स्थानिक समाज

सातारा समाज  :  मुंबई शहराशिवाय महाराष्ट्रांत पुणें, सातारा, अहमदनगर; गुजराथेंत अहमदाबाद, बडोदें आणि माळव्यांत इंदोर वगैरे ठिकाणीं प्रार्थनासमाजाचे स्थानिक समाज आहेत.  ह्यांचे सालोसाल वार्षिक उत्सवाचे समारंभ होत असतात.  ते जवळजवळ आठवडाभर चालत असतात.  त्यांत भाग घेण्यास मला जावें लागे.  १९०५ सालच्या उन्हाळ्यांत सातारा येथील उत्सवासाठीं मी गेलों.  रा. सितारामपंत जव्हेरे हे ह्या समाजाचें काम कळकळीनें चालवीत असत.  रा. काळे, रा. मोरोपंत जोशी व त्यांची कन्या मथुराबाई वगैरे मंडळी त्यांना मदत करीत असत.  भजन, उपासना, व्याख्यानें हीं कार्यक्रमांतील ठराविक कामें झाल्यावर तेथील लष्करांत अस्पृश्य लोकांच्या सैनिकांकरितां एक विशेष व्याख्यान झालें.  गांवांत अस्पृश्यांसाठी एक शाळा उघडण्यांत आली.  सातार्‍याहून पांच मैलांवर वर्णे नांवाचें एक खेडें आहे तेथील सबरजिस्ट्रार रा. बापूजी बच्चाजी शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. गणपतराव शिंदे यांनीं मुद्दाम बोलावून नेलें.  खेड्यांतील लोकांसाठीं भजन, उपासना करवल्या.  लोकांमध्यें वांटण्यासाठीं पोस्टल मिशनचें वाङ्‌मय पाठविण्यांत आलें.  पुढील एका वर्षी डॉ. भांडारकर, गणपतराव आंजर्लेकर, स्वामी स्वात्मानंद, गणपतराव कोटकर, श्रीमती जनाबाई शिंदे वगैरे मंडळींसह सातार्‍यास गेलों.  उत्सव थाटाचा झाला.  यवतेश्वराच्या डोंगरावर वनोपासना झाली.  

अहमदनगर समाज  :  १९०६ सालीं अहमदनगर समाजांत उत्सवासाठीं गेलों.  तेथील साळी समाजाचे प्रमुख पुढारी रा. सहदेवराव बागडे या समाजाचा पुढाकार घेऊन काम चालवीत.  यांच्या वजनामुळें समाजांत बरेच साळी जातीचे लोक येत असत.  शंकर पांडुरंग पंडित, लालशंकर उमीयाशंकर वगैरे विद्वानांच्या प्रोत्साहनानें नगर येथें स्वतंत्र मंदिर बांधण्यांत आलें होतें.  इ.स. १९०५ सालापासून पुढें मी या समाजांत मधूनमधून जाऊं लागलों.  त्या वेळीं व पुढें संत, हिवरगांवकर, धनेश्वर, ॠषि वगैरे तरुण मंडळींनीं समाजाचें काम नेटानें चालविलें होतें.  फ्रेंडस् लिबरल् असोसिएशन नांवाची संस्था स्थापन होऊन तिच्या विद्यमानें समाजाबाहेरही व्याख्यानें देण्याचा उपक्रम तेव्हां झाला; पण समाजाचा मुख्य भार त्या वेळीं प. वा. सहदेवराव बागडे यांच्यावरच पडला होता.  त्यांच्या साहाय्यानें एक स्पृश्यांसाठीं व एक अस्पृश्यांसाठीं अशा दोन रात्रीच्या शाळा काढण्यांत आल्या.  पुढें कांहीं वर्षांनीं त्या बंद पडल्या.  रा. ब. मारुतीराव भुजंगराव या वृद्ध गृहस्थानें आपल्या स्वकुळ साळी समाजांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठीं ५००० रु. व केवळ प्रार्थनासमाजासाठीं ३००० रु. अशा देणग्या दिल्या.  त्यांतच सहदेवराव बागडे यांनीं स्वतःच्या १००० रु. ची भर घातली (प्रार्थनासमाजाचा इतिहास, पान २९२).

सोनईची चळवळ  :  पुढें १९०८ सालीं अहमदनगरास गेलों असतां सोनई येथें मोठी चळवळ झाली.  तेथील खेड्यांतील लोकांचें एक शिष्टमंडळ मला तेथें नेण्यास आलें.  ही सत्यशोधक मंडळी होती.  तेथील स्थानिक ब्राह्मणमंडळींशीं कांहीं वाद माजून आसपासच्या बर्‍याच खेड्यांत असंतोष उत्पन्न झाला होता.  जातीजातींत सामाजिक बाबतींत वैमनस्य माजलें असतां, त्यांच्यांत सलोखा घडवून आणून उदारधर्माच्या चळवळीकडे लक्ष लावणें हें प्रार्थनासमाजाचें ब्रीद आहे.  म्हणून मी सोनई येथें गेलों.  तेथील ओढ्याच्या कांठीं वाळवंटांत प्रचंड जाहीर सभा भरली.  निरनिराळ्या खेड्यांतून सर्व जातींची हजारों मंडळी जमली होती.  प्रत्येक जातीचे दोन दोन प्रतिनिधि घेऊन एक साधारण समिति बनविण्यांत आली.  त्यांत ब्राह्मणांचेही दोन प्रतिनिधी घेण्यांत आले.  सत्यसमाज हें नांव ह्या नवीन चळवळीला देण्यांत आलें.  एक दोन वर्षे काम चालल्यावर सोनई येथील दोन पाटील घराण्यांत वितुष्ट आल्यानें ह्या नवीन चळवळीचा लोप झाला.

इंदूर  :  १९०७ सालीं मी इंदुरास समाजाचे उत्सवास गेलों.  बरोबर माझी पत्‍नी सौ. रुक्मिणीबाई आणि सहकारी स्वात्मानंद हे होते.  इंदूर समाजाचें नांव मध्यभारतवर्षीय ब्राह्मसमाज असें आहे.  डॉ. प्रभाकरपंत भांडारकर, होळकर कॉलेजचे प्रो. देसाई, तेथील प्रसिद्ध पाटकर जाधव यांचें घराणें, चित्रकार मिटबावकर ह्यांचा या समाजांत मोठा पुढाकार असे.  ही सर्व मंडळी अनुष्ठानिक असून समाजाचें काम जोरांत चाललें होतें.  रा. सदाशिवराव केळकरही तेथेंच होते.  ह्या उत्सवांत नगरसंकीर्तनाचें कार्य थाटाचें झालें.  शेवटीं नगराबाहेर वनोपासनेंत प्रीतिभोजनाचा समारंभही गोड झाला.  ता. २४ एप्रिल १९०७ रोजीं तेथील कांहीं पुढारी मंडळींच्या मदतीनें एक कमिटी स्थापन करून अस्पृश्यांसाठीं ता. ५ मे १९०७ रोजीं एक संस्था उघडण्यांत आली.  होळकर कॉलेजचे प्रो. गोखले हे व्हाइस प्रेसिडेन्ट व रामचंद्रराव मिटबावकर हे सेक्रेटरी होते.  ह्या समाजाचें एक सुंदर ब्राह्ममंदिर आहे.  तेथील पाटकर-जाधव घराण्यांतील मंडळींची समाजाला फार मदत होती.  त्यांचें होळकर दरबारांत वजन असल्यानें श्रीमंत तुकोजीराव महाराज व त्यांची पत्‍नी सीताबाई होळकर यांचें समाजाकडे लक्ष लागलें.  महाराजांकडून या समाजास दरमहा ३० रु. चें वर्षासनही मिळत असतें.

मांडवगड  :  उत्सव आटोपल्यावर जाधवमंडळींनीं धार, मांडवगड, महू वगैरे प्रेक्षणीय स्थळें पाहण्यासाठीं बैलगाडींतून सफर काढली.  माझ्या पत्‍नीलाही घेऊन मी त्या सफरीस गेलों.  धार येथील प्रसिद्ध किल्ला आणि तेथील प्राचीन राज्याचे अवशेष पाहून आनंद झाला.  विंध्याद्रीच्या शिखरावर मांडवगड ही मध्ययुगीन मुसलमान बादशहांची राजधानी होती.  तेथें दहावीस मोठमोठ्या मशिदी, देवळें आणि राजमहाल हीं फार प्रेक्षणीय दिसलीं. मध्ययुगीन राजा बाजबहादूर व रूपमती यांच्या प्रेमाचीं स्थळें पाहण्यांत आलीं.  यानंतर नर्सिंगचें शिक्षण घेण्यासाठीं सौ. रुक्मिणीबाईंस कांहीं महिने इंदुरास जाधवमंडळींकडे ठेवून मी मुंबईस आलों.  तुकोजीरावमहाराजांची दाई व बाळकृष्णपंत जाधव यांची पत्‍नी सौ. अहल्याबाई या फार चारित्र्यवान् व थोर मनाच्या बाई होत्या.  त्यांच्या प्रेमळ सहवासांत रुक्मिणीबाईंना मोठा लाभ घडला.

नवसारी  :  पोस्टल मिशनच्या कामांत परिचय झालेले रा. जी. के. वैद्य यांचें ता. १ सप्टेंबर १९०४ चें पत्र आढळतें.  त्यावरून नवसारी येथील प्रार्थनासमाजाची खालल हकिगत मिळते.  रा. ब. हरी रामचंद्र शिंदे, बडोदा स्टेट इंजिनियर यांनीं ३० ऑक्टोबर १८९८ रोजीं नवसारी येथें समाज स्थापला.  त्यांत रा. ब. शिंदे आणि रा. मोतिलाल ए. मुनशी, हायकोर्ट वकील यांनीं पुढाकार घेतला.  प्रथम १५ सभासद होते.  त्यांची संख्या १९०४ सालीं ४० झाली.  प्लेगमुळें या समाजाचे कामांत दरवर्षी चार चार महिने खंड पडतो.  पहिला जाहीर उत्सव १९०० सालीं व दुसरा १९०३ सालीं झाला.  चवथा १९०४ ऑगस्टमध्यें झाला.  त्यांत मीं भाग घेतला होता.  १९०३ सालांत श्रीमंत महाराजांचे बंधु श्रीमंत संपतराव गायकवाड यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें.  १९०४ च्या उत्सवांत शनिवार-रविवारीं उपासना व व्याख्यानें मीं केलीं.  समाजाचे हेतु व कार्य यांचें मीं स्पष्टीकरण केलें.  सुभासाहेब रा. ब. खासेराव जाधव यांनीं सुंदर भाषण करून धार्मिक शिक्षणाची आवश्यकता सांगितली.  मीं समाजाला एक लायब्ररी असावी अशी सूचना करून मुंबईहून कांहीं पुस्तकें पाठविलीं म्हणून लायब्ररीची स्थापना झाली.

सोनगड  :  नवसारी प्रांतांतील जंगलामध्यें सोनगड म्हणून एक गांव आहे.  तेथें एक समाज चांगला होता.  त्यांतील कित्येक प्रतिनिधि खास आमंत्रणावरून नवसारीच्या उत्सवास आले होते.  पुढील वर्षी सोनगड येथील समाजास मीं भेट दिली.  येथें बडोदें संस्थानच्या शेतकी खात्याचें एक केंद्र आहे.  या प्रांतांतील ढाणके नांवाच्या जंगली जातींच्या लोकांच्या शिक्षणाची येथें सोय आहे.  श्रीमंत सयाजीरावमहाराजांनीं कृपावंत होऊन ह्या जातीच्या मुलांसाठीं व मुलींसाठीं दोन नमुनेदार वसतिगृहें उघडलीं होतीं.  तीं पाहून महाराजांच्या उदार अंतःकरणाची साक्ष पटली.  प्रत्येक वसतिगृहांत ५० विद्यार्थ्यांची सोय केली होती.  मागासलेल्या लोकांना शिक्षण देतांना मुलांप्रमाणेंच मुलींची व्यवसथा करण्याला महाराज कधीं विसरत नसत.  मुलांना शिकवून मुलींना अडाणी ठेवण्यांत त्या समाजाला धोका आहे, हें महाराजांनीं प्रथमच जाणलें.  या वसतिगृहाचे सुपरिंटेंडेंट रा. फत्तेखां नांवाचे मुसलमान गृहस्थ मोठ्या कळकळीनें काम करीत होते.  हे प्रार्थनासमाजाचे सभासद असून या गांवीं एक स्वतंत्र प्रार्थनासमाजही चालवीत होते.  त्यांनीं या चळवळीचा कसा आरंभ झाला याविषयीं एक मनोरंजक गोष्ट कथन केली.  श्रीमंत सरकार सर सयाजीरावमहाराज या प्रांतांतील ढाणके नांवाच्या मागासलेल्या जातीची परिस्थिति स्वतः निरीक्षण्यास आले असतां ठिकठिकाणीं त्यांच्यापैकीं कोणींच महाराजांना दिसेना.  हें गूढ काय आहे याचा तपास केल्यावर पुरुष व बायकामुलें हीं सर्व झाडांवर उंच चढून बसलेलीं दिसलीं.  महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला पाहून ते आपल्याला धरून नेतील या भीतीनें त्या बिचार्‍यांनीं असें केलें होतें.  हें दृश्य पाहून ह्या लोकांची सुधारणा अवश्य केली पाहिजे, असा महाराजांनीं निश्चय केला.  त्याचें फळ या संस्था आहेत, असें फत्तेखानांनीं गहिंवरून सांगितलें.  धन्य महाराज !

बडोदें  :  १९०३ सालीं मी विलायतेहून परत येण्यापूर्वी श्रीमंत सयाजीरावमहाराज यांचेकडून पत्र आलें होतें कीं, स्वदेशीं आल्यावर प्रथम त्यांना भेटावें.  याप्रमाणें मी त्यांना स्वदेशीं आल्यावर १९०३ च्या ऑक्टोबरांत भेटण्यास गेलों.  त्या वेळीं बडोद्यांत अस्पृश्यांसाठीं चार प्राथमिक शाळा होत्या.  त्या मीं तपासून पाहण्यासाठीं तजवीज करावी असें महाराजांनीं विद्याधिकार्‍यांस फर्माविलें.  तपासून कांहीं सूचना करावयाच्या असल्यास महाराजांना समक्ष करावयास सांगितलें.  सर्व शाळा जोरांत चालल्या होत्या.  परंतु प्राथमिक शिक्षण संपल्यावर मुलांना पुढें वाव नसल्यानें तीं मोकळीं हिंडत होतीं.  पुस्तकी शिक्षणामुळें तीं आपल्या वडिलांचे हलके धंदे करण्यास असमर्थ आणि नाखूश होतीं.  मीं ही गोष्ट महाराजांचे कानीं घालून मुलांच्या नोकरीविषयीं कांहीं झाल्यास करावें अशी सूचना केली.  धोरणी महाराजांनीं लोकमत अनुकूल नसल्यानें तूर्त हें शक्य नाहीं असें सांगितलें; पण स्कॉलर्शिपा देऊन पुढील शिक्षणाची सोय करण्याचें कबूल केलें आणि त्याप्रमाणें तशी व्यवस्था पण झाली.

मराठ्यांकडून स्वागत  :  बडोदें शहरांतील प्रमुख मराठेमंडळींनीं माझें स्वागत करून पानसुपारीचा एक जाहीर समारंभ केला.  मेहेरबान खासेराव जाधव यांचा या बाबतींत पुढाकार होता; पण एकामागून एक जीं वक्त्यांची भाषणें झाली त्यांतून प्रतिकूल सूरच निघूं लागले.  माझें सर्व शिक्षण मराठा समाजाचे खर्चांतून झाल्यानें व विलायतेला जाण्यायेण्याचा खर्चही महाराजांकडून मिळाला असतां मी मराठा समाजाच्या सेवेला हजर न होतां प्रार्थनासमाजांत शिरलों हें बरें केलें नाहीं, अशीं भाषणें करून माझ्या गळ्यांत जेव्हां माळ घालावयास मंडळी पुढें आली तेव्हां उत्तर देतांना मी म्हटलें कीं, ''असें जर आहे, तर मी ही माळ घालण्यास लायक नाहीं.  म्हणून ती हातांतच घेत आहें.  प्रार्थनासमाज सर्वांसाठीं आहे आणि त्यासाठीं मला तयार केलें हें मराठ्यांस, विशेषतः महाराजांना भूषणावहच आहे.  स्वतः महाराज हेच जर केवळ मराठ्यांकरितां नाहींत तर त्यांचा अनुयायी मी निराळा कसा होऊं ?

सन १९०४ सालीं नाताळांत काँग्रेसचें अधिवेशन मुंबईस ठरलें.  सामाजिक परिषदेचें अध्यक्षस्थान या वर्षी महाराजांना द्यावयाचें ठरलें होतें.  ह्याच वेळीं एकेश्वरी धर्मपरिषदेची पुनर्घटना करून तिचें अधिवेशन मुंबईस करण्याचे कामीं मीं पुढाकार घेतला होता.  त्या वेळीं मुंबई प्रार्थनासमाजास भेट द्यावी व समाजाच्या रात्रीच्या शाळांच्या बक्षीससमारंभामध्यें अध्यक्षस्थान स्वीकारावें म्हणून महाराजांना आमंत्रण करण्यासाठीं मी बडोद्यास डिसेंबर १९०४ मध्यें गेलों.  त्या वेळीं तेथील हायकोर्टाचे जज्ज व डॉ. भांडारकर यांचे बंधु श्री. वासुदेवराव गोपाळ भांडारकर हे होते.  मी त्यांचेकडे उतरलों.  हे प्रार्थनासमाजाचे सभासद होते.  शेठ हरगोविंददास कांटावाला वगैरे जुन्या पुढार्‍यांच्या नेतृत्वाखालीं बडोद्यास एक प्रार्थनासमाज चालविला होता; पण त्याचें काम हल्लीं बंद होतें.  बडोद्यांतील जयसिंगराव स्टेट लायब्ररीमध्यें महाराजांच्या आज्ञेनें माझें एक जाहीर व्याख्यान करण्यांत आलें.  महाराजांनीं मुंबईंत समाजाच्या परिषदेच्या कामांत भाग घेण्याचें मान्य केलें.

मंगळूर  :  सन १९०७ च्या ऑक्टोबर अखेरीस हिंदुस्थानच्या नैर्ॠत्य किनार्‍यावरील मंगळूर शहरांतील ब्राह्मसमाजाकडून मला तिकडे नेण्यासाठीं त्या समाजाचे रा. व्यंकटाप्पा कांतप्पा नांवाचे एक सभासद मुंबईस आले.  मी व चि. जनाक्का श्री. व्यंकटाप्पाबरोबर आगबोटीनें निघालों.  मंगळूरला पोंचल्यावर समाजाचे अक्षरशः सर्व सभासद-स्त्रीपुरुष आणि मुलें-माझें स्वागत करण्यासाठीं बंदरावर आले होते.  मंगळूर हें बंदर उतरण्यास कठीण असल्यामुळें आगबोट बंदरापासून लांब थांबते.  लहानशा मचव्यांतून उतारूंना बंदरावर पोंचविण्यांत येतें.  ही सर्व मंडळी माझ्यासाठीं किती तरी वेळ उन्हांत तिष्ठत होती.  त्यांचें हार्दिक स्वागत पाहून आम्हांला गहिंवर आला.  वृद्ध अध्यक्ष उल्लाळ रघुनाथय्या, सेक्रेटरी के.रंगराव, खजीनदार कृष्णराव गांगुली, कर्नल सदाशिवराव व आणखी कांहीं थोडीं सारस्वत ब्राह्मण घराणीं होतीं.  बाकी सर्व तिकडील प्रांतांतील बिल्लव जातीचे सभासद होते.  ही जात तिकडे अस्पृश्य मानलेली होती.  पण तो आश्रम पालटून ब्राह्मसमाजांत प्रवेश झाल्यावर हे सर्व सभासद सर्रास वरिष्ठ वर्गांत मोडूं लागले.  यामुळें कोपर्‍यांतील ह्या ब्राह्मसमाजाचा पूर्वेतिहास फार मनोरंजक आणि उद्बोधक झाला आहे.  ब्राह्मसमाजाच्या प्रसारामध्यें या प्रांतांतील कामानें फार वरचा नंबर पटकावला आहे.

समाजाची स्थापना  :  ब्रह्मानंद केशवचंद्र सेनच्या अमदानींत त्यांचे पट्टशिष्य प्रतापचंद्र मुझुमदार यांनीं ह्या कामीं पुढाकार घेतला होता.  त्या वेळीं बिल्लव जातीचे आलसाप्पा नांवाचे पुढारी वजनदार होते.  ५००० बिल्लव ब्राह्मसमाजाची दीक्षा घेण्यास तयार आहेत, अशी तार त्यांनीं केशवचंद्र सेन यांना केल्यामुळें प्रतापचंद्र यांना पाठविण्यांत आलें.  त्यांचे स्वागत करण्यासाठीं बंदरावर ह्या जातीचा प्रचंड समुदाय जमला होता; पण प्रतापचंद्र मुझुमदार महाशय अस्सल इंग्रजी पोशाखांत जेव्हां मचव्यांतून बंदरावर उतरले तेव्हां त्यांना पाहून हा जमलेला समाज बिचकला.  हे कुणी तरी ख्रिस्ती मिशनरी आपणांस बाटविण्यास आले आहेत, अशी धास्ती घेऊन सगळ्या गर्दीची पांगापांग झाली आणि बिचार्‍या आलसाप्पाजवळ कोणी धरला नाहीं.  प्रतापचंद्रांनीं धीर सोडला नाहीं.  ते आलसाप्पा यांच्या घरीं जाऊन उतरले.  दुसरे दिवशीं सकाळीं ब्राह्मोपासनेस प्रतापबाबू बसले त्या वेळीं त्यांनीं आपली साधी शुद्ध बंगाली शाल अंगावर घेतली होती.  तीवर त्यांची शुभ्र विपुल दाढी, मोकळ्या डोक्यावरील लांब आणि कुरळे केस हा अस्सल देशी देखावा पाहून आदले दिवशीं उधळून गेलेल्या लोकांस थोडा थोडा धीर येऊं लागला.  आपलें इंग्रजींतील अमोघ वक्तृत्व आणि मायाळू प्रचाराचे जोरावर त्यांनीं लवकरच वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गांवर छाप बसविली व ब्रा. समाजाची स्थापना केली.  त्यानंतर नवविधान समाजाचे अनेक प्रचारक, विशेषतः अमृतलाल वोस, वलदेव नारायण, साधारण ब्राह्मसमाजाचे हेमचंद्र सरकार वगैरेंनीं अमोलिक कामगिरी केलीं.  अमृतलालची शिस्त, बलदेव नारायणांचा भक्तिभाव, हेमचंद्रांचें घटनाकौशल्य ह्यांचे ठसे अद्याप दिसत आहेत.  या परंपरेंत मीं या पवित्र भूमीवर पाय ठेवला.  सुमारें एक महिना अत्यंत सुखासमाधानानें आम्हीं या बालबोध समाजाची सेवा केली आणि ती त्यानें गोड करून घेतली.  विशेषतः आम्हां दोघां भावंडांना या प्रांताची कानडी भाषा येत असल्यानें या समाजांतील लहानथारे मंडळी आम्हांशीं अगदीं आपुलकीनें बिलगली.  आम्हांपासून त्यांना लाभ झाला कीं त्यांच्यापासून आम्हांला झाला हें निवडून सांगणें कठीण आहे.

ह्या प्रांतीं कोंकणी या नांवाची ब्राह्मणांची एक पोटजात आहे.  त्या जातीचे प्रतिनिधि विद्येंत, व्यापारांत व सरकारी नोकरींत पुढारलेले आहेत.  त्यांना मराठी भाषेचा फार अभिमान वाटत असे.  त्यांनीं माझीं मराठींत व्याख्यानें, उपासना व कीर्तनें मोठ्या आवडीनें करविलीं.  रा. सुब्बराव पै या नांवाच्या एका प्रेमळ गृहस्थानें एक लहानशी मराठी शाळा काढण्यांत पुढाकार घेतला.

समाजाचे उत्साही सेक्रेटरी के. रंगराव ह्यांनीं अस्पृश्यांच्या उद्धारासाठीं मुंबईच्या निराश्रित मंडळीची सुरुवात होण्यापूर्वीच गेल्या शतकांतील १८९७ सालीं सुरुवात केली होती.  मुंबईंत गेल्या वर्षी मीं नवीन अखिल भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची (All India Depressed Classes Mission)  सुरुवात केली होती, म्हणून के. रंगराव यांनीं विशेष उत्साहानें मला बोलावून नेलें होतें.  आजपर्यंत ह्या कामीं ते एकटेच खपत होते.  मीं ह्या कामाची पुनर्घटना केली.  गांवांतील पांच प्रमुख पुढार्‍यांची एक कमिटी नेमून मीं ती के. रंगरावांच्या जोडीला दिली आणि अखिल भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची ही मंगळूर शाखा म्हणून त्या मंडळीशीं संलग्न (Affiliated)  केली.  पुढें हिची वाढ झपाट्यानें झालीं.  ह्या नैर्ॠत्य किनार्‍यावरील द्राविड संस्कृति, लोकरिवाज, आश्चर्यकारक इतिहास यांचें निरीक्षण करण्यास बरीच मोठी संधि मिळाली.  बर्‍याच वेळां मी या प्रांतीं पुढें निरनिराळ्या कामानिमित्त येऊन गेलों.

प्रेमाचें भांडण  :  आम्हां दोघां भावंडांची उतरण्याची सोय या बिल्लव मंडळींनीं एका स्वतंत्र बंगल्यांत केली होती.  तरुण स्वयंसेवक नेहमीं कामाला हजर असत.  बिल्लव मंडळींची माझ्यावर अपूर्व भक्ति होती.  मला आपला गुरु मानून ते माझ्या अर्ध्या वचनांत राहात असत.  नरसाप्पा व नारायणाप्पा या नांवाचे दोघे बंधु आमच्या बंगल्यांत सहकुटुंब राहात असत.  आमच्या पाहुणचाराची जबाबदारी त्यांच्यावर असे.  तो करण्यामध्यें त्यांची केव्हां केव्हां अशी चुरशीची चढाई लागे कीं, ''देवा, आमचे ह्या शिष्यांपासून रक्षण कर'' असें म्हणण्याची आम्हांवर पाळी येई.  एकदां आमचें काम करण्यासाठीं ह्या दोघां भावांचें अक्षरशः मल्लयुद्ध जुंपलें.  मी तें सोडविण्यास गेलों असतां त्या दोघांचे आघात माझ्या पाठीवर पडून ती बरीच तिंबून निघाली.  कारण ही वेळ पहाटे ५ वाजतांची-रात्रीची-असल्यानें हा प्रकार अंधारांत चालला होता.  त्या दिवशींचा स्वयंपाक कोणीं करावा याबद्दल वाद उपस्थित झाला होता.  जो तो मी करणार असें अट्टाहासानें म्हणे.  उजाडल्यावर माझ्या पाठीवरचे बळ पाहून दोघे भाऊ लहान मुलांसारखे स्पुंफ्दून स्पुंफ्दून रडूं लागले.  त्यांची समजूत घालण्यासाठीं मला माझी बरीच शक्ति खर्च करावी लागली.

बिल्लवांची गृहस्थिति  :  मंगळूरभोंवतीं सृष्टिसौंदर्य अपूर्व आहे.  नद्यांचीं रुंद पात्रें, दोन्ही बाजूंना सुंदर रेती व त्यापलीकडे लाल मातीच्या टेकड्यां व त्यांवरील गर्द झाडी वगैरे शोभ सर्व ॠतूंत अपूर्व दिसते.  अड्यांर नांवाच्या जवळच्या एका खेड्यांत मीं बोटींतून सफर काढली.  बिल्लव जातीचे पुढारी व समाजाचे सभासद श्री. बोळार व्यंकटाप्पा या नांवाचे पोलीस अधिकारी बरोबर होते.  त्यांनीं ह्या सफरीची सर्व सोय केली होती.  आम्ही जंगलांत राहणार्‍या बिल्लव जातीच्या गृहस्थितीचें निरीक्षण करण्यासाठीं एका घरांत शिरलों.  मोठमोठ्या जमिनीवर राबण्यासाठीं हे लोक वंशपरंपरागत कुळें म्हणून खपतात.  ह्यांची स्थिति जवळजवळ जनावरांसारखीच आहे.  राहण्यासाठीं एखादी क्षुद्र झोंपडी, ताडामाडाच्या लाकडांचीं कांहीं क्षुल्लक उपकरणें एवढीच ह्यांची संपत्ति.  अंगावरच्या पोशाखाशिवाय बदलावयाला कपडे नसतात.  मी एका म्हातार्‍या स्त्रीला तिचें वय विचारलें.  तिनें लाजून म्हटलें, ''मला काय माहीत ?  माझ्या जमिनीच्या मालकाला ठाऊक असेल !''  अशा लोकांसाठीं रा. रंगरावांनीं मिशन काढलें यांत काय नवल !  या लोकांचीं मुलें दिवसभर कुठें तरी झाडावरील चिंचा, बोरें व केव्हां झाडपाला खाऊन पोट भरतात.  रात्रीं थोडीशी कांजी मिळाल्यास ती चाटून चाटून खातात.  औषध-पाण्याची त्यांना गरजच लागत नाहीं.  नंतर चारसहा आठवड्यांनीं आम्ही मुंबईस परत आलों.

पनवेल  :  १९०६-०७ च्या सुमाराला चि. जनाक्का कोंकणांतील पनवेल या गांवीं तेथील म्युनिसिपल शाळेंत मुख्य शिक्षक या  नात्यानें काम करीत होती.  सुधारक म्हणून तिला तेथें फार विरोध होऊं लागला.  तिचेबरोबर आई, बाबा आणि माझा मुलगा प्रताप हे राहात होते.  प्रार्थनासमाजाचीं तत्त्वें तेथील लोकांस समजावून दिल्यास गैरसमजूत कमी होऊन विरोध कमी होईल या आशेनें स्वामी स्वात्मानंदजींना बरोबर घेऊन मी परवेलास गेलों.  ज्या द्रव्यामुळें प्रकृतींत बिघाड होतो तींच द्रव्यें शरिरांत लहान प्रमाणावर घालून रोग बरा करण्याच्या प्रकाराला होमिओपाथी म्हणतात.  सुधारणेमुळें लोकांना चीड आलेली होती.  त्याच सुधारणेच्या लहान गुटिका लोकसमाजाला देण्याची ही आमची आध्यात्मिक होमिओपाथी होती.  स्वात्मानंदजी हे मूळचे आर्यसमाजिस्ट असल्यानें साधकबाधक कोटिक्रम करून आणि जुन्या ग्रंथांचे आधार देऊन वाद करण्याच्या पद्धतींत त्यांचा हातखंडा असे.  वादाचे मुद्दे संपल्यावर स्वामीजी केव्हां केव्हां आपल्या हातांतला दंडाही उगारीत.  तुलनात्मक धर्मपद्धति, आधुनिक धर्मविवेचन, अखिल जगताचें हळूहळू पालटणारें लोकमत, राजकारणासारख्या ऐहिक प्रश्नावर होणारा त्याचा परिणाम वगैरे विषयांवर माझें विवेचन होत असे.  या जोडगोळीनें पनवेलच्या वरिष्ठ वर्गावर थोडाबहुत परिणाम झाला आणि चिरंजीव जनाक्काच्या मुलींच्या शाळेंत मुलींची हजेरी पण सुधारली. अशा स्थितींत पनवेलचे गंगारामभाऊ सुभेदार हे महार गृहस्थ लष्करी पेन्शनर होते.  त्यांना माझे बाबांनीं आपल्या घरीं चहाला बोलाविलें.  त्यामुळें आम्ही मुंबईस परत आल्यावर लोकमताला पुन्हां ऊत आला.  बराच त्रास भोगावा लागला.  इतका कीं आमचे घरची मोलकरीण काम सोडून गेली आणि बाबांना हजामतीची पंचाईत पडली.  तेथील मामलेदार रा. बेंदूरकर नांवाचे एक प्रागतिक सज्जन गृहस्थ होते.  दुसरे म्युनिसिपालिटींत एक सभ्य व सज्जन मुसलमान होते.  त्या दोघांचें साहाय्य न मिळतें तर चिरंजीव जनाक्काला ही नोकरी सोडून मुंबईस परतावें लागलें असतें.  ह्यापुढें कोंकणांत अलिबाग, मालवण, सावंतवाडी, गोवें आंबोलीचा घाट, दापोली वगैरे ठिकाणीं प्रचारकार्यास मी वेळोवेळीं जाऊन आलों.  मालवण ही डॉ. भांडारकरांची मायभूमि.  त्या वेळीं तेथें इंदूरच्या समाजाचे सभासद आत्माराम सदाशिव केळकर हे राहात असत.  त्यांचे साहाय्यानें तेथील प्रार्थनासभेची मीं पुनर्घटना केली आणि अस्पृश्यांसाठीं बरींच महत्त्वाचीं अशीं कांहीं कामें केलीं.

कोल्हापूर  :  १९०९.  विलायतेला जाण्यापूर्वीपासूनच मी कोल्हापुरीं माझे मित्र गोविंदराव शासने, डॉ. कृष्णाबाई केळवकर यांचेकडे वेळोवेळीं जात होतों.  त्या वेळीं तेथील लायब्ररींत माझीं व्याख्यानें होत असत.  मी विलायतेला जाण्याच्या प्रवासखर्चाबाबत श्रीमंत शाहुमहाराजांकडून ३०० रु. ची मदत मिळाली होती.  १९०९ सालच्या उन्हाळ्यांत कोल्हापूर येथें माझें एक महत्त्वाचें व्याख्यान झालें.  त्यापूर्वी मी मुंबईस अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची स्थापना केली होती.  कोल्हापुरांत गणपत कृष्णाजी कदम, वकील, यांचें लक्ष प्रार्थनासमाजाचे कार्याकडे लागलें होतें.  प्रार्थनासमाजाचे कांहीं प्रसिद्ध पुढारी घेऊन कोल्हापुरास प्रचारकार्यासाठीं यावें म्हणून त्यांचा आग्रह पडला.  छत्रपतिमहाराजांचीही तशी इच्छा दिसली.  आर्यसमाजाला तर त्यांनीं भरपूर साहाय्य दिलेंच होतें आणि आपल्या समाजकार्यांत प्रार्थनासमाजाचाही त्यांना प्रयोग करून पाहावयाचा होता.  सिंधचे प्रसिद्ध प्रोफेसर टी. एल. वास्वानी, भक्त डॉ. रुबेन, कलकत्त्याचे प्रमथलाल सेन, मुंबईचे प्रसिद्ध प्रो. वेलिनकर या चौघांना घेऊन मी १९०९ च्या ऑक्टोबरच्या अखेरीस पुणें-सातारामार्गे कोल्हापुरास गेलों.  मराठा बोर्डिंगची इमारत गांवाबाहेर होती.  तिच्याजवळील एका स्वतंत्र बंगल्यांत सरकारी पाहुणे म्हणून आमची उतरण्याची सोय करण्यांत आली होती.  तेथील राजाराम कॉलेजांतील दिवाणखान्यांत प्रो. वास्वानी व वेलिनकर यांचीं व्याख्यानें, बाबू प्रमथलाल सेन यांची उपासना आणि माझें हरिकीर्तन वगैरे कार्यक्रम करविण्यांत आले; पण लोकमताचें सर्वांत अधिक आकर्षण डॉ. रुबेन यांच्या एकतारीनें केलें.  आम्ह पाहुणेमंडळी सरकारी गाडींतून बसून गांवांत निघालों असतां डॉ. रुबेनला एकदम स्फूर्ति येऊन त्यांनीं खालीं उतरावें आणि भर बाजारांत आपल्या एकतारींत तल्लीन व्हावें.  भोंवतालीं प्रचंड गर्दी व्हावी आणि आमच्या गाडीला वाट मिळूं नये असें वारंवार होऊं लागलें.  डॉ. रुबेनला एकटें सोडावें तर आम्हांकडे कोण येणार !  घेऊन जावें तर गर्दी वाटच सोडीना, असा वेळोवेळीं पेंच पडे.  एकंदरींत कुणीकडून तर प्रचाराचें कार्य व्हावें, म्हणून आम्ही हा पेंच मुकाट्यानें सहन करीत असूं.

कोल्हापुरांत या भेटीमुळें एक नवीन प्रार्थनासमाज सुरू करण्याची तयारी झाली आहे, असें रा. कदम यांना वाटूं लागलें.  बळवंत कृष्णाजी पिसाळ या नांवाच्या तरुण गृहस्थाला बरोबर घेऊन कदम यांनीं ह्या कामास हळूहळू सुरुवात केली. रा. सावंत, बॅ. खंडेराव बागल, डॉ. कृष्णाबाई केळवकर, रा. गोविंदराव शासने वगैरे मंडळींचें या कामास प्रोत्साहन मिळालें.

पुढें सन १९११ सालच्या मे महिन्यांत पुण्याचे रा. गणपतराव कोटकर, गणपतराव आंजर्लेकर, चि. जनाक्का व तिच्या शाळेंतील मैत्रिणी श्रीमती सीताबाई मराठे व सौ. गुलाबबाई वैद्य या मंडळींसह मी कोल्हापुरास पुन्हां गेलों. मुंबईचे बलभीमराव केसकर हे आपल्या घरांतील मंडळींसह अगोदरच तेथें जाऊन राहिले होते.  कोल्हापूरच्या समाजाचा त्या वेळीं कार्यक्रम ठरला होता व त्यांत आम्हीं भाग घेतला.  सरकारांतून योग्य ती मदत कोल्हापूर प्रार्थनासमाजास मिळाली.  याच भेटींत करवीर मठाचे जुने शंकराचार्य (डॉ. कूर्तकोटींच्या पूर्वीचे) ह्यांनीं माझें एक खास हरिकीर्तन आपल्या मठांत करविलें.  श्री. स्वतः श्रवणास हजर होते.  रिवाजाप्रमाणें त्यांनीं नारळ आणि धोतरजोडी देऊन माझी संभावना केली.  याच भेटींत रा. बागल आणि त्यांचे नातेवाईक रा. बाबासाहेब सावंत वकील यांचे घरीं कौटुंबिक उपासना झाल्या.  गांवाबाहेर एका सृष्टिसौंदर्याचे ठिकाणीं एक वनोपासना झाली.  तींत डॉ. कृष्णाबाई केळवकर यांनीं पुढाकार घेतला होता.  हा समाज पुढें कांहीं वर्षे चालून बंद पडला.  वरील रा. पिसाळ या तरुण गृहस्थानें काढलेलें 'विश्वबंधु' या  नांवाचें साप्‍ताहिक पत्र तसेंच कांहीं वर्षे चालविलें.  पोस्टल मिशनचें कामही तेच करीत होते.