प्रकरण १. दक्षिण प्रांतांतील दौरा-२ (3)

जगन्नाथपुरी :
आंध्र आणि ओरिसा यांच्या शिवेवर जगन्नाथपुरी हें प्रसिद्ध धर्मक्षेत्र आहे.  हें बंगाली उपसागरावरील एक महत्त्वाचें बंदर आहे.  हिंदु धर्माच्या प्रसारार्थ ह्या वैष्णव क्षेत्रानें मागें किती मोठी कामगिरी केली असेल ती असो, हल्लीं मात्र याचें स्वरूप भेसूर दिसतें.  निरीक्षण दृष्ट्या हें स्थळ फार आकर्षक आहे म्हणून मी येथें उतरलों.  येथें ब्राह्मसमाज नाहीं.  शिवाय ना ओळख ना पाळख.  आणि मी तर साहेबी पोशाखांतला एक काळा आदमी.  त्यामुळें माझी उतरण्याची फारच आबाळ झाली.  जेथें नुसती उतरण्याची सोय लागेना तेथें जेवणाचें काय विचारतां !  यात्रेकरूंनीं स्वतःचा स्वयंपाक करूं नये असा दंडक होता.  आणि देवळांतील महंत बडवे अत्यंत स्वार्थी, कठोर मनाचे, आणि पैसे उकळण्याचे विद्येंत कसलेले.  जगन्नाथजीला रोज एक मणाचा भाताचा भोग लागत असे.  तोच भात यात्रेकरूंना खापरांतून विकत मिळत असे.  पहिल्या दिवसाचा भात आदल्या दिवसाच्याच रांजणांत भरून ठेवल्यामुळें ताजें कोणतें व शिळें कोणतें याचें संशोधन करण्याचे कामीं यश येण्याची फारशी आशा नव्हती.  उलट असें संशोधन करणाराच तेथें पापी ठरत असे.  आणि अशा पाप्याला पाहुणचार मुळींच मिळत नसे.  शोध करतां करतां एक बंगाली बाबू, तेथें एक मोठे सरकारी अधिकारी आहेत असें कळलें.  ते ब्राह्मसमाजाचे एक सभासद होते.  पण ते एकलकोंडे असल्यानें त्यांच्या अधिकाराच्या मानानें त्यांचा ब्राह्मधर्म प्रसिद्ध नव्हता.  अशा मोठ्या क्षेत्राच्या देवळांत यात्रेकरूंची एकसारखीच नेहमी रीघ असे.  पण या सरकारी अधिकार्‍यांच्या मदतीनें मला या देवळांतील कानेकोपरे आणि मुख्य गाभार्‍यांतील मूर्ति निरखून पाहण्याची चांगली सोय झाली.  देऊळ भव्य, तितकेंच बेढब असून त्यांतील सर्व प्रकार त्याच सुरांत आणि तालांत दिसत होते.  गाभार्‍यांत देवाची मुख्य मूर्ति तर अत्यंत भेसूर, बायकामुलांच्या अंतःकरणांत धडकी भरविणारी दिसली.  ती पाहण्यासाठीं बायका, पुरुष, मुलें, सर्व दर्जाची आणि वयाचीं माणसें गर्दी करून एकमेकांशीं इतकीं बिलगत कीं, अलिकडे लंडनमध्यें बाँब्सच्या भीतीनें तळघरांत शिरलेलीं माणसेंहि तितकीं बिलगत नसतील.  गाभार्‍यांत नेहमींच अंधाराचे साम्राज्य असतें.

दर्शनाचे हे सोहाळे उपभोगून बाहेरील विस्तीर्ण पटांगणांत आल्यावर हायसें वाटलें.  मग भूक लागल्याचें स्मरण झालें.  आदला दीड दिवस उपोषण घडलें होतें.  भोग लागलेला भात फुटक्या मडक्यांत घालून स्वस्त दराची चढाओढ करीत देवळांतील महंताचे दलाल यात्रेकरूंच्या मागें लागत.  यात्रेकरूंनीं ह्या प्रसादाशिवाय दुसरें कांहीं खाऊं नये असें शास्त्र सांगे.  तो भात घेऊन दोन घांस खातों न खातों तों ह्या प्रसादापेक्षां भूक बरी वाटून यात्रेकरूंच्या हातांतील मडकीं सहजच खालीं गळून पडत.  तीं झाडून काढण्याची म्युनिसिपालिटीकडून व्यवस्था नव्हती.  या देवळांत कोणत्याहि प्रकारचा जातिभेद न राखतां अस्पृश्यांशिवाय सर्वांना येण्याला सरसकट परवानगी आहे.  अंगणाची जमीन फरसबंदीची होती.  तिच्यावर उष्ट्या भाताचीं पुटें पडून कायमची घसरगुंडी झालेली असे.  पण देवळांतल्या प्रमाणें अंगणांत अंधार नसल्यामुळें अन्नाची भूक हवेवर भागवून घ्यावी लागली.


अपूर्व तोडगा :
ह्या देवळाचें अत्यंत मासलेवाईक वैशिष्ट्य सांगण्याचें अजून पुढेंच आहे.  प्राचीन द्रावीड संस्कृति तिच्या नमुनेदार शिल्पकलेविषयीं प्रसिद्ध आहे.  मदुरा, त्रिचनापल्ली, श्रीरंगपट्टम् येथील प्रसिद्ध भव्य देवळें त्यांच्या अवाढव्यपणाबद्दलच नव्हे तर नाजुक सौंदर्याविषयीं देखील सर्व जगानें वाखाणण्यासारखीं आहेत.  या सौंदर्याला दृष्ट लागूं नये म्हणून द्राविडांनीं एक अपूर्व तोडगा काढला आहे.  दक्षिण देशांत कोठेंहि जा लहानमोठ्या देवळाच्या भिंतीवरच नव्हे तर रथादि वाहनांवरहि अत्यंत बीभत्स चित्रें नजरेंस भरण्यासारख्या ठिकाणीं कोरलेलीं दिसतात.  जगन्नाथजीचें मंदिर जरी सुंदर नाहीं तरी दृष्टिदोष घडूं नये म्हणून कानाकोपर्‍यांत सर्व भिंतीवर खालपासून वरपर्यंत जेथे म्हणून चित्र कोरण्याला जागा आहे, अशा सर्वच ठिकाणीं बीभत्स चित्रांची लयलूट झाली आहे.  ह्या दृष्टिदोषासंबंधीं द्राविडांची कल्पना अशी आहे कीं, कांहीं वाईट माणसांच्या दृष्टींत सुंदर वस्तूंचा भंग करण्याची शक्ति असते.  म्हणून त्याच्या दृष्टीची लालसा कुरूप वस्तूंत लय पावून सुंदर वस्तु सुरक्षित रहावी.  या समजुतीनेंच भोळ्या आया आपल्या गोर्‍या मुलाला गालबोट लावतात.  पण गोर्‍या मुलाबरोबर काळ्या मुलालाहि जसें गालबोट लागतें तशांतलाच प्रकार जगन्नाथपुरींतला आहे.  आणि त्यांतील बीभत्सपणाच्या कल्पकतेलाहि ऊत आलेला आहे.  कोकशास्त्रांतल्या असंख्य आसनांपेक्षांहि अत्यंत बीभत्स अशीं दहापांच अधिक आसनें पाहणाराला येथें दिसतील.  सर्वांत मनोवृत्तीला थक्क करणारें दृश्य म्हणजे हें कीं, ह्या नागड्या स्त्रीपुरुषांच्या संलग्न दंपतीची पूजा करण्यासाठीं तरुण कुमारिका आणि विधवा बाया हळदीकुंकु आणि फुलांच्या परड्या घेऊन सर्व मूर्तीचा परामर्ष घेण्यांत गुंतलेल्या आढळतात.  सारांश, या आधुनिक युगांत हें देऊळ आणि त्यांतले प्रकार अद्याप अखंड चालूं आहेत हें एक समाजशास्त्रांतील मोठें कोडें आहे असें म्हणत सुशिक्षित प्रेक्षक खजील होऊन देवळांतून बाहेर पडतो.

राममोहन रायची आई :
मनावर झालेल्या परिणामांच्या परिमार्जनासाठीं मी समुद्रकिनार्‍यावरील अत्यंत सुंदर व विपुल वाळवंटावर गेलों.  बंगालच्या उपसागराच्या लाटा जणु जगन्नाथाच्या दर्शनासाठीं अविश्रांत येत होत्या.  पण त्यांना पाहण्यासाठीं यात्रेकरूंपैकीं कोणीच तेथें नसे.  जगाचा खरा नाथ कोठें आणि हा तोतया जगन्नाथ कोठें.  पण जगांतील सर्व धर्मांचा समन्वय करणारा राममोहन राय ह्याच्याच आईनें ह्या तोतया जगन्नाथाच्या सेवेंत आपला देह ठेवला हें स्मरण करून मीं माझा आवंढा गिळला.  राममोहन राय हे आपल्या आईच्या भेटीला येथें आले होते, तेव्हां त्यांच्या आईनें देवदर्शन घेण्याची त्याला गळ घातली.  राममोहन व्यवहारचतुर असल्यानें, ''हे माझ्या आईच्या देवा, तुला नमस्कार असो'' असें म्हणून त्यांनीं आपल्या आईचें समाधान केलें.  


माघोत्सव :
१९०४ च्या जानेवारीच्या मध्याच्या सुमारास मी कलकत्त्यास पोंचलों.  त्यावेळीं तेथील माघोत्सव चालूं होता.  सबंध जानेवारी महिना हा उत्सव मोठ्या समारंभानें चालत असतो.  ब्राह्मसमाजाचे तीन पक्ष.  साधारण ब्राह्मसमाज, नवविधान ब्राह्मसमाज आणि आदि ब्राह्मसमाज.  हे तीनहि पक्ष स्वतंत्रपणें हा उत्सव चढाओढीनें करीत असतात.  मला हा प्रथमच प्रसंग असल्यानें प्रत्येक लहानसहान गोष्ट मी मोठ्या कौतुकानें निरीक्षण करूं लागलों.  बंगाली वर्षाचा माघ महिना हा आमच्याकडील पौष महिन्यांतच येतो.  शुद्ध एकादशी दिवशीं ब्राह्मसमाजाच्या स्थापनेचा दिवस पडतो.  तो बहुतकरून ता. २४ जानेवारीला येतो.  या सुमारास तीन दिवस सरकारी नोकरींतील सर्व ब्राह्मसमाजिस्टांना हक्काची रजा मिळते.  बंगाल्यांतील लहानथोर स्थानिक समाजांतून ब्राह्म कुटुंबें मोठ्या श्रध्देनें कलकत्त्यास या उत्सवाप्रित्यर्थ येतात.  त्यांची उतरण्याची व जेवणाची सोय एका स्वतंत्र नेमलेल्या मंडळाकडून मंदिराच्या आवारांत केलेली असते. पंधरा दिवस सर्व आल्या-गेलेल्यांना दोन वेळां फुकट जेवण व चहा मिळतो.  ब्राह्मसमाजाला ही जणूं काय एक निराळी नवीन घटनाच बनल्यामुळें परस्परांची ओळख होणें, सामाजिक संबंध दृढ होणें वगैरे महत्त्वाचे फायदे या उत्सवापासून होतात.  रोज सांजसकाळ ब्राह्मोपासना, व्याख्यानें व भजनें असें कांहींना कांहीं मुख्य मंदिरांत चाललेलें असतें.  कलकत्ता शहरांतील ब्राह्मबंधू शक्य तितका वेळ आपल्या बायकामुलांना घेऊन मंदिरांत जमत असतात.  दिवसभर सारखी गर्दी.  मुख्य दिवशीं पहाटे तीन वाजल्यापासून भजनाला सुरुवात होते.  टाळमृदंगाचा घोष चालतो.  लताफुलांनीं मंदिर सुशोभित करण्याचे आदले दिवसापासूनच चाललेलें असतें.  तीन तपास भजन झाल्यावर मुख्य आचार्य वेदीवर येऊन बसतात.  एक तास उद्बोधन, एक तास प्रार्थना, दोन तास प्रवचन अशी एकंदर सात तास ही मुख्य उपासना चालते.  मंदिराच्या दोन्ही मजल्यावर चिक्कार गर्दी असते.  ह्यावर्षी ही उपासना मुख्य आचार्य पं. शिवनाथशास्त्री ह्यांनीं चालविली.  उपासनेंत भक्तिरसाचा पूर वहातो.  माझ्या मनावर त्याचा फार मोठा परिणाम झाला.  शास्त्रीमहाशयांचें वक्तव्य केव्हां केव्हां इतकें प्रभावी होतें कीं, कित्येक मूर्छा येऊन पडतात असें ऐकलें आहे.  माझ्याजवळ प्रसिद्ध ब्राह्म पुढारी, बॅ. आनंदमोहन बोस हे बसले होते.  त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुधार चालली होती.  श्रोतृसमाजांत बाहेरचे लोक देखील पुष्कळच असत.  सकाळीं ६ वाजण्याचे आंत येऊन मंदिरांत जागा न पटकावल्यास समाजिस्टांनाहि जागा मिळेनाशी होते.  एकंदरींत प्रसंग अपूर्व खरा.


महर्षि देवेन्द्रनाथ ठाकूर :
ता. ३० जानेवारी १९०४ रोजीं, तिसरे प्रहरीं पं. शिवनाथशास्त्री ह्यांनीं मला आणि लाहोरचे प्रचारक भाई प्रकाशदेव यांना प्रसिद्ध कवि डॉ. रवींद्रनाथ टागोर यांचे वडील महर्षि देवेंद्रनाथ यांचे दर्शनास नेलें.  ब्राह्मसमाजांतील तीन प्रमुख विभूतींपैकी देवेन्द्रनाथ हे मधले होते.  ते आपल्या घरच्या दुसर्‍या मजल्यावर कोचावर बसले होते.  जिन्यांत चढतांना एका तरुणाची तसबीर दिसली.  ती त्यांच्या २५ वर्षे वयाच्या नातवाची होती.  यावरून देवेंन्द्रनाथांचें वय किती पिकलेलें होतें याची कल्पना होते.  आम्ही समोर दिसल्याबरोबर 'यावें शास्त्री महाशय' असे उद्‍गार काढून महर्षीनी स्वागत केलें.  पं. शिवनाथशात्र्यांनीं माझी गौरवपूर्वक ओळख करून दिली व मुंबईला राममोहन आश्रमाची उभारणी झाल्याची हकीकत सांगितली.  अशा रीतीनें मुंबईकडे नवचैतन्य झाल्याचें ऐकून महर्षिना गहिंवर आला आणि त्यांनीं माझ्या अंगावरून हात फिरविला.  ह्या महापुरुषाचे दर्शनानें मला धन्यता वाटली.  महर्षि म्हणाले, ''मी आतां फार थकून गेलों आहे.  शिवनाथ, तूं आमचें कार्य पुढें चालव.''  महर्षि मोठे एकांतप्रिय.  माघोत्सवाची गडबड त्यांना मानवत नसे.  ते त्याला गोलमाल (गडबड) असें संबोधीत.  दुसरी महत्त्वाची भेट म्हणजे ब्रह्मानंद केशवचंद्र यांचे शिष्य प्रतापचंद्र मुझुमदार यांची होय.  ते मंदिरांत उपासनेला बसले होते.  शुभ्र लोंकरी शाल त्यावर त्यांची शुभ्र विपुल दाढी, भव्य कपाळ, पाणीदार डोळे, एकंदर दृश्य मोठें प्रेरक दिसलें.  प्रतापबाबूंचें इंग्रजी भाषेवरचें प्रभुत्व अपूर्व होतें.  'Oh God of all nations' या शब्दानें त्यांनीं आपली गंभीर प्रार्थना इंग्रजींतून सुरू केली.  ती आत्म्याला हालवून जागी करणारी होती.  हे दोन्ही महापुरुष पुढल्यावर्षीच वारले.  त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला म्हणून मला विशेष समाधान वाटलें.


कालीमाता :
ह्या सफरींत कलकत्त्यास मीं एक अत्यंत किळसवाणा प्रकार पाहिला.  तो तेथील कालीमातेच्या देवळांतला होता.  एके दिवशीं तिसरे प्रहरीं मी कालीमातेचें देऊळ पाहण्यास गेलों.  सण वगैरे कांहीं नसतां देवळांत बरीच गर्दी होती.  फूलवाल्यांची दुकानें देवळाच्या रस्त्यावर रांगेनें बसलीं होतीं.  हजारों फुलांच्या माळा कालीमातेवर वाहून पुजारी पुन्हां त्याच माळा गिर्‍हाइकांस विकत असत.  गिर्‍हाईक त्या मुकाट्यानें घेत.  इतर ठिकाणीं नारळाचीं दुकानें असतात त्याप्रमाणें येथें लहान लहान कोंकरांचीं दुकानें होतीं.  कित्येक दिवस खावयास न मिळाल्यानें हे प्राणी अत्यंत रोडावलेले दिसत.  मंदिर हुगळी नदीचे कांठीं आहे.  कालीमातेची मूर्ति अत्यंत भेसूर असून तिच्या तोंडांतून भली मोठी जीभ बाहेर आलेली पाहून नवख्याच्या पोटांत धडकी भरे.  पुढें विस्तीर्ण अंगण असून मध्यभागीं देवीसमोर दोन मोठ्या खांबांचें वधस्थान आहे.  भक्त लोक डोळ्यांत जीव धरलेल्या कोंकराला नदींत बुडवून व आपणहि सचैल स्नान करून वधस्थानीं येत.  दोन लांकडांमध्यें त्या बिचार्‍याची मान घालून पुजारी एका झटक्यासरशीं शीर धडावेगळें करीत.  अर्थात पुजारी जातीनें अस्सल ब्राह्मणच असे.  गरम गरम रक्ताचा टिळा भक्ताच्या कपाळावर लावून त्याचा नवस पूर्ण करीत असे.  असे बली अंगणांतून अस्ताव्यस्त पडलेले मीं जवळ जवळ चाळीस मोजले.  त्यांत सुमारे चार रेड्यांचीं प्रेतें होतीं.  सबंध अंगणभर रक्तामांसाचा चिखल सांठला होता.  त्यांतून जाण्याची मोठी मुष्कील पडे.  जगन्नाथाच्या देवळांत वैष्णवशोभा पाहिल्यावर येथील शाक्तांच्या लीला पाहून निरीक्षकाची दृश्यपालट चांगली होते !  हिंदु धर्माची पुरातन काळापासून होत असलेली ही विटंबना अजून अखंड चाललेली पाहून मन उद्विग्न होतें.  सहानुभूतिशून्य परकीयांना हा प्रकार पाहून काय वाटत असेल !  हिंदु धर्माचीं उज्ज्वल स्थानें इतरत्र आहेत, नाहीं असें नाहीं.  पण प्रमुख क्षेत्रांतील असले भीषण अत्याचार पाहून उज्ज्वल स्थानांचें स्मरण कोणाला होणार ?  मूर्तिपूजेचा हा महिना पाहून हिंदु धर्माच्या सुधारणेची प्रेरणा महात्म्यांना होते.  पण त्यांस सनातनीयांकडून एकजात विरोधच होतो, हें धर्माचें नशीब !