प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद (२).

काशी येथें स्थानिक ब्राह्मसमाज नाहीं. गांव जुन्या मताचा व क्षेत्राचा असल्यामुळें तेथें स्वागत मंडळ स्थापणें फार जड गेलें. पण ह्या परिषदेचें महत्व प्रांतोप्रांतींच्या पुढा-यांना कळलें असल्यानें मीं जें त्यांना उद्देशून पत्रक काढलें त्याला सर्वांकडून उत्तेजनपर उत्तर व वर्गणीची रक्कम पण आली. बांकीपूरचे गुरुदास चक्रवर्ती आणि कानपूरचे महेंद्रनाथ सरकार ह्या दोघां साधारण ब्राह्मसमाजाचे सभासदांनीं काशीला जाऊन परिषदेची पूर्वतयारी करण्याचे कामीं मला मोठी मदत केली.

ब्राह्मसमाजाचे तीन पक्ष म्हणजे (१) राममोहन रायांनीं स्थापलेला आणि देवेंद्रनाथांनीं चालविलेला आदि ब्राह्मसमाज, (२) त्यांतून फुटून निघालेला केशवचंद्र सेन यांचा नवविधान ब्राह्मसमाज, (३) आणि त्यालाहि विरोध करून विभक्त झालेला साधारण ब्राह्मसमाज. सध्यां कलकत्त्यांतील तीन वेगळया शाखांचा बरावाईट परिणाम अखिल भारतांतील ब्राह्मसमाजावर आणि त्याच्या प्रसारावर काय घडला हें सांगण्याचें हे स्थळ नव्हे. मी तो परिणाम अभ्यासू या नात्यानें जाणून होतों. पण या तेढीचें स्वरूप ह्या तिन्ही पक्षाचे लोक काशी परिषदेंत हजर होते; म्हणून तें मला प्रत्यक्ष दिसलें. इतकेंच नव्हे पण पुढील कार्यांत पावलों-पावलीं नडूं लागलें. अध्यक्षाची निवड करण्यांतच मोठी नड आली. परिषद-कमिटीचे चेअरमन डॉ. भांडारकर व मुंबई समाजाचे अध्यक्ष नारायण चंदावरकर यांना काशीस येणें झालें नाहीं. वेळोवेळीं महाराष्ट्रीयानें पुढाकार घेणें हें इष्ट नव्हतें. काशी हें बंगालच्या सीमाप्रांतावर असल्यानें आणि पुढील अधिवेशन कलकत्त्यांत भरणार असल्यानें आणि उत्तरेकडील प्रांतांत बंगाली ब्राह्मणांचीच बहुसंख्या असल्यानें कलत्त्यांतील कोणातरी  सर्वसामान्य पुढा-यांना अध्यक्षस्थानीं बसविणें इष्ट होतें, म्हणुन पं. शिवनाथशास्त्री यांना अध्यक्षस्थान देण्यांत आले. आणि त्यांनीं अटकळीप्रमाणे काम देखील सुंदर रीतीनें केलें. परिषदेचें  काम एखाद्या स्थानिक समाजाच्या वार्षिक उत्सवाप्रमाणें डिसेंबर ता. २४ पासून ३१ पर्यंत मोठया सोहळयानें पार पडलें. उपासना, भजनें, व्याख्यानें, नामसंकीर्तनें आणि शेवटी प्रीतिभोजन इत्यादि तपशिलांत कोठेंच व्यत्यय आला नाहीं. निरनिराळया प्रांतांतून सुमारें ७५ ठिकाणांहून ब्राह्मसमाजाचे प्रतिनिधी आले होते. लंडन ख्रिश्चन मिशनच्या प्रशस्त हायस्कुलाशिवाय काशी येथें दुसरी कोठेंहि जागा मिळाली नाहीं हेंहि ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. दोनतीन वर्षांच्या अनुभवामुळें या खंडवजा हिंदुस्थानांतील दूरदूरच्या ब्राह्मसमाजांची सर्व प्रकरची माहिती आणि त्यांची सूची तयार करण्याची आवश्यकता मला भासूं लागली होती. ब्राह्मधर्म-सूचीग्रंथ मींच तयार करून प्रसिध्द करावा असा एक ठराव परिषदेनें एकमतानें पास केला. हा एक या परिषदेचा विशेष म्हणावयाचा. म्हणून परिषद संपल्यावर मी बंगाल, बिहार, आसाम या प्रांतांतून एक मोठा विस्तृत दौरा काढला. ब-याच दृष्टीनें हा दौरा महत्वाचा होता म्हणून त्याचा तपशील खाली देणें मला जरूर आहे.

ह्या परिषदेंत बंगाल्यांतील तीनहि पक्षांची परस्पर सहानुभूति बरीच वाढली व शिवाय निराळया प्रांतांतील ब्राह्म समाजिस्टांचा स्नेह झाला. अशा हितकारक परिषदेची खबर अधिक पसरावी, मुंबई प्रार्थना समाजासारख्या ति-हाइतांच्या कामाची इकडल्या दूरदूरच्या समाजांस माहिती कळावी (कारण प्रार्थनासमाज व आर्यसमाज ह्यांतीलहि भेद न जाणणारे कांहीं ब्राह्य समाजिस्ट इकडे भेटले). कांहीं प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करून घ्यावी, मुख्य मुख्य स्थानिक समाज समक्ष पहावे वगैरे हेतूनें मी ह्या सफरीवर निघालों.

बिहार प्रांताचीं राजधानी बांकीपूर येथें ता. २ जाने १९०६ रोजीं आलों. हा देश जरी बिहारी हिंदुस्थानी लोकांचा असला तरी येथें बंगाली लोकांची बरीच वस्ती असून सार्वजनिक बाबतींत त्यांचाच पुढाकार व सुळसुळाट दिसला. वायव्येकडील प्रांतांत ज्याप्रमाणें एकहि ब्राह्मण एतद्देशीय सांपडणें कठीण त्याप्रमाणें संबंध बिहार प्रांतांत बिहारी ब्राह्य समाजिस्टांची एकाच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी संख्या आहे. मुख्य ब्राह्मसमाज नवविधान मताचा आहे. भाई प्रकाशचंद्र रॉय, हे त्याचे पुढारी सर्वांशीं मिळून मिसळून वागून सार्वजनिक कामांत पुढाकार घेणारे आहेत. राममोहन रॉय सेमिनरी ही साधारण ब्राह्म समाजाची असून त्या शाळेंत ह्या पक्षाच्या उपासनाहि होतात. ता. ४ रोजी रॉय यांचे घरीं मीं प्रमुख मंडळी जमवून प्रथम मुंबईकडील हकीकत सांगितली. उत्सवांत एकमेकांनीं मिळून कार्यक्रम ठरवावा, एकमेकांच्या उपासनेस पाळीपाळीनें जावें असें ठरलें. बॅ. दास यांचे घरीं ता. ५ रोजीं दोन्हीं पक्षांच्या स्त्रियांची सभा भरली. पोस्टल मिशन,
डोमेस्टिक मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामें स्त्रियांनीं कशीं करावयाचीं हें सांगितलें. सिल्हेटहून काशी परिषदेस आलेल्या सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्यांनीं हिंदींत भाषण केलें.

ता. ६ रोजीं मोंघीर येथें आलों. हें रमणीय स्थान भागिरथीचे कांठीं आहे. पुराणांतील राजा दानशूर कर्ण ह्याची दान देण्याची जागा अद्यापि गंगेच्या तीरावर दाखवितात. ब्राह्म यात्रेकरूंस या स्थळाचें महत्व असें सांगण्यात येतें कीं, ब्राह्म समाजांत पुढें जो भक्तिसंप्रदाय सुरू झाला तो मूळ या ठिकाणीं. सन १८७२ सालीं हल्लींचें मंदिर बांधण्यांत आलें. मंदिरांत एकदां कांहीं वैष्णव मंडळीस भजनास बोलाविलें होतें. त्यांपैकीं एका चांडाळ जातीच्या भक्तानें इतकें सुश्राव्य व आवेशयुक्त भजन केलें कीं, त्याचा मंडळीवर विलक्षण परिणाम झाला. पुढें साधू अघोरनाथ ब्राह्मप्रचारक यांचें भजनाविषयीं प्रेम अधिकाधिक वाढून शेवटीं स्वतः केशवचंद्र सेन येथें असतां त्यांच्यावरहि भजनाचा परिणाम घडला व येथील कार्य बरेंच वाढलें. तरी हल्लींची येथील ओसाड व दीनवाणी स्थिति पाहून मन गहिंवरलें व मानवी मनाची अस्थिरता पाहून विस्मय पावलें. मंदिरापुढील पटांगणांत केशवचंद्र सेन, साधू अघोरनाथ, दीननाथ चक्रवर्ती यांच्या तीन समाधी मध्यभागीं एका चौथ-यावर बांधल्या आहेत. १९०२ सालीं या गांवीं आर्य समाजाची स्थापना झाली. पण तोहि नीट चालत नाहीं.

भामलपूर येथें ता. ७ रोजीं पोहोंचलों. हा समाज ता. २२ फेब्रुवारी १८६४ रोजीं स्थापण्यांत आला. राजा शिवचंद्र बानर्जी नांवाच्या एका अत्यंत आस्थेवाईक हितचिंतकानें स्वतः सर्व खर्च सोसून मंदिर बांधलें. केशवचंद्र सेन ह्यांच्या हस्तें हें मंदिर उघडण्यांत आलें. समाजांत थोडी कां होईना पण बडी बडी, प्रमुख व वृध्द मंडळी आहेत. पण उपासनेशिवाय कांहीं काम होत नाहीं. ता. ९ रोजीं सुमारे ५|६ तरुण पदवीधर ब्राह्म मंडळीपुढें मुंबईच्या तरुण ब्राह्ममंडळाचे छापील नियम वाचून दाखविले आणि तेथील पूर्वीची तरुण संस्था पुन्हां स्थापन करण्याचें ठरविलें. ह्यानंतर रात्रीं ७ वाजतां बाबू निवारणचंद्र मुकर्जी यांचे घरीं प्रमुख मंडळी जमली. त्यांच्यापुढें मुंबईकडील समाजाचें ति-हाईतपणाचें काम ऐकून त्यांना फार समाधान झालें. दोघांनीं तर वारंवार अशी इच्छा प्रगट केली कीं, मुंबई व बंगाल प्रांतांतील ब्राह्मांचे अधिक निकट संबंध जुळविणें फार इष्ट आहे. त्याकरितां परस्पर-विवाह-व्यवहार करणें अवश्य आहे. मीं म्हटलें कीं, निरनिराळया प्रांतांतील ऐपतदार ब्राह्मांनीं निरनिराळया प्रांतांत प्रवास केल्याशिवाय वरील व्यवहार कधीहि शक्य होणार नाहीं.

प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद

 येथवर माझ्या प्रचारकार्याचें स्थानिक आणि प्रांतिक स्वरूपाचें वर्णन केलें, पण प्रथम सांगितल्याप्रमाणें माझें लक्ष ब्राह्मधर्माच्या विश्वव्यापकत्वाकडे आणि त्या उच्च अधिष्ठानावरून ब्राह्मधर्माच्या भारतीय कार्याकडे नेहमीं लागून राहिलेलें असें. या कार्याचें मुख्य अंग ही भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद होती. सन १८८५ सालीं हिंदी राष्ट्रीय सभेचें पहिलें अधिवेशन मुंबई येथें भरलें, त्यांत न्या. रानडे यांचा अप्रत्यक्ष पुढाकार होता. त्यांची बुध्दि अष्टपैलू, भावना उदार व उच्च प्रतीची होती. पुढील दोन अधिवेशनें कलकत्ता व मद्रास शहरीं झाल्यावर अलाहाबादला चवथी बैठक भरली. आरंभापासूनच राजकारणास समाजसुधारणेचा बळकट पाठपुरावा होता. अर्थात् ह्या चौथ्या बैठकींत उदारधर्माचा पाठिंबा ह्या राष्ट्रीय चळवळीस मिळें क्रमप्राप्तच होतें. ह्या एकेश्वरी बैठकीचे अध्यक्ष न्या. रानडे झाले. कलकत्याचे मिस्टर आणि मिसेस आनंदमोहन बोस, लखनौचे बिपिनबिहारी बोस, बिहारचे बलदेव नारायण, लाहोरचे पं. शिवनारायण अग्निहोत्री यांनीं आपापल्या प्रांतांतील ब्राह्मसमाजाच्या कार्यासंबंधीं भाषणें केलीं. पुढें सालोसालीं राष्ट्रीय सभा जेथें जेथें भरेल त्या वेळीं तेथें ही धर्मपरिषदहि भरविण्यांत यावी आणि पुढील वर्षाचे चिटणीस म्हणून पं. शिवनाथशास्त्री यांना नेमावें असा ठराव करण्यांत आला. १८८९ सालीं मुंबईला ही परिषद मुंबई प्रार्थना समाजांत भरली, आणि त्या वेळीं प्रांतोप्रांतींच्या पुढा-यांनीं भाग घेतला.

कलकत्याहून नवविधान समाजाचे प्रतापचंद्र मुझुमदारहि हजर होते. तेव्हां ब्राह्मसंघ (Theistic Union) या नांवाची एक मध्यवर्ती संस्था स्थापून पुढील कार्याचा प्रयत्न करण्यांत यावा असें ठरलें. नवीनचंद्र राय ह्यांना ह्या संघाचे चिटणीस नेमले. कलकत्यास साधारण ब्राह्मसमाज, नवविधान ब्राह्मसमाज व आदि ब्राह्मसमाज असे निरनिराळे पक्ष पडून ब्राह्मसमाजाच्या समाईक कार्यांत फूट पडली होती. ह्या वरील नवीन संघामुळें ही फूट भरून येण्याचा बराच संभव होता. आणि त्यांत आम्ही मुंबईकडील पुढा-यांनींच न्या. रानडे ह्यांच्या नेतृत्वाखालीं उचल खाल्ली असा तर्क करण्यास बरीच जागा आहे. कारण पुढील दोनतीन सालीं न्या. रानडे ह्यांनाच परिषदेचें अध्यक्षस्थान देण्यांत आलें होतें. चवथी बैठक नागपुरास १८९१ सालीं भरली. तेथें ब्राह्मसमाज नसल्यामुळें काम फारसें झालें नाहीं. पुढील सालाकरतां वामन आबाजी मोडक, पांडुरंग सदाशिव केळकर यांस चिटणीस नेमण्यांत आले. १८९४ सालीं मद्रासच्या बैठकीस डॉ. भांडारकर हे अध्यक्ष होते व पुढील सालीं म्हणजे १८९५ सालीं पुण्याच्या काँग्रेसचे वेळीं बैठक पुणें प्रार्थना मंदिरांत भरली. त्यावेळीं अमेरिकेचे युनिटेरियन धर्माचे प्रसिध्द प्रचारक रेव्हरंड जे. टी. संडरलंड हे हजर होते. ह्यापुढें मधून मधून १९०३ पर्यंत जरी ह्या परिषदेच्या बैठकी भरल्या तरी तिचें काम मंदावलें. पांचवी बैठक अलाहाबाद येथें भरली असतां मुंबईच्या ‘सुबोध-पत्रिकेनें’ लिहिले : “अशा प्रांतिक बैठकीचें महत्व राष्ट्रीय सभेच्या धामधुमींत भरणा-या भारतीय अधिवेशनापेक्षांहि किंबहुना अधिक आहे; कारण प्रांतिक बैठकीनें मिळविलेल्या माहितीवरून आणि अनुभवावरून राष्ट्रीय बैठकीचें काम अधिक पायाशुध्द व पध्दतशीर होण्याचा संभव आहे.”

“अशा मंदावलेल्या स्थितींत १९०३ च्या नाताळांत मद्रासेंत भरलेल्या अधिवेशनावरून ह्या परिषदेची झालेली विस्कळित स्थिति माझ्या मनांत भरली. आणि पुढील सालीं मुंबईला भरणा-या राष्ट्रीय सभेच्या वेळीं धर्मपरिषद संघटित स्वरूपांत बोलाविण्याचा मीं निश्चय केला हें मीं वर सांगितलेंच आहे. त्याप्रमाणें हीं पुनर्घटित एक दोन अधिवेशनें सोडून कराचींत भरलेल्या १९१३ सालच्या अखेरच्या बैठकीपर्यंत या कार्यांचा सर्व भार, चिटणीस या नात्याने मीं माझ्यावरच घेतला.

पुढील कोष्टकावरून ह्या एकेश्वरी धर्मपरिषदेच्या कार्याचें समालोचन नीट करण्यास बरे पडेल

तक्ता (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

१९०३ सालच्या मद्रास-बंगालच्या सफरीवरून हिंदुस्थानांतील निरनिराळया ब्राह्मसमाजांची मला बरीच प्रत्यक्ष माहिती झाली होती. १९०४ सालीं मुंबईच्या परिषदेंत हिंदुस्थानच्या निरनिराळया प्रांतांतून पुष्कळसे प्रमुख पुढारी मुंबईस आल्यानें त्यांच्या समक्ष परिचयाची तींत भर पडली. आणि त्यांच्यावर ह्या नवीन संघटित परिषदेचा परिणाम घडला. इतकेंच नव्हे तर मुंबई प्रार्थना समाजांतील पुढा-यांनाहि ह्या नवीन प्रयत्नांचें महत्व कळून चुकलें. कलकत्त्याच्या खालोखाल मुंबई प्रार्थना समाजाचें महत्व असल्यानें येथील बैठक समाजाबाहेरील लोकांवरहि परिणामकारी झाली. यंदाच्या सामाजिक परिषदेचें अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीराव महाराजांनीं स्वीकारल्यामुळें तो एक नवीनच विशेष घडला. म्हणून धर्म परिषदेंतहि महाराजांनीं प्रत्यक्ष भाग घ्यावा ही कल्पना मला सुचली. स्वतः मी त्यांस आमंत्रण करण्यास गेलों हें वर आलेंच आहे. स्वागताध्यक्षाचें काम सर नारायण चंदावरकरांनीं आणि अध्यक्षाचें काम गुरुवर्य डॉ. भांडारकरांनीं केल्यामुळें ह्या अधिवेशनास अधिक रंग चढला. रात्रीच्या शाळांचा बक्षिस समारंभ झाला. त्यांत अध्यक्षस्थान पत्करून त्याच रात्री राममोहन आश्रमांत जें थाटाचें प्रीतिभोजन झालें त्यांतहि महाराजांनीं प्रमुखपणें भाग घेतला. ह्या भोजनास मुंबईच्या आर्यसमाज आणि सामाजिक परिषदेचे प्रतिनिधी यांना आमंत्रण केलें होतें. आर्यसमाजाचे चिटणीसांनीं १५० सभासदांना घेऊन येण्याचें कबूलहि केलें होतें. प्रार्थना समाजाचे उपाध्यक्ष दानशूर दामोदरदास सुकडवाला यांनीं भोजनाचा सर्व खर्च भोगण्याची जबाबदारी घेतली होती, पण मुंबई प्रार्थना समाजानें कांही मुसलमान गृहस्थांना प्रार्थना समाजाची दीक्षा दिलेली होती म्हणून आयत्यावेळीं आर्यसमाजिस्टांनीं भोजनाला हजर राहण्याचें टाळलें. कृतीची बाजू आल्यावर केवळ ध्येयवादावर अकांडतांडव करणारे हे वाचीवीर कशी बगल मारतात ह्यांचें हें स्पष्ट उदाहरण आहे. शिवाय तो काळ १९०५ सालचा होता. आर्यसमाजांत बहुतेक गुजराथ्यांचाच भरणा होता. कृतीच्या सुधारणेला गुजराथ प्रांत त्याकाळीं तयार नव्हता त्याचें हें उदाहरण! पण महाराज श्रीमंत सयाजीराव यांनीं गुजराथ्यांना हें उदाहरण घालून दिलें ही गोष्ट मोठी संस्मरणीय झाली. परिषदेंत निरनिराळया ब्राह्मो पुढा-यांचीं भाषणें झालीं. तींहि नमुनेदार होतीं. पुढील परिषद बनारस येथें काँग्रेस भरत असल्यानें तेथें भरविण्याचें ठरलें. तेव्हांपासून अशा परिषदांच्या सरचिटणीसाचें काम मींच करावें असें सर्वानुमतें ठरविण्यांत आले.