1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

निराश्रित साह्यकारी मंडळी

दुसरा संगिया साह्यकारी ह्याची वाट मागे फिरून न पाहता अस्पृश्य वर्गाच्या उद्धारार्थ काम आज जवळजवळ १३ वर्षे येथील ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी रा. के. रंगराव हे निश्चयाने करीत आहेत. हल्ली तर त्यांनी आपला २५-३० वर्षांचा वकिलीचा धंदा गेल्या ऑगस्टात आवरून संपूर्णपणे अंत्यजांचीच सेवा स्वीकारली आहे. ते आपल्या कुटुंबासह आता ब्राह्ममंदिरासमोरील प्रचाराश्रमात येऊन राहिले आहेत व नावाशिवाय अनभिषिक्त प्रचारकच बनले आहेत. स्वीकारलेल्या कामात वेळोवेळी त्यांची मित्रमंडळी त्यांचे दोष काढीत आहेत, त्यांना सरसकट एकच उत्तर म्हणून आपल्या टेबलाजवळील “Fault finders will find fault even in Paradise” हे वाक्य भव्य अक्षरांनी एका तांबड्या फळीवर कोरून ठेविलेले आहे. त्यांच्या शाळेतील हजेरीपटावर ७३ पारियांच्या मुलांची नावे आहेत. रोजची सरासरी सुमारे ६० आहे. एक मुलगा शिकून शिक्षक बनला आहे. मुले २—३ मैलांवरून शिकावयास येतात, म्हणून त्यांस दोनप्रहरचे एक जेवण शाळेत द्यावे लागते. ६ हातमागांपैकी ३ चांगले चालले आहेत. पण कापडाला मागणी चांगली नाही. कारण गिरणीतील हलक्या स्वस्त दराच्या व वरून सारखेच दिसणा-या नगापुढे हातमागाच्या भरीव पण महाग कापडाचा टिकाव लागत नाही, पण एरंडी रेशमाच्या किड्यांची लागवड करण्यात रा. रंगरावांनी बरेच श्रेय व प्रसिद्धी संपादन केली आहे. कोईमतूर येथील शेतकीच्या कॉलेजातून ह्या किड्यांसाठी त्यांच्याकडे पुष्कळ मागणी येत आहे. हे रेशीम तयार करण्याचे कामी उच्च शिक्षण मिळविण्याकरिता मि. मेलोथ नावाच्या एका अनुभवी गृहस्थास रा. रंगरावांनी मिशनच्या मार्फतीने बंगाल्यातील पुसा येथील कॉलेजात पाठविले आहे. मंगळूरच्या कलेक्टरसाहेबांनी ह्या कामगिरीचे महत्त्व जाणून सरकारातून ५०० रु. देणगी देवविली आहे. रा. मेलोथ हे लवकरच परत येतील व पश्चिम किना-यावर जागजागी मिशनची ठाणी उघडण्यात आपल्यास मदत करतील अशी रा. रंगरावांना मोठी उमेद आहे. रा. रंगरावांचे सर्वांत नावाजण्यासारखे व मदतीस अवश्य पात्र असे काम म्हणजे मंगळूरहून एका मैलावरील एका सुपीक टेकडीवर त्यांनी घातलेली पारियांची वसाहत होय. तेथे हल्ली १७ कुटुंबांची कशी तरी सोय झाली आहे, पैकी चौघांस मात्र पक्क्या इमारती मिळाल्या आहेत. बाकी तात्पुरत्या झोपड्या आहेत. सरकारने इमारती लाकूड फुकट दिले असल्याने व मजुरी ज्याची त्यानेच पुरवावयाची असल्याने ३६ रुपयांत एका कुटुंबासाठी एक पक्के घर मिळेल अशी रंगरावांनी सोय केली आहे. ५० रुपये दिल्यास दोन कुटुंबांची कायमची सोय होईल असे घर तयार होते. एकंदर साठ कुळे राहतील एवढी जागा आहे. इकडे श्रीमंत उदार गृहस्थांचे लक्ष जाईल काय ? एक मोटरगाडी म्हणजे २०० पारियांच्या झोपड्या हे रंगरावांचे कोष्टक मुंबईचा एकादा भाटिया शिकेल तर गरिबांचे कोटकल्याण होणार आहे ! ह्या वसाहतीत दोन विहिरी काढल्या आहेत, दोन्हीसही गोडे पाणी लागले आहे. पैकी एकीचा खर्च ५०० रु. अंदमान बेटातील कैद्यांकडून मि. सदाशिव पिले नावाच्या एका सद्गृहस्थाने जमवून दिला आहे, म्हणून तिचे नाव अंदमान विहीर असे पडले आहे. एकूण अंदमानातील कैद्यांना हिंदुस्थानातील पारियांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे काय?

निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन

मंडळीचे धोरण व जबाबदारी
ह्याविषयी मंडळीनी वेळोवेळी शांतपणाने व स्पष्टपणाने खुलासा करावा तितका थोडाच आहे. कारण ह्या बाबतीत नव्या व जुन्या लोकांमध्ये, योग्यायोग्य कारणांवरून मंडळीच्या कामासंबंधी गैरसमज उत्पन्न होऊन इतर अनेक अपरिहार्य अडचणींमध्ये ह्या परिहार्य अडचणींची भर पडते. हजारो वर्षे अज्ञानाचे काळोखात पडलेल्या ह्या कोट्यवधी हीन जातींमध्ये आज एकदम आधुनिक शिक्षणपद्धतीच्या उजेडाचा लोट सोडल्यामुळे त्यांचा मोठा समाज विचकून अस्वस्थ होईल व कदाचित स्थापित राजसत्तेस अपाय पोहोचेल असा पहिला आक्षेप निघण्याचा संभव आहे, पण ह्या गरीब जातीच्या सुदैवाने व सरकारच्या शहाणपणाने सरकारचे सहानुभूतिपूर्वक लक्ष ह्या प्रश्नाकडे ही मंडळी निघण्यापूर्वीच कित्येक वर्षे लागले असल्यामुळे वरील वेडगळ आक्षेप बहुतेक मुळीच घेण्यात आला नाही असे म्हणण्यास हरकत नाही, उलट इलाख्याच्या अधिपतीपासून तो जिल्ह्याचे अधिपतीपर्यंत सरकारी अधिका-यांनी वेळोवेळी ह्या कार्यास प्रोत्साहन दिले आहे. हेही मंडळी जाणून आहे व तदनुरूप तिचे वर्तन आहे.

दुसरा महत्त्वाचा पण वरच्या इतकाच भ्रममूलक आक्षेप असा निघण्याचा संभव आहे की, आजपर्यंत निर्जीव अवस्थेत पडलेल्या ह्या प्रचंड समूहापूढे आज एकदम आधुनिक शिक्षण पद्धतीच्या द्वारा समता, स्वतंत्रता, बंधुता इत्यादी विक्षोभक तत्त्वांचे आदर्श ठेविल्यामुळे हा समूह जागृत होऊन वरील वर्गाचा द्वेष करू लागेल व सामाजिक युद्ध जुंपेल, ह्या आक्षेपात कादंबरी किती आहे व सत्य किती आहे हेही मंडळी पूर्ण जाणून आपले काम निमूटपणाने पण नेटाने करीत आहे, इतकेच नव्हे तर मंडळीच्या बाहेरील उतावळ्या वक्त्यांकडून विशेषतः (बेळगाव येथील म्युनिसिपल हॉलमध्ये ता. २५ मे १९१२ रोजी मेहरबान आर. सी. ब्राऊनसाहेब, बेळगावचे कलेक्टर ह्यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या भाषणाचा थोडक्यात सारांश.)

अस्पृश्य आणि मागासलेल्या वर्गातील वक्त्याकडून जेव्हा जेव्हा ह्या बाबतीत हयगय होते तेव्हा तेव्हा मंडळीकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

तिसरा एक चमत्कारिक आक्षेप धर्माच्या नावाने वस्तुतः धर्मपंथाच्या वतीने दोन परस्परविरुद्ध बाजूने घेण्यात येतो. तो असा :- ह्या मंडळीचे कार्य सुरू झाल्यापासून ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचे कामी मोठा अडथळा आला आहे असे काही आमचे ख्रिस्ती मिशनरी बंधू ओरडू लागले आहेत. उलट बाजूने काही जुन्या हिंदुधर्माभिमानी मित्रांकडून असा आक्षेप ऐकण्यात येतो की आमच्या धार्मिक प्रयत्नामुळे ह्या वर्गातील धार्मिक आचारविचारांत ढवळाढवळ होऊन हे हिंदुत्वाला मुकतील. हे दोन्ही आक्षेप परस्परविघातक आहेत हे एक आमचे सुदैव आहे, इतकेच नव्हे, तर त्या त्या बाजूनेच ह्या काल्पनिक आक्षेपांचे क्रियात्मक निरसन होईल, अशी सहानुभूती व मदतही आम्हांला मिळत आहे. उदाहरणार्थ नुकतीच एका प्रसिद्ध अमेरिकन ख्रिस्ती मिशनरीने न मागताच आम्हांला स्वतःच्या खिशातून पैशाची मदत पाठविली आहे. उलटपक्षी ह्या वर्गातील धार्मिक आचारविचार उज्ज्वल आणि उन्नत हिंदुधर्मास शोभण्यासारखे नाहीत हे जाणून कित्येक वयोवृद्ध आणि ख-या हिंदुधर्माच्या अभिमान्यांनी मंडळीच्या निरनिराळ्या ठिकाणी तुकाराम, रामदास, इत्यादिकांच्या उपदेशांच्या द्वारे धर्म आणि नीतिशिक्षणाचे काम चालविले आहे.

उद्योगधंद्याच्या बाजूने, व्यावहारिक शक्यतेच्या दृष्टीने आणि इतर अनेक त-हेने मंडळीच्या कार्यासंबंधी वेळोवेळी लहानमोठ्या असंख्य शंका व हरकती घेण्यात येतात, आणि विशेषेकरून ह्या मंडळीचे प्रयत्न लोकाश्रयावरच केवळ अवलंबून असल्यामुळे मदत मागावयास गेले असता पावलोपावली अशा हरकतीतून अडखळत मंडळीला मार्ग क्रमावा लागत आहे. म्हणून शेवटी वरील सर्व आक्षेपकांना एवढीच विनंती आहे की, मंडळीच्या कार्यास प्रत्यक्ष थोडासा हातभार लावून पहावा, म्हणजे आपल्या आक्षेपांस कसा अवकाश मिळत नाही हे तेव्हाच दिसून येईल.

कर्नाटक शाखा
मंडळीच्या कार्याची आवश्यकता सर्व हिंदुस्थान देशभर आहे. विशेषेकरून जसजसे खाली दक्षिणेत उतरावे, तसतसे तर अशा प्रयत्नांची अत्यंत जरुरी भासते. मंडळीचे ठिकाण मुंबईस आहे व तिच्या शाखा मुंबई इलाखाभर असून बाहेर मध्यप्रांत आणि मद्रास इलाख्यातही त्या आहेत. तरी बाहेरील ह्या ब-याच ठिकाणी ह्याच कामाकडे वाहिलेला निदान एकतरी प्रतिनिधी असलेल्या अशा सुव्यवस्थित आणि नियमबद्ध शाखा नसून नुसत्या फावलेल्या वेळी काम करणा-या किंवा मदत पाठविणा-या सद्गृहस्थांच्या स्थानिक कमिट्या आहेत. निरनिराळ्या भाषा चालू असलेल्या निरनिराळ्या प्रांती एक मुख्य शाखा आणि मग तिच्या उपशाखा निघाल्याशिवाय मंडळीच्या कामास म्हणण्यासारखा जोर येणार नाही. अशा शाखा निदान कर्नाटक आणि गुजराथ ह्या प्रांती एक दोन वर्षांतच उघडण्याचा मंडळीचा निश्चय आहे, त्यांपैकी कर्नाटक शाखा उघडण्याची पूर्वतयारी करण्याकरिता मंडळीचे प्रतिनिधी हल्ली ह्या प्रांती फिरत आहेत. ह्या शाखेच्या दोन वर्षांचा खर्चाचा अंदाज सुमारे २।। हजार रुपयांचा असून सुमारे १। हजार कर्नाटकात ह्या फिरतीवर जमवावयाचा आहे. त्यांपैकी ५०० रु. मिळवून देण्याचे येथील मंडळीनी मनावर घेतले आहे. येथील चिकित्सक पत्राने आमच्या कामासंबंधाने सहानुभूतीपर लेख लिहिला, व त्यामुळे आमच्या कामास येथे इतकी रक्कम जमा झाली. एकदर्थ आम्ही चिकित्सकाचे आभार मानतो. तसेच ह्या बाबतीत येथील अत्यंत उत्साही वकील रा. रंगराव नाईक ह्यांच्या निःस्वार्थ खटपटीबद्दल व्याख्यात्यांनी फार आभार मानिले व अशीच मदत इतर शहरी मिळून शाखा एक दोन महिन्यांतच स्थापिली जाऊन त्यांचेबरोबर असलेले त्यांचे सहकारी मि. सय्यद अबदुल कादिर ह्यांच्या हवाली ती करण्यात येईल अशी उमेद त्यांनी प्रदर्शित केली.

बोर्डिंगची जरुरी

सरकार, लोकल बोर्ड आणि म्युनिसिपालिट्या ह्यांच्या आश्रयाखाली ह्या लोकांसाठी पुरेशा वस्तीच्या ठिकाणी शाळा आता बहुतेक इलाखाभर पसरल्या आहेत, पण त्यांपैकी पुष्कळ चालाव्या तशा चांगल्या चालल्या नाहीत. ह्याचे मुख्य कारण योग्य शिक्षकांची उणीव हेच होय. ही उणीव भरून काढण्याकडे मंडळीचे लक्ष लागावे असे मोठ्या अधिकारी लोकांनी बोलून दाखविले आहे व ह्या मंडळीलाही तसेच वाटत आहे. शिवाय कशातरी शाळा काढून पाच तास एकत्र बसविल्याने कार्यभाग न होता चालू शाळांतून हुषार व होतकरू मुले निवडून त्यांचा पुढील अभ्यासक्रम मंडळीच्या अधिका-यांनी खुद्द आपल्या नजरेखाली त्या मुलांना रात्रंदिवस आणि बारा महिने ठेवून घेऊन करवावा, म्हणजे त्यांचे शिक्षण चांगले होईल, इतकेच नव्हे, तर त्यांची चाल, रीत, भाषा आणि सर्व संवयी सुधारतील, ह्याच उपायांनी त्यांच्यात चांगले शिक्षक निपजतील व थोडक्याच काळात ते आपल्या जातीची आपणच सुधारणा करू पाहतील, म्हणून अशा प्रत्येक प्रांतातील मुख्य शाखांचे बोर्डिंग अथवा विद्यार्थी वसतिगृह हे मुख्य व जरुरीचे अंग आहे.

निराश्रित साहाय्य

‘तीन वर्षांपूर्वी ज्यांचा स्पर्श झाल्यास ‘अब्रह्मण्यम्’ असे सर्वत्र वाटत होते, त्याच समाजास यक्षिणीची कांडी फिरल्याप्रमाणे एकदम निराळे स्वरूप यावे’. असे उद्गार प्रो. कर्वे ह्यांनी परवा ता. १८ ऑक्टोबर रोजी पुणे येथील किर्लोस्कर थिएटरमध्ये भरलेल्या निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या जाहीर सभेत काढले.

नंतर ह्या सभेची हकीकत शिंद्यांनी सांगितली. ‘निकृष्ठांना वर आणण्याच्या कामी आम्ही स्वतःलाच वर आणीत आहो. वरील मंडळीची स्थापना इलाख्याच्या मुख्य शहरी होण्याच्यावेळी तिच्या अध्यक्षांनी प्रांजलपणे म्हटले होते.

पुणे शाखेचे उपाध्यक्ष प्रिं. परांजपे ह्यांनी आपल्या भाषणात ‘महार मांगाच्या उन्नतीचा प्रश्न म्हणजे हा आपल्या सुधारणेचा प्रश्न आहे’. असे जे म्हटले ते वरील वाक्याचाच अनुवाद योग्यवेळी केला म्हणावयाचा.

पुढील तीन वर्षांत ही चळवळ तालुक्याच्या गावी जाणार असेल आणि एकंदर दहा वर्षांच्या आत जर ही खेडोखेडी पसरणार असेल तर प्रत्यक्ष काम करणारांमध्ये वरील सात्विक वृत्ती आतापर्यंत जशी कायम आहे तशी पुढेही कायम राहूनच ह्या चळवळीचा विस्तार होईल व हिचा विजय होईल.

मंडळीला पैशाची गरज नाही, माणसांची आहे. कारण, माणूस पैसा मिळवितो, पैसा माणसाला मिळवीत नाही, उलट केव्हा केव्हा पैशाच्या उपाधीमुळे माणसाचा माणूसपणा जातो. खेड्यापाड्यांतून काम व्हावयाचे असेल तोपर्यंत कामाला खरी सुरुवातही झाली म्हणता येणार नाही—तर माणसे पाहिजेत. काम करावयास पुढे यावे तर ते : (१) पोट भरायला येऊ नये, (२) अधिकार गाजवायला येऊ नये, (३) धडा शिकवायला येऊ नये, (४) मेहेरबानी करायला येऊ नये, तर केवळ प्रेरणेने व श्रद्धेने आपले कर्तव्य दिसत असेल तर बजावयास यावे. म्हणजे वरील सारी फळे आपोआप मिळतील. (फुट नोट - मासिक मनोरंजन, मुंबई, दिवाळी अंक सन १९०९, पृ. ६०.)

शिक्षण आधी का सांपत्तिक सुधारणा आधी ? सामाजिक सुधारणा करावी का धार्मिक सुधारणा करावी हा वाद नको आहे ! जळत्या घराचा वासा जसा ओढावा तसे ज्याने त्याने आपल्या हातास येईल ते काम करावे, तरच कळकळ खरी.

मंडळीच्या चार उपदेशांपैकी धर्मोपदेश हा एक उद्देश आहे. कदाचित पुढे मागे त्या मुद्यावर आमच्या ह्या वादप्रिय देशात वाद उपस्थित होण्याचा संभव आहे. ह्यावर तूर्त एवढेच सांगणे आहे की, ‘धर्म’ पदाचे दोन अर्थ आहेत. एक सात्विकपणा व सत्त्वाचा प्रवर्तक जो ईश्वर त्याकडे प्रवृत्ती; आणि दुसरा—पंथाचा अभिमान. मंडळी जो उपदेश करते तो पहिल्या अर्थाने. ज्या दिवशी पहिल्या अर्थाचा लोप होऊन दुसरा माजेल त्या दिवशी तेवढ्या उद्देशापुरते तरी मंडळीचे काम दुष्कर होऊ लागेल आणि ह्यासंबंधी दहशत मंडळीलाच वाटावयास पाहिजे व तशी ती वाटते, इतरास काळजी नको.

नाममंत्राचे सामर्थ्य

नाममंत्र आहे सोपा । अविश्राम चाळी पापा ।।
जो का निश्चय धरील । नाम तया उद्धरील ।।
नर नारी कोणी याती । नाम ठेवे एके पंक्ती ।।
तुका म्हणे या नामाने । कृपा केली भगवंताने ।।

आता ज्या साधूचा अभंग गाईला त्या तुकाराम महाराजांच्या चरित्राची कालच (ता. १६ रोजी) आपण ओळख करून घेतली. ते कसे वाढले, संसारात असताना त्यांनी कसे दिवस काढले, ईश्वराच्या सेवेत ते कसे राहिले, लोकांस त्यांनी सन्मार्ग कसा दाखविला, संकटास त्यांनी कशी पाठ दिली, शत्रूंशीही ते कसे वागले वगैरे अनेक महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान आपण करून घेतले आहे. असे जे साधूंत श्रेष्ठ साधू तुकाराम महाराज त्यांनी सर्वकाल भजनात, देवाच्या सेवेत घालविला हे खरे. पण, त्यांनी आमच्यासाठी मागे काही निरोप ठेविला आहे काय, काही आनंदाची बातमी, काही विश्रामाचे स्थान, संसारात असताना काही समाधानाची जागा असे काही ठेविले आहे, किंवा काही शुभ वर्तमान गाजविले आहे काय, असे वारंवार मनात येते. त्यास ह्या अभंगात संपूर्ण उत्तर मिळणार आहे. होय. तुकाराम महाराजांनी आपल्या मागे मोठा निरोप ठेविला आहे, आनंदाची बातमी आम्हा सर्वांच्यासाठी ठेविली आहे. तथा थकलेल्या भागलेल्यास विश्रांतीचे स्थान ठेविले आहे. आम्ही मात्र आपली तयारी केली पाहिजे. आणि हा निरोप, ही बातमी, हे शुभवर्तमान सर्व काही, ह्या एका अभंगामध्ये भरून आहे. ह्या अभंगाच्या प्रत्येक ओळीमध्ये हे आनंदाचे वर्तमान ओतप्रोत भरलेले आहे. त्याचा स्वीकार करण्याची मात्र आमची तयारी पाहिजे. पहा ह्या अभंगाच्या द्वारे तुकोबा काय संदेश पोहोचवीत आहेत तो !

मनुष्यजन्माचा किती थोर अधिकार आहे ! मनुष्यजन्म प्राप्त होणे म्हणजेच आमची जणू काय पापापासून मुक्तता होणे आहे. परंतु असे असून ह्या (फुट नोट – रविवार ता. १७-३-१९११ रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या तिस-या जयंतीनिमित्त केलेल्या उपदेशाचा सारांश.) मुक्तीच्या, ह्या पापविमोचनाच्या गोष्टी सांगावयाच्या सोडून आम्ही अधिकाधिक पापात पडतो आणि रात्रंदिवस पापाच्याच गोष्टी सांगतो ! इतर प्राणी पुष्कळ आहेत, सर्प आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, दुसरे अनेक हिंस्र पशू आहेत, पक्षी आहेत, त्या सर्वांना आत्मे आहेत. पण त्यांना मन नाही. त्यांच्या ठिकाणी स्वतःच्या संबंधाने काही जागृती नाही. काही जाणीव नाही. यातना होत असल्या तरी कालच्या यातनांची आज आठवण नाही, उद्याविषयीची कल्पना नाही. आम्हांला मन मिळाले आहे, आम्हांला बुद्धी आहे. पापदग्ध करून टाकणारा हा अमोलिक मनुष्यजन्म सापडला आहे. आणि आम्ही त्याचे सार्थक करून घेत नाही. देवाच्या नामाचा हा सोपा मंत्र जणू काय सापडला असून त्याची आम्ही हेळसांड करतो, पापकर्माचा इतका ढीग करतो, परस्परांच्या हेव्यामध्ये इतके गुंततो, संशयाने आपली मने इतकी दूषित करून घेतो, मत्सराने इतके वेडावून जातो, ज्ञानी असून अज्ञानाचा इतका पसारा मांडतो, प्रेम-निष्काम प्रेम-करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये ठेविले असून सूड घेण्याच्या बेतामध्ये इतके गुंग होतो की त्यामुळे अगदी हिंस्र, अगदी क्रूर, अधिक कृतघ्न, अधिक दुष्ट होतो व आपल्या थोर अधिकारास मुकतो ! हे पाहून तुकोबा सांगताहेत असे भांबावू नका, असे सैरावैरा पळू नका. हा नाममंत्र अगदी सोपा आहे. दुसरे लोक जादू टोण्याचे मंत्र पुष्कळ सांगत असतात. परंतु त्या सर्वांहून हा मंत्र सोपा आहे, ह्याचे सामर्थ्य अपार आहे. तुम्ही कितीही अपार पापे केलीत, पापांचे ढीग रचिलेत तरी एका क्षणामध्ये त्यांची राख करून टाकणारा हा मंत्र आहे ! एके बाजूला तुमची अपार पापे आणि दुस-या बाजूला प्रेमाची मूर्ती पण परम सामर्थ्यवान परमेश्व असा हा संबंध आहे. त्यामुळे त्या देवापुढे तुमच्या पापांचा तो काय टिकाव लागणार आहे ? मात्र तुम्ही ह्या सोप्या नाममंत्राचा निश्चयाने आश्रय केला पाहिजे. हा धर्म नवीन आहे म्हणून बुझून जाऊ नका. कोणतीही संकटे आली, कसेही प्रसंग आले तरी देवाचे नाव सोडावयाचे नाही, देवाच्या सेवेला मुकावयाचे नाही त्याचा जो हा मार्ग त्याच्यापासून एक रतिभरही मागे सरावयाचे नाही अशा निर्धाराने, अशा दृढ निश्चयाने ह्या संसारात फिरा, कर्मे करा, वावरा, आनंदाने रहा, सेवेत रत रहा म्हणजे पहा तुमच्या हातून कितीही पापे झाली असली तरी एका क्षणामध्ये ती दग्ध होतील. मात्र तुमच्या ठिकाणी निश्चयाचे बळ असले पाहिजे.

असा ज्यांचा जागता निश्चय आहे, असे ज्यांचे बळ आहे, ते पुरुष आहेत की त्या स्त्रिया आहेत, ते उच्च जातीचे आहेत की ते खालच्या वर्गातील आहेत, ते भाग्यवान की भाग्यहीन आहेत, ते श्रीमंत आहेत की गरीब आहेत, ते अधिकारी आहेत की नाहीत, ह्याचा मग विचार नाही. हे देवाचे नाव सर्वांना एका पंक्तीला नेऊन बसविते. उच्चनीचपदाचे भेद आम्ही क्षुद्र मनुष्यांनी केलेले. धन द्रव्याचे भेद हे निरनिराळ्या कारणांचे, निरनिराळ्या परिस्थितीचे परिणाम होत. नाममंत्राच्या आवारात त्यांचा प्रवेश नाही. तेथे सर्वांची पंगत एक, सर्वांची जात एक, सर्वांचा धर्म एक, मात्र आमचा निर्धार पाहिजे. आमचा निश्चय जितका बलवान तितका ह्या मंत्राचा परिणाम अधिक सुस्पष्ट आमच्या अनुभवास येतो. ह्या निशचयाची, ह्या निर्धाराची, मनाच्या तयारीची आपणाला दोन उदाहरणे सांगतो. गौतमबुद्धांनी लोकांस नवीन वाटणा-या धर्माची स्थापना केली. लोकांना ज्या गोष्टी नवीन वाटत होत्या त्या त्यांनी मोठ्या निर्धाराने प्रचारात आणल्या. पुरातन मार्गाचा त्याग केला. तो मार्ग खरा नव्हे असे सांगत सांगत ते संचार करू लागले. त्यामुळे त्यांस ज्याप्रमाणे अनुयायी मिळाले त्याचप्रमाणे अनेक शत्रूंचीही जोड त्यांना लाभली ! त्यांच्या शुभवर्तमानाच्या योगे ज्यांची चित्तवृत्ती अगदी क्षुब्ध झाली होती, त्यांना हा नवा धर्म अधर्म आहे असे वाटत होते. असे एक गृहस्थ एकदा गौतमबुद्धांपाशी गेले आणि त्यांनी त्यांस मनसोक्त शिव्या देण्यास प्रारंभ केला ! त्यांची त्यांनी वाटेल तशी निर्भर्त्सना केली ! परंतु त्याचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही ! आम्हांला कोणी एक शिवी देणार असे वाटले की, ती त्याच्याकडून स्पष्टपणे बाहेर येईल अशी आमची वृत्ती होते. मग त्याने एक दिली तर आमच्या दोन होतात, त्याच्या सहा तर आमच्या बारा असे होऊन आम्ही दोघेही जिवंत नरकवासामध्ये लोळू लागतो ! परंतु बुद्धाची ही अशी वृत्ती पाहून त्या ब्राह्मणास मोठा अचंबा वाटला. इतक्या शेलक्या शिव्या दिल्या, इतकी निर्भर्त्सना केली, तरी हा बुवा काही खवळत नाही, ह्याची चित्तवृत्ती क्षुब्ध होत नाही, ह्याची शांती आहे ती आहेच. हे पाहून तोच उलट अधिक क्षुब्ध झाला व म्हणाला, मी इतक्या शिव्यांची लाखोली वाहिली, इतकी निर्भर्त्सना केली, तरी त्याचा आपल्यावर काही परिणाम नाही. आपली पूर्वीची शांती आहे ती आहेच, हे कसे ? बुद्धदेव म्हणाले, “आपल्या होत्या नव्हत्या त्या सर्व शिव्या, सर्व शाप संपले ना ? नसल्यास आणखी चालू द्या. माझे उत्तर अगदी साधे आहे. पहा, कोणी मोठ्या प्रेमाने जर आपल्याला काही भेट आणली, पण त्या भेटीचा जर आपल्याला स्वीकार करावयाचा नसला, तर ते भेटीचे ताट आपण परत करतो, त्याचप्रमाणे मीही करीत आहे. आपली ही मला भेट आहे, हे ताट माझ्यापुढे ठेविले आहे पण ते मला नको आहे, मी त्याचा स्वीकार करीत नाही. आपण ते आणले आहे तसे आपले परत न्या. ते आपले आपल्याजवळच ठेवा !” कोण हा निश्चय, कोण ही शांती ! एकार्थी अशा प्रकारच्या साधू पुरुषाची निर्भर्त्सना करणे हे देखील मोठे पुण्य आहे ! कारण अशा साधूचा प्रत्यक्ष सहवास झाला म्हणजे मग आपली आतील पापे सगळी धुवून निघून आम्ही शुद्ध होतो !

हा असा निश्चय किंवा ही अशी निर्धाराची वृत्ती एकट्या गौतमबुद्धांचीच होती असे नव्हे. त्यांच्या शिष्यांनाही असेच साधन केले होते. एकदा एक शिष्य धर्मप्रचारास जाण्याची परवानगी मागू लागला. त्याची गौतमांनी अनेक प्रकारे समजूत केली, त्याचा निश्चय पाहिला. हा मार्ग नवीन आहे, लोक निर्भर्त्सना करतील, शिव्या देतील असे समजून मी समाधान मानून कामास लागेन असे बुद्धांनी सांगताच मला त्यांनी मारले नाही असे शिष्याचे उत्तर आले ! ‘पण तुला मारही बसण्याचा संभव आहे’ असे गुरूंनी म्हणताच, त्यांनी मला जिवे मारले नाही असे पाहून मी पुन्हा प्रचाराच्या कार्याला लागेन, असे शिष्याने सांगितले. ‘अरे बाबा, हा मार्ग इतका बिकट आहे, लोकांना इतका नावडता आहे की, ते खवळून जाऊन तुझा प्राणही घेतील’ असे बुद्धदेव म्हणाले. “तर मग ह्यापेक्षा आणखी काय पाहिजे ? लोकांना सन्मार्गाचा उपदेश करीत असता, लोकांच्या सेवेमध्ये असताना मला मरण आले तर ती माझी थोर पुण्याई, तर आता मला आपण मागे ठेवू नका, मला जाऊ द्याच. आपल्या कार्याला लागू द्या”. अशा शिष्याला मागे कोण ठेवणार त्याला नको जाऊ म्हटल्याने तो काय मागे रहाणार !

सारांश अशा प्रकारच्या निश्चयाने ह्या महामंत्राचा आम्ही स्वीकार केला, तर आमच्या अखिल पापांचा तत्काल नाश होईल. आमच्या सहवासाने इतरांच्या, ठिकाणी जागृती होईल. तर त्याचा स्वीकार करिताना आपण गरीब आहो, आपण स्त्री आहोत, आपण हीन जात म्हणून गणलेल्यांपैकी आहो, आपण अज्ञान आहो, आपण आधीच पापराशी आहो, असले विचारच मनात आणावयास नको. एकदा ह्या मंत्राचा स्वीकार करून निश्चयाने आम्ही वावरू लागलो की त्याचे कार्य दिसते, सर्व भेद नष्ट होतात, सर्व दोष नष्ट होतात, आपण शुद्ध होतो, आपण इतरांस शुद्ध करतो, आपण तरतो, इतरांस तारतो, असा हा नाममंत्र आहे, असा त्याचा महिमा तुकोबांनी आपल्याला सांगितला आहे तो आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करू या.

धर्मसाधन

ब्राह्म अथवा प्रार्थनासमाजाच्या सभासदांच्या मनांमध्ये वेळोवेळी असा प्रश्न उद्भवणे साहजिक आहे की आपण समाजाचे सभासद होऊन इतके दिवस झाले त्यात आपले धर्मसाधन किती झाले? समाजात सभासद होऊन इतके दिवस झाले त्यात आपले धर्मसाधन किती झाले? समाजात येण्यापूर्वीच्या आणि आल्यानंतरच्या स्थितीत फरक काय पडला आहे? प्रार्थना आणि उपदेश ह्यांच्याद्वारे आपणापुढे जे उच्च ध्येय ठेवले जाते त्यांपैकी कोणता भाग आपल्या चरित्रामध्ये संपादित झाला आहे? परंतु होत असलेल्या प्रयत्नाचे मानाने पहाता वरील प्रश्नास नेहमीच आशाजनक उत्तर मिळत असेल असे वाटत नाही. जगाच्या इतिहासात आजवर निरनिराळे जे धर्मसंप्रदाय होऊन गेले त्या सर्वांचा उद्देश व्यक्तीचे आणि समुदायाचे धर्मसाधन व्हावे हाच होता. प्रार्थनासमाजादी जे संप्रदाय आधुनिक काळात मोठ्या कसोशीने प्रस्थापित करण्यात आले आहेत त्यांचाही उद्देश हाच आहे. एकामागून एक इतके संप्रदाय काढण्यात आले आहेत त्यांचाही उद्देश हाच आहे. एकामागून एक इतके संप्रदाय काढण्यात येऊन आणि त्या त्या काळात त्यांची इतक्या आस्थेने जोपासना करूनही ज्याअर्थी धर्मसाधनाविषयी वरील धरसोडीचे उत्तर मिळते त्याअर्थी धर्मसंप्रदाय आणि धर्मसाधन ह्या दोन परस्परसंबंध विषयांवर पृथक् पृथक् थोडासा विचार करणे आवश्यक आहे.

नित्याच्या आपल्या बोलण्याच्या व्यवहारामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे पुरूषार्थाचे चार प्रकार येतात. पैकी विचार करिता मोक्ष, निर्वाण, पूर्णावस्था किंवा “Salvation” ही गोष्ट अनंतकाळची आहे, ही काही केव्हातरी एकदा मिळून जाण्यासारखी नाही म्हणून तिचा पुरूषार्थात समावेश करता येत नाही. दुसरे जे अर्थ आणि काम हे पुरूषार्थ आहेत ते इतके समर्याद आहेत की तुम्ही आम्ही साधारण माणसे देखील प्रसंगवशात त्यांची क्षुल्लकता जाणू शकतो. येणेप्रमाणे दोन अगदी समर्याद आणि एक अगदीच अमर्याद अशा प्रकारे तिन्हीची विल्हेवाट लागून चवथा राहणारा जो धर्म त्याजविषयी आज विचार कर्तव्य आहे. कित्येकांचे मते धर्म म्हणजे नुसती नीती असा अर्थ होतो. परंतु नीती म्हणजे हा एक आमचा दुस-याशी संबंध आहे. आपण जगात एकटेच असता किंवा आपल्यास दुस-या एका दूर निर्जन प्रदेशी सोडून दिले असता नीतीचा बहुतेक भाग संपुष्टात येऊन नीती अशी काही राहतच नाही. आत्मनीतीची तत्त्वे म्हणून जी काही आहेत ती तर खाण्यापिण्याच्या नेमस्तपणाप्रमाणे वरवरचेच नियम असतात. एकूण आपण एकटेच असताना नीतीचा विशेष प्रश्न रहात नाही. कारागृहात पडलेल्या दुर्दैवी माणसाची अशी स्थिती होते. परंतु आपल्या मनात उद्भवणारी सुखदु:खे, यत्न, विश्रांती, विवेक आणि समाधी, श्रद्धा आणि आशा इत्यादी थोर, गंभीर आणि पवित्र भावनांचे जे साम्राज्य चालू असते त्याला अशा एकांतवासाची आणि कारागृहाची काही बाधा होत नाही. त्याचे कार्य जसेच्या तसेच चालते किंबहुना अधिक बळावतेही. त्या भावना म्हणजे धर्म होय. त्यांचे पोषण करणे, उत्तरोत्तर संशोधन आणि वृद्धी करणे हे धर्मसाधन होय.

व्यक्तीचे अर्थ आणि काम हे दुसरे पुरूषार्त साधण्यामध्ये आणि समाजात राहून नीतीची निरनिराळी कर्तव्ये करण्यामुळे ह्या धर्मसाधनाचे काम कोणत्याही प्रकारे खोळंबता कामा नये. नाहीतर असा प्रकार व्हावयाचा:

देवधर्म सांदी पडिला सकळ| विषयी गोंधळ गाजतसे||

धर्म म्हणजे नीती, असे ज्याप्रमाणे काहीकांचे मत पडते त्याचप्रमाणे वरील धर्मसाधनही अर्थ आणि काम ही साधीत असताना आणि समाजाचे निरनिराळे व्यवहार करीत असतानाच घडते, त्याला धर्माच्या नावाने निराळेच असे काही करावयास नको असे कित्येक सूज्ञ माणसांचे म्हणणे पडते आणि त्यांचा तसा अनुभवही असतो. ह्या म्हणण्यात जरी पुष्कळ तथ्यांश आहे तरी ते सर्वांशी खरे नाही. मनुष्यजातीचा किंबहुना सर्व जड सृषअटीचा जो सतत विकास होत चालला हे त्याचाच एक भाग आमचे हे धर्मसाधन आहे. ते आम्ही बुद्ध्या केले नाही तरी तो स्वभावत:च घडणारा एक परिणाम आहे. असा केव्हा केव्हा शहाण्या माणसाचा समज होतो, परंतु वर सांगितलेल्या पवित्र भावना अशा रीतीने केवळ अंधपरंपरेने किंवा आपोआप आम्हांस मिळालेल्या नसतात. त्यांचा पूर्वापार संबंध यद्यपि ह्याच क्षणी आपणांस आठवत नसला तरी केवळ इतर पुरूषार्थामध्ये त्याची कशी तरी भेसळ करून देऊन तो निराळा असा मुळी नाहीच असे म्हणण्याचे धाडस आम्हांस तरी होत नाही.

उलटपक्षी आमचे जे निरनिराळे जुने, नवे धर्मसंप्रदाय चालू आहेत त्यांच्या योगे आमचे धर्मसाधन घडते असे समजून कित्येक लोक स्वस्थ राहतात. धर्मसंप्रदाय काढणे हा एक धर्मसाधन करण्याचा मुख्य मार्ग आहे, ह्यात शंका नाही आणि ह्याचा विचार आपण पुढील खेपेस करू. परंतु आज आपल्यास जी गोष्ट ध्यानात ठेवावयाची ती ही की, केव्हा केव्हा ह्या धर्मसंप्रदायामुळेच धर्मसाधनास अडथळा येतो. मागे एका उपासकानी वाचून दाखविलेल्या उता-यांत सांगितल्याप्रमाणे धर्माचे प्रचारक आणि पुरोहित हे ज्या प्रेम, पश्चात्ताप, आत्मपरीक्षण इत्यादी धर्मभावनांचे नित्य प्रवचन करीत असतात त्यासंबंधी संवयीमुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची जडता येते, कोरडेपणा येतो आणि ते त्यांपासून इतरांहूनही जास्त पराङमुख होण्याचा संभव आहे. आजपर्यंत एकामागून एक असे नवीन संप्रदाय काढण्याची जरूरी लागली आणि अजूनही पुढे लागले. ह्यावरूनही संप्रदायावरच सर्वस्वी अवलंबून राहून चालणार नाही हे उघड दिसते. आम्ही ज्या काही सांप्रदायिक प्रार्थना आणि उपदेश करतो त्यांच्यायोगे इतरांस जागृती होऊनही स्वत: ती न होण्याच संभव असतो. शुद्ध काचेतून ज्याप्रमाणे प्रकाशाची किरणे पार जातात त्याचप्रमाणे ईश्वरी प्रकाशाची किरणे आमच्यातून पार निघून गेलेली स्वत: आम्हांसच कळत नाहीत असे होते!

ह्यावरून वर म्हटल्याप्रमाणे, जरी संसारातील अर्थ आणि काम हे दोन पुरूषार्थ साधीत असताना काही अंशाने धर्मसाधन होते तरी तेवढ्यावरून जसे भागत नाही तसेच जरी एकाद्या संप्रदायात शिरून पूर्णपणे तन्मय होऊन ब-याच अंशाने धर्मसाधन होण्यासारखे आहे तरी तेवढ्यानेही भागत नाही हे उघड होते. धर्मसाधन हे प्रत्येक व्यक्तीने चिंतन, मनन, आत्मसंयमन, आत्मपरीक्षण, परसेवा व सहनशीलता इत्यादीद्वारा स्वत:च्या अनुभवाने व प्रयत्नानेच केले पाहिजे. ह्याहून अन्य उपाय आहेत पण त्यांची खात्री सांगवत नाही.

  1. धर्मसंघाची आवश्यकता
  2. धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
  3. धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
  4. धर्मजागृती
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
Page 24 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी