प्रकरण तिसरे : बौद्ध कालांतील अस्पृश्यता

हा काळ हिंदुस्थानच्या इतिहासांत अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्याच काळांत ह्या प्रचंड देशांत अनेक दृष्टींनी अेक क्रांत्या झाल्या. त्या अशा १ येथूनच हिंदुस्थानाच्या ऐतिहासिक काळाला सुरुवात झाली. ह्या पूर्वीच्या प्रागैतिहासिक काळांतील घडामोडी बहुतेक निश्चित पुराव्याच्या अभावी अनुमानानेच ठरवाव्या लागतात.

२. ह्या काळीं हिंदुस्थानचें आद्ययुग अथवा युगें संपून, मध्य युगाला सुरुवात होते. ह्या मध्ययुगाचा अमल जवळ जवळ दीड हजार वर्षें म्हणजे हिंदुस्थानावर मुसलमानांच्या स्वा-या होऊन त्यांचे आधिराज्य व त्यांच्या संस्कृतीचा परिणाम होऊं लागेपर्यंत चालू होता.


३. वैदिक आणि तत्सम इतर बाह्य संस्कृतींचा जो बरा वाईट परिणाम हिंदी समाजस्थितीवर ह्या काळापर्यंत होत होता त्याला येथून पुढे बौद्धजैनांनी चालविलेल्या सुधारणांचा विरोध होऊ लागला ह्या कलहांत जी कालेंकरुन तडजोड झाली तिला बौद्ध ब्राह्मणी संमिश्र संस्कृति असें नांव देतां येईल. ह्या मिश्र संस्कृतीचा काळ म्हणजे हें मध्ययुग होय.


४. ह्याच युगात संस्कृत वाड्मयाच्या जोडीला उत्तरदेशांत पाली व प्राकृत, तशीच दक्षिण देशांत तामीळ कानडी इत्यादि तद्देशीय वाड्याची भर पडली. ह्या युगापूर्वीच उत्तर हिंदुस्थानांत बाहेरून आलेल्या आर्य, शक वगैरे प्रतापी अभिजात मानववंशांची व त्यांच्या संस्कृतीची पूर्ण प्रतिष्ठा झाली होती. ह्या वंशांचा व संस्कृतीचा ह्या मध्ययुगाच्या आरंभापासून दक्षिण हिंदी द्वीपकल्पांत जोराचा शिरकाम होऊन सुमारे ख्रिस्ती शकाच्या आरंभीच म्हणजे अर्धसहस्त्रकांतच हें 'दक्षिणापथ' नांवाचे द्वीपकल्प भरतखंडांत, एकजीव झालें नाही तरी, सामील झाले.


६. ह्याच मध्ययुगाच्या आरंभी अलेक्झांडरच्या स्वारीमुळे उत्तर हिंदुस्थानाचा, पश्चिम आशियाशींच नव्हे तर पूर्व युरोपखंडाशीही संबंध जडला. इतकेंच नव्हे तर ह्या स्वारीला ज्या मौर्य साम्राज्याने यशस्वी रीतीने मागे हटविलें त्या प्रतापी आणि अस्सल हिंदी साम्राज्याने उत्तर आणि दक्षिण ह्या दोन भिन्न व तुटक हिंदी देशभागांची एकाच छत्राखाली संयुक्त घटना ( फेडरेशन) केली. इतकेंच नव्हे तर पूर्वेकडे ब्रह्मदेश, सयाम, मलाया द्वीपकल्प आणि दक्षिणेकडे सिंहलद्वीप येथपर्यंत आपल्या संस्कृतीचे हात पसरिले.


७. ह्या मध्ययुगापूर्वी भारतांत, निदान आर्यावर्तोत, ब्राह्मणी संस्कृतीचाच वरचष्मा होता. ही संस्कृति बहुश: 'आध्यात्मिक,' भावनात्मक, वाड्मयविषयक उर्फ शाब्दिक होती. मौर्य साम्राज्याचा व्यवहारवाद आणि बौद्धजैनांचा शुद्ध बुद्धिवाद ह्यांचें सहकार्य ह्या मध्ययुगांत घडून ह्या नवीन शक्तींशी ब्राह्मणी संस्कृतीला तडजोड करावी लागली.


८. ह्याच मध्ययुगांत हिंदी समाजाची पुनर्घटना वर्णाश्रमधर्म वगैरे-सारख्या अल्पसंख्याप्रेरित भावनात्मक पायांवरुन अर्थशास्त्राच्या आणि बहुजनसत्तेच्या नवीन पायावर झाली.


९. ह्याच मध्ययुगांत हिंदी समाजस्थितीची सुधारणा व लोकस्थितीची ऐहिक भरभराट जशी झाली तशीच भावी दुर्बळतेचीं आणि परवशतेची बीजेही कायमची पेरलीं गेली! येणेंप्रमाणे हा काळ चांगलाही आहे आणि तितकाच वाईटही आहे. कारण ह्या सबंध काळांत बौद्ध आणि ब्राह्मणी संस्कृतीची सारखी तडजोड चालली होती. आणि अशा मिश्रणाचा परिणाम भरत खंडाच्या भवितव्यतेवर पुढील म्हणजे अर्वाचीन युगांत अनिष्टच झाला ह्यांत नवल नाही! असो. आम्हांला ह्या कालांत आमचा प्रस्तुत विषय जी अस्पृश्यता तिचा विकास कसा झाला हे पाहावयाचे आहे.


अस्पृश्यतेचा व्याप आणि घटना कमी अधिक मानाने सर्व जगभर आहे हें वर सांगितलेंच आहे; तरी हिंदुस्थानांत ह्या घटनेला विशेष स्थैर्य आणि यश आले आहे ही गोष्ट ध्यानांत घेण्यासारखी आहे. आणि हिच्या कारणांचा शोध व मीमांसा शक्य तोंवर करणें जरूर आहे. हिंदुस्थानांतही त्यांतल्या त्यांत उत्तरेपेक्षा दक्षिण भागांत अस्पृश्यतेचा पाया अधिक खोल व दृढ रोविला असून त्याचा परिणाम किती तरी अधिक तीव्र दिसतो, ह्याचें कांही तरी विशेष कारण असलें पाहिजे. कदाचित् आर्यांच्या आगमनापूर्वीही ह्या देशांत ही संस्था होती किंवा काय अशी शंका मनांत येते. पण ह्या शंकेचे समाधान होण्यासारखा एकही पुरावा मिळण्याचें कांही साधन आता उरले नाही. उत्तर हिंदुस्थानांतील अस्पृश्यतेचा जो विकास आम्ही वर पाहिला आणि त्यासंबंधी आर्यांच्या वाड्मयांतून बौद्ध काळाच्या मागे मागे जाऊन जे मिळालेले उल्लेख वर उद्धत केले आहेत त्यांवरुन एक अनुमान असें निघत आहे की, आर्यांपूर्वी ह्या देशांत कायमची वसति करुन राहिलेल्या धनसंपन्न मानवजाति होत्या त्यांच्या सहवासाने कदाचित् अस्पृश्यतेचा शिरकाव आर्यांच्या समाजघटनेंत झाला असावा. हा सहवास जसजसा जास्त काळ व जास्त प्रमाणावर झाला तसतसा हा शिरकाव जास्त झालेला दिसत आहे. येरव्ही आर्य ग्रंथांतून शोध घेत जसजसे मागें जावें तसतसे अस्पृश्यतेचे दाखले कमी कमी कां आढळावे ह्या गोष्टीचा उलगडा नीट होत नाही.


मी दक्षिण हिंदुस्थानांत तामिळ देशांत समाजशास्त्रांचे संशोधन करीत असतां ब-याच मुदलियार, पिल्ले वगैरे द्राविड पंडितांनी मला सांगितले की आर्यांप्रमाणे अत्यंत प्राचीनकाळी द्राविड देशांतही एक प्रकारचें चातुर्वर्ण्य होते. १ किना-यावर राहणारे, २ अंतर्देशांतील मैदानांत राहणारे, ३ जंगलांत झाडींतून राहणारे व ४ डोंगरपाठारावर राहणारे, असे हे चार भिन्न समाज होते. सांपत्तिक दृष्टया ह्यांच्यांत उच्चनीच भाव होता. पण आर्यांप्रमाणें तो भेद सामाजिक होता की नाही हे तेवहा मला समजले नाही. बिशप कॉल्डवेल ह्यांनी 'द्राविड भाषांचे तौलनिक व्याकरण' (Comparative Grammar of dravidian Languages) ह्या नांवाचा जो एक अत्यंत परिश्रमाने लिहिलेला अमूल्य ग्रंथ आहे त्यांत Depressed Classes म्हणजे दलितवर्गांसंबंधी एक निबंध आहे. त्यांत विशप कॉल्डवेल म्हणतात, "द्राविड देशांत जे लोक आपल्यास शूद्र म्हणवितात, ते स्वत:स शूद्र म्हणजे आर्येतर येवढ्याच अर्थाने समजतात, नीच ह्या अर्थाने नव्हे. मात्र शूद्र म्हणजे द्राविड देशाचे अस्सल रहिवासी असाहि एक अर्थ शूद्र म्हणून घेण्यांत आहे. मानीव अस्पृश्य ह्यांना ते शूद्र हें बहुमानाचे नांव देत नसत. मुदलीयार ह्या शब्दाचा यौगिक अर्थच 'मूळचा' असा आहे. ह्यावरून अस्पृश्य जे पारिया लोक त्यांना परके समजण्यांत येत असे, असें दिसतें. ह्यावरून प्राचीन द्राविडांतही अस्पृश्यता स्वतंत्र रुपाने होती अशी शंका येते. पण ह्या कल्पनेस शिलालेखी अगर वाड्मयीन आधार नाहीत.


अस्पृश्यता रूढ होण्याची दोन स्वाभाविक कारणें उघड आहेत. पहिलें जातिद्वेष अथवा वर्णद्वेष आणि दुसरे वृत्तिमत्सर. उत्तर हिंदुस्थानांत आर्यांचा जम हळूहळू बंसू लागल्यावर त्यांनी जेव्हा वर्णांची व्यवस्था लाविली तेव्हा त्या अवस्थेंत शुभ्र, ताम्र, पीता आणि कृष्ण ( ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ) अशा भिन्न वंशांचा समावेश यशानुक्रम करुन घेतला आहे. सर्व ब्राह्मण पांढरे, सर्व क्षत्रिय तांबडे अथवा जांभळ्या वर्णाचे, सर्व वैश्य पिवळे आणि शूद्र तितके एक जात काळेच होते असें माझें म्हणणें नाही. कातडीच्या रंगावरुन वर्णांची लाविलेली उपपत्ति इतिहासज्ञ कै. राजवाड्यांची आहे. माझी नव्हे. मला ती पसंत नाही. मात्र हे सगळेच रंग आताच्या ह्या सगळ्याच वर्णोत व पोट-जातींत आढळतात, त्याअर्थी ते पूर्वीही आढळले असावेत असा माझा तर्क आहे. रामकृष्ण काळे होते. न जाणों वसिष्ठ वाल्मीकि कश्यप हेही काळे असतील. तेव्हा शुभ्रकाय ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यांचा गुणकर्मानुसार परिस्थितीवशात् शिरकाव झाला असावा; आणि ज्यांच्या गुणकर्मांचा-केवळ बाह्य रंगाचाच नव्हे-तिटकारा आला अशा घोर जंगली जातींना दूर ठेवण्याची प्रवृत्ति पूर्वीच्या आयेंतरांच्या सहवासाने आर्योचीही झाली असावी, असें मला वाटतें. पण पुढे अर्थशास्त्राच्या पायावर आर्यांमध्ये निरनिराळ्या वृत्तीचा उर्फ धंद्यांचा विकास झाला तसतशी वर्णद्वेषांत वृत्तिमत्सराची भर पडून पूर्वीच दूर ठेवलेल्या जातीमध्ये वृत्तिबहिष्कृत अशा लोकांची भर पडूं लागलून अस्पृश्यतेचा विस्तार होऊं लागणें संभवते. पुढे आर्यांच्या वसाहती दक्षिण हिंदुस्थानांत जसजशा होऊ लागल्या तसतसा वर्णद्वेष आणि वृत्तिद्वेष ह्या जोडगोळीमुळे दक्षिणेकडे अगोदरच असलेल्या अस्पृश्यतेला अधिक ऊत आला असावा हें उघड दिसतें. येरव्ही दक्षिणेकडील व उत्तरेकडील अस्पृश्यतेंत इतका तीव्र फरक का असावा हे कळत नाही.


प्रो. टी. डब्ल्यु. व्हिस डेव्हिड्स ह्या विद्वान शोधकांनी आपल्या Buddhist India ('बौद्धकालीन हिंदुस्थान') ह्या पुस्तकांत ( प्रकरण ४, पान ५३-५५) आर्यांच्या वर्णव्यवस्थेंत बौद्धकाळी आर्थिक वृत्तिव्यवस्थेची भेसळ कशी होऊं लागली हे पाली भाषेंतील निरनिराळ्या जातक ग्रंथांतून मार्मिक उतारे देऊन स्पष्ट केलें आहे. पुढे दिलेल्या भाषांतरित उता-यावरुन त्यांचा आशय स्पष्ट होईल.
भरतखंडावर स्वारी करणा-या ज्या आर्य जमाती त्यांच्या नायकाशीं आपला वंशसंबंध जोणारे 'क्षत्रिय' हे तत्कालीन समाजाचे म्होरके होते... यशयाग करणा-या पुरोहितांच्या वंशावर हक्क सांगणा-या ब्राह्मणांची पायरी त्यांच्यानंतरची होती. त्यांच्याखाली शेती कसणारा सामान्य जनसमाज म्हणजे वैश्यवर्ग होता. सर्वांच्या शेवटीं अनार्थ वंशांत जन्मलेल्या शूद्रांची गणना होत होती. हे लोक मजुरी, हस्तकौशल्याची कामें किंवा सेवाचाकरी करीत. हे वर्णांने इतरांपेक्षा अधिक काळे होते....


येवढ्यानेच हें परिगणन संपले असें नाही. चा-ही वर्णांच्या तळाशी म्हणजे शूद्रांच्या खालच्या पायरीवर हलक्या जमाती व हलक्या धंद्यांचे लोक ('हीन जातीय' आणि 'ही शिप्पाणि') असत. 'हीन जाती'मध्ये चटया विणणारे, फासेपारधी व गाड्या तयार करणारे यांचा समावेश होत असे. हे लोक हिंदुस्थानांतील मूल वंशापैकी असून वंशपरंपरेने ही तीन कामें करणारे होते. 'हीन शिल्पी' - बुरूड, न्हावी, कुंभार,कोष्टी, चांभार इ. जे असत त्यांच्यामध्ये जन्मत: निश्चित झालेला पृथकृपणा नसे. या 'हीन शिल्पापैकी एखादा धंदा सोडून दुसरा धंदा त्यांस स्वीकारतां येत असे व कित्येक तसें करीतही असत. उदाहरणार्थ, पांचव्या जातकामध्ये एकप्रेमसंबंधांत निराश झालेला क्षत्रिय, बिलकुल मानहानि किवा दंड सोसावा न लागतां कुंभाराचा, बुरूडाचा, वेतकाम करणा-याचा माळ्याचा, आणि स्वयपाक्याचा-इतके धंदे एकामागून एक करतांना दिसतो. सहाव्या जातकामध्ये एक वैश्य शिंप्याचा व कुंभाराचा धंदा करीत असलेला आढळतो; असें असूनही त्याच्या नातेवाईकांची त्याजविषयीची आदरबुद्धि ढळलेली दिसत नाही.


अखेर, या 'हीन जाति' व 'हीन शिल्पा' पेक्षाही तिरस्कृत असलेल्या चंडाल व पुल्कस या मूलवासीयांच्या जमाता जैन व बौद्ध ग्रंथांतून उल्लेखिलेल्या दिसून येतात. ह्या उता-यावरुन दिसून येतें की आर्यांच्या चातुर्वर्ण्यात आपसांत वाटेल तशी आदलाबदल झालेली चालत असे; पण ह्या चातुवर्ण्याबाहेर ज्या बहिष्कृत व तिरस्कृत जाती असत त्यांचा आंत शिरकाव होत नसे.


ह्याच भागात प्रो. व्हिस डेव्हिड्स ह्यांनी पान ५६, ५७ वर खालील दहा उदाहरणें जातकांच्या संदर्भासह दिलीं आहेत.
१. एक क्षत्रिय राजपुत्राने आपल्या प्रीतिपात्रासाठी कुंभार, बुरुड, मालाकार इत्यादिकांची वृत्ति पत्करली तरी त्याचा सामाजिक दरजा कमी झाला नाही.
२. दुस-या राजपुत्राने आपल्या राज्याचा वाटा आपल्या बहिणीला बहाल करुन आपण वैश्यवृत्ति स्वीकारिली.
३. तिस-या राजपुत्राने एक व्यापा-याजवळ राहून हाताने काम करुन पोट भरले.
४. एका उमरावाने पोटासाठी तिरंदाजी केली.
५. एक ब्राह्मणाने वैश्यवृत्तीने पैसे मिळविले.
६. दुस-या दोन ब्राह्मणांनी तसेंच पोट भरलें.
७. दुसरा एक ब्राह्मण एकां तिरंदाजाचा मदतनीस झाला.
८,९. ब्राह्मणांनी शिकारी आणि फासे पारध्याची वृत्ति चालविली.
१०. एक ब्राह्मण सुतार झाला.


ब्राह्मण उघडपणें शेतकी करुन शेळ्या मेंढरें राखीत असत. क्षत्रियाने टाकलेल्या बायकोशीं ब्राह्मणाने विवाह केला ( जातक ५. २८०) अनुलोमच नव्हे तर प्रतिलोम विवाहही होत असत. म्हणजे वरिष्ठ वर्णाच्या बायका कनिष्ठांशी लग्न करुन राहात. वर उद्धत केलेले उ्म्मग्ग जातकांतील श्रीकृष्णाने जांबवतीशीं केलेल्या विवाहाचें उदाहरण लक्षात घेण्यासारखे जरी भेदभाव डळमळीत होत तरी भेदाचा खुंटा हालून हालून अधिक बळकटच होत होता अशी प्रो. डेव्हिड्सलाही कबुली द्यावी लागली आहे. ( पान ६०).


गौतम बुद्धाच्या वेळची डळमळीत स्थिती मौर्य साम्राज्याच्या वेळी अस्पृश्यांपुरती तरी बळकट झालेली दिसते. मोठमोठ्या शहरातं, विशेषत: पाटलीपुत्र (पाटणा) नगराच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या धंद्यांच्या लोकांची वसति वसल्याचीं वर्णनें मेगास्थिनीसच्या लेखांतून आणि कौटिलीय अर्थशास्त्र ह्या ग्रंथांतून आढळतात. ह्या ग्रंथांचे अधिकरण २ रें, प्रकरण २२, भाग चौथा, पान ५४ वर स्पष्ट उल्लेख आहे की :- पार्षडचंडालानां स्पशानांन्ते वास:।

 
हे पाषंड कोण नीटसें समजत नाही. बौद्ध जैन नसावेत. ते चार्वाक, लोकांयातिक, पाशुपत असावेत. पण ते बहिष्कृत असल्यास मोठे आश्चर्य होय. पण चंडालांची वसति मात्र गांवाबाहेरील स्मशानाच्या पलीकडे असल्याचा हा पुरावा महत्त्वाचा आणि स्पष्ट आहे.


आर्यांची भारतीय ग्रामसंस्था फार प्राचीन आहे. आर्य हे ह्या देशांत उपरे असल्यामुळे त्यांचा अभिजात आर्येतरांशीचं केवळ नव्हे तर अनभिजात आयेंतराशींही व्यवहार फटकून राहण्यापेक्षा मिळते घेऊन राहाण्याचाच जास्त होता, व असणे जरूर होते; कारण ते जरी उपरे होते तरी दक्षिण आफ्रिकेंतील हल्लीच्या शुभ्रकायांप्रमाणे त्यांच्या वसाहती मूळ देशांशी संबंध ठेवणा-या दीर्घसूत्री व दृढ नव्हत्या. हिंदी आर्यांना येथील भिन्न आयेंतरांशी जमते घेऊन वेळोवेळी समरस झाल्या शिवाय त्यांच्या ग्रामसंस्थांची उभारणी होणे शक्य नव्हतें. ते उपरे असले तरी भारतवर्षांत कायम राहण्यास आले होते. मूळदेशांशी त्यांचे लागेबांध्ये नसून त्यांच्यामागे इंग्रज राजकर्त्यांप्रमाणे 'होमचार्जेस' (Home charges) चा उर्फ घऱच्या देण्याचा ससेमिरा नव्हता. त्यामुळे आद्य आर्यांनी भारतवर्षांत आयेंवर्षांत आयेंतरांशी जे मुदतबंदी मजुरीचे आणि अलुत्याबल्युत्याचे नियम केले ते हल्लीच्या गौरकायांपेक्षा अधिक सढळ हाताने, अधिक संभावितपणाने केलेले आढळतात, हें खालील उता-यावरुन दिसते.
 

 

नमस्तक्षम्यो रथकारेभ्यश्र वो नमो, नम: कुलालेभ्य: कर्मारेभ्यम

वो नमो, नमो, निषादेभ्य: पुअिष्ठेभ्यश्र वो नमो, नम: श्वनिभ्यो भृगयुभ्यश्च वो नम: ।।
माध्यन्दिन ( शुक्लयजुर्वेद ) संहिता, १६, २७


यशकर्माला निरनिराळी कर्मज, खनिज, प्राणिज सामग्री लागत असे, तिच्यासाठी मोठमोठे ऋत्विज वर सांगितलेल्या सच्छूद्राच्याच नव्हे, तर निषाद, पुक्कस, श्वनि म्हणजे कुत्रे पाळणारे आणि मृगयु म्हणजे भिल्ल, इत्यादि जंगली लोकांच्याही पाया पडत. नवरात्रात 'घटाला घावरी,' दिवाळींत 'रांगोळी' असा मोठ्याने आवाज काढून रस्त्यातून ओरडत जाणा-या वैदू बायांशी किंबहुना 'शॉन (शेण)च्या व शॉन' असे ओरडणा-या भोकरवाडींतील मांगिणींशीं देखील सदाशिव पेठेंतील ब्राह्मणांच्या बायका किती आर्जवाने वागतात, त्याचें वरील यजुवेंदांतल्या नमस्कारांशी फार साद्दश्य भासते! परंतु बौद्ध आणि जैन धर्माच्या प्रसारामुळे व सहवासामुळे यज्ञक्रिया संपृष्टांत आल्यावर पुढे लौकरच म्हणजे मनुस्मृतीच्या काळांत सुतारलोहारादि कुशल पांचाळांची मान्यता जरी वाढलेली दिसते तरी अकुशल श्रम करणा-या व अंगी विशेष क्षात्रतेज नसलेल्या आर्यंतरांची गणना अस्पृश्यांत होऊन त्यांना गांवबाहेर डांबून ठेवण्यांत आलेलें आढळतें. बौद्ध आणि जैन धर्म जरी जातिभेद मानीत नसत तरी त्यांच्या अमदानींत अनेक नवीन जातिसंघाना पूर्वीपेक्षाही अधिक मान्यता मिळून अशोक मौर्याच्या साम्राज्यानंतर कुशलांची वैश्य वर्गामध्ये विशेष चढती आणि अकुशलांची सामान्य शुद्धांत गणती होऊन जातिभेदाचे पर्याय फार वाढले. बौद्धांच्या व जैनांच्या उदार विचारांमुळे यज्ञविषयक हत्या व अत्याचार यांना जरी आळा बसला, तरी सामाजिक रचनेची संकीर्णता कमी न होता उलट फार वाढली यांत शंका नाही. विशेषत: ग्रामबाह्य हीन मानिलेल्या जातींचे सारे व्यवहार हत्त्या व हीन कर्मोशीच अधिक अधिक निगडित होत गेल्यामुळे त्यांची अस्पृश्यता व बहिष्कार उत्तरोत्तर दुणावत व दृढावत जाणेंच क्रमप्राप्त होतें.

बौद्धांची अहिंसा व जैनांचा कडकडीत शाकाहार ह्यामुळे ह्या दोघांही उदारघींचा ओघ अस्पृश्यतानिवारणापेक्षा दृढीकरणाकडेच होणें स्वाभाविक होतें. उलटपक्षीं यज्ञयागादि हत्त्येच्या अत्याचारांत वावरणा-या ब्राह्मणांचा सहवासाच ह्या बहिष्कृत वर्गांशी अधिक असण्याचा संभव जास्तआहे, हें शूलगवादि गृह्यसूत्रांतील विधीवरुन व हल्लीच्या मरीआईच्या भयंकर जत्रांवरून स्पष्ट दिसते. मरीआईच्या जत्रेंत ज्याप्रमाणे रेड्याचें डोके कापून ते गांवाभोंवती फिरवून शिवेवर नेऊन पुरतात किंवा वाटून खातात. तशाच प्रकारचा विधि गृह्यसूत्रांत शूलगव नांवाचा होता. असो. एक पक्षी बौद्ध जैनांचा सोवळेपणा, औदासीन्य आणि वैराग्य आणि दुसरे पक्षी ब्राह्मणधर्मीयांचा हत्याप्रिय कर्मठपणा ज्याला राजवाड्यांनी आचरटपणा हें निरुत्कासिद्ध समर्पक नांव दिलें आहे - ह्या दोन भिन्न प्रवृत्तींचा मिलाफ होऊन चिचा-या अस्पृश्यांचा बुडता पाय बहिष्काराच्या चिखलांत कायमचा जो रुतला तो रुतलाच !


मौर्य साम्राज्याच्या विस्तारामुळें आर्यांचें आणि तत्समांचें सामाजिक वर्चस्व नर्मदेच्या उत्तरेपक्षा दक्षिणेकडे विशेष आढळतें. त्यामुळे जरी बौद्ध आणि जैन ह्या उदार धर्मांचा दक्षिणेकडे प्रसार झाला तरी त्याबरोबरच मायावी आर्य राज्यव्यवस्था, कृत्रिम वर्णव्यवस्था आणि स्वार्थी ग्रामसंस्था आणि ह्या सर्वांची विषारी नांगी जी अस्पृश्यता तिचा विशेष विकास उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे अधिक झालेला समाजशास्त्राच्या दृष्टीने पाहणा-यास स्पष्ट दिसत आहे. ह्या बाबतींत प्रसिद्ध समाजशास्त्री हेन्री मेन व सेन्सस रिपोर्टर आर. व्ही. रसेल ह्यांच्या ग्रंथांतील कांही उल्लेख फार महत्त्वाचे आहेत, त्यांचें भाषांतर पुढेत देतों.


"मद्रासेकडे मिरासी वतनबाबीचा जो कायदा आहे तो प्राचीन ग्रामसंस्थेचा कदाचित अवशेष असावा. ह्या कायद्याअन्वयें जमिनीच्या मालकीचा हक्क फक्त कांही थोड्या वरिष्ठ जातींना देण्यांत आला. पुढे भोवतालच्या पडिक जमिनी वाहण्याचा मक्ता ह्या थोड्या आद्य मालकांकडेच राखून ठेवण्यांत आला. ह्यांनीच प्रथम ही नवीन जमीन लागवडीस आणल्याशिवाय इतरांना अशा जमिनी संपादन करण्याचा हक्कच नसे. पारिया किंवा इतर अस्पृश्य वर्गांना तर जमिनीच्या मालकीचा हक्क नाही."


Russel's Tribes and Castes of the Central Provinces. पान ४१.


ह्या आद्यमालकांना हल्ली मुदलियार असें नांव आहे. मोदल (मुद्दल) हा शब्द तामीळ भाषेंतील विशेषण असून त्याचा अर्थ पहिला, अव्वल, पूर्वींचा असा आहे. मोदलियार हें अनेकवचनी रूप आहे. ह्यावरून मोदलियार म्हणजे प्रथम वसाहत करणारे शिष्टजन असा अर्थ होतो. ह्यावरुन ही ग्रामसंस्था आर्यांच्याही आधीची द्राविडी दिसते. मलबारांत नंबुद्री ब्राह्मण हे आर्य आहेत. त्यांनी हीच द्राविडी संस्था अधिक बळकट करुन सारी जमीन आपल्याच मुठींत वळून, तद्देशीयांना पशूंप्रमाणे त्याच जमिनीवर राबविण्याची जी अमानुष रुढि पाडली आहे ती अद्यापि जारी आहे. रसेलने सर हेन्री मेन यांच्ा प्रसिद्ध 'ग्रामसंस्था' (Village Commonity) ह्या ग्रंथांतून पान १२७ वर पुढील निर्णायक उतारा दिला आहे.


"मध्य आणि दक्षिण हिंदुस्थानांत अशी कित्येक खेडीं ( गावं) आहेक की ज्यांच्या शिवेला लागूनच काही जातींची वस्ती आहे. ह्या जातीच्या माणसांचा संबंध ह्या गावांतील कोणत्याही स्वाभाविक व सांधिक स्थितीशी येणें शक्य नसते. हे लोक निसर्गत;च अस्पृश्य समजण्यांत येतात. त्यांना गांवांत मज्जाव असतो किंवा कांही राखीव जागेंतच जाण्यास त्यांना परवानगी असते. तेव्हाहीं त्यांचा स्पर्श टाळण्यांत येतो. स्वत:च्या शरीरावर आपल्या मूळ जातित्वाचा स्पष्ट चिन्हे वाहण्याची त्यांच्यावर सक्ती असते. त्यांचा गांवांत जरी शिरकाव नसतो तरी गांवाच्या ब-यावाईटाशी अभेद्य संबंध असलेला एक चिकटवलेला भाग म्हणून ह्या लोकांची धस्ती असते. त्यांची वृत्ति (कामें) निश्चित असतें. त्यापैकी गांवांच्या परस्पर मर्यांदांचा निश्चय करणें हा एक त्यांचा मुख्य अधिकार असतो. ह्या बाबतींत त्यांचा निकाल शेवटला समजण्यांत येतो. ह्यावरून ह्यांचा वंश भिन्न असून गांवांत राहणा-या वसाहतवाल्यांनी ह्यांच्या जमिनी बळकावस्या आहेत हें उघड दिसतें."


सर हेन्री मेन हे ह्या देशांत परके असल्याने वर वर्णिलेला प्रकार 'कित्येक' खेड्यांत आहे असें त्यांनी म्हटलें आहे. कारण त्यांना सर्व खेडी पाहणे शंक्य नव्हतें. वस्तुत: वरील प्रकार सर्वच खेड्यांत आहे. म्हणूनच गांव आहे तेथे महारवाडा आहे अशी मराठींत म्हण पडली आहे. ह्या प्राचीन ग्रामसंस्थेचे दृश्य जितके अद्यापि महाराष्ट्रांतील खेड्यांत स्पष्ट दिसतें त्याहून अधिक स्पष्ट हिंदुस्थानांत किंबहुना सर्व जगात कोठे आढळणार नाही. उत्तरेकडील मौर्यांच्या साम्राज्यपीठाचा अपहार शुंग आणि कण्व ह्या ब्राह्मणी नोकर घराण्यांनी केल्यामुळे व ही दोन्ही घराणीं दुबळ व राजकारणांत गैरवाकव ठरल्यामुळे तीं अल्पकाळात नष्ट झाली. अशोकाच्या मागे लवकरच दक्षिणेंत शातवाहन नांवाचे बादशाही घराणें उदयास आलें. त्याने मगध देशापर्यंत आपल्या राज्याची हद्द उत्तरेकडे नेली व दक्षिणेंत त्याच्या शिवेवर तिन्ही बाजूला समुद्राचें वलय होतें. अशा अर्थाने किंचित् अतिशयोक्तीचे शिलालेख आढळतात. मौर्यांइतके बादशाही सामर्थ्य शुंग व कण्व ह्यांच्यांत नव्हते म्हणून दक्षिणेकडील शातवाहनांना बादशाही स्थापण्यास संधि मिळाली. ती त्यांनी उत्तरेपर्यंत भिडवली. हे शातवाहन उर्फ साळवी मराठी 'मुलखांतून रद्द अथवा महाराष्ट्र आणि तेलगू व कानडी मुलखांतून रड्डी ह्या नांवाने अद्यापि प्रसिद्ध आहेत.

 

जमिनीची बहुतेक सर्व मालकी अथवा मिरासी ह्या अफाट प्रदेसांत ह्यांचेकडेच आहे. कृष्णा आणि तुंगभद्रा ह्यांच्या मधला, आणि उत्तरेला माळव्यांत थेट शोणभद्रेच्या खो-यापर्यंत, सर्व मध्यदेश ह्यांच्या निशाणाखाली आला. ह्याला महाराष्ट्र असें मधून मधून लोक संबोधीत असत. ह्यूएन संग ह्या चिनी प्रवाशाने 'महोलोख' म्हणून जें गाव योजिलें ते ह्याच महाराष्ट्र शब्दाचा अपभ्रंश असून त्या प्रवाशाने ज्या राष्ट्राशी स्वभावलक्षणे वर्णिलीं आहेत ती सर्व मराठ्यांना व रड्डीना तंतोतंत जुळतात. ह्याच महाराष्ट्रात हेनरी मेनन वर वर्णिलेली ग्रामसंस्था अद्यापि जीव धरुन आहे. ह्यांतील कोणत्याही खेड्यांत जा, तेथे महार(माल), मांग (मादिग ), चांभार (समगार) ह्यांचे प्रत्येक गांवानजीक वाडे आणि बलुत्याचे वगैरे बावन हक्क आणि कामें अद्यापि कोणाही संशोधकाला तपशीलावार स्पष्ट दिसतील.

 

खेड्यातील पाटील उर्फ गौडा ( ग्रामडा) ग्रामणी असेंही वेदकालचें नाव पुष्कळ ठिकाणी आढळतें-हा हल्ली मराठी, तेलगू, कानडी, गुजराथी, अथवा हिंदी ह्या पैकी कोणतीही भाषा बोलत असो, त्याचा धर्मपंथ आज वैष्णव, शैव, नाथपंथी, मानभावी, लिंगायत, जैन, किंबहुना मुसलमानीही असो, परंतु त्याचा वंश रट्टच आढळणार. ह्या रट्टांचे अथवा रेड्डींचे व त्यांच्या प्रभावळींत गोविलेल्या महार, मांग, चांभार ह्या भिन्न वंशांचे सहवास, सहकार्य व सहवीर्य पुरातन काळापासून आजवर अखंड चालत आलेले आहेत. सहवीर्य ह्या शब्दावरुन रड्डीचा व ह्या बहिष्कृतांचा शरीरसंबंध होत असावा असें सुचविण्याचा माझा इरादा नाही. तसा पुरावा मिळाल्यास तसेंही विधान मी आनंदाने करीन. महार मांग व रेड्डींनी शूरत्वाची कृत्ये सहकार्याने केली येवढाच येथे अभिप्राय आहे. केवळ आडनावांचाच प्रश्न असता तर रट्टांच्या कुळीची नावें 'अस्पृश्यांनी' आश्रय-आश्रित संबंधाने घेतलीं असावींत असें सांगून कोणीही मोकळा होईल. पण देवकें, दैवतें, सोएर सुतक, स्मशानविधी पांचवी, सट, बारसे, लग्नविधी व तत्संबंधी परातून चालीरीती इ. समाजशास्त्राने महत्त्वाची मानलेल्या जाळ्यांची गुंतागुंती ह्या आश्रय-आश्रितांमध्ये निरखीत जाऊन जर कोणी त्यांचा माग काढीत मुळाकडे धैर्याने मागे मागे जाऊ लागला, तर तो शातवाहनांच्याच काय, पण गौतमबुद्धाच्याही मागे प्रागेतिहासिक काळांत जाऊन भिडेल. सारांश काय, तर महाराष्ट्रातील ग्रामसंस्था वेदांपेक्षाही जुनी असूं शकेल, किंबहूना ती आर्यांचीच विशेष आहे की तत्पूर्वीच्या द्राविडांच्या समाजव्यवस्थेंतही अंगभूत होती ह्याचा ठाम निर्णय करणें अशक्य होईल.


आर्यांच्या वर्णव्यवस्थेशी भारतीय अस्पृश्यतेच्या उगमाचा व विकासाचा जितका संबंध आहे त्याहूनही जास्त आर्यांच्या व कदाचित् द्राविडांच्याही ह्या सर्वगामी ग्रामसंस्थेशी आहे. दुस-या भाषेंत हीच गोष्ट सांगावयाची झाल्यास, परजातिद्वेष हे राजकीय अथवा सामाजिक कारण जितकें ह्या अस्पृश्यतेच्या मुळाशीं व वाढीशीं संबद्ध आहे, त्याहूनही जास्त स्वकीय वृत्तीचा लोभ आणि परकीयांचा मत्सर हें आर्थिक कारण भारतीय अस्पृश्यतेच्या मुळाशीं, विशेषत: दक्षिण भारतांतील अस्पृश्यतेच्या वाढीशीं व दृढतेशीं गुतलेलें आहे, असें दिसतें. जेथे जेथे उप-या जेत्यांनी तद्देशीयांच्या जमिनी व राज्ये बळकावलीं आहेत. तेथे तेथे असल्या ग्रामसंस्था उर्फ मालकी व बलुत्याचे विपरीत संबंध निर्माण झाले आहेत. आधुनिक मुदतबंदी मजुरीची पद्धत आणि वसाहतींतील आगमनिर्गमाचे सर्व कायदेकानू असल्या ग्रामसंस्थांची म्हणजे स्वकीय वृत्ति-लोभाची व परजाति-द्वेषाची स्पष्ट द्योतकें होत ह्यांत काय संशय आहे?


भारतीय वर्णव्यवस्थेंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व त्रैवर्णिक आर्य समजले जातात; आणि शूद्र हा मागाहून ह्या व्यवस्थेंत आर्यांनी आपलासा करुन घेतलेला भिन्न वंश सामान्यत: सर्व भारतांत-विशेषत: दक्षिण भारतात-द्राविंडवंशी समजला जातो. हा भेद केवळ मानीव वर्ण व्यवस्थेच्या दृष्टीने झाला. पण ग्रामसंस्थेच्या आर्थिक दृष्टीने पाहतां मालकी अथवा मिराशी आणि बलुतें ह्यांचा निकष लावला तर आर्य आणि द्राविड ह्यांची सर्वत्र भेसळ झालेली आढळेल. पुष्कळ ठिकाणीं द्राविडवंशी शूद्र समजले जाणारे ग्रामणीचा उर्फ मालकीचा किंवा मिराशीचा हक्क भोगणारे संपन्न अवस्थेंत आढळतात; तर उलट पक्षीं वर्णगुरु म्हणविणारे ब्राह्मण जोशी, वैद्य, देवपूजक, गुरव इत्यादिकांच्या हीन वृत्तीवर किंवा बलु-याच्या हक्कावर तृप्त असतात. तसेच कांही अर्धवट रजपूत मध्य प्रातांत हाळब, रामोशी, जागले, चौघुले ह्या नात्याने अशांच्या हीनवृत्ति चालवून गुजराणा करतांना आढळतात. पण ह्यापैकी कोणीही अरपृश्य झाले नाहीत, किवा अशा हीन वृत्तींना कायमचे चिकटले नाहीत. हल्लीच्या अस्पृश्य जातीच मात्र ह्या बलुत्यांचे चिरंतन गुलाम बनलेल्या आहेत. इतकेंच नव्हे तर ह्या वतनावर पाणी सोडून स्वतंत्रपणें कोणी निर्वाह चालवूं म्हटल्यास त्याच्यावर वरिष्ठ वर्गांकडून जबरी होते. बाहेर तर काय, प्रत्यक्ष हिंदुस्थानांतील युरोपिअनाने चालविलेल्या चहाच्या व निळाच्या मळ्यांवर मुदतबंदीने राबणा-या एखाद्या मजुराचा खून झाला तर त्याची लवकर दाद लागत नाही; त्याचप्रमाणे एखाद्या महाराने मेलेले ढोर ओढण्याचें नाकारलें म्हणून त्याचा खून झाल्याच्या आरोपावरुन हायकोर्टापर्यंत खटले चालूनही पुराव्याच्या अभावामुळें कोणास शासन न झाल्यांची उदाहरणें अद्यापि आढळतात ! एकंदरीत ह्या ग्रामसंस्थेमुळे वरील चार वर्णांपैकी समजले जाणा-या सर्व ग्रामस्थांचा योगक्षेम नीट चालून, ग्रामबाह्यांच्या मात्र उन्नतीच्या सर्वही वाटा बंद झाल्या आहेत.


"असुनि जन्मभूमी ज्याची होत बंदिशाळा ! परवशतापाश दैवें ज्यांच्या गळां लागला ।।" ही चोराची उलटी बोंब पुन: ह्याच वरिष्ठांच्या तोंडून त्यांच्या दुष्कर्मविपाकामुळें हल्ली ऐकू येत आहे !
अस्पृश्यांची बलुतीं आणि बावन वतनें म्हणजे वेदांतांत वर्णिलेला शुकनलिका न्याय होय. पिंज-यांतला पोपट दार उघडलें की पळून जाईल, पर पारध्याची नलिका आपल्याच पायाने घट्ट धरिलेला पोपट प्रत्यक्ष पारधी येऊन ओढूं लागला तरी ती सोडीत नाही असें जें इतिदास रसभरित रीतीने सांगत असतात त्यांत मोठें धार्मिक तत्त्व आहे. ह्या बलुत्यांच्या हक्कापायी भारतीय अस्पृश्य जातींची मानसिक अवनति किती झाली आहे आणि मुदतबंदी मजुरीचा प्रयोग निदान पूर्ण यशस्वी झाला आहे ह्याची हीं क्षुद्र बलुतीं स्पष्ट द्योतके आहेत. अलीकडे अस्पृश्यांनी अस्पृश्योद्धारासाठी ज्या परिषदा भरविल्या आहेत व जे प्रयत्न चालविले आहेत त्यांतून चालू असलेली त्यांच्यातील सुधारक-उद्धारकांची खेचाखेची म्हणजे वरील शुकनलिकान्यायच होय. कारण स्वतः अस्पृश्यच !