1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

स्वराज्य विरुद्ध जातिभेद

ब्रिटिश पार्लमेंटपुढे लवकरच जगाच्या इतिहासात संस्मरणीय होणारा एक नमुनेदार खटला अव्वल सुनावणीसाठी येणार आहे. त्यातील वादीप्रतिवादी हे दोन व्यक्ती नसून दोन महत्त्वाची तत्त्वे आहेत. त्यांतील एक तत्त्व तारतम्य दृष्ट्या पाहू गेले असता नवीन असून दुसरे जवळ जवळ मनुष्य स्वभावाइतकेच किंबहुना त्याहूनही अधिक जुने आहे. पण त्या दोहोंमध्ये जो झगडा माजून राहिला आहे तो मुळीच नवा नाही. त्याचा इतिहास म्हणजे मनुष्यजातीचा सामाजिक इतिहासच म्हणावयाचा ! जगातील महायुद्धे आणि महत्त्वाचे तहनामे, मोठमोठ्या राज्यक्रांत्या आणि धर्मक्रांत्या, मोठमोठ्या युगकारी सुधारणांचे उगम आणि विलय इ. घडामोडी ह्या केवळ ह्या महाझगड्यातील आघात-प्रत्याघात होत. मनुष्यजातीच्या शिक्षणासाठी विश्वकर्मा हे जे महाकाव्य अनादी कालापासून रचीत आहे त्यातील एक पर्व होऊन रहाणार असा हा कज्जा ब्रिटिश पार्लमेंटपुढे सुरू होणार आहे, असे म्हणण्यास आम्ही फारशी अतिशयोक्ती करीत असू असे वाटत नाही.

पार्लमेंटपुढे जो खटला लवकरच चालणार आहे त्यातील वादी-प्रतिवादी दोन तत्त्वे आहेत, असे आम्ही वर म्हटले. ती परस्पर विरोधी तत्त्वे म्हणजे “हिंदी स्वराज्य” आणि “मानवी जातिभेद” ही होत. ह्या दोन तत्त्वांमध्ये पुरातन काळापासूनच विरोध वाढत आला आहे. आणि त्यामुळे इतिहासामध्ये वेळोवेळी क्रांत्या झाल्या आहेत. ह्याचे कारण एक तत्त्व मनुष्यजाती, विशेषतः हिंदी राष्ट्रास, उदयोन्मुख करणारे आहे व दुसरे त्यास आजपावेतो पराङ्मुख करीत आलेले आहे. हा विरोध नीट समजण्यास ह्या दोनही तत्त्वांची संक्षिप्त, स्पष्ट व्याख्या करणे जरूर आहे. “हिंदी स्वराज्य” ह्या शब्दांनी संबोधली जाणारी एक नूतन, सात्विक आणि पवित्र भावना भारतवर्षात उचंबळू लागली आहे. तिचा अर्थ नुसता हिंदी लोकांचे राज्य इतकाच खास नाही. एवढाच अर्थ असता तर भारतवर्षाच्या जवळ जवळ एक-तृतीयांश भागात म्हणजे (फुटनोट प्रभात, वर्ष ४ थे. अंक १-२.) हिंदी संस्थानांच्या राज्यकारभारात ह्या नवीन तत्त्वांची सरशी आहे, असे मानावे लागेल. कारण, ही सर्व संस्थाने अनेक दृष्टींनी पाहता हिंदी स्वराज्याचेच नमुने आहेत. नाही कोण म्हणेल ? तेथील राजे, प्रधानमंत्र्यापासून तो खेड्यातील पाटलापर्यंत सर्व अधिकारी हिंदीच आहेत. जमाबंदी, बजेटमंजुरी, शिक्षणखाते, स्थानिक स्वराज्य, लष्कर व पोलीस खाते, धर्मादाय आणि दरबारच्या इतर मामुली वहिवाटी ही निदान औपचारिक दृष्ट्या तरी अगदी पूर्वपरंपरेला धरूनच आहेत. मग  ही सारी स्वराज्याची बाह्यांगे संस्थानांतून पूर्वीप्रमाणेच कायम असतानाही आधुनिक दृष्ट्या काँग्रेस लीगच्या योजनेत जी स्वराज्याची नूतन भावना रेखाटली आहे; ती काही कोठे ह्या संस्थानी स्वराज्यात दिसून येत  नाहीत. बाहिरल्या नेणे उत्तम मुंडिले । अंतरी दंडिले नाही जेवी ।। ह्या वचनाप्रमाणे स्वराज्याचे अंतरंग, त्याचा आत्माच केवळ जी जबाबदार पद्धती ती वडिलार्जित स्वराज्याच्या पोषाखी कलेवरात मुळीच नाही, हे आधुनिक स्वराज्यवाद्याच्या कट्ट्या पुरस्कर्त्यांनाही कबूल करावे लागत आहे. आणि तसे ते सर्व स्पष्ट शब्दांनी वेळोवेळी कबूल करीत आले आहेतच. राज्याचा कारभार प्रत्यक्षपणे चालविणारे अधिकारी पुरूष कोणत्याही जातीचे, धर्माचे व पंथाचे असोत, ते स्वकीय असोत किंवा परकीय असोत, त्याच्या कारभाराची अखेरची सूत्रे ज्या जनतेवर ते कारभार चालवितात, त्या जनतेच्या संमतीवर निखालस अवलंबून राहावी; हाच जबाबदार राज्यपद्धती ह्या शब्दयोजनेचा अर्थ आहे. आणि ह्याच पद्धतीला ‘स्वराज्य’ हे नाव सार्थपणे देता येईल. इतर स्वराज्ये, ती कितीही पुरातन काळापासून चालत आलेली असोत. ती नावाचीच समजावयाची. वर निर्दीष्ट केलेल्या खटल्यातील वादी जे हिंदी स्वराज्य त्याची एवढी व्याख्या तूर्त पुरे आहे.

आता प्रतिवादी जो जातिभेद त्याचे लक्षण ठरवू या. हिंदुस्थानात हल्ली जी जातीभेदाची पद्धची चालू आहे तिचा पूर्वइतिहास कसाही असो; तिचा परिणाम हिंदुस्थानात हल्लीचे निरनिराळे समाज राहत आहेत; त्यांच्या परस्पर संबंधावर अतिशय प्रतिकूल झालेला आहे, हे आता सर्व सूज्ञ लोक कबूल करू लागले आहेत. धार्मिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा औद्योगिक दृष्ट्या अद्यापि ह्या पद्धतीची तरफदारी कोणी कितीही करीत असला तरी आजकाल उचंबळत असणा-या आमच्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या मार्गात ह्या जातिभेदाचा अडथळा येत आहे; निदान आणला जात आहे; ही गोष्ट ह्या जातिभेदाच्या पुरस्कर्त्यांच्या लक्षातही हळूहळू येऊ लागली आहे. आणि ते राजकीय हितासाठी तरी निदान जातिभेदाच्या सर्व सबबी बाजूला ठेवा असे आपल्या अनुयायांना उपदेश करू लागले आहेत. अशा वेळी जातिभेदाची कामचलाऊ व्याख्या थोडक्या शब्दात करावयाची झाल्यास ज्यास इंग्रजीत vested interest असे म्हणण्यात येते, तसले विशिष्ट साचलेले हितसंबंध अशी करता येईल. शरीराच्या एकाद्या भागाला मार लागून तेथे रक्त साचून शरीरातील रुधिराभिसरणाला अडथळा आल्यामुळे शरीराची जशी विकृत स्थिती होते; तशीच विकृत स्थिती वरील साचलेले हितसंबंध उर्फ जातिभेद ह्यामुळेही राष्ट्ररूपी शरीरामध्ये अवश्य होते हे निर्विकार दृष्टीने पाहणा-याला ताबडतोब दिसून येण्यासारखे आहे.

जातिभेदामुळे कोणाचेच हित होत नाही असे म्हणण्याचा इरादा नाही व प्रयोजनही नाही. जातिभेदामुळे संचित झालेले हितसंबंध हे राष्ट्राचे हितसंबंध खासच नव्हेत. एवढेच सांगणे आहे. असले संचित हितसंबंध विवक्षित जातीला साधक असले तरी इतर काही जातींना ते बाधक असतात. एका जातीला दान ते दुस-या जातीला ऋण असा हा नेहमी अन्योन्य संबंध असतो. ह्यामुळे ह्या संबंधांना राष्ट्रीय संबंध कधीच म्हणता येणार नाही. इतकेच नव्हे तर जेव्हा जेव्हा सर्व राष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी एकादी नवीन सुधारणा घडवून आणावयाची असेल तेव्हा ह्या जातिभेदरूपी संचित संबंधाचा पर्वत मध्ये आड आल्याशिवाय राहात नाही.

येणेप्रमाणे जबाबदार राज्यपद्धती म्हणजे हिंदी स्वराज्य आणि संचित हितसंबंध म्हणजे मानवी जातिभेद ही दोन लक्षणे वरील खटल्यातील वादी आणि प्रतिवादी झालेल्या दोन तत्त्वांची आहेत. हे नेहमी ध्यानात ठेविल्यास प्रस्तुत विषयाचा वादग्रस्तपणा ब-याच अंशाने कमी होण्याचा संभव आहे. स्वराज्याचा “जबाबदार राज्यपद्धती” हा अर्थ जसा सरकारपक्षास तसाच लोकपक्षासही मान्य आहे. तसेच “संचित हितसंबंध” हा जातिभेदाचा अर्थ सुधारक आणि उद्धारक, प्रागतिक आणि राष्ट्रीय, स्वातंत्र्यवादी आणि धर्माभिमानी ह्या भिन्नभिन्न पक्षालाही मान्य होईल, असा आहे आणि ह्या प्रकारे वादी-प्रतिवादी-भूत वरील जी परस्पर विरुद्ध दोन तत्त्वे हिंदी स्वराज्य आणि मानवी जातिभेद ह्यांच्या खटल्याची सुनावणी ऐकावयाला मनाची समतोल स्थिती होईल अशी आशा आहे.

ह्या खटल्याची पूर्वतयारी आतापर्यंत झाली. वादी-प्रतिवादी ह्यांचे मुख्य वकील आणि इतर कायदेशीर सल्लागार मंडळीही बहुतेक ठरल्याप्रमाणेच आहेत. ब्रिटिश पार्लमेंटचे दोन भिन्न भिन्न भाग आहेत. एक बडे लोकांची सभा व एक सामान्य लोकांची सभा. एकावर जातिभेदाचे निशाण फडकत आहे. तर दुस-यावर जबाबदार राज्यपद्धतीचे निशाण लावले आहे. प्रतिवादीचे वकीलपत्र बड्या लोकांच्या सभेमध्ये हिंदुस्थानला परिचित असलेले बडे गृहस्थ लॉर्ड सिडनहॅन ह्यांच्याशिवाय कोण घेऊ शकणार ? उलटपक्षी भारतमंत्री नामदार माँटेग्यूसाहेब हे जरी बडे गृहस्थ नसले तरी उदारमतवादी असल्यामुळे हिंदी स्वराज्याची वकिली ब्रिटिश पार्लमेंटच्या सामान्य लोकांच्या सभेमध्ये पत्करण्याचे कंकण त्यांनीच बांधले हे युक्त आहे. लॉर्ड सिडनहॅमसाहेब हे एक ब्रिटिश साम्राज्याचे संरक्षक आहेत. पाच वर्षे ह्या देशातील एका मोठ्या सुभ्याची वहिवाट केल्यामुळे त्यांना ह्या देशातील उणेपुरे सर्व अवगत झाले आहे. उलटपक्षी भारतमंत्री ह्यांनीही ह्या देशामध्ये एकदा सहज आणि एकदा मुद्दाम येऊन वाटेल तितका पुरावा मिळविला आहे. हिंदुस्थानातील परकीय भांडवलदार आणि इतर सुखवस्तू युरोपियन गृहस्थ, हिंदी इनामदार, जमीनदार व किताबवाले, तसेच पारशी, ख्रिस्ती, मुसलमान इत्यादी नवे जुने परधर्मी संघ आणि हिंदुधर्मातीलच निकृष्ट आणि मागासलेल्या कित्येक असंतुष्ट जाती ह्यांच्या सहानुभूतीवर, सल्लामसलतीवर आणि सहकार्यावर प्रतिवादीच्या वकिलाची मुख्य भर असणे साहजिक आहे. उलटपक्षी वादीचे वकील भारत मंत्री माँटेग्युसाहेब हे स्वतः उदारमतवादी असल्यामुळे आणि प्रत्यक्ष भारतवर्षाचे मीठ खात असल्यामुळे त्यांचा ओढा ह्या देशातील जनतेच्या आकांक्षा तृप्त करण्याकडे आणि पुढा-यांशी सहकार्य साधण्याकडे विशेष असणे साहजिकच आहे. कोर्टात दोन्ही पक्षांचे दोन मुख्य वकील असले तरी प्रत्यक्ष काम चालविण्यामध्ये अप्रत्यक्षरीतीने त्यांना मदत करण्यासाठी दुसरे कित्येक कायदेपंडित हाताशी तयार असतातच. अशा प्रकारचे मदतगार म्हणून काँग्रेस आणि होमरूल लीगने आपआपली शिष्टमंडळे पाठविण्याचे ठरविले आहे. वादीच्या वकीलास इंग्लंडातील मजूर पक्षाची मदत मिळण्याचा संभव आहे हे पाहून प्रतिवादीच्या वकीलानेही इंडो-ब्रिटिश नावाचे एक नवीन स्वकीय-परकीयांचे मित्रमंडळ तयार केले आहे. पूर्वी अँग्लो इंडियन हा शब्द प्रचारात होता. त्याऐवजी आता इंडो-ब्रिटिश हा प्रचार सुरू झाला. एवढ्यावरून श्राद्धातल्या सव्यापसव्याप्रमाणे केवळ पोकळ सुताची घालकाढ एवढाच अर्थ आहे असा नव्हे, तर पूर्वी अँग्लो इंडियन समाजामध्ये जे थोडे मिश्रण दिसून येत असे ते आता इंडो-ब्रिटिश मंडळामध्ये स्वकीय-परकीयांचे जाडे मिश्रण दिसून येणार आहे. एकूण पूर्वतयारी तरी जय्यत झालेली आहे. ब्रिटिश पार्लमेंटपुढे अशा प्रकारचा कज्जा नवीन आलेला आहे असे नाही. आयरीश स्वराज्याचा कज्जा आज किती वर्षे तरी भिजत पडलेला असून ग्लॅडस्टन, ऑस्क्विथ प्रभृती महात्म्यांनी ज्यात हात टेकिले, तो निकालात जाण्यापूर्वीच त्याच्याहून अत्यंत विस्तृत परिणामकारी हा कज्जा दाखल करून घेण्याची पाळी ब्रिटिश पार्लमेंटवर आली आहे. महायुद्ध संपून गेले तरी त्याच्या खालोखाल महत्त्वाचे हे सनदशीर युद्ध जुंपणार म्हणून जगाचे डोळे त्याच्याकडे लागतील ह्यात संशय नाही. परंतु इतर जग केवळ तमासगीर म्हणून ह्या कज्जाकडे पाहील तर हिंदुस्थानच्या भावना नुसत्या कौतुकापेक्षा खात्रीने अधिक खोल असणार ! जीव धरून पुढे सरावे की मागे रेटले जाऊन मरून पडावे हा राष्ट्रीय जीवनमरणाचा प्रश्न ह्या सनदशीर झगड्यात आहे. ह्यापुढे प्रत्यक्ष महायुद्धही बापडे फिके आहे, असे हिंदुस्थानचे मीठ खाणा-या प्रत्येक देशनिष्ठास वाटले तर त्यात काय वावगे होईल ?

हे स्वराज्य-युद्ध नुसते पार्लमेंटच्या चार भिंतींच्या आवारामध्येच चालून संपणार आहे असे नाही. हल्लीच्या महायुद्धाचे खंदक जरी युरोप खंड आणि त्याच्या सीमेवरच आहेत तरी त्याचा व्याप सर्व जगभर पसरला आहे. त्याचप्रमाणे ह्या सनदी युद्धाचे खंदक जरी पार्लमेंटच्या आवारात असले तरी ह्याचा व्याप आणि ह्याची तयारी सर्व ब्रिटिश रामराज्यभर पसरल्याशिवाय रहाणार नाही. कारण जरी वादी हा हिंदुस्थानचा रहिवासी असला तरी प्रतिवादी सर्व ब्रिटिश साम्राज्याचा रहिवासी आहे. इतकेच नव्हे तर हा प्रतिवादी प्रत्यक्ष हिंदुस्थानातही आपले हातपाय पसरून व घर करून स्थावर पदाला पोहोचला आहे. ही गोष्ट लक्षात घेतली असता हे युद्धमान पक्ष मुळीच समानबळ नाहीत हे दिसून येईल. आणि त्याप्रमाणे वादी पक्षाने आपली साधनसामग्री व मनुष्यबळ हल्लीपेक्षा किती तरी अधिक वाढविले पाहिजे, आणि हे युद्ध किती दीर्घ काळ टिकणारे आहे हे दूरदृष्टीने नीट न्याहाळून त्याचप्रमाणे आपली धीरोदात्त आणि गंभीर वृत्ती कशी राखली पाहिजे हेही ध्यानात आणणे भाग आहे. शेवटी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावयाची ती अद्याप सांगावयाचीच उरली आहे. ह्या सनदशीर युद्धातील योद्धे भारतमंत्री आणि लॉर्ड सिडनहॅम अगर त्यांचे सल्लागार हे नव्हेत. हे केवळ सरकारपक्ष आणि प्रजापक्ष ह्यांचे फार तर वकील आहेत, इतकेच म्हणता येईल, किंबहुना खरे युद्ध सरकार आणि प्रजा ह्यांमध्ये माजलेले नसून वर सांगितलेल्या दोन तत्त्वांमध्ये माजलेले आहे. त्यातील वादीची म्हणजे नव्या स्वराज्य तत्त्वाची जुन्या जातिभेदाच्या तत्त्वावर जितक्या लवकर सरशी होईल तितका सरकारचा आणि प्रजेचा अधिकच फायदा होणार आहे. उलट तत्त्वाचा कायमचा पराजय होईल तर दोघांचाही तोटाच आहे. असे नसेल तर पार्लमेंटने हा कज्जा आपल्यापुढे मुळी येऊच दिला नसता. तथापि हे युद्ध तत्त्वांचे आहे म्हणून सरकार आणि प्रजापक्ष ह्यांनी ह्या युद्धाच्या नुसत्या तारा वाचीत व तमाशा पाहात बसून चालणार नाही. सरकारपक्षाने काय करावयाचे ते करावयाला सरकार दक्ष व तत्परच आहे. उलट प्रजापक्ष मात्र फार दुबळा आणि नवशिक्यांचा असल्यामुळे त्याने घ्यावी तितकी काळजी आणि खावी तितकी खस्ता थोडीच आहे. हिंदी प्रजेने विशेष ध्यानात ठेवण्याची जी गोष्ट ती ही की स्वराज्याचा खरा शत्रू जातिभेद हाच होय. जातिभेदाच्या पुरस्कर्त्याला इंग्रजीत ब्युरोक्राट हे नाव आहे. ह्या विचित्र प्राण्याचा सुळसुळाट जसा परकीयात तसा स्वकीयांतही आहे. हे आम्ही हिंदूंनी विशेष लक्षात बाळगले पाहिजे. नवीन स्वराज्य मिळविण्याच्या मार्गात जरी मुख्य अडचण परकीय ब्युरोक्राटांची आहे तरी हल्ली आमच्यावर स्वराज्यासाठी दात विचकण्याची पाळी आली आहे. ती आमच्यातील स्वकीय ब्युरोक्राटांमुळेच आली असे लोकमान्य टिळकासारखे स्वराज्यवादीही अलीकडे सांगू लागले आहेत. त्यांच्या सांगण्यावरून तरी आमचे डोळे उघडून आमचा शत्रू बाहेर आहे की आत आहे हे आम्ही शोधून पाहिले पाहिजे. जातिभेदाचा पुरस्कार करणारा स्वकीय असो किंवा परकीय असो, काळा असो वा गोरा असो, स्वतःला उच्च म्हणवीत असो किंवा नीच म्हणवीत असो, तो कोणी असो आपल्या जातीचे हक्क सांगून राष्ट्रकार्याला विघ्न आणीत असेल तर तोच एक ब्युरोक्राट समजावा. आणि त्याच्या हातून जर काही होईल तर स्वराज्याच्या थडग्यावर मूठभर माती जास्तच पडेल. दुसरे काय होणार ? म्हणून आम्ही अंतर्मुख होऊन आमच्यातील जातिभेदांना ताळ्यावर आणल्याशिवाय आमच्या स्वराज्यवाद्यांना कायमचा जय मिळणार नाही. परकीय जातिभेदी उर्फ ब्युरोक्राट केव्हा केव्हा तर हिंदुस्थानातील जातिभेदामुळे गांजलेल्या लोकांची कीव करण्याचा आव आणून नवीनच निर्माण केलेले जातिभेदाचे एक अस्त्र स्वराज्याच्या किल्ल्यावर फेकतात आणि त्यांचा अनुवाद स्वकीय जातिभेदीही करावयास चुकत नाहीत. उलटपक्षी स्वराज्यवादाची तोंडपाटिलकी करण्यात प्रवीण पण आपआपल्या जातीच्या संचित हितसंबंधाला नुसत्या ठरावांच्या शब्दांचा चटका लागला तरी हाय हाय करणारे काही जातिभेदाचे गुप्त पुरस्कर्ते स्वराज्याच्या बाजूने लढण्याचा आव आणून आपली व इतरांची फसवणूक करीत असतात. कदाचित दोहों पक्षाकडील अशा गुप्त जातिभेद्यांचे संगनमत होऊन एकादा तह होण्याचा मोठा धोका आहे. हा तह म्हणजे स्वराज्य नव्हे तर स्वराज्याला पकडण्याला मांडलेला तो सापळाच म्हणावयाचा. स्वराज्य वाटेल तेव्हा मिळो, तूर्त ख-या स्वराज्यवाद्यांनी ह्या सापळ्यापासून तरी आपल्यास दूर सुरक्षित ठेवावे म्हणजे पुढच्या तयारीला बरे पडेल.

स्वराज्य आणि स्वाराज्य

स्वराज्य हा शब्द अलीकडे महशूर झालेला आहे. स्वाराज्य ह्याचा अर्थ मात्र पुष्कळांस कदाचित माहीत नसेल. स्वाराज्य म्हणजे स्वर्गीय राज्य. स्वर्ग म्हणजे परलोक, पुढील काळाशी त्याचा संबंध, त्याचा विचार आता कशाला ? असे कदाचित कोणी म्हणतील तर त्यांना एवढेच उत्तर की, मी स्वर्ग म्हणजे प्रस्तुतचाच काल व प्रस्तुतचेच ठिकाण समजतो. झेंदावेस्तात सुमनाला स्वर्ग म्हटलेले आहे, व कुमन तो नरक होय. सुमन म्हणजे शोभन मन, सुविचारांनी भरलेले. कठोपनिषदात “यदेव इह तदन्यत्र यदन्यत्र तदिह” असे म्हटले आहे. इथला वाईटपणा, तोच स्वर्गातील वाईटपणा. इथल्या वाईटपणामध्ये व स्वर्गातील चांगल्या-वाईटपणामध्ये काही भेद नाही, पूर्ण ऐक्य आहे. तेव्हा ह्या केवळ पुढच्या गप्पा आहेत, असे आजच्या विषयासंबंधाने वाटू देऊ नये. स्वर्गाचा काही अंश आहे. तो नसेल, तर स्वर्ग पुढेही असणे अशक्य आहे असे मी म्हणतो. स्वर्ग म्हणजे चांगल्या कल्पनांचा समुदाय. त्याच्याच आधारे भावी स्वर्गाची कल्पना करता येते. असो;--
सर्व काँग्रेसमध्ये गेली काँग्रेस श्रेष्ठ, त्यातील सर्व भाषणांमध्ये अध्यक्षांचे भाषण श्रेष्ठ, त्यातही पुढील वाक्य श्रेष्ठ. ते आपल्या मुख्य प्रधानांच्या तोंडचे आहे. Good government is no substitute for self government. म्हणजे चांगले राज्य हे स्वराज्याचा मोबदला नव्हे. स्वराज्याचा मोबदला सुराज्याने होणे नाही. आजच्या व्याख्यानात स्वराज्य आणि सुराज्य ही परस्परविरुद्ध आहेत, ह्यांच्यात चिरविरोधच आहे, की ती तशी नसून परस्परांना दुजोरा देणारी, एकच आहेत, म्हणजे त्यांचे सहकार्य, ऐक्य आहे, ह्याचा विचार करणे आहे. आणि प्रयत्न असा करावयाचा आहे—व्याख्यात्यांनीच नव्हे, तर देवाच्या घरात जे बसलेले आपण, त्या श्रोत्यांनीही—की ती एकच आहेत. माझ्याकडे फक्त निकाल उघड करण्याची कामगिरी आली आहे. पण (फुट नोट- इंदूरास दिलेल्या व्याख्यानाचा सारांश. सुबोध पत्रिका १२-०५-१९०७) आपण सर्वांनी मनात विवेचन करून पडताळून पहायचे आहे. स्वराज्याचा अर्थ वर्तमानपत्रातून केला जातो की आमच्या लोकांचे राज्य. अरे पण आमचे लोक ते कोणते ? कोणाला म्हणायचे आमचे लोक ? आमच्या लोकांची कल्पना कोणती ? हे आमचे लोक व हे परकीय असे कसे निवडून काढायचे ?

ब-याच देशांचे इतिहास ब-याच सुव्यवस्थित रीतीने उपलब्ध आहेत. इजिप्शियन, असिरिअन, बॅबिलोनियन, ग्रीक, रोमन ह्या लोकांनी राज्य केले, बळ गाजविले, ते ते स्वराज्य होते काय ? ग्रीसचे एक उदाहरण घ्या. किती लोकांचे स्थानांतर झाले, नव्या लोकांनी जुन्या रहिवाश्यांना जुलमाने आपल्यात घेतले. त्यात पुनः स्पार्टन, अथिनियमन, कॉरिथियन निराळे. आपण ज्या राज्याकडे पाहून स्वराज्याची कल्पना बांधितो, ते ब्रिटिश हे नाव तरी संमिश्रणाचे नाही असे तरी कोणी म्हणेल काय ? अँग्लो-सॅक्शन्समध्ये अँगल्स निराळे व सॅक्सन्स निराळे. ह्यावरून हे दिसून येईल की कोणता भाग आमच्या बाहेर टाकावयाचा हे ठरविणे कठीण आहे. सर्वत्र लोक एकमेकांत मिसळत चालले आहेत. ह्या वाढत्या विकासात अशी पायरी सांगता येते काय की तेथे स्वराज्य दृष्टीस पडेल. आम्हांस स्वराज्य पाहिजे असे म्हणताना लोकसत्तात्मक राज्य पाहिजे असे म्हणण्याचा सध्या इरादा नसतो. आम्हांला आमचे राज्य पाहिजे असा हेतू. पण असे पहा, असे कधी झाले आहे काय ? ह्या हिंदुस्थानातच पुष्कळांनी पुष्कळ राज्ये केली आहेत. पण ती आपली नव्हती. कोणी तरी येऊन राज्य केलेल, पण त्याच्या संबंधाने त्यावेळी लोकांची आपलेपणाची सीमा वाढलेली असे.  हा आपलेपणा असीम, खरोखर निराधार आहे.

स्वराज्याचा दुसरा अर्थ घेऊ. आम्हांला लोकसत्तात्मक राज्य पाहिजे. म्हणजे १० ख्रिस्ती, १५ मुसलमान, २७ हिंदू असे मिश्रित, किंवा अमिश्रित लोकांचे राज्य असावे. ह्या अर्थाने तरी लोकसत्तात्मक राज्य इतिहासात झाले आहे काय ? काही अंशाने इंग्लिशांचे तसे आहे. पण त्या पूर्वीचे रोमन राज्य घ्या. त्याची सूत्रे फक्त रोमच्या रहिवाशांच्या हाती. ग्रीसचे घ्या. उदाहरणासाठी एक गोष्ट सांगतो, पोरीक्लिस म्हणून एक पराक्रमी ग्रीक मुत्सद्दी होऊन गेला. त्याचेवर त्याच्या बायकोचे वजन होते. बायको अगदी लहरी असे. तिचे लहरी प्रेम तिच्या कुत्र्यावर होते. तेव्हा विनोदाने असे म्हटलेले आहे की ग्रीसचे राज्यसूत्र एकेकाळी कुत्र्यावर अवलंबून होते. ह्यावरून हा साधारण नियम उघड होतो की चार पुढारी एकत्र होतात, ते टेहळतात, आपली व्याख्याने, आपले विचार लोकांस सांगत फिरतात, ह्यामुळे त्यांची लोकांवर छाप बसते व त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्याचे सुकाणू फिरते. इंग्लंडात तरी पहा, लोकसत्तात्मक राज्य पुरे आहे काय ? तेथे बायकांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक, तरी बायकांना तेथे राज्य नाही. त्यांनी पार्लमेंटगृहात जाऊ म्हटले, तर पोलीस लोक त्यांस बाहेर ढकलून देतात. बाकीच्या अर्ध्यातून किंवा अर्ध्याहून कमीच लोकांतून गरीब लोक –की, ज्यांच्यापाशी एक पैसा किंवा एक पैही नाही व मिळविण्याचे सामर्थ्य नाही—वगळले पाहिजेत. बरे, अमेरिकेचे उदाहरण घ्या. तेथे तरी हीच त-हा ! बायकांस व निग्रोंस राजदरबारी मज्जाव, तेव्हा स्वराज्याच्या आतापर्यंत घेतलेल्या दोनही अर्थाने स्वराज्य आतापर्यंत नीट रीतीने झालेले नाही.

आता स्वाराज्य घ्या. आपल्याकडे रामराज्याची कल्पना आहे. राजाला कर नको आहे, लोक तो घ्या म्हणताहेत, देशामध्ये चोर नाही, म्हणून पोलीसही नाही, असे दंतकथेतील स्वाराज्य, तसेच पाश्चात्यांची “Utopia” युटोपियासारखी कल्पना म्हणजे भावी सुखाशेचे राज्य, शिवाय सोशियालिस्ट, कम्युनिस्ट ह्यांनी सध्या प्रयोगही करून पाहिले आहेत. तीही अशीच कल्पना की, उत्पन्नावर सर्वांचे हक्क सारखे असावेत. आमच्यामध्ये मताचे पंथ तर पाश्चात्यांत कृतीचे निघाले आहेत. पण ह्याही कल्पनेस, यश यावे अशी माझी, तुमची सर्वांची इच्छा आहे तरी, अद्यापि ते आले नाही. सात्विक कल्पना मात्र ही खरी की कधी कोणी कोणाशी वैर करीत नाही, कोणी कोणाचे मन दुखवीत नाही. सगळे बंधू, सगळ्या बहिणी, सगळी संपत्ती सर्वांची. राजा नाही, तेव्हा ह्याला राज्य म्हणावे की नाही ह्याची तरी शंकाच येते. पण असे जे स्वाराज्य, ते मागे कधी झाले नाही, ह्यापुढे तरी होईल कशावरून ? तेव्हा “न भूतो, न भविष्यति” असे काही तरी घेऊन रिकामा कंठशोष कशाला ?

पण आता विधिबाजू घेऊन पाहू. मी म्हणतो की मनुष्याच्या सर्व खटपटीचा ओघ सनातन काळापासून, स्वराज्य आणि स्वाराज्य एक करण्याकडे चालत आला आहे. ब्राह्मसमाजाची मोक्षाची कल्पना काय आहे ? तर अनंत उन्नतीची. ही कधी झाली आहे काय ? नाही. पुढे होईल काय ? नाही. पण ह्याबद्दल अंतरीचा अनुभव, साक्षात्कार मात्र आहे की, आपली अनंत उन्नती होत रहाणार, तोच प्रकार येथे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपले राज्य आपणावर केले पाहिजे, तेच खरे स्वराज्य—स्वाराज्य किंवा सुराज्यही पण तेच. तथापि सर्वांत श्रेष्ठ जी काँग्रेस, त्यातील भाषणात असे असावे की स्वराज्य व स्वाराज्य भिन्न नाही. जी गोष्ट आपणाला पाहिजे त्याच्याविषयी आपली शुद्ध कल्पना नको काय ? नाही तर स्वराज्य न देणा-याच्या मनात यावे की ह्यांना वाईट राज्य पाहिजे ते देऊ नये. मागणा-याच्या मनात आम्हांला आमचे राज्य पाहिजे. अशा गैरसमजुतीने कार्य कसे होईल ? बरे स्वराज्य एकेक व्यक्तीनेच करणे किती कठीण आहे ? आपणाशिवाय जगातील सर्व लोक नष्ट झाले असे समजून, आपण आपल्याच नियमांनी चालू असे ठरवून त्याप्रमाणे चालणे जर कठीण, तर आम्ही सर्व लोकांचे नियमन करू म्हणणे हास्यास्पद नव्हे काय ? तर प्रत्येकाने एवढी दृष्टी ठेवली तरी पुष्कळ काम झाले की जे सदाचाराचे नियम ते आपण आपल्या संबंधात अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. जे श्रेय तेच प्रिय करून घ्यायला पाहिजे, घेतले पाहिजे. ज्ञानदृष्टीने श्रेय, तेच खरोखर प्रिय व्हावे. गुरुत्वाकर्षण, रेषाकर्षण, परमाणु परमाणूंमधील आकर्षण ह्यांचे नियम जसे युक्तीने सिद्ध झाले आहेत, तसेच सात्विकपणाचे नियम सिद्ध झाले आहेत काय ? होय, झाले आहेत. “सर्वाणि भूताणि आत्मवत् पश्य ।” जे तुला प्रिय आहे, तेच दुस-याला प्रिय आहे असे समजून त्याप्रमाणे वाग. हा सदाचाराचा एक प्रमुख अढळ नियम. भौतिक नियमात पालट होत आहेत, पण धर्माचे, नीतीचे, आत्म्याचे जे काही नियम, ते त्रिकालसिद्ध होत. त्याबरहुकूम ज्याने त्याने स्वतःचे वर्तन ठेवणे ते स्वाराज्य होईल. हे नाही, तोपर्यंत एकाने आम्हांला स्वराज्य द्या म्हणावे व दुस-यांनी म्हणावे तुम्हांला स्वाराज्य देतो, ह्यापासून उद्दामपणा, अभिमान, अज्ञान दोन्ही पक्षांकडे अशुद्ध हेतू मात्र दृष्टीस पडतात. भांडणाचीच स्थिती कायम राहणार. “आपल्या मते पिसे । परि ते आहे जैसे तैसे ।।” ते ह्याची योजना आपल्याकडे सत्य, वास्तविक स्थिती ह्याअर्थी करतात. स्वराज्य व स्वाराज्य ही एक वास्तविक स्थिती आहे. अशा स्वराज्याचा व स्वाराज्याचा अनुभव साधुसंत सनातन काळापासून घेत आले आहेत. ज्याचा अधिकार असेल त्याला ह्यातील ऐक्य समजून येणार आहे. ज्याचा नसेल त्याला ते कधीच कळून येणार नाही.

स्त्री-दैवत

ईश्वराचा साक्षात्कार वनामध्ये, मनामध्ये व जनामध्ये अशा तीन ठिकाणी होत असतो. सृष्टीमध्ये सौंदर्य आपल्या नजरेस पडते. नद्या, पर्वत, डोंगर, सागर, महासागर, सकाळ, संध्याकाळ इत्यादिकांमध्ये देव आहे अशी साहजिक समजूत आपली होते, त्याचप्रमाणे आपल्या अंत:करणातही त्याचा मंगल हस्त स्पष्ट दिसतो. सद्सद्विवेकबुद्धी तोच देतो म्हणजे ईश्वर सृष्टीत म्हणजे वनात व मनात आहे ही गोष्ट समजणे फार कठीण नाही, पण ईश्वर जनात आहे हे अजून जसे समजावे तसे समजले नाही. जोपर्यंत जनामध्ये ईश्वराचा साक्षात्कार आपणास पटत नाही, तोपर्यंत वरील दोन पटलेले साक्षात्कार अपूर्ण होत. ह्याकरता जनामधील साक्षात्कार प्राप्त करून घेण्याकरिता आपण नेहमी झटले पाहिजे व मनात अशी इच्छा धरली पाहिजे की, -“पाहिन जनी जगदीश कधी मी, आस मना ही लागली”.

पूर्ण दयाधन, शाश्वत, पापाचा नाश करणारा, मंगल, भक्तांचे मनोरंजन करणारा असा परमेश्वर जनामध्ये पहावयास पाहिजे. आज मी स्त्रियांमध्ये ईश्वर कसा दिसतो हे सांगणार आहे. स्त्रीस्वभावामध्ये ईश्वरी अंश आहे हे अजून फारसे समजलेसे दिसत नाही : “जसे खारे पाणी पिऊन घन ते गोड करिती । स्त्रिया दु:खा तेवी गिळुनि सुखराशीस वमती ।।”

जर का आकाशात मेघावली नसत्या तर आमची कोण दुर्दशा झाली असती ! पृथ्वीवर एक भाग जमीन व तीन भाग पाणी असून काय फळ ? त्या चट सा-या पाण्याच्या बिंदुबिंदूंतून क्षार भरला असल्यामुळे महासागराचे काठी बसूनदेखील आमच्या व तशाच सकल जीव वनस्पतीच्या कंठाला कायमची कोरड पडली असती, नव्हे ?

जशी गत ढगाविना सृष्टीची, तशीच स्त्रियांविना ह्या संसाराची आहे, हे जाणत्यांनी थोडा विचार करून पाहिल्यास दिसेल. सृष्टीत जसे खारे पाणी ( फूट नोट – ता. २०-०२-१९१० रोजी सायंकाळी मुंबई प्रार्थनामंदिरात आपल्या साध्वी मातु:श्रीच्या आद्यश्राद्धानिमित्त केलेल्या उपदेशाचा सारांश.) ठाईचेच विपुल आहे, तसे संसारात सुखाच्या साधनांची ही समृद्धी आहे तरी पण सुखाच्या ह्या कच्च्या मालाचे पक्के उपभोग्य नग कोण बनविते बरे ?

अविचारी पुरुषांनो ! सुखाचे पक्के नग बनविन्याची कामगिरी पुरुष करतो असे कृतघ्न आणि धआडसी उत्तर तुम्ही उताळवीपणे द्याल. पण किंचित विचार करा ! कृषी, उद्योग, व्यापार, राजकारण, समाजबंधन, धर्मानुशासन आणि तत्वज्ञान अशा ह्या सात पर्यायांनी पुरुष ह्या जगातील सृष्ट संपत्तीवर आपली कुशलता व परिश्रम लढवितो, पण तेवढ्यानेच सुखाचा पक्का नग तयार होतो अशी तुमची समजूत होईल तर ती चुकीची समजा. सुखोत्पादनाचे कामी पुरुषांचे बाहुबळ किंवा बुद्धिबळ ह्या दोहोंची किंमत प्राकृत जड संपत्तीहून काही विशेष निराळी आहे असे नाही. हे सर्व कच्च्या मालाचेच प्रकार समजावेत.

जेव्हा अखेरीस संसाररंगभूमीवर स्त्री येते व तिच्या अंत:करणातील प्रेमलहरींचा ह्या संपत्तीला स्पर्श घडतो तेव्हाच ह्या सर्व संपत्तिपरंपरेचे पर्यवसान पक्क्या सुखात होते, एरव्ही सर्व गाबाळच, ह्यात संशय नको. पुरुषांचे लक्षण वीर्य, तर स्त्रीचे लक्षण सहनशीलता होय. सुखाच्या कच्च्या मालात जो सर्वत्र क्षार भरला आहे तो गाळून गोड करावयाचे झाल्यास तेथे वीर्याचे काहीच चालावयाचे नाही. त्यासाठी सहनशीलतेची बळकट चाळण पाहिजे, आणि ती चाळण स्त्रीलाच लाभली आहे ! ह्या सहनशीलतेच्या द्वारे स्त्री ही पती, पुत्र आणि पिता ह्या तिघांची आज्ञा पाळते इतकेच नव्हे तर त्यांचे लळेही पाळिते. वरवर पाहणारास ती पती आणि पिता ह्यांची आज्ञा पाळते असे दिसेल, पण खोल पाहिल्यास ती त्यांचे लळे पाळते असे दिसेल. सहज पाहताना ती आपल्या कोमल अर्भकाचे किंवा जवान पुत्राचे लळे पाळते असे दिसेल, पण विचारदृष्टीने पाहिल्यास ती त्यांच्या आज्ञाही पाळीत आहे असे दिसेल. लळे होवोत की आज्ञा होओत ज्या दैवी गुणाच्या द्वारे स्त्री त्यांचे पालन करते तो गुण सहनशीलता होय. तो गुण पुरुषामध्ये नाही. पुरुष नादाने किंवा भीतीने किंवा वैतागाने केव्हा केव्हा सहनशील होतो, पण ते सहन करणे नव्हे, ते त्याचे दौर्बल्य होय. तो दैवी गुण नव्हे. कृती करण्याचे जसे एक सामर्थ्य आहे तसेच सहन करण्याचे दुसरे किंबहुना श्रेष्ठ सामर्थ्यच आहे. पहिले पुरुषाला व दुसरे स्त्रीलाच प्राप्त झालेली विशेष धने होत. ह्या दोन जाती ह्या दोन भिन्न दैवी गुनांनी मंडित झाल्या आहेत. पहिल्याच्या योगे सुखाचा कच्चा माल व दुस-याच्या योगे त्याचा पक्का नग तयार होतो.

बाळपणी, तरुणपणी आणि वृद्धपणी स्त्रीचा अत्यंत पवित्र सेवाधर्म – किंवा शुश्रुषाधर्म – चुकत नाही. ती माहेरी असो की सासरी असो तिचे हे असिधाराव्रत चालूच असते. घरी पाळण्यात मूल रडू लागले आणि आईने त्याच्या भावाला हालवावयास सांगितले तर तो फार तर एक दोन झोके देऊन चटकन आईचा डोळा चुकवून आपल्या चेंडूला टोलवीत निसटून जाईल. पण तीच बहीण असेल तर ती आपला खेळ सोडून पाळणा हालवीत राहील. सासरी जशी ती सास-याची व दिराची कटकट सोशील तशी आपल्या माहेरी ती बापाची व भावाची कटकट सोशीत राहील.

भाच्या मामी पतिला । पत्नी पुत्रा होई माता ।।
भावा बहिणी दिरास । वहिनी कन्या होई ताता ।।
- बाबा गर्दे

ह्याप्रमाणे तिला जरी वरवर निराळी दिसणारी पात्रे घ्यावी लागली तरी काम एकच, ते सहन करण्याचे. आमरण व बिनबोभाट ही सहनशीलता तिने पत्करली नसती, पदोपदी तिने आपल्या स्वाभाविक हक्कांचे हवन करून आपल्या पुरुष साथीदारांच्या माथ्यावर कर्तव्याचे ऋण साचविले नसते, तर आमचा हा संसारशकट वंगण नसलेल्या चाकाप्रमाणे कर्कश झाला असता व लवकर झिजला असता. फार तर काय इतके सर्व करून, आपण करतो असा तिने नुसता बोभाटा केला असता तरी आमच्या सुखाची घडी बिघडली असती. ही तिची सहनशीलता केवळ दैवी सामर्थ्यच म्हणावयाचे, दुसरे काय !

भगवान श्रीकृष्ण विभूतिविस्तार सांगून शेवटी एक साधारण सिद्धांत सांगतात-
माझ्या दिव्य विभूतीला अंत नाही परंतपा ।
हा तो विभूति विस्तार म्या संक्षेपेचि वर्णिला ।।
आता जो का भाग्यवंत प्राणी श्रीमंत ऊर्जित ।
तो तो तू जाण की माझ्या तेजांशाचाचि संभव ।।
- अध्याय १०, वामनपंडित

गीताकार प्रत्यक्ष श्रीकृष्णाइतके रसिक आणि सत्यग्राही असते तर त्यांनी वर दिलेल्या विभूतिविस्तारात स्त्रीचे उदाहरण खचित दिले असते. स्त्रीमधीलही श्रीमंत आणि ऊर्जित सहनशीलता दैवी तेजाचा अंश कोण नाही म्हणेल ? साधेभोळे तुकोबा तर आपला निष्कपट अनुभव निवेदन करितात की,
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरवीति ।।

भक्त केशवचंद्र सेन ह्यांनी खाली वर्णिल्याप्रमाणे चहूंदिशी ईश्वरीरूप पाहून नमस्कार केला आहे :
हा विशाल संसार । तव प्रिय परिवार ।
नरनारी त्वत् प्रकाश । महिमा अपार ।
स्त्रीलोक-बालक-शत्रु-मित्र पदी वारंवार नमस्कार ।
तुम्ही सर्व मूलाधार ।।
नमो देव, नमो देव । नमो निरंजन हरी ।।धृ।।

ह्यावरून आपण स्त्रीच्या ठिकाणचे दैवत ओळखले पाहिजे, इतकेच नव्हे, तर त्याला अत्यंत आदरपूर्वक अनेकवार नमन केले पाहिजे. असे असून रामकृष्णादिकांचे ठायी पराक्रम पाहून किंवा बुद्ध, ख्रिस्तादिकांचे प्रेम पाहून केवळ पुरुषांच्या ठायीच आम्ही ईश्वर पाहतो हे कसे ? भारत, रामायण आणि इलियड ही सारी पुरुषांचीच गोडवी गात आहेत तर काय ? पण पुरातन काळापासून आमची सहचारिणी आम्हांबरोबर चालत आलेली अबला स्त्री तिच्यामध्ये काही दैवी अवतार नाही काय ? ईश्वराचा कर्तृत्वशक्तिरूपी जो प्रखर अंश त्याचे द्योतक म्हणून चंडी, मुंडी, महाकाली इत्यादी देवींची रूपे आम्ही हिंदूंनी कल्पिली आहेत. पण तो प्रकारही पौरुष गुणांचा सत्कार झाला. सहनशक्तिरूपी ईश्वराचा जो सौम्य अंश आहे त्याची कल्पना आम्हा अवतारप्रिय हिंदूंना अद्यापि नाही हे किती नवल आहे.

“मातृदेवो भव” मातेच्या ठायी देवाला पहा असे मनूजी सांगतात. पण स्त्री सर्व अवस्थेत सर्व प्रसंगीही माताच असते. पती, पिता, पुत्रादिकांचे ती सर्वच काळी अपराध सहन करिते, शुश्रुषा करिते आणि लाड पुरविते म्हणून ती सर्वांची सारखीच माता म्हणावयाची. तर आपण केवळ मातृदेवो भव असे न म्हणता स्त्रीदेवो भव असे म्हटले पाहिजे. ज्याने आपल्या पत्नीला तुच्छ मानिले, कन्येला हेळसांडले, सुनेला लाथाडले, त्याने नुसत्या आपल्या मातेपुढे मात्र मान लवविली तर तो त्याचा मिथ्याचार समजावा. आपली बायको, बहिण, मुलगी, सून ह्या सर्वजणी कोणाच्या तरी आया असणार किंवा होणार व आपली आईही तशीच कोणाची तरी बायको आणि कोणाची तरी सून असणार. तर मग दुस-या कोणाचा तरी देव तो आपला पायपोस आणि आपण धि:कारलेली वस्तू दुस-या कोणाचे तरी पूजास्थान हा कोण प्रकार ? पूज्यतेच्या बाबतीत हा उलटासुलटा न्याय अत्यंत दु:सह आहे.

दुस-या एका प्रकारच्या लोकांचा धर्म ‘स्त्रीदेवो भव’ असा असतो तसा मात्र येथे अर्थ समजू नये. नामदेवानी म्हटले आहे की,
ऐका कलियुगाचा आचार । अधर्मपर झाले नर ।।१।।
मंचकावर बैसे राणी । माता वहातसे पाणी ।।२।।
स्त्रियेसी अलंकार भूषण । माता वळीतसे शेण ।।३।।
स्त्रियेसी पाटावाची साडी । माता नेसे चिंध्या लुगडी ।।४।।
सासु सास-या योग्य मान । मायबाप न मिळे अन्न ।।५।।
साली सासवा आवडती । बहीणभावा तोंडी माती ।।६।।
स्त्रियेसी एकांत गोडी । मातेसी म्हणे xx वेडी ।।७।।
म्हणे विष्णुदास नामा । ऐसा कलियुगीचा महिमा ।।८।।

वर वर्णिलेल्या मिथ्याचाराचा निषेध कोणीही करील. कारण ह्या ठिकाणी पुरुष स्त्रीचे ठायी देव पहात नसून एक उपभोग्य वस्तू पाहून तिच्या ठिकाणी लाचावलेला असतो, इतकेच. हा प्रकार केवळ तामसी झाला. ज्या स्त्रीच्या पोटी आपण झालो तिने आपल्याला प्रेमाने, सहिष्णुतेने आणि कौतुकाने वागविले म्हणून तिलाच तेवढे देव मानणे हा प्रकार राजसी झाला. पण स्त्रीजातीच्या ठायी हे दैवी गुण स्वाभाविकच आहेत हे जाणून सर्व स्त्रीजातीला पूज्य मानून तिचा सत्कार करणे हा सात्विक प्रकार होय, हेच सुधारकाचे लक्षण, हीच सभ्य गृहस्थाची चालरीत समजावी.

सहनशीलता हा गुण पुरुषामध्ये मुळीच नसतो असे नाही. कित्येक पुरुषांमध्ये स्त्रीस्वभावाचे प्राबल्य असते. तसेच उलटपक्षी कित्येक स्त्रियांमध्येही शौर्यधैर्यवीर्यादी पुरुषस्वभावाचे प्राबल्य दिसून येईल. तात्त्विकदृष्ट्या पाहता स्त्रीपुरुष हा भेद केवळ शारीरिक नाही तर मानसिक आहे हे उमगेल. शौर्य आणि सहिष्णुता हे दोन्ही दैवी गुण होत. एक सामर्थ्यदर्शक, दुसरा दौर्बल्यदर्शक अशातला प्रकार नसून दोहोंमध्ये भिन्न प्रकारचे ईश्वरी सामर्थ्यच आहे असे जाणले पाहिजे. आणि ह्या दोहो प्रकारच्या सामर्थ्याची सुसंगत घडल्यामुळेच संसार चालत आहे. एरवी तो चालणे शक्य नाही हे जाणून हे दोन गुण ज्या दोन भिन्न जातींमध्ये विशेषपणे वसत आहेत त्यांनी परस्परांशी योग्य आदर राखावा, स्वत:चीच बडेजावी मिरवू नये, म्हणजे संसार सुरळीत चालेल, इतकेच नव्हे तर नर आणि नारी ह्यांचे ऐक्य होऊन एक पूर्ण पुरुष उदय पावेल आणि तेथेच ईश्वरदर्शन किंवा ब्रम्हसाक्षात्कार घडेल.
ॐ शांति: शांति: शांति: ।

स्तुती, निर्भत्सना व निंदा

जाणोनि नेणते करी माझे मन| तुझी प्रेमखुण देऊनिया||१||
मन मी व्यवहारी असेन वर्तत| जेवी जळा आत पद्मपत्र||२||
ऐकूनि नाइके निंदास्तुति कानी| जैसा का उन्मनी योगीराज||३||
तुका म्हणे ऐसे झालिया वाचून| करणे ते ते शीण वाटतसे||४||

संसार करीत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या व्यवहारात निमग्न रहावे लागते. आणि हे व्यवहार करीत असताना आपली स्तुती ऐकण्याचे प्रसंग प्रत्येकास येतात. निंदेचेही प्रसंग येतात, त्यांचा विचार पुढे करू. परंतु आपले हातून सदव्यवहार घडो, किंवा अविचाराची कृत्ये होवोत, आपली कोणी ना कोणी केव्हा तरी स्तुती करणारे आढळतेच! बाहेरचे कोणी नसले तरी आपले आप्त, आपली बहीण, पत्नी असे कोणी तरी आपली स्तुती करतेच. तूर्त हा स्तुतिनिंदेचा विचार मनात यावयास आमचे तरूण मित्र रा. रा. केशव सदाशिव केळकर ह्यांनी केकावलीवर जो एक लहानसा वाचनीय निबंध लिहून प्रसिद्ध केला आहे, त्याच्या अखेरीस दिलेल्या केकांतील पुढील केका विशेष रीतीने कारण झाली आहे:
गमो मधुर हे विष स्तवन सेविता माजवी|
करकी मलिन सद्यशोमुख हलाहला लाजवी||
हरापरिस तू बरा प्रभुवरा सदा जो पिशी|
असा रस समर्पि त्या अमृत आपुले ओपिशी||

ह्या केकेमध्ये पंतांनी हरीला हरापेक्षा म्हणजे शंकरापेक्षा श्रेष्ठ ठरविले आहे. शंकराने हलाहल नामक अत्यंत जहाल विष एकदा प्राशन केले. आणि त्याने ते पचविलेही. परंतु त्याचा शेष राहिला म्हणून म्हणा किंवा दुस-या काही कारणामुळे असो त्याला नीलकंठ असे म्हणतात! तथापि परमेश्वराची स्थिती ह्यापेक्षा फार निराळी आहे. अत्यंत जहाल जे हलाहल विष त्याच्याही पेक्षा जहाल विष ह्या जगात आहे. त्याचे परमेश्वर सेवन करतो, ते घटाघटा पितो एवढेच नव्हे तर ‘असा रस समर्पि त्या अमृत आपुले ओपिशी’ इतके जहालातले जहाल विष कोणते? तर ते ‘स्तुती’ होय. हे विष आहे असे आम्हांला वाटतही नाही, म्हणून आम्ही ते पचवितो, घटाघटा त्याचे प्राशन करतो, पण त्याचा अत्यंत अनिष्ट परिणाम झाल्यावाचून राहत नाही. आम्हांला आमची कोणी स्तुती केली म्हणजे जरा बरे वाटते. काम करण्यास उत्साह येतो असे वाटते व काम करण्यास उत्साह यावा, उत्तेजन मिळावे म्हणून स्तुतीची आवश्यकता आहे असे वाटू लागते. विडी ओढण्याचे व्यसन ज्यास अद्याप लागलेले नाही अशा मनुष्याने विडीचा एक झुरका मारला की, त्यास मोठी हुषारी आली असे वाटते, पण पुढे ते उत्तेजन वगैरे बाजूस राहून धूम्रपान हे त्यास व्यसनच जडते व त्यावाचून त्याचे चालत नाहीसे होते. स्तुतिरूपी हे विष त्याहून वाईट आहे.

व्यसनाचे अनिष्ट परिणाम आपल्याला दिसतात, व्यसन वाईट म्हणून टाळण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतो. पण मनुष्य एकदा स्तुतिप्रिय झाला की मग त्याच्या अधोगतीस सीमा नाहीशी होते हे आपण नित्य लक्षात ठेविले पाहिजे. आपल्या ठिकाणी पात्रता नसता आपली जी स्तुती होते त्याच्यायोगे जडता प्राप्त होतेच, परंतु हा पात्रापात्रतेचा विचार तूर्त दूर ठेविला तरी स्तुती आमच्या अधोगतीसच कारण होते असे दिसून येईल.

मी एकादे उपयुक्त कार्य करीत आहे असे वाटून लोक माझी स्तुती करू लागतात. लोक बरे म्हणू लागताच ते कार्य प्रथम अधिक उत्साहाने करावयास लागतो, पण हा उत्साहच माझ्या घातास कारण होतो. नंतर लोकांनी माझी स्तुती केलीच पाहिजे अशी भावना माझअया ठिकाणी उत्पन्न होते. स्तुतीला मी पात्रच आहे, इतरांपेक्षा मी थोर आहे, माझ्या ठिकाणी इतरांपेक्षा परोपकारबुद्धी अधिक वास करीत आहे, देशहिताची आस्था मलाच आहे असे वाटून मी अधोगतीस जात असतो आणि ह्या माझ्या अवनतीस, हलाहलापेक्षाही जहाल जे स्तुतिरूपी विष तेच कारण झालेले असते.

आता आपण निंदेविषयी थोडा विचार करू. आणि तो करीत असता निर्भर्त्सनेसंबंधाने असे दोन शब्द सांगणे जरूर आहे की, कोणाच्याही हातून घडलेल्या वाईट कृत्याबद्दल जी निर्भर्त्सना होते ती व निंदा एक नव्हेत. निर्भर्त्सना होणे हे ठीक आहे. नीच कृत्य होत नसूनही आपणास दोष देण्यात येत असतो, आपल्याविषयी भलभलते ग्रह आपल्या सभोवार होत असतात, चर्चा चालू असते, ती निंदा. निर्भर्त्सना व सत्कृत्य ही एके ठिकाणी असू शकत नाहीत. धडधडीत सत्कृत्य करणाराची जर कोणी निर्भर्त्सना करू लागला तर त्यास आपण वेडापीर म्हणू!

पण, निंदेचे तसे नाही. स्तुती ज्याप्रमाणे आम्हांला जहाल विषाहून विष वाटू लागली पाहिजे त्याप्रमाणे निंदा हे एक अमृतच आहे असे आम्हांस वाटू लागले पाहिजे. कोणी आणची निंदा केली की, आम्ही प्रथम अगदी निरूत्साह होतो, आमची आस्था डळमळू लागते, आमच्या ठिकाणी एक प्रकारची उद्विग्नता नांदू लागते व निंदा करणारासंबंधाने अनादर, हेवा इ. आमच्या ठिकाणी जागृत होतात. पण असे न होता निंदा ही आम्हांला अमृताप्रमाणे वाटू लागली पाहिजे! निंदेच्याद्वारे आपले दोष आपल्याला कळू लागतात, त्यांच्याविषयी आपल्या ठिकाणी जागृती होते, आपले दोष आपणच शोधून काढावे अशी मनाची प्रवृत्ती होऊ लागते. आपण सत्कृत्यामध्ये निमग्न असूनही निंदा होते असा अनुभव आला म्हणजेही ‘जेवी जळा आत पद्मपत्र’ अशी आपली वृत्ती झाली पाहिजे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे जे तुकोबांनी आपल्या एका अभंगामध्ये म्हटले आहे ते ह्याचसाठी की निंदेच्याद्वारे आपले दोष आपल्याला सहज कळतात. परंतु विनाकारण निंदा होत असली, तरी तिजकडे आपण दुर्लक्ष करून, ही अशी निंदाच माझ्या शुद्धीस कारण होईल असे मानून आपण आपल्या कार्यामध्ये रत असले पाहिजे, निंदा अमृततुल्य मानावयास लागले पाहिजे.

मार्कस आरेलिअस ह्याने एके ठिकाणी म्हटले आहे:

“Do but your duty and do not trouble yourself,
Whether….you have a good word or bad one…..

श्रीकृष्णाचा कर्तव्यनिष्ठेसंबंधाने आपल्याला असाच उपदेश झालेला आहे. सारांश, व्यवहारामध्ये आपण नांदत असताना स्तुति-निदां ऐकण्याचे प्रसंग आपल्यावर वारंवार येत असतात. आम्ही निंदेला भीत असतो. पण खरे पाहता स्तुतीला आम्ही अधिक भ्यावयास पाहिजे. कारण स्तुती आमच्या घातास कारण होते. स्तुतीचे व्यसन जडले म्हणजे इतरांनी आपली स्तुती केलीच पाहिजे असे आपणांस वाटू लागते. पण, निंदा ही आमची मैत्रीण होऊ शकते. निंदा आम्हांस कर्तव्यनिष्ठा करणारी, विनम्रवृत्ती अंगामध्ये भिनवणारी, इतरांविषयी मनामध्ये उदारभाव उदित करणारी, स्वत:च्या दोषांविषयी चित्तामध्ये जागृत ज्योत पेटविणारी अमृतवल्ली आहे! अशा प्रकारे आपण आपल्या कर्तव्यात निमग्न असताना स्तुतिनिंदेचा योग्य उपयोग जर आपण करून घेऊ लागलो तर आम्हांपैकी प्रत्येकाला मार्कस आरेलिअसप्रमाणे “I do my duty that is enough”. मी माझ्या कर्तव्यात एकनिष्ठेने निमग्न आहे. तितकेच मला पुरे आहे, असे म्हणता येईल.

सोमवंशीय सन्मार्दर्शक समाज

(सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाजातर्फे अस्पृश्य वर्गाची जाहीर सभा, पुणे.........एका कळकळीच्या भाषणातील काही भाग.)

ह्या समाजातील कामे करणारी सर्व तरूण मंडळी आमच्या पुणे येथील बोर्डिंगमध्ये शिकून मोठी झालेली आहेत. त्यांनी आपल्या जातीला सन्मार्ग दाखविण्याचे हे काम पत्करलेले पाहून प्रत्यक्ष त्यांच्या आईबापापेक्षा मला कौतुक वाटणे साहजिकच आहे. प्रथम निराश्रित साहाय्यकारी मंडळीचे काम ह्या शहरात सुरू झाल्यापासून शिमग्यातील बीभत्स प्रकार बंद करण्यासाठी होलिका संमेलनाची योजना झाली. ह्या वेळी निरनिराळ्या जातींच्या पेठानिहाय मंडळ्या स्थापण्यात आल्या. अशाच मंडळीपैकी अस्पृश्यवर्गाच्या मंडळीनी, हा कायमचा समाज स्थापिलेला पाहून होलिका, संमेलनाच्या चालकांच्या उद्देश कल्पनेपेक्षाही अधिक सफल झाला म्हणावयाचा. अस्पृश्य वर्गाच्या काही काही वस्तीमध्ये शिमगा नसताही त्यातील बीभत्स प्रकार दिसून यावयाचे ते दिवस जाऊन आता काही शिकलेल्या तरूण मंडळीनी आपल्या जातीच्या उद्धाराने काम कायमचे पत्करले हे देशातील एक सुचिन्हच होय. येथे जो मोठा स्त्रीसमूह जमलेला आहे, त्यांना उद्देशून मला एवढेच सांगावयाचे आहे की, जर त्यांनी आपल्या ताब्यातील सर्व लहान मुलांना आमच्या शाळेत घातले तर थोडक्यात काळात आतासारखे समाज अधिक निर्माण होऊन जातींचे कल्याण हा हा म्हणता होईल. आमचे मिशन नुसते शाळेचेच काम न करिता त्याबरोबर इतरही कामे करीत आहे. उदा. आजचे अध्यक्ष डॉ. खेडकर हे मिशनने चालविलेल्या धर्मार्य दवाखान्यात रोज सकाळी एक तास येऊन औषधे फुकट देत असतात. तरी पुष्कळ भोळ्याभाबड्या बाया आपले स्वत:चे किंवा लेकरांचे आजार अद्यापि ह्यांना न दाखविता मांत्रिक, भगत व देवर्षी ह्यांच्या नादी लागून आपले पैसे व जीव धोक्यात घालतात. आजच्या प्रसंगी एका महत्वाच्या विषयावर अस्पृश्य वर्गाच्या जबाबदार पुढा-यांना दोन शब्द सांगणे मला जरूर आहे. हल्ली आपल्या देशावर मोठा आणीबाणीचा प्रसंग आहे. सार्वभौम सरकार चिंतामग्न झाले आहे. जनतेचे सर्व जातीचे पुढारी राजकीय हक्क साधण्यास सिद्ध झाले आहेत. अशा वेळी तुमच्यामध्येही झपाट्याने जागृती होत आहे, हे इष्टच आहे. जातवार प्रतिनिधित्वाचा हक्क मिळाला नाही म्हणून इतरांप्रमाणे तुम्हीही सरकारवर रूसून बसण्याची ही वेळ नव्हे, हे मला तुमच्या हितासाठी कळकळीने सांगणे आहे. काही झाले तरी सरकार तुमच्या बाजूस आहे. जातवार प्रतिनिधित्वाचाच हक्क देण्याच्या कामी सरकारने म्हटल्याप्रमाणे जरी अनेक अडचणी असल्या तरी कौन्सिलमध्ये तुमच्याच जातीचे थोडे खास प्रतिनिधी निवडून देण्याची तजवीज होईल, अशी मला अद्यापि बळकट आशा आहे. म्हणून मला तुम्हाला अगत्याचे सांगणे आहे की, त्यावेळी तुम्ही सरकारशी फटकून वागू नये., किंवा बेजबाबदारपणाने न समजताच काहीतरी टीका करू नये. राजकीय हक्क संपादण्याचा खरा मार्ग म्हणजे, सरकारास तन, मन, धन खर्च करून ह्या लढाईत शिकस्तीची मदत करणे हा होय. तुमच्या जातीची एक पलटण पूर्ण झालेली आहे आणि ती हल्ली बडोदा कँपमध्ये आहे, असे मला एका मित्राने सांगितले आहे. ते ऐकून मला अतिशय आनंद झाला आणि सैन्य भरतीच्या कामी हल्लीपेक्षाही अधिक जोराने प्रयत्न झाल्यास साम्राज्याचेच नव्हे तर तुमच्या जातीचेही कल्याण होईल.

  1. सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला विस्मय व विषाद
  2. सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
  3. सुधारकांची जुनी परंपरा (स्फूट)
  4. सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
Page 1 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी