1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

सामान्य विचार

दोन पद्धती  :  कोणत्याही एका मोठ्या समाजसुधारणेचें व्यापक कार्य घेतल्यावर कार्यपद्धतीचे ढोबळ दृष्ट्या दोन भिन्न प्रकार पडतात.  विवक्षित आणि मर्यादित क्षेत्र घेऊन पद्धतीचें केंद्रीकरण आणि संघटन ही पहिली पद्धत.  अमर्याद लोकसमाजाचें मत आणि वळण बदलण्यासाठीं प्रचारकार्य करणें ही दुसरी पद्धत.  पहिलीला सुवर्णकार-पद्धति आणि दुसरीला मेघवृष्टि-पद्धति असें म्हणावयास हरकत नाहीं.  सोनें, मोतीं हिरे वगैरे धातू घेऊन सुवर्णकार आपल्या कलाकुसरीनें त्यांचे उत्तम नग बनवतो, तर दुसर्‍या पद्धतींत अमर्याद क्षेत्रावर मेघानें वर्षाव केल्यामुळें अखेरीस उत्तम पीक येतें.  हा पद्धतीचा भेद केवळ आधुनिक आहे असें म्हणतां येणार नाहीं.  पुरातन कालीं मोठमोठे धर्मप्रसार झाले, धर्मबुद्धीच्या घटना झाल्या.  त्यांच्या चालकांना या दोन्ही पद्धती स्वीकाराव्या लागल्या.  ठिकठिकाणीं गुरुकुलें स्थापून त्यांनीं आचार्यांच्या द्वारां धर्मबुद्धीची शिकवण दिली व पुरोहित नेमून धर्माचीं अनुष्ठानें, गृह अथवा सामाजिक संस्कार यांच्या द्वारें धर्माची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली ही पहिली पद्धत.  निस्संग परिव्राट् व सतत संचार करणारे परमहंस संन्यासी नेमून त्यांच्या द्वारां वेळोवेळीं झोपीं जाणार्‍या लहानथोर जनतेला जागी करणें आणि कार्यप्रवण राखणें ही दुसरी.

अस्पृश्यतानिवारण हें मोठें जागतिक कार्य.  खंडवजा भारतासारख्या देशसमूहावर ह्या कार्याचा प्रयोग करणें हें कांहीं लहानसान कृत्य नव्हे.  कार्य मोठें, पण कार्यवाह लहान.  पण विभूतीची वाट पहात बसण्याला अवसर कोठून आणणार !  विभूतीची वाट पहाण्यांत बराच काळ अगोदरच लोटून गेला होता.  अलौकिक, लोकोत्तर विभूति आणि सामान्य माणसांची घटना ह्या दोहोंचें मी समाजशास्त्रदृष्ट्या विद्यार्थीदशेंत थोडेंबहुत आकलन केलें होतें.  म्हणून विभूतिवादावरील माझा विश्वास कमी होऊन सामान्य माणसांच्या घटनात्मक प्रयत्‍नाकडे माझा कल विद्यार्थीदशेंतच होऊं लागला होता.  थॉमस कार्लाईलचा विभूतिवाद आणि हर्बर्ट स्पेन्सरचा सामान्य माणसांचा घटनात्मक प्रयत्‍नवाद ह्या दोहोंची तुलनात्मक मीमांसा मीं तरुणपणींच केलेली होती.  म्हणून अस्पृश्यतानिवारणाचे कामीं आधुनिक काळांत कोणी विभूति पुढें येत नाहीं आणि मी तर स्वतः अत्यंत सामान्य माणूस ही वस्तुस्थिति पाहून मी हताश झालों नाहीं.  श्रद्धेनें पर्वत हलतात ह्या ख्रिस्तोक्तीची प्रचिती पाहण्याची वेळ आली होती.  श्रद्धा मग ती एखाद्या विभूतीची असो वा सामान्य माणसांची असो, श्रद्धा ती श्रद्धाच !  तिनें पव्रत हे हललेच पाहिजेत.  मात्र सामान्य माणसाची तशी घटना झाली पाहिजे.  अपेक्षेप्रमाणें थोडाबहुत पैशाचा निधी जमल्यावर कामासाठीं मी योग्य माणसें जमा करूं लागलों.  निधि जमवणें हें माणसाचें काम.  पण माणसें मिळणें ही ईश्वरी देणगी.  ह्या कामाला स्वार्थत्यागपूर्वक वाहून घेऊन काम करणारीं माणसें मिळणें कठीण जाऊं लागलें.

प्रचारकांचे दोन प्रकार  :  अशा माणसांचेही दोन प्रकार पडतात.  सर्वसंग-परित्यागी संन्यासी हा पहिला प्रकार.  घराघरांची जबाबदारी असलेलीं, अरण्यांत जाण्यापेक्षां समाजांतच राहून गृहस्थाश्रम चालविणारीं सामान्य माणसें हा दुसरा प्रकार.  संन्यासी कामाला मिळाले असते तरी ते शिस्तींत बसणारे व चालणारे नसतात.  ज्यांना घर करण्याचा अनुभव नाहीं त्यांना समाज वळविण्याचा अनुभव कोठून येणार !  तो अनुभव असला तरी तसले अनुभवी संन्यासी कोठून आणावयाचे ?  असल्या संन्याश्यांशीं गांठ पडली नाहीं हेंच मी नशीब समजतों.  प्रार्थनासमाजाचें प्रचारकार्य करीत असतांना मला असले एक संन्यासी मिळाले होते.  त्यांचें नांव स्वामी स्वात्मानंदजी.  मेघवृष्टीनें उपदेश आणि प्रवचनें करण्यांत त्यांचा मला मोठा लाभही झाला होता.  त्यांतही केव्हां केव्हां मतभेद झाल्यास स्वामीजी दंडा घेऊन उठत हा अनुभव मला आलेला होता.  म्हणून अशा संन्याश्यांची मला फार हळहळ लागली नाहीं.  त्यांत मी स्वतः पडलों अगदीं सामान्य माणूस.  माझ्याबरोबर काम करण्याला असामान्य माणूस कशाला येईल ?  नुसतीं बी.ए., एम.ए. आणि परदेशविद्याभूषित माणसेंसुद्धां माझ्या भेदरट मनाला असामान्य दिसूं लागलीं.  अशीं माणसें थोडा वेळ स्वार्थत्याग करतील, पण तीं अखेरपर्यंत मिशनची शिस्त पाळतील याची खातरजमा कोण देणार !  'श्रद्धावान् लभते ज्ञानम' अशी म्हण आहे 'ज्ञानवान् लभते श्रद्धा' अशी म्हण नाहीं.  म्हणून फारशी इंग्रजी विद्या न मिळवलेलीं आणि गरजेपुरतें व कामापुरतें आधुनिक विद्येचें चांगलें ज्ञान असलेलीं अशीं माणसें क्रमाक्रमानें मिळालीं.  त्यांनाच ह्या मिशनचें सारें श्रेय आहे !

कार्याची घटना  :  मिशनच्या कामाची खालीलप्रमाणें मांडणी करण्यांत आली.  एक मध्यवर्ती शाखा ठरवायची.  तिचा हेतु आणि रचना यासंबंधीं जरूर तितकेच नियम करावयाचे.  अशी ही मातृसंस्था मुंबई शहरांत स्थापण्यांत आली.  प्राथमिक अथवा दुय्यम शिक्षणाची शाळा, उद्योगशाळा, विद्यार्थी-वसतिगृहें, फुकट दवाखाना, धर्मशिक्षणाच्या आणि नीतिशिक्षणाच्या साप्‍ताहिक शाळा, केवळ सार्वत्रिक धर्माला अनुसरून म्हणजे जातिभेद आणि मूर्तिपूजा यांना फाटा देऊन चालविण्यांत येणारीं उपासनालयें एवढीं तरी निदान ह्या मध्यवर्ती संस्थेचीं अंगें ठरलीं.  ह्यासाठीं एक आश्रम स्थापण्यांत येऊन त्याची सर्व जबाबदारी अंगावर घेणार्‍या कुलगुरूची आवश्यकता मला भासली.  ह्या मध्यवर्ती आश्रमाची घडी नीट बसल्यावर पुढें जसजसा अनुभव येईल तसतशा निरनिराळ्या प्रांतांतून भाषावार प्रांतिक शाखा आणि त्यांच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय पोटसंस्था स्थापण्याचा विचार ठरला.  सुवर्णकार पद्धतीनें हीं कामें चालूं असतां मेघवृष्टीचें काम म्हणजे जाहीर व्याख्यानांच्या द्वारें परिषदा, प्रदर्शनें, प्रात्यक्षिकें, मिरवणुकी वगैरे साधनांच्या द्वारें लोकमत तयार करणें हें काम आवश्यक होतें.  ह्या दोन्ही पद्धतीचीं कामें परस्परावलंबी होतीं.  ठिकठिकाणच्या केंद्रीकृत संस्था नसत्या आणि नुसतें प्रचाराचेंच काम चाललें असतें तर लोकमत कसें बनणार आणि मेघवृष्टि प्रचाराचें काम न चालवतां नुसत्या स्थानिक संस्थांना द्रव्याचें व सहानुभूतीचें साहाय्य तरी कसें मिळणार !  म्हणून या दोन पद्धतींचीं कामें मीं एकमेकांपासून भिन्न पण परस्परपोषक अशीं प्रथमपासूनच ठरविलीं होतीं.  प्रचाराचें काम मीं स्वतः अंगावर घेऊन करण्यासारखें होतें.  पण पहिल्या कामासाठीं मात्र तज्ज्ञ आणि अधिकारी माणसें पाहिजे होतीं.  मिशनचें काम म्हणजे अस्सल धर्मयुद्धाचें काम होतें.  नुसती मुलुखगिरी केल्यानें युद्धांत जय मिळत नाहीं आणि मिळाला तरी तो टिकत नाहीं.  मिळालेल्या मुलखांत कोटकिल्ले स्थापणें आणि ते शिस्तीनें व बंदोबस्तानें टिकवणें ह्यांवरच अखेरचा जय अवलंबून असतो.

पहिले कार्यवाहक  :  कामासाठीं माणसें मिळवण्याचा प्रयोग मीं स्वतःच्या घरापासूनच केला.  कारण बोलून चालून मी वेडापीर ठरलों, तर घराबाहेरच्या लोकांनीं मजवर विश्वास कसा ठेवावा !  यशानेंच यश मिळतें.  घरच्या लोकांना घेऊन थोडेसें काम करून दाखविल्यावर प्रार्थनासमाज हें जें माझें आध्यात्मिक घर, त्यांतूनच माणसें मिळतील अशी माझी बळकट श्रद्धा होती.  मध्यवर्ती शाखेची मागें दिलेली जी समिति आहे ती सर्व प्रार्थनासमाजिस्टांचीच आहे.  अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर, उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला, खजीनदार नारायणराव पंडित, सुपरिंटेंडेंट डॉ. लाड व जनरल सेक्रेटरी मी स्वतः हे अनुक्रमें प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद आणि प्रचारक होते.  ह्याच न्यायानें पुढील कार्यवाहक मला प्रथम माझ्या घरांतून आणि पुढें प्रार्थनासमाजाच्या आध्यात्मिक गृहांतून मिळवायचे होते.  म्हणून मी प्रथम माझी भगिनी श्रीमती जनाबाई, मातोश्री सौ. यमुनाबाई, पिताजी ती. रामजीबुवा ह्यांना कार्यास बोलाविलें.  जनाबाई पनवेलीस म्यु. पलिटीच्या मुलींच्या शाळेंत मुख्य अध्यापिका होत्या.  मॅट्रिकपर्यंत त्यांचें इंग्रजी शिक्षण झालें होतें.  उपासनेच्या वेळी भजन करणें, प्रसंगविशेषीं गोरगरिबांचा समाचार घेणें वगैरे प्रार्थनासमाजाच्या कामीं मला त्या अगोदरच मदत करीत होत्या.  तेंच काम ह्या मिशनमध्यें वाहून घेऊन करण्यासाठीं मीं त्यांना आपल्या कायमच्या नोकरीचा राजीनामा देण्याची विनंती केली आणि ती त्यांनीं मान्य केली.  जिथें मुलें तिथें आम्ही, ह्या अस्सल हिंदु नियमाप्रमाणें माझे आईबाप माझ्या मागें आले.  आम्ही सांगूं तें काम, ठेवूं तें स्थळ असा त्यांचा निर्धार झाला.  आमच्या घरोब्याचे सय्यद अबदुल कादर या नांवाचे तरुण सद्‍गृहस्थ होते.  तेहि मॅट्रिक पास झालेले होते.  मुंबईतील इस्लामिया स्कूलमध्यें त्यांना शिक्षकाची नोकरी होती.  आमच्याप्रमाणेंच त्यांनींही प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली होती.  आमचें उदाहरण पाहून त्यांनींही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते मिशनचे स्वार्थत्यागी कार्यवाह बनले.  हें दिव्य पाहून प्रार्थनासमाजाचे दुसरे एक सभासद रा. वामनराव सदाशिवराव सोहोनी यांनाही ह्या आध्यात्मिक सांथीनें गांठलें.  मुंबईंतील विल्सन हायस्कूलमध्यें ते एक नामांकित शिक्षक होत.  वामन आबाजी मोडक ह्या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञाच्या तालमींत शिकून ते त्या शास्त्रांत आणि कार्यांत चांगले तरबेज झाले होते.  ते आम्हांस येऊन मिळाल्यावर स्वीकृत कार्यांत परमेश्वराचा हात आहे, असा जणुं साक्षात्कारच आम्हांला झाला आणि अशा रीतीनें आमचा आत्मविश्वास वाढला.  अशा प्रकारें मुंबईंतील मध्यवर्ती आश्रमाची व गुरुकुलाची तयारी झाली.  सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः या न्यायानें जरूर त्या पैशाच्या कामीं मी लागलों.

सत्याग्रह व तुरुंगवास

प्रसिद्ध दे. भ. श्री. बाळूकाका कानिटकर यांनी खालील टिपणें पाठवलीं आहेत -

''(१) हरिभाऊ फाटक व बाळूकाका कानिटकर यांनीं श्री. विठ्ठलरावांना भेटून १९३० च्या एप्रिल महिन्यांत कायदेभंग चळवळींत पुढारीपण घेण्याची विनंती केली ती त्यांनीं मान्य केली.  लगेच श्री. केशवराव जेधे हेही ह्या चळवळींत सामील झाले.  (२) कर्मवीर शिंदे यांनीं पुणें जिल्ह्यांत खेडोपाडीं पायीं दौरा काढला.  त्यांचे पथकाबरोबर श्र. हरिभाऊ पाठक, श्री. हरिभाऊ तुळपुळे, श्री. पोपटलाल शहा ही मंडळी मधूनमधून जात असत.  ह्या दौर्‍याचा खेडोगांवीं फार परिणाम झाला.  व्याख्यान, पोवाडे वगैरेंच्या साहाय्यानें हा प्रचार झाला.  खेडेगांवांतील मंडळींनीं ह्या लोकांचें उत्साहानें स्वागत केलें.  जेवणखाण वगैरेची सोय आपोआप न सांगतां जागोजाग लोक स्वयंस्फूर्तीनें करीत.  (३) शिंदे आठवड्यांचे शेवटीं पुण्यास परत येऊन पुन्हां दौर्‍यावर जात.  पुण्यास बाळूकाका कानिटकर हे चळवळीचे सर्वाधिकारी नेमले गेले होते.  त्यांना सर्व प्रकारें उत्तेजन देऊन श्री. शिंदे व इतर पुढारी ह्यांनीं महत्त्वाची मदत केली.  पुण्याहूीनी बाहेरगांवीं ठिकठिकाणीं जाणार्‍या सत्याग्रही तुकड्यांना निरोप देण्याचे समारंभ रा. शिंदे ह्यांचे अध्यक्षतेखालीं अनेक वेळां होत असत.  त्या वेळीं श्री. शिंदे ह्यांच्या पत्‍नी समक्ष हजर राहून जाणार्‍या सत्याग्रह्यांना नारळ व आशीर्वाद होत.  (४) कानिटकर ह्यांचे वाड्यांतच प्रथम सत्याग्रहशिबिर होतें.  तेथें क. शिंदे, श्री. तात्यासाहेब केळकर, श्री. हरिभाऊ फाटक, श्री. हरिभाऊ तुळपुळे, संगमनेरचे श्री. रामकृष्ण दास वगैरेंची बैठक होऊन महाराष्ट्रांत जंगलसत्याग्रह करण्याचें ठरलें.  प्रभातफेरी जशी पुण्यानें सुरू केली तशीच जंगलसत्याग्रहाची कल्पना पुण्यानेंच उचलून धरली व ती सबंध बृहन्महाराष्ट्रभर कालांतरानें, वणव्याप्रमाणें, पसरली.  कानिटकर यांनीं हजार सत्याग्रही निरनिराळ्या युद्धक्षेत्रावर पाठवल्यानंतर त्यांनाता. ३० एप्रिल १९३० रोजीं सरकारनें पकडलें.''  

एप्रिल महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यांत सोमवारीं सकाळीं मीं हवेली तालुक्यांतील पहिल्या दौर्‍यावर निघालों.  बरोबर दहापंधरा तरुण स्वयंसेवकांची तुकडी होती.  सत्याग्रहाचा मोठा झेंडा पुढें फडकत होता.  बाजाची पेटी, टाळ आणि प्रभातफेरीची पद्यावली प्रत्येकाच्या हातीं होती.  एक डफ-तुणतुण्यांसह पोवाडेवाल्यांचा ताफा बरोबर होता.  पुण्याच्या हद्दीवर फर्ग्युसन कॉलेजच्या समोर प्रथम झेंडावंदन झालें.

दौरा  :    हा दौरा प्रथम पुण्याजवळील दापोडी गांवीं गेला.  तेथून प्रत्येक खेडेगांवांत प्रथम प्रभातफेरी म्हणत उभ्याउभ्याच व्याख्यानें देत पुढच्या गांवीं जात असूं.  दोन प्रहरी एखाद्या गांवीं जेवण्याचा बेत आधींच ठरलेला असे.  स्नान वगैरे आटोपल्यावर जेवण्यास वेळ असेल तेव्हां पोवाडे सुरू होत.  चिंचवड, देहू, आळंदी, चऱ्होली, लोणी, लोहगांव वगैरे लहानमोठीं सर्व गांवें करून पहिल्या आठवड्यांत बहुतेक हवेली तालुका संपवला.  ह्या आठवड्यांत पायीं शंभर मैलांचा प्रवास झाला.  ह्या दौर्‍याचा पुढील आठवड्यांचा कार्यक्रम वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असे; पण एकदोन दिवसांतच खेड्यांपाड्यांतून दौर्‍याची दाट वंदता कर्णोपकर्णी पसरूं लागली.  पण गांव संपवून पथक दुसर्‍या गांवं निघालें कीं, झेंड्यांची वाट पाहात बायकामुलें हद्दीवर येऊन बसत.  पुढें पुढें तर हा दौरा खेड्यांतील लोकांना इतका प्रिय झाला कीं, एका गांवचे लोक आपल्या गांवचे हद्दीपर्यंत पोंचवायला येत तर दुसर्‍या गांवचे लोक सामोरे न्यावयाला येत.  दौरा अमुक ठिकाणीं असेल असें संकेताने ओळखून पुण्याहून वासुकाका जोशी, देवगिरीकर वगैरे मंडळी मधून मधून समाचार घेण्यास येत.  पहिल्या आठवड्यांचा दौरा संपवून शेवटचें खेडें जें लोहगांव त्याहून येत असतां वाटेंत येरवड्यांच्या तुरुंगाच्या बाहेर उभें राहून पथकानें एक गाणें म्हटलें.  तुरुंगाच्या बाहेर कांहीं कैदी काम करीत होते,  आम्हीहि त्यांच्याबरोबर लवकर जाऊं असा विश्वास आम्हांस वाटत होता.  झेंड्यांचा जयजयकार झाला.  त्या वेळीं कैद्यांनींहि त्यांत भाग घेतला.  पोलिस कौतुकानें पाहात होते.  येरवड्यांजवळील टेकडीवरील विठ्ठलदास ठाकरसी यांच्या पर्णकुटीजवळच्या धर्मशाळेंत पथकाची उतरण्याची सोय केली होती.  तेथें सहभोजन झालें त्या वेळीं गांवांतील शिष्टमंडळी हजर होती.  सायंकाळीं जंगलीमहाराजाचे देवळांत पथक थोडा वेळ राहिलें.  तेथून शिवाजीमहाराजांचे पुतळ्यास हार घालून बुधवार चौकांतून मोठी मिरवणूक निघाली.  सदाशिव पेठेंतील शिवाजीमंदिरांत जाहीर सभा झाली.  त्या वेळीं आठवड्यांचा अहवाल मीं सांगितला आणि खेड्यांतील समाज स्वातंत्र्याला किती आतुर झाला आहे ह्याची हकीगत मीं कळवली.

दुसरा दौरा  :   पुढच्या सोमवारीं सत्याग्रहपथक खेड तालुक्यास निघालें.  त्या वेळीं एक मोटार-लॉरी भाड्यांनें करावी लागली.  स्वयंसेवक वीस जमले.  जास्त येण्यास आतुर होते.  मंचर, घोडें, जुन्नर, नारायणगांव वगैरे खेड्यांतून दौर्‍याचें मोठ्या थाटानें स्वागत झालें.  ह्या दौर्‍यांत प्रथम मीठ विकण्याचा कायदेभंग सुरू झाला.  दांडी येथून मिठाचीं मडकीं आणण्यांत आलीं होतीं.  केव्हां केव्हां मिठाचा लिलांव होऊन बरेच पैसे जमत.  स्वयंसेवकांचे कॅप्टन कृष्णराव महादेव काळे हे होते.  ह्यांनीं अवर्णनीय उत्साह दाखविला.  माझ्यानंतर ह्या उत्साही युवकास ७ म.स. मजुरीची शिक्षा झाली.  गाडगीळ व लिमये हीं दोन मुलें पोवाड्यांची बहार करीत असत.  मोठ्या गांवांतील सभेंत आसपासच्या सर्व खेड्यांतील बायकामुलें येऊन वाट पाहात बसत असत.

हे दिवस उन्हाळ्याचे असल्यानें शेतकर्‍यांना सुटी असे.  त्या वेळीं वर्षाचे हंगामे, उरुस, कुस्त्या ह्यांच्या निमित्तानें मोठमोठ्या जत्रा भरत.  ह्याचा फायदाही दौर्‍यास मोठा झाला.  सभेंतील व्याख्यान संपल्यावर विदेशी कापडाची होळी होत असे.  त्या वेळीं कोणावरही जुलूम होत नसे.  उत्साहाच्या भरांत लहान लहान मुलें आपल्या डोक्यावरील मौल्यवान् विदेशी टोप्या होळींत टाकीत.  त्यांत कांहीं सरकारी अधिकार्‍यांचीं मुलें आपल्या वडिलांच्यादेखत आपल्या टोप्या फेकीत.  सभा सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यावर पथकाच्या गांवांतून फेर्‍या होत.  त्यामुळें पथकाचीं गाणीं गांवोगांव म्हणण्याचा प्रघात पडला.  उरुस व जत्रेंतला जमाव सोडून दिला तरी इतर सभेच्या वेळींसुद्धां कांहीं ठिकाणीं ५।७ हजारांचा जमाव सहज जमे.  लोकांना ह्या दौर्‍याचें वेडच लागून गेलें होतें.

हा दौरा म्हणजे धार्मिक वारकर्‍यांची एक दिंडीच झाली होती.  स्वयंसेवक पथकाची शिस्त धर्म म्हणून पाळीत असत.  भल्या पहाटे उठून ५॥ वाजतां उपासनेस सर्वजण नियमानें बसत.  उपासनेच्या वेळीं मी त्यांना पथकाची शिस्त, आम्हीं चालविलेल्या कार्याचे पावित्र्य आणि जबाबदारी, अनत्याचार आणि सहनशीलता वगैरे धार्मिक विषयांचें महत्त्व समजावून सांगत असें.  ६ वाजतां सूर्योदयाचे वेळीं सर्वजण झेंडावंदन करीत.  नंतर खेड्यांतून प्रभातफेरी निघे.  ती संपल्यावर आम्ही दुसर्‍या गांवीं जात असूं. दुसर्‍या आठवड्यांचा दौरा संपल्यावर ह्या कामानें सबंध महाराष्ट्रभर खळबळ उडवून दिली.  सरकार धरण्याची प्रतिक्षणीं आम्ही वाट पाहात होतों.  पोलिस शिपाई किंवा सी.आय.डी. भेटले तर त्यांनाही आम्ही आनंदानें मोटारींत घेत असूं.

तिसरा दौरा  :   तिसरा दौरा भीमाशंकर व त्याच्या पलीकडील गांवीं निघाला.  हा प्रांत तेथील प्रसिद्ध कोळ्यांचा होता.  त्यांत कांहीं गुन्हेगार प्रवृत्तीचीं माणसें असत.  त्यांना दारू न पिणें, चोरी, अत्याचार न करणें वगैरे आमच्या कार्याचीं सात्त्विक तत्त्वें समजावून सांगणें अत्यंत कठीण गेलें.  ते म्हणत, ''आम्ही दारू एक वेळ सोडूं, पण चोरी व मारामारी कशा सोडूं ?  तो आमच्या पोटाचा धंदा व वाडवडिलांचा धर्म आहे.''  हें एकून आम्ही अशा लोकांपुढें कायदेभंगाचें पुराण बंद ठेवीत असूं.  आणि इतर सामोपचाराच्या गोष्टी सांगत असूं.  एकदोन ठिकाणीं तर सभेमधून अस्पृश्यांना वेगळें बसवण्यांत आलें.  ह्या वेळीं आम्ही आपलें ठाणें अस्पृश्यांत नेऊन स्पृश्यांना वेगळे ठेवीत असूं आणि अस्पृश्यतेचा जुना कायदा मोडायला त्यांना शिकवीत असू.  खरें पाहतां अशा दौर्‍यावर आम्हीं सरकारचा द्वेष करावा असें कोठेंच कधीं सांगितलें नाहीं.  सरकारचे पुष्कळ कायदे आमच्या हिताचेच आहेत, ते अवश्य पाळावेत असेंच आम्ही सांगत असूं.  जे कायदे प्रजेच्या हिताचे नसतात व जे प्रजेच्या विरोधास न जुमानतां केलेले असतात, असेच कायदे निवडून काढून ते पाळूं नयेत असें आम्ही सांगत असूं.

माझी अटक  :   आमच्या पथकांत सर्व जातींचे तरुण होते.  आम्हीही एक प्रकारच्या युद्धक्षेत्रांत होतों.  म्हणून कोणत्याही प्रसंगीं आम्ही जातिभेद पाळीत नव्हतों.  सोंवळ्या तरुणांस आम्ही अगोदरच येऊं देत नसूं.  किंबहुना अशा प्रकारच्या भेदाचें कोणालाही स्मरणही नव्हतें.  ता. १० मे १९३० रोजीं आम्ही तिसर्‍या आठवड्यांचा दौरा संपवून पुण्यास परत आलों.  भीमाशंकरचा घाट चढून उतरल्यामुळें व बराच प्रवास पायीं झाल्यामुळें मी फार थकून गेलों होतों.  रविवारचे दिवशीं कोठेंही बाहेर पडलों नाहीं.  ता. १८ मे रोजीं वैशाख शुद्ध पौर्णिमेस बुद्धजयंति होती.  कौटुंबिक उपासनामंडळाच्या विद्यमानें सालाबादप्रमाणें उत्सव करण्यास वेळ नव्हता.  सकाळीं मी एकटाच पर्वतीच्या टेकडीवर जाऊन ध्यान करून आलों.  १२ वाजतां जेवणखाण करून दिवाणखान्यांत बसलों.  इतक्यांत पुणें शहरचे पोलिस इन्स्पेक्टर मि. मिलर व जिल्हा इन्स्पेक्टर मि. शिंदे हे मला पकडावयास दारांत आले.  ही कुजबजू मला अगोदरच कळली होती.

माझी प्रवासाची पिशवी, वाचनाचीं पुस्तकं, व जरुरीचे कपडे घेऊन मी गेलों.  भगवद्‍गीता, धम्मपद, बायबल, 'सुलभसंगीत', चष्मा, विंचरण्याची फणी, इतके माझे सोबती कोठेंही बरोबर असणारे, तेही माझ्याबरोबर निघाले.  घरांतील माणसें खिन्नवदनानें पटापट पायां पडूं लागलीं.  रस्त्यांत मोटार उभी होती.  पोलिसांनीं मला खेडकडे नेतों असें खोटेंच सांगितलें.  ती खोटी हूल गांवांत उठल्यावर बाबूराव जेधे वगैरे मंडळी खेडकडे जाऊन आली.  तिसरे प्रहरीं खंडाळा येथील सरकारी बंगल्यांत माझे बाळपणींचे स्नेही, डेप्युटी कलेक्टर श्री. माधवराव हुल्याळ ह्यांचेपुढें मला उभें करण्यांत आलें. ११७ कलमाखालीं गुन्ह्याला चिथावणी देण्याचा व ४७ कलमाखालीं बेकायदेशीर मिठाची विक्री केल्याचा असे दोन आरोप माझेवर होते.  दोन पोलिस, मीं व मॅजिस्ट्रेट ह्या चोघांशिवाय कोर्टांत कोणीच नव्हतें.  मी खोलींत शिरतांच रा. हुल्याळ यांनीं आपण होऊनच मला नमस्कार केला व आपल्या टेबलाला लागूनच मला बसावयास खुर्ची दिली.  गुन्हा कबूल आहे काय असें हुल्याळ मॅजिस्ट्रेटनें विचारलें.  मी म्हटलें कीं, ''पोलिसांनीं सांगितलेली हकीकत सगळी खरी आहे.  मीं गुन्हा केला किंवा कसें तें सांगण्याचें काम माझें नव्हे.  तें कोर्टानें ठरवावें.''  सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली.  क्लास बी अशी शिफारस झाली.  पण ती वॉरंटावर न लिहितां तोंडीच पोलिसास बजावण्यांत आलें.  त्या हलगर्जीपणामुळें तुरुंगात दोन आठवडे तिसर्‍या वर्गाचें सुख अनुभवास आलें.

खटल्याचा फार्स संपल्यावर मित्र या नात्यानें मी मॅजिस्ट्रेट हुल्याळ यांच्या पत्‍नीस भेटलों. त्याच्या पत्‍नीचे डोळे अश्रूंनीं भरले होते.  मीं विनोदानें म्हटलें ''आपल्याच नवर्‍याचा म कैदी असून आपण अश्रु गाळतां !''  एक अंजीर खाऊन पाणी पिऊन मीं मोटारींत बसलों.  सायंकाळीं ७ वाजतां येरवडा तुरुंगांत दाखल झालों.  मुक्त नेसूंचें धोतर व अंगांतला सदरा ह्याशिवाय माझे सर्व कपडे एका पार्शी वॉर्डरनें काढून घेतले.  मी तिसर्‍या वर्गाचा सक्तमजुरीचा कैदी म्हणून मला एकानें झोंपावयाला जाडेंभरडें तरट व पांघरावयाला तसेंच कांबळें दिलें.  ना उशी ना चादर, पण दिवसभर झोंप लागली.  पहिल्या आठवड्यांतच माझें ४।५ पौंड वजन कमी झालें.  तुरुंगाच्या धक्क्यानें असें प्रथम प्रथम होतें.  पण पुढें तें भरून निघतें.  तुरुंगाच्या बाहेरच्या भिंतीला लागूनच अंधारी म्हणून जो भाग आहे त्यांत मला ठेवण्यांत आलें.  रात्रीं खोलींत प्रकाश नसे.  म्हणून ह्या भागाला कदाचित् अंधारी हें नांव असावें.  पण पूर्वी ह्या भागांतील खोल्यांत दिवसासुद्धा अंधार असावा.  त्याशिवाय अंधारी हें नांव ह्या भागाला अन्वर्थक नाहीं.  कारण, ह्याच्याच पूर्वेकडील भाग स्वच्छ आणि प्रशस्त होता.  अंगणांत झाडें, स्नानास हौद वगैरे चांगली व्यवस्था होती.  रात्रीं दिवेही असत.  मला १५ दिवसांनीं 'बी' क्लास मिळाल्यावर ह्या चांगल्या भागांत माझी बदली झाली.  महात्मा गांधी वगैरे मोठ्या पुढार्‍यांनाहि पुढें ह्याच वॉर्डांत ठेवण्यांत आलें होतें.  

भास्करराव जाधव  :   ता. १ जुलै १९३० रोजीं रा. भास्करराव जाधव मला मुद्दाम भेटावयास आले.  त्या वेळीं ते शिक्षणमंत्री होते.  रुप्याचे छडीचा भालदार घेऊन आल्यामुळें चहूंकडे तुरुंगांत खळबळ उडाली.  सुपरिंटेंडेंटच्या खोलीमध्यें भासकररावांकडे मला नेण्यांत आलें.  मला पोंचवून सुपरिंटेंडेंट जेव्हां जाऊं लागले तेव्हां मीं त्यांना बसण्याची विनंती केली.  इतर कोणी भेटावयास आलें असतां कैद्याला १५ मिनिटांपेंक्षां अधिक वेळ भेटण्याची परवानगी नसते.  पण भास्करराव तब्बल दोन तास माझ्याशीं बोलत बसले तरी उठेनाताच.  ते मराठींत बोलूं लागले.  भास्कररावांना मीं ''कां आलांत ?'' असें विचारलें.  ''एरव्हीं समाचाराला आलों'' असें सांगून ते म्हणाले, ''आतां तुम्ही वृद्ध झालां आहांत.  तुम्हांस विश्रांतीची जरुरी आहे.  ती घेण्याचें निश्चित करीत असाल तर मी तुम्हांस नेण्यासाठीं आलों आहें,'' मीं म्हटलें, ''विश्रांतीच जर मला पाहिजे आहे, तर मला येथल्याइतकी बाहेर दुसरीकडे कोठें मिळणार नाहीं.  आणि आमच्यासारखी मंडळी येथें असली तर बाहेरचीही थोडी गडबड कमी होईल.''  भास्करराव म्हणाले, ''अहो, काय बाहेर वणवा पेटला आहे.  शहरांतून आणि खेड्यांतून सारखीच धामधूम चालली आहे.''  ''असें जर आहे तर आम्हांला येथेंच राहूं द्या'' मीं म्हटलें.  ''मी येथें येण्यापूर्वी जर तुम्ही मनांत आणलें असतेंत तर मी येथें आलोंही नसतों.  येथें आल्यावर मला बाहरे नेण्याचें मनांत आणून काय उपयोग ?''  असा एकमेकांच्या मनांतला भाव एकमेकांस कळल्यावर, मग ब्राह्मणेतर पक्षाविषयीं बोलणें सुरू झालें.  ''ब्राह्मणेतर पक्षाची संघटना चांगली होत नाहीं, काम होत नाहीं'' वगैरे वगैरे माझीं स्पष्ट मतें मीं सांगितलीं.  एकंदरींत हें संभाषण आणि ही भेट मला आंधळ्या कोशिंबिरीप्रमाणें वाटली.

तुरुंगांतील दिनचर्या  :  'सी' क्लास व 'बी' क्लास यांतील फरक असा आहे.  'सी' क्लासच्या कैद्यांना सकाळीं १ वाडगाभर जोंधळ्याची कांजी मिळते.  मग १० वाजतां १ किंवा बाजरीच्या भाकरी आणि मुगाची आमटी.  संध्याकाळीं ५ वाजतां पुन्हां तेंच जेवण मिळतें.  नेसावयास खादीचे दोन मांडचोळणे व दोन सदरे मिळतात.  निजावयास एक काथ्याचें तरट व दोन कांबळीं.  'बी' क्लासला कांजीच्या ऐवजीं सकाळीं ७ वाजतां अर्धा शेर दूध, १० वाजतां चपाती, भात, वरण, एक भाजी, लोणी व साखर.  संध्याकाळीं ५ वाजतां तेंच जेवण.  दोन्ही क्लासला चटणी वगैरे कांहीं तिखट मिळत नाहीं.  'बी' क्लासला नेसावयास ठराविक धोतराचीं पानें, अंगांत दोन सदरे, डोक्यास खादीची गांधी टोपीसारखी टोपी.  निजावयास एक गादी, एक चादर, एक उशी आणि अंथरावयास दोन कांबळीं.  भांडीं 'सी' क्लासला १ उथळ वाडगा व १ कथलाचें टमरेल एवढींच भांडीं मिळतात.  'बी' क्लासला ऍल्युमिनियमचें ताट, तांब्या, दोन वाडगे हीं भांडीं मिळतात.  कैद्यांनीं हीं भांडीं वरचेवर स्वच्छ ठेवावींत अशी ताकीद मिळे व त्यांची तपासणी होत असे.  रोज सकाळीं डॉक्टर येऊन कैद्यांची तपासणी करीत असे.  रोग्यांस औषण आणून देत.  'बी' क्लासला खोलींतच औषध मिळे.  'सी' क्लासला दवाखान्यांत जावें लागे.  आजार गंभीर असल्यास रोग्याची तुरुंगांतील हॉस्पिटलांत रवानगी होई.  दर आठवड्यांला स्वतः जेल सुपरिंटेंडेंट येऊन प्रत्येक कैद्याची तपासणी करून कांहीं गरजा, अडचणी असल्यास ऐकत असे.  त्याच्याबरोबर जेलर, असिस्टंट जेलर, वॉर्डर वगैरे असत.  एक असिस्टंट जेलर रोज कैद्यांस येऊन भेटून जात असे.  ही सर्व बडदास्त राजकीय 'बी' कैद्यांसाठींच असे.  'बी' क्लासचे सगळे कैदी एकाच वॉर्डांत ठेवण्यांत आले होते.  त्यांना एकमेकांच्या खोलींत जाण्यास मनाई असे; पण व्हरांड्यांत किंवा अंगणांत बोलण्यास हरकत नसे.

तुरुंगांतील कामें :   'बी' क्लासच्या सक्तमजुरीच्या कैद्यांना काथ्याचीं जुनीं तरटें उकलणें आणि उकललेल्या काथ्यांची पुन्हा नवीन दोरखंडें बनवणें हें काम सकाळीं सातपासून १० पर्यंत व दुपारीं १२ पासून ४ पर्यंत असें एकंदर ७ तास असे.  'सी' क्लासला बाहेरचीं कष्टाची कामें मिळत व धट्टयाकट्टया माणसास चक्की मिळे.  म्हातार्‍या माणसांना सवलतीनें काम मिळे.  पण काथ्या वळण्याचें काम फार श्रमाचें नसल्यानें माझें वय ५८ वर्षांचें होतें तरी माझ्या आणि माझ्याबरोबर इतर तरुण कैद्यांच्या कामांत कांहीं फरक होत नसे.  नित्य उठून ह्या प्रकाराशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नसल्यानें कैद्याच्या मनांत उदासीनता येत असे.  आमच्या दालनाच्या समोरील अंगणांत पूर्व बाजूस एक कलमी आंब्याचें ठेंगणें झाड व पश्चिम बाजूस एक लिंबाचें झाड हिरव्यागार पालवीनें वांकलेलें दिसे.  वरचेवर आम्ही त्यांच्याजवळ जाऊन आमच्या मनाची उदासीनता घालवीत असूं.  दर पंधरवड्यांनें आमचीं वजनें घेण्यांत येत असत.  ता. १०।८।३० रोजीं माझें १४४ पौंड वजन भरलें.  तीन महिन्यांत माझें १२ पौंड वजन कमी झालें.

आमांश व गाउटचा आजार  :  येथें आल्यापासून मी जून महिन्याचे शेवटीं आमांशानें आजारी पडलों.  त्यांतच मला   म्हणजे बोटांतील संधिवाताचा विकार झाल्याचें कळलें. माझ उजव्या पायाचीं तीन बोटें नखाजवळ पाळीपाळीनें दुखूं लागलीं.  हा आजार मला पूर्वी कधीं झाला नव्हता.  मला हॉस्पिटलांत सुमारें ८ दिवस ठेवण्यांत आलें.  ता. १४ ऑगस्टला घरची मंडळी भेटण्यास आली, तेव्हां हॉस्पिटलांतून भेटण्याचे ठिकाणीं जाण्याचीसुद्धां मला शक्ति नव्हती.  कसाबसा भेटून परत आल्यावर अंगांत ताप चढला.  रात्रभर बोट ठणकून फार त्रास झाला.  प्रकृतीची काळजी वाटूं लागली.  दुसरे दिवशीं सुजलेलें बोट फुटलें.  ता. ९ पासून १९ पर्यंत हॉस्पिटलमध्येंच होतों. बोटांतून पू गेल्यामुळें आराम पडला.  अंधारींत परत आलों.  ऑगस्टच्या शेवटीं पुन्हां थोडासा आमांशाचा विकार झाला.  हा अंथरुणांत पडण्यासारखा आजार नाहीं.  नेहमींप्रमाणें खाणेंपिणें चालू असून काम पण करीत असे.  रोज काथ्या वळण्याचें काम करावें लागल्यामुळें हाताचीं बोटें दुखत.  पडल्या जागीं उठतांनाही श्रम होतात.  हा प्रताप वार्धक्याचा कीं तुरुंगाचा हें कळेना.

तुरुंगांतील धर्माचरण  :   तरुंगांत हिंदु व मुसलमान कैद्याला धर्माचरण करण्याचें कांहीं साधन नाहीं.  पण रोमन कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट या ख्रिस्ती पंथांची साप्‍ताहिक उपासना चालू असते.  मला अशा उपासनांची फार गरज भासूं लागली.  तेव्हां सुपरिंटेंडेंटच्या परवानगीनें मी कॅथॉलिक उपासनेस दर मंगळवारीं जाऊं लागलों.  येथें येवरड्यांचे फादर लॉडर हे उपासक असत.  उपासना सकाळीं चालू असे.  आम्हांला 'इलेस्ट्रेटेड विकली' हें इंग्रजी साप्‍ताहिकच काय तें वाचावयास मिळे.  'विविध वृत्त' आम्हांस वाचावयास मिळणार अशी बातमी असि. जेलर मि. रॉजर यानें सांगितली.  म्हणून आम्ही त्याबद्दल अधिकार्‍यांकडे वारंवार पृच्छा केली असतांही अधिकार्‍यांनीं त्यास सफाईनें बगल दिली.  आमच्या वॉर्डांतील आम्ही चौदा कैदी दर रविवारीं तें पत्र आधाशासारखें वाचून काढीत असूं.  राजकीय वार्तेची ह्यांत गंधवार्ताही नसे.  म्हणून या पत्राची निवड झाली होती.  सोमवारीं पुन्हां हें आमच्याकडून काढून घेण्यांत येत असे.  मजकूर संपल्यावर केव्हां केव्हा आम्ही जाहिरातीसुद्धां वाचीत असूं.  त्या वेळीं राजकीय पखाचीं व गांधींचीं सरकारशीं समेटाचीं बोलणीं चाललीं होतीं.  सप्रू, जयकर हे शांतिदूत गांधींना वरचेवर येऊन भेटून जात असत.  तुरुंगाच्या दारावरील दुसर्‍या मजल्यांतील सुपरिंटेंडेंटच्या ऑफिसांत त्यांचीं बोलणीं चालत असत.  बोलणीं समजलीं नाहीं तरी खालीं आवाज ऐक येई.  त्यावरच आम्ही तृप्‍ति मानून घेत असूं.

Read more: सत्याग्रह व तुरुंगवास

शेतकरी चळवळ

१९२६-२७ च्या सुमारास गुजराथचे सरदार वल्लभभाई पटेल यांनीं बार्डोलीस करबंदीची अपूर्व चळवळ काढली आणि विलक्षण धाडस व घटना करून ती सरकारविरुद्ध यशस्वी करून दाखवली.  तीमुळें सबंध मुंबई इलाख्यांत शेतकर्‍यांमध्यें अपूर्व जागृति होत चालली होती.  अशा मुहूर्तावर मुंबई कौन्सिलांत सरकारपक्षानें दोन बिलें आणलीं होतीं.  एक सारावाढीचें व दुसरें तुकडे-बिलाचें.  हीं दोन्ही लोकांना अत्यंत अप्रिय होतीं.  मुंबई इलाख्यांत विशेषतः महाराष्ट्रांत मालकीच्या जमिनींचे वारसाहक्कानें अगदीं लहान लहान तुकडे इतके पडत चालले होते कीं, शेतकर्‍याच्या वैयक्तिक दृष्टीनें आणि राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनें, पडत जाणार्‍या शेतकीच्या जमिनींचे हे तुकडे अत्यंत अनिष्ट होते हे खरें; पण दुसर्‍या बाजूनें मोठमोठे जमिनींचे भाग मोठमोठ्या भांडवलदार मंडळींनीं विकत घेऊन साखरेचे कारखाने संयुक्त भांडवलाचे जोरावर चालवण्याचें सुरू केलें होतें.  त्या व्यापार्‍यांमध्यें परकीय भांडवलदारही पुष्कळ होते.  म्हणून ह्या भांडवलदारांच्या कारवाईमुळें जनतेंत मोठा संशय पसरत होता.  अशा स्थितींत हीं दोन बिलें सरकारी रीतीनें लोकांपुढें यावयास नको होतीं.  १९२८ सालच्या पावसाळ्यांत मुंबई सरकारचें कौन्सिल पुणें येथें आल्यावर, हीं दोन बिलें सरकारास तांतडीनें पार पाडून घ्यावयाचीं होतीं.  मुंबई सरकारचे जमाबंदीचे दिवाण सर सी. व्ही. मेहेता यांनीं ह्या बिलांचा पुढाकार घेतला होता.  म्हणून या इलाख्यांतील प्रजापक्षानें ह्या परिषदेचें काम मोठ्या तांतडीनें व हिंमतीनें चालवलें होतें.

पुणें येथील रे मार्केटांत सुरू झालेल्या मुंबई इलाख्यांतील मराठी बोलणार्‍या जिल्ह्यांतील शेतकरीवर्गाची परिषद् सुरू झाली.  त्या परिषदेला महाराष्ट्र व कर्नाटक येथील निरनिराळ्या जिल्ह्यांतून सुमारें ५००० शेतकरी आले होते.  सर्व पक्षांची आणि निरनिराळ्या मतांची पुढारी मंडळी हजर होती.  दूरहून भाकरी बांधून आलेल्या शेतकरी मंडळींनीं रे मार्केट चिक्कार भरून गेलें होतें.  ह्या परिषदेसाठीं मंडईंतल्या भाजीवाल्या लोकांनीं आपापलीं दुकानें बंद ठेवलीं होती.  स्वागताध्यक्ष श्री. बाबूराव जेधे ह्यांचें भाषण झाल्यावर अध्यक्षस्थानीं माझी योजना व्हावी असें सुचविलें.  अनुमोदन दे. भ. तात्यासाहेब केळकर यांनीं दिलें.  

अध्यक्षीय भाषण  :  ''गेल्या आठवड्यांत मी बंगालच्या फिरतीवर निघालों होतों.  कलकत्त्यास ब्राह्म समाजाची शतसांवत्सरी असल्यानें मला तिकडे जाण्याची निकड लागली होती.  पण इतक्यांत मुंबईत असतांना ह्या परिषदेच्या स्वागताध्यक्षांकडून मला जरुरीची तार आली आणि पकडवारंटानें धरून आणून मला ह्या स्थानीं बसविण्यांत आलें आहे.  दलित अस्पृश्यांची आजपर्यंत यथाशक्ति ब्राह्म समाजानें सेवा केली आहे.  आतां शेतकरीवर्ग दलित होऊं लागला आहे.  अस्पृश्यांची अस्पृश्यता तिकडे कमी होऊं लागली आहे, तर इकडे सरकारनें दुसरा एक दलितवर्ग मोठ्या प्रमाणांत निर्माण करण्याचा चंग बांधला आहे.  हें काम धार्मिकच समजून मीं पत्करलें आहे....''

परवां मीं एक सत्यशोधकी जलसा पाहिला.  त्या जलश्यांतील अगदीं पिळून निघालेल्या बाळा पाटलानें खालील टाहो फोडला.  

’’शेतकर्‍यांचा कुणी न्हाई वाली ।
मुलाबाळांची - माझ्या बाळांची ।
दशा कशी झाली ! ॥  शेतकरी - ई - ई - अ !!''

संस्थानांतील स्थिति  :  जगांतील एका अत्यंत बुद्धिवान, संपत्तिमान् व पराक्रमी लोकांचें ह्या देशावर शंभर वर्षे राज्य चालून देशांतील ९१० लोकांची ही केविलवाणी लोकस्थिति असावी आणि इकडे या राज्यकर्त्यांच्या टेकडीवरील हवाशीर राजवाड्यांत नाचरंग, तमाशे ह्यांची झोड उठावी !  धिक्कार असो ह्या राजनीतीला.  इकडील नोकरशाही आमची ट्रस्टी असल्याचें आम्हांस भासवीत आहे.  ट्रस्टींचा हिंदुस्थानाला हा एक मोठा रोगच जडला आहे म्हणायचा.  ह्या ट्रस्टी रोगानें आम्ही गेलीं शंभर वर्षे हैराण झालों असतां गेल्या दहा वर्षांत 'मंत्री रोग' म्हणून एक नवीनच व्याधि ह्या भल्या ट्रस्टी मंडळानें सुधारणेच्या नांवाखालीं सुरू केली आहे आणि तीही आमच्या सुधारणेच्या नांवाखालीं !  परकीय ट्रस्टी आणि स्वकीय मंत्री ह्यांचा मिलाफ झाल्यामुळें आतां कांहीं धडगत नाहीं अशी हवालदील अवस्था आमची झाली आहे.  नोकरशाहीची पोलादी चौकट आधींच काय कमी बळकट होती ?  तिलाच तेल रोगण लावून ठाकठीक ठेवण्यांत आम्ही आमचे प्रतिनिधि म्हणून पाठवून दिलेल्या भरंवशाच्या पुढार्‍यांनीं मंत्रिपदावरून सज्ज व्हावें ही कोण आपत्ति ?  अशा स्थितींत शेतकर्‍यांना आकश फाटलें असल्यासारखें झाल्यास काय नवल ?  हा देश म्हणजे शेतकर्‍यांचा.  शेंकडा ऐशींहून जास्त लोकांचा निर्वाह केवळ शेतीवर चालतो.  अज्ञान, दारिद्र्य आणि असहाय्यतेच्या गाळांत देशाचा ८३१०० भाग गुंतला असतां आम्ही थोडी शिकलेली दुबळी मंडळी स्वराज्याच्या काय गप्पा मारीत बसतों आहोंत !  इंग्रजी अमदानींत गिरण्या, गोद्या वगैरे मोठ्या भांडवलाचे धंदे सुरू झाल्यानें खेड्यांतील कसदार तरुणांचा ओघ शहराकडे वळला आहे.  खेड्यांत आणि लहान भांडवलाचे मारवाडी व ब्राह्मणादि पांढरपेशा जातींचे सांवलींत सोकावलेले लोक अडाणी शेतकर्‍यांस आपल्या सावकारी जाळ्यांत गुंतवून त्यांच्या जमिनीचे आपण कर्ते मालक होऊन बसले आहेत.  शेतकरीवर्ग आपल्याच शेतावर खंडदार होण्याचीही ऐपत न उरल्यामुळें मजूर बनत चालला आहे.  सतत फसवला गेल्यामुळें त्याची स्वतःचीहि परंपरागत दानत आणि नीति बिघडून तो गांवगुंड बनूं लागला आहे.  मी गेल्या फेब्रुवारीच्या सुमारास ऐन हंगामाचे दिवसांत सांगली-जमखंडी संस्थानांतील कृष्णातंटाकावरील गांवेच्या गांवे आणि खेडींच्या खेडीं एक महिनाभर हिंडत होतों.  हा भाग पिकांविषयीं प्रसिद्ध आहे.  परंतु खेडींच्या खेडीं शेतकरी मालकांच्या ताब्यांतून स्वतः शेती न करणार्‍या उपटसूळ लोकांच्या ताब्यांत गेलेलीं पाहून माझें काळीज फाटलें. संस्थानांत शेतकर्‍यांच्या संरक्षणाचे कायदे नाहींत.  व्याजाची दामदुप्पटच नव्हे तर पांचसहापट झाली तरी नवीन दस्तऐवज करून ब्राह्मण-मारवाडी सावकारांनीं सबंध गांवचें गांव बळकावल्याचें मीं प्रत्यक्ष पाहिलें.  

दुहेरी व्यवस्था :  तुकडे एकत्र करण्यासाठीं जर लहान लहान शेतकर्‍यांची जमीन घ्यावयाची तर त्यांना मोबदला पैशांनीं न देतां मोठमोठ्या तुकड्यांच्या मालकांकडून कांहीं भाग घेऊन तो त्या लहान शेतकर्‍यांना देण्याची कां व्यवस्था नसावी ?  अशी दुहेरी व्यवस्था झाल्यास पैशाचा मोबदला कोणासही व्यावा न लागून जमिनीची नुसती अदलाबदल मात्र होणार आहे.  असें करण्यांत अडचण जास्त येईल हें खरें; पण न्यायही जास्त होईल. परंतु कोणतेंही सरकार श्रीमंत लोकांचें मिंधेंच असणार !  थोड्यां श्रीमंतांच्या असंतोषापेक्षां पुष्कळ गरिबांवर जुलूम करणें सरकारला नेहमीचेंच सोयीचें असतें.  पण ह्याचा परिणाम क्रांतिकारक झाल्याशिवाय राहणार नाहीं.  सामुदायिक हिताच्या दृष्टीनें लहान तुकड्यांच्या एकीकरणाप्रमाणेंच मोठ्या तुकड्यांची विभागणीही हितावह ठरणार.  म्हणून सरकारनें आपण हें काम न करतां परस्पर साहाय्यकारी मंडळ्या, लोकडबोर्डे व ग्रामपंचायतींच्या द्वारां कां करूं नये ?

सारावाढ  :   ह्या सारावाढीचें जें दुसरें बिल आणलें आहे तें तर उघड अन्यायाचें व जुलमाचें आहे.  हल्लींचाच सारा देण्याचें त्राण शेतकर्‍यांत उरलें नाहीं.  त्यांत आणखी जबर भर करावयाची म्हणजे सरकारी निष्ठुरतेची कमाल आहे.  बॅकबे डेव्हलपमेंट, सक्कर बॅराज असलीं अत्यंत खर्चाचीं कामें काढल्यामुळें आणि तीं अत्यंत अंदाधुंदीनें चालल्यामुळें मुंबई सरकारचें जवळजवळ दिवाळें निघालें आहे.  अशा वेळीं कोणीकडून तरी पैसा उकळण्याची सरकारला घाई असणार.  म्हणून त्यानें गरीब व मुक्या प्रजेवर जुलूम करण्याचे धाडस चालवलें आहे.

जमिनीचे हक्कसंबंध हे फार पुरातन आणि पवित्र विषय आहेत.  लोकांच्या धर्मसमजुतींत हात न घालण्याचा तिर्‍हाईतपणा जसा सरकारनें बाळगला आहे, तसाच जमिनीच्या हक्कसंबंधांतही त्यांनीं बाळगावयास पाहिजे आहे.  म्हणून केवळ फायद्यातोट्याच्या दृष्टीनेंच नव्हे तर तत्त्वदृष्टीनेंही प्रजेनें सरकारला जोराचा विरोध करणें इष्ट आहे.  बार्डोलीनें आपलें नांव इतिहासांत अजरामर केलें आहे.  पण बार्डोलीचें रणकंदन कितीही घोर असलें तरी पुढें जें याहूनही मोठें रणकंदन माजणार आहे त्याचा हा ओनामा आहे आणि त्याचें श्रेय ब्रिटिश नोकरशाहीलाच आहे.

या परिषदेचें बरेंचसें श्रेय जेधेबंधूंकडे आहे.  आलेल्या सर्व शेतकर्‍यांना जेध्यांनीं आपल्या खर्चानें जेवण घातलें.  चळवळीचें प्रचंड स्वरूप पाहून सरकारनें लागलीच नमतें घेतलें आणि हीं दोन्हीं अप्रिय बिलें काढून घेतलीं.  इतकें अपूर्व यश कोणत्याही लोकचळवळीला आलें नसेल.  पण ह्या यशामुळें चळवळीची कायम घटना होण्याचें काम थबकलें.  आतांपर्यंत सर्व पक्षांनीं मिळून काम केलें होतें.  तें तसें पुढें चालेना.  दुसर्‍याच दिवशीं जेधे मॅन्शनमध्यें स्टँडिंग कमिटीची सभा झाली.  तींत ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा वाद सुरू झाला. ब्राह्मणेतरांनीं निराळ्या तर्‍हेनें स्वतंत्रपणें काम सुरू करावें अशी चळवळ जवळकरांनीं सुरू केली.  जेधेबंधूंचें राष्ट्रीय पक्षाकडे लक्ष लागलें होतें, पण त्यांचा ब्राह्मणेतर पक्षांतही पाय रुतला होता.  त्यांतून पूर्ण निघाला नव्हता.  ह्याच सुमारास बागलाण प्रांतांत शेतकर्‍यांच्या गार्‍हाण्यांसंबंधीं चौकशीचें काम चाललें होतें.  महाराष्ट्रदेश म्हणजे आपसांतील दुहीबद्दल प्रसिद्धच आहे.  कोणतीही चळवळ कायम चालावयाची झाल्यास कोणत्या तरी एकाच पक्षानें ती चालवावयास पाहिजे.  माझ्यासारख्या पक्षातील पुढार्‍यानें सर्व पक्षांना किती जरी थोपवून धरलें तरी त्याचा कायमचा टिकाव लागत नाहीं हें अनुभवास आलें.  

मला कलकत्त्याच्या साधारण ब्राह्मसमाजाच्या शतसांवत्सरिक उत्सवासंबंधीं जावयाची निकड लागली होती.  पक्षांचा चाललेला हा बखेडा मागें टाकून मी ता.२ ऑगस्ट रोजीं पुण्याहून निघालों.  ह्या सफरीवर कलकत्त्यापर्यंत कोल्हापूरचे रा. गोविंदराव सासने होते.  मुंबईहून सकाळीं ता. ४ ला निघून दोन प्रहरीं दोन वाजतां नांदगांव येथें उतरलों.  तेथील मराठा बोर्डिंग पाहून दुसरे दिवशीं सकाळीं धुळ्यास पोंचलों.  श्री. शंकरराव देव यांच्या घरीं उतरलों.  सायंकाळीं सुमारें ३००० शेतकर्‍यांची प्रचंड सभा भरली.  'शेतकरी आणि सरकार' ह्या विषयावर माझें व्याख्यान झालें.  मोठा उत्साह दिसला.  डॉ. घोगरे ह्यांचे मराठा बोर्डिंग पाहिलें.  तरुण ब्राह्मणेतर संघानें माझें दुसरें एक जाहीर व्याख्यान करवलें.  माझा दौरा व ही शेतकरी परिषद वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्यानें जळगांव, उमरावती, नागपूर वगैरे ठिकाणीं शेतकर्‍यांच्या प्रचंड जाहीर सभा भरविण्यांत आल्या.  विषय पूर्वीचाच होता.  ह्या सुमारास वर्‍हाड-मध्यप्रांताच्या कौन्सिलांत शेतकरीच्या कुळांना संरक्षण देण्यासंबंधींचें बिल आलें होतें.  नागपूरच्या जाहीर सभेंत रुईकर अध्यक्ष होते.  माझें दीड तास भाषण झालें.  ता. १६ रोजीं मी कलकत्त्याला पोचलों.  तेथें महाराष्ट्रीय मंडळानें आपल्या गणपतीपुढें सुभाषचंद्र बोस ह्यांचें व्याख्यान ठरवलें होतें.  माझी अध्यक्षस्थानीं योजना झाली होती.  त्या वेळीं बंगाल्यांत एक कुळकायद्याचें बिल कौन्सिलपुढें आलें होतें.  बंगाल्यांतील राष्ट्रीय पक्ष जमीनदान असल्यानें ह्या बिलास अनुकूल नव्हता.  पुणें परिषदेची हकीकत सांगून बंगालच्या राष्ट्रीय पक्षानें आपलें धोरण बदललें पाहिजे असें मीं बजावलें.  एकदोन महिन्यांनीं बंगालहून पुण्यास परत आल्यावर शेतकरी परिषदेच्या स्टँडिंग कमिटीचें काम बंद पडलेलें दिसलें.  दोन चार वेळां रा. केशवराव जेध्यांना विचारलें तरी ते लक्ष घालीनात.  शेवटीं कमिटीच्या सभासदत्वाचा त्यांनीं राजीनामा दिला.  तथापि जेधेबंधूंचें लक्ष दिवसेंदिवस राष्ट्रीय सभेकडे जास्त लागलें हा ह्या परिषदेचाच सुपरिणाम म्हणावयाचा.  तात्यासाहेब केळकर व इतर ब्राह्मण पुढार्‍यांनीं सरकार वल्लभभाईंना बोलावून लँड लीग नांवाखालीं एक नवीनच उपक्रम सुरू केला.  त्या लीगच्या घटनेचे नियम करतांना मला मुद्दाम आमंत्रण पाठवलें होतें.  त्या वेळीं ही लँड लीग नसून लँड-लॉर्ड-लीग आहे असें मीं सरदारभाईंना कळवलें.  अखेरीस परिषदेप्रमाणें लीगकडून कांहीं काम झालें नाहीं.  मात्र शेतकर्‍यांमधील जागृति दोन तीन वर्षे टिकून होती.  नाशिक जिल्ह्यांत तालुका चांदवड येथें, सातारा जिल्ह्यांत बोरगांवांत, भोर संस्थानांत बेंबटमाळ येथें आणि सांगली संस्थानांत तेरमाळ येथें शेतकरी परिषदा माझ्या अध्यक्षतेखालीं भरल्या, शेवटीं नवीन सुधारलेला कौन्सिलप्रवेश सुरू झाला.  त्या दंगलींत ही शेतकरी चळवळ लय पावली.

व्हायकोम सत्याग्रह

१९२४ चा पावसाळा सुरू झाला.  तसाच त्रावणकोर या संस्थानच्या व्हायकोम या गांवीं मोठा सत्याग्रह सुरू झाला.  व्हायकोम येथील देवळांतच नव्हे तर देवळाला जाण्यायेण्याच्या वाटेवरही मोठमोठ्या प्रतिष्ठित पण अस्पृश्य मानलेल्यांस जाण्यास कायदेशीर मनाई होती.  म्हणूनच स्वामी विवेकानंदांनीं 'मलबार म्हणजे एक वेड्यांचें इस्पितळ' असें म्हटलें होतें. अशा देवळांच्या वाटेवर जाण्याला ख्रिस्ती, मुसलमान वगैरे कोणत्याही परधर्मीयाला केव्हांही मनाई नव्हती.  इतकेंच नव्हे तर देवळाच्या मंडपांत व बाह्य मंडपांत अशा परकीयांना प्रतिष्ठितपणें नेण्यांत येत असे.  हा विलक्षण अन्याय हाणून पाडावा म्हणून व्हायकोमला सत्याग्रह सुरू झाला.  हा विषय मुख्यतः सामाजिक सुधारणेचा होता तरी गांधींच्या नवीन राजकारणामुळें त्यास उग्र राजकीय स्वरूप प्राप्‍त झालें होतें.  कांहीं अस्पृश्यवर्गीय मंडळी ह्या सत्याग्रहापूर्वी कित्येक वर्षे आर्य समाज, ब्राह्म समाज व थिऑसफी वगैरे नवीन धर्मपंथांतून सभासद म्हणून दाखल झाली होती.  त्यांनादेखील रस्त्यावर जाण्यास अटक होऊं लागली.  लाहोरचे स्वामी श्रद्धानंद आर्य समाजाचे वतीनें, कालिकतचे मंजिरी रामय्या (ज्यांनीं कलकत्त्याच्या काँग्रेसमध्यें अस्पृश्यतेच्या विरुद्ध प्रथम ठराव आणला) थिऑसफीच्या वतीनें वगैरे सुधारक मंडळी ह्याच सत्याग्रहांत मोठ्या अटीतटीनें भाग घेत होती.

साधु शिवप्रसाद  :   अशा वेळीं मलबार प्रांतांतील ब्राह्मसमाजाचे सभासदच नव्हे तर एक प्रचारक, साधु शिवप्रसाद नांवाचे तरुण व्हायकोमला गेले.  ते पूर्वाश्रमींचे तिय्या जातीचे होते.  म्हणून इतर अस्पृश्यांप्रमाणें त्यांनाही मनाई झाली.  त्यांनीं तो वृत्तांत कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजाच्या कमिटीकडे लिहून कळवला.  साधारण ब्राह्म समाजाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्राणकृष्ण आचार्य यांनीं त्रावणकोर दरबाराकडे जाहीर विनंतीपत्र पाठवून ह्या बाबतींत ताबडतोब दाद मागितली आणि मी साधारण ब्राह्म समाजाचा मंगलोर येथील प्रतिनिधि म्हणून पत्राची एक प्रत मजकडे पाठवून मीं समक्ष व्हायकोम येथें जावें आणि श्यक्य असेल तो प्रयत्‍न करावा अशी सूचना मला करण्यांत आली.  मलबार प्रांतांत ब्राह्म समाजाचा प्रचार करणारे साधु शिवप्रसार यांचींही मला वेळोवेळीं पत्रें येऊं लागलीं आणि व्हायकोम येथेंच नव्हे तर त्या प्रांतांत प्रचारकार्यासाठीं मीं मदत करावी म्हणून दक्षिण व उत्तर मलबारांत दौरा काढावा असा त्यांचा तगादा लागला.  मी हें प्रकरण मंगलोर समाजाच्या कमिटीपुढें ठेवलें; पण कमिटीला नको म्हणण्याचें धैर्य होईना व हो म्हणण्याचेंही आवडेना.  पैशाचाच प्रश्न (दौर्‍याच्या खर्चाचा) असेल तर तो भाग मी पाहून घेतों, पण ज्या अर्थी अस्पृश्यसेवा हें माझ्या ब्राह्म प्रचाराचें मुख्य अंग आहे आणि ज्या अर्थी कलकत्त्याच्या ब्राह्म समाजाच्या अध्यक्षांनी मीं व्हायकोमला जावें म्हणून सुचवलें त्या अर्थी हा दौरा काढणें माझें कर्तव्य आहे, आणि मंगलोर ब्राह्म समाज कमिटीला कोणतीही हरकत घेणें शक्य नाहीं.

व्हायकोम सत्याग्रहाची धामधूम   :   कालिकत ब्राह्म समाजाचे सेक्रेटरी डॉ. गोपालन् हेही पूर्वाश्रमींचे अस्पृश्यच होते.  त्यांना माझा दौरा अत्यंत पसंत पडला.  त्यांनीं कालिकतला बोलावलें.  खर्चाची तजवीज केली.  साधु शिवप्रसाद ह्यांना कालिकतला बोलावलें.  दौर्‍याचा कार्यक्रम ठरून मे महिन्यांत मी व साधु शिवप्रसाद व्हायकोमला गेलों.  त्यापूर्वी कालिकत येथें व्हायकोम सत्याग्रहाविषयीं एक प्रचंड जाहीर सभा झाली.  अर्थात् तींत स्थानिक राजकीय पुढार्‍यांनीं भाषणें केलीं.  माझेंही भाषण झालें.  तें मद्रासच्या वर्तमानपत्रांतून जाड मथळ्याखालीं प्रसिद्ध झालें.  तें पाहून मंगलोर समाजांतील सोंवळ्या बिल्लव मंडळींचें धाबें दणाणलें.  व्हायकोम हा लहानसा तालुक्याचा गांव होता.  त्या ठिकाणीं हजारों सत्याग्रही आणि इतर प्रेक्षक यांचा प्रचंड तळ पडला होता.  आर्य समाजाचे आणि शीख समाजाचे जथे एकावर एक येऊन थडकत होते.  शीखांनीं तर एक मोफत भंडारा चालवला होता.  सत्याग्रहांमध्यें नुसते अस्पृश्यच नसून नायर लोकांचा भरणाही होता.  कांहीं नंबुद्री तरुणही त्यांत होते हें विशेष होय.  साधु शिवप्रसाद व मी गेल्यावर तेथील सत्याग्रह्यांनीं आमचें आनंदानें स्वागत केलें.  व्याख्यानें होऊं लागली.  दुसरे दिवशीं साधु शिवप्रसाद यांना घेऊन मी सत्याग्रहास निघालों.  मी येण्यापूर्वीच माझीं सविस्तर वर्णनें फोटोसहित पोलिसकडे गेलींच होतीं.  मुख्य पोलीस कमिशनरच आज सत्याग्रहाच्या खुंटावर सज्ज उभे होते.  त्यांनीं मला ओळखलेलें पाहून फार आश्चर्य वाटलें.  रोज शंभर शंभर सत्याग्रहींचे जथे रस्त्यांतील कुंपणाजवळ आडवे बसत. वाव मिळाली कीं, आंत घुसण्याचा ते प्रयत्‍न करीत.  पोलीस त्यांना पिटाळून लावीत. एका वेळीं एका माणसाला जावयाला मिळेल इतकें अरुंद फाटक ह्या कुंपणास ठेवण्यांत आलें होतें.  त्याच्या दोन्ही बाजूंस दोन पोलीस अधिकारी उभे असत.  शिवप्रसादाला घेऊन मी ह्या अरुंद फाटकांतून जाणार हें आधींच प्रसिद्ध झालें होतें.  शिवप्रसादाच्या बगलेंत हात घालून मी ह्या फाटकांत आधीं शिरलों.  पोलिसांनीं मला जाऊं दिलें पण प्रमुख अधिकारी पोलीस कमिशनरनें माझ्या व शिवप्रसादांच्यामध्यें दांडकें घालून हंसत हंसत म्हटलें कीं, ''आपण खुशाल जा !  पण यांना जांता येणार नाहीं !''  मीं म्हटलें कीं, ''आम्ही दोघे ब्राह्म धर्माचे प्रचारकबंधु आहोंत.  आम्हां दोघांनाही न ओळखतां तुम्ही असा पंक्तिपंच कां करतां ?''  ''आम्ही आपल्याला पूर्ण ओळखतों.''  मीं त्यांना बजावलें कीं, ''मी येथून त्रिवेंद्रममध्यें दरबारला भेटावयास जाणार आहें.  तुम्ही आम्हांला बेकायदेशीर अटक करीत आहां याची पूर्ण जबाबदारी घेतां आहांत ना ?''  अधिकारी म्हणाले, ''आम्ही जें करीत आहोंत तें दरबारच्याच आज्ञेनें करीत आहोंत.  आपल्याला आम्हीं अटक केली नाहीं.  उलट पोलीस बरोबर देऊन तुम्हां एकट्यालाच सन्मानपूर्वक देऊळ दाखवण्याचीही आमची तयारी आहे.  मात्र तुमच्या बंधूंस तसें करतां येणार नाहीं.  कारण पूर्वाश्रमींचें ते कोण आहेत तें आम्ही ओळखवतों.''

दिवा व राघवैय्या  :  पुढें लगेच आम्ही त्रिवेंद्रम् येथें दिवाण राघवय्या यांची गांठ घेतली.  शिवप्रसाद बरोबर होतेच.  ब्राह्म समाजाच्या अध्यक्षाकडून त्यांना (त्रावणकोर दरबारला) ज्या ब्राह्म प्रचारकांवर व्हायकोम येथें अन्याय होत आहे म्हणून दाद मागण्याचा अर्ज आला होता तो आपणांस मिळाला काय असें विचारलें.  त्याचें उत्तर अद्यापि मिळालें नाहीं हें कसें ?  दिवाणानें उत्तर केलें कीं, ''त्या प्रश्नाचा विचार चालू आहे,'' मीं म्हटलें, ''आपला इकडे विचार चालू आहे तर तिकडे व्हायकोमला परवां आम्हांला अटक झाली याची वाट काय ?''  ते म्हणाले, ''झालेल्या प्रकरणांत थोडी कसूर झाली आहे हें खरें; पण ज्या अस्पृश्यांनीं ब्राह्म समाजाची दीक्षा घेतली आहे, त्यांनीं आपण हिंदु नाहीं असें जाहीर करावें म्हणजे त्यांची वाट खुली होईल !''  मीं म्हटलें, ''ब्राह्म समाज हा हिंदु आहे कीं नाहीं हा मोठा प्रश्न आहे.  तें ठरवणें दुसर्‍याचें काम नव्हे.  ब्राह्म समाज कोणीही असो.  हिंदु नसलेल्या परधर्मी गृहस्थांस मज्जाव नाहीं आणि ब्राह्म समाजिस्ट आपण हिंदु नाहींत असें जाहीर करीपर्यंत त्यांना मज्जाव; असा तुमच्या कायद्याचा अर्थ आहे काय ? असें असेल तर मी स्वतः महाराजांना भेटून खुलासा विचारणार आहे.''  दिवाण म्हणाले, ''महाराजांनीं हा सर्व अधिकार दरबारकडे दिला आहे.  ते तुम्हांला भेटणार नाहींत.''  यापुढें हुज्जत घालीत बसण्यांत अर्थ नाहीं असें समजून मीं दिवाणांस नम्रपणें सांगितलें, ''ह्या सर्व विसंगत प्रकाराचा पुकारा मी ठिकठिकाणीं जाहीर सभा भरवून करणार आहें.  आपली हरकत असल्यास कळवा.''  तेव्हां ते म्हणाले, ''तुमचे व आमचे मार्ग भिन्न आहेत व ते दोघांनाही मोकळे आहेत.  यापेक्षां जास्त कांहीं मी सांगूं शकत नाहीं.''  

मुंबई क्रॉनिकलमधील तार  :   यापुढें कोचीन व त्रावणकोर संस्थानांत ब्राह्म समाजाच्या प्रचारासाठीं आम्ही ठिकठिकाणीं गेलों.  कोचीनची राजधानी अर्नाकुलम् येथें आम्ही गेलों असतां तेथील प्रेस असोसिएटेडच्या एजंटनें मुंबई क्रॉनिकल पत्राचा एक अंक माझे हातीं देऊन त्यांतील एक तार मला दाखविली.  तिचा आशय असा होता :- 'पुण्याचे प्रसिद्ध पुढारी रा. वि. रा. शिंदे हे व्हायकोम येथें गेले असतां त्रावणकोर पोलीस अधिकार्‍यांनीं त्यांना देवळाच्या वाटेवर जाऊं देण्यास मनाई केली हें बरें झालें नाहीं.  रा. शिंदे ह्यांच्या मागें सबंध महाराष्ट्र आहे हें त्रावणकोर दरबारनें पक्कें ध्यानांत ठेवावें !'  हा मजकूर सर्वांशीं खरा नव्हता म्हणून मी मुंबई क्रॉनिकलला ताबडतोब दुरुस्तीचें पत्र लिहिलें कीं, ''व्हायकोमला मला स्वतःला मनाई झाली नाहीं.  उलट सन्मानानें देऊळ दाखविण्याची पोलीसनें तयारी दाखवली.  मात्र माझे ब्राह्म प्रचारकबंधु शिवप्रसाद यांना ते पूर्वाश्रमींचे अस्पृश्य म्हणून अशी बंदी झाली.''  क्रॉनिकलला ही चुकीची तार ज्या प्रेस असोसिएटेडच्या एजंटनें पाठविली त्याच्याकडून चुकीबद्दल दिलगिरी प्रदर्शित करणारें एक पत्रही मजजवळ देऊन ठेवलें.

व्हायकोमच्या सत्याग्रहाचें निरीक्षण करून मला एक गोष्ट स्पष्ट दिसून आली कीं, दक्षिण मलबारांत (त्रावणकोर व कोचीन संस्थानांत) मंदिरांत किंबहुना मंदिराच्या वाटेवर जाण्याबाबत स्पृश्य हिंदु, ख्रिश्चन आणि मुसलमान अथवा दुसरा कोणीही परधर्मीय परकी मनुष्य यांना मज्जाव नाहीं.  मात्र स्वतःला हिंदु म्हणवणार्‍या अस्पृश्याला मज्जाव आहे.  मग तो कितीही सुशिक्षित किंवा प्रतिष्ठित असो त्याच्याविरुद्ध ही जी सर्वधर्मीयांनीं मिळून एकी केली होती ती मोठी आश्चर्यकारक होती.  आणि ह्या पवित्र एकीला ह्या दोन हिंदु संस्थानांचा पाठिंबा होता आणि ब्रिटिश सरकार तिकडे डोळेझांक करीत होतें.

नंबुद्री व नायर  :   मी या दौर्‍यावर निघालों तेव्हां केवळ व्हायकोम सत्याग्रह हाच माझा हेतु नव्हता; तर ह्या प्रांतांत पुरातन कालापासून वस्ती करून राहणारे नंबुद्री नांवाचे ब्राह्मण आणि नायर नांवाचे क्षत्रिय ह्यांची राहणी आणि चालीरीती निरखून पहाव्यात हा एक उद्देश होता.  ह्या दोन्ही जाती मलबारांत बाहेरून आल्या होत्या.  नंबुद्री ह्या शब्दाची व्युत्पत्ति नंबु = श्रद्धा आणि द्री = श्री म्हणजे श्रद्धास्पद असा अर्थ आहे.  मलबारांतील बहुतेक जमीनदारी ह्या दोन जातींकडेच आहे.  त्यांतल्या त्यांत नंबुद्रींचा पगडा नायरवरही आहे.  ह्या दोन जातींमध्यें अनुलोम विवाहपद्धति प्रचलित आहे; म्हणजे नायरांच्या स्त्रिया वरिष्ठ मानलेल्या नंबुद्री पुरुषांना देण्याचा प्रघात आहे.  ह्या प्रकाराला विवाह असें न म्हणतां संबंधम् असें म्हणतात.  एका नंबुद्री ब्राह्मणास अशा प्रकारें अनेक नायर स्त्रियांशीं संबंध ठेवतां येतो.  नंबुद्री कुटुंबांत वडील मुलानेंच आपल्या नंबुद्री जातीच्या स्त्रियांशीं विवाह करावा व बाकीच्या मुलांनीं नायर जातीच्या स्त्रियांशीं संबंधम् लावावा असा प्रघात आहे. नंबुद्री जातीयांशीं असा संबंध ठेवून घेणें नायर लोकांत मोठें भूषणावह समजलें जातें.  वडील मुलांशींच नंबुद्री स्त्रियांनीं लग्न लावालें ही चाल असल्यानें नंबुद्री स्त्रिया पुरुषांपेक्षां अधिक शिल्लक राहून बहुपत्‍नीकत्वाची चाल पडली आहे.  नायर व नंबुद्रींचा संबंध नुसता बेटीव्यवहारापुरताच होतो; रोटीव्यवहार होत नाहीं. आणि बेटीव्यवहारसुद्धां पुष्कळ प्रसंगीं नांवापुरताच असतो.  नंबुद्रीप्रमाणेंच नायर लोकही आपल्यापेक्षां कनिष्ठ जातींशीं अशा प्रकारचा बेटीव्यवहार ठेवतात.  नायर समाज मातृशासनपद्धतीचा (Matriarchy) आहे.  आर्थिक मिळकतीचा वारसा व वहिवाट बायकांकडून चालवयाची.  पुरुष मिळकतीचा नुसता व्यवस्थापक. एका बाईची मिळकत अशा प्रकारें तिच्या बहिणीच्या मुलीकडे जाते.  वस्त्रप्रावरणाचे बाबतींतही नायर लोकांत चमत्कारिक चाली आहेत.  बेंबीपासून वरील भागावर कसलाही कपडा न वापरण्याची चाल त्यांच्यांत आहे.  स्त्रिया अर्धनग्न असतात.  अर्थात् या बाबतींत कालमानेंकरून पुष्कळच सुधारणा झाली आहे.  छातीवर एखादा लहानसा रुमाल किंवा तत्सम वस्त्र टाकलें कीं झाला पोषाख पण कोणी वडीलधारें माणूस सामोरें आल्यास त्याचा मान राखण्याकरितां तोही रुमाल काढून टाकण्याची पद्धत आहे.  युरोपियन लोक जसे डोकीवरची टोपी उतरून सन्मान दर्शवतात त्याचप्रमाणें छातीवरचें वस्त्र काढण्याची ही स्त्रियांत पद्धत असे.  नायरहूनही खालच्या जातींतील स्त्रिया राजरोसपणें रस्त्यांतून उघड्यां छातीनें हिंडत असल्याचें मीं प्रत्यक्ष पाहिलें आहे.  वरिष्ठ जातींपुढें छातीवर वस्त्र घेऊन जाणें म्हणजे त्यांचा उपमर्द करण्यासारखें आहे असें कनिष्ठवर्गीय स्त्रिया समजत.  मात्र नंबुद्री जातीच्या स्त्रिया पडद्यांत असत.  त्या कधीं उघड्यांवर दिसत नसत.  कलावंतिणी व वाईट चालीच्या स्त्रिया मात्र अंगावर संपूर्ण पोषाख घालीत.  त्या प्रांताच्या सेन्सस् रिपोर्टांतून व डिस्ट्रिक्ट गॅझेटमधून अशा विलक्षण चालींसंबंधीं तपशीलवार आणि चित्तवेधक वर्णनें आहेत.

मंगलोरकडे कोर्वी नांवाची एक जंगली जात आहे.  त्या जातीच्या बायका रस्त्यांतून अर्धनग्र स्थितींत हिंडत असत.  तेथील डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे सेक्रेटरी रा. सा. के. रंगराव ह्यांनीं त्या जातीच्या स्त्रियांस सभ्य चालीरीती शिकावाव्यात असें मनांत आणलें.  बरेंचसें नवीन कापड आणून त्यांच्या चोळ्या शिवून त्या ह्या स्त्रियांस वांटण्यांत आल्या.  प्रथम हा नवीन पोषाख पाहून स्त्रियांस आनंद वाटला.  पण त्या घरोघर गेल्यावर त्यांच्या जमातीला हा भ्रष्टाकार पाहून इतका राग आला कीं, त्यांनीं ह्या बायकांस बेदम मारलें. दुसरे दिवशीं त्या बायकांनीं नवीन पोषाखाचें गाठोडें परत आणून के. रंगरावांच्या अंगणांत फेंकून दिलें व के. रंगरावांस अत्यंत बिभत्स शिव्याशाप देत, त्रागा करीत त्या निघून गेल्या.  

ह्या प्रांतांत नायर लोकांचा मागील काळीं इतका कडक अंमल असे कीं, एखाद्या खालच्या जातीच्या इसमास नायर माणसानें ठार केलें तर त्याच्यावर कांहीं खटला चालत नसे.  ह्या प्रांतांतील लोकांची स्वच्छतेविषयीं फार प्रसिद्धि आहे.  प्रत्येकाच्या घरीं परड्यांमध्यें तळीं असावयाचीं.  जातां येतां कित्येक वेळां तरी त्यांत स्नान करून ओलेत्यानेंच स्त्रीपुरुष हिंडत असल्याचें मीं पाहिलें.  पावसाळ्यांत मी स्वतः पुष्कळ तास भिजून चिंब झालों तरी सर्दी म्हणून कधीं झालीं नाहीं.

विहंगमावलोकन

हेतु  :   परदेशांत १९०१ ते १९०३ या दोन वर्षांत माझें जें निरीक्षण व शिक्षण झालें त्याचा आराखडा विहंगमदृष्ट्या प्रथम घेणें बरें.  मी इंग्लंडांत केवळ ऑक्सफर्ड येथें मँचेस्टर कॉलेजांत धर्माचें पुस्तकी शिक्षण घेण्याकरतां गेलों नव्हतों.  मुख्यतः तुलनात्मक पद्धतीनें जगांतील सर्व धर्मांच्या इतिहासाचें ऊर्फ विकासाचें अवलोकन करून स्वतःची धर्मबुद्धि विशद करून धर्मप्रचाराची तयारी करणें हा तर मुख्य हेतु होताच.  पण तो एक हेतु होता.  शिवाय युरोपांतील प्रमुख चालीरीती पाहाव्या, वाङ्‌मय वाचावें, पंडित आणि सज्जन यांच्या भेटी घ्याव्या, नव्या-जुन्या संस्थांनी वाढ निरखावी, निरनिराळ्या वर्गांची-विशेषतः खालच्या व चिरडलेल्या वर्गांची-अंतःस्थिति ओळखावी व त्यांच्यांत राहावें, सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळें पाहावींत आणि तेथें एकान्तवास करावा व आत्मशोध करावा इ. अनेक हेतू होते.

कॉलेजांतील सुट्टया  :  मँचेस्टर कॉलेज हें सुधारकी कॉलेज होतें.  ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटींत जुन्या ख्रिस्तीमताचा दाब दृढ असल्यानें ह्या कॉलेजचा त्या युनिव्हर्सिटींत प्रवेश होणें शक्य नव्हतें.  तथापि त्या विश्वविद्यालयाचा बरा-वाईट परिणाम व संसर्ग ह्या कॉलेजवर न घडणें अशक्य होतें.  ह्या कॉलेजचा अध्ययनाचा व अनध्ययनाचा ऊर्फ सुट्टीचा काळ इतर कॉलेजांप्रमाणेंच नियमित केला होता.  पहिली टर्म ऑक्टोबरच्या मध्यापासून तों डिसेंबरच्या मध्यापर्यंत ८।९ आठवड्यांची व  नंतर नाताळची सुटी ४ आठवडे.  दुसरी टर्म जानेवारीच्या मध्यापासून तों मार्चच्या मध्यापर्यंत ८ आठवडे व नंतर ईस्टरची सुटी ६ आठवडे.  तिसरी टर्म मेच्या सुरुवातीपासून जवळ जवळ जून अखेर; नंतर उन्हाळ्याची दीर्घ सुटी सप्टेंबरअखेर १२ आठवड्यांची.  म्हणजे जवळ जवळ सहा महिने सुटी व सहा महिने अभ्यास असा प्रकार आहे.  मी ऑक्सफर्डमध्यें दोन वर्षे होतों.  त्या काळीं सहा टर्म्स व सहा सुट्या पडल्या.  पहिली नाताळची सुटी मीं लंडनमध्यें घालविली.  दुसरी सुटी पॅरिसमध्यें घालविली.  तिसरी उन्हाळ्याची दीर्घ सुटी इंग्लिश व स्कॉच Lake Districts मध्यें, म्हणजे पर्वतशिखरें व सरोवरें पाहण्यांत हिंडून घालविली.  पैकीं पहिले पंधरा दिवस बॉरोडेल नांवाच्या सुंदर दरींत डरवेंट वॉटर नांवाच्या सुंदर सरोवराच्या किनार्‍यावर माझे परमपूज्य प्रो. जे. एस्लीन कार्पेंटर यांच्या लीथ नांवाच्या कुटीरांत पाहुणा म्हणून होतों.  माझ्याबरोबर ७।८ विद्यार्थी होते.  चौथी दुसर्‍या नाताळची सुटी मीं मुद्दाम ऑक्सफर्डमध्येंच राहून घालविली.  पांचवी मीं कॉर्नवॉलमध्यें नैऋत्य  किनार्‍याकडील प्रदेशांतील बस्टनहॅम वगैरे शहरें व खेडीं पाहण्यांत घालविली.  पैकीं १३ दिवस माझे मित्र मिस्टर आणि मिस् जे. वॉल्टरकॉककडे त्यांच्या (बॉस कॅसल् या भागांतील) पोलट्रुनी नामक झोंपडींत पाहुणचार घेतला.

शेवटची दीर्घ सुटी मी कांहीं दिवस चेस्टनहॅम येथील मध्यदेशांत घालवून पुढें हॉलंडची राजधानी अँमस्टरडॅम येथें अनेक सुधारलेल्या देशांतील उदार धर्मीयांची परिषद भरली होती, तींत हिंदुस्थानच्या ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून गेलों.  नंतर जर्मनी, स्वित्झर्लंड व इटली हे देश पाहिले.  जर्मनी येथील कलोन गांवचें प्रसिद्ध कॅथेड्रल (उपासना-मंदिर), जें जगांतील सात आश्चर्यांपैकीं एक असें मानलें जातें, हें विशेष रीतीनें पाहण्यासाठीं दोन दिवस घालविले.  स्वित्झर्लंड येथील आल्प्स पर्वतांतील अत्यंत सुंदर अशा लुसन प्रदेशांत अवलोकनासाठीं मुद्दाम चार दिवस घालविले.  मुंबई युनिव्हर्सिटींत माझा ऐच्छिक विषय रोमचा इतिहास होता.  त्या इतिहासांतील प्राचीन स्थळें, इमारती, अलीकडची लोकस्थिति व लोकसंस्था पाहण्यासाठीं जिनोआ व रोम येथें एक आठवडाभर राहिलों.  शेवटीं नेपल्सजवळ जुनें पाँपे शहर, भूकंपाखालीं दडपून गेलेलें पण नुकतेंच उत्खनन केलेलें, त्यांतील देखावे व वस्तु पाहण्यासाठीं आणि जवळचा ज्वालामुखी व्हेसुवियस पर्वत नुकताच आ पसरून आपल्या पोटांतील ज्वलतप्रवाह ओकत होता, हें पाहण्यासाठीं नेपल्सला ४ दिवस राहिलों.  शेवटीं तेथील बंदरांतून इटॅलियन बोटीनें ता. ६ ऑक्टोबर १९०३ रोजीं मुंबईस येऊन पाहोचलों.

माझ्या दोन वर्षांच्या प्रवासांत मी इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड व इटली हे देश थोडेबहुत पाहिले.  एकंदरींत इंग्लिश लोक बरे दिसले.  फ्रेंच अधिक उल्हासी व किंचित् उथळ भासले.  इटॅलियन मात्र मेकॉलेनें म्हटल्याप्रमाणें हिंदु लोकांसारखे मनांतून बरेच उतरतात.  हा कॅथालिक पंथाचा प्रभाव.  आल्प्स पर्वत व र्‍हाइन नदी प्रशस्त व रमणीय दिसली.  पॅरिस शहर ख्यातीप्रमाणें सुंदर व नटवें दिसलें.  लंडन बोजड व बेंगरूळ दिसलें.  त्यांत बराच फापटपसारा आढळून आला.  इंग्लंडमध्यें विशाल असा देखावाच नाहीं.  सर्व लहान प्रमाणावर, साधेंच पण नयनमनोहर असायचें.  लोक घुम्मे पण पक्के व्यावहारिक व शहाणे दिसले.  श्रीमंत व दरिद्री हे भिन्न दर्जे एकमेकांत शेजारीं गुण्यागोविंदानें वागतात.  संतोष व शांति ह्या चिमुकल्या बेटांत मूर्तिमंत दिसल्या.  अर्थात् गर्वाची बाधा दोघांनाही आंतून झालेलीच, हें खोल नजरेंत आल्याशिवाय राहात नाहींच.  दारूचें व्यसन व लैंग्य व्यभिचार मोठमोठ्या शहरांतून चोहोंकडेच बोकाळला आहे व वाढत आहे.  पण खेडीं व रानें शुद्ध आहेत.  शेती खालावत आहे.  बेकारी माजत आहे.

ख्रिस्ती धर्माचा पगडा इतर मोठ्या देशांपेक्षां इंग्लिश बेटांत अधिक सुरक्षित दिसतो.  मात्र तो संभावित स्वरूपांतच विशेष आहे.  म्हणजे अध्यात्मापेक्षां सामाजिक जीवनच सांभाळून आहे.  खर्‍या परोपकाराचीं कामें मागें पडून धर्माची संभावित रहाटीच अधिक चालविली जात आहे.  ह्या म्हणण्याला मुक्तिफौजही (Salvation Army) अपवाद नाहीं.

लैंगिक नीतीचा बोभाटा पॅरीस व फ्रेंच हद्दीवरील शहरांतून बराच आहे.  तरी पण इतर देशांतील-विशेषतः अमेरिकन खुशालचेंडूच-या बोभाट्याला अधिक कारण आहेत.  खुद्द फ्रेंच राष्ट्र कॅथॉलिक पेंचांतून सुटलें नाहीं, तरी वरपांगी स्वातंत्र्याच्या शाब्दिक गलबल्याला अधिक हातभार लावीत आहे.  मला आयर्लंड, रशिया व ग्रीक हे देश पहावयास मिळाले असते तर बरें झालें असतें.  रशियांतील कौंट टॉलस्टॉयचे पट्टशिष्य क्रांतिकारक चेट्कॉव्ह हे एकदां मँचेस्टर कॉलेजच्या मार्टिनो क्लबमध्यें व्याख्यान देण्याला आले होतेच.  त्यांची मीं खाजगी भेट घेतली तेव्हां भावी महायुद्धाचें व रशियन क्रांतीचें स्वप्नही मला पडलें नव्हतें.  तरी पण युरोपियन किनारा सोडण्यापूर्वी पाश्चात्य संस्कृतीच्या घमेंडखोर पोकळपणाचा मला जवळ जवळ वीट आला होता.

  1. विविध प्रयत्न
  2. वडील भावाचा मृत्यु
  3. लोकमताचे हेलकावे
  4. राजकारणाची सुरुवात
  • 33
  • 34
  • 35
  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
Page 38 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी