काठेवाडचा दौरा

काठेवाडचा दौरा  :  १९०४ च्या एप्रिल महिन्यामध्यें माझे मित्र गुजराथेचे नानालाल कवि सादरा येथें सरकारी नोकरींत होते.  उन्हाळ्याची सुटी पडल्यामुळें माझ्याबरोबर काठेवाडांत समाजाच्या प्रचारकार्यासाठीं दौरा काढण्याचें त्यांनीं ठरविलें.  मी सादरा येथें गेलों.  स्टेशनहून सादरा गांव बराच लांब असल्यानें व प्रदेश वाळवंटाचा असल्यामुळें माझी प्रवासाची उंटावरून जाण्याची व्यवस्था केली होती.  संवय नसल्यामुळें ह्या प्रवासाचा मला बराच त्रास झाला.  अंग फार हालल्यानें दोन दिवस कमरेला ठणका लागला होता.  सादर्‍याहून आम्ही दोघे प्रथम अहमदाबाद प्रार्थनासमाजांत गेलों.  तेथें व्याख्यानें आणि सभासदांशीं परिचय वगैरे करून घेण्यांत दोन दिवस गेले.  समाजाचे अध्यक्ष लालशंकर उमीयाशंकर यांची प्रथमच ओळख झाली.  त्यांनीं स्थापलेलें मोठें अनाथालय पाहिलें.  ह्या समाजाला पैशाचें भरपूर साहाय्य आहे.  प्रार्थनामंदिर प्रशस्त आणि सुंदर आहे.  सभासदांचीं संख्या पुष्कळ आहे, पण अनुष्ठानिक सभासद फारच कमी होते.  रा. रमणभाई नीलकंठ हे समाजाचे सेक्रेटरी होते.  आम्ही अहमदाबादहून राजकोटला गेलों.  प्रसिद्ध विद्वान् (प. वा.) शंकर पांडुरंग पंडित, बॅ. सिताराम नारायण पंडित आणि घनश्याम नारायण पंडित हे काठेवाडांत मोठी मान्यता पावलेले तीन पंडित बंधु राजकोटांत कायमची वस्ती करून राहात असत.  आम्ही शंकर पांडुरंग यांचे घरीं उतरलों.  रा. शंकर पांडुरंग पंडित हे प्रार्थनासमाजिस्ट होते आणि दुसरे दोघे प्रागतिक ध्येयाचे होते.  राजकोटांत राजकुमार कॉलेज व इतर तशाच मोठ्या लोकांच्या शिक्षणाची मध्यवर्ती संस्था होती.  ग्राशिया नांवाचा काठेवाडांतील जमीनदारांचा एक श्रीमंत वर्ग आहे.  त्यांचीही एक शाळा श्रीमंती थाटाची होती.  कवाईत करणें, घोड्यांवर बसणें व इतर मर्दानी खेळ खेळणें ह्या बाबतींत ह्या कुमारांची फार काळजी घेण्यांत येत असे आणि हीं कामें ह्या तरुणांना फार आवडतही असत.  क्षत्रियाला शोभणारा पेहेराव, पाणीदार वृत्ति आणि कसलेली शरीरप्रकृति पाहून आनंद झाला.  मुंबई इलाख्यांतील राजेरजवाड्यांच्या मुलांची सोय येथें एकत्र केल्यानें परस्पर-परिचय होऊन ते पुढें राजपदारूढ झाल्यावरही तो कायम राहातो.  राजकोटहून आम्ही भावनगरला गेलों.  तेथील कॉलेजांत माझें व्याख्यान झालें.  सर प्रभाशंकर पट्टणी यांचें या संस्थानांत फार वजन असे.  त्यांचीही ओळख झाली.  भावनगरहून आम्ही जुनागडला गेलों व दिवाण बेचरदास यांचेकडे उतरलों.  व्याख्यानें, भेटी व ठरीव कार्यक्रम झाल्यावर जवळच असलेल्या गिरनार पर्वतावर जाण्याचा विचार ठरला.  दिवाणांच्या ओळखीमुळें गिरनार पर्वतावर आमची राहण्याची व्यवस्था मोठ्या बडदास्तीची झाली.

गिरनार  :  'गढ जुनो गिरनार वादल थीनुं बातुं करी' ही काठीवाडी म्हण बहुजनसमाजांत प्रसिद्ध आहे.  तिच्यामुळें हा गड पाहण्याची आम्हांस फार आतुरता लागली होती.  मेघांशीं भाषण करणारा हा जुना गड गिरनार जवळजवळ चार हजार फूट उंच आहे.  त्याच्या पायथ्याशीं एका मोठ्या प्रशस्त दगडावर सम्राट् अशोक राजाचा एक प्रसिद्ध शिलालेख आहे.  गिरनारच्या पश्चिमेस गीर नांवाचें प्रसिद्ध जंगल लागूनच आहे.  त्यांत पशूंचा राजा सिंह याचें साम्राज्य आहे.  हिंदुस्थानांत याची पैदास दुसरीकडे कोठें नसल्यानें या जंगलाला मोठें महत्त्व आलेलें आहे.  जुनागडच्या प्राणिसंग्रहालयांत सुमारें १०।१२ सिंह आम्हीं पाहिले.  त्या वेळीं त्यांच्या घोर गर्जनांनीं प्रदेश निनादून गेला.  खुर्च्यांवरून आम्हांला गिरनारवर नेण्यांत आलें.  संस्थानच्या आतिथ्यालयांत आमची थाटाची सोय झाली.  शिखरावर प्रसिद्ध आणि प्राचीन अशीं कित्येक सुंदर जैनमंदिरें आहेत.  स्वामी नारायण पंथाचींही कांहीं देवळें आहेत.  येथून आसमंतांतला देखावा आत्म्याला जागृत करणारा दिसतो.  ह्या पर्वतावर मोठमोठ्या खोल गुहा आहेत.  त्यांतील एका गुहेमध्यें प्रवेश करून अंधारांतून बरेच लांबवर आंत गेल्यावर गाभार्‍यांत किती तरी निस्संग आणि विरक्त साधु राहात असलेले आम्हीं पाहिले.  पेटलेल्या धुनीचा प्रकाश अंधारांत रौद्ररसाची प्रेरणा करीत होता.  साधूंच्या मुद्रा गंभीर आणि प्रसन्न, शरीरें धष्टपुष्ट आणि तेजःपुंज, बहुतेक नग्न आणि राखेने माखलेलीं पाहून फार पाश्चर्य वाटलें.  ह्या निर्जन प्रदेशांत ह्या साधूंची खाण्यापिण्याची सोय कशी लागते, इतर योगक्षेम कसा चालतो याचें कोडें आम्हांला पडलें.  आम्हां प्रापंचिकांच्य मनांत अर्थात् असले खाण्यापिण्याचेच विचार अगोदर येणार.  साधूंना असले प्रश्न विचारल्यावर त्यांनीं नुसतें हंसून आमची बोळवण केली.  गुहेच्या आसपास ठिकठिकाणीं शुद्धोदकाचीं कित्येक टांकीं दिसलीं.  त्यांचा उपयोग हे साधु आणि जंगलांतले व्याघ्रादि वन्य पशु यांच्याशिवाय दुसरें कोण करणार ?  हे आळीपाळीनें टांक्यांवर येऊन जात असत.  त्यांच्या गांठीभेटी होऊन काय प्रकार घडत असेल हें कळण्याला मार्ग नव्हता.  अशा समागमांत आमचे चार दिवस मोठ्या समाधानाचे, एकान्तवासाचे आणि धर्मचिंतनाचे गेले आणि आम्ही जुनागडास दिवाणांच्या कोठींत परत आलों.  तेथें मियागांवचे ठाकूर, बडोदें सरकारचे मांडलिक आमचे सरपाहुणे होते.  ठाकूरसाहेबांनीं परत जातांना आपल्या मियागांव या जहागिरीच्या जागीं मीं दोन दिवस राहून जावें म्हणून मोठ्या अगत्याचें आमंत्रण केलें व तें मीं आनंदानें पत्करलें.  प्रार्थनासमाजाच्या कार्याविषयीं ठाकूरसाहेबांनीं मोठी सहानुभूति प्रकट केली.  येथून दुसर्‍या एका लहानशा संस्थानाच्या गांवीं आम्ही गेलों.  तेथें काठेवाडी जुन्या मताचे शाहिराची भेट झाली.  त्यांचीं साधीं एकतारीवरचीं व परिणामकारीं भजनें ऐकावयाला मिळालीं.  त्यांतील तेजाभगत नांवाच्या शाहिराचीं दोनतीन अनुभविक पदें मीं उतरून घेतलीं.  पुढें माझ्या कीर्तनांत त्यांचा चांगला उपयोग झाला.  दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळें रात्री फार सुखासह गेल्या.  नंतर नानालाल कवींची व माझी ताटातूट झाली.  मी एकटाच अहमदाबादेहून मुंबईकडे परतलों.

मियागांव  :  अशा प्रवासांत मला नेहमीं एक स्मरणीय अनुभव येत असे.  एकाचा उल्लेख करणें बरें.  कधीं श्रीमंतांचे घरीं थाटाचें आदरातिथ्य तर लगेच खाण्यापिण्याचे अत्यंत हाल अशा स्थितीची अलटापालट होऊन माझी चांगली कसोटी लागत असे.  उत्तम साळीचा भात भात खाऊन दुसरे दिवशीं शिळी भाकरही मिळत नसे.  अहमदाबादेस परत येतांना थोडाच वेळ राहिल्यानें आणि गाडी अवेळीं निघाल्यानें मला एक दिवसाचें उपोषण पडलें.  बी.बी.सी.आय. रेल्वेवरील मियागांव स्टेशनवर गाडी भर बारा वाजतां मला सोडून पुढें चालती झाली.  स्टेशन क्षुद्र असल्यानें तेथें कसलीच सोय नव्हती.  दोनचार मिनिटांत गाडी गेल्यावर सर्वत्र सामसूम झालें.  स्टेशनमास्तर, पोर्टर कोठें गेले तें कळेना.  उन्हांत पिण्याला पाणी मिळेना, तर खाण्याची गोष्ट काय !  दीड दिवसाच्या उपोषणानें माझ्या पोटांतील कावळे आंतडीं कुरतडूं लागले.  अर्ध्याच मैलावर एक कुग्राम होतें.  ट्रंक व बिस्तरा प्लॅटफॉर्मवरच टाकून मी तेथें भक्ष्यशोधार्थ गेलों.  त्या ओसाड खेड्यांत मला नीट माणसेंही दिसेनात.  कांहीं दारें लागलेलीं व उघडीं असतील तर माणसें नसलेलीं असा प्रकार होता.  मी एका ब्राह्मणाच्या घरीं शिरलों.  त्याच्या घरीं श्राद्ध होतें, असें कळलें.  दोन प्रहर उलटून गेले तरी हा यजमान नुकताच उठून हजामतीला बसला होता.  जेवणाची सोय होईल काय, असें विचारतां त्यानें मी ब्राह्मण आहें का, असें विचारलें.  नाहीं म्हणतांच त्यानें मला चक्क बाहेर जाण्यास सांगितलें.  हताश होऊन शेवटीं मी एका शिंप्याचे दुकानावर आलों व माझी कठीण अवस्था सांगितली.  शिंप्याला पाझर फुटला.  आपली पत्‍नी जवळच्या तळ्यावर गेली आहे; ती आल्यावर कांहीं उरलेंसुरलें मिळेल किंवा काय तें पाहूं, असा त्यानें मला धीर दिला.  शेवाळलेला घाणेरड्यां पाण्याचा घडा डोकीवर घेऊन बाई परत आली.  तिनें एका पितळींत कालचा उरलेला उसळीवजा भात व त्याहून शिळी कढी एका वाडग्यांत वाढली.  कढींत पाहतों तर चारपांच माशा पडलेल्या होत्या.  मुकाट्यानें त्या वेंचून टाकून मीं हें पक्कान्न अधाशासारखें खाल्लें; पण पाणी कांहीं केल्या पिववेना.  कसेंबसें आंचवून मी बाहेर ओटीवर शिंप्याजवळ येऊन एका चटईवर पडलों.  श्रमामुळें झोंप लागली.  अर्ध्या तासानें उठून चटईवरच पाणी प्यालों. माझ्याजवळ चटईवर एक मुसलमान गृहस्थ बसला होता.  त्याची खंती न बाळगता मी पाणी पितों हें पाहून शिंप्याचे डोळे लाल झाले.  त्यानें कांहींच मुर्वत न ठेवतां मला दुकानांतून खालीं उतरण्यास सांगितलें.  त्यांत मुसलमानाचा अपमान होऊन तोही खालीं उतरला.  तो पोलीस शिपाई होता.  मोठ्या मिनतवारीनें मी कोण, कोठचा आहें याची तो चौकशी करूं लागला.  मी रेल्वेंतला एक उतारू आहें, माझें सामान प्लॅटफॉर्मवर पडलें आहे, जात न पाळणारा मी एक मराठा आहें वगैरे माहिती मीं सांगितली.  तो म्हणाला, ''चला, जवळच आमच्या फौजदारसाहेबांचें ठाणें आहे.  तेही मराठहेच आहेत.  तुमचें सामान मी स्वतः डोक्यावर घेऊन तेथें पोंचवतों.'' तसें त्यानें केलें.  फौजदारसाहेब कोल्हापूरचे माझे चांगले परिचयाचे निघालें.  माझी कहाणी ऐकून ते कळवळले.  पडदा पालटला आणि उत्तम सोय लागली.  रात्रीं मी ठाण्यावरच राहिलों.  मियागांव तेथून सुमारें दोन मैलांवर होता.  एका पोलिसाकडून ठाकुरास निरोप गेला.  त्यांनीं ताबडतोब एक सुंदर गाडी पाठवली.  नानालाल कवीनें माझ्या येण्याबद्दलचें ठाकूरसाहेबांना जें पत्र पाठवलें होतें तें चुकून एक दिवस उशीराचें होतें म्हणून हा सर्व त्रास पडला, असें सांगून ठाकूरजींनीं माफी मागितली.  तेथें एक दिवस राहून व थाटाचा पाहुणचार भोगून मी मुंबईस परत आलों.  येणेंप्रमाणें प्रार्थनासमाजाच्या आणि पुढील डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कामाकरितां काठेवाड आणि गुजराथ या प्रांतीं मीं एकंदर चार सफरी केल्या.

राममोहन आश्रम  :  १९०४ च्या पावसाळ्याच्या आंत आमचे बाबा जमखंडींतील वस्ती कायमची सोडून आणि कुटुंबांतील सारी मंडळी घेऊन मुंबईस आले.  त्यापूर्वीच राममोहन राय आश्रमामध्यें आमची राहण्याची सर्व व्यवस्था करण्यांत आली होती.  गिरगांवांतील प्रार्थनामंदिराच्या आवारांत या आश्रमाची चारमजली भक्कम इमारत आहे.  तळमजल्यांत भांडारकर लायब्ररी आहे.  दुसर्‍या मजल्यांत लाकडाच्या पडद्या लावून निरनिराळ्या खोल्या करून आमची व्यवस्था करण्यांत आली होती.  तिसर्‍या मजल्यांत एक मोठें दालन असून त्यांत समाजाचीं संमेलनें वगैरे करण्याची व्यवस्था होती.  चवथ्या मजल्यांत पुढें थोडी मोकळी जागा सोडून एक खोली काढण्यांत आली आहे.  तेथें खासगी प्रार्थनेची जागा व बाहेरून आलेल्या मिशनरींची सोय करण्यांत येते.  मुख्य इमारतीपासून स्वयंपाकाकरितां खोल्यांची अलग सोय असून स्नानासाठीं तुटक खोल्या आहेत.  एकंदर सोय चांगली आहे.  माझ्या कुटुंबांत एकंदर १०।१२ माणसें होतीं.  समाजांतील प्रचारक या नात्यानें माझी नेमणूक झाली तेव्हां माझ्या खर्चासाठीं दरमहा ६० रु. ची व्यवस्था करण्यांत आली.  शिवाय प्रवासाचा वगैरे सर्व खर्च माझा मींच पाहून घ्यावा लागत असे.  इतकेंच नव्हे तर समाजाची व तदनुषंगिक इतर कामें मीं काढल्यास त्यांच्याही खर्चाची जबाबदारी मजवरच पडे.  सात वर्षे मीं हें काम केलें, तरी माझ्या ह्या नेमणुकींत कांहीं वाढ झाली नाहीं आणि मी मागावी, असेंही मला कधीं वाटलें नाहीं.  मुंबई हा मुख्य राजधानीचा गांव.  राममोहन आश्रमाची सोंय माझ्यामुळें आणि त्याच्या पूर्वीपासूनही पाहुण्यांची ये-जा फार.  समाजाचे सभासदच नव्हत तर इतरही प्रागतिक मताचे सन्माननीय पाहुणे नेहमीं येऊन आश्रमांत उतरत.  त्यांतील कांहीं युरोप वगैरे बाहेरदेशीं जाणारे व तिकडून येणारे प्रतिष्ठित गृहस्थ असत.  त्यांच्याही सरबराईचा बोजा आम्हांवर पडे.  खर्चाचा प्रश्न बाजूला ठेवला तरी पाहुणचाराची दगदग आमच्या घरच्या कुटुंबियांवर नेहमीं पडे आणि ही कळ बोलून दाखवण्यासारखीही नव्हती.  गृहमेधाचें कठीण दिव्य मुकाट्यानें चालवावें लागे.  घरचें देखरेखीचें सर्व काम बाबांकडे होतें.  भावंडें शाळेंत असत.  तीं मोठीं झाल्यावर माझ्या कामांत सामील झालीं.  वृद्ध आईबाबाही माझ्याच नादीं लागले.  माझ्या कार्याशीं मी इतका तादात्म्य पावलों होतों कीं, माझें हें करणें न्यायाचें कीं अन्यायाचें होतें, सत्य होतें कीं असत्य होतें, ह्याचा विचार त्या वेळीं माझ्या ध्यानांतही येत नव्हता आणि घरच्या मंडळींची मनोरचना तक्रार करण्यासारखी तर कधींच नव्हती.  असा हा आमचा प्रपंचाचा अल्लारखी गाडा चालला होता.