अस्पृश्यतानिवारक परिषद

अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर चालना देणा-या दोन प्रमुख घटना विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रेरणेने १९१७-१८ साली घडल्या. १९१७ सालच्या अखेरीस कलकत्ता येथे भरलेल्या काँगेसच्या अधिवेशनात अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मंजूर करण्यात आला ही एक घटना व त्या पाठोपाठच १९१८ सालच्या मार्चमध्ये मुंबईस राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेली अस्पृश्यतानिवारक परिषद ही या बाबतीतील दुसरी महत्त्वाची घटना होय.


अण्णासाहेब शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापून अस्पृश्यतानिवारणाच्या कामाला आरंभ केल्यास एक तपाचा अवधी संपत आलेला होता. ह्या दहा-बारा वर्षांच्या अवधीमध्ये शिंदे यांच्या अविश्रांत प्रयत्नामुळे देशाच्या पातळीवर ह्या प्रश्नाच्या बाबतीत किती मोठ्या प्रमाणामध्ये जागृती झाली होती याचे प्रत्यंतर ह्या दोन प्रमुख घटनांमुळे येते. सगळ्या देशातील विविध प्रकारच्या पुढा-यांना सहभागी करून घेणारी आणि मुंबईतील तीन-चार हजार अस्पृश्यवर्गातील व्यक्तींनी उपस्थित राहण्याची इच्छा उत्पन्न करणारी ही परिषद म्हणजे अस्पृश्यतानिवारणकार्यातील एक प्रमुख टप्पा म्हणावा लागेल.


सवर्णांच्या मनामध्ये पालट घडवून त्यांच्या मनातील अस्पृश्यतेची जाणीव कमी करण्याच्या दृष्टीने अस्पृश्यतानिवारक परिषदा अत्यंत उपयोगी पडू शकतात, अशी शिंदे यांची धारणा होती. त्या दृष्टीने लहान-मोठे प्रयत्न ते मिशनची स्थापना झाल्यापासून करीतच होते. महाराष्ट्राच्या पातळीवर अशी परिषद मोठ्या प्रमाणात पुण्यास १९१२ साली त्यांनी यशस्वीपणे भरविली होती. राष्ट्रसभेने अस्पृश्यतानिवारणाची ठराव केल्याने ह्या प्रश्नाला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व आले होतेच. तेव्हा अशा प्रकारची परिषद देशाच्या पातळीवर ओयोजित करणे कामाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे त्यांना स्वाभाविकपणे वाटले असणार. देशपातळीवर अशी अस्पृश्यतानिवारक परिषद भरविण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला त्याला दुसरे एक तात्कालिक निमित्तही घडले.


करवीरपीठाचे शंकराचार्य असलेले डॉ. कुर्तकोटी हे पूर्वाश्रमीचे अण्णासाहेब शिंदे यांचे मित्र होते. अण्णासाहेबांचे जिवलग मित्र विष्णुपंत देशपांडे तेरदाळकर यांनी डॉ. कुर्तकोटींची धाकटी बहीण शारदा हिला सून म्हणून पसंत केले होते व विष्णुपंताचे मोठे चिरंजीव गणपतराव यांच्याशी शारदेचा विवाह झाला होता. या व्यहीपणाच्या संबंधामुले डॉ. कुर्तकोटी यांच्याशी शिंदे यांचा स्नेहसंबंध जुळून आला होता व त्यांच्या पुरोगामी विचारामुळे ते शंकराचार्य झाले असताही हा स्नेहसंबंध वाढीस लागला होता.


डॉ. कुर्तकोटी हे मुंबईस आले असता एकदा आपल्या लवाजम्यासह मुंबई येथे छत्रपीत शाहूमहाराज यांच्या पन्हाळा लॉज ह्या निवासस्थानी उतरले होते. त्या वेळी मित्र या नात्याने डॉ. कुर्तकोटींनी अण्णासाहेब शिंदे यांना भेटीस बोलाविले. अवांतर गोष्टी झाल्यानंतर डॉ. कुर्तकोटी यांनी शिंदे यांना सूचना केली की, त्यांनी एक अस्पृश्यतानिवारण परिषद मोठ्या प्रमाणावर भरवावी व हिंदुस्थानातील लोकमत अजमावून पाहावे व अमनुकूलता दिसल्यास आपण शंकराचार्य या नात्याने हिंदूंनी अस्पृश्यता पाळू नये अशा अर्थाचे आज्ञापत्र काढू असे आश्वासन दिले. मात्र या कामी लो. टिळकांचे सहकार्य शिंदे यांनी संपादित करावे, असाही सल्ला त्यांनी दिला. खरे तर शंकराचार्यांच्या आज्ञापत्राची देशस्थ व कोकणस्थ ब्राह्मणांमधील बेटीव्यवहाराच्या बाबतीत कशी वासलात लागली याची शिंदे यांना पूर्ण कल्पना होती. म्हणून त्यांना अशा आज्ञापत्राचे महत्त्व वाटत होते अशातला भाग नव्हता. लोकमान्यांचे सहकार्य मिळेल याबद्दल त्यांना शंका नव्हती. ह्या निमित्ताने सनातनी हिंदूंच्या हृदयामध्ये अस्पृश्यतानिवारणाच्या विचाराल जागा मिळाली तर बरेच होईल, असा मात्र विचार शिंदे यांच्या मनात आला. एक मोठी अस्पृश्यतानिवारक परिषद भरवावी व देशातील प्रांतोप्रांतीच्या सर्व जातींच्या वेचक प्रमुख गृहस्थांच्या सह्या एका स्पष्ट अखिल भारतीय जाहीरनाम्यावर घ्याव्या असे शिंदे यांना बरेच दिवसांपासून वाटत होते. ह्या निमित्ताने अशा प्रकारची परिषद भरविण्याचे निश्चित करून शिंदे कामाला लागले.


लो. टिळकांचे शिंदे यांना एक वेगळेच दर्शन याप्रसंगी झाले. त्या वेळी ते इंग्लंडला जाण्याच्या गडबडीत होते. तरी ते वेळात वेळ काढून शिंदे यांच्याबरोबर पन्हाळा लॉजमध्ये श्रींच्या दर्शनासाठी गेले. श्रींपुढे सुमारे दोन-तीन डझन नारळांनी भरलेली ताटे ठेवून लोकमान्य आदराने बसलेले पाहून शिंदेय यांना फार कौतुक वाटले. तिघांच्या विचारांनी पिरषद आयोजित करावी असे ठरले. प्रत्यक्ष परिषदेत सहभागी होण्यासाठी शंकराचार्यांना येणे जमले नाही. अण्णासाहेब शिंदे यांनी परिषदेची जय्यत तयारी केली.१


अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासेस मिशनतर्फे भरविलेल्या अस्पृश्यतानिवारक परिषदेच्या अधिवेशनास शनिवार दिनांक २३ मार्च १९१८ रोजी दुपारी फ्रेंच पुलाजवळ उभारलेल्या मडपात सुरुवात झाली. अधिवेशनास हजर राहून परिषदेच्या कार्यास सहानुभूती दाखविणा-या लोकांत परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमंत सयाजीराव महाराज यांच्या व्यतिरिक्त स्वागत मंडळाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर, नामदार सी. व्ही. मेहता, ना. व्ही. जे. पटेल, ना. बेळवी, बाबू बिपिनचंद्र पाल, एस्. आर. बम्मनजी, जमनादास द्वारकादास, पी. के. तेलंग, आर. जी. प्रधान, लक्ष्मीदास तेरसी, बॅ. मुकुंदराव जयकर, बॅ. भुलाभाई देसाई, डॉ. साठे इत्यादी बडी बडी मंडळी प्रामुख्याने झळकत होती. सभेस सुमारे पाच हजारांवर एवढा स्त्री-पुरुष मिश्र प्रेक्षकवर्ग जमला होता. महाराजांची स्वारी बरोबर तीन वाजता मंडपाच्या दाराशी येऊन पोहोचली. तेथे त्यांचे स्वागत सर नारायण, ना. पटेल व अण्णासाहेब शिंदे यांनी केले. श्रोतुवर्गाची विशेष गोष्ट म्हणजे अस्पृश्य समजल्या जाणा-या वर्गापैकी बरेचसे लोक आपल्या परिवारास हजर होते. एका उच्चासनावर मिशनच्या उद्योगशाळेतील विद्यार्थांनी तयार केले सुतारकाम, शिवणकाम व इतर कलाकुसरीचे नमुने मांडले होते. ते मिशने सरचिटणीस विठ्ठल रामजी शिंदे यांनी महाराजांस दाखविले व त्यानंतर महाराजांची स्वारी मुख्य उच्चासनावर स्थानापन्न झाली. परिषदेच्या कार्यास आरंभ होण्यापूर्वी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या काही मुलांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्यावर स्वागतपर पद्ये गायिली.


परिषदेचे स्वागताध्य सर नारायण चंदावरकर यांनी फार कळकळीचे भाषण केले. ते म्हणाले, “ज्या परिस्थितीत आज आपण येथे जमलो आहोत, त्या परिस्थितीवरून अस्पृश्यवर्गाचा भविष्यकाळ बराच उज्ज्वल वाटू लागला आहे, पणे तो भविषकाळ खरोखर उज्ज्वल व्हावयाचा किंवा नाही ही गोष्ट आज येथे जमलेले लोक ज्या जोराने या चळवळीस चालना देतील त्या जोरावर सर्वस्वी अवलंबून आहे.” अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेच्या कार्याचे श्रेय देताना डी. सी. मिशनच्या कार्यकर्त्यांना व प्रामुख्याने विठ्ठल रामजी शिंदे यांना जणू काय मनोमन डोळ्यांसमोर ठेवून सर नारायण चंदावरकर पुढे म्हणाले, “इतिहास आपणास असे सांगतो की, ज्यापासून राष्ट्राचा विकास होतो अशा सर्व प्रकारच्या प्रगतिकारक चळवळींचा उगम थोड्याशा व्यक्तींच्या कार्यातच सापडतो. प्रस्तुतच्या बाबतीत त्या व्यक्ती म्हणजे ज्यांची प्रथम प्रथम हेटाळणी झाली ते डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे गृहस्थ होते. त्यांच्या कार्याने प्रचंड अशा हिंदू समाजाची सदसदविवेकबुद्धी जागृत झाली. अस्पृश्य लोकांना खाली ढकलल्याने अखिल समाजाचा एकषष्ठांश भाग समाजाला पारखा होतो ही जाणीव लोकांच्या हृदयात उत्पन्न होऊ लागली.” सर नारायणराव पुढे म्हणाले की, “जोपर्यंत तुम्ही त्यांना अवनत स्थितीतच ठेवाल तोपर्यंत देवही तुम्हाला (वरच्या वर्गाला) अवनत अवस्थेतच राखील. या निकृष्ट समजल्या जाणा-या वर्गात तीन प्रकारचे भेद आहेत. एक अस्पृश्यवर्ग, दुसरा जवळ जाण्यासही अयोग्य व तिसरा वर्ग म्हणजे निर्देश करण्यासही अयोग्य हा होय. हा हिंदुस्थानला शतकानुशतके लागलेला काळिमा आहे आणि तो आता आपण अखिल हिंदुस्थानला निर्वाणीची प्रार्थना करून साफ धुवून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण हे नीट लक्षात ठेवले पाहिजे की, प्रस्तुतचे हे लोकसत्तेचे युग म्हणजे सामान्य व्यक्तींचे होय.” आपले भाषण संपविताना त्यांनी निरनिराळ्या संस्थानिकांचा, विशेषतः गायकवाड सरकारांचा, त्यांनी आपआपल्या संस्थानात अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दल केलेल्या प्रयत्नासाठी व कळकळीबद्दल आभारपूर्वक निर्देश केला.


यानंतर सर नारायणरावीं परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीरावमहाराज यांनी सुशोभित करावे अशी विनंती केली. या सूचनेस श्री. जमनालाल द्वारकादास यांनी गुजरातीत अनुमोदन दिल्यानंतर टाळ्यांच्या गजरात ती सर्वानुते संमत झाली.


यानंतर मिशनचे सेक्रेटरी या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे यांनी सभेच्या कार्याबद्दल सर्व हिंदुस्थानातून शुभेच्यादर्शक तारा व पत्रे आल्याचे सांगितले. त्यामध्ये म. गांधी यांची ‘अस्पृश्यतेचा समूळ नाश झालाच पाहिजे’ अशा आशयाची, नंतर डॉ. रवींद्रनाथ यांची परिषदेच्या कामाला सुयश चिंतणारी तार होती. तसेच करवीरपीठाचे शंकराचार्य, सातारचे दादासाहेब करंदीकर व पुण्याचे डॉ. मॅन यांचे प्रमुख संदेश होते.


संदेशवाचन झाल्यानंतर अधिवेशनाचे अध्यक्ष श्रीमत सयाजीरावमहाराज यांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात आपल्या अध्यक्षीय भाषणाला प्रारंभ केला. ते म्हणाले, “अस्पृश्यतानिवारण हा माझा जिव्हाळ्याचा व आस्थेचा विषय अगदी प्रारंभापासून राहिलेला आहे व याबाबतीत बडोदा संस्थानात अनेक उपाय योजण्याचे प्रयोग आम्ही केले आहेत ह्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली हा मी माझा बहुमान समजतो. आपण मोठ्या धाडसीपणाने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याबाबत आस्था प्रकट करण्यासाठी माझे विचार मी प्रकट करीत आहे.” भारतामध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न किती जटिल आहे, हे श्रीमंत सयाजीरावांनी प्रारंभी विशद केले. ते म्हणाले, “पाच कोटी लोकांच्या बिकट अवस्थेचा हा प्रश्न आपल्या सामाजिक तत्त्वज्ञानाशी निगडित आहे, म्हणून लोकांची अंतःकरणे बदलल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकणार नाही. वैज्ञानिक विचार व सामाजिक पुनर्घटनेची बळकट प्रेरणा ही आपली जीवनदृष्टी व मनोवृत्ती बदलून टाकीत आहे. त्यापुढे अडाणी पूर्वग्रह आणि वर्णाचा दुरभिमान कालांतराने टिकून राहणार नाही. मात्र एक वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती हिंदुस्थानच्या संदर्भात लक्षात घेतली पाहिजे. राजकीय आणि धार्मिककदृष्ट्या हिंदुस्थानमध्ये एकजिनसीपणा नसल्यामुळे जपानसारख्या देशात सम्राटाच्या एका हुकमाने जी सुधारणा करणे शक्य झाले तसे आपल्या येथे होऊ शकत नाही. जपानमध्ये १८६८ ते १८७१ ह्या काळात नवी राज्याघटना अवतरली. सामुराई ह्या क्षत्रियवर्गाला आपले सर्व वंशपरंपरा, हक्क आणि अधिकार सोडावे लागले व त्यांना शेतकरी, कारागीर, दुकानदार यांसारख्या व्यावसायिकांचे जीवन जगणे प्राप्त झाले. जपानमधील हिनइन आणि हिंदुस्थानातील अतिशूद्र यांच्यामध्ये साधर्म्य आहे. हे दोन्ही वर्ग अस्पृश्य मानले जात असत. जपानमधील समंजस पुढा-यांच्या सूचनेवरून तेथील पोरगेल्या सम्राटाने १८७१ मध्ये फर्मान काढून तेथील अस्पृश्यता एका क्षणात नष्ट केली. हे फर्मान असे, इटा आणि हिनइन ह्या संज्ञा नष्ट करण्यात आल्या आहेत ह्या नावाखाली जन्मलेल्या लोकांचा समावेश आता सर्वसाधारण लोकसंख्येमध्ये केला जाईल व त्यांच्या सामाजिक दर्जा, उपजीविकेची साधने ही इतर लोकांप्रमाणे राहतील.


“अशा प्रकारची घटना हिंदुस्थानात मात्र शक्य नाही. शिक्षण आणि लोकजागृती यांद्वाना लोकमानसाला सावकाशपणे आवाहन करूनच हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. अंत्यज समजल्या जाणा-या जाती ह्या बौद्धिक व मानसिकदृष्ट्या अजिबात कमकुवत नाहीत. भारताच्या सर्वच प्रांतांमध्ये अंत्यजवर्गातून देशव्यापी ख्यातीचे संतपुरुष निर्माण झाले आहेत व ब्राह्मणासारख्या जातीकडूनही ते आदरणीय मानले जात आहेत. उदाहरणार्थ, दक्षिण हिंदुस्थानातील नाणंद, उत्तरप्रदेशातील रोहिदास, महाराष्ट्रातील चोखामेळा, बंगालमधील रोहिदास ठाकूर. सध्याच्या काळातही विद्यापीठातून चमकणारी बहिष्कृतवर्गातील मुलांची कितीतरी उदाहरणे आढळतात.”


यानंतर श्रीमंत सयाजीरावांनी भारतामध्ये अस्पृश्यवर्गावर किती विविध त-हांनी अन्याय होतो याबद्दलची उदाहरणे सांगितली. भगवदगीतेसारख्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथामध्ये भगवंतांनी सर्व प्राणिमात्र आपल्याला सारखे आहेत व मजकडे येण्याचा सर्वांना सारखाच अधिकरा आहे, ह जे मत मांडले त्याचाही उल्लेख केला. खुद्द त्यांनी आपल्या संस्थानामध्ये अंत्यजवर्गातील मुलांसाठी शाळा चालविताना ज्या अनेकविध अडचणी आल्या त्यांचे वर्णन करून त्यावरही कशी मात करता येते हे सांगितले. अस्पृश्यता नष्ट करण्याने सबगोलांकार होणार आहे ही भीती अनाठायी असल्याचे सांगून अस्पृश्यता नष्ट केल्याने ह्या वर्गातील लोकांना आपण केवळ स्वाभाविक असे माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देत आहोत. आतापर्यंतच्या काळात ह्या वर्गाबाबत आपण वस्तुतः जे करावयास पाहिजे होते ते केलेले नाही. यापुढे मात्र शब्दांत आणि कृतीत त्यांच्याशी योग्य त्या प्रकारे वर्तन करूया, त्यांना माणुसकीची योग्य अशी वर्तणूक देऊया, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.


श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर अस्पृश्यता नष्ट करण्याच्या बाबतीत व ह्या वर्गाच्या उन्नतीसंबंधात विविध ठराव मांडले गेले व चर्चा झाली.
पहिला ठराव बॅ. मुकुंदराव जयकर यांनी मांडलाः


“निकृष्टवर्गावर लादलेली अस्पृश्यता यापुढे ताबडतोब काढून टाकण्यात यावी आणि या कार्यासाठी प्रत्येक प्रांतातील वजनदार व विचारी कार्यकर्त्या पुढा-यांनी एक अस्पृश्यतानिवारक जाहीरनामा काढून निकृष्टवर्गास शाळा, दवाखाने, न्याय कचे-या, सार्वजनिक खर्चाने चालविलेल्या सार्वजनिक संस्था तसेच विहिरी, तळी, सार्वजनिक पाणवठे, व्यवहाराची व करमणुकीची ठिकाणे व देवालयासारखी सार्वजनिक ठिकाणे इत्यादी ठिकाणी कोणत्याही प्रकारे प्रतिबंध न राहता पूर्ण मोकळीक करून द्यावी असे ह्या परिषदेचे मत आहे.” प्रथम श्री. विठ्ठल रामजी शिंदे व त्यांच्याबरोबर काम करणारे गृहस्थ यांचे अशा त-हेची विशिष्ट परिषद भरविण्यापर्यंत मजल येईपर्यंत त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन करून बॅ. जयकर पुढे म्हणाले, “आपणांस राजकीय, सामाजिक व धार्मिक अशा सर्व प्रकारच्या विचारांच्या पुढा-यांकडून सहानुभूती प्राप्त झाली आहे हा एक प्रस्तुतच्या कार्यास शुभशकुनच समजला पाहिजे. स्वातंत्र्याची पहिली पायरी आत्मयज्ञ हीच होय.” या ठरावास आर्य समाजाच्या मुंबई शाखेचे पं. बाळकृष्ण शर्मा यांनी हिंदीत दुजोरा दिला व ह्या ठरावास लक्ष्मीदास तेरसी यांनी गुजराथीत अनुमोदन दिले. ते म्हणाले, “मी ज्या ठरावावर बोलावयास उठलो आहे तो अत्यंत साधा व कोणीही कसलाही आक्षेप घेणान नाही अशा स्वरूपाचा आहे. या ठरावास अनुमोदन देणा-याच्या हृदयाची उदारता फक्त प्रकट होते अशातला मुळीच भाग नाही. कारण त्या योगाने आपण निकृष्टवर्गाला (मी अस्पृश्य हा शब्द वापरत नाही) त्यांच्या जन्मसिद्ध हक्काव्यतिरिक्त काहीही अधिक देत नाही. निकृष्टवर्ग हा अखिल जनतेचा एक भाग आहे आणि म्हणूनच त्याला सर्व प्रकारच्या सार्वजनिक संस्थांत वाव मिळण्याचा दुस-या कोणत्याही वर्गाइतका अथवा व्यक्तीइतकाच हक्क आहे. कारण असा त-हेच्या संस्था सार्वजनिक पैशानेच चालविल्या जातात व त्यांनी जर आपले न्याय्य हक्क बाजावयाचा आग्रह धरला तर कोणालाही कायदेशीर उपाययोजनेने त्याचे निवारण करता येणार नाही. परंतु रूढी ही केव्हाही प्रबळच असते.” अशा प्रकारचे प्रतिपादन करून श्री. लक्ष्मीदास तेरसी यांनी बॅ. जयकर यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन दिले. बडोद्याचे पं. बाळकृष्ण शर्मा व पुण्याचे प्रो. गोविंद चिमणाजी भाटे यांचीही अनुमोदनपर भाषणे झाली.


या ठरावानंतर ठरावातील आशयाला अनुसरून जाहीरनाम्याचा मसुदा करून त्यावर राष्ट्रातील पुढा-यांच्या सह्या घेण्याचा अधिकार मिशनच्या सेक्रेटरीला देण्यात आला. मसुद्याच्या शेवटी ठरावात सांगितल्याप्रमाणे अस्पृश्यतानिवारणाच्या कामी जाहीरनाम्याच्या खाली सही करणा-यांनी व्यक्तिशः जबाबदारी घेण्याचे कलम मुख्य व महत्त्वाचे होते. परिषदेच्या फलश्रुतीचा हा एक प्रकारे कार्यरूप भाग होता.