1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

वाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव

भांडवलशाहीचें भविष्य
माझ्या मतें शेतकरी म्हणजे तोच, कीं जो आपल्या कुटुंबाच्या व आश्रितांच्या पोषणाला, शिक्षणाला आणि योग्य त्या सुखसोयींना आवश्यक इतकीच, आणि आपल्या आप्तांकडून व आश्रितांकडून वाहवेल इतकीच जमीन बाळगतो आणि ती आपण स्वतः आपल्या आप्तांच्या व आश्रितांच्या श्रमानें योग्य रीतीनें खरोखर वाहतो. असें न करतां इतर जे जे म्हणून जमीन धारण करतात किंवा तिचेवर हक्क सांगतात ते ते सर्व केवळ भांडवलदार आणि म्हणून ते ख-या अर्थानें शेती करणारे शेतकरी नसून उलट त्या शेतक-यांचे अगदीं शत्रूच नसले, तरी त्यांचे दावेदार आणि प्रतिस्पर्धी, असें समजण्यास कांहीं हरकत नाहीं. अर्थात, राष्ट्रानें जर कांहीं जमीन कोणा व्यक्तीस अगर समूहास कांहीं इतर राष्ट्रकर्त्यासाठीं तात्पुरती वापरावयास दिली असेल, तर तिचा धारण करणारा त्या वेळेपर्यंत शेतक-यांचा प्रतिस्पर्धी म्हणतां येणार नाहीं. इतरांस तरी दावेदार किंवा प्रतिस्पर्धी कां म्हणावयाचा, तर ह्या जमिनीवर जिवापाड मुलाबाळांसह राबणारा एक, तर तिच्यावरचा लोण्याचा गोळा सबंध गिळून उरलेल्या ताकासाठीं देखील हेवादावा करणारा भांडवलदार शेतक-याच्या छातीवर कायमचा बसला असतो म्हणून हा भांडवलदार कोणत्याहि जातीचा, दर्जाचा, स्वकीय किंवा परकीय सरकार असो अथवा संस्थानिक असो, इनामदार असो किंवा खोत असो; हे चट सारे शेतक-याचे दावेदार होत. ते बहुतकरून शेतक-यांचे हितशत्रू आणि कित्येकदां तर अगदीं उघड शत्रू असतात. प्राचीन राजे शेताच्या उत्पन्नाचा सहावा हिस्सा घेत; पण ते स्वतःहि शेतकरी असत. त्या वेळीं शेती फार धोक्याची असे. म्हणून त्यांच्या संरक्षणाची आतांपेक्षां जास्त गरज असे. आतां धोका फार कमी; पण शेतक-यांवर सा-याच्या रूपानेंच नव्हे तर इतर अनेक दृश्य व अदृश्य रूपानें कराचा बोजा भारी; आणि खेड्यांतून आणि जंगलांतून रोगराई, वनपशु इत्यादि अनेक संकटांतून बचाव करण्याची जबाबदारी आपणावर जवळ जवळ नाहींच असें अलिकडचे राजे वागतात. बाकीचे जमीनदार तर केवळ नांवाचा मालकी हक्क सांगून आपण खरे जमिनीचे मालक आणि शेतकरी म्हणजे केवळ पिढीजाद गुलाम अशा समजुतीनें राजाशीं सहकार्य करून राहिले आहेत.

वारकरी पंथाची लोकसत्तात्मकता

पंढरीचा वारकरी पंथ उभारण्यांत ज्ञानेश्वरीपेक्षां नामदेवाच्या गाथेचीच मदत अधिक झाली आहे. नामदेवाचें नांव उत्तर हिंदुस्थान आणि विशेषत: पंजाबांत प्रसिद्ध होऊन त्याचीं जोमदार हिंदी पदें शीख लोकांच्या ग्रंथसाहेबांत कायमचें ठाणें देऊन बसलीं आहेत. इतकेंच नव्हे तर नामदेवाच्या समाधीवर पंजाबांत गुरुदासपूर जिल्ह्यांत घुमण नांवाच्या गांवांत शीख लोकांनीं बांधलेलें एक सुंदर जुनें मंदिर अद्यापि आहे. ह्यावरून नामदेव महाराज हे अखिल भारतीय भागवतपदावर आरूढ होऊन चुकले आहेत, ह्यांत आतां शंका घेण्याचें कारण उरलें नाहीं. नामदेव-ज्ञानदेवाचे काळींच ह्या पंथाचें धुरीणत्व सर्व जातींच्या संतांनीं घेतलें. ह्या पंथांत केवळ कोणत्याहि एकाच व्यक्तीचें प्राधान्य नसून भागवतधर्माचें विशेष तत्त्व जें लोकसत्तात्मकत्व, तें तर सर्व हिदुंस्थानांतील त्या वेळच्या पंथांमधून दिसून येत होतें, पण ह्या नवीन तत्त्वांचा पूर्ण विकास जसा आणि जितका महाराष्ट्रांत झाला आहे तितका पंजाब सोडून इतर कोणत्याहि प्रांतांत झालेला आढळणार नाहीं. पंढरपूरच्या देवळांतील बडवेपण म्हणजे पोट भरण्याच धंदा जरी आतां ब्राह्मणांनीं आपलासा केला आहे, तरी प्रत्यक्ष देव आणि त्याच्या भजनाचा प्रकार आमूलाग्र सामान्य जनतेच्या ताब्यांतच अद्यापि आहे. कीर्तनाच्या सांप्रदायांत तर महार चोखामेळ्यानें प्रवीणत्वच मिळविलें आहे. वारक-यांचे मुख्य दोन फड १ देहुकर आणि २ वासकर. हे दोन्ही निर्भेळ ब्राह्मणेतरांच्या स्वाधीनच आहेत. ठरलेल्या संतमालिकेंत तर ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद माजविणें हें वारकरी वर्गांत मोठें पाप समजलें जातें. ह्या मालिकेंत बहुसंख्या ब्राह्मणेतरांचीच आहे. त्यांच महार, चांभार आणि वेश्याहि आहेत ! ज्याच्या गळ्यांत वीणा त्याची जात न पाहतां ब्राह्मणहि श्रद्धेनें त्याच्या पायांवर डोकें टेकतात आणि आनंदानें गोपाळकाल्याचा भाग परस्परांच्या तोंडांत घालून सेवन करितात! एकनाथासारख्या संतानें महाराचा भोजनव्यवहारांतहि विटाळ मानला नाहीं, मग इतर ब्राह्मणांच्या भेदभावाचा शिरकाव होणें दूरच राहिलें. तसेंच शिव आणि विष्णु हाहि भेद नाहीं. एकनाथ व इतर महाराष्ट्र भागवतांची बहुसंख्या नाथपंथी शैवच होती. इतर कांहीं तर शाक्त, लिंगायत आणि मुसलमानहि होते. ह्या पंथांत मूर्तिपूजा, सोवळेंओवळें, व्रथवैकल्यें, तीर्थविधि, मंत्रतंत्र, यज्ञयाग, दान, तप वगैरे कशाचेंहि मुळींच थोतांरड खपत नाहीं. ज्यानें जावें त्यानें एकदम धुळीच्या पायानिशीं देवाला प्रत्यक्ष आलिंगन द्यावें ! मग तो पुरुष असो, स्त्री असो, राजा असो, रंक, विधवा अथवा वेश्या असो. अठरापगड जातींच्या निरनिराळ्या वारक-यांचे सर्व हक्क समान आहेत. विशेष हा कीं, महाराष्ट्र वारकरी पंथांत राधाभक्तीचें खूळ तर मुळींच खपत नाहीं. तें बंड केवळ बंगाल्यांतून आलेलें आहे व त्याचा खप केवळ तिकडेच आहे. आणखी एक विशेष हा कीं, ह्या पंथाला राजकारणाची विषबाधा अद्याप झालेली नाहीं. संस्थापनेच्या वेळीं काय झालें असेल तेंहि असो. तें अगदीं अनिश्चितच आहे. पण जर एखादा धर्म केवळ जनतेच्या आश्रयानें व बळावरच चालला असेल, आणि त्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या त्रैवर्णिकांच्या कुटिल नीतीचा विटाळ झाला नसेल, तर तो हाच एक पंथ अद्यापि उजळमाथ्यानें वावरत आहे !

वाङ्मय

कानडी ही मराठीपेक्षां जवळ जवळ एक हजार वर्षें अधिक पूर्वींची भाषा असल्यानें तिचें वाङ्मयहि अधिक जुनें, विविध आणि अभिजात असणारच. आठव्या शतकांत नृपतुंग ऊर्फ अमोघवर्ष राष्ट्रकूट ह्याच्या वेळीं मराठी ही “महाराष्ट्री” च्या उदरातूंन वाङ्मयाच्या दृष्टीनें तर राहोच, पण बोलण्याच्या उपयोगी अशी भाषा, या दृष्टीनेंहि बाहेर स्वतंत्र रूपानें वावरत होती कीं नाहीं ह्याची शंका आहे. अशा वेळीं ह्याच नृपतुंगाच्या नांवावर कविराजमार्ग नांवाचा अलंकारशास्त्राचा ग्रंथ कानडींत प्रसिद्ध होता. चंपू नांवाचा काव्यप्रकार संस्कृतांत आढळण्यापूर्वीं कानडीनेंच तो प्रथम प्रचारांत आणला. दिगंबर पंथी धगधगीत वैराग्याच्या तापांतून बचावूनहि जैन कवींनीं शृंगारलीलावतीसारखीं काव्यें कानडींत रचल्यावर मग कोठें हजार-पांचशें वर्षांनीं रघुनाथ पंडितानें आपलें नलदमयंती-स्वयंवर हें शुद्ध शृंगाराचें पहिलें काव्य रचलें; आणि तोहि पण तंजावरकडचाच होता असें म्हणतात. अनुप्रास म्हणून शब्दालंकाराचें जें एक अंग आहे तें निर्माण करण्याचें सर्वस्वीं श्रेय कानडीलाच आहे असें सागंतात; आणि कानडींतला हा अनुप्रास पुढें मोरोपंतांनीं व रघुनाथपंतांनीं उचलला. इतकेंच नव्हे तर मध्ययुगीन संस्कृत वाग्देवीलाहि हा दक्षिण देशांत मिळालेला मणी आपल्या गळसरींत ओवण्यास कमीपणा वाटला नाहीं ! यक्षगान ह्यासारखीं कानडी नाटकें झाल्यावर किती तरी शतकांनीं पुढें अण्णा किर्लोस्कराला पहिलें नांव घेण्यासारखें संगीत नाटक रचण्याची प्रेरणा झाली. आणि तोहि बेळगांवकडचाच होता ! उत्तरेकडील व-हाडांत मराठींत नाट्य-संगीत अद्यापि नाहीं. कीर्तन ही संस्था अस्सल मराठी असावी अशी कित्येकांची फुशारकी आहे. पण अंपलवासी नांवाचे मलबारी कीर्तनकारांची स्तुती सेन्सस रिपोर्टांतूनसुद्धां अद्यापि दुमदुमत आहे.
वैष्णव-शैवांच्या भक्तिपंथाचा उदय प्रथम द्रविड देशांतच झाल्यानें तुटक पदांचा व ललितांचाहि बहर तिकडेच अगोदर झाला; नंतर कीर्तनाचा प्रचार इकडे आला. पुरंदर विठ्ठलानें कृष्णलीलेचा रस कानडींत जितका व जसा वठविला आहे तशी व तितकी करामत बिल्हणचरित्राचें मराठी कवितेंत भाषांतर करणा-या बीडकर विठ्ठलालाहि साधली नाहीं. पदें आणि लावण्यांसारख्या लौकिक काव्यांतहि कानडीचीच सरशी होती. नाहीं म्हणावयाला पोवाड्याची मात्र कानडींत उणीव भासते. कारण कर्नाटकांत अलीकडे बरींच शतकें स्वराज्याचा दुष्काळ गाजत आहे ! ज्ञानेश्वरापासून रघुनाथपंतापर्यंत मराठी कवींनीं शिकस्त करून वरील पारडें पालटलें. हल्लीं तरी वैनगंगेपासून तुंगभद्रेपर्यंत व पलीकडे क्वचित् कावेरीपर्यंतहि मराठी वाङ्मयाचा दरारा चालू आहे. पण ह्या सर्व भाषाक्रांतीचें आणि हल्लींच्या मराठीच्या वैभवाचें बरेंचसें श्रेय कानडीलाच आहे. चालुक्य आणि राष्ट्रकूट राजांचे पदरीं कित्येक कवि आणि पंडित कानडी व तेलगू ह्या दोनहि भाषांत प्रवीण असलेले राहत असत. तसेंच देवगिरीच्या यादवांचे पदरीं कानडी किंवा तेलगू आणि मराठी भाषेंत पारंगत असे पंडीत असले पाहिजेत. शहाजीचे पदरीं जयराम पंड्ये नांवाचा बारा भाषांची प्रौढी मिरवणारा कवि अशाच मासल्याचा होता. सातारच्या आणि तंजावरच्या भोसल्याच्या आश्रयानें मराठीची वाढ कानडीहून अधिक झाली. शेवटीं काव्यरसांत ज्या कानडीनें एकदां इतका मोठा कीर्तिरव गाजविला त्याच हतभागी कानडींत अलीकडे अशी एक अभद्र म्हण पडली आहे कीं, “आरी अरसु, हिंदुस्थानी सरसु, कन्नड बिरसु” म्हणजे मराठी मर्दानी, मुसलमानी सरस आणि कानडी ही राठ !
वयाच्या मानानें मराठी ही सर्वांत मागाहून जन्मलेली म्हणून सृष्टिक्रमानें ती शेवटची असावी. पण केवळ राजकारणाचे जोरावर तिनें हिंदुस्थानांत संख्येच्या मानानें आतां चौथा नंबर पटकाविला आहे. आणि अभिजात वाङ्मयाचे जोरावर तर तिचा आज दुसरा नंबर आहे. काव्याच्या, जुनेंपणाच्या व भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीनें पाहतां, ज्ञानेश्वरीसारखा आभिजात ग्रंथ, पहिला नंबर पटकाविणा-या बंगालींत तरी आहे कीं नाहीं ह्याची मला निदान शंका आहे. जुन्या तामील कानडी भाषेंतील वाङ्मयाचा मात्र अद्यापि नीट शोध लागला नाहीं. तो जेव्हां पूर्णपणें लागेल तेव्हां भारतीय संस्कृतिविषयकच काय, पण मानववंशशास्त्रासंबंधीं हल्लींच्या कित्येक मतांत आमूलाग्र उलथापालथ होण्याचा बराच संभव आहे !

व-हाडी आणि इतर शाखा

(११) ज्याप्रमाणें कोंकणी त्याचप्रमाणें व-हाडी अथवा नागपुरी ही एक मराठीची उपभाषा आहे. केवळ इतिहासाच्या दृष्टीनें पाहतांना नागपुरी ही कोंकणीपेक्षां अधिक जुनी आहे. पण ती मराठीपासून कोंकणीइतकी तुटून वेगळी दिसत नाहीं. ह्याचें कारण कोंकणीपेक्षां ती जास्त अलीकडची हें नसून, तिचें आणि मराठीचें दळणवळण कोंकणीपेक्षां जास्त आहे, हेंच होय. व-हाडी ऊर्फ नागपुरी भाषेंत निराळे ग्रंथ नाहींत, व दळणवळणामुळें ते तसे असणें शक्यहि नाहीं. कोंकणींत जरी आज स्वतंत्र सारस्वत उपलब्ध नाहीं, तरी पूर्वीं अल्प-स्वल्प होतें, तें पोर्तुगिजांच्या अत्याचारांमुळें नष्ट झालें, व त्यांच्याच जुलमी राजसत्तेमुळें व धार्मिक दडपणामुळें अधिक निर्माण होणें अशक्य झालें. परंतु तें कधींच अस्तित्वांत नव्हतें, असें म्हणतां येणार नाहीं. कोंकणी भाषा विशेषतः सुशिक्षित सारस्वत ब्राह्मणांच्या व्यवहारंतली असल्यामुळें ती अल्प प्रमाणांत कां होईना, परंतु ग्रांथिक बनली म्हणून तिला कांहीं अंशीं वेगळेपणाचा भास प्राप्त झाला आहे. तो भास नागपुरींत वेगळें सारस्वत असण्याचा संभवच नसल्यामुळें, व ती नेहमीं निरक्षर समाजांत वावरत राहिल्यामुळें ती एक केवळ निराळी बोली अशाच स्थितींत राहिली व अजूनहि आहे. ह्या व-हाडीच्या पश्चिमेकडे खानदेशी व पूर्वेकडे हाळबी अशा मराठीच्या आणखी दोन शाखा आहेत. ग्रिअरसननें आपल्या “लिंग्विस्टिक सर्वें” मध्यें खानदेशीचा अंतर्भाव गुजरातींत आणि हाळबीचा हिदींत केला आहे. परंतु त्यांनीं कोंकणीचा अंतर्भाव गुजरातींत किंवा कानडींत केला नाहीं, ह्याचें कारण त्यांना किंवा कोणालाहि तसें करतां येतच नाहीं. ज्या प्राकृतांतून मराठीचा उद्भव झाला त्याच प्राकृतांतून कोंकणीचाहि झाला, ही गोष्ट दालगादो ह्यांनाहि कबूल आहे. ह्या सर्व ऐतिहासिक परिस्थितीचें अवलोकन केल्यावर कोणालाहि कोंकणी ही मराठीपासून भिन्न आहे किंवा स्वतंत्र आहे असा आग्रह धरतां येणार नाहीं.
(१२) वर सांगितलेली ऐतिहासिक आपत्ति किंवा उणीव पाहून पंडित दालगादो ह्यांचे कोणी अनुयायी अशी शंका काढतील कीं, ज्या अर्थीं कोंकणीचा अंतर्भाव मराठीशिवाय हल्लीं चालू असलेल्या कोणत्याहि भाषेंत करतां येत नाहीं आणि प्रत्यक्ष मराठीशींहि तिचें तादात्म्य पूर्णपणें सिद्ध करतां येत नाहीं, त्या अर्थीं कांहीं पाश्चात्त्य पंडित समजतात त्याप्रमाणें सारस्वत ब्राह्मणांची एक निराळी भाषा होती, व तिच्यापासून कोंकणीचा उद्भव झाला असावा, असें जें दालगादो म्हणतात त्यांत काय वावगें आहे? ही लुप्त भाषा आज सांपडत नाहीं, एवढ्याच आपत्तीचा फायदा घेऊन कोंकणीचा अंतर्भाव मराठींत करणें व कोंकणीवर मराठीची सत्ता चालविणें म्हणजे “बाप दाखीव नाहीं तर श्राद्ध कर” असें म्हणण्याप्रमाणेंच जुलुमाचें आहे. या शंकेवर माझें उत्तर असें आहे कीं, सारस्वतांची आतां लुप्त झालेली एक भाषा पूर्वीं केव्हां तरी होती, हें ज्या कांहीं पाश्चात्त्य पंडितांचें मत आहे, त्यांचीं नांवें व इतर पुरेसा दाखला दालगादो ह्यांनीं दिला नाहीं. दिला असता तर ह्या लुप्त समजल्या जाणा-या भाषेविषयीं अधिक शोध करण्यास अवसर सांपडला असता. ह्या अनिर्दिष्ट पाश्चात्त्य पंडितांची ही एक केवळ शंका असावी; अशी भाषा होतीच असा त्यांचा कांहीं सिद्धान्त नसावा. अशा शंकेवर दालगादो ह्यांनीं आपली स्वत:ची दुसरी एक शंका स्थापिली, ती ही कीं, त्या लुप्त भाषेपासून हल्लींच्या कोंकणीचा उद्भव झाला आहे. दोनच नव्हे, अशा अनेक शंका जरी एकत्र केल्या, तरी नुसत्या शंकेच्याच जोरावर कोणताहि सिद्धान्त तयार होत नाहीं. मी तर उलट असें म्हणतों कीं, मुलीच्या चेहेरेपट्टींत आईच्याहून कांहीं थोडीं लक्षणें जास्त आहेत, एवढ्याचवरून मराठी कोंकणीची आई नव्हे किंवा बहीण नव्हे; इतकेंच नव्हे तर पाश्चात्त्य पंडितरूपी पोलिसांच्या कचेरींत जी दुसरीच एक बाई बेपत्ता झाली आहे अशी खबर लागली आहे, तीच बेपत्ता बाई कोंकणीची आई असावी, असें समजणें हें कोंकणीची आई मराठीच आहे, असें समजण्यापेक्षांहि अधिक धाडसाचें आहे ! असो. हा ऐतिहासिक बाह्य मुद्दा येथेंच संपवून, आपण ह्या दोन्ही भाषांचीं अंतर्गत प्रमाणें म्हणजे शब्दकोश, व्याकरण, स्वरशास्त्र (Phonology) संप्रदाय (Idioms) इत्यादि अंतःप्रमाणांच्या तुलनेकडे वळूं.

लिखित इतिहासाचे पुरावे

वर विशेषत: भाषाशास्त्राचे आणि समाज-शास्त्राचे पुरावे यांचा विचार केला. आतां लिखाणाचे अथवा लिखित इतिहासाचे पुरावे या लेखांत देऊन हा विषय पुरा करावयाचा आहे. परंतु अस्सल ऐतिहासिक पुरावे अशा विषयांत निदान हिंदुस्थानांत तरी दुर्मिळच असणार हें प्रथमदर्शनींच कबूल केलें पाहिजे. आमचीं पुराणें हल्लीं ज्या स्थितींत आढळतात ती इतिहासाच्या दृष्टीनें अत्यंत विकृत स्थिति आहे. पुराणांचें मूळ स्वरूप अथवा त्यांत वर्णिलेली वस्तुस्थिति वेदकालाहूनहि प्राचीन आहे, अशी आधुनिक संशोधकांची समजूत होत चालली आहे. F. E. Pargiter, M. A. यांच Ancient Indian Historical Tradition  हा अत्यंत परिश्रमानें तयार केलेला ग्रंथ या समजुतीचें प्रमुख उदाहरण आहे. पुराणांचें हें प्राचीन स्वरूप आतां जरी उपलब्ध नाहीं आणि उपलब्ध होण्याची मुळीं आशाहि नाहीं, तरी हल्लींच्या महाभारत व पालीगाथा या ग्रंथांतून या पुराणांतील अव्वल कथाभागाचें अंधुक स्वरूप दिसून येतें.
महाभारतांत निरनिराळ्या प्राचीन वंशांचीं व देशांचीं अनेक ठिकाणीं वर्णनें आलीं आहेत; पण त्यांत रट्ट वंशाचा वंश या अर्थानें कोठेंच उल्लेख नाहीं. रट्ट हा शब्दच मुळीं पाली भाषेंतला, कदाचित् द्रावीड भाषेंतला, असल्यामुळें भारतासारख्या संस्कृत ग्रंथांत हा न आढळणेंच साहजिक आहे. पण पाली ग्रंथांतहि हा शब्द एक विशिष्ट वंश या अर्थानें नसून, राष्ट्र अथवा देश या सामान्य अर्थानें विशेष आढळतो. यावरून निरनिराळ्या वेळीं हिंदुस्थानांत शक, पल्लव, हूण, जाठ, अश्व वगैरे शूर आणि लढाऊ राज्यकर्ते वंश हल्ला करण्यासाठीं येऊन येथेंच ठाणे देऊन राहिले, त्यांनाच उत्तर हिंदुस्थानांत राजपूत आणि दक्षिणेंत मराठे हें सामान्य नांव अर्वाचीन काळीं मिळालें हें सिद्ध होतें. यांपैकीं शक, पल्लव, अश्व हे शब्द अथवा नांवें महाभारतांत आढळतात. तीं मात्र प्राचीन आहेत खास. अश्व अथवा असी हा मानव वंश मध्यआशियांत प्रमुख असून त्यावरूनच असीरियाच नव्हे तर आशिया हें नांव सिद्ध झालें आहे. हा शक वंशच होय. अश्व म्हणजे घोडा. शकांचें व घोडा या जनावराचें मोठें अभेद्य साहचर्य आहे. या वंशावरून घोड्याला हें नांव पडलें किंवा घोड्याच्या अश्व नांवावरून या वंशाला हें नांव पडलें, हा समाजशास्त्रांतला एक रंजक प्रश्नच आहे. असो. महाभारतांतील अनेक प्रख्यात राजांच्या नांवांत किंवा आडनांवांत अश्व हा शब्द मोठ्या प्रामुख्यानें झळकत आहे, हें खालील संदर्भावरून दिसतें. अश्वग्रीम, अश्वचक्र, अश्वपति, अश्वशकू, अश्वशिरा : हीं नांवें आदिपर्वाच्या ६६ व्या अध्यायांत वरचेवर आलीं आहेत. मागधाचा पुत्र अश्वकेतु याला अभिमन्यूनें मारलें असा द्रोणपर्व (४८-७) यांत उल्लेख आहे. प्रत्यक्ष शक या नांवाचाहि उल्लेख सभापर्व ७८-९९ आणि भीष्मपर्व ९-४५ यापेक्षां जास्त ठिकाणीं फारसा आढळत नाहीं. तक्षक (तकशक) कद्रुपुत्र नाग याची कथा आस्तिक पर्वांत प्रामुख्यानें आली आहे. हें नांव एका प्रमुख शक वंशाचेंच आहे. त्याचें आणि पुरुवंशाचें महायुद्ध जन्मेजयाचे वेळीं आलेलें जनमेजयानें केलेल्या सर्पयज्ञाच्या कथेवरून दिसून येतें. एकंदरींत बुद्धपूर्व कालीं जे शक, पल्लव, जाठ इत्यादि रट्टवंश हिंदुस्थानांत आले त्यांचे महाभारतांत असे तुरळकच उल्लेख आढळतात.
अश्व : दनुपुत्र: असुर: अशा अर्थाचा उल्लेख (आदिपर्व, अ. ६६, श्लोक २४) आहे. म्हणजे अश्ववंश देव अथवा मानव नसून दानव किंवा असूर असा किंचित् पूर्वेकडील भारतीय आर्यांकडून तिरस्कार दाखविणारा अर्थ वरील महाभारताच्या उल्लेखावरून दिसतो. आर्य म्हणजे भारतांत सिंधु नदीच्या पूर्वेकडे राहणारे तेवढेच, असा आकुंचित अर्थ मागाहून झाला. येरवीं शक, पल्लव, जाठ, काठ, भाट, वगैरे मध्यआशियांतील फिरत्या जातीहि सारख्याच आर्य असणें अधिक संभवनीय आहे. प्रत्यक्ष पारश्यांना भारतीय आर्य असुर म्हणूं लागले, आणि त्याचप्रमाणें पारशीहि सिंधु नदीच्या पूर्वेकडील सर्वच आर्यांना इंद्रपूजक म्हणजे पिशाचपूजक हीनजातीय म्हणूं लागले. त्याच न्यायानें शक, पल्लव, हूण, जाठ वगैरेंची मनुस्मृतीच्या नंतरच्या कालांत व्रात्यक्षत्रियांत गणना होऊं लागली. तें कसेंहि असो, त्यांची क्षत्रियांतच मात्र गणना केव्हांहि होत होती, हाच मुद्दा येथें विशेष ध्यानांत घेण्यासारखा आहे. पुढें ऐतिहासिक कालांत शक-पल्लवादि प्राचीन नांवेंहि मागें पडून क्षत्रियत्वबोधक राजपूत, मराठे, रेड्डी, वगैरे ज्यांत राज् धातु प्रधान आहे, हींच नांवें रूढ झालीं. नांव कोणतेंहि असो, ह्या सर्व जाती हिंदुस्थानांत बाहेरूनच आल्या आहेत एवढाच प्रतिपाद्य विषय आहे.
मध्यआशियांतून अगर पूर्व युरोपांतून प्राचीन आर्य जाती बाहेर गेल्या, त्यांपैकीं स्कॉटलंड, आयर्लंड वगैरे ठिकाणीं हल्लीं आढळणा-या केल्ट्स, गॉलस या जाती युरोपांत प्रथम गेल्या व नंतर जर्मनी-हंगेरी वगैरे देशांत हल्लीं आढळणा-या गॉथसव्हँडॉल्स्, सॅक्सन (शक् सेन), हूण या जाती किंचित् मागाहून गेल्या. पण त्या ज्याप्रमाणें सर्व सारख्याच आर्य होत्या यांत शंका नाहीं, त्याप्रमाणें यदु, पुरु, इक्ष्वाकु इत्यादि जाती प्रथम हिंदुस्थानांत आल्या आणि नंतर शक, पल्लव, हूण, जाठ भाट, इ. आले आहेत हें सिद्ध आहे. परंतु सर्व सारखेच आर्य होते हें मत राजस्थान या महत्त्वाच्या ग्रंथाचे कर्ते कर्नल जेम्स टॉड यांनीं फार परिश्रमानें प्रतिपादिलें आहे. टॉडनें आपला राजपुतांचा मोठ्या सहानुभूतीनें लिहिलेला इतिहास शंभर वर्षांपूर्वीं (१० मार्च १८३२ रोजीं) प्रसिद्ध केला. त्याच धर्तीवर ग्रांट डफनें मराठ्यांचा इतिहासहि गेल्या शतकांतच प्रसिद्ध केला आहे. पण टॉडची सहानुभूति आणि अविश्रांत शोधक बुद्धि या हडेलहप्पी ग्रांट डफमध्यें मुळींच नव्हती. त्यामुळें मराठ्यांसंबंधीं फार कोते विचार त्यानें प्रसिद्ध केले आहेत. टॉडच्या सहानुभूतीचा घोट वाजवीपेक्षां जास्त झाला असें वाटल्यावरून त्याच्या मागाहून उद्यास आलेल्या ग्राँट डफचे कान कोणीतरी तत्कालीन चर्चिलपिशाचानें फुंकले असल्यास न कळे ! तें कसेंहि असो, मराठ्यांच्या पूर्वपीठिकेविषयीं शोधीत असतां राजपुतांच्या पूर्वपीठिकेविषयीं ज्यांनीं ज्यांनीं लिहिलें आहे त्यांचा आधार घेणें भाग पडतें; आणि त्यांत वावगें असें कांहींच नाहीं. शकपल्लवादि वंश टॉडच्या म्हणण्याप्रमाणें आर्य असोत किंवा नसोत, ते सर्व मध्यआशियांतून हिदुंस्थानांत आले येवढें तरी टॉडच्या प्रयत्नावरून उघड दिसतें.
टॉडनें निरनिराळ्या पांच मूळ अस्सल पुराव्यांच्या आधारावर अस्सल राजपुतांच्या मूळ ३६ कुळांची एक यादी आपल्या पुस्तक १ लें भाग ७, पान ८६-१२५ यांत सविस्तर वर्णिली आहे, ती फार महत्त्वाची आहे. या ३६ कुळांचाच विस्तार मागाहून मराठ्यांच्या प्रथम ५६ व नंतर ९६ कुळांत झाला आहे. मराठ्यांच्या या कुळांची माहिती मी एन्थोव्हेनकृत Castes and Tribes of Western India,  ह्या अलीकडच्या ग्रंथांतून घेतलेली आहे. खालील कोष्टकांत दाखविलेल्या नामसादृश्यावरून राजपूत असोत किंवा मराठे असोत त्यांचीं मूळ कुळें ३६ हून कमी असोत,  किंवा ९६ हूनहि जास्त असोत; त्या सर्वांचें मूळ मध्यआशियांतील शक-द्वीप (शकताई) नांवाच्या विस्तीर्ण भागांत संचार करीत असलेल्या शक, पल्लव, पृथू, अश्व ऊर्फ असीर, मसागेटी- महाजाठ, हूण, तार्तार, इ. शूर, लढाऊ, राज्यकर्त्या वंशांतच आढळतें, आणि त्यांनाच पुढें कालांतरानें उत्तर हिंदुस्थानांत राजपूत, पश्चिम हिंदुस्थानांत मराठे आणि दक्षिण हिंदुस्थानांत रड्डी हीं गुणवाचक नांवें पडलीं असें आमचें शोधाअंतीं मत बनूं लागलें आहे.

  1. लिंगायत धर्म
  2. लकबा
  3. राष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म
  4. रामानंद
  • 56
  • 57
  • 58
  • 59
  • 60
  • 61
  • 62
  • 63
  • 64
  • 65
Page 61 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी