सामान्य विचार

दोन पद्धती  :  कोणत्याही एका मोठ्या समाजसुधारणेचें व्यापक कार्य घेतल्यावर कार्यपद्धतीचे ढोबळ दृष्ट्या दोन भिन्न प्रकार पडतात.  विवक्षित आणि मर्यादित क्षेत्र घेऊन पद्धतीचें केंद्रीकरण आणि संघटन ही पहिली पद्धत.  अमर्याद लोकसमाजाचें मत आणि वळण बदलण्यासाठीं प्रचारकार्य करणें ही दुसरी पद्धत.  पहिलीला सुवर्णकार-पद्धति आणि दुसरीला मेघवृष्टि-पद्धति असें म्हणावयास हरकत नाहीं.  सोनें, मोतीं हिरे वगैरे धातू घेऊन सुवर्णकार आपल्या कलाकुसरीनें त्यांचे उत्तम नग बनवतो, तर दुसर्‍या पद्धतींत अमर्याद क्षेत्रावर मेघानें वर्षाव केल्यामुळें अखेरीस उत्तम पीक येतें.  हा पद्धतीचा भेद केवळ आधुनिक आहे असें म्हणतां येणार नाहीं.  पुरातन कालीं मोठमोठे धर्मप्रसार झाले, धर्मबुद्धीच्या घटना झाल्या.  त्यांच्या चालकांना या दोन्ही पद्धती स्वीकाराव्या लागल्या.  ठिकठिकाणीं गुरुकुलें स्थापून त्यांनीं आचार्यांच्या द्वारां धर्मबुद्धीची शिकवण दिली व पुरोहित नेमून धर्माचीं अनुष्ठानें, गृह अथवा सामाजिक संस्कार यांच्या द्वारें धर्माची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली ही पहिली पद्धत.  निस्संग परिव्राट् व सतत संचार करणारे परमहंस संन्यासी नेमून त्यांच्या द्वारां वेळोवेळीं झोपीं जाणार्‍या लहानथोर जनतेला जागी करणें आणि कार्यप्रवण राखणें ही दुसरी.

अस्पृश्यतानिवारण हें मोठें जागतिक कार्य.  खंडवजा भारतासारख्या देशसमूहावर ह्या कार्याचा प्रयोग करणें हें कांहीं लहानसान कृत्य नव्हे.  कार्य मोठें, पण कार्यवाह लहान.  पण विभूतीची वाट पहात बसण्याला अवसर कोठून आणणार !  विभूतीची वाट पहाण्यांत बराच काळ अगोदरच लोटून गेला होता.  अलौकिक, लोकोत्तर विभूति आणि सामान्य माणसांची घटना ह्या दोहोंचें मी समाजशास्त्रदृष्ट्या विद्यार्थीदशेंत थोडेंबहुत आकलन केलें होतें.  म्हणून विभूतिवादावरील माझा विश्वास कमी होऊन सामान्य माणसांच्या घटनात्मक प्रयत्‍नाकडे माझा कल विद्यार्थीदशेंतच होऊं लागला होता.  थॉमस कार्लाईलचा विभूतिवाद आणि हर्बर्ट स्पेन्सरचा सामान्य माणसांचा घटनात्मक प्रयत्‍नवाद ह्या दोहोंची तुलनात्मक मीमांसा मीं तरुणपणींच केलेली होती.  म्हणून अस्पृश्यतानिवारणाचे कामीं आधुनिक काळांत कोणी विभूति पुढें येत नाहीं आणि मी तर स्वतः अत्यंत सामान्य माणूस ही वस्तुस्थिति पाहून मी हताश झालों नाहीं.  श्रद्धेनें पर्वत हलतात ह्या ख्रिस्तोक्तीची प्रचिती पाहण्याची वेळ आली होती.  श्रद्धा मग ती एखाद्या विभूतीची असो वा सामान्य माणसांची असो, श्रद्धा ती श्रद्धाच !  तिनें पव्रत हे हललेच पाहिजेत.  मात्र सामान्य माणसाची तशी घटना झाली पाहिजे.  अपेक्षेप्रमाणें थोडाबहुत पैशाचा निधी जमल्यावर कामासाठीं मी योग्य माणसें जमा करूं लागलों.  निधि जमवणें हें माणसाचें काम.  पण माणसें मिळणें ही ईश्वरी देणगी.  ह्या कामाला स्वार्थत्यागपूर्वक वाहून घेऊन काम करणारीं माणसें मिळणें कठीण जाऊं लागलें.

प्रचारकांचे दोन प्रकार  :  अशा माणसांचेही दोन प्रकार पडतात.  सर्वसंग-परित्यागी संन्यासी हा पहिला प्रकार.  घराघरांची जबाबदारी असलेलीं, अरण्यांत जाण्यापेक्षां समाजांतच राहून गृहस्थाश्रम चालविणारीं सामान्य माणसें हा दुसरा प्रकार.  संन्यासी कामाला मिळाले असते तरी ते शिस्तींत बसणारे व चालणारे नसतात.  ज्यांना घर करण्याचा अनुभव नाहीं त्यांना समाज वळविण्याचा अनुभव कोठून येणार !  तो अनुभव असला तरी तसले अनुभवी संन्यासी कोठून आणावयाचे ?  असल्या संन्याश्यांशीं गांठ पडली नाहीं हेंच मी नशीब समजतों.  प्रार्थनासमाजाचें प्रचारकार्य करीत असतांना मला असले एक संन्यासी मिळाले होते.  त्यांचें नांव स्वामी स्वात्मानंदजी.  मेघवृष्टीनें उपदेश आणि प्रवचनें करण्यांत त्यांचा मला मोठा लाभही झाला होता.  त्यांतही केव्हां केव्हां मतभेद झाल्यास स्वामीजी दंडा घेऊन उठत हा अनुभव मला आलेला होता.  म्हणून अशा संन्याश्यांची मला फार हळहळ लागली नाहीं.  त्यांत मी स्वतः पडलों अगदीं सामान्य माणूस.  माझ्याबरोबर काम करण्याला असामान्य माणूस कशाला येईल ?  नुसतीं बी.ए., एम.ए. आणि परदेशविद्याभूषित माणसेंसुद्धां माझ्या भेदरट मनाला असामान्य दिसूं लागलीं.  अशीं माणसें थोडा वेळ स्वार्थत्याग करतील, पण तीं अखेरपर्यंत मिशनची शिस्त पाळतील याची खातरजमा कोण देणार !  'श्रद्धावान् लभते ज्ञानम' अशी म्हण आहे 'ज्ञानवान् लभते श्रद्धा' अशी म्हण नाहीं.  म्हणून फारशी इंग्रजी विद्या न मिळवलेलीं आणि गरजेपुरतें व कामापुरतें आधुनिक विद्येचें चांगलें ज्ञान असलेलीं अशीं माणसें क्रमाक्रमानें मिळालीं.  त्यांनाच ह्या मिशनचें सारें श्रेय आहे !

कार्याची घटना  :  मिशनच्या कामाची खालीलप्रमाणें मांडणी करण्यांत आली.  एक मध्यवर्ती शाखा ठरवायची.  तिचा हेतु आणि रचना यासंबंधीं जरूर तितकेच नियम करावयाचे.  अशी ही मातृसंस्था मुंबई शहरांत स्थापण्यांत आली.  प्राथमिक अथवा दुय्यम शिक्षणाची शाळा, उद्योगशाळा, विद्यार्थी-वसतिगृहें, फुकट दवाखाना, धर्मशिक्षणाच्या आणि नीतिशिक्षणाच्या साप्‍ताहिक शाळा, केवळ सार्वत्रिक धर्माला अनुसरून म्हणजे जातिभेद आणि मूर्तिपूजा यांना फाटा देऊन चालविण्यांत येणारीं उपासनालयें एवढीं तरी निदान ह्या मध्यवर्ती संस्थेचीं अंगें ठरलीं.  ह्यासाठीं एक आश्रम स्थापण्यांत येऊन त्याची सर्व जबाबदारी अंगावर घेणार्‍या कुलगुरूची आवश्यकता मला भासली.  ह्या मध्यवर्ती आश्रमाची घडी नीट बसल्यावर पुढें जसजसा अनुभव येईल तसतशा निरनिराळ्या प्रांतांतून भाषावार प्रांतिक शाखा आणि त्यांच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय पोटसंस्था स्थापण्याचा विचार ठरला.  सुवर्णकार पद्धतीनें हीं कामें चालूं असतां मेघवृष्टीचें काम म्हणजे जाहीर व्याख्यानांच्या द्वारें परिषदा, प्रदर्शनें, प्रात्यक्षिकें, मिरवणुकी वगैरे साधनांच्या द्वारें लोकमत तयार करणें हें काम आवश्यक होतें.  ह्या दोन्ही पद्धतीचीं कामें परस्परावलंबी होतीं.  ठिकठिकाणच्या केंद्रीकृत संस्था नसत्या आणि नुसतें प्रचाराचेंच काम चाललें असतें तर लोकमत कसें बनणार आणि मेघवृष्टि प्रचाराचें काम न चालवतां नुसत्या स्थानिक संस्थांना द्रव्याचें व सहानुभूतीचें साहाय्य तरी कसें मिळणार !  म्हणून या दोन पद्धतींचीं कामें मीं एकमेकांपासून भिन्न पण परस्परपोषक अशीं प्रथमपासूनच ठरविलीं होतीं.  प्रचाराचें काम मीं स्वतः अंगावर घेऊन करण्यासारखें होतें.  पण पहिल्या कामासाठीं मात्र तज्ज्ञ आणि अधिकारी माणसें पाहिजे होतीं.  मिशनचें काम म्हणजे अस्सल धर्मयुद्धाचें काम होतें.  नुसती मुलुखगिरी केल्यानें युद्धांत जय मिळत नाहीं आणि मिळाला तरी तो टिकत नाहीं.  मिळालेल्या मुलखांत कोटकिल्ले स्थापणें आणि ते शिस्तीनें व बंदोबस्तानें टिकवणें ह्यांवरच अखेरचा जय अवलंबून असतो.

पहिले कार्यवाहक  :  कामासाठीं माणसें मिळवण्याचा प्रयोग मीं स्वतःच्या घरापासूनच केला.  कारण बोलून चालून मी वेडापीर ठरलों, तर घराबाहेरच्या लोकांनीं मजवर विश्वास कसा ठेवावा !  यशानेंच यश मिळतें.  घरच्या लोकांना घेऊन थोडेसें काम करून दाखविल्यावर प्रार्थनासमाज हें जें माझें आध्यात्मिक घर, त्यांतूनच माणसें मिळतील अशी माझी बळकट श्रद्धा होती.  मध्यवर्ती शाखेची मागें दिलेली जी समिति आहे ती सर्व प्रार्थनासमाजिस्टांचीच आहे.  अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर, उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला, खजीनदार नारायणराव पंडित, सुपरिंटेंडेंट डॉ. लाड व जनरल सेक्रेटरी मी स्वतः हे अनुक्रमें प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद आणि प्रचारक होते.  ह्याच न्यायानें पुढील कार्यवाहक मला प्रथम माझ्या घरांतून आणि पुढें प्रार्थनासमाजाच्या आध्यात्मिक गृहांतून मिळवायचे होते.  म्हणून मी प्रथम माझी भगिनी श्रीमती जनाबाई, मातोश्री सौ. यमुनाबाई, पिताजी ती. रामजीबुवा ह्यांना कार्यास बोलाविलें.  जनाबाई पनवेलीस म्यु. पलिटीच्या मुलींच्या शाळेंत मुख्य अध्यापिका होत्या.  मॅट्रिकपर्यंत त्यांचें इंग्रजी शिक्षण झालें होतें.  उपासनेच्या वेळी भजन करणें, प्रसंगविशेषीं गोरगरिबांचा समाचार घेणें वगैरे प्रार्थनासमाजाच्या कामीं मला त्या अगोदरच मदत करीत होत्या.  तेंच काम ह्या मिशनमध्यें वाहून घेऊन करण्यासाठीं मीं त्यांना आपल्या कायमच्या नोकरीचा राजीनामा देण्याची विनंती केली आणि ती त्यांनीं मान्य केली.  जिथें मुलें तिथें आम्ही, ह्या अस्सल हिंदु नियमाप्रमाणें माझे आईबाप माझ्या मागें आले.  आम्ही सांगूं तें काम, ठेवूं तें स्थळ असा त्यांचा निर्धार झाला.  आमच्या घरोब्याचे सय्यद अबदुल कादर या नांवाचे तरुण सद्‍गृहस्थ होते.  तेहि मॅट्रिक पास झालेले होते.  मुंबईतील इस्लामिया स्कूलमध्यें त्यांना शिक्षकाची नोकरी होती.  आमच्याप्रमाणेंच त्यांनींही प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली होती.  आमचें उदाहरण पाहून त्यांनींही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते मिशनचे स्वार्थत्यागी कार्यवाह बनले.  हें दिव्य पाहून प्रार्थनासमाजाचे दुसरे एक सभासद रा. वामनराव सदाशिवराव सोहोनी यांनाही ह्या आध्यात्मिक सांथीनें गांठलें.  मुंबईंतील विल्सन हायस्कूलमध्यें ते एक नामांकित शिक्षक होत.  वामन आबाजी मोडक ह्या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञाच्या तालमींत शिकून ते त्या शास्त्रांत आणि कार्यांत चांगले तरबेज झाले होते.  ते आम्हांस येऊन मिळाल्यावर स्वीकृत कार्यांत परमेश्वराचा हात आहे, असा जणुं साक्षात्कारच आम्हांला झाला आणि अशा रीतीनें आमचा आत्मविश्वास वाढला.  अशा प्रकारें मुंबईंतील मध्यवर्ती आश्रमाची व गुरुकुलाची तयारी झाली.  सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः या न्यायानें जरूर त्या पैशाच्या कामीं मी लागलों.