1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

परिषदा, संमेलने यांमधील सहभाग

अण्णासाहेब शिंदे यांचे सामाजिक स्वरुपाचे कार्य; इतिहाससंशोधन, समाजशास्त्रीय व तत्त्वज्ञानात्मक स्वरुपाचे लेखन याबाबतचा त्यांचा अधिकार मोठा असल्यामुळे विविध प्रकारच्या परिषदा व संमेलने यांमध्ये अध्यक्ष, उद्घाटक या प्रकारचा बहुमान त्यांना मिळणे स्वाभाविक होते. खरे तर शिंदे यांची निर्भीड व सत्याचा वेध घेणारी मते या क्षेत्रातील मान्यवरांना पटणारी व भावणारी अशी बहुधा नसत. ते काही सर्वच लोकांना रुचेल, पटेल अशा प्रकारचे बोलणारे वा लिहिणारे, वक्ते वा लेखक नव्हते. त्यामुळे अशा प्रकारचे बहुमान त्यांना महाराष्ट्रात सातत्याने मिळत होते असे काही दिसत नाही. तरी पण सामाजिक क्षेत्रात त्यांनी अलौकिक कर्तृत्व गाजविले असल्यामुळे व संशोधनाच्या व वैचारिक साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र प्रज्ञा दाखविली असल्यामुळे त्यांची सर्वस्वी उपेक्षा करणेही सुशिक्षित समाजाला शक्य नव्हते. दुसरी गोष्ट अशी की, सर्वसामान्य सुशिक्षितांच्या मताला धक्का देणारे विचार शिंदे यांच्याकडून प्रकट होत असले तरी त्यांची योग्यता जाणणारा लहानसा का होईना पण एक प्रभावी वर्ग सुशिक्षितांमध्येही अस्तित्वात होता. या कारणाने अशा परिषदांत व संमेलनांत सहभागी होण्याची. निदान काही वेळ तरी कळकळीची निमंत्रणे शिंदे यांना मिळत असत व नवा स्वतंत्र विचार प्रकट करण्याची संधी म्हणून अण्णासाहेब शिंदे हे अशा प्रकारची निमंत्रणे स्वीकारीत असत. अशा प्रत्येक सभास्थानावरुन त्यांनी जे विचार प्रकट केले त्यामधून त्यांच्या विचारांचा स्वतंत्रपणा व मैलिकताही प्रकट झाल्यावाचून राहत नाही.


विठ्ठल रामजी शिंदे हे धार्मिक, सामाजिक सुधारणांसाठी स्वतःचे आयुष्य वाहणारे कृतिवीर होते. सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्यांनी जे विचार मांडले आहेत त्यांच्या पाठीमागे स्वाभाविकपणे स्वानुभवाचे बळ होते. १९२५ साली प्रांतिक सामाजिक परिषदेच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी महत्त्वाचे विचार मांडले आहेत. स्वतः शिंदे यांनी आधी अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला प्रारंभ केला व नंतर त्या कार्याचा अधिकाधिक विस्तार व्हावा, त्या कामाला उठाव मिळावा म्हणून परिषदांचे आयोजन अतिशय परिणामकारक रीतीने केले होते. ह्याबाबतीत १९१२ साली पुणे येथे त्यांनी डॉ. भांडारकरांच्या अध्यक्षतेखाली भरविलेली मिशनची महाराष्ट्र परिषद ही एक नमुनेदार परिषद म्हणावी लागेल.

त्याचप्रमाणे मार्च १९१८ मध्ये मुंबईत श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मिसनच्या साहाय्याने भरविलेली अखिल भारतीय पातळीवरील परिषद ही केलेल्या कामाची माहिती देऊन भावी कार्याला चालना देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची परिषद ठरली. आधी काम करावे व त्यानंतर भावी काळातील कामाला उठाव मिळण्याच्या दृष्टीने परिषदेच्या द्वारा आवश्यक विचारमंथन करावे हे अशा परिषदांमागचे उद्दिष्ट असले पाहिजे असे शिंदे यांचे धोरण होते. ज्या प्रांतिक सामाजिक परिषदा आयोजित केल्या जातात त्या पाठीमागे प्रत्यक्ष कृतीचे बळ नसते ही उणीव बहुधा शिंदे यांना जाणवलेली असावी. म्हणूनच त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या प्रास्ताविकात प्रारंभी असे म्हटले की, "पाठीमागे विधायक कार्य करणा-या संस्था नसताना भरविल्या जाणा-या परिषदा ह्या नुसत्या आवाज करणा-या घंटांसारख्या किवा पर्जन्यरहित वावटळीसारख्या विफल होऊन त्यांच्या योगाने सार्वजनिक शांततेचा भंग मात्र होत असतो!" या परिषदेत सामाजिक सुधारणेच्या संदर्भात त्यांनी मूलभूत स्वरुपाचे विचार मांडले.


आपल्याकडे सामाजिक सुधारणांचा वेग मंद का असतो, ह्या प्रश्नाची चर्चा करताना आपल्याकडे सामाजिक सुधारणा ह्या शब्दाची व्याप्तीच मर्यादित समजली जाते, ह्या मोठ्या उणिवेकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. सामाजिक सुधारणा म्हणजे जुन्या कर्मठ धार्मिक भावना व जुन्या रुढी यांच्याविरुद्ध चाललेला झगडा आहे, एवढे सांगितल्याने त्या शब्दांची निम्मी-अर्धी व्यापतीही सांगितल्यासारखी होत नाही असे विधान करुन धार्मिक भावनेच्या पलीकडे सामाजिक सुधारणांचा कितीतरी मोठा भाग आहे, याचा ते निर्देश करतात. आतापर्यंतच्या सामाजिक सुधारणा ह्या धर्माने घातलेले निर्बंध व धर्माच्या पाठबळावर असलेल्या रुढी यांच्या संदर्भातच प्रामुख्याने केल्या जात होत्या. वस्तुतः खेडेगावातील आरोग्यसंवर्धन, शहरातील मजूरवर्गाची सुधारणा, शिशुसंगोपन वगैरे अनेक महत्त्वाच्या बाबींचा सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात समावेश त्यांना अगत्याचे वाटते.


सामाजिक सुधारणा मंद गतीने होण्याच्या आणखी एक महत्त्वाच्या कारणाचा ते निर्देश करतात. ते कारण म्हणजे, शुद्ध सामाजिक सुधारणेचे म्हणविले जाणारे कार्य धर्मापासून बुद्धिपुरःसर अलिप्त ठेवले जाते. कै. आगरकरांसारखे जुन्या परंपरेतील समाजसुधारक या कार्याची उभारणी अद्यापही उपयुक्ततावाद, युक्तिवाद, भूतदया वगैरे दुस-या कोणत्याही तत्त्वावर करण्यास तयार असतात; पण धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर उभारण्यास तयार नाहीत. अशा त-हेची धर्मविन्मुख प्रवृत्ती समाजसुधारकांमध्ये असावी ही गोष्ट त्यांना अयोग्य वाटते. सर्व प्रकारच्या भावनामय चळवळी ह्या आध्यात्मिक चळवळी असतात ही त्यांची भूमिका होती.


विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी सांगितलेला हा विचार अत्यंत मौलिक स्वरुपाचा वाटतो व त्याला प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे पाठबळ आहे. भारतात आणि महाराष्ट्रात आजपर्यंत सामाजिक सुधारणेची व सामाजिक पुनर्घटना करण्याची प्रत्यक्षामध्ये जी मूलभूत स्वरुपाची मोठमोठी कामे झाली आहेत, ती धर्मनिष्ठ पुरुषाकडूनच झालेली आहेत असे आपल्याला ध्यानात घ्यावे लागते. येथे अर्थातच धर्म म्हणजे आध्यात्मिक आशय असलेला धर्म अभिप्रेत आहे आणि निरर्थक कर्मकांड अभिप्रेत नाही ही गोष्ट स्पष्ट आहे. भारतीय समाजाच्या धार्मिक अंधश्रद्धांना हादरे देऊन सामाजिक सुधारणांना जोराची चालना देऊन न्यायाच्या व माणुसकीच्या पायावर भारतीय समाजाची पुनर्घटना करण्याचे काम फार मोठ्या प्रमाणात राजा राममोहन रॉय, महात्मा जोतीबा फुले, खुद्द महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहूमहाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांनी केलेले आहे व हे सर्व पुरुष धर्मनिष्ठ होते. समाजसुधारणा व धर्माच्या आद्य तत्त्वांचे आचरण ह्या दोहोंच्या बाबतीतील ध्येयात्मक प्रयत्नाचे ऐक्य होणे त्यांना आवश्यक वाटते. या ऐक्याच्या योगाने आमच्या सुधारकांची सुधारणा होऊन त्यांच्या ध्येयास अधिक उत्कटता प्राप्त होवो अशी शुभेच्छा ते प्रकट करतात.


सामाजिक सुधारणेच्या तपशिलाचा विचार करताना ते अस्पृश्यतानिवारण, ब्राह्मणेतरांचा असंतोष, हिंदू-मुसलमानांचे ऐक्य व हिंदू-संघटन यांचा निर्देश करतात. ह्या बाबी ते सर्वस्वी भिन्न समजत नाहीत, तर बृहत हिंदू समाजास जडलेल्या एकाच अंतर्गत रोगाची ही भिन्न भिन्न लक्षणे आहेत, असे ते सांगतात, ह्या समस्यांच्या मुळाशी असणारी व्याधी म्हणून ते एका गोष्टीचा निर्देश करतात. "काल्पनिक भेद काढून त्यांना केवळ खाजगी व्यवहारातच नव्हे तर सार्वजनिक व्यवहारामध्येसुद्धा उच्च दर्जाचे राजकारण व चारित्र्याचे पावित्र्य यांच्या वर स्थान देण्याची जी हिंदी जनतेच्या मनोवृत्तीला स्वयंस्फुरित सवय आहे, तीच हिंदुस्थानला विशिष्ट असलेली मानसिक व्याधी होय." ह्या व्याधीमुळेच बेकीची अथवा दुहीची बीजे निर्माण होतात.

 

स्पृश्यास्पृश्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, हिंदू-मुसलमान हा भेद निर्माण करुन काहीजण स्वतःलाच श्रेष्ठ व इतरांना कनिष्ठ समजतात. ह्या काल्पनिक भेदामुळे व श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या जन्मजात कल्पनेमुळे हिंदुस्थानात सामाजिक पातळीवर हे प्रश्न निर्माण झालेले आहेत, असे विश्लेषण ते करतात. शिंदे यांची मूलभूत स्वरुपाची ही भूमिका असल्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न धर्मग्रंथाच्या आधारे सोडविण्यासाठी शास्त्रीपंडितांकडे सोपवू नये. कारण हा प्रश्न सोडवण्यास सर्वात नालायक कोण असतील तर ते शास्त्रीपंडितच होत, अशी त्यांनी ठाम भूमिका येथील भाषणात मांडली, महात्मा गांधीशी झालेल्या चर्चेच्या वेळी शिंदे यांनी म. गांधींना ठामपणे हेच सांगितले असल्याचे लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी नमूदही करुन ठेवले आहे.


ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा प्रश्न अलीकडचा नसून जुना असल्याचे ते नमूद करतात. ध्वनी आणि प्रतिध्वनी अशा प्रकारचे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे स्वरुप आहे असे ते विश्लेषण करतात. ब्राह्मणवर्गाने आपला ताठा सोडावा. राजकीय महत्तवाकांक्षेच्या पटांगणात ब्राह्मणेतर खेळाडूंचे स्वागत करावे अशी अपेक्षा प्रकट करतात. ब्राह्मणेतरवर्गानेही उभय पक्षात सलोखा नांदेल अशी व्यवस्था घडवून आणणे त्यांना आवश्यक वाटते. मराठी बांधवांना ते उपदेश करतात की, सत्यशोधक समाजाची विस्कळीत घडी त्यांनी नीट बसवावी. म्हणजे वाटेल त्या बेजबाबदार वेड्या पिराला ही संस्था म्हणजे ब्राह्मणवर्गाचा सूड उगवण्याचे हत्यार म्हणून उपयोग करुन गेता येणार नाही. हिंदुसंघटनेच्या प्रश्नाचा विचार करताना ते हिंदुसभेच्या पुढा-यांनी आधी हिंदूंची म्हणजेच अस्पृश्यांचीच मने दुखावणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगतात.


या अध्यक्षीय भाषणातच त्यांनी स्त्रीदास्यविमोचन, सहकाराची चळवळ, खेड्यांतील व शहरातील मजूरवर्ग इत्यादींच्या समस्यांचा थोडक्यात निर्देश करुन त्या समस्या सोडविण्याची दिशा दाखविली.


१९३३च्या डिसेंबर अखेरीस नागपूर येथे महाराष्ट्र साहित्य संमेलन भरले. संमेलनाचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक वस्तूंचे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. २६ डिसेंबर १९३३ रोजी ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन विठ्ठल रामजी शिंदे यांनी करावे अशी त्यांना विनंती करण्यात आली होती. सिटी कॉलेजातल्या खोल्यांतून प्रदर्शनातील वस्तू मांडल्या होत्या. औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम संमेलनाच्या मुख्य मंडपातच सकाळी साडेआठ वाजता सुरु झाला. प्रदर्शन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अनेक स्त्री-पुरुष श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.


प्रदर्शनाचे उद्घाटक विठ्ठल रामजी शिंदे यांचा परिचय करुन देणारे भाषण नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु न्या. भवानीशंकर नियोगी यांनी केले. भाषणामध्ये त्यांनी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या कार्याचे ऐतिहासिक महत्व उत्तम प्रकारे विशद केले. शिंदे यांच्या कार्याची योग्यता सांगताना न्या. नियोगी म्हणाले, "शिंद्यांचा जिला भरीव हातभार लागला नाही, अशी लोकसेवेची, समाजोन्नतीची चळवळ दाखवून देणे कठीण आहे आणि अशी परिस्थिती आहे यात आश्चर्यही नाही. कारण ज्याचा जनसेवा हा धर्म आणि तो धर्म तेच नित्य कर्तव्य किंबहुना ज्याचा स्वभाव झाला आहे, त्याचा एखाद्या जनहितकारक चळवळीशी संबंध न आला तरच आश्चर्य.

राजकारण, समाजकारण, धर्मकार्य, शिक्षणकार्य इतकेच नव्हे तर वाड्मयसेवा आणि इतिहाससंशोधन या सर्वांत शिंद्यांचा भाग आहे आणि फार महत्त्वाचा भाग आहे. सत्य अथवा प्रामाणिकपणा हा फार मोठा किंबहुना सर्वात मोठा सद्गगुण आहे असे म्हटले पाहिजे. आपल्याला जे सत्य वाटेल त्याप्रमाणे निश्चयाने वागणे ही गोष्ट असामान्य पुरुषच करु जाणे. शिंद्यांनी या गोष्टीला लागणारा आवश्यक त्याग, तितिक्षेचे धैर्य दाखविण्यातच आपले सर्व आयुष्य खर्च केले आहे. त्यांना ब्राह्मसमाजाची तत्त्वे पटली, ते ब्राह्मो झाले व इंग्लंडहून सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करुन येऊन अनेक वर्षांपर्यंत त्यांनी ब्राह्मोसमाजाच्या प्रचारकाचे काम केले. हे काम करीत अनेक ठिकाणी हिंडत असता हिंदू समाजाच्या एका फार मोठ्या घटकाची दुर्दशा त्यांच्या नजरेस आली व अस्पृश्योद्धाराच्या चळवळीला त्यांच्याकडून आरंभ झाला.


"ज्या काळी विधवाविवाहासारखे साधे प्रश्न सुटणेदेखील दुरापास्त होते अशा त्या घनदाट धर्मवेडाच्या काळात अस्पृश्योद्धाराची चळवळ सुरु करणे व त्यासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढणे, इतकेच नव्हे तर अस्पृश्यांत जाऊन त्यांच्यापैकी एक झाल्याप्रमाणे त्यांच्यात वागणे या गोष्टीसाठी अतुल स्वमतधैर्याचीच आवश्यकता होती. एवढेच नव्हे तर मूलमार्गी बुद्धीची व समाजाविषयी ख-या कळकळीचीही गरज होती. अस्पृश्योद्धाराच्या चळवळीचे महत्त्व लक्षात घेता ती शिंद्यांच्या आयुष्यातील फार मोठी कामगिरी झाली यात नवल नाही. स्वत: स्थापन केलेली डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था अस्पृश्यांच्या हाती देऊन त्यांनी आपल्या कामाची योग्य परिणती करुन दाखवली ते कोणीही कबूल करेल. मराठी जाती व अस्पृश्य यांच्यातील त्यांची शैक्षणिक कामगिरी फार महनीय आहे आणि समाजाच्या उन्नतीच्या मार्गात शिक्षण हीच मुख्य बाब असल्यामुळे ती त्यांच्याकडून हाती घेतली जाणे साहजिकच होते. परंतु शिमग्याची घाणेरडी व लाजिरवाणी चाल आणि मुरळ्या देण्याची दक्षिणेतील पद्धत यांच्याविरुद्धही त्यांनी पूर्वीच्या काळात चळवळी केल्या हे पाहून तर आश्चर्य वाटल्यावाचून व कार्यकर्त्यांच्या सुधारणेविषयीच्या जिव्हाळ्याबद्दल कौतुक वाटल्यावाचून राहात नाही. इतक्या व्यापक व सूक्ष्म दृष्टीच्या कार्यकर्त्यांची दृष्टी संकुचित असून शकत नाही. ती संबंध देशाइतकी विशाल व विस्तुत असावी लागते. म्हणूनच श्रीयुत शिंदे हे सामाजिक चळवळीप्रमाणेच अनेक राजकीय चळवळीतही भाग घेताना दिसत. तर दोन्ही ठिकाणी त्यांची राष्ट्रीय व्यापक दृष्टी छपली नव्हती ही गोष्ट अभिनंदनीय असली तरी शिंद्यांच्या बाबतीत साहजिकच होती.


"परंतु परिस्थितीमुळे आपदधर्मच धर्म होऊन बसत असतो. लो. टिळकांना गणिताची आवड असून त्यांना देशासाठी राजकारणात पडावे लागले. तसेच श्री. शिंदे यांनाही राष्ट्रकारण व जातीकारण यात पडावे लागले. वास्तविक त्यांचा आवडता विषय इतिहाससंशोधन हा होय. यासंबंधात त्यांची कामगिरी फार प्रशंसनीय असून तिच्याशीच आज आपल्या मुख्यत: संबंध आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या त्यांच्या अनेक दृष्टींनी महत्त्वाच्या पुस्तकात त्यांचे जसे विलक्षण प्रवासाचे परिश्रम दिसून येतात, त्याचप्रमाणे संशोधनाची कौतुकास्पद कामगिरीही दिसून येते. त्यांची अनेक भाषाभिज्ञता सर्वविदित असून मराठी व कानडी यांचा परस्परसंबंध याविषयीचे त्यांचे लेख फार मननीय व उद्बोधक आहेत.

तेव्हा राष्ट्रीय कामगिरी व सार्वजनिक कार्य आणि संशोधनप्रेम व वाड्मयसेवा यांचा ज्यांच्या जीवनात सुंदर संगम झाला आहे, असा अध्यक्ष या प्रसंगाला लाभल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाल्याबद्दल आपणाला आश्चर्य वाटायला नको. वास्तविक मी आपणाला आतापर्यंत कर्मवीर शिंदे यांचा परिचय करुन दिला असे वाटत असेल, पण ते बरोबर नाही.

कारण शिंद्यांचा परिचय करुन देणे महाराष्ट्रात तरी आवश्यक नाही. या संमेलनाबरोबर भरविण्यात येत असलेली हे प्रदर्शन वाङ्मयीन व ऐतिहासिक आहे. रा. शिंदे यांची या संबंधीची कामगिरी महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचे मान्य केले हे किती उचित झाले, याच मी आपणासमोर मोठ्याने विचार करीत होतो. तो झाल्यावर मी आता कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी त्यांना विनंती करतो." ह्या कामाला हात घालण्यात शिंदे यांची मूलगामी बुद्धी व समाजविषयीची खरी कळवळ दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.


प्रिन्सिपॉल पांढरीपांडे यांनी प्रदर्शनाचा थोडक्यात इतिहास सांगून प्रदर्शनात कोणकोणत्या दुर्मिळ, मौल्यवान व ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाच्या वस्तू मांडल्या आहेत यासंबंधी माहिती दिली.


अण्णासाहेब शिंदे यांनी सुमारे एक तासभर उद्घाटनपर भाषण केले. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या मासिकासंबंधाने ते म्हणाले की, "मासिके व वृत्तपत्रे यांतून सर्व प्रकारच्या मतांना अवसर मिळावा पाहिजे. अब्राह्मणांची अगर अस्पृश्यांची नियतकालिके आमच्या भागात बुडतात हे ठीक नाही." यानंतर इतिहाससंशोधनासंबंधी ते म्हणाले की, "इतिहाससंशोधकाची दृष्टी नेहमी निर्दोष असावी. त्याचे मत निर्विकार असल्याशिवाय शास्त्र या संज्ञेत पात्र होणारा इतिहास लिहिता येणे शक्य नाही. तसेच पेशवाई व मराठेशाही एवढ्यावरच संशोधनकार्य संपत नाही. वेदाच्या पूर्वकाळसंबंधीही माहिती मिळाली पाहिजे. कारण वेदपूर्वकाळातही येथे सुसंस्कृतता संशोधनकार्य संपत नाही.

 

वेदाच्या पूर्वकाळासंबंधीही माहिती मिळाली पाहिजे. कारण वेदपूर्वकाळातही येथे सुसंस्कृतता वाढली असली पाहिजे. प्राचीन इतिहास जाणण्यासाठी भाषांचे तैलनिक अध्ययन करणे जरुर आहे. यासाठी केवळ संस्कृतावर अवलंबून न राहता पाली वगैरे प्राकृत भाषा व मराठीच्या सरहद्दीवरील द्रवीड भाषा यांचा उपयोग करुन घेतला पाहिजे." अशा प्रकारे अण्णासाहेबांनी समकालीन इतिहासकारांमध्ये असणा-या उणिवांवरच अप्रत्यक्षरीत्या बोट ठेवून इतिहासकाराची दृष्टी पूर्वग्रहरहित, व्यापक असावयास पाहिजे असे सांगून कालाच्या दृष्टीने इतिहासाची व्याप्ती वेदपूर्वकाळापर्यंत नेणे आवश्यक असल्याचेही सांगितले. समकालीन इतिहासकार संस्कृत भाषेवर वाजवीपेक्षा जास्त अवलंबून राहतात हे अण्णासाहेबांना योग्य वाटत नव्हते. म्हणून इतिहासकारांची अनेकभाषाभिज्ञता कशी आवश्यक आहे त्याचाही त्यांनी निर्देश केला. भाषणाच्या अखेरीस इतिहासलेखनाच्या क्षेत्रात असलेल्या एका उणिवेवरही त्यांनी बोट ठेवले. ती म्हणजे मराठ्यांनी इतिहासलेखन केले नाही. मराठ्यांनी मराठ्यांबद्दलच्या इतिहासाचे लेखन केले तर विशेष गोडी येऊ शकेल. सध्या या क्षेत्रात मराठे मागासलेले आहेत म्हणून पुढारलेल्या लोकांनी त्यांना उ्ततेजन देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आवाहन केले.


१९३३ च्या डिसेंबरात नागपूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनात इतिहासप्रदर्शनाचे उद्घाटक या नात्याने अण्णासाहेब शिंदे यांनी भाग घेतला, तर त्याच्या पुढील वर्षी बडोदा येथे भरविण्यात आलेल्या १९ व्या साहित्य संमेलनामध्ये तत्त्वज्ञान व समाजशास्त्र या विभागाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी अण्णासाहेब शिंदे यांना विनंती करण्यात आली व ती त्यांनी मान्यही केली. श्रीमंत संपतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन भरविण्यात येणार होते. बडोदे सरकारबद्दल अण्णासाहेब शिंदे यांच्या मनात अतीव आदराची भावना होती. म्हणूनही अण्णासाहेब शिंदे यांनी विभागीय अध्यक्षपद स्वीकारण्यास आनंदाने अनुमती दिली असावी. संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ ना. गो. चापेकर हे होते व स्वागताध्य जनरल नानासाहेब शिंदे होते. समाजशास्त्र हा शिंदे यांच्या आवडीचा व व्यासंगाचा विषय. नियोजित अध्यक्ष चापेकर यांच्याबद्दलचा आदरभाव, बडोद्याचा स्नेहसंबंध ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे अण्णासाहेब शिंदे यांनी स्वाभाविकपणेच ह्या संमेलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


साहित्य संमेलनास प्रारंभ २५ डिसेंबर १९३४ रोजी न्यायमंदिराच्या भव्य हॉलमध्ये सुरु झाला. दुस-या दिवशी विविध विभागांच्या अध्यक्षांची भाषणे श्रोत्यांच्या विनंतीवरुन न्यायमंदिर हॉलच्या प्रशस्त सभागृहामध्ये झाली. तत्त्वज्ञान व समाजशास्त्र हे दोन्ही विषय अण्णासाहेब शिंदे यांच्या आस्थेचे व व्यासंगाचे असल्यामुळे त्यासंबंधी मूलभूत विचार मांडण्याची ही संधी स्वाभाविकपणेच त्यांनी घेतली.


खरे तर अण्णासाहेब शिंदे कोणत्याही विषयावर भाषण करीत असोत, त्यामध्ये त्यांच्या विचाराचा स्वतंत्रपणा प्रकट झाल्यावाचून राहत नसे. त्यांच्या भाषणात श्रोत्यांना प्रत्येक वेळी पूर्वी कधीही न ऐकलेले नवे विचार हमखासपणे ऐकावयास मिळत. कोणत्याही विषयाचा विचार करताना शिंदे यांच्या दृष्टीचा ठाव हा इतरांहून वेगळा असल्यामुळे चर्चविषयाचे वेगळेच स्वरुप श्रोत्यांना पाहावयास मिळत असे. तत्त्वज्ञान व समाजशास्त्र ह्या विभागाच्या अध्यक्षपदावरुन केलेल्या त्यांच्या भाषणामध्ये अण्णासाहेब शिंदे यांच्या स्वतंत्र दृष्टीचा प्रत्यय येतो.


प्रारंभीच त्यानी सांगितले की तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र ह्या दोन्ही विषयांवर मराठीत स्वतंत्र वाङ्मय फारच थोडे, किंबहुना गणनेत घेण्याइतकेही नाही, इतके अल्प आहे. तत्त्वज्ञानपर श्रेष्ठ दर्जाचे वाड्मय आपल्या देशात निर्माण झाले, पण तो फार पूर्वीचा काळ. प्राकृत भाषेत व पुढील काळामध्ये केवळ भाष्यग्रंथच निर्माण झाले व भाष्याची ही प्रथा आद्यशंकराचार्यांनीच घालून दिली. स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याऐवजी भाष्यग्रंथ लिहिण्याचा गौण मार्गच ज्ञानेश्वर, एकनाथ ह्या आपल्या भाषेतील तत्त्ववेत्यांनी स्वीकारला. अण्णासाहेब शिंदे त्यानंतर म्हणाले की, "पुढे पुढे तर एका गीतेच्या घाण्याभोवती मराठीतील समग्र तात्त्विक विचारचक्र फिरु लागले."


आधुनिक काळातील तत्त्वज्ञानपर वाङ्मयाच्या निर्मितीचा विचार करताना पाश्चात्य देशात जे विचार निर्माण होत आहेत त्याचा प्रभाव पूर्वीच्या मानाने अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठीमध्ये स्वतंत्र तत्त्वज्ञानविचाराची निर्मिती न होता पूर्वीच्या काळी संस्कृतमधून तर आधुनिक काळात पाश्चात्त्य देशांतून आयाक केली जाते, ह्या वस्तुस्थितीचा निर्देश करुन शिंदे म्हणाले, "आमचा देश तूर्त तरी विचारसंपत्तीची नुसती उतारपेठ होऊन राहिला आहे. सध्याच्या काळात सारे जगच वैज्ञानिक क्रांतीमुळे आणि त्याहूनही अधिक तीव्र अशा राजकीय-सामाजिक-आर्थिक क्रांतीने हादरु लागले असल्याने ह्यापुढे नुसत्या तार्किक अर्थवादाचा खप कमी होईल." अशी अपेक्षाही त्यांनी प्रकट केली. मराठीमध्ये कोणत्याही प्रकारच्या तत्त्वज्ञानात्मक वाड्मयाची निर्मिती होणे आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी म्हटले आहे, "अमक्याचे तत्त्वज्ञान किंवा तमक्याच्या तत्त्वज्ञानाचा इतिहास वगैरे आकाशाला गवसणी घालण्याचा आव आणणारी पुस्तके मराठीत न झाली तरी चालेल. त्यात काही नावीन्य अगर गांभीर्य नसणार. ह्यापेक्षा जास्त स्वतंत्र आणि सुटसुटीत ग्रंथ तयार करावयाचे नसल्यास आमच्यातील काही कॉलेजातील प्रोफेसरांप्रमाणे आधुनिक विद्याविशारदांनी लघुकथा, भावगीते, फार तर विनोदी कादंब-या लिहिलेल्या ब-या. त्याही खपत नसल्या तर परीक्षेचे कागद तपासण्यात अधिक किफायत मिळेल तर पाहावी. मग उगाचच वाचकांचा वेळ घेणारी तत्त्वज्ञाने कशाला? ह्याबाबतीत जबलपूर कॉलेजचे प्रोफेसर श्री. द. गो. मंटगे, एम. एस्सी ह्यांनी नुकत्याच लिहिलेल्या अपेक्षावाद ह्या चोपड्याची मला स्वाभिमान आठवण होत आहे. ह्या चोपड्याचा आकार एखाद्या बेकार तरुण कवीच्या कवितासंग्रहाहूनही लहान आहे आणि त्यांचा विषय पहावा तर 'जगता व्यापून दशांगुळे उरला' सापेक्षातावाद सिद्ध असो वा नसोत; जाड्या विद्वानाला बारके पुस्तक लिहिणे शक्य आहे, ही अपूर्व गोष्ट ह्या प्रोफेसरांनी सिद्ध केली, म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो. अशी क्षुद्र पुस्तके आमच्या पुण्यात कोणी प्रसिद्ध करीत नाही, ते आपण काम केले म्हणून बडोदावासीयांचेही अभिनंदन करतो." आमच्याकडील प्रोफेसरांनी नवीन शोध लावले नाही तरी परकीयांच्या ख-या शोधाची साध्या भाषेत रुपांतरे करुन आम्हा अडाणी मराठ्यांना त्यांची ओळख करुन दिली तर ते मोठेच काम होईल अशी अपेक्षा त्यांनी ह्या विषयाचा समारोप करताना प्रकट केली.

सर्वसामान्य लोकांना नवे विचार सोप्या भाषेच्या द्वारा कळविणे आवश्यक आहे, ही शिंदे यांची त्यांच्या विद्यार्थिदशेपासून असलेली धारणा त्यांच्या या अध्यक्षीय भाषणातून जसी प्रकट होते, त्याचप्रमाणे पुण्याच्या पोकळ पंडिती संस्कृतीबद्दलही त्यांच्या मनात असणारी नापसंतीची भावना प्रकट झाल्यावाचून राहत नाही.

नाताळची सुट्टी : मुक्काम लंडन

नाताळची सुट्टी लंडनमध्ये घालवावी असे विठ्ठल रामजींनी ठरविले. होते. त्याप्रमाणे ८ डिसेंबरला सुट्टी लागताच दुपारी एक वाजता ऑक्सफर्डहून निघून दोन तासांत ते लंडनला पोहोचले. ग्रेज इन् रोडवर त्यांनी एक खोली भाड्याने घेतली. त्यांच्या शोजारच्या खोलीतच राजाराम भास्कर पानवलकर आणि नाशिकचे श्री. पंगे हे मुक्काम करून होते. पानवलकरांशी त्यांची लगेच मैत्री जुळली. पानवलकर तिघांसाठी उत्तम सात्त्विक शाकाहारी स्वयंपाक तयार करीत. ह्या सोबत्यांच्या जोडीने त्यांचे लंडन पाहणे चांगले झाले.

विठ्ठल रामजी हे मनात काही हेतू धरून लंडनमध्ये सुट्टी घालवावी या इराद्याने आले होते. “ज्या पाश्चात्त्य सुधारणेचे गोडवे आपण शाळांतून, कॉलेजांतून, ग्रंथांतून, गुरुमुखातून ऐकतो; इतकेच नव्हे तर जे हे सुधारणाचक्र खाऊनपिऊन घरी स्वस्थ रामराम म्हणत बसणा-या आमच्या साध्याभोळ्या राष्ट्रास आज सुमारे शंभर वर्षे चाळवीत आहे त्याची काही कळसूत्रे वरील अचाट शहरात दिसतील तर ती पाहावी असा एक हेतू निघतेवेळी मनात दडून राहिला होता. कारण ऑक्सफर्डचे विद्यापीठ हे एक थोरला आश्रम असल्यासारखे आहे. येथे विद्याव्यासंगाशिवाय दुस-या कोणत्याही भानगडीचे वारे नाही आणि आधुनिक सुधारणारूपी चीज तयार होण्याची लंडनएवढी मोठी वखार तर जगात कोठे नाही.”१

लंडन शहराचा प्रथमदर्शनी त्यांच्या मनाला जर कोणता जबरदस्त धक्का बसला असेल तर तेथील अफाट लोकसंख्येचा. छप्पन लाख वस्तीच्या या शहरात गेल्याबरोबर “मानवी महासागरात आपण जणू काय गटांगळ्या खातो आहो” असे त्यांना वाटू लागले. “कुठल्याही रहदारीच्या रस्त्यात गेल्याबरोबर स्त्री-पुरुषांच्या लाटांवर लाटा थडकत असताना पाहून जगावर मनुष्यप्राणी फार सवंग झाला आहे असे वाटते,” अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. “शेकडो मंडळ्या, हजारो संस्था, अनेक भानगडी व असंख्य चळवळी सार्वजनिक हिताकरिता चाललेल्या आहेत हे गाईड बुकावरून कळते. पण त्या कोणत्या कोप-यात आहेत व त्यांचे ह्या जनसमूहावर काय कार्य घडते ह्याचा काही बोध होत नाही.”२ विठ्ठल रामजी शिंदे यांना आपल्या उद्दिष्टांबद्दल कळकळ होती. भारतात परत गेल्यानंतर आपल्याला धर्मकार्याच्या जोडीनेच दीनदलितांची सुधारणा करण्याचे काम करावयाचे आहे ही त्यांच्या मनाची पक्की धारणा होती. त्यामुळे त्यांच्या उद्दिष्टाला अनुसरून धर्मकार्य व सामाजिक कार्य करणा-या संस्थांची त्यांनी आवर्जून पाहणी केली. अशा प्रकारचे काम करणा-या व्यक्तींच्या भेटी घेतल्या. ज्ञानात भर पडावी अशा प्रकारची वस्तुसंग्राहालये, प्राणिसंग्रहालये बघितली. त्याचप्रमाणे लंडन शहरातील सांस्कृतिक जीवनाची अंगे सौंदर्यबुद्धीने निरखिली. १३ डिसेंबरला दोन प्रहरी ते मिस् मॅनिंगच्या घरी गेले. मिस् एलिझाबेथ ऍडलेड मॅनिंग ह्या नॅशनल इंडियन असोसिएशनच्या ऑनररी सेक्रेटरी होत्या.३ शिंदे यांच्या भेटीने त्यांना फार आनंद झाला. मिस् मेरी कार्पेंटरप्रमाणेच मिस् मॅनिंग ह्या सामाजिक सुधारणा व शिक्षण ह्याबद्दल झटत असत. रेव्ह. चार्लस् व्हायसे (१८२८-१९१२) ह्या कडक एकेश्वरी सुधारकाच्या त्या अनुयायी होत्या. युनिटेरियन सेक्रेटरी बोवी यांची त्यांनी १७ तारखेला भेट घेतली. त्यांच्याबरोबर ‘युनिटेरियानिझम’ ह्या विषयावर ते बोलले. त्यांच्या विनंतीवरून शिंदे यांनी ‘युनिटेरियन वर्ल्ड’ या मासिक पुस्तकासाठी प्रार्थनासमाजाबद्दल छोटास लेख लिहून दिला.

शहराच्या मध्यभागी गिल्डफर्ड रस्त्यावर असलेले ‘बालहत्यानिवारकगृह’ त्यांनी काळजीपूर्वक पाहिले व गृहाबद्दल तपशीलवार माहिती मिळविली. टॉमस कोरम नावाच्या एका परोपकारी व्यापा-याने १७३९ मध्ये ही संस्था स्थापन केली. पार्लमेंटने व प्रस्तुत संस्थेने व्यापक औदार्याची जी भूमिका घेतली होती तिचा परिणाम पापाचरणाला उत्तेजन मिळण्यात झाला व गृहात दाखल केलेल्या अनाथ मुलांची संख्या पंधरा हजारापर्यंत वाढली हे लक्षात येता संस्थेने काटेकोर निमय केले. गृहात ठेवावयाचे मूल एक वर्षापेक्षा मोठे असू नये. मूल हवाली करण्यास स्वतः आईनेच आणले पाहिजे व झालेला सर्व प्रकार तिला निवेदन करावा लागतो. फसवल्या गेलेल्या पण चांगल्या वर्तणुकीच्या बाईलाही गृहात आधार दिला जातो व त्या बाईलाही सन्मार्गास लावून ती समाजात मिसळली जाईल अशी व्यवस्था केली जाते. ही सर्व नाजूक कामे पोक्त व थोर अशा माणसांची कमिटी कसून चौकशी करून न्यायबुद्धीने करते. हल्ली गृहात मुले, मुली मिळून ३२३ असून निरनिराळ्या खेड्यांत २२९ तान्ही मुले दायांजवळ ठेवली आहेत इत्यादी माहिती विठ्ठल रामजी शिंदे यांना मिळाली. प्रार्थनासमाज पंढरपुरास या प्रकारचे गृह चालवीत असल्याचे स्वाभाविकपणेच त्यांच्या मनात आले असणार.४

२७ तारखेस ‘पोस्टल मिशन’ च्या अध्यक्ष मिस् टॅगर्ट यांच्या घरी विठ्ठल रामजी हे राजाराम पानवलकरांबरोबर जेवायला गेले. तेथे ‘पोस्टल मिशन’च्या चिटणीस मिस् फ्लॉरेन्स हिल्ल ह्या आल्या होत्या. मार्गारेट टॅगर्ट ह्या पासष्टीच्या आणि फ्लॉरेन्स हिल् ह्या अठ्ठावन्न वर्षांच्या होत्या. पोस्टल मिशनची चळवळ अमेरिकेत सुरू करणारे रेव्ह. रॉबर्ट स्पीअर्स ह्यांनी ह्या दोघी मैत्रिणींना हे काम इंग्लंडमध्येही करावे असे आग्रहपूर्वक सुचविले. त्यावरून १८८६ मध्ये ह्या दोघींनी इंग्लंडमध्ये पोस्टल मिशनचे काम अत्यंत प्रभावीपणे सुरू केले. त्यामुळे या दोघींचे नाव पोस्टल मिशनच्या कामाशी कायमचे जोडले गेले.५ ह्या दोघींकडून शिंदे यांनी पोस्टल मिशनची माहिती करून घेतली. २ जानेवारीस मिस् हिल्लच्या निमंत्रणावरून पोस्टल मिशन कौन्सिलच्या सभेला ते गेले. सभेमध्ये त्यांनी मुंबईच्या बाजूला ‘ब्रह्मो पोस्टल मिशन’ची एक शाखा काढण्याचा आपला विचार त्यांनी ठेवला. कमिटीला तो फारच पसंत पडून त्यांना लागतील त्याप्रमाणे पुस्तके पुरविण्याचे आश्वासन दिले. लंडन येथील पोस्टल मिशनचे काम दहा-बारा स्त्रियांची कमिटी पाहत असे. युनिटेरियन वाङ्मय पोस्टामार्फत पाठवून व पत्रव्यवहार करून प्रसार करण्याचे काम सर्व देशभर स्त्रियाच करतात. पुढे ब्राह्मधर्म प्रसाराचे काम या धर्तीवरच आपल्याकडील स्त्रियांनी हाती घ्यावे अशा प्रकारचे जाहीर आवाहन विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुबोधपत्रिकेतून “सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र”६ लिहून केले. मुंबईस ब्रह्मो पोस्टल मिशनची स्थापना करून श्री. वासुदेवराव सुखटणकर ह्या आपल्या मित्राकरवी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ह्या कामाला आरंभ आधीच केला होता.

ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे इत्यादी पाहावीत, नवीन माहिती मिळवावी अशी शिंदे यांच्या ठिकाणी तीव्र जिज्ञासा त्यांच्या विद्यार्थिदशेपासूनच दिसून येते. एका नवीन देशात व वेगळ्या सांस्कृतिक वातावरणात आल्यानंतर पाहण्यासारखे त्यांना कितीतरी होते. १६ डिसेंबरला त्यांनी रीजंट पार्क येथील विशाल प्राणिसंग्रहालय पाहिले. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातारणात राहतील अशी व्यवस्था या उद्यानातील प्राणिसंग्रहालयामध्ये केलेली पाहून ते विस्मित झाले. ब्रिटिश म्युझियममधील ‘नॅचरल हिस्टरी’ हा विभाग २१ आणि २४ डिसेंबर असे दोन दिवस तेथे जाऊन काळजीपूर्वक बघितला. “डार्विनच्या विकासवादावर हजारो व्याख्याने ऐकण्यापेक्षा ही म्युझियम एकदा नीटपणे पाहून ही अधिक माहिती होते” असे त्यांना वाटले.७

भिन्न भिन्न मताच्या समाजामधील उपासनासाठी ते जात होते व त्यांच्या कार्यपद्धतीच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण करीत होते. पोर्टलंड स्ट्रीटमधील युनिटेरियन देवळात स्टॉफर्ड ब्रुकची उपासना त्यांनी ऐकली. साऊथ प्लेसमधील नैतिक समाजात उपासना ऐकण्यासाठी २९ तारखेच्या रविवारी ते तेथे गेले. ऑगस्ट कोम्त या फ्रेंच तत्त्वज्ञाची पॉझिटिव्हिझम् (प्रत्यक्षार्थवाद) ही विचारप्रणाली ह्या समाजाला मान्य आहे. या संप्रदायात ईश्वर, आत्मा वगैरे अज्ञेय गोष्टींना फाटा दिलेला असतो. केवळ नीतीपलीकडे धर्म म्हणून कोणतीही बंधने पाळण्याची त्यांना आवश्यकता वाटत नसे. उपासनापद्धती ख्रिश्चन देवळातल्याप्रमाणेच होती. मात्र परमेश्वर वगैरेचा तेथे उल्लेख होत नाही. लोकांना जबरीने लढाईवर पाठविणे हे निंद्य आहे असे मत उपासकाने दिले. अर्थशास्त्रज्ञ अँडम्स् स्मिथ, नीतिशास्त्रज्ञ सिज्विक वगैरेंचे उतारे वाचले. टेनिसनची काही पदे गाइली. १ जानेवारीला एसेक्स हॉलमध्ये म्हणजे युनिटेरियन समाजाच्या कार्यालयाच्या जागी संध्याकाळी शिंदे थिऑसॉफिकल सोसायटीचा वर्ग पाहण्यास गेले. ‘पुनर्जन्म’ या विषयावर व्याख्यात्याने प्रतिपादन केले. प्रश्नोत्तरे व चर्चा शांतपणे झाली. व्याख्यात्यांशी विठ्ठल रामजी शिंदे ऍनी बेझंट यांच्याबद्दल बोलले. व्याख्यात्यांनी सांगितले की, बेझंटबाईंनी हिंदुस्थानात जे काम चालविले आहे त्याचा जगात इतरत्र चाललेल्या थिऑसॉफिकल चळवळीशी कोणताही संबंध नाही. हिंदुस्थानातील काम त्या स्वतःला हिंदू म्हणवून करीत आहेत. ५ जानेवारीच्या रविवारी ते संडे स्कूल असोसिएशनचे चेअरमन इयन प्रिचर्ड यांच्या घरी जेवणास गेले. नंतर उपासनामंदिरात मिस् प्रिचर्डने मुलांसाठी एक उपासना चालविली. विठ्ठल रामजी शिंदे यांनीही विनंतीवरून छोटेसे भाषण केले. सुमारे दोनशे मुले उपस्थित होती. २० वर्षांवरच्या सात तरुणांचा रविवारचा वर्ग प्रिचर्ड स्वतः आपल्या घरी घेत असत.

विठ्ठल रामजी यांना स्वीकृत कामाबद्दल आणि आपल्या ध्येयविषयाबद्दल जशी तळमळ होती त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या कलानिर्मित सौंदर्याचा आस्वाद घ्यावा याबद्दलची उत्कट ओढ होती. लंडनमध्ये आल्याच्या दुस-या दिवशी त्यांनी ट्रफालगर स्क्वेअरमधील ‘नॅशनल पिक्चर गॅलरी’ हे चित्रसंग्रहालय पाहिले. राफील, रुबेन इत्यादी प्रसिद्ध चित्रकारांची सुंदर चित्रे तेथे होती. एकेक चित्र त्यांना इतके सुंदर वाटे की ते सोडून त्यांना पुढे जाववत नसे. ही चित्रे पाहताना रसिकांची अवस्था कशी होते ते सांगताना त्यांनी नमूद केले आहे की, “दालनाच्या मधोमध खुर्च्यांची रांग आहे. त्यावर बसून कित्येक रसिक प्रेक्षक भिंतीवरील तसबिरीकडे पुष्कळ वेळ टक लावून स्वतःही चित्राप्रमाणेच तटस्थ दिसतात.”८

२० तारखेच्या रात्री त्यांनी ‘शार्लाक होम्स’ या नाटकाचा प्रयोग पाहिला. त्यामधील वास्तव स्वरूपाच्या अभिनयाचे त्यांना कौतुक वाटले. “ह्या लोकांचे लक्ष अभिनयाकडे फार आहे. ते त्यांनी फार चांगले साधले आहे. रंगभूमी व नेहमीची रहाटी ह्यात मुळीच फरक दिसला ही हीच खुबी आहे.” मात्र नाटकाबद्दल एकंदर अभिप्राय देताना त्यांनी हे नाटक उत्तम गणले जात असले तरी आपल्याला म्हणण्यासारखा आनंद झाला नाही, असे नमूद केले९ नाटकाबद्दल त्यांचा असा अभिप्राय पडावा याचे कारण असे असणार की, एक प्रकारची आध्यात्मिकता असेल तरच ती कला त्यांना खरीखुरी सुंदर वाटत असे.

लंडनच्या मुक्कामात शिंदे यांच्या मनावर परिणाम करणा-या दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. २२ तारखेच्या रविवारी पोर्टलंड स्ट्रीटवरील युनिटेरियन देवळात ते गेले होते. रेव्ह. हेनरी वड्स पेरिस यांचे 'शांती' या विषयावर व्याख्यान झाले. युनिटेरियन देवळातील व्यासपीठातून चालू विषयाचा ऊहापोह होतो ही बाब त्यांना विशेष वाटली. आफ्रिकेत चालू असलेल्या लढाईविषयी रेव्हरंड पेरिस यांनी जोरदारपणे प्रतिकूल मत मांडले. स्वतःची भूमिका मांडताना ते म्हणाले, “धर्म जर व्यवहारात येत नसेल, अगर कोणताही नीतीचा व न्यायाचा व्यवहार धर्मात गणला जात नसेल तर मी आजच प्रचारकपदाचा राजीनामा देईन.”१० त्यांची स्वतःची भूमिका अशीच होती, हे त्यांच्या फर्ग्युसनच्या रोजनिशीतील नोंदीवरून जाणवते. पेरिस यांचे हे मत विठ्ठल रामजी यांना चांगलेच भावले असणार. उन्नत पातळीवरून केलेले लौकिकातील कार्य व धर्म, नीती आणि धर्म यांना एकरूप मानण्याची शिंदे यांची भूमिका त्यांच्या पुढील आयुष्यातील कृतीतून आणि विचारातून दिसून येते. ही भूमिका दृढ होण्यामध्ये रेव्ह. पेरिस यांच्या ह्या उद्गाराचा मोठा प्रभाव पडला असावा, असे मानण्यास जागा आहे.

३० डिसेंबरला विठ्ठल रामजी शिंदे यांनी डोमेस्टिक मिशनपैकी रेव्ह. समर्स यांचे जॉर्जेस रोमधील मिशन पाहिले. ह्या भागातील गरीब लोकांची स्थिती चार-पाच घरात प्रत्यक्ष नेऊन रेव्ह. समर्सने दाखविली. पैकी तीन ठिकाणी अगदी म्हाता-या बाया फार आजारी होत्या. दोघा आजारी बायांजवळ जाऊन विठ्ठल रामजींनी प्रार्थना केली. ह्या दिवशी चहाची पार्टी होती. या प्रसंगी विठ्ठल रामजींनी छोटेसे भाषण दिले. सर्व कामकरी बाया दिवसभर कामावर गेल्या असता त्यांची मुले सांभाळण्याची व्यवस्था एका घरामध्ये केली होती. अशी २३ मुले त्या घरात देखरेखीसाठी ठेवलेली होती. ह्या कामासाठी माफक मोबदला आकारला जात असे. युनिटेरियन असोसिएशनमार्फत मिशनचा खर्च भागविला जात असे.

शिंदे यांनी या डोमेस्टिक मिशनचे काम पाहिले आणि इतिहास माहीत करून घेतला. डॉ जोसेफ टकरमान (१७७८ ते १८४०) ह्यांनी बोस्टन परिसरातील चेल्सी ह्या चर्चची जबाबदारी २५ वर्षे सांभाळली. त्यांची प्रकृती खालावली व आवाज बसला. त्यामुळे त्यांना निवृत्त व्हावे लागले. मिशनरी वृत्तीने काम करण्याची त्यांच्या ठिकाणी ओढ शाबूत असल्याने त्यांनी आपल्या कार्यासाठी नवे क्षेत्र शोधले. गरीब वस्तीतील दुबळ्यांचे दुःख व्यक्तीव्यक्तींशी संपर्क साधून दूर करण्याचा प्रयत्न करावा ह्या हेतूने त्यांनी १८३५ मध्ये ‘लंडन डोमेस्टिक मिशन सोसायटी’ ही संस्था स्थापन केली. रेव्ह. फ्रेडरिक समर्स हे जॉर्जेस रो ह्या मिशनमध्ये १८७९ मध्ये दाखल झाले. तरुणपणी ते बर्मिंगहॅम येथे उद्योग करीत होते. भरपूर संपत्ती मिळवून देणारा धंदा त्यांनी सोडून दिला व मिशनरी होऊन गरिबांची सेवा करण्यासाठी आपले आयुष्य वाहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १८७७ मध्ये त्यांची लिव्हरपूल येथे मिशनरी म्हणून नेमणूक झाली. लंडन मिशन कमिटीने त्यांना लंडनमध्ये बोलावून घेतले व १८७९ पासून ते जॉर्जेस रो मिशनमध्ये मिशनरी म्हणून काम करीत होते. गरिबांची सेवा करण्याची तळमळ, प्रचंड उद्योगशीलता आणि कामातील तत्परता हे विशेष गुण त्यांच्या ठिकाणी होते. जोडीला आपल्या सहका-यांचे साहाय्य घेऊन मिशनची विविध कार्ये करण्याचे संघटनाकौशल्य त्यांच्या ठिकाणी होते. रविवारची उपासना, रविवारची शाळा, बायबलवाचनाच्या बैठकी, ग्रंथालय अशी विविध प्रकारची कामे मिशनच्या वतीने चालू होती. ह्या सोसायटीच्या वतीने स्पायटल फील्ड मिशन, क्रिपल गेट मिशन, किन्सिंगटाऊन मिशन, नॉर्थ स्ट्रीट मिशन अशा ह्या डोमेस्टिक मिशनच्या शाखा होत्या.

मिशन चालविण्याचे उद्दिष्ट हे गरीब, दुःखार्त, अज्ञ आणि पतित अशांची ऐहिक आणि आध्यात्मिक सुधारणा करावी हे होते. अशा दीनदुःखार्तांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन साहाय्य करावे व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा ही मिशनची काम करण्याची पद्धती होती. हे काम करण्यासाठी आपला पूर्ण वेळ आणि शक्ती उपयोगात आणू शकतील अशा प्रकारचे पगारी मिशनरी संस्थेने नेमण्याची पद्धती अवलंबिली होती.११ रेव्ह. समर्स यांनी गरिबांचे दुःख दूर करण्याचे हे काम मिशनच्या वतीने अत्यंत सेवाभावी आणि समर्पणशील वृत्तीने चालविले होते. रेव्ह. समर्स यांची सेवाभावी वृत्ती आणि त्यांची काम करण्याची पद्धती ही शिंदे यांना फारच प्रभावी वाटली. कळसकरांची भेट झाल्यापासून म्हणजे १८९८ पासून विद्यार्थिदशेतच विठ्ठल रामजी शिंदे यांना आपण आपल्या देशातील हतभागी अस्पृश्यवर्गाची सर्वतोपरी सुधारणा करण्यासाठी काम करावे अशी प्रेरणा झाली होती. काही एक कार्य करण्यासाठी एखादी मंडळी स्थापन करावी या प्रकारचा विचारविनिमय त्यांनी सासने, हुल्याळ ह्या मित्रांसमवेत केला होता. रेव्ह. फ्रेडरिक समर्स यांचे जॉर्जेस रो मिशनमधील हे काम व कामाची पद्धती बघितल्यानंतर आपण हिंदुस्थानात परत गेल्यानंतर अस्पृश्य मानलेल्या लोकांसाठी ह्या मिशनच्या धर्तीवर संस्था स्थापन करून काम करावे असा विचार त्यांच्या मनात आला. म्हणून रेव्ह. समर्सच्या मिशनला विठ्ठल रामजी शिंदे यांनी दिलेली भेट ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना ठरली.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ठिकाणी धर्मप्रेरणा उत्कट होती. समाजसुधारणेची खरीखुरी कळकळ होती त्याचप्रमाणे त्यांच्या ठिकाणी देशप्रेमाची भावनाही उत्कट स्वरूपाची होती. त्यामुळे लंडनात त्यांचे नव्याने झालेले मित्र राजाम भास्कर पानवलकर यांच्यासमवेत लंडन इंडियन सोसायटीच्या १४ डिसेंबर १९०१च्या सभेस ते गेले. ह्या लंडन इंडियन सोसायटीची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी १८६५ मध्ये केली. सोसायटीचे अध्यक्ष दादाभईच होते पानवलकरांचे ‘इंग्रजी साम्राज्याखाली हिंदुस्थानातील स्वराज्याची आवश्यकता’ ह्या विषयावर एक तास व्याख्यान झाले. त्यानंतर इतर चौघे जण बोलले. त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनीही भाषण केले. शिंद्यांनी या सभाप्रसंगाचे वर्णन केले आहे. “बोलणारे सगळेही अजाण व अननुभवी होते. तरी दादाभाई सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकत होते व त्यांचे आपल्या नातवाप्रमाणे कौतुक करीत होते. व्याख्यान आटपल्यावर मुलांनी त्यांस अनेक प्रश्न मोठ्या सलगीने विचारले. त्यांची फोड त्यांनी मोठ्या आवेशाने केली. म्हातारा देहाने वृद्ध आहे खरा पण त्याचा उत्साह तरण्यापेक्षा तरुण आहे. सभेचे सेक्रेटरी वाघळे ह्यास बोलता बोलता ते सत्तेने म्हणाले, ‘अरे, तू किती मूर्ख आहेस रे? आता मी तुला शिव्या हासडीन पाहा.’१२

लंडन इंडियन सोसायटीचे काम दादाभाई नौरोजी एरव्ही खेळीमेळीने चालवीत असले तरी तत्त्वाच्या बाबतीत तडजोड करायची नाही याबद्दल ते ठाम असत. व्यापक देशहिताचा विचार ते नेहमी दूरदृष्टीने करीत असत. १८९९च्या जूनमध्ये लंडन इंडियन सोसायटीची सभा भरली व पुण्याच्या काळ पत्राने लिहिलेल्या लेखातून राजद्रोह प्रकट होतो काय ह्याबद्दल आणि रँड आणि आमर्स्ट ह्यांच्य खुनाबद्दल चर्चा होऊन खुनाच्या घटनेचा निषेध करून नये ह्याबद्दल ह्या पक्षास एक मत जास्त मिळाले. त्यावर पुन्हा मोठी सभा बोलावून तीमध्ये विचार करण्याचा निर्णय दादाभाईंनी घेतला व त्या सभेतही मत आपल्या विरुद्ध म्हणजे खुनाच्या बाजूने गेले तर आपण राजीनामा देऊ असे त्यांनी निक्षून सांगितले. ते म्हणाले, “मी आपला जन्म जरी देशहितासाठी घालविला आहे (व त्यामुळे पुष्कळ इंग्रज लोक मला दूषण देत आहेत तितके इतर कोणास नाहीत.) तरी खुनासारखे दुष्ट राक्षसी कृत्य करणा-यांचा पक्ष मी कधीही घेणार नाही.” सुबोधपत्रिकेने हा वृत्तान्त देऊन म्हटले, “एकूण पुण्यातील खोट्या देशाभिमानाचे वारे लंडनपर्यंत एतद्देशीयांत पसरले आहे! दादाभाई शेटजींनी केलेला निश्चय त्यांच्या ख-या देशभक्तीस अनुरूप आहे.१३

लंडन इंडियन सोसायटीच्या सभा जशा कळकळीने पार पडावयास पाहिजेत तशा पडत नसत असे दिसते. ४ जानेवारी १९०२च्या शनिवारच्या होणा-या दर पंधरवड्याच्या बैठकीसाठी विठ्ठल रामजी शिंदे गेले होते. अध्यक्ष दादाभाई नौरोजी व दुसरी पाच-सात मंडळी केवळ हजर होती. पण शेवटपर्यंत व्याख्याते आणि दोन्ही चिटणीस आले नाहीत. म्हणून सभा लांबणीवर टाकावी लागली. स्वतः कमालीचे वक्तशीर असणा-या शिंदे यांना हा प्रकार अगदी रुचला नाही. उपरोधाने त्यांनी लिहिले आहे, “इंडियन लंडनात गेला म्हणून काय झाले. इंडियनच तो! ह्या सभेस कोणी युरोपियन येत नाहीत हे एक भाग्यच. नाहीतर ही हिंदी व्यवस्था त्यास कळली असती.”१४

अर्ध्याअधिक जगाला चाळवणा-या इंग्रजांच्या सुधारणाचक्रांची काही कळसूत्रे लंडन शहरात आपल्याला पाहावयास मिळतील अशी उमेद बाळगून विठ्ठल रामजी शिंदे येथे आले होते आणि त्यांनी उमेद बाळगल्याप्रमाणे त्यांना काही कळसूत्रे निश्चितच पाहावयास मिळाली. लंडन शहराचे भौतिक रूपही त्यांना फार वेधक वाटले. केवळ बाह्यरूपाचेच नव्हे, तर ह्या व्यापारी राष्ट्राचे अंतरंगही त्यांनी नीट ओळखले. आपल्याकडच्या आणि त्यांच्या दुकानात असणारा फरक तसेच दुकानदाराच्या वृत्तीत असणारा फरक ते मार्मिकपणे सांगतात. “माल तर मोहक खराच, पण तो दुकानात मांडून आपण दाराशई येऊन बसतात. एखाद्यास वाटावे की हे जणू रखवालीच करीत आहेत. इखडे काही निराळाच प्रकार. दुकान म्हणजे एक जंगी पारदर्शक पेटी अथवा पदार्थसंग्रहालय अथवा एक लहानसे प्रदर्शनच. रस्त्यातून धावतानादेखील दुकानातील सर्व जिन्नस किमतीसहित दिसतील.”१५ “मात्र यांचा व्यापार नुसत्या भपक्याने वाढला असे नव्हे. अनियंत्रित व्यापार आणि कायदेशीर स्पर्धा ह्या तत्त्वाचा या लाकांवर असा फायदेशीर परिणाक झाला आहे की, गि-हाईकांशई बेशिस्तपणा, आडदांडपणा, बेविश्वास अगर किमतीत अफरातफर केल्यास व्यापारी आपले भांडवल लवकरच गमावून घेईल. एकंदरीत सौंदर्य, बुद्धी आणि नीती या तीनही मुख्य तत्त्वांची समान सांगड घालून दीर्घोद्योग, अचाट साहस व निश्चल श्रद्धा ह्यांच्या पायावर ह्या लोकांनी आपल्या व्यापारशास्त्राची इमारत उभारली आहे. म्हणून लंडन शहरातून हल्लीचे वैभव आले आहे.”१६

इंग्रजांच्या स्वभावातील आत्मिक अंग हे विठ्ठल रामजींनी ध्यानात घेण्याचा प्रयत्न केला. हे लोक स्वार्थी, सुखार्थी, जडवादी आहेत असा समज इथले ऐश्वर्ययुक्त जीवन बघितल्यावर वाटण्याची शक्यता आहे. शिंदे यांना वाटले, “पाश्चात्त्य सुधारणेचे सर्व रहस्य केवळ चैनीतच नाही. जगात राहून सुख भोगण्याची अत्यंत लालसा ह्या लोकांस आहे हे खरे, पण पृथ्वीवर राहून आकाशातील स्वर्गाकडे उडी न घेता इथेच स्वर्ग उतरविणयाची ह्यांची दिशा आहे. हे लोक स्वार्थी आहेत हे तर खरेच. पण स्वार्थ साधल्याबरोबर परमार्थास ते कसे लागतात हे आम्हांस समजून घेणे आहे.”१७ शिंदे यांनी हे नुसतेच समजून घेतले होते असे नव्हे तर काही नमुनेदार उदाहरणांवरून स्वतःच्या भावी कार्याची प्रेरणाही घेतली होती.

विठ्ठल रामजी शिंदे यांचा लंडनमधील हा सुट्टीचा मुक्काम खूप धावपळीचा तसाच खूप उपयुक्त आणि आनंददाक झाला. ५ जानेवारी १९०१ रोजी लंडनहून सातच्या गाडीने ते ऑक्सफर्डला जायला निघाले. साडेनऊ वाजता तेथील आपल्या बि-हाडी पोहोचले. त्यांना फार दिवसांनी घरी आल्याप्रमाणे वाटले.१८

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘लंडन शहर,’ लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १५
२.    तत्रैव, पृ. १५-१६.
३.    दि इन्क्वायरर, लंडन, १९ ऑगस्ट १९०५, पृ. ५३१.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘लंडन येथील बालहत्याप्रतिबंधक गृह’, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. २१-२५.
५.    दि इन्क्वायरर, ३० मे १९२५, ६ जून १९२५, १२ ऑक्टोबर १९३५.
६.    सुबोधपत्रिका, ९-८-१९०३.
७.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८४-८६.
८.    तत्रैव, पृ. ७८.
९.    तत्रैव, पृ. ८३-८४.
१०.    तत्रैव, पृ. ८४.
११.    व्ही. डी. डेव्हिस, द लंडन डोमेस्टिक मिशन सोसायटीः रेकॉर्ड ऑफ हंड्रेड इयर्स – १८३५-१९३५, द लिंडसे प्रेस, एसेक्स हॉल, लंडन, १९३५, पृ ९-१०, ५३.
१२.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८०.
१३.    सुबोधपत्रिका, १८ जून १८९९.
१४.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८९.
१५.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘लंडन शहर, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १६.
१६.    तत्रैव, पृ. १७.
१७.    तत्रैव, पृ. १७.
१८.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८९-९०.

तुकोजीराव महाराजांची देणगी व मांगांचे शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न

१९१२ साल हे मिशनला आर्थिकदृष्ट्या चांगले गेले. एन्. एम्. वाडिया ट्रस्टने ६ हजार रुपयांची वार्षिक देणगी एकूण ३ वर्षांसाठी द्यावयाला सुरुवात केली. तरीही मिशनच्या वाढत्या व्यापामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करणे आवश्यक होते. मिशनला एक सदन मुंबईला बांधण्यासाठी ४० हजार रुपयांची, पुण्यातील सदनासाठी २० हजार रुपयांची व ५ नवीन वाहिलेल्या सेवकांसाठी ५ वर्षांची तरतूद म्हणून २५ हजार रुपये असे एकूण ८५ हजार रुपये उभे करण्याची गरज होती. २९ ऑगस्ट १९१२ रोजी भरलेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये ह्या बाबींचा विचार करून मिशनला आर्थिक साहाय्य करावे म्हणून वजनदार मंडळींच्या सह्यांचे पत्र काढण्यात आले. ह्या पत्रकावर डॉ. भांडारकर, सर चंदावरकर, सर चिनुभाई माधवलाल, मि. रतन जे. टाटा इत्यादी मंडळींच्या सह्यांचे आवाहन काढण्यात आले होते. ह्या आवाहनात म्हटले होते की, “६ वर्षांच्या छोट्या कालखंडात भारतीय नि. सा. मंडळाने अस्पृश्यतेचा प्रश्न जिथे बिकट बनून राहिलेला आहे अशा हिंदुस्थानच्या पश्चिम, मध्य व दक्षिण भागांमध्ये ह्या लोकप्रिय कार्याचा विस्तार केलेला आहे. मंडळीला सामान्यतः वर्षाला २५ हजार रुपये खर्चावे लागतात व एवढी रक्कम केवळ मध्यमवर्गाकडून वर्गणीच्या रूपाने मिळणे कठीण होते. पैशाचा तुटवडा जाणवून त्याचा स्वाभाविक परिणाम होतो तो असा की, मंडळीच्या कार्यवाहकांनी आर्थिक साहाय्य गोळा करण्यासाठी आपली बरीचशी शक्ती व वेळ खर्च करावा लागतो म्हणून समाजातील धनिकवर्गाला आमचे कळकळीचे आवाहन आहे की, त्यांनी मिशनला भरीव व आर्थिक साहाय्य करावे म्हणजे मिशनच्या कार्याकर्त्यांना अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेच्या कामासाठी भरपूर वेळ देता येईल.”१


मिशनची परिषद भरविताना पुणे येथील इमारत बांधण्यासाठी काहीएक आर्थिक साहाय्य ह्या परिषदेत मिळवावे असा एक अधिकच हेतू होता. परिषदेत आवश्यक तो फंड उभा न राहता सुमारे २६० रुपयांची तूट आली. मात्र शिंदे ह्यांनी नमूद केले की, “पण चिटणीस रा. पटवर्धन ह्यांचे सात्त्विक परिश्रमाला दुसरीकडूनच यश येणार होते.”२ परिषद आटोपल्यानंतर परिषदेच्या सर्व कामकाजाची इत्थंभूत माहिती देणारा परिषदेचा अहवाल छापण्यात आला. वर नमूद केलेले नि. सा. मंडळीचे आवाहन व मंडळीच्या परिषदेचा हा अहवाल इंदूरचे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर ह्यांच्याकडेही पाठविण्यात आला होता. परिषदेचा हा सुंदर अहवाल वाचून व नि. सा. मंडळीने चालविलेल्या ह्या कार्याची माहिती मिळून श्रीमंत तुकोजराव अत्यंत प्रभावित झाले. त्यांच्या मुंबईतील मुक्कामात मिशनचे जनरल सेक्रेटरी ह्या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना त्यांनी १९१२च्या डिसेंबरात ताजमहाल हॉटेलमध्ये बोलावून घेतले व मिशनच्या पुणे येथील इमारतीसाठी २० हजार रुपयांचा चेक त्यांच्या स्वाधीन केला. पुण्यातील ह्या सदनाला आपल्या पूर्वज अहल्याबाई होळकर ह्यांचे नाव द्यावे, ही अपेक्षा श्रीमंत तुकोजीरावांनी प्रकट केली. ह्या देणगीनिमित्त आनंद प्रकट करण्यासाठी मंडळीच्या मुंबई व पुणे येथील शाळांना सुटी देण्यात आली होती.


ह्या रकमेवरच पुढे मुंबई सरकारच्या मिळालेल्या ८७ हजार रकमेची भर पडली व पुणे येथील भोकरवाडीमध्ये अहल्याश्रम ही मिशनची सुंदर इमारात उभी राहिली.


पुण्यात भरलेल्या महाराष्ट्र परिषदेतून दुसरे एक कार्य निष्पन्न झाले. परिषदेसाठी साता-याहून मांग लोकांचे पुढारी श्रीपतराव नांदणे हे आले होते व परिषदेत त्यांनी निबंध वाचला हे आपण पाहिले आहेच. शिंदे ह्यांचा त्यांच्याशी परिषदेच्या निमित्ताने चांगला परिचय झाला. सातारा जिल्ह्यातील मांग लोकांना इंग्रज सरकारने रोजची हजेरी त्यांच्या पाठीमागे लावली होती. मांग लोकांवर होणारा हा अन्याय दूर व्हावा अशी त्यांनी परिषदेत जोराची मागणी केली होती. शिवाय इतर अस्पृश्य जातीला ज्याप्रमाणे शेतजमिनी आहेत तशा मांगाना नाहीत तेव्हा पडीक जमिनीपैकी काही जमिनी मांगांना मिळाव्यात अशी त्यांनी मागणी पुढे मांडली होती. मांग मंडळींवर होणारा हा अन्याय दूर होणे अत्यंत निकडीचे आहे असे अण्णासाहेब शिंदे ह्यांना तीव्रनेतने वाटू लागले. त्याचप्रमाणे ह्या मांग लोकांसाठी एक शेतकी खेडे वसवावे असा अभूतपूर्व प्रयोग करण्याची कल्पना शिंदे ह्यांना स्फुरली. डॉ. हॅरॉल्ड एच्. मॅन ह्यांच्या पुढाकाराने त्यांनी गव्हर्नरांकडे शिष्टमंडळ न्यावयाचे ठरविले व त्या शिष्टमंडळात श्री. श्रीपतराव नांदणे ह्यांना मुद्दाम बरोबर घेतले. गव्हर्नरसाहेबांपुढे श्री. नांदणे ह्यांनी पुढील तक्रारी मांडल्या व मागण्या केल्या.
१.    मांग गरीब असून त्यांना स्वतःचा अशा विशेष धंता नाही.
२.    सगळ्या मांगांनाच गुन्हेगार मानले जाते हा त्यांच्यावर अन्याय आहे.
३.    सातारा जिल्ह्यात बरीच पडीक जमी आहे ती सवलतीच्या दराने मांगांना देण्यात यावी.
४.    शेतकीचा धंदा मांगांना फार योग्य आहे.
५.    सातारा जिल्ह्यात कोठेतरी प्रशस्त जागा घेऊन मांगांसाठी एक शेतकी खेडे (वसाहत) डी. सी. मिशनकडून ह्या विषयीची चौकशी करण्यासाठी पुण्यात खास कमिटी नेमली. तिने २६ जून १९१४ रोजी पुढील ठराव केला.
१.    निदान १०० कुटुंबांची सोय होईल, अशी एक वसाहत प्रयोगादाखल सातारा जिल्ह्यात व्हावी.
२.    रा. शिंदे यांनी तिच्यासाठी योग्य असा एक मनुष्य शोधून काढावा.
३.    सरकारकडून पुणे व सातारा जिल्ह्यातील जंगलखात्यातून नांगरटीसाठी निवडून काढलेल्या जागांची यादी मागवावी व त्यांपैकी ४०० एकर एकत्र असलेली जागा रा. शिंदे ह्यांनी निवडून काढावी.


ह्या ठरावानंतर शिंदे ह्यांनी ह्या कामाचा पाठपुराव आरंभला. मध्यभागाचे कमिशनर मि. मेकॉनकी ह्यांची त्यांनी डॉ. मॅन ह्यांच्यासमवेत भेट घेतली. शिंदे ह्यांनी जमाबंदी खात्याचे मुख्य कौन्सिलर मि. लँब व पोलीसखात्याचे इन्सेक्टर जनरल मि. केनेडी ह्यांच्याकडे रा. मांदणे ह्यांना नेऊन ह्या कामी त्यांची सहानुभूती मिळवून ठेवली होती. अशा त-हेने गव्हर्नरांपासून ते जिल्ह्याच्या कलेक्टरांपर्यंत सगळ्यांची सहानुभूती व मदतीचे आश्वासन मिळाल्यावर शिंदे व डॉ. मॅन हे प्रत्यक्ष जमिनीच्या चौकशीसाठी सातारा जिल्ह्यातील तालुक्यातालुक्यांतील गावे पाहण्यास निघाले. शेतकीच्या प्रश्नावर चौकशीच्या कामी मदत व्हावी म्हणून श्री. विठ्ठल नामदेव काळे ह्या तज्ज्ञ गृहस्थास बरोबर घेतले. सातारा जिल्ह्यात शिंदे व काळे ह्यांनी एकंदर ३ सफरी केल्या आणि पुढील ३ खेडी वसाहतीसाठी केंद्र बनविण्याच्या दृष्टीने चौकशी करण्यासाठी निवडली. १) एरंडोली – मिरजेच्या पश्चिमेस ९ मैलांवर, २) कुपवाड – बुधगाव स्टेशनच्या दक्षिणेस ३ मैलांवर व सांगली, मिरज आणि बुधगाव संस्थानच्या हद्दीमध्ये. ह्याच खेड्यात सुमारे १२०० एकर जमीन जंगलखात्याकडून मिळण्यासारखी वाटली व त्यांपैकी १५० एकर जमीन नांगरटीसाठी अति उत्तम आणि ३०० एकर जमीन साधारण प्रतीची असल्याचे आढळून आले.
३) पळूस-कुंडलरोड ह्या स्टेशनापासून ३ मैलांवर सांगली व औंध ह्या संस्थानच्य हद्दीमध्ये.


ही तीन केंद्रे पाहण्यापूर्वी व निश्चित करण्यासाठी सातारा जिल्ह्यात शिंदे ह्यांनी काळे ह्यांना बरोबर घेऊन सुमारे १ हजार मैलाचा प्रवास भर उन्हाळ्यात केला. त्या काळी साता-यात बैलगाडीचे रस्तेही चांगले नव्हते. म्हणून बराच भाग त्यांना पायी जावे लागले. तिस-या सफरीत वसाहत कमिटीचे चेअरमन डॉ. मॅन हे शिंदे ह्यांच्याबरोबर होते. त्यांना शेतकीचा उत्तम अनुभव होता आणि ते स्वतः शिंदे ह्यांच्याबरोबर काही ठिकाणी पायीसुद्धा गेले होते. त्यामुळे चौकशीच्या कामात कोणतीही कसूर राहिली नव्हती. हे वसाहतीचे खेडे शेतकीच्या आणि त्याचबरोबर उद्योगधंद्याच्या दृष्टीने वसविण्यात येणार होते. त्यांनी केलेला खर्चाचा आरंभीचा अंदाज २० हजार रुपये इतका होता. अखेरीस कुपवाडचे केंद्र निवडण्यात आले व त्यासाठी सरकारकडे रीतसर अर्जही पाठविण्यात आला.


परंतु दैवदुर्विलास असा की, ह्या सुमारासच महायुद्धाचे संकट येऊन कोसळले. शिंदे, काळे व डॉ. मॅन ह्यांनी केलेल्या चौकशीचा फायदा मात्र सरकारास मिळाला. कारण महायुद्धास कामी आलेल्या शिपायांच्या कुटुंबास मदत म्हणून निर्देशिलेल्या शेतकीच्य जमिनीची जरुरी लागले म्हणून आम्हास ही तूर्त देता येत नाही असे सरकारकडून मिशनला उत्तर आले. मांगांच्या तोंडाचा घास शिपायांना म्हणून राखून ठेवला. ह्या सर्वच प्रकरणांबद्दल शिंदे ह्यांनी म्हटले आहे, “पण अखेरीस काय झाले ते असो. कुपवाडच्या जमिनीच्या काही भागावर हल्ली डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन कॉलेजची इमारत उभी दिसते. उन्हातान्हातून चौकशीची धावपळ केली कुणी? ती कशासाठी केली? आणि अखेरीस निशबाने यशाची माळ कोणाच्या गळ्यात घातली? सावकाशपणे विचार करून वाचकांनीच काय वाटेल ते वाटून घ्यावे.”३ शिंदे ह्यांची मांगांच्या शेतकी खेड्याची कल्पना जर अस्तित्वात आली असती तर कुणी सांगावे, अस्पृश्यवर्गाच्या भवितव्यतेला वेगळे वळणही लागले असते.


अण्णासाहेब शिंदे ह्यांच्या मांगांच्या शेतकी खेड्याच्या योजनेसारखा विचार त्यानंतर १५ वर्षांनी बाबासाहेब आंबडकरांनी मांडला. महारवतनामुले स्पृश्यांच्या गुलामगिरीत अडकलेल्या प्रजेला आपली सुटका करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवून मानाने जगता यावे यासाठी बाबसाहेब आंबेडकरांनी १९२७ साली महार लोकांसाठी अशाच प्रकारचा विचार मांडला. त्यांनी महारवतानाचा त्याग करून जंगलखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जमिनी सरकारकडून मिळवून तेथे स्वतंत्र वसाहती करून सेती करावी; त्यामुले त्यांना वतन गेल्याचे नुकसान हजारो पटींनी भरून काढता येईल. अशा वसाहतीतील सर्व महार लोकांना शेतीवर उपजीविका करण्याइतपत क्षेत्र सापडणे कठीण. म्हणून खादी विणण्याचा व विकण्याचा व्यवसाय त्यांनी करावा व सर्व महार मंडलींनी खादी वापरण्याचा निश्चय करावा असा मार्ग आंबेडकरांनी महारांच्या सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुचविला.४ मात्र आंबेडकरांचा हा विचार अमलात आणण्याच्या दृष्टीने कोणी परिश्रम घेतल्याचे, प्रयत्न केल्याचे आढळत नाही. त्यांची सूचना केवळ विचाराच्या पातळीवरच राहिली.


शिंदे यांची योजना जर अमताल आली तर खेडेगावातील अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांच्या जीवनाला स्वावलंबीपणाचे विधायक वळण लागून त्यांच्या जीवनात स्पृहणीय पालट होण्याची संभावनीयता जरूर होती.


संदर्भ
१.    दि सिक्थ अँन्युअल रिपोर्ट ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, १९१३, पृ. १०-११.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २६३-६४.
३.    तत्रैव, पृ. २८२-२८३.
४.    भीमराव रामजी आंबेडकर, ‘अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया,’ अग्रलेख, बहिष्कृत भारत, २३ डिसेंबर १९२७.

खटल्याचा दैवदुर्विलास

विठ्ठल रामजी शिंदे हे मिशनच्या प्रत्यक्ष कामातून निवृत्त झाले व मंगलोरमध्ये ब्राह्मसमाजाचे प्रचारक म्हणून १९२४ साली गेले. त्यानंतर त्यांना मिशनच्याच संदर्भात आणखी एका अप्रिय घटनेला तोंड द्यावे लागले, किंबहुना त्यांनीच स्थापन केलेल्या मिशन ह्या संस्थेच्या मातृसंस्थेकडून अनपेक्षित त्यांच्यावर आघात केला गेला. १२ नोव्हेंबर १९२२ रोजी मातृसंस्थेच्या साधारण सभेने शिंदे यांना विश्वस्त पदावरून काढावे असा निर्णय घेऊन ठेवला होता मात्र तो त्यांना कळविलाही नव्हता. याबाबतची वस्तुस्थिती अशी की, बॅ. मुकुंदराव जयकर, लक्ष्मणराव नायक आणि विठ्ठल राजमी शिंदे हे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ह्या संस्थेचे विश्वस्त होते, त्यांच्याऐवजी जी. बी. त्रिवेदी, जी.जी. ठकार, पुणे आणि लक्ष्मणराव नायक हे नवीन विश्वस्त नेमण्याचा ठराव वरील सभेत केला. बॅ. मुकुंदराव जयकर यांनी कदाचित आपल्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला असेल म्हणून जी. जी. ठकार यांची नेमणूक केली गेली असे म्हणता येणे शक्य होते. परंतु विठ्ठल रामजी शिंदे यांनी विश्वस्तपदाचा राजीनामा दिला नसतानाही त्यांच्यऐवजी जी. बी. त्रिवेदी ह्यांना विश्वस्त का नेमले हे शिंदे यांना अनाकलनीय वाटले. ह्या बाबतीतील ठराव शिंदे यांना दोन वर्षे कळविण्यातही आला नाही. ते मंगलोरला गेले असता ह्याबाबतची कुणकुण त्यांना लागली होती. आधीचे विश्वस्त म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांची सही काही व्यवहारासाठी ज्या वेळेला मागण्यात आली त्या वेळेला शिंदे यांनी स्वाभाविकपणेच सही देण्यास नकार दिला. एखाद्या विश्वस्ताला त्याच्या विश्वस्त पदावरून काढण्यासाठी सहा कारणे ‘ट्रस्ट अँक्ट’ मध्ये नमूद केलेली आहेत. त्यांपैकी एकही कारण आपल्याकडून घडलेले नाही. याची शिंदे यांना खात्री होती. असे असताना मातृसंस्थेने त्यांच्याविरुद्ध हायकोर्टात फिर्याद केली. त्यावर हायकोर्टाने विठ्ठल रामजी शिंदे यांनाच विश्वस्त ठेवावे असा निकाल दिला. मातृसंस्थेने आपल्यावर खटला भरू नये असे मित्रत्वाच्या नात्याने त्यांना जी. बी. त्रिवेदी यांना तातडीच्या पत्राने कळविले. कारण अशा प्रकारच्या फिर्यादीने मिशनलाच नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे आणि आपल्यावर तर उघड उघड अन्याय होत आहे. विश्वस्त मंडळातून काढावे असे एकही कारण आपल्याकडून घडलेले नाही हेही त्यांनी नमूद केले. हायकोर्टापुढील खटल्याचे स्वरूप पाहता एका बाजूला मिशनसारखी सन्मान्य संस्था ही वादी होती आणि दुस-या बाजूला आपल्यासारखी एक गरीब व्यक्ती प्रतिवादी आहे. या खटल्याच्या खर्चाचा भूर्दंड अखेर मिशनवरच बसणार इत्यादी गोष्टी त्यांनी जी. बी. त्रिवेदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केलेल्या होत्या. तरीही मिशनने त्यांच्यावर खटला चालविलाच.


६ फेब्रुवारी १९२५ रोजी हायकोर्टाचा निकाल विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बाजूने लागला. ह्या निकालान्वये डी. सी. मिशनने विठ्ठल रामजी शिंदे आणि जी. जी. ठकार यांचे विश्वस्तपद कायम ठेवून त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी तिसरा ट्रस्टी नवीन साधारण सभेने नियुक्त करावा असा आदेश दिला. बँकेत असलेले सर्व रोखे विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश ठकार आणि हायकोर्टाच्या हुकुमान्वये मिशनच्या साधारण सभेने निवडावयाचा तिसरा विश्वस्त यांच्या नावे जुन्या विश्वस्तांनी बदलून द्यावेत आणि दोन्ही पक्षाचा कोर्टखर्च आणि खटल्याचा खर्च मातृसंस्थेतूनच व्हावा असे हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वरूप होते.


अण्णासाहेब शिंदे यांना जी भीती वाटत होती ती रास्तच ठरली. मिशनचा एक हजार रुपयांचा व अण्णासाहेब शिंदे यांचा ५००रु. चा कोर्टखर्च मिशनच्या माथी बसला.१ ह्या खटल्याच्या निमित्ताने आपल्या नावाला विनाकारण कलंक लागला नाही याचे फक्त समाधान अण्णासाहेबांना मिळाले. अण्णासाहेबांच्या जीवनात दारुण असे विरोधाभ्यास पाहावयास मिळतात. जी संस्था अपार कष्टाने स्थापन केली, वाढविली, आयुष्यभराचा स्वार्थत्याग जिच्यासाठी केला त्याच संस्थेने त्यांच्यावर आरोपी म्हणून खटला भरावा यापेक्षा दैवदुर्विलास तो काय! ज्यांच्यासाठी हे मिशन काढले व आयुष्यातील दीड तपाचा काळ अविश्रांत परिश्रम करून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला; त्याच वर्गातील लोकांनी त्यांच्याविरुद्ध आक्षेप घेऊन त्या संस्थेतून त्यांनी दूर व्हावे अशासारखी परिस्थिती निर्माण केली, ही एक दुदैवी घटना त्यांच्या वाट्याला आली होतीच. त्यावर झालेला हा दुसरा आघात म्हणजे मुंबई येथील मातृसंस्थेने त्यांच्यावर भरलेला खटला. अण्णासाहेब शिंदे यांच्या ठिकाणी ऋषितुल्य वृत्ती व अपार क्षमाशीलता होती म्हणूनच ते ह्या दोन आपदांना तोंड देऊ शकले, असे वाटते.


संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३३०-३३२.

कौटुंबिक उपासनामंडळ

मंगलोर येथील आपले वास्तव्य संपुष्टात आणल्यानंतर पुण्यास परतताना अण्णासाहेब शिंदे यांनी दक्षिण कर्नाटकातील मुडब्रिद्री, कारकळ येथील जैनधर्मीयांची देवळे, घुमटाराज हा पुतळा इत्यादी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आखलेला दौरा संपविला व १९२५ च्या एप्रिल महिन्यात ते पुण्यास पोहोचले. मंगलोर येथे प्रतिष्ठित ब्राह्म बिल्लवांशी त्यांचे जे मतभेद झाले होते त्यामुळे त्यांचे तेथील वास्तव्य सुखावह झाले नसले तरी धर्मप्रचाराचे काम विविध प्रकारे करता आल्यामुळे त्यांच्या मनाला आंतरिक समाधान वाटत होते. पुण्यात आल्यानंतर काही दिवस त्यांनी विश्रांती घेतली; परंतु धर्मप्रचाराचे उन्नत कार्य समाजाप्रमाणे केल्याशिवाय त्यांच्या मनाला स्वस्थता वाटणे शक्य नव्हते. स्वाभआविकपणेच त्यांनी आपल्या भावी धर्मकार्याची एक नवी योजना आखली.


१८९८ मध्ये ते बी.ए. चे विद्यार्थी असताना ब्राह्मसमाजात जाऊ लागल्यापासून खेडेगावातील लोकांमध्ये ह्या उन्नत धर्मविचाराचा प्रसार होणे निकडीचे आहे असे त्यांना वाटत होते. या संदर्भात रोजनिशीमध्ये नोंद करताना त्यांनी म्हटले आहे की, "असल्या गावंढळांचीच बहुसंख्या आणि त्यांन आपल्यात घेतल्याशिवाय समाजाचा खरा प्रसार कधी होणार नाही." ह्या नोंदीत त्यांनी 'माझ्यासारख्या गावंढळास' असाही स्वत:चा निर्देश केला आहे. ह्या निर्देशावरुन त्यांना किमानपक्षी ग्रामीण संस्कृतीतून, वातावरणातून आलेले लोक अभिप्रेत होत असे दिसते. ह्या त्यांच्या जुन्या विचाराने अलीकडच्या काळात उचल खाल्ली होती. ब्राह्मधर्माचा प्रचार बहुजन समाजात आणि विशेषत: कुटुंबात, कुटुंबातील बायकामुलांत कसा होईल याची विवंचना त्यांच्या मनाला लागली होती. ब्राह्मसमाजाच्या चळवळीचे एवढ्या अवधीत त्यांनी भारतभर निरीक्षण केले होते. ही चळवळ आजपावेतो सुशिक्षितांत, शहरात राहणा-यांत गुंतून पडली होती. ब्राह्मसमाजाची शुद्ध आणि उच्च बुद्दिवादाची शिकवण साध्या भोळ्या बहुजन समाजाला सहज कळण्यासारखी नव्हती. इंग्रजी आणि संस्कृत न जाणणा-या आणि खेड्यांत राहणा-या लोकांसाठी ब्राह्मसमाजाकडून प्रयत्न होणे कठीण होत व ते झालेही नव्हतें हे त्यांना माहीतच होते. मग अशा लोकांच्या बायकामुलांसाठी प्रयत्न होणे आणखी दूरच होते; म्हणून कुटुंबामध्ये धर्मप्रचार करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेबांनी एक योजना आखली.


शिवाजी मराटी हायस्कूलचे संस्थापक हेडमास्तर श्री. बाबुराव जगताप, पुणे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष श्री. बाबुराव जेधे व इतर मित्रमंडळीपैंकी गणपतराव शिंदे, रामराव जोतीबा शिंदे, वकील, काळभोर वगैरे मराठी समाजाचे पुढारी धार्मिकबाबतीत प्रागतिक विचारांचे होते. अण्णासाहेबांनी प्रथमत: ह्या मंडळींच्या घरी भगिनी जनाबाईंसह रविवारी आणि अन्य सुटीच्या दिवशी जाऊन ब्राह्मधर्माच्या कौटुंबिक उपासना चालविण्याचा उपक्रम सुरु केला. बायकामुलांना समजतील अशी सोपी भजने व भक्तिपूर्ण प्रवचने मंडळींना आवडू लागली. हा उपक्रम वर्षभर चालविण्यानंतर व त्याची यशस्विता अजमावल्यानंतर त्यांनी कौटुंबिक उपासनामंडळ रीतसरपणे घटना करुन स्थापण्याचा विचार केला. ह्या सुमारासच त्यांनी अहल्याश्रमातून आपले बि-हाड हालवन ते शुक्रवार पेठतील माळवदकरांच्या वाड्यात राहावयास गेले. मिशनमध्ये त्यांचे निष्ठावंत सहकारी असलेले कृष्णराव गोविंदराव पाताडे हे कौटुंबिक उपासनामंडळाच्या कार्यामध्ये साह्म करण्यास आनंदाने तयार झाले. ह्या काळात यश येण्याची चिन्हे त्यांना दिसू लागली. तेवहा १६ जून १९२६ रोजी कौटुंबिक उपासनामंडळाने पुढील विनंतीपत्र काढले.


कौटुंबिक उपासना मंडळ
विनंती पत्र
यं हि किच्चं अपविद्धं अकिच्चं पन करियती |
उन्नळानं पमत्तानं तेसं वड्ढन्ति आसवा ||
धम्मपद, अ. २१ श्लो. ३


अर्थ : जे करावयास पाहिजे त्याचा चुथडा होत आहे. जे करु नये ते पण केले जात आहे. उनाड आणि प्रमत्त जे, त्यांच्या वासना वाढत आहेत.
१. हल्ली लोकसमाजाची स्थिती अत्यंत कीव येण्यासारखी झाली आहे. अध्यात्म म्हणजे काय हे लोकांना न कळून त्याची थट्टा उघड उघड चालली आहे. तरुण नास्तिक व वृद्ध निराश झालेले दिसतात. मनुष्याचा मनुष्यावर विश्वास नाही. कारण एकच की धर्माचा पाया ढासळू लागला आहे.


२. धर्माविषयी विचार अथवा उपासना करावयाची झाल्यास फार तर प्रौढ मंडळीच जमतात. तेही क्वचित. अशा एकांगी विचारांचा आणि उपासनांचा परिणाम कुटुंबावर होत नाही, ह्यात नवल नाही. खरी धार्मिक उपासना सहकुटुंबच व्हावयास पाहिजे. म्हणून ख-या श्रद्धेने व प्रेमाने प्रेरित झालेली मंडळी नियमितपणे उपासनेसाठी एकत्र होणे आवश्यक आहे.


३. धर्म म्हणजे केवळ मत नव्हे. तत्त्वज्ञान किंवा बाह्म कर्मही नव्हे. धर्म ही बाब अंत:करणाची व भावनांची आहे, म्हणून धर्माचा उदय आणि प्रचार कुटुंबाचे द्वारा होणेच उचित आहे. तसे इतिहास सांगत आहे. कुटुंब म्हणजे केवळ बायकोच नव्हे. आईबाप, बहीण-भाऊ, नवरा-बायको, मुले ह्यांच्या प्रेमाचे केंद्र म्हणजे कुटुंब. हेच धर्माचरणाचे व प्रसाराचे क्षेत्र, केवळ व्यक्ती नव्हे.


४. वरील गोष्टी ध्यानात आणून अशा स्वतंत्र शुद्ध कार्यकारी उपासनेची एक घटना करण्याची मंडळाची इच्छा आहे. ज्यांना हा उद्देश पटतो त्यांनी ह्या घटनेत सहकुटुंब यावे, असे आमंत्रण आहे. ज्यांना कुटुंबच नसेल त्याने एकटे आल्यास चालेल; पण तो अथवा ती सभासद होऊ शकणार नाही. कोणाची खाजगी मते अथवा कौटुंबिक परंपरा कशा आहेत हे पाहण्याची व ती कशी असावीत हे ठरविण्याची मंडळाची इच्छा नाही व अधिकारही नाही. प्रत्येकाचे अंतर जाणणारा ईश्वर समर्थ आहे. एकमेकांच्या अंतरात डोकावण्यापेक्षा व वर्तनाविषयी साशंक राहण्यापेक्षा सर्वांनी एकत्र जमून चित्तशुद्धी करणे म्हणजेच उपासना होय.


५. कुटुंबे कोणत्याही दर्जाची, जातीची, राष्ट्रांशी, अगर धर्माची असोत, अथवा ह्यांपैकी उपाधी नसलेली असोत तिकडे पाहण्याचा मंडळाचा अधिकार नाही. मंडळाच्या येणा-यांना उपासनेसंबंधी खरी श्रद्धा आणि कळकळ पाहिजे आणि ती नियमितपणा, वक्तशीरपणा, स्थिरपणा आणि शांतपणा ह्या गुणांच्या द्वाराच दिसून आली पाहिजे. एवढीच मंडळीची शर्त आहे.


६. मंडळाचा सर्व विचार आणि व्यवहार केवळ बहुमताने ऐहिक कार्याप्रमाणे चालणार नाही. योग्यायोग्यातेनुरूपच निकाल व अंमलबजावणी होईल.
घ.न. २९६, शुक्रवार पेठ, पुणे
कृष्णाराव गोविंदराव पाताडे, सेक्रेटरी, कौ. उ. मंडळ, पुणे


कौटुंबिक उपासनामंडळ रीतसर सुरु झाल्यावर सुमारे दहा-बारा कुटुंबे सभासद झाली. पुणे येथील शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी हायस्कूल येथे मंडळाच्या सार्वजनिक साप्ताहिक उपासना व प्रासंगिक कीर्तने होत असत. पहिल्या सहा महिन्यांतच अशा तीस उपासना व पाच कीर्तने झाली. अण्णासाहेब शिंदे, काळभोर, जेधे, जगताप, लाड यांच्या घरी कौटुंबिक उपासना झाल्या. त्या वेळी स्त्रियांच्याच केवळ तेवीस संगतसभा झाल्या. ब्राह्मसमाजाच्या उन्नत विचाराचा लाभ कुटुंबातील बायकामुलांना विशेषत्वाने मिळावा हा जो अण्णासाहेब शिंदे यांचा हेतू होता तो ब-याच अंशी सफळ होताना दिसू लागला. स्त्रियांच्या सभांतून सभासद नसलेल्या कुटुंबातूनदेखील ब-याच स्त्रिया आपल्या सुनालेकींसह हजर असत. मंडळाच्या उपासनेत किंवा कोणत्याही कामात जातीचा किवा धर्माचा भेद मुळीच करण्यात येत नसे.


प्रारंभी मंडळाचे सेक्रेटरी म्हणून कृष्णराव गोविंदराव पाताडे ह्यांनी काम केले. त्यानंतर गणपतराव बापूजी शिंदे, बा.पा. लाड ह्यांनी सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. श्री. बाबुराव जगताप ह्यांचे सर्वतोपरी साहाय्य असे. कौटुंबिक उपासना मंडळाच्या कार्याचा विस्तार सातारा, कोल्हापूर येथे करावा असेही योजिले होते. परंतु ती योजना फलद्रूप झाली नाही. मंडळाच्या वतीने कोणी विशेष पाहुणे आले असता त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी शहरातील शेडीदशे व्यक्तींना निमंत्रणे पाठविली जात व रा. ब. पां. चि. पाटील, एन्. जी. पवार (इंजिनियर) जेधे बंधू, डुंबरे बंधू, बाबुराव सणस, व्ही. के. जोग, पां. ना. राजभोज, एस्. आर. तावडे, हॅरिएट गोरे, मालिनीबाई खान इत्यादी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहत. आनंदीबाई शिर्के, शं. के. कानेटकर (गिरीश), माधवराव पटवर्धन (माधव जूलियन), बाळूताई खरे ( विभावरी शिरुरकर), वेणूताई पानसे इत्यादी साहित्यिक मंडळीही उपस्थित राहत असत. मंडळाच्या वतीने शिकागो येथील युनिटेरिअन धर्मप्रचारक डॉ. साऊथवर्थ यांचे १४ डिसेंबर १९२८ रोजी व्याख्यान झाले. इंग्लंडमधील युनिटेरियन समाजाच्या प्रतिनिधी मिसेस वुडहाऊस व मिस् नेसफिल्ड यांनी ४ जानेवारी २९ रोजी मंडळास भेट देऊन व्याख्यान दिले. प्रा. धर्मानंद कोसंबी यांचे ७ एप्रिल १९२८ रोजी व्याख्यान झाले. अशी व्याख्याने व कार्यक्रम श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये होत असत व असा विशेष प्रसंगी उपस्थितांची संख्याही मोठी असे.


मंडळाच्या उपासना ब-याच वेळा अण्णासाहेब शिंदे चालवीत असत. तर कधी कधी बाबुराव जगताप, गणपतराव शिंदे हे चालवीत असत. बुद्धजयंती, ख्रिस्त जयंती, नवीन वर्षाचा प्रारंभ अशा विशेष दिवशी खास उपासना चालविल्या जात. १९२७ च्या डिसेंबर अखेरीपासून कौटुंबिक उपासना मंडळाचे अहवाल पुस्तकरुपाने लिहिण्यात येऊ लागले. सामान्यत: उपासक आपल्या निरुपणाचे सार ह्या पुस्तकात नमूद करीत असत. प्रमुख उपस्थितांची नावेही प्रत्येक उपासनेच्या वृत्तान्तामध्ये नमूद केली जात.


उपासनेच्या वेळी अण्णासाहेब शिंदे हे एखादा महत्त्वाचा आध्यात्मिक विचार लौकिक जीवनाच्या संदर्भात मांडीत असत. ८ जानेवारी १९२८ रोजी चालविलेल्या विशेष उपासनेत येणा-या संक्रांतीच्या सणाचे महत्त्व स्पष्ट केले. गोड बोलण्याचे आत्मिक महत्त्व त्यांनी विशद केले. सत्य समजून घेऊनच तृप्त न राहता अत्यंत प्रिय रीतीने त्याचा फैलावा करुन सामाजिक आनंदात भर टाकणे हे आपले आत्मिक कर्तव्य आहे. मधुर वाणी हा निर्मळ मनाचा वास आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.


१ एप्रिल १९२८ रोजी अण्णासाहेबांनी चालविलेल्या उपासनेमध्ये उद्धोधनासाठी धम्मपदातील पंधराव्या अध्यायातील सुखवग्ग हा भाग वाचून त्याचे निरुपण केले. उपदेशासाठी 'ऐसे भाग्य काई लाहता होईन ! अवघे देखे जन ब्रह्मरुप' हा अभंग घेतला व बुद्धाच्या धर्मचक्राचे विवेचन केले. विवेचनात त्यांनी म्हटले, आम्ही खरे सुखी केव्हा होऊ? तर भोवताली वैर, छळ, दु:ख निराशा असताही जर आम्ही आपली शांती राखू तेव्हाच आम्हाला आढळून येईल की, ह्या जगातही ख-या दृष्टीने पाहणा-यास सुखच दिसते. गौतम बुद्ध अथवा तुकारामासारखे संत हे निराशावादी होते, असे आम्ही वरवर विचार करणारे किती सहज म्हणून जातो. परंतु जगाच्या कसोटीतून उतरल्यावर कळून चुकते की, संत हेच आनंदवादी व आशावादी असून आम्ही प्रपंचलंपटच उलट कुरकुरणारे व निराशावादी ठरतो. जशास तसे वागण्यास केवळ दु:खाचे मूळ असून सुखाची लागवड आत्म्यातून बाहेर करावयाची आहे. बाह्म जगातून आत्म्यात सुखाची आवक शक्य नाही. सुखाचे व आनंदाचे उत्पत्तिस्थान आत्मा हे स्वयंभू स्थान आहे. मायेचे चक्र बाहेर फिरत आहे. त्यातच धर्मचक्र मायेहूनही अधिक प्रभावशाली फिरत असते. बुद्धासारख्या विभूतींनीच हे धर्मचक्र फिरवावयाचे नसून आम्ही-तुम्हीही नकळत फिरवीत असतो. गुरुत्वाकर्षणाच्या नियमास न जुमानता जसा कॅपिलरी फिनॉमिनॉ दिसतो, तसेच मायेच्या चक्राच्या उलट हे धर्मचक्र आत्मिक जीवन फिरवीत असते.


कलकत्त्याच्या साधारण ब्राह्मसमाजाची स्थापना होऊन १५ मे १९२८ रोजी पन्नास वर्षे पूर्ण होतात ह्या निमित्ताने कौटुंबिक उपासना मंडळाचे ७ वे ८ एप्रिल १९२८ रोजी श्री. शिवाजी मराठा शाळेत उत्सव केला. ता. ७ रोजी सायंकाळी प्रो. धर्मानंद कोसंबी यांचे, 'हल्लीच्या परिस्थितीत श्री गौतमबुद्धाच्या शिकवणीचे महत्त्व' या विषयावर जाहीर व्याख्यान झाले. व्याख्यानातील प्रतिपादन, श्रोत्यांचे प्रश्न व कोसंबींनी दिलेली उत्तरे ह्या सा-याचा वृत्तान्त अण्णासाहेब शिंदे यांनी स्वत: नमूद केला आहे.


ह्या वृत्तान्तावरुन समग्र व्याख्यानप्रसंगाचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येऊ शकते. प्रारंभी अण्णासाहेबांनी उचित शब्दांत धर्मानंद कोसंबीचा यथार्थ परिचय करुन दिला. वृत्तान्तामध्ये त्यांनी नमूद केले आहे, "प्रो. धर्मानंदांनी सांगितले की बुद्धाचे नुसता आपलाच मोक्ष न पाहता सर्व मनुष्यजातीने शांदी कशी मिळवावी हा मार्ग शोधून काढला. तो मध्यमा प्रतिपत्तीचा अष्टांगमार्ग होय. ह्याचे विस्ताराने कथन केले. करुणा व प्रज्ञा ह्या दोन्हीचे समत्व म्हणजे बौद्ध धर्म अशी त्यांनी व्याख्या केली. नियंत्रणाशिवाय दुस-या तत्त्वाचे प्राबल्य वाढळे म्हणजे जगात कसे घोटाळे होतात ते जैन धर्माची अहिंसा व आधुनिक शास्त्रीय ज्ञानजन्य प्रज्ञेचा दुरुपयोग ह्याचे दाखले देऊन स्पष्ट केले. ह्या दोन्हीचे समत्व म्हणजे योग असे सांगितले. हा योग श्री गौतमांनी आपल्या शिकवणीतच नव्हे तर चरित्रांत उत्तम अनुभवास आणून दिला. हल्ली करुणा व प्रज्ञा ही दोन्ही तत्त्वे जगात आहेत, पण त्यांचा परस्परांवर दाब नाही. त्यामुळे दु:ख  पसरले आहे. व्याखअयानात विद्धता, शांती, वक्तृत्व तर होतेच पण विनोद व समयसूचकताही अपूर्व असल्यामुळे ते आबालवृद्धांस सारखेच बोधक झाले. हजर असलेल्यांत शंकरराव चव्हाण, डेप्युटी कलेक्टर; शंकरराव मोरे वकील, श्रीपतराव शिंदे, बाबुराव जगताप, टी. डी. नाईक, गणपतराव शिंदे, डॉ. नवले, खैसाराम जैन, ल. भिडे, माधव जूलियन पटवर्धन, शिवाजी हायस्कूलची शिक्षक व शिष्य मंडळी, कौटुंबिक उपासनामंडळाचे बरेच स्त्रीसभासद, निराश्रित साह्यकारी मंडळीचे अहल्याश्रमातील बहुतेक कार्यवाहक वगैरे बराच मोठा समाज जमला होता. जवळ जवळ एक तास व्याख्यान दिल्यावर श्रोतृवर्गातील तरुणांनी काही प्रश्न विचारल्यास उत्तराच्या रुपाने खुलासा चांगला होईल असे व्याख्याते म्हणाले."


ओळख करुन देताना श्री. अण्णासाहेबांनी ज्ञानकोशकारांनी जो बौद्ध धर्माविषयी अत्यंत खोडसाळपणा केला आहे ( असे जे म्हटले ) त्या विषयी व्याख्यात्यांनी खुलासा करावा अशी सूचना केली होती. "अशा खोडसाळपणाला उत्तर देण्याची आपली शक्ती नाही. स्वत: गौतमबुद्धाचे अशांच्या तोंडी न लाण्याची आज्ञा केली आहे" असे सांगून व्याख्याते म्हणाले की, "ज्ञानकोशात जी चुकीची विधाने आहेत ती सर्व इकडून तिकडून गोळा केलेली आहेत व ज्या शिव्या दिलेल्या आहेत त्या मात्र निव्वळ स्वत:च्या आहेत," हे एका हरदासाची नक्कल सांगून मोठ्या विनोदाने पटविले. नंतर श्री. अण्णासाहेबांनी पुन्हा प्रश्न केला की, "युरोप-अमेकितेचीस प्रवासात व्याख्यात्यास बौद्ध धर्मप्रणीत शीलसंपत्तीचा पुरस्कार केलेला कोठे आढळला काय?" ते म्हणाले, "बौद्धप्रणीत अनत्याचारी शांतितत्वाचे जे जे प्रसिद्ध पुरस्कर्ते त्या बहुतेकांना कठोर राज्यकर्त्यांनी तुरुंगातच ठेवलेले आढळले." बौद्ध धर्माच्या अवनतीचे कारण ह्या धर्माने राजाश्रय केला त्यामुळे त्याला शत्रू उत्पन्न झाले. दुसरे कारण बौद्ध भिक्षूची दानत बिघडली. तिसरे कारण गौतमाने जातिभेदाला मूठमाती दिली, तसे बौद्ध गृहस्थाश्रमी लोकांकडून वर्तन झाले नाही, इत्यादी." रा. चव्हाणांनी विचारले, "अशोक हा बौद्ध नव्हता अशी कल्पना आहे, ह्याचा खुलासा काय?" उत्तर विनोदाने असे मिळाले की, "ज्यांची ही वेडगळ कल्पना असेल त्यांनाच हा खुलासा विचारणे बरे. दारु पिऊन एखाद्याने तुम्हाला शिव्या दिल्या तर त्याचा खुलासा व्याख्याता कसा करील?" (हशा). डॉ. नवले यांनी विचारले की, "बौद्ध धर्माच्या पुरस्कारासाठी एखादी मंडळी निघाली तर व्याख्याते मदत करतील काय?" उत्तर : "अति आनंदाने, हमालीदेखील करु." गणपतराव शिंद्यांनी विचारले की, "तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ आदिकरुन भागवत संतांच्या मराठी काव्यात बौद्धतत्त्वे गोविली आहेत ती वाचून बहुजन समाजापुढे ठेविली असता समाज ती लवकर ग्रहण करणार नाही का?" ह्याला विनोदाचे उत्तर: "एखाद्या दारुड्याने दारु सोडावी म्हणून अंगात देवी आल्याचे दाखवून देवी दारु सोड म्हणते असे भासविले, तर दुस-या बाजूचे लोक, दुसरी देवी दारु पी म्हणते असे भासवतील. म्हणून असे पर्यायाचे प्रयत्न न करिता प्रत्यक्षच केलेले बरे." श्रीपतराव शिंद्यांनी विचारले की, "महाराष्ट्रात असे प्रत्यक्ष प्रयत्न होत आहे काय?" उत्तर : "मुंबईस एम्. पॉवेल कंपनीचे डॉ. नायरनी बौद्ध समाजा काढला आहे. पण त्यापासून फार तर वाड्मयाची माहिती मिळते. प्रत्यक्ष शील वाढण्याचा उपाय नाही. श्री. अण्णासाहेब शिंदे जेथे जातील तेथे बौद्धधर्माचा सहानुभूतीने पुरस्कार करितातच."


"शेवटी अण्णासाहेब आभार मानताना म्हणाले की, व्याख्यात्यांचे व्याख्यान आपण सर्व विसरू, पण त्यांचा पुण्यकारक समागम जो आबालवृद्धांस आज प्रत्यक्ष घडला त्याचा संस्कार आम्हावर नकळतच घडला आहे. तो विसरण्याचा प्रश्नच नाही. पण त्याचा परिणाम झाल्याचे पुढे योग्य वेळी दिसून येईलच. श्रवणापेक्षाही संतसमागमाचा फायदा अधिक आहे. महाराष्ट्रात आपण जिल्ह्यानिहाय संचारास जाऊ तेव्हा प्रो. धर्मानंदांनी आपणही बरोबर येऊन बौद्ध धर्माची माहिती जनतेस सांगू असे आश्वासन दिल्याचे अण्णासाहेबांनी सांगून शेवटी करुणा व प्रज्ञा ह्यांच्या समत्याचे पूर्ण अधिष्ठान जे ईश्वरतत्व त्यांचे आभार मानून सभा बरखास्त केली."


कौटुंबिक उपासना मंडळाच्या साप्ताहिक उपासनांमध्ये अण्णासाहेब शिंदे यांनी विविध विषयांवर प्रवचने केली. त्यांपैकी काही विषय पुढीलप्रमाणे होते : ईश्वर सच्चिदानंदरुप असून सत्, चित्, आनंद ह्या ईश्वर साक्षात्काराच्या पाय-या आहेत; ईश्वर आनंदरुप आहे; ईश्वर ही प्रेमशक्ती आहे; उपासनेचा हेतू आनंदाचा साक्षात्कार हा आहे; खरा धर्म चांगुलपणात आहे; ईश्वराच्या ठिकाणी सेव्यसेवकभाव असतो. कधी बहिणाबाईंचे चरित्र. तर कधी ख्रिस्त जयंतीनिमित्त ख्रिस्त जीवनातील एखादा उद्दोधक भाग यांवर त्यांनी प्रवचन केले. ह्या सर्व प्रवचनांचा रोख आपले लौकिकातील जीवन आध्यात्मिक पातळीवर कसे नेता येईल असे. त्यांनी स्वत: केलेल्या राजकीय चळवळीलाही आध्यात्मिक अधिष्ठान होते. त्यामुळे कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊन पुणे जिल्ह्यातील हवेली, जुन्नर, खेड ह्या तालुक्यातील दौरा आटोपून आल्यानंतर ११ मे १९३० च्या कौटुंबिक उपासनेमध्ये त्यांनी आपल्या दौ-याची इत्थंभूत माहिती सांगितली.


कौटुंबिक उपासना मंडळात बायकांना व मुलांना बोध करणे अभिप्रेत असल्याने आध्यात्मिक विषय सुबोधपणे व रंजकपणे मांडावा असेही अण्णासाहेब शिंदे यांना वाटत असे. त्यासाठी ते कधी कधी प्रसंगानुरुप हरिकीर्तेने करीत असत. १९२६ साली २१ जुलैला आषाढी महाएकादशीच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी हायस्कूलमध्ये हरिकीर्तन केले. त्यामध्ये त्यांनी तुकारामाची पत्नी जिजाऊ यांचे आख्यान लावले. निरुपणासाठी त्यांनी जिजाऊवर 'अवलाईची नवलाई' हे पद मुद्दाम रचले. जेधे मेन्शनमध्ये गुरु गोविंदसिंग यांच्यावर, कार्तिक महाएकादशी दिवशी शिवाजी हायस्कूल येथे जनाबाई यांची आख्याने आपल्या हरिकीर्तनात केली. श्री जिजामाता स्मारक करण्याच्या चळवळीत स्त्रियांनी आस्थेवाईकपणे भाग घ्यावा अशी श्री शिवनेरी जीर्णोद्धार कमिटीतर्फे अण्णासाहेबांना विनंती करण्यात आली. त्यासाठी कौटुंबिक उपासना मंडळामार्फत पुण्यातील सर्व जातींतील स्त्रियांची मोठी जाहीर सभा शिवाजी हायस्कूलात भरविण्यात आली. त्यावेळी अण्णासाहेबांनी कीर्तन केले. त्यामध्ये जिजामातेचे आख्यान त्यांनी लावले. ह्या आख्यानासाठी त्यांनी जिजामातेची थोरवी वेधकपणे व परिणामकारक रीतीने वर्णन करणारा स्वत: रचलेला ठसकेबाज फटका म्हणून दाखविला. स्त्रीवर्गाची महती व कर्तृत्व श्रोत्यांच्या मनावर ठसविणे व स्त्रियांमध्येही आत्मसन्मानाची भावना जागृत करणे हा अण्णासाहेबांच्या आस्थेचा विषय होता. त्यांच्या कीर्तनातून नेहमी भक्तिज्ञानपर, धार्मिक किंवा सामाजिक विषय असत. पण केव्हा केव्हा सामान्य बायकांना व विशेषत: मुलांना कळण्यासाठी ते विनोदात्म पद्धतीने विवेचन करीत असत. जेधे मॅन्शनमध्ये केलेल्या कीर्तनात जुनी श्रद्धा व नवी सुधारणा यांच्यामधील झगडा दाखविणारी स्वकृत लावणी त्यांनी म्हणून दाखविली. वरवर विनोदी आणि उथळ वाटणा-या ह्या लावणीमध्ये श्रद्धा आणि सुधारणा यांचा संवाद दाखविला आहे व आध्यात्मरहित आधुनिक सुधारणेचा पोकळपणा निदर्शनास आणला आहे. वनोपासनेच्या उपक्रमामुळे अनेक कुटुंबे संपूर्ण दिवस एकत्र घालवीत व त्यामुळे कुटुंबाकुटुंबांमधील स्नेहभाव वृद्धिंगत होण्यास मोठी मदत होते, ह्या अनुभवामुळे मंडळाच्यावतीने वनोपासनेचा कार्यक्रम वर्षातून एकदा तरी घडविण्यात येत असे. २२ एप्रिल १९२७ रोजी मंडळाच्या सहलीची तसेच त्यांच्या विनोदात्म लेखनशैलीची कल्पना त्यामुळे येऊ शकेल. ३


"मंडळी प्रथम पर्वती गावाच्या पूर्वेकडील अंबील ओढ्याचे काठावरील अगदी निर्जन व निवांत अंबराईत पेरुच्या बागेत उतरली. त्या वेळी नऊदेखील वाजले नव्हते. हिवाळ्यामुळे उन्ह तान्ह्या मुलाहूनही कोवळे होते. हांतरुण पसरून सावलीत दोन तान्ह्या मुलांना ठेवून, त्यांना रा. संतुजीराव कदम व वि. रा. शिंदे ही म्हातारी राखत बसली. बाकी सर्व लहान-मोठी स्त्री-पुरुषे कोणी पाणी आणावयाला तर कोणी इतर कामासाठी, कोणी ओढ्याच्या पाण्यात तर कोणी झाडांच्या पारंब्यांवर यथेच्छ विहार करावयाचा गेली. कोणी मुलीनी आपल्या ओच्यात नव्या गजना भरल्या, तर कोणी मुलांनी टपु-या हिरव्या चिंचांनी आपले खिसे गच्च गरम भरले. कोणी थंडगार पाण्यात न्हाणेधुणे आटपले; तर कोणी कोवळ्या उन्हात रविकिरण स्नानात मग्न झाले. पण तास-दीड तासात ( सकाळपासून कोणी काहीच खाल्ले नसल्यामुळे ) मंडळीन बोलावताच हळूहळू लहान (आशाळभूत) तोंडे करुन जमू लागली. पोट हे बेलिफाचे काम किती उत्तम करिते, हे अशा वेळी त्याने बजावलेल्या यशस्वी वारंटावरुन चांगले समजले. साडेदहा वाजले. धनगरी पद्धतीने पंक्तीचा भाट असावा असे ठरले. सगळ्यांनी कोंडाळे करावे. मधे गोपाळकाला ठेवावा. एकदा वाढल्यावर कोण कोणासाठी न उठता, ज्याने त्याने हातानेच जे लागेल ते घ्यावे. असे चालले. दही पाहिजे असल्यास एकाने घ्यावे व तसेच (दह्याचे पाळे ) कोंडाल्यात हातपोस्टाने फिरवावे. ह्या नवीन टपालाचे काम अमेरिकेतील सुधारलेल्या पोस्टापेक्षाही चांगले वठले. वास्तविक पाहता ते धनगरी टपाल नवीन नसून श्रीकृष्ण गोपाळहूनही जुने आहे. तेथील चिंचेच्या खालील इतिहाससंशोधकांनी निकाल दिला. ही न्याहारी बरोबर एक तास चालली. मग काय विचारता. काहींना तर बसल्या बसल्याच लवंडण्याची पाळी आली. लेकुरवाळ्यांना आपली लेकरे जड झाली. झाडांना पाळणे बांधिले. त्यात जी लेकरे निजली ती तीन तास झाले तरी उठेनात. ज्या बायका दमट व अंधा-या खोल्यांतून रात्रीचा दिवस करुन राबतात, त्यादेखील सपशेल आडव्या झाल्या ना? मग, सांगतो, का मस्करी करितो.


"दोन तान्ह्या मुलांसह आम्ही लहान-मोठे चोवीसजण होतो. ह्याची नावे हाजरी पुस्तकांत नमूद झाली आहेत. म्हणून येथे दिली नाहीत. शिवाय एक मोलकरीण होती. तिच्यात सहानुभूतीचा लेशही नव्हता. ह्यावरुन ही अस्सल मराठे कुलांतली असावी असे ओघानेच ठरविले. लाकडाच्या बाहुलीसारखी जी ती बसली ती हालेना. मग हासल्याबोलण्याची गोष्ट दूर. इतर बायका पसरल्या, तरुणही लवंडले. अर्वाच्य पोरेही पेंगू लागली. जणू काय जेवणाचे श्रम सर्व श्रमात जास्त असह्म. हे उघड्या हवेचे माहात्म्य. पण आम्ही काय तेथे निजावयाला गेलो होतो? जेवणानंतर मुखशुद्धीसाठी अण्णासाहेबांनी 'हल्लीचे चिवडेवाले' आणि "अग नवनारी, ते चाललीस कुठे जरा थांब ना' ही महाकाव्ये म्हणून दाखविली. तरी काही आळसाचा हल्ला हटेना की ती लाकडाची मोलकरीण हासेना शेवटचा रामबाण म्हणून त्यांनी जेव्हा बंगाल्यातील गोपाळ भांड४ विदूषकाची गोष्ट सांगितली. ती संपण्यापूर्वीच बायकामुले उठून बसली. इतकेच नव्हे, तर हासे न आवरल्यामुळे त्यांची मुरकुंडी वळून जमिनीवर पडू लागली. तरीदेखील त्या लाकडी बाईला हासू आले नाही. डोळ्याचे पाते हालते नाही. योगीच ती !  अशा कौटुंबिक सोहळ्यात तीन वाजले तरी कोणास कळेना. पश्चिमेकडील सावल्या तितक्याच लांब पूर्वेकडे पसरल्या. तरी हांतरुणावर पसरलेली मंडली दुस-या मुक्कामास जाण्यास काही केल्या उठेनात. काही तर्करत्नांनी तर निजलेल्या तान्ह्यांची सबब पुढे करुन अॅडजर्नमेंटचा ठराव आणला. पण तो बहुमताने फेटाळण्यात आला. इतरांनी चिंचेची सावली, ओढयाचा काठ, आसपासची निर्जनता व शेवटी दूर उंचावर समोर दिसणारे पर्वतीचे सौंदर्य अशा एकका दोन अनेक आळशी रसिकतेच्या सबबीवर लहानमोटी अडवणुकीची अमेंडमेंड आणिली. पण अधिकारी मंडळाने त्या सर्वांचे गोड निवारण केल्यावर तीन वाजता सर्व मंडळी कशीबशी तेथून पर्वतीच्या दक्षिणेकडील दरीतील मळ्याकडे निघाली.


"मळ्यात सुमारे दोन तास होतो. बायकांनी आज तो संप केला तो मुंबईच्या मजुरांच्या संपाहून जास्त यशस्वी झाला. त्यांच्या मुलांना सायकलीवरुन आणि तान्हयांना हातांवरुन पुरुषांनाच न्यावे लागले. तेथे गेल्यावर तरुणांना (मुलींना नव्हे ) चहा करावा लागला. चहा तयार झाल्यावर लोळणा-या बायकांनी एकेक तर मुलींनी दोन दोन कोप झोडले. कधी चहा न पिणा-या एका वृद्ध कपीने तर एक कोप पिऊन दुसरा आपल्या अंगावर सांडून घेतला. पण स्वारी नको काही म्हणेना! ह्या तपस्वी बोवांच्या ह्या व्रतभंगावर जणू ताण करण्यासाठी एक साध्वी बाईंनी पाच मिनिटांपूर्वी आपण काही खाणार नाही म्हणून केलेली भीष्मप्रतिज्ञा पार विसरुन पोळ्या आणि गचक्याची उसळ जी खात बसली, ती उठते कशाला. तीन तासांतच इतकी भूक.


"असा हा दिवस आनंदात गेला. सूर्याला दुसरे बालपण येऊ लागले. दिवसा ढवळ्या आम्हाला घरी पोचावयाचे होते. वृद्ध दूरदर्शी असतात. म्हणून संतुजीराव आपला मगदूर ओळखून आगावू निघाले. पावसाळ्यात जसे एकामागून एक महापूर येतात. त्याप्रमाणे आजची दोन जेवणे व एक चहा ह्यांचा हल्ला झाल्यामुळे उपासना करण्याचा विचार वाहून कोठे गेला कोण जाणे. कृतयुगात लोक खाऊन पिऊन सुखी होते. तेव्हा धर्म नव्हता. त्याचप्रमाणे आम्ही आज खाऊन पिऊन सुखी आणि निष्पाप झालो. मग उपासनेची गरज कोठे राहिली. कलियुगात धर्माच्या परिषदा भरू लागल्या आहेत. आम्हीही परत गावात गेल्यावर धर्माचे स्तोम माजवू, हा काही विचार मनात येऊन नाखुषीने आम्ही मळ्यातून निघालो. दिवे लावण्यास घरी आलो."


मंडळाचे काम अन्य ठिकाणीही बाहेरगावी सुरु व्हावे यासाठी अण्णासाहेब शिंदे यांनी १९२७ च्या जुलैमध्ये व त्यानंतर कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बेळगाव, निपाणी, गडहिंग्लज ह्या ठिकाणी सफरी काढल्या. त्यांच्याबरोबर काही ठिकाणी कृ. गो. पाताडे, गणपतराव शिंदे व बाबुराव जगताप हे गेले होते. कोल्हापूर येथ कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना १९२८ मध्ये होऊन डॉ. कृष्णाबाई केळवकर, गोविंदराव सासने, भगवंतराव बारटक्के ह्यांनी काही वर्षे चिकाटीने काम चालविले.


कौटुंबिक उपासना मंडळाने कार्य १९३० सालापर्यंत जोमाने चालले होते. १९३० सालच्या मे महिन्यात अण्णासाहेब शिंदे यांना कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे सहा महिन्यांची तरुंगवासाची शिक्षा झाली. त्यामुळे मंडळाचे काही उपक्रम बंद पडले. तरीही साप्ताहिक उपासना, पाहुण्यांचे स्वागत, वनोपासना वगैरे उपक्रम चालू राहिले. १९३६ साली अण्णासाहेब शिंदे वेताळपेठेतील भाड्याचे घर सोडून शिवाजीनगर येथील स्वत:च्या 'रामविहार' ह्या घरामध्ये राहावयास आले. त्या वेळी कौटुंबिक उपासना मंडळाची शिवाजीनगर शाखा उघडण्यात आली. प्रारंभी वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपॉल वि. के. जोग यांच्या घरी उपासना होत असत. ते कॉलेजच्या परिसरात राहायला गेल्यानंतर "रामविहार' ह्या अण्णासाहेबांच्या राहत्या घरामध्ये उपासना होऊ लागल्या. अण्णासाहेबांचे आजारपण आणि वार्धक्य यांमुळे कौटुंबिक उपासना मंडळाचे कार्य १९४० नंतर मंदावले.

  1. ऍमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषद
  2. अहल्याश्रमाची पूर्व तयारी
  3. अपूर्व स्नेहसंमेलन
  4. अखेरचे दिवस
  • 124
  • 125
  • 126
  • 127
  • 128
  • 129
  • 130
  • 131
  • 132
  • 133
Page 129 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी