1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

हिंदुस्थानातील उदार धर्म

धर्म ही बाबत प्रत्येक मनुष्याच्या अंत:करणाची असल्यामुळे आस्थेवाईक मनुष्याचा खरा धर्म सर्वत्र सारखाच असणार. जसजशी मनुष्याची सुधारणा होत जाते तसतशी धर्माच्या प्रगतीची दिशाही सारखीच असते. म्हणून कर्मठपणा आणि हटवाद ह्यांस न जुमानता व्यक्तीचा धर्म, त्याचा उगम जे अंत:करण आणि अंतर्याम ह्यांना अनुसरूनच आहे. ह्या दृष्टाने पाहता पाश्चात्य देशांतील प्रसिद्ध विद्वान मनुष्यांनी हिंदुधर्माची तत्त्वे आणि आदर्श जितक्या मानाने समजून घेतलेले आहेत, तितक्या मानाने पाश्चात्य देशांतील धर्मशास्त्रवेत्त्यांनी घेतलेले नाहीत. परंतु ह्या सभेचा उद्देश व्यक्तीच्या धर्मापेक्षा सामाजिक धर्माविषयी विचार करण्याचा असल्यामुळे किंबहुना, धर्माच्या निरनिराळ्या संस्था होता होईल तो व्यक्तीच्या अनुभवाला आणि अंत:करण-प्रवृत्तीला अनुसरून रहातील असे करण्याचा आहे असे मला वाटते. म्हणून हिंदुस्थानातील नव्या आणि उदार धर्माच्या चळवळीचे वर्णन करण्यापूर्वी तेथील पुरामधर्माची स्थिती कशी आहे ह्याविषयी दोन शब्द सांगतो.

हिंदुस्थानातील जुन्या धर्माची व्यंगे आणि त्याचे दुष्परिणाम पाश्चात्य देशांतल्याहून निराळे आहेत. मागे किंवा आता हिंदुस्थानामध्ये विशिष्ट आणि ठराविक मतांविषयी आग्रह फारसा आढळून येत नाही. धर्मग्रंथांची प्रमाणता मानण्यात येत आहे, परंतु ते सर्व धर्मग्रंथ पुष्कळ वर्षांपूर्वी मृत झालेल्या भाषेमध्ये लिहिले असल्यामुळे आणि त्यांच्या अर्थाची ओढाताम पाहिजे तशी करता येत असल्यामुळे साधारण माणसाच्या मार्गामध्ये धर्मग्रंथाचा फारसा अडथळा येत नाही. उपासनेच्या प्रकाराविषयी पाहू गेले असता ती एक स्थानिक बाब होऊन बसलेली आहे, म्हणजे विशिष्ट काही स्थळे आणि प्रतिमा ह्यांनाच महत्त्व आलेले आहे. देशामध्ये प्राचीन काळापासून पवित्र मानली गेलेली निरनिराळी क्षेत्रे आहेत. शहरोशहरी शृंगारलेली भव्य देऊळे आहेत, इतकेच नव्हे तर घरोघरी देवघर म्हणून एक स्वतंत्र खोली असते, व त्यामध्ये काही निवडक देवांचा देव्हारा असतो. धर्मनियंत्रणाच्या दृष्टीने धर्मसंघ आणि राजकीय संस्था ह्यांचा पाश्चात्य देशांतल्याप्रमाणे राजकीय दृष्ट्या संबंध जुळलेला नाही. किंबहुना, पाश्चात्य देशांतल्याप्रमाणे हिंदुधर्माची संघसंस्था (Church) कधीच बनलेलीही नाही. हिंदुधर्म म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे व हल्ली त्याचे शासन आणि नियमन असंख्य जातीचा जो मोठा एक व्यूह बनलेला आहे त्याचे द्वारा होत आहे आणि त्याचा पाया आध्यात्मिक तत्त्वावर रचलेला नसून सामाजिक आणि कौटुंबिक हितसंबंधावर रचलेला आहे. बुद्धधर्मास हिंदुस्थानातून काढून लावल्यावर ख्रिस्ती शकाच्या आठव्या शतकाच्या सुमारास धर्माचे पहिले मोठे आचार्यपद स्थापण्यात आले असावे असे दिसते. परंतु त्याची कामगिरी आध्यात्मिक गरजा काय आहेत त्या समजून घेऊन त्या भागविण्याची नसून केवळ जातिबंधनाच्याद्वारा हिंदुधर्माच्या ज्या जुन्या समजुती आणि विधी ह्यांची परंपरा शाबूत ठेवणे एवढीच आहे. फक्त ब्राह्मणांना विशेषेकरून त्यातल्या त्यात भिक्षुक मंडळीनाच धर्माची काही विहित कर्मे आचरावी लागतात. इतर चालू वहिवाटीच्या गोष्टी आपापल्या आवडीप्रमाणे करीत असतो. हिंदुस्थानामध्ये ज्याचे खरे जुलमी साम्राज्य चालू आहे तो आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ ह्यांच्यापैकी कोणी नसून चालू वहिवाट हीच होय. थोडे पैसे देऊन उपाध्येबोवाचे तोंड बंद करता येते, थोड्याशा विचारचापल्याने धर्मपुस्तकाची आडकाठी नाहीशी होते, परंतु ख-या धर्माच्या प्रबळ प्रेरणेचे पाठबळ असल्याशिवाय शेवटची जी राक्षसी चालरीत तिला कोण तोंड देऊ शकेल! हिंदू आचार्यांनी थोडीशी स्वतंत्रता दिली आणि सुधारणेला अनुकूल असे एकादे आज्ञापत्रही काढळे तरी बहुजन समाजाने जणू एकाद्या जादूने भारल्याप्रमाणे, जुन्या चालीला जी एकदा दृढ मिठी मारली आहे ती काही केल्या सुटत नाही.

ख्रिस्ती आणि महमदी हे दोन धर्म बाहेरून हिंदुस्थानात आले आहेत; पण त्यामुळे जुन्या घोटाळ्यामध्ये नवीन गोंधळाची भर मात्र पडली आहे. जेथे तद्देशीय साधू-संतांना व सुधारकांना यावे तसे यश प्राप्त झाले नाही, तेथे ज्यांचा कल साहाय्य करण्यापेक्षा जय मिळविण्याकडे विशेष आहे त्यांचे आध्यात्मिक बाबतीत काय चालणार? हिंदूंचा देश दोनदां जिंकला गेला आहे. पण हिंदूंचा धर्म आपली शुद्धी आणि उद्धार कधी होईल ह्याची अद्यापि वाट पहात आहे. ती व्हावयाची म्हणजे कोणत्याही बाहेरून आलेल्या धर्मामुळे होणार नाही, तर आत्म्याच्या खास उत्पत्तिस्थानात उगम पावून सर्व मनुष्यजातीचा जो एक साधारण धर्म निघणार आहे त्यातच होईल.

हिंदुस्थानातील उदार धर्म

ह्या भावी साधारण धर्माची वाट खुली करणारी हिंदुस्थानातील ब्राह्म समाज एक मोठी वैभवशाली शक्ती आहे. ह्या समाजाचा संस्थापक राजा राममोहन रॉय (१७७२-१८३३) हा आधुनिक हिंदचा ज्येष्ठ पुत्र होय. “तो जेव्हा जेव्हा सनातन धर्माविषयी बोलत असे तेव्हा तेव्हा गहिंवरून डोळ्यांतून अश्रू गाळीत असे” असे सांगतात. त्याचा धर्म म्हणजे केवळ एकमत किंवा मनोवृत्तीच नसे तर साक्षात जीवन होता व ते जीवनही सर्व बाजूंचे असे. राजकारण आणि आर्थिक अभ्युद्य, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा ह्या सर्वांसाठई त्याचे जिणे, त्याचा प्रयत्न व त्याचे मरण ही घडली. त्याच्या जिवंत धर्माच्या ह्या निरनिराळ्या आज्ञात जणू होत्या. त्याचा देशाभिमान हे एक त्यांच्या सर्वात्मक वृत्तीचे अंगच होते. ऑस्ट्रियाच्या सैन्याचे नेपल्स येथील लोकांच्या स्वातंत्र्याची आहुती घेतली, तेव्हा १८२१ साली त्यांनी लिहिले आहे की “नेपालिटन लोकांचे हित ते माझे हित व त्यांचे शत्रू ते माझे शत्रू होत.” त्याने ब्रिटिश पार्लमेंटपुढे जो शेवटचा खलिता वाचला त्यात पूर्व आणि पश्चिम ह्यांचा भरतभूमीत जो संगम झाला आहे त्याचे अगदी दूरचे परिणाम कायकाय घडतील ह्याचे भविष्य वर्तवून ठेविले आहे. पूर्व आणि पश्चिम, प्राचीन आणि अर्वाचीन ह्यांचा मिलाफ त्याच्या स्वत:मध्येच चांगलासा झालेला दिसतो. आधुनिक संस्कृतीत जे काय उत्तम आहे. ते शोधून घेण्याचे भरतभूमीत जे कार्य हल्ली घडत आहे त्या कार्याची राममोहन रॉय ही एक मंगलमूर्तीच होय. आणि ब्राह्मसमाज हे त्याचे स्मारक आहे.

कलकत्ता येथे जे पहिले ब्राह्ममंदिर उघडण्यात आले त्याच्या ट्रस्टडीडमध्ये पुढील उल्लेख आहे, “सनातन ईश्वराच्या उपासनेकरिता कोणताही भेद न राखता सर्वांनी जमण्याची जागा..................अचिंत्य परमेश्वर, विश्वाचा कर्ता आणि भर्ता, कोणा मनुष्याने किंवा राष्ट्राने कोणाही विशिष्ट व्यक्तीस दिलेले कोणतेही विशेष नाव असो, त्याने ओळखला न जाणारा”.

ब्राह्मसमाजात कडकडीत सत्य आणि न्याय व सहिष्णुता ह्यांची एकवाक्यता कशी आहे हे जगास जाहीर करण्यास जणू पुढील कलमही त्या डीडमध्ये आढळते, ‘जी एकादी जिवंत अथवा जड वस्तू दुस-या कोणाची तरी उपास्यविषय झालेली असेल तिची, ब्राह्मोपासना चालली असताना कोणीही आपल्या उपदेशात, प्रार्थनेत अथवा पद्यात, निंदा अथवा थट्टा करू नये’.

ज्याअर्थी धर्मबाबतीत ठराविक मते आणि त्यांचा उगम जे उपाध्यायांचे अधिकारी मंडळ ह्या दोन्हींपासून ब्राह्म समाज दूर रहात आहे, त्याअर्थी त्यांची मते काय आहेत व काय नाहीत हे सांगण्याची येथे आवश्यकता उरली नाही. पण त्याच्या धर्म जीवनाची व प्रगतीची जी ढोबळ तत्त्वे आहेत त्यांचा मात्र मी उल्लेख करीत आहे.

(१) सनातनता-“राजा राममोहन रॉय हा तुलनात्मक धर्मशास्त्राचा जगातला पहिला शोधक होय.” असे सर मॉनीयर वुईल्सम्सने म्हटले आहे. जगातील बहुतेक सर्व मुख्य धर्मग्रंथांचे त्यांच्या मूळ भाषेतून परिशीलन केल्याने त्या सर्वांत आपल्या सनातन धर्माची बीजे आढळली. त्याच्या सनातनवाद त्याच्यामागे त्याच्या अनुयायांनी अधिकाधिक प्रचीतीस आणिला आहे. सन १८५० साली महर्षी देवेंद्रनाथाच्या प्रमुखत्वाखाली वेद अभ्रांत आहेत, हे मत समाजाने निखालपणे पण आदरपूर्वक सोडून दिले. आणि त्याचवेळी जगातील सर्व पवित्र वाड्मय ही मनुष्यमात्राची देवाने दिलेली समाईक देणगी असे समजून तिचा स्वीकारही केला. मागाहून २५ वर्षांनी ब्रह्मानंद केशवचंद्र ह्यांनी आपल्या नवविधान शिक्षेत जगातील सर्व देवर्षी, धर्मग्रंथ आणि धर्मसंघ ह्यांची एकवाक्यता कशी होण्यासारखी आहे ते दाखविले. अद्यापिही निरनिराळ्या स्थानिक समाजाच्या वार्षिक उत्सवांतून निरनिराळ्या धर्मसंस्थापकांच्या चरित्रावर सहानुभूतीची व्याख्याने होत असतात. समाजाची ही सर्वात्मकता म्हमजे एकप्रकारची भिक्षुक वृत्ती आहे व समाजाला स्वत:चे असे काहीच नाही असाही आक्षेप बाहेरच्या मंडळीकडून वेळोवेळी येतो. पण त्याची पर्वा न करिता ब्राह्म मंडळी, सर्व धर्मविभूतींशी सहवास आणि त्यांचे शिष्याशी सख्य साधण्यास तत्पर असते.

(२) सयुक्तिकता- वरील सर्वात्मकता ही केवळ एक मनोवृत्ती किंवा विचार न करता सापडेल ते स्वीकारण्याचा प्रयत्न आहे असे नव्हे. आपल्या स्वत:च्या विवेकशक्तीचा उपयोग करण्यास कोणीही ब्राह्म कधी मागे घेत नाही. धर्माध्ययनाच्या सर्व प्रदेशात आधुनिक शोधाचे किती महत्त्व आहे हे तो जाणून असतो व त्याचा स्वीकारही करतो. त्याचे शास्त्र व त्याचा धर्म (विवेक आणि विश्वास) ह्यांच्यामधअये कधी लढा पडत नाही किंवा ही दोन्ही कधी परस्परांपासून अलग राहत नाहीत.

(३) आध्यात्मिकता- परंतु ब्राह्माच्या जाणिवेचा मुख्य उगम आणि आधार म्हटला तर चैतन्यच आहे, त्याचे मन नव्हे, पाश्चात्य बुद्धिवादाचा त्याच्यावर कितीही परिणाम झाला असला तरी त्याला धर्मबाबतीत भाव आणि भक्ती हीच तत्त्वे प्रधान वाटतात. ह्याबाबतीत श्रीमान केशवचंद्र सेन ह्यांच्या चारित्र्याचा परिणाम समाजावर विशेष घडला आहे. ते आपल्या अंतर्मार्गानेच धर्माचा ठाव घेण्याचे कामी एकाद्या नुसत्या भाष्यकारापेक्षाही खोल बुडी मारू शकले किंवा एकाद्या पंडितापेक्षाही वर मजल मारू शकले.

(४) व्यावहारिकता- पूर्ण ब्राह्म व्हावयाचे तर नुसत्या विचाराने किंवा मनोवृत्तीच्या द्वारेच होत येणार नाही. प्रथम स्वत:ला व नंतर जगाला प्रत्यक्ष सेवा करून आपल्या धर्माची प्रतीती दाखवावयाची असते. ब्राह्मांची वेदी म्हणजे आपल्या मनोवृत्तीचे सोहाळे उपभोगावयाचे क्रीडाभुवन, किंबहुना अचिंत्य वस्तूविषयी तर्कवितर्काचे च-हाट वळण्याचे किंवा वादविवादाचे जाळे विणण्याची वखार नव्हे, तर भरतभूमीच्या अभ्युदयाला हल्ली अत्यंत आवश्यक असलेल्या सामाजिक सुधारणेच्या सर्व प्रकारच्या युद्धाचे उघडे समरांगमच होय.

कार्यपद्धती
(५) तडजोड नाही- कित्येक हिंतचिंतकांकडून ब्राह्मांना वेळोवेळी असे भासविण्याचा प्रयत्न होत असतो की ब्राह्मांनी आपली मते हल्लीपेक्षा कमी निस्पृहपणाने प्रतिपादली असता आणि जुन्या लोकांचे जे आचार वरवरचे आहेत त्यांच्याशी अधिक तडजोडीने वागले असता त्यांच्या कामात अधिक यश येण्याचा संभव आहे. पण मूर्तिपूजा आणि विधीचे अवडंबर ह्याचे दुर्भेद्य कवच फोडून आत अडकून राहिलेले धर्मबीज मोकळे करण्याची आज्ञा ब्राह्मसमाजाला वरून झाली आहे अशी जोवर त्याची भावना राहील तोवर त्याला सर्व प्रकारच्या गुळचट मिथ्यावादाला शांतीने व धैर्याने तोंड दिलेच पाहिजे. आपल्या देशाच्या राष्ट्रीयतेचा विध्वंस करणारे असाही आरोप ब्राह्मांवर लादण्यात येतो. तथापि उज्ज्वल सत्य आणि उच्चतर हित ही साधण्यासाठी त्यांना सुधारणे आपले कठीण व्रत निश्चयाने पाळलेच पाहिजे. जैन, लिंगायत, शीख इ. पुष्कळ सुधारक पंथानी प्रथम प्रथम पुराणधर्मावर आपले जोराचे हल्ले केले पण अखेरीस तेही आता त्याच गर्तामध्ये रूतून एकजीव होऊन गेले आहेत. ह्याचे कारण त्यांची मते पूर्वी उदार नव्हती असे नव्हे तर पुढे आपल्या उदार बहाण्यास कायमचे जीवन प्राप्त होईल असा कडकडीतपणा त्यांनी अखेरपर्यंत राखला नाही हेच होय. ब्राह्मसमाजाने आपल्या पुढे हा धडा चांगला ठेविला आहे.

(६) हटवाद नाही – जुन्या मतांविषयी ब्राह्मांची इतकी कडकडीत खबरदारी आहे तरी त्यांच्या स्वत:च्या मतांविषयी त्यांचा दुस-यावर जुलूम किंवा आग्रहही नाही. धार्मिक जीवन आणि त्याची प्रगती ह्यांसाठी कोणत्याही हटवादाची विधित: अथवा निषेधत: आवश्यकता नाही असा ब्राह्मांचा अनुभव आहे. जडशास्त्रांचा अतिशयित नकार आणि धर्मशास्त्रांचा अतिशयित होकार ह्या दोहोंचा अडथळा धर्ममार्गात सारखाच कसा येतो हे ते पूर्ण ओळखून आहेत. एकाद्या घोर कड्याच्या काठाशी एकादे भयचकित अर्भक जसे उबे रहावे, तसाच ब्राह्मही वाचातीत आश्चर्य व आनंद ह्यांनी युक्त अशा अदृश्य ईश्वराचे द्वारी तटस्थ उभा आहे.

(७) पंथ नाही- मताप्रमाणेच संघामध्येही सर्वत्र मोकळेपणा आहे. समाजाची द्वारे सर्वाला सर्वदा खुली आहेत. आत येण्याला कोणास संकोच वाटत असल्यास त्याचेच नशीब!

कार्य
सर्व हिदुंस्थान देशभर शंभराहून अधिक समाज आहेत. समजातील प्रमुख गृहस्थ साप्ताहिक उपासना चालवितात. धंदेवाईक पुरोहित नाहीत. प्रचारक तयार करण्यासाठी सादनाश्रम नावाची एक मध्य संस्था कलकत्त्यास आहे. तत्त्वांचा प्रसार करण्याचे कामी गृहस्थी मंडळीही बराच हातभार लावते. जातिभेद नाहीसा करणे, बालविवाह बंद करणे, स्त्रीशिक्षण वाढविणे आणि विधवाविवाहाची आडकाठी काढणे ह्या व इतर गृहय आणि सामाजिक सुधारणांचा नेटाने ही मंडळी पुरस्कार करते.

इंग्लंड व अमेरिका येथील युनिटेरिअन लोकांनी ब्राह्मांची पूर्वीपासूनच फार सहानुभूती आहे. अलीकडे लंडन येथील ब्रिटिश अंड फॉरेन युनिटेरिअन असोसिएशन आपल्या खर्चाने हिंदुस्थानातील ब्राह्म विद्यार्थ्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात तुलनात्मक धर्माध्ययनाची सोय करून व आपले प्रतिनिधी हिंदुस्थानात पाठवून उदारधर्माचे कार्य व राष्ट्राराष्ट्रांतील सख्य बरेच वाढवीत आहेत.

आर्यसमाज

ही एक दुसरी एकेश्वरी धर्माची मोठी चळवळ आहे. ह्याची संस्थापना स्वामी द्यानंद सरस्वती (१८२४-१८८३) ह्यांनी १८७५ त केली. ह्यांनी आधुनिक हिंदुस्थानाचा लूथर असे म्हणता येईल. ह्यांनी पुराणमतवादी पंडितांशी कडाक्याचा वाद चालविला, आणि मूळ वेदांच्या चार संहितांशिवाय इतर सर्व हिंदुधर्मग्रंथांचे प्रामाण्य झुगारून दिले. ह्या चार वेदांवरच त्यांनी आपल्या एकेश्वरी मताची मदार रचिली. वेदांचा अर्थ लावायचा तो यास्काचार्याच्या अनुसारेच (इ.स. पूर्वी ५००) लावावा, असा ह्यांचा आग्रह होता. मागाहून ह्या अर्थाचा कसा घोटाळा करण्यात आला आहे, हे त्यांनी निर्भयपणाने प्रतिपादले. स्वामी द्यानंद सरस्वतींचे अनुयायी आपल्याला आर्य म्हणवीत आहेत, ते जरी वेदांच्या प्रामाण्याला अद्यापि चिकटून आहेत तरी त्यांचा ते अशा खुबीने अर्थ लावितात की, आधुनिक विचाराशी त्यांचा कसा तरी जम बसेलच. मूर्तिपूजेचा निषेध, ईश्वराचे ऐक्य व शुद्ध स्वरूप आणि सामाजिक सुधारणेची सर्व अंगे ह्यांमध्ये आर्यांचा ब्राह्मांइतकाच जोराचा व निष्कपट पुढाकार आहे. ते जरी वेदप्रामाण्य मानतात, तरी केव्हा केव्हा त्यांची मजल सार्वत्रिक धर्माच्या अगदी उच्च शिखरापर्यंत जाऊन पोहोचते, हे लाला रालाराम ह्यांच्या पुढील उद्गारावरून दिसून येण्यासारखे आहे, “ ख्रिस्ताने सांगितलेले धर्माचे उदात्त आदर्श-ख्रिस्त्यांनी नव्हे, आर्यसमाज स्वीकारीत आहे. तलवारीने पसरण्यात आलेला इस्लाम नव्हे तर सर्व विश्वासियांसी शांतीने व प्रीतीने राहणारा व ईश्वरास शरण जाण्यास लावणारा इस्लामी धर्म आर्यसमाज अगदी आपला असा म्हणत आहे. बुद्धाची अंत:शुद्धी, वैराग्य आणि उच्चनीती ही तर आर्यसमाजाची वारशाची मिळकतच आहे. एकंदरीत दैवी पितृत्व व मानवी बंधुत्व हाच धर्म आर्यसमाज सांगत आहे.”

वेदांसंबंधी त्यांचा जो विशेष कटाक्ष आहे. त्यामुळे, आर्याच्या ज्या प्राचीन ग्रंथांची आज कित्येक शतके हेळसांड होत आहे, त्याकडे राष्ट्राचे आता नवीन लक्ष लागू लागले आहे. व त्याचे नीट अध्ययन होऊ लागले आहे. २५ वर्षांच्या थोड्या अवकाशात विचारसंघटना, आणि प्रचार इ. बाबतीत आर्यांनी अगदी आश्चर्यकारक मजल मारली आहे. हल्ली २५० आर्यसमाज आहेत. तरूणांना शिकविण्यासाठी व प्रचारक तयार करण्यासाठी त्यांच्या दोन मोठ्या संस्था आहेत. ख्रिस्ती व महमदी लोकांतूनही ते आपले सभासद करून घेतात.

थिऑसॉफिकल सोसायटी

ही एक तिसरी मोठी चळवळ आहे. जरी ही चळवळ प्रथम अमेरिकेत निघाली, तरी हीची मूळ प्रेरणा पूर्वेकडूनच आली हे. व आता तर हिचे मुख्य ठाणे हिंदुस्थानच वसविण्यात आले आहे. हिची गूढ मते व हटवाद एका बाजूस ठेवून पाहिले असता हिच्याकडूनही प्रगतीचे शुभ कार्य बरेच होत आहे, असे आढळून येईल – (१) विश्वबंधुत्व, (२) वर्तुलात्मक धर्म, तत्त्वज्ञान व शास्त्र ह्यांचे अध्ययन वाढविणे ह्या दोन हेतूंना अनुसरून ह्या मंडळीत असंख्य हिंदू, पार्शी, मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध ह्यांचा शिरकाव झाला आहे, व त्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. ह्या मंडळीत दाखल झाल्यावरही ह्या निरनिराळ्या शिष्यांना आपापले पूर्वाश्रम जसेच्या तसेच शाबूत राखता येत आहेत ही एक ह्या मंडळीची प्रौढी आहे व बाहेरच्यांना कोडे आहे. तथापि ज्या अर्थी ह्या मंडळीच्या प्रयत्नामुळे निरनिराळ्या मनुष्यवर्गांमध्ये आध्यात्मिक जागृती, धर्मसंबंधी सहिष्णुता आणि परस्पर परिचय वाढत आहे, त्याअर्थी प्रगतीचा अभिमान बाळगणा-या सर्वांनी ह्या मंडळीचे स्वागतच करणे योग्य आहे. पुराणमतांचे जे शुष्क सांगाडे पडून राहिले आहेत, त्यांवर ह्यांनी चालविलेली हातचलाखी व अतींद्रिय प्रदेशातील त्यांच्या धाडसी भरा-या आणि सुलभ संचार ही सर्व पाहून जरी बरेच वेळां ह्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मन साशंक होते, तरी ह्या मंडळीचे हिंदुस्थानातील पुढारी मिसेस बिझांट आणि कर्नल ऑलकॉट ह्यांच्या हेतूविषयी शंका घेण्यास जागा दिसत नाही. उलट काशी येथील सेंट्रल हिंदू कॉलेज आणि मद्रासेतील पारिया मुलांकरिता काढिलेल्या शाळा वगैरे ह्यांचे लोकोपकाराचे व्यावहारिक आणि कळकळीचे प्रयत्न पाहून सर्वांना आदर वाटण्यासारखा हे.

गेल्या २० वर्षात सर्व जगात ह्या मंडळीची ७१४ ठाणी स्थापण्यात आली आहेत, पैकी २२२ हिंदुस्थानात आहेत.

ह्या तिन्ही चळवळींचा उगम आणि ह्यांचे चालू कार्यही एकमेकांपासून अगदी अलग आहे. ह्यांपैकी ब्राह्मसमाजाची दिशा प्रस्तुत (युनिटेरिअन) महासभेच्या धोरणाला अगदी अनुकूल आहे असे मला वाटते. दुस-या दोन्ही चळवळीदेखील ज्याअर्थी आमच्या विरूद्ध नाहीत त्याअर्थी आमच्याच पक्षाच्या आहेत, असे समजण्यास हरकत नाही. आमच्या परस्परांतील ऐक्य जे आज आम्हांस  दिसत नाही, ते पुढे दिसून येईल.

मध्यंतरी माझा भरंवसा असा आहे की, हल्लीपेक्षा ब्राह्मसमाजाची संघटना अधिक नेटाने झाल्यास, पौरस्त्य खंडात अधिक विस्तृत प्रमाणावर शुभ कार्य साधण्यासाठी ब्राह्मसमाज ही एक उत्तम भूमिका मिळेल. हे शुभ कार्य म्हणजे एका बाजूस ब्रह्मदेश, सयाम, सिलोन आणि जपान येथील उदार बौद्ध व दुस-या बाजूस हिंदुस्थानातील उदार मुसलमान आणि इराणातील बाबी पंथानुयायी ह्यांच्यामध्ये घडवितायेणारे सख्य व सहकार्य हे होय. आता देखील ह्या उदार चळवळी आशिया खंडात आपापले कार्य अलग राहून करीत आहेत, न जाणो भावी ऐक्याकडेच त्या मार्ग शोधीत आहेत! आमची तशी इच्छा असल्यास, हे दिव्य स्वप्न सफल करण्याकरिता पूर्व आणि पश्चिम ह्यांचे सहकार्यच झाले पाहिजे. जुन्या ख्रिस्ती धर्माने दुस-या तितक्याच, किंबहुना जास्त जुन्या व हट्टी धर्माशी विनाकारण डोईफोड चालविली आहे. ह्यापुढे उदार ख्रिस्तीधर्माने निरनिराळ्या तद्देशीय उदार प्रयत्नामुळे नवीन हुरूप धरून त्यांच्या खांद्याला खांदा लावावा. पुढे होणारे युद्ध हे अमुक वाद व तमुक धर्म ह्यांमध्य नसून एकापक्षी सर्व जुन्या धर्माची शुष्क हाडे व दुस-या पक्षी धर्माचे रसभरीत व उचंबळणारे जीवन ह्यांमध्ये होणार आहे. प्रस्तुत महासभा ही आगामी युगाची मोठी पताका आहे, असा आमचा भरंवसा आहे.

लाहोर येथील धर्मपरिषद

ब्राह्मपरिषदेचे जे तीन मुख्य हेतू (१) नाताळच्या सुट्टीतील राष्ट्रीय महोत्सवात निरनिराळ्या प्रांतांतून जे ब्राह्म एकत्र जमतात व जमण्यासारखे असतात, त्यांमध्ये विशेष परिचय व दळणवळ घडवून आणणे, (२) ह्या महोत्सवात इतर जो मोठा जमाव जमतो त्याच्या निदर्शनास ब्राह्मसमाजाचे उद्देश आणि तत्त्वे आणून देणे, (३) जेणेकरून ब्राह्मसमाजाची बढती होईल अशा हितकर उपायांची चर्चा करून ठराव पास करणे, ह्यांपैकी तिस-या हेतूसंबंधी बरेच काम ह्या वर्षी शांततेने आणि समाधानपूर्वक करण्यात आले.

परिषदेचे अध्यक्ष प्रो. विनयेंद्रनाथ सेन हे होते. ता. २७ डिसेंबर सोमवार सकाळी परिषदेची पहिली बैठक भरली. रा. रा. वि. रा. शिंदे ह्यांनी जनरल सेक्रेटरी ह्या नात्याने प्रथम प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी सांगितले की, परिषदेची मूळ कल्पना, प्रथम मुंबईस सन १८८९ च्या राष्ट्रीय परिषदेच्या वेळी निघाली. तेव्हापासून १९०४ पर्यंत परिषदेचे काम केवळ पहिल्या हेतूने आणि अनियमितपणाने कसे तरी झाले व तेही मुंबई, कलकत्ता, मद्रास अशा मुख्य शहरांत तेथील समाजामुळे झाले.

सन १९०३ साली मद्रास येथील परिषदेची परमावधीची हेळसांड पाहून ती अधिक व्यवस्थित रीतीने व मोठ्या प्रमाणावर भारत ब्राह्मपरिषद भरविण्याचा रा. शिंदे ह्यांनी निश्चय केला व त्याप्रमाणे मुंबई प्रार्थनासमाजाच्या आश्रयाखाली पहिली व्यवस्थित परिषद भरली. त्यावेळी ब-याच निरनिराळ्या ब्राह्म व प्रार्थना समाजांकडून प्रतिनिधी बोलविण्यात आले होते व चर्चेसाठी विषयही सुचविले गेले होते. अशा रीतीने काशी, कलकत्ता, सुरत, मद्रास ह्यांही ठिकाणी क्रमाने दरसाल परिषदा घेण्यात आल्या आणि शेवटी लाहोरला ही परिषद भरविण्यात आली होती.

एवढ्या अवधीत प्रौढी मिरवण्यासारखा एकादा मोठासा कार्यभाग उरकला आहे असे कोणालाही जरी वाटण्यासारखे नसले तरी निराश होण्याचेही कारण नाही. समाजाच्या अभिवृद्धीसंबंधी बरेच ठराव वेळोवेळी पास झाल्यामुळे काही महत्त्वाच्या बाबतीत सर्वसाधारण मत ठामपणे प्रदर्शित झाले आहे. समाजाच्या सामान्य गरजा व उणिवांची सर्वांना कल्पना आलेली आहे. परिषदेची हिंदुस्थानातून एक फेरी पूर्ण झाली व लवकर दुसरी सुरू करणे आवश्यक भासू लागले.

वेळोवेळी पास झालेले ठराव अंमलात आणावयाचे झाल्यास स्वत: परिषदेलाच काही तरी सनदशीरपणा आला पाहिजे. परिषदेचे कायमचे दप्तर, कायमचा फंड व काही कायमचीच तिला वाहिलेली माणसे तयार झाली पाहिजेत. परिषद अशीच पुढे ढकलीत नेण्यात काही अर्थ नाही. ह्या संबंधाने मद्रासच्या परिषदेत श्रीगणेशा झाला होता आणि वर्षभर काम चालू ठेवण्यास जनरल सेक्रेटरींना ३०० रूपये देण्यात यावेत असे ठरले. पण ही जबाबदारी अविनाशचंद्र मुजुमदार ह्यांनीच घेतल्यामुळे त्यांना ती पार पाडता आली नाही. म्हणून ती आता सर्वानाच घेणे भाग आहे.

रा. शिंदे ह्यांच्या वरील भाषणावर सुमारे दोन तास चर्चा झाली आणि शेवटी असे ठरले की, परिषदेची सनदशीर व्यवस्थेविषयी प्रत्यक्षपणे वाटाघाट करण्याचा काळ आताच आलेला नाही. तरीपण परिषदेच्या पुढील कामासंबंधी दिग्दर्शन करण्याच्या हेतूने काही त्रोटक सूचना दुस-या दिवशीच्या बैठकीत आणण्यासाठी प्रो. विनयेंद्रनाथ सेन ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक सब्-कमिटी नेमण्यात आली. त्या समितीवर सेक्रेटरी म्हणून रा. वि. रा. शिंदे ह्यांची निवड झाली.

त्याच दिवशी सायंकाळी ह्या सब्-कमिटीची बैठक होऊन तिने खालील सूचना एकमताने मान्य केल्या:

(१) पूर्वीप्रमाणे परिषद राष्ट्रीय सभेबरोबरच भरावी.
(२) स्टॅडिंग कमिटीने काही योग्य आणि निवडक विषयांचा तक्ता तयार करून त्यावर निरनिराळ्या समाजांच्या प्रतिनिधींकडून निबंध मागवावेत व परिषदेत वाचल्यावर पसंतीप्रमाणे प्रसिद्ध करावेत.
(३) जाहीर सभा, मेळे, पुस्तके वाटणे इ. द्वारा ब्राह्मधर्माच्या तत्त्वाच्या प्रसारार्थ परिषदेच्या ठिकाणी व वेळी प्रयत्न करावेत.
(४) सामाजिक मेळे, कौटुंबिक उपासना, सहली वगैरेंच्या द्वारा निरनिराळ्या प्रांतांतून आलेल्या पाहुण्यांमध्ये दळणवळण वाढविण्याचे उपाय योजावे.
(५) पुढील परिषद अलाहाबाद येथे स्टँडिंग कमिटीच्या सल्ल्याने भरविण्याची तजवीज करण्याकरिता बाबू अविनाशचंद्र मुजुमदार ह्यांना विनंती करण्यात यावी.
(६) दुस-या दिवशीच्या बैठकीत हे ठराव पास झाले. नं. ३ व ४ ह्यांतील कामे ज्या ठिकाणी स्वागत कमिटी असेल तेथे तिच्या सल्ल्याने करावी असाही ठराव पास झाला. ह्याशिवाय,
(७) अमेरिका व इंग्लंडमधून उदार धर्माचे काही प्रतिनिधी १९१०-११ साली पृथ्वीपर्यटनास निघून हिंदुस्थानात मुंबई, बनारस व कलकत्ता येथे येऊन व्याख्यान देणार आहेत. त्या प्रतिष्ठित पाहुण्यांच्या आगमनाचा लाभ निरनिराळ्या समाजांनी घ्यावा अशी ही परिषद शिफारस करीत आहे.
(८) श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्यांनी वेळोवेळी ब्राह्मधर्मासंबंधी सहानुभूती दर्शवून व यंदा आपल्या दोघा कामदारांना परिषदेत प्रतिनिधी म्हणून पाठविल्याबद्दल परिषद समाधान व्यक्त करीत आहे.
(९) सन १८७२ च्या विवाहासंबंधाच्या तिस-या अँक्टसंबंधी सरकारकडून काय सुधारणा घडवून आणणे शक्य आहे हे समजून घेण्याकरिता कलकत्ता येथील ब्राह्मसमाज कमिटीने नामदार एस. पी. सिंह ह्यांजकडे एक डेप्युटेशन पाठवावे अशी सदर कमिटीस विनंती करण्यात यावी.
(१०) सरकारी विद्याविषयक संस्थांतून योग्य रीतीने नीतिशिक्षण देण्याची तजवीज करण्यात यावी, अशा अर्थाची हिंदुस्थान सरकारास विनंती करण्यात यावी.
(११) मोघोत्सवाबद्दल सर्वत्र सुट्टी असावी, अशाबद्दलचा ठराव पास झाला.

त्यानंतर हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतांतील १२ गृहस्थांची एक स्टँडिंग कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीचे जनरल सेक्रेटरी रा. रा. वि. रा. शिंदे आणि बाबू अविनाशचंद्र मुजुमदार हे होते. कमिटीच्या सर्व सभासदांनी वार्षिक खर्चासाठी प्रत्येकी २५ रूपये वर्गणी जमवून जनरल सेक्रेटरीकडे पाठवावी असाही ठराव पास झाला.

लाहोर येथील धर्म परिषद

ब्राह्म परिषदेचे जे तीन मुख्य हेतू (१) नाताळच्या सुट्टीतील राष्ट्रीय महोत्सवात निरनिराळ्या प्रांतांतून जे ब्राह्म एकत्र जमतात व जमण्यासारखे असतात त्यांमध्ये विशेष परिचय व दळणवळण घडवून आणणे (२) ह्या महोत्सवात इतर जो मोठा जमाव जमतो त्याच्या निदर्शनास ब्राह्म समाजाचे उद्देश आणि तत्त्वे आणून देणे (३) जेणेकरून ब्राह्म समाजाची बढती होईल अशा हितकर उपायांची चर्चा करून ठराव पास करणे. ह्यांपैकी तिस-या हेतूसंबंधी बरेच काम ह्या वर्षी शांततेने आणि समाधानपूर्वक करण्यात आले.

परिषदेचे अध्यक्ष प्रो. विनयेंद्रनाथ सेन हे होते. ता. २७ डिसेंबर सोमवार सकाळी परिषदेची पहिली बैठक भरली. रा. रा. वि. रा. शिंदे ह्यांनी जनरल सेक्रेटरी या नात्याने प्रथम प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी सांगितले की, परिषदेची मूळ कल्पना प्रथम मुंबईस सन १८८९ च्या राष्ट्रीय परिषदेच्या वेळी निघाली. तेव्हापासून १९०४ पर्यंत परिषदेचे काम केवळ पहिल्या हेतूने आणि अनियमितपणाने कसे तरी झाले व तेही मुंबई, कलकत्ता, मद्रास अशा मुख्य शहरात तेथील समाजामुळे झाले.

सन १९०३ साली मद्रास येथील परिषदेची परमावधीची हेळसांड पाहून ती अधिक व्यवस्थित रीतीने व मोठ्या प्रमाणावर भारत ब्राह्म परिषद भरविण्याचा रा. शिंदे ह्यांनी निश्चय केला व त्याप्रमाणे मुंबई प्रार्थना समाजाच्या आश्रयाखाली पहिली व्यवस्थिती परिषद भरली. त्यावेळी ब-याच निरनिराळ्या ब्राह्म व प्रार्थना समाजांकडून प्रतिनिधी बोलाविण्यात आले होते व चर्चेसाठी विषयही सुचविले गेले होते. अशा रीतीने काशी, कलकत्ता, सुरत, मद्रास याही ठिकाणी क्रमाने दरसाल परिषदा घेण्यात आल्या आणि शेवटी लाहोरलाही परिषद भरविण्यात आली.

एवढ्या अवधीत प्रौढी मिरविण्यासारखा एकादा मोठासा कार्यभाग उरकला आहे असे कोणालाही जरी वाटण्यासारखे नसले तरी निराश होण्याचेही कारण नाही. समाजाच्या अभिवृद्धीसंबंधी बरेच ठराव वेळोवेळी पास झाल्यामुळे काही महत्त्वाच्या बाबतीत सर्वसाधारण मत ठामपणे प्रदर्शित झाले आहे. समाजाच्या सामान्य गरजा व उणिवांची सर्वांना कल्पना आलेली आहे. परिषदेची हिंदुस्थानातून एक फेरी पूर्ण झाली व लवकर दुसरी सुरू करणे आवश्यक भासू लागले.

वेळोवेळी पास झालेले ठराव अंमलात आणावयाचे झाल्यास स्वत: परिषदेलाच काही तरी सनदशीरपणा आला पाहिजे. परिषदेचे कायमचे दप्तर, कायमचा फंड व काही कायमचीच तिला वाहिलेली माणसे तयार झाली पहिजेत परिषद अशीच पुढे ढकलीत नेण्यात काही अर्थ नाही. ह्या संबंधाने मद्रासच्या परिषदेत श्रीगणेशा झाला होता आणि वर्षभर काम चालू ठेवण्यास जनरल सेक्रेटरींना ३०० रूपये देण्यात यावे असे ठरले पण ही जबाबदारी अविनाशचंद्र मुजुंमदार ह्यांनीच घेतल्यामुळे त्यांना ती पार पडता आली नाही. म्हणून ती आता सर्वानाच घेणे भाग आहे.

रा. शिंदे यांच्या वरील भाषणावर सुमारे दोन तास चर्चा झाली आणि शेवटी असे ठरले की, परिषदेची सनदशीर व्यवस्थेविषयी प्रत्यक्षपणे वाटाघाट करण्याचा काळ आताच आलेला नाही तरीपण परिषदेच्या पुढील कामासंबंधी दिग्दर्शन करण्याच्या हेतूने काही त्रोटक सूचना दुस-या दिवशीच्या बैठकीत आणण्यासाठी प्रो. विनयेंद्रनाथ सेन ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक सब-कमिटी नेमण्यात आली. त्या समितीवर सेक्रेटरी म्हणून रा. वि. रा. शिंदे ह्यांचीच निवड झाली.

त्याच दिवशी सायंकाळी ह्या सब-कमिटीची बैठक होऊन तिने खालील सूचना एकमताने मान्य केल्या.

(१) पूर्वीप्रमाणेच परिषद राष्ट्रीय सभेबरोबरच भरावी.
(२) स्टँडिंग कमिटीने काही योग्य आणि निवडक विषयांचा तक्ता तयार करून त्यावर निरनिराळ्या समाजांच्या प्रतिनिधींकडून निबंध मागवावेत व परिषदेत वाचल्यावर पसंतीप्रमाणे प्रसिद्ध करावेत.
(३) जाहिर सभा, मेळे, पुस्तके वाटणे इ. द्वारा ब्राह्म धर्माच्या तत्वाच्या प्रसारार्थ परिषदेच्या ठिकाणी व वेळी प्रयत्न करावेत.
(४) सामाजिक मेळे, कौटुंबिक उपासना, सहली वगैरेंच्या द्वारा निरनिराळ्या प्रांतांतून आलेल्या पाहुण्यांमध्ये दळणवळण वाढविण्याचे उपाय योजावे.
(५) पुढील परिषद अलाहाबाद येथे स्टँडिंग कमिटीच्या सल्ल्याने भरविण्याची तजवीज करण्याकरिता बाबू अविनाशचंद्र मुजुमदार ह्यांना विनंती करण्यात यावी.

दुस-या दिवशीच्या बैठकीत हे ठरावव पास झाले. नं. ३ व ४ ह्यांतील कामे ज्याठिकाणी स्वागत कमिटी असेल तेथे तिच्या सल्ल्याने करावी असाही ठराव पास झाला ह्याशिवाय-
(७) अमेरिका व इंग्लंड मधून उदार धर्माचे काही प्रतिनिधी १९१०-११ साली पृथ्वीपर्यटनास निघून हिंदुस्थानात मुंबई, बनारस व कलकत्ता येथे येऊन व्यख्यान देणार आहेत. त्या प्रतिष्ठित पाहुण्यांचा आगमनाचा लाभ निरनिराळ्या समाजांनी घ्यावा अशी ही परिषद शिफारस करीत आहे.
(८) श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्यांनी वेळोवेळी ब्राह्मधर्मासंबंधी सहानुभूति दर्शवून व यंदा आपल्या दोघा कामगारांना परिषदेला प्रतिनिधी म्हणून पाठविल्याबद्दल परिषद समाधान व्यक्त करीत आहे.
(९) सन १८७२ च्या विवाहासंबंधाच्या तिस-या अँक्टसंबंधी सरकारकडून काय सुधारणा घडवून आणणे शक्य आहे हे समजून घेण्याकरिता कलकत्ता येथील ब्राह्मसमाज कमिटीने नामदार एस. पी. सिंह यांजकडे एक डेप्युटेशन पाठवावे अशी सदर कमिटीस विनंती करण्यात यावी.
(११) माघोत्सवाबद्दल सर्वत्र सुट्टी असावी अशा बद्दलचा ठराव पास झाला.

त्यानंतर हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतांतील १२ गृहस्थांची एक स्टँडिंग कमिटी नेमण्यात यावी आणि त्या कमिटीचे जनरल सेक्रेटरी रा. रा. वि. रा. शिंदे आणि बाबू अविनाशचंद्र मुजुमदार हे होते. कमिटीच्या सर्व सभासदांनी वार्षिक खर्चासाठी प्रत्येकी २५ रूपये वर्गणी जमवून जनरल सेक्रेटरीकडे पाठवावी असाही ठराव पास झाला.

लंडन शहर

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. १०-१-१९०२

आमच्या कॉलेजास नाताळची रजा मिळाल्याबरोबर ती लंडन येथे घालवावी म्हणून तिकडे निघालो. ज्या पाश्चात्य सुधारणेचे गोडवे आपण शाळांतून, कॉलेजांतून, ग्रंथांतून, गुरूमुखांतून ऐकतो-इतकेच नव्हे, तर जे हे सुधारणाचक्र, खाऊन पिऊन घरी स्वस्थ राम राम म्हणत बसणा-या आमच्या साध्याभोळ्या राष्ट्रास आज सुमारे १०० वर्षे सारखे चाळवीत आहे. त्याची काही कळसत्रे वरील अचाट शहरात दिसतील ती पहावी असा एक हेतू निघतेवेळी मनात दडून राहिला होता. कारण, ऑक्सफर्डचे विद्यापीठ हे एक थोरले आश्रम असल्यासारखे आहे. येथे विद्याव्यासंगाशिवाय दुस-या कसल्याही भानगडीचे वारे नाही. आणि आधुनिक सुधारणारूपी चीज तयार होण्याची लंडनएवढी मोठी वखार तर जगात दुसरीकडे कोठे नाही. तेव्हा निघताना माझ्या मनात वरील हेतू असणे साहजिक आहे. पण लंडन येथे गेल्यावर निराळाच प्रकार झाला! सुधारलेल्या उद्योगी लोकांचे ५६ लाख वस्तीचे हे मुख्य शहर. ह्यात प्रथम गेल्याबरोबर मानवी महासागरात आपण जणू गटांगळ्या खातो आहो की काय असे वाटू लागते! आमच्याकडील पारमार्थिक कवींनी भवसागराविषयीची आपली भीती वारंवार प्रदर्शित केली आहे. त्यांपैकी एकादा जर ह्या साक्षात भवसागरात येऊन पडला, तर बिचा-याची कोण त्रेधा उडून जाईल! कुठल्याही रहदारीच्या रस्त्यात गेल्याबरोबर स्त्री-पुरूषांच्या लाटांवर लाटा थडकत असताना पाहून जगावर मनुष्यप्राणी सवंग झाला आहे, असे वाटते आणि त्याविषयी फारशी पूज्यबुद्धी राहत नाही. शेकडो मंडळ्या, हजारो संस्था, अनेक भानगडी व असंख्य चळवळी, सार्वजनिक हिताकरिता चाललेल्या आहेत हे गाईडबुकावरून कळते. पण त्या कोणत्या आहेत व त्यांचे ह्या जनसमूहावर काय कार्य घडते, ह्याचा काही बोध होत नाही. अशा स्थितीत माझ्या वरील हेतूची काय वाट झाली असावी, हे निराळे सांगावयास नको. शिवाय स्पेन्सरने आपल्या ‘समाजशास्त्राचे अध्ययन’ ह्या ग्रंथात लिहिलेले आठवते की कोणी एक फ्रेंच प्रवासी इंग्लंडात येऊन आठ दिवस राहिल्यावर त्यास इंग्रजांविषयी एक ग्रंथ लिहावा असे वाटून तो लिहू लागला. एका महिन्याने त्याच्या मतांविषयी त्यालाच खात्री वाटेना. एक वर्षभर राहिल्यावर तर ग्रंथ लिहिण्याचे काम त्याने अजीबात टाकून दिले! तात्पर्य विश्रांतीकरिता मिळालेल्या सुटीत नुसते तर्क लढविण्याची दगदग न करिता ह्या अक्राळविक्राळ शहरात नजरेस पडतील ते चमत्कार मुकाट्याने पाहण्याचा मी निश्चय केला!

कार्थेज, कैरो, बगदाद, रोम इ. जगाच्या इतिहासावर परिणाम घडविणारी जी प्रचंड शहरे झाली, त्याच तोडीचे पण त्या सर्वाहूनही मोठे लंडन हे होय. आणि ह्याचा प्रताप हल्ली कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे सर्व जगाला भोवत आहे. लोकसंख्येच्या मानाने हे आस्ट्रेलिया खंडापेक्षा सव्वा पटीने मोठे आहे. स्कॉटलंड व वेल्स दोहोंची लोकवस्ती मिळविली तरी इतकी होत नाही. २० वर्षांपूर्वी ह्याच्या भोवती जी खेडी होती ती आता ह्यातील रस्ते झाले आहेत. तरी अद्यापि हे वणव्याप्रमाणे आसमंतात झपाट्याने पसरत आहे. ह्या शहरात वाहनांची जी अचाट योजना केली आहे, तिजकडे परकीयांचे लक्ष आधी जाते. काही आगगाड्या जमिनीवरून धावतात, काही उंच कमानीवरून हवेतून धावतात, तर काही जमिनीखालून खोल बोगद्यातून धावतात. टैम्स नदीवरून एकादी आगगाडी पाखरासारखी फडफडते, तर पाण्याखालून एकदी सरपटते! ह्याशिवाय ट्रॅमबे, ऑम्नीबस् व साध्या गाड्या ह्यांची तर रस्त्यात खेचाखेची! अगदी नुकतीच एक सेंट्रल लंडन रेल्वे म्हणून ८० फूट खोल भुईतून जाणारी विजेची गाडी झाली आहे. प्रत्येक स्टेशनावर उतारू लोकांस लिफ्टने खाली सोडतात व वर घेतात. आतील स्टेशनावर प्रकाशाची व हवेची इतकी सुंदर व्यवस्था केली आहे की, वरच्यापेक्षा खालीच बरे वाटते. तीन-तीन मिनिटांनी एक गाडी अकस्मात् पुढे येते आणि हजारो लोकांना घेऊन एका मिनिटात पसार होते. ही परंपरा सकाळपासून रात्रीच्या १२ पर्यंत घड्याळातील काट्याप्रमाणे नियमाने चालू असते. लंडनच्या जमिनीत खाली कोठे काय आहे हे सांगवत नाही. विजेच्या दिव्यांच्या तारा, धुराच्या दिव्यांच्या तोट्या, पाण्याचे बंब, मैल्याची गटारे आणि आगगाडीचे बोगदे ह्यांनी सगळी जमीन मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे पोखरली आहे. खाली जमिनीत ही नकशी, वरती हवेतून टेलिग्राफ व टेलिफोनचे जाळे पसरले आहे. जागजागी टेलिफोनची ठिकाणे आहेत. त्यांतून जरूरीचे निरोप जाऊन लगेच उत्तर येते, अगर दोघांचे संभाषण चालते.

ह्याप्रमाणे लंडन नावाचे २००-३०० चौरस मैल क्षेत्रफळाचे एक सावयवी शरीर आहे!

इंग्लंड हे बोलून चालून व्यापा-यांचे राष्ट्र. अर्थात त्याचे मुख्य शहर म्हणजे सर्व जगाचे एक भले मोठे मार्केट. तेव्हा त्यातील दुकाने पाहण्यासारखी असतील ह्यात नवल काय? माल तर मोहक खराच. पण तो दुकानात मांडून ठेवण्याची ढब त्यातून मोहक. आमच्याकडील दुकानदार आपल्या मालाचे ढीगाचे ढीग दुकानात लपवून ठेवून आपण दाराशी येऊन बसतात. एकाद्यास वाटावे हे जणू रखवालीच करीत आहेत. इकडे काही निराळाच प्रकार. दुकान म्हणजे एक जंगी पारदर्शक पेटी—अथवा पदार्थसंग्रहालय—अगर एक लहानसे प्रदर्शनच. रस्त्यातून धावतानादेखील दुकानातील सर्व जिन्नस किंमतीसहित दिसतील. हिंदुस्थानात मागे एकदा प्रदर्शनाकरिता मेणाचे सुंदर पुतळे आणले होते, तसले पुतळे येथे प्रत्येक कापडवाल्याच्या दुकानात उभे केलेले असतात. आणि त्यांवर दुकानातील पोशाकाचे मासले चढविलेले असतात. पुतळ्यांकडे पाहून पोशाक घेण्याची इच्छा सहज होते. काळोख पडल्यावर प्रत्येक पदार्थाजवळ एक एक बिजलीची बत्ती चमकू लागते. दुकानावरच्या ज्या पाट्या आणि जाहिराती दिवसा शाईने लिहिलेल्या दिसतात, त्या रात्री दिव्याने अधिक स्पष्ट दिसतात आणि दुकानास अधिकच शोभा येते. जाहिरातीने तर इतका कहर उडवून दिला आहे की पहावे तिकडे अक्षरे, चित्रे आणि पुतळे हीच दिसतात. कित्येक हालतात, कित्येक लकाकतात, तर कित्येक वारंवार आपला रंग बदलतात! शहरास कंटाळून बाहेर पडलो, तर शेतांतून व पिकांतूनही जाहिराती दिसाव्यात काय? भुईखालच्या विजेच्या गाडीकडे जाण्यास मी एकदा लिफ्टमधून खाली उतरत असताना माझी नजर काळोखातून सहज भुयाराच्या भिंतीकडे गेली. तितक्यातच लिफ्टच्या उजेडामुळे भिंतीवर एक जाहिरात दिसली!! अशा ह्या मायावी लोकांपुढे व्यापारात आमचा टिकाव कसा लागेल!

नुसत्या भपक्या-भपक्यानेच ह्यांचा व्यापार इतका वाढला आहे, असे म्हणणे केवळ भ्रममूलक आहे. अनियंत्रित व्यापार आणि कायदेशीर स्पर्धा ह्या तत्त्वाचा ह्या लोकांवर असा फायदेशीर परिणाम झाला आहे की गि-हाईकांशी बेशिस्तपणा, आडदांडपणा, बेविश्वास अगर किमतीत अफरातफर केल्यास व्यापारी आपले भांडवल लवकरच गमावून घेईल. आपल्या पेढीची कोणत्याही प्रकारे बदनामी होऊ नये इतकेच नव्हे, तर लहान-थोर दर्जाच्या कसल्याही गि-हाईकाचे क्षुल्लक बाबतीतही मन दुखवू नये म्हणून दुकानदार हरएक प्रयत्न करीत असतात. एकंदरीत सौंदर्य, बुद्धी आणि नीती ह्या तीनही मुख्य तत्त्वांची समान सांगड घालून दीर्घोद्योग व अचाट धाडस व निश्चळ श्रद्धा ह्यांच्या पायांवर ह्या लोकांनी आपल्या व्यापारशास्त्राची इमारत उभारली आहे म्हणून लंडन शहरास हल्लीचे वैभव आले आहे!

हे लोक स्वार्थी आहेत, सुखार्थी आहेत, जडवादी आहेत इ. समज पुष्कळ शहाण्या लोकांचेही आहेत आणि इकडे आल्यावर ह्यांचे वैभव, ह्यांची चैन आणि फॅशन्स पाहून हेच ग्रह कायम होण्याचा पुष्कळ संभव आहे. इकडील बाजारातील एक-चतुर्थांश तरी माल निव्वळ चैनीचा आहे असे दिसेल. परवा ‘ख्रिस्तमस बजार’ ह्या नावाचे केवळ नाताळाकरिता एक जंगी दुकान मांडण्यात आले होते, त्यात तळघरापासून तो वर चार मजल्यांपर्यंत लहान मुलांस नाताळात नजर करण्याची खेळणी मांडून ठेविली होती. हे लाखो रूपयांचे दुकान पाहून मला वाटले की इंग्लंडातील लहान मुलांनी जर नुसती आपली खेळणी विकली तर हिंदुस्तानातील दुष्काळपीडितांचे प्राण वाचतील! असो, तो भाग वेगळा. पण पाश्चात्य सुधारणेचे सर्व रहस्य केवळ चैनीतच नाही. जगात राहून सुख भोगण्याची अत्यंत लालसा ह्या लोकांस आहे हे खरे. पण, पृथ्वीवर राहून आकाशातील स्वर्गाकडे उडी न घेता येथेच स्वर्ग उतरविण्याची ह्यांची दिशा आहे. हे लोक स्वार्थी आहेत हे तर खरेच. पण स्वार्थसाधल्याबरोबर परमार्थास ते कसे लागतात, हे आम्हांस समजून घेणे आहे. असो. आज इकडील भौतिक प्रकार सांगितला. पुढे साधल्यास एक दोन बौद्धिक आणि नैतिक मासले सांगेन.

लंडन येथील बालहत्यानिवारक गृह

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. ७-३-१९०२

ह्या अफाट शहराच्या मध्यभागी गिल्डफर्ड रस्त्यातून एके दिवशी जात असता एक भव्य व जुनी इमारत दिसली. तिचे दारावर लिहिलेले वरील नाव वाचून मला आत जाण्याची इच्छा झाली. पण सोमवारीच हे गृह प्रेक्षकांकरिता उघडे असते म्हणून एका सोमवारी ओळखीचे पत्र वगैरे मुद्दाम काही न नेता बरोबर एका सोबत्यास घेऊन पहावयास गेलो. रस्त्यातील फाटक ओलांडल्यावर विस्तीर्ण आणि स्वच्छ पटांगण लागले. त्यातून चिटणीसांचे कचेरीत गेल्यावर आम्हांला सर्व गृह हिंडून दाखविण्याकरिता आम्हांबरोबर एका चौदा वर्षाच्या हुषार मुलास दिले. ह्या छोक-याने आम्हांस मोठ्या व्यवस्थेने चित्रांची खोली, कमिटी बसावयाची जागा, म्युझिअम इ. दाखविल्या आणि प्रत्येकाची थोडक्यात चटकदार माहिती दिली. कमिटीच्या खोलीतील एका मोठ्या सुंदर तसबिरीत ख्रिस्ताजवळ काही लहानलहान मुळे खेळत होती, तिचे खाली हे सोन्याचे वाक्य बायबलातून लिहिले होते. “लहानग्यास मजकडे येऊ द्या, कारण अशाकरिताच देवाचे राज्य आहे,” चित्रांच्या खोलीत हॅडल आणि हॉगर्थ ह्यांची प्रख्यात चित्रे ठेविली होती. म्युझिअममध्ये कित्येक मिशन-यांकडून मुलास नाताळ निमित्त बक्षिस देण्यास पुस्तके व इतर चिजा मिळालेल्या मांडून ठेविल्या होत्या. मध्यभागी एका गोल टेबलावर कोणा एका मोठ्या एडिटराने दिलेल्या बाहुल्या, फुले, माळा, खेळणी, कोनाकृती रचून ठेविल्या होत्या. ह्यानंतर आमच्या चिमुकल्या वाटाड्यने आम्हांस भोजनगृहात नेले. १०० मुले रांगेने दोन्ही बाजूने बसतील असे एक लांब टेबल होते. ५|७ मुले नाताळासाठी भोजनगृह सुशोभित करण्यात अगदी गर्क झाली होती. ती सर्वच आम्ही आत गेल्याबरोबर आम्हांजवळ आनंदाने हासत हासत आली. भिंतीवरच्या एका फळीवर जाड अक्षरांनी लिहिलेली १०-१२ नावे आम्हांला मोठ्या अभिमानाने दाखविण्यात आली. ती नावे दक्षिण आफ्रिकेच्या लढाईत बँड वाजविण्यास नुकतेच पाठविलेल्या ह्यांच्या बंधूंची होती. एका पोटी जन्मलेल्या भावांमध्येदेखील क्वचित बाबतीत असा अभिमान आढळणार नाही. ह्याच खोलीत एका कोप-यात मुलांच्या लक्षात सहज भरतील, अशा रीतीने मोठमोठ्या आश्रयदात्यांची नावे लिहिली होती.

एकंदर आश्रमाचे तीन भाग केले आहेत. ७ पासून १२ वर्षांच्या मुलांचा एक भाग. ७ पासून १५ वर्षांच्या मुलींचा दुसरा भाग. आणि ३ पासून ७ वर्षांच्या लहान मुला-मुलींचा तिसरा भाग. ह्यांस अनुलक्षूनच इमारतीच्या दोन उभ्या बाजू आणि मधली आडवी रांग अशी योजना केली आहे.

एका बाजूस मुलांची खाली जेवणाची जागा, वरती निजण्याची जागा व मागे शाळा आणि दुस-या बाजूस तशीच मुलींची व्यवस्था केली आहे. त्यांस एकमेकांत मिसळण्याची सक्त मनाई आहे. नंतर आम्ही शाळेत गेलो. एकंदर १०० मोठ्या मुलांचे वयाचे मानाने तीन वर्ग केलेले आहेत. तिन्हींचा अभ्यास चालला होता. मुख्य अध्यापकाने सांगितले की मुलांकडून शाळेतील अभ्यास अर्धा वेळ करून घेऊन बाकीच्या वेळात त्यास कसला तरी धंदा आणि विशेषेकरून बँड वाजविण्यास आणि कवाईत करण्यास शिकविले जाते. मुलींस सर्व घरगुती कामे करण्यास शिकवितात. १५ वर्षांनंतर मुलास बहुतकरून लढाईत बँड वाजविण्यास अगर कोणत्यातरी धंद्यात उमेदवारीस ठेवण्यास येते. मुलीस सभ्य कुटुंबात तिच्या हुषारीप्रमाणे नोकरी पाहून देतात, २१ वर्षांपर्यंत मुलां-मुलींवर गृहाची नजर असते. नंतर ती मुखत्यार होतात. अशा प्रकार ह्या गृहात अजमासे १०० मुलगे, १०० मुली आणि १०० लहान बालके इतक्या अनाथांची जोपासना होत आहे. ह्याशिवाय जन्मल्यापासून तो ३ वर्षांपर्यंतच्या सुमारे २०० तान्ह्या मुलांची जोपासना निरनिराळ्या खेड्यांतून गृहामार्फतच होत आहे.

ह्यानंतर मुलांस काही प्रश्न विचारल्यावर मग आम्ही बाहेरच्या पटांगणात आलो, इक्यात लहान मुलांचा वर्ग सुटला. दोन दोन मुले हातांत हात घालून रांगेने लांबवर लुटू लुटू चालू लागली. एक पोक्त बाई त्यांस हिंडवीत होती. ह्या चिमुकल्या पलटणीचा ड्रेस अगदी एकसारखा असल्यामुळे पुढे होणा-या लढायातील ह्यात योद्धा कोण होता व त्याची शुश्रुषा करणारी दाई कोण होती हे सहज कळत नव्हते. सर्वांची प्रकृती सुदृढ, चेहेरे प्रफुल्लित दिसत होते. ह्या बाईशी बोलत असता मुलांनी आम्हांभोवती गराडा दिला. सर्वांशीच हात हालविण्यास आम्हांस वेळ नव्हता म्हणून बाकीच्यांनी आम्हांस कोठे तरी नुसता स्पर्श करून आपली तृप्ती करून घेतली!

नंतर आम्ही प्रार्थनामंदिर पाहिले. हे मोठ्या थाटाचे असून ह्यात दोन तीन हजार लोक सुखाने बसतील अशी सोय केली आहे. निजवयाची जागा पाहिली, अगदी लहानापासून तो मोठ्यापर्यंत प्रत्येकास निराळी खाट आणि स्वच्छ, मऊ व उबदार गाद्या आहेत. मागचे बाजूस आजारी मुलांकरिता दवाखाना आहे.

गृहाचा इतिहास

फ्रान्स, हॉलंड देशांतून अशा प्रकारच्या संस्था पाहून येऊन लंडन येथे टॉमस कोरम् नावाच्या एका मोठ्या परोपकारी व्यापा-याने १७३९ त ही संस्था स्थापिली. प्रथम प्रथम जरी दोन महिन्यांच्या खालचीच मुले घेतली जात होती तरी दारावर मुले आणणा-यांची मोठी गर्दी जमू लागली व दंगे व मारामा-याही होऊ लागल्या. ह्याप्रमाणे पुष्कळ अर्भकांस नाइलाजास्तव परत पाठवावे लागत असे. म्हणून १७५६ मध्ये कमिटीने पार्लमेंटकडे मदतीबद्दल अर्ज केल्यावरून दहा हजार पौंडांची मदत मिळाली. येतील तितक्या सर्व मुलांस आत घ्यावे अशी पार्लमेंटची अट होती. म्हणून ह्या संस्थेचा सर्वांस योग्य फायदा मिळावा ह्या हेतूने सर्व देशभर जाहिराती दिल्या आणि प्रांतनिहाय मुले जमा करण्याकरिता योग्य स्थळांची योजना केली. हॉस्पिटलच्या दारावर एक टोपली टांगलेली असे. कोणीही मुलास टोपलीत ठेवून वर्दीची घंटा वाजवून चालते व्हावे असा क्रम चालला. पहिल्याच दिवशी (ता. २ जून १७५६) ११७ मुले सापडली! डिसेंबर ता. ३१ पर्यंत १७८३ मुले आली!! पुढल्या वर्षी ३७२७ मुले जमली!!! अशा दूरदर्शी औदार्याचा काय परिणाम व्हावयाचा तो लवकरच झाला. ह्या व्यवस्थेने पापाचरणास मोठे उत्तेजन मिळाल्यासारखे झाले. शिवाय अशा कोवळ्या वयातील इतक्या मुलांची योग्य व्यवस्था ठेवणे गृहास न साधल्यामुळे पुढील ३ वर्षे १० महिन्यांत जी एकंदर १४,९३४ मुले सापडली त्यांपैकी १०,३८९ मुले बाळपणीच वारली! काही प्रांतांतील कंगालखान्यातील अधिका-यांनी आपला खर्च कमी करण्यास लबाडी अगर जबरी करून बरीच मुले गृहात पाठविली! कित्येक चांगल्या पण दरिद्री आईबापांनी केवळ आपल्या मुलांच्या स्मशानयात्रेचा खर्च वाचविण्यास आपली मरणोन्मुख मुले टोपलीत टाकली!! शेवटी १७६० त पार्लमेंटास ही अट काढून घ्यावी लागली व तिने आपली मुलेही बंद केली. तथापि एकदा आत घेतलेल्या मुलांची अखेर वाताहात होईपर्यंत (१७७०) सर्व खर्च पार्लमेंटास द्यावा लागला. ह्यापुढे गृहाच्या बाणेदार चालकांनी केवळ लोकाश्रयावर नियमात योग्य फेरफार करून हे गृह चालविले.

सांप्रतची व्यवस्था

मूल हवाली करण्यास स्वत:आईनेच आणले पाहिजे. तिला झालेला सर्व खरा प्रकार निवेदन करावा लागतो. काही लटपट केल्यास अर्ज नामंजूर होतो. मूल जन्मेपर्यंत अगर जन्मल्यावर १ वर्षावर अर्ज घेण्यात येत नाही. बाईची इतर बाबतीत वर्तणूक चांगली आहे, हल्ली तिची दशा कठीण आहे, ज्या पुरूषाने तिजवर हा प्रसंग आणिला त्याने तिला फाटा दिला आहे वगैरे नाजूक गोष्टींची पूर्ण चौकशी केल्यावर कमिटी अर्ज मंजूर करिते. आणि असे केल्याने केवळ मुलाचेच प्राण वाचवून त्याची जोपासना करिते असे नव्हे तर त्या बाईलाही सन्मार्गास लावून समाजात मिसळविते. ही सर्व नाजूक कामे पोक्त व थोर अशा माणसांची कमिटी स्वत:च सक्तपणे करिते. मुलास फुकट घेण्यात येते इतकेच नव्हे तर, गृहाच्या कोणत्याही अधिका-याने कसलीही फी अगर खुशी घेतल्यास त्यास बडतर्फ करण्यात येते आणिती दिल्याबद्दल अर्जदाराचा अर्ज नामंजूर होतो. विवाहित स्त्रियांची अगर विधवांची मुले घेण्यात येत नाहीत. विधवा विवाहास येथे मुळीच प्रतिबंध नसल्याकारणाने हा नियम योग्यच आहे.

हल्ली गृहात मुले-मुली मिळून ३२३ आहेत व निरनिराळ्या खेड्यांत २१९ तान्ही मुले दायांजवळ ठेविली आहेत. सर्दावर्दीने प्रत्येक मुलामागे एकंदर खर्च सालीना २९ पौंड १४ शिलिंग ११ पेन्स येतो. १९०० साली ५५३ मुलांपैकी खेड्यात ६ वारली, गृहात दोन वारली आणि दोन त्यांच्या आप्तांनी नेली.

पापी पण अनुतापी आईच्या पोटी यदृच्छेने आलेल्या इतक्या मुलांचे येथे पोषण व शिक्षण होते. वर सांगितलेल्या सुंदर भोजनालयात ह्यांच्यासाठी दर रविवारी उपासना होतात, त्यावेळी शेजारच्या भागातील भाविक सभ्य स्त्री-पुरूष उपासनेस येतात. उपदेशक पगारी आचार्य आहेत. प्रत्येक वेळी धर्मार्थ फंड गोळा होतो. ह्या प्रकारे धर्माचे खरे लक्षण जो निष्काम परोपकार तो येथे नित्य घडतो! आणि आमच्यासारख्या परस्थास ह्या लोकांची एका दगडासरशी दोनचार पांखरे पाडण्याची वेमालूम तोड पाहून भारी कौतुक वाटते. मुले काम करण्याच्या लायकीची झाली म्हणजे त्यांना योग्य कामे व नोक-या लावून देतात. आणि २१ वर्षांची होऊन मुखत्यार झाली म्हणजे वर्षातील एका नियमित रविवारी त्यांच्या आभार प्रदर्शनासाठी म्हणून एक थाटाची उपासना होते. त्यावेळी कोणा तरी नामांकित बिशपचा उपदेश होतो. मुलांच्यातर्फे आभार मानल्यावर त्यास बक्षिसे वाटून शिवाय चांगल्या वर्तणुकीबद्दल प्रेसिडेंटच्या सहीची शिफारसपत्रे मिळतात. गतसाली ड्यूक ऑफ पोर्टलंड (उपाध्यक्ष) ह्यांनी बक्षिसे वाटली. ह्या प्रकारे अत्यंत सोवळे धर्माधिकारी व बडेबडे जातिवंत मानकरी ह्यांनादेखील ह्या संस्थेशी प्रत्यक्ष संबंध ठेविण्यात मुळीच लांछन वाटत. नाही!! गृहाच्या म्युझिअममध्ये दोन..... हृद्यात बाणासारख्या घुसणा-या मूर्ती ठेविल्या आहेत, त्या अशा-प्रस्थापक परोपकारी टॉमस् कोरम ह्यांची वयाने वाकलेली गंभीर मूर्ती उभी आहे. त्यांच्या डाव्या हातात नुकतेच जन्मलेले बालक खेळत आहे. त्यांच्या पायाजवळ पश्चात्तापाखाली चुरडून गेलेल्या एका तरूण व मुग्ध पोरीने गुडघे टेकिले आहेत. तिने आपले शरमिंधे तोंड एका हाताने घट्ट झाकलेले आहे. कोरम साहेब मात्र दुस-या हाताने शेक हँड करीत आहेत! इकडे मुलाने कोरम साहेबांच्या वासकुटाची गुंडी घट्ट धरली आहे! जणू काय, त्यांच्या परोपकाराचा फायदा ते हक्काने मागीत आहे!!

असो, अशा संस्थांचा उत्कर्ष होणे इष्ट आहे असे मुळीच नव्हे. पण मानवी स्वभावाची पूर्णता होईपर्यंत ह्या संस्था सर्व देशांत अवश्य आहेत, असे कष्टाने म्हणावे लागते. विधवा-विवाहास पूर्ण संमती असूनही ह्या देशात असा संस्थांची गरज भासत आहे, हे सुधारकांनी ध्यानात घेण्यासारखे आहे. आणि नुसती गरज आहे असे म्हणून स्वस्थ न बसता आज शेकडो वर्षे ही एकच नव्हे तर अशाच दुस-या अनेक संस्था ह्या एका लंडन शहरात चालू आहेत, ही गोष्ट, बालविधवांनादेखील शास्त्रोक्त विवाह करण्याची जेते सक्त मनाई आहे, तेथील सदय धर्माभिमान्यांनी लक्षात आणावी.

जे का रंजले गांजले| त्यासी म्हणजे जो आपुले||
तुका म्हणे सांगो किती| तोचि भगवंताची मूर्ति||

कित्येक प्रत्यक्ष कृती करून तुकारामाचे भगवंत बनतात! कित्येक नुसता त्यांचा उपदेश ऐकून माना डोलवितात! कित्येक कसल्हाही भानगडीत पडत नाहीत! आणि कित्येक तर प्रार्थनासमाजाने असलीच एक संस्था पंढरपुरास चालविली आहे, म्हणून त्याच्यावर दात ओठ खातात!

  1. रोग निवारक प्रयत्न एक निकडीची विनंती
  2. राष्ट्रीय निराशा
  3. रावसाहेब थोरात ह्यांच्या “बोधामृत”ला प्रस्तावना
  4. रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
Page 10 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी