1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

शिवाजी की रामदास?

समर्थ रामदासाविषयी आदरबुद्धी महाराष्ट्रामध्ये जी आहे तिच्यात जर भर पडावयास हवी आहे तर त्यासाठी ऐतिहासिक चर्चेच्या नावावर शिवाजीसारख्या थोर विभूतींना खाली ओढण्याची काय जरूरी आहे? रामदास व शिवाजी ह्यांची पहिली भेट केव्हा झाली हा वादग्रस्त प्रश्न आहे, परंतु ती राज्यस्थापनेनंतर पराक्रमामागून नावलौकिक झाल्यानंतर झाली असे म्हणावयास जागा असता शिवाजीच्या सर्व कर्तृत्वाचे, सर्व पराक्रमाचे, सर्व योजकतेचे, सर्व राजकारणी धोरणाचे श्रेय रामदासांना देऊन शिवाजीला त्यांच्या हातचे बाहुले करणे म्हणजे महाराष्ट्राचे मराठे म्हणविणा-यांचे मनात ब्राह्मणाविषयी अनादर भाव मुद्दाम वाढविण्यासाठी हा असा प्रकार सुशिक्षितांनी करण्याच्या भानगडीत पडणे आजच्या स्थितीत अत्यंत अनुचित होय. शिवाजीच्या कर्तृत्वाची साक्ष इतिहास देत आहे. त्यांच्या कर्तुत्वावर, त्यांच्या शौर्यावर, त्यांच्या योजना सामर्थ्यावर झाकण घालून समर्थांचे महत्त्व वाढविण्याचा काळ आता गेला. रामदासांचे महत्त्व वाढविण्यास त्यांचे मनाचे श्लोकही पुरेसे आहेत. रामदासाविषयी आदरबुद्धी वाढविण्यास दासबोध पुरेसा नाही काय? रामदासांची योग्यता त्यांची स्फुट प्रकरणे दाखवीत नाहीत काय? मग ऐतिहासिक सत्यसंशोधनाच्या मागे लपून शिवाजीसारख्या व्यक्तीवर शिंतोडा उडविण्याची काय जरूरी आहे?

शास्त्र आणि तत्त्वज्ञान-२

संसार आणि तत्त्वज्ञान ह्यांचा परस्पर निकट संबंध हा काही नवा नाही. तो पुरातनच आहे. पण त्याकडे द्यावे तितके लक्ष मात्र दिले गेलेले नाही. ह्या निकट संबंधाकडे पूर्ण लक्ष देऊन पाहिल्यास नवीन ज्ञानाचा उगम होतो आणि तेव्हाच तत्त्वज्ञानाला स्वतंत्र पदवीही प्राप्त होते. ज्ञात्यापासून केवळ अलग अशा बाह्य जगतातच जर विचारांचे सर्व क्षेत्र गुरफटून राहिले तर ते केवळ सामान्य कल्पनांचे एक जाळे बनून वास्तविक जीवनाशी त्यांचा काही संबंध पोचणार नाही. उलटपक्षी स्वत: ज्ञात्यामध्येच सर्व विचारक्षेत्रात अधिक विविधता आणि विचित्रताही प्राप्त होईल. पण अमूक एक सत्य एकाद्या व्यक्तीपुरतेच आहे आणि अमूक सत्य एकाद्या व्यक्तीपुरतेच आहे आणि अमूक सत्य सर्व जातीला लागू आहे, ह्याचा निर्णय करणे जड जाईल, इतकेच नव्हे, पण सर्व जातीलाही घडून आलेला एकादा विविक्षित अनुभव समुच्चय घेतला तरी त्यातील कोणता भाग केवळ भासमय आहे आणि कोणता खरोखर ध्येयमय आहे, ह्याचा निर्णय करण्याला काही प्रमाण उरत नाही. येणेप्रमाणे एकपक्षी बाह्य जगासंबंधाची केवळ सर्वसाधारण मोघम कल्पना किंवा इतरपक्षी व्यक्तीचे विशिष्ट अनुभव ह्या दोनही भूमिका एकदेशीयच असल्यामुळे त्यामुळे कोणत्याही एकाच बाजूने ज्ञानाचा ओघ वाहू लागल्यास आध्यात्मिक संस्कृती पूर्णपणे बनून येणार नाही. पण आम्ही चालविलेल्या जिज्ञासेचा मुख्य रोख तर हीच संस्कृती आहे. आमची पद्धती केवळ मानसिक नाही किंवा नुसती भौतिकही नाही, ती वास्तविक आहे. म्हणजे मानवी जगामध्ये उल्हसित होणा-या आध्यात्मिक जीवनासंबंधी सर्व गोष्टींचा उलगडा आणि एकवाक्यता करणे हा आमच्या जिज्ञासेचा मध्यबिंदू आहे.

तत्त्वज्ञानासंबंधी वर सांगितल्या प्रकारच्या भावनेमुळे त्याचा व्यक्तीविषयक जीवन आणि तसाच अखिल इतिहासाचे उद्दिष्ट कार्य ह्यांच्याशीही निकट संबंध येतो आणि ह्या निकट संबंधाची एकदा खूण पटली म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये विविधता व पक्षभेद हीच का वारंवार आढळतात आणि वरवर पाहणा-यांना तत्त्वज्ञानामध्ये सुसंगती कशी बहुतकरून विरळाच दिसून येते, ह्याही गोष्टींचा उलगडा होतो. स्वयंभू आध्यात्मिक जीवनाच्या साक्षात्काराचे साम्राज्य जोपर्यंत अढळ राहते तोपर्यंत सर्व सत्यामध्ये ऐक्यच नांदत आहे, अशा भावनेला आणि तद्वत नवीन संशोधनाच्या धैर्याला बाधा म्हणून कधीच येणार नाही. येणेप्रमाणे आध्यात्मिक जीवनावरच विचाराची मदार रचल्यामुळे जो एक लाभ घडतो तो हा की, विचारांची काही प्रमुख अशी पृथक दर्शने आपल्यापुढे दिसू लागतात, नाहीतर एरव्ही जे आपल्या भोवती विचारांचे दुर्गम जाळे पसरते त्याला ना अंत ना पार असे होऊन जाते. ह्या दृष्टीने पाहता आमच्यापुढे खालील पाच मुख्य दर्शने दिसत आहेत:-

(१) प्रथमारंभीच असा प्रश्न उद्भवतो की, अखिल जीवनाची (संसाराची) एकवाक्यता संस्थापणेच मुळी शक्य असेल काय? सत्याच्या समष्टीस्वरूपासंबंधाने कोणते तरी अंतिम विधान करणे शक्य होईल काय? जो कोणी ह्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देऊन परस्परविरोधी असे जे त्याचे चालू घडीचे अनुभव असतील त्यांनाच केवळ वश होऊन राहतो त्याला उदासी असे म्हणता येईल.

(२) समजा, वरील प्रश्नाला दुस-या एकाद्याने होकारार्थी उत्तर दिले, तर त्यापुढे पुन्हा असा प्रश्न उद्भवतो की ह्या संसार क्षेत्रामध्ये निसर्गाचे जे तत्त्व आढळून येते, त्याच्याशी प्रसंगानुसारे विरोध किंवा सहकार्य करणारे आध्यात्मिक असे दुसरे एकादे तत्त्व नांदत आहे? ह्या दुस-या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देऊन जो कोणी केवळ निसर्गाचाच उपासक बनतो, त्याला जडवादी किंवा अनात्मवादी असे समजण्याचा प्रघात आहे.

(३) जो कोणी आत्मतत्त्वाचे प्रतिपादन करतो त्यास अध्यात्मवादी असे म्हणता येईल, परंतु अध्यात्मवाद नुसते हो म्हणून स्वस्थ बसता येण्याइतका सुलभ नाही. आत्म्याचे दर्शन झाल्याबरोबर त्याचे स्वामित्वही मानल्याशिवाय सुटकाच नाही, असे होते (आत्म्याला नुसते शब्दाने मानून त्याचे स्वामित्वाला वश न होणे अशा स्थितीला मुळी दर्शनच म्हणता येणार नाही) परंतु ह्यावर अशी शंका उद्भवते की, ह्या स्वामित्वाचे प्रतिपादन सोप्या आणि शांत रीतीने करता येणे शक्य आहे की तेथे मोठा विरोध जुंपतो? (ह्या विरोधाच्या दृष्टीने पाहता वरील आत्मवाद्याच्या पुन्हा तीन भिन्न जाती आहेत असे आढळून येते) ज्या कोणाला हा विरोध मुळी नाहीच किंवा असलाच तरी तो निवारता येईल असे वाटते त्याला केवळ ध्यानशील आनंदवादी असे म्हणता येईल. इतर आत्मवाद्यांना हा आनंदवाद पोकळ वाटू लागतो.

(४) उलटपक्षी हा विरोध अगदी जबर भासू लागला असता इतर आत्मवाद्यांचे दोन विभाग होतात. (स्वयंभू आध्यात्मिक जीवन अथवा परमात्मा आणि जिज्ञासू अथवा जीवात्मा ह्यांच्यामध्ये जुंपलेल्या वर वर्णिलेल्या प्रकारच्या विरोधाचा एकदाचा निरास होऊन स्वामित्वाचा उलगडा जोवर होत नाही तोवर एक प्रकारची आध्यात्मिक अवरोधाची अवस्था प्राप्त होते). ह्या घोर अवरोधाला जो बळी पडला व जो कोणी भ्रांत होतो किंवा हताश होते त्याला संशयवादी किंवा नैराश्यवादी अशी अनुक्रमे (पारिभाषिक) नावे आहेत.

(५) परंतु त्यातल्या त्यात उत्साह धरून जो कोणी अंत:प्रयत्नाच्या जोरावर जीवनक्रम पुन्हा आरंभितो त्याच्या त्या दर्शनास प्रयत्नवाद असे म्हणता येईल. ह्या शेवटच्या दर्शनाची विशेष मीमांसा आम्ही मागील एका भागात करून चुकलो आहो. उदासी, जडवादी, आनंदवादी, संशयवादी, आणि प्रयत्नवादी ह्यांच्यामध्ये परस्पर कसा विरोध आहे हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. तथापि एवढे मात्र येथे निवेदन करणे अवश्य आहे की ह्या सर्व दर्शनांना तत्त्वज्ञानाच्या अगाध क्षेत्रामध्ये अवकाश मिळाला असता त्याचे सार्थक्य होण्यासाठी तत्त्वरज्ञानाचा जीवनाशी निकट संबंध राहावयाला पाहिजे आणि त्याचा पाया स्वयंभू आध्यात्मिक जीवनामध्ये खोल रोविला असलेला पाहिजे.

शास्त्र आणि तत्त्वज्ञान-१

शास्त्र आणि जीवन प्रदेशामध्ये खोल शिरत जाणा-या त्याच्या असंख्य शाखा, ही आधुनिक युगाचे एक महत्त्वाचे लक्षण होय, हे अगदी निर्विवाद आहे. शास्त्रामुळे जी विशिष्ट फलप्राप्ती झाली आहे, तेवढाच काय तो त्याचा परिणाम, असे नव्हे. त्याच्या बाह्य कार्यामुळे विश्वाशी आमचा अधिक निकट संबंध जडला आहे, आमच्या जीवनाला अधिक विशदता आली आहे, आणि आमचे बुद्धिमांद्य कमी होऊन बाह्य वस्तूंवरचे आमचे स्वामित्व दृढ झाले आहे. म्हणून जीवनाची मीमांसा निश्चित करण्याचे कामी शास्त्राचाही हात असला पाहिजे आणि त्याच्या योगे मनुष्याची पदवी उन्नत होत असली पाहिजे ह्यात शंका नाही. शास्त्राने बजावलेली कामगिरी जीवन संसृतीच्या कसास लावून पाहताना अर्थात शास्त्रालाही अद्याप किती तरी बिकट प्रश्न सोडवायचे आहेत हे दिसून येते. भौतिक शास्त्राच्या कार्यामध्ये जी भव्य सिद्धी प्राप्त झाली आहे, तिच्या भरात त्याच शास्त्राच्या (जड) पद्धतीचा मोर्चा मानवशास्त्रावरही वळविण्याची लालसा सहज उत्पन्न होत आहे. आणि हल्ली जो निरनिराळ्या विशिष्ट शास्त्रांचा सुव्यवस्थित विकास होत चालला आहे आणि त्या सर्वांच्या विशिष्ट कार्याची एक समतोल सांगड जमत चालली आहे, तिला वरील दूषित लालसेमुळे व्यत्यय घडत हे. तथापि ह्या व्यत्ययाचा प्रतिकारही योग्य प्रकारे होत आहे आणि अशा प्रकारच्या लालसेमुळे अखेरीस ख-या शास्त्राचे काही एक वाकडे न होता, शास्त्राला केवळ लोकप्रिय करण्याचा जो (ग्राम्य) प्रयत्न चालू असतो त्यालाच बाधा पडते. दुसरा एक धोका आहे तो असा, शास्त्राला बाह्य जगामध्ये जी यशप्राप्ती झाली आहे, तिच्या लकाकीमुळे अंत:करण दिपून जाण्याचा संभव आहे. चैतन्यशक्ती आणि विशिष्ट शास्त्रांनी मिळवून आणलेल्या विज्ञानाची अंत:समष्टी ह्यांचे तेज फिक्के पडल्याचा भास होतो. उपलब्ध झालेल्या बाह्य पदार्थाच्या सामग्रीवरच ठराविक दिशेने ज्ञानाची इमारत उठविणे एवढीच जणू शास्त्राची इतिकर्तव्यता असे वाटण्याचा संभव आहे. तरीपण आंतरिक तत्त्व (ज्ञाता) स्वयंभू गितमय आणि विविधरूपी आहे, हेही निदर्शनास येऊ लागले आहे, आणि शास्त्राची दिशा ठाम ठरून त्याला केवळ एककल्ली हटवादाचे स्वरूप प्राप्त होईल अशी फारशी भीती उरत नाही. तिसरी अडचण येते ती विचार आणि जीवन ह्यांचे परस्पर जे नाते आहे त्यामुळे. उदाहरणार्थ विशेषेकरून आम्ही जर्मन लोक केवळ ज्ञान म्हणजेच बाह्याचे अंतरामध्ये समरस होणे असा भ्रम करून घेत असतो आणि खरे चैतन्यतत्त्व बाजूलाच पडून पांडित्यबाहुल्याचाच आम्ही पुरस्कार करू लागतो. पण खरे पाहता हा काही शास्त्राचा दोष नव्हे. बाह्य परिस्थितीच्या संस्काराचा ज ओघ आपल्यावर चालून येतो त्याला सामोरे पाठविण्याला जाच्याजवळ आर्द्र जीवन असे काहीच नाही, अशा मनुष्याचा हा (दारिद्र्य) दोष होय. म्हणून शास्त्राचे महत्त्व आणि त्याने संपादलेले यश ह्यासंबंधी हा शेवटचा आक्षेप आम्हांला घेता येणार नाही.

तत्त्वज्ञानाची परिस्थिती वेगळी आहे. विश्वविद्यालयातील काही विशिष्ट बौद्धिक शिस्तीलाच केवल भुलून न जाता ज्याला म्हणून खरोखर सर्वसाधारणपणे विश्वविद्येचीच अपेक्षा असेल त्याला तत्त्वज्ञानाची हल्लीची अवस्था पाहून असमाधान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचे जे प्रस्तुत तत्त्वज्ञानविषयक प्रयत्न चालू आहेत; त्यांचा सर्वसामान्य असा कोणताही एक हेतूच नाही किंवा आधुनिक युगाची खरी आंतरिक गरज कोणती आहे ह्याचेही भान नाही. हल्लीच्या विचारसृष्टीमध्ये जो सर्वत्र गोंधळ गाजत आहे त्यातून सुटण्याची कोणी पर्वाच करीत नाही. आधुनिक युगामध्ये तत्त्वजिज्ञासेची जी एक मोठी लाट उसळली तिचा अखेरीस एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातील तार्किक ज्ञानामध्ये लय झाला. त्यानंतर ह्या महोदयाचे एक दोन लहानसहान तरंग पसरून गेल्यावर आता कोठे तेच महाकार्य नवीन जोमाने पुन्हा हाती घेण्याची आम्हांला आकांक्षा वाटू लागली आहे. परंतु अद्यापि आम्हांला अंत:स्वातंत्र्य प्राप्त झालेले नाही म्हणून सावरासावर करण्याच्या धांदलीत आम्हांला अजून आधुनिक युगाला काही निश्चित असे वळण लावण्याचे सामर्थ्य आलेले नाही. तसेच गतकाळापासून चालत आलेल्या अनेक असंबद्ध विचारविलयाचे जाळे जे आम्हाभोवती गोवले गेले हे त्यातूनही आमची अद्यापि सुटका झालेली नाही.

वर सांगितलेले अंत:स्वातंत्र्य जेव्हा विचारजगताला प्राप्त होईल, तेव्हाच हल्लीच्या अवनतीतून सुटका होईल. हे स्वातंत्र्य हल्लीच्या आध्यात्मिक प्रवृत्तीला विसंगत असू नये आणि त्याच्यामुळे जुन्या व नव्या अनुभवांना बाधा येऊ नये. म्हणून खालील तीन मुख्य मुद्द्यांना प्राधान्य दिले पाहिजे.

(१) तत्त्वज्ञानाची प्रधान भूमिका जीवन अथवा संसार हीच असली पाहिजे. ह्या संसाराच्या पलीकडे असलेले कोणते एकादे तत्त्व ते ज्ञातरूपाचे असो किंवा श्रेयसाचे असो (त्याचे नाव ब्रह्म असो की माया असो) त्यास आपले मूलस्थान करून तत्त्वज्ञानाचे चालावयाचे नाही. आत्मा, जगत् आणि ब्रह्म ह्या सर्वांची उत्क्रांती व्हावयाची असल्यास ती ह्या संसारक्षेत्रातच होणे शक्य आहे. तशीच ह्या तिन्ही तत्त्वांची स्थिती प्रवाहमय (अथवा विकासमय) असल्यामुळे त्यांचा परस्परांमध्ये हल्ली भासविण्यात येतो तितका विरोध वस्तुत: मुळीच नाही. ह्या संसारक्षेत्रात काही एक निश्चित असे समष्टी स्वरूप आकलिता आल्यास तत्त्वज्ञानाचा ह्यातूनच उगम होऊन त्यास इतर विशिष्ट शास्त्रापेक्षा अधिक स्वतंत्र अशी स्वत:ची पदवी प्राप्त होईल, आणि केवल्यासंबंधी आमची भावना अधिक खोल आणि पायाशुद्ध होईल. (२) वर निर्दिष्ट केलेले संसाराचे समष्टीरूप मनुष्याच्या बदलत जाणा-या अवस्था आणि लहरीपलीकडे  असावयास पाहिजे आणि इंद्रियातील स्वयंभू आध्यात्मिक जीवनाच्या साक्षात्काराशिवाय ह्या समष्टीरूपाचे आकलन होणे शक्य नाही. केवळ व्यक्तिविषयक अनुभव आणि मते ह्यांच्या गोत्यातून सुटका व्हावयाची असल्यास अशा आध्यात्मिक जीवनावाचून गत्यंतरच नाही. (३) येणेप्रमाणे एका दृष्टीने आध्यात्मिक जीवन म्हणजे एक अनिवार्य आपत्ती भासते, तर दुस-या दृष्टीने पाहता आध्यात्मिक जीवन म्हणजे एक अनंतकालाची कामगिरी आहे असे दिसून येते. ख-या विधेययात्मक तत्त्वज्ञानाचा केवळ चिकित्सेचा नव्हे-प्रादुर्भाव व्हावयाचा म्हणजे तत्पूर्वी मानसिक जीवन हे चांगले नावारूपाला आले असलेच पाहिजे. अशा तत्त्वज्ञानाला जी काही खरी फलप्राप्ती झाली आहे तो त्याचा जीवनाशी निकट संबंध राहिल्यानेच झाली आहे, जीवनापासून अलिप्त राहिल्याने ती कधीच झाली नसती.

शासनयोग

ता. १९ आणि ता. २६ जून १९१० रोजी विनययोगावर विचार करतेवेली आपण दुस-याशी कसे वागावे आणि आपण दुस-यास कसे वागवावे असे वागणुकीचे दोन भाग करण्यात आले होते. पहिल्यास विनययोग व दुस-यास शासनयोग असे नाव देण्यात आले होते. आज दुस-या भागाविषयी थोडासा विचार करू.

मनुष्याने मनुष्यास कसे वागवावे हे पाहाण्याच्या पूर्वी मनुष्यास वागविण्याचा अधिकार मनुष्यास आहेकी नाही, ह्या गोष्टीचा विचार करावयास पाहिजे आहे. पण त्याच्याही पूर्वी म्हणजे मनुष्यास शासनाचा अधिकार आहे की नाही हे ठरविण्याच्या पूर्वी, जगतात मुळी शासन आहे की नाही, हे पाहिले पाहिजे. संसारातील व्यवहाराचा पायाच जर कोणत्याही शासनावर अथवा नियमावर अवलंबून नसला, तर मनुष्याच्या व्यवहारापुरताच शासनाचा विचार करण्याची जरूरीच रहाणार नाही. ह्या बाह्य विश्वामध्ये सर्वत्र अबाधित आढळून येणा-या शासनाविषयी जरी निरनिराळ दर्शने आहेत, तरी थोडा विचार करून पाहता त्यामध्ये वस्तुत: विरोध नाही असे दिसून येईल. केवल नीतिनियमांचे अस्तित्व मानणारा कर्मवादी बुद्धादिकांचा एक पक्ष आहे. ह्या नियमांच्या मागे कोणी नियंता आहे, त्याची इच्छा म्हणजेच नियम असे मानणारे ईश्वरवादी आहेत. पण हे दोन्ही पक्ष सारखेच आस्तिक समजावयास पाहिजेत. व्यवहारात एकास नास्तिक व दुस-यास आस्तिक समजण्यात येते हे चुकीचे आहे. केवळ नियमांसच मानून नियंत्याविषयी उदासीन रहाणा-या ईश्वरवाद्यासही वरीलप्रमाणे अंशत: नास्तिक म्हणावयास पाहिजे. कारण, ईश्वरवादाचा मुख्य सिद्धांत सांगत आहे की, ‘अपिचेत् सदुराचारो भजते मामन्यभाक्| साधुरेव समन्तव्य: सम्यग् व्यवसितो हि स:||’ ह्यामध्ये धडधडीत नियमांचे उल्लंघन करणा-या दुराचार मनुष्यासही साधू समजण्याविषयी आज्ञा आहे. ह्यावरून नियमबंधनाविषयी हा पक्ष किती उदासीन आहे दिसते. उलटपक्षी, नियमवाद्यांचा असा आग्रह असतो की, आज आम्ही जे विचार मनात आणू त्यांचे पर्यवसान उद्या आग्रह असतो की, आज आम्ही जे विचार मनात आणू त्यांचे पर्यवसना उद्या कृतीत होणार, इतकेच नव्हे, तर आजचा विचार ती उद्याची कृती, उद्याची कृती ती परवाची सवय, परवाची सवय ते तेरवाचे शील, तेरवाचे शील ती शाश्वतची समाधी, येणेप्रमाणे पर्यवसानाची अबाधित परंपरा हा पक्ष मानतो. आणि ही परंपरा नियंत्याची इच्छा आहे की नाही, ह्याविषयीच्या विचारात तो पडत नाही. ह्याप्रकारे बोधिसत्व आणि भगवतभक्त हे सारखेच आस्तिक किंवा नास्तिक ठरतात. परंतु ज्याअर्थी दोघांचाही काही विधानांवर आधार आहे, त्याअर्थी दोघांनाही आस्तिक म्हणावयास पाहिजे.

लौकिक व्यवहारामध्य काह सनद मानणारे व काही स्वामी मानणारे असे दोन पक्ष दिसून येतात. सनदपक्ष म्हणतो की, स्वामी असला तरी तो सनदी नियमांनी बांधलेलाच असणार व तो असावयास पाहिजे. म्हणून सनद हेच मुख्य ध्येय. स्वामीपक्ष म्हणतो की, सनद हे केवळ स्वामीचे दान म्हणून तेच मुख्य ध्येय. आध्यात्मात ब्रह्म हे ज्याप्रमाणे ‘शुद्धमपापविद्धं’ त्याचप्रमाणे व्यवहारातील स्वामी हाही A king can do no wrong ह्य म्हणण्याप्रमाणे गुन्हा करू शकत नाही. येणेप्रमाणे प्रपंचात आणि परमार्थात जरी वरवर पाहता दोन भिन्न पक्ष दिसतात, तरी त्या दोघांमध्ये खरा विरोध नाही. दोन्ही पक्ष सारखेच निष्ठावान आहेत. विचार करता दोघांच्याही ध्येयांचा अंतिम लय एकाच वस्तूत होतो.

पण तिसरा एक पक्ष असा आहे की, तो मनुष्याच्या मनाबाहेर नियमांचे अस्तित्व मानीत नाही. नियमांचे अधिष्ठान मनुष्याच्या अंत:करणात आहे असे त्याचे म्हणणे असते. तत्त्ववेत्ता Kant ह्यांचे Categorical Imperative आणि कविकुलगुरू कालिदास ह्यांचे ‘संतांहि संदेहपदेषु वस्तुषु प्रमाणमंत:करणप्रवृत्तय:’ ही दोन्ही सूत्रे वरील स्वेष्टवादाचेच समर्थन करितात. पण हा स्वेष्टवादही शासन मानीतच आहे. ते शासन आतून असो किंवा बाहेरून असो ते आहे आणि मानले जात आहे हे खास.

चवथा पक्ष मात्र आत बाहेर कोठेच नियम मानीत नाही. खा, पी, चैन कर, कारण उद्या मरण येणार आहे, असे सांगणारा हा मात्र खरा आणि शुद्ध नास्तिक पक्ष होय. अशा वाममार्गी शाक्तांचा नाश झाल्यास कोणासही वाईट वाटणार नाही. नाश होतेवेळी स्वत: त्यांनासुद्धा वाईट वाटण्याचे कारण नाही. स्वत:च्या शक्तीशिवाय त्यांना बाहेर काहीच दिसत नसते म्हणून त्या शक्तीचा लय झाला असता मरण्यास त्यांनी खुषीने तयार असले पाहिजे, तरच ते शाक्त; नाहीतर त्या वेळेला जर बाहेरील शासनासंबंधी त्यांच्यात श्रद्धा किंवा भीती उत्पन्न होईल, तर ते शाक्त कसले? लोकायितक, चार्वाक इत्यादि मतवाद्यांचे काही युक्तिवादपूर्वक वाड्मय होते पण ते द्वेषाने नाहीसे केले असे सांगतात. पण ते उघडकीला येईतोपर्यंत तरी त्यांच्या नास्तिकपणाला बाध येत नाही.

असो. हा चवथा पक्ष शिवाय करून वरील तिन्ही पक्षांस, सृष्टीमध्ये शासन आहे, हे मान्य आहे. आता मनुष्यास शासन करण्याचा अधिकार आहे की नाही हे पहाण्यासाठी आजपर्यंत त्याच्याकडून हा अधिकार कसा बजावला गेला आहे ह्याचा इतिहास पाहू. मनुष्येच काय पण इतर प्राण्यांमध्येही शासनाचे दाखले दिसत आहेत. शासनाचा पहिला उद्भव मातेमध्ये दिसून येतो. अपत्य जन्मल्याबरोबर माता त्यावर प्रेम करू लागते.  इतकेच नव्हे तर त्यावर राज्यही करू लागते, प्रेमामुळे तिजवर शासनाची एक जबाबदारी येते. मुलाचे लाड करणे व कौतुक करणे एवढीच प्रेमाची लक्षणे नसून, अपत्याची जी इच्छा असेल त्या इच्छेला आपल्या शहाणपणाचा आळा ती सतत घालीत असते. मग ती माता मानवी असो किंवा खालील प्राण्यातील असो.

समाजाचा अधिकाधिक विकास होऊन अनेक कारणांमुळे इतरांपेक्षा एका व्यक्तीमध्ये जेव्हा धन, बल, बुद्धी इत्यादी एक किंवा सर्व गुणांचा जास्त संचय होतो, तेव्हा त्यांच्यामध्ये साहजिक आढ्यता उत्पन्न होऊन तिच्या जोरावर तो इतरांचा पुढारी होऊन त्यांवर शासन करू लागतो. हे बळ मजमध्येच आहे, इतरांमध्ये नाही, हे कार्य मजसारखे आजपर्यंत करीत आलेले आहेत, मी आता न करणे म्हणजे मानहानी होणार आहे अशा प्रकारच्या राजसी विचारांमुळे क्षत्रियांची उत्पत्ती आणि वाढ होऊ लागते, म्हणून आढ्यता हे शासनाचे दुसरे कारण होय. वत्सलतेमुळे होणा-या शासनाचा परिघ साहजिकच अल्प असणार. अपत्यसंबंधापलीकडे त्याचा वाव नसतो. केवळ वत्सलतेमुळेच ज्या स्थितीत शासन चालू असते ती समाजाची आद्य स्थिती. पुढे आढ्यतेमुळे व्यक्तीचे आणि व्यक्तिसमूहाचे इतर व्यक्तींवर किंवा इतर व्यक्तिसमूहावर जे राज्य चालू होते ती समाजाची दुसरी स्थिती ह्या आढ्यतेच्या जोरावर अद्यापिही शासन चालले आहे आणि पुढेही ह्या शासनाचा विस्तार अधिकाधिकच चालू रहाणार.

शासनाचे तिसरे कारण कर्तव्य हे होय. समाजाचा विकास अधिकाधिक झाल्यानंतर सात्विक माणसांनी इतरांवर शासन करणे हा एक त्यांच्या सात्विकपणाचा भाग आहे अशी कर्तव्यबुद्धी जागृत होते. कमी सुसंस्कृत माणसांवर किंवा जातींवर अधिक सुसंस्कृत माणसांनी किंवा जातींनी शासन चालविणे ही हक्काची गोष्ट नसून उलट कर्तव्याची गोष्ट आहे. अडाणी माणसांवर बुद्धिवानाने, अडाणी माणसांच्या हितासाठी राज्य करणे हा बुद्धिवानाचा हक्क नसून अडाणी माणसाचा बुद्धिवानावर हक्क आहे आणि बुद्धिवानाचे हे कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे मातापित्यांनी अपत्याचा सांभाळ करावा हे मातापित्यांचे कर्तव्य आणि अपत्याचा हक्क आहे त्याप्रमाणे सुसंस्कृतांनी असंस्कृतांचे नियमन करावे हे सुसंस्कृताचे कर्तव्य योग्य होय. हे कर्तव्य बजाविले जात असताना शास्त्यांचा सात्विकपणा तीव्र कसाला लागतो आणि ज्या ज्या मानाने तो ह्या कसोटीला उतरतो त्या त्या मानाने त्याचे ते शासन, कर्तव्याचे म्हणजे तिस-या कोटीतले आणि ज्या ज्या मानाने ते उतरत नाही त्या त्या मानाने ते आढ्यतेचे म्हणजे दुस-या कोटीतील समाजावे. एकंदरीत वत्सलता, आढ्यता आणि कर्तव्यता ही शासनाची तीन निरनिराळी कारणे आहेत.

मनुष्याच्या विकासाचा इतिहास पाहिला असता वरील कारणांच्याद्वारे मनुष्याकडून जे शासन घडत आहे, त्याचे श्रेय मनुष्यशक्तीकडे आहे, किंवा मनुष्येतर कोणा श्रेष्ठ शक्तीकडे आहे ह्याच्याविषयी वाद पडतो. वत्सलता आणि कर्तव्यता ह्या सात्विक कारणांमुळे हे श्रेय श्रेष्ठ शक्तीकडे देऊ गेल्यास, त्याबरोबर आढ्यता ह्या राजसी गुणांचेही संशयित श्रेय त्याच शक्तीकडे जाईल. हा संभव टाळावा म्हटल्यास उलटपक्षी सर्वच श्रेय मनुष्यशक्तीकडे येते. मनुष्यशक्तीचा सर्व चांगला भाग श्रेष्ठ शक्तीकडे आणि अपूर्व वाईटाला मात्र मनुष्यास जबाबदार करणे ही मनुष्याविषयी सम्यग्दृष्टी होत नाही. आणि श्रेष्ठ शक्तीलाही अशा प्रकारच्या पक्षपाताची जरूरी नाही. काहीही असो, मनुष्याच्या द्वारा हे शासन घडत आहे. ह्य शासनाची त्याजवर जबाबदारी आहे. तिच्यापासून त्याची सुटका नाही. ह्या शासनाच्या जबाबदारीपासून आपली सोडवणूक करून घेणे ह्यात कोणताही सात्विकपणा नाही. ईश्वराला शरण जाणे हे भगवदभक्तीचे थोर लक्षण आहे. पण शरणतेमुळे ही शासनाची जबाबदारी चुकते असे होत नाही. शासनाविषयी ईश्वरी आज्ञा झाली असता तिच्यात कसुरी करून पुन: आम्ही शरण आहो असे. म्हणत राहणे हे शरणतेचे खरे लक्षण नव्हे ते कोडगेपणाचे लक्षण होय. कोणालाही शरण गेल्यास तो सांगेल ते काम करावयास तयार राहणे आणि ते करण्यातच आनंद आणि थोरवी मानणे हेच त्या शरण गेल्याचे खरे खरे लक्षण होय.

आता शासनाचे किती प्रकार आहेत हे पाहू: (१) आईबापांकडून मुलांवर घडणारे शासन, (२) गुरूकडून शिष्यावर घडणारे, (३) राजाकडून प्रजेवर घडणारे अशी तीनच मानवी शासने संभवतात. व्यवहारात त्याहीपेक्षा आणखी दोन शासने आढळतात. (१) धनी आणि नोकर ह्यांमधील आणि (२) पती आणि पत्नी ह्यांमधील. पण न्यायदृष्टीने पाहू गेल्यास, धनी आणि नोकर ह्यांचा संबंध शास्ते आणि शास्य असा मुळीच नाही. कचेरीतला चपराशी असो, घरातील बाल्या असो, गिरणीतील कामगार असो, किंवा नोकर कुणीही असो, त्याच्यावर राज्य करावे असा धन्याचा अधिकार नाही. धनी आणि नोकर एकाच करारनाम्याचे दोन सारखे उमदे पक्ष आहेत. दोघेही परस्परांचे सारखे ऋणको आणि धनको आहेत. असे असून घरोंघरी आणि शहरोंशहरी चाकर लोकांवर जी साम्राज्ये चालू आहेत ती केवळ ‘बली तो कान पिळी’ ह्या न्यायाची आहेत. अर्थात बळाचे हे तत्त्व जेव्हा धन्याकडून चाकराकडे कलते तेव्हा शासनाचे पारडे डळमळू लागते आणि जो घोटाळा उडतो त्यावरून वरील साम्राज्याचा पाया न्यायावर रचला नसून अन्यायावर रचला आहे हे उघडकीला येते. एकंदरीत हा संबंध शासनाचा नव्हे हे सिद्ध होते. ह्याहूनही विलक्षण प्रकार पतीपत्नी किंवा साधारण स्त्रीपुरूषांच्या संबंधात येतो. प्रत्येक कुटुंबात हे बायकांवरचे राज्य चालू असते. अर्धी मनुष्यजात ह्याप्रकारे मनुष्यजातीच्या दुस-या अर्ध्यावर सत्ता गाजवीत आहे. विवाहामध्ये यद्यपि एक पक्ष दुस-यास म्हणतो की, ‘माझे हृदय ते तुझे हृदय आणि तुझे हृदय ते माझे हृदय’ तथापि व्यवहारात ‘माझे ते माझे आणि तुझे ते माझे’ असा शुद्ध अद्वैतवाद माजलेला दिसतो. म्हणजे एका पक्षी दोन हृदये आणि दुस-या पक्षी काहीच नाही असा प्रकार होतो, हा न्याय नव्हे. कोणी म्हणतात, पती आणि पत्नी ह्यांमध्ये परस्पर शासन असावयास पाहिजे, म्हणजे पती पत्नीचा राजा आणि पत्नी पतीची राणी (राज्य करणारी) असे असावे. पण हाही भ्रम आहे. शासनाचा संबंध कधीच परस्पर असू शकत नाही. एकपक्षी शासन तर प्रतिपक्षी निष्ठाच असावयास पाहिजे. शासन आणि निष्ठा ही एकाच व्यवहाराची समकालीन आवश्यक अंगे होत. निष्ठेशिवाय शासन संभवत नाही आणि शासनावीण निष्ठा निराधार होते. शासन चालू असताना निष्ठा ही उलट दिशेने चालू असते. ह्यावरून दोन पक्षांमध्ये परस्पर शासनाचा संबंध मानणे ही विचाराची भ्रांती होय. एवंच खरी शासने तीनच आहेत, ती- (१) पितृशासन, (२) गुरूशासन आणि (३) राजशासन; आणि तदनुरूप (१) अपत्यनिष्ठा, (२) शिष्यनिष्ठा आणि (३) प्रजानिष्ठा ह्या तीन निष्ठा होत.

मनुष्याने शासनाचा अधिकार आपणाकडे घेण्यापूर्वी स्वत: विनयसंपन्न झाले पाहिजे. ह्या विनयाचा अष्टांग मार्ग पूर्वी सांगितलाच आहे. आढ्यतेमुळे जो मनुष्य शासन चालवीत असतो, तोच मनुष्य कर्तव्यतेमुळे शासनास उपयुक्त होतो, हा त्याच्या विनयसंपन्नतेचा प्रभाव होय, म्हणजे राजसी शासनातून सात्विक शासनाचा जो विकास होतो, तो शास्त्याच्या विनयामुळेच होतो, शास्ता मग तो राजा असो किंवा गुरू असो किंवा पिता असो-त्या सर्वांनी आधी विनययोगात सिद्धी मिळविलीच पाहिजे. ऐहिक राजशासनात देखील राजाच्या लहान मोठ्या अधिकारी मंडळींनी प्रजेशी विनयाने वागले पाहिजे असे राजकीय हुकूम सुटतात, तेही ह्याच शास्त्राधारे. राजाचे अधिकारी हे सभ्य गृहस्थ असतात म्हणून विनयाने वागणे हा त्यांच्या सभ्यपणाचाच एक भाग आहे. एवढ्यावरच अवलंबून राजा स्वस्थ बसत नाही, तर शासनाचा अधिकार विनयाशिवाय मिळत नाही व कायम रहात नाही म्हणून विनय हा व्यक्तिविषयक सभ्यतेचा भाग असो किंवा नसो, तो शासनाची आद्य तयारी आहे म्हणून आचरलाच पाहिजे अशी राजाज्ञा असते. मग तशी धर्माज्ञा असेल त्यात नवल काय?

येणेप्रमाणे पितृशासन, गुरूशासन आणि राजशासन ह्याबद्दल पृथक् पृथक् विचार निरनिराळ्या प्रसंगी पुढे केला जाईल आणि त्यावेळी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही| मानियेले नाही बहुमता|’ असाच मनाचा भाव ठेवला जाईल. बहुमताचा एवढा मोठा प्रचंड प्रभाव आहे की, ते ज्यास सुदैवाने अनुकूल होते त्याच्या मूर्ती मंदिरोमंदिरी स्थापल्या जातात आणि त्याचे शहरातील चौकात पुतळे उभारले जातात. पण दुर्दैवाने तेच बहुमत ज्यास प्रतिकूल होईल त्यास चव्हाट्यावर सुळावर चढावे लागते. एवढा मोठा प्रभाव असूनही त्या बहुमतास न मानता सत्य आणि असत्याचा शोध करावयाचा असल्यास शोधकांनी आपले मनच ग्वाही ठेवावे असे तुकाराम सांगातत ते आम्हांस मान्य केले पाहिजे.

शांतिनिकेतन

बोलपूर

त्या गोष्टीला सुमारे ४०-५० वर्षे झाली असतील, महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर हे कलकत्त्यापासून सुमारे १०० मैलांवर बिरभूम जिल्ह्यात धर्मसाधनार्थ भ्रमण करीत होते. कलकत्त्यापासून फार दूर नाही व फार जवळही नाही व जेथे सृष्टीचे शांत आणि सौम्य मुखावलोकन निरंतर घडेल असे चिंतनानुकूल ठिकाण शोधून काढण्यात ते बरेच दिवस गुंतले होते. इतक्यात त्यांचे स्नेही बाबू श्रीकांत सिंह (हल्लीच्या नामदार एस्.पी. सिंहचे चुलते) ह्यांनी महर्षींना वरील जिल्ह्यातील आपल्या जमीनदारीच्या ठिकाणी काही दिवस रहावयास बोलाविले आणि त्यांना ज्या प्रकारचे ठिकाण हवे होते, ते आपल्या जमिनीतून पसंत करण्यास आग्रहाने सांगितले. त्यावरून महर्षींनी बोलपूर गाव आणि कोपाईनदी ह्यांच्या मधोमध १||-२ मैलांवरच्या अफाट ओसाड उंचवट्यावरील एका माळावर थोडीशी जागा आश्रमाकरिता पसंत केली.

असे सांगतात की, त्यावेळी ह्या प्रदेशात चोरट्यांची व वाटमा-यांची फारच भीती होती म्हणून दुसरी जागा पसंत करण्यास महर्षीना सांगण्यात आले. तरी पण त्यांनी तिकडे लक्ष दिले नाही. ह्याच माळावर एक जुना सप्तपर्ण वृक्ष (बंगालीत ह्याला छातीम हे नाव आहे) होता. त्याचे खाली बसून सूर्यास्ताकडे पाहात पाहात ध्यानस्थ होणे त्यांना फार आवडत असे. एकादोघांकडून माझे ऐकण्यात असे आले की, येथील चोरट्यांचा मुख्य दारिक सरदार नावाचा रामोशी एकदा महर्षींच्या अंगावर अपाय करण्यासाठी चालून आला, पण त्यांची ती भव्य, पण निरूपद्रवी आकृती व सौम्य मुद्रा आणि ते लवकरच ध्यानात गढून गेलेले पाहून, त्याची वृत्ती अगदी पालटून गेली! पुढे पुढे तर महर्षींची तेथेच कायमची वसती होऊ लागल्यामुळे दारिक सरदाराने आपला क्रूर पेशा अजीबात सोडून दिला, शेवटी हल्लीचा शांतिनिकेतन आश्रम तयार झाल्यावर महर्षीजवळ त्याने बरीच वर्षे दरवानाची नोकरी केली. दारिक सरदार अद्यापि जिवंत आहे, असे ऐकल्यावर तर मी मोठ्या कौतुकाने जवळच्या भुवनडांगा नावाच्या खेड्यात त्याला मुद्दाम भेटावयास गेलो, तो त्याने खेड्याबाहेरील कालीच्या देवळासमोरील अंगणात गुरांची पात जुंपून धान्याची मळणी चालविली होती. जवळ जवळ ऐंशीच्या घराला येऊन पोहोचला आहे तरी त्याची आंगकाठी सरळ आहे आणि त्याच्या डोळ्यांत एक प्रकारची चमक आहे. तो आमच्याशी फार नम्रपणे बोलला, व त्याच्या पारदर्शक संभाषणातून महर्षीसंबंधाचा त्याचा आदर स्पष्ट दिसत होता, इतकेच नव्हे तर त्यांनी त्याचा आयुष्यात नव्हे, आसमंतातील सर्व माळरानात घडवून आणलेली  क्रांती अंधुक अंधुक दिसून येत होती. राकट रामोशाचा हा प्रामाणिक शेतकरी बनलेला आणि गुरे जुंपून धान्याची मळणी करण्याच्या मिषाने प्रत्यक्ष चामुंडीच्या नाकासमोर शांतिदेवीचे स्तुतिपाठ म्हणणारा दारिक सरदार पाहून मला आतल्या आत गहिवर आला! असो.

दारिक सरदाराच्या ह्या भुवनडांगा खेड्यापासून अर्ध्या मैलाच्या आतच महर्षींचा पवित्र आणि रम्य शांतिनिकेतन नावाचा प्रसिद्ध आश्रम आहे. भरतखंडातील दूरदूरच्या ब्राह्मांना हे एक तीर्थयात्रेचे ठिकाण आहे म्हणण्यास हरकत नाही.

गुजराथेत स्वामीनारायणपंथ आणि बंगाल्यात ब्राह्मधर्म ह्या दोहोंचा उदय समकालीन असून स्वामिनारायणपंथी भाविक भक्तांना गुजराथेतील क्षेत्रे पाहून ‘दर्शनहेळा मात्र तया होय मुक्ति’ हा अनुभव यावा आणि बंगाल्याबाहेरच्या आमच्या बहुतेक ब्राह्मबंधूंना शांतिकनिकेतनासारखे प्रेरक, पवित्र आणि क्रांतिकारक स्थळ नुसत्या नावानेही माहीत नसावे हे काय गौड-बंगाल! आमचा धर्म मोठा ‘सुधारलेला धर्म’ आहे असे म्हणून आम्ही वेळोवेळी स्वत:स थोपटून घेतो पण सुधारणा आणि धर्म ह्या दोहोंच्या झटापटीत ‘सुधारणे’ चे चाळे फार माजून बिचा-या धर्मबुद्धीस नावडतीप्रमाणे मागील दारीच बसून रहावे लागते हे आम्हा ‘अप-टू-डेट’ ब्राह्मांच्या लक्षात यावे तसे येत नाही. ते काही असो, कितीही कडकडीत पोषाकाचा, इंग्लंडाहून नुकताच परतलेला तरणाबांड ब्राह्म ह्या निकेतनात आला असता त्याच्यावर जुन्या जगातल्या धर्मभावनेचा किंचित तरी परिणाम येथे झाल्याशिवाय रहाणार नाही, असे एक आपले मला वाटते.

कलकत्त्याहून इ. आय. आर. ने बरद्वानपर्यंत ६७ मैल गेल्यावर लूपलायन रेल्वेचा फाटा लागतो. त्याने पुढे ३३ मैल गेल्यावर ६ वे स्टेशन बोलपूर हे लागते. येथून १||मैलावर शांतिनिकेतन आहे. वाट चांगली सडकेची आहे. अगोदर तेथील कोणाही रहिवाशास किंवा नुसते सुपरिंटेंडेंट अशा पत्त्यावर लिहिल्यासही स्टेशनावरून पाहुण्यांचा नेण्याकरिता गाडीची व्यवस्था सहज करण्यात येते. निकेतनात पाहुण्याची राहण्याची वगैरे व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात येते तो एक छोटेखानी राजवाडाच आहे; एकंदर ढब बडेजावीची असल्यामुळे असल्या वन्य आश्रमातही महर्षींच्या गर्भश्रीमंतीची साक्ष पटविणारा त्यांचा पाहुणचार त्यांच्यामागे अजूनही अनुभवास येतो. शांतिनिकेतनाचा सर्व खर्च व व्यवस्था महर्षींनी ट्रस्टीकडे सोपविली आहे, व ती त्यांचे विरक्त चिरंजीव बाबू रविंद्रनाथ व नातू द्विपेंद्रनाथ अगदी नियमाप्रमाणे चालवितात. एकांतात काही दिवस धर्मसाधन करू इच्छिणा-या कोणाही प्रचारक अगर लोकसेवकाने येथे येऊन रहावे अशी महर्षींची इच्छा असे. तिला विसंगत असे अद्यापि घडलेले काही दिसून येत नाही. तरी ह्या उदार इच्छेचा फायदा कलकत्त्यातील कोणत्याही शाखेच्या प्रचारकांनी किंवा इतरांनी आजवर घ्यावा तितका घेतलेला आढळून येत नाही, बाहेरच्यांची तर गोष्टच राहिली.

महर्षींनी आश्रमाकरिता हीच जागा का पसंत केली ह्यासंबंधी विचारपूस करिता उत्तर असे मिळाले की ह्या ठिकाणची नैसर्गिक शोभा आणि शांती, हेच कारण होय. वरवर पाहणारास ह्या ठिकाणी निसर्गाची मनास थक्क करून सोडणारी अशी काही विशेष शोभा आहे असे मुळीच दिसत नाही. शांती म्हणावी तर महर्षी प्रथम येथे आले तेव्हा वाटमा-यंनी हा मुलूख बेजार करून सोडला होता. असे सांगतात की ज्या सप्तपर्णवृक्षाखाली बसून महर्षी तासानुतास ध्यानमग्न होऊन जात त्याच्या तळाशी एकदा खणून पाहिले असता एक नरकपाळांची रासच आढळली! ह्यावरून आजच्या शांतिनिकेतनाच्या स्थळाचे स्वरूप १-२ पिढ्यांमागे किती भेसूर होते हे कळून येईल. ह्याप्रमाणे वरवर पाहत नैसर्गिक शोभा आणि मानवी शांती ह्यांपैकी कोणतेही म्हणण्यासारखे कारण हेच स्थान विशेषेकरून पसंत करण्यास दिसून येईना. म्हणून मी दुसरे दिवशी पहाटे उठून ह्या स्थळाचे अधिक निरीक्षण करण्याचे हेतूने त्याचे आसमंतात ४-५ मैल हिंडून आलो. परत येऊन विशेष विचार करिता ह्या स्थळाचे रहस्य मला कळले. महर्षी हे सृष्टीचे मोठे भोक्ते होते. हिमालयाची उंच शृंगे व गंभीर द-या, खोरी, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा अशा नद्यांचे प्रशस्त प्रवाह, विस्तीर्ण पात्रे आणि समुद्राच्या लाटा इ. रूपाशी ज्या महर्षींचा अहर्निश सहवास घडत असे त्यांची सृष्टीसंबंधी अभिरूची कळसाला पोहोचली असली पाहिजे. सृष्टीची शोभा तिच्या अपवादक रूपातच आढळते असा सामान्य माणसासारखा महर्षींचाही ग्रह असणे शक्य नाही. शांतिविषयी म्हणावे तर हिंस्त्र पशू अथवा लुटारूंच्या उपद्रवामुळे प्राचीन मुनींच्या शांतीचा जसा भंग होत नसे, त्याचप्रमाणे आधुनिक महर्षींच्या शांतीलाही ह्या नैसर्गिक अपायांची बाधा वाटली नाही. मुनींच्या मनाच्या शांतीला बाधा होते ती सृष्टीच्या अपायामुळे नव्हे, तर ह्या संसारात सरपटणा-या क्षुद्र नरनारी आपल्या ऐहिक अथवा पारलौकिक योगक्षेमाचे वेळोवेळी नीच उपाय योजतात त्यामुळेच होते. ज्या ठिकाणी अशा उपायांचा शिरकाव नाही, जेथे भूमीचा विस्तीर्ण प्रदेश एकदम नजरेच्या आटोक्यात येतो आणि जेथून भोवताली दुरवर पाहता क्षितिजाचे सुंदर आणि विशाल वलय-जणू जमीन अस्मानाचे गाढ आलिंगनच- अहोरात्र दिसते त्याच ठिकाणी शांती आणि शोभा ह्या दोन्ही जुळ्या बहिणींचे चिरसाम्राज्य पहावयास मिळते. महर्षींनी स्थापलेले शांतिनिकेतन ह्या साम्राज्याचे एक सिंहासनच होय!

भोवताली भला मोठा ओसाड उघडा माळ आहे आणि मधअये सुमारे २ एकर जमीन ह्या निकेतनासाठी पसंत करून महर्षींनी ती आता तरूलतांनी गजबजून टाकिली आहे. आम्र, अशोक, देवदार इत्यादी प्रकारचे गगनचुंबी वृक्ष एकमेकांच्या खांद्यावर आपले प्रशस्त बाहू ठेवू ठेवून डोलत आहेत. मध्यभागी महालवजा दोनमजली पक्की आणि भव्य इमारत आहे. तिच्यासमोर बागेत टुमदार, स्वच्छ, शुभ्र संगमरवरी दगडाचे ब्राह्ममंदिर आहे. त्याचे अग्रभागी मोकळा मंडप असून त्यावर लोहशलाकाचे नाजुक, निमुळते, गोल घुमट आहे. मंदिराच्या चारी भिंती भिंगाच्याच असल्याने उपासनेस बसले असताही चहूबाजूंचा दूरवर देखावा दिसतो. उपासकांसाठी रांगेने आसने मांडली असून, मध्यभागी वेदीसाठी एक लहानसा संगमरवरी चौरंग आणि त्यावर दोन शुभ्र शंख ठेविले आहेत. भिंतीला लागूनच चारी बाजूंनी प्रधक्षिणा करण्याकरिता येण्यासारखी उंच चबुत-यावरून वाट आहे. त्यानंतर चोहोंकडून थोडीशी मोकळी जागा राखून, भोवताली छातीइतका प्राकार आहे. मंदिराच्या दारावर अँ हे अक्षर लावलेले असून त्याच्या खालील कमानीवर पुढे दिल्याप्रमाणे त्याचा अर्थ लिहिला आहे.

सर्वे वेदा यत्पदमामनंति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति|
यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरंति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योत्येतत् ||१||
बाहेरील बागेत जागजागी सुंदर वृंदावने आणि कुंड्या आहेत. त्यांच्या बाजूंवर उपनिषदांतील गंभीर उतारे व लहान मोठी वचने उल्लेखिली आहेत. त्यांपैकी खाली लिहिलेले अवतरण वाचून तर ह्या स्थळाचे महत्म्य मनात चांगले बाणते.

“एष सेतुर्विधरण एषां लोकांनामसम्भेदाय |
नैनं सेतुमहोरात्रे तरतो न जरा न मृत्युर्न शोको न सुकृतं न दुष्कृतं|
सर्वे पाप्मानोSतो निवर्तन्तेSअपहतपाप्मा ह्येष ब्रह्मलोक:||”

इ. इ. ही वचने वाचीत प्रेक्षक अगदी बाहेरील दाराजवळ आला असता भिंतीत बसविलेला खालील लेख वाचून ह्या आश्रमाच्या उदार आणि पवित्र हेतूची त्याला कल्पना येते इतकेच नव्हे तर ही स्वर्गीय तत्त्वे खुद्द त्याच्या अंत:करणात खोल रूजू लागतात:

“सर्वेषामेवास्मिन् शांतिनिकेतने ब्रह्मोपासनायामधिकार: इह खल निराकारमेकं ब्रह्मैवोपासीत| संप्रदायप्रथितां देवमूर्ति मनुष्यं पशुं पक्षिणं प्रतिकृतिं लिंगं देवप्रतीकं च नाचयेत| नापि पावकं जुहुयात् धर्म स्वोदरं वा समुद्दिदश्य किमपि भूतं मा हंस्यात्| आमिषं मद्यपानं विवर्जयेत्| कस्याप्युपास्यं नावमन्येत| ब्रह्मयोगं मैत्री शमादिकं च परामृश्य समुदपदिशेत्| ब्रीडाकरं प्रमोदं चोतसृजेत|

ह्या निकेतनातील मुख्य प्रेक्षणीय भाग म्हणजे उपरिनिर्दिष्ट सप्तपर्ण वृक्षच होय. महर्षींचे हे अत्यंत आवडीचे स्थान होते. ह्या आश्रमात चोहींकडेच पण विशेषत: ह्या ठिकाणी महर्षींचा पुण्यात्मा जणू घेर घालीत आहे असा भास होतो. ह्या जीर्ण वृक्षाचे तळाशी जेथे महर्षी नेहमी बसत तेथे आता एक सुंदर संगमरवरी वेदी बांधली आहे. तिच्या शिरोभागी ‘तिनि अमार प्राणेर आराम, मनेर आनंद, आत्मार शांति’, हे शब्द आहेत. ह्या वेदीवर बसले असता सुमारे १०-१२ पावलांवर एका संगमरवरी स्तंभावरील फलकावरची ‘शांतं शिवमद्वैतम्’ ही अक्षरे डोळ्यांत भरतात. तेथून हालावेसेच वाटत नाही.

मंदिरात दररोज प्रात:काळी ७ वाजता नित्याची उपासना होते, त्यासाठी एके आचार्य व दोन गायक ह्यांची नेमणूक झाली आहे. एरव्ही वाटेल तेव्हा वाटेल त्यास ध्यान, भजन तेथे करता येण्यासारखे आहे. दर बुधवारी व गुरूवारी मुख्योपासना होतात, त्या बाबू रविंद्रनाथ हे चालवितात. त्यावेळी येथील ब्रह्मचर्याश्रमातील १२५-१५० विद्यार्थी सर्व हजर असतात. पौष्य मासी (डिसेंबर) दरवर्षी येथे एक मोठी जत्रा भरते, तेव्हा आजूबाजूच्या खेड्यांतील ३-४ हजार खेडवळ जमून जुन्या जत्रेतलेच निरनिराळे खेळ करून १-२ दिवस करमणुकीत घालवितात.

ह्या ठिकाणी महर्षींची समाधी कशी नाही, ह्याचे आश्चर्य वाटल्यावरून शोधाअंती त्यांचे नातू द्विपेंद्र बाबू ह्यांनी असे कळविले की आपल्या रक्षेवर समाधी, थडगे अगर कोणतेही स्मारक कोठेही उभारू नये अशी महर्षींनी अगदी कडकडीत आज्ञा दिली आहे, भोवतालच्या खेड्यांतील लोकांत महर्षींसंबंधी इतका अलोट आदर आहे की, ह्या निराकाराच्या निष्काम आणि एकांतिक भक्तांची ही शेवटची इच्छा जर पूर्णपणे पाळली गेली नाही तर त्यांचे देव्हारे हा हा म्हणता माजतील, ह्यात तिळमात्र संशय नाही.

  1. व्यक्तित्वविकास
  2. वृत्ती, विश्वास आणि मते
  3. विसावे व्याख्यान
  4. विभूतीपूजा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
Page 6 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी