कार्याची सुरुवात

निराश्रित सेवासदन  :  अशा रीतीनें एक वर्ष लोटल्यावर निराश्रित साह्यकारी मंडळीचे कामाचा चहूंकडे बोलबाला होऊं लागला.  या नवीन कार्याबद्दल अनुकूलप्रतिकूल मतें प्रकट करण्यांत वृत्तपत्रकारांची चढाओढ लागली.  या राष्ट्रीय मुहूर्तकालांत मुंबईस बिनबोभाट परोपकारी कृत्यें करणारे दोन दानशूर गृहस्थ होते.  एक मलबारी नांवाचे पारशी गृहस्थ व दुसरे दयाराम गिडुमल, सुरतेचे डिस्ट्रिक्ट जज्ज.  पुण्याचे प्रो. धोंडोपंत कर्वे - अनाथ महिलाश्रमाचे संस्थापक, प्रो. गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवकमंडळाचे संस्थापक, राजकारणांत सारा हिंदुस्थान हलवून सोडणारे टिळक वगैरेंनीं महाराष्ट्राला तत्कालीन अग्रपद मिळवून दिलें होतें.  अशा मुहूर्तकाळीं वरील दोन परोपकारी गृहस्थांना केवळ महिलांच्या उद्धारासाठीं निष्काम बुद्धीनें कांहीं तरी करावें ही तळमळ लागून राहिली होती.

एके दिवशीं दयाराम गिडुमल या थोर पुरुषाकडून मीं त्यांना समक्ष भेटून जावें अशी अत्यंत प्रेमळपणाची चिठ्ठी आली.  ती भेट मी कधीं विसरणार नाहीं त्यांनीं मला अत्यंत आपलेपणानें कवटाळून, डोळ्यांत आंसवें आणून विचारलें.  ''हें अपूर्व मिशन काढण्याची कल्पना तुम्हांला कशी सुचली ?  ह्या कामीं अस्पृश्यवर्गांतल्या महिलांसाठीं तुम्हीं कांहीं तजवीज केली आहे काय ?''  मी निर्भीडपणें सांगितलें, ''ह्या हतभागी भारतामध्यें पुरुषांपेक्षां महिलांची स्थिति अत्यंत दुर्बल व केविलवाणी आहे, हें मी जाणून आहें.  माझ्याप्रमाणेंच माझ्या घरांतल्या मंडळींनाही ही जाणीव असल्यानें माझी त्यागी बहीण आणि पूज्य माता यांनीं आपलें पाठबळ दिलें आहे.''  ही वार्ता दयारामजीच्या कानांवर अगोदरच आली होती.  म्हणूनच त्यांनीं मला समक्ष भेटीला बोलावून असें कळकळीचें स्वागत केलें.  त्यांनीं पुढें विचारलें, ''ह्या असपृश्य महिलांच्या सेवेसाठीं आम्ही काय करूं शकुं ?''  मीं उत्तर दिलें, ''आमच्या मध्यवर्ती आश्रमांत निराश्रित सेवासदन या नांवाखालीं एक स्वतंत्र शाखा आम्ही काढूं.''  दयारामजींनीं ताबडतोब दरमहा १०० रु. ची मदत देऊं केली आणि हें सदर निघालें.

पहिली शाळा  :  मिशनची पहिली शाळा १८ ऑ. १९०६ सालीं एल्फीन्स्टन रोडवरील, स्टेशनच्या पूर्वेस मुरारजी वालजीच्या बंगल्यांत निघाली, असें मागें सांगितलेंच आहे.  पण कामाची वाढ झाल्यानें ही जागा पुरेना, म्हणून ह्या स्टेशनाचे पश्चिमेस ग्लोब मिलजवळ एका चाळींत अधिक प्रशस्त जागा घेतली.  मिशनचा पहिल्यापासूनच एक दंडक ठरला होता कीं, मिशनमध्यें काम करणार्‍यांनीं ज्या ठिकाणीं अस्पृश्य लोक राहतात तेथेंच त्यांच्यात मिळूनमिसळून राहावें.  काम करणारांनीं आपल्या कुटुंबासह येऊन राहावें.  मिशनर्‍यांच्या बायकामुलांनीं अस्पृश्य मानलेल्या बायकामुलांमध्यें मिळूनमिसळून राहावें.  ह्या उद्देशाला अनुसरून ग्लोब मिलजवळच्या एका चाळींत मिशनन आपलें ठाणें घातलें.  खालच्या मजल्यांत शाळा, दवाखाना, उद्योगालय वगैरेंची व्यवस्था करण्यांत आली आणि वरच्या मजल्यांत माझे वृद्ध आईबाप, सय्यद अबदुल कादर, त्यांची बहीण आणि तिचा नवरा इतक्यांची राहण्याची सोय करण्यांत आली.  तेथें वरील सदनाची संस्थापना २१ मे १९०७ रोजीं झाली.  ग्लोब मिलच्या आसपास या चाळीला लागूनच एक मोठें पटांगण होतें.  येथें शहराची वस्ती संपली होती आणि उन्हाळ्याच्या दिवसांत मुलांना खेळावयास प्रशसत जागा होती.  पण पावसाळ्यांत या जागेंत मोठी दलदल माजून दोनतीन महिने पाणी सांचून राहात होतें.  त्यामुळें राहण्याला जागा रोगराईची आणि गैरसोईची होती.  म्हणून लवकरच ही जागा सोडून स्टेशनला लागूनच नवीन प्रशस्त बंगला घेतला व तेथें या सदनाचें काम जोरांत चाललें.

हेतु व कार्य  :  मिशनचे हेतु पहिल्यापासूनच पुढीलप्रमाणें होते :  (१) शिक्षणप्रसार, (२) नोकर्‍या मिळवून देणें, (३) सामाजिक अडचणींचें निवारण करणें, आणि (४) सार्वत्रिक धर्म, व्यतिगत शील आणि नागरिकता वगैरे गुणांचा प्रसार ह्या गरीब लोकांत करणें.  शेवटचे तीन हेतु वरील सदन निघेपर्यंत साधणें अशक्य होतें.  म्हणून ह्या सदनाचे हेतु खालीलप्रमाणें ठेवण्यांत आले.  वरिष्ठ वर्गांतील जे कोणी उत्साही स्त्री-पुरुष-विशेषतः सुशिक्षित भगिनी-आपणांस वाहून घेऊन मिशनच्या कामासाठीं येण्यास तयार असतील त्यांच्यामध्यें कामाची पात्रता येण्यासाठीं त्यांना तयार करणें आणि अस्पृश्यवर्गांतल्या गरीब स्त्रियांमधून त्यांना कामें देणें.  मिशनचें काम उदार धर्माच्या पायावर चाललें होतें.  त्यासाठीं दर शनिवारीं व्याख्यानें आणि कीर्तनें होत.  रविवारीं सकाळीं धार्मिक शिक्षणाचें वर्ग आणि सायंकाळीं उपासना होत.  प्रथम प्रथम हें काम मी स्वतःच माझ्या बहिणीच्या साहाय्यानें करीत असें.  सदन निघाल्यावर त्याची स्वतंत्र व्यवस्था चांगली झाली.  सणाचे दिवशीं सामाजिक मेळे होते.  त्यांत अस्पृश्यवर्गीय स्त्रीपुरुष वरिष्ठ वर्गांतल्या स्त्री-पुरुषांत समानतेनें भाग घेत.  पहिल्या वर्षी ९ जाहीर व्याख्यानें, ४ कीर्तनें, ५ पुराणवाचनें असे प्रसंग झाले.  भजनसमाज उघडण्याच्या दिवशीं परळ आणि देवनार या शाळेंतल्या सर्व मुलांना व्हिक्टोरिया गार्डनमध्यें फिरवून आणून मिठाई वांटण्यांत आली.  मोहरमचे सुटींत सर्व मुलांना आणखी कांहीं वडील माणसांना घारापुरी येथील लेणीं दाखवून आणण्यांत आलीं.  त्या वेळीं तेथें प्रीतिभोजन झालें.  गांवांतील लोकांपासून जुनेव नवीन कपडे (सुमारें १५००) गोळा करून गरीब लोकांस वांटण्यांत आले.  गरीब बायांसाठीं - विशेषतः कुमारी व विधवा यांच्या शिक्षणासाठीं - शिवणकामाचा वर्ग सुरू करण्यांत आला. त्यांत तयार करण्यांत आलेले कपडेही वांटण्यांत आले.  ह्या लोकांत स्वच्छतेच्या संवयी वाढाव्या म्हणून दर शनिवारीं शाळांतील मुलांना सदनांत स्नान घालण्याची सोय करण्यांत आली.  ह्या साध्या गोष्टीचाही प्रथम प्रथम गैरसमज होऊन बर्‍याच अडचणी येऊं लागल्या.  अस्पृश्यवर्गांतील निरनिराळ्या जातींचीं मुलें एकमेकांत मिसळण्यास कचरत.  चिकाटीनें आणि चतुराईनें काम चालवून या अडचणींतून पार व्हावें लागलें.

शाळा जरी काढल्या तरी त्यावेळीं अस्पृश्यवर्गीय मुलांना शाळेंत रोजच्या रोज जाण्याची सवय नसे व त्यांच्या पालकांना रोजच्या रोजन पाठविण्याची आवड नसे.  शिक्षणाची अभिरुची लावून देण्यासाठीं सदनांतील स्त्रीप्रचारकांना घरोघरीं भेटी घ्याव्या लागत अहसत.  हें काम ख्रिस्ती लोकांचें आहे, असें समजून हे मिशनरी ख्रिस्ती असावे असा गैरसमज होऊं लागला.  त्याचें निराकरण करण्यासाठीं प्रचारक बायांनीं भारत, भागवत, रामायण वगैरे हिंदु लोकग्रंथांचें घरोघरीं वाचन सुरू केलें.  एकादशी, शिवरात्र वगैरे हिंदु सणांचे दिवशीं सदनामध्यें भक्तिविजयासाठीं हिंदु संतांचीं चरित्रें वाचून दाखविण्यांत आलीं.  आजार्‍यांची शुश्रूषा करण्यासाठीं आणि बाळंतपणांत मदत देण्यासाठीं सदनांतील स्त्रियांना शिक्षण देऊन तयार करण्यांत आलें.  श्रीमती वेणूबाई, द्वारकाबाई आणि श्रीमती कल्याणीबाई सय्यद ह्या तीन स्त्रिया सदनांत राहून हीं कामें उत्कृष्ट रीतीनें करीत.  या सदनांतील घरगुती सर्व कामें माझी बहीण जनाबाई जबाबदारीनें पार पाडी.  बाहेरच्या कामाचा सर्व बोजा रा. सय्यद अबदुल कादर यांनीं उचलला होता.  या कामासाठीं निराश्रित महिलासमाज ही निराळी संस्थाच जनाबाईनें काढली होती.  या महिलासमाजाचा पहिला वार्षिकोत्सव मदनपुरा मोरलँड रोडवरील इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या चार माड्यांसमोरील मंडपांत त्या वेळीं सौ. लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर ह्यांच्या अध्यक्षतेखालीं साजरा करण्यांत आला होता.  गांवांतील प्रमुख स्त्रिया हजर होत्या.  या महिलासमाजाचीं कामें भायखळा व परळ येथें दोन ठिकाणीं स्वतंत्रपणें चालत असत.

समाचार  :  घरोघर भेटीला जाऊन समाचार घेण्याचें काम वर्षभर चालत होतें.  त्या कामाचा फायदा आमच्या निराश्रित भगिनींना कितपत मिळतो हें आम्हांस सांगवत नाहीं, परंतु त्याचा आम्हांला मात्र निरीक्षणदृष्ट्या बराच मिळतो.  ह्यानंतर सौ. रुक्मिणीबाई सय्यद यांनीं भायखळा येथील कामाबद्दलचा वाचलेला रिपोर्ट पुढीलप्रमाणें आहे.  'घरांतील वर्ग सुमारें ६ महिने चालले.  गेल्या वर्षी एकंदर १३ बायकांची प्रसूति करण्यांत आली.  पुष्कळांना दवाखान्याचा लाभ देण्यांत आला.  पोलिस कमिशनरकडून बेवारशी मुलें व बायका मिळून ५ आलीं.  त्यांची निगा ठेवण्यांत आली.'

सोमवंशीय मित्रसमाज  :  महिलांच्या समाजाप्रमाणेंच पुरुषांचाही सोमवंशीय समाज स्थापन करण्यांत आला.  इंप्रुव्हमेंट ट्रस्टमधील चाळ नं. ३ मध्यें हा समाज ता. २४ मार्च १९०७ रोजीं स्थापन करण्यांत आला.  ह्याचा हेतु अस्पृश्य लोकांकरवींच स्वोद्धारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घ्यावा असा होता. १९१० अखेर पटावर ४० सभासद होते.  ते दरमहा ४ आणे वर्गणी देत.  दर रविवारीं एकेश्वरी मताच्या उपासना त्यांचेसाठीं चालविण्यांत येत.  १९१० सालीं अस्पृश्यांच्या निरनिराळ्या मोहल्ल्यांतून ह्या लोकांनीं ११ जाहीर सभा घडवून आणल्या.  अशाच एका सभेचे वेळीं एकनाथ व अस्पृश्य जाती या विषयावर माझें जाहीर व्याख्यान झालें.  ह्या मंडळींचा उत्साह इतका वाढला कीं, ह्या समाजासाठीं एक स्वतंत्र उपासनामंदिर बांधावें असा विचार १९०९ नोव्हेंबरमध्यें ठेवून वेळोवेळीं सभा होऊं लागल्या.  ह्यासाठीं फंड जमा होऊन ६५० रु. मुंबई बँकेंत ठेव ठेवण्यांत आली. ती ठेव पंचांच्या नांवें होती.  परंतु कोणत्याही कामांत स्थावर मिळकत येऊं लागली म्हणजे वादाची मुळी पेरल्याप्रमाणें होतें हा अनुभव ह्या लहानशा कामांतही येऊन कांहीं वर्षांनी हें काम बंद पडलें.

अनुभवाचा फायदा  :  ह्या निराश्रित सेवासदनाच्या खर्चासाठीं दयाराम गिडुमल यांनीं दरमहा १०० रु. देणगी दिली होती.  ती तीन वर्षांपूरतीच होती.  सुरुवातीचे अनुभव घेऊन पाहण्यासाठींच हे प्रयोग चालले होते.  त्या दृष्टीनें पाहतां ह्या मिशनला फार लाभ झाला.  प्रचारकांना अशा कामाचा आणि मनुष्यस्वभावाचा जो अनुभव आला तो प्रत्यक्ष कामापेक्षांही अधिक महत्त्वाचा वाटला.  लहान मुलें आणि वयपरत्वें अंथरुणाला टेकलेलीं माणसें यांचे फार हाल होतात, हें माझ्या नजरेस येत असे.  गिरणींत १२ तास काम करणार्‍या माणसांना आपलीं पोटची मुलें आणि वृद्ध जराग्रस्त आईबाप यांच्या जोपासनेस वेळ मिळत नसे, म्हणून अशांची सेवा हेंच सदनाचें मुख्य काम असे.  सदन काढल्याबरोबर माझे आई, वडील व तरुण बहिणी ग्लोब मिलच्या घाणेरड्यां चाळींत जाऊन राहिलीं.

मातेचा लळा  :  अशा कामांतील अनुभवाचीं कांहीं उदाहरणें लक्षांत घेण्यासारखी आहेत.  मुलांना शाळेंत पाठविण्यासाठीं आमच्यावर विश्वास बसावा म्हणून सदनाच्या ठिकाणीं माझ्या आईबापांकडे मुलें आणून ठेवण्याचा प्रयोग करून पाहिला.  लष्करांतून सेवानिवृत्त झालेले एक महार जमादार समजूतदार गृहस्थ होते.  ८ वर्षांची एक मुलगी व ६ वर्षांचा एक मुलगा अशीं दोन अपत्यें त्यांना होतीं.  आठ-आठ दिवस त्या मुलांना आमच्या सदनांत ठेवण्यांत ते कबूल झाले. अगदीं आपल्या पोटच्या पोराप्रमाणें त्यांना ठेवून घेण्यास माझी आईदेखील कबूल झाली.  चंद्राबाई नांवाची माझी धाकटी बहीण नुकतीच वारल्यामुळें विरहाचा मोठा धक्का बिचारीला बसला होता.  त्यांतून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून तिनें हें संगोपनाचें कार्य पत्करलें.  एके दिवशीं सदनांत गोडधोड झालें होतें.  म्हणून लहानग्या गंगूनें (मुलीचें नांव) नेहमीपेक्षां जरा जास्त खाल्लें.  गंगूला आपल्या स्वतःच्या बिछान्यांत घेऊन आई निजत असे.  असा लळा लावल्याशिवाय मुलें घर सोडून राहण्यास तयार होण्यासारखीं नव्हतीं.  मध्यरात्रीनंतर गंगूला अंथरुणांतच जुलाब होऊं लागले.  बिचार्‍या आईनें सर्व अंथरूण धुऊन काढून, मुलीला साफसूफ करून, ऊबदार उपचार करून उजाडण्याचे पूर्वी नीटनीटकें केलें होतें.  मी रागावेन म्हणून घडलेला प्रकार तिनें मला कळविला नाहीं.  तरी तो मला पुढें कळलाच.  मीं माझ्या आईचे पाय धरले.  अशा गोष्टींनीं या लोकांचा विश्वास आमच्यावर हळूहळू बसून पुढें लवकरच आमच्या प्राथमिक आणि दुय्यम शाळा व एक मोठें विद्यार्थी वसतिगृह चांगलें नांवारूपास आलें.

आणखी कांहीं प्रयोग  :  माझी बहीण जनाबाई समाचारास घरोघरीं जात असतांना तिला खडतर अनुभव आले :  (१) एका घरीं एक अगदीं वृद्ध बाई अंथरुणास खिळली होती.  पडून पडून तिच्या पाठीला जखमा झाल्या होत्या.  जनाबाई रोज तिची पाठ शेकण्यास जाई.  तिच्या पाठीला शेकण्याला पाणी तापवण्याकरितां जनाबाई चुलीकडे जाऊं लागली, तेव्हां बाई म्हणाली, ''बाई, तुमचे फार उपकार आहेत; पण माझ्या चुलीला शिवूं नका तुम्हां ख्रिस्ती लोकांनीं चूल बाटविल्यास लोक मला नांवें ठेवून वाळींत टाकतील.''  जनाबाईला आपल्या घरचा स्टोव्ह नेऊन आपलें स्वीकृत काम मुकाट्यानें करावें लागलें.  (२) राही नांवाच्या दुसर्‍या एका वृद्ध बाईला असाध्य जखमा झाल्या होत्या.  मोठ्या सायासानें ह्या बाईला जे. जे. हॉस्पिटलांत पोंचवण्यांत आलें.  दुसरे दिवशीं तिचा समाचार घेण्यासाठीं जनाबाई जाऊन पाहते तों तिच्या तरुण मुलानें तिला घरीं नेलेलें आढळतें आणि हा उपद्व्याप केल्याबद्दल त्याच्याकडून बराच शिव्यांचा प्रसादही मिळाला.  घरीं नेऊन मुलानें आपल्या वृद्ध आईच्या थोबाडांतही मारल्याचें कळलें.  मुलगा दारूच्या नशेंत होता, म्हणूनच हीं कृत्यें त्याच्याकडून पार पडलीं.  तो कामावर गेल्यावर जनाबाई बाईला भेटण्यास घरीं गेल्या.  मुलगा रेल्वेंत मजूर होता.  दारूच्या नशेंत रेल्वे ओलांडीत असतां दोन्ही डब्यांत चेंगरून तो जागच्या जागीं ठार झाला.  तेव्हां त्याची आई, ''बाळा, माझ्या तोंडांत मारायला तरी पुन्हां येरे !''  असे हंबरडे फोडूं लागली.  त्याच शोकांत म्हातारीचा त्या रात्रीं शेवट झाला आणि जनाबाईचें हें हृदयविदारक कामही संपलें.  (३) खालच्या वर्गांत मुरळी सोडण्याची चाल त्या वेळीं जारी असे.  मदनपुर्‍यांत आमच्या शाळेंत येणार्‍या एका मुलीला मुरळी सोडणार आहेत.  असें कळल्यावरून सदनांतील भगिनी चार समजुतीच्या गोष्टी सांगण्यास त्या मुलीच्या आईकडे गेल्या.  आपल्या धर्मांत हात घातल्याबद्दल अत्यंत संताप येऊन पुन्हां आमच्या अंगणांत येऊं नका असें त्या मुलीच्या आईनें दरडावून सांगितलें आणि आपल्या मुलीला शाळेंतून काढून घेतलें.  (४) पुण्याच्या डॉ. मॅनकडून मुरळी सोडलेली मुलगी सदनांत आली.  तिला अंगभरून वाईट रोग जडला होता.  तिची कोठेंही व्यवस्था होत नसल्यानें निर्वाणीचा उपाय म्हणून ही मुलगी सदनांत पाठवली गेली; पण मुलांबाळांनीं भरलेल्या सदनांत ही मुलगी ठेवणें धोक्याचें होतें.  म्हणून आमच्या भायखळा येथील शाळेजवळ एक स्वतंत्र खोली घेऊन जनाबाईला तिच्यासाठीं निराळें राहावें लागलें.  मुलगी फार आडदांड स्वभावाची होती.  बरेच दिवस तिनें फार त्रास दिला.  तथापि तिला तसेंच शिकवून बरी केल्यावर आणि ती चांगली शिकल्यावर तिचा योग्य स्थळीं विवाह करून देण्यांत आला.  ही मुलगी महाराची होती.  ही हल्लीं निजाम हैद्राबाद येथें शिक्षकीण आहे.

पुष्कळ बायांना गरोदरपणीं व बाळंतपणीं फार नाजुक उपचार करण्याची पाळी येई.  मिशनचे हितचिंतक मोठमोठे स्त्री-डॉक्टर असत.  ते औषधोपचार सांगत; पण शुश्रूषेचीं कामें सदनांतील स्त्रियांवर पडत.  एनिमा देणें वगैरे नवीन उपचाराचें काम आल्यास जुन्या मताच्या रोग्यांना आवरणें फार कठीण होई.  ते अत्यंत बीभत्स शिव्या देऊन निघून जात.  वेळोवेळीं पोलिसांकडून अनाथ अर्भकें सदनांत पाठवलीं जात.  अस्पृश्य म्हणून इतर अनाथालयांत त्यांचा शिरकाव होणें अशक्य होतें.  अशा मुलांना पंढरपूरच्या आश्रमांत किंवा दयारामशेठनीं मालाड येथें काढलेल्या आश्रमांत पाठविण्यांत येई.

प्रतिष्ठित स्त्रियांची कमिटी  :  अशा प्रकारचीं दयार्द्रतेचीं कामें करण्यास पुरुषांपेक्षां स्त्रियांच्या अंतःकरणाची जोड मिळविणें आवश्यक असतें.  या सदनाच्या कामामुळें तेंही लवकर घडून आलें.  १९०८ सालीं खालील प्रतिष्ठित स्त्रियांची कमिटी नेमण्यांत आली.  लेडी म्यूर मॅकेंझी - अध्यक्ष; लेडी चंदावरकर - उपाध्यक्ष; मिसेस स्टॅनले रीड - चेअरमन; सौ सीताबाई सुखटणकर आणि सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या जॉईंट सेक्रेटरी; कु. एस. के. काब्राजी - खजिनदार; ह्यांपैकीं डॉ. वासुदेवराव ह्यांची पत्‍नी सौ. सीताबाई सुखटणकर ह्या पूर्वाश्रमींच्या मँचेस्टर डोमेस्टिक मिशनचे चालक रेव्हरंड बिशप ह्यांची कन्या.  ह्यांनीं इंग्लंडमध्यें असतांनाच ह्या मिशनला तेथील युनिटेरियन लोकांची सहानुभूति मिळवून एकंदर ७०० रु. पाठविले होते.  त्या हिंदुस्थानांत आल्यावर त्यांनीं ह्या स्त्रियांच्या कमिटीचा सेक्रेटरीपणा पत्करला; पण पुढें डॉ. सुखटणकरांना लवकरच मुंबई सोडून लाहोरला जावें लागल्यानें ह्या बाईंचा मिशनशीं फारसा संबंध उरला नाहीं.  ह्या कमिटीवरच्या मोठमोठ्या घरंदाज बायकांनीं व्यक्तिशः मिशनची वेळोवेळीं फार काळजी घेतली आणि मोठमोठे निधि जमवून मिशनला दिले.  लेडी म्यूर मॅकेंझी यांनीं त्यांचे पति कांहीं दिवस ऍक्टिंग गव्हर्नर असतांना १९०९ सालीं महाबळेश्वर येथील शाखा उघडण्यास गव्हर्नरच्या बंगल्यांत सभा भरवून प्रत्यक्ष मदत केली.  १९०९ सालच्या सप्टेंबर महिन्यांत पुण्याच्या शाळेच्या बक्षिससमारंभांत अध्यक्षस्थान स्वीकारून लेडी म्यूर मॅकेंझीनें जोरदार भाषण करून श्रीमंतवर्गाचें लक्ष मिशनकडे वळविलें.  मलबार हिलवरील आपल्या बंगल्यांत आपल्या कमिटीची सभा भरवून त्यांनीं निधि मिळविण्यासाठीं नाना प्रकारचे उपाय सुचविले.  'टाइम्स ऑफ इंडिया' कर्ते सर स्टॅनले रीड यांच्या पत्नींनीं १९०९ सालीं मिशनमधील सर्व मुलांचा एक मेळा भरवून त्यांना खाऊ वांटला.  सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या तर रात्रंदिवस मिशनचें काम करण्यांत चूर असत.  लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर वरचेवर निराश्रित सदनांत समाचाराला येऊन खाऊच्या पाट्यांच्या पाट्या भरून विद्यार्थ्यांना वांटीत असत.  प्रसिद्ध दादाभाई नौरोजी यांची नात सौ. पी. कॅप्टन (मुंबई असि. पोस्टमास्तर जनरल यांची पत्‍नी) ह्या प्रसिद्ध देशाभिमानी बाईनें सौ. सुखटणकरांच्या पाठीमागें सेक्रेटरीपणा पत्करला.  पुढें पुण्याची शाखा सुरू झाल्यावर तळेगांव-दाभाडे येथें रात्रीची आणि दिवसाची शाळा मिशननें काढली.  तिचा सर्व खर्च ह्या दंपतीनें दिला आणि पुण्यांतल्या शाखेला एक शिवण्याचें यंत्र व हार्मोनियम बक्षीस दिला.

विद्यार्थी वसतिगृह  :  ह्या सदनाच्या कार्यांतून मिशनच्या कामाच्या ज्या मुख्य मुख्य अंगांची निष्पत्ति झाली त्या सर्वांत महत्त्वाचें काम म्हणजे मुंबई शाखेचें परळ येथील वसतिगृह होय.  अस्पृश्यवर्गाच्या शिक्षणासाठीं कितीही शाळा आणि उद्योगालयें काढलीं तरी त्यांची खरी उन्नति एवढ्यानेंच होणें शक्य नाहीं.  अशा शाळांतून अस्पृश्यांचीं मुलें दिवसांतून फार तर ५ तास राहून बाकीचा सर्व काळ जोंपर्यंत आपल्या घरगुती वातावरणांत आणि मागासलेल्या समाजस्थितींत घालवितात, तोंपर्यंत त्यांच्या नैतिक जीवनाचा विकास होणार नाहीं याची जाणीव चालकांना पूर्वीपासून होती.  त्यांच्यासाठीं स्वच्छ ऐसपैस जागेंत ह्या कामांत तयार झालेल्या कुलगुरूच्या वैयक्तिक नजरेखालीं दिवसांतून २४ तास विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी, म्हणून वसतिगृहांची जरुरी; पण हें ध्येय सुरुवातीपासूनच कसें गांठतां यावें ?  नुसतें दिवसाच्या शाळेंत येण्यास ज्यांची तयारी नाहीं ते आपल्या गांवाला व आईबापांना सोडून मुंबईसारख्या शहरांत कोठूर राहायला येणार ?  पण निराश्रित सदनाचें कार्य तीन वर्षे चालल्यानें हें ध्येय साधण्याची चिन्हें दिसूं लागलीं.  मिशनच्या शाळांची वाढ या तीन वर्षांत दुय्यम शाळा म्हणजे इंग्रजी ४ थी इयत्ता चालविण्यापर्यंत झाली.  ह्या अवधींत शाळांच्या आसपासच्या निवडक मुलांना घरीं दोनदां फक्त जेवावयास जाऊन बाकीचा वेळा सदनांतच घालविण्याची संवय करण्यांत आली.  स्नान घालणें, कपडेलते, अभ्यासाचीं पुस्तकें, खेळांची उपकरणीं आणि प्रशस्त पटांगण इत्यादि पुरवून घरापेक्षां शाळाच त्यांना अधिक प्रिय वाटेल असा कसून प्रयत्‍न करण्यांत आला.  शेवटीं ४ फेब्रु. १९०९ रोजीं वसतिगृह रीतसर उघडण्यांत येऊन त्याच्या पटावर ११ मुलें नमूद करण्यांत आली.  सप्टेंबर १९०९ पासून त्यांच्या जेवण्याखाण्याचीसुद्धा सोय करण्यांत आली.  १९१० डिसेंबरअखेर पटावर ३६ मुलांची संख्या दाखल झाली.  त्यांतून जरी कांहीं मुलें गेलीं तरी २१ मुलें कायमची शिल्लक उरलीं.  त्यांपैकीं ३ मुली होत्या.  मिशन जरी मुख्यतः अस्पृश्यांसाठीं काढलें होतें तरी पटावरील संख्येपैकीं निदान एकचतुर्थांशाहून जास्त नाहीं इतकी स्पृश्यवर्गीय मुलें घेण्याला मुभा ठेवली होती.  ह्याचा उद्देश दुहेरी होता.  स्पृश्य मुलांशीं मिळूनमिसळून वागून त्यांच्याशीं अभ्यासांत चढाओढ करून व त्यांच्या संवयींचा फायदा घेऊन अस्पृश्यांनीं आपला फायदा करून घ्यावा.  उलटपक्षीं अस्पृश्यांविषयीं जो विनाकरण तिटकारा स्पृश्यांमध्यें असतो तो निराधार आहे हें त्यांच्याशीं प्रत्यक्ष मिसळून पाहण्याची संधि ह्या स्पृश्यांना मिळावी.  केवळ मुलांशीं वागण्यांतच नव्हे तर मोठ्या माणसांमध्यें प्रचार करतांनाही पुढारलेल्या आणि मागासलेल्या समाजाशीं वागतांना, व्याख्यानपीठावरून बोलतांना प्रचारकांना हा दुहेरी हेतु सांभाळावा लागे.  इतकेंच नव्हे तर अस्पृश्यांपेक्षां स्पृश्यांनाच शिक्षण देण्याचें काम कित्येक वेळां अधिक अवघड होत असे.  विद्यार्थ्याचा दैनिक कार्यक्रम येणेंप्रमाणें -

५-०   सकाळीं उठणें.
५-३०  सकाळची प्रार्थना    
६-०   कांजी.
६-३०  बुक बाईंडिंगचें काम.
७-३०  शालेय अभ्यास    
९-०    स्नान व न्याहारी
१०-०   बुक बाईंडिंगचें काम.
११-१-० दिवसाची शाळा.
१-१-३० भोजन.
१-३०-५ दिवसाची शाळा
५-६ व्यायाम.
६-० भोजन.
७-३० - शालेय अभ्यास किंवा रात्रीची शाळा.
१०-० झोंपणें.

 

याखेरीज रविवारीं सकाळीं नैतिक शिक्षण.  तिसरे प्रहरीं विद्यार्थ्यांचें चर्चामंडळ व सायंकाळीं साप्‍ताहिक उपासना होत असत.  स्वयंपाकाकरितां एक बाई नेमलेली असे.  घरकामाकरितां एकही नोकर नसे.  आपापलीं कामें करून सामान्य कामांची वांटणी मुलेंच बिनबोभाट करीत असत.  कोणत्याही प्रकारें कोणत्याही प्रसंगीं जातिभेद पाळला जात नसे.  या बाबतींत कोणीं कधीं तक्रारही केली नाहीं.  अन्न नेहमीं शाकाहारी असे आणि तें विद्यार्थ्यांना मानवलेंही.  स्वच्छता आणि नैतिक बंधनें ह्या दृष्टीनें विद्यार्थ्याच्या वर्तनाकडे कसोशीनें पाहण्यांत येई.  पुरेशा जागेची मोठी उणीव भासत असे.

मोफत दवाखाना  :  हें कामही प्रयोगादाखल १९०६ नोव्हेंबरपासून १९०८ अखेर चाललें.  उद्देश हा होता कीं, औषधाचे द्वारें मिशनचा संबंध या लोकांशीं जडावा व नवीन औषधोपचाराची या लोकांस संवय लागावी.  नोव्हेंबर १९०६ पासून डिसेंबर १९०८ अखेरपर्यंत दोन वर्षे दवाखाना खुला राहून त्यांत १२३९ रोग्यांना दाखल करण्यांत आलें व  वेळां औषधोपचार देण्यांत आले.

 जाती      पुरुष स्त्रिया. मुलें.    एकूण.
   मराठा 
 ६१      ९६    ८१      ३३८
महार २२२ ६४ १६० ४४६
मोची ४८ २२ ७५ १४५
मांग १७ २२ ४२
भंगी   १६
सुरती २७ २६ ८६ १३९
मुसलमान ३५ ४१ २१ ९७
ख्रिस्ती ११ १२ ३२
ज्यू १२ १८
एकूण    
५३५ २९६ ४४२ १२७३

 

ह्या सर्व कामाचा खर्च २३३ रु. ९ आ. ९ पै आला.  ह्यावरून किती काटकसरीनें हें काम करण्यांत येत होतें, हें दिसून येतें.

शाळाखातें  :  राहतां राहिलेलें महत्त्वाचें काम म्हणजे शिक्षणाचें.  यासाठीं शाळाखातें पसंत करील अशा तज्ज्ञाची मोठी जरूरी होती.  निराश्रित सेवा-सदनाचें काम पाहून आणि त्यासाठीं मिळालेल्या स्वार्थत्यागी माणसांची तयारी पाहून रा. वामनराव सोहोनी या प्रार्थनासमाजाच्या सभासदाला आपल्याला वाहून घेऊन काम करण्याची प्रेरणा झाली.  ते ह्या कामाला सर्वतोंपरी पात्र होते.  सदनांतील प्रचारकमंडळी सदनांतील कामें करूनच तयार झाली.  रा. सोहोनी अगोदर बाहेर तयार होऊनच मिशनला १९०८ सालच्या आरंभीं येऊन मिळाले.  ते आल्याबरोबर त्यांनीं मिशनच्या परळ येथील शाळेचा दर्जा प्राथमिक शाळेंतून दुय्यम शाळेंत वाढविला.  रा. सोहोनींचें काम मागें सांगितलेल्या दोन पद्धतींपैकीं सुवर्णकार पद्धतीचें (Intensive) होतें.  शाळाखात्याचे सर्व नियम संभाळून त्यांनीं हें काम फार चोखपणें केलें.
 

 (१) परळ येथील दुय्यम शाळेंतील पटावरील संख्या-                                  
                          

 

इंग्रजी इयत्ता ४ थी
इंग्रजी इयत्ता ३ री
इंग्रजी इयत्ता २ री
इंग्रजी इयत्ता १ ली १५
    २७

  

मराठी इयत्ता तिसरी १७
मराठी इयत्ता दुसरी १५
मराठी इयत्ता पहिली २८
मराठी इयत्ता बिगर ५४
    ११४

 
(२)  देवनार कचरापट्टी प्रथमिक शाळा -

इयत्ता पटावरील संख्या हजेरी
२री
१ ली
बालवर्ग ३३ २५

 

ही शाळा ठाणें जिल्ह्यांतील चेंबूर येथें उघडण्यांत आली.  ह्या शाळेचे कामीं मुंबई कार्पोरेशनमधील इंजिनियर, रा. अमृतलाल ठक्कर यांचे अविश्रांत श्रम फार उपयोगी पडले.

(३)  मदनपुरा-दिवसाची शाळा -  पटावरील संख्या १२२, पैकीं ९७ मुलें आणि २५ मुली.

(४)  कामठीपुरा - भंगी लोकांसाठीं दिवसाची शाळा - ही एका गुजराथी गृहस्थाच्या उदार आश्रयानें चालू होती.  हिला  प्रथम जागाच मिळेनाशी झाली.  भंगी लोकांचा तिरस्कार इतर अस्पृश्यांनाही वाटत असे.  शिक्षक मिळण्याची मारामार पडूं लागली.  त्यामुळें शाळा बंद पडेल कीं काय असें वाटूं लागलें.  शेवटीं बडोद्यास तयार झालेले एक धेड जातीचे गृहस्थ मिळाले.  पटावरील संख्या ७६ होती.  रोजची हजेरी ६६ होती.  मराठी ४ इयत्तेंपर्यंत शिक्षण दिलें जाई.