांना स्पर्श करताच तो माझ्यामध्ये प्रविष्ट व्हावा.”८

केशवचंद्र सेन यांचे हे विचार आणि मनोवृत्ती विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अंतःकरणाला भिडणारी होती. त्यांचे अंतःकरण भावनाप्रधान व मनोवृत्ती उत्कट होत्या. त्यांच्या ठायी जीवनोत्साहाची ऊर्जा प्रचंड प्रमाणात होती व ती प्रकट होण्यासाठी, कार्यप्रवण होण्यासाठी जणू का वाट शोधत होती. केशवचंद्रांचे हे विचार आणि विठ्ठलरावांच्या ठायी असलेला जीवनोत्साहरूपी ऊर्जा यांचा संयोग होऊन त्यांना आपल्या भावी आयुष्याचे ध्येय स्पष्ट दिसू लागले. उन्नत धर्मकार्य करण्यासाठी आपण प्रार्थनासमाजाच्या कामाला स्वतःला वाहून घ्यावे ही ओढ त्यांना लागून राहिली. त्यांच्या डोक्यात रात्रंदिवस तेच तेच विचार सातत्याने येत राहिले. त्याच त्याच तरूण आणि वृद्ध मंडळींच्या गाठीभेटी घडत राहिल्याने समाजाशिवाय त्यांना सुचेनासे झाले. विठ्ठलराव, डेक्कन कॉलेजातील बी.ए.चे विद्यार्थी नानालाल दलपतरा कवी, न्यू इंग्लिश स्कूलमधील  मारवाडी जातीचे पदवीधर तरूण शिक्षक मोती बुलासा, भांडारकरांचे धाकटे चिरंजीव देवदत्त, वासुदेव अनंत सुखटणकर, लक्ष्मणराव ठोसर वगैरे तरुण मंडळी समाजात आडवारी वरचेवर जमू लागली. त्यातच कोटकरांसारखी वृद्ध मंडळी मिळून मिसळून वागू लागली. परिणाम म्हणून ही सर्व तरुण मंडळी समाजाची रीतसर दीक्षा घेऊन सभासद झाली. विठ्ठलरावांनी अशा त-हेने प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. ते रीतसर ब्राह्मसमाजाचे अनुयायी बनले व आयुष्याच्या एका नव्या वळणावर आले.

संदर्भ  
१. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १०९.
२. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. २७.
३. तत्रैव, पृ. २८.
४. तत्रैव, पृ. २८-२९.
५. तत्रैव, पृ. ३८.
६. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ११०.
७. तत्रैव, पृ. १११.
८. P.C. Muzumdar, The Life and Teachinge Keshub Chunder of Sen (3rd
   ed.) The Nababidhan Trust, Caicutta, 1931, P. 325-331.

प्रार्थनासमाज

मुंबईचा प्रार्थनासमाज हे बंगालमधील ब्राह्मसमाजाचे भावंड म्हणता येईल. मुंबईच्या प्रार्थनासमाज या संस्थेची स्थापना ३१ मार्च १८६७ रोजी फाल्गुन वद्य एकादशी म्हणजे पापमोचनी एकादशीच्या दिवशी झाली. प्रार्थनासमाज व  ब्राह्मसमाज ह्या संस्था बहुतेक सारखीच तत्त्वे प्रतिपादणा-या आहेत. मुंबई येथे प्रार्थनासमाज स्थापन होण्यामागे कोणती परिस्थिती होती, प्रार्थनासमाजाच्या स्थापनेस ब्राह्मसमाजाचे अस्तित्व काही एका प्रमाणात कारणीभूत झाले का, वगैरे इतिहास थोडक्यात ध्यानात घेऊ.

महाराष्ट्रामध्ये इ. स. १८१८ मध्ये पेशव्यांची सत्ता संपुष्टात येऊन इंग्रजी सतेचा अंमल सुरू झाला. पेशव्यांच्या दरबारात इंग्रजांचा वकील असलेला एल्फिन्स्टन मुंबईचा पहिला गव्हर्नर झाला. इंग्रजी अमलाबरोबर नवीन धर्तीच्या शिक्षणाचा प्रारंभ झाला. मुंबई शहराची वस्ती वाढून उद्योगधंदे, व्यापार, सट्टे ह्या सर्वांच्या द्वारे धनाची विपुलता निर्माण झाली. वाढत्या संपत्तीबरोबर वेश्यांचे नाचगाणे व दुर्व्यसनांचे इतर प्रकार सुरू झाले. ख्रिस्ती मिशन-यांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच महाराष्ट्रात शिरकाव करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. १८१४ मध्ये त्यांच्या प्रयत्नाला यश आले व मुंबईतील वास्तव्याला सरकारची परवानगी मिळाली. त्यानंतर हळूहळू त्यांनी धर्मविषयक विचाराच्या प्रसृतीला सुरुवात केली. त्यांचे हे काम जोमाने चालले होते. १८५२ साली स्वधर्माचा त्याग करून ख्रिस्ती झालेल्यांची संख्या एक लाख बाराशे पंचविस एवढी झाली. चर्च मिशनरी मंडळी, लंडन मिशनरी मंडळी, वेस्लियन मिशन इत्यादी मिशन-यांच्या संस्थांनी शाळा काढून शिक्षण देण्याचे काम झपाट्याने चालविले होते. या मिशन-यांच्या शाळांमध्ये सुमारे पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त मुले शिक्षण घेऊ लागली होती. इंग्रजी सत्तेमुळे येथे सुरू झालेल्या नव्या शिक्षणाच्या प्रथेबरोबर इंग्रजांच्या संस्कृतीचा, त्यांच्या धर्माचा, त्यांच्या राहाटीचा नव्याने परिचय इंग्रजी शिकलेल्या महाराष्ट्रातील तत्कालीन तरुण पिढीला होऊ लागला. त्यामुळे वास्तवाचे व विचारांचे एक नवे विश्व त्यांच्यासमोर खुले झाले. इंग्रजी संस्कृतीचा आणि विचाराचा परिणाम अप्रत्यक्षपणे होऊ लागला, तर मिशन-यांचे आक्रमण अधिक स्पष्ट स्वरूपात घडू लागले. याचा स्वाभाविक परिणाम म्हणून आपला धर्म, आपल्या सामाजिक संस्था आणि आपली जीवनपद्धती याबाबत नवशिक्षित पिढी अंतःर्मुख होऊन विचार करू लागली. रूढ हिंदू धर्मातील अनेक चालीरीतींचा समाजावर कसा अनिष्ट परिणाम होत आहे हे त्यांना जाणवू लागले. मूर्तिपूजेमुळे, जातिभेदामुळे समाजाची अवनत अवस्था झालेली आहे, हेही त्यांना प्रकर्षाने जाणवू लागले. इंग्रजी संस्कृतीकडून मूकपणे घडणा-या व ख्रिस्ती मिशन-यांकडून उघडपणे होणा-या आक्रमणाला तोंड देण्याची, कृतिशील उत्तर देण्याची गरज निर्माण झाली. अशा काळात महाराष्ट्रातील तत्कालीन कर्त्या, जबाबदार पुरुषांनी प्रार्थनासमाजाची स्थापना धार्मिक, सांस्कृतिक आक्रमणाला एक प्रकारे कृतिशील उत्तर देण्याचा प्रयत्न केला असे म्हणणे रास्त ठरेल.

 मिशन-यांचे आक्रमण एका बाजूने सुरू असताना नवशिक्षित मंडळींनी दर्पण, प्रभाकर यांसारखी वृत्तपत्रे, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, गुजराती व मराठी ज्ञानप्रसारक सभा यांसारखे उपक्रम सुरू करून लोकशिक्षणाचे कार्य आरंभिले. त्याचबरोबर समाजातील विचारी वर्ग रूढ धर्मातील दुष्ट व वेडगळ समजुतींमुळे समाजाचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता. विशेषतः स्त्रियांवर होणारा अन्याय व जाती-जतींमधील उच्चनीच भाव, सोवळेपणा ह्यामुळे आपल्या समाजचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता. हे व या प्रकाचे विचार विशेषतः दादोबा पांडुरंग तर्खडकर, राम बाळकृष्ण जयकर, डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, तुकाराम तात्या पडवळ, बाळा भाऊ शिंत्रे, लक्ष्मणशास्त्री हळबे, भिकोबा लक्ष्मण चव्हाण वगैरे त्या वेळच्या कर्तबगार गृहस्थांच्या मनात घोळत असत. ह्या सुमारास पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा व राम बाळकृष्णांच्या भेटीचा योग मुंबई शहरामध्ये आला. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी, याबद्दलची ईश्वरचंद्राची तळमळ, त्यांची विद्वत्ता व सत्यनिष्ठा यांचा राम बाळकृष्णांच्या मनावर अत्यंत इष्ट परिणाम घडला. पंडित ईश्वरचंद्र हे महर्षी देवेन्द्रनाथांच्या तत्त्वबोधिनी सभेचे सभासद होते. पंडित ईश्वरचंद्र यांचे राम बाळकृष्ण आणि इतर मंडळींसमवेत ब्राह्मसमाजाविषयी बोलणे झाले असण्याची शक्यता आहे. कलकत्त्यातील ब्राह्मसमाजाप्रमाणे मोठी नसली तरी अल्प प्रमाणावर आपण येथे चळवळ सुरू करावी असा निश्चय करून ह्या मंडळींनी राम बाळकृष्णांसमवेत १८४० च्या सुमारास ‘परमहंस मंडळी’ नावाची संस्था स्थापन केली. प्रथमतः ही मंडळी गुप्त होती. प्रकटपणे समाजाला न रूचणा-या गोष्टींसंबंधी चळवळ करण्याला हा काळ अनुकूल नाही असे समजून परमहंस मंडळीचे काम गुप्त ठेवण्यात आले. मूर्तिपूजेचा निषेध, एकेश्वरी मताचा पुरस्कार व जातिभेदाचा उच्छेद हे परमहंस मंडळीचे मुख्य उद्देश होते. जातिभेद मोडल्याची साक्ष म्हणजे पावरोटी सर्वांसमक्ष खाणे. सभेस प्रारंभ होताना व अखेरीस देवाची प्रार्थना म्हणण्याचा प्रघात असे. दादोबा पांडुरंगांनी लिहिलेला हस्तलिखित स्वरूपातील ग्रंथ सभासदांना वाचावयास देत असत. कोणताही एक धर्म ईश्वरद्त्त नाही असे त्यामध्ये विवेचन केले होते. दादोबा पांडुरंग यांनी ‘पारमहंसिक ब्राम्ह्यधर्म’ नावाचे छोटे पद्यमय प्रकरण लिहिले होते व त्यामध्ये ईश्वरभक्ती व भूतद्या, भक्ष्याभक्ष्य विचार इत्यादी बाबींसंबंधी विवेचन केले होते. परमहंस मंडळींच्या शाखा मुंबईच्या बाहेर पुणे, अहमदनगर, सातारा, बेळगाव, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी निघाल्या व एकंदर सभासदसंख्या हजारापर्यंत गेली. परंतु कोणा एका नविन सभासदाने मंडळींचे दप्तर लांबविले. सभासदांची नावे प्रसिद्ध केली व सभेच्या हेतूचा विपर्यास करून टीका केली. ही सभासदमंडळी अमुक एक दिवशी ख्रिस्ती होणार अशी भुमका उठविली. याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये सभासदांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. सभासदांची उपस्थिती रोडावली व हळूहळू परमहंस सभेचे काम बंद झाले.

परमहंस सभा जरी संपुष्टात आली तरी तिच्यामुळे जी जागृती झाली ती नष्ट झाली नाही. परमहंस मंडळीतील काही सभासदांस धर्माचीच अत्यंत आवश्यकता वाटत होती. डॉ. आत्माराम पाडुरंग, भिकोबादादा चव्हाण इत्यादी मंडळी एकमेकांपासून दूर झालेली नव्हती. पुढे कोणत्या मार्गाचा अवलंब करावा याच्याबद्दल विचारविनिमय चाललेला होता. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, ज्ञानप्रसारक सभा, बाँबे असोसिएशन यांच्याद्वारा त्याचप्रमाणे हिंदू रिफॉर्मर, दंभहारक, प्रभाकर, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश इत्यादी वृत्तपत्रांच्या द्वारा व अप्रत्यक्ष रीतीने होत होताच. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, जनार्दन सखाराम गाडगीळ, विष्णुशास्त्री पंडित हे सामाजिक विषयात लक्ष घालून संस्थांच्या द्वारा व लेखलनाद्वारा उपयुक्त कामगिरी बजावित होते. १८६३ मध्ये इंदुप्रकाश निघाल्यापासून सामाजिक सुधारणेस अनुकूल असे धडाडीचे लेख प्रसिद्ध होत. अशा प्रकारे लोकजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू झाले होते. पंचवीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत सर्वांगीण सुधारणेला अनुकूल अशा प्रकारचे वातावरण निर्माण होऊ लागले.
 
मात्र १८६४ मध्ये आर्थिक आघाडीवर मुंबईत वेगळेच चित्र दिसू लागले होते. शेअर्सच्या सट्टेबाजीत हजारो लोक धनवान बनले. पैशाशिवाय अन्य गोष्टींकडे लक्ष देण्याची कुणाच्या ठिकाणी वासना राहिली नव्हती. अशा वेळी ब्राह्मधर्माचे प्रभावी प्रचारक ब्रह्मानंद केशवचंद्र सेन मुंबई व्याख्याने देण्यासाठी आले होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, अमोघ वक्तृत्व, उदार विचार आणि अंतःकरणास भिडावे अशा प्रकारचे उद्गार या कशाचाही परिणाम संपत्तीने उद्दाम बनलेल्या मुंबईकरांवर झाला नाही. मात्र पुढच्याच वर्षी म्हणजे १८६५ मध्ये अमेरिकेतील सिव्हिल वॉर संपले. कापसाच्या किमती गडगडल्या व शेकडो व्यापा-यांचे दिवाळे निघाले. आर्थिक संकटांनी हाहाकार उडाला. सांपत्तिक स्थितीतील हा चढउतार पाहिल्यावर परमहंस सभेतील जुनीमंडळी पुन्हा उत्साहाने कामाला लागली. १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या घरी बाळ मंगेश वागळे, भास्कर हरी भागवत, नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद, सर्वोत्तम सखाराम मानकर, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे इत्यादी मंडळी उपस्थित राहिली. ह्या बैठकीमध्ये सामाजिक सुधारणेच्याच विषयाचा ऊहापोह झाला व विधवाविवाह, स्त्री-शिक्षण या कार्यास उत्तेजन द्यावे; बालविवाहाची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावा, जातिभेदाची चाल वाईट असल्याचे उघडपणे प्रतिपादावे इत्यादी विचार झाला. परंतु ह्यासंबंधी झालेल्या नंतरच्या सभांमध्ये ऐहिक कल्याणावर विशेष दृष्टी ठेवून ही कार्ये हाती घेण्यापेक्षा मनुष्याचे ह्या जन्मी मुख्य कर्तव्य जे परमार्थसाधन त्याकडे विशेष दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार कायम प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा निश्चय करण्यात आला. फाल्गुन वद्य एकादशी, शके १८७८ रविवार दिनांक ३१ मार्च १८६७ रोजी ईश्वरोपासनेस प्रारंभ झाला. समाज स्थापण्याच्या वेळी उद्देश व मूलतत्त्वे निश्चित करण्यात आली. देव एकच व निराकार आहे; त्याचे मानसिक भजन, पूजन करणे योग्य व आपले कर्तव्य आहे; मूर्तिपूजा हा असन्मार्ग असून देवास अपमानकारक आणि मनुष्यास नीचत्व आणणारा व दुराचरणाप्रत नेणारा आहे, तेव्हा हा असन्मार्ग सुटून सन्मार्गात लोकांची प्रवृत्ती व्हावी हा या समाजाचा उद्देश आहे असे स्पष्ट करण्यात आले. त्याशिवाय मूलतत्त्वामध्ये मूर्तिपूजेवर माझी श्रद्धा नाही असे स्पष्ट कलम घातले. समाजाचा सभासद होणा-यांस ही तत्त्वे मान्य असावी लागत. शिवाय त्याला पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा करावी लागे. “मी प्रत्यही परमेश्वराचे चिंतन करीत जाईन. सत्कर्मे आचरावयास व असत्कर्मापासून दूर रहावयास मी यत्न करीन. स्वभावदोषाने काही वाईट कर्म मजकडून घडल्यास त्याविषयी पश्चाताप व्हावा एतदर्थ परमेश्वरापाशी प्रार्थना करीन. हे परमेश्वर, ह्या प्रतिज्ञा पाळण्याचे सामर्थ्य मला दे.”

संस्थेची स्थापना होतेवेळी प्रार्थनासमाज हे नाव दिले गेले नव्हते. ऑक्टोबर १८६७ मध्ये टीकेला उत्तर देताना समाजाच्या एका सभासदाने ह्या मंडळीचे नाव प्रार्थनासमाज आहे असे स्पष्ट विधान केले.

प्रार्थनासमाजाने स्थापनेच्या वेळी ब्राह्मसमाजाचा नमुना डोळ्यांसमोर ठेवला होता ही गोष्ट खरी असली तरी मुंबईच्या मंडळींनी आपले स्वतःचे स्वत्त्व कायम ठेवून तत्त्वांची रचना केली होती असे दिसते. खुद्द देवेंद्रनाथ हे स्वतः जरी मूर्तिपूजेच्या जोरदार विरोधात असले तरी आदि ब्राह्मसमाजाच्या तत्वामध्ये प्रतिमापूजनासंबंधाने जोरदार विरोध दिसत नाही. देवेंद्रनाथांच्या काळातच ब्राह्ममंदिरातील वेदीच्या पाठीमागे जाऊन केला जाणारा वेदमंत्राचा घोष, ट्रस्टडीडशी विसंगत ठरणारा अवतारवादाला अनुकूल असा उपदेशकांकडून प्रकट होणारा विचार हा अनुभव घेतल्यानंतर १८४४ मध्ये महर्षी देवेंद्रनाथांनी प्रतिमापूजनाचा आपण त्याग करीत आहोत अशी इतर वीस अनुयायांसह प्रतिज्ञा घेतली व जे प्रतिमापूजनाच्या विरोधात आहे्त तेच खरे ब्राह्म असे जाहीर केले. बंगालमधील हा अनुभव ध्यानात घेऊन मुंबई प्रार्थनासमाजाने प्रारंभिक काळात मूर्तिपूजेसंबंधी ही कठोर भूमिका अंगीकारली असावी.

३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थनासमाजाची स्थापना झाल्यानंतर त्यासंबंधीची बातमी ख्रिस्ती धर्ममताच्या ज्ञानोद्य ह्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली. प्रतिमापूजन निषिद्ध मानून परमेश्वराची भक्ती करणा-या मंडळींकडे ख्रिस्ती लोक अपेक्षेने बघत असत. हे लोक पुढे-मागे ख्रिस्ती धर्म स्वीकारतील अशी त्यांना आशा वाटत असे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ख्रिस्ती मंडळींना आत्मीयता वाटत असे. मुंबई प्रार्थनासमाजाचे पहिले आचार्य अशी मान्यता असलेले श्री. भिकोबादादा चव्हाण हे मोठे ईश्वरनिष्ठ व प्रगल्भ मनोवृत्तीचे गृहस्थ होते. २ जून १८६७ रोजी बघितलेल्या उपासनेचे वर्णन ज्ञानोद्याचे संपादक शाहूराव कुकडे यांनी केले आहे. डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या कांदेवाडीतील माडीवरील दिवाणखान्यात शंभराहून जास्त मंडळी जमली असल्याचा त्यांनी निर्देश केला. त्यांनी म्हटले, “आम्ही गेलो तेव्हा रा. भिकाजी लक्ष्मण म्हणून एक भंडारी मनुष्य सिंहासनावर उभा राहून ईश्वराची प्रार्थना कशी करावी व प्रार्थना करणा-यांनी कसे वर्तावे या विषयावर एक निबंध वाचीत होता... हे काम चालविण्याकरिता ह्या मंडळींसारखा कोणी विद्वान, सुधारलेला, वजनदार मनुष्य नेमावा... कुणी योग्य मनुष्य मिळेपर्यंत पूर्वोक्त भंडारी मनुष्य त्यांनी उभा केला आहे हे बरे केले. पण तो असल्या मंडळींत शोभत नाही व लायक नाही... जो व्याख्याने देतो तोही पोशाख, भाषण वगैरे गोष्टींनी संभावित असला पाहिजे.”१ भिकोबादादा चव्हाण हे ‘मनी स्कुला’त मराठी शिक्षकाचे काम करीत असत. त्यांचा प्रेमळ स्वभाव, उत्कट ईश्वरनिष्ठा, सरळ वृत्ती ह्यांची माहिती नसल्यामुळे व भंडारी लोक वापरीत तसे मोठे पागोटे, अंगरखा व धोतर असा पोशाख पाहून त्यांच्यासंबंधी ज्ञानोद्यकारांनी अशा प्रकारचे अप्रस्तुत गैर उद्गार काढले.

आपल्या मतानुसार ईश्वरावर किती आत्यंतिक स्वरूपाची निष्ठा असू शकते याचे उदाहरण म्हणून भिकोबादादा चव्हाणांकडे निर्देश करता येऊ शकेल. दीनानाथ माडगावकर यांनी भिकोबादादांच्या आय़ुष्यातील एका प्रसंगाचे वर्णन केले आहे. उतरवयामध्ये भिकोबादादांची ‘मनी स्कुला’तील मराठी शिक्षकाची नोकरी संपली होती. त्यांना मिळणारे अल्पस्वल्प वेतन थांबले होते. अशा अवस्थेत त्यांच्या एकुलत्या एक साठ-सत्तर रुपये कमविणा-या पस्तीस-छत्तीस वर्षांच्या मुलास देवाज्ञा झाली. त्या मुलाला पत्नी व दोन मुले होती. अशा विपन्नावस्थेत संसार चालविण्याचा भार भिकोबादादांवर येऊन पडला. भिकोबादादांच्या मुलाच्या निधनाचे वृत्त ऐकून प्रार्थनासमाजातील लहानथोर मंडळी त्यांना भेटून सांत्वन करण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरी गेली. त्याप्रसंगी कोमल अंतःकरणाच्या एकदोन सभासदांना तर भिकोबादादांना बघितल्यावर रडे कोसळले. आपल्या भेटीस आलेल्या मित्रांची स्थिती पाहून भिकोबादादा काही वेळपर्यंत तो दुःखाच उमाळा शांत होईल म्हणून त्या मित्राकडे टक लावून पहात राहिले. शेवटी म्हणाले, “हे तुम्ही काय आरंभिले आहे? हा तुमच्या अश्रूंचा लोट मजवर हा दुर्घट प्रसंग गुदरला याबद्दल आपणास अतिशय दुःख होत आहे त्याची साक्ष आहे आणि देवाने ह्या दुःखात मला घालू नये होते असे आपणास वाटले, याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे असा माझा समज झाला आहे. तो चुकीचा नसेल तर आपल्या ह्या मनोवृत्तीबद्दल मला फार वाईट वाटते. परमेश्वर मायबाप आहे. तो कृपासागर, करुणानिधान असून न्यायी आहे असे मानणारे व तोंडातून उद्गार काढणारे तरी आपण सर्व आहोत. मग असे परमेश्वराविषयी मनात येणे अथवा त्यास मनात थोडीही जागा देणे किती अनुचित आहे याचा तुम्हीच विचार करा. हा प्रसंग मजवर येणे योग्य नाही असे म्हणणे करूणामय देवावर क्रूरतेचे व अन्यायाचे दोषारोपण करणे होय आणि श्रद्धाळू मनुष्यास हे बोलणे तर काय पण असा विचार मनात येऊ देणेही शोभत नाही. हा प्रसंग दुःसह तर खराच आणि परमेश्वर कृपेने तो कुणावर न येवो पण तो ओढवल्यापासून देवांनी कृपा करून एकाच परंतु सुशील, आज्ञाधारक व माझे कधीच मन दुखविण्यासाठी निरंतर झटणा-या अशा मुलाची देणगी दिली आणि माझे अनेक ज्ञाताज्ञात अपराध पोटी घालून तो मुलगा एवढा मोठा होईपर्यंत माझ्या अंगी पात्रता येईल म्हणून वाट पाहिली; अखेरीस मी तिला अपात्रच ठरलो आणि तो परत घेऊन गेला; अशीच माझी खात्री झाली आहे. आपण मनसोक्त वागावे आणि देवास दूषण द्यावे यात काय अर्थ?”

Read more: प्रार्थनासमाज

प्रस्तावना

डॉ. गो. मा. पवार यांच्या स्नेहापोटी आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विनंतीनुसार मोठ्या आनंदाने मी ही प्रस्तावना लिहीत आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे एवढे सविस्तर, सांगोपांग, समतोल, गौरवपर पण त्याच वेळी तटस्थ आणि अस्सल साधनांवर आधारलेले हे पहिलेच चरित्र कर्मवीर जाऊन जवळ जवळ अर्धशतकाचा काळ होऊन गेल्यानंतर का होईना प्रसिद्ध होत आहे. अशा ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने महर्षींना आदरांजली वाहण्याची संधी मला मिळत आहे याबद्दल डॉ. पवार आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांचे मी आभारच मानतो.

या प्रस्तावनेत प्रस्तुत चरित्राबद्दल व चरित्रनायकाबद्दल मी वेळोवेळी माझी मूल्यमापनात्मक विधाने अत्यंत संक्षेपाने व नम्रपणे वेळोवेळी मांडली आहेत. प्रस्तावनेच्या शेवटच्या विभागात माझे स्वतःचे महर्षींच्या जीवनाबद्दलचे आकलनही विनीत भावाने सादर केले आहे. तरीसुद्धा ही प्रस्तावना प्राधान्येकरून वर्णनात्मक आहे; विश्लेषणात्मक नाही याची नोंद वाचकांनी कृपया घ्यावी. डॉ. पवार यांनी महर्षींचे जीवन कसकसे, कोणत्या सूत्रांनुसार आणि कोणत्या पद्धतीने उलगडून दाखविले आहे हे बहुतांशी त्यांच्याच शब्दांत मी स्पष्ट केले आहे. एवढ्या मोठ्या समाजधुरिणाच्या एवढ्या मोठ्या चरित्राचा आशय थोडक्यात सादर करण्यात जर मी थोडाफार यशस्वी झालो तर बहुसंख्य आणि त्यातही नव्या पिढीच्या वाचकांना ती गोष्ट सोयीची होईल याच आशेने मी हे लिखाण करत आहे.

१
गेल्या दोन दशकांमधील महाराष्ट्राचा साक्षेपी वेध घेणा-या अभ्यासकांमध्ये एका गोष्टीविषयी एकवाक्यता आढळते. ती म्हणजे महर्षी रामजी शिंदे यांच्या असाधारण अशा सर्वगामी कार्याची आपण आजवर केलेली उपेक्षा. याचा उलगडा करण्याचा यत्न जाणत्यांनी वेळोवेळी केला आहे. उदाहणार्थ, डॉ. वि. भि. कोलते ह्यांच्या मते या उपेक्षेची मीमांसा अनेक दृष्टींनी करता येईल. “ज्या मराठा समाजात ते जन्मले तो त्यांच्याविषयी उदासीन आहे. ज्या दलित समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले त्याला त्याचे महत्त्व कळत नाही आणि राजकारणात ब्राह्मणेतर पक्षाशी सूत न ठेवता ज्या राष्ट्रीय पक्षाला ते मिळाले त्यांच्या महाराष्ट्रीय वारसदारांनी सोयिस्कर रीतीने त्यांची उपेक्षा चालविली आहे. वाङ्मयाच्या क्षेत्रात अण्णासाहेबांची कामगिरी अगदीच उपेक्षणीय आहे असे नाही, पण खास पुण्यात भरणा-या साहित्य संमेलनांच्या व्यासपिठावरून जेथे अतिसामान्य व्यक्तिंच्या चोपड्यांचा आवर्जून गौरव केला जातो तेथे आण्णासाहेबांच्या किंवा त्यांच्या वाङ्मयीन कामगिरीचा नुसता उल्लेखही होत नाही असा प्रत्यक्ष अनुभव आहे.” अण्णासाहेबांचे अस्पृश्योद्धाराचे कार्य स्पृश्य आणि त्यातूनही वरिष्ठ वर्णांना मनापासून रुचण्यासारखे होते असे नाही तर अस्पृश्यांमध्ये राजकारणाचे नवीन वारे शिरल्याने तेही शिंद्यांची उपेक्षा करू लागले अशी डॉ. कोलते यांची मीमांसा आहे. (कोलते, पृ. २-३).

डॉ. ध. रा. गाडगीळ यांच्या मते कर्मवीरांचे ‘ब-याच अंशी विस्मरण’ झाल्याची कारणे धर्मकारण, संशोधन, अस्पृश्यतानिवारण आणि राजकारण या चारही क्षेत्रांत पुढीलप्रमाणे आहेत. त्यांच्या मते, “आपल्या आयुष्यात कोणत्याच प्रचलित विचारात अथवा कार्यप्रवाहात कर्मवीर शिंदे पूर्णपणे समरस झालेले दिसत नाहीत.” धर्मकार्यात महाराष्ट्रात ब्राह्मोसमाज राहोच, पण त्याची विशिष्ट मराठी आवृत्ती प्रार्थनासमाज यासही कधी महत्त्व प्राप्त झाले नाही. इतिहास व भाषाशास्त्र या दोन्ही क्षेत्रांत कर्मवीर शिंदे यांच्या चिकित्सक, सखोल व स्वतंत्र विद्वतेची खोली व बुद्धीची चमक आपल्याला जाणवते. पण त्यांचे हे लेखन “प्रसंगोपात, वेळात वेळ काढून केलेले... मधून मधून कोठेतरी प्रकाशित झाले असल्यामुळे” त्याचे वजन पडले नाही. डॉ. गाडगीळांच्या मते, “त्या वेळचे मान्यवर संशोधक व विचारांची रूढ दिशा याबाबतचे बरेचसे लिखाण टीकात्मक असल्यामुळे त्याची उपेक्षा झाली हेही घडले असावे.” कर्मवीरांच्या कार्याचा अस्पृश्यतानिवारण हा गाभा होता. पण “त्यांच्या या कार्याच्या पूर्वार्धात स्पृश्य समाजाची फारशी सहानुभूती व मदत त्यांस मिळाली नाही. पुनरुज्जीवित सत्यशोधक समाजाची दृष्टी ब्राम्हणांवरील हल्ल्यात केंद्रित झाली व महात्मा जोतीबांच्या कार्याच्या या दुस-या बाजूकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. पुढील काळात स्पृश्यांची वृत्ती व त्यांच्या कार्याची गतिमानता यांबद्दल अधिकाधिक निराशा उत्पन्न झाल्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अस्पृश्यांनी चढाऊ धोरण व स्वावलंबी मार्ग पत्करला आणि शिंदे साहजिकच बाजूला पडले. राजकरणातही तीच गत झाली.

“कर्मवीर शिंदे यांचा पिंड राजकरणी दिसत नाही. ....परंतु ब्राह्मणेतरांचा सवतासुभा ज्यायोगे होईल असे काही करू नये, असे म्हणणा-याला त्या वेळेस मान्यता न मिळणे साहजिक होते आणि जे तरुण त्यांच्या विचाराशी सहमत होते त्यांचा कल मार्क्सवादाकडे वळल्यामुळे श्री. शिंदे यांच्या व्यापक भूमिका त्यांस पटणे शक्य नव्हते.’’ (मंगुडकर; १९६३, पृ. ७-८). ही झाली कर्मवीर का उपेक्षित राहिले याची डॉ. धनंजयराव गाडगीळ यांची मीमांसा. (गाडगीळ, पृ. ७-१०).

कर्मवीर शिंदे यांच्या जीवनाचे मर्म व वर्म उलगडताना श्री. रा. ना. चव्हाण यांच्या मते कर्मवीर उपेक्षित राहिले याचे कारण म्हणजे त्यांनी “कोणालाच सर्वांशी प्रमाण किंवा सर्वांशी अप्रमाण मुळीच मानले नाही..... सत्य हे बहुमतमान्य व लोकमान्य नसते, तरी त्याची साधना त्यांनी सोडली नाही. सत्यासाठी ते एकाकी (अलग-अस्पृश्य!) देखील होत.... विग्रह घेण्याच्या मागे त्यांची जी मौलिक दृष्टी व स्वतंत्र वागणूक झाली, हीच महत्त्वाची ठरते..... तटस्थतेत व त्रयस्थतेत त्यांनी विषाद मानिला नाही. व लोकरंजन व लोकाराधना केली नाही. प्रामाणिक मतभेद झाल्यामुळे व स्वशोधित स्वत:चे पण तात्त्विक सत्यच महत्त्वाचे मानण्याची आग्रही, हट्टी म्हणजे अशा स्वरूपाची सत्याग्रही प्रवृत्ती त्यांच्यात असल्यामुळे मतभेद विकोपाला जाऊन त्यांना जीवनात जबर किमती द्याव्या लागल्या व त्यांनी त्या दिल्या. हेच त्यांच्या जीवनाचे मर्म व वर्म होय, एवढेच नव्हे तर तत्त्वप्रधान मतभेद हाच पाया व शिखर ठरले. ...यामुळेच त्यांचे सारेच जीवन गतिमान व क्रांतिकारक झालेले आढळते..... (त्यांचे विग्रह व तटस्थता) ही सर्व त्यांचा मनोनिग्रह व त्याग दाखवते व ‘ग्यानबाची मेख’ या त्यांच्या हट्टी (!) व आनुष्ठानिक आग्रही स्वभावातच शोधता येते व शोधिली पाहिजे. त्यांची उपेक्षा म्हणजे भारतीय जटिल अस्पृश्यतेच्या चिवट प्रश्नाची व समस्येची उपेक्षा ठरते.” (चव्हाण, पृ. ३०-५६).

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या मते “महर्षी फार पूर्वी जन्माला आले. ते द्रष्टे सेनानी होते. परंतु त्यांच्या विचारांची आणि तत्वज्ञानाची झेप फार उंच आणि लांब पल्ल्याची होती. ती समाजाला त्या काळी पेलण्यासारखी नव्हती. समाजाचे नेतृत्व करणा-या माणसाने समाजापुढे नेहमीच असले पाहिजे. परंतु त्यानं किती पुढे असावे, याला मर्यादा असते. तो समाजाचा वाटाड्या असावा. त्याने दृष्टिक्षेपापलीकडे जाता कामा नये. तो तसा गेला तर मार्गदर्शनाचे कार्यच संपुष्टात येते. शिंद्यांचे जवळ जवळ असेच झाले.’’ (सावंत, पृ. ६-८).

महर्षी शिंदे हे उपेक्षित महात्मा का राहिले ह्याची अगदी अलीकडील भेदक व विचारदर्शक मांडणी भाई डॉ. एन. डी. पाटील यांनी केली आहे. त्यांच्या विवेचनानुसार महर्षींनी “त्यांनी ऐतिहासिक कार्य केलं, तथापि आपण इतके कर्मदरिद्री व करंटे ठरलो की त्यांच्या क्रांतिकारक सामाजिक विचाराचा आणि आचाराचा आशयच आपण ओळखू शकलो नाही. मराठा समाज त्यांच्याबाबतीत इतका अनुदार आणि असहिष्णू वृत्तीने वागला की त्याने त्यांना ‘महार शिंदे’च मानलं आणि त्या वेळी अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणा-या ज्या समाजासाठी त्यांनी आयुष्याची अक्षरशः बाजी लावली व आई, वडील, पत्नी, बहिणी व मुलेबाळे घेऊन महारवाड्यात आपले बि-हाड केले त्या समाजाला त्यांच्या रक्तामांसाचे नेतृत्व मिळाल्यानंतर त्या वर्गाने अण्णासाहेबांचा दुस्वास करायला सुरुवात केली. तशातच ज्या जाणत्या वर्गाला अण्णासाहेबांच्या कार्याचं महत्त्व समजत होतं, त्या वर्गाला त्यांचं कार्य नको होतं.” (पाटील, पृ. ४).

खुद्द प्रस्तुत चरित्रकाराच्या म्हणण्यानुसार महर्षी कोणत्याच मतांशी, पक्षांशी, चळवळींशी तादात्म्य पावले नाहीत. “कारण अशा तादात्म्यामुळे स्वतःच्या मतांना मुरड घालण्याची पाळी येते. शिंदे यांच्या भूमिकेत ही गोष्ट बसणारी नव्हती.’’ (पृ. २६८). म्हणूनच, “ज्या ज्या कामामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणतीही लौकिक स्पृहा मनात न ठेवता स्वतःला समर्पित केले त्या संस्थेमधून बाहेर पडण्याचे, तिच्याशी फारकत घेण्याचे दुर्धर, शोकात्म प्रसंग शिंदे यांच्या आयुष्यात येत राहिले.’’

ब्राह्मणेतर समाजातर्फे २३ एप्रिल १९२५ रोजी महर्षींना पुण्यामध्ये मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी उत्तरादाखल बोलताना स्वतः श्री. शिंदे यांनी “मी माझ्या मुख्य किंवा आनुषंगिक कार्यामध्ये कोणत्याही एका पक्षाच्या अथवा पंथाच्या अधीन झालो नाही. माझा पक्ष केवळ परमेश्वराचा आणि माझी सदसद्विवेकबुद्धी माझा प्रतोद. मला माहीत आहे, की अशा प्रकारचा मनुष्य कोणालाही खूष ठेवू शकत नाही’’ असे उद्गार काढले होते हे आपण विसरता कामा नये.

माझ्या मते तत्कालीन ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात इतरांनीही आपापल्या भूमिका, कार्यक्रम व हितसंबंध यांच्याविषयी आग्रही राहून आपापल्या अग्रक्रमांनुसार कर्मवीरांशी त्या त्या वेळी फारकत घेतली तर ऐतिहासिक विकासक्रमाच्या गतिशास्त्राप्रमाणे समजूनही घेता येते. पण त्या त्या स्थळकाळाचे संदर्भ ओसरल्यानंतरही पुढच्या पुढच्या पिढ्यांनी महर्षी शिंदे यांच्याविषयीचे पूर्वग्रह, किंतू, दुरावा व उपेक्षा सोडू नये यात मात्र ऐतिहासिक दृष्टीचा आपल्याकडे सर्रास आढळणारा अभावच दिसून येतो. आपापल्या जन्मजात जातवर्गाच्या अहंकारातून व हितसंबंधांतून मुक्त होऊन ऐतिहासिक सत्य व सामाजिक वास्तव यांना मुक्तिशील लोकहितपर भूमिकेतून सामोरे जाणे हे किती अवघड असते हीच गोष्ट या उदाहरणाने स्पष्ट होते. आपण जोवर सर्वांगीण सम्यक व सत्यनिष्ठ मुक्तीची दृष्टी स्वीकारणार नाही तोवर कर्मवीर शिंदे यांच्यासारखा महात्मा व महापुरुष उपेक्षेच्याच कक्षेत वारंवार ढकलला जाईल असेच चित्र आज तरी दिसते.

महर्षींचे विस्तृत असे चरित्र आजवर सिद्ध होऊ शकले नाही याचे कारण कोणत्या परिस्थितीत दडलेले असावे एवढ्याकरिता त्यांना भोगाव्या लागलेल्या उपेक्षेची त्रोटक का होईना एवढी मांडणी करावी लागली.

२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनाविषयी तसेच विचारधनाविषयी आजवर उल्लेखनीय असे काहीच लिहीले गेले नव्हते असा मात्र उपरोक्त प्रतिपादनाचा अर्थ नाही. प्रस्तुत प्रस्तावनेच्या म्हणजेच कर्मवीरांचे जीवन, व्यक्तिमत्त्व व कार्य यांच्याचपुरत्या मर्यादित संदर्भात बोलावयाचे म्हटले तर १९३० पासून ते थेट आजवर त्यांची अनेक छोटी-मोठी चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. कृष्णराव भाऊराव बाबर (१९३०), डॉ. गंगाधर मोरजे (१९७३), प्रा. संभाजीराव पाटणे (१९७६), डॉ. मा. प. मंगुडकर (१९७६), डॉ. ह. कि. तोडमल (१९८६), डॉ. भि. ना. दहातोंडे (१९९५), श्री. ए. के. घोरपडे गुरुजी (१९९८) व अगदी अलीकडे श्री. अनंतराव पाटील (१९९९) आणि ऍड. पी. के. चौगुले (१९९९) आदींनी महर्षींच्या चरित्र व कार्याचा लक्षणीय परामर्श घेतलेला आहे. १९९० साली प्रा. एम्. एस्. गोरे यांनी कर्मवीरांच्या कार्याचा परिचय एका इंग्रजी ग्रंथातही सादर केला आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखक डॉ. गो. मा. पवार यांनीच १९९० साली नॅशनल बुक ट्रस्टकरिता अठ्ठावन्न पानांची एक पुस्तिका लिहिली होती. तिचा इंग्रजी अनुवादही (२०००) उपलब्ध आहे.

इतके असूनही महर्षींचे अगदी सविस्तर, सर्वगामी, सखोल व चिकित्सक असे चरित्र आजवर उपलब्ध नव्हते. ही उणीव सामान्य वाचक, कार्यकर्ते आणि विचारवंत यांना चांगलीच खटकत होती. ही मोठी उणीव डॉ. गो. मा. पवार यांच्या प्रस्तुत ग्रंथाने फार जिव्हाळ्याने, कसोशीने आणि व्यासंगनिष्ठ पद्धतीने दूर केलेली आहे. कर्मवीरांचे हे चरित्र विस्तृत, अस्सल साधनांवर आधारलेले व विचारप्रवर्तक आहे, याविषयी दुमत होण्याची शक्यता मला तरी फार दिसत नाही.

या चरित्राचे दोन विशेष प्रकर्षाने जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही चरित्रकाराला भेडसावणा-या एका पेचातून डॉ. पवार यांनी अगदी स्पष्ट भूमिका घेऊन चांगलीच वाट काढली आहे. पेच असा की, त्या त्या स्थलकालाचा यथासांग तपशील न देता नुसताच चरित्रपट रेखाटला तर मांडणी सूत्रमय दिसते व ग्रंथ आटोपशीर होतो. पण यातली अडचण अशी असते की तत्कालीन इतिहासाचे ज्ञान असलेला जाणता अभ्यासवर्ग सोडला तर इतरांना असा ग्रंथ रोचक वाटला तरी दुर्बोध ठरतो. मुख्य म्हणजे त्यामुळे चरित्रव्यक्तीची त्या त्या वेळची विवक्षित निवड व वर्तन यांचे मर्म सामान्य वाचकाच्या आटोक्यात येत नाही. याउलट चरित्रव्यक्तीच्या जीवनक्रमाचा उलगडा तत्कालीन स्थलकालाच्या दमदार चित्रणातून करावयाचा म्हटला तर ग्रंथाची गुणवत्ता वाढते पण त्याचा विस्तार घसघशीत आकार घेतो. यामुळे जाणत्या अभ्यासकांना या सर्वपरिचित (!) गोष्टींचा एवढा प्रपंच का मांडला गेला आहे, असे वाटू लागते. तर दुसरीकडे एवढा मोठा ग्रंथविस्तार नव्याने विषयप्रवेश करणा-यांचा हिरमोडही करू शकतो.
डॉ. पवार यांनी यांपैकी दुसरा पर्याय डोळसपणे पण निर्धाराने स्वीकारला आहे. तरुण पिढीतील सामान्य वाचक व कार्यकर्ते या निवडीचे स्वागतच करतील, याविषयी मला शंका नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखी मातब्बर संस्था पाठीशी असल्यामुळेच डॉ. पवार यांना असले धाडस जमले असेल. त्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानावेत तेवढे अपुरेच ठरतील. पण त्याच वेळी असा ग्रंथविस्तार फापटपसारा ठरणार नाही, याकरिता लेखकापाशी सम्यक दृष्टी, विकारनिरपेक्ष तटस्थता, अस्सल साधनांवर आधारलेला निखळ व्यासंग आणि रसाळ व चित्रमय निवेदनशैली हवी. डॉ. पवार याबाबतीत उणे पडत नसल्याने हे चरित्र एकाच वेळी मनोवेधक तसेच विचारप्रवर्तक असे ठरणार आहे.

दुसरा विशेष म्हणजे डॉ. पवार यांनी महर्षींच्या अतिशय समृद्ध व बहुआयामी विचारधनाची त्यांच्या चरित्राइतकीच विस्तृत व चिकित्सक मांडणी करण्याचा मोह या ग्रंथात टाळला आहे. ही पण एक पेचाचीच बाब होती. पुढच्या अनेक पिढ्यांना वारंवार दखल घ्यावी लागेल एवढा संपन्न वैचारिक वारसा श्री. शिंदे यांच्या विविध लिखाणांत उपलब्ध आहे. तो बाजूस ठेवला तर कर्मवीरांच्या महत्तेचे पूर्ण स्वरूप आपल्याला उमजणार नाही. पण त्यांच्याविषयीच्या विस्तृत चरित्राची उणीव प्रथमतःच भरून काढावयाची ठरविल्यावर डॉ. पवार यांना त्यासाठी दुस-या खंडाची जोड द्यावी लागली असती. हे कार्य स्वत: डॉ. पवार यांना किंवा अन्य कोणाला केव्हातरी करावेच लागेल. पण प्राप्त परिस्थितीत डॉ. पवार यांनी श्री. शिंदे यांच्या लिखाणाचा चिकित्सक परामर्श प्रस्तुत ग्रंथात घेतला नाही, ही गोष्ट मला तरी समर्थनीय वाटते.

चरित्रलेखनाविषयी डॉ. पवार यांनी घेतलेले परिश्रम आपल्याला लगेच जाणवतात. कर्मवीरांसंबधीच्या हस्तलिखित सामग्रीचा धांडोळा त्यांनी चिकाटीने घेतला आहे. त्यामुळेच इंग्लंडमधील मँचेस्टर कॉलेजमधील ग्रंथालयात श्री. शिंदे यांच्या कॉलेजप्रवेशाच्या तारखेची नोंद व सही असलेले रजिस्टर, श्री. शिंदे यांनी पाठविलेली डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माहितीसंबंधीची पुस्तिका, त्यांचे गुरू प्रो. कार्पेंटर यांच्याशी श्री. शिंदे यांचा झालेला पत्रव्यवहार, पॉझ व मार्टिनो क्लब या वादविवादसंस्थांची वृत्तान्त पुस्तके व त्यामुळेच “धर्मप्रसाराच्या कार्यात स्त्रियांना सहभागी करून घेतले तर ते काम अधिक जोमाने चालेल’’, असा श्री. शिंदे यांनी पॉझ क्लबमध्ये मांडलेला ठराव आणि त्या कॉलेजमधील प्रथेप्रमाणे श्री. शिंदे यांच्यावरील कविता व त्यांचे एका समकालीनाने ‘कॉलेज ब्यूटी’ या नावाने काढलेले व्यंगचित्र हस्तगत करू शकले.

समकालीन इंग्रजीच नव्हे तर आपल्या हितचिंतकांच्या साहाय्यामुळे डॉ. पवार यांनी फ्रेंच व डच वृत्तपत्रे, नियतकालिके व ग्रंथ यांचाही अस्सल चरित्रलेखनाकरिता चांगलाच तलास घेतला आहे. त्यामुळेच इंग्लंडमधील युनिटेरिअन चर्चमध्ये श्री. शिंदे यांनी चालविलेल्या उपासना व केलेली भाषणे, कर्मवीरांनी हिंदू गृहस्थितीबद्दल दिलेले व्याख्यान व सादर केलेला नाट्यप्रयोग, ऍमस्टरडॅममधील १९०३ च्या युनिटेरिअन जागतिक त्रैवार्षिक परिषदेत श्री. शिंदे यांनी केलेल्या प्रभावशाली भाषणाचे वृत्तान्त, त्या संदर्भात शिंदे यांच्या फोटोसह डच वृत्तपत्रात आलेली माहिती, तसेच ३० ते ३२ इंग्रजी ग्रंथालयांतून श्री. शिंदे यांनी उल्लेखिलेल्या युनिटेरिअन धर्मपुरुष व संस्था यांच्याबद्दलची माहिती प्रस्तुत चरित्रात प्रतिबिंबित होऊ शकली.

विशेष म्हणजे श्री. शिंदे इंग्लंडमधील एकूण सतरा शहरी आणि त्याच्याच जोडीला ऍमस्टरडॅम, पॅरिस, रोम व पाँपी या नगरात जिथे जिथे गेले तिथे तिथे (म्हणजे विद्यापीठीय व महाविद्यालयीन ग्रंथालये, सार्वजनिक वाचनालये, वस्तुसंग्रहालये व प्राणिसंग्रहालये, वने, उपवने, उपहारगृह, इतकेच नव्हे तर पॅरिसमधील ‘पेर ला शाज’ ही स्मशानभूमी व अन्य प्रेक्षणीय स्थळे) डॉ. पवार आवर्जून जाऊन आले. मुळात डॉ. पवार साहित्याचे रसिक व व्यासंगी प्राध्यापक व समीक्षक, रसाळ लेखक व त्यातही वरील खटाटोप. त्यामुळे कर्मवीर शिंदे यांच्या इंग्लंडमधील वास्तव्याचे व युरोपमधील प्रवासाचे प्रत्ययकारक, चित्रमय व लोभस असे रूप या चरित्रग्रंथातून आपल्यापुढे साकार होते.

महर्षींच्या प्रदीर्घ चरित्रलेखनाचे शिवधनुष्य डॉ. पवार यांनी सहजपणे पेलले आहे. त्याचे त्यांच्या उपरोक्त परिश्रमाच्या जोडीला आणखी एक कारण आहे. डॉ. पवार हे कर्मवीरांच्या जीवनाचा व विचारधनाचा गेली अनेक दशके मागोवा घेत आलेले आहेत. महर्षींचे चिरंजीव श्री. प्रतापराव शिंदे हे डॉ. पवार यांचे सासरे. श्री. प्रतापरावांच्या संग्रहात असलेल्या मोठ्या रोजनिशांचे साक्षेपी व काटेकोर असे संपादन डॉ. पवारांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी या नावाने १९७९ च्या प्रारंभीच ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले होते. महर्षी शिंदे यांच्या “असाधारण व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय देणारी ही रोजनिशी’’  डॉ. पवार यांच्या ४७ पानी प्रस्तावनेमुळे अधिकच खुललेली आहे. डॉ. पवारांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामुळे त्या रोजनिशीचे वाङ्मयीन मूल्यही तिच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांच्याच जोडीला वाचकांच्या प्रत्ययाला येत असते. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महर्षी वि. रा. शिंदे जन्मशताब्दी समारोह समितीने श्री. शिंदे यांच्या ग्रंथसंपादनाचे कार्य ज्या संपादक मंडळावर सोपविले त्याचे डॉ. पवार हेही एक घटक होते. याच मंडळाने १९७६ च्या एप्रिलमध्ये कर्मवीरांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा व १९७९ च्या फेब्रुवारीमध्ये धर्म, जीवन व तत्त्वज्ञान हा असे दोन ग्रंथ संपादून प्रसिद्ध केले. यानंतर मागेच नमूद केल्याप्रमाणे डॉ. पवार यांनी नॅशनल बुक ट्रस्टकरिता विठ्ठल रामजी शिंदे यांचे ट्रस्टच्या याबाबतीतील रिवाजाप्रमाणे ५८ पानांचे एक छोटेखानी पण फार मार्मिक व सुबोध असे चरित्र लिहिले. केवळ सात प्रकरणात महर्षींच्या जीवनकार्याचे रेखीव चित्रण केल्यानंतर आठव्या प्रकरणात केवळ सहा पानात महर्षींच्या ‘संशोधनकार्य आणि साहित्यसेवा’ या क्षेत्रातील असाधारण गुणवत्तेवर त्यांनी अचूक बोट ठेवले आहे. अशा प्रकारे चरित्रलेखनाकरिता घेतलेल्या परिश्रमाला एवढ्या प्रदीर्घ आणि आस्थापूर्ण अभ्यासाची जोड लाभल्याने प्रस्तुत चरित्राला चांगलेच वजन लाभले आहे.

Read more: प्रस्तावना

प्रवासातील अनुभव

ब्राह्मधर्माचा प्रसार करणे आणि अस्पृश्यतानिवारण करून अस्पृश्य मानलेल्या वर्गाची सुधारणा करणे हे अण्णासाहेब शिंदे यांनी आपले जीवितध्येय मानले होते व एक प्रकारच्या निर्वाणीने ते या कामाला लागले होते. या दोन्ही कामाचे स्वरूपच असे होते की, त्यांना सतत प्रवास करणे भाग होते. प्रचारक म्हणून दरमहा रुपये साठ एवढा तुटपुंजा पगार त्यांना मिळत होता. ह्या पगारतच प्रचारकाने आपला प्रवासखर्चही भागवावा अशी अपेक्षा होती. निराश्रित साहाय्यकारी मंडळीचे काम तर त्यांनी स्वतः अंतःप्रेरणेचा कौल मानून सुरू केलेले. त्यातील पद स्वीकारले होते ते बिनपगारी सन्माननीय जनरल सेक्रेटरीचे. कुटुंबाचा खर्च मोठा. असे असले तरी अंगीकृत कार्यासाठी खर्चाची तमा न बाळगता ते सतत प्रवास करीत असत.  त्यांनीच स्वतः म्हटल्याप्रमाणे, “तत्त्वाने बेहोष झालेल्याला तपशिलाची कदर नसते. अशातला मी एक.”१ म्हणून त्यांचा प्रवास नेहमी रेल्वेच्या तिस-या वर्गानेच व्हायचा. हॉटेलमध्ये उतरण्याची चैन परवडण्याजोगी नव्हती. म्हणून ज्या गावी जायचे तिथे ओळख काढून कोणाच्या तरी घरी राहाण्या-जेवण्याची व्यवस्था करून घ्यायची. कधी कधी सर नारायण चंदावरकरांचे हुबळी येथील व्याही श्रीयुत सिरूर, बडोद्यातील डॉ. रा. गो. भांडारकरांचे हायकोर्ट जज्ज असलेले बंधु वासुदेव गोपाळ भांडारकर, अथवा काठेवाडीतील मियागावचे ठाकूरसाहेब यांच्यासारख्या बड्या यजमानांकडे थाटाचा पाहुणचार होत असे. तर कधी खाण्यापिण्याचे अत्यंत हाल होऊन उपासमारीची पाळी येत असे. एवढेच नव्हे, तर अनेकदा अपमानाचे प्रसंगही वाट्याला येत. ह्या दोन्ही प्रकाराकडे समभावाने बघण्याची वृत्ती त्यांच्या ठिकाणी बाणली होती. अपमानाच्या, फजितीच्या अनुभवाकडे समंजसपणे, खेळकरपणाने बघण्याची विनोदात्म वृत्ती त्यांच्या ठिकाणी होती. म्हणूनच ते अंगीकृत कार्यासाठी आयुष्यभर अशा प्रकारची भ्रमंती करू शकले.

१९०३ साली युरोपातून परत आल्यावर लगेच डिसेंबरात सामाजिक परिषदेसाठी आणि ब्राह्मसमाजाच्या एकेश्वरी धर्मपरिषदेसाठी मद्रासला जायला निघाले. तिखट मसाल्याची सवय राहिली नसल्याने दक्षिण प्रांतातल्या तिखटाच्या मा-याने त्यांची तारांबळ उडू लागली. “प्रत्येक ठिकाणी माझ्यासाठी बिनतिखटाचा स्वयंपाक करा असे पत्येक गृहिणीला बजावले तरी तिखटाशिवाय स्वयंपाक करणे म्हणजे जन्मात अपकीर्तीच करून घेणे,” असे तिला वाटून तिच्या दृष्टीने घातलेले अत्यंत थोडे तिखट हेही अण्णासाहेबांना सात दिवस पुरेल इतके असे. त्यामुळे दक्षिणेतील मुक्कामात त्यांना नेहमी अर्धपोटीच राहावे लागे. ह्या प्रवासात दुसरी एक आपत्ती त्यांना सहन करावी लागली. मद्रासकडील हिवाळा हा युरोपातल्या उन्हाळ्यापेक्षाही त्यांना कडक भासत होता. परंतु युरोपातून परत आल्यावर स्वदेशाला चालतील असे नवीन कपडे तयार करण्याचेही आर्थिक बळ त्यांच्यात नव्हते. म्हणून तेच युरोपियन कपडे त्यांना काही काळ वापरावे लागले. आपल्या या अवस्थेचे त्यांनी वर्णन केले आहे, “वरून जरी मी साहेब दिसत असलो तरी आतून नेहमी पुढच्या प्रवासखर्चाची व प्रकृतीला न मानवणा-या अन्नाची धास्ती बाळगणारा एक कंगाल फकीर होतो.”२

विठ्ठल रामजी शिंदे हे १९०४च्या उन्हाळ्यात काठेवाडच्या दौ-यावर गेले होते. जुनागड येथे दिवाणांच्या कोठीत बडोदे सरकारचे मंडलीक मियागावचे ठाकूर यांची भेट झाली. ठाकूरसाहेबांनी प्रार्थनासमाजाच्या कार्याबद्दल आस्था दाखविली व मियागाव ह्या आपल्या जहागिरीच्या गावी दोन दिवस राहून जावे यासाठी मोठ्या आग्रहाने निमंत्रण दिले. त्यानुसार विठ्ठल रामजी शिंदे बी. बी. सी. आय. रेल्वेवरील मियागाव स्टेशनवर उतरले. वेळ दुपारी भर बाराची. गाडी पकडण्याच्या नादात आदल्या दिवशी त्यांना उपवास पडला होता. त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले कोणतेही वाहन दिसेना. गाडी गेल्यावर दोन-चार मिनिटांतच सर्वत्र सामसूम झाले. स्टेशनमास्तर, पोर्टर हे कोठे गेले ते कळले नाही. दीड दिवसाच्या उपोषणाने त्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. ट्रंक व बिस्तरा प्लॅटर्फार्मवर टाकून अन्नाच्या शोधात ते निघाले. अर्ध्या मैलावर एक कुग्राम होते. फारशी माणसे दिसत नव्हती. ते एका ब्राह्मणाच्या घरी शिरले. त्यांच्या घरी श्राद्ध होते असे कळले. दोन प्रहर उलटून गेले तरी हा गृहस्थ नुकताच हजामतील बसला होता. “जेवणाची सोय होईल का?” असे शिंदे यांनी विचारताच “तुम्ही ब्राह्मण आहात का?” असे त्यांनी विचारले. शिंदे यांनी नाही म्हणताच त्याने चक्क बाहेर जाण्यास सांगितले. शेवटी हताश होऊन ते एका शिंप्याच्या दुकानावर आले व त्याला आपली कठीण अवस्था सांगितली. शिंप्याला त्यांची दया आली. त्याची बायको तळ्यावर पाणी आणावयास गेली होती. ती आल्यावर काही उरलेसुरले असेल ते मिळे का पाहू असा दिलासा त्या शिंप्याने दिला. शेवाळलेला घाणेरडा पाण्याचा घडा डोकीवर घेऊन बाई परत आली. तिने एका पितळीत आदल्या दिवशीचा भात व त्याहून शिळी कढी एका वाडग्यात वाढली. विठ्ठल रामजींनी पाहिले तो कढीत चार-पाच माशा पडलेल्या होत्या. मुकाट्याने त्या वेचून टाकून त्यांनी ते अन्न अधाशासारखे खाल्ले. पण त्यांना पाणी काही पिववले नाही. कसेबसे आचवून ते बाहेर ओट्यावर शिंप्याजवळ येऊन एका चटईवर बसून ते पाणी प्याले. त्यांच्याजवळ त्याच चटईवर एक मुसलमान गृहस्थ बसला होता. त्याची काही फिकीर न करता हा पाहुणा पाणी पितो हे बघून शिंपी भलताच रागावला. त्याने काहीच मुर्वत न ठेवता शिंदे यांना दुकानातून खाली उतरण्यास सांगितले. यात मुसलमाचा अपमान होऊन तोही खाली उतला. तो पोलीस शिपाई होता. त्याने शिंदे यांना सगळी माहिती विचारून घेतली. “मी जात न पाळणारा एक मराठा आहे” अशी माहिती त्यांच्याकडून ऐकताच त्या भल्या शिपायाने तेथे एक मराठाच फौजदारसाहेब आहे म्हणून त्यांच्या ठाण्यावर पोहोचवले व सामानही आणून दिले. ते फौजदार शिंदे कोल्हापूरचेच व शिंदे यांच्या परिचयाचे निघाले. त्यामुळे चित्र पालटले. त्यांच्याकडे उत्तम सोय झाली. पोलीसाकरवी ठाकूरांस त्यांनी निरोप दिला. त्यांनी शिंदे यांना घेऊन जाण्यासाठी सुंदर गाडी पाठविली. नानालाल कवींनी पाठविलेल्या पत्रात गफलतीने येण्याची वेळ एक दिवस उशिराची कळविल्याने हा घोटाळा झाल्याचे सांगितले व शिंदे यांना त्रास पडल्याबद्दल ठाकूरजींनी माफी मागिलती. त्यांच्याकडे एक दिवस थाटाचा पाहुणचार घेऊन ते मुंबईस परत आले.

१९०५च्या उन्हाळ्यात विठ्ठल रामजी शिंदे यांनी महाराष्ट्रात व कर्नाटकात दौरा काढला होता. त्यांच्यासोबत स्वामी स्वात्मानंदजी व डॉ. रुबेन हेही होते. नाशिक येथील काम त्यांनी आटोपले. श्री. नीळकंठराव पाटणकर वकील यांच्या ओळखीचे आसवले या गावी कोणी एक अस्पृश्यवर्गातले श्रीमंत पुढारी होते. पाटणकर यांनी सूचना केल्यावरून ते तिघेजण त्यांच्या भेटीस आसवले येथे गेले. पण या तिघांचा विचित्र वेष त्या अस्पृश्य गृहस्थाने बघितला. शिंदे दाढीवाले, स्वामी, रुबेन हातात एकतारी घेतलेले. ह्या तिघांचा असा विचित्र बेष पाहून हे काहीतरी मागायला भिकारबैरागीच आले असावेत अशी समजूत करून घेऊन मुख्य मालक त्यांना घराबाहेर भेटावयास गेले नाहीत. शेवटी कंटाळून त्यांनी नदीवर स्नान वगैरे उरकले. शिंदे लिहितात, “खावयास आमच्याजवळ उन्हाशिवाय काहीच नव्हते.” मुकाट्याने त्यांनी पुढच्या गावाची वाट धरली.

१९१० सालच्या नाताळात अलाहाबाद येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन होणार होते. त्याचवेळी भरणा-या भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेसाठी विठ्ठल रामजी शिंदे हे अलाहाबादला मध्यरात्री पोहोचले. नाताळचे थंडीचे दिवस होते. ते प्रो. बाबू रामानंद चटर्जी यांच्याकडे उतरणार होते. पण गाडीवाल्याला ते ठिकाण माहीत नव्हते. तास दोन तास अपरात्री इकडे तिकडे भटकल्यावर नाइलाज होऊन त्याने विठ्ठल रामजींचे सामान म्यूर कॉलेजच्या विस्तीर्ण पटांगणावर टाकले व तो निघून गेला. थंडी भयंकर पडली होती. अण्णासाहबे शिंदे यांना सामानाला डोके टेकवून त्या माळरानावर थंडीची ती रात्र काढावी लागली.

सततच्या अशा दगदगीच्या प्रवासातही विठ्ठल रामजी शिंदे हे घरच्या मंडळींना-कधी बाबांना, कधी पत्नीला, तर कधी जनाबाईंना-कटाक्षाने पत्रे लिहीत असत व आपली हालहवाल कळवीत व त्यांची विचारीत असत. उत्तरासाठी पुढच्या सोयिस्कर अशा मुक्कामाचा पत्ता देत असत. पुढे दिलेले कार्ड त्यांनी आपल्या बहिणीला लिहिले आहे.२

जयपूर
ता. १९ दि.१९०९
प्रिय जनाक्का,
काल रात्री १२ वाजता स्टेशनावर पोहोचलो. पण हे पडले त्रैतायुगातील. रात्री ९ वाजताच सर्व वेशीचे दरवाजे बंद होतात. झाले, वेटिंग रुममध्यमेच आम्ही निजलो. आणखी चार युरोपियन उतारू, आम्ही दोघे व एक कोणी बडा अंमलदार अशी ७ बहिष्कृत माणसे ह्या खोलीत घोरत पडलो. पण झोप कोणास लागली कोणास माहीत.

जयपूर फार सुंदर, स्वच्छ व जुने शहर आहे. आम्ही ज्यांचे घरी उतरलो आहो ते फार जुने सोवळे आहेत. त्यांनी मला मोरीजवळ जेवायला वाढले. मी खप्पी जेवलो. उद्या आग्र्याला जाऊन ताज पाहीन.
आ.
विठ्ठल

त्यांच्या ठिकाणी वरच्या पातळीवरचा समंजसपणा व विनोदबुद्धी होती. म्हणूनच मोरीजवळ बसून जेवण करण्याचा खप्पीपणा ते दाखवू शकत होते. शिवाय जेवण करीत असताना दुस-या दिवशी बघावयाच्या ताजमहालाचे आगामी सुख त्यांच्या डोळ्यांसमोर होतेच.

वेषादिकामुळे आसवले गावी अण्णासाहेब शिंदे यांच्यावर जसा चमत्कारिक प्रसंग ओढवला होता तसाच प्रकार १९११ साली बेळगावला त्यांना अनुभवावा लागला. हुबळी येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची कनार्टक शाखा उघडण्यात आलेली होती. त्या शाखेसाठी फंड जमा करण्याकरिता ते आपले सहायक सय्यद यांच्यासह बेळगावला गेले होते. सय्यद त्यांना कुटुंबातल्याप्रमाणे जिव्हाळ्याचे होते. अण्णासाहेबांच्या प्रभावामुळे ते उर्दू हायस्कूलमधील नोकरीचा राजीनामा देऊन मिशनमध्ये आजीव सेवक म्हणून रुजू झाले होते. ते दाढी ठेवीत नसत. मात्र १९०० सालापासून अण्णासाहेब शिंदे यांनी दाढी राखली होती.

बेळगावला राहत असलेल्या एका परिचित सारस्वत गृहस्थाला त्यांनी आपण येणार असल्याचे कळविले होते व त्याचेही आपल्याकडेच उतरावे असे उत्तर आले होते. शिंदे सय्यदांना आपल्याबरोबर घेऊन बेळगावास पोहोचले. ती दुपारची बाराची वेळ होती. त्या सारस्वत गृहस्थाच्या घरी जाऊन त्यांनी विचारणा केली असता घरातील बायकामंडळींनी नोकराकरवी मालक महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याचे कळविले. त्यावर अण्णासाहेबांनी आपण येणार असल्याचे मालकांना सांगितले होते व त्यांनी आपल्याकडे उतरावे असे कळविले असल्याचे सांगितले. अण्णासाहेबांच्या दाढीकडे पाहून त्या बायकामंडळींचा हे मुसलमान गृहस्थ असावेत असा ग्रह झाला असावा. कारण त्यांना सामान ओसरीवरच ठेवण्यास सांगण्यात आले. दुपारची वेळ, भूक सापाटून लागलेली, त्यात प्रवासाचा शीण. मात्र बराच वेळ गेला तरी जेवणास बोलावण्याचे चन्ह दिसेना. तेव्हा जेवण नाही, निदान चहाची तरी कुठे सोय होते किंवा नाही ह्याचा सय्यदांनी तलास घेतला. घरासमोरच एक हॉटेल होते. तिथल्या पो-यास चहा पाठवून देण्यास सांगून सय्यद परत फिरले. पण बराच वेळ झाला तरी हॉटेलमधून चहा येण्याचे चिन्ह दिसेना. असे पाहून सय्यदांनी हॉटेलच्या पोरास चहा आणण्यास ओरडून सांगितले. पण तो मालकाच्या तोंडाकडे पहात उभा राहिला. तेव्हा मालक आपल्या पोरावर जोराने खेकसून म्हणाला, “अरे सांग ना, त्यात भ्यायचे काय? चटकन सांगून टाक.” तेव्हा पोरगा सय्यदजवळ येऊन म्हणाला, “साहेब, तुम्हाला चहा देण्याची आमची कोणतीच हरकत नाही.” पण चमत्कारिक नजरेने अण्णासाहेबांच्या दाढीकडे पाहत स्पष्टपणे सांगितले, “तुमच्याबरोबर आलेल्या मुसलमान गृहस्थास मात्र चहा देता येणार नाही. आम्ही फक्त हिंदूंनाच चहा-फराळ देत असतो.” सय्यदांच्या लक्षात सारा प्रकार आला. मालकाला ऐकू जाईल इतक्या बेताने ते म्हणाले, “अरे तुला ठाऊक नाही. हे तर हिंदू आहेत. केवळ दाढी राखली म्हणून काही ते मुसलमान होत नाहीत. त्यांचे नाव शिंदे असून ते मूळचे कर्नाटकातीलच रहिवासी आहेत.” हे ऐकताच मालक लगबगीने सय्यदांकडे आला व म्हणाला, “आम्हाला हो काय माहीत. आता खुशाल चहा घ्या.” शिंदे यांना चांगल्या प्रकारे कानडी भाषा अवगत आहे हे नंतर कळल्यावर तर मालक चांगलाच खजील झाला.३ बाह्य लक्षणावरून निदान करणे किती विपर्यास करणारे ठरते. एखाद्या नाटकातच शोभावी अशी ही घटना होती.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १५३.
२.    शिंदे यांचा पत्रव्यवहार.
३.    जनाबाई शिंदे, साप्ताहिक तरुण महाराष्ट्र, पुणे, ३१ डिसेंबर १९४८.
४.    तत्रैव, पृ. १५५.

पारीस येथील एक महिना

दुस-या वर्षातील ईस्टरची सुटी पारीस पाहण्यात घालवावी असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठरविले होते. त्याप्रमाणे ते पारीसला जाण्यासाठी १३ मार्च १९०३ रोजी रात्री साडेदहा वाजता बोटीने न्यू हेव्हन येथून निघाले. समुद्र शांत व चांदणे स्वच्छ असल्याने प्रवास सुखाचा झाला. पारीस येथे सकाळी सात वाजता ते पोहोचले व शाब्रॉल् हॉटेलमध्ये मुक्काम केला.

पारीसच्या मुक्कामात शक्य तेवढ्या ऐतिहासिक वास्तू, प्रेक्षणीय स्थळे, उत्तमोत्तम शिल्पे पाहावी; धार्मिक, सामाजिक स्थितीचे निरीक्षण करावे व विद्वानांच्या भेटी घेऊन माहिती मिळवावी, चर्चा करावी असा त्यांचा उद्देश होता. लुक्षंबर्ग राजवाडा, पँथिऑन व सोबान अथवा पारीस युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली. पँथिऑनची इमारत बघितल्यावर फ्रेंचांची कला, कल्पना आणि कारागिरी तसेच सौंदर्याची रुची ग्रीकांप्रमाणेच आहे असे त्यांना जाणवले. ट्रायंफल आर्क, प्लेस डी कंकॉर्ड, पेती पॅलेस, त्रकोदेरो पॅलेस इत्यादी भव्य इमारती व प्रेक्षणीय स्थळे त्यांनी पाहिली. ‘म्युजी दि गिमे’ नावाची धर्माची म्युझियम त्यांनी पाहिली. नॉत्र दाम ह्या पारीस येथील अतिभव्य देवळामध्ये ते उपासनेस गेले. हे देवालय सुमारे वीस हजार लोक मावतील एवढे विशाल आहे. सां. व्हिनसां द पाल, मा दिलेन चर्च, सां रोक चर्च इत्यादी देवळांमध्येही ते उपासनेसाठी गेले.

२४ मार्च रोजी शिंदे यांचे बोटीवरील मुंबईचे पार्शी मित्र मि. कोतवाल यांची अचानक भेट झाली. त्यांनी शिंदे यांना शहराबाहेर बो द बलोन हे उपवन पाहावयास नेले. अत्यंत आखीव, रेखीव रूप दिलेले हे उपवन शिंदे यांना फारसे आवडले नाही. “एखाद्या सिंहाचे दात व नखे उपटून काढावीत व त्यास मिंधे करून एखाद्या श्रीमंताच्या लाडक्या पोरास खेळावयास द्यावे तशीच गत ह्या पारीसजवळच्या उपवनाची झाली आहे. झाडे दुकानात ठेवल्याप्रमाणे एकाच नमुन्याची. एकंदर देखावा इतका माणसाळलेला की ह्यास उपवन म्हणण्यापेक्षा अरण्याचे प्रदर्शन म्हणणे अधिक शोभते.” शिंदे यांना पारीस येथील उपवन जसे आवडले नाही त्याचप्रमाणे पारीस येथील करमणुकीची ठिकाणे व तेथे येणा-या लोकांचा वर्तनव्यवहारही रुचला नाही.

२६ मार्चला रात्रौ कोतवाल यांच्याबरोबर ते ‘ऑलिंपिया’ नावाच्या उत्तम गणल्या गेलेल्या म्युझिक हॉलमध्ये गेले. ‘नव्याचा पाश्चात्त्य अतिशोष पडल्यामुळे येथील लोकांची रुची बिघडत चालली आहे.’ असे त्यांना वाटले. तरुण मुलींना तंग पोशाख देऊन त्यांच्याकडून निरनिराळे ढंग करविणे हा येथील लोकांचा करमणुकीचा प्रकारही त्यांना फारसा भावला नाही. ह्या म्युझिक हॉलमधील लोकांचे ते निरीक्षण करीत होते. नाटकगृहात पुष्कळ वारयोषिता राजरोस विचारीत हिंडत होत्या. अशा बायका आपल्या धंद्यासाठी नाटक पाहावयास येतात. त्यांच्याशी बोलण्यात, हिंडण्यात कुणालाही संकोच वाटत नाही, असे शिंदे यांना दिसले. नाटक संपल्यावर नाटकगृहाखाली असलेल्या विस्तीर्ण उपाहारगृहामध्ये अशा बायकांची व पुरुषांची गर्दी जमते आणि ते यथेच्छ स्वैर वर्तन करतात. हे स्थळ दाखविल्यानंतर कोतवाल शिंदे यांना ‘मॅक्झिमस’ नावाच्या श्रीमंत थाटाच्या बदफैली उपाहारगृहामध्ये घेऊन गेले. शिंदे तेथे फार वेळ राहिले नाहीत. रात्री दोन-चार वाजेपर्यंत येथे रंग उडतो. प्रत्यक्ष अशा ठिकाणी कसलेही अपकृत्य होत नाही. तथापि स्वैराचारी स्त्री-पुरुष येथे एकत्र बसतात, उठतात, हिंडतात. काही स्त्रिया फार सुंदर आणि श्रीमंत दिसल्या. रात्री पत घरी येताना भेटणा-या सर्व स्त्रिया कुमार्गी आढळतात. असा हा पारीस येथे नित्य घडत असलेले प्रकार पाहून शिंदे यांचे डोके विचाराने भणभणले. नीतीसंबंधी एकंदर प्रश्न बिकट असला तरी त्याचा विचार वा उल्लेख होत नाही, किंबहुना वैवाहिक नीतीचा लोक अद्याप अनुभवपद्धतीने विचार करीत नाहीत याचे त्यांना आश्चर्य वाटते. ‘नीतिशास्त्र्यांनी पारीस येथील व्यवहार अवश्य निरीक्षावेत व त्यावरून वैवाहिक नीतीचे लक्षण बांधावे आणि समाजशास्त्राचेही धोरण राखावे’ इत्यादी विचार त्यांच्या मनामध्ये येऊन गेले.

दुस-या दिवशी रात्री कोतवाल ह्यांनी शिंदे यांना ‘बॉई बॉला’ नावाच्या सार्वजनिक नाचाचे ठिकाण दाखवावयास नेले. एक फ्रँक देऊन पाहिजे तेव्हा आत करमणुकीसाठी जावे. व्हायलीनवाल्याचा मनोहर बँड येथे वेळोवेळी सुरू होतो, तेव्हा वाटेल त्याने वाटेल तिच्याबरोबर नाचून लागावे, क्रीडावे, हिंडावे, बोलावे, उपाहार घ्यावा, किंवा संकेत करावा अशी येथील रीत त्यांना दिसली. येथेही रंगेल स्त्रिया अगदी उघड उघड येऊन विचारीत. सुमारे एक हजार माणसे येथे उल्हास करीत होती.

आजचे हे दृश्य बघितल्यानंतर शिंदे यांचा विचाराचा कल आदल्या दिवसाहून वेगळा झाला. त्यांचे मन क्षमाशील झाले. इतकेच नव्हे तर ह्या परिस्थितीबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती उत्पन्न होऊ लागली. त्यांच्या मनात आले, ‘हल्लीच्या उद्योगाच्या झटापटीत मनुष्यास कसल्या तरी करमणुकीची आवश्यकता आहे. धर्माधिका-यांनी शुद्ध करमणुकी जर पुरविल्या नाहीत तर इथल्याप्रमाणे अशुद्ध व केव्हा केव्हा मोठ्या घातुक करमणुकी आत शिरतात.’ इंग्लंडात हल्ली धर्माच्या बाबतीत खटपट करणारे मिशनरी शुद्ध करमणुकी पुरवून कामगारवर्गाचे मन धर्माकडे वळविण्याचा प्रयत्न करतात, ह्याबद्दल शिंदे यांचे फारसे अनुकूल मत नव्हते. ख-या धर्मप्रवृत्तीला निवृत्ती आवश्यक असते. निदान समाधान पाहिजे असते. धर्मप्रवृत्तीला करमणुकीमुळे अडथळा येतो असे त्यांना पूर्वी वाटत होते. आजही त्यांच्या ह्या मतामध्ये फारसा बदल करावासा वाटला नाही. तरी त्यांच्या मनाची एवढी निश्चिती झाली की, ‘शुद्ध करमणुकी पुरविल्या नाही आणि कॅथॉलिक धर्माप्रमाणे फाजील सोवळेपणाचा दंभ माजविला तर पारीससारखे मासले दिसणारच.’१

विठ्ठल रामजी शिंदे यांनी पारीसमध्ये बघितलेल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी वैशिष्ट्यपूर्ण स्थळे म्हणजे तेथील स्मशानभूमी होय. मों मांट ह्या नावाची स्मशानभूमी त्यांनी २७ मार्चला पाहिली. ५ एप्रिलला मों पार्नार्द बंद असल्यामुळे ती त्यांना पाहता आली नाही. मात्र दुपारून ‘पेर ला शाज’ ही सर्वात मोठी स्मशानवाटिका त्यांनी बघितली. तेथे प्रथम गेल्याबरोबर ज्यांच्यासाठी कबरस्थान नाही अशा सर्वच माणासांसाठी जे एक मोठे स्मारक भिंतीत कोरलेले आढळले, ते त्यांना मोठे वेधक वाटले. “मृत नवरा-बायको भिंतीतल्या दाराशी अज्ञेय प्रदेशाकडे जात आहेत. दोहीकडून कित्येक मृत विन्मुखपणे त्याच्यामागून चालले आहेत. खाली तेच जोडपे अखेर निद्रेत उघडे पडले आहेत. त्यावर त्यांचे अर्भक पालथे पडले आहे. आशादेवीने थडग्यावरील उचलून धरली आहे.” हे शिल्प त्यांना फारच परिणामकारी वाटले.

एकंदर स्मशानवाटिका त्यांना फार प्रेक्षणीय वाटली. पुष्कळ थडगी म्हणजे लहान लहान देवळेच आहेत... “स्मशानात स्वच्छ व सुंदर सडका. दोही बाजूंनी उंच झाडी. त्यांच्या खालीही एकाला एक चिकटून असलेली थडग्यावरची देवळे, असा एकंदर देखावा पाहून आपण पाताळ लोकांत मृतांच्या स्तब्ध शहरातच आहोत असे वाटते. येथील करुणरसपर शिल्पकारागिरीही पाहण्यासारखी आहे. कवी, वक्ते, योद्धे, मुत्सद्दी, चित्रकार, गायक ह्या सर्वांची माती येथे मातीत मिसळली आहे. अशा देवळात एकेका कुटुंबातील सर्व माणसे” पुरलेली असतात. कुटुंबीयांनी भेट दिल्यावर तेथे बसून प्रार्थना करण्यासाठी खुर्च्यांची वगैरे व्यवस्था असते. मृतांची रक्षा ठेवण्यासाठी एक गॅलरी बांधलेली असते, त्यामध्ये राख ठेवून वर तावदान अगर संगमरवरी दगड बसवलेला असतो. मृताचा फोटो अगर लहानसा मुखवटा वर बसिवतात, वगैरे बाबींचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. सुमारे दोन हजार अशी लहान लहान स्मारके असल्याचे त्यांनी नोंदविले आहे. तीस लाख प्रेते जिथे पुरली आहेत अशी ही अतिविस्तीर्ण स्मशानवाटिका पाहून व तेथील वातावरण अनुभवून शिंदे यांची वृत्ती अंतर्मुख झाली. ते लिहितात, “फुलामाळांचे निर्माल्य येथे बरेच साचलेले असते. जळक्या राखेवरही मागच्याची माया कशी लोलुप होते हे पाहून मन द्रवते. तसेच अशा प्रकारे स्मारक करण्याची चाल अगदी रानटी अवस्थेपासून युरोपच्या हल्लीच्या सुधारलेल्या काळापर्यंत कशी अखंड चालू आहे हे पाहून मनात ऐतिहासिक विस्मयही दाटतो. एकंदरीत तत्त्वज्ञान, नीती, काव्य व धर्म इत्यादी अनेक गहन विषयांवर गंभीर चिंतन करण्यासा ही पारीस येथील कॅथॉलिक स्मशानस्थळे अत्यंत अनुकूल आहेत.२

हल्ली या स्थळाला भेट दिली असता संपूर्ण स्मशानवाटिकेच नकाशा मिळू शकतो. ह्या नकाशामध्ये स्मशानवाटिकेतील सर्व रस्ते व पुरलेल्या प्रमुख व्यक्तींची देवळे निर्देशिलेली आढळतात. ऑगस्ट डी कोम्त, राफेल, मोलियर, बालझॅक इत्यादी फ्रान्समधील नामवंतांच्या समाधी ह्या स्मशानवाटिकेमध्ये आहेत.३

पारीस येथील प्रेक्षणीय स्थळे पाहावीत त्याचप्रमाणे येथील विद्वान लोकांच्या भेटी घेऊन धार्मिक, सामाजिक परिस्थितीचे आकलन करून घ्यावे असाही शिंदे यांचा दुसरा एक महत्त्वाचा उद्देश होता. या हेतूने त्यांनी पारीस युनिव्हर्सिटीच्या काही विद्वानांना व इतर उदार धर्मानुयायांना त्यांचे गुरू डॉ. कार्पेंटर यांच्याकडून ओळखीची शिफारसपत्रे घेतली होती. त्यानुसार ते प्रथम बॉनेमोरी या वृद्ध प्रोफेसरास भेटले. ते त्यांना डॉ.भांडारकरांसारखे किंचित कडक व उग्र दिसले. शिंदे हे ऑक्सफर्ड कॉलेजातील ब्राह्मसमाजाचे एक प्रतिनिधी आहेत व प्रो. कार्पेंटर यांनी त्यांना शिफारशीचे पत्र दिले ते पाहून शिंदे यांच्याबद्दल त्यांचे अनुकूल मत झाले. प्रोफेसरसाहेबांनी त्यांना सल्ला दिला की, तुम्हाला पारीस खरे पाहावयाचे असल्यास येथील नटव्या इमारती पाहून न भुलता त्यांच्या माळयावरील गाळ्यात शिरून डोकावून पाहा. तेथील कंगाल, चोरटे व गुंड लोक बिळातल्या उंदराप्रमाणे चोरून रात्री आश्रयाला राहतात त्याची कारणेही शोधा.

प्रो. जाँ रेव्हील हे विद्यापीठात आधुनिक धर्माच्या इतिहासाचे अध्यापक होते. शिंदे यांनी त्यांची भेट घेतली व फ्रान्समधील धार्मिक परिस्थितीची माहिती करून घेतली. १७८९ पर्यंत म्हणजे राज्यक्रांतीपर्यंत प्रोटेस्टंटास धर्मस्वातंत्र्य मिळत नव्हते. आता कॅथॉलिक, प्रोटेस्टंट व यहुदी अशा तीनही संघांना सारखाच आश्रय मिळू लागला आहे. सोशालिझमची सामाजिक चळवळ जोराने चालू असली तरी सोशालिस्ट लोक हे धर्मांच्या बाबतीत नास्तिक मताचे लोक आहेत. कॅथॉलिक मताच्या जुलमास कंटाळून हे सर्व धर्माविरुद्ध बंडास प्रवृत्त झालेले आहेत. ह्याप्रमाणे एकीकडे कॅथॉलिक धर्माचा अढाणीपणा, धर्मवेड व जुलूम तर दुसरीकडे सुधारकांचा बुद्धिअंधपणा, औदासीन्य आणि बंडखोरपणा ह्यामध्ये उदार धर्मांचे काम कठीण झाले आहे अशी वस्तुस्थिती प्रो. जाँ रेव्हील ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या ध्यानात आली. शिंदे नमूद करतात की, पारीस येथे धर्माचे नाव काढल्यास कित्येकांस हासे येते.

विठ्ठल रामजी शिंदे यांचे इंग्लंडमध्ये तसेच अन्य युरोपीय देशातील कुटुंबामध्ये स्वागत होत असे. अनेक गृहस्थ मंडळी बोलवीत असत असे दिसते. इंग्लंड, युरोपमध्ये अशी वागणूक एखाद्या भारतीयाल मिळणे ही बाब दुर्मीळच म्हणावी लागेल. शिंदे यांचे अशा प्रकारचे आतिथ्य होत होते याचे एकक कारण म्हणजे ते धर्मोपदेशकाचे शिक्षण घेत होते व या वर्गातील लोकांना तेथे मोठा मान मिळत आलेला आहे. दुसरे कारण, शिंदे यांचे छाप टाकणारे व्यक्तिमत्त्व व त्यांच्या स्वभावातील शालीनता व वागण्या-बोलण्यातील प्रगल्भपणा हे असणार.

२१ मार्च रोजी शिंदे यांनी प्रोफेसर जाँ रेव्हील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. ३० मार्च रोजी रात्रीच्या जेवणासाठी प्रो. रेव्हील यांनी शिंदे यांना बोलावले होते. एकंदर बरीच सभ्य स्त्री-पुरुष पाहुणे मंडळी जेवणासाठी त्यांनी निमंत्रित केली होती. याप्रसंगी शिंदे यांना एक विशेष प्रकार पाहावयास मिळाला. दिवाणखान्यातून जेवणाच्या टेबलाकडे जाण्यापूर्वी रेव्हील बाईंनी पाहुण्याचे एकेक जोडपे तयार केले. त्यात एकीचा नवरा व दुस-याची बायको अशा जोड्या तयार करून दिल्या. अशी जोडपी हातातहात घालून टेबलाजवळ गेली. अशी जोडपी करण्यात पाहुण्यांमध्ये समभाव व स्नेह वाढावा, जेवताना संभाषण चांगले व्हावे, अपरिचितांचा चांगला परिचय व्हावा असे अनेक चांगले उद्देश असल्याचे त्यांना प्रतीत झाले.

मोस्यू रोज यांनी शिंदे यांना २५ मार्च १९०३ रोजी जेवणासाठी निमंत्रित केले होते. शिंदे येणार म्हणून मादाम रोजच्या आईबापांना व बहिणींनाही जेवणासाठी त्यांनी बोलाविले. मादाम रोजबद्दल त्यांचे फार अनुकूल मत झाले. ती त्यांना ‘गोड’ व ‘कुशल’ बाई वाटली. ती इंग्रजी शिकत होती याचे त्यांनी मजेदार वर्णन केले आहे. इंग्रजीत विचारले की मादामची कासावीस होई, ती आतुर नजरेने नव-याकडे पाही, याचे शिंदे यांना फार कौतुक वाटे. फ्रेंच तरुणीस इंग्रजी तरुणीइतकी स्वतंत्रता नाही हे त्यांना बोलण्यातून समजले. विवाह मुलीच्या संमतीने आई-बापच लावतात. अलीकडील दहा वर्षांत स्त्री-शिक्षणाची अधिक सोय व प्रवृत्ती होत आहे. स्त्रियांच्या प्रगतीच्या बाबतीत इंग्रजांचेच येथे अनुकरण सुरू झाले आहे हे नमूद करून फ्रेंच आणि इंग्रच यांच्या संबंधाबद्दल ते आपले निरीक्षण नोंदवितात, “इंग्रजांचा संसारी शहाणपणा फ्रेंच शिकतात व आपली च्छानी म्हणजे फॅशन त्यांना शिकवितात.” इंग्रजापेक्षा फ्रेंच त्यांना अधिक मोकळ्या मनाचे वाटले.

मोस्यू रोज ही पारीसपासून आठ मैल दूर असलेल्या सोक नावाच्या खेड्यात राहावयास गेली असता फ्रान्समधील खेडे पाहावे या हेतूने शिंदे हे त्यांच्याकडे ७ एप्रिल रोजी गेले. दुपारच्या भोजनानंतर कुटुंबाच्या परिवारासह रानात फिरावयास गेले. हा पारीसचा भोवतालचा भागही पारीसला शोभेल असा त्यांना वाटला. प्रत्येक लहान गावातही एक प्लास अथवा पार्क म्हणजे फिरण्यासाठी मोकळी जागा असते. त्यात चौफेर सारख्या साच्याची झाडे असतात. ती पाने व फांद्या तोडून सारखी ठेवलेली आढळली. नंतर सर्व मंडळी रॉबिन्सन या ठिकाणी गेली. तेथे नुसती चाळीस-पन्नास विश्रामालये (म्हणजे रेस्टॉरंटच) होती. करमणुकीखातर रविवारी चार-पाच हजार लोक त्या ठिकाणी जमत. जुन्या झाडाच्या फांद्यांवर दोन अथवा चार मजली घरे केली होती आणि खाण्यापिण्याचे पदार्थ खालून वर चाकावरून ओढून घेत असत. सुमारे साठ वर्षांपूर्वी एका धोरणी पुरुषाने येथे प्रथम एक विश्रामालय उघडले तेव्हा तो रॉबिन्सन क्रूसोप्रमाणे जंगलात एकटाच येऊन राहिला होता म्हणून या ठिकाणास रॉबिन्सन हे नाव पडले. ह्या किफायतशीर उद्योगाचे अनुकरण होऊन सध्या ते मोठेच करमणुकीचे स्थान बनले. मोठमोठ्या जत्रा आणि क्षेत्रे कशी बनतात ह्याचे हे एक उदाहरण आहे असे शिंदे यांना वाटले. फ्रेंचांच्या सामाजिक वागणुकीचा, त्यांच्या हौशी वृत्तीचा हा नमुनाच त्यांना पाहावयास मिळाला.

पारीसच्या वास्तव्यातील आणखी एक महत्त्वाची भेट म्हणजे, मॅडेमोझील् (कुमारी) दुगार ह्या बाईची १ एप्रिल १९०३ रोजी झालेली भेट. त्या कॉलेज मोलिएर ह्या स्त्रियांच्या कॉलेजात वाङ्मय व तत्त्वज्ञान विषयाच्या अध्यापिका होत्या. पारीस येथील स्त्री-शिक्षणाविषयी माहिती मिळविण्यासाठी शिंदे यांनी ह्या बाईची भेट घेतली. त्यांना ह्या बाई अत्यंत गरीब, सभ्य व साध्या वाटल्या. त्यांच्याबद्दचा शिंदे यांचा अभिप्राय मोठा मार्मिक आहे. “हिचा पोशाख व वागणूक इतकी साधी दिसली, (की) ही पारीस नगरीत राहण्यास जवळ जवळ अयोग्यच दिसली.” स्त्रियांच्या प्राथमिक आणि द्वितीय शिक्षणासंबंधी शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक, साधार उत्तरे दिली. दोघांचेही संभाषण मनमोकळेपणाने झाले. हिंदुस्थानचे लोक म्हणजे गहन विषयात गुंतलेले, वैराग्य वृत्तीचेच असावयाचे असा तिचा समज होता. शिंदे यांची प्रवृत्तिपर, प्रगमनशील, शुद्ध बुद्धिवादी सुधारकी मते पाहून तिला आश्चर्य वाटले व तसे बोलून दाखविल्याबद्दल तिने माफी मागितली. शिंदे यांना तिचे भाषण व वर्तणूक फार आवडली. दुस-या दिवशी बाईंनी शिंदे यांना जेवणास बोलावले.

दुस-या दिवशीच्या भेटीत ते उच्च शिक्षणाविषयी बोलले. फ्रेंच विवाहपद्धतीसंबंधी त्यांचे मोठे मौजेचे बोलणे झाले. इंग्रजांप्रमाणे येथेही स्वयंवराची चाल हळूहळू पडू लागली होती. फ्रान्समध्ये तरुण मुलीस इंग्रज मुलीप्रमाणे स्वातंत्र्य नसे. पारीसच्या नीतीसंबंधाने बाईंनी मोकळेपणाने आपली माहिती व विचार सांगितले. ब्रिटिशांपेक्षा फ्रेंच लोकांत वैवाहिक नीती कमी असल्याचे मतही तिने बोलून दाखविले. नीती बिघडण्याचे एक कारण म्हणजे तरुण मुलांनी एकवीस वर्षांनंतर दोन वर्षे लष्करात नोकरी केली पाहिजे असा तेथे असलेला सक्तीच कायदा. शिवाय पारीस हे जगातले करमणुकीचे स्थान असल्याने परकीय चैनी लोकांचे येथे चाळे फार चालतात हेही एक कारण. शिंदे यांना एकंदरीतच स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल विशेष आस्था वाटत असे. स्त्रियांना पुरुषांच्याबरोबरीने स्थान मिळाले पाहिजे अशी त्यांना कळकळ होती. यासंबंधीही त्यांनी दुगारबाईंना विचारले. उच्च शिक्षणात स्त्रियांचा थोडा थोडा शिरकाव होत आहे व चळवळीचे काम स्त्रिया अंगावर घेत आहेत हे त्यांनी सांगितले. एकंदरीत स्त्रियांच्या बाबतीत फ्रान्स हा अमेरिका व इंग्लंडच्या मागे आहे हे बाईंनी मान्य केले. स्त्री-शिक्षणाच्या कामी कॅथॉलिक धर्माकडून कसा अडथळा येतो हे बाईंनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितले.

दुगारबाईंसमवेत दोन दिवसांच्या संभाषणानंतर स्त्रियांच्या उन्नतीविषयी झटून यत्न करणा-या या विद्वान बाईबद्दल शिंदे यांना फार आदर व प्रेम वाटू लागले. बाईंनाही शिंदे यांच्याबद्दल व त्यांच्या धर्माबद्दल आस्था उत्पन्न झाली. भेटीची आठवण म्हणून शिंदे यांना त्यांनी इमर्सनविषयी एक पुस्तक दिले. दुगारबाईंच्या भेटीचा, त्यांच्या सहवासाचा शिंदे यांच्या मनावर अत्यंत अनुकूल परिणाम झाला. त्यांचा निरोप घेऊन निघाल्यानंतर आपल्या मनाची वृत्ती कशी झाली हे त्यांनी हृदयंगमपणे प्रकट केले आहे. “११ वाजता मी घरी परत निघालो. ट्राममधून सेन नदीचे काठाने येताना तो रात्रीचा देखावा पाहात, नुकत्याच घडलेल्या शुद्ध सहवासाविषयी माझे मनात अनेक गोड विचारतरंग येऊ लागले. आत्मा आत्म्यावर लुब्ध झाला होता. म्हणून वियोग झाल्यावरही सुखच होत होते. शरीराची सर्वच सुखे दुःखपर्यवसायी आहेत. आत्म्याला पर्यवसानच नाही. कारण आत्मा अनंत आहे, म्हणून वृत्ती अखंडित राहते.”४

मॅडमोझील् दुगार ह्या बाई १९३१ साली निधन पावल्या. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या सहका-यांनी एक छोटीशी पुस्तिका काढली. पारीसमध्ये स्त्री-शिक्षणाच्या हेतूने निघालेले हे कॉलेज अद्यापही अस्तित्वात आहे.५

पारीस येथील महिन्याभराच्या मुक्कामात शिंदे यांनी पाहिलेले अखेरचे महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे पारीसपासून सुमारे चौदा मैल अंतरावर असलेला व्हर्साय येथील १४व्या लुईचा प्रचंड आणि श्रीमंत राजवाडा. १२ एप्रिल १९०३च्या दोन प्रहरी तेथे पोहोचले. राजवाड्याच्या चौकात १४व्या लुईचा घोड्यावर बसलेला मोठा धातूचा पुतळा आहे. ह्या ठिकाणी ऐतिहासिक चित्रांचा आणि पुतळ्यांचा अपूर्व संग्रह आहे. फ्रेंच इतिहासातील प्रसंगावर नामांकित चित्रकारांनी काढलेली चित्रे आहेत. अलीकडील काळात शिंदे यांनी इतकी उत्तमोत्तम चित्रे पाहिली होती की, नव्याने बघितलेल्या चित्रांमध्ये त्यांचे लक्ष लागत नसे. तरीही शार्लमेन, सां लुई ह्यांची चित्रे त्यांना बघावीशी वाटली. क्रुसेड्ससंबंधीची चित्रे एका स्वतंत्र हॉलमध्ये लावलेली होती. दुस-या मजल्यावरील गॅलरीत १७९७ पासून १८३५ पर्यंतची नेपोलियनचा पराक्रम रेखाटणारी अनेक चित्रे त्यांना वीर व करुण रसाची महती मनावर बिंबवणारी वाटली.

निरनिराळ्या दिवाणखान्यातील संपत्तीची परमावधी पाहून ते आश्चर्यचकित झाले. वेळ कमी असल्याने सर्व राजवाडा पाहणे त्यांना शक्य झाले नाही. वाड्याच्या खिडक्यांतून सुंदर बागेची व उपवनाची दिसणारी शोभा त्यांना अनुपम वाटली. बागेत आल्यावर उंच झाडे, वीथिका, पुष्पवाटिका, गुंफा, तडाग, लहानमोठे कारंजे, वाड्यापासून उतरत जाणारी सपाटी,  पुढे दूरवर दिसणारा रुंद व प्रशस्त कालवा, त्यावरील क्रीडानौका असा देखावा पाहून त्यांच्या मनाला समाधान वाटले. ईस्टरचा सण असल्यामुळे हजारो स्त्री-पुरुष व लहान मुले विहरण्यासाठी तेथे आली होती. एक सभ्य बाई, तिचा भाऊ व लहानगा भाचा ह्या कुटुंबासमवेत शिंदे फिरत होते. संध्याकाळचे सहा वाजल्यावर ही सर्व मंडळी परत गेली. ते मात्र एकटेच कालव्याच्या काठाने उपवनात हिंडू लागले. येथील देखाव्याने त्यांचे मन वेधून घेतले होते. त्या वेळच्या मनःस्थितीचे त्यांनी वर्णन केले आहे, “सुमारे आठ वाजता उपवन बंद होण्याची वेळ झाली तरी मला बाहेर जावनेना. वाड्याचे पुढे पाय-यावर, मागे वाडा, पुढे उद्यान, भोवती क्षितिजापर्यंत पसरलेली वनराई पहात मी चित्रासारखा एवढा वेळ अगदी एकटाच उभा होतो. पौर्णिमेचा चंद्र स्वच्छ आकाशात वर येत होता. वाड्यापुढची बाजू (१३६० फूट लांब) रंगीत फोटोसारखी सुबक व प्रमाणबद्ध नजरेत भरली. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्याच्या व सुधारणेच्या वातावरणात असे एकवटलेले माझ्या पाहण्यात तर अद्यापि कोठे आले नाही व पुढेही येईलसे दिसत नाही. म्हणून आठचे सुमारास बाहेर पडताना थोडे अवघड वाटले.”६

१४ मार्च १९०३ पासून सुमारे महिनाभर शिंदे यांनी पारीस येथे वास्तव्य केले. जगातील एका सुधारलेल्या व सुसंस्कृत समजल्या जाणा-या फ्रान्स ह्या देशाचे अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी महिनाभराच्या वास्तव्यामध्ये केला. स्थापत्यकलेचे अद्भुत आणि भव्य नमुने, अप्रतिम शिल्पे, श्रेष्ठ दर्जाच्या चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे त्यांनी मन लावून निरखली. नृत्यगायनाचे ढंगही बघितले. अति भव्य ख्रिस्ती देवळे जशी त्यांनी पाहिली त्याचप्रमाणे नाचगाण्याचे रंग उडविणारी बदफैली उपाहारगृहेदेखील पाहिली व तेथील लोकांचे निरीक्षण केले. एकंदरीत फ्रान्समध्ये कॅथॉलिक धर्माचा पगडा जाणवत असला तरी आधुनिक फॅशनचे माहेरघर असणा-या, युरोपमधील ह्या महत्त्वाच्या शहरामध्ये धर्माची पीछेहाट होत असून बहुतेकांना सुखासीन जीवनाची ओढ लागली आहे, असे आधुनिक जगाचे प्रतीकरूप चित्र त्यांना येथे पाहावयास मिळाले. मात्र ह्या वातावरणातही निष्ठावंतपणे अध्ययन करणारी बॉन मोरी, जाँ रेव्हील यांच्यासारखे प्राध्यापक त्यांना आढळले. फॅशनच्या गजबजाटातही अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत करणारी, नैतिक निष्ठेतून स्त्री-शिक्षणासाठी झटणारी मॅडेमोझील् दुगार हिच्यासारखी एखादी स्त्री आढळली. यामध्येच शिंदे यांच्या मनाला काही दिलासा प्राप्त झाला असणार.

संदर्भ
१.    वि. रा. शिंदे, रोजनिशी, पृ. १४०-४१.
२.    तत्रैव, पृ. १४२-४३.
३.    प्रस्तुत लेखकाला पेर ला शाज येथील स्मशानवाटिकेचा तेथेच उपलब्ध झालेला नकाशा.
४.    वि. रा, शिंदे, रोजनिशी, पृ. १४५-४७.
५.    मिस्स मारी क्लॉद महियास, पारीस यांनी ३० जुलै १९८३ रोजी प्रस्तुत लेखकास लिहिलेले पत्र.
६.    वि. रा. शिंद, रोजनिशी, पृ. १४८.

  1. परिशिष्टे १, २ आणि ३
  2. परतीचा प्रवास
  3. पदवी परीक्षेचा अभ्यास आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरचे पुणे
  4. पदवी परीक्षा
  • 114
  • 115
  • 116
  • 117
  • 118
  • 119
  • 120
  • 121
  • 122
  • 123
Page 119 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी