प्रकरण ३. काठेवाडचा दौरा (2)

अशा प्रवासांत मला नेहमीं एक स्मरणीय अनुभव येत असे. त्याचा उल्लेख करणें बरें. कधीं श्रीमंतांचे घरीं थाटाचें आदरातिथ्य तर लगेच खाण्यापिण्याचे अत्यंत हाल अशी स्थितीची अलटपालट होऊन माझी चांगली कसोटी लागत असे. उत्तम साळीचा भात खाऊन दुसरे दिवशीं शिळी भाकरहि मिळत नसे. अहमदाबादेस मी परत येतांना थोडाच वेळ राहिल्यामुळें गाडी अवेळीं निघाल्यानें मला एक दिवसाचें उपोषण पडलें. बी. बी. सी. आय. रेल्वेवरील मियागांव स्टेशनवर गाडी भर बारा वाजतां मला सोडून पुढें चालती झाली. स्टेशन क्षुद्र असल्यानें तेथें कसलीच सोय नव्हती. दोनचार मिनिटांत गाडी गेल्यावर सर्वत्र सामसूम झाली. स्टेशन मास्तर, पोर्टर कोठें गेले तें कळेना. उन्हांत पिण्याला पाणी मिळेना तर खाण्याची गोष्ट काय ? दीड दिवसाच्या उपोषणानें माझ्या पोटांतील कावळे आंतडीं कुरतडूं लागले. अर्ध्याच मैलावर एक कुग्राम होता. ट्रंक व बिछाना प्लॅटफॉर्मवरच टाकून मी तेथें भक्ष्यशोधार्थ गेलों. त्या ओसाड खेडयांत मला नीट माणसेंहि दिसेनात, दारें लागलेलीं व उघडीं असतील तर माणसें नसलेलीं असा प्रकार होता. मी एका ब्राह्मणाच्या घरांत शिरलों. त्याच्या घरीं श्राध्द होतें असें कळलें. दोन प्रहर उलटून गेले तरी हा यजमान नुकताच उठून हजामतीला बसला होता. जेवणाची सोय होईल कां विचारतां त्यानें मी ब्राह्मण आहे कां असें विचारलें. नाहीं म्हणतांच त्यानें मला चक्क बाहेर जाण्यास सांगितलें. हताश होऊन शेवटीं एका शिंप्याचे दुकानवर आलों. माझी कठीण अवस्था सांगितली. शिंप्याला पाझर फुटला. आपली पत्नी जवळच्या तळयावर गेली आहे. ती आल्यावर कांहीं उरलेंसुरलें असल्यास मिळेल असा त्यानें धीर दिला. शेवाळलेला घाणेरडया पाण्याचा घडा डोकीवर घेऊन बाई परत आली. तिनें एका पितळींत कालचा उरलेला उसळीवजा भात व त्याहून शिळी कढी एका वाडग्यांत वाढली. कढींत पाहतों तर चारपांच माशा पडलेल्या होत्या. मुकाटयानें त्या वेंचून टाकून मीं हें पक्वान्न अधाशासारखें खाल्लें. पण पाणी कांहीं केल्या पिववेना. कसेंबसें आंचवून मी बाहेर ओठीवर शिंप्याजवळ येऊन एका चटईवर पडलों. श्रमामुळें झोंप लागली. अर्ध्या तासानें उठून चटईवरच पाणी प्यालों. माझ्या जवळच चटईवर एक मुसलमान गृहस्थ बसला होता. त्याची खंती न बाळगतां मी पाणी पितों हें पाहून शिंप्याचे डोळे लाल झाले. त्यानें कांहींच मुर्वत न ठेवतां मला दुकानांतून खालीं उतरण्यास सांगितलें. यांत मुसलमानाचा अपमान होऊन तोहि खालीं उतरला. तो पोलीस शिपाई होता. मोठया मिनतवारीनें मी कोण कोठचा आहें ही चौकशी तो करूं लागला. मी रेल्वेंतला एक उतारूं आहें, माझें सामान प्लॅटफॉर्मवर पडलें आहे, जात न पाळणारा एक मराठा आहे, वगैरे सांगितलें. तो म्हणाला, “चला, जवळच आमचे फौजदारसाहेबांचें ठाणें आहे. तेहि मराठेच आहेत. तुमचें सामान मी स्वतः डोक्यावर घेऊन तेथें पोंहोंचवितों. तसें त्यानें केलेंही. फौजदारसाहेब कोल्हापूरचे माझे चांगले परिचयाचे निघाले. माझी कहाणी ऐकून ते कळवळले. पडदा पालटला आणि उत्तम सोय लागली. रात्रीं मी ठाण्यावर राहिलों. मियागांव तेथून सुमारें दोन मैलावर होता. एका पोलीसाकडून ठाकूरांस निरोप गेला. त्यांनी ताबडतोब एक सुंदर गाडी पाठविली. नानालाल कवीनें माझ्या येण्याबद्दलचें ठाकूरसाहेबांना जें पत्र पाठविलें होतें तें चुकून एक दिवस उशीराचें होतें म्हणून हा सर्व त्रास पडला असें सांगून ठाकूरजींनीं माफी मागितली. तेथें एक दिवस राहून थाटाचा पाहुणचार भोगून मुंबईस परत आलों. येणेंप्रमाणें प्रार्थना समाजाच्या आणि पुढील डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कामाकरतां काठेवाड आणि गुजराथ प्रांतीं मीं एकंदर चार सफरी केल्या.

१९०४ च्या पावसाळयाच्या आंत आमचे बाबा जमखिंडींतील वस्ती कायमची सोडून घरदार आणि कुटुंबांतील सारी मंडळी घेऊन मुंबईस आले. त्यापूर्वीच राममोहन राय आश्रममध्यें आमची राहण्याची सर्व व्यवस्था करण्यांत आली होती. गिरगांवांतील प्रार्थना मंदिराच्या आवारांत या आश्रमाची चार मजली भक्कम इमारत आहे. तळमजल्यांत भांडारकर ग्रंथालय आहे. दुस-या मजल्यावर लाकडाच्या पडद्या लावून निरनिराळया खोल्या करून आमची व्यवस्था करण्यांत आली होती. तिस-या मजल्यावर एक मोठें दालन असून त्यांत समाजाचीं संमेलनें वगैरे करण्याची व्यवस्था होती. चवथ्या मजल्यावर पुढें थोडी मोकळी जागा सोडून एक खोली काढण्यांत आली आहे. तेथें खासगी प्रार्थनेची जागा असून बाहेरून आलेल्या मिशनरीची सोय करण्यांत येते. मुख्य इमारतीपासून स्वयंपाकाकरितां खोल्यांची अलग सोय असून स्नानासाठीं तुटक खोल्या आहेत. एकंदर सोय चांगली आहे. माझ्या कुटुंबांत एकूण दहाबारा माणसें होतीं. समाजाचा प्रचारक या नात्यानें माझी नेमणूक झाली तेंव्हा माझ्या खर्चासाठीं दरमहा ६० रु. ची व्यवस्था करण्यांत आली. शिवाय प्रवासाचा वगैरे सर्व खर्च माझा मींच पाहून घ्यावा लागत असे. इतकेंच नव्हे तर समाजाचीं व तदनुषंगिक इतर कामें मीं काढल्यास त्याच्याहि खर्चाची जबाबदारी मजवरच पडे. सात वर्षे मीं हें काम केलें तरी माझ्या ह्या नेमणुकींत कांहीं वाढ झाली नाहीं, आणि ती मी मागावी असेंहि मला कधीं वाटलें नाहीं. मुंबई हा मुख्य राजधानीचा गांव. राममोहन आश्रमाची सोय झाल्यामुळें आणि त्याच्या पूर्वीपासूनहि पाहुण्यांची ये जा फार असे. समाजाचे सभासदच नव्हते तर इतरहि प्रागतिक मताचे सन्माननीय पाहुणे नेहमीं येऊन आश्रमांत उतरत. त्यांतील कांहीं युरोप वगैरे बाहेरदेशीं जाणारे व तिकडून येणारे प्रतिष्ठित गृहस्थ असत. त्यांच्याहि सरबराईचा बोजा आम्हांवर पडे. खर्चाचा प्रश्न बाजूला ठेवला तरी पाहुणचाराची दगदग आमच्या घरच्या कुटुंबियांवर नेहमीं पडे, आणि ही कळ बोलून दाखविण्यासारखीहि नव्हती. गृहमेधाचें कठीण दिव्य मुकाटयानें चालवावें लागे. घरचें सर्व देखरेखीचें काम बाबांकडे होतें. भावंडें शाळेंत जात असत. तीं मोठीं झाल्यावर माझ्या कामांत सामील झालीं. वृध्द आईबाबाहि माझ्याच नादीं लागलीं. माझ्या कार्याशीं मी इतका तादात्म्य झालों होतों कीं, माझें हें करणें न्यायाचें कीं अन्यायाचें होतें, सत्य होतें कीं असत्य होतें ह्याचा विचार त्यावेळीं माझ्या ध्यानांतहि नव्हता आणि घरच्या मंडळींची मनोरचना तक्रार करण्यासारखी तर कधीच नव्हती. असा हा आमच्या प्रपंचाचा अल्लारखी गाडा चालला होता.