1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

इतिहास

महाराष्ट्रांत भौगोलिक धरणाकंप मागें झाले नाहींत; किंबहुना महाराष्ट्राचें उंच पठार हें एक जगांतील अति स्थिर व प्राचीन भूमिभाग आहे असें भूगर्भशास्त्री म्हणतात; पण अखबारनवीस निराळीच गोष्ट सांगतात. ते म्हणतात, महाराष्ट्रांत ऐतिहासिक भूकंप फार झाले आहेत, आणि ते होण्यापूर्वीं सह्याद्रीचें कोणतें ना कोणतें तरी एक शिखर पेट घेतें. हल्लीं प्रचंडगड, राजगड, विचित्रगड शिखरांनीं पेट घेतला आहे. महारांष्ट्रांतील मराठ्यांत दोन भिन्न वर्ग (वंश नसल्यास) आहेत. ते वर्ग म्हणे (१) नेते मराठे व (२) अनुयायी कुणबी. पहिला वर्ग हिंमतवान्, हिकमतवान्, खोल दिलाचा व स्वतंत्र बाण्याचा आहे; तर दुसरा वर्ग शरीरचा सोशिक, मनाचा मोकळा, हाडाचा इमानी आणि जीवाचा करारी आहे. स्वराज्य ह्या दोन्हीं वर्गांची रोजची भाकर आहे. सणावाराची पोळी नव्हे. दोघेहि खेड्यांत किंबहुना रानांत जन्मून तेथेंच वाढून तेथेंच मरणारे आहेत. ह्यांची संस्कृति नागरिक मुळींच नव्हे. किंबहुना केवळ नागरिक संस्कृति त्यांना बाधते म्हटलें तरी चालेल. खेड्यांतलें स्वाभाविक स्वराज्य त्यांचें कोणी हिरावूं शकत नाहीं. अनेक धर्मांचीं व संस्कृतींचीं साम्राज्यें वावटळीप्रमाणें ह्यांच्यावरील वातावरणांतून गर्जना करीत आलीं व गेलीं. खालीं जमिनीवर ह्यांच्या स्वराज्याचा संसार तसाच चालूं आहे. जमीनमहसुलाची रयतवारी पद्धत, आणि धर्म, जात, वंश आणि धंदा कोणाचा कांहींहि असो, गांवगाड्यामध्यें सर्वांचा समाईक हक्क जर अद्यापि कोठें पुरातन कालापासून चालत असलेला दिसत असेल तर ह्याच हल्लींच्या महाराष्ट्रांत, कोंकणपट्टी मात्र ह्या नियमास अपवाद आहे. म्हणून ह्या दृष्टीनें ती पट्टी ऐतिहासिक महाराष्ट्राचा भागच नव्हे - बाकीचा देशावरला महाराष्ट्र ह्याची रयतवारी ऊर्फ स्वराज्य ही प्रकृतीच आहे. नुसतें भावी आदर्श नव्हे.
युद्धपूर्वकालांत हिमालयाच्या पायथ्याशीं झल्ल, मल्ल, लिच्छवी, वज्जी, रट्ट इत्यादी कुळें अथवा वसाहती केवळ स्वराज्यसुखांत राहात होत्या. त्यांचें शासन लोकसत्तात्मकपद्धतीचें (Limited Monarchy) होतें, हें पाली वाङमयावरून उघड दिसतें. सालो, मालो, लेचे, पेचे असे ह्यांच्या नांवांचे भाषाविषयकच नव्हे तर पोकळ नागरिक संस्कृतिवाल्यांनीं, गुणवाचकहि अपभ्रंश बनविले असतील, पण साळी, मराठे हे हल्लींचे क्षत्रिय अथवा शेतकरी हे त्या हिमालयांतून खालीं दक्षिणेंत उतरलेल्या स्वराज्य-शाली राष्ट्राचे आजचे अस्सल वंशज आहेत, असें मी तरी समजतों. स्वराज्याचे पायीं ह्या मराठ्यांनीं गेल्या २।। हजार वर्षांत पुष्कळ लहानमोठ्या कटकटी केल्या आहेत. त्यांतलीच एक शेवटची कटकट ह्या परिषदेची चळवळ होय !
स्वराज्यासाठीं कटकट करणें मराठ्यांची उपजत बुद्धीच आहे. “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ही शाब्दिक म्हण लो. टिळकांनीं रूढ केली; पण राहणीची रूढी निदान अडीच हजार वर्षें महाराष्ट्रांतील मराठ्यांची जुनीच आहे ! तिचा इतिहास आहे !!
मावळे म्हणजे केवळ पश्चिमेकडचे असा नुसता शब्दार्थ झाला, पण स्वतंत्र पाहण्यानें आपल्या मालकीची जमीन स्वत: वाहणारा साधासुधा मराठा असा ध्वन्यर्थ आहे. मावळ्याचा हा बहाणा श्रीशिवरायापूर्वीं हजारों वर्षांचा जुना आहे. शिवाजीनें ह्या बहाण्याला उत्पन्न केलें नसून उलट ह्या बहाण्यानें शिवाजीला उत्पन्न केलें. इतर आधुनिक कमअस्सल नागरिक बहाण्यानें शिवाजीला नुसतें नामशेष केलें मात्र. शेटे, पोतनीस, वाळिंबे हे आजचे मावळे होत. ह्यांची जात विचारूं नका, प्रकृति विचारा. ती प्रकृति स्वराज्यशील आहे. त्यांनीं चालविलेल्या परिषदेची बैठक जरी आजची आठवीच असली तरी त्यांची प्रकृति भूगर्भांतल्या आगीप्रमाणें पुरातन आहे. ती आग ब्रिटिशांसारख्या जगाला डोईजड झालेल्या धेंडालाहि शुद्ध करील. मग सचीवासारख्या आजकालच्या चिमुकल्या शक्तीला ती शुद्ध करणार नाहीं म्हणजे काय?

इतर पंथ

भागवत धर्म हा पुरातन काळीं द्राविडांचा होता. पुढें शाक्यपुत्र गौतम बुद्धानें त्यांचा ऐतिहासिक काळीं उठाव केला. शैव, वैष्णव, जैन पंथांनीं अखिल भरतखंडांत आणि बौद्धांनीं तर सर्व आशियाभर त्यांचा प्रसार केला. पुढें महायान, मंत्रयान, वज्रयान इ. तांत्रिक अधोगतीच्या द्वारां बौद्धांचीच नव्हे तर शैव, वैष्णवादि हिंदु भागवतांचीहि अवनति कशी झाली, हें आम्हीं वर दाखविलें आहेच. आतां येथें भागवत धर्माचें पुनरुज्जीवन करण्यासाठीं पुन: द्राविडांनींच आधुनिक उत्कृष्ट भक्तीचा उठाव कसा केला, तो सर्व जातीच्या संतांनीं अगोदर केल्यावर द्राविड ब्राह्मण आचार्यांनीं शास्त्र आणि काव्यग्रंथ लिहून त्या धर्माला ग्रांथिक स्वरूप कसें दिलें; पुढें ह्या धर्माचा प्रसार प्रथम कर्नाटक, नंतर महाराष्ट्र, नंतर उत्तर हिंदुस्थान व बंगाल ह्या प्रांतांत कसा व कोणीं केला, हें वर सांगितलें. वल्लभाचार्यांनीं ह्याच धर्माचा उपदेश प्रथम काशी येथें करून तो पुढें गुजराथेंत केला. पण त्याच्या पंथांत लवकरच राधावल्लभी पुष्टिमार्गाचें बंड माजल्यानें व कांहीं अंशीं हाच वाममार्ग चैतन्याच्या वैष्णवमार्गांत झाल्यानें ह्या सर्वच पंथांची अवनति होणें क्रमप्राप्तच झालें. आतां भागवत धर्माची एक अत्यंत शुद्ध आणि उज्वळ शाखा शीख धर्म ह्या नांवानें हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहे. त्या धर्माचा विचार करून हा विषय आटोपूं.

आवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे

सरकारचे आणि सावकाराचे बेजबाबदार तगादेदार, अशीं एक कां दोन शेतक-यावर घडणा-या जुलमाला अनेक तोंडें आहेत. सरकारी सा-याचाच तेवढा बोजा शेतक-यावर पडतो, असें मुळींच नाहीं. मिठाच्या आणि जकातीसारख्या प्रत्यक्ष कराचीच नव्हे, तर मोठ्या भांडवलवाल्यांच्या प्राप्तीवरील कराचीहि झळ अखेरीस खेड्यांतील शेतक-याला भासते; प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या रूपानें सरकार जो वसूल शेतक-यांकडून आपल्या खजिन्यांत खेचते, तो त्याच्या वट्ट वसुलांच्या जवळ जवळ नऊदशांशाइतका असतो ! पण खर्चाच्या बाजूनें मोबदला परत खेड्यांतल्या शेतक-याला किती पोंचतो हें पाहूं गेल्यास मात्र, नऊशतांशहि भरत नाहीं !  तो सर्व खर्च शहरांत राहणारांच्या चोंचल्यावर, सरहद्दीवरील सरदारांच्या बडेजावीवर, आणि टेकडीवरील छोट्या व बड्या लाटांकरितांच होत असतो. हा प्रकार हिंदुस्थानांतल्या बेदाद कुणब्यांचाच नव्हे तर जपान-अमेरिकेंतल्या लोकशाहींतल्या खेडवळांचा कमीअधिक मानानें असतोच. राजकीय सनदांची आलटा- पालट किती होऊनहि जर अखेर शेतक-यांच्या पोराबाळांच्या हातीं खापरच येतें, तर मग अखेरचा उपाय म्हणून त्यांनीं करबंदीचें शस्त्र उगारलें तर त्यांचा हात कोण तत्त्वज्ञानी अगर व्यवहारज्ञानी सरळपणानें धरूं शकेल बरें ?
ह्याच सातारा जिल्ह्यांत १५ वर्षांपूर्वीं मी हजेरीला कंटाळलेल्या मांग लोकांची एक वसाहत करण्याच्या हेतूनें, योग्य ठिकाण शोधण्यासाठीं वणवण हिंडत होतों. तासगांव तालुक्यांत गेलों तेथें अगदीं ओबडधोबड बैलगाडीलाही एका खेड्यांतून दुस-या खेड्यांत जाण्याला वाट मिळेना, अशीं पुष्कळ ठिकाणें दिसलीं. सबंध गांवठाण्यालाच पिण्यालायक पाणी मिळेना अशी स्थिति होती.

आधुनिक रूपान्तरें

इतकें सांगितल्यावर मागील कलमांत निर्दिष्ट केलेल्या महाराष्ट्रीय आधुनिक मानसिक भांडवलाचा आपण थोडक्यांत ठाव घेऊं या. प्रत्येकी वेळीं प्रत्येक देशीं स्वतंत्रच विचार चालूं असतात - किंबहुना असावयाला पाहिजेत असें नाहीं. पृथ्वीचे पाठीवर केव्हां ना केव्हां कोठें ना कोठें तरी स्वतंत्र विचार, स्वतंत्र काव्य, आणि स्वतंत्र कृति चालूं असतेच. वाहतूक आणि दळणवळणाचीं साधनें असतील त्या मानानें, ह्या स्वतंत्र पैदाशीचें स्थलांतर आणि कालांतर भाषांतराचे व रूपांतराचे द्वारें होणारच. ह्या न्यायानें पाहतां मध्ययुगीन इस्लामी संस्कृतीच्या संकर्षणानें महाराष्ट्राच्या आचारविचारावर जो परिणाम झाला, त्याच्या शतपट परिणाम प्रस्तुत पाश्चात्त्य संस्कृतीचा झाला आहे, व ह्याहून पुढें अधिकच होणार. पाश्चात्त्य देशांत भौतिक शोध आणि आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळें प्रत्यक्ष धर्माच्या निष्ठास्थानावर हल्ले चढून त्यांचीं शिखरें आणि गाभारें डळमळूं लागलीं. तो चित्कंप सर्व सुसंस्कृत जगाला अद्यापि भोंवतो आहे. ह्यांतून प्रागतिक महाराष्ट्र तेवढा कसा अलग राहणार? मुंबई विश्वविद्यालय सुरू होऊन एक पिढी उलटते न उलटते तोंच डार्विनसारखे शोधक आणि स्पेन्सरसारखे तार्किक ह्यांच्या विचारांनीं तत्कालीन महाराष्ट्रीय लेखकांना व वाचकांना भारून टाकलें. आम्ही कॉलेजांत जाण्यापूर्वींच मराठी वाङ्मयावर ह्या नूतन पाश्चात्त्य विचारांची भाषांतराच्या आणि रूपांतराच्या द्वारें इतकी छाप बसलेली दिसली कीं, तितकी छाप ब्रह्मसूत्र, शांकरभाष्य किंबहुना गीता-भागवत ह्या संस्कृत ग्रंथांचीहि महाराष्ट्रांतील वाचकवर्गावर निदान श्रीएकनाथाचे काळीं तरी बसली नव्हती. असती तर श्रीएकनाथांना अवघ्या अडीचशें वर्षांपूर्वींची ज्ञानेश्वरी धुंडाळून शुद्ध करून नवी कां नटवावी लागली असती? आणि श्रीनामदेवांनीं अमुक एक अभंग लिहीन म्हणून केलेली प्रतिज्ञा पूर्ण करावयाला पुन: त्यांच्यामागून तीनशें वर्षांनीं श्रीतुकारामांना कां ह्या मर्त्य लोकाची यात्रा करावी लागली असती ! असो, संस्कृत वाङ्मयाचें स्वदेशी प्राकृतांत कालांतर होण्याला जो काळ लागला, त्याच्या शतांशनिंहि काळ पाश्चात्त्य विचाराचें महाराष्ट्रांत स्थलांतर व्हावयाला लागला नाहीं; कारण संस्कृतीचा प्रवास, तो बरा असो वा कसाहि असो, गणितश्रेढीनें नव्हे तर ह्यापुढें भूमितीहून अधिक वेगानें होणार आहे.

आमचा देश तूर्त तरी बिचारा विचारसंपत्तीची नुसती उतारपेठ होऊन राहिला आहे; पण हल्लीं जेथें पिकतें तेथेंच विचाराची कशी क्रांतीची धुनी पेटली आहे पाहा ! पृथ्वीवरील सृष्टीच्या इतिहासाचें अवलोकन करून विशेषत: प्राणिशास्त्राच्या व भूगर्भशास्त्राच्या अभ्यासाच्या जोरावर पाश्चात्त्य तार्किक उत्क्रांतिवादासारखे अतिव्याप्त सिद्धान्त काढूं लागले होते. पण सर्व शास्त्रांत अधिक निश्चित शास्त्र जें गणित त्यांतच आतां युगांतर करणारे शोध होऊं लागले आहेत. त्यामुळें न्यूटनला शिळें ठरविणारे वैज्ञानिक आइनस्टाइनसारखे निर्माण होऊं लागले आहेत. आइनस्टाईननें विज्ञान जगांत जी एक अपूर्व क्रांति चालविली आहे, तिचा एक ठोकळ परिणाम जागतिक विचारावर किंबहुना वाङ्मयावरहि कदाचित् होईल असें वाटतें, तो हा कीं, यापुढें निवळ तार्किक अथवा काल्पनिक (Deductive or Apriori) विचारपद्धतीला आळा बसून तदनुसार गंभीर वाङ्मय, ललित नव्हे अधिकाधिक आनुभविक आणि निश्चित पद्धतीचा (Inductive or Aposteriori) अवलंब करील. प्रस्तुत सारें जगच वैज्ञानिक क्रांतीमुळें आणि त्याहूनहि अधिक तीव्र ज्या राजकीय, सामाजिक व आर्थिक क्रांतींनीं हादरूं लागलें आहे त्यामुळें ह्यापुढें नुसत्या तार्किक अर्थवादाचा खप कमी होईल. मग त्याची निपजहि कमीच झाली, तर कोणाला फारसें वाईट वाटण्याचें कारण नाहीं. ह्या दृष्टीनें पाहतां अमक्याचें तत्त्वज्ञान किंवा तमक्याच्या तत्त्वज्ञानाचा इतिहास वगैरे आकाशाला गवसणी घालण्याचा आव आणणारीं पुस्तकें मराठींत न झालीं तरी चालेल. त्यांत कांहीं नाविन्य अगर गांभीर्य नसणार. ह्यापेक्षां जास्त स्वतंत्र आणि सुटसुटीत ग्रंथ तयार करावयाचे नसल्यास आमच्यांतील कांहीं कॉलेजांतल्या प्रोफेसरांप्रमाणें आधुनिक विद्याविशारदांनीं लघुकथा, भावगीतें, फार तर विनोदी कादंब-या लिहिलेल्या ब-या. त्याहि खपत नसल्या, तर परीक्षेचे कागद तपासण्यांत अधिक किफायत मिळेल तर पाहावी. मग उगाच वाचकांचा वेळ घेणारीं तत्त्वज्ञानें कशाला? ह्या बाबतींत जबलपूर कॉलेजचे प्रोफेसर श्री. द. गो. मटगे, M. SC. ह्यांनीं नुकतेंच लिहिलेल्या “अपेक्षावाढ” ह्या चोपड्याची मला स्वाभिमान आठवण होत आहे. ह्या चोपड्याचा आकार एखाद्या बेकार तरुण कवीच्या कवितासंग्रहाहूनहि लहान आहे, आणि त्यांचा विषय पाहावा तर “जगता व्यापून दशांगुळें उरला.” सापेक्षता वाद सिद्ध असो वा नसो, जाड्या विद्वानाला बारकें पुस्तक लिहिलां येणें शक्य आहे, ही अपूर्व गोष्ट ह्या प्रोफेसरांनीं सिद्ध केली, म्हणून मी त्यांचें अभिनंदन करतों. अशीं क्षुद्र पुस्तकें आमच्या पुण्यांत कोणी प्रसिद्ध करीत नाहींत. तें आपण काम केलें म्हणून बडोदावासियांचेंहि अभिनंदन करतों. आमचे पुण्यांतले मीमांसक आणि वेदान्ती प्रत्यक्ष आईनस्टाईनचीच थट्टा करतील. ते म्हणतील ह्या जर्मनानें आमच्या आद्य शंकराचार्यांचा मायावाद चोरला. तें कसेंहि असो. आमच्याकडील प्रोफेसरांनीं नवीन शोध लावले नाहीं तर परकीयांच्या ख-या शोधांचीं साध्या भाषेंत रूपांतरें करून आम्हां अडाणी मराठ्यांना त्यांची ओळख करून दिली तरी पुरे. नागपूरच्या नवभारत ग्रंथमालाकारांनीं ह्याच आकर्षक विषयावर “सापेक्षता दर्शन” नांवाच्या एका होऊं घातलेल्या ग्रंथाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दुर्बोध विषयाचें सुबोध विवरण होणार अशी जाहिरात आहे, ती लवकर खरी ठरो ! असो. तत्त्वज्ञानावर झालें तेंच च-हाट माझ्या इच्छेपलीकडे लांबलें. आतां अधिक लोकप्रिय नसलें तरी खात्रीनें लोकोपयोगी अशा समाजशास्त्राकडे वळूं या.

अस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें

अस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें (PDF साठी येथे क्लिक करा)

 
वरील ३७ राजपूत नांवांपैकीं दक्षिणेंतील मराठ्यांमध्यें हल्लीं वर दाखविल्याप्रमाणें २४ नांवें तरी आढळतात. याचप्रमाणें मराठ्यांतल्या ९६ नांवांपैकीं राजपुतांत कितीतरी आढळतीलच. टॉडनें दाखविल्याप्रमाणें शकद्वीपांतून अर्धवट सुधारलेल्या कितीतरी शकवंशांतले पोटभेद पश्चिमेकडे सॅक्स्न, गेटी अथवा गॉथस हूण इ. जर्मनींत, ऑस्ट्रियांत, हंगेरींत पसरले; तसेंच शक, जाठ, हूण या नांवानें इराण, अफगाणिस्तान आणि नंतर उत्तर पश्चिम हिंदुस्थानांत आणि शेवटीं दक्षिण हिंदुस्थानांतहि पसरले. तेंच आजचे राजपूत, मराठे, रड्डी इ. होत.
शक आणि अश्ववंशाचा विचार वर झाला. आतां पल्लवांविषयीं कांहीं लिखाण मिळाल्यास पाहूं. पल्लव हें नांव पार्थवाचें रूपांतर आहे. इंग्रजींत यांनाच पार्थियन्स (Parthians) असें म्हणतात. यांत मूळ पृथु हा शब्द आहे. हें नांव इक्ष्वाकूपासून पांचव्या पिढीला अयोध्येच्या सूर्यवंशांतील पृथु या प्रसिद्ध राजाचें आढळतें. हा अनेनस नांवाच्या राजामागून गादीवर आला. पण हा वेन नांवाच्या एका दुष्ट राजाचा मुलगा होता असें महाभारत, शांतिपर्व, अध्याय ५९ आणि मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक ४१ यांत उल्लेख आहेत. याशिवाय या वेनाचा कोठें उल्लेख नाहीं. पृथु हा मोठा बलाढ्य सुनीत आणि पृथ्वीवर मोठी सामाजिक, आर्थिक व राजकीय उन्नति करणारा असा युगप्रवर्तक राजा झाला अशी पुराणांत ख्याति आहे. किंबहुना याच्याच नांवावरून पृथ्वी हें नांवहि प्रचारांत आलें; कारण यानें पृथ्वीवरील खांचखळगे बुजवून शेतकीला आरंभ केला असेंहि वर्णन आहे. पार्थव अथवा Parthians कुळालाहि याच राजापासून नांव मिळालें असावें. शूरसेन यादवापासून कुंतिभोज राजानें दत्तक घेतलेली कन्या कुंती ही पांडवांची आई आदिपर्व, अ. ६३ श्लो, ५९ तिचेपासून झालेला पार्थ (अर्जुन) हाहि पार्थवच दिसतो. पृथाश्व नांवाचा एक राजर्षि झाला. सभापर्व, अ. ८-१४ यावरून सूर्य, चंद्र, पृथु, अश्व, इ. वंशांत परस्पर विवाह आणि दत्तकविधि होत असत असें समजतें. आणखी अज्ञ पौराणिक उल्लेख धुंडीत बसल्यास लेखविस्तार फार होईल. आतां या Parthians  ऊर्फ पार्थव अथवा पल्लवांचा ऐतिहासिक काळांत मराठ्यांशीं व राजपुतांशीं कांहीं मेळ जमण्यासारखें कांहीं लिखाण मिळतें कीं काय तें पाहूं.
रॉलिन्सन नांवाच्या एका विद्वान् आणि शोधक इतिहासकारानें Story of the Nations  या पुस्तकमालेंत History of the Parthians (पार्थवांचा इतिहास) नांवाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत पर्थिवांच्या जातीय स्वभावाचीं आणि चालीरीतींचीं विशिष्ट लक्षणें म्हणून खालील पंधरा मुद्दे आपल्या ग्रंथांत प्रसिद्ध केले आहेत. ते उत्तरेच्या राजपुतांशीं व विशेषेंकरून दक्षिणेंतील मराठ्यांशीं इतके जुळतात कीं, ते येथें उद्धृत करणें अगदीं अवश्य वाटतें. हा इतिहासकार हिंदुस्थानांत आला असेल असें वाटत नाहीं. निदान त्याला येथील मराठ्यांची तरी माहिती असण्याचा संभव नाहीं. असें असूनहि त्यानें सहजासहजीं दिलेल्या पार्थवांचीं जातलक्षणें मराठ्यांशीं इतकीं तंतोतंत जुळावींत हें मोठें आश्चर्यकारक व अर्थपूर्ण आहे. त्यांचा उल्लेख केल्याविना या निबंधाची परिपूर्ति होणार नाहीं. म्हणून तो करून आम्ही हा लांबलेला लेख आटपतों. या पार्थवांचें साम्राज्य हिंदुस्थानाच्या वायव्य सरहद्दीवर ख्रिस्ती शकाब्दापूर्वीं थोड्या शतकापर्यंत मोठ्या वैभवानें चालू असल्याचे रॉलिन्सननें सविस्तर वर्णन केंलें आहे. त्यानें वर्णिलेल्या १५ मुद्यांचे मराठ्यांच्या स्वभावाशीं इतकें साम्य आहे कीं, तें त्याच्याच शब्दांत शक्य तितकें देणें भाग आहे. पण विस्तारभयास्तव तसें न करतां त्यांचा थोडक्यांतच मराठी गोषवारा दिला आहे. जिज्ञासूंनीं तें सर्व वर्णन मुळांतूनच वाचावें हें बरें.
Feudal System : मराठ्यांची जहागीरदारी व सरंजामपद्धति पार्थवांमध्यें तशीच होती. पान ७५.
Sophi पंडीत Magi पुरोहित : पार्थव बादशाहीच्या शेवटीं या भिक्षुकशाहीचा शहरांतून आणि खेड्यांतून डोईजडपणा फार झाला. भाग ५, पान ८०.
सत्यशोधक समाज : प्रथम प्रथम पार्थव, हे मागी ऊर्फ मध ब्राह्मणांच्या धार्मिक कह्याखालीं दडपून गेले होते. अग्निपूजा आणि प्रेतें उघड्यावर टाकण्याची चाल त्यांच्यांत होती. पण पुढें त्यांची अग्नीवरील श्रद्धा उडाली. मधांचें वजन नाहिंसें झालें. इतकेंच नव्हे, तर राज्यकारभारांतूनहि त्यांचा हात काढून टाकण्यांत आला. पान ३६४.
मृत राजांचीं देवळें अगर छत्र्या : राजे लोक मेल्याबरोबर त्यांच्या नांवानें देवळें बांधून त्यांत त्यांच्या मूर्तींची पूजा होत असे. त्यांचा संबंध सूर्य-चंद्राशीं भिडविण्यांत येई. (अशीं देवळें अद्यापि इंदूर आणि कोल्हापूर येथें पंचगंगेच्या कांठीं बांधण्यांत येत आहेत.) भाग ५, पान ८५.
सूर्य-चंद्र पूजा : राजघराण्यांतून सूर्य आणि चंद्र यांचीं कुळदैवतें म्हणून पूजा होत असे. भाग २३, पान ३९४.
टांक पूजा : सामान्य लोकांच्या घरांतून-मग त्यांचा संबंध राजघराण्याशीं असला तरी, त्यांच्या देव्हा-यावर पूर्वजांचे टांक ( सोन्यारुप्याच्या पातळ पत्र्याच्या मूर्ति) ठेवण्यांत येऊन त्यांची रोज पूजा होत असे. (मराठ्यांत ही चाल अद्यापि चालू आहे.) पान ३९५.
घोडदळ : पार्थवांमध्यें घोडदळाचे दोन भाग असत. [१] शिलेदाराचें भारी पथक. [२] बारगिरांचें हलकें पथक. चिलखत, भाला, बिचवा, हीं त्यांचीं नेहमींचींच आयुधें असत. पान ३९७.
गनिमी कावा : “Pretending panic, beating a hasty retreat, and scattering in their flight, they endeavoured to induce their foe to pursue hurribly and in disorder, being themselves ready at any moment to turn and take advantage of the least appearance of confusion.” पान ४०३. (ग्रॅंट डफनें मराठ्यांच्या गनिमी काव्याचें यापेक्षां निराळें वर्णन केलें आहे ?)
शमला : “Previously the royal headdress had been a diadem, which was a band encircling the head, and terminating two long ribbons or ends that hung down behind the head on the back.” पान ४५. (आतांच्या ग्वाल्हेर दरबारांतील श्रीमंत फाळके सरदारांच्या पाठीवर लोंबणा-या जोड शमल्यांचें हें खासें वर्णण आहें!)
बुरखा : बायकांमध्यें बुरखा जारी असे. त्यांच्या व्यभिचाराला कडक शासन असे. पुष्कळ बायका करण्याची चाल प्रतिष्ठित झाली होती. काडीमोड होत असे. पान ४१४. (मुसलमानांत या चाली मागाहून पडल्या. मराठ्यांतील पडदा मुसलमानांच्याहून फार जुना ठरतो!)
झनाना : “राणीवसा म्हणजे एक विस्तीर्ण झनाना असून, त्यांतील पट्टराणी लग्नाची व मुख्य मानाची असे. इतर पुष्कळ राण्या व शिवाय रखेल्या असत. सर्वजणी नेहमीं कडक पडद्यांत कोंडलेल्या असत. त्यांना फक्त नातलगांशीं आणि फार तर खोज्यांशीं बोलण्याची परवानगी असे. एकदाच मात्र एका राणीनें मोठा हिय्या करून आपल्या नव-याचीं राज्यसूत्रें आपल्या हातीं घेऊन आपल्या मुलाच्या साहाय्यानें तीं उत्तम रीतीनें चालविलीं.” पान ४०५. (ही एक तत्कालीन ताराबाई किंवा अहल्याबाईच म्हणावयाची!)
सोन्याची शय्या : सोन्याच्या पलंगावर निजण्याचा मान फक्त राजालाच असे. इतरांना सक्तमनाई असे. पान ४०५ (अद्यापि ही मनाई आहेच. श्री. सयाजीरावमहाराज गायकवाड यांनीं आपले पहिल्या नंबरचे सरदार घोरपडे यांना पायांत सोन्याचा तोडा घालण्याचा मान मोठी मेहेरबानी म्हणूनच बहाल केला आहे.)
शिकार : युद्धानंतर सिंहाची व वाघाची शिकार मोठ्या हौसेनें करीत.
नजराणा : भेट घेणा-यांनीं प्रथम भल्या मोठ्या नजराण्याची तयारी करण्याची आवश्यकता असे.
निशेबाजी : निरनिराळ्या कैफांचीं त्यांना व्यसनें असत. पार्थव हे एकंदरींत त्यांचे समकालीन ग्रीक आणि रोमन यांच्यापेक्षां कमी सुधारलेले होते. तथापि प्राचीन इतिहासकार दाखवितात इतका कांहीं हा संस्कृतीचा भेद फार मोठा नव्हता. भाग २३, पान ४१७.

पार्थव, पार्थियन्स, पल्लव, या सर्व नांवांचा औपपत्तिक संबंध, पेहल्लवी (भाषा), पेहलू (बाजू) या शब्दांशीं येतो असें प्रसिद्ध पारशी संशोधक शमसुलउल्मा जमशेटजी मोदी यांनीं मला एका समक्ष भेटींत सांगीतलें. संस्कृतांत पार्श्व म्हणजे बाजू या अर्थाचा शब्द आहे. संस्कृतांतील ‘स’ची किंवा 'ह' ची अवेस्ता भाषेंत ‘त’ अशी परस्पर अदलाबदल होते. उदाहरणार्थ-संस्कृत ऋत = अवेस्त अश (सत्य) संस्कृत मर्त्य  = अवेस्ता मर्श्य (माणूस) या न्यायानें पार्श्वचें पार्थ होणें साहजिक आहे. यावरून पार्थव म्हणजे आर्यांनीं व्यापलेल्या मध्यआशियांतील मोठ्या भागाच्या बाजूबाजूंनीं शिवेवर राहणारें एक राष्ट्र दिसतें. हिराडॉटस, स्ट्रॅबो, इ. ग्रीक आणि रोमन संस्कृतीचे गोडवे गाणारी प्राचीन इतिहासकार मंडळी यांनीं समग्र शक राष्ट्रसमूहाला आर्यांचें नुसतें सामंतचक्र बनविलें आहे. रॉलिन्सन, टॉडप्रभृति आधुनिक इतिहासकार त्याच शकादीनां इतिहासांत त्यांचें योग्य पद परत देऊं पाहात आहेत. हिंदुस्थानांतील राजपूत आणि मराठ्यांनीं तर तें पद स्वतःच्या आपल्या कर्तबगारीनें मिळविलें आहे.

  1. अस्पृश्यांचें राजकारण
  2. अस्पृश्यांची शेतकी परिषद
  3. अशोक आणि वैष्णव धर्म
  4. अमेरिकेंतले शेतकरी
  • 78
  • 79
  • 80
  • 81
  • 82
  • 83
  • 84
  • 85
  • 86
  • 87
Page 83 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी