माझ्या एकान्त सहली

एकान्तांतील सहली  :   जमखंडी हा गांव तिन्ही बाजूंनीं डोंगराच्या बगलेंत आहे.  विशेषतः दक्षिणेस मुधोळ संस्थानच्या वाटेवर तर एक सुंदर लांब दरी आहे.  तिच्यांत कट्टेगिरी नांवाचा दुसरा एक विस्तीर्ण तलाव आहे.  पावसाळ्यांत हा भरून वाहूं लागला, म्हणजे त्या सर्व प्रदेशास सुंदर वन्य शोभा येत असे.  मी जरी नेहमीं माझ्या सवंगड्यांच्या घेर्‍यांत अडकलेला दिसें, तरी एखाद्या दरींतून, डोंगराच्या माथ्यावरून, पूर्व व उत्तर या बाजूनें पिकलेल्या शेतांतून किंवा जमखंडींतील मोतीबागेंतून एकटेंच हिंडणें मला फार आवडत असे.  जमखंडीचे उत्तरेस ४-४॥ मैलांवर कृष्णेचें भव्य पात्र आहे.  तें माझ्या नित्याच्या आटोक्याच्या बाहेरचें असे; पण तेथेंही केव्हां केव्हां मी माझी गोपाळमंडळी घेऊन जात असें.  माझ्या हृदयाचा परिपोष माझ्या एकान्तांतील सहलींमुळेंच विशेष झाला.  निर्जन डोंगरांतून व दरींतून हिंडत असतांना मीं वाचलेल्या कादंबरींतला नायक मीच बनत असें.  मात्र नायिक नसल्यामुळें माझा विप्रलंभ शृंगार लंगडालुळा पडत असे.  जमखंडींत वसंत ॠतूंत कांहीं आंबरायांना मोहोर येऊन झाडावरच्या कोकिळा मदोन्मत होत !  उन्हाळा तेथें कडक भासे.  सायंकाळच्या क्लांत समयीं मीं मोतीबागेंतल्या कारंज्याजवळच्या बकुळीच्या झाडाखालीं बकुळीच्या मधुर सुगंधाच्या फुलांच्या माळा विणीत बसलों असतां --

कारंजाचे तुषार वाटति अग्निकणांचे परी,
पुष्पांचा तो सुगंध माझ्या शूळ निपजवी शिरीं
कोकिळकूजित ऐकुनि वाटे वीज कडाडे वरी

वगैरे संगीत सौभद्र नाटकांतून ऐकलेल्या पीडा मलाच होऊं लागत !  पण सुभद्रेचा मागमूस कोठेंच नसे !  सुभद्रा खोटी असली तरी सृष्टिदेवीचे हावभाव नजरेपुढें खरेच असत.  मोठा झाल्यावर कालिदास, बाणभट्ट आणि त्याहीपुढें वर्डस्वर्थ आणि स्कॉटस् ह्या कवींनीं व कादंबरीकारांनीं जें दिव्यामृत पाहिलें त्याचेंच बाळकडू मला ह्या ओबडधोबड कादंबर्‍यांनीं व नाटकांनीं पोरवयांतच पाजिलें होतें.  मग त्यांचा मी आभारी कां असूं नये ?

पहिला ठसा :  पण सर्वांच्याही पूर्वी मला हृदयदान दिलें.  तें माझ्या पवित्र आईनेंच !  तिच्याच पुण्यप्रभावानें मला सर्व जडरसांतून तारण मिळून माझ्या हृदयाचा परिपाक प्रथम धर्माच्या भक्तिरसांत व नंतर तत्त्वज्ञानाच्या शांत रसात झाला.  माझ्या वेळच्या मराठी पांचवया क्रमिक पुस्तकांत 'सहल करून येणें' हा एक धडा होता.  तो मला फार आवडत असे.  त्या आवडीचे साक्षात्कार माझ्या स्वतःच्या सहलींत मला घडत.  पण ह्या सगळ्याची पूर्वतयारी माझ्या आईच्या रानावनाच्या गोड गोष्टींत आणि बाबांच्या प्रेमळ सहवासांतच झाली.  पुढें कादंबर्‍यांनीं आणि पौराणिक पोथ्यांनीं जी काय भर टाकली असेली ती केवळ शब्दसंपत्तीची आणि जड रसांचीच होय.  दैवी कोमल भावनांचा पहिला ठसा माझ्या आईचाच  !

वनभोजन :  वर्षांतून निदान एकदां तरी- विशेषतः पावसाळ्याच्या अखेरीस बाबा आम्हां सर्वांना घेऊन कोठें तरी वनभोजनाला जात असत.  जमखंडी गांवाला (आमचे वाड्यांला) लागून पश्चिमेला एक डोंगर आहे.  हा जवळ जवळ ७००-८०० फूट तरी उंच असावा.  ह्याच्या अत्यंत उंच शिखरावर एक लहानसें शिवालय आहे.  त्याचें कानडींत नांव मेलगिरी लिंगाप्पा (उंच गिरीवरचा लिंग) आहे.  येथून जमखंडी गांवचाच नव्हे, तर आसमंतांतील निदान २०।२५ मैलांचा देखावा पावसाळ्यांत सुंदर दिसतो.  देऊळ उंच चबुतर्‍यावर बांधलेलें आहे.  त्याचे मागें एका खडकांतील गुहेंतून निर्मळ पाण्याचा झरा पावसाळ्यांत वाहतो.  एरवीं रुक्ष असलेला हा उंच डोंगर पावसाळ्यांत हिरवागार दिसतो.  हें उंच आणि एकान्त ठिकाण बाबांना पसंत असे.  आमच्या घरच्या सर्व मंडळींना व आपल्या एकादोघा जिवलग मित्रांनाही बरोबर घेतल्याशिवाय त्यांना वनभोजन यथासांग झालेसें वाटत नसे.  ह्या कल्पनेंत आईची त्यांना पूर्ण सहानुभूति व साह्य असे.  बहुतेक सगळा दिवस आमचा मोठ्या आनंदाचा जाई.  ही रसिकता बाबांमध्यें कोठून आली ह्याचें मला आतां आश्चर्य वाटतें.  ह्यामुळें मजमध्यें सृष्टिशोभेची रुचि व अवलोकनशक्तीचीं बीजें रुजलीं आणि माझ्या ग्रहणशील मनावर चांगला परिणाम झाला.