प्रकरण ३. काठेवाडचा दौरा

१९०६ च्या एप्रिलमध्यें माझे मित्र गुजराथचे नानालाल कवि सादरा येथें सरकारी नोकरींत होते. त्यांना उन्हाळयाची सुटी पडल्यामुळें माझ्याबरोबर काठेवाडांत समाजाच्या प्रचारकार्यासाठीं दौरा काढण्याचें ठरविलें. मी त्यांच्या घरीं सादरा येथें गेलों. स्टेशनहून सादरा गांव बराच लांब असल्यानें व प्रदेश वाळवंटाचा असल्यामुळें माझी प्रवासाची उंटावरून जाण्याची व्यवस्था केली होती. संवय नसल्यामुळें ह्या प्रवासाचा मला बराच त्रास झाला. अंग फार हालल्यानें दोन दिवस कमरेला ठणका लागला होता. साद-याहून आम्ही दोघे प्रथम अहमदाबाद प्रार्थना समाजांत गेलों. तेथें व्याख्यानें आणि सभासदांशीं परिचय वगैरे करून घेण्यांत दोन दिवस गेले. समाजाचे अध्यक्ष लालशंकर उमीयाशंकर यांची प्रथमच ओळख झाली. त्यांनी स्थापलेलें मोठें अनाथालय पाहिलें. ह्या समाजाला पैशाचें भरपूर साहाय्य आहे. प्रार्थना मंदिर प्रशस्त आणि सुंदर आहे. सभासदांची संख्या पुष्कळ आहे, पण अनुष्ठानिक सभासद फारच कमी होते. रा. रमणभाई नीलकंठ समाजाचे चिटणीस होते. अहमदाबादहून आम्ही राजकोटला गेलों. प्रसिध्द विद्वान् (प. वा.) शंकर पांडुरंग पंडित, बॅ. सीतासम पंडित आणि घनश्याम नारायण पंडित हे तीन पंडित बंधू काठेवाडांत मोठी मान्यता पावलेले राजकोटांत कायमची वस्ती करून राहात असत. आम्ही शंकर पांडुरंग यांचे घरीं उतरलो. रा. शंकर पांडुरंग पंडित हे प्रार्थनासमाजिष्ट होते, आणि दुसरे दोन प्रागतिक ध्येयाचे होते. राजकोटांत राजकुमार कॉलेज व इतर तशाच मोठया लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची मध्यवर्ति संस्था होती. ग्राशिया नांवाचा काठेवाडांतील जमिनदारांचा श्रीमंत वर्ग असे; त्यांचीहि एक शाळा श्रीमंती थाटाची होती. कवाईत करणे, घोडयावर बसणें व इतर मर्दानी खेळ खेळणें ह्या बाबतींत ह्या कुमारांची फार काळजी घेण्यांत येत असे. आणि हीं कामें ह्या तरुणांना फार आवडतहि असत. क्षत्रियाला शोभणारा पेहेराव, पाणीदार वृत्ति आणि कसलेली शरीरप्रकृति पाहून आनंद झाला. मुंबई इलाख्यांतील राजेरजवाडयांच्या मुलांची सोय येथें एकत्र केल्यानें परस्पर परिचय होऊन ते पुढें राजपदारूढ झाल्यावरहि तो कायम राहात असे. राजकोटहून आम्ही भावनगरला गेलों. तेथील कॉलेजांत माझें व्याख्यान झालें. सर प्रभाशंकर पट्टणी यांचें या संस्थानांत फार वजन असे, त्यांचीहि ओळख झाली. भावनगरहून आम्ही जुनागडला गेलों. दिवाणांचेकडे उतरलो. व्याख्यानें, भेटी हा ठरीव कार्यक्रम झाल्यावर जवळच असलेल्या गिरनार पर्वतावर जाण्याचा विचार ठरला. दिवाणांच्या ओळखीमुळें गिरनार पर्वतावर आमची राहण्याची व्यवस्था मोठया बडदास्तीची झाली.

“गढ जुनो गिरनार वादळ थीनुं बातुं करी”ही काठीवाडी म्हण बहुजन समाजांत प्रसिध्द आहे. तिच्यामुळें हा गड पाहण्याची आम्हांस फार आतुरता लागली होती. मेघाशीं भाषण करणारा हा जुना गड गिरनार जवळ जवळ चार हजार फूट उंच आहे. त्याच्या पायथ्याशीं एका मोठया प्रशस्त दगडावर सम्राट अशोक राजाचा एक प्रसिध्द शिलालेख आहे. गिरनारच्या पश्चिमेस गीर नांवाचें प्रसिध्द जंगल लागूनच आहे. त्यांत पशूंचा राजा सिंह त्याचें साम्राज्य आहे. हिंदुस्थानांत याची पैदास दुसरी कोणीकडे नसल्यानें या जंगलाला मोठें महत्व आलेलें आहे. जुनागडच्या प्राणिसंग्रहालयांत सुमारे १०|१२ सिंह आम्हीं पाहिले; त्यावेळीं त्यांच्या घोर गर्जनांनीं प्रदेश निनादून गेला. हें दृश्य मोठें प्रेरणा करणारें होतें. खर्च्यांवरून आम्हांला गिरनारवर नेण्यांत आले. संस्थानच्या आतिथ्यालयांत आमची थाटाची सोय झाली. शिखरावर प्रसिध्द आणि प्राचीन अशीं कित्येक सुंदर जैन मंदिरें आहेत. स्वामीनारायण पंथाचींहि कांहीं देवळें आहेत. येथून आसमंतांतला देखावा आत्म्याला जागृत करणारा दिसतो. ह्या पर्वतावर मोठमोठया खोल गुहा आहेत. त्यांतील एका गुहेमध्यें आम्ही प्रवेश करून अंधारांतून बरेंच लांबवर आंत गेल्यावर गाभा-यात कितीतरी निस्संग आणि विरक्त साधू रहात असलेले आम्हीं पाहिले. पेटलेल्या धुनीचा प्रकाश अंधारांत रौद्ररसाची प्रेरणा करीत होता. साधूंच्या मुद्रा गंभीर आणि प्रसन्न, शरीरें धष्टपुष्ट आणि तेजःपुंज, बहुतेक नग्न आणि राखेनें माखलेलीं पाहून फार आश्चर्य वाटलें. ह्या निर्जन प्रदेशांत ह्या साधूंची खाण्यापिण्याची सोय कशी लागते, इतर योगक्षेम कसा चालतो याचें कोडें आम्हांला पडलें. आम्हा प्रापंचिकांच्या मनांत अर्थात् असले खाण्यापिण्याचे विचार अगोदर येणार. साधूंना असले प्रश्न विचारल्यास त्यांनीं नुसतें हंसून आमची बोळवण गेली. गुहेच्या आसपास ठिकठिकाणीं शुध्दोदकाचीं कित्येक टांकीं दिसलीं. त्यांचा उपयोग हे साधु आणि जंगलांतले व्याघ्रादि वन्य पशू यांच्याशिवाय दुसरे कोण करणार ? हे आळीपाळीने टांक्यावर येऊन जात असत. त्यांच्या गांठी भेटी झाल्यास काय प्रकार घडत असेल हें कळण्याला मार्ग नव्हता. अशा समागमांत चार दिवस आमचे मोठया समाधानाचे, एकांतवासाचे आणि धर्मचिंतनाचे गेले. आणि परत आम्ही जुनागडास दिवाणांच्या कोठींत आलों. तेथें मियागांवचे ठाकूर बडोदे सरकारचे मांडलिक आमचे सहपाहुणे होते. ठाकूरसाहेबांनीं परत जातांना आपल्या मियागांव या जहागिरीच्या जागीं मीं दोन दिवस राहून जावें म्हणून मोठया अगत्याचें आमंत्रण केलें व तें मीं आनंदानें पत्करलें. प्रार्थना समाजाच्या कार्याविषयीं ठाकूरसाहेबांनीं मोठी सहानुभूति प्रकट केली. येथून दुस-या एका लहानशा संस्थानच्या गांवीं आम्हीं गेलों. तेथें काठेवाडी जुन्या मताचे शाहीराची भेट झाली. त्याचीं साधीं व परिणामकारी भजनें एकतारीवरचीं ऐकावयाला मिळालीं. त्यांतील तेजाभगत नांवाच्या शाहीराचीं दोन तीन अनुभविक पदें मीं उतरून घेतलीं. पुढें माझ्या कीर्तनांत त्यांचा चांगला उपयोग झाला. दिवस उन्हाळयाचे असल्यामुळें रात्री फार सुखावह गेल्या. तेथें नाथालाल कवीची व माझी ताटातूट झाली. मी एकटाच अहमदाबादेहून मुंबईकडे परतलों.