प्रकरण नववे : धर्म

आतापर्यंतच्या विवेचनावरुन दिसून आलें असलें पाहिजे की हिंदुस्थानांत हल्ली ज्या मानीव अस्पृश्यांच्या अंसख्य जाती आहेत. त्या अगदी भिन्न भिन्न वंशांतून आलेल्या आहेत व त्यांची संस्कृति आणि दर्जाही भिन्न आहे; इतकेंच नव्हे तर त्यांच्या संस्कृतींत मध्यन्तरीच्या इतिहासांत चढउतार बरेच झाले आहेत. पण हेंही खरें की आजकालच्या अस्पृश्य जातीपैकी ज्यांनी प्राचीन काळीं वैभव भोगिलें असावें अशांवरही पुढे अस्पृश्यतेचा परिणाम बरींच शतकें होत आल्याने स्वाभाविकपणें त्यांच्या संस्कृतीचा फार बिघाड झालेला आहे. ह्या आणि पुढील प्रकरणांतील विषयाचा विचार करितांना ह्या जातींमध्ये घडलेल्या मध्यंतरींच्या कालवाकालवीकडे दृष्टि ठेवणें जरूर आहे. येरवी आमच्या विचारांना एकांगीपणा येऊन, ह्या बिचा-यांवर आणखी एका नवीन अन्यायाचा बोजा पडेल !

ह्या प्रकरणांत धर्म हा जो शब्द योजण्यांत आला आहे तो सामुदायिक धर्म म्हणजे धार्मिक पंथ किंवा संघ ह्या अर्थानेच योजिला आहे. धर्माचा जो आध्यात्मिक अथवा पारमार्थिक अर्थ आहे तो केव्हाही व्यक्तपुस्ताच असतो. तो सामुदायिक होऊं शकतच नाही. सामुदायिक अर्थ म्हणजे पंत अथवा संघ हा देश. काल अथवा जनसमाज यांच्या संकेताप्रमाणे बदलणारा भिन्न असतो. धर्माचा खरा अर्थ आध्यात्मिक असतो तो कांही कोणा समूहाच्या संकेताप्रमाणे बदलणारा नसतो. तो सनातन असून केवळ व्यक्तीच्या अनुभवांतच आढळून येणारा असतो. ती व्यक्ति स्त्री, पुरुष, गरीब,श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित कशीही असो. प्रौढ वय आणि शुद्ध भावना असली की पुरे. तिच्या अनुभवांत आणि जीवनव्यवहारांत कमी अधिक मानाने हा सनातन धर्म आढळणारच. हा सनातन धर्म ह्या प्रकरणाचा मुळीच विषय नव्हे. इतकेंच नव्हे, ह्या सार्वत्रिक धर्माला हिंदु, मुसलमान ख्रिस्ती वगैरे नांवांनी संबोधितांही येणार नाही.

येथून पुढील प्रकरणांत अस्पृश्यतेचा, अर्थात् हिंदुस्थानांत आज हजारों वर्षे वर दिलेल्या व्याख्येनुसार बळी पडलेल्या असंख्य जन समूहाचा प्रश्न धसाला लागत आहे. पहिला प्रश्न हा आहे, की ह्या अवाढव्य अस्पृश्य समाजाचा धर्म कोणता? म्हणजे सामाजिक आणि कायद्याच्या व्यवहाराच्या दृष्टीने सुधारलेल्या जगांत हल्ली जे दहापांच मोठे सर्वमान्य धर्मसंघ, अथवा गट, रुढ झाले आहेत, त्यांपैकी कोणत्यांत ह्यांचा समावेश होत आहे किंवा होण्यासारखा आहे? कोणी सहज विचारतील की हा प्रश्नच मुळी कसा उद्भवतो? अर्थात् ते सर्व लोक हिंदु धर्मसंगांत आजपर्यंत वावरत आले असून आताच ही विक्षिप्त दीर्घ शंका कां आली? शंका दीर्घ असो की विक्षिप्त वाटो, ती अनाठायीं नाही. अगोदर दिंदु धर्मांचीच ठाम व्याख्या होत नाही. यहुदी, झरदुष्टी (पार्शी), बौद्ध, जैन, खिस्ती, मुसलमान, ह्या मोठ्या आणि प्राचीन, किंवा शीख, लिंगायत, ब्राह्म समाज, आर्य समाज, देवसमाज वगैरे अर्वाचीन लहान संघांप्रमाणे, हिंदु संघाच्या मर्यादा इतिहासाच्या दृष्टीने, किंबहुना लोकव्यवहाराच्या दृष्टीनेही ठाम ठरवितां येत नाहीत. हिंदु धर्म ही एक केवळ पुरातन काळापासून चालत आलेली रुढि आहे. कोणत्याही रुदीच्या मर्यादा ठरविणें जितकें कठीण आहे. त्याहूनही ह्या हिंदूधर्मरुपी पुरातन रुढीच्या मर्यादा ठरविणें अनंत पटीने जास्त दुरापास्त आहे. जवळ जवळ हें काम अशक्य आहे. हिंदु धर्म हें एक मायपोट आहे! ह्यांत सगळ्या जगाचाही समावेश करु पाहणाराचा हात कोणालाही निदान तर्कशास्त्राचे दृष्टीने धरतां येणार नाही. कोणी म्हणेल हिंदु म्हणजे जातिभेद मानणा-यांचा एक गट आहे. पण शीख, लिंगायत, ब्राह्म समाज वगैरे अलीकडचे जातिभेद न मानणारे पंथही खानेसुमारीच्या अहवालांत बिनबोभाट हिंदु ह्या सदरांत गणले जात नाहीत काय? परवापर्यंत मिश्रविवाह करुं पाहणा-यांना आपण हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती वगैरेपैकी कोणी नाही असें लिहून दिल्याशिवाय इंग्रज सरकारचे रजिस्ट्रार त्यांचा विवाह नोंदण्याचें नाकारीत असत. पण अलीकडे सर हरिसिंग गौरच्या ह्या कायद्यांतील सुधारणेंमुळे ही खुंटीही अगदी ढिली झाली आहे. गौरच्या सुधारणेपूर्वीही अनेक मिश्रविवाहितांनी आपले विवाह नोंदून घेण्याचेंच मुळी साफ नाकारलें आहे. म्हणून तेवढ्यानेच ते हिंदू नाहीत असें कोण म्हणू शकेल? मनुस्मृतींत वर्णसंकराचा कितीही बाऊ दाखविला असला, तरी प्रत्यक्ष मनुस्मृतीच्या काळांतही चार वर्णांच्या मर्यादा ठरविणें जें अशक्य होतें, तें आता शक्य थोडेंच झालें आहे? तात्पर्य काय की हिंदुधर्माची खरी व्याख्या म्हणजे जो कोणी आपल्यास हिंदु म्हणवीत असेल, तोच हिंदु. जो हिंदु असूनही म्हणवून घेण्यास तयार नसेल त्याच्यावर कोण जबरी करुं शकेल? रोजच्या व्यवहाराच्या दृष्टीने इतक्या खोल पाण्यांत शिरण्याची तसदी कोणी घेत नाही. पण खानेसुमारी तयार करणारावर ह्या खोल पाण्यांत शिरण्याची जबाबदारी अलबत पडते; ती त्याला टाळतां येत नाही. आजच्या आमच्या ह्या खंडवजा मोठ्या देशांत असे अनेक असंस्कृत मागासलेले जनसमूह आहेत की, ते आपण हिंदु आहोंत की नाही, ह्या प्रश्नाला कांहीच उत्तर देऊ शकत नाहीत; किंबहुना देऊ इच्छितही नाहीत. अशा असंख्य असंस्कृतांच्या आचारविचारांची नीट पाहणी करुन व त्यांच्या लक्षणांची व्याख्या ठरवून त्यांना धर्माच्या सदरांत एक विवक्षित जागा देणें खानेसुमारीच्या खात्याला भाग पडतें.

इ.स. १९०१ सालीं हिंदी खानेसुमारीचें प्रमुखत्व जेव्हा सर एच. एच. रिस्ले ह्या नामांकित समाजशास्त्रज्ञाकडे सोपविण्यांत आलें, तेव्हा त्याला अशा अनेक असंस्कृत जाती ह्या देशांत आढळून आल्या की त्यांच्या धार्मिक आचारविचारांना आणि भावनांना हिंदु, मुसलमान, खिस्ती वगैरे पैकी कोणत्याच रुढ नांवाखाली समाविष्ट करणें अशक्य झालें. आणि साधारण गणकांना तर कांही तरी वट्ट हुकून फर्मावणें भाग पडलें. म्हणून धर्माचा प्रश्न आल्याबरोबर अशा धर्माच्या सदराखाली त्या त्या असंस्कृत जातींचेंच कामचलावू नांव नमूद करण्याविषयी हुकून देणें रिस्ले ह्यांना भाग पडलें. याप्रमाणे गणकांचे कम सोपें झालें. तरी अशा अनेक जातींना प्राथमिक प्राकृत धर्मांची लक्षणें पाहून कांही तरी एक सामान्य नांव नवीनच कल्पणें भाग पडलें. देशी रुढ भाषेंत असें नांव आढळेना. (१) Fetishism (जडवस्तुपूजा), (२) Shamanism ( श्रमणवाद उर्फ पंचाक्षरी मार्ग ), Animism (3) (भूतपूजा), हीं तीन नांवें त्यांनी आधुनिक समाज शास्त्रांतून अथवा तौलनिक धर्मशास्त्रांतून निवडून, त्यांपैकी सारासार विचार करुन तिसरें भूतधर्म अथवा पिशाच पूजा हें नांव पसंत केलें. व त्या नांवाच्या सदराखाली या सर्व जातींची सरगणना करण्यांत आली. सन १९०१ साली हिंदुस्थान, बलुचिस्थान आणि ब्रह्मदेश मिळून एकंदर लोकसंख्या २९,४३,६१,०५६ आणि एकंदर हिंदूंची संख्या २०,७१,४७,०२६ भरली. त्या हिंदूंशिवाय वरील भूतधर्मीयांची संख्या एकूण ८५,८४,१४८ दाखविण्यांत आली आहे. (खाने. रिपोर्ट १९०१; खंड १-अ, भाग २-कोष्टकें; कोष्टक ६ पान ५८-६२ पहा ) त्याच रिपोर्टाच्या पहिल्या पुस्तकांतील पुरवणी भागांत शेवटीं पान ५६०-५६९ पर्यंत एकंदरीत सर्व हिंदी लोकांचा सामाजिक दर्जा दाखविणारी जी कोष्टकें दिली आहेत त्यांत निरनिराळ्या प्रांतांतून जी अस्पृश्य मानलेल्या अनेक जातींची संख्या दिली आहे तिचा वट्ट आंकडा ५,१७,३८,६७३ हा तयार होतो. या विशिष्ट प्रांतवार कोष्टकांवरून उघड दिसतें की रिस्ले यांनी या मानीव अस्पृश्यांना पूर्ण विचारअंती व जबाबदारीपूर्वक हिंदु-धर्म-संघातच समाविष्ट केलें आहे. शास्त्रीय आणि केवळ औपपत्तिक दृष्टीने कांही ठरो, चालू लोकमत आणि लोकव्यवहार या दृष्टीने पाहतां, या गणनेंत आक्षेपाई असें कांही नाही असे कोणासही वाटेल; आणि मलाही असेंच वाटतें, पुढील दशवार्षिक म्हणजे इ.स. १९११ सालच्या शिरगणतीचें काम ई. ए. गेट यांचेकडे सोपविण्यांत आलें. हे गृहस्थ इ. स. १९०१ सालींही रिस्ले साहेबांचे सहकारी होते. या दहा वर्षांत पुढीलप्रमाणे वरील वट्ट आकड्यांत वाढ झालेली दाखविली आहे. एकूण हिंदी लोकसंक्या ३१,३५,४७,८४०, एकूण हिंदु २१,७५,८६,८९२, एकूण भूतधर्मीय १,०२,९५,१६८. या दहा वर्षांत हिंदूंच्या वट्ट लोकसंख्येविषयीं मुसलमानांनी वाद उपस्थित केला होता. पण तो या भूतधर्मीयांच्या संख्येबद्दल नसून केवळ अस्पृश्यांना हिंदूंत गणावें की वेगळें गणावें याबद्दल होता. इ. स. १८६७ सालापासून म्हणजे खानेसुमारी हिंदु स्थानांत सुरु झाल्यापासून या भूतधर्मीयांची संख्या हिंदूपासून अलगच दाखविण्यांत येत आहे; म्हणून त्यांच्यासंबंधाने वादाला कारणच नव्हतें. पण अस्पृश्यांच्याबद्ल वाद उपस्थित होण्यास सबळ कारण होतें. मानीव अस्पृश्यांची जेव्हा इ.स. १९०१ सालच्या स्वानेसुमारींत जवळ जवळ ५|| कोटी ही संख्या प्रांतवार पसरलेली आढळली, इतकेंच नव्हे पण या मानीव अस्पृश्यांतही कांही प्रांतांतून कांही कांही अस्पृश्य जाती भूतधर्मीयांच्या सदरांत दाखविलेल्या आढळल्या, तेव्हा सर्वच मानीव अस्पृश्यांसंबंधी वाद उपस्थित होणें साहजिकच होतें. कदाचित् या वादाला कांही अंशी बळी पडून म्हणा, किंवा ही कटकट चुकविण्याच्या हेतूने म्हणा इ.स. १९९१ सालीं मानीव अस्पृश्यांची संख्या वेगळी दाखविण्यांत आली नाही. इतकेंच नव्हे तर स १९०१ सालाप्रमाणे हिंदुधर्मांतर्गत निरनिराळ्या समाजांचा अथवा जातींचा परस्पर उच्चनीच दर्जा दाखविण्यारीं कोष्टकेंच स. १९११ सालच्या खानेसुमारींतून वगळण्यांत आली. त्यामुळें ह्या भूतधर्मीयापैकी किती जाती व त्यांची किती संख्या मानीव अस्पृश्य आहे, आणि उलट पक्षीं, ह्या मानीव अस्पृश्यांतील किती जाती व त्यांची किती संख्या भूतधर्मीय आहे, हें नक्की ठरविण्यास मार्गच उरला नाही. कांही असो. मानीव अस्पृश्यांच्या प्रचंड लोकसंख्येंत कांही तरी भूतधर्मीयांची गणना झालेली आहे ह्यांत शंका नाही. तथापि सर्वच मानीव अस्पृश्य भूतधर्मीय, असेंही म्हणतां येत नाही. कारण पहिल्यांची घट्ट संख्या दुस-यांच्यापेक्षा पांच पटीहून उघड उघड अधिक भरत आहे.

हा निर्णय झाला आधुनिक लोकमतानुसारें व लोकव्यवहाराच्या दृष्टीने. पण अगदी प्राचीन काळीं जेव्हा वेदधर्मीय आर्य (?) नांवाचे लोक हिंदुस्थानांत येऊन वसाहत करुं लागले त्या वेळीं हिंदुधर्माचा व्याप आणि अर्थ आजच्यासारखा व इतका स्पष्ट असणें शक्य नाही. अस्पृश्यतेची संख्या आर्यांच्या वसाहतीपूर्वी किंवा वसाहतीच्या काळी ह्या देशांत होती की नव्हती हें निश्चित ठरविण्यास साधन नाही. वेदसंहितेचा काळ ख्रिस्ती शकापूर्वी हजार बाराशें वर्षे इतका अलीकडे मानला तरी त्या काळच्या वाड्मयांत अथवा अन्य प्रकारें अस्पृश्यतेचा ग्रांथिक अथवा लेखी पुरावा मुळींच सापडत नाही, हें आपण पहिल्या खडांत पाहिलें. मानीव अस्पृश्य त्या वेळीं असेल तरी, त्यांची संख्या आणि आपत्ति आजच्या सारखी आणि इतकी तीव्र असणें शक्य नव्हतें. कारण तत्कालीन सामाजिक घटना आजच्याप्रमाणे सुसंघटित व दृढमूल झालेली नव्हती. पाणिनीच्या कालापासून अस्पृश्यतेचे उल्लेख मिळूं लागतात. यास्काचार्यांनी आपल्या निरुत्कांत अध्याय ३, खंड १६, मंत्र १० ह्यावर भाष्य करितांना केलेला "चत्वारो वर्णा निषाद: पंचम इति औपमन्व:|" हा पंचम वर्णाचा उल्लेख संस्कृत वाड्मयांत जवळ जवळ पहिलाच होय. वर्ण तर चारच. पांचवा जन म्हणजे वर्णबाह्य निषादांच्या जाती असा पंचम शब्दाचा अभिप्राय आहे.

औपमन्यवांच्या काळींही निषाद म्हणून जो लोकसमूह होता, तो सर्व आताप्रमाणें अस्पृश्य मानला जात होता ह्याला पुरावा नाही. निषाद म्हणजे आर्यांच्या वसाहतीबाहेरचे लोक; स्वत: वसाहत करुन स्वतंत्रपणे राहणारे त्यांचा व आर्यांचा संबंधच येत नसल्याने आधुनिक बहिष्काराचा व अस्पृश्यतेचा प्रश्नच त्यांच्या संबंधी उद्भवत नाही.

आजची अस्पृश्यता मनुस्मृतीच्या काळी पूर्णत्वाला आलेली आढळते. ह्या अस्पृश्यांची पूर्वपाठिका आणि हे कोणत्या कारणांनी अस्पृश्य ठरविण्यांत आले, ह्याविषयीं मनुस्पृतीची मीमांसा निराधार व अनैतिहासिक आहे, असें मी वर प्रतिपादिलें आहे. तरी त्या काळी आजचा बहिष्कार व अस्पृश्यता ह्यांचा जम पूर्ण बसला होता असें मानण्याला मनुस्पृतीचा पुरावा अगदी बिनतोड आहे, ह्यांत शंका नाही.

मनूच्या दहाव्या अध्यायांत वर्णसंकराने उत्पन्न झालेल्या कोणत्या जाती कशा व किती हीन, म्हणून अस्पृश्य व बहिष्कृत, ह्याचा निर्णय दिला आहे. ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष ह्यांच्या प्रतिलोमसंकरजन्य संततीला चंडाल ही संज्ञा देऊन ती जात पहिल्या पायरीची अस्पृश्य कल्पिली आहे. पण हा चंडाल आणि निषाद स्त्री ह्यांच्या संकरसंततील व अंत्यावसायी, पुक्कस, कारावर, आहिंडिक सोपाक वगैरे जातींना चंडालाहून अधिक नीच पायरीचे ठरविण्यांत आलें आहे. चांडाल झाला तरी शूद्रापासून म्हणजे वर्णांतर्गत शेवटच्या वर्णापासून झाला म्हणजे तो तुलनेने बरा. पण वर्णबाह्य निषाद आणि हा अस्पृश्य चांडाल ह्यांच्या संकराला अधिकाधिक नीच मानण्यांत आलें आहे. तरी पण स्वत: निषाद हा अस्पृश्य असण्याचें कारणच नव्हतें. कारण त्यांचा व आर्य वसाहतींचा अर्थाअर्थी संबंधच येत नव्हता. त्याचप्रमाणे हल्लीही बृहद् हिंदू समाजाशीं अगदी फटकून राहणा-या जंगली भूतधर्मीय जाती अस्पृश्य मुळीच नाहीत. ज्या असंस्कृत आर्येतरांचा आर्य वसाहतीशीं केवळ हीन कामधंद्यासाठी संबंध आला, किंबहुना ज्या स्वतंत्र जातींना जिंकून अगर त्यांच्याशी समजुतीने वागून, वसाहतीला चिकटूनच पण अगदी बाहेर डांबण्यात आलें त्याच तेवढ्या जमाती आजकालच्या बहिष्कृत अस्पृश्य जाती होत. केवळ जिंकण्यामुळें, अगर हीन धंद्यामुळेंच नव्हे तर पाखंडी धर्मावरील क्रूर बहिष्कारामुळेंही वेळोवेळीं व देशोदेशीं या बहिष्कृतांत भर पडत जाऊन आजकालची अवाढव्य संख्या कशी तयार झालेली आहे, हें मागील प्रकारणांत सिद्ध झालेंच आहे. पण अजून ज्यांचा वसाहतींशीं संबंध आलेला नाही, अशा जंगली जाती आजही अस्पृश्य नाहीत. पण त्यांचा धर्म मात्र प्राथमिक दर्जाचा म्हणजे भूतप्रेत-पिशाचादिकांची पूजा हा आहे.

आमचा प्रस्तुतचा मुद्दा 'अस्पृश्यांचा" धर्म कोणता हें ठरविण्याचा आहे. आज हजारो वर्षें मानीव अस्पृश्य जाती शहरांतून व खेड्यांतून वरिष्ठ  म्हणविणा-या हिंदु, मुसलमान इत्यादिकांच्या वसाहतीं. जवळ त्यांच्या सेवेंत राहत आल्यामुळे, या मानीव वरिष्ठांच्या धर्माचा व राहणीचा थोडा फार परिणाम या मानीव अस्पृश्यांवर होणें अगदी साहजिक आहे. बौद्ध, लिंगाईत, शीख, ख्रिस्ती, मुसलमान हे धर्मपंथ प्रसारक आणि प्रागतिक असल्याने मानीव अस्पृश्यांचा शिरकाम या निरनिराळ्या नवीन पंथांत हजारांनीच नव्हे तर लक्षांनी झाला आहे. येरवी या परकीय व पाखंडी समजले गेलेल्या पंथांना तरी प्रथम प्रथम रिक्रूट भरती कोठून मिळणार ? बंगाल्यांत, मध्यप्रांतांत विशेषत: मद्रासेंत आणि मलबारांत हल्लीच्या मुसलमानांच्या व ख्रिस्त्यांच्या संख्येपैकी शेकडा नव्वद हे मूळचे 'अस्पृश्य'च आहेत, असें जे खानेसुमारीच्या रिपोर्टात म्हणलेलें आढळते, तें मुळीच अतिशयोक्तीचें नाही. या नवीन सुधारक पंथांत न शिरतां, मागे सवयीच्या जोरावर ज्यांची मोठी संख्या पूर्व स्थितींत राहिली त्यांच्यापैकी बहुसंख्येवर हिंदुधर्मांतील हीन देवता आणि अडाणी विधिसंस्कार यांचा परिणाम कालवशात् झाला असलेल्या आता दिसतो व म्हणून त्यांना हिंदू हें नांव पडलें आहे यांत काय नवल? नवल हेंच की परकीयांनी व 'पाखंड्यांनी' या अस्पृश्यांचा एवढा मोठा भाग काबीज करुन घेतला असतां, उलट सोवळा हिंदूधर्म मात्र अद्यापि या बिचा-यांना झिडकारून हिरमुसले करीत आहे! इतकेंच नव्हे तर त्यांचे हाडवैर संपादन करीत आहे. तें कसेंही असो. अशा स्वाभाविक ओघाने अस्पृश्यांचा समावेश हिंदुधर्मांत झालेला आता दिसत आहे. ते संस्कारत: हिंदू नसून, केवळ संसर्गत: किंबहुना स्वभावत: हिंदू बनले आहेत असें म्हणणें क्रमप्राप्त आहे. एखाद्या मेजवानीचे वेळीं पक्कान्नाचा ताज वाटा सर्व 'वरिष्ठ" वर्गांना जाऊन मातींत मिसळलेल्या उष्टया पत्रावळी उकिरड्यावर टाकल्यावर, ज्याप्रमाणे खेड्यांतील 'अस्पृश्यांना'ना चाटावयाला मिळतात, त्याचप्रमाणे हिंदुधर्माचा हीन भाग मात्र नेमका यांच्या वाट्याला येतो. बंगाल्यांतला चैतन्यांचा वैष्णव भक्तिमार्ग, शिखांचा सत् अकाल, महाराष्ट्रांतील ज्ञानबा-तुकारामांचा वारकरी संप्रदाय अनुसरण्यास आणि द्राविडांतील कांही वरवरचीं सांप्रदायिक चिन्हे आचरावयास त्यांना मुभा आहे. पण उच्चवर्णी वैष्णवांत कोणी अस्पृश्य वैष्णवाने अगर शैवाने समान दरजाने मिसळूं म्हटलें किंवा देवळांतच काय पण कांही देवळांच्या नुसत्या वाटेवर पाय ठेवूं म्हटलें तर त्यांच्या जीवावरच येऊन बेतते, इतकेंच नव्हे तर सार्वजनिक शांतीच्या सबबीवर इंग्रज बहादुरांचे सोटेशाही पोलीस व लष्कर सोवळेवाल्यांचीच बाजू घेऊन या हतभाग्यांवरच घसरतें. असो, या अपवादक गोष्टी सोडून दिल्या तर आज मानीव अस्पृश्यांचा बहुजनसमाज भुताखेताच्या पुजेंतच गुरफटलेला दिसत आहे. तो केवळ नामधारी खानेसुमारींतलाच हिंदू आहे असे म्हटल्यास निदान तज्ज्ञांना तरी आम्हांवर राग होणार नाही अशी आशा आहे.

बहुतेक मानीव अस्पृश्यांची प्रमुख प्रमुख प्राचीन राष्ट्रें, उदाहरणार्थ महाराष्ट्रांतील महार मांग, मद्रासेकडील पारिया पुलया, बंगाल्यांतील नमशूद्र राजबंसी इ. यांचे मूळ राष्ट्रदैवत म्हणजे एकच; ती मरी आई हेंच होय. हें दैवत भूमिमातेंचेंच एक रुपक अथवा प्रतीक आहे, हें तौलनिक धर्मशास्त्राने सिद्ध होण्यासारखें आहे. हे आद्य दैवत केवळ आजकालच्या अस्पश्यांचेच नव्हे. तर प्राचीन काळच्या बहुतेक सा-याच प्राथमिक राष्ट्रांच्या देव्हा-यावर कोणत्या ना कोणत्या तरी स्वरुपाने प्रतिष्ठित होतेंच. इतकेंच नव्हे तर आजही हिंदुस्थानांतील ब्राह्मण, क्षत्रिय आदिकरुन वरिष्ठ गणलेल्यांचे कुलदैवत अगर इष्ट दैवत दुसरें कितीही उच्च असलें, तरी त्यांच्या बायकांकडून प्रसंगविशेषी, शितळादेवी, सटवाई, मेसाई, मरी आई या गांवाच्या शिवेवर ठाण मांडून बसलेल्या माताच पूजेचा मान आणि हक्काचा नैवेद्य उगविल्याशिवाय राहत नाहीत. शिव आणि काली ही दैवतें जी प्रसिद्धपणेंच मूळच्या रहिवाश्यांची होती ती मागाहून आलेल्या सुधारलेल्यांनी आपलींशी करुन घेतलीं. त्यांना आता प्रतिष्ठा आली आहे. पण वरिष्ठ वर्गोंचे लौकिक व्यवहार आणि लोकभ्रम यांजकडे दृष्टि फेकली तर पिंपळावरचा मुंजा, भिंतीवरचा नागनरसेबा, नदीनाल्यांतल्या जकण्या, दाट झाडींतली काळूबाई, यांचा अंमल 'अस्पृश्या'प्रमाणे अद्यापि 'स्पृश्यां' वर देखील इतका जारी चालू आहे की या हिंदुधर्माच्या मायपोटांत संस्कृत धर्माची हद्द संपते कोठे व प्राकृतधर्मांची सुरु कोठे होते, हें शोधणें म्हणजे मृगजळाच्या मर्यादा शोधण्याप्रमाणें व्यर्थ ठरतें. अशा परिस्थितींत बिचा-या 'अस्पृश्यां'नाच हसण्यांत कोणता शहाणपणा आहे? वरिष्ठ वर्गाचा असला तिरस्कार व छळ सोसून अद्यापि या भोळ्या जाती आपल्यास हिंदू म्हणविण्याचा आग्रह सोडीत नाहीत हेंच वरिष्ठ म्हणविणारांनी आपलें मोठें भाग्य समजावें. असे असून आजकालच्या वर्णाश्रम स्वराज्य परिषदा अस्पृश्यांच्या गोष्टी सांगावयास येतों म्हणणा-या अस्सल ब्राह्मण विद्वनांना, देशाभिमानी पुढा-यांना व विरक्त संन्याशांना देखील आपल्या आजूबाजूला फिरकूं देत नाहीत, या अन्यायाला काय म्हणावें ! म्हणावयाचें काय, ह्या अपूर्व अन्यायाचेंच नांव अलीकडे 'सनातनी हिंदु धर्म' असें रूढ झालें आहे.

केवळ संघाच्या दृष्टीने पाहतां मात्र ह्या अस्पृश्यांच्या प्रचंड समूहाला हिंदूधर्मांत जागा आहे असें मानण्यांच्या उलट आणखी एक मोठा प्रबळ व प्रतिकूल पुरावा अभेद्य परंपरेने चालत आलेला आहे, तो दृष्टीवेगळा करुन चालावयाचें नाही. हिंदु संघाच्या शेजारीं राहून अनुकरणवशात् मानीव अस्पृश्यांतील कांही सुधारलेल्या समाजांनी हिंदु उपासनेचा स्वीकार केला तर तिकडे हिंदु धर्माचा पुरोहित वर्ग फार तर दुर्लक्ष्य करील. प्रत्यक्ष हरकत करण्याची दगदग करणार नाही. पण स्वत: जाऊन अस्पृश्यांचे पौरोहित्य आजवर कोणत्याही प्रांतांत कोणाही ब्राह्मणांने केलेलं नाही. किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या धर्माचा नुसता उपदेशही केलेला नाही ! लग्नविधि असो किंवा स्मशानविधि असो, बारसें असों किंवा मृताचा दिवस असो, अशी सर्व शुभाशुभ धर्मकृत्यें करावयाला ह्या सर्व अस्पृश्य जातीचें आपल्यापैकीच गुरु अथवा गोसावी असतात. त्यांच्या परंपरा चालत आलेल्या असतात. त्यांना जातीकडून अथवा क्वचित् राजाकडूनही उत्पन्ने असतात. व्यक्तिश: दक्षिणाही मिळते. ह्यावरुन धर्मसंघाच्या दृष्टीने ह्या ग्रामबाह्य जाति आचारबाह्य आहेत असें स्पष्ट होतें. लोकमा्य टिळकांनी .

प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानामनेकता |
उपास्थानामनियम: एकद्धर्मस्य लक्षणम् ||

अशी एकदा हिंदुधर्माची एक कामचलावू व्याख्या केली होती. ती किती जरी ऐसपैस त्या वेळीं वाटली, तरी ह्या जातींला ती देखील लागू पडत नाही. 'उपास्यानामनियम:' आणि 'साधनानामनेकता' ही व्यतिरेकी लक्षणें जीं अधर्माचीं आहेत, तींच पुन: धर्माचीं कशीं होऊं शकतील? ती कांही तरी विधायकच असलीं पाहिजेत ना? ख्रिस्ती व मुसलमानी धर्मसंघांत उपास्यांचा नियम आहे. तो हिंदुधर्मसंघांत नाही. येवढ्यावरुन तो हिंदूंचें वैशिष्टय होऊ शकत नाही. कारण असा अनियम बौद्ध व इतर समाजातही आढळतो. 'प्रामाण्यबुद्धिवेंदेषु' म्हणजे वेद प्रमाण मानणें हेंही तत्व व्यवहारांत फारच गैरसोयीचें झालें आहे. कोणाही स्पृश्य ब्राह्मणेतराचे घरीं पूजा अथवा गृह्ससंस्कार चालविण्यास ब्राह्मण गेला तर तेथे वेदमंत्र म्हणण्यास तो तयार नसतो. ब्राह्मणेतरांसाठी पुराणोत्तक निराळे मंत्र तयार आहेत. जेथे ब्राह्मणेतरांच्या बाबतींत स्वत: ब्राह्मणांचीच प्रामाण्यबुद्धि अशी लटपटते, तेथे अस्पृश्यांच्या आणि वेदांच्या संबंधाची नुसती कल्पनाही कशी शक्य होणार ! मग अस्पृश्य हिंदु कसे हा एक खरोखर प्रश्नच आहे. आज ज्या क्षुद्र देवतांच्या उपासना अस्पृश्य करीत असलेले दिसतात, त्यांची उपासना वरिष्ठ म्हणविणारे हिंदूही राजरोस करितात एवढ्यावरुनच अस्पृश्यांना हिंदु म्हणावयांचें ना ? पण ह्या देवता अस्पृश्यांनी स्पृश्यांपासून घेतल्या की स्पृश्यांनी अस्पृश्यांपासून ? कोणी म्हणेल स्पृश्यांस्पृश्यतेचा उद्भव होण्यापूर्वीपासूनच ह्या देवता आणि त्यांची उपासना सर्वत्रच चालू आहे. पण मग तेवढ्यानेच अस्पृश्य हिंदु कसे ठरतात? अशा उपासना महायान बौद्ध धर्माच्या हीन अनुयायांमध्ये अद्यापि हिंदुस्थानाच्या सरहद्दीवर व बाहेरही चालू आहेत. मग तेही हिंदुच काय? मुसलमान ताबूत करितात, व त्यांचे पाहून कांही हिंदु मुसलमानांपेक्षाही अधिक बेहोष होऊन ताबुतापुढे नाचतात, म्हणून हिंदूंना काय मुसलमान म्हणावयाचें ? की ताबुतांना हिंदुधर्माचें साधन म्हणावयाचे ? ह्या विक्षिप्त संबंधाला जसें केवळ अनुकरणसंबंध म्हणता येईल, तसेंच स्पृश्यांच्या व अस्पृश्यांच्या दरम्यान आज दिसणारा धार्मिक संबंधही केवळ अनुकरणसंबंध का म्हणूं नये? हा संबंधही केवळ उपासनेच्या कांही भागापुरताच दिसतो. सर्वच उपासना तरी स्पृश्यांप्रमाणे अस्पृश्यांत कोठे रुढ आहेत? गाय, ब्राह्मण आणि तुळशीवृंदावन हीं तीन पुजास्थाने हिंदु बहुजनसमाजामध्ये रुढ आहेत, तशी तीं अस्पृश्यांमध्ये आहेत काय? मुळीच नाहीत. ख्रिस्ती-मुसलमानांप्रमाणे, शीख आणि लिंगायतांनी पुष्कळ प्रमाणाने व शैव वैष्णवांनी थोड्या प्रमाणाने ह्या बहिष्कृत वर्गांना आपल्यांत घेण्याचा प्रयत्न केला; पण ख्रिस्ती-मुसलमानांचे ह्या बाबतींतलें यश उत्तम, शीख-लिंगायतांचे यश मध्यम, आणि शैव-वैष्णवांचें यश कनिष्ठ का ठरलें? लिंगायतांत च्छलवादी आणि शीखांत मजबी अथवा लालबेग म्हणून जे लोक असतात ते अस्पृश्यांतूनच आलेले असतात. ते अद्यापि अस्पृश्यच आहेत! पहिल्यांनी अस्पृश्यांना एकदम आपल्या धर्मसंघांत एकजीव करुन घेतलें, दुस-यांनी धरसोड चालविली आहे, व तिस-यांनी तर अस्पृश्यांना आपल्या वेदांच्या, देवळांच्या आणि संघाच्या बाहेर लांब ठेवलें आहे. हिंदुधर्माची परंपरा, सांधिक शासन, विधि संस्कार, पठन पाठन, मग ते वैदिक असो, पुराणोत्तक असो, संस्कृत असो वा प्राकृत असो, त्याचा अधिकार मानीव अस्पृश्यांना स्वप्नांत देखील मिळणे शक्य नाही. तो मिळविण्यासाठी अस्पृश्याने मरुन पुन: स्पृश्यांत जन्मलें पाहिजे; येरवी नाही. असाच खरोखर त्यांच्या वरील बहिष्काराचा अर्थ आहे. ह्या अर्थाचा निषेध व निराकरण करुन धमक असेल तर हिंदु समाजाची व संघाची नवी घडी घालणें हें सुधारकाचें काम आहे. नुसती अर्थाची शाब्दिक लावालावी करुन वास्तविक बदल कसा घडेल? तोंवर अस्पृश्यांच्या धर्माचें कोडें कसें उकलणार?

हिंदुस्थानांतील कोट्यवधि अस्पृश्य आज कित्येक शतकें बिनबोभाट आपल्यास हिंदु म्हणवीत आहेत, त्यांचा प्रत्यक्ष छळ करणारे स्पृश्य वर्गही नुसतें नांवाने हिंदु म्हणवून घेण्याला त्यांना हरकत करीत नाहीत. इतकेंच नव्हे, कपट राजनीतीत कुशल असलेल्या इंग्रज सरकारच्या खानेसुमारी खात्याच्या प्रमुखांनी प्रति दशवार्षिक अहवालात, निर्विकार समाजशास्त्राचें आलोडन करुनही अस्पृश्य वर्गांची गणना हिंदु धर्माच्या सदरखालीच केली आहे. असें असूनही त्यांच्या हिंदुच्वावि।ई मी जी वर शंका प्रगट केली आहे, ती कांही आमच्या राष्ट्राच्या पससांतील गृहकलह जो एकदा कसा तरी दृष्टीआड झाला आहे त्याची खपली पुन: उकरुन नसतें नवीन वितुष्ट माजविण्याच्या कुस्तित हेतूने नव्हे. तर हें जें आमच्या राष्ट्रशरीराचे अगदी जुनाट हाडव्रण, आज जें भरून आल्याप्रमाणे दिसत आहे, तें आंतून भरून आलें नसून, नुसते बाहेरुन वरवर भरलेलें दिसतें. ते केव्हा ना केव्हा आणि पुन: पुन: चिघळणारच अशी प्रामाणिक भीति मला वाटत आहे. अशा प्रकरणांत भिडस्तपणा किंवा चालढकलपणा फार घातकी आहे. म्हणून वरील इषारा देणें मला अगदी जरुर वाटतें. मला हेंही ठाऊक आहे की अलीकडे -विशेषत: आमच्या महाराष्ट्रांत अगदी सोवळे ब्राह्मण भटजी केवळ दक्षिणेच्या आशेने लावतांना आणि सत्यनारायणाच्या पोथ्याही वाचतांना आढळतात. पण अशा प्रसगीं ते किती सुरक्षित रीतीने दूर उभे राहतात, आणि आपणच शिजविलेला सत्यनारायणाचा प्रसाद असूनही स्वत: आपण सेवन करण्याचें कसें टाळतात; आणि लपंडावांमुळे लग्ने आणि पोथ्या तात्पुरत्या पार पडल्या तरी चतुर अस्पृश्यांच्या मनाला अपमानाच्या नवीन जखमा होऊन नवीन वाद व नव्या चळवळी कशा जोरावतात, तेंही ध्यानांत घेणें जरूर आहे. पुराणोत्त्काची धूळ डोळ्यांत सलूं लागल्यामुळे स्पृश्य ब्राह्मणेतरांत ज्याप्रमाणे सत्यशोधकांची चळवळ सुरु होऊन ब्राह्मणांचा शिरकाव कांही झालें तरी आपल्या धर्मकृत्यांत घडू द्यावयाचा नाही, अशी नवी तेढ बळावू लागली आहे, तिचाच प्रसार अस्पृश्यांमध्ये अलीकडे होऊ लागला आहे. आणि समंजस अस्पृश्य लोकही आपले संस्कार आपल्याच लोकांकडून करुन घेऊं लागले आहेत. ह्याला जबाबदार कोण? तोंड दाबून बुक्क्यांचा मार कोठवर सहन होणार? बुक्क्या तरी बंद नाही तर तोंड तरी मोकळें झालेंच पाहिजे ना? महारांची दक्षिणा पाहिजे पण त्यांचा स्पर्श नको, हें व्हावें कसें ?

हिंदु धर्माची आणि समाजाची एकता व दृढता न्यायाच्या दृष्टीने निर्विवाद सिद्ध व्हावी ही कळ आता हिंदुमहासभेसारख्या उद्धारक संस्थांना, पंडित मालवीय व डॉ. मुंजे सारख्या सोवळ्या आणि ओवळ्या ब्राह्मण पुढा-यांना सारखीच भासूं लागली आहे. कोल्हापूरच्या क्षत्रिय जगद्गुरूंनी शेंकडो अस्पृश्यांना क्षत्रियत्वाची दीक्षा स्वहस्ते दिली, मालवीयजी आपल्या हातांनी अस्पृश्यांच्या गळ्यांत जानवी अडकविली, रत्नागिरीकडे डॉ. सावरकरांच्या अविश्रांत परिश्रमाने व डॉ. कुर्तकोटीसारख्या सुधारक शंकराचार्यांच्या अनुज्ञेने अस्पृश्यांच्या तोंडून प्रत्यक्ष वेदमंत्र म्हणून मूर्तीची षोडशोपचार पूजा झाली, इतकेंच नव्हे तर थाटाचें सर्व जातींचें सहभोजनही झाले, अशा वर्तमानपत्रांतून नित्यश: बातम्याप्रसिद्ध होत आहेत. प्रसंगविशेषी एखादें आडबाजूचें मारुतीचें देऊळ किंबहुना शेट जन्मालाल बजाज सारख्या देशभक्ताच्या वैयक्तिक वजनाखाली चाललेलें मोठें देऊळही अस्पृश्यांना उघडें होतें. ही धामधूम अशीच खरोखर सर्वत्र चालून अखेर ज्या दिवशी लहान थोर अस्पृश्य स्त्रीपुरुष हिंदु स्पृश्यांच्या सहवासांत समसमान दर्जाने सर्वच बाबतींत वावरुं लागतील, तेव्हाच त्यांची गणना हिंदुधर्मांत यथार्थ झाली, असें कोणीही म्हणेल, असें झाल्यावर अस्पृश्य हे खरे हिंदु आहेत की भूतधर्मीय आहेत, का आणखी कोणी आहेत, हें पाहण्यासाठी सरकारी खानेसुमारीचीं पुस्तके चाळण्याची कशाला जरुरी पडेल? असें होणार नसेल, तर ही पानें चाळून तरी काय फायदा ?

शेवटीं एका नाजूक गोष्टीचा उल्लेख करुन हें प्रकरण आटपूं वर जी मी शंका प्रदर्शित केली ती केवळ काल्पनिक नाही. सांधिक धर्माची व राजकारणाची नेहेमी गुंतागुंती पडते. परवा डॉ. आंबेडकरांनी कलकत्त्यास सायमन कमिशनच्या पोटकमिटीने एक सभासद ह्या नात्याने २३ ऑकटोबर १९२८ रोजीं भरलेल्या त्या कमिशनच्या संयुक्त परिषदेपुढे साक्ष दिली; तेव्हा त्यांनी स्पष्ट आणि जबाबदारीपूर्वक सांगितलें की, - "There is really no link between the Hindus and the Depressed classes.Therefore we must be regarded as a distinct and independent community, separate from the Hindus."

(अर्थ - "अस्पृश्यांचा व हिंदूंचा अर्थाअर्थी कांही संबंध नाही. त्यांचा एक स्वतंत्र निराळा असा अल्पसंख्याक समाज आहे, असें समजून त्यांना तसें वागविण्यांत यावें.") डॉ. आंबेडकरांच्या ह्या विधानाला व मागणीला सर्वच अस्पृश्यांचा पाठिंबा आहे, असें मुळीच नाही. पण कोणाच्या कोणत्या विधानाला ह्या जंगात कधी सर्वोचाच पाठिंबा मिळावा आहे? म्हणून डॉ. आंबेडकरांच्या ह्या विधानांची आम्हांला हेटाळणी करतां येईल? असो ह्या मुद्दयांचा विचार पुढे राजकारणाच्या प्रकरणांत अधिक करणें बरें होईल. तूर्त असेंच आणखी एक अगदी गैरसोईचें विक्षिप्त विधान अगदी अनपेक्षित दिशेने मला आढळलेलें येथे उल्लेखिल्याशिवाय मला राहवत नाही.

म्हारम्हात्म्य नांवाच्या एक विक्षिप्त पुराणाचे मी मागील प्रकरणांत बरेच उतारे दिले आहेत. पुढील दोन उतारे मासलेवाईक दिसतात.
नाना जाती आठरा वर्ण | ह्यांचे उचिष्ट न खावें म्हाराने |
मिलंची वेगळा करोन | इतर जातींचें न खावें || १४

मिलंची आणि म्हार जाण | ही दोन्ही चंद्रवंशी उत्पन्न |
म्हणोनि तयाचे घरचें अन्न | खावें ह्याराने वेद घाये (?) ||१५

(अध्याय ५ वा)

येथे मिलंची हा शब्द म्लेंच्छ ह्याचा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ मागील तिस-या अध्यायांत मुसलमान असाच शब्द योजून कर्त्याने स्पष्ट केला आहे. 

सेख सैय्यद मोंगल पठाण | अरब रोहिलेही मुसलमान |
रंगारी आत्तार बागवान | त्याच्या पोटी जावें || १८

म्हार आणि मुसलमान | हे दोघे एक वंशे उत्पन्न |
चंद्र वंश पूर्ण | सोम म्हणताति यालागे || १९

डॉ. आंबेडकर हे महारांचे एक विद्वान आणि प्रतापी पुढारी आहेत. त्यांना सर्वोचा नाही तरी पुष्कळांचा पाठिंबा आहे. त्यांच्यासाठी प्रत्यक्ष जीवाचीही आहुति देण्यास कांही अनुयायी तयार आहेत. ह्या 'म्हार म्हात्म्य' पुराणाचे कतें बाळकदास हे म्हारांचे एक पुरोहित गोसावी बुवा दिसतात. ह्यांनी आपल्या ग्रंथांच्या समाप्तीचा काळ व स्थळ ही शेवटीं दिली आहेत. शके १८८८ असें लेखकाचे चुकीने पडलें असावें. संदर्भावरुन शके १७८८ हें साल दिसतें. नीरानदीचे काठीं पुणें जिल्ह्यांत पाडेगांव म्हणून एक गाव आहे. तें स्थळ ग्रंथाचे शेवटीं दिलें आहे. ह्या गावीं म्हार गोसाव्यांची प्रसिद्ध घराणीं आहेत. ते असले ग्रंथ करितात, असें ऐकतों. ह्या बुवांच्या वरील मुसलमानांसंबंधी विधानाला म्हारांचा पाठिंबा आज मिळेल असें वाटत नाही. तरी म्हार मुसलमानांच्या कडे जेवतात. ते मुसलमानाप्रमाणें डुकराचें मांस अत्यंत त्याज्य मानून, गाईचें मांस मात्र उघड खातात हें प्रसिद्ध आहे. मुसलमान व महार हे दोघे चंद्रवंशी उत्पन्न झाले असें वर 'म्हारमहात्म्या'तून अवतरण दिलेंच आहे. चांद्रमास व निशाणावर चंद्राची कोर मुसलमानांची प्रसिद्धच आहे. मुलसमानी आमदानींत म्हारांवर त्यांच्या संस्कृतीचा परिणाम थोडा थोडका झाला असेल असें नाही. इंग्रज सरकाराचा व ख्रिस्ती मिशन-यांचा आताही तसाच होत आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करितां सुमारें पाऊणशें वर्षांमागें ह्या गोसाव्याने असें विधान केलेलें पाहून विशेष आश्चर्य मानावयाला नको. अशा विक्षिप्तपणाला 'उपास्यानां अनियम: | साधनानां अनेकता' अशी व्याख्या करुन लो. मा. टिळकांनी जरी आपली मूक संमति दिली आहे, तरी तिची मजल येथवर जाईल असें कोणालाही वाटणार नाही. कांही असो, आजकालच्या राजकारणाच्या ओढाताणींत आपण मुसलमान होऊं अशी धमकी केव्हा केव्हा. अस्पृश्य पुढारी देत असतात तिचा कोणताही संबंध वरील गोसाव्याच्या विधानाशीं मुळींच दिसत नाही. असता तर आपल्या पुराणांत तशी अधिक शिकवण दिल्याशिवाय तो न राहता. तें कसेंही असो, हिदु धर्माची शुद्धि व उत्कर्ष, आणि हिंदुसमाजाचें ऐक्य आणि दृढता वगैरेची चाड बाळगणा-या सर्वांनी अस्पृश्य वर्गांच्या खास प्रतिनिधीचे वरीलप्रमाणें उद्गार अगदीच टाकावू ठरवून घमेंडींत अत:पर राहूं नये, येवढाच तूर्त इषारा आहे.

मंदिराप्रवेशाचा मुद्दा ह्याच प्रकरणाखाली येईल असें कोणासही वरवर पाहतां वाटेल. पण त्यांत धर्म नसून अस्पृश्यांचे राजकारण आहे. आणि तें योग्यच आहे. व्हायकोम येथे प्रथम मंदिरप्रवेश सत्याग्रह झाला तेव्हा मी स्वत: त्यांत भाग घेतला. कारण सार्वजनिक देवळांत जाण्याचा प्रत्येक हिंदूचा धार्मिकच नव्हे तर सामाजिकही हक्क आहे. तो सामाजिक हक्क बजावण्यासाठी साधु शिवप्रसाद नांवाचे एक ब्राह्मसमाजाचे प्रचारक व मी तेथे गेलों. साधू शिवप्रसाद हे ब्राह्य होण्यापूर्वी तिय्या ह्या अस्पृश्य जातीचे होते; म्हणून त्यांनाही व्हायकोमच्या देवळाच्या नुसत्या वाटेवरही फिरण्याची मनाई झाली. ह्याचा खुलासा करुन घेण्याकरिता मला ब्राह्मसमाजाच्या वतीने व्हायकोमला जावें लागलें. मी त्या वेळीं दक्षिण कानडा जिल्ह्यांत मंगळूर ब्राह्मसमाजाचा आचार्य होतों. व्हायकोम गांव त्रावणकोर संस्थानांत आहे.

कलकत्याच्या साधारण ब्राह्मसमाजाने त्रावणकोर दरबारला शिवप्रसाद ह्या ब्राह्य प्रचारकाला झालेल्या मनाईबद्दल खुलासा विचारला असतां., कांहीच उत्तर मिळालें नाही. म्हणून मी तेथे गेलों. शिवप्रसादाच्या हातांत हात घालून मी सत्याग्रहाच्या फाटकांत शिरण्याचा प्रयत्न केला. पण मी येणार ही बातमी अगोदरच प्रसिद्ध झाल्याने मुख्य पोलीस सुपरिटेंडंट स्वत:च फाटकावर कडेकोट तयारीने उभे होते. त्यांनी मला वाट दिली इतकेंच नव्हे तर प्रत्यक्ष मंदिरांतही नेऊन दाखविण्याची तयारी दर्शवली. पण शिव प्रसादांना फाटकाच्या आंत जाऊं देईनात. सर्व पोलीस आम्हांशी आदराने व तितक्याच जबाबदारीपूर्वक निश्चयाने वागले. मग हें प्रकरण मी थेट त्रिवेंद्रम येथे दिवाणाकडे नेलें. त्यांनी प्रथम, झालेल्या प्रकाराबद्दल औपचारिक खेद प्रदर्शित केला. पण शेवटीं त्यांनी असा दप्तरी सल्ला दिला की शिवप्रसादाने आपण हिंदू नाही असें कबूल करावें. मग ते ब्राह्म असोत, आर्यसमाजाचे असोत, कोणी असोत; त्यांना फाटकांत जाण्याची परवानगी मिळेल. अर्थात् हा विक्षिप्त सल्ला स्वीकारण्यांत आला नाही. तें प्रकरण तेथेच थांबलें. पुढे पालघाट म्हणून एक गाव ब्रिटिश मलबारांत आहे तेथे आर्यसमाजांत प्रविष्ट झालेल्या अस्पृश्यांबाबत प्रश्न उत्पन्न झाला असतां, स्वामी श्रद्धानंद हे प्रसिद्ध आर्यसमाजाचे संन्याशी तेथे गेले. तरी अशा अस्पृश्यांना मंदिरप्रवेशाचाच नव्हे पण मंदिराच्या वाटेवरही फिरण्याचा हक्क मिळाला नाही. सार्वजनिक शांतताभंग होईल म्हणून उलट ब्रिटिश अधिका-यांच्या भिडेला श्रद्धानंदांना मात्र बळी पडावे लागलें. असें प्रत्यक्ष स्वामीजींनीच मला सांगितले. एकूण काय तर अस्पृश्य जोंवर हिंदु धर्मांत राहण्याचा आग्रह धरतील, तोंवरच त्यांच्यावर हा मंदिर बहिष्कार आहे  ! ज्या दिवशीं ख्रिस्ती अगर मुसलमान यांसारख्या सत्ताधारी धर्मांचा ते उलट स्वीकार करतील, त्या दिवशी त्यांच्यावर बहिष्काराचें शस्त्र उगारण्याची इच्छा हिंदुलोकांत असो वा नसो, सामर्थ्य मात्र खास नाही, हीच गोष्ट वरील दक्षिण देशांतील सत्याग्रहाने सिद्ध झाली आहे !

व्हायकोमचा सत्याग्रह केवळ काँग्रेसच्या जोरावर बरेच महिने मोठ्या चिकाटीने चालला. तरी त्याला पूर्ण यश आलें नाही. त्यानंतर महाराष्ट्रांत उमरावतीची अंबाबाई, पुण्याची पर्वती, नाशिकचा काळा राम वगैरे देवळांपुढे सत्याग्रह पद्धतशीर झाला, पण कोठेच यश आलें नाही. महाड येथील तळ्यावरील पाणवठ्याचा सत्याग्रह मात्र बहुतांशी यशस्वी झाला आहे. वरील सर्व मंदिरप्रवेशाच्या सत्याग्रहांना यश येईपर्यंत अस्पृश्य हे हिंदू आहेत की नाहीत हा प्रश्न पुन: अनिश्तितच राहतो. तें कसेंही असो. वरील सत्याग्रही आपल्या धार्मिकच नव्हे तर सामाजिक हक्काबद्दलही भांडत आहेत. तरी पण ह्या धकाधकींत धर्म अथवा समाजसुधारणा नसून उभय पक्षांचें राजकारणच आहे असें माझें प्रांजल मत झालें आहे. आता ह्या राजकारणाला केवळ स्पृश्यांच्या हट्टाचें स्वरुप आलें आहे. स्पृश्यांनी हिंदुमहासभेचें व काँग्रेसचें ऐकून अस्पृश्यांना सामोपचारें ह्यापूर्वीच सर्व मंदिरे खुली करुन दिलीं असतीं तर अस्पृश्य मोठे धार्मिक व भक्तिभान् झाले असते, असें नव्हे. पण आजच्या त्यांच्या राजकारणाला खात्रीने निराळें वळण लागलें असतें.  त्यांना-निदान त्यांच्यापैकी जे स्वतंत्र मतदारसंघ मागत आहेत त्यांना तरी-आपल्या आग्रहाला आधार उरला नसता. पण कांही अदूरदर्शी व आपमतलबी हिंदूंच्या हट्टामुळेंच स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आज अगदी न्याय्यच नव्हे तर अवश्य ठरत आहे. तिच्यामुळें राष्ट्राला धोका आहे हेंही खरेंच आहे. तो धोका हा की ह्या मागणीला अधिकच उग्र स्वरुप येऊन, पुढे सर्व सार्वजनिक देवळेंच नव्हत, तर खासगी देवघरेंही अस्पृश्यांना मोकळी केलीं तरी त्यांचा हट्ट कदाचित कांही काळ तसाच कायम राहिल. अशाने अस्पृश्यांचें म्हणण्यासारखें मोठेंसें कल्याण झालें नाही तरी परकीयांच्या कांही चेष्टेचें मात्र आणखी थोडें जास्त प्रदर्शन होईल. ह्या पेक्षा जास्त ह्या मंदिरप्रवेशाच्या मुद्याचा विचार ह्या प्रकरणांत करणें मुळींच जरुर नाही.