अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व म. गांधींजी संबंध

अण्णासाहेब शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेसच्या मिशनच्या कामातून अंग काढून घेतले आणि ही संस्था प्रामुख्याने अस्पृश्यवर्गीयांच्या स्वाधीन केली, तरी अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यातून त्यांची सुटका होणे कठीण होते. कारण अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हे त्यांनी धर्मकार्य म्हणून आंतरिक प्रेरणेने पत्करलेले काम होते व ह्या कार्याच्या सिद्धीसाठी शक्य होतील ते सर्व प्रयत्न पुढील काळातही अण्णासाहेब करीत राहिले.


राष्ट्रीय सभेने अस्पृश्यतानिवारणाचा ठऱाव मंजूर केल्यानंतर हे काम राष्ट्रसभेच्या कामाचा एक भाग बनणे अपरिहार्य होते व म. गांधींसारखा देशाच्या सर्वांगीण जीवनाचा विचार करणारा नेता काँग्रेसचाही नेता बनल्यानंतर अस्पृश्यतानिवारणाच्या कामाकडे त्यांनी लक्ष देणे स्वाभाविक होते. विठ्ठल रामजी शिंदे आणि महात्मा गांधी यांचा दोघांच्याही जिव्हाळ्याच्या ह्या प्रश्नावर विचारविनिमय होत असे, संवाद त्याचप्रमाणे विसंवादही घडत असे, असे दिसते. महात्मा गांधींचा भारतीय राजकारणात उदय झाल्याबरोबर त्यांची अलौकिक थोरवी विठ्ठर रामजी शिंदे यांच्या मनाला भावली होती व महात्मा गांधीबद्दल त्यांच्या अंत:करणात अतीव आदराची भावना निर्माण झाली होती. म. गांधींची आध्यात्मिक दृष्टिकोणातून जीवनाच्या सर्व अंगांचा विचार करण्याची व्यापक भूमिका शिंदे यांच्या मते थोर व्यक्तीचे लक्षण होते. म. गांधींची थोरवी वर्णन करताना त्यांनी १९२२ साली लिहिले आहे, "गेल्या तीन शतकांत आमच्या ह्या हतभागी हिंदुस्थानात दोन लोकोत्तर पुरुष निर्माण केले. ह्यावरुन जगाच्या प्रभावळीत ठेवण्यासारखी पुरुषरत्ने पैदा करण्याची आमच्या देशाची शक्ती नष्ठ झाली नाही हे आम्ही निरभिमानपणे व केवळ आध्यात्मिक दृष्टीने म्हणू शकतो. ही रत्ने म्हणे पुण्यश्लोक श्री शिवाजी महाराज आणि पूज्यपादारविंद महात्मा गांधीजी हीच होत!" आपण या आधी पाहिले आहेच की, मंगलोर येथे असताना तेथील सरकारी कॉलेजात सेंट फ्रान्सिस ऑफ असीसीवर प्रवचन करीत असताना त्यांनी म. गांधींच्या संदर्भात असे प्रतिपादन केले की, गांधीजी हे धर्म आणि राजकारण यांत भेद न करिता राजकारणाला धर्माचे अधिष्ठान देतात; मात्र इंग्रज शासनकर्ते आपला धर्म व शासन ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवतात," अण्णासाहेब शिंदे यांना ही तुलना करुन म. गांधीची थोरवी तर सांगायची होतीच, परंतु इंग्रज हे हिंदुस्थानवर धर्मबुद्धीचे राज्य चालवीत नाहीत हेही दाखवून द्यावयाचे होते.


म. गांधीबद्दल शिंदे यांच्या मनात असलेला अतीव आदर कधीही कमी झाला नाही. मात्र अस्पृश्यतेच्या प्रश्नावर त्यांच्याशी शिंदे यांचे मतभेद अनेकदा होत राहिले व त्यांची स्पष्ट शब्दांत जाणीव करुन देण्याबद्दल शिंदे यांनी कधीही कसूर केली नाही.


१९९५ च्या सुमारास म. गांधी हिंदुस्थानमध्ये आले. ते पुण्यात आले असता ना. गोखले यांना भेटले हे त्यांना गुरुस्थानीच होते व ते गांधींची सर्वतोपरी काळजी घेत. कदाचित गोखले यांनी सांगितल्यावरुन असेल, गांधीजी विठ्ठल रामजी शिंदे यांना भेटण्यासाठी भोकरवाडी येथील डी.सी. मिशनच्या शाळेमध्ये आले होते. पुण्यातील मंडळी व्यक्तिशः गांधीजींना त्यावेळी ओळखत होती, असे नाही. विठ्ठल रामजी शिंदे यांची मात्र त्यांच्याशी या आधीही भेट झाली होती. श्रेष्ठ कृषितज्ज्ञ व पुण्यातील शेतकी कॉलेजचे प्राचार्य पी. सी. पाटील यांनी गांधीजी भोकरवाडीला मिशनच्या शाळेत कसे आले व आपण त्यांना कसे पाहिले याचे वर्णन केले आहे, ते असे:


"पुण्यास ज्या वेळी मराठा समाजात शिक्षणविषयक जागृती होत होती, तेव्हा एकदा विठ्ठल रामजी शिंद्यांनी भोकरवाडीत मराठी इतिहासावर व्याख्यानमाला सुरु केली होती. आम्ही चाळीस-पन्नास तरुण हजर होतो. बडोद्याचे इंजिनिअर जयराम जनार्दन सावंत यांचे व्याख्यान होते. विषय "बाजीप्रभू व पावनखिंडीची लढाई" असा होता मी अध्यक्ष होतो. मी व सावंत प्लॅटफॉर्मवरील खुर्च्यांवर बसलो होतो. विठ्ठलराव शिंद्यांसह बाकीची मंडळी प्लॅटफॉर्मखाली जाजमावर बसली होती. सावंतांच्या व्याख्यानाला बराच रंग आला होता. इतक्यात एक साधारण, सडपातळ गृहस्थ डोक्यास काठेवाडी धर्तींचे पागोटे, अंगात खादीचा आखूड अंगरखा व खादीचा पंजा नेसलेले बाहेरून एकटेच सभेत आले. विठ्ठलरावांनी त्यांना पाहताच पुढे जाऊन त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. विठ्ठलरावांखेरीज आम्हा कोणालाही त्या नवख्या गृहस्थाची ओळख नव्हती. व्याख्यान संपले. समारोप झाला आणि विठ्ठलराव शिंदे अध्यक्षांचे व व्याख्यात्यांचे आभार मानण्यास उठले. प्लॅटफॉर्मच्या जवळ येऊन त्या नवख्या गृहस्थाकडे बोट करुन त्यांनी सांगितले, "हे सज्जन कोण आहेत हे आपणास माहीत नाहीसे दिसतात. हे दुसरे कुणी नसून द. आफ्रिकेत हिंदी समाजाचे पुढारी म्हणून ज्यांच्यासंबंधी आपण वृत्तपत्रांतून वाचतो तेच हे गांधीजी होत. ते नुकते द. आफ्रिकेतून परत आले आहेत. त्यांचे दर्शन झाले याबद्दल आपणा सर्वांना आनंदच वाटेल."


"आम्ही अगदी विस्मयात पडलो व सर्वांनी त्यांना आदराने नमस्कार केला. गांधींसारख्या जगप्रसिद्ध, पण मी त्या वेळपर्यंत न पाहिलेल्या महात्मापुढे अध्यक्ष म्हणून बसण्याचा प्रसंग मला आठवतो. हेच माझे गांधीजींचे पहिले दर्शन."


म.गांधींनी असहकाराची व बहिष्काराची चळवळ सुरु केल्यानंतर अस्पृश्यवर्गाने ह्या चळवळीत भाग घ्यावा की नाही याबद्दलचा विचार गंभीरपणे करण्याचा प्रसंग निर्माण झाला. मिशनचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर स्वत: शिंदे, मुंबई शाखेचे सेक्रेटरी वामनराव सोहोनी व सय्यदांसारखे अन्य कार्यकर्ते यांचे ह्या प्रश्नाबाबात एकमत होते. अस्पृश्यतवर्गाला या चळवळीत ओढले तर स्वाभाविकपणेच त्यांना मिळणारी सरकारी ग्रॅंट बंद होण्याची भीती होती, म्हणून अस्पृश्यवर्गाला ह्या चळवळीपासून दूर ठेवावे असेच ह्या मंडळीचे मत होते. याबाबत अण्णासाहेब शिंदे यांनी लो. टिळकांच्या मताचा कल अजमावावा असे ठरविले. १९९८ साली कर्नाटकात अथणी येथे राष्ट्रीय पक्षाची जिल्हापरिषद भरली असत त्यामध्ये अण्णासाहेब शिंदे यांनी भाग घेतला व लो. टिळकांचे ह्या प्रश्नाबाबत मत आजमावले. टिळकांनीही "मिशनला राजकारणात ओढणे शक्य नाही व इष्ट नाही." असेच मत दिले.


१९२० च्या नाताळात नागपूर येथे राष्ट्रीय सभा भरली असताना असहकारितेच्या चळवळीत अस्पृश्यांना सामील करुन घ्यावे की नाही याबाबतीत शिंदे यांचे काय मत पडले, हे म. गांधींनी अजमावून पाहण्याचे ठरविले व त्यासाठी राष्ट्रीय सभेच्या विषयनियामक समितीत शिंदे यांची नेमणूक त्यांनी करुन घेतली. असहकारसारख्या कठीण बाबतीत अस्पृश्यांना गुंतविण्याचा तूर्त काळ आला नाही, हे जाणून मिशनच्या शिंदे वगैरे मंडळींनी जे समतोल धोरण ठरविले होते तेच योग्य आहे हे सरकारी ग्रॅंट घेण्याचे चालू ठेवावे असे महात्माजींचे यावेळी मत पडले.


नागपूर येथे काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी २५ डिसेंबर १९२० रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषद आयोजित केली. ही परिषद शिंदे यांना घाईघआईने भरवावी लागली. पण परिषदेस प्रचंड लोकसमूह हजर होता. मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, जमनालाल बजाज, सरोजिनी नायडू, राजगोपालाचारी वगैरे प्रांतोप्रांतीचे पुढारी हजर होते. म. गांधींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ह्या परिषदेत पुढील दोन ठऱाव मंजूर झाले. १. अस्पृश्यवर्गाची हिंदू धर्म व हिंदू राष्ट्र यांच्याशी असलेली एकनिष्ठा ध्यानात घेऊन त्यांच्यावर असलेले नागरिकत्वाचे व धार्मिक प्रकारचे सर्व प्रतिबंध काढून टाकावेत. २. हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांचा पूर्ण विकास व्हावा म्हणून अस्पृश्यांच्या मार्गात अद्यापि स्वतंत्रपणे धद्याची निवड करण्यात आणि चालविण्यात काही अडथळे येत आहेत ते सर्व जाऊन त्यांच्यात स्वयंनिर्णयाची वृत्ती विकसित व्हावी अशी रीतीने त्यांना हरएक सवलत देऊन मदत करावी.


हे दोन्ही ठराव महत्त्वाचे होते. पहिला, सामाजिक पातळीवरील अस्पृश्यतेची जाणीव नष्ट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता व वरिष्ठवर्गीयांच्या मनामध्ये पालट घडविण्याचा त्याचा हेतू होता. दुसरा ठराव अस्पृश्यवर्गीयांची उन्नती होण्यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे उद्योगधंदे करावेत, याबाबतीत चालना देणारा होता.या परिषदेत म. गांधी भाषण करताना म्हणाले, "मी वैष्णव आहे. वर्णाश्रमाचा अभिमानी आहे. तरीसुद्धा अस्पृश्यतेस हिंदू धर्मात कोठेही आधार सापडत नाही; अस्पृश्यत्व हे फार अत्यंत प्रेम आहे. ती मला पोटच्या मुलाप्रमाणे प्रिय आहे व तिला आपली असे म्हणून घेण्यासाठी मला आपल्या पत्नीशी बरेच झगडावे लागले आहे. मी या मुलीला दत्तक घेतले आहे. तरी इतरांनीही तसेच करावे असा माझा आग्रह नाही."


महात्माजींनी दत्तक घेतलेली ही लक्ष्मी नावाची मुलगी मुंबई मिशनच्या वसतिगृहातून त्यांनी नेली होती. पुढे तिचा विवाह एका ब्राह्मण गृहस्थाशी लावण्यात आला. शिंदे यांनी चालविलेले कार्य व त्यांचे धोरण व महात्माजींची भूमिका यामध्ये येथपर्यंत सुसंवाद आढळून येतो. महात्माजींचा वर्णाश्रमधर्माचा अभिमान हा शिंदे यांना पटणारा नव्हता. परंतु अस्पृश्यतानिवारणाच्या कामामध्ये म. गांधीच्या या भूमिकेचा निदान अद्यापपर्यत तरी अडथळा आलेला नव्हता.


राष्ट्रीय सभेने १९९७ साली अस्पृश्यतानिवारणचा ठराव मंजूर केल्यानंतर व म. गांधींनी भारतीय राजकारणामध्ये सक्रिय प्रवेश केल्यानंतर व एक प्रकारे काँग्रेसची सर्व सूत्रे त्यांच्या हाती आल्यानंतर अस्पृश्यतानिवारणाचे कार्यही म. गांधींनी काँग्रेसच्या द्वारा जोमदारपणाने करावे, ह्या कामाला काँग्रेसने महत्त्व द्यावे असे शिंदे यांना वाटत होते. आपली ही अपेक्षा काँग्रेसकडून, म. गांधीकडून पूर्ण होत नाही असे ध्यानात आल्यावर शिंदे यांना त्याबद्दल असमाधान वाटू लागले व म. गांधीकडे काहीशा प्रेमाच्या अधिकाराने ते तक्रारही करु लागले असे पुढील काळातील घटनांवरुन दिसून येते. १९२३ साली विठ्ठल सामजी शिंदे डी. सी. मिशनच्याकामातून मुक्त झाले. संस्थेच्या द्वारा अस्पृश्यतानिवारणाचे व अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे त्यांच्याकडून प्रत्यक्षरुपाने होणारे काम स्वाभाविकपणेच संपुष्टात आले. तेव्हा एखाद्या चळवळीत प्रत्यक्षपणे सहभागी होऊन लोकांमध्ये जागृती करण्याचे काम मात्र त्यांनी चालूच ठेवले. मंगलोर येथे ते वास्तव्य करीत असाताना व्हायकोम येथील मंदिराप्रवेशाच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला. १९२४ च्या अखेरीस मंगलोर येथून ते परत पु्ण्यास आले. अस्पृश्यांबाबतचे काम काँग्रेसकडून ज्या जोमाने व तळमळीने व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती त्याप्रमाणे ते होत नाही असे लक्षात आल्यानंतर ह्या कामाकडे म. गांधीचे लक्ष वेधण्याचे ते प्रयत्न करीत होते. ह्या बाबतीत त्यांनी एक पत्र त्यांचे सहकारी कृ. गो. पाताडे यांच्याबरोबर महात्माजीना पाठविले. हे पत्र वाचून महात्माजींनी "अगदीच वाईट' अशी प्रतिक्रिया प्रकट केली. महात्माजींची ही प्रतिक्रिया पाताडे यांच्याकडून समजल्यानंतर अण्णासाहेब शिंदे हे स्वाभाविकपणेच नाराज झाले व आपली प्रतिक्रिया व भूमिका त्यांनी महात्मा गांधींना २५ नोव्हेंबर १९२४ रोजी पत्र लिहून कळविली. शिंदे यांनी पुढीलप्रमाणे पत्र लिहिले:


प्रिय महात्माजी,
ऑल पार्टी कॉन्फरन्सच्या वेळी श्रीयुत पाताडे यांनी आपली भेट घेतली. त्यांच्याजवळ मी आपल्याला जे पत्र दिले होते ते वाचल्यानंतर आपण 'अगदी वाईट' असे त्याचे वर्णन केले हे मला त्यांच्याकडून समजले. आपल्यासारख्या थोर व मनमोकळ्या व्यक्तीकडून अशी प्रकारची प्रतिक्रिया प्रकट झाल्याचे समजून मला आश्चर्य वाटले व दु:खही झाले. हे पत्र व्यक्तिश: तुम्हाला लिहिलेले मुळीच नव्हते. ते माझ्यासारख्या दलितवर्गाच्या नम्र सेवकाने आपल्यासारख्या दैवी प्रेरणा असलेल्या भारताच्या पुढा-याला लिहिलेले पत्र होते.त्यामध्ये प्रकट केलेली मते आणि आशंका सर्वस्वी माझ्या नव्हे तर सामान्यत: दलितवर्गाच्या व विशेषतः मिशनच्या होत्या.


आपल्या अंतःकरणात खादीला प्रथम स्थान आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याला दुसरे आणि कदाचित अस्पृश्यतेला तिसरे स्थान आहे. परंतु माझ्या अंत:करणात मात्र (अस्पृश्यतेला) पहिले स्थान आहे. मी निश्चितच माझी आपणाबरोबर तुलना करायचे मनातही आणीत नाही. प्रत्यक्ष व्यावहारिक राजकारणाच्या बाबतीत मी चुकत असेन व आपण बरोबर असाल हे संभवते. ते पत्र मी अतिशय घाईत परंतु माझ्या अंत:करणाशी प्रामाणिक राहून लिहिले होते आणि ते आपणाकडे एक व्यक्ती म्हणून नव्हे तर पुढारी म्हणून पाठविले होते.


आपल्या नेतृत्वाखाली असणा-या काँग्रेसची ह्या तथाकथित हिंदू असणा-या दुर्दैवी अस्पृश्यवर्गाबद्दलची जाहीर वक्तव्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये किती मोठी तफावत आहे हे आपण जाणताच. नागपूर काँग्रेसच्या विषयनियामक समितीमध्ये मी भाग घेतला, पंरतु त्याचा विशेष लाभ झाला नाही. अर्थात मी पुढारीही नव्हे. परंतु त्यानंतरच्या अवधीत आपला व श्री. राजगोपालाचारी यांचा अपवाद वगळता नाव घेण्याजोग्या कोणत्याही पुढा-याला ह्या वर्गाच्या दु:खामध्ये लक्ष घालण्यास वेळ मिळाला नाही. दक्षिणेतील सत्याग्रहाचा मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन अभ्यास केला. परंतु तुमचे या प्रश्नाकडे लक्ष असतानाही आपल्या अन्य पुढा-यांकडून या सत्याग्रहाची सफाईदारपणे उपेक्षा करण्यात आली. आपण स्वत: व्हायकोमला जाऊ शकला नाहीत आणि पं. मालवीयजी जाणे संभवनीय नव्हते. स्वामी श्रद्धानंदजी यांची आणि माझी मंगलोरला भेट झाली. कदाचित त्यांना आता ह्या जुनाट क्षेत्रात भाग घेतल्याबद्दल पश्चात्ताप होत असेल.


मलबार आणि द. कानडा भागात शांतपणे काम करण्यात मी गेले आठ महिने घालविले. माझी आता अशी खात्री आहे की केवळ सनातनीच नव्हे तर वारंवार आपली मते प्रकट करणारे उदारमतवादीही विधायक स्वरुपाची आश्वासने देत असूनही ह्या प्रश्नाचा गंभीरपणे विचार करीत आहेत असे दिसत नाही. भारतीय अथवा परकीय, कोणतीही संघटित स्वरुपाची संस्था, दलितवर्गाचा एक राजकीय अंग म्हणून विचार करावयास तयार असल्याचे दिसत नाही.


श्री. पाताडे यांनी मला सांगितले की, गेल्या आठवड्यात मुंबई येथे सुमारे दहा-बारा अखिल भारतीय कीर्तीच्या पुढा-यांना ते मुंबईत भेटले. परंतु त्या सर्वांनी बेळगाव येथे होणा-या आगामी अस्पृश्यतानिवारक परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची तयारी दाखविली नाही. आपणाला आठवत असेलच की, आपण नागपूर येथील ह्या परिषदेचे अध्यक्षस्थान कृपावंतपणे पत्करले होते. त्यानंतर इतके वर्षांत सहानुभूतिपूर्वक भाषणे करीत असूनसुद्धा ह्या तिय्यम दर्जाच्या कामाला वेळ देण्याइतकी सवड कोणालाही नाही. तूर्त मी आपणाला कोणत्याही प्रकारची विनंती करुन त्रास देऊ इच्छीत नाही. फक्त आपण कृपया माझे ते पत्र आपणाला "अगदी वाईट" का वाटले हे कळवावे. श्री. पाताडे यांनी आपल्याला हे मिशन आणि मुंबई येथील पितृसंस्था यांमधील भेद स्पष्ट केलेला आहेच.


ताजा कलम : हे लिहीत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आपण क्षमा कराल असा विश्वास मी बाळगतो. आपली प्रकृती सुधारली आहे हे ऐकून मला फार आनंद वाटता.
वि.रा. शिंदे


मी प्रवासात असताना तुमचे पत्र मिळाले. मी तुमच्या मागील पत्राला 'अगदी वाईट' म्हटले त्याचे कारण त्यामध्ये धमकी होती. आपण एकाच क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते म्हणून मी तशा प्रकारचा शेरा मारला होता. माझ्या अंत:करणात अस्पृश्यतेला तिसरे स्थान आहे असे तुम्ही जे म्हणता ते चूक आहे. अन्य बाबींबरोबरच तिलाही समान स्थान आहे. तुम्ही सरस आहात. कारण तुमच्या दृष्टीने ते सर्वस्व आहे.
आपला.
एम्. के. गांधी


अस्पृश्यांसाठी काम करण्याच्या संदर्भात विठ्ठल रामजी शिंदे व म. गांधी यांच्या धोरणात सूक्ष्म स्वरुपाचा भेद कसा होता, याची कल्पना वरील पत्रावरुन येऊ शकते. एक प्रकारे म. गांधीनीच म्हटल्याप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदे यांना एकमेव ध्यास होता तो अस्पृश्यतानिवारणकार्याचा. हा प्रश्न सोडवण्याची त्यांना अत्यंत निकड वाटत होती. म. गांधीच्या पुढे मात्र साकल्याने सर्व देशाच्या राजकारणाचा विचार होता. अस्पृश्यतानिवारणाच्या कामाच्या संदर्भात अजून तरी गांधीजी बराचसा वेळ देऊ शकत नव्हते.


अस्पृश्यांच्या संदर्भात देशामध्ये नवनवीन समस्या निर्माण होत होत्या. पुढील वर्षातच म्हणजे १९२६ च्या प्रारंभी अस्पृश्यांबाबातच्या एका वेगळ्या समस्येने विठ्ठल रामजी शिंधे यांचे लक्ष वेधून घेतले. ही समस्या म्हणजे दक्षिण भारतात अस्पृश्यवर्गाचे धर्मांतराच्या नावाखाली होणारे शोषण. स्वत: अण्णासाहेब शिंदे हे कोणत्याही एका धर्माचे एकांगी अभिमानी अथवा पक्षपाती नव्हते. कारण ते स्वत: उदार अशा विश्वधर्माचे एकनिष्ठ अनुयायी होते. आपल्याला जन्माने प्राप्त झालेल्या धर्माचा त्याग न करताही विश्वधर्माचे अनुयायी होता येते व त्याची उपासना करता येते, असा त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच अस्पृश्यवर्गीयांना हिंदू धर्मातून ओढून त्यांना ख्रिश्चन करुन त्यांचे शोषण चालले आहे ही गोष्ट शिंदे यांना काळजी करण्यासारखी वाटत होती. म्हणून द. भारतात घडत असलेल्या घटनांकडे महात्माजींचे लक्ष वेधून घ्यावे व त्यांना ह्या कामी लक्ष घालण्यास प्रवृत्त करावे ह्या हेतूने त्यांनी म. गांधींना पुढीलप्रमाणे पत्र लिहिले:


दि. डिप्रेस्ड क्लासेस मिशन
सोसायटी ऑफ इंडिया
नानाची पेठ, पुणे शहर.


१८ फेब्रुवारी १९२६
महात्मा एम. के. गांधी
सत्याग्रह आश्रम, साबरमती.


विषय : डी. सी. वर्क्स कॉन्फरन्स


प्रिय महात्माजी,
गेली दोन वर्षे मी दक्षिण भारतामध्ये दहा-बाराहून जास्त वेळ दौरा केला असता मला असे दिसून आले की, धर्मांतराच्या नावाखाली दलितवर्गीयांचे निर्दयपणे शोषण केले जात आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्वामी श्रद्धानंदजींना व मला ब्रदर रामचंद्रराव यांनी दलितवर्गीयांसाठी कार्य करणा-यांच्या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथे निमंत्रित केले होते. आम्हाला असे दिसन आले की, खेडीच्या खेडी धर्मांतर करुन ख्रिस्ती बनवली जात होती. काँग्रेसने अथवा आमच्या मिशनने दलितवर्गामध्ये जे काम चालवले आहे ते अत्यंत असंघटित स्वरुपाचे आहे. म्हणून मी असे आयोजिले होते की, आपल्या नेतृत्वाखाली या क्षेत्रातील ख-याखु-या कर्यकर्त्यांचे एक अधिवेशन घ्यावे, परंतु आपण एक वर्षभर सत्याग्रह आश्रम सोडून कोठेही बाहेर पडणार नाही हा आपला निश्चय ऐकून माझी घोर निराशा झाली. मी पुष्कळ दिवसांपासून आपल्याबरोबर निवांतपणे संभाषण करण्याच्या संधीची वाटत पाहात आहे. मला आशा वाटते की, मुस्लिमांचा प्रश्न अथवा द. आफ्रिकेतील समस्या सुटण्याच्या आधी शक्यतो अस्पृश्यता नष्ट व्हावी. हे मत आपण मान्य कराल.


२. मी स्वत: हळूहळू ह्या कामातून मुक्त होऊन ब्राह्म मिशनरी म्हणून जे माझे मुख्य काम आहे, त्यालाच वाहून घ्यावे, असे वाटू लागले आहे. स्वेच्छेने निवडलेल्या ह्या कार्यक्षेत्रामध्ये मी अस्पृश्यातीलही अस्पृश्य अद्यापि आहे. माझे १६ फेब्रुवारी १९२६ चे 'इंदूर चौकशीसंबंधी'चे पत्र आपणास मिळाले असेल असा मला विश्वास वाटतो. आपण मला आपल्या सवडीने लवकरात लवकर भेटण्याची संधी द्याल काय ?
आपला
वि.रा.शिंदे


महात्माजींना लिहिलेल्या ह्या पत्रामध्ये अस्पृश्यतानिवारणाच्या क्षेत्रात त्यांच्या वाट्याला जी उपेक्षा आली त्याबद्दलची खंतही प्रकट होताना दिसते. म. गांधीचे नेतृत्व त्यांनी मनाने पत्करले होतेच. अस्पृश्यतानिवारणाच्या कामातही त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभावे अशी शिंदे यांची इच्छा प्रकट होताना दिसते. मात्र म. गांधीकडून याबाबतीत त्यांना भरीव स्वरुपाचे सहकार्य पुढच्या काळातही मिळाले असे दिसत नाही. उलट त्यांच्यामधील मतभेदाचे अंतर वाढतच जाताना दिसते.


शिंदे यांना अस्पृश्यतानिवारणाचा प्रश्न हा स्वातंत्र्य मिळवण्याहूनही अधिक निकडीचा वाटत होता. त्यामुळे म. गांधीच्या भेटीत प्रत्यक्ष चर्चा करुन, त्यांना पत्रे लिहून, त्याचप्रमाणे अन्य प्रकारे महात्माजींचे या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा सतत प्रयत्न होता. म. गांधींनी १९३० मध्ये दांडीचा सत्याग्रह करण्याचे निश्चित केले. महात्माजींनी मिठाचा सत्याग्रह करण्याच्या आधी अस्पृश्यतेचा सत्याग्रह करावा असे त्यांना वाटत होते. अण्णासाहेबांचे एकनिष्ठ अनुयायी आणि सहकारी श्री. कृष्णराव पाताडे हे सुभेदार घाडगे यांच्यासह सत्याग्रहस्थानी गेले. महात्मा गांधींचे या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सत्याग्रह सुरु होण्याआधी मिठाचे मडके ताब्यात घेण्याची त्यांनी अभूतपूर्व कृती कशी केली, हे आपण आधी पाहिले आहेच.


अस्पृश्यतानिवारणकार्याचा अण्णासाहेब शिंदे यांना कसा ध्यास लागून राहिला होता याची एक वेधक आठवण श्री. यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेली आहे. १९३३ साली यशवंतराव हे देशासाठी सव्वा वर्षाचा तरुंगवास भोगून आलेले विशीतील तरुण होते. अस्पृश्य मानलेल्या वर्गासाठी काही एक कार्य करण्याच्या प्रेरणेने आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांनी या वर्गासाठी एक रात्रशाळा सुरु करण्याचे ठरविले. त्या समारंभाला अण्णासाहेब शिंदे यांना आणता आले तर तो एक शुभाशीर्वाद ठरेल असे त्यांना वाटले, व त्यांना निमंत्रण देण्यासाठी पुण्यास जाऊन त्यांच्या राहत्या घरी भेटले. आपला येण्याचा हेतू अण्णासाहेबांना सांगितला. त्यांनी यशवंतरावांची बारीक चौकशी केली. "अखेर त्यांनी येण्याबद्दल होकार दिला. पण त्याचबरोबर एक अट घातली. ते म्हणाले, "माझ्याबरोबर हरिजनालाही घरी जेवायला आणावे लागले." मी लगेच होकार दिला, तेव्हा ते म्हणाले,"पण घरच्या लोकांना विचारलेस का?" मी नकार देऊन त्यांना म्हटले,"सर्व जातींचे मित्र माझ्या घरी येतात. आईची त्याबद्दल काही तक्रार नाही."


अखेर हरिजनाबरोबर पंगत होईल याची खात्री झाल्यावरच त्यांनी होकार दिला. ठरल्याप्रमाणे ते आले मला जणू स्वर्ग मिळाला. ते माझ्याबरोबर पायी हिंडले, हरिजनवाड्यात आले आणि कार्यक्रम पार पडला.


१९२० साली नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यातानिवारक परिषदेमध्ये आपण वर्णाश्रमवादी आहोत हे जाहीर करुनही अस्पृश्यतानिवारणाचा आग्रह त्यांनी प्रकट केला होता. अस्पृश्यतानिवारणाच्या प्रश्नबाबात म. गांधींची ही भूमिका विठ्ठल रामजी शिंदे यांना मान्य नव्हती. शिंदे कमालीचे धर्मनिष्ठ होते, परंतु ते विश्वधर्माचे उपासक होते. कोणत्याही एका विशिष्ट धर्माची विशिष्ट प्रणाली व विशिष्ट परंपरा त्यांना मान्य नव्हती. धर्माच्या चौकटीत राहूनच अस्पृश्यतानिवारण करण्याची म. गांधींची भूमिका शिंदे यांना सुसंगत वाटत नव्हती. त्यांनी प्रमाण मानलेला धर्म हा विवेकनिष्ठ धर्म होता. म्हणून अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबतची सोडवणूक करण्यासाठी ह्या दोघांमध्ये असलेला सूक्ष्म मतभेद वेळोवेळी प्रकट होत होता. म. गांधींच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात अतीव आदराची भावना होती. जनमानसावर असलेला त्यांचा प्रभाव शिंदे यांनी स्पष्ट दिसत होता. मात्र वर्णाश्रमधर्माच्या चौकटीत राहून, धार्मिक परंपरेचा आधार शोधून अस्पृश्यतानिवारण करण्याची त्यांची भूमिका मात्र त्यांना मान्य नव्हती. अशा विरोधभक्तीच्या कात्रीत शिंदे सापडले होते. म. गांधी यांची भेट संधी मिळेल त्या वेळेला घेत होते. अशा वेळी ह्या दोघांच्या दृष्टिकोणात असलेली तफावत पुन:पुन्हा स्पष्ट होत असे.


लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या संदर्भात केलेले एक निवेदन बोलके आहे. म. गांधी व शिंदे यांच्या भेटीच्या प्रसंगाचे लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वर्णन केले आहे. "महात्मा गांधीना वेदशास्त्री व हिंदू धर्म मान्य नाही, असा प्रचार पुराणमतवादी या वेळी जोराने करीत होते. बुद्धिवादी सुधारकांचे असे सांगणे होते की, हिंदू धर्म व त्याचे पंडित यांचे काहीही मत असो अस्पृश्यतानिवारण ही एक सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाची गरज आहे. म्हणून अस्पृश्यतानिवारण व्हावयास पाहिजे. गांधींनी आधुनिक सुशिक्षितांचा हा सल्ला मानला नाही. कै. विठ्ठल रामजी शिंदे हे एकदा येरवड्यामध्ये गांधींना वरील सल्ला देण्याकरिता मुद्दाम आले होते. विठ्ठल रामजींचा अधिकार समाजसुधारणेच्या बाबतीत किती मोठा होता हे सांगण्याची गरज नाही. विठ्ठल रामजी शिंदे आले तेव्हा मी गांधींच्या शेजारी बसलो होतो. दुपारी तीन वाजताचे ऊन गांधींचे अंग तापवीत होते. विचारपूस झाल्यावर विठ्ठलराव शिंद्यांनी गांधींना सवाल टाकला की, "धर्मशास्त्र व धर्मशास्त्री या दोन्ही गोष्टी या युगात पूर्ण मागे पडल्या आहेत. या ब्राह्मण पंडितांना व पुरोहितांना अस्पृश्यतेसारख्या प्रश्नावर निर्णय द्यायचा काय अधिकार आहे? आपण त्यांना महत्त्व दिल्यामुळे त्यांना नसते महत्त्व चढू लागले आहे." "माझ्या जीवित संदेशाची मदार ज्यांच्यावर आहे, त्यांपैकी ते आहेत." असे गांधी एक क्षणभर न थांबता एका तडाख्यात म्हणाले. विठ्ठल रामजी पुन्हा म्हणाले की, "नैतिकतेची भूमिका संपूर्णपणे समर्थ नाही काय?" गांधींनी उत्तरे दिले, "नैतिकता आणि धार्मिकता एकजीव झाली तरच त्यांना पूर्णत्व येते." विठ्ठल रामजी म्हणाले, "धर्मग्रंथावाचून जगण्यास धर्म समर्थ आहे." गांधी म्हणाले, "पुरोहितांनी व धर्मग्रंथांनी धर्माला मदतही केली आहे. म्हणून त्यांची मदत मिळत असल्यास आपले कार्य अधिक यशस्वी होईल."


शास्त्राभ्यास नसलेले प्रतिष्ठित सनातनी लोक पत्राद्वारा व समक्ष त्यांना वारंवार सांगू लागले की, "बनारस येथील पंडितव्याघ्रच धर्मशास्त्राचा निर्णय देऊ शकतील. वाई येथील सुधारकशास्त्र्यांच्या पांडित्याचा दंभस्फोट बनारस येथील पंडितराजच करु शकतील. त्या पंचाननाच्या गर्जनेपुढे हे टिकाव धरणार नाहीत. परंतु धर्मशास्त्रातील आचार व प्रायश्चित्त यासंबंधीच्या प्रकरणात अस्पृश्यतेचे समर्थ करणारी शेकडो वचने आहेत ही गोष्ट मला माहीत होती. ते सांगण्यास बनारसचे पंडित नको होते. महात्माजींच्याही निदर्शनास ती गोष्ट आली होती."


महात्मा गांधींना अस्पृश्यता नष्ट व्हावी याची खरीखुरी ओढ होती, हे जितके खरे होते तेवढेच अस्पृश्यता न मानण्यास धर्मग्रंथात आधार मिळावा ही त्यांची इच्छाही प्रबळ होती. अस्पृश्यता मानण्यास अनुकूल असणा-या धर्मवचनाकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते. अस्पृश्यतानिवारणाची तळमळ व धर्मग्रंथावर असणारी श्रद्धा ह्या कात्रीमध्ये म. गांदी सापडले होते.


१९२९-३० सालच्या सत्याग्रह पर्वाच्या आणि स्वातंत्र्ययुद्धाच्या ऐन धामधुमीतही विठ्ठल रामजी शिंदे यांना अस्पृश्यतेचा प्रश्न सुटण्याची निकड लागून राहिली होती. सी.बा.लांडगे यांनी पर्वती सत्याग्रहावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी परखडपणाने नमूद केले आहे की, काँग्रेस आणि म. गांधी अस्पृश्यता नष्ट करण्याच्या कामी जी दिरंगाई करतात ती अक्षम्य आहे. अस्पृश्यता नष्ट न करता स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ पाहणे हा जगाच्या दृष्टीने गुन्हा ठरणार आहे. ह्या प्रश्नाची निकड सांगताना ते म्हणतात की, मी म्हणतो ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजण्यापूर्वी अस्पृश्यतानिवारण झाले पाहिजे. स्वत: अण्णासाहेब शिंदे हे मूर्तिपूजा मानीतच नव्हते, तरीही त्यांनी पर्वती येथील मंदिरप्रवेशाच्या सत्याग्रहाला सामाजिक पातळीवरुन पाठिंबा दिलेला होता.शिंदे हे आपल्याला वाटणारी निकड महात्माजींजवळ वारंवार तक्रारीच्या सूरातही बोलून दाखवीत होते. गांधीजी प्रत्यक्ष कृती करण्याच्या संदर्भात दिरंगाई करीत आहेत ही शिंदे यांची तक्रार होती. १९३० मधील एका लेखामध्ये त्यांनी म. गांधींशी झालेल्या भेटीला वृत्तान्त कथन केला आहे. "परावा मी गुजरातेत संचार करीत असता गांधीजींना साबरमती आश्रमात भेटण्याचा सुयोग आला. तेव्हा त्यांच्याशी माझा अलीकडे एक तात्त्विक मतभेद होऊ लागलेला आहे, त्याविषयी मी खुलासा करुन घेतला, तो असा: "अस्पृश्यांचा सत्याग्रह चालू आहे. जुन्या मतवाद्यांनी जर विरोध केला तर अस्पृश्यांनी दारे मोडून व भिंती पाडून आत शिरावे. तरच सत्याग्रह पूर्ण होईल. एरवी नाही. मात्र असे करताना जुन्या मतवाद्यांनी डोके फोडले तर फोडून घ्यावे. सार्वजनिक शांतीचा भंग झाला तर तिची काडीइतकीही पर्वा करु नये. पण तसेच जुन्या मतवाल्यांविषयी अंत:करणात लवमात्र द्वेष बाळगू नये. हा शक्तिवाद होय, अत्याचार नव्हे," माझे हे मत गांधीजीना पटले. इतकेच नव्हे तर ते म्हणाले, "मी तुमच्याही पुढे जाऊन ते सबंध देऊळच समूळ उद्दध्वस्त करीन. कारण त्यात मुळी देवच नाही." मी लगेच म्हणालो, "गांधीजी तुम्ही असे कदी करणार?" ते म्हणाले, "ती वेळ अद्यापि आली नाही." मी म्हटले, "महात्माजी, स्वातंत्र्याचा पुकारा करण्यापूर्वीच तुम्ही हे करावयास पाहिजे होते. ही संदी दवडल्यामुळे पुढेही तुमची वेळ कधीच येणार नाही."


अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याची जी निकड शिंद्यांना वाटत होती तेवडी आणि त्या स्वरुपात म. गांधींना वाटत नव्हती, हे संवादावरुन स्पष्ट होते.


१७ जून १९३४ रोजी मुंबई येथील ३४ संस्थांच्या वतीने विठ्ठल रामजी शिंदे यांना मानपत्र देण्याचा समारंभ म. गांधींच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या संदर्भात सुबोधपत्रिकाकारांनी म. गांधी व विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संबंधाबाबतचा मुद्दा स्पष्टपणाने पुढे मांडला. विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रथमत:च व अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीचा प्रारंभ करुन ह्या कार्याचा विस्तार कसा केला हे दाखवून दिल्यानंतर सुबोधपत्रिकाकारांनी म्हटले आहे, "मुंबई इलाख्यात मिशनच्या शाखा एके काळी असताना, सर्व हिदुस्थानभर फिरुन श्री. विठ्ठलराव यांनी जागृती उत्पन्न करुन कार्य करुन दाखविले असता, त्यांच्या पुष्कळ मागून ह्या कार्याचा पुढाकार घेण्यास आलेले गांधीजी व एके काळी शिंद्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले ठक्करबाप्पा शिंद्यांस मागे सारुन अगर त्यांच्याशी सहकार्य न करता आपला सवतासुभा उभा करतात व आता शिंद्यांच्या सन्मानार्थ भरणा-या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावयास तयार होतात, हे कसे? दोन कडक प्रकृतीची माणसे एकत्र आली असता एक दुस-याच्या ओंजळीने पाणी प्यावयाचा नाही, हे जरी अगदी खरे असले तरी दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेला जाणूनबुजून मागे टाकून आपले घोडे या दोघांनी पुढे दामटल्यामुळे मिशन संस्थेला अगदी जीव धरुन रहावे लागत आहे."


सुबोधपत्रिकाकारांनी म. गांधी व ठक्करबाप्पा यांच्याबद्दल आक्षेपवजा सुरात वरील अभिप्राय प्रकट केलेला आहे. म. गांधींची राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची शैली अगदी स्वतंत्र व स्वयंसिद्ध होती. त्यांनी स्थापन केलेल्या हरिजनसेवक संघात विठ्ठल रामजी शिंदे यांचे व त्यांच्या मिशनचे सहकार्य घेतले नाही, हीही वस्तुस्थिती आहे. मात्र याचा अर्थ असा नव्हे की, या क्षेत्रातील शिदे यांच्या कार्याचे महत्त्व गांधीजीना वाटत नव्हते. गांधीजींना मिशनने चालविलेल्या कामाची माहिती व थोरवी यथार्थ स्वरुपात अगदी १९९५ पासून अवगत होती. पुण्याप्रमाणेच मुंबई येथील मिशनचे कार्य त्यांनी मिशनला प्रत्यक्ष भेट देऊन पाहिले होते.


श्री. ठक्करबाप्पा यांच्या संदर्भात आक्षेप घेणे हेही रास्त ठरणारे नव्हते. ठक्करबाप्पांच्या मनामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल अतीव आदराची भावना होती व ती त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर लिहिलेल्या मुत्युलेखामध्ये प्रांजळपणे प्रकट केली आहे. ते म्हणतात, "ते माझ्या चार गुरुपैकी होते. माझ्या जन्मदात्यानंतर मी त्यांनाच मानतो. त्यांच्या पायाशीच मी सार्वजनिक कार्याचे धडे घेतले. माझ्यापेक्षा वयाने ते लहान असले तरी राष्ट्रहितासाठी करावयाच्या चळवळीबाबतच्या अभ्यासात त्यांची फार मोठी प्रगती होती. मुंबई प्रांतातील अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेच्या चळवळीचे ते जनक होते. पंजाब व उत्तर प्रदेश सोडला तर भारतातील या प्रकारच्या कार्याचा प्रारंभ करणारे ते पहिले पुरुष व या कार्याचे अग्रदूत होते. प्रत्यक्ष कार्याचे धडे मी त्यांच्यापासून घेतले. "  म. गांधींनी चालविलेल्या अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यासंबंधी ठक्करबाप्पा हे त्यांना अधिक अनुरुप वाटले असणे शक्य आहे. म्हणून त्यांनी हरिजनसेवा संघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली असावी. वर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या कार्याच्या धोरणाबद्दल म. गांधी व अण्णासाहेब शिंदे यांच्या दृष्टिकोणात तफावत असल्यामुळे ह्या कामी शिंदे यांचे सहकार्य घेणे उपयुक्त ठरणार नाही असे म. गांधीना वाटले असले तर तेही अत्यंत स्वाभाविक आहे.

गांधीजींनी जाणीवपूर्वक विठ्ठल रामजी शिंदे अथवा त्यांनी चालविलेले मिशन यांची उपेक्षा केली असे म्हणणे रास्त ठरणार नाही. ह्या बाबतीत सुबोधपत्रिकाकारांनी आपल्या टिपणाच्या अखेरीला ते विधान केले तेच रास्त म्हणावे लागले. "दोन कडक प्रवृत्तींची माणसे एकत्र आली असता एका दुस-याच्या ओंजळीचे पाणी प्यावयाचा नाही." म. गांधी व विठ्ठल रामजी शिंदे दोघेही आपआपल्या भूमिकेशी एकनिष्ठ होते. ह्यापलीकडे दोघांमधील असणा-या अंतराचा अर्थ लावणे फारसे योग्य ठरणार नाही.