1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

भागवत धर्माचा पाया

पहिल्या व्याख्यानांत 'भागवत' धर्माचा 'वैदिक' धर्माशीं किती अत्यल्प संबंध आहे, खरा संबंध पाहावयाचा असल्यास वैदिक धर्माच्याहि फार पलीकडे गेलें पाहिजे, हें सांगितलें. आधुनिक जाडे विद्वान् देखील हिंदुस्थानच्या कोणत्याहि बाबीचा इतिहास पाहावयाचा झाल्यास वेदांकडे धाव घेतात. ह्याचें कारण वेद हे इतिहासाचे उगम नव्हत, तर नुसते अशा विषयाचा एक उपलब्ध लेखी पुरावा येवढ्यामुळेंच, हेंहि प्रथमदर्शनींच सांगितलें; व शेवटीं ह्या भागवत धर्माचें संशोधन करण्यासाठीं हिंदुस्थानांतील वैदिक किंबहुना आर्य संस्कृतीपलीकडील द्रावीड, कोल, मोंगल किंवा त्याहूनहि प्राचीन इतर आर्येतर संस्कृतींचाहि शोध करणें क्रमप्राप्‍त आहे, असें सांगितलें. मात्र ह्या शोधासाठीं कागदोपत्रीं किंवा लेखी पुरावाच पाहिजे. अशा लेखी पुराव्याशिवाय कोणत्याहि गोष्टीला आम्ही सत्य म्हणणारच नाहीं, असा येथें आग्रह धरून चालावयाचें नाहीं. लेखी पुरावा म्हणजेच केवळ बिनतोड पुरावा, व इतर अनुमानें म्हणजे टाकाऊ, असें कोणी सुज्ञ म्हणणार नाहीं. इतकेंच नव्हे तर एखाद्या गोष्टीविषयीं अगदीं स्पष्ट लेख मिळाला, म्हणून त्या गोष्टीविषयीं अगदीं प्रत्यक्ष पुरावा मिळाला, असेंहि म्हणतां येणार नाहीं. नुसत्या पोशाखावरूनच सभ्य गृहस्थाला ओळखतां येत नाहीं, तसेंच नुसत्या लेखावरूनच त्यांतील गर्भितविषय सत्य आहे, असेंहि म्हणतां येत नाहीं. आमच्या विद्यार्थिदशेंतील एक विनोद आठवतो, तो सांगणें प्रासंगिक आहे. डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी आम्हां फर्ग्यूसनवाल्यांना टिन्पॉट् कॉलेजवाले, असें पूर्वी हिणवीत असत. डेक्कन कॉलेजांतील टेनिसक्लब, बोटक्लब वगैरे भपक्याच्या संस्था, विद्यार्थ्यांची आणि अध्यापकांची अक्कडबाज राहणी पाहून निदान माझे तरी डोळेच दिपत. इतकेंच नव्हे, एकदा तर कडक इस्त्री केलेला लिननशर्ट अंगांत नसलेल्या माणसाला सुशिक्षित तरी कसें म्हणावें, अशी शंका नवीन भरती झालेल्या कांहीं तरुण डेक्कन कॉलेजवाल्यांना आलेली पाहून, मी कधीं तरी सुशिक्षित होईन कीं नाहीं, ह्याची मला तेव्हां खात्री नसे ! असो. कडक इस्त्रीचा व सुशिक्षणाचा गेल्या पिढींत जितका संबंध होता, तितकाच किंबहुना कांकणभर जास्तच संबंध, लेखी पुरावा आणि ऐतिहासिक सत्य ह्यांमध्यें असावा, अशी कांहीं संशोधकांची अद्यापि समजूत असलेली आढळते; निदान आर्यानार्य वादांत तरी ही समजूत फार नडते, ही गोष्ट सर्व इतिहाससंशोधकांनीं समजून असणें सुरक्षितपणाचें आहे.

हिंदुस्थानांतील आहे नाहीं तें सर्व सत्य आणि शुभ चार वेदांतच आहे, बाकी उरेल तो अंधकार अशी भाविक समजूत केवळ जुन्या कर्मठ ब्राह्मणांचीच नसून अगदीं आजच्या कांहीं आर्यसमाजी प्रोफेसरांचीहि आहे. प्रोफेसर मॅक्समुल्लर हे परकीय असूनहि त्यांना आर्यत्वाचाच नव्हे तर वेदांचाहि त्यांच्या पांडित्यामुळें मोठा अभिमान होता. त्यांनीं आपल्या पौरस्त्य पवित्र ग्रंथमालेंतील, उपनिषदांवरील ग्रंथाच्या प्रस्तावनेंत म्हटलें आहे कीं, राममोहन राय ह्यांनीं उपनिषदांचें भाषांतर केलें, तुलनात्मक धर्माचें पहिलें अधिष्ठान उभें केलें व त्यांचे अनुयायी देवेंद्रनाथ, केशवचंद्र सेन आणि 'साधारण ब्राह्मसमाजा''चे संस्थापक व चालक ह्या सर्वांना आपल्या धर्माची प्रेरणा उपनिषदांतून झाली आहे, हें मॅक्समुल्लरचें म्हणणें सर्व खरें आहे. पण शेवटीं देवेंद्रनाथांनींच उपनिषदांतून जरी स्वतः प्रेरणा घेतली तरी वेदाचें प्रामाण्य गौतम बुद्धाप्रमाणेंच झुगारून दिलें, हेंहि पण तितकेंच खरें आहे. ह्या गोष्टींत जें रहस्य आहे, तें हेंच कीं, वेद संहिता काळचा जो आर्यांचा अस्सल 'वैदिक' धर्म तो पुढें उपनिषत्काळांत आपल्या शुद्ध आर्यस्वरूपांत उरला नाहीं. प्रस्थानत्रयीचा शेवटचा टप्पा जो भगवद्‍गीता धर्म त्यांत तर तो फारच कमी उरला, आणि शेवटीं देवेंद्रनाथांच्या काळीं तर तो धर्म आपल्या कीर्तिरूपानेंच केवळ उरला, प्रामाण्यरूपानें उरणें शक्यच नव्हतें. तात्पर्य इतकेंच कीं, उपनिषत्काळीं म्हणजे गौतम बुद्धाच्या पूर्वी १।२ शतकांचा धर्म म्हणजे वैदिक धर्म नसून बाहेरून आलेल्या आर्य धर्मावर, सुमेरियन ऊर्फ सुमेरु, आसुर, नाग, द्राविड, मोंगल, कोल, इ. आर्यांच्या इतकेंच किंबहुना कांहीं बाबतींत आर्याहूनहि निःसंशय अधिक सुसंस्कृत मानववंश सिंधू नदीच्या पूर्वेकडे हिंदुस्थानांतच जे राहात होते, त्यांच्या धर्मांचा, भाषेचा व इतर संस्कृतीचा संस्कार घडून बनलेला मिश्रधर्म तत्कालीन वरिष्ठ वर्गात चालू होता. आर्यांहून अधिक वैभवाची संस्कृति, ते येण्यापूर्वी हिंदुस्थानांत होती; तिचे प्रत्यक्ष आणि आश्चर्यकारक अवशेष नुकतेच सिंध आणि पंजाब प्रांतांत ब्रिटिश सरकारच्या संशोधनखात्याला सांपडले आहेत. ते डोळ्यांनीं पाहूनहि उपनिषत्काळाच्या अत्यंत संकीर्ण संस्कृतीमुळें नवीन निर्माण झालेल्या स्वतंत्र व उदार धर्माचें सर्व श्रेय अस्सल पण आर्ष 'वैदिक' धर्मालाच देणें म्हणजे आजकालचें तुलनात्मक धर्माचें शास्त्र आणि वाङ्‌मय वाचून, ख्रिस्ती अथवा त्याहूनहि कडव्या इस्लाम धर्माच्या कांहीं सुशिक्षित प्रचारकांमध्यें आज जें मनाचें औदार्य व दृष्टीचा मोकळेपणा आला आहे, त्याचें सर्व श्रेय बायबलला किंवा कुराणाला देण्यासारखेंच आहे. श्रेयाच्या ह्या भोळसर वांटणीला अगदींच सौम्य नांव द्यावयाचें झाल्यास 'अनैतिहासिक' ह्यापेक्षां दुसरें यथार्थ नांव सांपडावयाचें नाहीं.

भागवत धर्म विकास

भागवत धर्माचा जवळ जवळ तीन हजारांहून जास्त वर्षांचा इतिहास अवघ्या पांच व्याख्यानांत आणणें म्हणजे पांच बोटांच्या ओंजळींत गंगानदी धरणेंच म्हणावयाचें. भाषणाचे द्वारें एका तासांत आटोपणें, किंवा लेखाच्या द्वारें वर्तमानपत्राच्या दोन रकान्यांत ती घुसडणें म्हणजे तर एक अजब धाडस.  सारांशरूपानें तेंहि करावयाचें आहे.  म्हणून श्रोत्यांची व वाचकांची सपशेल माफी मागण्याशिवाय गत्यंतरच नाहीं.  टीकाकारांनीं ही माफी ध्यानांत ठेविल्यास मेहरबानी होईल.

भागवत धर्म

अतिसंक्षेकानें वर वैदिक धर्माचें लक्षण सांगितलें. आतां भागवत धर्माचें अगदीं थोडक्यांत लक्षण ओळखावयाचें आहे. ईश्वराचें केवळ संख्यावाचक एकत्व हें भागवत धर्माचें लक्षण नव्हे. निदान तें मुख्य लक्षणें तरी नव्हे. भागवत धर्माचें मुख्य लक्षण भक्ति (प्रेम) आणि श्रद्धा (विश्वास) हींच होत. हा भगवत् किंवा भगवान् एक आहे कीं अनेक आहेत, तो कोणी ऐतिहासिक पुरुष होता किंवा तत्त्व दृष्टीनें ओळखली जाणारी एक कैवल्य वस्तु (Metaphysical Absolute) होती, वगैरे विषय तत्त्वज्ञानाचे आहेत. ह्या विषयांचा धर्माशीं संबंध आहे, पण तेच विषय म्हणजे धर्म नव्हत. निदान भागवत धर्म नव्हत. अशी या विवेचनापूर्वी तरी माझी समजूत आहे. कर्म, ज्ञान, वैराग्य आणि भक्ति अशा मानवी मनाच्या चार अवस्था आहेत. त्यांपैकीं शेवटची अवस्था भागवत धर्माचा अगदीं प्राण किंवा आत्माच म्हटलेंतरी चालेल. कर्म (म्हणजे बाह्यविधि) आणि ज्ञान हीं वेदांमध्यें आहेत. पहिल्या तिन्ही वेदांत व ब्राह्मण ग्रंथांत कर्म आहे आणि चौथ्या वेदांत आणि विशेषतः उपनिषदांत उच्च प्रकारचें तत्त्वज्ञानहि आहे. शेवटीं शेवटीं हिंदुस्थानांत आल्यावर आर्यांच्या संस्कृतींत वैराग्याच्याहि छटा दिसूं लागल्या. पण वैराग्य हें आर्यांचें मुख्य लक्षण नव्हे. आर्यवंश हा एक अत्यंत तेजस्वी, परंतु प्रवृत्ति-प्रधान मानववंश होऊन गेला. श्रुति ग्रंथांत आणि संहिता कालीं चार आश्रमांची घटना नव्हती, फार तर काय भगवद्‍गीतेंतहि आश्रमांचा उल्लेख नाहीं ! इतकेंच नव्हे, चौथ्या ज्ञानप्रधान अथर्ववेदाचा तर गीतेंत नुसता उल्लेखहि नाहीं. स्मृति ग्रंथांतून चार आश्रमांचे उल्लेख भरपूर सांपडतात; तरी सर्व आश्रमांपेक्षां गृहस्थाश्रमाचें फार महत्त्व स्मृतींतून वर्णिलें आहे. वैराग्य आणि देहदंडन हीं झरतुष्ट्रानें केवळ पातकेंच गणलीं आहेत ! उपासातापासाचा अत्यंताभाव कोठें असेल तर तो हल्लींच्या पार्शी धर्मांतच आहे.

शेवटचें तत्त्व भक्तीचें, तें केवळ पांचरात्र अथवा सात्वत धर्मांतच प्रथम उदयास आलें, पण ह्याचा खरा परिपोष बौद्ध आणि जैन धर्मांचे संस्थापक व प्रचारक भगवान् बुद्ध आणि महावीर ह्यांच्या प्रभावशाली आणि प्रेमी प्रयत्‍नानंतरच हिंदुस्थानांत झाला. श्रीकृष्ण महात्म्यानें हा भक्तिधर्म प्रथम स्थापिला, असे प्राचीन वैदिक वाङ्‌मयांत अंधुक पुरावे आहेत, पण ह्या धर्माचे वैदिक धर्माशीं धागेदोरे उपलब्ध नाहींत. इतकेंच नव्हे तर इतरहि कोठें त्याविषयीं ऐतिहासिक पुरावे मिळावे तितके मिळत नाहींत, ही किंचित् निराशेची गोष्ट आहे. उलट भगवद्‍गीता हा ग्रंथ जो वासुदेव-कृष्ण-विष्णु धर्माचा बळकट पाया आणि किल्ला, त्यांतहि हा नवीन धर्म वैदिक त्रयीवर अवलंबून नाहीं; इतकेंच नव्हे तर खर्‍या मोक्षाला वेद अपुरे आहेत, असें स्पष्ट आणि वेळोवेळीं म्हटलें आहे. ॥ त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ॥४५॥ अध्याय २ श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । समाधावचला बुध्दिस्तदा योगमवाप्स्यसि ॥५३॥ अध्याय २ रा. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गति प्रार्थयत्ने ॥ ....... क्षीणे पुण्ये मर्त्यलोके विशन्ति ॥ २०-२१ ॥ अध्याय ९ यान्ति देवव्रता देवान् .... यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥२५॥ अध्याय ९ इ. अनेक उतारे देतां येतील.

भगवद्‍गीता हा ग्रंथ मिश्र मतांचा ग्रंथ आहे. त्यांत कोणकोणत्या काळीं कोणकोणतीं मतें कशीं मिसळण्यांत आलीं, हें अस्पष्टपणानेंहि ठरविण्याचें दुर्घट काम आहे. तें प्रोफेसर गार्वे त्यांनीं आपल्या Introduction to the Bhagavat Gita ह्या लेखांत केलें असून त्याचें इंग्रजींत भाषांतर रा. उटगीकरांनीं केलेलें ह्या प्रकरणीं वाचनीय आहे (Indian Antiquary १९१८). भिन्न मतें कशींहि मिसळलीं असोत, सर्व भगवद्‍गीता गौतम बुद्धाच्या कालानंतरची असून तिच्यावर उमटलेले गौतम बुद्धाच्या शिकवणीचे स्पष्ट ठसे दिसून येत आहेत. विशेषतः कर्मयोग, मध्यमाप्रतिपत्ति आणि निर्वाण ह्या ज्या तीन गोष्टी सिद्धार्थाच्या शिकवणीच्या मुख्य प्राणभूत, त्या गीतेमध्यें स्पष्ट उल्लेखिल्या आहेत. तेलंग आणि टिळक ह्या दोघां विद्वानांनीं ह्यांचा केवळ ओझरताच उल्लेख केला आहे. टिळकांनीं भर भगवद्‍गीतेवरूनच पुढें महायान बौद्ध धर्माला प्रेरणा मिळाली, असें ठरविण्याचा प्रयत्‍न केला आहे; पण हिंदुस्थानांतल्या भागवत धर्माचा उगम श्रीकृष्ण कीं बुद्ध हा वाद यथासांग करण्याला येथें अवकाश नाहीं. तरी तत्त्वज्ञानाची कशीहि दृष्टि असो, भक्ति आणि श्रद्धा ह्यांना जैन आणि बौद्ध धर्मांत स्थान होतें, इतकेंच नव्हे तर ह्या आध्यात्मिक अवस्थांचा परिपोष निदान हिंदुस्थानांत तरी महावीर नाट-पुत्र आणि सिद्धार्थ शाक्य-पुत्र, हे महात्मे जन्मले नसते, तर इतका झाला असता कीं नाहीं हा एक चितनीय प्रश्न आहे.

असो. वरीलप्रमाणें वैदिक धर्म आणि भागवत धर्म ह्यांचीं लक्षणें ढोबळ मानानें व संक्षेपतः सांगितलीं. शाक्त आणि शैव धर्माविषयीं अद्यापि सांगावयाचें उरलेंच. जरी वेदांत ह्या दैवतांचा उल्लेख आहे किंवा उल्लेख झाल्याचा निदान भास होत आहे, तरी हीं दैवतें मूळ आर्यांच्या संस्कृतींत नाहींत. निदान हा वाद चालविण्याला येथें अवकाश नाहीं. गुरुवर्य सर डॉ. भांडारकर आपल्या Vaishnavism & Shaivism ह्या अमूल्य ग्रंथांत पान २४२ वर म्हणतात कीं ''रुद्र-शिव ह्या कल्पनेचा माग काढण्यासाठीं गृह्यसूत्रा (च्या काळा) पर्यंत आम्हीं वैदिक वाङ्‌मयाचा तपास केला, पण तेथें कोठेंहि कोणा देवीचा, मातब्बर दैवत अशा रूपानें, शोध लागला नाहीं.'' प्रो. मॅक्समुल्लर ह्यांनीं आपल्या Anthropological Religion, Gifford Lecture in १८९१ ह्या ग्रंथांत पान ४१० वरील परिशिष्टांत म्हटलें आहे कीं, ''ॠग्वेदांतील १० व्या मंडलांतील १२७ स्तोत्रांपुढें एका खिलामधील रात्री ह्या देवतेच्या स्तोत्राच्या चार चरणानंतर दुर्गा ह्या देवीचा स्पष्ट उल्लेख आहे.'' पण मुख्य व्याख्यानांत पुष्कळ प्रमाणांचा विचार करून ह्या जगप्रसिद्ध पंडितानें आपली स्पष्ट कबुली पुढील शब्दांत दिली आहे. ''म्हणून माझें असें मत आहे कीं, दुर्गा किंवा शिव हीं दैवतें वेदांतील कोणत्याहि दैवतांचीं विकसित किंबहुना विकृतहि रूपें नव्हेत.'' पान १६६. ह्या दैवतांचा संबंध वैदिक धर्माशीं नाहीं उलट पुरातन कालापासून ह्याचा निकट संबंध भागवत धर्माशीं आहे. इतकेंच नव्हे, तर विष्णु भागवतांच्याहि पूर्वी शिव भागवतांचे आणि देवी भागवतांचेहि स्वतंत्र ग्रंथ उपनिषत्काळांत आणि पुराणकाळांत भरपूर आढळतात. पण ह्या प्रकरणांचा तपशील पुढील व्याख्यानांत येणेंच बरें होईल. तूर्त एवढेंच ध्वनित करणें बरें कीं, कर्म (बाह्य विधि) आणि ज्ञान हीं जशीं आर्य संस्कृतीचीं विशिष्ट लक्षणें, तशींच वैराग्य, गूढज्ञान आणि भक्ति अथवा श्रद्धा हीं द्रावीड संस्कृतीचीं मुख्य लक्षणें होत, आणि ज्याअर्थी भागवत धर्माशीं ह्या दुसर्‍या मानसिक अवस्थांचा अधिक निकट संबंध आहे त्याअर्थी भागवत धर्माचा विकास समजून घेण्यासाठीं आर्यांच्यापेक्षां इतरांच्या संस्कृतींचाच अधिक अभ्यास करणें जरूर व इष्ट आहे.

भविष्य

अनेक यंत्रांचा शोध लागून हल्लींच्या औद्योगिक क्रांतीच्या काळांत ह्या भांडवलासुराचा जन्म झाला आहे. हा चिरंजीव नाहीं. इतर प्राचीन असुराप्रमाणें हाहि आपल्या कर्मानें आणि इतरांच्या जागृतीनें मरणारा आहे. सार्वत्रिक शिक्षणाचा आणि सार्वत्रिक वाहतुकीचा जसजसा प्रसार होईल. तसतसें ह्या असुराचें आयुष्य संपुष्टांत येणार. मजूर आणि मालक हा भेदच नव्हे. तर खेडें आणि शहर हाहि भेद भविष्यकाळीं टिकणार नाहीं. अमेरीकेंत असें एक खेडें नाहीं कीं, जेथें वीज, मोटार, रेडिओ आणि हवाई जहाज ह्यांचा शिरकाव नाहीं. हा ढेरपोट्या भांडवलासूरहि न्यूयॉर्क शहरापेक्षां दूरदूरच्या खेड्यांत रात्रीं निजावयास अधिक जातो. उलट खेड्यांतले कामकरीहि दिवसा शिक्षणासाठीं आणि कामासाठीं शहरांत राहून रात्रीं निजण्यास खेड्यांतच जातात. भावी शहरें किंवा खेडीं हीं दोन कधीं न भेटणा-या मानवी मित्र वर्गांचीं भिन्न निवासस्थानें अशीं न राहतां सर्वांचींच दिवसा कामाचीं व रात्रीं विश्रांतीचीं ठिकाणें होतील. हें पुढील भविष्य अजमावून जर वरील संयुक्त संघ आपलें कार्य नेटानें आटोपतील तरच ह्या भांडवलासुराची आयुर्मर्यादा संपून तो अंतर्धान पावेल; आणि प्राचीन काळचें बळीचें राज्य पुनः बळीलाच मिळून पुनः घडी बिघडेपर्यंत सर्व सुरळीत चालेल.

भगवद्गीता

भागवत धर्माचें ऐतिहासिक अवलोकन करतां करतां आम्ही वेदान्ताचें शेवटचें प्रस्थान जी अतिशय पवित्र भगवद्गीता तिचे जवळ आलों. हें प्रस्थान भागवत धर्माचें केवळ केंद्रच होय. सर्व हिंदुमात्रांचें हें आध्यात्मिक काळीजच म्हटलें असतां अतिशयोक्ति मुळींच होत नाहीं. ह्या ग्रंथांच्या उपासना, विवेचनें, पारायणें, भाष्यें, भाषांतरें आणि गुणगौरव जितके झाले आहेत तितके हिंदूंच्या दुस-या कोणत्याहि ग्रंथाचे झाले नाहींत. ह्या गौरवाच्या अनेक कारणांपैकीं एक कारण हें कीं, हा ग्रंथ हिंदूंच्या अनेक तत्त्वज्ञानांचा किंबहुना धार्मिक भावनांचाच नव्हे तर त्यांच्या धार्मिक इतिहासाचाहि एक अतिसंक्षिप्त निष्कर्ष आहे. इतकेंच नव्हे तर ह्या ग्रंथांनंतर हिंदुस्थानांतील अनेक भिन्न भिन्न धर्मांचा जो पुढें विकास झाला त्याला हा चिमुकला आणि चटकदार काव्यमय ग्रंथच प्रत्यक्ष अथवा पर्यायानें कारणीभूत झाला आहे. हें सर्व अत्यंत श्रद्धापूर्वक मानूनच आम्ही पुढील टीकात्मक विवेचन करीत आहों.

ही गीता अगदीं संक्षिप्त असली तरी अगोदर हल्लींहूनहि अधिक संक्षिप्त असावी आणि तिच्यांत वेळोवेळीं मागाहून भर टाकण्यांत आली असावी, हें सूक्ष्मदर्शीयांना सहज दिसण्यासारखें आहे. बाराव्या अध्यायानंतर गीताकारांनीं ती संपवली असती, तरी गीतेंत कांहीं उणीव भासली असती, असें नाहीं. पण हिंदूंच्या अनेक ग्रंथांप्रमाणें प्रस्तुत गीतेचेहि अनेक कर्ते असावेत असें दिसतें व ते मूळ गीतेंत भर टाकणारे निरनिराळ्या मताचे व मतलबाचे लोक असावेत, त्यामुळें ह्या ग्रंथाला केवळ अवास्तव पुनरुक्तीचाच नव्हे तर परस्पर विसंगतपणाचाहि दोष कांहीं अंशीं जडला आहे. अनेक इतर तेजस्वी गुणांत हे दोष झाकल्यासारखे आहेत, पण टीकेच्या दृष्टीला ते ढळढळीत दिसतात. ज्ञान, भक्ति, कर्म आणि वैराग्य ह्या चारी मानसिक अवस्थांची ह्या काव्यांत जी भेसळ झाली आहे, ती अगदीं बेमालूम एकजीव झालेली नाहीं. त्यामुळें जरी पुषक्ळदा पृथक् पृथक अवस्थांच्या माणसांना ही गीता मोहनीसारखी मोहून टाकीत आहे, तरी ज्यांच्यामध्यें ह्यांपैकीं कोणतीच अवस्था असावी तितकी उत्कट झालेली नसते, अशा वावदूकांना ही गीता म्हणजे एक भली खाशी भांडकुदळच गवसल्यासारखी होते. पहिल्या व्याख्यानांत सांगितल्याप्रमाणें प्रो. गार्बे ह्यांनीं ह्या गीतेंत निरनिराळ्या संप्रदायांचे सिद्धान्त आणि विश्वास ह्यांची निरनिराळ्या काळीं भर पडून हल्लीं उपलब्ध असलेलें हिचें स्वरूप किती संकीर्ण किंबहुना विसंगत झालें हें चांगलें दाखविलें आहे. थोडक्यांत गार्बे यांचा गीतेंतील धर्माविषयीं निर्णय असा आहे :- मुळांत या भागांत धर्माचा वेदांशीं कांहीं संबंध नव्हता, कृष्ण अथवा वृष्णि कुळांतील यादवांमध्यें श्रीवासुदेवानें ह्याचा प्रथम प्रसार केला. पुढें कांहीं बौद्धांनीं जसें बुद्धाला देवाप्रमाणेंच मानून त्यांनीं एक महायान पंथ स्थापला तसेंच कांहीं सोमवंशीय क्षत्रियांनीं ह्या वासुदेवाला भगवान बनवून कृष्णोपासक एकांतिक ईश्वर-धर्म स्थापून त्यांचें त्यांनीं एक मूळ गीतोपनिषद् रचलें असावें. ही गोष्ट बुद्धानंतर परंतु ख्रिस्तपूर्वीं अगदीं ढोबळ मानानें ३०० वर्षांच्या सुमारास झाली असावी. जैन आणि बौद्ध ह्या पूर्वेकडच्या सूर्यवंशी क्षत्रियांना जशी सांख्य आणि योग दर्शनाचीं मतें पसंत होतीं, तशींच पश्चिमेकडील ह्या सोमवंशीय क्षत्रियांनाहि हींच मतें पसंत होतीं. वेदान्तदर्शनाला विशेषत: पुढें आद्य शंकराचार्यांचे वेळी जें शुद्ध अद्वितीय वादाचें स्वरूप प्राप्त झालें तें ह्या वेळीं रूढ झालें नसावें, अणि पूर्वमीमांसेचा तर सर्व क्षत्रियांना कंटाळा येऊन त्यांतील कर्मठपणाचा अभिमानी जो ब्राह्मणवर्ग त्याच्याशीं ह्या दोहोंकडच्या सूर्य आणि चंद्र वंशी क्षत्रियांचे खटके उडूं लागले असावेत. बुद्धोपासक, जिनोपासक, आणि कृष्णोपासक क्षत्रियांमध्येहि आपसांत एकी होती असें मुळींच नव्हे. त्या प्रत्येकांचे इतिहास, पुराण आणि चरित्र-ग्रंथ ऊर्फ गीता अथवा जातकें अर्थात् निरनिराळे बनत चालले. ह्या भानगडीमुळें भारताप्रमाणेंच तदंगभूत मूळ भगवद्गीतेंतहि वेळोवेळीं सांप्रदायिक भर पडत चालली असावी. सांख्य योग, पूर्व-उत्तर मीमांसा, न्याय-वैशेषिक अशीं षड्दर्शनांचीं संलग्न जोडपीं आहेत. गीतेचे सांख्य-योगपर भाग आणि पूर्व-उत्तर मीमांसापर भाग कोणकोणते आहेत, हें गार्बे ह्यांनीं अत्यंत परिश्रमानें तपशीलवार पृथक् करून दाखविले आहेत. त्यांच्या मतें गीतेच्या विस्ताराचा काळ इ. स. पूर्वीं २०० पासून नंतर २०० वर्षांपर्यंत आहे. ह्या विस्तारांत मूळच्या एकेश्वरी गीतेंत अगदीं शेवटी शेवटीं ब्राह्मण वर्गानें आपलीं पूर्व आणि उत्तर मीमांसेचीं मतें घुसटलीं असें गार्बे म्हणतो. मला वाटतें अशोक मौर्याचें राज्य, त्याच्या मागें लवकरच पुष्यमित्र शुंग नांवाच्या सेनापतीनें बळकावून जी ब्राह्मणी धर्माची धामधूम अखिल भरतखंडांत उठविली तिच्याच साह्यानें पुढें कण्व नांवाच्या ब्राह्मण मंत्र्यानें क्षत्रियांना कायमचे चित् केले. बौद्ध, जैन आणि शैव भागवतांना पायबंद लावले; राम, कृष्ण इ. क्षत्रिय विभूतींच्या ऐतिहासिक स्वरूपाचा लोप करून त्यांचे नुसते पौराणिक देव्हारे माजविण्यासाठीं वेदांतील विष्णु ही अगदीं गौण देवता पुढें आणिली. क्षत्रियांच्या वर्चस्वालाच नव्हे तर सर्वसाधारण सनातन भागवत धर्मालाहि वैष्णव सांप्रदायाचें कायमचें ग्रहण लावून, पुढील युगांतील चिरस्थाई ब्राह्मणी वर्चस्वाची कायमची मेढ रोविली; वगैरे वगैरे ज्या क्रांतीकारक गोष्टी ख्रिस्ती शकापूर्वींच्या व नंतरच्या ह्याच एकदोन शतकांत घडल्या, त्याच आणिबाणीच्या काळांत वर गार्बेनें सिद्ध केल्याप्रमाणें मूळ गीतेला हल्लींचें संकीर्ण स्वरूप प्राप्त झालें असावें.

येथवर भागवत धर्माचा आमच्या देशांत निरनिराळ्या बाजूनें पाया कसा घालण्यांत आला व तो कोणीं, केव्हां, कोणकोणत्या नांवाखालीं घातला, हें सांगितले. ह्यापुढील भाग ह्या धर्माच्या सांप्रदायिक प्रसाराचा फार मनोवेधक आहे. तो पुढील तिस-या व्याख्यानांत सांगूं.

  1. ब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें)
  2. ब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान
  3. ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग
  4. बौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध
  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72
  • 73
Page 69 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी