माझ्या खोड्या

आग्रहीपणा :  दंगा, मारामारी आणि स्वैर खेळ हे बालपणाचे जन्मसिद्ध हक्क होत आणि ते मी माझ्या परीनें-आमचे बाबांचा आम्हांवर कितीही दाब असो- बजावयाला कांहीं कमी केलें नाहीं.  अगदीं लहानपणीं मी शेजारच्या मुलांना मारून आईकडे कागाळ्या आणीत असें,  हें मला अद्यापि आठवतें.  आमचे आजोबा असतांना आमच्या वाड्यांच्या बाहेरच्या पटांगणांत कांहीं भाडोत्री कुळें राहात असत.  त्यांत पाटोळे नांवाचें एक गरीब कूळ असे.  त्यांचा रामू नांवाचा एक माझ्याच वयाचा लहान मुलगा असे.  सहज खेळतां खेळतां मीं त्याच्या डोक्यावर हात ठेवण्याचा हट्ट घेतला; पण हात ठेवूं न देण्याचा त्यानेंही हट्ट घेतला.  कारण हट्ट करणें हा दोघांचाही सारखाच जन्मसिद्ध हक्क होता ना !  शेवटीं आम्हां लहानग्यांची मारामारी झाली.  रामू आपल्या आईकडे रडत गेला. तरी मी त्याच्या मागें लागलोंच होतों.  शेवटीं ह्या खटल्याचें अपील आमचे आईकडे आलें.  कारण रामूची आई माझ्या आईची मोठी मैत्रीण होती.  आईनें हा खटला साहजिकच आजोबांकडे वर्ग केला.  आजोबांनीं आम्हां दोघां हेकेखोरांना आपल्या समोर घेतलें आणि दोघांना खाऊ देऊं केला; पण खाऊपेक्षां मला दावेदाराचे डोक्यावर हात ठेवण्यांतच जास्ती ईर्षा वाटत होती.  रामू खाऊला कबूल झाला आणि मीं त्याच्या डोक्यावर हात ठेविला.  खटल्याचा निकाल लागला.  बरा म्हणा वाईट म्हणा हा आग्रहीपणा माझ्यांत केव्हां केव्हां चमकतो !

गांवढळ खोड :  म्हातारबा सुतार म्हणून माझ्या वडिलांचे एक मित्र असत.  त्यांचीं दोन मुलें रामू आणि कृष्णा हीं अनुक्रमें माझ्या आणि माझ्या वडील भावाच्या वयाचीं असत.  मी मराठी शाळेंत असतांना आमची चौघांची फार गट्टी असे.  एकदां आम्ही चौघे एकीकडे व दुसर्‍या आळींतील मुलें दुसरीकडे, ह्यांची आमच्या घराच्या पश्चिमेस असलेल्या तळ्यांत एक मोठी मारामारी झालेली आठवते.  तळ्यांत पाणी नसे.  त्यांत खेळण्यास विस्तीर्ण जागा असे; पण एकदां रामूची आणि माझीच मारामारी जुंपून आम्ही दोघेही आमच्या आळींतील मोठ्या रस्त्यांत भलीं मोठी खोल गटारें होतीं त्यांत घाणींत पडलों.  रामूच्या आईनें आम्हांला दोघांना धुतलें, पुसलें, खडे व कांटे रुतले होते ते काढले.  माझ्यापेक्षां रामूला जरी मार जास्त लागला होता, तरी त्याच्या आईनें माझेंच कौतुक करून मला आईकडे पाठविलें.

विहिरीच्या जुन्या भिंतीवर एक प्रकारची बारीक लव्हाळ्याप्रमाणें वनस्पति चिकटून वाढत असे.  ती वाळल्यावर आम्ही काढून आणीत असूं.  ती प्रतिपक्षाच्या मानेला न कळत फासल्यावर तेथें आग सुटे.  हा खरोखर आमचा दुष्टपणा आणि भ्याडपणाही खरा; पण म्हणतात ना, प्रेमांत आणि युद्धांत सगळेंच कांहीं शोभतें.  मग त्याला आम्हीच कसे अपवाद ?  शिमगा आला म्हणजे ह्या बालयुद्धाला नवीन जोम येई.  पण जसजसा मी वरच्या वर्गांत जाऊन ब्राह्मणांच्या मुलांना हाताशीं घेऊं लागलों तसतसा हा गांवढळपणा कमी झाला.  तरी माझ्या कांहीं वैयक्तिक खोड्यां चालूच होत्या.

रामतीर्थ  :  जमखंडीच्या पश्चिमेस रामतीर्थ म्हणून एक रम्य ठिकाण आहे.  तेथें दर श्रावणी सोमवारीं जत्रा भरत असे.  इ.स. १८५७ सालच्या बंडानंतर जमखंडीचे यजमान श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन ह्यांनीं ह्या ठिकाणींच आपली वस्ती मांडली.  पूर्वी येथें रामेश्वराचें एक जुनें रम्य देऊळ होतें.  पुढें २५।३० वर्षांत येथें विस्तीर्ण राजधानीचें स्थान झालें.  पश्चिमेस डोंगराखालीं कडपट्टी म्हणून एक लहान खेडेगांव आहे.  तेथें बसवण्णाचें पुरातन प्रसिद्ध लिंगायत देवालय आहे.  येथें मोठी यात्रा भरत असे.  अप्पासाहेबांनीं रामतीर्थ लोकप्रिय करण्यासाठीं ही यात्रा वर डोंगरांत आपल्या राहण्याच्या जागीं कांहीं वर्षे नेली.  रामतीर्थास जाण्याला एक वरची डोंगराची व दुसरी खालची सपाट-गाड्यां वगैरे जाण्याची-अशा दोन वाटा असत.  ह्या दोन्ही वाटा सोडून अगदीं डोंगराच्या माथ्यावरून मेलगिरी लिंगाप्पाच्या देवळामागून रामेश्वराच्या देवळाला जाण्याची मीं नवीन टूम काढली.  ह्याचें कारण पावसाळ्यांत डोंगरावरची व भोंवतालच्या दूरवर मैदानी प्रदेशांतील शोभा फार सुंदर दिसे.

विंचवांशीं खेळ  :   ह्या डोंगरावर विंचू फार असत.  ते भले मोठे काळे तांबडे असत.  काळ्या विंचवाला इंगळी म्हणतात.  ती चावली कीं प्राणान्तच  !  हे विंचू धरून त्यांची एक मोठी माळ करण्याची आम्हांला खोड लागली.  दगड उचलला कीं, खालीं विंचू आढळावयाचाच.  मी तर विंचू धरण्यांत मोठा धीट व पटाईत झालों.  पुढें पुढें विंचवाच्या नांगींतलें विष काढून त्याला अगदीं तळहातांत घेऊन मी इतर मुलांना चकीत करीत असें.  विंचू नजरेस पडला कीं, तो आपली नांगी आधीं वर करतो.  ती मी मोठ्या शिताफीनें चिमटींत घट्ट पकडीत असें.  मग नखावर त्याच्या नांगीचें टोंक घासलें म्हणजे त्यांतून विषाचा एक लहानसा बिंदु बाहेर निघे.  तो पुसून टाकला कीं, विंचवाचें सर्व तेजच नाहीसें होई.  तो आपोआपच नांगी खालीं टाकी.  मग त्याला कोणीही खुशाल हातावर घ्यावें.  पण निस्तेज विंचवालाही हातांत घेण्याचें धैर्य कोणास होत नसे.  मग माझ्या फुशारकीला कोठली सीमा उरणार !  घरांत किंवा आमच्या शाळेंत एखादा मोठा विंचू निघाला कीं मुलें मजकडे येत.  मी चटकन तो धरून त्याचें विष काढून हातावर घेई.  अशा गडबडींत एखादे वेळीं चुकून मला विंचू चावतही असे; पण अभिमानास पेटून त्या वेदना मी मुकाट्यानें सहन करीत असें.  कोण हा अर्कटपणा !

सहिष्णुता  :  दुखणें आलें किंवा जबर इजा झाली तर इतरांप्रमाणें मी विव्हळत नसें; स्वस्थ घुमेपणानें पडें.  ''विठ्या, काय तूं बेरड आहेस रे !''  असें आई म्हणे.  तिकडे माझें लक्षच नसे.  ही स्पार्टन सहिष्णुता माझ्यांत जन्मतः नसून ती माझ्या मानीपणानें मीं आणली होती.  शिक्षकांनीं छडी मारली कीं, साधारण मुलें मोठ्यानें किंकाळी फोडीत.  इंग्रजी शाळेंत गेल्यावर मला तर शिक्षकाच्या हातून मार खाण्याची कधीं अपवादादाखलही पाळी आली नाहीं.  सहनशीलपणा वाढवावा म्हणून मी शिक्षक नसतांना त्यांची छडी घेऊन एखाद्या मुलाच्या हातांत देई आणि माझ्या तळहातावर व मनगटावर जोरानें मारण्यास सांगें.  किती मारलें तरी मी हात खालीं घेत नसें.  हात हिरवा-निळा झालेला लपवून ठेवण्याचा जो त्रास होई तेवढाच काय तो !

इंग्रजी सहाव्या किंवा सातव्या इयत्तेंत असतांना घडलेली एक गोष्ट.  आमचें नेहमींचें मित्रवलय बसलें होतें.  मी दुःख किती सहन करतों, तें पाहण्यासाठीं व्यंकू कुलकर्णी ह्यानें एक जळती उदकाडी माझ्या उजव्या हाताच्या पंजाच्या मागील भागावर ठेवली.  ती एकदम न ठेवतां हळूच जवळ आणतां आणतां लावली.  उद्देश हा कीं, पहिला चटका लावल्याबरोबर मी कचरतों कीं काय हें पाहावें.  माझ्या तोंडांतून एखादा शब्द किंवा डोळ्यांवरून कसलेंही चिन्ह दिसलें कीं मी हरलों असें समजावयाचें ठरलें होतें.  शेवटीं जळती उदकाडी बराच वेळ ठेवली तरी हूं का चूं नाहीं.  उदकाडीच विझूं लागली.  उतक्यांत माझ्या आईनें अकस्मात् येऊन तें पाहिलें.  ती खूप रागें भरली !  माझ्या उजव्या हाताचे मागें तो लहानसा व्रण अद्यापि स्पष्ट दिसत आहे.  ह्या अर्वाच्यपणास काय म्हणावें !

विक्षिप्‍तपणा :  विक्षिप्‍तपणाचें धाडस माझ्या स्वभावांतच उपजत पेरलेलें दिसतें. कारण कॉलेजांत गेल्यावरही बर्‍याच वेळां मी चमत्कारिक वागलों आहें.  पन्हाळगड-विशाळगडची सफर मीं फर्ग्युसन कॉलेजांत असतांना केली.  तेव्हां किल्ल्याच्या अवघड जागीं चढून जाऊन बसणें मला आवडावयाचें.  इंग्लंडांत असतांना इंग्लिश लेक्समध्यें मी एकदां डॉ. कारपेंटर-आमच्या मँचेस्टर कॉलेजचे प्रिन्सिपाल-ह्यांचा पाहुणा होतों.  बरोबर कॉलेजमधील ७।८ सहाध्यायी होते.  एके दिवशीं ठरलें कीं, सूर्योदय पाहाण्याला रात्रीं उठून एका डोंगराच्या शिखरावर जावयाचें.  सूर्योदयापूर्वी तेथें पोंचण्यासाठीं भल्या पहाटे उठून मी निघालों.  डोंगरांत कांहींशी वाट उंच गेल्यावर मोठा पाऊस आला.  रात्र अंधारी होती.  सगळी मंडळी परतली; पण मला परतावेंसें वाटेना.  मी एकटाच तसा पुढें चाललों.  पाऊस थांबेना.  वाट दिसेना.  मुलूख अगदींच अपरिचित.  बरोबर कोणीच नाहीं.  शेवटीं जवळच एक लहानशी गुहा लागली.  तींत शिरून मीं पावसापासून आश्रय घेतला.  सुदैवानें जवळ काड्यांची पेटी होती. काडी ओढून पाहतां गुहा फार लहान होती, असें दिसलें.  उजाडेपर्यंत रात्र तेथेंच काढावी लागली.  सकाळीं उठून एकटाच भुतासारखा घरीं आलों.  मिसेस कारपेंटर चिंतेंत बसल्या होत्या.  हें माझें करणें त्यांना फार धाडसाचें वाटलें; पण मला त्यांत कांहीं विशेष वाटलें नाहीं.  

ह्याच वेळीं डॉ. कारपेंटर आणि आम्ही सर्व मंडळी इंग्लिश लेक्स् डिस्ट्रिक्ट (सरोवर प्रातीं) मध्यें वजभोजनास गेलों असतांना डोंगरांत एका रम्य जंगली ठिकाणीं फराळास उतरलों.  जो तो स्वच्छंदानें हिंडूंफिरूं लागला.  मला एक उंच झाड दिसलें.  त्यावर चढण्याची मला हुक्की आली !  लागलीच मी चढलोंही; पण उतरतां येईना.  कारण पायांत बूट घालून मी कसा तरी वर चढलों, पण उतरतांना बुटांसह पाय घसरूं लागले.  बूट नसते तर उतरणें सोपें होतें; पण मंडळींत बूट काढणेंही बरें नव्हतें.  लागलों घुटमळायला.  अखेर एका फांदीच्या शेवटीं जाऊन ती वांकवून मीं खालीं उडी घेतली.  त्या वेळीं तर मिसेस कारपेंटरनीं किंकाळीच फोडली.  पुन्हां असल्या चेष्टा करूं नकोस, म्हणून त्यांनीं मला गंभीरपणानें बजावलें.  स्कॉटलंडांतील सरोवर प्रांतांत तर मी एकटाच रोज २०।२५ मैल सरोवरावरून बोटींतून जाई आणि उंच डोंगराच्या अगदीं शिखरावर एकटाच तासन तास जाऊन बसें.  भीति वाटत नसे.  भिण्यासारखें कांहीं नव्हतेंही.  हॉटेलांत श्रीमंती चोंचले करणार्‍या मंडळींत न मिसळतां कोठें तरी अगदीं एकान्तवासांतील गरिबाच्या झोंपडींत मी उतरत असें.  सॅवरडेनॉन नांवाच्या खेड्यांत एका गरीब कुटुंबांत मी उतरलों होतों.  तेथील लहान मुलांना घेऊन मी लॉक लोमंड सरोवरावर एकदां फिरत होतों.  मनांत आलें कीं पोहावें.  कपडे काढून घेतली उडी !  जरी उन्हाळा होता तरी सरोवराचें पाणी इतकें थंड होतेकीं, मी पडल्याबरोबर गारठलों.  अंगाची मूठ वळावयाला लागली.  पायाला गोळे येऊं लागले.  मग पोहतों कसचा !  मोठ्या प्रयासानें मी कांठला लागलों.  लहान मुलें घाबरून गेलीं.  हा जिवावरचा प्रसंग गुदरला !

शर्यत  :  मी मराठी शाळेंत असतांना १०।१२ वर्षांचा होईपर्यंत तर फारच उतावळा, चळवळ्या व खोडकर होतों; पण माझा वडील भाऊ नेहमीं पाठीराखा असे.  म्हणूनच बाहेर गेलेला मी सुरक्षित घरीं येत असें.  एरवीं आईला मोठी काळजीच असे.  चैत्र महिन्यांत रामतीर्थांत श्रीमंत अप्पासाहेब गुरांचें जंगी प्रदर्शन करीत.  त्या वेळीं मोठमोठ्या शक्तिवान् बैलांची ओझ्यानें भरलेल्या गाड्यां ओढण्याची शर्यत होत असे.  ती पाहण्यास गांवोगांवच्या लोकांची मोठी गर्दी जमे.  एकदां ही शर्यत पाहण्यासाठीं मी आणि माझा भाऊ गेलों होतों.  गर्दीत आम्हां मुलांस कसें दिसणार ?  म्हणून आम्ही एका मोठ्या झाडावर चढलों; पण त्या झाडावर अगोदरच पुष्कळ माणसें चढून पाहात होतीं.  त्या झाडाच्या एका मोठ्या उंच आणि लांब फांदीवर इतकीं माणसें गर्दी करून बसलीं कीं, शेवटीं भार सहन न होऊन ती सबंध फांदी माणसांसह तुटून खालीं पडली.  खालीं देखील माणसांची गर्दीच होती.  त्यामुळें मोठा हाहाःकार झाला.  मीही उंचीवरून खालीं पडलों.  गर्दीत पडलों म्हणून हातपाय मोडले नाहींत; पण विलक्षण ओरखडलें होतें.  इतक्यांत पोलिसांची धराधरी चालली.  मग मी जीव घेऊन पळत सुटलों.  माझें लग्नांतलें मोठें लांब लाल पागोटें झाडाच्या फांदींत अडकलेलें व लग्नांतला लांब चिटाचा अंगरखा फाटलेला.  शिवाय धोतर पायांत अडकत होतें.  पोलीस तर धरावयास जवळ आलेला.  अहाहा !  काय तो प्रसंग !  पण सर्वांना चुकवून पगोटेंही झटकन ओढून घेऊन शेंडी सावरीत मीं जी धूम ठोकली ती दीड मैल मागें न पाहतां घरापर्यंत मजल गांठली; पण मरण अद्यापि पुढेंच होतें.  घरी बाबांनीं फाटके कपडे पाहिल्यावर काय दशा होईल ती आठवून पोलिसपेक्षांही ह्या नवीन धास्तीनें काळीज धडधडूं लागलें.  घरीं प्रवेश करण्याची छाती कांहीं होईना.  बाबा आहेत काय, कोठें बसले आहेत ह्याचा कानोसा वाकून पाहून घेतल्यावर चोराप्रमाणें मी आंत शिरलों.  बाबा घरीं नाहींत हें पाहून हायसें वाटलें व सर्व श्रमांचा परिहार झाला !

विशेष करामत :  शिमग्यांत एकदां अशीच खोड मोडली.  शिमग्याचे दिवसांत चांदण्या रात्रीं, बाबांचा डोळा चुकवून उनाडक्या करीत आम्ही फिरत असूं.  विशेष करामत म्हणजे वेश्यांच्या आळींत बदफैली लोकांच्या नांवानें शिमग्यांतल्या अचकट-विचकट म्हणी म्हणत, अभद्र ध्वनि काढीत मध्यरात्र उलटून जाईपर्यंत हिंडावयाचें आणि पुन्हां धुळवडीच्या सकाळीं भुताटकी करावयाची, ती निराळीच !  एकदां मी कांहीं मुलांबरोबर एका वेश्येच्या घराजवळ वाईट गाणीं म्हणत बोंबलत गेलों.  मुलांच्या नादीं लागून तिच्या दाराशीं मी दंगामस्ती करूं लागलों.  आंतून बाळा काणे नांवाचा एक तरुण ब्राह्मण त्रासून आला व त्यानें मलाच पकडलें.  त्याच शिक्षकानें मला शाळेंत घालण्याचा प्रथम मुहुर्त करण्याचा धडा घालून दिला, असें मागें सांगितलेंच आहे.  तो फार रागीट व दांडगा होता.  उभ्या वर्गांत तो मुलांना मारूं लागला तर एकाच हातानें न मारतां दोन्ही हातांनीं गुराला मारल्याप्रमाणें झोडपीत सुटे.  ही त्याची मारकट प्रसिद्धि मला माहीत होती.  अशा यमाच्या हातीं सांपडल्यानें माझी गाळण उडाली.  त्यानें संतापून माझें डोकें धरलें होतें.  त्याच्या हातांत माझा रुमालच ठेवून मी खालीं झुकांडी देऊन निसटलों व सूंबाल्या केला.  बाळा काण्यांच्या हातून सुटलों, पण रुमालाशिवाय घरांत बाबांपुढें कसें जाणार !  शेवटीं माझा वडील भाऊ काण्यांकडे गेला.  मी रामजीबोवांचा मुलगा असें कळल्यावर त्या यमाचीच उलट गाळण उडाली.  रुमाल परत देऊन झालेली गोष्ट बाबांना कळवूं नको, अशी उलट माझ्या भावाचीच तो गयावया करूं लागला.  अशानें हा प्रसंग टळला !  मी मोठा झाल्यावर शिमग्यांतले अनाचार व अत्याचार बंद करण्यासाठीं होलिकासंमेलनाची महाराष्ट्रभर मोठी चळवळ केली.  तींत बरेंच यशही आलें,  मुंबईत ह्या कार्याचा आद्य व मुख्य प्रवर्तक मीच हें सर्व खरें; पण बाळपणाच्या माझ्या लीलांची वाट काय ?  मोठेपणीं होलिकासंमेलनांत साळसूदपणें लंबीं व्याख्यानें देतांना मध्येंच एखादे वेळीं बाळा काणे आठवल्याबरोबर माझी बोबडीच वळे.  एवढ्या प्रसिद्ध वक्त्याच्या तोंडाला मध्येंच कां खीळ पडली असें श्रोत्यांस वाटे; पण अंदरकी बात राम जाणे !