प्रकरण १४. मिशनची घटना

येणेंप्रमाणें मुंबई येथील मध्यवर्ती संस्थांचीं कामें होऊं लागून एका नमुनेदार मातृसंस्थेची उभारणी झाली. यापुढें या संस्थेच्या प्रत्यक्ष शासनाखालीं प्रांतिक मुख्य शाखांची घटना करावयाला जनरल सेक्रेटरी लागले. ह्या मिशनच्या शाखांचे तीन प्रकार ठरले होते. पहिला प्रकार अंगभूत शाखांचा. ह्या शाखा मिशनची जी मध्यवर्ती कार्यवाहक कमिटी होती तिच्या प्रत्यक्ष अंमलाखालीं चालावयाच्या होत्या. जमाखर्चाची सर्व जबाबदारी आणि इतर कारभार मध्यवर्ती कमिटीच्या संमतीनें चालवावयाचा होता. प्रांतिक शाखांचे मुख्य चालक आणि त्यांचा मदतनीस कमिटीचे सभासद हे मध्यवर्ती कमिटीच्या संमतीनें नेमले जात. हा चालक स्वतःला वाहून घेऊन काम करणारा असल्यास त्याच्या पगाराची जबाबदारी ह्या मुख्य चालकांवर आणि त्याच्या कमिटीवर असे. वर्षअखेर जमाखर्चाचा खर्डा स्थानिक ऑडिटरनें मंजूर केल्यावर तो खर्डा आणि वार्षिक अहवाल मध्यवर्ती कमिटीच्या पसंतीला मुंबईस पाठविण्यांत येई. वेळों वेळीं या शाखांची आणि त्यांच्या आश्रयाखालीं चाललेल्या इतर संस्थांची तपासणी जनरल सेक्रेटरीकडून होत असे. ह्या शाखांची वर्षाअखेर जी शिल्लक राही त्यांपैकीं जास्तींत जास्त १००० रु. बाकी ठेवून मध्यवर्ती कमिटीच्या द्वारें मातृसंस्थाकडे येत असे. याशिवाय विशिष्ट हेतूनें दिलेले कायमचे निधि असतील तर ट्रस्टफंड या नात्यानें वरील ट्रस्टीकडे येत.

दुसरा प्रकार संलग्न शाखांचा. ह्या शाखांची जमाखर्चाची आणि कामाची जबाबदारी प्रत्यक्षपणें मध्यवर्ती कमिटीकडे नसे. मात्र कामाचें धोरण मिशनच्या हेतूला धरून चाललें आहे कीं नाही हें जनरल सेक्रेटरी वेळोवेळीं तपासून पहात. मिशनच्या वार्षिक सर्वसाधारण अहवालांत सामील करण्यासाठीं अशा शाखांचा जमाखर्चाचा तक्ता आणि कामाचा अहवाल जनरल सेक्रेटरीच्या ऑफिसांत वेळेवर येत असे.

तिसरा प्रकार सहकारी शाखांचा. ह्या बहुतेक स्वतंत्रपणें चालत. धोरण आणि परस्पर सहानुभूति असली कीं अशा शाखा मिशन मान्य करीत असे.

मातृसंस्थेचे आद्य ट्रस्टी-नामदार गोकुळदास कहानदास पारेख, बी. ए., एल्एल्.बी. (२) सेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला (३) श्री. विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए. ता. १ जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत मिशनचें दप्तरी वर्ष ठरलेलें असे.

१९०८ सालच्या एप्रिलमध्यें पुणें येथील कांहीं अस्पृश्य पुढा-यांच्या कळकळीच्या विनंतीवरून मिशनचे जनरल सेक्रेटरी या नात्यानें मीं पुण्यास भेट दिली. मिशनची पहिली अंगभूत शाखा पुण्यांत असावी असा माझा विचार ठरला. पुढें दोन महिन्यांनीं मीं माझे मदतनीस रा. सय्यद अबदुल कादर यांस पुण्यास पाठविले. त्यांनीं २२ जून १९०८ रोजीं पुणें, सेंटर स्ट्रीट, लष्कर येथील एका घरांत या शाखेची पहिली दिवसाची शाळा उघडली. पैशाची व्यवस्था तात्पुरतीच होती. शाळेचें सामान कांहींच नव्हतें. अस्पृश्यवर्गीय एका पुढा-याकडून टेबल व खुर्ची तात्पुरती मिळाली होती. पुढील सर्व व्यवस्था करण्याचें काम रा. ए. के. मुदलियार यांचेवर सोपवून रा. सय्यद मुंबईस परत गेले. वर्तमानपत्रांतून जाहिराती वगैरे देऊन पाहिल्या. महिन्यांत ५७७ रु. जमविण्यांत आले. बॅ. एच्. ए. वाडीया या उदार गृहस्थानें १०० रु. ची पहिली देणगी दिली. नंतर मि. डब्ल्यू. टी. मॉरिसन, आय. सी. एस., मध्यभाग कमिशनर व डेक्कन कॉलेजचे प्रोफेसर वुडहाऊस यांनीं प्रत्येकीं ३० रु. देऊन सुरुवातीच्या अडचणी भागविल्या. पण शिकविण्यास शिक्षक कोणी मिळेना म्हणून मातृसंस्थेंतून मुंबईहून श्री. ए. व्ही. गुर्जर या नांवाच्या गृहस्थास पाठवावें लागलें. खर्चाची रात्रंदिवस तळमळ लागली असतां मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांजकडे पुणें शाखेचे चिटणीस रा. मुदलियार यांनीं एक विनंतिपत्रक पाठविण्याचें धाडस केलें. मिशनचे चालक कोण आहेत आणि त्यांचें कार्य कसें चालू आहे याची योग्य ती चौकशी केल्यावर गव्हर्नरसाहेबांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीकडून रा. मुदलियार यांस ता. १८-८-१९०८ रोजीं पुढील उत्तर आलें – “आपल्या गेल्या महिन्याच्या १९ व्या तारखेच्या पत्रास नामदार गव्हर्नरसाहेबांच्या आज्ञेनें कळविण्यांत येतें कीं, आपले मिशन मदतीला लायक आहे आणि तें यशस्वी होवो अशी गव्हर्नरसाहेबांची इच्छा आहे. मदतीसंबंधानें आपणांस कळविण्यांत येतें कीं, गव्हर्नरसाहेबांनीं आपली कन्या मिस् व्हायोलेट क्लार्क यांना पुढील महिन्यांत एक जाहीर गायनाचा जलसा करण्याची परवानगी दिली आहे. जलशाच्या उत्पन्नांतून बरीचशी शिल्लक उरेल अशी आशा आहे.”

हा प्रसिध्द गायनवादनाचा जसा पुणें येथें सप्टेंबर महिन्यांत करण्यांत आला. प्रत्यक्ष गव्हर्नरसाहेबांचा आणि पुणें येथील सैन्य विभागाचे कमांडर मेजर जनरल आल्डरसन यांचा आश्रय होता म्हणून या इलाख्यांतील बरेच राजेरजवाडयांनीं आणि शेठ सावकरांनीं मोठया रिक्त हस्तें उदार आश्रय दिला. सर्व खर्च वजा जातां ३,४६७ रु. १३ आणि ६ पै ही शिल्लक त्या मिशनला मिळाली. ती मातृसंस्थेच्या अध्यक्षांकडे मुंबईंस पाठविण्यांत आली. केवळ पैशाच्या दृष्टीनेंच नव्हे तर राजेरजवाडे आणि प्रसिध्द पुढारी गृहस्थांच्या नजरेला ह्या मिशनचें कार्य आल्यामुळें ह्या प्रसंगाचें महत्व दिसून येण्यासारखें आहे. हें खालील आंकडयावरून कळून येईल.

या जलशाच्या कांहीं देणगीदारांचीं नांवें -
श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड रु. ५००
श्रीमंत सर शाहू छत्रपति महाराज रु. २००
आमोदचे ठाकूरसाहेब रु. १००
सचीनचे नवाबसाहेब रु. १०१
नामदार आगाखान  रु. ५००
भोरचे अधिपति रु. २००
केरवाडचे ठाकूरसाहेब रु. १००
इचलकरंजीचे अधिपति रु. २५
धरमपूरचे अधिपति रु. १०


यानंतरहि श्रीमंत लोकांकडून कांहीं देणग्या येऊं लागल्या. त्यांत सर जेकब ससून यांजकडून रुपये ५०० आणि मुधोळच्या अधिपतींकडून रु. १०० आले. १९१८ अखेर ह्या शाखेच्या खालील संस्था होत्या. (१) पुणें, लष्कर, दिवसाची शाळा, (२) पुणें, लष्कर, रात्रीची शाळा (३) पुणें, लष्कर, वाचनालय. (४) गंजपेठ, रात्रीची शाळा (५) मंगळवार पेठ, रात्रीची शाळा. शेवटची शाळा माझे हस्तें १९०५ सालीं उघडून पुणें प्रार्थना समाजाकडे नंतर चालविण्यास दिली होती. ती आतां मंगळवार पेठेंत नेऊन मिशनच्या कार्यांत सामील करून घेण्यांत आली.

शिक्षणाखेरीज इतर कामें झालीं त्यांत शिमग्यांतील ओंगळ प्रकार बंद व्हावेत म्हणून ठिकठिकाणीं जाहीर सभा करून प्रयत्न करण्यांत आले. त्यांत प्रसिध्द समाजसेवक श्री गोपाळ कृष्ण देवधर ह्यांनीं प्रमुख भाग घेतला. ह्या प्रकाराविरुध्द प्रचारार्थ कांहीं गाणीं श्री. मुदलियार यांची कन्या कु. ठकूताई हिनें केलीं होतीं.

२६ सप्टेंबर १९०९ रोजीं श्रीमंत सर सयाजीराव महाराज यांच्या हस्तें आणि अध्यक्षतेखालीं हा समारंभ मोठया थाटानें पार पडला. इडारचे अधिपति श्रीमंत प्रतापसिंग, लेडी म्यूर मॅकेंझी, भोरचे अधिपति रावसाहेब, नामदार गोखले, डॉ. भांडारकर, सरदार नौरोजी पदमजी वगैरे थोर मंडळी प्रमुख स्थानीं बसली होती. इस्लामिया स्कूल हॉलमध्यें चिक्कार गर्दी भरली होती. कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅन यांनीं पाहुण्यांचें स्वागत केलें. ह्यावेळीं एक वादग्रस्त प्रश्न उद्भवला. महार जातीचे पुढारी शिवराम जानबा कांबळे यांचे नेतृत्वाखालीं एक मानपत्र महाराजांना देण्याचा विचार ठरला. पण हें मानपत्र महार जातीकडूनच दिलें जावें असा त्यांचा आग्रह पडला. इतर अस्पृश्य जातींनाहि त्यांत भाग घ्यावासा वाटला. हा वाद लवकर मिटेना आणि समारंभाचा तर दिवस जवळ आला म्हणून मुंबईहून मला बोलाविण्यांत आलें. सर्व वर्गाच्या पुढा-यांना बोलावून त्यांना मीं सांगितलें की, मिशनचें रजिस्टर्ड ट्रस्ट डीड आहे; त्याबरहुकूम मिशनला अशा प्रकारचें जातिविशिष्ट काम करण्याचा अधिकार नाहीं. मिशनचे कार्यामध्यें जीं वरिष्ठवर्गीय माणसें आहेत तीं सर्व जातींचीं व धर्मांचीं आहेत. पण त्यांनाहि सार्वत्रिक उदार धर्माच्या पायावरच मिशनचें कार्य करावें लागत आहे. स्वतः महाराज सरकारांनाही जातिविशिष्ट मानपत्र रुचणार नाहीं. ह्या उपर महार लोकांचा आग्रहच असेल तर आणि महाराज असें मानपत्र स्वीकारीत असतील तर ह्या मंडपाचे बाहेर अन्य ठिकाणीं व अन्य वेळीं कुणीहि मानपत्र द्यावें. येथेंच आणि आतांच द्यावयाचें असेल तर सर्व अस्पृश्यवर्गानें एकत्र होऊन द्यावें. त्यांनीं हा एकत्रपणा दाखविला नाहीं तर त्यांच्यासाठीं काम करण्यामध्यें वरिष्ठ वर्गालाहि विघ्नें येऊं लागतील. सर्वांची समजूत पटून मिळून मिसळून मानपत्र समारंभ झाला. ह्यानंतर सेक्रेटरी मुदलियार यांनीं अहवाल वाचला. लेडी म्यूर मॅकेंझी यांचें सुंदर व जोरदार भाषण झालें. शेवटीं महाराजंनीं यथोचित भाषण करून १००० रु. ची देणगी दिली. तो कायम निधि समजून दमाजीराव गायकवाड स्कॉलरशिप या नावानें होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या देण्याचें ठरलें. ीमंत सयाजीराव महाराजंना ह्या प्रसंगी मानपत्र देण्यांत आल्यावर महार, मांग व चांभार जातींच्या तीन स्त्रियांनीं महाराजांना आरती ओवाळली. तेव्हा महाराजांनीं प्रत्येक आरतींत एक सोन्याची गिनी टाकली.

ता. १८ ऑक्टोबर १९०९ रोजीं हा डिप्रेसड् क्लास मिशन डे साजरा करण्यासाठीं पुणें शहरीं किर्लोस्कर थिएटरांत एक प्रचंड जाहीर सभा भरविण्यांत आली. पुणें शहरांत अशा प्रकारची ही पहिलीच सभा होती. मिशनला चोहीकडून मदत जरी मिळाली तरी पुण्यासारख्या जुन्या वळणाच्या शहराची मदत अद्याप मिळावयाचीच होती; म्हणून हा समारंभ घडवून आणला. प्रि. र. पु. परांजपे अध्यक्षस्थान स्वीकारलें. महारांचे पुढारी श्रीपतराव थोरातराव, सुप्रसिध्द वकील ल.ब. भोपटकर, मुसलमानांचे पुढारी इस्माइल बहादूर, हंपी येथील शंकराचार्योचे एजंट रा. हरकारे, रा. न. चिं. केळकर, प्रो. धर्मानंद कोसांबी वगैरेंनीं जोरदार भाषणें केलीं. अध्यक्षांचे आभार मानतांना प्रो. धोंडो केशव कर्वें वगैरेंनी आपली १०० रु. ची देणगी जाहीर केली. रा. हरकारे यांनीं आपल्या भाषणाचे शेवटीं हंपीचे शंकराचार्यांचें प्रत्यक्ष सहानुभूतीचें द्योतक म्हणून त्यांचे आज्ञेनुसार ३०० रु. ची देणगी दिली. ह्या सभेमुळें ह्या इतिहासप्रसिध्द शहराचें हृदयकपाट उघडलें.

२५ एप्रिल १९१० रोजीं जेजुरीच्या यात्रेंत मुरळी-प्रतिबंधक जाहीर सभा पुणें शाखेकडून भरविण्यांत आली. खडकीचे लक्ष्मणराव सत्तूर, मुंबईहून मी स्वतः व एस. के. नाईक ह्या सभेस मुद्दाम हजर होते. मुरळी सोडण्याची दुष्ट चाल महाराष्ट्रांत प्रसिध्दच आहे. मुरळी सोडण्याचा धार्मिक विधि आणि तिचा प्रसार ह्या खंडोबाचे देवळांतूनच होतो. ही चाल बंद पाडण्यांत यावी असा ह्या सभेचा हेतू होता; पण अस्पृश्यवर्गीय जनतेला मान्य होण्यासारखा तो काळ नव्हता. कित्येक लोक दारूनें झिंगून सभेला विरोध करूं लागले. सभा चालविणें अशक्य झालें. मिशनमधील भजन करणा-या विद्यार्थ्यांकडून गाणीं म्हणविण्यांत आलीं तेव्हां सभेला नवीन रंग येऊन ती यशस्वी रीतीनें पार पडली. पुढें जी मुरळी-प्रतिबंधक चळवळ मोठया प्रमाणावर झाली तिचें मूळ ह्या सभेंत आहे.

येथपर्यंत अंगभूत शाखांतील केंद्रीभूत कार्याचें वर्णन केलें. आतां मेघवृष्टीनें सर्व देशभर जें कार्य झालें त्याचें कथन करतों. हीं दोन भिन्न कार्यें समांतर आणि सारखीं चालूं ठेवणें अवश्य असतें. १९१० सालीं या कार्यांत मुंबई सोशल रिफॉर्म असोसिएशनचें सहकार्य लाभलें. मिशनच्या संस्थापनेचा दिवस ता. १८ ऑक्टोबर १९०६ हा होता. ह्याचें स्मरण सर्व देशभर व्हावें म्हणून हिंदुस्थानच्या कानाकोप-यांतून ठिकठिकाणीं जाहीर मोठमोठया विभूतीच्या अध्यक्षतेखालीं सभा भरविण्यांत आल्या. त्याचा परिणाम फार मोठा झाला. अस्पृश्यांत जागृत झाली; त्यांच्यांत ऐक्य वाढीस लागलें. स्पृश्य लोकांत कळकळीचा प्रादुर्भाव होऊन तो जोमास लागला. अनेक देणग्या मिळाल्या. देशामध्यें चोंहिकडे मिशनच्या कामाबद्दल हार्दिक सहानुभूति भरपूर मिळत आहे हें सिध्द झालें. पुढच्या वर्षी पुन्हा एकवार चोंहिकडे जाऊन वरील सहानुभूतीचा व्यावहारिक फायदा घ्यावा म्हणून मीं प्रतिनिधि या नात्यानें निरनिराळे चार दौरे काढले. त्यावेळीं बरोबर माझी बहीण जनाबाई, सन्माननीय कार्यकर्ते अमृतलाल ठक्कर आणि मदतनीस अबदुल कादर हेहि होते. व-हाड, काठेवाड, कर्नाटक प्रांत, पश्चिम किनारा या ठिकाणीं अनेक व्याख्यानें दिलीं. निरनिराळया संस्थांना भेटी दिल्या. स्थानिक कार्याचा परिचय करून घेतला आणि देणग्या व वर्गणीहि जमा केली. जुन्या संस्थांना उपयुक्त सूचना दिल्या आणि नव्या संस्था निर्माण केल्या.

या दौ-याशिवाय भगिनी जनाबाई ह्या ३ नोव्हेंबर १९१२ रोजीं व-हाडांत हिंडून तेथील परिस्थिति पाहून फंड जमविण्यासाठीं दौ-यावर निघाल्या. अमरावती, यवतमाळ, यूगांव, रामसौर, खामगांव, मलकापूर, धुळें वगैरे ठिकाणीं फंड जमवून त्या मुंबईस परत आल्या. खर्च वजा जाऊन त्यांनी सुमारें ६०० रु. फंड जमविला होता. त्यानंतर मी स्वतः पुन्हां अमरावती, यवतमाळ येथें जाऊन व्याख्यानें देऊन यवतमाळ येथें एक अस्पृश्य वसतिगृह काढण्याची तयारी करून आलों. यवतमाळचे रा. ब. मुंडले वकील, जमीनदार लांडगे, जिनिंग फॅक्टरीचे मालक द्रवीड यांचे सहाय्यानें तेथें एक वसतिगृह स्थापण्यांत आलें. याची व्यवस्था भगिनी जनाबाई यांच्याकडे सोंपवून त्यांना तिकडे पाठविण्यांत आलें. कोल्हापूरचे रा. जी. के. कदम, वकील यांनाहि त्यांच्या मदतीला देण्यांत आले होते.

१९१४ च्या डिसेंबरपासून १९१५ च्या एप्रिल अखेर निराश्रित साह्यकारी मंडळीचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांनीं दक्षिण हिंदुस्थानांतील अस्पृश्यांची कठिण स्थिति शहरांतून आणि खेडयांतून फिरून स्वतः नजरेनें पाहण्यासाठीं, व्याख्यानें आणि मुलाखतींचे द्वारा सदर मंडळीचे कार्यांत हातभार लावण्यासाठीं विस्तृत दौरा काढला. मद्रासच्या डी. सी. एम. च्या शाखेनें अखिल भारतीय मिशनच्या वतीनें डिसेंबरमध्यें १९१४ सालीं ऍंडरसन हॉलमध्यें एक परिषद भरविली. तिचें अध्यक्षस्थान चंदावरकरांनीं पतकरलें. पुढें त्याच महिन्यांत मद्रासचे गव्हर्नरांचे अध्यक्षतेखालीं एक मोठी जाहीर सभा भरविण्यांत आली. त्यावेळीं सर नारायण चंदावरकरांनीं भाषण करून मिशनच्या मुंबईकडील कार्यासंबंधीं माहिती कळविली. गव्हर्नरसाहेबांनीं मिशनच्या कार्याचा गौरव करून मदतीचें आश्वासन दिलें. त्यानंतर सर नारायणराव यांनीं कोईमतूर, पालघाट, तेलीचेरी इत्यादि ठिकाणीं हिंडून, गोरगरिबांत मिसळून बारकाईनें त्यांची स्थिति निरखिली. आणि परत आल्यावर आपल्या निरीक्षणासंबंधींचीं पत्रें ‘टाइम्स ऑफ इंडिया’व ‘सोशल रिफॉर्मर’मध्यें प्रसिध्द केलीं. मंगळूरचे के. रंगराव, पालघाटचे श्री. शेषय्या आणि वल्लभराजा, कालिकतचे मि. रामप्पी, मि. मोमन, मि. मंजेरी रामय्या, तेलीचेरीचे मि. केळू वगैरे कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना उत्तेजन दिलें. ही सर्व उत्साही मंडळी जरी थोडी असली तरी त्यांच्या कार्याचें महत्व फार होतें. ह्या दौ-याचा परिणाम दक्षिणेंतील कार्यावर फार मोठा झाला.

अस्पृश्यांनीं ठराविक रस्त्यावरून चालावयाचें नाहीं, व इतर रस्त्यावरून चालतांना आपल्या जातीचा पुकारा करीत चालावयाचें, हा प्रकार मलबारखेरीजइतर कोणत्याहीं प्रांतांत नाहीं. मलबारांत जातीजातीच्या सूक्ष्म भेदाचें अवडंबर फार असून कडक नियम पाळण्यांत येतात. हें पाहून स्वामी विवेकानंदांनीं मलबार हें एक वेडयाचें इस्पितळ आहे असें म्हटलें आहे. अस्पृश्यांस भीक मागण्याची परवानगी नाहीं, प्रामाणिकपणें काम करण्याचीहि मुभा नाहीं. याबद्दल सर नारायणरावांनीं कडक टीका करून त्यांना उद्योग करण्याची तरी परवानगी देण्यांत यावी अशी करुणा भाकली. मलबारांत नायादी म्हणून नीचतम मानलेली एक जात आहे. त्यांच्याशीं सर नारायणरावांनीं भाषण केलें. त्यांच्या भाषणांत पुष्कळ संस्कृत शब्द आलेले पाहून सर नारायणरावांना फार आश्चर्य वाटलें. नीचांतला नीच, अक्षरशत्रू, चांभारापासूनही शंभर यार्ड दूर रहावें हा त्याचा अधिकार आपली अस्पृश्यता पुकारीत भीत भीत जो गांवांत येतो, त्याच्या तोंडीं इतके संस्कृत शब्द, त्यांचीं नांवें उच्चवर्णीयांसारखीं हें कसें, ह्याचें सर नारायणराव ह्यांस फार आश्चर्य वाटलें. चौकशीअंतीं त्यांस असें कळून आलें की, नायादी लोकांचें मूळ नंबुद्री ब्राह्मणापर्यंत पोचलें ! नंबुद्री ब्राह्मण कुटुंबांचे हातून कांहीं प्रमाद घडले म्हणून त्यांस बहिष्कृत करण्यांत आलें. त्यांचें पतन होत होत त्यांस आज नायादी जातीची स्थिति प्राप्त झाली. सर नारायणराव  ह्यांनी   मलबारांत केलेला प्रवास अस्पृश्योद्वाराचे बाबतींत बराच जागृतीस कारण झाला.