प्रकरण चवथें : मनुस्मृतिकालीन अस्पृश्यता

मनुस्मृतीचा काळ अद्यापि नक्की ठरत नाही. पण मनुस्मृति हल्ली ज्या स्थितींत आढळते ती गुप्तसाम्राज्याच्या वेळची असावी असा तर्क करण्यास पुष्कळ जागा आहे. ह्या वेळी बौद्ध संस्कृतीचा पूर्ण नायनाट झाला नसला तरी ती घसरणीला खास लागली होती आणि त्याच मानाने ब्राह्मणी संस्कृतीची मेढही प्रतिष्ठित झाली होती. इतर गोष्टी कशाही असोत, आमच्या पूर्वोत्त्क व्याख्येवरहुकुम असलेली अस्पृश्यता उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम म्हणजे सर्वच भरतखंडांत रूढ झाली होती. मानवधर्मशास्त्राच्या उर्फ मनुस्मृतीच्या १० व्या अध्यायांत चंडाल, पुक्कस, निषाद वगैरे मानव वंशांची जी ऐतिहासिक मीमांसा केलेली आहे ती शुद्ध इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत निराधार आहे. ह्या काळीं वर्णव्यवस्था बौद्ध संस्कृतीच्या शेगडींतून जळून पोळून वर्णत्वाचा तिचा आत्मा नाहीसा होऊन हल्लीच्या जातिभेदाच्या स्वरुपाला येऊन पोहोंचली होती. चडालादि स्वतंत्र मानववंश असून त्यांची उपपत्ति ब्राह्मण स्त्रिया आणि शूद्र पुरुष ह्यांची संकरजात अशी करणें म्हणजे केवळ वर्णद्वेषाचें खूळ होय. हें खूळ गुप्तकाळापासून पुढे आतापर्यंत सारखे वाढतच आहे. वर्णसंकर झाला नाही असें कोणाचेंही म्हणणें नाही. पण हल्लींच्या सर्व जाती केवळ वर्णसंकरामुळेंच झाल्या आणि ब्राह्मण शिवाय करुन सर्व जाती वर्ण-संकरजन्यच आहेत, आणि त्यांतल्या त्यांत अस्पृश्य वंश म्हटलें की, केवळ वर्णसंकरापलीकडे त्याला अस्तित्वच नाही, ही उपपत्ति खास ऐतिहासिक नाही. मनुस्मृतीच्या १० व्या अध्यायांतला चवथा श्लोक खालील प्रमाणें आहे:


ब्राह्मण: क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णां द्विजातय:।
चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पंचम:।।


अर्थ :- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन वर्ण दोनदा जन्मतात; म्हणजे एकदा सृष्टिक्रमाने व मागून उपनयन संस्काराने. शूद्र सूष्टिक्रमाप्रमाणे एकदाच जन्मतो. ह्या चारांपेक्षा पांचवा असा वर्णच नाही.


पांचवा वर्ण नाही, आणि अस्पृश्य जातीची लोकसंख्या तर भारतात चोहोंकडे पसरली आहे हें पाहून त्यांच्या उपपत्तीची काळजी ह्या स्मृतिकाराला पडली. आणि त्यांच्या हीनत्वाचा नगारा मोठ्याने वाजविण्यासाठी वर्णसंकराशिवाय दुसग तोडगा त्याला कोणता मिळणार? तो तोडगा त्याच अध्यायांत श्लोक १२ मध्यें येणेंप्रमाणे वर्णिला आहे :-


शूद्रादायोगव: क्षत्ता चंडालश्चोधमो नृणाम् ।
वैश्यराजन्यविप्रासु जायन्ते वर्णसंकरा: ।।


अर्थ :- शूद्र पुरुष आणि त्याहून श्रेष्ठ अनुक्रमें वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण जातींतील स्त्री ह्यांच्यामध्ये प्रतिलोम म्हणजे उलट्या शरीरसंबंधामुळे जी प्रजा होते तिला अनुक्रमें आयोगव, क्षत्ता आणि चंडाल अशी नावें आहेत; त्यांत शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री ह्यांची जी संतति तिलाच मात्र चंडाल समजून अत्यंत नीच आणि अस्पृश्य मानण्यांत आलें आहे. मनूने वर्णसंकराचा जो निषेध केला आहे तो प्रतिलोमाचाच. म्हणजे खालच्या जातीचा पुरुष आणि वरच्या जातीची स्त्री ह्यांच्या संबंधाचाच केला आहे. ह्याच्या उलट जो अनुलोम संकर त्याचा निषेध केला नाही, इतकेंच नव्हे तर उलट गौरवच केला आहे. त्याच १०व्या अद्यायांत खालील दोन श्लोक ध्यानांत घेण्यासारखे आहेत.
 

 

शूद्रायां ब्राह्मणाजात: श्रेयसा चेत्प्रजायते ।
अश्रेयान्श्रेयसीं जातिं गच्छत्यासप्तमाद्युगात् ।।६४।।


शूद्रा ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्रैति शूद्रताम् ।
क्षत्रियाजातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च ।।६५।।


अर्थ :- शूद्र कन्येला ब्राह्मणापासून कन्या झाली, त्या कन्येला पुन: ब्राह्मणापासूनच कन्या झाली आणि अशा सात पिढ्या झाल्यावर ती अगदी ब्राह्मणच उपजली असें होतें. ह्याप्रमाणे शूद्राचा ब्राह्मण व ब्राह्मणाचा शूद्र बनतो आणि ह्याप्रमाणे क्षत्रिय आणि वैश्यही समजावे.


ह्यावरून त्या काळच्या वर्णव्यवस्थेच्या कल्पना किती अनैतिहासिक, अस्वाभाविक, एकांगी आणि डोईजड झाल्या होत्या हें उघड होतें. अशा व्यवस्थेमुळे चोहोंकडेच सर्वांचाच वर्णसंकर होऊन वर्ण बाह्य अस्पृश्य जातींशिवाय शुद्ध जात कोठेच उरली नव्हती असा ह्या भयंकर तोडग्याचा खरा अर्थ होतो हें ह्या स्मृतिकाराच्या लक्षांत आलेलें दिसत नाही. ह्यांत चार वर्णांतील पुरुषांचाच अपमान होतो असें नसून स्त्रीजातीलाही हीन मानल्यामुळे तिचाही भयंकर अपमान केला गेला आहे. पुरुष म्हणजे बीज, स्त्री म्हणजे क्षेत्र, बीजालाच सर्व महत्त्व आणि क्षेत्राला कांहीच नाही, अशी ही एकांगी उपपत्ति आहे. दुस-या भाषेंत सांगावयाचे पडद्यांत व सोवळ्यांत डांबावयाचें ही हल्लीची मुसलमानांची नीति मनुस्मृतींत चांगली वर्णिलेली आहे. 'स्त्रीषु दुष्टासु जायते वर्णसंकर:' हा भगवद्गीतेचाही भावार्थ आहे. तोही ह्याच काळाला शोभतो. अस्सल बौद्ध काळांत असेल अनुलोम प्रतिलोम दोन्ही शरीरसंबंध होत होते, पण वरील कल्पनांचा गांधा-गोंधळ मात्र नव्हता. बौद्ध संस्कृति किंबहुना तत्पूर्वींची खऱी आर्यसंस्कृति निर्वीर्य झाल्यावरच असल्या एककल्ली विचारांना मान्यता मिळणें शक्य आहे. सामान्य वर्णव्यवस्थेचें कसेंही असो. अस्पृश्य मानिलेल्यांच्या दु:खावर हा नवीनच विषारी डाग जो दिला गेला आहे तोच आमचा प्रस्तुत मुद्दा आहे. वर्णद्वेष आणि वृत्तिलोभ ह्या जोडगोळींने मानीव अस्पृश्यांना हतवीर्य करुन त्यांना कायमचें शारीरिक आणि बौद्धिक गुलाम बनवून, पुन: त्यांच्या वंशाची उतपत्ति अशी लावणे, म्हणजे अविवेकाचाच नव्हे तर अन्यायाचा कळस होय !


नुसती उपपत्ति लावूनच स्मृतिकार तृप्त झाले नाहीत. ह्या मानवी वर्णसंकराच्या गुन्ह्याला खरी, कायमची आणि कडेलोटीची पुढील शिक्षा ह्याच १० व्या अध्यायांत फर्मविण्यांत आली आहे.


चंडालश्वपचानां तु बहिग्रामात्प्रतिश्रय:।
अपपात्राश्च कर्तव्या धनमेषां श्वगर्दभम् ।।५१।।


बासांसि मृतचेलानि भिन्नभांडेषु भोजनम् ।
काषर्णायसमलंकार: परिवज्या च नित्यश: ।।५२।।


न तै: समयमन्विच्छेत्पुरुषो धर्ममाचरन् ।
व्यवहारो मिथस्तेषां विवाह: सद्दशै: सह ।।५३।।


अन्नमेषां पराधीनं देयं स्याद्भिन्नभाजने ।
रात्रौ न विचरेयुस्ते ग्रामेषु नगरेषु च ।।५४।।


दिवा चरेयु: कार्यार्थ चिह्यिता राजशासनै: ।
अबांधवं शवं चैव निर्हरेयुरिती स्थिति:।।५५।।


वध्यांश्च हन्यु: सतंतं यथाशास्त्रं नुपाज्ञया ।
वध्यवासांसि गृहीयु: शथ्याश्चाभरणानि च ।।५६।।


अर्थ :- चांडाल, श्चपच इत्यादि जातींनी गावाबाहेर राहावें; त्यांच्या जवळ फुटकीं भांडीच असावींत; कुत्री आणि गाढवें हेंच त्यांचे धन; प्रेतांवरील कपडे हीचं त्यांची वस्त्रें; त्यांनी फुटक्या मडक्यांतच खावे; काळ्या लोखंडाचे अलंकार ल्यावे; नित्य भटकत असावें; इतरांनी त्यांच्याशी कसलाही व्यवहार (सामोपचाराचाही) करु नये; त्यांचे विवाह त्यांच्यांतच व्हावे; त्यांना अन्न द्यावयाचे असल्यास दुस-याकडून खापरांतून द्यावे; शहरांत किंवा खेड्यांत त्यांनी रात्री येऊ नयें; दिवसा कामासाठी कायद्याने ठरविलेली चिन्हे धारण करुनच यावें; तें काम म्हणजे बेवारशी प्रेतें नेणें, देहान्तशिक्षा झालेल्यांचा राजाज्ञेने वध करणे व त्यांचे कपडे, दागिने वगैरे घेणें, हे होय.


वर छांदोग्य उपनिषदाच्या ५ व्या अध्यायाच्या २४ व्या खंडांतील ४ था श्लोक ( पान २४ पहा) उद्धृत केलाच आहे. त्यांत स्पष्ट म्हटलें आहे की चांडालाला उष्टें दिलें तरी वैश्वानर आत्म्यामध्ये आहुति दिल्याप्रमाणे पुण्य आहे. हें छांदोग्याचें औदार्य कोणीकडे आणि ज्या मनुस्मृतीच्या ४ थ्या अध्यायांतील खालील श्लोकां शूद्रालाही उच्छिष्ट देऊं नये आणि चांडाल-पुक्कसांच्या तर वा-यालाही उभें राहूं नये असे फर्माविले आहे, तिचा कडकडीत तुसडेपणा कोठें? बुद्धपूर्व आणि बुद्धोत्तर काळांत केवढा हा फरक !


न शूद्राय मतिं दद्यात् नोच्छिष्टं न हविष्कृतम् ।
न चास्योपदिशेद्धर्म न चास्य व्रतमादिशेत् ।।८०।।


अर्थ : - शूद्राला सल्ला देऊं नये; उच्छिष्ट किंवा हवन होऊन शिल्लक उरलेलें अन्न देऊं नये; प्रत्यक्ष धर्मोपदेश किंवा प्रायश्चित्तोपदेशही देऊ नये. साध्या शूद्रावर जर असा बहिष्कार, तर अतिशूद्राविषयी खालील श्लोकांत वर्णिल्याप्रमाणे कट्टा द्वेष असावा ह्यांत काय नवल !

 
न संघसेच पतितैर्न चांडालैर्न पुल्कसै: ।
न मूखैंर्नावलिप्तैश्व नान्त्यैर्नोन्त्यावसायिमि: ।।७९।।


अर्थ : - पतित, चांडाल, पुल्कस, मूर्ख, गर्विष्ठ, अंत्य व अंत्यावसायि यांच्या बरोबर ( एका वृक्षाच्या ठिकाणी) एकत्र बसूं नये. ह्या श्लोकावर भाष्यकारांनी खालील अर्थांची पुरवणी जोडली आहे; शूद्रजातीय स्त्रीचे ठिकाणी निषादापासून झालेला जातीने पुल्कस होत असतो; अंत्य म्हणजे परीट, चांभार, बुरूड वगैरे: चांडालापासून निषाद स्त्रीचे ठिकाणी झालेले अंत्यावसायि होत.


मनुस्मृतीनंतर हल्लीच्या स्वरुपांत आढळणा-या अठरा महापुराणांचें व अनेक उपपुराणांचे विशाळ मध्ययुगीन संस्कृत वाड्मय लिहिलें जात होते. ह्याच बौद्ध जैन संस्कृतीशीं उघड हेवादावा आणि विरोध चालत होता. ह्या ( सुमारे ५०० वर्षांच्या) काळांत ब्राह्मणी संस्कृतीची घडी बौद्धादिकांच्या विरोधाने विस्कटलेली पुन: बसून अर्वाचीन समाजस्थितीचा पाया घातला जात होता. ह्या वाङ्मयांतून उतारे देऊं गेल्यास ग्रंथविस्तार मर्यादेपलीकडे जाईल. अस्पृश्यतेची घडी वरील स्मृतीने जी बसविली ती अगदी आजतागायत जशीच्या तशीच शाबूत दिसत असल्यामुळें त्या पुराणवाड्यांतून नवीन ऐतिहासिक माहिती मिळण्याचीही कांही आशा नाही. म्हणून जी मिळते ती देऊन जागा अडविणें इष्ट दिसत नाही. वर्ण-संकराची उपपत्ति जुळवून क्षत्ता, आयोगव इत्यादि ज्या अनेक संकरजन्य उपजातींचा उल्लेख मनुस्मतिकार करितात त्यांचा आता, किंबहुना पूर्वींही, प्रत्यक्ष मागमूस आढळत नाही. चांडाल, पुल्कस, निषाद वगैरे थोड्या नावांपलीकडे, आजच्या समाजस्थितींत, महार, मातंग, ढोर, धेड, पारिया, चिरुमा, नामशूद्र, मेघवाल, बळ्हई, वगैरे अनेक मानव अस्पृश्य जातींचीं नावें आढळतात त्यांचा उल्लेख मनूंत अथवा इतर स्मृतींत किंवा पुराणांतूनही आढळत नाही. आणि ह्या जाती तर ह्या विशाल देशाच्या सर्व अंगांतून व काना कोप-यांतून राजरोस आढळतात. ह्या वरून येवढेंच सिद्ध होत आहे की आजकालच्या मानीव अस्पृश्यांची उपपत्ति केवळ वर्णव्यवस्थेच्या काल्पनिक धोरणावरुन लावीत न बसता, ती राजकीय, समाजिक आणि विशेषत: आर्थिक कारणांवरुन लावण्याचा आम्ही जो वर प्रयत्न केलेला आहे त्याच दिशेने पुढील शोधकांनी प्रयत्न चालविणें अधिक शास्त्रीय ठरेल.


वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे स्मृति व पुराणे हल्ली प्रचलित असलेल्या अनेक जातींची अथवा त्याच्या नांवांची मीमांसा करण्याची योग्य साधनें नव्हत, ह्यांत कांही मोठेसें आश्चर्य आहे असें मुळींच नव्हे. हे ग्रंथ म्हणजे आताच्या 'सेन्सस रिपोर्ट' अथवा 'एथ्नोग्राफिक सर्व्हे' ह्यांप्रमाणे आधुनिक शास्त्रीय पद्धतीनुसार लिहिलेले ग्रंथ नव्हतं. बोलून चालून हे पक्षाभिनिविष्ट ग्रंथ होते.' अनुलोम प्रतिलोम शरीरसंबंध बंद पाडून कांही विशिष्ट मानीव वर्णांचा टेंभा मिरविण्याचा त्यांचा उघड उद्देश होता. हा उद्देश साध्य करण्यास त्यांना कृत्रिम इतिहास प्रतिष्ठित करावयाचा होता. आज देखील डोईजड जाती अथवा वर्ग असले बनावट इतिहास तयार करुन जगाला झुलवीत आहेत, मग आमच्या स्मृति-पुराणांनी तर मानवी स्वभावाविरुद्ध काय केलें आहे म्हणून आश्चर्य मानावयाचें आहे? अगोदर वर्णसंकराची उपपत्ति बसावावयाची, मग त्या संकराला निषिद्ध मानावयाचें आणि मग क्षत्ता, आयोगव इत्यादि संस्कृत उर्फ कृत्रिम नांवें घ्यावयाची हा सर्व प्रकार केवळ अहमन्यतेचा विलास होय. महार, ढोर, पारिया, चिरुमा, नमशूद्र, बळहई इत्यादि आजकालच्या "अस्पृश्यांची" नावें निरनिराळ्या प्रांतांतून आढळतात, तीं ह्या पुराणग्रंथांतून का आढळत नाहीत, हाही प्रश्न उभ्दवतच नाही. भिन्न धंदे, भिन्न परिस्थिती, वगैरेवरुन हीं नावें ह्या ग्रंथानंतरच्या अलीकडच्या काळांत पडलेलींच असावींत. ह्या बाबीचा विचार दुस-या खंडांतील. "नांवांच्या व्युत्पत्ति" ह्या प्रकरणांत करण्यांत आला आहे. ह्यांतील कांही नांवें पुराण-स्मृतिग्रंथांच्या पूर्वींही होती. उदाहरणार्थ, चंडाल, पुल्कस ( पुलय), मेध(मघ) वगैरे. पण त्या जमातींचीही पूर्वपीठिका समाजशास्त्रान्वयें ठरवितांना स्मृतीचा पुरावा घेणें अगदीच अप्रयोजक आहे हें वाचकांनी ध्यानांत घ्यावे.