1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

बंदिस्त बळीराजा

आपल्या मुलाबाळांच्या प्राथमिक गरजा भागविण्याइतके उत्पन्न जो स्वतः शेतीमध्ये मशागत करून मिळविण्याचा प्रयत्न करतो तो शेतकरी, तोच बळीराजा.
भांडवलदार शेतक-यांच्या छातीवर बसलेला कायमचा दावेदार, शेतकरी व कामगार हे खरे राष्ट्राचे धारक व चालक. वास्तविक भांडवलदाराने शेतक-यांच्या आणि कामगारांच्या मांडीखाली तट्टासारखे चालले पाहिजे. कारण ह्या तट्टाची चंदी शेतकरी कामगारांच्या हातात असते. आणि “ज्याची चंदी त्याचाच लगाम असावयास हवा;” पण घडते उलटे ! तट्टाच्या हातातच मालकाचा लगाम !! तट्टू जिकडे जाईल तिकडे ससेहोलपट शेतकरी कामगारांची !!!
जमीन मालकीहक्क कल्पना ब्रिटिश काळात जमिनीचे अति लहान तुकड्यात विखुरण्यास कारणीभूत झालेली आहे. हे लहान तुकडे एकत्र केले पाहिजेत. त्याशिवाय कृषि-उत्पादनक्षमता वाढणार नाही. म्हणून १९२८ साली जसे तुकडेबंदी बिल आणले होते तशी आजही तुकडेजोड कायद्याची कार्यवाही निरनिराळी राज्ये करताहेत. जमीन मालकी व्यक्तीची वा व्यक्तीसमूहाची असूच शकत नाही. जमीन ही सर्व समाजाच्या सर्वकालीन समाईक मालकी हक्काची आहे. एक आपद् धर्म म्हणून राज्यसत्ता निरनिराळ्या व्यक्तीला मालकीहक्काचे वितरण करते. जमीन लहान असल्याने उत्पादनवाढीस अडथळा येतो. असे भांडवलदार कट (Clique) करून ओरड करतात. त्यांचे ओरडणे वजनदार असल्याने, सामाजिक न्यायाची पायमल्ली होत असताना सुद्धा स्वीकारली जाते. शेतकरी असंघटित असल्याने व तो असंघटित राहील ह्या दृष्टीने भांडवलदारांनी केलेल्या क्लृप्त्या यशस्वी होत राहातात. त्यातल्या त्यात गोरगरीबांना नाना त-हेच्या व्यसनात गुरफटण्यात आनंद वाटत राहील अशी परिस्थिती निर्माण करण्यात भांडवलदार यशस्वी होतात. शेतक-यांची दानत (फूट नोट- रयत शिक्षण पत्रिका, सातारा १९७३, [ता. २४ ऑक्टोबर १९३७ रयत शिक्षण संस्था, आजीव सेवक शपथविधीचे वेळी काढलेले उद्गार.]) बिघडविली जाते. आणि त्यामुळे साधनसामग्रीचे समान वाटप म्हणजे गरिबीचे वाटप असे त्यांना दृष्टोत्पत्तीस आणता येते.
संन्याशाच्या लग्नाची जशी शेंडीपासून तयारी तशी हीनदीन शेतक-यांच्या व अस्पृश्यांच्या उन्नतीची त्याच्या मनापासून तयारी करावयास हवी, त्यासाठी त्यांना शिक्षण, सामाजिक शिक्षण मिळावयास हवे.
महार व मराठे हे चुलतबंधू आहेत. त्यातही महार थोरल्या घरचे आहेत. ही भावना निर्माण झाली पाहिजे. ह्यालाच लोककल्याण म्हणावयाचे, लोककल्याण म्हणजे शीलाची, अंतःकरणाची पालट, सनदेची अदलाबदल नव्हे. प्रत्येकाने ती कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर “ज्याचे त्याने अनहित केले तेथे कोणाचे बा (काय) गेले ?” अशी गत व्हायची.
सामाजिक एकी निर्माण झाली की, अर्थगाड्याच्या बैलाची शिंग-दोरी नेहमी खेचता येते. शेतक-यांचा राजकारणावर, व्यापारावर ताबा राहू शकतो. विकासाच्या परिपोषक संस्था निर्माण होतात. एकमेकांत सहकार्याची भावना निर्माण होते.
खेडे-शहर कारखानदारी-शेती हा भेद रहाणार नाही. ह्यासाठी वाहतुकीच्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला पाहिजे. सार्वत्रिक शिक्षण व वाहतुकीची साधने जितकी वाढतील तेवढी सर्वसामान्यांची जागृती वाढेल. सर्वसामान्यांच्या जागृती वाढीबरोबर भांडवलशाहीचे चिरंजीवीत्व लयास जाईल. त्याचबरोबर स्वराज्य मिळेल. स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात होईल.

सामाजिक त्रिविधता “तिरपगडा”
देशाचा त्रिफळा होऊ नये. सर्व हिंदू समाज हा एक साप आहे. ह्या सापाचे विषारी तोंड म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजणा-या अल्पसंख्य पण पुढारलेल्या जातीजमाती. समाजस्वरूपी ह्या सापाचा मधला भाग म्हणजे, सुस्त व बेडूक गिळालेला मधला बहुजनसमाज ! ह्यात मराठे व तत्सम शेतकरी, कारागीर, बहुजनता समावेशित होते; व शेपटी म्हणजे मागे अस्पृश्य मानलेली व आता हरिजन-बौद्ध ह्या नावाने ओळखिली जाणारी तळातील अल्पसंख्य ग्रामीण मोल-मजूर व दास मानलेले हे लोक होत. ही दास-प्रथा ह्या देशात जन्मजात व नैसर्गिक ठरली. ती जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ह्या न्यायाने ह्या अस्पृश्यतेच्या रूढीची भयानकता त्यांची त्यांनाच जास्ती ठाऊक असणे शक्य आहे. आजही भारतात ठिकठिकाणी अस्पृश्य मानलेल्या लोकांवर अन्याय होत असल्याची वृत्ते सर्व प्रांतांतून अधूनमधून वरचेवर येतात !
भरतखंड हे खेड्यांचा फार मोठा समुदाय व त्यातील जनता ह्यांनीच बनलेले आहे. आणि ह्या अफाट लोकसमुदायाची पुनर्रचना करण्याचा बिकट प्रश्न विचारात घेता नुसत्या त्याच्या शिवेपर्यंतही समाज सुधारणेचा पल्ला पोचलेला नाही. आतापर्यंतचा समाजसुधारक हा शहरापुरताच मर्यादित असून त्याचे कार्य फुरसतीच्या वेळातच झालेले आहे... अशीच स्थिती जोपर्यंत राहील तोपर्यंत बहुजन समाजावर ह्या प्रयत्नाचा म्हणण्यासारखा परिणाम घडण्याची आशा नाही.
भारतवासीयांनो, स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरून हा घातकी, पातकी आत्मबहिष्कार नाहीसा करा. आपल्या ह्या चमत्कारिक देशात जातिभेदरूपी सहस्त्रलिंग म्हणजे दुहीच्या हजारो खुणा किंवा लहरी दाखविणारा जबरदस्त तलाव आहे. आज हजारो वर्षे ह्यातले पाणी स्थिर आहे; पण त्याच्या तळाशी गाळामध्ये असंख्य नीच मानिलेले जातिबांधव जिवंत असे वंशपरंपरेने रुतलेले आहेत. एकंदर हिंदुसमूहाकडे पाहिले असता इतका विचित्रपणा व विस्कळीतपणा दिसून येतो की, कोणत्याही दृष्टीने एका विवक्षित कारणासाठी ह्या जनसमूहाचे नीटसे वर्गीकरण करू म्हटले असता जवळ जवळ अशक्यच वाटते.
इंग्रजी राज्यात ख्रिस्ती धर्मात, हिंदू लोकांची धर्मांतरे होत राहिल्यास राष्ट्रीय दृष्ट्या आता जी हिंदु-मुसलमानांची दुही आहे तिच्याऐवजी हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती असा सामाजिक तिरपगडा होणार आणि तो राष्ट्रीय ऐक्याला बाधक झाल्याशिवाय राहणार नाही !


नमुनेदार वसतिगृह
ता. २४ ऑक्टोबर १९३७, रविवार दिवशी, सातारा येथील श्री छत्रपती शाहू वसतिगृहाचा द्वादश वार्षिकोत्सवाचा समारंभ होता. श्री. भाऊराव पायगोंडा पाटील नावाच्या एका विचित्र जैन गृहस्थानी हे गृह उघडले. तेव्हा त्यात एकच अस्पृश्य विद्यार्थी होता. जगद्वंद्य महात्मा गांधी ह्यांच्या हस्ते ह्या गृहाचा नामकरणविधी होऊन, सध्या त्यात १९५ विद्यार्थी आहेत. (पैकी १२ मुसलमान, ९ जैन, ८७ अस्पृश्य आणि ८७ मराठे आणि तत्सम जातीचे आहेत. सातारा येथील राजवाड्यामधील सुमारे १० एकरांची शेतकीची बाग, धनीणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे. ती भाऊरावांनी खंडाने घेतली आहे. गगनचुंबी वृक्ष, सुंदर काळी सुपीक जमीन, मोटा लावलेली मुबलक पाण्याची विहीर अशा ऐश्वर्यात भाऊरावांनी आपले १९५ विद्यार्थी ठेवले आहेत. प्रथम स्वतःचे होते नव्हते ते ८-१० हजार रुपये खर्च करून झाल्यावर मुलांच्या शिष्यवृत्त्या, त्यांचे श्रम व बाहेरचे पैसे ह्यांवरच भाऊराव हे शेत-घर चालवीत आहेत. आजपर्यंत बाहेरून (सरकारी ग्रँट धरून) सुमारे २० हजार रुपये मिळाले आहेत. पण मुलांच्या प्रत्यक्ष पोटगीवर एक पैही खर्चण्यात आली नाही. कारण हरामाचे खाऊन कोणीही पुस्तकी विद्या शिकू नये अशी चालकाची इच्छा आहे. म्हणून भाडे, फी सादिलवार वगैरे खर्चाकरिताच बाहेरच्या मदतीचा व्यर्थ व्यय झालेला आहे. मुलांनी मग ते क्षत्रिय कुलावंतंस असोत की मांग, महार असोत, फुकटचे असोत की, ७-८ रु. फी कदाचित देवोत, सर्वांनी बंधुभावाने वागून सारखे राबून खाल्ले पाहिजे असा निष्ठूर दंडक आहे. त्यामुळे सर्व शागीर्द तेजस्वी, ताजे, आज्ञाधारक व ध्येयवादी आहेत. पोटपोषा एकही नाही. मग चंगी भंगी कोठून असणार ? अशासाठी पुण्यामुंबईतील कॉलेजची वसतिगृहे पाहावीत.
ह्या बारा वर्षाच्या उत्सवात एक स्मरणीय विधी झाला. सभा, खेळांच्या शर्यती, जेवण, नाटक, मिनिस्टरचा सत्कार, ही मामूली सोंगे झाली, त्यात विशेष नाही. ह्या घरातून पास झालेले १०-१५ पदवीधर (त्यात काही एलएल. बी. झालेले, काही एम. ए., बी. इ. होऊ घातलेले हजर होते.) त्याचेही मला विशेष वाटले नाही. पण त्यांतील १५ तरुणांचा आपले भावी आयुष्य भाऊरावांच्या ह्या व अशाच इतर स्वावलंबी शिक्षण संस्थांस वाहून घेण्याचा गंभीर शपथविधी झाला, हाच विशेष होय. हा स्फूर्तिदायक विधी मी व माझी बहीण श्रीमती जनक्का ह्यांचेसमोर व्हावा असा ह्या गृहातील सर्व विद्यार्थ्यांनी अगदी आग्रह धरला की त्यापुढे आम्हांला मान वाकवावीच लागली. वरील १५ पैकी २ मुसलमान, १ जैन, ५ मराठे, ४ अस्पृश्य, २ साळी व १ धनगर असे होते. त्यांतील बहुतेक ग्रॅज्युएटस् होते. त्यांत मांग जातीतील एक विद्यार्थी श्री. भिंगारदेवे हे संस्कृत घेऊन ऑनर्समध्ये आलेले आहेत. ह्या सर्वांनी आमचे पुढे जाहीर रंगभूमीवर उभे राहून शपथ घेण्यापूर्वी श्री. भाऊरावांनी थोडक्यात त्यांची बालचरित्रे सांगितली. ती रोमांचकारी होती.
श्री. भाऊरावांनी अशी घरे मुंबई, पुणे, निपाणी वगैरे ठिकाणी उघडली आहेत. डिप्रेस्ड क्लास मिशनचे वसतिगृह आम्ही भाऊरावांनाच बहाल केले आहे. पण ते नमुनेदार कधी होईल ते देवालाच माहीत.
पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या पश्चिम कुंपणाला लागून प्लेग कँपच्या पुणे शहर म्यु. च्या पत्र्याच्या मोडक्या ओसाड झोपड्या आहेत. त्यात भाऊरावांनी आपल्या सुमारे २५ कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह काढले आहे. त्यांना प्रत्येकी पोटाला खर्च दरमहा ३-१२-० रुपयांपेक्षा जास्त येत नाही. हा खर्च देखील त्यांच्या सातारच्या बोर्डिंगच्या मानाने एक रुपया अधिकच आहे. ऑनर्स ग्रॅज्यूएटचे हे ऐश्वर्य की, म्यु. ने ह्यांना कंदील की, नुसते पाणीही अजून पुरविले नाही. ह्यात ब्राह्मणांखेरीज इतर सर्व जातींचे विद्यार्थी आहेत. त्यांत बरेचसे हरिजन आहेत. ब्राह्मणांनाही घेण्याची भाऊरावांची तयारी आहे. पण ब्राह्मणांची तयारी दिसत नाही. त्यांतील विद्यार्थी बिनबोभाट मोठमोठ्या परीक्षेत वरचे नंबर पटकावितात. एका माजी विद्यार्थ्याने तर चालू साली पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये फेलोशिप मिळविली आहे. आंघोळीपुरते फर्ग्यूसन कॉलेजच्या आवारात ते जातात व येतात व येताना पिण्याचे पाणी आणतात. कित्येकांच्या दारांना कड्या कुलपेही नसतात. डर तो पिछे रहा, त्याबाबत नजीकच्या कॉलेज वसतिगृहात डोकावा म्हणजे सोन्याचा धूर निघत असलेला आपणास दिसेल. इतके असूनही पुण्यातील संतमहंतांना श्री. भाऊरावांचे युनियन बोर्डिंग हाऊस कोठे आहे हे माहीत नाही. मग ते कसे चालत असेल ह्याची चौकशी कोण करणार ? 
पुण्याच्या शुक्रवार पेठेत श्री. शिवाजी हायस्कूलला लागून श्री. बाबूराव जगताप ह्यांनी एक कौटुंबिक उपासना मंडळ चालविले आहे. त्यात त्यांच्या हायस्कूलच्या वसतिगृहाचे ४० विद्यार्थी दर रविवारी जमत असतात. गेल्या रविवारी वरील युनियन बोर्डिंग हाऊसचे सर्व विद्यार्थी उपासनेस हजर होते. ततप्रसंगी पुणे येथील अहल्याश्रमाच्या डी. सी. मिशन वसतीगृहाचे अधिकारीही हजर होते. एकंदर ६०-७५ जमाव होता. येत्या २५ तारखेला नाताळचे दिवशी ख्रिस्त जयंतीनिमित्त वनोपासनेसाठी वरील तिन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांनी कौटुंबीय उपासना मंडळाच्या ह्या उपासनेस हजर रहाण्याचे ठरविले आहे. येणेप्रमाणे ह्या तिन्ही वसतिगृहांतील तरुणांना एकत्र आणून पद्धतशीर वळण लावण्याचा विचार आहे. काय होते ते पाहू.

बंगालचीसफर

ब्राह्मधर्माची परिषद १८८९ साली प्रथम  मुंबईस भरल्यापासून एक दोन वर्षे खेरीज करून जरी सालोसाल दर काँग्रेसच्या वेळी भरत आली आहे, तरी तिजसंबंधी माहिती पुष्कळांना झालेली नव्हती. केवळ काँग्रेसकरिता आलेलेच लोक काय ते जमत व त्यांच्याही आठवणीत ती फार दिवस टिकत नसे. पण मुंबईस भरलेल्या १९०४ च्या परिषदेपासून हिची प्रसिद्धी होऊ लागली. ती काशी येथील परवाच्या परिषदेमुळे तर बरीच झाली. ह्या परिषदेत बंगाल्यातील दोन्ही पक्षांची परस्पर बरीच सहानुभूती वाढली व शिवाय निरनिराळ्या प्रांतांतील ब्राह्मांचा बराच स्नेह झाला. अशा हितकारक परिषदेची खबर अधिक पसरावी. मुंबईकडील कामाची हकीकत इकडच्या दूरदूरच्या समाजास कळवावी, (कारण प्रार्थनासमाज व आर्यसमाज यांतीलही भेद न जाणणारे काही ब्राह्म इकडे भेटले) काही प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करून घ्यावी, मुख्य मुख्य समाज समक्ष पहावे, शिवाय सर्व समाजांची एक डिरेक्टरी करावयाची आहे, त्याअर्थी काही माहिती स्वत: मिळवावी वगैरे हेतूने मी बंगाल व आसाम प्रांतांत फिरतीवर निघालो. ता. २ जानेवारी रात्री ११ वाजता मी......

बांकोपूर

बिहार प्रांतातील मुख्य शहर बांकीपूर येथे आलो. बांकीपूर, पाटणा व दिनापूर ही मोठमोठी शहरे एकमेकांला अगदी लगूनच भागीरथीच्या काठी आहेत. हा देश जरी बहारी (हिंदुस्थानी) लोकांचा, तरी येथे बंगाली लोकांची बरीच वस्ती आहे, व सरकारी नोक-या पटकावण्याच्या व विद्याव्यासंगाच्याबाबतीत ह्यांचा पुष्कळच पुढाकार आहे. अर्थात एतद्देशीय बहा-यास हे आवडत नाही, हे बंगाली जाणून आहेत. वायव्येकडील प्रांतात ज्याप्रमाणे एकही ब्राह्म एतद्देशीय सापडणे कठीण, त्याप्रमाणे सबंध बहार प्रांतातही बहारी ब्राह्मांची संख्या एकाच हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी आहे. पण ही उणीव केवळ ब्राह्मसमाजाचीच आहे असे नव्हे. स्त्रीशिक्षणासारख्या सर्वमान्य सामाजिक सुधारणेतही इकडे महागाई फार आहे. बांकीपूर येथे एक मुलींचे खासगी हायस्कूल आहे; ते मूळ बंगाल्यांनीच काढले. हल्ली एकंदर सुमारे १०० मुलींपैकी बहारी मुली ४ च आहेत. बाकीच्या बंगाली मुलींपैकी २४ ब्राह्मांच्या आहेत. सर्व स्त्री व पुरूषशिक्षक ब्राह्मच आहेत. ह्या शाळेची व्यवस्था बहुतेक येथील प्रमुख ब्राह्मांच्याच हाती आहे. ह्याचे श्रेय येथील वृद्ध पेन्शनर आचार्य बाबू प्रखाशचंद्र राय व विशेषेकरून त्यांची परलोकवासी पत्नी अघोरकामिनी ह्यांजकडे आहे. मध्ये एकदा ही शाळा मोडकळीस आली असता अघोरकामिनीने सर्व व्यवस्था आपल्याकडे घेतली व शाळा हायस्कूलच्या दर्जास आणून सोडिली. ब्राह्मसमाजाच्या दृष्टीने पाहता कलकत्त्याच्या खाली डाक्का व त्याचे खाली बांकीपूरचाच नंबर लागतो. येथे जरी दोन पक्षांचे हल्ली दोन समाज आहेत तरी परस्पर बरीच सहानुभूती आहे व ती वाढत्या कलेवर आहे. तथापि अगदीच भेद मिटून पूर्ण ऐक्य होण्याची नुसती आशादेखील तूर्त दिसत नाही. मात्र दोन्ही पक्षांकडून प्रामाणिकपणे यत्न होत आहे.

बांकीपूर ब्राह्मसमाज

हा नवविधान पक्षाचा आहे. हा सन १८६६ मे, ता. २४ दिवशी स्थापण्यात आला. ह्यापूर्वी एकदा केशवचंद्र ह्यांनी येथे येऊन एका व्याख्यानाने सर्व प्रदेश दणाणून सोडला असे सांगतात. हल्ली ह्या समाजातील उपासकांची संख्या स्त्रीपुरूष व मोठी मुले मिळून सुमारे ५० आहे. शिवाय हितचिंतक. हल्ली जुने मंदिर पाडून नवीन बांधण्याचे काम चालू आहे. अघोरकामिनीच्या परिश्रमाने स्थापन झालेल्या दोन संस्था हल्ली तिच्या नावाने चालू आहेत. अघोर नारी समिती नावाची सभा स्त्रियांच्या उन्नतीसाठी व इतर परोपकाराची कामे करीत आहे. अघोरपरिवार नावाचे सुमारे १०-१२ लहान मुलींचे बोर्डिंग बाबू गौरीप्रसाद मुजुमदार व त्यांची पत्नी ह्यांचे व्यवस्थेखाली आहे. शिवाय कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता एक बोर्डिंग आहे. त्यात हल्ली ११ विद्यार्थी राहत आहेत. हे जरी ब्राह्म नाहीत तरी त्यांस ब्राह्मधर्माचेच वळण लागत आहे.

बांकीपूर ब्राह्म काँग्रिगेशन

हे साधारण समाजपक्षाचे आहे. सन १८९६ चे सुमारास कलकत्त्याच्या साधनाश्रमातून भाई प्रकाशदेव, सुंदरसिंग, गुरूदास चक्रवर्ती, सतीशचंद्र चक्रवर्ती एम. ए. व श्रीरंग बिहारीलाल एम. ए. असे पाचजण केवळ ईश्वरावर भरंवसा ठेवून धर्मप्रचारार्थ निघाले ते वाटेत बहारप्रांती आरा येथे उतरले व तेथे त्यांनी एक साधनाश्रम स्थापिला. सन १८९६, ऑगस्ट महिन्यात तो आश्रम आरा येथून बांकीपूर येथे नेण्यात आला. तेव्हापासून ह्या समाजाची सुरूवात झाली. सुंदरसिंग परलोकी गेले, भाई प्रकाशदेव ह्यांनी लाहोरास ठाणे दिले व मागे राहिलेल्या तिघांनी जिवापाड श्रम करून नावजण्यासारखी कामे उभारली आहेत. ह्यांचे स्वत:चे अद्यापि मंदिर नाही. प्रचारक गुरूदास चक्रवर्ती ह्यांचे घरीच समाज दर रविवारी सायंकाळी भरतो. हल्ली ब्राह्मउपासकांची संख्या स्त्रिया, पुरूष व मुले मिळून एकंदर ६० आहे.

राममोहन राय सेमिनरी ही १८९७ जानेवारी ता. १ रोजी स्थापिली. ह्या शहरी हे एक पहिल्या नंबरचे हायस्कूल झाले आहे. लोक व सरकारी अधिकारी ह्य दोघांच्याही आदरास ते पात्र झाले आहे. शाळेस क भक्कम व पुरेशी इमारत स्वत:च्या मालकीची आहे व तिच्याभोवती विस्तीर्ण पटांगण व कंपौंड आहे. मुलांची संख्या १०९ आहे. शाळेतच ब्राह्ममुलांकरिता एक बोर्डिंग आहे. प्लेगमुळे बोर्डिंगात मुलांची संख्या फार कमी झाली आहे. हल्ली ६ मुले आहेत, पैकी २ च ब्राह्म आहेत. पण बाकीच्या चौघांस पूर्ण रीतीने ब्राह्म वळण लावण्याचे अटीवरच घेण्यात आले आहे. ह्या शाळेची इमारत विकत घेण्याचे बाबतीत बरेच कर्ज झाले होते ते शेठ दामोदरदास गोवर्धनदास ह्यांच्या उदार देणगीने फेडण्यात आले. ह्या बाबतीत चालक मंडळीनी फार फार आभार प्रदर्शित केले. ह्याशिवाय एक स्त्रियांची सभा. एक आदित्यवारचा लहान मुलांचा वर्ग आणि तरूण ब्राह्मगण अशा संस्था आहेत. गरीब लोकांकरिता एक रात्रीची शाळा आहे. दुष्काळात व विशेषेकरून प्लेगमध्ये आश्रमाने फार मेहनत घेतल्यामुळे प्रचारक मंडळीचे बरेच वजन आहे. ह्याशिवाय बहारी यंग मेनस् इन्टिट्यूट नावाची संस्था ह्यांच्याच हाताखाली आहे.

ता. ३ रोजी अघोरपरिवारात उपासना चालविली. ता. ४ रोजी सायंकाळी बाबू प्रकाशचंद्र राय ह्यांचे घरी दोन्ही पक्षांची प्रमुख मंडळी जमली. मी प्रथम मुंबईकडची सर्व हकीकत सांगितली. नंतर दोन पक्षांचे एकत्र कार्य कसे होईल ह्याविषयी संभाषण चालले. प्रकाशचंद्र राय हे जरी पक्के नवविधानी आहेत तरी ह्यांचा दोघांसही एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. शेवटी उत्सवात एकमेकांनी कार्यक्रम मिळून ठरवावा व एकमेकांच्या उपासनेस वगैरे पाळीपाळीने जावे असे ठरले. ता. ५ रोजी दोहोंकडील स्त्रियांची सभा मि. दास बॅरिस्टर ह्यांचे घरी जमली होती. पोस्टल मिशन, डोमेस्टिक् मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामे स्त्रियांनी कशी करावयाची आहेत ह्याविषयी बोललो. मुलींनादेखील माझे इंग्रजी भाषण कळले. हेमंतकुमरी चौधरी सिलहतहून कॉन्फरन्सला आलेल्या डेलिगेटही त्यावेळी हजर होत्या. त्यांनी हिंदीत भाषण केले.

मोंगीर

ता. ६ रोजी दोनप्रहरी येते आलो. भागिरथीचे तटी हे मोठे रमणीय स्थान आहे. विशेषेकरून जुन्या किल्ल्यातील भाग मनोहर आहे. इंग्रज पाठलाग करीत असता मीरकाशीम ह्यांनी येथेच शेवटचे ठाणे दिले होते. पुराणातील राजा दानशूर कर्ण ह्याची दान देण्यास बसण्याची जागा गंगेच्या तीरावर एका लहानशा उंचवट्यावर अद्यापि दाखविण्यात येते. हल्ली ह्या ठिकाणी बेद रामपूरच्या जमीनदाराने सुंदर महाल ‘कर्णचौडा’ बांधला आहे. येथून पुढे गंगाजीचे विस्तीर्ण व बाकदार पात्र व माठोमोंगीर गावाभोवतालच्या टेकड्यांची अर्धगोल रांग व त्यावरची दूर क्षितिजात दिसणारी सुपारीची झाडे ह्या सर्वांचा एकंदर देखावा प्रेक्षकांचे म दंग करून टाकतो. एका फ्रेंट प्रवाशाने तर ह्या देखाव्यास अगदी अप्रतिम असे शिफारसपत्र दिल्याचे ऐकण्यात आले.

असो. ब्राह्म यात्रेकरूंस ह्या स्थळाचे महत्त्व असे सांगण्यात येते की, ब्राह्मसमाजात भक्तिसंप्रदाय जो सुरू झाला तो मूळ ह्या ठिकाणी. सन १८६८ च्या सुमारास इ. आय. रेल्वेचे ऑडिट ऑफिस जेव्हा कलकत्त्याहून मोंगीरजवळ जमलापूर येथे आणिले तेव्हा त्यातील ४-५ ब्राह्म कारकून मोंगीर येथे राहू लागले. पुढे त्यांच्या श्रमाने येथील समाज स्थापण्यात आला व नंतर १८७२ त हल्लीचे मंदिर बांधण्यात आले. मंदिरात एकदा काही वैष्णव मंडळीस भजनास बोलाविले होते. त्यापैकी एका चांडाळ जातीच्या भक्ताने इतके प्रेमळ व आवेशयुक्त भजन केले की त्याचा मंडळीवर विलक्षण परिणाम झाला. पुढे साधू अघोरनाथ ब्राह्मप्रचारक ह्यांचे भजनाविषयी प्रेम अधिकाधिक वाढून शेवटी स्वत: केशवचंद्रसेन एकदा येथे असता त्यांच्यावरही भजनाचा परिणाम घडला व येथे समाजाचे कार्य बरेच वाढले. पुढे हा भक्तीचा वेग जरी सर्व ब्राह्मसमाजात पसरला आणि मोंगीर समाजात एका काळी ४०-५० सभासद होते तरी हल्लीची येथली ओसाड व दीनवाणी स्थिती पाहून अंत:करण गहिवरते व मानवी मनाची अस्थिरता पाहून विस्मयते. मंदिरापुढील पटांगणात केशवचंद्रसेन, साधू अघोरनाथ, दीनानाथ चक्रवर्ती प्रचारक यांच्या तीन समाधी मध्यभागी एका चौथ-यावर बांधल्या आहेत. मंदिराकडे पाहून व इतिहास ऐकून मनास जी उदासीनता प्राप्त होते तिच्याच जणू ह्या तीन दृश्य मूर्ती.

पुढे लवकरच कर्ताभजा मंडळीचा कोणी एक पुरूष ह्या गावी आला. इकडे ह्या नावाची एक ईश्वराच्या कर्तृत्वगुणाची उपासक मंडळी आहे. ह्यांचे लक्षण जवळजवळ शाक्तमार्गीयांप्रमाणेच असावेसे वाटते. केवळ मनोविकारालाच वश होऊन समाजात आलेली काही नादलुब्ध मंडळी वरील पुरूषाच्या नादी लागली. सुमारे १८८० साली कृष्ण प्रसन्नसेन नावाच्या समाजातील एका हितचिंतकाने सनातनधर्म मंडळीची नवीनच एक ध्वजा उभारली. ह्या प्रकारे मंडळी कमी होता होता शेवटी मध्ये ऑडिट ऑफिसही पुन: पूर्वस्थळी गेले. १९०२ त ह्या गावी आर्यसमाजाची स्थापना झाली पण तोही नीट चालत नाही. हल्ली मंदिरात फार तर ३-४ जण उपासनेस जमतात. बागची बावू (द्वारकानाथ बागची) नावाचे एक वृद्ध गृहस्थ मंदिरातच असतात. कुचबिहारच्या महाराजांकडून त्यास दरमहा ४ रू. मिळतात. आपल्या पित्याच्या समाधीपुढे दिवा लावण्याकरिता म्हणून महाराणी दरमहा ३ रू. देते.

येथील कॉलेजातील एक तरूण प्रोफेसर बाबू सुरेशचंद्र राय हे सभासद आहेत व दुसरे एक बोर्डिंग सुपरिटेंडेंट हितचिंतक आहेत. त्यांच्याशी व इतर काही मंडळीशी दोनप्रहरी संभाषण झाले व येथील तरूण विद्यार्थ्यांकरिता काही धार्मिक संस्था काढावी असे ठरले. यानंतर

भागलपूर

येथे ता. ७ रोजी आदित्यवारी ७|| वाजता पोहोचलो. एकांतस्थळी एक लहानसे पण सुंदर मंदिर आहे. उपासना संपत आली होती. स्त्रिया-पुरूष मिळून उपासक १०-१२ होते. दुसरे दिवशी सकाळी आचार्य हरीसुंदर बोस ह्यांचे घरी केशवचंद्रसेन ह्यांच्या पुण्यतिथीसंबंधी उपासना त्यांनीच चालविली. येथील प्रमुख लोकांचा विशेष कल जरी नवविधान पक्षाकडे आहे तथापि मंत्री बावू निवारणचंद्र मुकरजी हे फार समजूतदार व वजनदार असल्याने समाजाचे एकंदर धोरण अगदी ति-हाईतपणाचे आहे. आनुष्ठानिक ब्राह्म उपासकांची एकंदर संख्या सुमारे ६० व इतर ५ आहे.

हा समाज ता. २२ माहे फेब्रुवारी सन १८६४ रोजी, विशेषेकरून बाबू ब्रजकृष्ण बसू व  नवकुमार राय ह्यांच्या प्रयत्नाने व प. वा. प्रतापचंद्र मुझुमदार ह्यांच्या सल्ल्याने स्थापित झाला. राजा शिवचंद्र बानर्जी नावाच्या एका अत्यंत आस्थेवाईक हितचिंतकाने स्वत: सर्व खर्च सोसून मंदिर बांधविले ते केशवचंद्र ह्यांचे हस्ते ता. २२ फेब्रुवारी १८८० रोजी उघडण्यात आले. ह्याचे पूर्वी सन १८७८ साली ह्या जागेला लागूनच एक भली मोठी जागा विकत घेऊन त्यात ५ ब्राह्म कुटुंबांनी आपली राहण्याची मोठमोठी घरे बांधली.

समाजात थोडी का होईनात पण बडीबडी प्रमुख व वृद्ध मंडळी आहेत. पण उपासनेशिवाय दुसरे काही काम होत नाही. संगत सभा, बायकांची सभा, तरूण ब्राह्मगण, मुलांसाठी शाळा, सामाजिक मेळे वगैरे बरेच सुखसोहळे उपभोगून हा समाज आता शांत झाला आहे. ता. ९ रोजी सायंकाळी सुमारे ५-६ तरूण पदवीधर ब्राह्म मंडळीपुढे मुंबईच्या तरूण ब्राह्मगणाचे छापील नियम वाचून दाखविले व विचाराअंती येथील पूर्वीची तरूणांची संस्था पुन: सुरू करण्याचे ठरले. ह्यानंतर रात्री ७ वाजता बाबू निवारणचंद्र मुकर्जी ह्यांचे घरी प्रमुख मंडळी जमली. त्यापुढे मी मुंबईकडील कामाची हकीकत सांगितली. बहुतेकांस ती नवीनच असल्याने ऐकून फार समाधान झाले व दोघांनी तर वारंवार अशी इच्छा प्रदर्शित केली की मुंबई व बंगालप्रांतातील ब्राह्मांचे अधिक निकट संबंध जुळविणे फार इष्ट आहे व त्याकरिता परस्पर विवाह-व्हवहार करणे, अवश्य आहे. मी म्हटले की, निरनिराळ्या प्रांतांतील ऐपतदार ब्राह्म गृहस्थांनी सहकुटुंब निरनिराळ्या प्रांतांत प्रवास केल्याविना वरील विवाह-व्यवहार कधीही शक्य होणार नाही आणि अशा प्रवासामुळे सर्वपक्षी अत्यंत हित होणार आहे. नवविधान व साधारण समाज ह्यांतील दुहीसंबंधाने मुंबईकडील समाजाचे अगदी ति-हाईतपणाचे वर्तन पाहून इकडील पुष्कळ ठिकाणच्या दोहोंपक्षांच्या कट्ट्या अभइमान्यांसही बरे वाटते हे मोठे सुचिन्ह आहे.

ता. १० सकाळी मी कुचबिहारकडे निघालो. भागलपुराजवळ वाळवंट व प्रवाह मिळून गंगेचे ७ मैल अफाट पात्र आहे. ते आगगाडी व आगबोटीतून ओलांडले. पुढे दोनप्रहरी

काठीहार

म्हणून रेल्वेचे जंक्शन लागले; तेथे माझ्या गाडीला बराच अवकाश होता. ह्या ठिकाणी मागे एक समाज होता असे नुसते भागलपुरास ऐकले होते. त्यासंबंधी काही शोध लागल्यास घ्यावा म्हणून सामान स्टेशनावर ठेवून गावात गेलो. ह्या गावात रेल्वे जंक्शनमुळेच महत्त्व आले असल्यामुळे चहूंकडे बकाली वस्तीच होती. बरीच चौकशी केल्यावर मंदिराचा पत्ता लागला. सुमारे २५ फूट रूंद चांगली पक्की चुनेगच्ची इमारत आहे. पण काम मध्येच बंद पडल्यामुळे दारे व खिडक्या मात्र लावावयाच्या आहेत आणि तेव्हापासून ही इमारत अशीच बेवारशी उघडी पडल्यामुळे हिला अकाली जीर्णावस्था आलेली पाहून फार वाईट वाटले आणि हे मुक्तद्वार गौडबंगाल आहे तरी काय ह्याचा पत्ता लावावा म्हणून मी रात्रीपर्यंत राहिलो. शेजारच्या एका मुसलमान गृहस्थाने सांगितले की, बहुतेक तयार झालेली ही इमारत अशी अनाथ पडल्यामुळे हिचा क्वचितप्रसंगी अत्यंत खेदजनक दुरूपयोग होतो.

रात्री एका जुन्या माहितगाराचा, तेथील हेडमास्तरच्या साहाय्याने पत्ता लागला. एका खोलीत चार रेल्वे नोकर कामावरून दमून येऊन करमणुकीसाठी बुद्धिबळे खेळत होते. अशात माझी त्यांची अवचित मुलाखत करण्यात आली. शेवटी माहिती मिळाली की सन १८८७ साली काही रेल्वेतील ब्राह्म नोकरांनी विशेषेकरून जानकीनाथ गांगोली व रखलदर्श चाटर्जी ह्यांच्या प्रयत्नाने येथे समाज स्थापन झाला. त्यावेळी १० सभासद होते. १८९९ साली हल्लीची इमारत बांधण्यास सुरूवात झाली. ८०० रू. चे काम झाले. आणखी १००-२०० रूपयांत काम पुरे होण्यासारखे आहे. पण इतक्यात येथील रेल्वे ऑफिस एकदम कलकत्ता येथे गेल्यामुळे येथे एकही ब्राह्म उरला नाही. इमारत तशीच पडली आहे. येथपर्यंत हकीकत ऐकत असताना ह्या इमारतीप्रमाणेच बुद्धिबळाचा डावही अगदी बहरात आलेला तसाच तहकूब पडला होता. मी मंडळीस म्हटले, दिवसभ काम करून तुम्हांला रात्री करमणूक अवश्य आहे पण करमणूक होऊन शिवाय आत्म्याला थोडीबहुत उन्नती व शांती मिळाल्यास कसे? आणि ह्यासाठी तुम्हांला ही इमारत पूर्ण करून वहिवाटीस मिळाल्यास कसे? मात्र एकच अट की ह्या ठिकाणी जे भजन होईल ते केवळ एकच ईश्वरास उद्देशून व हिंदू-मुसलमान इ. कोणाही धर्मीयांस चालेल असे झाले पाहिजे. संभाषणाअंती मंडळीस कल्पना पूर्ण पसंत पडली. मंदिर उपयोगास मिळाल्यास विच्छायतीचा व दिवाबत्तीचा खर्चही सोसण्यास मंडळी तयार झाली. पण मंदिर पूर्ण व्हावे कसे?

येथून १८ मैलांवर पूर्णिया हे जिल्ह्याचे गाव आहे. येथे बाबू हजारीलाल नावाचे आस्थेवाईक ब्राह्म गृहस्थ असतात. कॉन्फरन्समध्ये त्यांची ओळख झाली होती. पूर्णीयाकडे आगगाडी रात्री १० वाजता निघाली. तीतून निघून रात्री सुमारे एक वाजता

पूर्णीया

येथे बाबू मजकुरांचे घरी पोहचलो. आकस्मित येथे आलेले तारकनाथ राय नावाचे आस्थेवीक ब्राह्म मित्राची गाठ पडली. दोघांस हेतू कळविला. पूर्वीच्या फंडापैकी २०० रू. अद्यापि शिल्लक आहेत असे कळले. विचार ठरल्यावर झोपी गेलो. पूर्णीया येथे समाज आहे, मंदिर नाही. दोनच आनुष्ठानिक ब्राह्म कुटुंबे आहेत. प्रात:काळी दुस-या कुटुंबात उपासना झाली. दोनप्रहरी आम्ही चौघेजणही पुन: काठीहार येथे गेलो. सायंकाळी तेथील हायस्कुलात व्याख्यान झाले. येथील मुख्य अधिकारी मनसफ एक उदार मताचे मुसलमान बॅरिस्टर गृहस्थ आहेत. त्यांनी आपल्याच सहीनिशी सर्व रेल्वेवरच्या नोकर लोकांस आमंत्रणपत्रिका पाठविली व अध्यक्षस्थानही पतकरले. ह्या कामी येथील तरूण हेडमास्तरांनी मोठ्या उत्साहपूर्वक साहाय्य केले. व्याख्यानानंतर बाबू हजारीलाल हे येथील काही मंडळींच्या सल्ल्याने बाकी उरलेल्या शिलकेतून मंदिर पुरे करून देण्याचे ठरवून नंतर पूर्णीयाकडे निघाले आणि मी रात्री १ वाजता कुचबिहाराची वाट पुन: धरली.

ह्या प्रकारे बहार प्रांतातील काम झाल्यावर मी श्रीगंगेचा निरोप घेऊन तिचा पिता जो पर्वतराज हिमाचल त्याचे चरणांगुलीवर विराजमान झालेली वनश्रीची जणू माहेरकडची जिवलग सखी जी कुचबिहार नगरी तिच्या आत सायंकाळच्या शांत समयी अत्यादरपूर्वक प्रवेश केला.

Read more: बंगालचीसफर

बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी

ता. २७ रोजी सकाळी ७ वाजता कॉफी आटपल्यावर ब्राह्मबंधु-स्वामी मजकडे आले व आम्ही दोघे मिळून शहर पाहण्यास निघालो. युरोपीय शहरांचा देखावा स्मृतिपटलावर अद्यापि ताजा असल्यामुळे त्याच्या तुलनेने आजच्या देखाव्याचे मला विशेषच कौतुक वाटू लागले. हिंदुस्थान म्हणजे रशिया खेरीज करून बाकीच्या युरोपाप्रमाणे एक खंडच आहे, असे म्हणतात ते पुष्कळ दृष्टीने खरे आहे. उत्तर युरोपातून आल्प्स् चढून खाली दक्षिणेस इटालीत उतरल्यावर पाहणारास जी देखाव्याची पालट दिसते तीहूनही जास्त मला येथे दिसू लागली. दक्षिण युरोपात जुन्या ग्रीक व लॅटिन सुधारणांच्या सांगाड्यावरून आधुनिक सुधारणेचे मांस भरलेले तर काही ठिकाणी नुसता रंग चढलेला पाहून इतिहास भक्तास जो विस्मय वाटण्यासारखा आहे त्याहून अधिक दक्षिण हिंदुस्थानात वाटतो-निदान मला तरी वाटला. आज सकाळच्या फेरीत रस्त्याने मला जागोजाग एक ना दोन, चार सुधारणा आढळल्या- द्रविडी, आर्य, मुसलमानी, इंग्रजी. मोठी मौज ही की, काही ठिकाणी चारींची बेमालूम भेसळ होऊन गेली आहे तर काही ठिकाणी एकीवर दुसरीची, दुसरीवर तिसरीची अशी पुटे बसलेली आहेत. रस्त्यात जाणा-या येणा-याकडे नुसते घटकाभर निरखून पाहिले तरी बस्स, मानवजातिशास्त्राचे एक दोन धडे सहज समजतात. काळा वर्ण तर सांगावयास नकोच. पण बसके नाक, पसरट तोंड, लोंबते ओठ, एकंदरीत बावळी व राकट मुद्रा ही खालील वर्गाची साधारण चेहेरेपट्टी पुष्कळ ठिकाणी उच्छ वर्णासही लागू पडते. जातिभेदाचे ठराविक नियम अद्यापि जरी महाराष्ट्रातल्याहीपेक्षा अधिक कडकपणे इकडे पाळले जात आहेत तरी, आर्य आणि अनार्य ह्या नैसर्गिक वर्णांचा संकर कधीच होऊन गेला आहे हे उघड दिसते. हल्लीच्या अय्यर, अयंगार, राव, कोमटी, मुदलीयार, नायडू, बक्कलग्यार, कुरूबर, पारिया इत्यादी जाती, हिंदुस्थानच्या इतर भागातल्या जाती आणि वेदांतल्या चार जाती ह्यांचा कसा काय मेळ बसवावा ह्यासंबंधी घोटाळा रस्त्याने जाता जाता मनात माजत असे. ह्या घोटाळ्यात मन आहे तोच एकादी पारिया (महार) बाई (तिने स्वत: अगर तिच्या बापाने ख्रिस्तीधर्माचा स्वीकार केला असल्यामुळे) मडमसाहेबासारखा पोशाख करून एकाद्या दुकानात शिरताना दिसे आणि मुख्य शेटजी तिला खडी ताजीम देऊन आपल्या सर्व जिनसा दाखविण्यास पुढे पुढे करीत. इकडे तिचा जातिबंधूच पण ‘स्वधर्मे निधनं श्रेय:’ म्हणून परधर्माला भिणारा एकादा पारिया गटारावरच उभा असलेला दिसे. असो.

ह्याप्रमाणे....स्वामीशी इंग्रजीत बोलत, स्वामींचे शब्द मात्र इंग्रजी पण उच्चार अस्सल तामिळी व कित्येक ठिकाणी वाक्यरचनाही तीच! इकडे वरचेवर लक्ष जाई पण गेल्यासारखे दाखवीत रस्त्याने चाललो असता ह्या द्राविडी शहराची अस्ताव्यस्त शोभा नजरेत भरू लागली. भक्कम वर्तुलाकारमध्ये झिजलेल्या खांबांच्या रांगा, गुळगुळीत चुनेगच्चीच्या थंडगार ओट्या, स्वच्छ धुतलेली दगडी आंगणी, त्यांवर घातलेल्या रांगोळ्या, मधूनमधून लहान लहान शेणाच्या गोळ्यांत रोवून ठेविलेली भोपळ्याची फुले, (मला वाटते लक्ष्मीची आवडती जी कमळे त्यांच्याऐवजी ही असावीत) किंचित् आखूड पण भक्कम लाकडी दरवाजे आणि अंबरठे आणि त्यांवर ओढलेले हळदीकुंकवाचे पट्टे वगैरे पाहून खरोखर आल्हाद होत असे. आणि स्वच्छता व नीटनेटकेपणा ह्या गुणाने पाश्चात्यांनी आमच्यापुढे विशेष घमेंड मारू नये असे वाटू लागते तोच, ह्या स्वच्छ घरापुढच्या गलिच्छ गटारात केवळ सार्वजनिक हलगर्जीपणाची हेंदर साचली होती आणि कित्येक ठिकाणी तर स्वत: गटारांचाच हमरस्त्यात लोप होऊन गेला होता ते पाहून वरील तुलनात्मक बाबीत पुन: विचार करणे भाग पडे.

नागरिक नीटनेटकेपणा राखण्याची जबाबदारी सर्व नगरावर आहे, आणि ती सक्तीने पाळण्याचे काम नागरिक अधिका-याचे आहे हे काही नुसते सरकाराबरोबर भांडून आम्हांला कळण्यासारखे नाही. आमच्या रस्त्यांत सुंदर इमारती नाहीत असे नाही. चालता चालता एका चौकात आल्याबरोबर आडगल्लीतल्या लाल मसजीद नावाच्या एका सुंदर मुसलमानी उपासनामंदिराकडे माझी नजर गेली. मंदिराची मासेलवाईक बांधणी आणि रसिक सुबकता मनात एकदम भरल्यामुळे ते नीट पाहिल्याशिवाय पुढे पाऊल पडेना. ते सर्व पाहून बाहेर पडल्यावर बाजूचा दरिद्री व घाणेरडा देखावा पाहून चमत्कारिक हिरमोड झाला. एका बाजूस बुरूडांनी आपल्या उंच वेळूंची भलीमोठी जुडगी आणि तट्ट्याची भेंडोळी मशिदीला लागूनच ठेविली होती. ती मशिदीहून उंच दिसत होती आणि जवळ त्यांच्या तक्रारी, व्यापाराचा गलबला चालला होता. मशिदीच्य दारातच मिठाईवाल्याची भजी तळण्याची एक जंगी कढई कढत होती. आणि हा खाण्याचा माल, विकणा-याची मूर्ती व तिचा पेहराव ही दोन्ही कढईपेक्षाची काळी कुळकुळीत दिसत होती. दुस-या बाजूस कोळसेविक्यांची दुकाने लागली होती. ह्या प्रकारे ह्या मशिदीच्या सौंदर्याची व सात्विकतेची चोहोंकडून हलाखी चाललेली पाहून सादृश्यामुळे चटकन माझ्या मनात निराळेच विचार आले. जो आमच्या रस्त्यात हा प्रकार नित्य चालला आहे. त्याहून ओंगळ प्रकार आमच्या धर्मात नाही का चालला? धर्मात किती शुद्ध, सात्विक व सुंदर तत्त्वे आहेत, धर्माच्या इतिहासात किती थोर प्रयत्न झालेले आहेत आणि त्या सा-यांवर आता भलत्याच गोष्टींचे किती कठीण वेष्टण पडले आहे आणि कोण गवगवा माजला आहे! लाल मशिदीची काळजी काजीसाहेबास असावयाला पाहिजे खरी. तथापि त्यांनी आपले काम केले नाही अगर त्यास करता आले नाही म्हणून एकादा म्युनिसिपालिटीचा कामगार येऊन केवळ रस्त्यातील शोभेची नाहक हानी होते ती न व्हावी ह्या हेतूने, मशिदीच्या दारातल्या भल्या मिठाईवाल्यास आपले दुकान तेथून उठविण्यास ताकीद देऊ लागला तर त्यास काजीसाहेब खात्रीने अनुकूल होतील काय? ते काही असो, काजीसाहेबाचा व दुकानदारांचा अंतस्थ संबंध काही असो किंवा त्या मशिदीचे काही होवो, सध्या धर्मात जी बाजारी लोकांनी चोहीकडे धुमाकुळ उडवून दिली आहे ती निवारण करणारा कोणीतरी चांगला खवीस आला पाहिजे खास. जेरूसलेमच्या देवळात नित्य जमून गिल्ला करणा-या सराफांना येशूने एकदा पार धुडकावून दिले होते. असे कित्येकांना कित्येकदा केले आहे तरी हे सराफ पुन: जमतात. त्यांना वेळोवेळी हुसकून लावण्याची योजना झालीच पाहिजे. दुसरा इलाज नाही.

ह्या प्रकारे ह्या दक्षिणेतील शहरात हिंडत असता द्रविडी देवळांची पसरट व बोथट शिखरे ख्रिस्ती चर्चची गाथिक निमुळती स्पायर्स, मुसलमानी मशिदीचे पांढरे शुभ्र मनोरे ह्या सा-यांचे एकच विसंगत चित्र नजरेस दिसू लागले. एकादा अस्सल आर्य, कडकडीत सोवळा, अर्धा उघडा, मानेवर लांब शेंडीचा झुपका लटकत असलेला असा आयंगार आपल्या वाटेत एकादी गरीब पारियाबाई जिच्या एकंदर शारीरिक व मानसिक विकासावरून पाहता ती हिंदुस्थानापेक्षा आफ्रिकेत राहण्यास योग्य दिसत आहे......आली म्हणून तिजवर डोळे वटारीत आहे तोच मागून एक बाईसिकल घंटी न वाजता एकदम आलेली पाहून पारियाबाई व आपण दोघेजण गटारावर उभी राहतात, व एकादा सोजीर बेगुमान दौडत जातो. एकादा अर्धवट शिकलेला अंडरग्राजुएट पायात जोडा वरती पाटलून घालून कानडी हेलात इंग्रजी बोली रस्त्याने मोठमोठ्याने आपल्या सोबत्याशी बोलत जात आहे. एकादा मुसलमान ज्याच्या जातीची स्थिती टिपू सुलतानाच्या वेळी कशी असेल ती असो; आता मात्र तिचा मोठा धंदा म्हणजे गाडी हाकण्याचा झाला आहे, इतका की परवा कुतब्याचा मोठा सण होता म्हणून गाड्या अत्यंत महाग झाल्या होत्या..... असा तो सणानिमित्त भपकेदार कपडे घालून निमाज पडण्यास निघाला आहे. असे नानाविध चमत्कार दाखविणारा जीवंत सिनेमेटोग्राफ मला बंगळूरच्या रस्त्यात दिसला.

ही अपूर्व विसंगतता व विविधता पाहून हिवाळ्याच्या थंड हवेत हिंदुस्थानात चैनीसाठी फिरावयास आलेल्या युरोपियन प्रवाशास मोठी मौज वाटत असेल. पण मद्रासच्या राष्ट्रीय सभेस निघालेल्या एकाद्या यात्रेकरूस व देशभक्तास काय वाटेल! बिचा-याच्या मानेवर केवढी प्रचंड जबाबदारी! असली परस्परविरूद्ध तत्त्वे एकत्र ठोकून त्यांचे एक राष्ट्र घडवावयाचे केवढए जोखमीचे आणि दीर्घोद्योगाचे काम हे! हे पाचपंचवीस वर्षात होणारे नव्हे तर शतकेच्या शतके करीत राहिले पाहिजे. आणि ते एकाच बाजूने करून होणार नाही तर सर्वच बाजूंनी अनेक अडथळे सोसून करीत राहिले पाहिजे. खरोखर धार्मिक काम हे!!

प्रेरणा आणि प्रयत्न

मनुष्य कसाही असो, ज्ञानी असो वा अज्ञानी असो, संपत्तिसुखसागरात पोहणारा असो किंवा पापाने गांजलेला असो, त्याला कोणत्या ना कोणत्या प्रसंगी तरी कमीअधिक प्रमाणाने ईश्वरी प्रेरणा ही होणारच. मानवी मन आणि ईश्वरी प्रेरणा ह्यांचा अपरिहार्य संबंध आहे. किंबहुना ईश्वरी प्रेरणेला पात्र असणे हेच मानवी मनाचे लक्षण असेही म्हणता येईल. ज्यास कधीही दैवी प्रेरणेचा स्पर्श होण्याचा संभव नाही, ते मन पशूचे समजावे. अपवादादाखलही ते मनुष्यामध्ये आढळणार नाही. प्रेरणा ह्या शब्दाचा आजच्या प्रसंगी एवढाच अर्थ घ्यावयाचा आहे की, एकाएकी अकल्पितपणे मनाची सुखमय स्थिती होऊन त्यात आदर्शाचे दर्शन होणे. ह्या दर्शनामुळे नेहमीच एकादा मोठा युगांतर करणारा, (Epoch making) शोध किंवा विचार लाभतो असे नव्हे, किंवा ‘न भूतो न भविष्यति’ असा काही अजब चमत्कार घडतो असेही नव्हे, तर केवळ मनाची अनिर्वचनीय सुखमय स्थिती होऊन त्या वेळी त्यास एकाद्या थोर ध्येयाचा साक्षात्कार होतो. ह्या साक्षात्काराचे एक लक्षण असे आहे की, तो आपल्या कसल्याही प्रयत्नांनी होत नाही व होण्यासारखा नसतो. कठोपनिषदामध्ये म्हटले आहे.

नायमात्मा प्रवचनेन लभ्यो| न मेधया न बहुना श्रुतेन||
यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तैस्यैष आत्मा| विवृणुते तनू स्वाम्||
-कठोपनिषद् ३-२-२२
(हा आत्मा आदर्श केवळ प्रवचनाच्या योगे म्हणजे पुष्कळ सांगितल्याने, किंवा बुद्धीच्या योगे किंवा ऐकण्याने मिळत नाही. ज्यावर त्याची कृपा होईल त्यालाच तो मिळतो. त्यालाच तो आपले स्वरूप उघड करून दाखवितो.)

ह्या ठिकाणी आधुनिक थिऑसॉफिस्ट किंवा सूक्ष्मवादी म्हणतील की, ह्या प्रेरणेला यद्यपि आपला ह्या जन्मातील प्रयत्न कारणीभूत झालेला नसला, तथापि पूर्वजन्मातील प्रयत्न कारणीभूत होत असावा. आणि आधुनिक मानसशास्त्रवेत्ते (Psychologists) सांगतात की, मनाच्या बाह्य आणि ज्ञात व्यापारामुळे ह्या प्रेरणेचा अनुभव घडलेला नाही, असे जरी भासले तथापि काही गूढ अंतर्व्यापारामुळे तरी तो घडत असला पाहिजे. ते व्यापार आपणांस कळत नसले, तरी मुळीच घडत असला पाहिजे. ते व्यापार आपणांस कळत नसले, तरी मुळीच घडत नाहीत असे म्हणता येत नाही. पण ह्या दोहों पक्षांचे म्हणणे काही असो, उपनिषदातील वरील उद्गाराची यथार्थता कमी होत नाही. कारण, ह्या प्रेरणेच्या सुखमय स्थितीस आपला कोणताही तिच्यापूर्वी आपल्याकडून नुकताच झालेला प्रयत्न कारणीभूत होत नाही हे खरेच आहे. पूर्वसंचितामुळे ती होवो, किंवा अंतर्व्यापारामुळे होवो, ती प्रेरणा हल्ली आपल्यास आपोआप प्राप्त झालेली आहे, अशी साक्ष आपले मन आपल्यास देते. जसे काय आपल्यासाठी एकाद्या पिढीत अनामत ठेवलेल्या शिलकेचा वारसा असून, त्यावरील व्याज आपल्यास एकाएकी मिळावे आणि आपली संकटातून मुक्तता व्हावी, किंवा एकादा कार्यारंभ करण्यास मदत व्हावी असाच ह्या प्रेरणेचा प्रकार अनुभवाला येतो. तात्पर्य इतकेच की, आदर्शदर्शन होण्याला आपले प्रयत्न कारण नसून, ते आपल्यास अकस्मात घडते.

पण ही प्रेरणा अथवा आदर्शदर्शन झाले म्हणजे सर्व काही मिळविले असे होत नाही. उलट ह्यानंतर आपल्या ख-या आणि घनघोर प्रयत्नास सुरूवात व्हावयाची असते. कवीला एकाद्या कल्पनेची प्रेरणा झाल्यावर तिचा त्यास सारखा ध्यास लागतो, आणि त्या कल्पनेला शब्दसृष्टीतले मूर्तस्वरूप देण्यास त्याला अविश्रांत श्रम करावे लागतात. केवळ प्रेरणा झाली एवढ्यावरूनच कोणी कवी बनतो असे नाही. प्रतिभा हे काव्याचे सर्वस्व असे जरी आहे, तरी ही प्रतिभा कमीअधिक मानाने सर्वांमध्येच असते. कवीच्या अंत:करणाची सहृदयता आणि त्याला अकस्मात होणारी प्रेरणा हे दोन्हीही गुण मानवी मनास सामान्य आहेत. पण ज्या व्यक्तीमध्ये ह्या गुणांशिवाय झालेल्या प्रेरणेत शब्दाचे सुंदर आणि कायमचे स्वरूप देण्याची अलौकिक शक्ती असते, तीच व्यक्ती प्रचारात आम्ही ज्याला कवी म्हणतो त्याच्या पदाला पोहोचते. हे मूर्तस्वरूप देण्याचे काम तडीस नेण्यासाठी कवीला भाषा, व्याकरण, लोकरीती, मनुष्यस्वभाव आणि अभिरूची इत्यादी अनेक गोष्टींशी सतत झगडावे लागते. मूर्तिकाराचेही असेच आहे. प्रख्यात इटालियन मूर्ती करणारा मायकेल आजेलो ह्याने मनुष्याच्या आकृतीएवढी मोझेसची हुबेहूब मूर्ती केलेली रोम शहरामध्ये ठेविलेली आहे. ती घडविण्याचे कामी त्याला चाळीस वर्षे लागली असे सांगतात. इतक्या काळानंतर ज्या घाटाची अलौकिक मूर्ती घडविण्याचे श्रेय त्याला शेवटी मिळाले, तिची हुबेहूब छाया प्रेरणेच्या रूपाने त्याला चाळीस वर्षांच्या आरंभीच दिसली असावी. ज्याप्रमाणे एकाद्या आधीच घडलेल्या मूर्तीवर चिखलाचा जाड आणि कठीण थर सांचलेला असावा आणि तो खरडून काढून आतील मूर्ती उघडकीस आणीत असतात. हाच प्रकार चिता-याचा आणि हाच प्रकार संसारात पुरूषार्थ साधणा-या प्रत्येक पुरूषाचा. ज्याप्रमाणे कवी धिमेपणाने हळूहळू पदरचना करतो, मूर्तिकार टाकीचे घाव मारतो, चित्रकार कलमाचे फटकारे ओढतो, त्याचप्रमाणे संसारपटावर पुरूषार्थसाधकही हळूहळू आपल्या ध्येयाकडे मार्ग क्रमीत असताना प्रयत्नश: पावले टाकितो.

प्रेरणा होत असताना मोठे सुख होते, पण प्रयत्न करीत असताना घोर यातना होत असतात. प्रेरणेचा काळ मध्यरात्रीसारखा मनास मोहून टाकणारा, तेव्हा कोणत्याही रंगास जिल्हई येते; न्यूने दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. प्रेरणेस कालावधी न लागल्यामुळे श्रमाची तर गोष्टच काढावयास नको. पण प्रयत्नाचे तसे नाही. ह्यावेळी मध्यान्हाचा प्रखर उजेड पडून सर्व रंग निस्तेज झालेले असतात, न्यूने उघडी होतात, पावलोपावली विलंब लागून मार्गप्रतीक्षा करावी लागते, अनिश्चय, निराशा, प्रलोभन, प्रमाद ह्यांच्या प्रखर तापातून अडखळत जावे लागते. पुष्कळदा साधक रंजीस येऊन हात टेकितो, माघारही घेतो. अशा वेळी त्याला पूर्वी झालेल्या आदर्श दर्शनाची पुन:पुन्हा आठवण करावी लागते.

ह्यावरून उपनिषदात सांगितलेला आत्मा आपल्या इच्छेने ज्याच्याकडे येतो, त्याचे तेवढ्यावरूनच चांगले होते असे नाही. तुकाराम म्हणतात:

देवाची ते खूण, आली ज्याच्या घरा| त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा||
देवाची ते खूण, करावे वाटोळे| आपणा वेगळे कोणी नाही||
देवाची ते खूण, तोडी मायाजाळ| आणि हे सकळ जग हरी||
पहा देवे तेचि बळकाविले स्थळ|| तुक्यापे सकळ चिन्हे त्याची||

असाच उद्गार येशू ख्रिस्तानेही काढला आहे. “मी पृथ्वीवर आग पाखडण्यासाठी आलो आहे. मी शांती देण्यास आलो आहे असे तुम्हांस वाटते काय? मी सांगतो ‘नाही’ पण दुही माजविण्यास आलो आहे. कारण आतापासून ज्या घरात पाच असतील त्यांपैकी दोन तिहींच्या विरूद्ध होतील आणि तीन दोहींच्या विरूद्ध होतील, मुलगा बापाच्या आणि बाप मुलाच्या उलट होईल. मायलेकीचे पटणार नाही. सासू सुनेचे भांडण लागेल” (लूकसने केलेले शुभ वर्तमान भाग १२, श्लोक ४९-५३). आदर्शाचे एकदा दर्शन झाले म्हणजे ते पिशाच्चाप्रमाणे कसे माणसाच्या मागे लागून त्यास भ्रमविते, ह्याचे उत्तम वर्णन श्रीएकनाथांनी पुढील अभंगात केले आहे.

भूत जबर मोठे ग बाई| झाली झडपण करू गत काई||
सूप चाटूचे केले देवऋषी| या भूताने धरिली केशीं||
लिंब नारळ कोंबडा उतारा| त्या भूताने धरिला थारा||
भूत लागले त्या नारदाला| साठ पोरे झाली त्याला||
भूत लागले ध्रुव बाळाला| उभा अरण्यात ठेला||
एकाजनार्दनी भूत| सर्वठायी सदोदित||

ह्यावरून आदर्शदर्शन झाल्यावर जे सतत प्रयत्न करावयास लागतात त्यासच ते दर्शन किंवा प्रेरणा झाली म्हणावयाची, इतरांस नाही. एरवी काही लोक म्हणत असतात की आम्ही प्रेरणावादी आहो, आम्हांला प्रयत्न करण्याची काही जरूरी नाही. जसे काय प्रयत्नाचा आणि प्रेरणेचा काही संबंध नाही. पण वरील उदाहरणावरून प्रेरणा ही ख-या प्रयत्नास कारण आणि आरंभ आहे असे दिसून येते. आपले हे १०० किंवा ६० वर्षांचे आयुष्य म्हणजे आपल्यास मिळालेली एक संधीच होय. आयुष्याची बाळपणरूपी प्रस्तावना संपल्यावर केव्हा ना केव्हा तरी तरूणास आदर्शाचे दर्शन होतेच. हे झाल्यावर त्याच्यापुढे जे त्याचे भावी आयुष्य असते ते एकाद्या मूर्तिकारापुढे ठेविलेल्या संगमरवरी शिळेप्रमाणेच आहे. मायकेल आंजेलोने ४० वर्षांत ज्याप्रमाणे मोझेसचा पुतळा कोरिला, त्याप्रमाणे संसारातील प्रत्येक साधकास आपल्या पुढील कमी अधिक ४० वर्षांच्या आयुष्यातून आपल्या आदर्शानुरूप स्वचरित्राचा पुतळा कोरावयाचा असतो. कारखान्यामध्ये मुले शिकत असता कारखानदार त्यांना ज्याप्रमाणे लाकूड, धोंडा, धातू इत्यादी सामग्री पुरवितात आणि पुष्कळ वेळां विद्यार्थी ज्याप्रमाणे ह्या सामग्रीचे काहीच न बनविता तिची केवळ नासधूस करितात, त्याप्रमाणे आयुष्यरूपी बहुमोल धातूची नासधूस सर्वत्र चाललेली दिसते. तथापि ह्याच संसारशाळेतून ब-याच विद्यार्थ्यांनी बाहेर पडण्यापूर्वी आपणास दिलेल्या सामग्रीच्या आपल्या दर्शनानुरूप काही तर मूर्ती मागे करून ठेविलेल्या आढलतातच.

प्रेमाचा विकास

(सोशल सर्व्हिस लीगच्या तर्फे शिंदे ह्यांचे प्रेमासंबंधाने व्याख्यान).

प्रथम प्रेम म्हणजे काय? प्रेमाच्या कल्पनेचा ख्रिस्ती. धर्मात चांगला विकास पहावयास सापडतो. आपल्याकडेही प्रेमाची कल्पना आहे परंतु तिची उत्क्रांती चागंली झालेली नाही. निदान त्या उत्क्रांतीचा इतिहास तरी उपलब्ध नाही. केव्हा केव्हा आमची प्रेमाची कल्पना ‘अवघे देखे जन ब्रह्मरूप’ ह्या उच्च कोटीला पोहोचते. परंतु ह्या भावनेचा आपलेकडे व्यवस्थित विकास झालेला दिसत नाही. तेव्हा आपण ख्रिस्ती धर्मातील ह्या कल्पनेचा विकास पाहू.

प्रथम पाचव्या शतकातील सेंट ऑगस्तीन ह्यांच्या प्रेमात वैराग्य कडकडीत दिसते. ईश्वरात पूर्म लय व्हावा म्हणून बाह्य जगताविषयी वैराग्य. यानंतरच्या सेंट बनार्ड ह्यांच्या प्रेमात वैराग्य नव्हते असे नाही. परंतु लोकांवरील प्रेम त्यात अधिक स्पष्टपणे दिसून येत होते. सेंट फ्राँसिस ह्यांनी दु:खरूपी लोखंडाला सुखरूपी सुवर्ण केले. गरिबात जाऊन गरीब व्हावे. दीनात दीन बनावे व पाण्यात जाऊन त्यांनी पाप का केले हे पहावे. अशी त्यांची वृत्ती होती. ह्या तिन्ही पाय-यांपेक्षा पूर्ण विकास सांप्रतचे मुक्ती फौजेचे उत्पादक जनरल बुथ ह्यांचे ठायी दिसून येतो. त्यांचे अंगावर तुम्हास फाटक्या छाट्या दिसावयाच्या नाहीत, काही नाही. थोडक्यात वैराग्याचे बाह्य चिन्ह काहीच दिसावयाचे नाही. त्यांच्यामध्ये तुम्हाला अखंड धडपड, चळवळ प्रवृत्ती दिसून येईल.

सारांश प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे, प्रेम म्हणजे प्रवृत्ती, निवृत्ती नव्हे, प्रेम म्हणजे जीवनाचा कंटाळा नव्हे. सेंट ऑगस्तीन मध्य प्रेमाच्या भावनेचा उदभव दिसतो. जनरल बुथ ह्यांचे ठायी तिचा पूर्ण विकास दिसतो. वैराग्याऐवजी जीवनाच्या कंटाळ्याऐवजी तुका म्हणे गर्भवासी|सुखे घालावे आम्हासी’ असे वाटले पाहिजे. प्रेमाच्या भावनेचा, मैत्रीच्या भावनेचा पूर्ण विकास आपल्याकडे बुद्ध भगवानाचे ठायी झालेला दिसून येतो. त्यांनी जे मैत्रीचे जीवन स्वीकारले ते असे की, ते पाहूनच लोकांनी बुद्धधर्मी व्हावे. प्रेम ही मनोवृत्ती स्वयंभू अहेतुक आहे. प्रेम ही कामना आहे. आत्म्याचे प्रसरण आहे. निष्काम प्रेम हा शब्दच मला कळत नाही. माझे मगजात शिरत नाही. आपण प्रेम करतो ते आपण सुखी व्हावे म्हणून नव्हे, जग सुखी व्हावे म्हणूनही नाही, ते स्वयंभू आहे. निर्हेतुक आहे. मातीच्या देहामध्ये प्रेमाची लहर, आत्म्याची स्वतंत्रता त्याचे अस्तित्व दाखवितो. वर्गसन आपल्या या ग्रंथात मेमरी, स्मरणशक्तीवरून आत्म्याची उपपत्ती लावतात. प्रेमावरूनही आत्म्याची उपपत्ती लावता येईल. प्रेम हे मातीचे कार्य नव्हे. जड जग, मृण्मय जग ह्याचे उत्क्रमण, विकसित स्वरूप हे नव्हे. प्रेमाचा तरंग, लाट पाहिल्याबरोबर दुस-याच जगाचा प्रत्यय वाटतो. त्याचेच हे स्वरूप.

अशा ह्या प्रेमास प्रयत्नाची व सातत्याची जोड मिळाली म्हणजे सेवा झाली व समुदायाने, संघटनेने ती अंमलात आणण्यास सुरूवात केली म्हणजे ती समाजसेवा झाली. आपल्या समाजसेवेत तरी सर्व मूलतत्वे आहेत की एखादे कमी अथवा कमजोर आहे ह्याचे नेहमी निरीक्षण ठेवले पाहिजे. उणीव दिसली की ती लगेच भरून काढली पाहिजे.

  1. प्रेमसंदेश
  2. प्रेमप्रकाश
  3. प्रार्थनासमाजाचा एक नमुना
  4. प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का ?
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
Page 19 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी