1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

माझे आजोबा

पहिल्या आठवणी : माझ्या घराण्यांतील मीं पाहिलेला सर्वांत वडील मनुष्य म्हणजे माझे आजे बसवंतराव. त्यांचे मेहुणे व्यंकटराव (व्यंकप्पा) हे माझ्या आजीचे सख्खे भाऊ. हे माझ्या आजीपेक्षा मोठे होते. पण हे आजोबांपेक्षां लहान कीं मोठें हें मला ठाऊक नाहीं. हे आमच्या आजोबांच्या आश्रयाखालीं आमचेच घरीं राहात असत. त्यांची मला फारच अंधुक आठवण आहे. आमचे घरी एक मोठा, काळा म्हातारा, पाठाळ बैल यल्लमादेवीला वाहिलेला (कंठाळीचा बैल) होता. त्यावरून त्याला कठल्या बैल असें नांव होतें. त्याचेवर ओझें लादून व्यंकप्पा आमचे मळ्यांतून रोज घरीं येत. हीच माझ्या आयुष्यांतील अगदी पहिली आठवण होय. व्यंकप्पा फार सात्त्विक, साधे व सहनशील होते. आमचे आजे बसवंतराव नेहमीं त्यांची चेष्टा करीत व तिकडे केवळ दुर्लक्ष करून व्यंकप्पा केव्हां तरी गंभीरपणानें उत्तर देत. ह्या वेळीं मी फार तर तीन किंवा चार वर्षांचा असेन.

माझ्या जन्मभूमीचा गांव जमखंडी. हा कृष्णा नदीचे दक्षिणेस ४॥ मैलांवर, विजापूरचे पश्चिमेस ३६ मैलांवर व कुडची (एस्.एम्.आर्.) स्टेशनापासून ३३ मैलांवर आहे. विजापूरपैकीं लिंगायत तेली जातीच्या देसायांचा हा मूळ गांव. पटवर्धनांनीं त्यांच्यापासून हा प्रांत जिंकून घेतला.

अप्पा दप्‍तरदार नांवाचे एक श्रीमंत ब्राह्मण गृहस्थ जमखंडीचे यजमान रावसाहेब (गोपाळराव) पटवर्धनांचे वेळीं होते. त्यांचा आश्रय आमच्या आजोबांस असावा. त्यांचा मळा जमखंडीचे पूर्वेस आलगूरच्या वाटेवर दोन मैलांवर होता. तो आमच्या आजोबांकडे पुष्कळ वर्षे लागवडीस होता. आमचे राहाते घराची जागाही ह्या दप्‍तरदारांनींच दिली असें मी ऐकत होतों. पण माझ्या जन्मापूर्वी हा जुना संबंध आधींच पुष्कळ वर्षे तुटलेला असावा. हा मळा मात्र माझे जन्माचे वेळींही आमचेकडेच होता. ह्या मळ्याला 'अप्पांचा मळा' असें माझ्या लहानपणीं म्हणत असत. आतां तो अगदीं उध्वस्त झाला आहे.

चंद्रोजीराव : आजोबांचे वडील चंद्रोजीराव हे लढाईंत मारले जाऊन त्यांच्या सर्व घराण्याचा नाश झाला ! ते विजापूरपैकीं सुरापूरचे राहणारे. ही लढाई परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांनी जिंकली, असे इतिहासकार खरेशास्त्री ह्यांनीं एका केसरीचे अंकातं लिहिलें आहे. चंद्रोजीराव शिंदे हे जर सुरापूरचे जहागिरदार असतील तर हें शक्य आहे. पण तें आतां कळण्यास मार्ग नाहीं. सौंदत्ति येथें १२ व्या शतकांत शिंदे घराण्याचें राज्य होतें. त्या घराण्यांतील कोणी पुरुष सुरापूरचा जहागिरदार असल्यास चंद्रोजीरावाचा संबंध शोधून काढण्यास जागा आहे. पण माझे वडील जिवंत असतांना मला आपल्या वंशावळीचा शोध करण्याचा विचारही सुचला नाहीं. आतां तर गोष्टी फारच जुन्या झाल्या !

माझे आजोबा एका नदीचें कांठीं अगदीं लहानपणीं पोरके आढळले. ही नदी कृष्णा असावी. पुढें त्यांना जमखंडीचें देसायानीं पाळलें. कारण पोर पाणीदार व होतकरू होतें. देसाई हे लिंगायत असल्यानें त्यांनीं या मुलाला लिंगायत होण्याला सांगितलें. हा तर मराठा मांस खाणारा, म्हणून हें धर्मांतर न आवडून तो देसायांच्या घरांतून निघून वर सांगितलेल्या दप्‍तरदाराचा मळा करून स्वतंत्र राहूं लागला असावा.

आमचे घरीं त्या वेळीं फक्त आमच्या आजोबांना व बाबांना मराठी येत होतें. बाबांचें मराठी शिक्षण मुलकींत मराठी भाषेंत त्या वेळचे मानानें उत्तम झालें होतें. आजोबांना लिहतां वाचतां येत होतें, असे मला वाटत नाहीं. कारण मीं त्यांना वाचतांना कधी पाहिलें नाहीं. ते फार पाणीदार व कर्तृत्ववान् पुरुष होते. शरीर सडपातळ, उंच, वर्ण चांगला गोरा, डोळे लाल, भिंवया कोरलेल्या, अशी एकंदर उठावदार आकृति होती. त्यांचा पोशाख अस्सल दरबारी मराठेशाहीचा होता. तंगदार पांढरी विजार, घोळदार अंगरखा, पांढरी बिनपिळाची बत्ती, मिशा झुपकेदार, शुभ्र, लांब व ताठ. एकंदर रुबाब मनांत भरण्यासारखा होता. पुरुष हिकमती व विनोदी होता.

एक हिकमत : ह्याबद्दलची एक गोष्ट आमची आई सांगत असे. ती अशी - आजोबा एकदां प्रवासाला गेले असतां एका घरीं उतरण्यास जागा मागूं लागले; पण त्या घरची बाई मोठी खाष्ट होती. तरी तेथेंच उतरण्याचा आजोबांनीं निश्चय केला. नाहीं होय म्हणतांना बाईनें गोठ्यांत जागा दिली. सायंकाळी बाईनें आपल्या मुलास न्हाऊं घालून पाळण्यांत निजविलें. एक झोका देऊन बाई आंत कामास गेली; पण मूल कांहीं केल्या रडण्याचें थांबेना. बाई झोके देऊन जाई, पण मुलानें केवळ आकांत मांडला. पुन्हां बाई मुलास हातांत घेई, आंजारी व गोंजारी. पण जशी जशी ती त्यास रंजविण्यास इकडे तिकडे खालवर करी, तसतसें तें पोर अधिकच चरफडूं लागलें. शेवटीं बाई घाबरून आजोबांकडे मुलास कांहीं उपचार सुचल्यास तो करण्याकरितां दीनपणानें आली. आजोबांनीं मुलास मांडीवर घेऊन त्याचे पोटावरून व पाठीवरून हात फिरविला, तोंच मूल स्वस्थ झालें व हसूं खेळूं लागलें. हा चमत्कार पाहून बाईला फारच आश्चर्य वाटलें व आनंद झाला. ती आजोबांच्या पायां पडूं लागली. तिनें लगेच घरांत चांगलीशी जागा देऊन आजोबांस दोन दिवस सत्कारानें मेजवानी दिली.

आजोबांची करामत अगदीं साधी होती. न्हालेल्या मुलाला पाळण्यांत घालून बाई आंत गेल्यावर, आजोबा पाळण्याजवळ जाऊन मुलाच्या कुल्यांत अगदीं नाजूक जागीं एक सराट्याचा लहानसा कांटा खोवून ठेवून आल्यानें मुलाची तळमळ उडली होती. जेव्हां बाईनें मूल आजोबांच्या मांडीवर दिलें, तेव्हां आजोबांनीं मुलाचे पाठीवरून हात फिरवीत असतां बाईची नजर चुकवून तो सराट्याचा कांटा काढून घेतला. मग मूल कशाला रडतें ! बाईला मात्र आजोबा मोठे अवलिया वाटले.

बसप्पा अथणी : बसप्पा अथणी नांवाचा एक श्रीमंत लिंगायत वाणी गृहस्थ माझ्या बाबांचा मोठा मित्र होता. त्याला व्यापारांत खोट आल्यानें दिवाळें निघण्याची पाळी आली. म्हणून तो जंगलांत फांस लावून आत्महत्या करण्यास निघाला असतां, माझे वडील रामजीबाबा यांनीं त्यास आडविलें व धीर देऊन घरीं आणलें. आमचे घरांतील नगद हजारों रुपये व आमचे आईचे मौल्यवान् दागिने बसप्पाचे पदरांत टाकून बाबांनीं त्याचा जीव व अब्रू वांचविली. पण पुढें हें विश्वासाचें कर्ज त्यानें संपूर्ण फेडलें नाहीं. हा सर्व प्रकार वृद्ध आजोबांना मुळींच आवडला नाहीं. एकंदरींत आमच्या वडिलांचा अव्यवहारी, उदार व विश्वासू स्वभाव आजोबांना पसंत नव्हता. आपला मुलगा संसारांत फसून दुःखांत दिवस काढणार, हें त्यांचे भाकीत पुढें अक्षरशः खरें ठरलें. आजोबा जिवंत असेपर्यंत मात्र आमचें घराणें चांगल्या सुबत्तेंत होतें.

बेहिशेबी उधारी : बसप्पाच्यानें कर्ज फेडवेना, म्हणून त्याच्या दुकानांतून आमचे घरीं सर्व वाणसौदा उधार येत होता. बसप्पा वरचेवर आमचे वडिलांकडे बसावयास येत असत. त्या वेळीं आजोबा मला जवळ बोलावून माझ्या हातावर साखरी काजू ठेवून कानडींतील एक स्वकृत फटका शिकवीत आणि हा फटका म्हणत बसप्पाजवळ जाण्यास मला सांगत.
ग्यांगड ग्यांगण्णा । आडकी संगण्णा ।
वंद क्कोट्टु मूरु बरी उण्णा ॥
ह्याचा थोडक्यांत अर्थ असा आहे कीं, संगण्णा नांवाचा वाणी एक देऊन तीन आपल्या वहींत लिहितो. हा टोमणा बसप्पाच्या उधारी खात्यावर होता. अशी खोटी उधारी लिहून बसप्पा कर्ज फेडणार हा ध्वनि त्या फटक्यांत होता.

बसप्पा ज्या ज्या वेळीं घरीं येई त्या त्या प्रत्येक वेळीं तो माझ्या हातावर थोडी खडीसाखर ठेवी. मी लहानपणीं मोठा गुटगुटीत व गोजीरवाणा होतों, असें सांगतात. जे घरीं येत ते सर्व माझ्यावर प्रेम करीत.

एके दिवशीं आजोबांनीं शिकविलेला हा नवीन कानडी फटका माझ्या बोबड्या शब्दांत म्हणत वेडेवांकडे हातवारे करीत मी बसप्पाजवळ गेलों. जवळच माझे बाबा बसले होते. ते रागानें म्हणजे, ''अरे विठ्या, काय रे, हें कोणीं तुला शिकविलें ? ऑं !'' ''मला आजोबांनीं शिकविलें.'' असें म्हणून मी धूम ठोकून आजोबांचे कुशींत दडून बसलों.

लष्करी पेशा : आजोबांनीं कधीं कोणाची नोकरी केलेली मला माहीत नाहीं. त्यांचा धंदा शेतकीचा. पण तीही त्यांनीं प्रत्यक्ष हातानें केली असेलसें वाटत नाहीं. मात्र ते मान्यतेनें व सुखवस्तु असे राहात असत. मी जेथें जन्मलों तें राहातें घर आजोबांच्या म्हातारपणीं माझ्या बाबांनीं बांधलें होतें. आमची जागा व वाडा 'लक्कन केरी' नांवाच्या तळ्याचे कांठी होता. हें तळें फुटून आमचें जुनें घर त्या पुरांत बुडालें. नंतर तें पुन्हां कदाचित् आमचे वडिलांनीं माझे जन्माचें पूर्वी बांधलें असावें. माझ्या आजोबांचा रयतावा चांगला होता. लोक त्यांना सुभेदार म्हणत. सन १८५७ सालचे बंडापूर्वी रामचंद्रराव अप्पासाहेब यांचे वेळीं तासगांवाहून मराठ्यांचीं कांहीं घराणीं जमखंडीच्या रिसाल्यांत आलीं होतीं. त्यांना सुभेदार असें म्हणत. त्यांतच आमचे आजोबांची गणना होत असावी. ह्यावरून त्यांनीं लष्करांत कोठें तरी सुभेदारी केली होती, असा तर्क करण्यास जागा आहे.

आजोबांचे वेळीं आमच्या घराण्यांत लष्करी पेशा होता, ह्याचा एक पुरावा मीं लहानपणीं प्रत्यक्ष पाहिला. इ.स.१८५७ सालच्या बंडांत इंग्रजी लष्कर जमखंडीस आल्यावर लोकांनीं आपलीं खाजगी हत्यारें जमिनींत पुरून ठेवली. तशीं आमच्या वाड्यांतही आम्ही आमचीं हत्यारें पुरलीं होतीं. पुढें हत्यारांचा कायदा झाल्यानें हीं हत्यारें तशींच पुरलेलीं राहिलीं. आजोबा वारल्यावर मी इंग्रजी शाळेंत असतांना माझ्या वडिलांनीं आमच्या वाड्याच्या एका जुन्या भागाची जमीन उकरून हीं हत्यारें पाहिलीं. तलवारी व कट्यारी अगदीं गंजून निकामी झाल्या होत्या. ढाली वगैरेंचे लोखंडी खिळे गंजलेले सांपडले. त्या हत्यारांत बंदुकी अजिबात नव्हत्या.

आजोबांविषयीं एक आख्यायिका आमची आई सांगे. ती अशी कीं, एकदां आजोबांनीं गोसाव्याचें सोंग घेऊन कांहीं महत्त्वाचे कागदपत्र व टपाल दुसरीकडे लांबचा प्रवास करून पोंचविलें. शिवाय आजोबांच्या लष्करी साहसाच्या, तरुणपणच्या कांहीं गोष्टी आम्हांला आम्ही लहान असतांना सांगून आई आमची करमणूक करीत असे.

शेवटीं शेवटीं आजोबांना वृद्धपणामुळें अगदीं दिसेनासें झालें. ते आपल्या खोलींतून बाहेर सोप्यांत जेथें माझा पाळणा बांधलेला असे तेथें भिंतीला टेकून माझा पाळणा हालवीत बसत. मला थोडें थोडें समजत असे. मी त्यांचा लाडका होतों. मला साखरफुटाणे व साखरेंतले काजू आजोबा खावयास देत. म्हणून मी नेहमीं त्यांच्या आजूबाजूला लाडीगोडी करीत असें. त्या वेळीं मला ते कांहीं तरी मजेदार गोष्टी व बालगीतें शिकवीत.

माझा जन्म : आजोबा सुमारें १८७८-७९ इसवींत वारले असावे, असा माझा तर्क आहे. त्या वेळीं माझ्या बाबांनीं संस्थानची नोकरी सोडली, असें आई म्हणत होती. मी इ.स. १८७३ मधें एप्रिल महिन्याचे २३ तारखेस जन्मलो, असा माझ्या जन्मपत्रिकेंत उल्लेख आहे.

एक स्वप्न : ह्या वेळची एक गोष्ट आठवते. तिजवरून आजोबांचा मी किती लाडका होतों हें दिसतें. आजोबा वारण्याचे सुमारास मला देवी काढल्या होत्या. त्या वेळीं मी ५ किंवा ६ वर्षांचा होतों; अद्यापि शाळेंत जात नव्हतों. देवी टोचल्यानें माझे दंड सुजले होते. आजोबांच्या मृत्यूमुळें घराणें शोकांत होतें. माझ्या दंडांवरील जखमांची हयगय होऊन ते सुजून त्यांत किडे पडलेले कोणीं पाहिलेंच नव्हतें. दहावे दिवशीं दसपिंडीच्या विधीकरितां आम्ही घरांतील सर्व मंडळी कृष्णा नदीवर जाणार होतों. आदले दिवशीं रात्रभर माझा हात दुखून मला झोंप कशी ती आली नव्हती. माझी आई दिवसां नेहमीं कामांत असे. तिला गाढ झोंप लागली होती. तिला स्वप्न पडलें. त्यांत आजोबा माझ्या पाळण्याजवळ मला कुरवाळीत म्हणाले, ''पकुल्या, तुझ्या दंडांत किडे पडले असून तुझ्याकडे लेकाचे कुणीच पाहात नाहीं कीं रें !'' हें वाक्य ऐकून आई जागी होऊन मला पाळण्यांत पाहूं लागली, तों माझ्या दंडांत किडे बुजबुजत असलेले दिसले. तिनें लगेच बाबांना जागें केलें. नंतर उन्ह पाण्यानें माझे दंड धुऊन त्यांत टरपेंटाईन घातल्यावर सर्व किडे बाहेर येऊन माझे हात हलके झाले. दुसरे दिवशीं सकाळीं आईचे स्वप्नाबद्दल आश्चर्य करीत सर्व मंडळी नदीवर दसपिंडीच्या विधीला गेली. मीही त्यांच्यांत होतों.

जनाक्का : आजोबा वारण्यापूर्वी १-२ महिने माझी बहीण जनाक्का जन्मली होती. आजोबांना मुळींच दिसत नव्हतें. ते एक दिवस पाळण्याजवळ येऊन तान्ह्या जनाक्काला हातानें चांचपून पाहूं लागले आणि उद्‍गारले, ''हां ! बिद्री कासव्वाने अदाळ.'' जमखंडीपैकीं बिद्री नांवाचा एक पेट्याचा गांव आहे. तेथील कासव्वा (काशीबाई) नांवाची एक ब्राह्मणाची बाई आजोबांच्या ओळखीची असे. ती फार लठ्ठ असे. जनाक्का लहानपणी जास्त बाळशामुळें लठ्ठ असे; म्हणून ती कासव्वाप्रमाणे आहे, असा आजोबांचा बोलण्याचा आशय होता.

माझी आजी

संताबाई : जमखंडीचे आग्नेयीस मुधोळचे बाजूला निंगनूर (लिंगन + ऊर = लिंगाचें गांव) नांवाचें देसायांचें एक खेडें आहे. ही माझ्या आजीची व तिचा भाऊ व्यंकप्पा ह्यांची जन्मभूमि. आमच्या घराण्याची म्हणजे बसवंतरावांची कुलदेवता तुळजापूरची अंबाबाई. तेथील भोपे भाऊराव कदम हे आमचे आश्रित. त्यांच्या वहींत आजोबांचें नांव बसवंतराव आणि आजीचें संताबाई असें आहे, असें मला स्वतः भाऊराव कदम ह्यांनी सांगितलें. पण ह्या कानडी मुलखांत आमच्या आजाआजीला लोक बसप्पा व सत्यव्वा असें म्हणत. माझ्या आजीचा स्वभाव करारी व कांहीं अंशी तामसी होता. तिची माहेराकडील कुलदेवता सौंदत्तीची यल्लमा होती. हा संबंध सौंदत्तीच्या शिंदे घराण्याकडे जातो. तुळजापूरची अंबाबाई ही खरी अस्सल मराठ्यांची देवता. आमच्या देव्हार्‍यावर ह्या दोन्ही देवता असत; पण आजी धार्मिक व आग्रही असल्यामुळें घरीं यल्लामाचें प्रस्थच फार असे. तरी भाऊराव कदम आपला हक्क गाजविण्यास वरचेवर येतच.

आजी वर्णानें काळी, रूपानें राकट, पण संसारांत शहाणी, फार उद्योगी व कर्तृत्ववान् होती. तिचें माहेर फार गरीब दिसतें. एरव्हीं तिचा भाऊ आमचे घरीं का राहाता ? इतकेंच नव्हें तर त्याचा एकुलता एक मुलगा शिद्दु आमच्याच घरीं लहानाचा मोठा झाला. शिद्दु हें नांव कर्नाटकी मराठ्यांत असतें. एकंदरींत बसवंतरावांचा विवाह त्यांच्या आपत्कालीं झालेला दिसतो. त्यांचा स्वभाव विनोदी व सहिष्णु असल्यामुळें घरगुती बाबी त्यांनीं बहुतेक आजीकडेच सोपविल्या होत्या. आजी कष्टाळू व कर्तृत्ववान् असल्यामुळें शेतवाडी, घर, देवधर्म वगैरे सर्वच कारभार स्वतः पाहात असे. आमचे आजोबा फारसे धार्मिक दिसले नाहींत. एकंदरींत आजोबांत मराठ्यांचीं व आजींत कर्नाटक्यांची लक्षणें भरपूर दिसत. आजी खेडवळ व राकट कुणबाऊ, तर आजोबा नागरिक, दरबारी व गुलहौशी दिसत. पोरकेपणामुळें व जमखंडी संस्थान ब्राह्मणी पडल्यामुळें बिचार्‍या बसवंतरावांचा खानदानीपणा बराच खालीं उतरला.

पुढें त्यांचे एकुलते एक चिरंजीव, माझे वडील रामजीबाबा ह्यांनीं आपल्या सुशिक्षणानें आणि आपल्या खंबीर लेखणीच्या जोरावर आमचा खानदानीपणा पुन्हां वर उचलला. तथापि पुढें तलवारीचे दिवस अजिबात गेल्यामुळें आमच्या घराण्यांतल्या जुन्या मराठमोळ्याला ब्राह्मणी तर्‍हा व कारकुनी वळण लागलें.

आजोबांचे मागून १।२ वर्षांनीं आजी वारली. पण तिच्या फारशा गोष्टी मला आठवत नाहींत. ह्यांचे कारण तिचा मला फार लळा नव्हता व ती नेहमीं शेताच्या व घरच्या कामांत गुंतलेली असे. तिचा स्वभावहि प्रेमळ नव्हता. ती घरीं शेताचा कापूस आल्यावर तो वटून त्याचें सूत स्वतः कांतून तें कोष्ट्याला देऊन लुगडीं विणवून घेत असे. पुढें आम्हांला गरिबी आल्यावर माझी आईही सूत कांतून प्रपंच कसा तरी भागवीत असे.

पोरकट चोरी : दूधदुभतें करण्यांत आजी फार वाकब असे. घरच्या दुभत्याचें लोणी कढवून एक गाडगें भरून सुंदर साजूक तूप फडताळांत आजीनें एकदां ठेविलें होतें. माझ्या बाबांची एकुलती एक बहीण अंबाबाई तेव्हां आमचे घरींच दुष्काळामुळें राहात असे. भागूबाई नांवाची तिची मुलगी, माझा वडील बंधु भाऊराव आणि मी खेळगडी असूं. लहानपणीं मी मोठा गोडघाशा, खादाड व चोरटा होतों. घरीं गोडधड झालें की आजीनें व आईनें कांहीं जपून व कोठें तरी दूर ठेविलें असलें, तरी त्यांच्यामागें तें हुडकून चोरून खाण्यांत माझा हातखंडा होता. एकदां आई, आजी व आत्या (तिला आम्ही अक्का म्हणत असूं.) ह्या तिघी पाणी आणावयास विहिरीवर गेल्या होत्या. त्या येण्याचे आंत आम्हीं तिघांनीं ताज्या तुपाच्या मडक्यावर हल्ला केला. मडक्यांत तूप भरलेलें वरवर थिजलें होतें, पण खालीं अद्याप पातळ होतें. तें आम्हां चोरांना कळलें नाहीं. आम्ही घाईंत मडकें ताटांत पालथें केलें.

तेव्हां भसकन सगळेंच तूप पडून उष्टें झालें. आजी तर इकडे येण्याची वेळ झाली. ताटांतील तूप कांहीं आम्हां तिघांनाही संपेना. ओठावर, पोटावर, हातावर, कोपरापर्यंत तुपाचे ओघळ पडलेले असा आमचा देखावा पाहाण्यासारखा होता. आजी, आई व आत्या तिघी आंत आल्या, तेव्हां ताज्या तुपाचा घमघमाट सुटला होता. त्यांनीं आमचें ध्यान पाहिल्याबरोबर आम्हांला मुद्देमालासकट पकडलें. मग काय ? आम्ही एकमेकांवर चोरीचा आरोप ठेवूं लागलों. एकानें हुडकून काढलें, दुसर्‍यानें खिडकी उघडली व तिसर्‍यानें मडकें पालथें केलें. अशा प्रकारें खरें पाहतां सगळेच गुन्हेगार व सगळ्यांचेच हात व तोंडें तुपानें बरबटलेलीं त्या तिघांनीं पाहिली. एकंदरींत ह्या जिवंत चित्रांचें जें त्यांना दृश्य दिसलें त्यांतच त्या तिघी गुंग झाल्यामुळें आम्ही सुटून पळालों.

यल्लमाची यात्रा : सौंदत्तीची यल्लमा ही आमच्या आजीची कुलदेवता. ह्या देवीची भक्ति आजी मोठ्या निष्ठेनें करी. तिनें ह्या देवीची ताळी देव्हार्‍यांत ठेविली होती. पंढरपूरची जशी माळ तशी ही सौंदत्तीची ताळी - एक सोन्याची सॉव्हरीनसारखी ताळी (पुतळी). नंतर तांबड्या पोवळ्याचे व पांढरे मणी ओंवलेली ही ताळी असे. उपास करणें, लिंब नेसणें, दंडवत घेणें, सौंदत्तीच्या डोंगरांतील प्रसिद्ध क्षेत्राची यात्रा करणें वगैरे गोष्टींत आजीचा करारी स्वभाव दिसे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दरवर्षी ह्या यात्रेला जमखंडी येथील यल्लमाची मूर्ति तिचे पुजारी सौंदत्तीला घेऊन जात. हिला जगाची यल्लमा म्हणत. जग म्हणजे एक मोठी ३।४ फूट व्यासाची, वाटोळी, १॥-२ फूट खोल अशी बांबूची परडी असे. तिच्यांत यल्लमाचा रुप्याचा भव्य मुखवटा ठेवून तिला खालीं मोठें लुगडें नेसवून सजावट करीत. ह्या यात्रेबरोबर जमखंडीच्या आजूबाजूचे २००।४०० स्त्रीपुरुष कोणी गाड्यांतून, कोणी बैल-घोड्यांवरून तर कोणीं पायीं चालत जात. ही यात्रा आटोपून परत आल्यावर एकदम देवळांत न जातां जमखंडी गांवाबाहेर दक्षिणेकडे कट्टेगिरी म्हणून एक तलाव आहे, त्याच्याजवळ ही सर्व यात्रा उतरत असे. गांवातील सर्व भक्तमंडळीनें देवीस नैवद्य न्यावयाचा असतो. मग रात्रीं मिरवणूक काढून थाटानें मूर्ति देवळांत आणीत. गोड खावयास व मौज पाहावयाला मिळे, म्हणून मला लहानपणीं यल्लमाच नव्हे तर आजीदेखील तेवढ्या वेळेपुरती फार आवडे. धर्माचे पहिले संस्कार माझ्या कोमल मेंदूवर आजीच्या त्या द्राविडी देवतेनें उठवलेले. आठवण माझ्यावर मला ते अजून रमणीय वाटतात. इतकेंच नव्हें तर आजी वारल्यावर बर्‍याच वर्षांनीं मी इंग्रजी पांचव्या इयत्तेंत असतांना मला खरूज झाली; तेव्हां मीं ह्या यल्लमाला नवस केला. खरूज बरी झाल्यावर यल्लमाची यात्रा करून यावें, म्हणून मीं माझ्या वडिलांजवळ आग्रह धरला. कौतुकानें त्यांनी तो पुरविला. आम्ही घरची सर्व मंडळी सौंदत्तीची यात्रा करून आलों. ही गोष्ट इ.स. १८८९ च्या डिसेंबरच्या महिन्यांत घडली असावी.

अंबाबाईची यात्रा : ह्यापूर्वी सुमारें ९।१० वर्षांमागें आम्ही तुळजापूरची यात्रा केली होती. ती मला फार आवडली होती. ती मला चांगली आठवते. अंबाबाई आमची कुलदेवता. तिचें नांव माझ्या आतेला ठेवलें होतें. आजोबा वारल्यानंतर एकदोन वर्षांत आजी वारण्याचे पूर्वी - सुमारें १८७९।८० इ.स. सालीं -- ही यात्रा घडली असावी. घरची बैलगाडी होती. राम्या व मदार्‍या ही दोन मोठ्या बैलांची जोडी होती. काडाप्पा हें गड्याचें नांव होतें. हा गडी मोठा विश्वासू व फार दिवस आमच्या घरीं काम करीत असलेला होता. तो आमच्या आजीच्या निंगनूर ह्या खेड्यांतला होता. आई, बाबा, आजी, मी, माझा मोठा बंधु (नांव भाऊराव), धाकटी बहीण (तान्हें बाळ जनाक्का फार तर एक वर्षाची असेल) आणि गाडी हांकणारा काडाप्पा गडी असे आम्ही सातजण गाडींत होतों. त्या वेळीं मी फार तर सहा-सात वर्षांचा असेन व भाऊ अकरा बारा वर्षांचा असेल. वाटेंत विजापूर, सोलापूर, हीं शहरें आणि कृष्णा, भीमा व सीना ह्या नद्या लागल्या. सीना नदीवरील वाळवंटांत आम्हीं उपाहार केला. तेव्हों प्रथम लांब सोलापुरी पांढर्‍या साखरकाकड्या खाल्या हें आठवतें. विजापुरास गोलघुमट व जुन्या मशिदी आणि सोलापुरास जुनें सिध्देश्वराचें देऊन पाहिल्याचे ठसे मला अद्यापि आठवतात. पुढें मोठेपणीं विलायतच्या प्रवासांत माझ्यामध्यें जी निरीक्षणशक्ति आढळली तिचीं हीं पूर्वबीजें होत. त्या वेळीं आगगाडी म्हणजे मोठें नवल ! सोलापुराजवळ आगगाडीच्या रस्त्यालगत धावती गाडी पाहावी म्हणून बाबांनीं आम्हां सर्व मंडळींना कुठल्या तरी एका लेव्हल क्रॉसिंग जवळ अडवून ठेविलें. दोन प्रहर झाले, तरी गाडी आली नाहीं. भूक लागल्यानें मला त्या आगगाडीचा मोठा कंटाळा व राग आला आणि तिचेविषयीं कल्पनाच नसल्यानें ती पाहाण्याची मला हौसही वाटली नाहीं.

तुळजापुरांत जें पाहिलें त्यांपैकीं कांहीं देखावे अद्यापि आठवतात. देवीचा निजावयाचा पलंग व त्यावरील अतिशय उंच गादी आठवते. रात्रीं आराध्ये लोक जळती पोत अंगाभोंवतीं कशी पाजळीत, त्यांच्या कवड्यांच्या माळा, तेलानें माखलेला पायघोळ पोषाख वगैरे सर्व आठवतें.

कठीण नवस : तुळजापूरची अंबाबाई व सौंदत्तीची यल्लमा यांशिवाय इतर कांहीं देवींची व देवर्षींची भक्ति आमची आजी करीत असे. जमखंडीच्या पूर्वेस चार मैलांवर कुंभारहाळ व त्याच्याही पूर्वेस कुंचतूर म्हणून एक गांव आहे. कुंचनुरास महादेवाचें (महादप्पा) देवस्थान आहे. तेथें आमच्या घरची सर्व मंडळी दरवर्षी चैत्री प्रतिपदेस नैवेद्य घेऊन जात व तेथें एक दिवस राहून परत येत असत.

सन १८५७ चे नंतर जमखंडीच्या संस्थानिकावर बंडांत सामील झाल्याचा वहीम आला होता. तो खोटा ठरावा, म्हणून ह्याच देवतेला आजीनें सात मैल दंडवत घालण्याचा नवस करून तो पार पाडला. सुदैवानें जमखंडीकरांचा प्रत्यक्ष संबंध शाबीत झाला नाहीं. म्हणून काहीं दिवस बेळगांवच्या किल्ल्यांत ठेवून, त्यांना परत गादीवर आणून बसविण्यांत आलें. त्यांचा विश्वासू मसलतदार छोटुसिंग या एका बाणेदार रजपुतानें सर्व कारभार आपल्या अंगावर घेतल्यानें त्याला मात्र जमखंडी येथें इंग्रज सरकारनें फांशी दिलें. जमखंडी शहराचे उत्तरेस कृष्णा नदीचे वाटेवर छोटुसिंगाचें थडगें आहे. हा नवसास पावतो, अशी भोळ्या लोकांची समजूत आहे.

कुंभारहाळ येथें लक्ष्मण नांवाचा एक धनगराच्या जातीचा देवर्षि राहात असे. त्याच्या दर्शनाला आमची वडील मंडळी जात असत.

शिवाय ताईबाई नांवाची एक देवता कर्नाटकांत पुजली जाते. ही कदाचित् शितळामाता असावी. हिला ''येळ मक्कळ ताई'' (सात मुलांची माता) असें कानडींत म्हणत. आमच्या वाड्यांतील गोठ्यांत, एका कोनाड्यांत ह्या देवीचे नांवानें एक तिकोनी धोंडा शेंदूर फासून बसविला होता. आमच्या वडिलांना देवी आल्या होत्या. त्यांतून ते वांचले, म्हणून आमच्या आजीनें ही स्थापिली असल्यास न कळे. आमचे बाबा एकुलते एक पुत्र म्हणून हें शक्य आहे. ह्या ताईबाईला दरवर्षी एक आठखुरी मेंढीचा बळी लागत असे. आठखुरी मेंढी दिल्यानें आपलीं मुलें सुखी राहतात, अशी समजूत दिसते. त्या दिवशीं आमचे घरीं मांसाचे जेवणाची मोठी समाराधना होत असे. ही प्रथा मला समजूं लागल्यावर माझ्या सांगण्यावरून बंद करण्यांत आली.

ह्याशिवाय आमच्या आजाआजींच्यादेवता दुसर्‍या विशेष दिसल्या नाहींत. हें सर्व धर्माचरण आमच्या आजीचेंच होतें. आजोबा आपले तिचे लाड पुरवीत असत. आजीनंतर ह्या सर्व देवीदेवतांची श्रध्दा आमच्या घराण्यांतून लवकरच नामशेष झाली.

बाबा त्या काळचे सुशिक्षित असल्यानें असल्या देवतांवर त्यांची धार्मिक वृत्ति तृप्‍त होणें शक्य नव्हतें. त्यांनीं पुढें पंढरपूरचा संप्रदाय पत्करला. ते पंढरपूरच्या वारीला जात होते, पण त्यांनीं माळ मात्र घातली नाहीं. जमखंडीच्या यजमानाजवळ त्यांचें वजन असल्यानें त्यांच्या वजनानें आपल्या वाड्याजवळ त्यांनीं विठोबाचें एक लहानसें देऊळ बांधविलें. त्याला विठोबाचा मठ म्हणत.

शाकाहार : आमची आजी शाकाहारी होती. यल्लमा देवीला मांसाचा नैवेद्य चालत नाहीं. ही तेलंगणांतल्या रड्डी लोकांची देवता. कर्नाटकांतले रड्डी व दक्षिण महाराष्ट्रांतील मराठे हे एकाच जातीचे असावेत, असें माझें मत मीं शास्त्रदृष्ट्या सिद्ध केलें आहे. हे तेलंगी रड्डी वैष्णवही आहेत. त्यामुळें ते शाकाहारी बनले. ते व्यंकटेशाचेही उपासक आहेत. आजीच्या भावाचें नांव व्यंकप्पा होतें. ह्यावरूनही हाच समज दुणावतो. आमच्या आईच्या माहेरचीं माणसेंही शाकाहारी होतीं. पंढरपूरच्या वारकरी संप्रदायामुळें आणि आमच्या बाबांची वहिवाट ब्राह्मणमंडळींत फार असल्यामुळें, केवळ आमच्या आजोबांशिवाय आमचे घरीं मांसाहारी कोणीच नव्हतें. अशा परिस्थितींत ताईबाईचा आठखुरी मेंढीचा नैवेद्य आमचे घरीं कसा आला, हें एक कोडेंच आहे. तो एक प्रकार सोडला, तर आमचा इतरांचा शाकाहार इतका कडक होता कीं, आजोबांना मांस खावयाचें झाल्यास गोठ्यांत स्वयंपाक करून सर्व भांडीं घासून घरीं यावें लागे.

अंतकालचें वेड : तुळजापुराहून परत आल्यावर बहुतेक दुसरेच वर्षी - इ.स. १८८०।८१ सालीं- आमच्या आजीचा अंत झाला. मरतांना तिला वेड लागलें. जमखंडीस बाबा वैद्य म्हणून एक प्रसिद्ध आयुर्वेदी वैद्य होते. त्यांनीं वेडावर उपाय म्हणून आजीच्या डोईवर एक मोठी सळई लाल तापवून मोठा डाग दिला. डाग देतांना आजीला त्याचें कांहींच वाटलें नाहीं. ती आपली भोंवतालीं पडलेले दाणे टिपत बसली होती. तें पाहून आम्हां सर्वांना फार वाईट वाटलें. त्या स्थितींत ती दोन-चार महिने होती. आजीला वेड लागल्यावर वेडाचे भरांत ती घरांतील सोन्याचे दागिने घेऊन आपल्या मुलीस देण्यास जाई. ते वाटेंत गळून पडले, तरी तिला कळत नसे. ओळखीचे लोक ते आमचे घरीं आणून देत. काय त्या वेळची ही दानत व आमच्या घराण्यावरची जमखंडीच्या लोकांची श्रध्दा !

माझी आई

[ जन्म ( अदमासें ) १८४० -- मृत्यु ८ फेब्रुवारी १९१० ]

येथवर आठवणी लिहून कोणाचीच जन्माची किंवा मृत्यूची तिथि, महिना अगर निदान वर्ष तरी मीं कां लिहिलें नाहीं याचें कारण मला माहीत नाहीं.  माझ्या बाबांचा चौकसपणा, सुसंस्कृतपणा इतका होता कीं, त्यांनीं आमच्या घरच्या पुरोहितांकडून घरच्या सर्व मुलांच्या जन्मपत्रिका ज्योतिष शास्त्रान्वयें वर्तवून ठेविल्या आहेत.  सुदैवानें तेवढ्या तरी आम्हीं अद्यापि जपून ठेवल्या आहेत.  मीं मोठा झाल्यावर मला आपली जन्मभूमि बदलावी लागली.  इतकेंच नव्हें तर मी एवढी मोठी परीक्षा इतक्या मागल्या काळांत पास होऊनही आपल्या संसारांत लक्ष न घालतां आजन्म दारिद्र्याचें व्रत घेतलें.  त्यामुळें व्यवहारांत मी बाबांपेक्षांही अधिक नालायक व निष्काळजी ठरलों.  बाबांनीं कर्जाखालीं खानदानी घालविली तर त्यांच्यापेक्षां सुशिक्षितपणाचा कांदा त्या मीं ती कधींच मिळविली नाहीं,  किंबहुना खानदानीनें राहण्याला मी अपात्र ठरलों.  तशांत कांहीं वर्षे मुंबईंत व नंतर पुण्यांत नेहमीं बदलणार्‍या भाड्यांचे घरांत राहावें लागल्यामुळें बाबांच्या पोथीपुस्तकांची व कागदपत्रांची मीं अक्षम्य हयगय केली आणि दैवहत असा मी आतां आठवणी लिहीत बसलों आहें !  फार काय पण मीं माझा स्वतःचा पत्रव्यवहारही जपून ठेवला नाहीं.  ही चूक मला खेद देत आहे.

बाबांचें लग्न :   माझी आई आलगूर या गांवीं जन्मली.  ती आपल्या आईबापांची बहुतेक पहिलीच मुलगी असावी असें तिच्या बोलण्यावरून दिसतें.  नंतर कांहीं मुलांनंतर आतां हयात असलेले आमचे मामा रामजीबाबा व शेवटची मुलगी आमची मावशी तानूबाई ही होय.  आमच्या आईची पहिली मुलगी बाळाबाई हिचेपेक्षां माझा मामा रामजी हा लहान असावा असें दिसतें.  सोमा मुलगा अगदीं लहान असतांना आलगूरचे आजोबा एक वर्ष गुडघी रोगानें आजारी पडले.  त्या आजारांत चूल व मूल यांची सर्व जबाबदारी माझ्या अगदीं लहान असलेल्या आईवर पडली.  आईचें लग्न ह्या आजारापूर्वी झालें की मागाहून झालें हें कळत नाहीं.  आमच्या घरची स्थिति जर चांगल होती आणि माझे बाबा जर शिकलेले व हुशार होते तर माझ्या आजोबांनीं अशा गरीब व लंगड्यां मनुष्याशीं सोयरीक कां केली बरें ?  यावरून वाटतें कं, माझ्या आईबाबांचें लग्न अगदीं लहानपणीं - म्हणजे माझ्या बाबांच्या शिक्षणापूर्वी झालें असेल.  म्हणजे माझी आई आत वर्षांची व बाबा बारा वर्षांचे असतील.  हा सर्व केवळ अजमासच आहे.  या अजमासाला आणखी एक कारण आहे.  माझे बाबा लहानपणीं फार खोडकर असत.  विशेषतः त्यांना झाडावर चढण्याचा नाद असे.  माझ्या आजोबांच्या मळ्यांत एक मोठें केवड्यांचें झाड होतें.  केवडा काढावयास जाऊन बाबा लहानणीं त्या झाडावरून पडून मरतां मरतां वांचले.  तेव्हांपासून आमच्या आईनें हरतालिकेचें व्रत घेतलें असें ती लहानपणीं सांगत असे.  तिचें लग्न होण्यापूर्वी जर बाबा पडले असते तर तिनें हें व्रत घेण्याचें कारणच नाहीं.  लग्नाचें वय मुलीचें ७।८ व मुलाचें १२।१३ हें सामान्यतः असतें.  निदान ह्यापेक्षां जास्त तितक्या मागल्या काळांत असणें संभवनीय नाहीं.  झाडावरून पडण्यालाही १२ वर्षांचे वय - २।३ वर्षे पुढें मागें-संभवतें.

यमुनाबाई  :   माझे बाबा आपल्या आईप्रमाणें काळे व रूपानेंही आपल्या आईचे चेहर्‍याचे होते.  माझी आई तिच्या आईप्रमाणें फारशी गोरी नसली तरी थोडी उजळ निमगोरी आणि चेहर्‍यानें आपल्या बापासारखी होती.  अर्थात् आईला लिहितां-वाचतां येणें शक्य नसलें तरी वैष्णव ब्राह्मणाचें वळण, सात्त्विक राहाणी, शाकाहार, घरकामांत कष्टाळूपणा व हुषारी वगैरे गुणांनीं ती मंडित होती.  म्हणून बाबांच्या वडिलांनीं हा जोडा पसंत केला असावा.  ह्या दोन्ही घराण्यांचें ब्राह्मणी वळण व माझ्या बाबांचें सुशिक्षण यामुळें माझें शिक्षण इतकें झालें.  इतकेंच नव्हे तर शेवटपर्यंत माझा सहवासही ब्राह्मणांशींच घडला.

आईची कानडी भाषा अगदीं शुद्ध वैष्णव ब्राह्मणाची तर बाबांची मराठी भाषा कर्नाटकांतील शुद्ध देशस्थ ब्राह्मणाची.  त्याप्रमाणें पेहराव व तशाच संवयी,  गोपीकृष्णावरची किती सुंदर सुंदर कानडी गाणीं व पुरंदर विठ्ठलाचीं भजनें म्हणून आई लहानपणीं आम्हांला पाळण्यांत निजवीत असे.  तिचा गळा फार गोड व म्हणण्यांत स्वाभाविकपणेंच करुण रसाचा उठाव असे.  मोठेपणींही ही गाणीं ऐकवून व गोपीकृष्णाच्या गोष्टी सांगून ती आम्हां भावंडांना दारिद्र्याच्या कठीण वेदना हळुवार करीत असे.  व्रतें, उपास व इतर गृहकृत्यें ब्राह्मणाप्रमाणें करण्याला आई आलगुरांत लग्नापूर्वीच शिकली असावी.  शिवाय बसवंतरावांच्या सुशिक्षित व पाणीदार मुलाला मुलगी दिली म्हणून कुळकर्ण्याच्या घरच्या बायामंडळींनीं या लहान यमुनेला अधिकच काळजीनें घरगुती वळण लावलें असावें, कारण माझा आजी गंगाताई हिच्या अंगांत कांहीं हें वळण देण्याची करामत नव्हती.  इतके बसवंतराव जरी मोठे पाणीदार व रुबाबदार मराठे होते, तरी आमच्या बाबांना कारकुनी बाण्याचें वळण लावणें त्यांना शक्य नव्हतें.  ह्या कोवळ्या जोडप्याला ब्राह्मण संस्कृति सहानुभूतीनें व योग्य दक्षतेनें तीं एकमेकांस विवाहपाशानें बद्ध होण्यास योग्य ठरली.  ही एक भाग्याची विधिघटनाच नव्हे तर काय !  माझ्या आईबापांचा अगदीं आदर्शवत् वैवाहिक संबंध मला ३७ वर्षे पाहावयास मिळाला.  माझ्या आजीचे दागिने तितक्या मागील काळीं कर्नाटकी ब्राह्मणेतरांप्रमाणें किंचित् ग्राम्य असत.  पण माझ्या आईचे दागिने मराठा पद्धतीचे, सर्व सोन्यामोत्यांचे, वजनदार व जडावाचे होते.  केवळ सांपत्तिक दृष्ट्या पाहातांही माझे वडील कर्ते झाल्यावर आजोबांपेक्षां अधिक संभावित व श्रीमंत स्थितीला पोहोंचले; पण आजा-आजीचे मागें त्यांनीं आपल्या निष्काळजीपणानें म्हणा किंवा धार्मिकपणानें म्हणा आपल्या घराची धूळधाण केली.  इतकेंच नव्हे तर, त्यांनीं आम्हांला अन्नालाही महाग केलें.  आईची जोड व एक प्रकारचा निर्बंध नसता, तर बाबा आम्हांला कोणावर तरी टाकून बैरागी होऊनही गेले असते.  म्हणून आम्हीं सर्वस्वीं आईचे ॠणी आहोंत.

सासुरवास  :   माझ्या आईच्या अंगीं ही दैवी पात्रता येण्याला तीन प्रकारचे टाकीचे घाव तिला अगदीं लहानपणापासून तों अगदीं मरणाचे दारापर्यंत, जवळजवळ ७० वर्षे सोसावे लागले.  प्रथम माहेरच्या दारिद्र्यामुळें आणि बाप लंगडा व आई कर्तृत्वहीन असल्यामुळें माझ्या आईचे झालेले हाल.  दुसरें तिला परकीयांचें म्हणजे वैष्णव ब्राह्मणांचें लागलेलें वळण आणि तिसरें तिला झालेला कठीण सासुरवार.  तिसरा जो सासुरवास त्याच्या गोष्टी आईनें आमच्या लहानपणीं ज्या उठतां-बसतां सांगितल्या त्या ऐकून आमचें कोवळें हृदय करपत होतें.  आमच्या आजीचा-संताबाईचा-स्वभाव खाष्ट होता.  ती फार क्रूर होती अशांतला प्रकार नव्हता; पण अगदीं हेकट, सहानुभूतिशून्य आणि पक्षपाती होती.  तिला दोनच मुलें होतीं व त्यांतल्या त्यांत तिचें प्रेम तिच्या मुलीवर, अंबाबाईवर जास्त होतें.  गरिबीमुळें ही मुलगी आमच्या घरींच राहात असल्यामुळें सासूच्या कहरांत नणंदेची भर पडत असे.  त्यामुळें ती सुनेला मरेमरेतों राबवी.

आमचा रयतावा :   आमचे घरीं रयतावा मोठा होता.  दावणींत औताचे आठ बैल तर असतच; शिवाय गाई, म्हशी आणि वासरांचें शिल्लार असे.  आजी रानांत गड्यांच्या बरोबर सर्व काम स्वतः करी.  तिचा भाऊ व्यंकप्पाही राबत असावे.  माझ्या आईला मात्र शेतांत जावें लागत नसे.  पण घरकामाचा बोजा लहानपणापासून एकटीवरच पडे.  नणंद होती तिचा उपयोग चहाड्यां सांगण्यापुरताच.  आजोबा, आजी, बाबा, नणंद अंबाबाई, केव्हां केव्हां तिचा नवराही, व्यंकप्पा, त्याचा मुलगा शिद्दु, आम्ही तीन तीन मुलें, अंबाबाईची मुलगी भागूबाई, दोन चार गडीमाणें व यांशिवाय अतिथि, बैरागी, पाहुणे इतका हा नेहमींचा राब !  सकाळीं चार वाजल्यापासून दळणाची घरघर सात वाजेपर्यंत चाले.  मग विहिरींतून पाणी आणणें, स्वयंपाक, भांडीं धुणें, जेवण होतें न होतें तोंच सूत कातणें, मग इतक्या बैलांच्या शेणाच्या गोवर्‍या करणें, शिवाय रात्रीचा स्वयंपाक.  श्रीमंत आप्पासाहेबांचें राहणें जमखंडीहून १॥ मैलावर डोंगरांत रामतीर्थ नांवाचे ठिकाणीं असे.  तें काम आटोपून यावयाला रात्रीं ११।१२ वाजहत.  तोंपर्यंतही घरचें काम आटपत नसे.  बाबा कामावरून लौकर येत नसत.  पुन्हां भल्या सकाळीं दळणाला उठावें लागत असे.  बाबांचें आणि आजोबांचें वैभव असतां तरुण सुनेला इतकें काम कां ?  तर त्या काळची साधी आणि कष्टाळू राहाणी आणि विशेषतः आजीचा हेकटपणा.  आजोबांना हा सासुरवास आवडत नसे.  पण नित्याची कटकट करणेंही त्यांच्या सुखवस्तु स्वभावाला पटत नसे.  नशीब आईचें !

हालअपेष्टा  :   आईला नुसता कामाचा भार नसे.  तिला एकदां जी अगदीं लहानपणीं सासरीं आणली होती ती माहेर ६ मैलांवर असूनही २।४ वर्षांत एकदांही तेथें पाठविण्याची मारामार पडूं लागली.  कारण माहेरचीं माणसें गरीब, आईचें बाळंतपणही करण्यास असमर्थ.  घरांत वस्त्रालंकारांची रेलचेल असूनही सुनेला ते घरांत घालून तिचें कौतुक करण्याची सहृदयता आजींत नसे.  इतकेंच नव्हें तर आपल्या लाडक्या मुलीला तितकेच दागिने नाहींत म्हणून कांहीं अंशीं मत्सरही आड येत असावा.  हिंदु सासुरवासाची नाजूक कारणें इतकीं आहेत कीं, जुन्या वळणांतील सर्व लोकांनासुद्धां त्यांची मीमांसा करतां येत नसे.  आमच्या बाबांचाही स्वभाव फार रागीट असे.  मुलें होऊं लागेपर्यंत एक प्रकारचा जाच व मुलें होऊं लागल्यावर तो एक दुसराच भार.  आमच्या आईला एकंदर वीस मुलें झालीं (एक खंडीभर अशी म्हण आहे).  त्यांपैकीं एकाच वेळीं पांचांहून जास्त केव्हांच नव्हतीं.  ह्यावरून निदान पंधरा तरी मुलांचा शोक आईला करावा लागला.  तिच्या प्रेमाला सीमाच नव्हती.  दोन मुलें मोठीं होऊन वारलीं.  माझा मोठा भाऊ-त्याचें नांव परशुराम (लाडकें नांव भाऊच होतें.)  हा अठरा वर्षांचा होऊन वारला.  सर्वांत धाकटी बहीण चंद्राबाई नांवाची सुमारें १४।१५ वर्षांची होऊन वारली.  भाऊ पटकीनें दोन दिवसांत तडका-फडकीं वारला.  त्याचा शोक तिनें कित्येक वर्षे इतका केला कीं, दगडालाही पाझर फुटावा.  पुढें आईचे म्हातारपणीं चंद्राबाई क्षयानें झिजून वारली.  तिचा शोक आईला मरेपर्यंत पुरून उरला !

घरचें काम इतकें पडे कीं, त्याचा एकदां हृदयद्रावक परिणाम घडला.  मी ५ वा मुलगा.  माझ्या अगोदरचा कृष्णा म्हणून एक मुलगा होता.  तो रंगानें उजळ आणि पिंडानें गुटगुटीत होता.  सुमारें ६ महिन्यांचा असतांना तो आईच्या अंगाखालीं चिरडून झोपेंत कधीं मेला तें तिला कळलेंच नाहीं.  त्याला पाजीत असतांना आईला गाढ झोंप लागून, मुलाचा दम कोंडून सकाळीं तो मेलेला आढळला !  मग त्या आकांताला व आईच्या हालाला कोण सीमा असणार !!  हा प्रकार इ.स. १८७०।७१ मध्यें घडला असला पाहिजे.  आजा-आजी असेतोंपर्यंत म्हणजे इ.स. १८८० पर्यंत तरी आईला स्वातंत्र्य म्हणजे काय तें माहीत नव्हतें.  कोणत्या अस्सल हिंदु सुनेला हें स्वातंत्र्य असणार !  आणि आजी गेल्यावर लवकरच आमच्या घरची सुबत्ताही तिचे बरोबर गेली.  कारण बाबांनीं माझ्या जन्माचे अगोदरच म्हणजे इ.स. १८७३ चे सुमारासच सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.  इतकेंच नव्हे तर त्यांनीं त्यानंतर कोणताच किफायतीचा धंदा केला नाहीं.  गड्यांमाणसांवर शेती कसची चालते !  खर्च बिनहिशोबी.  एकूण आईला घरी स्वातंत्र्य मिळतें न मिळतें तोंच अठरा विश्वे दारिद्र्यानें तिला गांठलें !

तान्याक्का  :   माझी आजी संताबाई वारल्यावर माझ्या आईचीं दोनतीन वर्षे फार हालांत गेलीं.  त्या वेळीं माझी बहीण मुक्ताबाई (जनाक्काच्या पाठीवरची, आठवी मुलगी) हिचे जन्मापूर्वी आई गरोदर होती.  जवळजवळ एक वर्षभर ती हिंवतापानें बेजार होती.  त्या वेळीं मीं नुकताच मराठी शाळेंत जावयास लागलों असेन.  बहुतकरून तें १८८०।८१ साल असावें.  आईला रोज दोन प्रहरीं कडकडून हींव भरत असे.  तिला तहान फार लागे.  तेवहां पाणी तापवून देण्यालाही घरीं कोणी नसे.  बाबा कोठें तरी बाहेर जात असत.  माझी बहीण जनाक्का २।३ वर्षांची असेल.  आई फार खंगली होती.  शेवटीं अशांतच बाळंतपण आलें.  आई सर्व महिने आजारी असल्यामुळें जन्मलेलें मूल तान्याक्का अर्थात् अशक्त व रोगीच झालें.  या आजारामुळें तान्याक्काच्या मेंदूवरही परिणाम झाला होता.  ती फार भोळसर होती.

जनाक्का :   माझा भाऊ परशुराम ह्याच्या पाठीवर आम्ही चौघे मुलगेच झाल्यामुळें व सातवी मुलगी जनाक्का जन्मल्यामुळें ही आमच्या घरांतली पहिलीच मुलगी.  म्हणून जनाक्का ही आम्हां सर्वांची लाडकी होती.  विशेषतः ती माझ्या बाबांची मोठी लाडकी होती.  ती लहानपणीं अंगानें गुटगुटीत, बुद्धीनें चुणचुणीत, भांडखोर व बोलकी असे.  दिवसांतूनच काय पण तासांतूनहि आम्ही कितीदां तरी भांडत असूं.  कारण दोघांचाही स्वभाव तापट, हावरा, अधाशी, खोडकर व दोघेंही आम्ही बाबांचे लाडके.  त्यामुळें आमच्या कागाळ्यांना सीमाच नसे !  आमची वर्दळ आईकडे केली कीं, स्वयंपाक-घरांतलें काम सोडून तिनें आम्हांला धमकावयाला सोप्यांत बाहेर यावें.  पण आईचा स्वभाव शांत व सहनशील असल्यानें आम्हां दोघांनाही तिच्या रागाचा धाक मुळींच वाटत नसे.  पण बाबांचा नुसता त्यांच्या नांवाचाही आम्हांस जबर धाक असे.  ते घरीं असेतोंपर्यंत त्यांच्यासमोर उभें राहाण्याचीही आम्हांला छाती होत नसे.  ते बाहेर गेले कीं, ताबडतोब आमच्या धांगडधिंग्याला सुरुवात होई.  माझा मोठा भाऊ माझ्या आई-सारखा शांत व मवाळ होता.  तो आमच्यांत फारसा मिसळत नसे.  धाकटी तान्याक्का थोडी मोठी झाल्यावर आमचेबरोबर खेळावयास येई.  पण ती फारच भोळसर असल्यामुळें आम्ही सांगूं तें तें ती मुकाट्यानें करी.  माझा मोठा भाऊ इ.स. १८८५ सालीं पावसाळ्यांत पटकीच्या रोगानें वारला.  त्या वेळीं गांवांत ही सांथ बरीच होती.  म्हणून जमखंडीच्या गांवकर्‍यांनीं मरीआईची मोठी यात्रा केली.  त्या वेळीं कित्येक रेडे, पुष्कळशीं बकरीं व कोंबड्यांची तर गणतीच नाहीं, इतक्या प्राण्यांचा वध झाला !

आमचा वाडा :   इतकी मुलें लहानपणी वारण्याचें कारण आमच्या वाड्यांची आरोग्याच्या दृष्टीनें परिस्थिति वाईट होती.  आमचे घराचे पश्चिमेला लागून एक मोठें तळें होतें.  त्याच्या खालच्या सखल भागांत आमचा वाडा असे.  सांडपाणी जाण्याला कोठें वावच नव्हता.  दक्षिणेलाही आमच्या घराचे मागें उंचवटाच होता.  स्वयंपाकघरांत एक न्हाणी होती व बाहेर सोप्याचें खालीं, मोठ्या दरवाजाला लागूनच एक दुसरी न्हाणी होती.  पण दोनहि न्हाण्यांचें सांडपाणी दोनचार हातांवर जमिनींतच जिरत असे.  अर्ध्या घरांत अंधार, सोल व कोंदट हवा असे.  मोठा मुख्य दरवाजा उत्तरेकडे तोंड करून होता व त्याच्या आंत थोडें अंगण व थोडी पडवी होती.  हवा आणि उजेड यावयाला काय ती एवढीच वाट होती.  दक्षिणेच्या बाजूला तीन खिडक्या होत्या.  त्या लहान होत्या व त्या बाजूला गांवचे लोक शौचास बसत.  म्हणून त्या आम्हांला झांकाव्या लागत.  उजेडाला साणी राखली होती.  त्यांतून दोन प्रहरीं ऊन पडे.  पण हवा येणें शक्य नसे.  आरोग्याचे दृष्टीनें हें घर अतिशय वाईट असे.  मोठ्या दाराच्या पुढें सुमारें एक एकराचें आंगण असे.  त्यांत उकिरडे, कडब्याच्या गंजी, गोवर्‍यांचे हुडवे, शेणाचे ढिगारे असत.  वायव्य कोनास एक पेवाचा पायखाना असे.  त्याचा उपसाही वेळेवर होत नसे.  एवढेंच बरें होतें कीं, आमच्या वाड्यांच्या दक्षिण, पश्चिम व उत्तर बाजूनें बर्‍याच अंतरापर्यंत दुसर्‍या कोणाचींही घरें नसत.  पश्चिमेच्या बाजूला तर मोठें विस्तीर्ण तळें (लक्कनकेरी नांवाचें) आणि त्याच्या पश्चिमेस मोठा डोंगर होता.  आमचा वाडा गांवाच्या पश्चिम हद्दीवरचा शेवटचाच होता.  वाड्यांबाहेर जरी मोकळी हवा मुबलक होती, तरी आंतली स्थिति अपायकारक होती.  बाळंतपणांत बाळंतिणीचे खोलींतच एक खड्डा खणून त्यांतच बाळंतिणीला १०।१२ दिवस न्हाऊं घालीत.  अशा स्थितींत इतकीं मुलें लहानपणींच वारलीं हें आश्चर्य नसून आम्ही ५।७ जण कसे वांचलों हेंच आश्चर्य होय !

आईच्या गोष्टी  :   दर दुसरे वर्षी आमच्या आईचें बाळंतपण हें ठरलेलेंच असे आणि त्या वेळीं मागलें मूल कांहीं जिवंत नसे.  बाळंतपण, मुलांचा आजार किंवा मरण यांखालीं माझ्या आईची सर्व शक्ति खचली.  तरी पण मुलांचा कंटाळा किंवा संसाराचा तिटकारा - किंबहुना दुःखाचा किंवा निराशेचा एक उद्‍गारही कधीं आईच्या तोंडांतून आमच्या कानांवर आला नाहीं.  उलट दारिद्र्याच्या असह्य वेदना, वर्‍याचा रागीट स्वभाव मुलांचा जोजार सोसूनही आम्हां लहानग्यांना नेहमीं आपल्या माहेरच्या सुखदुःखाच्या गोष्टी रसिकपणानें सांगून आई आमची गोड करमणूक करीत असे.  आईच्या गोष्टी व गाणीं हाच आमचा मोठा मेवा होता.  तिची आनंदी आणि विनोदी वृत्ति हीच आमची विश्रांति होती.  तिच्या गोष्टींची आम्हांला पुढें पुढें चटक लागली.  इतकी कीं, जर भूक लागली असली, स्वयंपाकाला अवकाश असला, किंबहुना भाकरीबरोबर खावयास चांगली भाजी नसली, तर आम्हीं आईच्या काठवटीभोंवतीं जमून तिला गोष्टी सांगण्यास लावीत असूं.  मग तिनें आम्हांस अशा प्रेमळ कहाणींत गुंतवावें कीं, स्वयंपाक केव्हां झाला, आम्ही काय खाल्लें कीं मुळींच कांहीं खाल्लें नाहीं याचें आम्हांस भान राहात नसे.  बाबा एखादे वेळीं रात्रीं उशिरां घरीं आले कीं, आमच्या गोष्टीची मेजवानी लांबे !  केव्हां केव्हां आम्हीं वन्समोअरही म्हणत असूं !  एकंदर आईच आमची खेळगडी होती.  आम्हांला बाहेरच्या खेळगड्यांची जरुरीच लागत नसे.  आमचा वाडा वकीकडचा, अंधारी व मयाण असल्यानें लोकांच्या नजरेंत तो भुताटकीचा एक मोठा अड्डाच होता.  शिवाय आमचे आजूबाजूचे सर्व घरांतून, किंबहुना आमचे सर्व मराठा जातींतही आमच्याइतकें सुशिक्षित व वजनदार घराणें नसल्यानें भोंवतालच्या लोकांना आमचा मोठा दरारा वाटत असे.

आत्मसंतोष :   आमच्या बाबांचा स्वभाव रागीट, सडेतोड, करारी असल्यानें व आमची आई आपल्या आईप्रमाणेंच, कधीं आपल्या दाराच्या बाहेर कामाशिवाय पाऊलही टाकणारी नसल्यामुळें आमचे घरीं शेजार्‍यांचा विनाकारण सुळसुळाट कधींनसे.  कितीही त्रास असो व कसलाही प्रसंग येवो, बाबा घरीं असोत-नसोत, आई आम्हां चौघां पिलांस एखाद्या पक्षिणीप्रमाणें पंखाखालीं घेऊन आनंदानें बसे व आम्हांलाही तिच्या पंखाशिवाय दुसरा आसरा नको असे.  आजा-आजी असेतोंपर्यंत ज्या वाड्यांत मोठ्या दणक्यानें रयतावा चालत असे तेथें त्यांच्यामागें थोड्यांत वर्षांत सर्व वैभव होरपळून रानांत शेत नाहीं, गोठ्यांत गुरें नाहींत, घरांत माणसेंही नाहींत, अशी ओसाड सिथति झाली.  तरी बाबांना संसाराची काळजी म्हाणून कसली ती लागली नाहीं किंवा आईच्या स्वभावांत कडूपणाची छटा कधीं दिसून आली नाहीं.  ह्या धन्य संतोषाचा माझ्या मनावर जो परिणाम झाला, मला जें बाळकडू मिळालें तेंच माझें अमूल्य भांडवल.  माझ्या पुढील आयुष्याचें तारूं अनेक तुफानांतून जें सुरक्षितपणें चाललें त्याला आधार काय ती माझ्या आईबापांची आत्मसंतुष्ट वृत्ति.

सोळा वर्षे माझ्या बाबांनीं अगदीं कांहीं धंदारोजगार न करितां घरीं निजून काढलीं.  या सोळा वर्षांत घरची शेतीभाती, गुरें, गडीमाणसें, आईच्या अंगावरची सर्व चीजवस्तु फुटक्या घड्यांतील पाण्याप्रमाणें गळून व झिरपून माझ्या नजरेसमोर गेली.  मी अगदीं लहान असतांना माझ्या हातांत सोन्याची कडीं, कमरेस सोन्याचा झिळीमिळी करगोटा, गोठ्यांत मोठमोठे धिप्पाड बैल आणि शेतांत फार दिवसांचे इमानी नोकर होते.  दोहोंकडच्या आजाआजींच्या कुशींत मी लडिवाळपणें लोळलों होतों; सणवार, उत्सव-समारंभ पाहात होतों.  घरांत पाहुण्यांची व आश्रितांची मांदी जमत असे.  घरीं पुराणिक, पुरोहित, भजनीमंडळी, साधु, संत, फकीर, बैरागी, तडीतापडी यांची रीघ लागे.  हळूहळू मी नुसत्या दोनतीन भावंडांतच सुख मानून माझ्या आईभोंवती घिरट्या घालून सुखानें राहाण्यास शिकलों.  हा कोणाचा प्रभाव ?   केवळ माझ्या आईच्या दैवी संतोषाचा !

वाशांचें सरपण  :   बाबा देवळांतून, मठांतून कोठें तरी भजनाला जात.  घरीं आले तरी ते निघून राहात.  जागेपणीं त्यांचेसमोर उभें राहाण्याची आम्हां कोणाची छाती नसे.  मग आम्ही चार मुलें व आई हेंच पंचायतन आत्मसंतोषाचें दिव्य आगर होतें.  आमच्या भोंवतालचें भंगुर वैभव कसें पार नाहीसें झालें याचें एकच हृदयद्रावक उदाहरण सांगतों.  आमच्या राहात्या घरांतील माया तर सर्व गेलीच; पण आमच्या बाहेरच्या विस्तीर्ण अंगणांत चौफेर कुळवाडी होती.  म्हणजे भोंवतालीं खोल्यांतून गरीब भाडोत्री कुटूंबें राहात असत.  त्यांच्यापासून बाबा कांहीं भाडें घेत असतील, असें मला वाटत नाहीं.  कारण त्या वेळीं घराला भाडें घेणें लाजीरवाणी गोष्ट समजत.  हळूहळू हीं सर्व कुळें परागंदा झालीं.  त्यांच्या धाबीवजा खोल्यांच्या दुरुस्तीचा त्राण आमच्यांत उरला नाहीं.  स्वतः आमच्या जळणाचीही पंचायत पडूं लागली.  मग काय विचारतां !  या पडक्या खोल्यांच्या मोठ्या तुळ्या व वासे आम्ही सोळा वर्षांत सरपण करून जाळलें.  'विठू, वासे आण' म्हणून आईनें सांगण्याचा अवकाश, कीं एका हातानें शेंडी व दुसर्‍या हातानें लंगोटीचें शेंपट ओढीत मी वासे ओढावयाला धांवलोंच !  पांडवप्रतापांतील द्रौपदीवस्त्रहरणाचें चित्र मीं पोथींतून पाहिलेंच होतें.  दुःशासनाचा आविर्भाव म्हणून मी आमच्या जुन्या वाड्यांतील अंगणाचे बाजूच्या धाब्याचे वासे ओढीत असे आणि मोठ्या फुशारकीनें आईला जळण नेऊन देत असे.

करवीरची यात्रा  :   घराचें आणि संसाराचें कांहीं होवो.  बाबांच्या देवदेवतेमध्यें व भजनपूजनांत कांहीं खंड पडला नाहीं.  आजी वारल्यावर दोनतीन वर्षांनीं बाबांना दत्ताच्या उपासनेचा नाद लागला.  घरीं श्रीगुरुचरित्राच्या पोथीचें पारायण चाललेलें.  बाहेरची भाविक मंडळी ऐकावयास येत व बाबा मोठ्या खड्यां आवाजांत पोथी वाचून अर्थ सांगत.  जमखंडींत काण्णव आळींत एक दत्ताचें देऊळ आहे.  तेथें बाबा सायंकाळीं भजनाला जात.  त्याच वेळीं नरसोबाच्या वाडीची आणि कोल्हापूरच्या यात्रेची टूम निघाली.  त्या वेळीं आमच्या घरचे गाडीबैल, गडीमाणसें होतीं.  बाबा, आई, आम्ही चार भावंडें, एखादें पांचवें तान्हें मूल, शिवाय चिऊबाई नांवाची काण्णव आळींतील एक विधवा ब्राह्मणाची बाई (ही आमच्या घरची पुरोहित चंद्रभट डेंगरे यांची बहीण होती) व आमचा तुकाराम नांवाचा मराठा गडी इतकेजण आमच्या स्वतःच्या गाडींतून कोल्हापूरचे महालक्ष्मीचे यात्रेस निघाले.  वाटेंत अथणी, शेडबाळ, कागवाड, कुरुंदवाड, मिरज, सांगली, हातकणंगलें वगैरे लहानमोठीं गांवें आम्हीं पाहिलीं व नरसोबाच्या वाडींत श्रीदत्ताची यात्रा केली. एका ब्राह्मणाचे घरीं उतरून आम्हीं देवाचा नैवेद्य व ब्राह्मणभोजन केलें.  कोल्हापुरास गांवाबाहेर पूर्वेकडे एकवेरीचें देऊळ आहे.  त्याच्या ओवरींत आम्ही तीन दिवस उतरलों होतों.  कोल्हापूरचे राजधानीचें वैभव, अंबाबाईचें भव्य देऊळ, त्याचें महाद्वार, कोल्हापुरांतील पाण्याचे नळांना लावलेलीं सुंदर गायमुखें, रंकाळे व पदमाळे हे तलाव या सार्‍यांचा मनावर चांगला ठसा उमटला.  एकवेरी देवळांतील आंगणांत एक मोठा विस्तीर्ण चबुतरा आहे.  त्यावर खेळत असतां तेथील एका मुलाशीं भांडण होऊन माझी मारामारी झाली.  ''विठ्या, तूं कोठें गेलास तरी तुझी आगळीक कांहीं थांबत नाहीं ना रे !''  असें म्हणून आईनें मला त्या वेळीं मारामारींतून सोडविलें. येथपर्यंत माझ्या पूर्वजांचा वृत्तान्त संपला.  येथून पुढें माझ्या स्वतःच्या पिढीचा वृत्तान्त सुरू होत आहे.

माझा हायस्कूलचा काळ

( १८८५-१८९१ अखेर )    

हीं सात वर्षे माझ्या आयुष्यांतलीं महत्त्वाची होतीं.  इ.स. १८८५ च्या पावसाळ्याचे आरंभीं माझा वडील भाऊ वारल्यामुळें माझ्या भावंडांत मीच वडील झालों आणि माझ्या स्वभावांत एकदम विलक्षण फरक पडला !  बाळपणाचा हूडपणा कमी होऊन मी गंभीर, विचारी व अभ्यासी बनलों.  आईबाबांचा शोक, घरची झपाट्यानें खालावत चाललेली सांपत्तिक स्थिति, माझ्या आईला वरचेवर झालेल्या मुलांचे बाळपणांतले मृत्यु आणि बाबांचा हताश उदासीनपणा ह्याचा परिणाम मजवर दिवसेंदिवस अधिकाधिक घडत चालला.  ह्या वेळीं मला ११ वें वर्ष संपून १२ वें नुकतेंच लागलें होते.

शिक्षकवर्ग  :  जमखंडी हा लहान संस्थानी गांव.  त्या वेळीं संस्थानचें उत्पन्न ४।५ लाखांचें असावें.  शहरची वस्ती १५ हजारांची.  शाळा खात्याची स्थापना नुकतीच झाली असावी.  अशा ठिकाणचें हायस्कूल कोणत्या दर्जाचें असावें ह्याची कल्पना सहज होते.  मी हायस्कुलांत गेलों तेव्हां तें हायस्कूल झालें नव्हतें.  फार तर पांच इयत्ता असतील.  रा. त्रिंबकराव खांडेकर ह्यांना पुण्याहून हेडमास्तराचे जागेवर आणिलें होतें.  त्यांची स्वतःची मॅट्रिकची तरी परीक्षा झाली असेल कीं नाहीं हें मला माहीत नाहीं.  पण त्यांचा स्वभाव सुशील, नीतिमान्, नेमस्त, गंभीर आणि करारी होता.  नवीन इंग्रजी शिकलेल्यांचा उथळपणा त्यांच्यांत मुळींच नव्हता.  जमखंडी गांवांत व दरबारांत त्यांच्या ह्या स्वभावामुळें लोक व स्वतः यजमानही वचकून होते.  असिस्टंट शिक्षकांत विशेष कोणी म्हणण्यासारखे शिकलेले किंवा फारसे बुद्धिमान् नव्हते.  मी पांचव्या इयत्तेंत गेल्यावर शाळेचा दर्जा वाढून त्याच वर्षी वरील वर्गांत बाहेरील पदवीधर शिक्षक आणावे लागले.  मी सहाव्या इयत्तेंत गेल्यावर जमखंडीच्या शाळेंतून मुलें प्रथमच मॅट्रिकच्या परीक्षेस पाठविण्यांत आलीं.  तिसर्‍या वर्षी आम्हां चौघांना जमखंडी हायस्कुलांतून पाठविण्यांत आलें.  त्याच सुमारास आमच्या शाळेला हायस्कूलचा दर्जा प्राप्‍त झाला.  सहाव्या इयत्तेंत रा. वासुदेवराव चिरमुले, बी.ए. हे पहिले पदवीधर नवीन नेमण्यांत आले.  रसायन शास्त्राच्या प्रयोगाचेंही कांहीं सामान शाळेला मिळालें.  एकंदरींत आतांप्रमाणें त्या वेळीं तशा मागसलेल्या प्रांतांत इंग्रजी शिक्षणाचा दर्जा असावा तसा नव्हता.  आगगाडी ( सदर्न मराठा रेल्वे ) मी पांचव्या इयत्तेंत जाईपर्यंत झाली नसावी.

विषयांची गोडी  :   पहिल्या वर्षी इंग्रजी हा विषय मला नवा असल्यामुळें व शिक्षक चांगला सहानुभूतीचा नसल्यामुळें मला तें वर्ष फार जड गेलें.  पण दुसर्‍या वर्षापासून मला इंग्रजी भाषेची व शाळेंतील इतर सर्वसामान्य विषयांची गोडी लागली.  तेव्हांपासून शिक्षक जरी विद्वान् नव्हते तरी सहानुभूतीनें शिकविणारे मिळाले.  माझी हुशारी पाहून ते माझें कौतुक करूं लागल्यामुळें मला उत्तेजन मिळालें. Nothing succeeds like success (यशासारखें यशस्वी कांहींच नाहीं.)  ही इंग्रजी म्हण मला तेव्हां जरी माहीत नव्हती, तरी तिचा अनुभव मला जास्त जास्त येऊं लागला.  मराठी शाळेंत असतांना आम्ही वर्गांत जमिनीवर बसत असूं.  तरटाच्या लांब पट्टया हांतरावयाला असत.  इंग्रजी शाळेंत आम्हांला बाकावरबसावयास मिळालें.  मागें टेकावयाला उंच व जाड उतरत्या पाठीचीं मेजें (डेस्कस्) असत.  शाळेची इमारत शहरच्या मध्यभागीं, भर बाजारांत उंच अशा जोत्यावर, टुमदार व मनांत भरण्याजोगी होती.  मराठ शाळेंत सकाळसंध्याकाळ दोन वेळां जावें लागत असे.  इंग्रजी शाळेंत दोन प्रहरीं ११ पासून सायंकाळीं ५ पर्यंत एकदांच जावें लागे.  मे महिन्याची लांब सुट्टी मिळे.  मराठी शाळेच्या शिक्षकांचें पंतोजीपणाचें मुख्य लक्षण म्हणजे त्यांच्या हातांतील वेताची एक लांब छडी आणि तिचे केवळ मास्तरांच्या लहरीप्रमाणें आमच्यावर होणारे उदार प्रयोग !  इंग्रजी शाळेंत हा प्रकार बदलला.  एकंदरींत मी एका नवीन जीवनप्रवाहांत पडल्याप्रमाणें वाटलें.

ग्रहणशीलता  :  इंग्रजी तिसर्‍या इयत्तेपर्यंत आम्हांला जुन्या काळचीं इंग्रजी क्रमिक पुस्तकें म्हणजे 'हॉवर्ड' ची मालिका.  आतांच्या आकर्षक रीडर्सप्रमाणें त्यांत चित्रें वगैरे कांहीं नव्हतीं.  तरी तिसर्‍या इयत्तेपासून इंग्रजी राहाटीचे धडे वाचावयाला मिळत.  त्यामुळें ग्रहणशील बुद्धीच्या माझ्या डोळ्यांपुढें एका नवजीवनाचे नव्या रंगाचे पडदे दिसूं लागले.  इंग्रजी शेताचें वर्णन, इंग्रजी झाडाझुडपांचीं नांवें, इंग्रजी खेडीं, इंग्रजी कुंपणावरील निरनिराळ्या जंगली वेली, फुलें वगैरे नवीन देखावे मला नवीन हर्ष देऊं लागले.  त्यामुळें मला धडे आवडूं लागले.  विषय आवडला म्हणजे तो सुलभ होतो.  इतकेंच नव्हें तर परिणामकारीही हातो.  तिसर्‍या इयत्तेचे शिक्षक रा. आप्पा काळे हे होते.  त्यांच्या शिकवणींत एकपट रसिकता असली तर ती माझ्या हृदयांत चेंडूप्रमाणें उशी घेऊन द्विगुणित व चौगुणित होई.  अशा रीतीनें शिक्षकाच्या सहानुभूतीला शिष्याच्या ग्रहणशीलतेची जोड मिळत चालली.

इंग्रजी अभ्यास  :   मी चौथ्या इयत्तेत गेलों, तर माझे आवडीचे शिक्षक आप्पा काळेही चौथ्या वर्गात शिक्षक झाले.  इंग्रजी पुस्तक 'सँडफर्ड ऍंड मर्टन' हें लावण्यांत आलें.  तें मला फार आवडलें.  विचार नवीन व उदार, भाषा बालबोध, मधून मधून इंग्रजी पोषाखांचीं चित्रें, इंग्रजी राहणीचीं व वनश्रीचीं शब्दचित्रें आणि छायाचित्रें ह्यांमुळें इंग्रजी राहणीविषयीं कुतूहलता मजमध्यें दिवसेंदिवस वाढूं लागली.  इतकी कीं पुढें मी मोठा झाल्यावर दैववशात् इंग्लंडांतील उत्तमोत्तम विश्वविद्यालयांत, ऑक्सफर्ड येथें दोन वर्षे राहावयास मिळालें, तेव्हां तेथील खेड्यांपाड्यांत जाऊन शेतांत, कुंपणांत फिरून मीं जे देखावे पाहिले व अनुभव घेतला त्यांचीं पूर्वस्वप्नेंच जणुं मला माझ्या जमखंडीसारख्या खेडवळ शाळेंतील क्रमिक पुस्तकें वाचीत असतांना पडत होतीं.  पांचव्या इयत्तेंत 'लँबस् टेल्स' हें पुस्तक लावलें होतें.  त्यांत कविकुलगुरु शेक्सपियर्सची भेट झाली.  शिकविण्यास ठाकूर नांवाचे पुणेरी शिक्षक होते.  सहाव्या इयत्तेंत 'रीडिंगज् फ्रॉम दि स्पेक्टेटर' हें पुस्तक चिरमुले ह्यांनी शिकविलें.  हे एक ग्रॅज्युएट-बी.ए. होते.  यांत ऍडिसच्या खर्‍या बालबोध इंग्रजीचा व ताज्या विचारांचा मासला कळला.  अशा रीतीनें माझ्या हृदयांत इंग्रजी भाषेची नव्हें, तर संस्कृतीच्याचही पक्षपाताचीं बीजें इतक्या कोंवळेपणांतच रुजूं लागलीं.

पांचव्या इयत्तेंत संस्कृत, भूमिति आणि बीजगणित व सहावींत रसायन, यंत्रशास्त्र, भूगोल, खगोल इत्यादि आधुनिक शास्त्रांची मूलतत्त्वें ह्यांचा उपक्रम झाला.  एखाद्या मनोर्‍यावर चढत असतांना प्रत्येक मजल्याभोंवतालचें क्षितिज अधिकाधिक विस्तीर्ण होऊन ज्याप्रमाणें जास्त प्रदेश दृष्टीच्या टापूंत येतो व आनंद वाढतो त्याप्रमाणें माझा हा हायस्कूलमधला अभ्यासक्रम मला फार चित्तवेधक व बोधकारक झाला.  त्यामुळें माझ्या घरांतील भयानक दारिद्र्याच्या वेदना मला कधींच भासल्या नाहींत, कीं माझ्या शिशुदशेच्या सहजानंदांत कधीं खंड म्हणून पडला नाहीं.  ह्या माझ्या सदानंदी उत्साहामुळें माझ्या आईबाबांचें दुःखही हलकें झालें.  विशेषतः माझ्या आईला आपले कठीण कष्ट सह्य झाले, ह्या गोष्टीचा मला आतां अभिमान वाटतो.

सकृद्दर्शनीं प्रेम  :   आमची खेडवळ शाळा, तो जुना काळ; इंग्रजी विद्येचा आमच्या देशांत आतां कोठें नवा आरंभ झालेला, तशांत माझें कोवळें वय ह्या सर्व गोष्टी विचारांत घेतां, पुढें माझ्यावर इंग्रजी संस्कृतीनें जो अमोघ मोहपाश टाकला आणि माझ्या सर्व आयुष्याचा प्रवाह बदलून टाकला, त्या भावी परिणामाचे डोहाळे जणुं मला ह्या माझ्या साध्याभोळ्या शाळेंत भासूं लागले. Love at first impression म्हणजे सकृद्दर्शनीं प्रेमाच्या झटक्याचाच हा एक मासला माझ्या प्रत्यक्ष अनुभवास आला.

मराठी अभ्यास  :   मी केवळ इंग्रजीला हुरळून तन्मय झालों आणि माझ्या मातृभाषेला व संस्कृतीला पारखा झालों असें मुळींच नव्हे.  चवथ्या-पांचव्या इयत्तेंत आम्हांला नवनीतांतील कांहीं कविता लावल्या होत्या.  त्यांत विशेषेंकरून रघुनाथ पंडिताचे नलदमयंती आख्यानानें मजवर जो ठसा उमटविला तो अद्यापि ताजा आहे.  ह्या सुंदर काव्यांतील कविता मी घरीं माझ्या आईला व बहिणींना म्हणून दाखवून मोठ्या रसिकतेनें त्यांचा अर्थ सांगत असें.  मराठीवरील माझें अकृत्रिम प्रेम वाढण्यास शाळेपेक्षां अधिक साधनें माझ्या घरींच होतीं, हें सांगण्यास मला कृतज्ञता वाटते.  श्रीधर, महिपति, तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे मराठी कवि आणि प्रासादिक संतांच्या ग्रंथांचें पारायण माझे बाबा स्वतःच घरीं करीत असत.  त्यांच्या संग्रहीं ह्या जुन्या पोथ्या बर्‍याच होत्या व त्या वाचून ते नेहमीं इतरांस पुराणिकाप्रमाणें अर्थ सांगतांना मी ऐकत असें.  चवथ्या-पांचव्या इयत्तेंत माझें मराठी सुधारल्यावर मी स्वतः रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, भक्तिविजय वगैरे ग्रंथ नित्य वाचून आपल्या वर्गांतल्या मुलांना त्यांचा अर्थ सांगत असें.  त्या वेळीं मराठी गद्य वाङ्‌मय तयार झालें नव्हतें; पण आम्हांला त्याची वाण भासली नाहीं.  आतां जी आधुनिक वाङ्‌मयात गबाळ वाढ झाली आहे तिच्यामुळें बालबोध मराठीच्या परिचयांत विशेषे भर पडली किंवा फायदा झाला, असें मला वाटत नाहीं.

संस्कृत अभ्यास  :   सहावींत माझा संस्कृतशीं संबंध घडला.  आमच्या शाळेंत रा. गणेशशास्त्री जोशी म्हणून एक जुने शास्त्री संस्कृत वाङ्‌मय शिकविण्यास होते.  मॅट्रिकचा अभ्यास करतांना एक्स्ट्रॉ रीडिंग म्हणजे शाळेंतील वर्गांत नेमलेल्या अभ्यासापलीकडे कांहीं वांचणें बरें असतें.  तें वाचावयास शास्त्रीबोवांचे घरीं आम्ही कांहीं विद्यार्थी मिळून जात असूं.  माझा पहिला नंबर पाहून शास्त्रीबोवा मी जातीन मराठा म्हणून कोणताही भेद मनांत न आणतां रसिकतेनें रघुवंश, कादंबरी, शाकुंतल वगैरे वाङ्‌मय आम्हांला शिकवीत असत.  सकाळीं आम्ही त्यांचेकडे जात असूं.  ते गोठ्यांत गाईचें शेण काढीत असतांना तोंडात तंबाकूचा बार भरून त्याच्या मधून मधून पिचकार्‍या मारीत कधीं कधीं इकडे तिकडे फिरत आम्हांला रघुवंशांतील श्लोक सांगत.  बाणाची कादंबरी त्यांनीं आम्हांला अशी शिकवली कीं, ती त्यांची हंसत मुद्रा, सूक्ष्म विनोद, प्रेमळ बोल मला अद्यापि आठवतात.  अच्छोद सरोवरावरील शिवालयांतील महाश्वेतेच्या संगीत भजनासारख्या देखाव्याचें वर्णन करण्याची पाळी आली कीं, गणेशशास्त्रांच्या स्वाभाविक रसिकतेला पाझर फुटे,  शृंगार, वीर, करुणादि नऊ रसांचें अभ्यंगस्नान आम्हांला घडे.  ऍडिसनचे 'सर रॉजर डी कॉव्हरले' वाचीत असतांना जो मी इंग्लंडांतील खेड्यांतील देखाव्यांत रमे, तोच एकदम दीड हजार वर्षांपूर्वीच्या श्रीहर्षाचें चरित्र शास्त्रीबोवांच्या मुखांतून ऐकतांना मागील भारतीय वैभवाच्या शिखरावर भ्रमण करूं लागे.  आणि हीं स्थळ-कालांतरें करणारा मी त्या वेळीं १७।१८ वर्षांचाच होतों !

रसिकता  :   गणित असो वा शास्त्र असो, भाषा असो वा व्याकरण असो, परकीय इंग्रजी असो वा मृत संस्कृत असो कीं मातृभाषा चालू मराठी असो, माझी गति सारखीच अकुंठितपणें चाले.  सर्व हायस्कूलच्या अभ्यासक्रमांत मला अभ्यासाचे श्रम म्हणून कधीं भासलेच नाहींत.  ह्याचें कारण माझ्या बुद्धीचें तेज नसून (मी बुद्धीनें साधारणच आहें) केवळ माझ्या हृदयाची निर्मळ रसिकताच होय, हें मला येथें नमूद करावयाचें आहे.  ही रसिकता मला शाळेपेक्षां घरांतच अधिक, गुरूंपेक्षां माझ्या आई-बापांकडूनच जास्त मिळाली हें खास.  माझ्या घरीं जातिभेद नव्हता, तसा माझ्या हृदयांत संस्कृतिभेदाचा किंवा पक्षपाताचा कृत्रिमपणाही नव्हता.  सौंदर्य जेथें भेटेल तेथें ऊर्ध्वहस्तानें स्वीकारण्यास मी लहानपणापासून एका पायावर तयार आहें.  मग तें इंग्लंडांतलें असो कीं स्वदेशांतलें असो, शहरांतलें असो कीं खेड्यांतलें असो, संस्कृत असो कीं प्राकृत असो, तें सहज व स्वाभाविक असलें कीं पुरे.  मी त्याला बिलगतोंच म्हणून समजावें.  ह्या माझ्या मुग्ध शृंगारी स्वभावामुळें, केवळ कपटी व्यवहाराच्या दृष्टीनें पाहतां प्रपंचांत माझें बर्‍याच अंशीं नुकसान झालेंआहे आणि कांहींजणांमध्यें मजसंबंधी दुराग्रहही पसरला आहे, तरी पण 'स्वभावो दुरतिक्रमः' ह्या न्यायानें मी आपला माझ्याच चालीनें चाललों आहें, ही चाल मी हायस्कुलांतच नव्हें तर अगदीं माझ्या पाळण्यांतच किंबहुना माझ्या मातृगर्भातच शिकलों असेन.

महाराष्ट्र परिषद

मिशनच्या परिषदा  :-  मेघवृष्टीनें प्रचार करण्याचे तीन प्रकार आहेत -  (१) ठिकठिकाणच्या हितचिंतक पुढार्‍यांचीं मनें वळवून त्यांच्याकडून लोकमत तयार करण्यासाठीं त्यांच्या त्यांच्या गांवीं प्रचंड सभा भरविणें.  (२) अशा रीतीनें लोकमत अजमाविल्यावर जनरल सेक्रेटरीनें (मुख्य प्रचारकानें) प्रांतांच्या एका मुख्य ठिकाणीं अंगभूत शाखा स्थापून तिच्या नियंत्रणाखालीं जिल्ह्याच्या ठिकाणीं उपशाखा स्थापण्यासाठीं प्रांताचें निरीक्षण करून आणि निधि मिळविण्यासाठीं दौरे काढणें.  (३) तिसरा प्रकार मिशनच्या खास परिषदा भरविणें.  भारतीय राष्ट्रीय सभेची बैठक नाताळांत जेथें जेथें होत असे तेथें तेथें एकेश्वरी धर्माची परिषद भरविण्यास मला जावें लागत असे.  त्याच वेळीं मी ह्या मिशनच्याही परिषदा संघटित रूपानें भरवीत असें.  १९०६ मध्यें मिशन स्थापल्यावर १९०७ मध्यें सुरत, १९०८ मध्यें मद्रास, १९०९ लाहोर, १९१० अलाहाबाद, १९१२ बांकीपूर, १९१३ कराची येथें काँग्रेसच्या वेळीं या परिषदा भरविण्यांत आल्या.  बांकीपूर येथें काँग्रेसचे अध्यक्ष, अमरावतीचे नामदार मुधोळकर वकील हेच मिशनच्या परिषदेचे अध्यक्ष होते.  कराचीच्या परिषदेंत लाला लजपतराय हे अध्यक्ष होते.  ह्या परिषदांमुळें प्रांतांप्रांतांतून आलेल्या पुढार्‍यांचें लक्ष ह्या मिशनच्या कार्याकडे लागत असे.  त्या त्या प्रांतांत ह्या मिशनच्या कार्याची उभारणी करण्यासाठीं माहिती आणि मदत मिळत असे.  पण प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यांत ह्या अस्पृश्यांच्या प्रश्नाला शिरकाव होण्याला त्या वेळीं अनुकूलता मुळींच नव्हती.  हा प्रश्न धर्माचा आहे; त्याची भेसळ राजकारणांत नको, अशी सबब सांगून त्या वेळचे जहाल अथवा मवाळ राजकीय पुरुष हा प्रश्न सफाईदारपणें टाळीत असत.

परिषदेची तयारी  :  १९०६ सालीं हें मिशन निघून त्याचें अर्धे तप १९१२ अखेर संपूर्ण झालें.  ह्या राष्ट्रीय प्रश्नाच्या बाबतींत ह्या अर्ध्या तपांत महाराष्ट्रीयांनीं उचल खाऊन सर्व प्रांतांत आघाडी मारली.  मुंबई, मद्रास, मध्यप्रांत ह्या हिंदुस्थानांतील तीन इलाख्यांत ह्या मिशनच्या द्वारें व शासनाखालीं ह्या प्रश्नाची अपूर्व घटना केली.  म्हणून मला असें वाटूं लागलें कीं, ह्या मिशनची खास महाराष्ट्रीय परिषद भरवून लोकमताचा आढावा घ्यावा.  ह्या प्रयोगासाठीं पुणें शहर हेंच योग्य ठिकाण असें ठरविलें.  मुंबई हें पैशाचें केंद्र आणि पुणें हें चळवळीचें केंद्र हा आधुनिक महाराष्ट्राचा अनुभव आहे.  पुणें शाखेचें वसतिगृह स्थापावें, सर्व मिशनचा एक मध्यवर्ती आश्रम स्थापावा, सनातनी पक्षाला हालवून पाहावें, भिन्नजातीय व भिन्न धर्मीय पुढार्‍यांची सक्रीय सहानुभूति कसोटीस लावून पहावी वगैरे इतर अनेक हेतु होतेच.  ही परिषद वरिष्ठ वर्ग आणि अस्पृश्यवर्ग ह्यांच्या सहकार्यावर घडवून आणण्यांत आली.

परिषद फर्ग्युसन कॉलेजच्या ऍंफि-थिएटरमध्यें सर रामकृष्णपंत भांडारकर यांचे अध्यक्षतेखालीं सन १९१२ ऑक्टोबर ता. ५, ६, ७ ह्या तीन दिवशीं भरली.  परिषदेच्या कामाकरितां स्वयंसेवकांची जोरदार घटना केली.  त्यांत विशेषतः पुणें येथील शेतकी कॉलेजचे व इतर कॉलेजांतील बर्‍याच तरुण स्वयंसेवकांनीं ऊन, वारा, पाऊस यांना न जुमानतां एकसारखी मेहनत केली.  सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सभासद रा. वझे यांनीं आणि इतरांनीं फारच श्रम घेतले.  परिषदेकरितां आलेल्या सर्व जातींच्या दूरदूरच्या पाहुण्यांची जेवण्याची व राहण्याची सोय मिशनच्या लष्करांतील शाळेंत करण्यांत आली.  जेवणासाठीं भव्य मंडप घालण्यांत आला होता.  सर्व जातींचे मिळून २६० पाहुणे आले होते.  त्यांचीं एकत्र भोजनें तीन दिवस मिळून-मिसळून होत होतीं.  परिषदेच्या दुसर्‍या दिवशीं म्हणजे रविवारीं परिषदेचे स्वयंसेवक, वरिष्ठ जातीचे हितचिंतक आणि निरनिराळ्या अस्पृश्य जातींचे पाहुणे मिळून सुमारें ४०० पानांचें थाटाचे प्रीतिभोजन झालें.  ह्या भोजनांत ५० वरिष्ठ जातींच्या लोकांनीं भाग घेतला.  कमिटीचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. मॅन यांनीं प्रीतिभोजनांत सर्वांत मिसळून भोजन केलें.

सर्व पाहुणेमंडळी पुण्यास आल्यावर त्यांचें नांव, जात ह्यांची नोंद होई.  सकाळचा चहा झाल्यावर परस्पर परिचय होऊन भोजन होई.  सभेचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणें उरकण्यांत येई.  सर्व कार्यक्रमाला भजनानें व उपासनेनें आरंभ होई.  पहिले दिवशीं रा. ब. काशिनाथ बाळकृष्ण मराठे यांनीं उपासना चालविली.  दुसरे दिवशीं परिषदेसाठीं प्रार्थना समाजाच्या हरिमंदिरांत परिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर यांनीं उपासना चालविली.  त्या वेळीं परिषदेचे बाहेरगांवचे २५० पाहुणे हजर होते.  तिसर्‍या दिवशीं मिशनचे शाळेंत मीं स्वतः उपासना चालविली.  त्या वेळीं मुंबईहून आलेल्या परळ मिशनच्या मुलांनीं निरनिराळ्या व्यक्तिप्रार्थना केल्या.  

पुढार्‍यांचा मेळावा  :   दोन प्रहरीं अध्यक्ष भांडारकर स्थानापन्न झाले.  जमलेल्या थोर मंडळींत सर चंदावरकर, डॉ. मॅन, भावनगर संस्थानचे दिवाण पट्टणी, ना. मौलवी रफिउद्दीन, इचलकरंजीचं अधिपति श्रीमंत बाबासाहेब घोरपडे, कोल्हापूरचे भास्करराव जाधव, गोपाळराव देवधर, बी. एस. कामत, प्रो. धोंडोपंत कर्वे, रेव्हरंड रॉबर्टन, तेलगू समाजाचे पुढारी डॉ. कोरेज, अस्पृश्यांपैकीं सुभेदार मेजर भाटकणर, नगरचे डांगळे, पुण्याचे कांबळे, भंग्यांचे पुढारी नाथामहाराज, सातारचे मातंग पुढारी श्रीपतराव नांदणे वगैरे अनेक पुढारी होते.

कार्याचें क्षेत्र  :   प्रथम मीं माझ्या भाषणांत ह्या चळवळीचा थोडक्यांत इतिहास सांगून मिशनच्या हल्लींच्या कार्याचा विस्तार पुढील कोष्टक देऊन सांगितला.

ठिकाणें                                        संस्था
१ मुंबई -        ५ दिवसाच्या शाळा व १ रात्रीची शाळा.  ५०० विद्यार्थी.  १ वसतिगृह व त्यांतील
                  २६ मुलें, २ भजनसमाज, १ धंदेशिक्षणाची शाळा.

२ पुणें -          एक २०० मुलांची शाळा, १ भजनसमाज, १ वाचनालय, क्रिकेट क्लब वगैरे.

३ हुबळी -       १ दिवसाची शाळा, १ रात्रीची शाळा, १ वसतिगृह.

४ सातारा -      १ रात्रीची शाळा, १ भजनसमाज.

५ ठाणें -         गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी स्थानिक मंडळी.

६ दापोली  -     गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी स्थानिक मंडळी.

७ मालवण -     गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी स्थानिक मंडळी.
८ मंगलोर -      १ दिवसाची शाळा, १ रात्रीची शाळा, १ वसतिगृह, १ हातमागाचा वर्ग.

९ मद्रास -       २ दिवसाच्या व २ रात्रीच्या शाळा, एकंदर मुलें १३०

१० अकोला -    ३ रात्रीच्या शाळा, १ वसतिगृह.

११ उमरावती -  २ रात्रीच्या शाळा.

१२ इंदूर -       १ रात्रीची शाळा.

१३ भावनगर -   १ दिवसाची शाळा.

१४ कोल्हापूर -  १ वसतिगृह.

सध्या एकंदर १४ ठिकाणीं २३ शाळा, ५५ शिक्षक, ११०० मुलें, ५ वसतिगृहें, इतर १२ संस्था व ५ प्रचारक असून खर्च एकंदर रु. २४४८५ आहे.

वरील विस्ताराचें निरीक्षण केल्यावर असें दिसून येईल कीं, निरनिराळ्या ४ भाषा चालू असलेल्या ७ प्रांतांत मंडळीला आपले प्रयत्‍न करावयाचे आहेत; म्हणूनच तिला हल्लीं भरलेल्या परिषदेसारख्या निरनिराळ्या ठिकाणीं प्रांतिक परिषदा भरविण्याची जरुरी आहे.  अशा परिषदेशिवाय मंडळीला आपल्या कार्याचा विस्तार व दृढीकरण करण्यास दुसरा मार्ग नाहीं.

सरकार, संस्थानिक, म्युनिसिपालिट्या आणि परोपकारी संस्था, सर्व जाती आणि सर्व धर्म - एकूण ह्या प्रचंड देशांतील सर्व शुभ शक्ति - ह्यांचें केंद्र ह्या कार्यांत जितक्या अंशानें जास्त साधेल तितक्याच अंशानें अधिक यश येईल हें ध्यानांत वागवून परिषदेचे सर्व सभासद सात्त्विक वृत्तीनें विचार करतील अशी उमेद आहे.

भाषणें  :   अध्यक्ष डॉ. भांडारकर यांचें विद्वत्ताप्रचुर आणि संशोधनात्मक असें भाषण झालें.  अस्पृश्यतेचें मूळ आणि मीमांसा त्यांनीं वेद, उपनिषदें, पाली ग्रंथ, मराठी संतकवि यांच्या आधारें व प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासाला धरून मोठ्या अधिकारयुक्त वाणीनें केली.  यानंतर निरनिराळ्या व्यक्तींनीं पुढीलप्रमाणें विद्वत्तापूर्ण अशीं व्याख्यानें दिलीं.

               वक्ता               
        विषय
१ गणेश अक्काजी गवई   
वर्‍हाडांत ख्रिश्चन मिशननें अस्पृश्यांसंबंधीं केलेलें काम व त्याची मिशनच्या कार्याशीं तुलना
२  बी. एस. कामत 
गुरुकुलाची आवश्यकता.
३  सौ. लक्ष्मीबाई रानडे
सदर.
४  रा. गोपाळराव          
उपदेशकाची जरुरी.
५  रा. केशव रामचंद्र कानिटकर
औद्योगिक शिक्षणाची दिशा. यानंतर वसतिगृहासाठीं भिक्षापात्र फिरविण्यांत आलें.
६  रा. भास्करराव जाधव .... 
सदर.
७  रा. नाथामहाराज (भंगी पुढारी)  ... सदर.
८  नामदार बाबासाहेब इचलकरंजीकर ....  उद्धाराच्या कामीं अस्पृश्यांनीं वरिष्ठ वर्गाशीं मिळूनमिसळून वागावें.  यांनीं ५० रु. देणगी जाहीर केली.
९  प्रो. गो. चि. भाटे  .... 
 सर्वांस अवश्य शिक्षण द्यावें.
१०  न. चिं. केळकर ....     म्युनिसिपालिट्या लोकनियुक्त व्हाव्यात व त्यांत अस्पृश्य प्रतिनिधि असावेत.
११  रा. आर. जी. प्रधान  ....
 सदर
१२  प्रो. हरिभाऊ लिमये  ....
 म्युनिसिपालिटींत अस्पृश्य प्रतिनिधि येण्याची वाट न पाहतां त्यांच्या उन्नतीची सोय करावी.
१३  रा. भास्करराव जाधव  .... अस्पृश्यांनीं सरकारी नोकरींत शिरण्याची आवश्यकता व कोल्हापूर संस्थानांतील प्रयत्‍न. महाराजांनीं हत्तीवर अस्पृश्य माहूत नेमल्याचें उदाहरण.
 १४  रा. जोग इचलकरंजीकरांचे चिटणीस ....   इचलकरंजी संस्थानांतील प्रयत्‍न.
 १५  रा. वि. रा. शिंदे  ...  मुंबई, पुणें येथें मिशनचे स्वतःचे इमारतीची जरुरी.
 १६  एल. बी. नायडू  --- सदर ---
 १७  श्री. महाभागवत (भावी शंकराचार्य) ....   संस्कृतमध्यें.  मिशनच्या धार्मिक प्रयत्‍नांची योग्यता.  हे प्रयत्‍न
 १८  प्रो. लक्ष्मणशास्त्री लेले ....



समारोप व रा. वि. रा. शिंदे यांचे आभार.
 समन्वयाच्याच पायावर झाले पाहिजेत.  त्याबद्दल मिशनचे आधार.
वेदोपनिषदांतील उतारे.  वेदकाळीं अशी अस्पृश्यता नव्हती.
हल्लींचें विकृत स्वरूप गेलें पाहिजे.


१९  अध्यक्ष भांडारकर  ....                      

 
स्त्रियांची सभा  :   तिसर्‍या दिवशीं श्रीमती रमाबाईसाहेब रानडे यांच्या अध्यक्षतेखालीं स्त्रियांची सभा लष्कर येथील शाळेंत भरली.  वरिष्ठ वर्गांतील सुमारें ५० व अस्पृश्य समाजांतील सुमारें २०० स्त्रिया हजर होत्या.  सौ. लक्ष्मीबाई रानडे, सौ. सीताबाई भांडारकर, सौ. काशीबाई कानिटकर प्रमुख स्थानीं बसल्या होत्या.  अध्यक्षीणबाई म्हणाल्या, ''अशीं कामें आम्हा बायकांच्या अंगवळणीं पडलीं नाहींत, पण तीं पडेपर्यंत कामाला खरा जोर येणार नाहीं.  निराश्रित वर्गांतल्या स्त्रियांची सुधारणा करण्यासंबंधानें पुणें, मुंबई, यवतमाळ, अकोला, अमरावती वगैरे ठिकाणीं जे प्रयत्‍न होत आहेत ते सर्व मीं पाहिले आहेत.  अकोला येथें श्रीमती बेन्द्राबाई यांनीं आपल्या महार जातींतील १४।१५ मुलांचें एक स्वतंत्र वसतिगृह चालविलें आहे.  त्यांत इतकी स्वच्छता व टापटीप दिसली कीं, हीं मुलें निकृष्ट जातीचीं आहेत असें कोणालाही ओळखतां येत नाहीं.''  नंतर मिशनच्या शाळेंतील शिक्षिका पार्वतीबाई जाधव या महार बाईचें भाषण झालें.  ह्या बाई मिरजेहून आल्या होत्या.  त्या म्हणाल्या - ''ह्या परिषदेस येण्यापूर्वी आमची उतरण्याची सोय होईल काय याची पंचाईत आम्हांस पडली होती.  पण येथें आल्यावर ब्राह्मणादि वरिष्ठ जातींच्या बायकांनीं आमची उत्तम बडदास्त ठेवली.  उलट महार, मांग, चांभार वगैरे आम्ही लोकच एकमेकांच्या पंक्तीस बसण्यास कुरकुरूं लागलों.  तेव्हां 'तुम्हांस (महारांस) ब्राह्मणांच्या पंक्तीस बसण्याची हौस वाटते आणि मांगास पंक्तीस येऊं देण्यास तुम्ही नाराज होतां हें कसें ?' असें विचारलें.  ह्यावर सर्वांची समजूत पटून सुमारें ३०० महार-मांग एकत्र बसलेले पाहून सर्वांना मोठा आनंद झाला.''

नंतर कु. शिंगणे व पुणें येथील अस्पृश्य पुढारी श्रीपतराव थोरात यांची कन्या कु. लक्ष्मीबाई यांचें निबंधवाचन झालें.  अकोल्याच्या श्रीमती इंदिराबाई परचुरे यांचें भाषण झालें.  शेवटीं सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्यांनीं अध्यक्षीणबाईंचे आभार मानले.

महाराष्ट्र परिषदेस एकूण १७ जिल्ह्यांतील ५४ गांवांतल्या निरनिराळ्या १० जातींच्या २३० पाहुण्यांची सर्व तर्‍हेची सोय परिषद कमिटीमार्फत करण्यांत आली होती.  ह्याखेरीज इतर सभासद पुणें शहरांतील स्थानिक रहिवासी होते.
दोन विघ्नें   :   ह्या परिषदेचीं सर्व कामें अत्यंत उत्साहानें पार पडलीं; तरी दोन प्रकारें विघ्नें आल्यानें परिषदेला मोठी मनोरंजकता आली.  दुसर्‍या दिवशीं रविवारीं मोठ्या थाटाचें ४०० लोकांचें सहभोजन ठरलें होतें.  परिषदेंतील पाहुण्यांचें तीन दिवस सहभोजन चाललेलें होतेंच !  दोन दिवस ब्राह्मण आचारी खुशीनें स्वयंपाक करीत होते; पण रविवारच्या मोठ्या सहभोजनाचें दिवशीं पुणें शहरांतील बरीच ब्राह्मण-मंडळी जेवण्यास येणार होती, हें ऐकून सकाळीं दहा वाजतां स्वयंपाक्यांनीं संप करून मोठा अडथळा आणला.  चालकांनीं लगेच त्यांना मंडपांतून जाण्यास सांगितलें.  बाहेरून आलेल्या पाहुण्यामंडळींपैकीं ब्राह्मण बायकांनीं आणि स्वागत कमिटींतील अस्पृश्य सभासदांच्या बायकांनीं स्वयंपाकाचें सर्व काम एकदम अंगावर घेऊन ठरल्याप्रमाणें १२ वाजतां सर्व तयारी केली.  सौ. रुक्मिणीबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालीं बिनबोभाट सर्व तयारी झालेली पाहून सर्व पाहुण्यांना आश्चर्य व आनंद वाटला.  दोन तासांत दोन पंक्ती उठून सर्व भोजनसमारंभ आटोपल्याबरोबर जोराची पर्जन्यवृष्टि एक तासभर झाली.  लष्करांतल्या शाळेंतील पाहुणेमंडळींच्या उतरलेल्या ठिकाणाहून फर्ग्युसन कॉलेजचें सभागृह २ मैल लांब होतें.  तरी स्वयंसेवकांनीं अपूर्व तसदी घेऊन सभेच्या कामांत कोणत्याही प्रकारची उणीव भासूं दिली नाहीं.  एक तासाच्या विलंबानें सभेचें काम सुरळीतपणें पार पडलें.  देव तारी त्याला कोण मारी !
अपूर्व कामगिरी  :  परिषदेकरितां जवळ जवळ २००० पत्रें बाहेर पाठवून त्यांचीं उत्तरेंही आलीं.  हें एक दीड महिन्यांच्या आंतच करावें लागलें.  बाहेरगांवांहून परिषदेसाठीं येणार्‍या मंडळींना रेल्वे-तिकिटाची सवलत मिळावी म्हणून निरनिराळ्या रेल्वे कंपन्या व आगबोट कंपन्या यांच्याशीं मीं पुन्हां पुन्हां पत्रव्यवहार केला.  तरी सर्वांकडून शेवटीं नकारार्थीच उत्तर आलें.  स्वागत कमिटीचे दुय्यम चिटणीस रा. दा. ना. पटवर्धन ह्यांनीं ही परिषद घडवून आणण्यासाठीं जे अविरांत श्रम केले त्यांचें वर्णन शब्दानें करवत नाहीं.  रा. ए. के. मुदलियार यांचे हाताखालीं त्यांना दक्षतेचें आणि तत्परतेचें वळण लागलें होतें.  परिषदेचें बहुतेक श्रेय त्यांनाच आहे.  सुमारें पाऊणशें पानांचा परिषदेचा अहवाल पुस्तकरूपानें प्रसिद्ध करून परिषदेच्या वाङ्‌मयांत त्यांनीं एक संस्मरणीय भर टाकली.

उदार देणगी  :  ही परिषद पुणें येथील इमारतफंडासाठीं मुख्यत्वेंकरून भरविण्यांत आली होती.  परिषदेंत तो फंड न मिळतां उलट खर्चांतच २५९ रु. १४ आ. ३ पै तूट आली.  पुणें शहराच्या दारिद्र्याचें याहून सुंदर प्रदर्शन दुसरीकडे कोठें दिसणार !  पण चिटणीस रा. पटवर्धन यांचे सात्त्विक परिश्रमाला दुसरीकडूनच यश येणार होतें.  परिषदेचा सुंदर अहवाल वाचून इंदूरचे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर यांना दयेचा पाझर फुटला आणि त्यांनीं पुढील महिन्यांतच जनरल सेक्रेटरी म्हणून मला ताजमहाल हॉटेलमध्यें बोलावून २०,००० रु. चा चेक माझे हातीं दिला.  ह्यांतच पुढें मुंबई सरकारच्या ८७,००० रु. ची भर पडून पुणें शाखेसाठीं भोकरवाडींत 'अहल्याश्रम' या नांवाच्या सुंदर इमारतींत आश्रम उघडण्यांत आला.

  1. मंगलोर ब्राह्म समाज
  2. भावी सामाजिक सुधारणेची तयारी
  3. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद
  4. ब्राह्म समाजाचा शतसांवत्सरिक उत्सव
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • 45
  • 46
Page 42 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी