प्रकरण ७. स्थानिक समाज (2)

 १९०३ सालीं मी विलायतेहून परत येण्यापूर्वी श्रीमंत सयाजीराव महाराज यांचेकडून पत्र आलें होतें कीं, स्वदेशीं आल्यावर प्रथम त्यांना भेटावें. याप्रमाणें मी त्यांना स्वदेशीं आल्यावर १९०३ च्या आक्टोबरांत भेटण्यास गेलों. त्यावेळीं अस्पृश्यांसाठीं बडोद्यांत चार प्राथमिक शाळा होत्या. त्या मीं तपासून पाहण्यासाठीं तजवीज करावी असें महाराजांनीं विद्याधिका-यांस फर्मावलें. तपासून कांहीं सूचना करावयाच्या असल्यास महाराजांना समक्ष करावयास सांगितलें. सर्व शाळा जोरांत चालल्या होत्या. परंतु प्राथमिक शिक्षण संपल्यावर मुलांना पुढें वाव नसल्यानें तीं मोकळीं हिंडत होतीं. पुस्तकी शिक्षणामुळें तीं आपल्या वडिलांचे हलके धंदे करण्यास असमर्थ आणि नाखूष होतीं. मीं ही गोष्ट महाराजांचे कानीं घालून मुलांच्या नोकरीविषयीं कांहीं झाल्यास करावें, अशी सूचना केली. धोरणी महाराजांनी लोकमत अनुकूल नसल्यानें तूर्त हें शक्य नाहीं असें सांगितलें. पण शिष्यवृत्या देऊन पुढील शिक्षणाची सोय करण्याचें कबूल केलें, आणि त्याप्रमाणें तशी व्यवस्था पण झाली.

बडोदें गांवांतील मराठे मंडळींनीं माझें स्वागत करून पानसुपारीचा एक जाहीर समारंभ केला. श्रीमंत खासेराव जाधव यांचा या बाबतींत पुढाकार होता. पण एकामागून एक जीं वक्त्यांचीं भाषणें झालीं त्यांतून प्रतिकूल सूरच निघूं लागले. माझें सर्व शिक्षण मराठा समाजाचे खर्चांतून झाल्यानें व विलायतेला जाण्या-येण्याचा खर्चहि महाराजांकडून मिळाला असतां मी मराठासमाजाच्या सेवेला हजर न होतां प्रार्थंना समाजांत शिरलों हें बरें केलें नाहीं. अशीं भाषणें करून माझ्या गळयांत माळ गालावयास मंडळी जेव्हां पुढें आली तेव्हां उत्तर देतांना मीं म्हटलें कीं, ''असें जर आहे तर मी ही माळ घालण्यास लायक नाहीं, म्हणून मी हातांतच घेत आहे. प्रार्थना समाज सर्वांसाठींच आहे, आणि त्यासाठीं मला तयार केलें हें मराटयांस, विशेषतः महाराजांना भूषणावह आहे. स्वतः महाराज हेच जर केवळ मराठयांकरितां नाहींत तर त्यांचा अनुयायी मी निराळा कसा होऊं ?''
१९०४ सालीं काँग्रेसचें अधिवेशन मुंबईस ठरलें. सामाजिक परिषदेचें अद्यक्षस्थान या वर्षी महाराजांना द्यावयाचें ठरलें होतें. ह्याच वेळीं एकश्वरी धर्माच्या परिषदेची पुनर्घटना करून तिचें अधिवेशन मुंबईस करण्याचे कामीं मीं पुढाकार घेतला होता. त्या वेळीं मुंबई प्रार्थना समाजास भेट द्यावी व समाजाच्या रात्रीच्या शाळांच्या बक्षिस-समारंभामध्यें अध्यक्षस्थान स्वीकारावें म्हणून महाराजांना आमंत्रण करण्यासाठीं मी बडोद्यास डिसेंबर १९०४ मध्यें गेलों. त्यावेळीं तेथील हायकोर्टचे जज्ज डॉ. भांडारकर यांचे बंधु श्री. वासुदेवराव गोपाळराव भांडारकर हे होते. त्यांचेकडे मी उतरलों. हे प्रार्थना समाजाचे सभासद होते. शेठ हरगोविंददास कांटावाला वगैरे जुन्या पुढा-यांच्या नेतृत्वाखालीं बडोद्यास एक प्रार्थना समाज चालविला होता. पण त्याचें काम हल्लीं बंद होतें. बडोद्यांतील जयसिंगराव स्टेट लायब्ररीमध्यें महाराजांच्या आज्ञेनें माझें जाहीर व्याख्यान करविण्यांत आलें. महाराजांनीं मुंबईस समाजाचे परिषदेच्या कामांत भाग घेण्याचें मान्य केलें.
सन १९०७ च्या आक्टोबर अखेरीस हिंदुस्थानच्या नैॠत्य किना-यावरील मंगळूर शहरांतील ब्राह्मसमाजाकडून मला तिकडे नेण्यासाठीं त्या समाजाचे एक सभासद रा. व्यंकटाप्पा कांताप्पा मुंबईस आले. मी व चि. जनाक्का श्री. व्यंकटाप्पाबरोबर आगबोटीनें निघालों. मंगळूरला पोहोंचल्यावर समाजाचे अक्षरशः सर्व सभासद स्त्रीपुरुष आणइ मुलें माझें स्वागत करण्यासाठीं बंदरावर आले होते. मंगळूर हें बंदर उतरण्यास कठीण असल्यामुळें आगबोट बंदरापासून लांब थांबते. लहानशा मचव्यांतून उतारूंना बंदरावर पोहोंचविण्यांत येतें. ही सर्व मंडळी माझ्यासाठीं कितीतरी वेळ उन्हांत तिष्ठत होती. त्यांचें हार्दिक स्वागत पाहून आम्हांला गहिंवर आला. वृध्द अध्यक्ष उल्लाळ रघुनाथय्या, चिटणीस के. रंगराव, खजिनदार कृष्णराव गांगुली, कर्नाड सदाशिवराव व आणखी कांहीं थोडी सारस्वत ब्राह्मण घराणीं होतीं. बाकी सर्व तिकडील प्रांतांतील बिल्लव जातीचे सभासद होते. ही जात तिकडे अस्पृश्य मानलेली होती. पण तो आश्रम पालटून ब्राह्मसमाजांत प्रवेश झाल्यावर हे सर्व समासद सर्रास वरिष्ठ वर्गात मोडूं लागले. यामुळें ह्या ब्राह्मसमाजाच्या प्रसारामध्यें या प्रांतांतील कामानें फार वरचा नंबर पटकावला आहे.

ब्रह्मानंद केशवचंद्र सेनच्या अमदानींत त्यांचे पट्टशिष्य प्रतापचंद्र मुझुमदारांनीं ह्या कामीं पुढाकार घेतला होता. त्यावेळी बिल्लव जातीचे पुढारी आलसाप्पा नांवाचे वजनदार गृहस्थ हे होते. पांच हजार बिल्लव ब्राह्मसमाजाची दीक्षा घेण्यास तयार आहेत अशी तार त्यांनीं केशवचंद्र सेन यांना केल्यामुळें प्रतापचंद्र यांना पाठविण्यांत आलें. त्यांचें स्वागत करण्यासाठीं बंदरावर ह्या जातीचा प्रचंड समुदाय जमला होता. पण प्रतापचंद्र मुझुमदार महाशय अस्सल इंग्रजी पोशाखांत जेव्हां मचव्यांतून बंदरावर उतरले तेव्हां त्यांना पाहून हा जमलेला समाज बिचकला.हे कुणीतरी ख्रिस्ती मिशनरी आपणांस बाटविण्यांत आले अशी वास्ती घेऊन सगळया गर्दीची पांगापांग झाली. आणि बिचा-या आलसाप्पाजवळ कोणी उरला नाहीं. प्रतापचंद्रांनीं धीर सोडला नाहीं. आलसाप्पा यांच्या घरीं जाऊन उतरले. दुसरे दिवशीं सकाळीं ब्रह्मोपासनेत प्रतापबाबू बसले त्यावेळीं त्यांनीं आपली साधी शुध्द बंगाली शाल अंगावर घेतली होती. ती त्यांची शुभ्र विपुल दाढी, मोकळया डोक्यावरील लांब आणि कुरले केस हा अस्सल देशी देखावा पाहून आदले दिवशीं उधळून गेलेल्या लोकांस थोडा थोडा धीर येऊं लागला. आपलें इंग्रजींतील अमोघ वक्तृत्व आणि मायाळू प्रचाराचे जोरावर त्यांनीं लवकरच वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गावर छाप बसविली. ब्राह्मसमाजाची स्थापना केली. त्यानंदतर नवविधनसमाजाचे अनेक प्रचारक, विशेषतः अमृतलाल बोस, बलदेव नारायण, साधारण ब्राह्मसमाजाचे हेमचंद्र सरकार वगैरेंनीं अमोलिक कामगिरी केली. अमृतलालची शिस्त, बलदेव नारायणाचा भक्तिभाव, हेमचंद्रांचें घटनाकौशल्य ह्यांचे ठसे अद्याप दिसत आहेत. या परंपरेंत मीं या पवित्र भूमीवर पाय टेवला. सुमारें एक महिना अत्यंत सुकासमाधानानें आम्हीं या बालबोध समाजाची सेवा केली, आणि ती त्यानें गोड करून घेतली. विशेषतः आम्हठ दोघां भावंडांना या प्रांताची कानडी भाष येत असल्यानें या समाजांतील लहान थोर मंडळी आम्हाशीं अगदीं आपुलकीनें बिलगली. आम्हांपासून त्यांना लाभ झाला व त्यांच्यापासून आम्हाला झाला.

ह्या प्रांतीं कोंकणी या नांवाची ब्राह्मणांची एक पोट जात आहे. त्या जातीचे प्रतिनिधी विद्येंत, व्यापारांत व सरकारी नोकरींत पुढारलेले आहेत. त्यांना मराठी भाषेचा फार अभिमान वाटत असे. त्यांनीं माझीं मराठींत व्याख्यानें, उपासना व कीर्तनें मोठया आवडीनें करविलीं. रा. सुब्बराव पै या नांवाचे एक प्रेमळ गृहस्थानें एक लहानशी मराठी शाळा काढण्यांत पुढाकार घेतला.

समाजाचे उत्साही चिटणीस के. रंगराव ह्यांनीं अस्पृश्यांच्या उध्दरासाठीं मुंबईच्या निराश्रित मंडळींची सुरुवात होण्यापूर्वीच १८९७ सालीं सुरवात केली होती. मुंबईत गेल्या वर्षी मी अखिल भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची ( All India Depressed Classes Mission) सुरुवात केली होती. म्हणून के. रंगराव यांनीं विशेष उत्साहानें मला बोलावून नेले होते. आजपर्यंत ह्या कामीं ते एकटेच खपत होते. मीं ह्या कामाची पुनर्घटना केली. गांवांतील पांच प्रमुख पुढा-यांची एक कमिटी नेमून के. रंगरावांच्या जोडीला दिली. आणि अखिल भारतीय निरिश्रत साह्यकारी मंडळीची ही मंगळूर शाखा म्हणून त्या मंडळीशीं ही संलग्न केली. पुढें हिची वाढ झपाटयानें झाली. ह्या नैॠत्य किना-यावरील द्राविड संस्कृति,लोकरिवाज, आश्चर्यकारक इतिहास यांचें निरीक्षण करण्यास बरीच मोठी संधि मिळाली. ब-याच वेळां मी या प्रांतीं पुढें निरनिराळया कामानिमित्त येऊन गेलों.
आम्हा दोघां भावंडांची उतरण्याची सोय या बिल्लव मंडळींनीं एका स्वतंत्र बंगल्यांत केली होती. तरुण स्वयंसेवक नेहमीं कामाला हजर असत. बिल्लव मंडळीची माझ्यावर अपूर्व भक्ति होती. मला ते आपले गुरु मानून ते आमच्या अर्ध्या वचनांत रहात असत. नरसाप्पा व नारायणाप्पा या नांवाचे दोघे बंधू आमच्या बंगल्यांत सहकुटुंब राहात असत. आमच्या पाहुणचाराची जबाबदारी त्यांच्यावर असे. तो करण्यामध्यें त्यांची केव्हां केव्हां अशी चुरशीची चढाई लागे कीं, ''देवा आमचे ह्या शिष्यांपासून रक्षण कर'' असें म्हणण्याची आम्हावर पाळी येई. एकदां आमचीं कामें करण्यासाठीं ह्या दोघां भावांचें अक्षरशः मल्लयुध्द जुंपलें. मी तें सोडविण्यास गेलों असतां त्या दोघांचे आघात माझ्या पाठीवर पडून ती बरीच तिंबूल गेली. कारण ही वेळ पहाटेची असल्यानें अंधारांतच हा प्रकार चालला होता. त्या दिवशींचा स्वयंपाक कोणीं करावा याबद्दल वाद उप्सथित झाला होता. जो तो मी करणार असें अट्टाहासानें म्हणें. उजाडल्यावर माझ्या पाठीवरचे वळ पाहून दोघे भाऊ लहान मुलासारखे स्पुंच्दून स्पुंच्दून रडूं लागले. त्यांची समजूत घालण्यास बरीच शक्ति खर्च करावी लागली.

मंगळूरभोंवतीं सृष्टिसौंदर्य अपूर्व आहे. नद्यांचीं रुंद पात्रें, दोन्ही बाजूला सुंदर रेती व त्यापलीकडे लाल मातीच्या टेकडया, व त्यावरील गर्द झाली वगैरे शोभा सर्व ॠतूंत अपूर्व दिसते. अडयार नांवाच्या जवळच्या एका खेडयाला मीं बोटींतून सफर काढली. बिल्लव जातीचे पुढारी व समाजाचे सभासद व श्रीयुत व्यंकटाप्पा बोळार या नांवाचे पोलीस अधिकारी बरोबर होते. त्यांनीं ह्या सफरीची सर्व सोय केली होती. आम्ही जंगलांत राहणा-या बिल्लव जातीच्या गृहस्थितीचें निरीक्षण करण्यासाठीं एका घरांत शिरलों. मोठमोठया जमीनदारीच्या जमिनीवर राबण्यासाठीं हे लोक वंशपरंपारगत कुळें म्हणून खपत असत. ह्यांची स्थिति जवळ जवळ जनावरासारखीच असे. झाडाखालच्या क्षुद्र झोंपडींत राहणें, ताडीमाडीच्या लाकडांचीं कांहीं क्षुल्लक उपकरणें एवढीच यांची संपत्ती. अंगारच्या पोशाखाशिवाय बदलावयाला कपडे नसत. मी एका म्हाता-या स्त्रीला तिचें वय विचारलें. तिनें लाजून म्हटलें, “मला काय माहीत? माझ्या जमिनीच्या मालकाला ठाऊक असेल.”  अशा लोकांसाठीं रा. रंगरावांनीं मिशन काढलें यांत काय नवल? या लोकांचीं मुलें दिवसभर कुठें तरी झाडावरील चिंचा, बोरें व केव्हां झाडपाला खाऊन पोट भरीत. रात्रीं थोडीशी कांजी मिळाल्यास ती चाटून चाटून खात. औषधपाण्याची त्यांना गरजच लागत नसे. पुढें चार सहा आठवडयांनीं आम्हीं मुंबईस परत आलों.

१९०६-७ च्या सुमाराला चि. जनाक्का कोंकणांतील पनवेल या गांवीं तेथील म्युनिसिपल शाळेंत मुख्य शिक्षक या नात्यानें काम करीत होती. सुधारक म्हणून हिला तेथें फार विरोध होऊं लागला. तिचेबरोबर आई, बाबा आणि माझा मुलगा प्रताप हे रहात होते. प्रार्थनासमाजाचीं तत्वें तेथील लोकांस कळवून दिल्यास गैरसमजूत कमी होऊन विरोध कमी होईल या आशेनें स्वामी स्वात्मानंदजीला बरोबर घेऊन मी पनवेलास गेलों. ज्या द्रव्यामुळें प्रकृतींत बिघाड होतो तींच द्रव्यें शरीरांत लहान प्रमाणावर घालून रोग बरा करण्याच्या प्रकाराला होमीओपथी म्हणतात. सुधारणेमुळें लोकांना चीड आलेली होती. त्याच सुधारणेच्या लहान गुटिका लोकसमाजाला देण्यांत ही आमची आध्यात्मिक होमीओपथी होती. स्वात्मानंदजी हे मूळचे आर्यसमाजिस्ट असल्यानें साधकबाधक कोटिक्रम आणि जुन्या ग्रंथांचे आधार देऊन वाद करण्याच्या पध्दतींत स्वामिजींचा हातखंडा असे. वादाचे मुद्दे संपल्यावर स्वामिजी केव्हां केव्हां आल्या हातांतला दंडाहि उगारीत. तुलनात्मक धर्मपध्दति, आधुनिक धर्मविवेचन, अखिल जगताचें हळू हळू पालटणारें लोकमत, राजकारणासारख्या ऐहिक प्रश्नावर होणारा त्याचा परिणाम वगैरे विषयावर माझें विवेचन होत असें.  या जोडगोळीनें पनवेलच्या वरिष्ठ वर्गावर थोडाबहुत परिणाम झाला, आणि चिरंजीव जनाक्काच्या मुलींच्या शाळेंत मुलींची हजेरी पण सुधारली. अशा स्थितींत पनवेलचे गंगारामभाऊ सुभेदार हे महार गृहस्थ लष्करी पेन्शनर होते. त्यांना माझे बाबांनीं आपल्या घरीं चहाला बोलाविलें. त्यामुळें आम्हीं मुंबईस परत आल्यावर लोकमताला पुन्हां ऊत आला. बराच त्रास भोगावा लागला. इतका कीं आमचे घरची मोलकरीण काम सोडून गेली, बाबांना हजामतीची पंचाईत पडली. तेथील मामलेदार रा. बेंदूरकर नांवाचे एक प्रागतिक सज्जन गृहस्थ होते. म्युनिसिपालिटींत एक सभ्य व सज्जन मुसलमान होते. ह्या दोघांचें साहाय्य न मिळतें तर चिरंजीव जनाक्काला ही नोकरी सोडून मुंबईस परतावें लागलें असतें. ह्यापुढें कोंकणांत अलिबाग, मालवण, सावंतवाडी, गोवें, आंबोलीचा घाट, दापोली वगैरे ठिकाणीं प्रचारकार्यास मी वेळोवेळीं जाऊन आलों. मालवण ही डॉ. भांडारकरांची मायभूमि. त्यावेळीं तेथें इंदूर समाजाचे सभासद आत्माराम सदाशिव केळकर हे रहात असत. त्यांचे साहाय्यानें तेथील प्रार्थना सभेची पुनर्घटना केली आणि अस्पृश्यांसाठीं देखील बरींच महत्वाचीं अशीं कांहीं कामें केलीं.

विलायतेला जाण्यापूर्वीपासूनच मी कोल्हापुरीं माझे मित्र गोविंदराव सासने, डॉ. कृष्णाबाई केळवकर यांचेकडे वेळोवेळीं जात होतों. त्यावेळीं तेथील ग्रंथांलयांत माझीं व्याख्यानें होत असत. मी विलायतेला जाण्याच्या प्रवासखर्चाबाबत श्रीमंत शाहू महाराजांकडून तीनशें रुपयांची मदत मिळाली होती. १९०९ सालच्या उन्हाळयांत कोल्हापूर येथें माझें एक महत्वाचें व्याख्यान झालें. त्यापूर्वीं मी मुंबईस अखिल भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची स्थापना केली होती. कोल्हापुरांत गणपत कृष्णाजी कदम, वकील यांचें लक्ष प्रार्थना समाजाच्या कार्याकडे लागलें होतें. प्रार्थना समाजाचे कांहीं प्रसिध्द पुढारी घेऊन कोल्हापुरास प्रचारकार्यासाठीं यावें म्हणून त्यांचा आग्रह पडला. छत्रपति शाहू महाराजांचीहि तशी इच्छा दिसली. आर्यसमाजाला तर त्यांनीं भरपूर साहाय्य दिलेंच होतें; आणि आपल्या समाजकार्यांत प्रार्थना समाजाचाहि त्यांना प्रयोग करून पहावयाचा होता. सिंधचे प्रसिध्द प्रोफेसर टी. एल्. वास्वानी, भक्त डॉ. रुबेन, कलकत्याचे प्रमथलाल सेन, मुंबईचे प्रसिध्द प्रो. वेलिनकर या चौघांना घेऊन मी १९०९ च्या ऑक्टोबरच्या अखेरीस पुणें, सातारा मार्गें कोल्हापुरास गेलों. मराठा वसतिगृहाची इमारत गांवाबाहेर होती. तिच्या जवळील एका स्वतंत्र बंगल्यांत सरकारी पाहुणे म्हणून आमची उतरण्याची सोय करण्यांत आली होती. तेथील राजाराम कॉलेजांतील दिवाणखान्यांत प्रो. वास्वानी व वेलिनकर यांचीं व्याख्यानें व बाबू प्रमथलाल सेन यांची उपासना आणि माझें हरिकीर्तन वगैरे प्रसंग करविण्यांत आले. पण सर्वांत अधिक लोकमताचें आकर्षण डॉ. रुबेन यांच्या एकतारीनें केलें. आम्ही पाहुणे मंडळी सरकारी गाडींतून बसून गांवांत निघालों असतां डॉ. रुबेनला एकदम स्फूर्ति येऊन त्यांनीं खाली उतरावें, आणि भर बाजारांत आपल्या एकतारींत तल्लीन व्हावें, भोंवताली प्रचंड गर्दी व्हावी, आमच्या गाडीला वाट मिळूं नये, असें वारंवार होऊं लागलें. डॉ. रुबेनला एकटें सोडावें तर आम्हाकडे कोण येणार! घेऊन जावें तर गर्दी वाटच सोडेना. असा वेळोवेळीं पेंच पडे. एकंदरींत कुणीकडून तरी प्रचाराचें कार्य होवो म्हणून आम्ही हा पेंच मुकाटयानें सहन करीत असूं.

कोल्हापुरांत या भेटीमुळें एक नवीन प्रार्थना समाज सुरू करण्याची तयार झाली आहे असें रा. कदम यांना वाटूं लागलें. बळवंत कृष्णाची पिसाळ या नांवाच्या तरुण गृहस्थाला बरोबर घेऊन रा. कदम यांनीं ह्या कामास हळूहळू सुरुवात केली. रा. सावंत, रा. खंडेराव बागल, डॉ. कृष्णाबाई केळवकर, रा. गोविंदराव सासने वगैरे मंडळींचें या कामास प्रोत्साहन मिळालें.

पुढें सन १९११ सालच्या में महिन्यांत पुण्याचे रा. गणपतराव कोटकर, गणपतराव आंजर्लेकर, चि. जनाक्का व तिच्या शालेंतील मैत्रिणी श्रीमती सीताबाई मराठे व सौ. गुलाबबाई वैद्य या मंडळींसह मी कोल्हापुरास पुन्हां गेलों. मुंबईचे बलभीमराव केसकर हे आपल्या घरांतील मंडळींसह अगोदरच तेथें जाऊन राहिले होते. कोल्हापुरच्या समाजाचा त्या वेळीं कार्यक्रम ठरला होता, व त्यांत आम्हीं भाग घेतला. सरकारांतून योग्य ती मदत कोल्हापूर प्रार्थना समाजास मिळाली. याच प्रसंगीं करवीर मठाचे जुने शंकराचार्य (डॉ. कूर्तकोटींच्या पूर्वींचे) यांनीं माझें एक खास हरिकीर्तन आपल्या मठांत करविलें. श्री स्वतः श्रवणास हजर होते. रिवाजाप्रमाणें त्यांनीं नारळ आणि धोतरजोडा देऊन माझी यथोचित संभावना केली. याच भेटींत रा. बागल आणि त्यांचे नातेवाईक रा. बाबासाहेब सावंत वकील यांचे घरीं कौटुंबिक उपासना झाल्या. गांवाबाहेर एका सृष्टिसौंदर्याचे ठिकाणीं एक वनोपासना झाली. तींत डॉ. कृष्णाबाई केळवकर यांनीं पुढाकार घेतला होता. हा समाज पुढें कांहीं वर्षें चालून बंद पडला. रा. ब. कृ. पिसाळ यांनीं ‘विश्वबंधु’ या नांवाचें साप्ताहिक पत्र तसेंच कांही वर्षें चालविलें. पोस्टल मिशनचें कामहि तेच करीत होते.

प्रकरण ७. स्थानिक समाज

 मुंबई शहराशिवाय महाराष्ट्रांत पुणें, सातारा, अहमदनगर, गुजराथेंत अहमदाबाद, बडोदें, आणि माळव्यांत इंदूर वगैरे ठिकाणीं प्रार्थना समाजाचे स्थानिक समाज आहेत. ह्यांचे सालोसाल वार्षिक उत्सवाचे समारंभ होत असतात. ते जवळ जवळ आठवडाभर चालत असतात. त्यांत भाग घेण्यास मला जावें लागे.

१९०५ सालच्या उन्हाळयांत सातारा येथील उत्सवासाठीं मी गेलों. रा. सीतारामपंत जव्हेरे हे ह्या समाजाचें काम कळकळीनें चालवीत असत. रा. रा. काळे, रा. मोरोपंत जोशी व त्यांची कन्या मथुराबाई वगैरे मंडळी त्यांना मदत करीत असत. भजन, उपासना, व्याख्यानें ही कार्यक्रमांतील ठराविक कामें झाल्यावर तेथील लष्करांत अस्पृश्य लोकांच्या सैनिकांकरतां एक विशेष व्याख्यान झालें. गांवांत अस्पृश्यांसाठीं एक शाळा उघडण्यांत आली. साता-याहून पांच मैलांवर वणें नांवाचें एक खेडें आहे. तेथील सबरजिस्ट्रार रा. बापुजी बच्चाजी शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. गणपतराव शिंदे यांनीं मुद्दाम बोलावून नेलें. खेडयांतील लोकांसाठीं भजन, उपासना करविल्या. लोकांमध्यें वाटण्यासाठीं पोस्टल मिशनचें वाङ्मय पाठविण्यांत आलें. पुढील एक वर्षी डॉ. भांडारकर, गणपतराव आंजर्लेकर, स्वामी स्वात्मानंद, गणतराव कोटकर, श्रीमती जनाबाई शिंदे वगैरे मंडळींसह साता-यास गेलों. उत्सव थाटाचा झाला. यवतेश्वराच्या डोंगरावर वनोपासना झाली.

१९०६ सालीं अहमदनगर समाजांत उत्सवासाठीं गेलों. तेथील ताळी समाजाचे प्रमुख पुढारी रा. सहदेवराव बागडे या समाजाचा पुढाकार घेऊन काम चालवीत. यांच्या वजनामुळें समाजांत बरेच साळी जातीचे लोक येत असत. शंकर पांडुरंग पंडित, लालशंकर उमियाशंकर वगैरे विद्वानांच्या प्रोत्साहनानें नगर येथें स्वतंत्र मंदिरबांधण्यांत आलें होतें. इ. स. १९०५ सालापासून पुढें मी या समाजाला मधून मधून जाऊं लागलों. त्यावेळीं व पुढें संत, हिवरगांवकर, धनेश्वर, ॠषि वगैरे तरुण मंडळींनीं समाजाचें काम नेटानें चालविलें होतें. फ्रेंड्स लिबरल असोसिएशन नांवाची संस्था स्थापन होऊन तिच्या विद्यमानें समाजाबाहेरहि व्याख्यानें देण्याचा उपक्रम तेव्हां झाला. पण समाजाचा मुख्य भार त्यावेळीं प. वा. सहदेवराव बागडे यांच्यावरच पडला होता. त्यांच्या साह्यानें एक स्पृश्यांसाठीं व एक अस्पृश्यांसाठीं अशा दोन रात्रींच्या शाळा काढण्यांत आल्या. पुढें कांहीं वर्षांनीं त्या बंद पडल्या.

पुढें १९०८ सालीं अहमदनगरास गेलों असतां सोनई येथें मोठी चळवळ झाली. तेथील खेडयांतील लोकांचें एक शिष्टमंडळ मला तेथें नेण्यास आलें. ही सत्यशोधक मंडळी होती. तेथील स्थानिक ब्राह्मण मंडळीशीं कांहीं वाद माजून आसपासच्या ब-याच  खेडयांत असंतोष उत्पन्न झाला होता. जातीजातींत सामाजिक बाबतींत वैमनस्य माजलें असतां त्यांच्यांत सलोखा घडवून आणून उदार धर्माच्या चळवळीकडे लक्ष लावणें हें प्रार्थना समाजाचें ब्रीद आहे म्हणून मी सोनई येथें गेलों. तेथील ओढयाच्या कांठीं वाळवंटांत प्रचंड जाहीर सभा भरली. निरनिराळया खेडयांतून सर्व जातीची हजारों मंडळी जमली होती. प्रत्येक जातीचे दोन दोन प्रतिनिधी घेऊन एक साधारण समिती बनविण्यांत आली. त्यांत ब्राह्मणांचेहि दोन प्रतिनिधी घेण्यांत आले. सत्यसमाज हें नांव ह्या नवीन चळवळीला देण्यांत आलें. एक दोन वर्षें काम चालल्यावर सोनई येथील दोन पाटील घराण्यांत वितुष्ट आल्यानें ह्या नवीन चळवळीचा लोप झाला.

१९०७ साली मी इंदूरास समाजाचे उत्सवास गेलों. बरोबर माझी पत्नी सौ. रुक्मिणीबाई आणि सहकारी स्वात्मानंद हे होते. इंदूर समाजाचें नांव मध्यभारतवर्षीय ब्राह्मसमाज असें आहे. डॉ. प्रभाकरपंत भांडारकर, होळकर कॉलेजचे प्रो. देसाई, तेथील प्रसिध्द पाटकर-जाधव यांचें घराणें, चित्रकार मिटबावकर ह्यांचां या समाजांत मोठा पुढाकार असे. ही सर्व मंडळी अनुष्ठानिक असून समाजाचें कार्य जोरांत चाललें होतें. रा. सदाशिवराव केळकरहि तेथेंच होते. ह्या उत्सवांत नगरसंकीर्तनाचें कार्य थाटाचें झालें. शेवटीं नगराबाहेर वनोपासनेंत प्रीतिभोजनाचा समारंभही गोड झाला. ता. २४ एप्रिल १९०७ रोजीं तेथील कांहीं पुढारी मंडळींच्या मदतीनें एक कमिटी स्थापन करून अस्पृश्यांसाठीं ता. ५ मे. १९०७ रोजीं एक संस्था उघडण्यांत आली. होळकर कॉलेजचे प्रो. गोखले हे व्हाइस प्रेसिडेन्ट, रामचंद्रराव मिटबावकर हे सेक्रेटरी होते. ह्या समाजाचें एक सुंदर ब्राह्ममंदिर आहे. तेथील पाटकर जाधव घराण्यांतील मंडळीची समाजाला फार मदत होती. त्यांचें होळकर दरबारांत वजन असल्यानें श्रीमंत तुकोजीराव महाराजांचें व विशेषतः सीताबाई होळकर यांचें समाजाकडे लक्ष लागलें. महाराजांकडून या समाजास दरमहा ३० रु. चें वर्षासनहि मिळत असतें.
उत्सव आटोपल्यावर जाधव मंडळींनीं धार, मांडवगड, महू वगैरे प्रेक्षणीय स्थळें पाहण्यासाठीं बैलगाडींतून सफर काढली. माझ्या पत्नीलाही घेऊन मी त्या सफरीस गेलों. धार येथील प्रसिध्द किल्ला आणि तेथील प्राचीन राज्याचे अवशेष पाहून आनंद झाला. विंध्याद्रीच्या शिखरावर मांडवगड ही मध्ययुगीन मुसलमान बादशहांची राजधानी होती. तेथें दहा वीस मोठमोठया मशिदी, देवळें आणि राजमहाल हीं फार प्रेक्षणीय दिसलीं. मध्ययुगीन राजा बाज्ञबहादूर व रूपमती यांच्या प्रेमाचीं स्थळें पाहण्यांत आलीं. यानंतर नर्सिंगचें शिक्षण घेण्यासाठी सौ. रुक्मिणीबाईस कांहीं महिने इंदूरास जाधव मंडळीकडे ठेवून मी मुंबईस आलों. तुकोजीराव महाराजांची दाई व बाळकृष्णपंत जाधव यांची पत्नी सौ. अहिल्याबाई या फार चारित्र्यवान व थोर मनाच्या बाई होत्या. त्यांच्या प्रेमळ सहवासांत रुक्मिणीबाईंना मोठा लाभ घडला.

रा. ब. हरी रामचंद्र शिंदे, बडोदा स्टेट इंजिनियर यांनीं ३० ऑक्टोबर १८९८ रोजीं नवसारी येथें प्रार्थना समाज स्थापला. त्यांत रा. ब. शिंदे आणि रा. मोतीलाल ए. मुनशी, हायकोर्ट वकील यांनीं पुढाकार घेतला. प्रथम पंधरा सभासद होते. ते १९०४ सालीं चाळीस झाले. प्लेगमुळें या समाजाचे कामांत दरवर्षी चार चार महिने खंड पडतो. पहिला जाहीर उत्सव १९०० सालीं, दुसरा १९०३ सालीं झाला. चवथा १९०४ ऑगस्टमध्यें जाला व त्यांत मीं भाग घेतला होता. १९०३ सालांत श्रीमंत सयाजीराव महाराजांचे बंधु श्रीमंत संपतराव गायकवाड यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें. १९०४ च्या उत्सवांत शनिवार-रविवारीं उपासना व व्याख्यानें मीं केलीं. समाजाचे हेतू व कार्याचें स्पष्टीकरण केलें. सुभासाहेब रा.ब. खासेराव जाधव यांनीं सुंदर भाषण करून धार्मिक शिक्षणाची आवश्यकता सांगितली. मीं समाजाला एक ग्रंथालय असावें अशी सूचना करून तिची सुरुवात म्हणून मुंबईहून कांहीं पुस्तकें पाठविलीं.

नवसारी प्रांतांतील जंगलामध्यें सोनगड म्हणून एक गांव आहे. तेथें एक समाज चांगला चालला होता. त्यांतील कित्येक प्रतिनिधि खास आमंत्रणावरून येथून नवसारीच्या उत्सवास आले होते. पुढील वर्षी सोनगड येथील समाजास मीं भेट दिली. येथें बडोदा संस्थानचे शेतकी खात्याचें एक केंद्र आहे. या प्रांतांतील ढाणके नांवाच्या जंगली जातीच्या लोकांच्या शिक्षणाची येथें सोय आहे. श्रीमंत सयाजीराव महाराजांनीं कृपावंत होऊन ह्या जातीच्या मुलांसाठीं व मुलींसाठीं दोन नमुनेदार वसतिगृहें उघडलीं होतीं. तीं पाहून महाराजांच्या उदार अतःकरणांची साक्ष पटली. प्रत्येक वसतिगृहांत ५० विद्यार्थ्यांची सोय केली होती. मागासलेल्या लोकांसाठीं शिक्षण देतांना मुलांप्रमाणेंच मुलींची व्यवस्था करण्याला महाराज कधीं विसरत नसत. मुलांना शिकवून मुलींना अडाणी ठेवण्यांत त्या त्या समाजाला धोका आहे हें महाराजांनीं प्रथमच जाणलें. या वसतिगृहाचे चालक रा. फत्तेखान नांवाचे मुसलमान गृहस्थ मोठया कळकळीनें काम करीत होते. हे प्रार्थना समाजाचे सभासद असून या गांवीं एक स्वतंत्र प्रार्थना समाजहि चालवीत होते. त्यांनीं या चळवळीचा कसा आरंभ झाला याविषयीं एक मनोरंजक गोष्ट कथन केली. श्रीमंत सरकार सर सयाजीराव महाराज या प्रांतांतील ढाणके नांवाच्या मागासलेल्या जातीची परिस्थिति स्वतः निरीक्षण्यास आले असतां ठिकठिकाणीं त्यांच्यापैकीं कोणीच महाराजांना दिसेनात. हें गूढ काय आहे याचा तपास केल्यावर पुरुष, बायका व मुलें हीं सर्व झाडावर उंच चढून बसलेलीं दिसलीं. महाराज आणि त्यांच्या परिवाराला पाहून ते आपल्यास धरून नेतील या भीतीनें, त्या बिचा-यांनीं असें केलें होतें. हे दृश्य पाहून ह्या लोकांची सुधारणा अवश्य केली पाहिजे असा त्यांनीं निश्चय केला. त्याचें फळ या संस्था आहेत असें फत्तेखानांनीं गहिंवरून सांगितलें. धन्य महाराज !!