विविध प्रयत्न

नागपूरच्या सरकारी कॉलेजचे प्रो. श्रीनिवास नारायण बनहट्टी यांनीं आपल्या नवभारत ग्रंथमालेतर्फे माझें 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हें पुस्तक इ.स. १९३३ सालीं प्रसिद्ध केलें आहे.  त्यांत मीं या प्रश्नाचा प्राचीन कालापासून सविस्तर व सांगोपांग विचार केला आहे.  ह्याचा परामर्ष पुढें योग्य स्थळीं घेणें बरें पडेल.  तूर्त अस्पृश्यतानिवारणासंबंधीं डिप्रेस्ड क्लासेस मिशनचें काम सुरू होण्यापूर्वी गेल्या शतकाच्या मध्यापासून जे प्रयत्‍न झाले आहेत त्याचा जरुरीपुरता निर्देश करणें बरें.  याविषयीं रा. श्री. व्यं. केतकरकृत 'महाराष्ट्रीय ज्ञानकोश' या पुस्तकांत १९२४ सालीं माझा सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे.

पूर्वेतिहास  :  या जागतिक प्रश्नाच्या उत्पत्तीविषयीं मीं 'ज्ञानकोशा' च्या लेखाच्या आरंभीं म्हटलें आहे कीं, अस्पृश्यतेचा इतिहास निदान हिंदुस्थानांत तरी आर्य लोकांच्या आगमनाइतकाच जुना आहे.  चांडाल हा शब्द वैदिक वाङ्‌मयांत आणि बौद्ध वाङ्‌मयांतून आढळतो.  बुद्धाच्या वेळेच्या पूर्वीपासून तरी निदान चांडाल आणि इतर राष्ट्रें अस्पृश्य गणलीं जात होतीं, असे उल्लेख आढळतात.  इराणांतील झरतुष्ट्रपंथी आर्य व हिंदुस्थानांतील देवयज्ञी आर्य यांना अस्पृश्य आणि तिरस्करणीय समजत असत, असे पारश्यांच्या जुन्या व अर्वाचीन ग्रंथांत पुरावे मिळतात.  आर्यांचा हिंदुस्थानांत कायमचा जम बसल्यावर त्यांनीं येथील दस्यु ऊर्फ शूद्र नांवाच्या जित लोकांना आपल्या वस्तीजवळच, पण बाहेर राहावयास लावलें.  त्यांच्या व आपल्या संस्कृतींत भेसळ होऊं नये म्हणून त्यांनीं त्यांना अस्पृश्य ठरविलें.  ज्या अर्थी जपानांत हैटा व हीना नांवाच्या अस्पृश्य जाती अद्यापि आहेत त्या अर्थी अस्पृश्य जात ही संस्था आर्यांनींच निर्माण केली असून तिचा प्रादुर्भाव पूर्वी मोंगल लोकांतही होता हें सिद्ध होतें.  हैटा किंवा ऐटा ही जात फिलिपाइन बेटांतून जपानांत गेली असावी.  अथ्रवण (ब्राह्मण), रथेष्ट्र (राजन्य), वस्ट्रय (वैश्य) आणि हुइटि (शूद्र) असे झरतुष्ट्राच्या वेळीं इराणांत चार भेद होते.  वेदांत शूद्र हा भेद फारसा आढळत नाहीं, पण महाभारतांत अमीर आणि शूद्र यांचा उल्लेख असून सिंधु नदीच्या मुखाजवळील भागांत त्यांची वस्ती असावी असें दिसतें.  ॠग्वेदांत पुरुषसूक्तांत शूद्र शब्द झाला आहे व शुल्क यजुर्वेदांत आठ वेळां हा शब्द आला आहे.  Castes of India ह्या पुस्तकांत विल्सननें म्हटलें आहे कीं, कंदाहार प्रांतांत शूद्रोई नांवाचें प्राचीन राष्ट्र होतें आणि सिंधु नदीवर शूद्रोस नांवाचें शहर होतें.  इराणांतील हुइटी अथवा शूद्रोई आणि फिलिपाइन बेटांतील हैटा या जातींचा संबंध असल्याचें सिद्ध करतां आल्यास अस्पृश्यतेच्या प्राचीन उत्पत्तीवर आणि प्रसारावर बराच प्रकाश पडण्यासारखा आहे.  इंग्रजी शिक्षणामुळें हिंदुस्थानांत जी आधुनिक सुधारणेची प्रवृत्ति झाली तिच्यामुळें अस्पृश्यतेच्या निवारणार्थ जे ठिकठिकाणीं प्रयत्‍न झाले त्यांचा आतां विचार करूं.

महात्मा ज्योतिबा फूले  :  बंगाल्यात १८२८ सालीं राजा राममोहन राय यांनीं ब्राह्मसमाज स्थापन करून आद्य प्रगतीची ध्वा उभारली, पण अस्पृश्यतानिवारणाचा अग्र आणि अंतिम मान महाराष्ट्रासच मिळाला.  विशेषतः तो मान महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेंच प्राप्‍त झाला.  महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुणें येथें फुलमाळी समाजांत झाला.  १८४८ पर्यंत यांचे मराठी व इंग्रजी शिक्षण मिशनरी शाळेंत झालें.  १८५२ सालीं मुंबई सरकारानें ज्योतिबांना २०० रुपयांची शाल मोठी जाहीर सभा भरवून नजर केली.  त्याचें कारण १८४८ सालीं ज्योतिबांनीं मुलींची पहिली शाळा स्थापन केली आणि १८५२ सालच्या आरंभीं महार-मांगांच्या मुलांसाठीं पहिली शाळा स्थापन केली.  ही शाळा मुंबई इलाख्यांतच नव्हे तर अखिल भारताच्या इतिहासांत अस्पृश्यांसाठीं एका हिंदूनें उघडलेली पहिली शाळा होय.  सरकारी इन्स्पेक्टर मेजर कँडीसाहेब यांनी ह्या शाळेची पहिली परीक्षा २१ मार्च १८५२ रोजीं शुक्रवार पेठेंतील शाळेंत घेतली, असें त्या दिवशीं प्रसिद्ध झालेल्या ज्ञानप्रकाशच्या अंकांत नमूद झालेलें आहे.  ''ह्या वेळेस शुद्ध लिहणें व वाचणें वगैरे गोष्टींत ह्या शाळेंतील मुलांनीं विश्रामबागेंतील (वरिष्ठ वर्गाच्या) कित्येक मुलांपेक्षांही उत्तम परीक्षा दिली, असें मेजरसाहेबांनीं बोलून दाखविलें.''  ता. ५ डिसें. १८५२ च्या 'ज्ञानप्रकाशांत' पहिल्या वार्षिक रिपोर्टासबंधानें संपादकानें स्पष्ट मत दिलें आहे.  ''त्यांनीं एक मुलींची शाळा आपल्या घराजवळ काढली.  त्या कालावधींत व पुढेंही त्यांना त्यांच्या जातीकडून फार त्रास सोसावा लागला.  त्यांस शेवटीं त्यांच्या तीर्थरूपांनीं त्याच कारणावरून घरांतून बाहेर काढलें.  आपल्या नीच मानलेल्या बंधुजनांस अज्ञानसागरांतून काढून ज्ञानामृताचें सेवन देण्याकरितां त्यांनीं संकटें भोगलीं, हा त्यांचा त्या जातीवर मोठा उपकार आहे.  आम्हीही त्यांचे आभार मानतों.'' ह्या शाळेंत चांभाराच्या मुलींना ज्योतिबा स्वतः व त्यांची पत्‍नी किती कळकळीनें शिकवीत असत याविषयीं एक पत्र ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध झालें आहे. ''त्यांचे तीन मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि सखाराम यशवंत परांजपे यांची ज्योतिबांना बरीच मदत असे.  महारामांगांच्या शाळांत बरीच गर्दी होत असे.  ह्या लोकांस त्यांनीं आपल्या राहत्या घराच्या विहिरीवर पाणी भरण्यास परवानगी दिली होती.'' (अ. ए. गवंडीकृत फुले-चरित्र, पान ८)

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीनें नानाच्या पेठेंत पुणें म्युयनिसिपालिटीकडून ता. १८ जून १९१४ रोजीं भोकरवाडीजवळील ७ एकर जागा आपल्या प्रशस्त इमारतीकरितां नव्याण्णव वर्षांच्या करारानें घेतली आहे.  हीच ती ज्योतिबांची मिळकत होय.  सरकारकडून म्युनिसिपालिटीला जी शाळा मिळाली ती देखील हल्लीं या मंडळींच्या शाळांतच सामील झाली आहे.

बाबू शशिपाद बंदोपाध्यायजी (बानर्जी)  :  बंगाल्यांत अस्पृश्यतानिवारणाचा प्रथम मान वरील ब्राह्मण गृहस्थांकडेच आहे.  हे कलकत्त्याकडील बारानगर गांवीं सन १८४० मध्यें कुलीन ब्राह्मण जातींत जन्मले.  सन १८६६ सालीं त्यांनीं ब्राह्मसमाजाची दीक्षा घेतली.  तेव्हांपासूनच ते खालच्या जातीशीं मिळूनमिसळून जेवूं-खाऊं लागले.  १८६५ सालच्या नोव्हेंबरच्या १ ल्या तारखेस बारानगरच्या गिरणींतल्या मजुरांची त्यांनीं एक सभा भरविली.  या सभेंत ठराव होऊन त्यांनीं मजुरांकरितां रात्रीच्या व दिवसाच्या शाळा काढल्या.  हा अनाचार टवाळ लोकांस न खपून त्यांनीं त्या शाळा उठविल्या.  पण बाबूजींनीं स्वतःच्या खर्चानें इमारती बांधून त्या कायम ठेवल्या.  महाराष्ट्रांतील चोखामेळ्याप्रमाणें बंगाल्यांतील कर्ताभजापंथी चांडाळवर्ग भजनाचा शोकी आहे.  त्यांचा बिहालपारा गांवीं सारंगी तयार करण्याचा एक उत्तम कारखाना आहे.  तेथें जाऊन बाबूजी चांडाळांचें कीर्तन ऐकत.  १८७० सालच्या ऑगस्ट महिन्यांत त्यांनीं अशा मजूरवर्गाचा एक क्लब काढला.  त्याच्या द्वारां त्यांना वाचनाची गोडी लागली आणि त्यांच्या मद्यपानादि दुष्ट चाली सुटल्या.  वेडीवांकडीं अभद्र गाणीं सोडून ही मंडळी सात्त्विक कीर्तनें करूं लागलीं.  १८७१ मध्यें जेव्हां बाबूजी विलायतेस निघाले तेव्हां ह्या गरीब मजुरांनीं त्यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक मानपत्र दिलें.  या दीनांच्या सेवेबद्दलचा बाबूजींचा सत्कार ते विलायतेस गेल्यावर ब्रिस्टल शहरीं एका मिशनरी संस्थेनें मोठें मानपत्र देऊन केला.  परत आल्यावर शशिपाद बाबूंनीं गरिबांसाठीं एक पैसा किमतीचें एक मासिक काढलें.  दर महिन्यास त्याच्या १४०० प्रती खपूं लागल्या.  त्यांत पं. शिवनाथसारख्यांनीं लेख लिहिले.  श्रीमंत वर्गाचीही त्यास चांगलीच मदत असे.  'बारानगरसमाचार' नांवाचें साप्‍ताहिकही त्यांनीं काढलें.  ते चांडाळाबरोबर जेवीत; मेहेतरांच्या मुलांची शुश्रुषा करीत.  सरकारनें नुकत्याच उघडलेल्या सेव्हिंग्ज बँकेंत त्यांचे पैसे ठेवायला लावून त्यांनीं त्यांना काटकसर शिकविली.  बारानगरास पुढें ब्राह्मसमाज स्थापन झाल्यावर तेथें बरेंच काम होऊं लागलें.  कलकत्ता येथें ब्राह्मसमाजाचा माघोत्सव होतो.  त्या वेळीं मोठ्या थाटाचें नगरसंकीर्तन निघतें.  त्यांत बारानगरच्या मजुरांची एक दिंडी येऊन भजनांत भाग घेते.  हल्लीं बंगाल्यांत जें Backward Classes Mission आहे त्यांचें मूळ महाराष्ट्रांतील Depressed Classes Mission हें आहे.

मुंबईंतील एक प्रयत्‍न  :   मुंबई शहरांत १८५५ सालीं एक मंडळी नेमून तिच्या विद्यमानें कांहीं शाळा अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीं स्थापन झाल्या होत्या, पण त्या वेळीं काल अनुकूल नसल्यामुळें व चिकाटी धरून काम न झाल्यानें त्या शाळा बंद पडल्या.  १८७० सालीं ब्रह्मानंद केशवचंद्र सेन विलायतेहून परत आले व त्यांनीं धोबी तलावावर फ्रामजी कावसजी इन्स्टिट्यूटमध्यें जें व्याख्यान दिलें त्यांत त्यांनीं खालच्या जातींच्या उन्नतीसाठीं मुं. प्रा. समाजानें कांहीं कार्य करावें अशी सूचना केली.  ह्या सूचनेस अनुसरून मुं. प्रा. स. च्या मंडळींनीं रात्रीच्या कांहीं शाळा स्थापन केल्या.  त्यापैकीं दोन शाळा फक्त अस्पृश्य मानलेल्या जातींसाठीं होत्या.  १८९१ सालीं प्रा. स. चे एक सभासद शेठ दामोदरदास सुखडवाला ह्या उदार गृहस्थांनीं भायखळा येथें स्वखर्चानें अस्पृश्यांसाठीं शाळा चालविण्यासाठीं मदत केली.  सर नारायणराव चंदावरकर यांनीं १८९१ सालीं असें म्हटलें आहे कीं, 'अस्पृश्योद्धाराच्या एकंदर चळवळीचा त्या वेळपर्यंतचा इतिहास अवलोकन केला व आज अस्पृश्योद्धारार्थ चालू असलेलें कार्य ध्यानांत घेतलें तर बरेंचसें श्रेय ख्रिस्ती मिशनरी, ब्राह्मसमाज, कर्नल अलकॉट व इतर थिऑसॉफिस्ट, स्वामी दयानंद सरस्वती व आर्यसमाज यांच्याकडे जातें यांत कांहीं संशय नाहीं.'

सयाजीराव महाराज  :  भारतीय अस्पृश्यता ही एक स्वतंत्र संस्थाच आहे.  बौद्ध, जैन, शीख, लिंगायत, वैष्णव वगैरे धर्मपंथीयांनीं व इतर साधुसंतांनीं प्राचीन व मध्ययुगीन कालीं अस्पृश्यांच्या आत्मिक उद्धारासाठीं प्रयत्‍न केले आहेत, पण ते सर्व वैयक्तिक स्वरूपाचे होते.  सामुदायिक अस्पृश्यता मुळांतच नष्ट करून आधुनिक अर्थानें ती निवारण्याचें व त्यापुढचें भौतिक उद्धाराचें काम या पंथांनीं किंवा कुणीं संतांनीं केलेलें इतिहासांत नमूद नाहीं.  ह्या बाबतींतील चालू प्रयत्‍न म्हणजे आधुनिक युगाचेंच एक विशिष्ट लक्षण आहे.  पाश्चात्यांची संस्कृति या पुराणप्रिय देशांत अंमल गाजवूं लागल्यावर १९ व्या शतकाच्या मध्यापासून अशा प्रयत्‍नांना सुरुवात झाली.  केवळ कलानुक्रमाप्रमाणें पाहिल्यास श्रीमंत महाराज सरकार गायकवाड यांचा नंबर तिसरा लागतो.  महात्मा जोतिबा फुले यांचा प्रयत्‍न १८५२ सालीं, बाबू बॅनर्जी यांचा प्रयत्‍न १८६५ सालीं व श्रीमंत महाराज सर सयाजीरावांचे प्रयत्‍न १८८३ सालीं, म्हणजे त्यांना राज्याधिकार मिळाल्याबरोबर दुसर्‍या तिसर्‍या वर्षी सुरू झाले.  या दृष्टीनें पाहतां श्रीमंत महाराज म्हणजे एका मोठ्या संस्थानचे मोठे अधिपति म्हणूनच नव्हे तर अखिल भारतांतील लोकमताचे नेते, समाजसुधारक, राजकारणकुशल मुत्सद्दी व आपल्या दोस्त इंग्रज सरकारालाही पदोपदीं धडे शिकविणारे अनुभवी सत्ताधारी म्हणून जगापुढें झळकत आहेत.  १८८२ सालीं ह्या कामास हात घालतांना महाराजांचें वय अवघें वीस वर्षांचेंही नव्हतें.  इतर संस्थानांतून जीं थोडींबहुत अशीं अपूर्व कृत्यें होतात त्यांचें श्रेय एखाद्या प्रागतिक दिवाणाकडेच असतें.  १९१८ सालीं आपल्या भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची मुंबईस एक खास अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती.  तिचें अध्यक्षीय भाषण करतांना महाराज म्हणाले.  ''मला या कामीं अनेक अडचणींशीं झगडावें लागलें.  कितीही मोठ्या पगाराचें आमिष दाखविलें तरी कित्येक वर्षे हिंदु शिक्षकच मिळेनात.  मुसलमानांकडून व नंतर आर्यसमाजिस्टांकडून हें काम करवून घ्यावें लागलें.''  ह्या कठिण कार्याबद्दल १९२१ सालीं 'परोपकारी सभा' या नांवाच्या सभेनें महाराजांना 'पतितपावन' अशी पदवी दिली.  त्या वेळीं महाराज म्हणाले, ''या पदवीला मी पात्र आहें असें मला तरी वाटत नाहीं.  राज्याच्या काळजीमुळें व परिस्थितीमुळें ह्या कामीं मा जितकें करावयाचें होतें तितकें घडलें नाहीं.  माझे अधिकारी मला जें सांगतात त्यावरच मला निमूटपणें अवलंबून राहावें लागतें आणि ते जें करतात त्यावरच तृप्‍त राहावें लागतें.  मानवी प्रयत्‍नाला मर्यादा असतात.  विशेषतः हिंदुस्थानांतील राजेलोकांना ते सर्वाधिकारी असूनही ह्या मर्यादा अधिकच भोंवतात.''

१८९१-९२ सालीं बडोदा, अमरेली, पाटणा आणि नवसारी येथें प्रत्येक ठिकाणीं अस्पृश्य मुलांसाठीं व मुलींसाठीं स्वतंत्र वसतिगृहें काढून त्यांच्या जेवण्याची व राहण्याची सोय केली गेली.  कपडेलत्ते, पाट्यापेन्सिली वगैरेही पुरविलीं.  ह्यानंतर कित्येक वर्षे ह्या प्रयोगाला दुष्काळ व प्लेग हीं विघ्नें आलीं.  मुलांना शाळेंत पाठविण्याला या कंगाल लोकांना त्राण उरेना.  हिंदु अधिकार्‍यांच्या सहानुभूतीच्या अभावाचीही त्यांत भर पडली.  शेवटीं ह्यांतील कांहीं वसतिगृहें बंद ठेवावीं लागलीं.  तरी देखील महाराजांनीं खर्चांत बचत न करतां बडोदें भागांत रु. ४० च्या व इतर भागांत रु. २५ च्या शिष्यवृत्त्या ठेवल्या व कसेंही करून १९०० सालापासून पुढें कांहीं वर्षे शाळांतून विद्यार्थ्यांची संख्या १०० पासून १५०० पर्यंत राहील असें केलें.  एकंदरींत ह्या थोर पुरुषाच्या अंतःकरणांत ह्या हतभागी लोकांचा ध्यास सतत लागला होता, हें माझ्या ध्यानांत येऊन चुकलें.  इतकेंच नव्हे तर ह्या महत्त्वाच्या विषयासंबंधीं माझ्या स्वतःच्या विचारांना नवीन प्रोत्साहन मिळून ब्राह्मसमाजाच्या अखिल भारतांतील माझ्या प्रचारकार्याबरोबर ह्या लोकांची निरनिराळ्या प्रांतांतील स्थिति स्वतः डोळ्यांनीं नीट निरखून अजमाविण्याची मला प्रेरणा झाली.  १९०४ सालीं मुंबई येथें राष्ट्रीय परिषदेच्या अधिवेशनाबरोबर सामाजिक परिषदेचें अधिवेशन झालें.  त्या वेळीं एकेश्वरी परिषद भरून राममोहन आश्रमांत श्रीमंत महाराजांनीं प्रीतिभोजनांत भाग घेऊन आमच्याशीं सहकार्य केलें.  या परिषदेचा महाराष्ट्रावर व विशेषतः पुण्यांतील कार्यकारी पुढार्‍यांवर जसा शुभ परिणाम झाला तसाच महाराजांच्या उत्साहशक्तीवरही झालेला दिसतो.  लगेच दोनतीन वर्षांत पुणें-मुंबई येथें सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी, सोशल सर्व्हिस लीग, सेवासदन, डि. क्ला. मिशनसारख्या अखिल हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनावर परिणाम करणार्‍या संस्थांचा उद्‍भव झाला.  उलटपक्षीं याच सुमारास श्रीमंत महाराजांनींही आपल्या राज्यांत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा पास करून राष्ट्रीय शिक्षणाचा धडा इतर लहान-मोठ्या संस्थानांसच नव्हे तर प्रत्यक्ष इंग्रज सरकारासही घालून दिला.  बडोद्याच्या इतिहासांत हें साल सोन्याच्या अक्षरांत लिहिलें जाईल.  बडोद्यांत सक्तीच्या शिक्षणाचें प्रस्थान मांडल्यावर उसळीसरशी अंत्यज शाळांची संख्या १८ ची २४७ आणि विद्यार्थ्यांची संख्या ५००० ची ९२६९ झाली.  बंद केलेल्या वसतिगृहांची पुन्हां गरज भासूं लागली.  लौकरच अंत्यजांच्या सुदैवानें आर्यसमाजी पं. आत्माराम ह्या तरबेज आणि स्वतःस वाहून घेतलेल्या कार्यवाहकाची जोड मिळाली.  १९०७-८ च्या सुमारास हल्लींचें नांवाजलेलें बडोद्याचें अंत्यज विद्यार्थी वसतिगृह उघडण्यांत आलें.  पंडितजींना त्याचें सुपरिंटेंडेंट व बडोदें राज्यांतील अंत्यजांच्या शिक्षणाचे इन्स्पेक्टर नेमण्यांत आलें.  ह्याच सुमारास महाराजांनीं मला बडोद्यास पुन्हां बोलाविलें.  न्यायमंदिराच्या भव्य दिवाणखान्यांत एक जंगी दरबारवजा जाहीर सभा बोलावून महाराजांनीं स्वतःच्या अध्यक्षतेखालीं माझें 'अस्पृश्योद्धार' ह्या विषयावर व्याख्यान करविलें.  हेंच व्याख्यान मला पुढें लिहून काढावयास सांगून 'बहिष्कृत भारत' या नांवानें तें प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या १०० प्रती बडोदें दरबारनें विकत घेतल्या.  ह्या सर्व गोष्टींचा परिणाम बडोद्याच्या कार्यावर होऊन पंडित आत्मारामांच्या देखरेखीखालीं त्याला मोठा जोर आला.

डॉ. आंबेडकर ह्या अस्पृश्यवर्गाच्या प्रसिद्ध पुढार्‍याला महाराजांचा मोठा आश्रय होता.  बडोदा कॉलेजांतून ते बी.ए.झाल्यावर महाराजांनीं त्यांना अमेरिकेंत दरबारच्या खर्चानें कित्येक वर्षे ठेवून पीएच.डी. करवून आणलें.  बडोदें शहरांतील चार वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊनच न थांबतां त्यांच्या धार्मिक शिक्षणाचीही उत्तम सोय करण्यांत आली आहे.  गुजराथेंतील अंत्यजवर्ग आपापलीं धार्मिक गृहकृत्यें आपल्याच जातीच्या पुरोहिताकडून करवून घेत असतात.  त्यांना गरोडा म्हणतात.  या गरोड्यांकडून धर्मकृत्यें योग्य रीतीनें व्हावींत म्हणून त्यांच्यासाठीं एक संस्कृत शाळा काढण्यांत आली आणि त्यांत २५ गरोडा विद्यार्थ्यांना दरमहा ८ रु. स्कॉलरशिप देऊन तयार करण्यांत आले.  वसतिगृहांतील सर्व विद्यार्थ्यांना वेदमंत्रांसह नित्याची उपासना करण्यास शिकविण्यांत येतें.  शिवाय त्यांचीं दोन बालवीरपथकें आहेत.

खालील कोष्टकावरून बडोद्यांतील अंत्यज शाळांची कशी प्रगति झालीं हें दिसून येईल.
तक्ता

(तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढें दुमदुमत राहिलेल्या मंदिरप्रवेशाच्या दंगलींतही ह्या पतितपावन महाराजांनीं आघाडी मारून सरशी मिळविली आहे.  मंदिरप्रवेशाची चळवळ सुरू होण्यापूर्वीच महाराजांनीं आपलें खंडेराव-मंदिर अस्पृश्यांस खुलें केलें आणि ही चळवळ सुरू झाल्यावर १९३२ च्या ऑक्टोबर महिन्यांत सर्व हिंदुधर्मीयांस जातगोत मनांत न आणतां सरकारी देवळांत प्रवेश करुं द्यावा व तसें करण्यास खाजगी देवळांच्या मालकांचीं मनें वळवावीं अशा आशयाचा महाराजांनीं युरोपांतील लोझानहून तारेनें हुकूम पाठविला.  संकटें हीं कार्यसिद्धीचीं मापेंच होत, अशी खूणगांठ मनांत बांधून समाजधुरीणांनीं सतत वागलें पाहिजे.  महाराजांनीं असें केलें म्हणूनच त्यांना अपूर्व यश लाभलें.

थिऑसोफिकल सोसायटी  :  थिऑसोफिकल सोसायटीचे अध्यक्ष कर्नल ऑल्कॉट ह्यांनीं अस्पृश्यतानिवारणाचा उत्तम उपाय म्हणून मद्रास शहरीं आपली पहिली शाळा १८९४ सालीं एका झोपडींत काढली.  दुसरी १८९८ मध्यें व तिसरी १८९९ मध्यें उघडली.  १९०१ च्या रिपोर्टांत सर्व शाळांमिळून त्या सालच्या २० डिसेंबर रोजीं ३८४ मुलगे, १५० मुली आणि १६ शिक्षक होते.  चवथ्या इयत्तेपर्यंत तालीम, हिशेब व व्यावहारिक इंग्रजी हे विषय शिकविण्यांत येत.  त्यांच्या धर्मांत मुळींच हात घालण्यांत येत नसे.  १९०३ सालीं मीं स्वतः मद्रास शहरीं सोसायटीच्या ४ शाळा पाहिल्या.  येथें किंडरगार्टन पद्धतीचें नमुनेदार शिक्षण मीं पाहिलें.  एक तज्ज्ञ स्विस् बाई देखरेखीचें काम फारच कळकळीनें व खुषीनें करीत होती.

के. रंगराव  :  मद्रास इलाख्यांत विशेषतः पश्चिम किनार्‍यावर मलबारांत अस्पृश्यांचे हाल कल्पनातील होत आहेत.  वरिष्ठ जातींच्या व्यक्तीपासून ६०-७० फुटांच्या अंतरावर येण्यास अस्पृश्यांना अद्यापि मनाई आहे; म्हणून ह्या प्रांतीं सर्वांच्या मागून ह्या कामास सुरुवात झाली.  मंगळूर ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी रा. सा. के. रंगराव यांनीं मंगळूर येथें आपली पहिली शाळा १८९७ सालीं काढली.  त्यापूर्वी लोकमत तयार करण्यासाठीं 'पंचम लोकांचीं गार्‍हाणीं' (Wrongs of the Panchamas)  ही लहानशी चोपडी त्यांनीं इंग्रजींत प्रसिद्ध केली.  तींत त्यांनीं ह्या लोकांचीं हृदयद्रावक दुःखें वर्णिलीं आहेत.  ह्या कामीं रंगरावांना आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांकडून अनन्वित छळ सोसावा लागला.  रंगराव हे स्वतः सारस्वत जातीचे असून त्यांच्या कुटुंबाला कुटाळ लोक 'पंचमती' असें उल्लेखीत.  ह्या छळाला न जुमानतां १० वर्षांत त्यांनीं बरीच प्रगति केली.  सरकारच्या मदतीनें त्यांना त्या अवधींत ह्या संस्थेसाठीं विस्तीर्ण जागा, इमारत, उद्योगशाळा आणि वसाहतीसाठीं सुमारे २० एकर शेतकीची जागा इतकी सामुग्री संपादन करतां आली.  १९०७ च्या सुमारास मी मंगळुरास ब्राह्मसमाजाच्या कामासाठीं गेलों तेव्हां मी ही संस्था आमच्या भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींत शाखा म्हणून संलग्न करून घेतली.  तेव्हांपासून पुढें हिची बरीच भरभराट आणि प्रसिद्धि झाली.

ब्रिटिश सरकार आणि ख्रिस्ती मिशनें  :  यांनीं अस्पृश्यांची स्थिति सुधारण्यासाठीं जे कांहीं प्रयत्‍न केले ते प्रसिद्धच आहेत.  यांच्या मार्गांत अडथळा काय तो नोकरशाहीची नबाबरी पद्धति आणि मिशनर्‍यांचें धर्मांतराचें वेड एवढाच होता.  बाकी साधनें भरपूर होतीं.  हे अडथळे नसते, तर त्यांच्या हातून हा अस्पृश्यतेचा प्रश्न लवकर सुटला असता.  मद्रासकडील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या - विशेषतः रोमन कॅथॉलिक पंथाच्या - पद्धतींत तर उघड उघड अक्षम्य दोष मला दिसले ते हे कीं जातिभेदाचें निर्मूलन करण्याचें त्यांचे धर्मांत सांगितलें असूनही केवळ आपली संस्था वाढवावी ह्या कावेबाज हेतूनें अस्पृश्य लोकांना ख्रिश्चन धर्मांत घेऊन पुन्हां त्यांना अतिनीच अवस्थेंतच ठेवण्यांत आलें आहे.  त्यामुळें त्यांना हिंदुधर्मास पारखे होऊन शिवाय जातिभेदाचे व अस्पृश्यतेचे असह्य जुलूम सोसावे लागतात.  ब्राह्मण-ख्रिस्ती लोकांशीं त्यांना मिसळून वागतां येत नाहीं.  उपासनेसाठीं ख्रिस्ती देवळांत जाण्यास त्यांना मज्जाव आहे.  मेरी माता, ख्रिस्त इत्यादि मूताअची पूजा अस्पृश्यवाड्यांत सर्रास चालू आहे.  त्यांचे पुरावे मीं स्वतः दक्षिण देशीं त्रिचनापल्ली वगैरे ठिकाणीं हिंडत असतांना पाहिले.  ख्रिस्ती लोकांत हल्लीं जी राष्ट्रीय चळवळ चालू आहे, ती कायम राहिली आणि हिंदुमहासभेसारखी चळवळ शब्दांपलीकडे जाऊन कृतींत उरली, तर लवकरच हे ख्रिस्ती अस्पृश्य पुन्हां धर्मांतर करून हिंदुधर्मांत येतील असें वाटतें.  

इंग्रज सरकारनें सक्तीचें शिक्षण देऊन शिकलेल्यांना मोठमोठ्या जागा देऊन ह्या लोकांना वर आणण्यांत आजवर जी अक्षम्य ढिलाई केली आहे, ती केली नसती तर अस्पृश्यतेला ताबडतोब ओहोटी लागली असती.  तथापि अशा बाबतींत परकीय नोकरशाही आणि परधर्मी कावेबाजी यांना पोकळ नांवें ठेवण्यापेक्षां सर्व दोष स्वकीयांनींच पत्करावा हें योग्य आहे.

आर्यसमाज, ब्राह्मसमाज, हिंदुसमाज ह्यांतील कित्येक उदार गृहस्थांनीं अस्पृश्यतानिवारणाच्या लहानमोठ्या बर्‍याच संस्था काढून ह्या कामीं पुष्कळ स्तुत्य प्रयत्‍न केले.  म्हैसूर, निजाम, हैद्राबाद, इंदोर वगैरे मोठमोठ्या संस्थानांनीं आपल्या विद्याखात्यामार्फत अस्पृश्यवर्गाची शिक्षणविषयक तरतूद पुष्कळ केली.  पण हे सर्व प्रयत्‍न भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे कामाचा बोलबाला झाल्यानंतर जी सहानुभूतीची व जागृतीची लाट देशावर पसरली तिच्यामुळें झाले.

येथवर अस्पृश्यासाठीं स्पृश्यांनीं ज्या चळवळी केल्या त्यांचाच उल्लेख आला आहे.  पण त्या बाबतींत स्वतः अस्पृश्यांनींसुद्धा आत्मोद्धाराची चळवळ केली आहे.  पूर्वी ब्रिटिश सरकारच्या सैन्यांत अस्पृश्य लोकांची भरती होत असे.  ती पुढें बंद झाली.  सुमारें १८९०-९१ पासून महार-चांभारादि अस्पृश्यांची नवीन भरती बंद झाली.  नंतर पूर्वीच्यांनाही रजा मिळूं लागली.  ह्याविषयीं दाद लावून घेण्याचे पहिले प्रयत्‍न महाड तालुक्यांतील रानडुल गांवचे पेन्शनर हवालदार गोपाळनाक विठ्ठलनाक वलंगकर नांवाच्या वृद्ध गृहस्थानें मोठ्या चिकाटीनें केले.  महात्मा जोतिबा फुले, बाबा पदमजी यासारख्यांची ह्यांना शिकवण व मदत होती.  सन १८९५ सालीं पुण्यास भरलेल्या काँग्रेसच्या वेळीं ह्यांनीं चळवळ केली होती.  दापोली येथील अस्पृश्य वर्गांतील महार-चांभार लष्करी पेन्शनरवाल्यांच्या वसाहतींत सदर बाबानें बरीच वळवळ केली.  पण चळवळ नवीन असल्यामुळें यश आलें नाहीं.  त्यांनीं हिंदुस्थान सरकाराकडे अर्ज केला असतां पेन्शनर लोकांना त्या वेळीं नुसत्या सह्या करण्याचेंही त्यावेळीं धैर्य झालें नाहीं.  पुढें हीच चळवळ पुण्याचे श्री. शिवराम जानबा कांबळे यांनीं १९०३ सालापासून मोठ्या नेटानें १९१० पर्यंत चालवली.  ती अद्याप चालूच आहे.