1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

हिंदुस्थान सरकारास सूचना

१९१६ सालापर्यंत हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतिक सरकारांकडूनच नव्हे तर प्रत्यक्ष हिंदुस्थान सरकारकडूनही आमच्या मिशनला मान्यता मिळाली.  ह्याचें एक उदाहरण म्हणून ता. १२ मे १९१६ तारखेचा एक खलिता हिंदुस्थानच्या चीफ सेक्रेटरीकडून मुंबई इलाख्याच्या चीफ सेक्रेटरीमार्फत आमच्या मिशनकडे आला.  ता. १६ मार्च १९१६ रोजीं मध्यवर्ती कायदेमंडळापुढें नागपूरचे नामदार मि. दादाभाई यांनीं अस्पृश्यवर्गांच्या सुधारणेकरितां एक ठराव आणला होता.  त्याअन्वयें हिंदुस्थान सरकारनें निरनिराळ्या प्रांतांच्या सरकारांनीं आजपर्यंत अस्पृश्यवर्गाच्या बाबतींत काय काय केलें आहे व पुढें काय काय करणार आहेत याविषयीं तपशीलवाद माहिती मागितली आणि ह्या बाबतींत आमच्या मिशनचीं मतें काय आहेत आणि सरकारांनीं पुढें काय काय करावें ह्याविषयीं मिशनची सूचना पाठवण्याविषयीं लिहिलें होतें.  मिशनचे सविस्तर अहवालहि मागविले होते.

ता. ३० ऑक्टो. १९१६ रोजीं मुंबई सरकारच्या सेक्रेटरीमार्फत हिंदुस्थान सरकारला उत्तरीं कळवलें.  अस्पृश्यवर्ग, गुन्हेगार जाती आणि जंगली जाती हा प्रस्तुत चौकशीचा विषय होता.  पैकीं अस्पृश्यवर्गाचेंच हें मिशन काम करीत आहे.  ह्या जातीला सक्तीच्या मोफत शिक्षणाची तर जरूर आहेच; पण तें यशस्वी होण्याला पुरेसें आकर्षणही झालें पाहिजे.  ह्या बाबतींत सरकारनें आमच्या मिशनसारख्या खासगी संस्थांची मदत घ्यावयाला पाहिजे.  वाङ्‌मयीन शिक्षणाला औद्योगिक शिक्षणाची जोड आवश्यक आहे; पण ह्या जातीला हजारों वर्षे केवळ शारीरिक कष्टाची गुलामगिरी करण्याचें अंगवळण पडल्यानें औद्योगिक बाबतींत वरिष्ठ दर्जाचें प्राविण्य मिळविण्यांत त्यांना उत्साह नाहीं.  सामाजिक बंधनानें त्यांना मोकळीक नाहीं.  त्यांनीं उत्पन्न केलेल्या मालाला उठाव मिळत नाहीं.  हा प्रश्न त्यांचा जन्मस्वभाव बदलण्याचा आहे.  ही क्रांति घडवून काम चुटकीसरशी, किंबहुना एकदोन पिढ्यांत घडवून आणण्यासारखें नाहीं.  नैतिक शिक्षण याहूनही कठीण आहे; आणि तें झाल्याशिवाय शिक्षणाचें काम पुरें होणार नाहीं.  स्वाभिमान, आत्मसंयमन, आत्मविश्वास हीं तत्त्वें ह्यांच्या अंगीं बाणल्याशिवाय ह्यांच्या उद्धाराविषयीं बोणलें व्यर्थ आहे.  गेल्या १० वर्षांत मिशन हें पायाशुद्ध काम करीत आलें आहे.  खास वसतिगृहाची योजना ठिकठिकाणीं हें मिशन करीत आहे.  साधें पण उदात्त घरगुती वातावरण ह्या वर्गांतील होतकरू तरुणांस मिशन पुरवीत आहे.  ह्या बाबतींत मिशनला अकल्पनीय अडचणी येत आहेत.  मिशन मुलांबरोबर मुलींचीही सोय करीत आहे.  मॅट्रिक्युलेशनपर्यंत शिक्षण देऊन निरनिराळ्या कॉलेजांत जाणारीं मुलेंही या वसतिगृहांत आहेत.  औद्योगिक शिक्षण केवळ शाळांतूनच देऊन चालणार नाहीं.  मुलें मोठीं झाल्यावर त्यांना निरनिराळ्या कारखान्यांतून जडजोखमीचीं कामें हाताळण्याची संवय व्हावी, म्हणून त्यांना मोठमोठ्या कारखान्यांतून उमदेरवार म्हणून नेमण्याची व्यवस्था सरकारला करतां येण्यासारखी आहे.  या वर्गापैकीं महार आणि चांभार या दोन जातींनीं ब्रिटिश सरकारच्या लष्करांत मोठें नांव मिळविलें आहे.  पण अलीकडे ह्यांच्या जागा लष्करांतून कमी झाल्यामुळें ह्या जातींत असंतोष पसरत आहे.  त्यासंबंधीं ते चळवळही करीत आहेत.  व्यवस्थित पद्धतीनें लष्करी शिक्षण देऊन लष्करांत त्यांना जबाबदारीच्या जागा दिल्यास त्यांचा स्वाभिमान जागा होईल आणि तेव्हांच त्यांच्या खर्‍या उद्धाराला सुरुवात होईल.

निराळ्या शाळा  :  ह्या लोकांच्या निराळ्या स्वतंत्र शाळा चालविण्यांत कांहीं गैरफायदे आहेत याची जाणीव ह्या मिशनला आहे.  ते असे  :-

(१)  अशा शाळांना योग्य शिक्षक मिळत नाहींत.  (२) खालच्या दर्जाच्या शाळांहून या शाळांचा अधिक विकास होत नाहीं.  (३) या वर्गांतही जातीजातींत पुरातन भांडणें आहेत.  (४) ह्यांचां परिणाम ह्या शाळांवर पुष्कळ घडतो.  (५) वरिष्ठ वर्गाच्या मुलांशीं मिसळण्याची संधि न मिळाल्यानें आणि त्यांच्या शाळा एकीकडे अलग ठेवल्यामुळें शिक्षणावरचा त्यांचा विश्वास हळूहळू कमी होत जातो.  (६) आणि अशा निराशेमुळें मुले, त्यांचे आईबाप आणि त्यांचे हितकर्ते ह्या सर्वांचीच नाउमेद होते.  ह्यासाठीं अस्पृश्य मुलांना इतर सामान्य शाळांतूनच हक्कानें प्रवेश मिळावा असे प्रयत्‍न सरकारनें जारीनें करावेत.

येणेंप्रमाणें ह्या मिशनचें अनुभविक मत दिल्यावर खालील सूचना करण्यांत आल्या :  (१) खेड्यांतील आणि शहरांतील विद्यार्थ्यांसाठीं वाढत्या प्रमाणावर पुष्कळशा प्राथमिक शाळा उघडाव्या.  (२) निदान जिल्ह्यांतून एका तरी शाळेला औद्योगिक शाळेची जोड असणें अत्यंत जरूर आहे.  (३) नैतिक वळण लागावें म्हणून मुख्य मुख्य केंद्रांत वसतिगृह स्थापावे.  (४) ट्रेनिंग कॉलेजमध्यें व उच्च दर्जाच्या औद्योगिक शाळांमधून शिक्षण देण्यासाठीं उदार प्रमाणांत विद्यार्थीवेतनें द्यावींत आणि तीं चांगल्या रीतीनें जाहीर करावींत.  (५) आमच्या मिशनसारख्या खासगी संस्थांना भरपूर मदत करून त्यांचे सहकार्य संपादन करावें.  (६) अशा खास शाळांसाठीं सरकारनें स्वतंत्र इन्स्पेक्टर नेमून त्यांच्यावर खास प्रयत्‍नांची जबाबदारी टाकावी.  (७) ह्या लोकांसाठीं सहकारी पतपेढ्या काढून त्यांच्यांतच परस्परांमध्यें सहकार्य वाढेल असें करावें.  (८) सरकारनें म्युनिसिपालिट्या, लोकल बोर्ड ह्यांच्या ह्या कामासाठीं संयुक्त कमिट्या स्थापाव्यात आणि त्यांच्या सभा वेळोवेळीं भरवून सूचना मागवाव्यात.  (९) लोकमत तयार करण्यासाठीं ह्या संयुक्त कमिट्यांनीं वेळोवेळीं परिषदा भरवाव्यात.

ह्या मिशननें आजपर्यंत जें अस्पृश्यवर्गाप्रीत्यर्थ काम केलें आहे त्याचा वार्षिक अहवाल सोबत जोडण्यांत आला होता.  या प्रकरणीं Views and Suggestions to The Government of India ह्या नांवाचें एक १७ पानांचें चोपडें स्वतंत्रपणें प्रसिद्ध केलें आणि त्याच्या कित्येक प्रती प्रांतिक सरकारला देण्याकरितां पाठविण्यांत आल्या.

स्थानिक समाज

सातारा समाज  :  मुंबई शहराशिवाय महाराष्ट्रांत पुणें, सातारा, अहमदनगर; गुजराथेंत अहमदाबाद, बडोदें आणि माळव्यांत इंदोर वगैरे ठिकाणीं प्रार्थनासमाजाचे स्थानिक समाज आहेत.  ह्यांचे सालोसाल वार्षिक उत्सवाचे समारंभ होत असतात.  ते जवळजवळ आठवडाभर चालत असतात.  त्यांत भाग घेण्यास मला जावें लागे.  १९०५ सालच्या उन्हाळ्यांत सातारा येथील उत्सवासाठीं मी गेलों.  रा. सितारामपंत जव्हेरे हे ह्या समाजाचें काम कळकळीनें चालवीत असत.  रा. काळे, रा. मोरोपंत जोशी व त्यांची कन्या मथुराबाई वगैरे मंडळी त्यांना मदत करीत असत.  भजन, उपासना, व्याख्यानें हीं कार्यक्रमांतील ठराविक कामें झाल्यावर तेथील लष्करांत अस्पृश्य लोकांच्या सैनिकांकरितां एक विशेष व्याख्यान झालें.  गांवांत अस्पृश्यांसाठी एक शाळा उघडण्यांत आली.  सातार्‍याहून पांच मैलांवर वर्णे नांवाचें एक खेडें आहे तेथील सबरजिस्ट्रार रा. बापूजी बच्चाजी शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. गणपतराव शिंदे यांनीं मुद्दाम बोलावून नेलें.  खेड्यांतील लोकांसाठीं भजन, उपासना करवल्या.  लोकांमध्यें वांटण्यासाठीं पोस्टल मिशनचें वाङ्‌मय पाठविण्यांत आलें.  पुढील एका वर्षी डॉ. भांडारकर, गणपतराव आंजर्लेकर, स्वामी स्वात्मानंद, गणपतराव कोटकर, श्रीमती जनाबाई शिंदे वगैरे मंडळींसह सातार्‍यास गेलों.  उत्सव थाटाचा झाला.  यवतेश्वराच्या डोंगरावर वनोपासना झाली.  

अहमदनगर समाज  :  १९०६ सालीं अहमदनगर समाजांत उत्सवासाठीं गेलों.  तेथील साळी समाजाचे प्रमुख पुढारी रा. सहदेवराव बागडे या समाजाचा पुढाकार घेऊन काम चालवीत.  यांच्या वजनामुळें समाजांत बरेच साळी जातीचे लोक येत असत.  शंकर पांडुरंग पंडित, लालशंकर उमीयाशंकर वगैरे विद्वानांच्या प्रोत्साहनानें नगर येथें स्वतंत्र मंदिर बांधण्यांत आलें होतें.  इ.स. १९०५ सालापासून पुढें मी या समाजांत मधूनमधून जाऊं लागलों.  त्या वेळीं व पुढें संत, हिवरगांवकर, धनेश्वर, ॠषि वगैरे तरुण मंडळींनीं समाजाचें काम नेटानें चालविलें होतें.  फ्रेंडस् लिबरल् असोसिएशन नांवाची संस्था स्थापन होऊन तिच्या विद्यमानें समाजाबाहेरही व्याख्यानें देण्याचा उपक्रम तेव्हां झाला; पण समाजाचा मुख्य भार त्या वेळीं प. वा. सहदेवराव बागडे यांच्यावरच पडला होता.  त्यांच्या साहाय्यानें एक स्पृश्यांसाठीं व एक अस्पृश्यांसाठीं अशा दोन रात्रीच्या शाळा काढण्यांत आल्या.  पुढें कांहीं वर्षांनीं त्या बंद पडल्या.  रा. ब. मारुतीराव भुजंगराव या वृद्ध गृहस्थानें आपल्या स्वकुळ साळी समाजांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठीं ५००० रु. व केवळ प्रार्थनासमाजासाठीं ३००० रु. अशा देणग्या दिल्या.  त्यांतच सहदेवराव बागडे यांनीं स्वतःच्या १००० रु. ची भर घातली (प्रार्थनासमाजाचा इतिहास, पान २९२).

सोनईची चळवळ  :  पुढें १९०८ सालीं अहमदनगरास गेलों असतां सोनई येथें मोठी चळवळ झाली.  तेथील खेड्यांतील लोकांचें एक शिष्टमंडळ मला तेथें नेण्यास आलें.  ही सत्यशोधक मंडळी होती.  तेथील स्थानिक ब्राह्मणमंडळींशीं कांहीं वाद माजून आसपासच्या बर्‍याच खेड्यांत असंतोष उत्पन्न झाला होता.  जातीजातींत सामाजिक बाबतींत वैमनस्य माजलें असतां, त्यांच्यांत सलोखा घडवून आणून उदारधर्माच्या चळवळीकडे लक्ष लावणें हें प्रार्थनासमाजाचें ब्रीद आहे.  म्हणून मी सोनई येथें गेलों.  तेथील ओढ्याच्या कांठीं वाळवंटांत प्रचंड जाहीर सभा भरली.  निरनिराळ्या खेड्यांतून सर्व जातींची हजारों मंडळी जमली होती.  प्रत्येक जातीचे दोन दोन प्रतिनिधि घेऊन एक साधारण समिति बनविण्यांत आली.  त्यांत ब्राह्मणांचेही दोन प्रतिनिधी घेण्यांत आले.  सत्यसमाज हें नांव ह्या नवीन चळवळीला देण्यांत आलें.  एक दोन वर्षे काम चालल्यावर सोनई येथील दोन पाटील घराण्यांत वितुष्ट आल्यानें ह्या नवीन चळवळीचा लोप झाला.

इंदूर  :  १९०७ सालीं मी इंदुरास समाजाचे उत्सवास गेलों.  बरोबर माझी पत्‍नी सौ. रुक्मिणीबाई आणि सहकारी स्वात्मानंद हे होते.  इंदूर समाजाचें नांव मध्यभारतवर्षीय ब्राह्मसमाज असें आहे.  डॉ. प्रभाकरपंत भांडारकर, होळकर कॉलेजचे प्रो. देसाई, तेथील प्रसिद्ध पाटकर जाधव यांचें घराणें, चित्रकार मिटबावकर ह्यांचा या समाजांत मोठा पुढाकार असे.  ही सर्व मंडळी अनुष्ठानिक असून समाजाचें काम जोरांत चाललें होतें.  रा. सदाशिवराव केळकरही तेथेंच होते.  ह्या उत्सवांत नगरसंकीर्तनाचें कार्य थाटाचें झालें.  शेवटीं नगराबाहेर वनोपासनेंत प्रीतिभोजनाचा समारंभही गोड झाला.  ता. २४ एप्रिल १९०७ रोजीं तेथील कांहीं पुढारी मंडळींच्या मदतीनें एक कमिटी स्थापन करून अस्पृश्यांसाठीं ता. ५ मे १९०७ रोजीं एक संस्था उघडण्यांत आली.  होळकर कॉलेजचे प्रो. गोखले हे व्हाइस प्रेसिडेन्ट व रामचंद्रराव मिटबावकर हे सेक्रेटरी होते.  ह्या समाजाचें एक सुंदर ब्राह्ममंदिर आहे.  तेथील पाटकर-जाधव घराण्यांतील मंडळींची समाजाला फार मदत होती.  त्यांचें होळकर दरबारांत वजन असल्यानें श्रीमंत तुकोजीराव महाराज व त्यांची पत्‍नी सीताबाई होळकर यांचें समाजाकडे लक्ष लागलें.  महाराजांकडून या समाजास दरमहा ३० रु. चें वर्षासनही मिळत असतें.

मांडवगड  :  उत्सव आटोपल्यावर जाधवमंडळींनीं धार, मांडवगड, महू वगैरे प्रेक्षणीय स्थळें पाहण्यासाठीं बैलगाडींतून सफर काढली.  माझ्या पत्‍नीलाही घेऊन मी त्या सफरीस गेलों.  धार येथील प्रसिद्ध किल्ला आणि तेथील प्राचीन राज्याचे अवशेष पाहून आनंद झाला.  विंध्याद्रीच्या शिखरावर मांडवगड ही मध्ययुगीन मुसलमान बादशहांची राजधानी होती.  तेथें दहावीस मोठमोठ्या मशिदी, देवळें आणि राजमहाल हीं फार प्रेक्षणीय दिसलीं. मध्ययुगीन राजा बाजबहादूर व रूपमती यांच्या प्रेमाचीं स्थळें पाहण्यांत आलीं.  यानंतर नर्सिंगचें शिक्षण घेण्यासाठीं सौ. रुक्मिणीबाईंस कांहीं महिने इंदुरास जाधवमंडळींकडे ठेवून मी मुंबईस आलों.  तुकोजीरावमहाराजांची दाई व बाळकृष्णपंत जाधव यांची पत्‍नी सौ. अहल्याबाई या फार चारित्र्यवान् व थोर मनाच्या बाई होत्या.  त्यांच्या प्रेमळ सहवासांत रुक्मिणीबाईंना मोठा लाभ घडला.

नवसारी  :  पोस्टल मिशनच्या कामांत परिचय झालेले रा. जी. के. वैद्य यांचें ता. १ सप्टेंबर १९०४ चें पत्र आढळतें.  त्यावरून नवसारी येथील प्रार्थनासमाजाची खालल हकिगत मिळते.  रा. ब. हरी रामचंद्र शिंदे, बडोदा स्टेट इंजिनियर यांनीं ३० ऑक्टोबर १८९८ रोजीं नवसारी येथें समाज स्थापला.  त्यांत रा. ब. शिंदे आणि रा. मोतिलाल ए. मुनशी, हायकोर्ट वकील यांनीं पुढाकार घेतला.  प्रथम १५ सभासद होते.  त्यांची संख्या १९०४ सालीं ४० झाली.  प्लेगमुळें या समाजाचे कामांत दरवर्षी चार चार महिने खंड पडतो.  पहिला जाहीर उत्सव १९०० सालीं व दुसरा १९०३ सालीं झाला.  चवथा १९०४ ऑगस्टमध्यें झाला.  त्यांत मीं भाग घेतला होता.  १९०३ सालांत श्रीमंत महाराजांचे बंधु श्रीमंत संपतराव गायकवाड यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें.  १९०४ च्या उत्सवांत शनिवार-रविवारीं उपासना व व्याख्यानें मीं केलीं.  समाजाचे हेतु व कार्य यांचें मीं स्पष्टीकरण केलें.  सुभासाहेब रा. ब. खासेराव जाधव यांनीं सुंदर भाषण करून धार्मिक शिक्षणाची आवश्यकता सांगितली.  मीं समाजाला एक लायब्ररी असावी अशी सूचना करून मुंबईहून कांहीं पुस्तकें पाठविलीं म्हणून लायब्ररीची स्थापना झाली.

सोनगड  :  नवसारी प्रांतांतील जंगलामध्यें सोनगड म्हणून एक गांव आहे.  तेथें एक समाज चांगला होता.  त्यांतील कित्येक प्रतिनिधि खास आमंत्रणावरून नवसारीच्या उत्सवास आले होते.  पुढील वर्षी सोनगड येथील समाजास मीं भेट दिली.  येथें बडोदें संस्थानच्या शेतकी खात्याचें एक केंद्र आहे.  या प्रांतांतील ढाणके नांवाच्या जंगली जातींच्या लोकांच्या शिक्षणाची येथें सोय आहे.  श्रीमंत सयाजीरावमहाराजांनीं कृपावंत होऊन ह्या जातीच्या मुलांसाठीं व मुलींसाठीं दोन नमुनेदार वसतिगृहें उघडलीं होतीं.  तीं पाहून महाराजांच्या उदार अंतःकरणाची साक्ष पटली.  प्रत्येक वसतिगृहांत ५० विद्यार्थ्यांची सोय केली होती.  मागासलेल्या लोकांना शिक्षण देतांना मुलांप्रमाणेंच मुलींची व्यवसथा करण्याला महाराज कधीं विसरत नसत.  मुलांना शिकवून मुलींना अडाणी ठेवण्यांत त्या समाजाला धोका आहे, हें महाराजांनीं प्रथमच जाणलें.  या वसतिगृहाचे सुपरिंटेंडेंट रा. फत्तेखां नांवाचे मुसलमान गृहस्थ मोठ्या कळकळीनें काम करीत होते.  हे प्रार्थनासमाजाचे सभासद असून या गांवीं एक स्वतंत्र प्रार्थनासमाजही चालवीत होते.  त्यांनीं या चळवळीचा कसा आरंभ झाला याविषयीं एक मनोरंजक गोष्ट कथन केली.  श्रीमंत सरकार सर सयाजीरावमहाराज या प्रांतांतील ढाणके नांवाच्या मागासलेल्या जातीची परिस्थिति स्वतः निरीक्षण्यास आले असतां ठिकठिकाणीं त्यांच्यापैकीं कोणींच महाराजांना दिसेना.  हें गूढ काय आहे याचा तपास केल्यावर पुरुष व बायकामुलें हीं सर्व झाडांवर उंच चढून बसलेलीं दिसलीं.  महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला पाहून ते आपल्याला धरून नेतील या भीतीनें त्या बिचार्‍यांनीं असें केलें होतें.  हें दृश्य पाहून ह्या लोकांची सुधारणा अवश्य केली पाहिजे, असा महाराजांनीं निश्चय केला.  त्याचें फळ या संस्था आहेत, असें फत्तेखानांनीं गहिंवरून सांगितलें.  धन्य महाराज !

बडोदें  :  १९०३ सालीं मी विलायतेहून परत येण्यापूर्वी श्रीमंत सयाजीरावमहाराज यांचेकडून पत्र आलें होतें कीं, स्वदेशीं आल्यावर प्रथम त्यांना भेटावें.  याप्रमाणें मी त्यांना स्वदेशीं आल्यावर १९०३ च्या ऑक्टोबरांत भेटण्यास गेलों.  त्या वेळीं बडोद्यांत अस्पृश्यांसाठीं चार प्राथमिक शाळा होत्या.  त्या मीं तपासून पाहण्यासाठीं तजवीज करावी असें महाराजांनीं विद्याधिकार्‍यांस फर्माविलें.  तपासून कांहीं सूचना करावयाच्या असल्यास महाराजांना समक्ष करावयास सांगितलें.  सर्व शाळा जोरांत चालल्या होत्या.  परंतु प्राथमिक शिक्षण संपल्यावर मुलांना पुढें वाव नसल्यानें तीं मोकळीं हिंडत होतीं.  पुस्तकी शिक्षणामुळें तीं आपल्या वडिलांचे हलके धंदे करण्यास असमर्थ आणि नाखूश होतीं.  मीं ही गोष्ट महाराजांचे कानीं घालून मुलांच्या नोकरीविषयीं कांहीं झाल्यास करावें अशी सूचना केली.  धोरणी महाराजांनीं लोकमत अनुकूल नसल्यानें तूर्त हें शक्य नाहीं असें सांगितलें; पण स्कॉलर्शिपा देऊन पुढील शिक्षणाची सोय करण्याचें कबूल केलें आणि त्याप्रमाणें तशी व्यवस्था पण झाली.

मराठ्यांकडून स्वागत  :  बडोदें शहरांतील प्रमुख मराठेमंडळींनीं माझें स्वागत करून पानसुपारीचा एक जाहीर समारंभ केला.  मेहेरबान खासेराव जाधव यांचा या बाबतींत पुढाकार होता; पण एकामागून एक जीं वक्त्यांची भाषणें झाली त्यांतून प्रतिकूल सूरच निघूं लागले.  माझें सर्व शिक्षण मराठा समाजाचे खर्चांतून झाल्यानें व विलायतेला जाण्यायेण्याचा खर्चही महाराजांकडून मिळाला असतां मी मराठा समाजाच्या सेवेला हजर न होतां प्रार्थनासमाजांत शिरलों हें बरें केलें नाहीं, अशीं भाषणें करून माझ्या गळ्यांत जेव्हां माळ घालावयास मंडळी पुढें आली तेव्हां उत्तर देतांना मी म्हटलें कीं, ''असें जर आहे, तर मी ही माळ घालण्यास लायक नाहीं.  म्हणून ती हातांतच घेत आहें.  प्रार्थनासमाज सर्वांसाठीं आहे आणि त्यासाठीं मला तयार केलें हें मराठ्यांस, विशेषतः महाराजांना भूषणावहच आहे.  स्वतः महाराज हेच जर केवळ मराठ्यांकरितां नाहींत तर त्यांचा अनुयायी मी निराळा कसा होऊं ?

सन १९०४ सालीं नाताळांत काँग्रेसचें अधिवेशन मुंबईस ठरलें.  सामाजिक परिषदेचें अध्यक्षस्थान या वर्षी महाराजांना द्यावयाचें ठरलें होतें.  ह्याच वेळीं एकेश्वरी धर्मपरिषदेची पुनर्घटना करून तिचें अधिवेशन मुंबईस करण्याचे कामीं मीं पुढाकार घेतला होता.  त्या वेळीं मुंबई प्रार्थनासमाजास भेट द्यावी व समाजाच्या रात्रीच्या शाळांच्या बक्षीससमारंभामध्यें अध्यक्षस्थान स्वीकारावें म्हणून महाराजांना आमंत्रण करण्यासाठीं मी बडोद्यास डिसेंबर १९०४ मध्यें गेलों.  त्या वेळीं तेथील हायकोर्टाचे जज्ज व डॉ. भांडारकर यांचे बंधु श्री. वासुदेवराव गोपाळ भांडारकर हे होते.  मी त्यांचेकडे उतरलों.  हे प्रार्थनासमाजाचे सभासद होते.  शेठ हरगोविंददास कांटावाला वगैरे जुन्या पुढार्‍यांच्या नेतृत्वाखालीं बडोद्यास एक प्रार्थनासमाज चालविला होता; पण त्याचें काम हल्लीं बंद होतें.  बडोद्यांतील जयसिंगराव स्टेट लायब्ररीमध्यें महाराजांच्या आज्ञेनें माझें एक जाहीर व्याख्यान करण्यांत आलें.  महाराजांनीं मुंबईंत समाजाच्या परिषदेच्या कामांत भाग घेण्याचें मान्य केलें.

मंगळूर  :  सन १९०७ च्या ऑक्टोबर अखेरीस हिंदुस्थानच्या नैर्ॠत्य किनार्‍यावरील मंगळूर शहरांतील ब्राह्मसमाजाकडून मला तिकडे नेण्यासाठीं त्या समाजाचे रा. व्यंकटाप्पा कांतप्पा नांवाचे एक सभासद मुंबईस आले.  मी व चि. जनाक्का श्री. व्यंकटाप्पाबरोबर आगबोटीनें निघालों.  मंगळूरला पोंचल्यावर समाजाचे अक्षरशः सर्व सभासद-स्त्रीपुरुष आणि मुलें-माझें स्वागत करण्यासाठीं बंदरावर आले होते.  मंगळूर हें बंदर उतरण्यास कठीण असल्यामुळें आगबोट बंदरापासून लांब थांबते.  लहानशा मचव्यांतून उतारूंना बंदरावर पोंचविण्यांत येतें.  ही सर्व मंडळी माझ्यासाठीं किती तरी वेळ उन्हांत तिष्ठत होती.  त्यांचें हार्दिक स्वागत पाहून आम्हांला गहिंवर आला.  वृद्ध अध्यक्ष उल्लाळ रघुनाथय्या, सेक्रेटरी के.रंगराव, खजीनदार कृष्णराव गांगुली, कर्नल सदाशिवराव व आणखी कांहीं थोडीं सारस्वत ब्राह्मण घराणीं होतीं.  बाकी सर्व तिकडील प्रांतांतील बिल्लव जातीचे सभासद होते.  ही जात तिकडे अस्पृश्य मानलेली होती.  पण तो आश्रम पालटून ब्राह्मसमाजांत प्रवेश झाल्यावर हे सर्व सभासद सर्रास वरिष्ठ वर्गांत मोडूं लागले.  यामुळें कोपर्‍यांतील ह्या ब्राह्मसमाजाचा पूर्वेतिहास फार मनोरंजक आणि उद्बोधक झाला आहे.  ब्राह्मसमाजाच्या प्रसारामध्यें या प्रांतांतील कामानें फार वरचा नंबर पटकावला आहे.

समाजाची स्थापना  :  ब्रह्मानंद केशवचंद्र सेनच्या अमदानींत त्यांचे पट्टशिष्य प्रतापचंद्र मुझुमदार यांनीं ह्या कामीं पुढाकार घेतला होता.  त्या वेळीं बिल्लव जातीचे आलसाप्पा नांवाचे पुढारी वजनदार होते.  ५००० बिल्लव ब्राह्मसमाजाची दीक्षा घेण्यास तयार आहेत, अशी तार त्यांनीं केशवचंद्र सेन यांना केल्यामुळें प्रतापचंद्र यांना पाठविण्यांत आलें.  त्यांचे स्वागत करण्यासाठीं बंदरावर ह्या जातीचा प्रचंड समुदाय जमला होता; पण प्रतापचंद्र मुझुमदार महाशय अस्सल इंग्रजी पोशाखांत जेव्हां मचव्यांतून बंदरावर उतरले तेव्हां त्यांना पाहून हा जमलेला समाज बिचकला.  हे कुणी तरी ख्रिस्ती मिशनरी आपणांस बाटविण्यास आले आहेत, अशी धास्ती घेऊन सगळ्या गर्दीची पांगापांग झाली आणि बिचार्‍या आलसाप्पाजवळ कोणी धरला नाहीं.  प्रतापचंद्रांनीं धीर सोडला नाहीं.  ते आलसाप्पा यांच्या घरीं जाऊन उतरले.  दुसरे दिवशीं सकाळीं ब्राह्मोपासनेस प्रतापबाबू बसले त्या वेळीं त्यांनीं आपली साधी शुद्ध बंगाली शाल अंगावर घेतली होती.  तीवर त्यांची शुभ्र विपुल दाढी, मोकळ्या डोक्यावरील लांब आणि कुरळे केस हा अस्सल देशी देखावा पाहून आदले दिवशीं उधळून गेलेल्या लोकांस थोडा थोडा धीर येऊं लागला.  आपलें इंग्रजींतील अमोघ वक्तृत्व आणि मायाळू प्रचाराचे जोरावर त्यांनीं लवकरच वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गांवर छाप बसविली व ब्रा. समाजाची स्थापना केली.  त्यानंतर नवविधान समाजाचे अनेक प्रचारक, विशेषतः अमृतलाल वोस, वलदेव नारायण, साधारण ब्राह्मसमाजाचे हेमचंद्र सरकार वगैरेंनीं अमोलिक कामगिरी केलीं.  अमृतलालची शिस्त, बलदेव नारायणांचा भक्तिभाव, हेमचंद्रांचें घटनाकौशल्य ह्यांचे ठसे अद्याप दिसत आहेत.  या परंपरेंत मीं या पवित्र भूमीवर पाय ठेवला.  सुमारें एक महिना अत्यंत सुखासमाधानानें आम्हीं या बालबोध समाजाची सेवा केली आणि ती त्यानें गोड करून घेतली.  विशेषतः आम्हां दोघां भावंडांना या प्रांताची कानडी भाषा येत असल्यानें या समाजांतील लहानथारे मंडळी आम्हांशीं अगदीं आपुलकीनें बिलगली.  आम्हांपासून त्यांना लाभ झाला कीं त्यांच्यापासून आम्हांला झाला हें निवडून सांगणें कठीण आहे.

ह्या प्रांतीं कोंकणी या नांवाची ब्राह्मणांची एक पोटजात आहे.  त्या जातीचे प्रतिनिधि विद्येंत, व्यापारांत व सरकारी नोकरींत पुढारलेले आहेत.  त्यांना मराठी भाषेचा फार अभिमान वाटत असे.  त्यांनीं माझीं मराठींत व्याख्यानें, उपासना व कीर्तनें मोठ्या आवडीनें करविलीं.  रा. सुब्बराव पै या नांवाच्या एका प्रेमळ गृहस्थानें एक लहानशी मराठी शाळा काढण्यांत पुढाकार घेतला.

समाजाचे उत्साही सेक्रेटरी के. रंगराव ह्यांनीं अस्पृश्यांच्या उद्धारासाठीं मुंबईच्या निराश्रित मंडळीची सुरुवात होण्यापूर्वीच गेल्या शतकांतील १८९७ सालीं सुरुवात केली होती.  मुंबईंत गेल्या वर्षी मीं नवीन अखिल भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची (All India Depressed Classes Mission)  सुरुवात केली होती, म्हणून के. रंगराव यांनीं विशेष उत्साहानें मला बोलावून नेलें होतें.  आजपर्यंत ह्या कामीं ते एकटेच खपत होते.  मीं ह्या कामाची पुनर्घटना केली.  गांवांतील पांच प्रमुख पुढार्‍यांची एक कमिटी नेमून मीं ती के. रंगरावांच्या जोडीला दिली आणि अखिल भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची ही मंगळूर शाखा म्हणून त्या मंडळीशीं संलग्न (Affiliated)  केली.  पुढें हिची वाढ झपाट्यानें झालीं.  ह्या नैर्ॠत्य किनार्‍यावरील द्राविड संस्कृति, लोकरिवाज, आश्चर्यकारक इतिहास यांचें निरीक्षण करण्यास बरीच मोठी संधि मिळाली.  बर्‍याच वेळां मी या प्रांतीं पुढें निरनिराळ्या कामानिमित्त येऊन गेलों.

प्रेमाचें भांडण  :  आम्हां दोघां भावंडांची उतरण्याची सोय या बिल्लव मंडळींनीं एका स्वतंत्र बंगल्यांत केली होती.  तरुण स्वयंसेवक नेहमीं कामाला हजर असत.  बिल्लव मंडळींची माझ्यावर अपूर्व भक्ति होती.  मला आपला गुरु मानून ते माझ्या अर्ध्या वचनांत राहात असत.  नरसाप्पा व नारायणाप्पा या नांवाचे दोघे बंधु आमच्या बंगल्यांत सहकुटुंब राहात असत.  आमच्या पाहुणचाराची जबाबदारी त्यांच्यावर असे.  तो करण्यामध्यें त्यांची केव्हां केव्हां अशी चुरशीची चढाई लागे कीं, ''देवा, आमचे ह्या शिष्यांपासून रक्षण कर'' असें म्हणण्याची आम्हांवर पाळी येई.  एकदां आमचें काम करण्यासाठीं ह्या दोघां भावांचें अक्षरशः मल्लयुद्ध जुंपलें.  मी तें सोडविण्यास गेलों असतां त्या दोघांचे आघात माझ्या पाठीवर पडून ती बरीच तिंबून निघाली.  कारण ही वेळ पहाटे ५ वाजतांची-रात्रीची-असल्यानें हा प्रकार अंधारांत चालला होता.  त्या दिवशींचा स्वयंपाक कोणीं करावा याबद्दल वाद उपस्थित झाला होता.  जो तो मी करणार असें अट्टाहासानें म्हणे.  उजाडल्यावर माझ्या पाठीवरचे बळ पाहून दोघे भाऊ लहान मुलांसारखे स्पुंफ्दून स्पुंफ्दून रडूं लागले.  त्यांची समजूत घालण्यासाठीं मला माझी बरीच शक्ति खर्च करावी लागली.

बिल्लवांची गृहस्थिति  :  मंगळूरभोंवतीं सृष्टिसौंदर्य अपूर्व आहे.  नद्यांचीं रुंद पात्रें, दोन्ही बाजूंना सुंदर रेती व त्यापलीकडे लाल मातीच्या टेकड्यां व त्यांवरील गर्द झाडी वगैरे शोभ सर्व ॠतूंत अपूर्व दिसते.  अड्यांर नांवाच्या जवळच्या एका खेड्यांत मीं बोटींतून सफर काढली.  बिल्लव जातीचे पुढारी व समाजाचे सभासद श्री. बोळार व्यंकटाप्पा या नांवाचे पोलीस अधिकारी बरोबर होते.  त्यांनीं ह्या सफरीची सर्व सोय केली होती.  आम्ही जंगलांत राहणार्‍या बिल्लव जातीच्या गृहस्थितीचें निरीक्षण करण्यासाठीं एका घरांत शिरलों.  मोठमोठ्या जमिनीवर राबण्यासाठीं हे लोक वंशपरंपरागत कुळें म्हणून खपतात.  ह्यांची स्थिति जवळजवळ जनावरांसारखीच आहे.  राहण्यासाठीं एखादी क्षुद्र झोंपडी, ताडामाडाच्या लाकडांचीं कांहीं क्षुल्लक उपकरणें एवढीच ह्यांची संपत्ति.  अंगावरच्या पोशाखाशिवाय बदलावयाला कपडे नसतात.  मी एका म्हातार्‍या स्त्रीला तिचें वय विचारलें.  तिनें लाजून म्हटलें, ''मला काय माहीत ?  माझ्या जमिनीच्या मालकाला ठाऊक असेल !''  अशा लोकांसाठीं रा. रंगरावांनीं मिशन काढलें यांत काय नवल !  या लोकांचीं मुलें दिवसभर कुठें तरी झाडावरील चिंचा, बोरें व केव्हां झाडपाला खाऊन पोट भरतात.  रात्रीं थोडीशी कांजी मिळाल्यास ती चाटून चाटून खातात.  औषध-पाण्याची त्यांना गरजच लागत नाहीं.  नंतर चारसहा आठवड्यांनीं आम्ही मुंबईस परत आलों.

पनवेल  :  १९०६-०७ च्या सुमाराला चि. जनाक्का कोंकणांतील पनवेल या गांवीं तेथील म्युनिसिपल शाळेंत मुख्य शिक्षक या  नात्यानें काम करीत होती.  सुधारक म्हणून तिला तेथें फार विरोध होऊं लागला.  तिचेबरोबर आई, बाबा आणि माझा मुलगा प्रताप हे राहात होते.  प्रार्थनासमाजाचीं तत्त्वें तेथील लोकांस समजावून दिल्यास गैरसमजूत कमी होऊन विरोध कमी होईल या आशेनें स्वामी स्वात्मानंदजींना बरोबर घेऊन मी परवेलास गेलों.  ज्या द्रव्यामुळें प्रकृतींत बिघाड होतो तींच द्रव्यें शरिरांत लहान प्रमाणावर घालून रोग बरा करण्याच्या प्रकाराला होमिओपाथी म्हणतात.  सुधारणेमुळें लोकांना चीड आलेली होती.  त्याच सुधारणेच्या लहान गुटिका लोकसमाजाला देण्याची ही आमची आध्यात्मिक होमिओपाथी होती.  स्वात्मानंदजी हे मूळचे आर्यसमाजिस्ट असल्यानें साधकबाधक कोटिक्रम करून आणि जुन्या ग्रंथांचे आधार देऊन वाद करण्याच्या पद्धतींत त्यांचा हातखंडा असे.  वादाचे मुद्दे संपल्यावर स्वामीजी केव्हां केव्हां आपल्या हातांतला दंडाही उगारीत.  तुलनात्मक धर्मपद्धति, आधुनिक धर्मविवेचन, अखिल जगताचें हळूहळू पालटणारें लोकमत, राजकारणासारख्या ऐहिक प्रश्नावर होणारा त्याचा परिणाम वगैरे विषयांवर माझें विवेचन होत असे.  या जोडगोळीनें पनवेलच्या वरिष्ठ वर्गावर थोडाबहुत परिणाम झाला आणि चिरंजीव जनाक्काच्या मुलींच्या शाळेंत मुलींची हजेरी पण सुधारली. अशा स्थितींत पनवेलचे गंगारामभाऊ सुभेदार हे महार गृहस्थ लष्करी पेन्शनर होते.  त्यांना माझे बाबांनीं आपल्या घरीं चहाला बोलाविलें.  त्यामुळें आम्ही मुंबईस परत आल्यावर लोकमताला पुन्हां ऊत आला.  बराच त्रास भोगावा लागला.  इतका कीं आमचे घरची मोलकरीण काम सोडून गेली आणि बाबांना हजामतीची पंचाईत पडली.  तेथील मामलेदार रा. बेंदूरकर नांवाचे एक प्रागतिक सज्जन गृहस्थ होते.  दुसरे म्युनिसिपालिटींत एक सभ्य व सज्जन मुसलमान होते.  त्या दोघांचें साहाय्य न मिळतें तर चिरंजीव जनाक्काला ही नोकरी सोडून मुंबईस परतावें लागलें असतें.  ह्यापुढें कोंकणांत अलिबाग, मालवण, सावंतवाडी, गोवें आंबोलीचा घाट, दापोली वगैरे ठिकाणीं प्रचारकार्यास मी वेळोवेळीं जाऊन आलों.  मालवण ही डॉ. भांडारकरांची मायभूमि.  त्या वेळीं तेथें इंदूरच्या समाजाचे सभासद आत्माराम सदाशिव केळकर हे राहात असत.  त्यांचे साहाय्यानें तेथील प्रार्थनासभेची मीं पुनर्घटना केली आणि अस्पृश्यांसाठीं बरींच महत्त्वाचीं अशीं कांहीं कामें केलीं.

कोल्हापूर  :  १९०९.  विलायतेला जाण्यापूर्वीपासूनच मी कोल्हापुरीं माझे मित्र गोविंदराव शासने, डॉ. कृष्णाबाई केळवकर यांचेकडे वेळोवेळीं जात होतों.  त्या वेळीं तेथील लायब्ररींत माझीं व्याख्यानें होत असत.  मी विलायतेला जाण्याच्या प्रवासखर्चाबाबत श्रीमंत शाहुमहाराजांकडून ३०० रु. ची मदत मिळाली होती.  १९०९ सालच्या उन्हाळ्यांत कोल्हापूर येथें माझें एक महत्त्वाचें व्याख्यान झालें.  त्यापूर्वी मी मुंबईस अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची स्थापना केली होती.  कोल्हापुरांत गणपत कृष्णाजी कदम, वकील, यांचें लक्ष प्रार्थनासमाजाचे कार्याकडे लागलें होतें.  प्रार्थनासमाजाचे कांहीं प्रसिद्ध पुढारी घेऊन कोल्हापुरास प्रचारकार्यासाठीं यावें म्हणून त्यांचा आग्रह पडला.  छत्रपतिमहाराजांचीही तशी इच्छा दिसली.  आर्यसमाजाला तर त्यांनीं भरपूर साहाय्य दिलेंच होतें आणि आपल्या समाजकार्यांत प्रार्थनासमाजाचाही त्यांना प्रयोग करून पाहावयाचा होता.  सिंधचे प्रसिद्ध प्रोफेसर टी. एल. वास्वानी, भक्त डॉ. रुबेन, कलकत्त्याचे प्रमथलाल सेन, मुंबईचे प्रसिद्ध प्रो. वेलिनकर या चौघांना घेऊन मी १९०९ च्या ऑक्टोबरच्या अखेरीस पुणें-सातारामार्गे कोल्हापुरास गेलों.  मराठा बोर्डिंगची इमारत गांवाबाहेर होती.  तिच्याजवळील एका स्वतंत्र बंगल्यांत सरकारी पाहुणे म्हणून आमची उतरण्याची सोय करण्यांत आली होती.  तेथील राजाराम कॉलेजांतील दिवाणखान्यांत प्रो. वास्वानी व वेलिनकर यांचीं व्याख्यानें, बाबू प्रमथलाल सेन यांची उपासना आणि माझें हरिकीर्तन वगैरे कार्यक्रम करविण्यांत आले; पण लोकमताचें सर्वांत अधिक आकर्षण डॉ. रुबेन यांच्या एकतारीनें केलें.  आम्ह पाहुणेमंडळी सरकारी गाडींतून बसून गांवांत निघालों असतां डॉ. रुबेनला एकदम स्फूर्ति येऊन त्यांनीं खालीं उतरावें आणि भर बाजारांत आपल्या एकतारींत तल्लीन व्हावें.  भोंवतालीं प्रचंड गर्दी व्हावी आणि आमच्या गाडीला वाट मिळूं नये असें वारंवार होऊं लागलें.  डॉ. रुबेनला एकटें सोडावें तर आम्हांकडे कोण येणार !  घेऊन जावें तर गर्दी वाटच सोडीना, असा वेळोवेळीं पेंच पडे.  एकंदरींत कुणीकडून तर प्रचाराचें कार्य व्हावें, म्हणून आम्ही हा पेंच मुकाट्यानें सहन करीत असूं.

कोल्हापुरांत या भेटीमुळें एक नवीन प्रार्थनासमाज सुरू करण्याची तयारी झाली आहे, असें रा. कदम यांना वाटूं लागलें.  बळवंत कृष्णाजी पिसाळ या नांवाच्या तरुण गृहस्थाला बरोबर घेऊन कदम यांनीं ह्या कामास हळूहळू सुरुवात केली. रा. सावंत, बॅ. खंडेराव बागल, डॉ. कृष्णाबाई केळवकर, रा. गोविंदराव शासने वगैरे मंडळींचें या कामास प्रोत्साहन मिळालें.

पुढें सन १९११ सालच्या मे महिन्यांत पुण्याचे रा. गणपतराव कोटकर, गणपतराव आंजर्लेकर, चि. जनाक्का व तिच्या शाळेंतील मैत्रिणी श्रीमती सीताबाई मराठे व सौ. गुलाबबाई वैद्य या मंडळींसह मी कोल्हापुरास पुन्हां गेलों. मुंबईचे बलभीमराव केसकर हे आपल्या घरांतील मंडळींसह अगोदरच तेथें जाऊन राहिले होते.  कोल्हापूरच्या समाजाचा त्या वेळीं कार्यक्रम ठरला होता व त्यांत आम्हीं भाग घेतला.  सरकारांतून योग्य ती मदत कोल्हापूर प्रार्थनासमाजास मिळाली.  याच भेटींत करवीर मठाचे जुने शंकराचार्य (डॉ. कूर्तकोटींच्या पूर्वीचे) ह्यांनीं माझें एक खास हरिकीर्तन आपल्या मठांत करविलें.  श्री. स्वतः श्रवणास हजर होते.  रिवाजाप्रमाणें त्यांनीं नारळ आणि धोतरजोडी देऊन माझी संभावना केली.  याच भेटींत रा. बागल आणि त्यांचे नातेवाईक रा. बाबासाहेब सावंत वकील यांचे घरीं कौटुंबिक उपासना झाल्या.  गांवाबाहेर एका सृष्टिसौंदर्याचे ठिकाणीं एक वनोपासना झाली.  तींत डॉ. कृष्णाबाई केळवकर यांनीं पुढाकार घेतला होता.  हा समाज पुढें कांहीं वर्षे चालून बंद पडला.  वरील रा. पिसाळ या तरुण गृहस्थानें काढलेलें 'विश्वबंधु' या  नांवाचें साप्‍ताहिक पत्र तसेंच कांहीं वर्षे चालविलें.  पोस्टल मिशनचें कामही तेच करीत होते.

स्थानिक कार्य

प्रेमळ गोतावळा  :  वर आंखलेल्या आराखड्यांप्रमाणें मीं स्थानिक कामास लागलों.  दिवसाचीं कामें आटोपल्यावर रात्रीं सभासदांच्या भेटी घेणें, रात्रीच्या शाळांची देखरेख करणें वगैरे आटोपून घरीं येण्यास रात्रीचें ११।१२ वाजत.  मुंबईसारख्या अफाट वस्तींत सभासदांचीं घरें १०।१२ मैल लांबवर पसरलेलीं असत व शाळाही दूर दूर असत, म्हणून इतका वेळ लागे.  कामांत वक्तशीरपणा राखण्यास जड जाई.   प्रथम प्रथम संघटना होणें कठीण गेलें.  समाजांत तरुणांचा उत्साह वाढत होता.  त्यांचें साहाय्य आनंदानें मिळूं लागलें; पण अनियमितपणाबद्दल कांहींजणांकडून प्रथमपासूनच टीका चालत असे; पण ती प्रेममूलक होती.  त्यामुळें ती दुःसह होत नसे.  समाजाच्या बाहेरची मंडळी मला माझ्या कामांत कितपत यश मिळेल याबद्दल साशंक नजरेनें पाहात असत, तर कांहीं कौतुकानें पाहात असत.  या भिन्न प्रवृत्तींमुळें मी माझी करमणूक करून घेत असें.  आमच्या घरची मंडळी साध्या राहाणीची व खेडवळ प्रांतांतून आलेली.  त्यांना ह्या मुंबईसारख्या नवीन नवीन ढंगांच्या समाजामध्यें आपलें बस्तान बसविण्यास प्रथम प्रथम कठीण गेलें.  प्रार्थनासमाजाच्या थोर थोर घराण्यांनीं आमची खरी स्थिति पाहून आम्हांस मोठ्या मान्यतेनें सांभाळून घेतलें.  भांडारकर, माडगांवकर, चंदावरकर वगैरे घराण्यांतील स्त्रियांनीं माझ्या वृद्ध आईशीं मिळूनमिसळून वागणूक ठेवून मुंबईचा परकेपणा व तुटकपणा भासूं दिला नाहीं.  वासुदेव बाबाजी नवरंगे, सदाशिवराव केळकर, द्वारकानाथ वैद्य, सौ. लक्ष्मीबाई रानडे वगैरे घराणीं तर आम्हांस आमच्या घराण्यासारखींच वाटत होतीं.  रा, कोरगांवकरांनीं तर प्रथमपासूनच माझ्याबद्दल फारच काळजी वाहिली.  वामनराव साहोनी व सय्यद अबदुल कादर हे तर माझ्या कामांत आजीव येऊन मिळाले.  डॉ. सुखटणकरांचा माझ्याशीं परदेशांतून कळकळीचा पत्रव्यवहार चालू असे.  डॉ. काशीबाई नवरंगे, डॉ. वैकुंठ कामत वगैरे तरुण मंडळी आमच्या घरगुती अडचणी भागविण्याला सदैव तत्पर असत.  असा हा गोतावळा भोंवतालीं जमून आल्यामुळें मुंबई शहरांतल्या राहणीच्या आर्थिक तंगीच्या वेदना सहज सह्य झाल्या.  जसजसा माझ्या कामाचा व्याप वाढूं लागला तसतसा हा गोतावळाही वाढूं लागला.

क्रांति  :  विसाव्या शतकाच्या आरंभापासून वृद्ध पिढी जाऊन नवीन पिढीनें त्यांची जागा घेतल्यामुळें प्रार्थनासमाजांत एक प्रकारची क्रांती होऊन तो वाढीला लागला.  जुन्या संस्थांचा नवीन जोम आणि नवीन संस्थांची भर ह्यामुळें चहूंकडे नवचैतन्य फुलूं लागलें.  रा. द्वारकानाथ वैद्यांनीं सुबोध-पत्रिका सांवरली, वामनराव सोहोनी यांनीं रात्रीच्या शाळा हातीं घेतल्या, कोरगांवकरांनीं जमाबंदीची काळजी केली आणि इतर नवीन नवीन तरुण स्वयंसेवक म्हणून पुढें आले.  ह्याचा परिणाम पुढें कांहीं वर्षे समाजाच्या वार्षिक उत्सवाचें वेळीं स्पष्ट दिसूं लागला.  दूरदूर राहणार्‍या सर्व कुटुंबांची स्नेहसंमेलनें घडूं लागलीं.  निरनिराळ्या दर्जांमध्यें परिचय वाढून निरनिराळ्या कुटुंबांमध्यें कौटुंबिक उपासना होऊं लागल्या.  सगळा समाज म्हणजे एक कुटुंब ही भावना रुजूं लागली.  ह्यामुळें परकीयांचें लक्षही समाजजीवनाकडे अधिक लागूं लागलें.  हितचिंतक सभासद होऊं लागले आणि सभासद कार्यवाहक होऊं लागले.  गिरिजाशंकर त्रिवेदीसारखी गुजराथी मंडळी देखील सभासद होऊं लागली.  कराचीचे डॉ. रुबेन ह्यांच्या भजनाचा लाभ वरचेवर घडूं लागला.  स्वामी स्वात्मानंदजी ह्या आर्यसमाजिस्ट प्रचारकाची जोड प्रचारकार्यामध्यें मिळूं लागली.  मणिलाल पारेखसारख्या भावनाशील भक्ताची भर पडली.  सय्यद अबदुल कादर व त्यांची बहीण हाजराबाई हीं दोन भावंडें तर जमखंडीपासूनच आमच्या घरांत नेहमींचींच असत.  केरो रावजी भोंसलें ह्या मराठा तरुणानें नुसते सभासदच होऊन न राहतां पंढरपूर येथील अनाथ आश्रमाचें चालकत्व आपणांकडे घेऊन तो बराच नांवारूपास आणला.  प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास यांचें मूक औदार्य या सर्व नवचैतन्यास पुष्टिदायक होऊन चिरस्मरणीय झालें.  डॉ. भांडारकरांसारख्या पूज्य विभूतीचा समागम मुंबईकरांस वेळोवेळीं घडून आध्यात्मिक लाभांत भर पडूं लागली.  शिवरामपंत गोखले या वृद्ध प्रचारकाचा बालबोध उपदेश बायकामुलांनाही आवडूं लागला; पण ह्या सर्व घटनेचा मध्यबिंदु प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांनीं साधला.  ते मुंबईचे एक तोलदार नागिरिक असल्यामुळें सरकारदरबारांत तसेंच प्रतिष्ठित लोकसमाजांत प्रार्थना समाजास एक अढळ भूमिका त्यांनीं मिळवून दिली.  गत पिढींतल्या एकाहून एक महानुभाव श्रेष्ठ विभूतींनीं प्रार्थनासमाजाला जें उच्च अधिष्ठान मिळवून दिलें तें अद्यापि मागें उरलेल्या दादासाहेब भांडारकरांनीं आणि नवीन मिळालेल्या चंदावरकरांनीं कायम राखिलें.


ह्या सर्वांचा एक दृश्य परिणाम समाजाच्या ३८ व्या वार्षिकोत्सवामध्यें (१९०५ मध्यें) स्पष्ट दिसून आला.  स्त्रियापुरुष, लहानथोर, तरुणवृद्ध, सभासद आणि हितचिंतक वगैरे सर्वांनींच ह्या उत्सवांत जोमानें भाग घेतला.  ह्या वर्षाचें प्रीतिभोजन फारच थाटाचें झालें.  त्यांत प्रो. गोपाळ कृष्ण गोखले, प्रिन्सिपाल रघुनाथराव परांजपे, रा. बंडोपंत भाजेकर अशा किती तरी बाहेरच्या हितचिंतकांनीं भाग घेतला.  इतकेंच नव्हे तर अस्पृश्य समाजांतील कांहीं मंडळी पंक्तीस हजर होती.  त्यामुळें थोडीशी आंतबाहेर खळबळ उडाली; पण ही नवी प्रथा लवकरच पचनीं पडून सामाजिक जीविताला भरपूरपणा आल्यावांचून राहिला नाहीं.

उपासनापद्धति  :  उपासनापद्धतींत या क्रांतिकाळांत एक महत्त्वाची भर पडली.  ती अशी :- सिंध आणि पंजाब या प्रांतांतून डॉ. रुबेन आणि लाहोराहून रामरखामलसारखी भजनाची रसिक मंडळी राममोहन आश्रमांत येऊन राहात.  तसेंच बंगालहून तरुण विद्यार्थी ब्राह्मसमाजाचे सभासद मुंबईत शिक्षणासाठीं येऊन राहात.  त्यांत प्रबोधकुमार दत्त या नांवाचे तरुण गृहस्थ कलकत्त्याकडील ब्राह्मसमाजांत प्रसिद्ध गायक होते.  या सर्वांचा आमच्या घराशीं फार निकट संबंध जडला.  त्यांच्या सहवासामुळें प्रार्थनासमाजाच्या साप्‍ताहिक उपासनेच्या पूर्वी वेदीखालीं बसून अर्धा तास भजन करण्याची प्रथा पडली.  त्यांत विशेषेंकरून सिंध प्रांतांतील हिंदी भजनें आणि बंगालमधील रवीन्द्रनाथ टागोरकृत सुंदर पदें यांचा समावेश अधिकाधिक होऊं लागला.  मुंबईसमाजांतील उपासनेच्या वेळीं ब्राह्मसंगीत म्हणण्याचे बाबतींत आमच्या सभासदांच्या भगिनीमंडळाकडून पुढाकार घेण्यांत येऊं लागला.  त्यांत द्वा. गो. वैद्य यांच्या पत्‍नी व सितारामपंत जव्हेरे यांची कन्या गुलाबबाई व त्यांची बहीण कृष्णाबाई जव्हेरे आणि विशेषतः मराठी पद्यें म्हणण्यामध्यें माझी बहीण श्रीमती जनाक्का यांचा पुढाकार असे.  प्रार्थनासमाजांत बंगाली गाण्यांचा प्रवेश सितारामपंत जव्हेरे यांच्या कालापासून आहे.  सत्येंद्रनाथ टागोर सातार्‍याला डिस्ट्रिक्ट जज्ज होते, तेव्हां सातार्‍याला एक प्रार्थनासमाज चालला होता.  सितारामपंतांच्या मुलींनीं- गुलाबबाई, कृष्णाबाई, इंदिराबाई यांनीं- तेव्हांपासून बंगाली गाणीं घेतलीं.  सितारामपंतांनीं त्यांचें मराठी भाषांतर करून प्रार्थनासंगीतांत त्यांचा समावेश केला.  आम्ही राममोहन आश्रमांत राहायला लागल्यावर प्रबोधकुमार दत्त यांचा आमच्या घरीं फार लळा पडला.  त्यांचा गळा अत्यंत मधुर असून ब्राह्मसंगीतांत त्यांचें सुंदर प्रभुत्व असे.  त्यांच्याकडून श्रीमती जनाबाईंनीं बंगाली भाषेची आणि विशेषतः संगीताची बरीच माहिती करून घेऊन आपल्या इकडील संगीतांत त्याचा प्रसार केला.

सुलभ संगीत  :  प्रार्थनासंगीताची ६ वी आवृत्ति सन १९०१ मध्यें प्रसिद्ध झाली.  तेव्हांपासून हें पुस्तक बरेंच बोजड आणि आणि किंमतीनें महाग होतें.  रात्रीच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठीं आणि बहुजनसमाजांत ब्राह्मोपासनेचा प्रसार करण्याचे कामीं संगीत पुस्तकें आटोपशीर व स्वस्त दराचीं असणें आवश्यक झालें.  म्हणून ब्राह्मो पोस्टल मिशनच्या द्वारें सुलभ संगीत या नांवाचें एक लहानसें पुस्तक प्रसिद्ध करण्यांत आलें.  या कामीं माधवराव केळकर यांनीं बरीच मदत केली.  डॉ. रुबेन यांच्या भजनामुळें सिंधप्रांतीय गाणीं इकडील मंडळींना विशेष आवडूं लागलीं.  त्यामुळें प्रेमलहरी नांवाचें एक छोटेंसें पुस्तक प्रसिद्ध केलें.  उपासनेच्या वेळचें संगीत भगिनीमंडळींनीं म्हणावें आणि उपासनेच्या पूर्वीच्या वेळचें भजन तरुणांनीं म्हणावें असा प्रघात पडूं लागला.  या बाबतींत सय्यद अबदुल कादर यांनीं पुढाकार घेतला.  त्या वेळीं त्यांची प्रथम पत्‍नी वारली असल्यामुळें त्यांच्या मनाची स्थिति विरक्त झाली होती.  'अपने हरीके मै जोगन बनी' हें पद म्हणतांना तर ते गहिंवरून जात.  ह्या सुलभ संगीत पुस्तकाची लोकप्रियता इतकी वाढली कीं, पुढें त्याच्या पांच आवृत्त्या निघाल्या आणि बहुजनसमाजांतच नव्हे तर प्रत्यक्ष प्रार्थनासमाजाचें उपासनेच्या वेळीं आतां हींच पुस्तकें उपासकांच्या हातीं बहुतेक दिसत आहेत.  आतां हें भजनाचें काम व पोस्टल मिशनचें काम प्रार्थनासमाजाचे सेक्रेटरी व राममोहन हायसकूलचे शिक्षक रा. वेलिनकर यांनीं चालविलें आहे.  पूर्वीच्या पिढींत हें भजनाचें आणि गाण्याचें काम रा. गणपतराव आंजर्लेकर हरिकीर्तनाचे आणि उपासनेचे वेळीं दादासाहेब भांडारकरांचे मागें राहून चालवीत असत.

सुट्या आठवणी

लाला लजपतराय  :   मिशन नुकतेंच सुरू झालें होतें.  सुरतेच्या काँग्रेसच्या बैठकीस (१९०७ सालीं) लाला लजपतराय आले होते.  आमच्या मिशनच्या निराश्रित सेवासदनांत माझे आईबाबा आणि घरची सर्व मंडळी राहून महारामांगांची सेवा करितात ही गोष्ट लालाजींच्या कानावर गेली.  म्हणून ते हें सदन पाहण्यास आले.  माझी वृद्ध आई समोरी गेली.  लालाजींनीं एकदम तिच्या चरणांवर मस्तक ठेवून दंडवत प्रणाम केला.  आईनें त्यांना उचलून उभें केलें आणि त्यांच्या कपाळावर हात फिरवून आपल्या शिरावर कडकडून बोटें मोडलीं.  हा कुरवाळण्याचा मराठी प्रकार पाहून लालाजींना अत्यंत आनंद झाला. It is one of the holiest thing that can be done by the religious and charitable societies of this country.
Lala Lajpatrai


सय्यद आणि शिंदे  :  कर्नाटक शाखेची घटना करीत असताना सय्यद आणि शिंदे या नांवांचा मोठा गमतीदार घोटाळा होत असे.  एके दिवशीं मध्यरात्रीं बेळगांवच्या स्टेशनवर उतरलों.  भूक लागली होती.  सबंध बाजारांत एकच चहाचें दुकान उघडें होतें.  सफरीवर असतांना आम्हां दोघांचीं नांवें वर्तमानपत्रांतून जाहीर झालीं होतीं.  आम्ही चहा घेण्यास दुकानांत गेलों असतां आम्हांस चहा देण्यास दुकानदार मागेंपुढें करूं लागला.  माझी दाढी पाहून मीच सैय्यद असावा, असा त्यास संशय आला.  सय्यदला दाढी नव्हती म्हणून त्याच्या हिंदुत्वाविषयीं संशय आला नाहीं.  हा घोंटाळा ओळखून सय्यद पुढें होऊन चहावाल्यास म्हणाले कीं, ''अहो, दाढी असली म्हणून काय झालें ?  ते हिंदु आहेत !''  पण खुद्द सय्यदविषयीं प्रश्नच निघाला नाहीं.  कांहीं आढेवेढे न घेतां आम्हांला चहा मिळाला आणि काम झालें.

पुढें धारवाड व हुबळी येथील कामें आटोपून आम्ही गदग येथें गेलों.  तेथील एका श्रीमंत व्यापार्‍यानें गांवाबाहेरील आपल्या एक मोठ्या बंगल्यांत उतरण्याची आमची सोय केली होती.  पण जेवण्याची सोय आम्हांसच करावयाची होती.  कर्नाटकांत लिंगायतांच्या मठांत पैसे घेऊन भाकरी देण्याची सोय असते.  एक दिवस तशी सोय झाली.  पण आम्ही कुणीतरी महारामांगांमध्यें काम करणारे विक्षिप्‍तराव आहोंत असें ऐकून दुसरे दिवशीं मठाधिकार्‍यांनीं भाकरी देण्याचें नाकारलें.  आमचा स्वयंपाक आम्हीच करूं लागलों.  बागेंतल्या नळावर बसून मी भांडीं घासावींत आणि सय्यदनें आंत बसून स्वयंपाक करावा अशी वांटणी झाली.  गांवांतून लहानमोठें गृहस्थ आम्हांस भेटण्यास येत.  भांडीं घांशीत बसलेला मीच सय्यद असें समजून शिंदेसाहेब कोठें आहेत असें मला विचारीत.  ''दिवाणखान्यांत बसा, भेटतील तेथें'' म्हणून मी त्यांना आंत पाठवीं.  आंत गेल्यावर सय्यदलाही तोच प्रश्न विचारीत.  ''आणून भेटवतों'' असें सांगून तो त्यांना बसवी.  थोड्यां वेळानें हात वगैरे धुऊन आम्ही त्यांना भेटावयास गेलों म्हणजे खरे शिंदे कोण व खरे सय्यद कोण हें त्यांना कळल्यावर त्यांचे हिरमुसलेले चेहरे पाहण्यासारखे होत.

म्हैसूरच्या राजवाड्यांत   :   दौर्‍यावर असतांना मोठमोठ्या राजेरजवाड्यांना समक्ष भेटायचे प्रसंग येत.  बावळटपणामुळें केव्हां केव्हां माझी फजिती उडे.  अहल्याश्रमाची कोनशिला बसवण्यासाठीं म्हैसूरच्या महाराजांना आमंत्रण करण्यास म्हैसूर येथें १९२१ सालीं गेलों होतों.  माझ्या पाहुणचाराची उत्तम सोय झाली.  पण ''महाराजांना समक्ष भेटावयाचें असल्यास पाहुण्यानें दरबारी पोषाक घातलाच पाहिजे असा म्हैसुरी रिवाज आहे'' असें प्रायव्हेट सेक्रेटरीनें सांगितलें.  हा पोषाक मजजवळ नव्हता.  अशा पाहुण्यासाठीं सरकारी पोशाक मिळतो असें सेक्रेटरीनें सांगितलें.  डोक्याला म्हैसूरी जरतारी फेटा, अंगांत लांब अंगरखा, ढिली विजार आणि कमरेला भरजरी दुपेटा हा सर्व साज नाइलाजानें अंगावर घालून मी म्हैसूरचा दरबारी अय्या बनलों.  वाड्यांत गेलों तर म्हैसूरचे महाराज आपल्या भव्य दालनांत माझी वाट पाहात उभे होते.  मी सामोरा गेलों तों मागें माझ्या दुपेट्याची टांचणी सुटून दुपेट्याचे एक दोन विळखे माझ्यामागें मारुतीच्या शेपटाप्रमाणें लोळत असलेले माझ्या ध्यानांतच आले नाहींत.  महाराजांचे हुजरे महाराजांच्या मागें उभे राहून तोंडावर हात ठेवून गालांतल्या गालांत हंसूं दाबीत असल्याचें दिसलें.  पण महाराज मात्र गंभीर उभे होते.  त्यांनीं मला आसनावर बसवलें व मग आपण जवळ बसले.  बसतांना मागें वळून पाहातों तों माझी लांब शेपटी आवरणें फार कठीण झालें.  जी धांदल उडाली ती शब्दानें सांगणें कठीण.  मी महाराजांना नम्रपणें म्हणालों कीं, ''महाराज, ही पोषाकाची उपाधि आमच्यासारख्यांच्या पाठीमागें कां असावी ?''  त्यांनाही वाईट वाटलें, आणि ते म्हणाले ''आपल्यासारख्यांना हा नियम लागूं नाहीं.  चूक झाली.''  नंतर मीं माझ्या भेटीचें कारण सांगितलें.  समारंभास युवराजांना पाठवण्याचें महाराजांनीं कबूल केलें.

ह्याच वेळीं मद्रास प्रांतांत आणि म्हैसूर प्रांतांतही बिशप व्हाइट हेड या साहेबांची अस्पृश्यांचीं गांवेंच्या गांवें त्यांना बाप्‍तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्याची, चळवळ चालली होती ही गोष्ट मीं महाराजांच्या कानावर घातली. महाराज म्हणाले, ''अशा गोष्टी सहसा आमचे कानावर येत नाहींत.  सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहें.''  मिशनची हकीकत ऐकून महाराजांनीं आनंद व्यक्त केला.  पुढल्या खेपेस मुंबईला आल्यावर आपण मिशनला अवश्य भेट देऊं असें आश्वासन दिलें आणि त्यांनीं तसें केलेंही.

धारचे महाराज  :   महाराजांना भेटण्यास मी एकदां धारला गेलों होतों.  त्यांच्या प्रा. सेक्रेटरीकडे उतरलों होतों.  महाराजांना भेटण्याचे आदले दिवशीं मला भेटायला एक गृहस्थ आले होते.  त्यांचा चेहरा दिसण्यांत बरोबर महाराजांसारखा होता.  पण मीं स्वतः महाराजांना कधींच पाहिलें नव्हतें.  आम्ही मुंबई-पुण्याकडचे लोक.  दरबारच्या चालीरीती आम्हांस माहीत नसतात म्हणून टांग्यांतून महाराजांना भेटावयास नेत असतां प्रायव्हेट सेक्रेटरीनें पुष्कळशा सूचना केल्या होत्या.  महाराज मला भेटण्याकरतां व्हरांड्यांच्या पायरीवर येऊन उभे होते.  अंगांत घरगुती साधा पोषाख होता.  राजचिन्ह कांहींच नवहतें.  महाराज आंत बसले असतील म्हणून मी भरभर पायर्‍या चढून जाऊं लागलों.  काल भेटलेले इसमच हे असें समजून मी महाराजांचे हात धरून विचारलें ''कां हो तुम्ही कसे येथें'' प्रायव्हेट सेक्रेटरीसह सगळेजण थक्क झाले.  केलेल्या सर्व सूचना व्यर्थ गेल्या.  झालेली चूक चटकन् ध्यानांत येतांच मी सांवरून म्हणालों, ''महाराज, आपण आंत असावयाचें, येथें येण्याची तसदी कां घेतली ?''  बुंदसे गयी तो हौदसे आती नहि.

गोंडलचे महाराज  :   राजकोटास असतांना मी एकदां गोंडलच्या महाराजांना भेटावयास गेलों.  माझ्याबरोबर भगिनी जनाक्काही होत्या.  ही गोष्ट सर भगवतसिंगजींना कळवली नव्हती.  आम्हांस दुरून येतांना पाहून ते चटकन् उठून आंत गेले.  ते आम्ही पाहिले, पण कां ते आम्हांस प्रथम कळेना.  इतक्यांत महाराज आपल्या पत्‍नीला व कन्येला घेऊन बाहेर आले.  त्यांनीं मोठ्या अदबीनें माझ्या बहिणीशीं ओळख करून दिली.  मोठ्या लोकांचा हा रुबाब पाहून आम्हांस फार संतोष झाला.

धेडोने माटे धेडोने माटे  :   काठेवाडांत फिरत असतां एके दिवशीं दोन प्रहरीं एका स्टेशनावर पुढील अनुभव आला.  साधारणपणें आगगाडींत पहिला, दुसरा आणि तिसरा असे वर्ग असत.  क्वचित् ठिकाणीं फक्त युरोपियनांसाठीं म्हणून खास चौथा असामान्य वर्ग असतो.  पण काठेवाडांत 'धेडोने माटे' म्हणजे 'अस्पृश्यांसाठीं' म्हणून मला एक पांचवा असामान्य वर्ग सांपडला. या वर्गांत कांहीं अस्पृश्यांची स्त्री-पुरुषमंडळी गर्दी करून बसली होती.  तिसर्‍या वर्गांत मी होतों.  वेळ भर दोन प्रहरची होती.  इतक्यांत एक पोलीस पार्टी आली.  त्यांनीं अस्पृश्यवर्गीयांना धक्के मारीत खालीं उतरवलें व त्या डब्यांत ऐसपैस पाय पसरून बसले.  धेडांना दुसरीकडे जागा मिळणें अशक्य होतें.  पोलिसापुढें त्यांचा उपाय चालेना.  मला अत्यंत चीड आली.  गार्डाकडे गेलों आणि मीं होत असलेला अन्याय ताबडतोब दूर झाला पाहिजे ''नाहीं तर मी येथल्या येथेंच वरिष्ठांस तारा करून योग्य तो उपाय केल्यास तुम्हांस जड जाईल'' असें सांगितलें.  गार्डाला मी कोण तें स्टेशनवर कळलें.  त्यानें लगेच पोलिसाला खालीं उतरवून अस्पृश्यांची सोय केली.  मला थोडें आश्चर्य वाटलें.  कारण इतर ठिकाणीं मलाच मोठी अद्दल घडली होती.  या ठिकाणीं इतक्या सहजासहजीं मला यश आलेलें पाहून शोध करूं लागलों असतां असें कळलें कीं, हा गार्ड पूर्वाश्रमींचा धेड असून हल्लीं ख्रिश्चन झाल्यानें त्याला गार्डची जागा मिळाली होती.  म्हणून त्यानें आनंदानें माझ्या तक्रारीचा बंदोबस्त केला.  

थूंगांवची परिषद  :  वरिष्ठ वर्गाच्या मोठमोठ्या परिषदा आम्हीं भरवल्या होत्या; पण अमरावती जिल्ह्यांतील थूंगांव येथें रा. गणेश आक्काजी गवई यांनीं एक महार परिषद भरवली होती.  थूंगांव हा गणेश आक्काजी गवईचा राहण्याचा गांव होता.  अकोल्याचे दादासाहेब महाजनी, हरीभाऊ परचुरे व सौ. परचुरे, उमरावतीचे काणे वकील वगैरे बडी बडी १५।२० मंडळी मोठ्या सहानुभूतीनें परिषदेस आली होती.  मी व भगिनी जनाबाई हजर होतों.  आम्ही सर्व मंडळी भर दोन प्रहरीं थूंगांवला पोंचलों.  अमरावतीहून ब्राह्मण आचारी बरोबर घेतले होते.  पण थूंगांवला पोंचल्यावर तेथील सर्व भ्रष्टाकार पाहून हे सर्व आचारी बुजले आणि पळ्या खांद्यावर ठेवून ते परत गेले.  आम्ही आंघोळीस ओढ्यावर जाऊन पाहतों तों पाणी पाय घालण्याच्यासुद्धा लायकीचें नव्हतें.  पिण्यास पाणी जेथें मिळेना तेथें खावयास अन्न मिळालें नाहीं याचें दुःख काय !  परिषदेच्या पाहुण्यांना डाळकुरमुर्‍यांवर भूक शमवावी लागली.  अर्थात् परिषद लवकर आटोपली हें निराळें सांगावयास नकोच.  यावत् तैलं ।  तावत् व्याख्यानम् ॥  संध्याकाळच्या आंतच मंडळींनीं आपापली वाट सुधारली; पण महारवाडा म्हणजे आमचें माहेरघर. गवईंच्या घरच्या मंडळींशीं आमचा दाट परिचय.  महारांचा मोठा भंडारा चालला होता.  गांवोगांवचे महार परिषदेला पुष्कळ जमा झाले होते.  गवईंच्या घरच्या मंडळींनीं पुष्कळ आग्रह करून आम्हांस ठेवून घेतलें.  खेडेगांवचा धुरळा, महारवाड्यांतला उकिरडा आणि वर्‍हाडांतला उन्हाळा.  एक का दोन आम्हांला पुष्कळ प्रेक्षणीय स्थळें पाहण्यास मिळाली.  

दुसरे दिवशीं तिसरे प्रहरीं आम्ही परत निघालों.  मुख्य अनुभव पुढेंच येणार होता.  वर्‍हाडचे छकडे नमुनेदार.  गाडी हांकणारा दांडीवर बसला कीं मागे जेमतेम एकाच माणसाला जागा उरावयाची.  आम्ही दोघे कसेबसे बसलों.  दोन बैल चांगले पोसलेले दणगट होते.  नाकांत वेसणी नव्हत्या.  थूंगांवाहून अमरावती १६ मैल.  मधोमध आठ मैलांवर आल्यावर गाडीचा कणा मोडला.  चाक एकीकडे, बैल एकीकडे व बसणार दुसरीकडे असा प्रकार झाला.  मोडक्या गाडीला बैल बांधून दुसरी गाडी आणण्यासाठीं गाडीवान थूंगांवला गेला.  गाडीची एक चाकाची धांव निखळून पडली होती.  बाळपणची आठवण होऊन ती मी धांव घेऊन चाकासारखी फिरवूं लागलों. धांव बैलाच्या अंगावर गेल्यावर तोहि उधळून थूंगांवला गेला.  रात्रीचा अंधार होऊं लागला.  बर्‍याच वेळानें थूंगांवचे लोक दुसरी गाडी घेऊन आले.  आम्हांला परत थूंगांवला जाऊन जादा पाहुणचार घ्यावा लागला.

मालाडचा लांडगा  :  राजवाडे, महारवाडे ह्यांतच माझे अनुभव संपत नाहींत.  खालील प्राण्यांचेही अनुभव आहेतच. भंगिनी जनाबाई मालाड येथील दयाराम गिडुमल यांनीं निराश्रित स्त्रियांसाठीं काढलेल्या आश्रमांत कांहीं दिवस सुपरिंटेंडेंट होत्या.  हा आश्रम अगदीं जंगलांत होता.  आजूबाजूस मैलभर मनुष्यवस्ती नव्हती.  रखवालदार पुरभैय्याही बाहेर राहण्यास धजत नव्हता.  श्वापदांच्या आरोळ्यांनीं त्याला झोंप लागत नवहती.  अशा वेळीं एका रात्रीं एक भयंकर लांडगा आश्रमाच्या दाराशीं येऊन उभा राहिला.  भय्याची गाळण उडाली.  तो आंत येण्यास गयावया करूं लागला.  त्याच्यासाठीं दार उघडावें तर भय्या आधीं कीं लांडगा आधीं हा प्रश्न उभा राहून आंतील स्त्रिया भीतीनें दार उघडीनात.  त्या मोठमोठ्यानें किंचाळूं लागल्या.  त्या आवाजानेंच लांडगा निघून गेला, आणि जिवावरचा प्रसंग निभावला.  दुसरे दिवशीं दयारामभाईंना निराळी व्यवस्था करणें भाग पडलें.

भोकरवाडींतील गाढवी  :  एका लोणार्‍याच्या गाढवीला पाठीस लाळ पडून अहल्याश्रमाच्या विस्तीर्ण पटांगणांत निचेष्ट येऊन ती पडली.  आश्रमाच्या दवाखान्यांतन तिची शुश्रूषा चालली.  बर्‍याच दिवसांनीं ती बरी झाल्यावर लोणारी तीस परत नेण्यास आला.  गाढवी पूण्र बरी झाली नव्हती व तशांत गाभण असल्यानें ती विण्याचे दिवस जवळ आले होते.  आमच्या मॅटर्निटी होममध्यें तिची दुसरी शुश्रूषा चालली.  तिला एक सुंदर पिलूं झालें.  थोड्यां दिवसांनीं तें उडूं-बागडूं लागल्यावर परिचयामुळें गाढवी माझ्याभोंवतीं फिरूं लागली.  मोठ्या कष्टानें तिची माहेरांतून पाठवणी करावी लागली.

बंड्यां माकड  :  आमचे बंधु एकनाथराव यांच्या एशियाटिक पेट्रोलियम् कंपनीमधील एक अत्यंत खोडकर माकड सर्व नोकरवर्गांस प्रिय झालें होतें.  अनेक चेष्टा करून तें एका प्राणांतिक प्रसंगांतून वांचलें होतें.  एकदां तर तें तेलाच्या टाकींत पडल्यामुळें त्याला मुष्किलीनें वांचवण्यांत आलें.  साहेबलोकांनीं त्याला गोळी घालण्याचा प्रयत्‍न केला होता.  शेवटीं त्याला आमच्या बंधूंनीं घरीं आणून ठेवलें.  तेथेंही त्यानें पुष्कळ प्रताप गाजवले.  शेवटीं तें 'अहल्याश्रमांत' आणण्यांत आलें.  बायकामुलांस त्याचा फार उपद्रव होत असे, पण तें माझ्या संवयीचें होतें.  इतरांच्या खोड्यां करी; पण मी गेलों कीं माणसासारखा सलाम करी.  हिंवाळ्यांत त्याल उबदार पोषाख केला.  पण दुसर्‍या दिवशीं फाडून तो बरगड्यां खाजवीत बसलेलें आढळायचें.  एके दिवशीं तें सुटून पळालें आणि शेजारच्या ख्रिश्चन व ज्यू लोकांच्या घरीं त्यानें मोठा धुमाकूळ माजवला.  मी गेलों तरी हुलकावण्या दाखवून पार होई.  कंटाळून मी घरीं घेऊन बसलों असतां आपण होऊनच माझ्या टेबलावर मला सलाम करीत आला.  जणूं कांहीं झालेला प्रकार त्याला ठाऊकच नाहीं.  शेवटीं ही ब्याद दुसर्‍याला देऊन टाकावी लागली.

मुडबीक्षिचा डॉ. ह्यूम  :   मिशनच्या सुरुवातीला एका ख्रिश्चन इसमास शिक्षकाची नोकरी देण्यांत आली होती.  तो अमेरिकन मिशनमधून आला होता.  लगेच मिशनचे प्रमुख साहेब डॉ. ह्यूम ही तक्रार घेऊन मला भेटण्याला राममोहन आश्रमांत (मुंबईस) आले आणि हुज्जत घालूं लागले कीं, आम्ही ख्रिश्चन लोकांस फूस लावून आमच्या धर्मांत घेतों.  मीं सांगितलें, ''साहेब, त्याच्या अर्जावरून त्याला आम्हीं फक्त शिक्षकाची नोकरी दिली आहे.  त्याचा ख्रिस्ती धर्म अद्यापि कायम आहे.  डॉ. ह्यूम साहेब, आजवर हजारों हिंदु लोकांस तुम्ही ख्रिस्ती केलेंत.  आमच्याकडून कोणी तक्रार घेऊन आलें काय ?  मग आज एकासाठीं विनाकारण इतकी तळमळ कां ?  तो येण्यास तयार असल्यास त्याला तुम्ही खुशाल परत घेऊन जा !''  डॉक्टरसाहेबांची समजूत पटेना.  ''ही तुमची सुरुवात आहे.  मला वेळींच बंदोबस्त केला पाहिजे.  मी अमेरिकन वर्तमानपत्रांत तुमच्या उलट लिहून तिकडून तुम्हांला जी मदत मिळत असते ती बंद करवीन.''  मला हंसूं आवरेना.  ''साहेब, एवढें तुम्ही अवश्य करा.  माझ्या मिशनची अमेरिकेंत फुकट जाहिरात होऊन आजवर नसलेली मदत उलट मिळूं लागेल.''  साहेब निरुत्तर होऊन निघून गेले !

ना. आगाखान  :   ना. आगाखान हा 'कलंकी अवतार' आहे असें सांगून महारमांगांना मुसलमान करण्याची मागें एकदां हूल उठली होती.  भोकरवाडींतील कांहीं मांग कुटुंबांनीं मुसलमानी धर्म स्वीकारला होता अशी अफवा उठली होती.  त्या वेळीं पुणें शहरांत रा. माटे यांची चळवळ चालू होती.  कांहीं जाहीर सभाही धर्मांतर होऊं नये म्हणून झाल्या.  पण पैसे घेऊन धर्मांतर केलेले पुन्हां हिंदु धर्मांत येऊन दाखल झाले.

साहित्यसेवा

आतांपर्यंत मीं माझ्या क्रियात्मक सेवेच्या आठवणी दिल्या.  साहित्यसेवेविषयीं कांहीं उल्लेख न केल्यास या ग्रंथास अपूर्णत्व येईल म्हणून या प्रकरणीं त्याचा संक्षेपानें उल्लेख करणें भाग आहे.  माझें सर्व आयुष्य परिश्रमाचें काम करण्यांत गेल्यामुळें मोठमोठे ग्रंथ तयार करण्याकडे मला वेळच मिळाला नाहीं.  तथापि प्रवासवर्णनें, इतिहाससंशोधन, तत्त्वविवेचन, धर्मोपदेश वगैरे विषयांवर माझीं जीं व्याख्यानें झालीं तीं समग्र लिहून काढून तत्कालीन वर्तमानपत्रांतून आणि मासिक पत्रांतून प्रसिद्ध करण्यांत आलीं आहेत.  ह्याशिवाय निरनिराळ्या परिषदांत आणि अध्यक्षपदावरून केलेलीं विस्तृत भाषणें वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होऊन शिवाय पुस्तकरूपानें छापण्यांत आलीं आहेत.  विलायतेंतील प्रवास, हिंदुस्थानांतील प्रवचनें आणि व्याख्यानें हीं सर्व एकत्र करून माझे मित्र रा. बी. बी. केसकर यांनीं स्वतंत्रपणें पुस्तकरूपानें छापलीं.  तीं पुस्तकें इंदुप्रकाशकारांनीं आपल्या वर्गणीदारांस १९३२ सालीं मोफत वांटलीं.

मराठा विद्यार्थी भ्रातृमंडळ पुणें, ह्या मंडळापुढें ''सुशिक्षित मराठ्यांचीं कर्तव्यें'' ह्या विषयावर माझें विस्तृत व्याख्यान झालें.  तें इंदुप्रकाशांत, जून १९१४ स ता. २३ ते २६ अखेर प्रसिद्ध झालें आहे.  त्यांत दिलेली आंकडेवारी आणि केलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत.  स्वतंत्र पुस्तकरूपानेंही हें व्याख्यान प्रसिद्ध झालें आहे.

मी तरुण असतांना ललितवाङ्‌मय लिहिण्याच्या विचारांत होतों.  एका सामाजिक कादंबरीची योजनाही मीं करून ठेवली होती.  पण कार्यबाहुल्यामुळें वेळ मिळाला नाहीं.  माझ आवडीचा विषय इतिहास.  त्यावर मात्र मीं वेळोवेळीं व्याख्यानें दिलीं आहेत.

१९२३ सालीं डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या कामांतून मी निवृत्त झालों.  त्यानंतर माझ्या साहित्यसेवेच्या इच्छेनें उचल खाल्ली.  हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे आर्यांचा इतिहास.  आर्यांच्या आगमनापासून हिंदुस्थानच्या इतिहासास सुरुवात झाली वगैरे वगैरे भ्रामक कल्पना जाड्यां जाड्यां विद्वानांमध्येंसुद्धां अजूनही दिसतात.  आर्यांच्या पूर्वीही हिंदुस्थानांत द्राविड आले.  ते पश्चिमेकडून आले.  त्यांच्याही पूर्वी हिंदुस्थानांत मोगल (कोल = कोळी वगैरे) आले.  हिंदुस्थानभर त्यांनीं वस्ती केली.  त्या विषयावर निरपेक्ष रीतीनें संशोधन करण्याची जरुरी आहे असें वाटल्यावरून आर्य-द्राविड वाद ह्या विषयावर १९२५ सालच्या सुमारास, नाशिक, कोल्हापूर वगैरे ठिकाणीं जाहीर व्याख्यानें दिली.  तीं विषयाच्या नाविन्यतेमुळें, सामान्य जनांस रुचत नसत.  ता. २१ जाने. १९२५ च्या Indian Daily Mail ह्या इंग्रजी दैनिकांत व त्याच सुमारास Indian Social Reformer मध्यें व मद्रासच्या  ह्या इंग्रजी दैनिकांत ह्या विषयावरील माझे संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

माझ्या मिशनच्या कामानिमित्त आखिल भारतांतून अनेक वेळां फिरतीवर असतां ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळें मी मुद्दाम जाऊन पाहात असें.  ओरिसांतील अत्यंत सुंदर भुवनेश्वरीचें देऊळ आणि खंडगिरी व उदयगिरी ह्या डोंगरांवरील जैन लेणीं पाहिलीं आणि खारवेल राजाचा इतिहासप्रसिद्ध शिलालेख वाचून पाहिला.  दक्षिणेंस कृष्णेच्या मुखाजवळील अमरावती येथील बुद्धावशेष, कर्नोल-कडप्पा येथील ऐतिहासिक स्थळें, हंपी विरूपाक्षाचें देऊळ, व्यंकटाचल पर्वतावरील तिरुपतीचें वैष्णवमंदिर, दक्षिण कानडांतील मूडबिद्री आणि कारकळ येथील जैनमंदिरें, उत्तरेकडील गिरनार पर्वतांतील देवालयें, अबूचे पहाडावरील दिलवारामंदिर, मांडू येथील प्रेक्षणीय स्थळें, आग्रा, दिल्ली, मथुरा, अमृतसर येथील इतिहासप्रसिद्ध स्थळें वगैरे अनेक स्थळें पाहून त्यासंबंधींची माहिती वर्तमानपत्रांत लिहून ठेवली आहे.

जयराम पिंडये नांवाच्या कवीनें केलेल्या 'राधामाधवविलासचंपू' नांवाचें काव्य म्हणजे शहाजीराजे यांची प्रशस्ति शोधून काढण्याचें श्रेय प्रसिद्ध इतिहासकार राजवाडे यांनीं मिळवलें आहे.  मूळ चंपू ७६ पानांचा व त्यावर प्रस्तावना २०० पानांची राजवाड्यांनीं लिहली आहे.  शहाजीमहाराजांची प्रशस्ति उजेडांत आणतांना मराठे जातीच्या सामान्य जनांवर बेजबाबदार टीका करून त्यांच्या नांवाला काळोखी लावण्याचा केलेला प्रयत्‍न पाहून मला चीड आली.  म्हणून ह्या प्रस्तावनेवर चार टीकात्मक लेख १९२३ सालच्या 'विजयी-मराठा' पत्रांत आले आहेत.  ह्याच प्रस्तावनेंत राजवाड्यांनीं जैन-लिंगायतांशीं भांडकुदळपणा केला आहे.  म्हणून टीकात्मक लेखांची भाषा फार कडक झाली आहे.

पुणेरी पेशव्यांची कामगिरी  :   'केसरी' कारांनीं प्रो. जदुनाथ सरकारांची भेट घेऊन त्यांचे मराठ्यांच्या इतिहासासंबंधीं विचार प्रसिद्ध करण्याचा प्रयत्‍न ता. ४ नोव्हें.१९२४ च्या 'केसरींत' केला आहे.  त्यांत जदुनाथ सरकार म्हणतात - (१) सातारच्या १ ल्या शाहू महाराजांच्या अंगांत राज्य चालविण्याची धमक नव्हती.  (२) साम्राज्याची कल्पना त्यांच्या डोक्यांत पेशव्यांनींच भरून दिली.  त्यांनींच (पेशव्यांनीं) मराठ्यांना साम्राज्य व संपत्ति मिळवून दिली वगैरे.  ह्यावर विजयी मराठ्यांत मीं तीन टीकात्मक लेख लिहिले.  ते अनुक्रमें ता. १,८, १५ डिसें. १९२६ च्या अंकांत प्रसिद्ध झाले आहेत.

कानडी-मराठी संबंध  :   रा. रा. भि. जोशी यांनीं 'नवीन मराठी भाषेची घटना' हें पुस्तक प्रसिद्ध केलें.  त्याची पुरवणी म्हणून 'कानडी-मराठीचा परस्पर संबंध' म्हणून माझा लेख प्रसिद्ध केला आहे.  तोच लेख केसरीनें ता. ३० ऑक्टो., २० नाव्हें., ४ डिसें. आणि १४ डिसें. १९२३ रोजीं अनुक्रमें चार अंकांत प्रसिद्ध केला आहे.

जुलै १९२६ च्या 'विविध ज्ञानविस्तार' च्या अंकांतील पान ८९ वर माझा 'कोंकणी व मराठी याचां परस्पर संबंध' हा लेख प्रसिद्ध झाला आहे.  त्यांत कोंकणी ही मराठीचीच एक उपभाषा आहे असें सांगण्याचा मीं प्रयत्‍न केला आहे.  ऑक्सफर्ड येथें असतांना मीं तौलनिक भाषाशास्त्र, तौलनिक मानववंशशास्त्र, तौलनिक धर्मशास्त्र ह्या शास्त्रांचें ऐतिहासिकदृष्ट्या अध्ययन केलें होतें.  कोंकणी आणि कानडी याप्रमाणेंच बंगाली, उरिया, हिंदी, सिंधी, गुजराथी इत्यादि भाषांचा मराठीशीं परस्पर संबंध काय आहे हें मी लेख, तौलनिक व्याकरणशास्त्र यांच्या दृष्टीनें लिहिणार होतों.  पण वेळ मिळाला नाहीं.  परंतु मराठी भाषेचा प्रवास कसा झाला याविषयीं केसरींत एक लेख लिहिला आहे व त्यांत मीं म्हटलें आहे, ''१९२३ नंतर बंगाल, ओरिसा, तेलंगण आणि दक्षिण कोंकण ऊर्फ केरळ या चार प्रांतांतून गेल्या दोन वर्षांत मला प्रवास करावा लागला.  त्यावरून हल्लींची मराठी ही 'महाराष्ट्री' असें  नांव असलेल्या एका प्राचीन प्राकृतांतूनच आलेली नसून ती मगध देशांतून पश्चिम बंगाल, ओरिसा, तेलंगण, वर्‍हाड आणि १००० वर्षांपूर्वीचा उत्तर कर्नाटक (कृष्ण व गोदावरी ह्यांमधील भाग) ह्या प्रांतांतून प्रवास करीत असलेली एक भाषा असावी असा माझा पूर्ण ग्रह बनत चालला आहे.  इतकेंच नव्हे, तर अशा अर्धवट बनलेल्या स्थितींतच ही प्रगमनशील सुमारें १०००-१२०० वर्षांत उत्तर कोंकण ऊर्फ अपरांत या प्रांतीं आणि तेथून दक्षिण कोंकण ऊर्फ केरळ या प्रांतांत उतरली आणि त्या दोन्ही प्रांतांत हल्लीं मालवणी, कोंकणी, गोव्हनी या नांवांनीं ती रूढ आहे.''

तौलानिक भाषाशास्त्राचा अभ्यास करीत असतां मला शब्दांच्या व्युत्पत्तिशास्त्राचाही नाद लागला.  १९३१ सालच्या सुमारास 'महाराष्ट्र शब्दकोशाचें' काम चाललें असतां, प्रत्येक शब्दची व्युत्पत्ति कसून नीट लावली पाहिजे व त्यासाठीं निदान आर्येतर एक तरी भाषा जाणणार्‍या विद्वानांची एक कमिटी नेमावी अशी सूचना मीं कोशकारांना केली.  त्याप्रमाणें प्रि. राजवाडे, रा. मोडकशास्त्री, रा. कुलकर्णी वगैरेंची एक कमिटी दर आठवड्यांतून एकदां शब्दकोशकचेरींत भरत असे.  मीही त्या कमिटीवर होतों.  

१९२९ सालच्या डिसेंबर महिन्यांत बडोद्याच्या सहविचारिणी सभेनें मला 'तौलनिक शास्त्रावर' व्याख्यान देण्यासाठीं खास आमंत्रण केलें.  'तौलनिक भाषाशास्त्राच्या अध्ययनाची आवश्यकता' ह्या विषयावर जयसिंगराव स्टेट लायब्ररी, बडोदें येथें ता. २९ डिसेंबर १९२९ रोजीं रविवारीं सायंकाळीं ६ वाजतां माझें व्याख्यान झालें.  बडोदा म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष रा. सुधाळकर हे अध्यक्षस्थानीं होते.  ह्यानंतर मी अहमदाबादेस गेल्यावर येथें एक व्युत्पत्तिशास्त्रावर माझें व्याख्यान झालें.  तेथील प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ अध्यक्षस्थानीं होते.  पुण्यांतील शब्दकोशाची आणि व्युत्पत्तिकमिटीची हकीकत मीं सांगितली आणि तिच्याशीं सहकार्य करण्यासाठीं अहमदाबादेंतील विद्वान् लोकांनीं तशीच एक कमिटी नेमावी अशी सूचना केली.  ती मंडळींनीं मान्य केली.

भागवतधर्माचा विकास  :   हिंदुस्थानचा पूर्वापार विस्तृत इतिहास लिहिण्याचा माझा मानस पूर्वीपासूनच होता.  पण कार्यव्यापृतत्वामुळें हें काम केवळ मला अशक्य होतें; पण हिंदुस्थानांतील धर्मांचा इतिहास तरी लिहावा असा विचार वरचेवर मनांत येऊं लागला.  म्हणून तो इतिहास लिहिण्याचें हातीं घेण्यापूर्वी त्याची एक विस्तृत प्रस्तावना तरी लिहावी आणि तिच्यावरून मग धर्माचा इतिहास हा मूळग्रंथ लिहिण्याचें ठरवावें म्हणून १९२५ सालीं मी भागवतधर्माचा इतिहास ह्या विषयावर पांच संशोधक व्याख्यानें लिहून काढलीं आणि तीं व्याख्यानरूपानें लोकांपुढें ठेवलीं.  पहिलें व्याख्यान पुणें येथें ता. १७ जुलै १९२५ रोजीं झालें.  त्यांत भागवतधर्माची व्याख्या, श्रद्धा व भक्ति ह्या दोन तत्त्वांत आहे असें ठरवून ह्या धर्माचा आणि वैदिक धर्माचा फारसा संबंध नाहीं असें ठरवलें.  ह्या धर्माचें अतिप्राचीन स्वरूप वेदादींच्याहीपेक्षां अतिप्राचीन आहे असें मीं दाखवलें.  अर्थात् ह्या धर्माचें प्राचीन स्वरूप आतांप्रमाणें नव्हतें.  तें फार अविकसित स्थितींत होतें.  वैदिक धर्म म्हणजे अविचार (जादू-टोणाधर्म) धर्म.  त्याचा श्रद्धा व भक्तीशीं संबंध येत नाहीं.  वैदिक धर्म म्हणजे भौतिक धर्म व भागवत धर्म म्हणजे नैतिक धर्म असा मुळांतच फरक आहे वगैरे विचार मीं पहिल्या व्याख्यानांत मांडले.

पांच भागवत  :   दुसरें व्याख्यान पुणें प्रा. स. मंदिरांत २४ जुलै १९२५ ला झालें.  त्यांत भागवत शब्दाचा इतिहास सांगितला.  भग शब्दापासून भागवत शब्द झालेला आहे.  भाग्य ह्या शब्दामध्येंसुद्धां भग हा शब्द आहे.  भाग्य या शब्दाचा अर्थ संतति, संपत्ति, ऐश्वर्य असा आहे.  भाग्य देणारा तो भगवान् व त्याची उपासना म्हणजे भागवतधम्र.  हा भगवान् म्हणजे ईश्वर असें नव्हे.  ईश्वर हा अर्थ मागाहून प्रचारांत आला.  एखादी मोठी नैतिक विभूति असा भगवान् या शब्दाचा अर्थ ईश्वरवाद निर्माण होण्यापूर्वी होता.  ह्या पूर्वीच्या अर्थानें देवीभागवत, शिवभागवत, बौद्धभागवत, जैनभागवत आणि विष्णुभागवत असे भागवताचे पांच प्रकार होते.  देवीभागवत म्हणजे देवीचे ऊर्फ शक्तीचे उपासक म्हणजे शाक्त होते.  देवीभागवतांतील 'भग' ह्या शब्दाची व्युत्पत्ति इतर भागवतांतील 'भग' या शब्दाच्या व्यत्पत्तीपेक्षां अगदीं निराळी आहे.  'भग' म्हणजे योनि.  स्त्रीचें जननेंद्रिय.  योनि म्हणजे एक मोठी शक्ति आहे अशी प्राचीन कल्पना.  ही प्रभावी शक्ति म्हणजे देवी.  तिची उपासना करणें म्हणजे शाक्त धर्म.  देवीचा उल्लेख वेदांमध्यें फार ओझरता आहे.  रात्री, दुर्गा, वगैरे नांवें वेदांमध्यें ह्या शक्तीचीं आढळतात.  ह्या देवीला अनुरूप 'शिव' म्हणून दुसरी एक देवता प्राचीन कालीं विशेषतः द्राविडांमध्यें होती.  'शिस्न' देव या नांवानें या देवाचा वेदांत उल्लेख आहे.  याचा आर्यांना मोठा तिटकारा असे.  मोहेंजोदारो आणि हरप्पा या सिंध आणि पंजाब प्रांतीं हल्लीं जें मोठ्या प्रमाणावर पुराणवस्तुसंशोधन झालें आहे त्यांत शिस्नाच्या (पुरुष जननेंद्रियाच्या) मातीच्या आकृति पुष्कळ सांपडल्या आहेत.  ह्या शिस्नांकृति वस्तूंची फार मोठ्या प्रमाणावर पूजा होत असे.  अद्यापिही हिंदुधर्माप्रमाणें शिवाची म्हणून जी पूजा होते ती पिंडीच्या रूपानें होते.  ही पिंढी म्हणजे 'भगा' मध्यें लिंग प्रविष्ट झालेलें दृश्य स्वरूप होय.  ह्याशिवाय शिवाची पूजा अन्य रितीनें होत नाहीं.  'भग' ह्या शब्दाची दुसरी व्युत्पत्ति 'बोगू' म्हणजे भाग्य देणारा देव असा असून या अर्थाचा शब्द स्लाव्ह (रशियन) भाषेंत आहे, असें प्रो. मॅक्यमुल्लरचें मत आहे.  सिद्धार्थ बौद्ध आणि महावीर जैन यांना त्यांचे अनुयायी भगवान् म्हणत असत; तरी त्या दोन्ही धर्मांमध्यें ईश्वरवाद नाहीं.  वेदांमध्यें 'विष्णु' म्हणून एक लहानशी देवता होती.  वासुदेव कृष्णानें हा विष्णुधर्म प्रचारांत आणला; त्याचा ईश्वरवादांत अविकास झाला.  श्वेताश्वतर उपनिषदामध्यें शैव-ईश्वरवादाचा आणि भगवद्‍गीतेमध्यें वैष्णव ईश्वरवादाचा विकास आढळतो.  पण ह्या दोन्ही उपनिषदांच्या पूर्वी सिद्धार्थ आणि महावीर ह्या मानवी विभूतींनीं आपापल्या धर्माचा प्रसार केला !  वगैरे विचार मीं दुसर्‍या व्याख्यानांत मांडले.

तिसरें व्याख्यान २८ जुलै १९२५ रोजीं पुणें प्रार्थनासमाजांत झालें.  वर निर्दिष्ट केलेल्या पांच भागवतधर्मांचा प्रसार आणि अवनति कशी झाली हें मीं तिसर्‍या व्याख्यानांत सांगितलें.  मंदिरें, मूर्ति, यात्रा, पुराणें वगैरे साधनांच्या द्वारें प्रसार होतां होतां त्याची अवनति झाली.  धर्म म्हणजे मोक्षाकरितां आहे हें खरें असूनही त्याचा प्रचार करणार्‍यांनीं आपला धंदा बनवल्यामुळें जनतेंत अंधश्रद्धा माजून धर्माला विकृत स्वरूप प्राप्‍त झालें.  हें विकृत स्वरूप देवीभागवत आणि शिवभागवतांतच नव्हे, तर बौद्ध आणि जैन धर्मांतूनही प्रगट झालें.  मंदिरें व मूर्ति ह्या तर जैनांनींच प्रथम प्रचारांत आणल्या.  शैवांनीं व शाक्तांनीं आणि पुढें वैष्णवांनीं त्यांचें अनुकरण केलें.  त्यामुळें सर्वांचाच बिघाड झाला.  वेदांमध्यें मूर्तिपूजेला बिलकूल वाव नव्हता.  तथापि प्राचीन आर्यांमध्यें व द्राविडांमध्यें शिल्पशास्त्राचा व वास्तुशास्त्राचा प्रचार बराच होता.  ॠभू नांवाच्या ब्राह्मण रथकारांना तर वेदकालीं अगदीं देवासारखा मान होता.  त्यांनीं इंद्रास दोन पिवळ्या रंगाचे घोडे आणि अश्विनीकुमारांस एक हलकासा पृथ्वीभोंवतीं फिरणारा रथ करून दिला.  ते मोठे कारागीर होते.  उद्यानें, विमानें, यंत्र, किल्ले, विहिरी, कवच, आयुधें वगैरे करण्यांत ते फार पटाईत असत.  (विश्वंभर वास्तुशास्त्र)

विश्वब्राह्मणाचा इतिहास नांवाच्या बाळशास्त्री क्षीरसागर ह्यांनीं लिहिलेल्या ग्रंथांत ह्यांविषयीं बरीच मनोरंजक माहिती आहे.  ह्या ब्राह्मणांनीं धर्माला लौकिक स्वरूप आणून दिलें आणि त्यामुळें ज्ञान, भक्ति, कर्म, वैष्णव वगैरे धर्मांचीं मोक्षदायक मूलतत्त्वें मागें पडून, ब्राह्मक्रियेची बजबजपुरी वाढली.  ह्यांतच मंत्र आणि तंत्राची भर पडली.  मंत्रानें धर्माचरणावर संक्षेप बसला व धर्माला गूढ स्वरूप प्राप्‍त झालें.  जेथें मंत्र सांगण्याची अक्कल सांगणार्‍यांमध्यें व ऐकणार्‍यांमध्ये उरली नाहीं तेथें तंत्र निघाले.  तंत्र म्हणजे कांहीं तरी भ्रम उत्पन्न करणारे बाह्य उपचार.  

दैवाधीनं जगत् सर्वं मंत्राधीनं तु दैवतम् ।
तन्मंत्रं ब्राह्मणाधीनें ब्राह्मणो मम दैवतम् ॥
भूतानां प्राणिनः श्रेष्ठाः प्राणिनां बुद्धिजीविनः ।
बुद्धिमत्सुवराः श्रेष्ठाः नरेषु ब्राह्मणाः स्मृताः ॥
मनुस्मृति १-९६

मांत्रिकाची आणि मूर्तिकारांची दुकानदारी, तांत्रिकांचा वाममार्ग, पुराणांनीं केलेला इतिहासाचा विपर्यास ह्या सर्वांचा परिणाम घडून हिंदुस्थानांतील धर्म म्हणजे एक विचित्र मायपोट होऊन बसलें.  बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून गेला.  जैनधर्माची प्रगति खुंटली. बाकी उरलेल्या वैष्णव, शाक्त आणि शेष ह्या सर्वच पंथांची अवनति झाली.

चवथें व्याख्यान प्रार्थनासमाजांत १८ जुलै १९२५ रोजीं झालें.  त्यांत हिंदुधर्माचें पुनरुज्जीवन व सुधारणा झाली.  ती महाराष्ट्र भागवत धर्मानें म्हणजे पंढरपूरच्या वारकरी संप्रदायानें कशी केली हें मीं सांगितलें.  ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत वारकर्‍यांनीं हिंदु धर्म चोखाळला व तो लोकसत्तात्मक केला हें मीं विशद करून सांगितलें.

पांचवें व्याख्यान प्रार्थनासमाजांत ३१ ऑगस्ट १९२५ रोजीं झालें.  त्यांत दक्षिणेकडील लिंगायत धर्म, उत्तरेकडील शीखधर्म आणि पूर्वेकडील चैतन्यांचा वैष्णवधर्म ह्यांनीं हिंदुधर्माची सुधारणा कशी केली हें सांगितलें.  ह्यानंतर युगांतर झालें.  पाश्चात्य सुधारणेचा हिंदुस्थानांत प्रवेश झाला.  ब्राह्म आणि प्रार्थनासमाज, आर्यसमाज, थिऑसफी, विवेकानंदांचें रामकृष्ण मिशन वगैरेंचे हिंदुधर्माची उजळणी करण्याचे प्रयत्‍न महशूरच आहेत.  त्यांचे प्रयत्‍न अद्यापि चालू असल्यामुळें त्यांचा परामर्श मीं माझ्या व्याख्यानांत घेतला नाहीं.

मराठ्यांची पूर्वपीठिका  :   तौलानिक भाषाशास्त्रांप्रमाणेंच तौलनिक मानववंशशास्त्राचेंही मी अध्ययन केलें होतें.  मराठ्यांची पूर्वपीठिका या विषयावर 'रत्‍नाकर' मासिकांत मीं एकंदर तीन लेख प्रसिद्ध केले.  पहिला लेख मार्च १९२९ च्या अंकांत व दुसरा मे १९२९ च्या अंकांत आला.  त्यानंतर १९३० सालच्या चळवळींत पडून मी कारावासांत गेल्यामुळें तिसरा लेख मे १९३१ च्या 'रत्‍नाकारांत' प्रसिद्ध झाला.  मराठ्यांची पूर्वपीठिका हा लेख लिहिण्याचा उद्देश मीं मराठा असून जातिनिष्ठेमुळें लिहिला असें मुळींच नाहीं.  मराठा नांवाचे लोक हिंदुस्थानांतील अनेक जातींपैकीं एक जात नसून ते एक राष्ट्र आहेत आणि एक प्रसिद्ध मानववंशहि आहेत अशी माझी समजूत आहे.  परस्परांमध्यें अन्नव्यवहार न करणें हें एक जातीचें मुख्य लक्षण आहे.  हें लक्षण मराठ्याला मुळींच लागू पडत नाहीं.  अस्पृश्यवर्ग सोडल्यास इतर कोणाहि हिंदुधर्मीयांशीं अन्नव्यवहार करण्यांत मराठे म्हणवणारे फारशी हरकत घेत नाहींत.  पण इतर जाती आपसांत बेटीव्यवहार करण्याला मुळींच हरकत घेत नाहींत.  तर मराठे लोक केवळ मराठा म्हणूनच एखाद्याला मुलगी देण्यास किंवा घेण्यास कबूल नसतात.  ते ह्या बाबतींत कुळी ऊर्फ गोत्र, खानदानी, देवक, पदर (पूर्वीचे संबंध किंवा नातें) वगैरे गोष्टी पाहतात.  अशा दृष्टीनें हा वर्ग वैशिष्टयपूर्ण आहे.  इतकेंच नव्हे तर ह्यानेंच महारामांगांच्यानंतर प्राचीन आणि मध्ययुगीन काळांत महाराष्ट्र देशाची वसाहत केली.  जमिनीचे हेच मालक आणि वाहक आहेत.  अशा स्थूल आणि तिर्‍हाईत दृष्टीनेंच मीं ह्यांच्या पूर्वपीठिकेचा विचार केला आहे.  पहिल्या लेखांत भाषाशास्त्राच्या दृष्टीनें ह्यांच्या नांवाचा मीं सांगोपांग विचार केला आहे.  रट्ट हें पाली नांव.  (शब्द) राज आणि रथ ह्या तीन निरनिराळ्या शब्दांशीं मराठा ह्या नांवाचा संबंध येतो.  ह्या संबंधाचा विस्तारानें पहिल्या लेखांत मीं विचार केला आहे.  

दुसर्‍या लेखांत चालीरीती आणि इतर सामाजिक संस्था अथवा दर्जा ह्या दृष्टीनें विचार केला आहे.  मराठा व कुणबी हीं दोन नांवें ह्या वर्गांत प्रसिद्ध आहेत आणि हीं दोन्हीं नांवें एकाच मानववंशाचीं आहेत.  ह्या नांवांवरून दर्जाचा भेद दिसून येतो; पण वंशाचा भेद दिसून येत नाहीं.  विवाह, दत्तकविधि, पडदा, अंत्येष्टि, श्राद्ध, पेहेराव आणि खाणें-पिणें वगैरे दृष्टींनीं पाहतांना मराठ्यांमध्यें वरवर भेद दिसून येतात.  तरी ह्या बाह्या भेदांवरून त्यांच्यांत मानववंशीय भेद आहेत, असें मुळींच सिद्ध होत नाहीं.  उलट ह्या बाह्य आचारांवरून त्यांचे मौलिक ऐक्यच जास्त स्पष्टपणें सिद्ध होतें.  छत्तीस कुळी, छप्पन्न कुळी, शहाण्णव कुळी, म्हणून ज्यांची संख्या वेळोवेळीं वाढते अशा कुळी परंपरागत आहेत.  त्या सर्व मराठ्यांत सारख्याच आहेत.

तिसर्‍या लेखांत मराठ्यांच्या पीठिकेविषयीं मीं कांहीं लेखी पुरावे दिले आहेत; पण ते फार थोडे आहेत.  नाहींच म्हटलें तरी चालतील.  रॉलिन्सन् नांवाच्या लेखकानें Story of the Nations ह्या पुस्तकमालेंत History of the Parthians म्हणजे पार्थवांचा इतिहास नांवाचा ग्रंथ लिहिला आहे.  त्यांत त्यानें पार्थवांच्या जातीय स्वभावाचीं आणि चालीरीतींचीं जीं विशिष्ट लक्षणें म्हणून सांगितलीं आहेत तीं उत्तरेकडील राजपुताना व दक्षिणेकडील मराठ्यांना इतकीं तंतोतंत जुळतात कीं मराठे हे पार्थव किंवा पल्लव वंशाचे असतील असें वाटूं लागतें.

साहित्यसंमेलनें  :   मी महाराष्ट्र साहित्य संमेलनास बर्‍याच वेळां हजर होतों.  १९३० च्या डिसेंबर महिन्यांत नागपूर येथें हें संमेलन भरलें.  त्या वेळीं इतिहासाचें प्रदर्शन मांडलें होतें.  तें उघडण्याचा समारंभ माझ्या हस्तें करण्यांत आला.  न्यायमूर्ति आणि नागपूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरु रा. नियोगी हे अध्यक्षस्थानीं होते.  त्यांनीं मजसंबंधीं मोठें गौरवपर भाषण केलें.  मीं सांगितलें, ''इतिहासवाङ्‌मय आणि ललितवाङ्‌मय ह्यांत मोठा फरक आहे.  इतिहास लिहिण्यांत भावना वर्ज्य कराव्या लागतात तर लालित्यांत भावना आवश्यक असतात.  १९३५ सालीं हें संमेलन नाताळांत बडोद्यास भरलें.  त्या वेळीं संमेलनांतील विचारासाठीं निरनिराळ्या विषयांसाठीं निरनिराळ्या शाखा करून प्रत्येक शाखेवर स्वतंत्र उपाध्यक्ष नेमण्यांत आला होता.  'धर्माचें तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र' ह्या शाखांचा उपाध्यक्ष मी होतों.  पण ही योजना फारशी यशस्वी झाली नाहीं.  संमेलनाचें लक्ष कोणत्याही गंभीर विषयाकडे नसतें.  बहुतेक तरुण मंडळींचें लक्ष अश्लीलतेच्या ठरावाकडे लागून राहिलेलें असतें.  ह्या नेहमींच्या अनुभवावरून मी पुढें संमेलनास कधीं गेलों नाहीं.

समारोप  :   आतां मी माझ्या वाचकांची रजा घेतों.  माझ्या अत्यंत दुबळ्या अवस्थेकडे पाहिलें असतां इतक्या पानांचा मजकूर मीं कसा सांगितला ह्याचें माझें मलाच आश्चर्य वाटतें.  दृष्टि अतिशय मंदावलेली.  हात कंपवायूनें सदैव कांपत असत.  त्यामुळें वाचन फार दुर्घट झालें.  लिहिण्याचा प्रश्न तर दूरच राहिला.  स्मरणशक्तिही बरीच क्षीण झालेली.  ह्यामुळें ह्या सर्व लिखाणाचें श्रेय माझे धाकटे चि. कुमार रवींद्र यांचेकडेच आहे, हें मला आनंदानें नमूद केलें पाहिजे.  अनेक जुन्या रोजनिशा, हस्तलिखित पत्रें, वर्तमानपत्रांतील व मासिकांतील कात्रणें वगैरे वगैरे सामुग्रीचा ढीग अस्ताव्यस्त रीतीनें पडलेला.  त्यांतून विषयाला लागू असें लिखाण शोधून काढण्यास दिवसचे दिवस लागत.  मित्रांकडून इतर माहिती गोळा करणें आणि पुणें शहरांतील परिचितांकडे हेलपाटे घालणें वगैरे दगदगीचीं कामें चि. रवींद्रानें मोठ्या हौसेनें आणि तितक्याच चिकाटीनें केलीं.  पुष्कळ वेळां मी गळून पडलों तरी मोठ्या विनयानें त्यानें मला उत्साहाचा दम भरला.  हें सर्व करीत असतां स्वतः रवींद्राची तब्येतहि बरोबर नव्हती.  तरीही त्यानें हे श्रम घेतले ही विशेष गोष्ट आहे.  सामुग्री पुरवण्याचे कामीं, प्रकृतीची क्षीणावस्था व उतारवय असतांही माझे मित्र श्री.बी.बी. केसकर ह्यांनीं जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार ॠणी आहें.

  1. सामान्य विचार
  2. सत्याग्रह व तुरुंगवास
  3. शेतकरी चळवळ
  4. व्हायकोम सत्याग्रह
  • 32
  • 33
  • 34
  • 35
  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
Page 37 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी