1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

पॅरीस शहर

समता-स्वतंत्रता-बंधुतेचा झेंडा मिरविणारी, सौंदर्याची जी खाण त्या पॅरीसपुरीत आम्ही सकाळचे १० वाजता उतरलो. पॅरीस शहर पॅरीस शहराप्रमाणेच आहे. ह्यापेक्षा जास्त काही वर्णन करवत नाही. पुष्कळ लोकांनी याचे वर्णन केले असल्यामुळे, येथे त्याचे वर्णन करण्याचे विशेष प्रयोजन नाही. शिवाय जेवण वगैरे आटपून आम्ही गाडीत बसून बाहेर पडलो, तोच आम्हांस पावसाने गाठले. आम्ही मुख्य रस्त्याने प्रदर्शनाकरिता मुद्दाम बांधलेले मोठमोठे सुंदर महाल पाहत प्रथम ‘पॅलेस डी नॅशनल इन्व्हालिड्’ म्हणजे जेथे प्रसिद्ध ऐतिहासिक राजपुरूषांची थडगी आहेत, अशा राजवाड्यात गेलो. वीरमणी नेपोलियनाचे येथे भव्य कबरस्थान आहे. हौदासारखी सुमारे २० फूट व्यासाची वर्तुलाकार जागा जमिनीत सुमारे २० फूट खोल सुरेख बांधून काढली आहे. ह्या हौदाच्या मध्यभागी नेपोलियनाचे भव्य थडगे आहे. त्याचा रंग दाट काळसर तपकिरी आहे. हौदाच्या छातीइतक्या उंच कठड्यावरून खाली डोकावून त्याकडे पाहावे लागते. हा दिवस आदित्यवारचा असल्यामुळे, येथे हजारो लोकांची गर्दी जमली होती. हे ठिकाण गंभीर असल्यामुळे इतकी गर्दी असूनही चहूंकडे शांत होते, त्यामुळे देखावा अधिकच गंभीर दिसला! थडग्याभोवती भिंतीच्या कोनाड्यांतून ७-८ पुतळे उभे आहेत. तशीच सभोवती निशाणे, भाले व काही हत्यारे ठेविली आहेत आणि त्याने जिंकलेल्या मुख्यमुख्य लढायांचा भोवताली उल्लेख केला आहे. पण शेवटी ह्या जग जिंकू पाहाणा-या जेत्यास काळाने चीत करून आपल्या सर्वभक्षतेचे स्मारक येथे त्याच्या थडग्याच्या रूपाने स्थापित केले आहे.

दि बिग् व्हील:- ह्यानंतर आम्ही ‘राक्षसी चक्र’ पहावयास गेलो. आपल्याकडे जत्रेच्या ठिकाणी जसे उंच पाळणे उभारून त्यात लोकास बसवून हालवितात, त्याच नमुन्याचे पण अत्यंत प्रचंड हे वरील चक्र आहे. ह्याचा व्यास २००-२५० फूट असावा. सुमारे १०० फूट उंचीच्या दोन्ही कडच्या दोन-तीन तिरकस खांबांवर ह्या राक्षसी चक्राचा राक्षसी कणा ठेविला आहे. ह्या चक्राच्या परिघात सुमारे २० मोठ्या लाकडी पेट्या अथवा खोल्या बसविल्या आहेत. प्रत्येक खोली १५ हात लांब, ५ हात रूंद आणि ५ हात उंच आहे.

एका खोलीत २० माणसे बसतील इतकी जागा असते. आत एक टेबल व दोन खुर्च्या ठेविलेल्या असतात. हे चक्र पाच पाच मिनिटांनी एकदा थांबते. तेव्हा खोलीत बसलेली माणसे बाहेर येतात व नवी आत जातात. एका फेरीस एका माणसास एक फ्रँक म्हणजे सुमारे १० आणे पडतात. खोलीच्या बाजू तावदानाच्या असल्यामुळे चहूंकडचा पॅरीस शहराचा देखावा दिसतो आणि जेव्हा चक्राच्या वरच्या टोकावर जातो तेव्हा आम्ही आकाशात २००-२५० फूट उंच असतो. ज्या सळ्यांवर ह्या खोल्या अडकविल्या असतात, त्या फार जाड नसल्यामुळे केव्हाच मोडतील की काय अशी विनाकारण भीती वाटत असते. हे चक्र जेव्हा प्रथम सुरू केले तेव्हा ह्यास हालविणा-या यंत्राचा काही भाग बिघडला होता, तो दुरूस्त करून चक्र पुन्हा चालू करण्यास १२ तास लागले, तोपर्यंत २०० फुटांवरच्या खोलीत बसलेल्या माणसांची काय भयंकर अवस्था झाली असेल याची कल्पना हे चक्र प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय सहज होण्यासारखी नाही.

नंतर आम्ही एफे नावाचा प्रसिद्ध मनोरा पहावयास गेलो. हा ७००-८०० फूट उंच असावा असे म्हणतात. वरील चक्रापेक्षाही हे काम अचाट आहे. हा सर्व मनोरा लोखंडाचा आहे. दर माणसी दोन फ्रँक दिल्यास खोलीसकट मनो-याच्या शिखरावर उचलून नेतात. वरून खाली पाहण्याची देखील छाती होत नाही. आम्ही अर्धा मनोरा चढून गेल्यावर पाऊस सोसाट्याने पडू लागला व वारा सोसाट्याचा सुटला म्हणून वर जाण्याचा नाद सोडून खाली उतरलो. हे असले अचाट कृत्य इतका खर्च केला असून ते कायम ठेवावे की पाडावे ह्याविषयी म्युनिसिपालिटी वाद करीत आहे. हा मनोरा १८८९ च्या प्रदर्शनासाठी बांधला. हा पाडावा असे म्हणणा-यांच्या एक मुद्दा असा आहे की, मनोरा बेढब झाला आहे! कमाल आहे फ्रेंच सौंदर्याची !! नुकत्याच झालेल्या प्रदर्शनासाठी बांधलेल्या भव्य व सुंदर इमारती पाडण्याचे काम चालले आहे.

९|| वाजता पॅरीसहून निघून रात्री १ वाजता कॅले येथे पोचलो. इंग्लिश चॅनेल ओलांडण्यास १ तास लागला. येथे समुद्र नेहमी खवळलेला असतो. आमच्या बरोबरच्या बहुतेकांस वांत्या झाल्या, मलाही फार मळमळले. ता. ७ रोजी सकाळी ७ वाजता लंडन येते पोहोचलो. तेथे ३ दिवस राहून ता. १० ला संध्याकाळी सुखरूप ऑक्सफर्ड येथे पोहोचलो, येथे माझा प्रवास संपला. तो सुखाचा झाला, ह्याबद्दल परमेश्वराचा मी फार आभारी आहे.

पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली

ऑक्सफर्ड

मुलांनो, दगडी कोळसा तुम्हांला पाहून, निदान ऐकून तरी माहीत असेलच. लोखंड आणि दगडी कोळसा म्हणजे इंग्रज लोकांचे हाड आणि मांस असे म्हणण्यास काही हरकत नाही. ह्या कोळशाच्या खाणी सुदैवाने ह्या लहानशा बेटात इतक्या विपुल पसरल्या आहेत की, ह्या राष्ट्राच्या जगड्व्याळ गरजा भागूनही त्या दरवर्षी अगणित खंडी बाहेरदेशी पाठविता येतात. आफ्रिकेतील हि-यांच्या खाणी घेऊन येथील कोळशाच्या खाणी घ्या, असे कोणी म्हटल्यास हे लोक कबूल होणार नाहीत! तर अशा ह्या अमोल द्रव्याची एकादी खाण आपण पाहू चला.

आपण सध्या मँचेस्टर शहराच्या उत्तरेकडे सुमारे ५ मैलांवर आलो आहो. हे पहा एक मोठे आवार आणि त्यातील पटांगण. मधोमध सुमारे २०-२५ फूट उंचीवर एक भले मोठे चक्र उभे फिरत आहे. त्या चक्रावरून भली भक्कम लोखंडी काढणी पृथ्वीच्या पोटात गेली आहे. बरोबर त्या चक्राच्या खाली जमिनीत सुमारे १० फूट लांब, रूंद, चौकोनी आडाप्रमाणे एक खळगा आहे. एकंदरीत हा सर्व देखावा एकाद्या साधारण रहाटगाड्यासारखा दिसतो. त्याशिवाय सभोवती ह्या पटांगणात दुसरे काहीच विशेष दिसत नाही आणि मी तर तुम्हांस येथे कोळशाची एक आश्चर्यकारक खाण दाखविण्यास आणिले! मुलांनो, निराश होऊ नका. आपल्या पायाखालीच पृथ्वीच्या पोटात सुमारे पाव मैलाखाली एक ३-४ मैल लांबीची भली मातब्बर खाण पसरली आहे बरे! ती पहा, आपणांस खाली नेण्याकरिता पाताळातून एक पिंज-यासारखी खोली आडाच्या तोंडाशी आली. मी तुमच्यासाठी मॅनेजर साहेबांच्या परवानगीची वगैरे सर्व व्यवस्था केली आहे. पहा, आम्ही परकीय पाहुणे म्हणून येथील लोक एकादी गोष्ट किती आदराने दाखवितात. आमचेबरोबर सांभाळण्यास एक स्नेही व स्वत: मॅनेजरही खाली उतरत आहेत, तर तुम्हांस भिण्याचे काही कारण नाही. पण थांबा, उतरण्यापूर्वी आधी तुमचे चांगले कपडे काढून जुने कपडे चढवा. कोळशाच्या धुळीमुळे ते खराब झाले तरी हरकत नाही. तुमच्या जवळ आगकाड्या अगर दुसरा कसलाही ज्वालाग्राही पदार्थ असल्यास तो वरच ठेवा. तो खाली तुमच्याजवळ निघाल्यास खाडकन् सर्वास कैदेची शिक्षा होईल हो!

चला, तर आपण पिंज-यात जाऊ. हे पहा आता ७ वाजून १५ मिनिटे झाली आहेत. आमच्यासकट एवढा मोठा पिंजरा, एकादा धोंडा जसा पडावा, तसा एका मिनिटात खाली जाईल. पहा, आपल्यास हा वेग दु:सह होऊ लागला आहे नव्हे! पोटात कालवते, उरात धस्स होते, डोके भणभणते, आमच्यात एकादी मुलगी असती, तर तिने किंकाळीच फोडली असती, आता आम्ही तळाशी पोहोचलो देखील! घड्याळात पहा ७-१६ मिनिटावर थोडी सेकंदे झाली आहेत! तरी आम्ही नवखे असल्यामुळे, पिंज-यास तितका वेग दिला नव्हता. कानात कशा कळा येऊ लागल्या आहेत, ऐकू अगदीच कमी येते! काते समजले काय! आम्ही पृथ्वीवर होतो, त्यापेक्षा आता १३२० फूट खाली आल्याकारणाने कानातील पडद्यावर हवेचे तितके जास्त दडपण पडत आहे व एका मिनिटातच हा फरक पडल्यामुळे किंचित कळा येऊ लागल्या आहेत. लवकरच ह्या दडपणाची सवय होऊन पूर्ववत ऐकू येईल.

हे खाणीचे तोंड एकाद्या अवीट बोगद्यासारखे दिसत आहे. कामदार, मजूर, घोडी व खटारे ही सर्व सारखीच भासत आहेत. सूर्याची येथे खबरही नाही, तथापि त्यावाचून काही अडलेले नाही. चहूकडे ग्यासचे तोडे पेटले आहेत. त्या उजेडात भिंती आणि छत ह्यांचा, गुळगुळीत पांढ-या विटांनी मढविलेला अर्धगोल स्पष्ट दिसत आहे. एकंदरीत आपल्यास आज एका नव्याच सृष्टीचा शोध लागल्याचा भास होत आहे. बाजूच्या तबेल्यात जाऊन आपण मूळ खाणीकडे जाण्याची तयारी करू या. ह्या तबेल्यात हल्ली अठरा घोडे कामावरून येऊन चंदी चरत उभे आहेत. येथे अत्यंत अवश्य तितकाच प्रकाश आहे. भिंतीवर कायसे हालत आहे, ते पाहिले काय? अहो ती झुरळे! उबट हवा, अंधार, माणसांची फारशी वहिवाट नाही अशा ठिकाणी ह्या अमंगळ प्राण्यांचा सुकाळ असणारच. मुलांनो! आपल्या शरीरात आळश व मनात अज्ञान साचू दिल्यास त्यात ह्या प्राण्यांहून किती तरी जास्त अमंगळ विचारांची हेंदर वाढते बरे! असो. खाणीचा गर्भ येथून सुमारे २ मैल लांब आहे. येथून पुढे कोठेही तुम्हांला प्रकाशाचे एक किरण अगर आगीची एकादी ठिकगीही नजरेस पडणार नाही. कारण खाणीतील वातावरणात कोळशाचा पेट घेणारा वायू केव्हा केव्हा बराच मिसळत असल्यामुळे त्याचा यत्किंचितही अग्नीशी संयोग झाल्यास मोठा प्रळय घडेल. पण कामक-यास दिसले तर पाहिजच म्हणून प्रत्येकाजवळ एक बत्ती दिलेली असते. ती अशा सुरक्षितपणे कंदिलात बसविलेली असते की, आतील ज्योतीचा बाहेरील वायूशी संयोग होत नाही. कामदार लोकांजवळ वुल्फ लॅप नावाचा नवीन निघालेला कंदील असतो. एकादे ठिकाणी जर ग्यास बराच सुटला असला, तर ह्या कंदीलातील दिवा आपोआपच नाहीसा होतो. व त्याप्रमाणे खबरदारी राखण्यास सापडते. हा दिवा पुन: आपोआपच पेटण्याचीही त्यात व्यवस्था असते. पहा मुलांनो, पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, असली महाभूते हल्लीच्य काळी माणसांची अगदी खेळणी झाली आहेत!

आपणही प्रत्येकजण एका हातात एक कंदील व दुस-या हातात टेकण्यास आखुडशी एक काठी घेऊन निघू या. बोगदा पुढे अगदी लहान होईल. तेथे तर आपणांस अगदी ओणव्याने जावे लागेल, तेव्हा काठीचा उपयोग होईल. ह्या खाणीचे नाव ‘डो’. हिच्यातील कोळशाचा मुख्य थर आठ फूट जाड व ५६० यार्ड लांब आहे. कोळशाच्या गाड्या ओढण्याला वाटेने लोखंडी रूळ टाकले आहेत. खुणेची घंटा वाजवून पाहिजे त्या ठिकाणी वर्दी पोहोचविण्यास भिंतीवर विजेची तार आहे. समोर एक कोळशाची ट्रेन येत आहे, म्हणून आपण जपून एका बाजूस उभे राहू या. एका
खटा-यावर ३ घनफुटांची एक पेटी आहे. तीत सुमारे ७ हंड्रेडवेट कोळसा भरला आहे. असे १८ खटारे एकच घोडा रूळावरून ओढीत खाणीच्या तोंडाशी जात आहे. नंतर तितकेही खटारे आपण वर प्रथम पाहिलेल्या रहाटगाडग्याने वर ओढून घेतात. प्रत्येक रात्री अशा १८ खटा-यांच्या २६ सफरी होतात. दिवसा त्याच्या दुप्पट! आणि असेच नेहमी.

चला आपण पुढे जाऊ. थोडे वर वळून पहा कोळशाचे कसे पहर सुटलेले आहेत! ते खाली कातरून पडू नयेत म्हणून भिंतीत भक्कम तुळ्या मारलेल्या आहेत. तथापि येथे कधी कधी कोण भयंकर अपघात होत असतील! आमच्या बरोबर असलेल्या स्नेह्याने आपल्यावर आलेल्या एका अरिष्टाचे नुकतेच वर्णन केले. ते कादंबरीकाराच्या कल्पनेतही येणार नाही. असो. आता येथे एक उंच डिगर लागली आहे. घोड्याचा येथे निभाव लागत नाही म्हणून खटारे पाठविण्याची कशी करामत लढविली आहे पहा. डिगरीवरून कोळशाच्या भरलेल्या गाड्या खाली धावत जाताना जी शक्ती उत्पन्न होते तिचाच उपयोग रिकाम्या गाड्या दुस-या बाजूने डिगरीवर ओढण्यात केला जात आहे. आणि ह्या प्रकारे ह्या  ३६ गाड्यांची घडोमोड एकटाच मनुष्य एका साध्या यंत्राच्या साहाय्याने मध्ये उभा राहून चालवीत आहे!

आणखी थोडे पुढे जाऊ या. येथे जागा फार कठीण आहे. घोडा फिरण्याला जागा नाही. वाफेचे यंत्र चालविणे म्हणून त्याहून धोक्याचे. म्हणून येथे एक मनुष्य पाण्याच्या जोराने यंत्र हाकीत आहे. आपण अंग सांभाळून ह्या कचाट्यातून पुढे थेट खाणीच्या गर्भात जेथे कोळसा उकरण्याचे काम चालले आहे तिकडे जाऊ या. आपल्या बरोबर खाणीतील दगाफटक्यासंबंधी जबाबदार तपासणीदार आहे. खाणीतील सुरूंग उडविण्याचेही काम त्याचेच आहे. इतरांनी खणून तयार केल्यावर हा तो भरून उडवितो. त्याचे आधी कोठे ग्यास बाहेर पडत आहे की काय, ह्याबद्दलची आपल्या दिव्याने तपासणी करतो. एका बाराने जवळ जवळ १० टनांचा कोळसा कातरला जातो. खाणीच्या मुळाशी काही विशेष पाहण्यासारखे काम चाललेले नसते. कोळसा उकरणे व भरणे, आणि निरूपयोगी जी भुकटी राहते ती वाटेतून दुसरीकडे रचणे ही खटपट चाललेली असते. पण ह्या चरकात जे प्राणी गुंतले असतात त्यांची स्थिती मात्र पाहण्यासारखी आहे. अंगावर केवळ लाज राखण्यापुरता कपडा, नखशिखांत कोळशाच्या भुकटीचा लेप, घामाच्या सारख्या धारा चाललेल्या. त्या रेघांतून ह्यांची जी अंगकांती, दिसते तेवढ्यावरूनच हे प्राणी, वरील जगात गाडीतून हिंडणा-या लॉर्ड साहेबांचे नातलग आहेत असे ओळखावयाचे.

मुलांनो, आमचे मानवी वैभव व ऐहिक ऐश्वर्य ह्यांची जी एकंदर इमारत आहे, तिचा पाया अशा काबाडकष्टाच्या आणि धोक्याच्या खंदकात रोविला आहे बरे! त्या पायाशी आम्ही नाही तरी आमचेसाठी दुसरे कोणी तरी निरंतर राबत असतात. आम्हीही आमचेपरी जर मनाने, नीतीने आणि शरीरानेदेखील असे न राबू तर आम्ही खातो ते अन्न आणि भोगितो ती सर्व सुखे निव्वळ हरामाची आहेत हे मी सांगावयास पाहिजे काय! ह्या खाणीत येऊन तुम्ही जे निरनिराळे सृष्टिनियमाचे व मानवी करामतीचे अदभुत चमत्कार पाहिले त्याबद्दल तुम्हांस आश्चर्य व आनंद झाला असेलच. पण त्यात काही विशेष नाही. ही दोन्ही जंगली माणसासही होण्यासारखी आहेत. पण अशी कृत्ये पाहून जर आम्हांस सर्व मानवी कुटुंबाबद्दल कृतज्ञता व धन्यता वाटली नाही आणि स्वत:ला नवा दम आणि ईर्षा आली नाही, तर आपण जगच्चालकाचे पदरी मोठे करंटेच म्हणावयाचे!

आता इतक्या खोलात, इतके विपुल जळण, तळघरात साठवून ठेवल्याप्रमाणे कोणी साठविले असावे, हे कोडे तुम्हांला पडले असेल. लक्षावधी वर्षापूर्वी पृथ्वीच्या पाठीवर जी दाट झाडी लागून गेली होती ती भूकंपाच्या जबर धक्क्यासरशी खाली खचून, अत्यंत दाबामुळे आता दगड होऊन राहिली आहे. ह्यासंबंधी माहिती मोठी चटकदार आहे. ती तुम्ही आपल्या वडिलास अगर शिक्षकास विचारा, सोडू नका.

पुरस्कार

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या लेखांचा “भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न” हा पहिला लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. महर्षी अण्णासाहेब शिंदे ह्यांनी १९०३ ते १९३८ ह्या काळात अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत जे संशोधनपर लेख लिहिले ते सर्व प्रथमच एकत्रित स्वरूपात ह्या ग्रंथामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. त्यामध्ये त्यांचे प्रकाशित साहित्य जसे समाविष्ट केलेले आहे तसेच काही दुर्मिळ, अप्रकाशित लेखही संपादित केलेले प्रथमच पहावयास मिळतील. महर्षी शिंदे ह्यांनी आयुष्यभर अस्पृश्यतेच्या प्रश्नांचे संशोधन व चिंतन केलेले आहे. म्हणूनच “अस्पृश्यतेचा छडा लावण्यात – निवारणाचा भाग तर राहू द्या – मला स्वत:ला जो जन्मभर अनुभव आला आणि आनंद झाला तो लक्षात घेता मला आणखी जन्म मिळाले तरी ते ह्याच शोधनात आणि सेवाशुश्रुषेत खर्चीन,” (शिंदे लेखसंग्रह: पृष्ठ १२१ : संपा. डॉ. मा. प. मंगुडकर) असे उद्गार त्यांनी काढले आहेत.

 “धर्म, जीवन व तत्त्वज्ञान” हा महर्षी शिंदे ह्यांच्या लेखांचा दुसरा खंड आज प्रसिद्ध होतो आहे. धर्म, जीवन व तत्त्वज्ञान ह्यासंबंधी महर्षींनी आयुष्यभर जे मनन आणि चिंतन केले; जे अनुभविले आणि आचरिले ते बहुतांशी सर्व या ग्रंथात समाविष्ट केलेले आहे. धर्म ही त्यांच्या जीवनातील मूलभूत प्रेरणा होती. ह्या प्रेरणेचा एक आविष्कार म्हणजे महर्षी शिंदे ह्यांचे जीवनकार्य होय. अर्थात त्यांची धर्मासंबंधी कल्पना परंपरागत कल्पनेपेक्षा पुष्कळशी वेगळी आहे. त्यांचा समाजिक आशय व्यापक आहे. त्यांची विचाराची झेप शुद्ध मानवतेची आहे. ह्या ग्रंथात धर्म, जीवन व तत्त्वज्ञान ह्यासंबंधीचे लेख एकत्रित केल्यामुळे त्यांची जीवनविषयक कल्पना येण्यास मदत होईल. महर्षी शिंदे ह्यांचे हे चिंतन आजच्या परिस्थितीच्या संदर्भात देखील महत्त्वाचे ठरेल ह्यात तिळमात्र शंकाच नाही.

महर्षी शिंदे ह्यांनी धर्म म्हणजे काय ह्यासंबंधी केलेली चर्चा किती मार्मिक आहे हे पुढील अवतरणावरून दिसून येईल. “धर्म म्हणजे सबलांनी दुर्बलांना, वरिष्ठांनी कनिष्ठांना सत्तेमध्ये, ज्ञानामध्ये सहभागी करून घेणे होय. समाजातल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला बलशाली करणारा हाच खरा धर्म होय. उत्तरोत्तर विकास पावणा-या मानवी शक्तीच्या साहाय्याने व बदलणा-या परिस्थितीस अनुसरून श्रेष्ठांने कनिष्ठास, जाणत्याने नेणत्यास, पवित्राने पतितास ह्या देणगीचा फायदा दिला नाही व स्वत: आपल्यामध्ये ती वाढविली नाही तर धर्माची मूळ ज्योत विझली आहे असे समजावे.”

आजचे अस्पृश्य व मराठा समाज ह्यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे; इतकेच नव्हे तर मराठे व महार हे मूळचे एकाच वंशातले होत, असे त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ ह्या आपल्या लेखामध्ये म्हटले आहे. आपला हा विचार मांडताना महर्षी अण्णासाहेब शिंदे म्हणतात, “महाराष्ट्रातील महारांची भाषा पाहिली असता त्यांचे उच्चार, त्यांचे स्वर व एकंदर त्यांची बोलण्याची ढब मराठी कुणब्यासारखीच आहे असे दिसून येते. त्यांच्या देव्हा-यावर खंडोबा, बहिरोबा, भवानीआई वगैरे मराठ्यांच्याच देवतांच्या मूर्ती दिसतात.

नासिक, त्र्यंबक, पैठण, पंढरपूर, तुळजापूर इत्यादी क्षेत्रांच्या ठिकाणी इतरांबरोबर त्यांचीही गर्दी जमते आणि वारकरी, कथेकरी, भाविणी, वाघे वगैरे धर्म संप्रदाय मराठ्यांप्रमाणे त्यांच्यातही पूर्वापार चालू आहेत. महाराष्ट्रातील महारांमध्ये मराठ्यांच्या अस्सल शहाण्णव कुळांपैकी ब-याच कुळांची नावे आढळून येतात ती – जाधव, साळुंखे (चालुक्य), पवार, मोर (मौर्य) गाईकवाड, शेलार, साळवी, सुरवशे (सूर्यवंशी), इत्यादी होत.” [ह्या शिवाय चव्हाण, जगताप, आंबवले, आंभोरे, वानखेडे ही नावेही मराठा-महारात समान आहेत.] वरील सर्व पुराव्यावरून महर्षी शिंदे असे सूचित करितात की, आजचे महार हे मूळचे मराठेच असले पाहिजेत. महात्मा ज्योतिबा फुले ह्यांनीही अशाच त-हेचे विचार ‘गुलामगिरी’ या ग्रंथात व्यक्त केलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपल्या प्रदीर्घ संशोधनानंतर “दि अनटचॅबल्स” या ग्रंथात “आजचे अस्पृश्य हे एके काळचे क्षत्रिय होते असा सिद्धांत मांडिला आहे. अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत ह्या तिन्हीही विद्वानांच्या विचारात किती साम्य आहे ! संशोधकांनी ह्याचा विचार करावा इतका मह्त्त्वाचा प्रश्न वरील विचारवंतांनी निर्माण केलेले आहे.

महर्षी शिंदे ह्यांना बौद्ध धर्माचे आकर्षण १९१० सालापासूनच होते असे त्यांच्या ग्रंथावरून दिसून येते. १९१० साली पुणे येथे जॉन स्मॉल हॉलमध्ये महर्षी अण्णासाहेबांचे बोद्ध धर्मावर व्याख्यान झाले. त्यात बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार झाला पाहिजे असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. ह्या प्रश्नाचा तपशील देताना महर्षी म्हणाले, “एकंदरीत आता जो बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार व्हावा अशी आमची इच्छा आहे, तो हल्ली इतरत्र प्रचलित असलेल्या त्या धर्माच्या विधि-वैकल्याचा, टिळाटोपीचा किंवा निर्जीव आचारांचा नव्हे, तर ज्या उदार तत्त्वांच्या योगे मागील काळी मनुष्य जातीची उन्न्ती झाली, त्यांचा आमच्यामध्ये पुन: उद्धार होऊन आमच्या धर्मसमजुतीस सर्वदेशीयता व आचरणाला अधिक उज्ज्वलता येवो इतकीच इच्छा आहे.” [धर्म, जीवन तत्त्वज्ञान पृ. १९८]

१९२७ साली महर्षी अण्णासाहेब ब्रह्मदेशात गेले होते. ब्रह्मदेश हा बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र. म्हणूनच मुख्यत: ते ब्रह्मदेशाला गेले असले पाहिजेत. ब्रह्मदेशाच्या यात्रेविषयी लिहिताना ते आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, बौद्ध धर्माचे जीवन पहाण्यासाठी विशेषत: एकांत विहारात राहून त्या धर्माचे रहस्य अनुभविण्याचा विचार मनात येऊन मी यात्रा करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे प्रस्थान ठोकले. एका बुद्ध विहारात उ कोडण्णा ह्या ब्रह्मी भिक्षूची भेट झाली. त्यांच्या भेटीने शांती व गंभीरपणा ह्यांचा परिणाम माझ्या मनावर फार झाला. ह्या विहाराचे वातावरणही आध्यात्मिक भावनांनी भरलेले होते. इतके की, आपणही बौद्ध धर्माची उपसंपदा (दीक्षा) घ्यावी असे मला वाटू लागले इ. इ. (माझ्या आठवणी व अनुभव पृ. ३७०-७२).

असेच एकदा कलकत्ता येथील ब्राह्मसमाजाच्या उत्सवात “मी बौद्ध आहे” असे त्यांनी जाहीर करून टाकिले. वैशाखी पौर्णिमा म्हणजे भगवान बुद्धाचा महा परिनिर्वाण दिन. तो दिवस महर्षि शिंदे भक्तिभावाने साजरा करीत. त्यांनी वाई (जिल्हा सातारा) येथे १९३५ साली ब्राह्मोसमाजाची स्थापना केली. ती देखील वैशाखी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त साधूनच. पुढे येथील ब्राह्मसमाजाचा वार्षिकोत्सव दरसाल वैशाखी पौर्णिमेलाच साजरा होऊ लागला.

१९३० साली महर्षींनी गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली. त्या प्रीत्यर्थ त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. तुरूंगात जाताना त्यांनी ‘धम्मपद’ हा पवित्र बौद्ध धर्मग्रंथ आपल्या बरोबर नेला होता. इतक्या जुन्या काळी अशा प्रकारे व्यक्तिगत पातळीवर बौद्ध धर्माचा मनाने स्वीकार करणारे व बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार झाला पाहिजे असे स्पष्टपणे जाहीर उद्गार काढणारे भारतातील ते एकमेव विचारवंत असावेत.

१९२६ साली पुणे येथे अस्पृश्यांची शेतकी परिषद भरली होती. तिचे अध्यक्षस्थान महर्षीनीच विभूषित केले होते. त्यांचे अध्यक्षीय भाषण अतिशय विचारप्रवर्तक व बोलके आहे. महर्षी शिंदे म्हणाले, “आजचा अस्पृश्य शेतमजूर हा एके काळी येथील जमिनीचा मालक होता. महाराष्ट्राची मूळ वसाहत करणारा महाराष्ट्राचा तो मूळचा शेतकरी होता. परंतु पुढे त्याला त्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करावे लागले. आता तो पुन: शेतमालक झाला पाहिजे” ह्या प्रश्नाविषयी मीमांसा करिताना महर्षी शिंदे म्हणतात, “मराठे आणि महार हे दूरचे चुलतबंधू असल्यासारखे आहेत. त्यात महारांना थोरल्या घरचे हे नाव आहे. पण तेवढ्यावरून इतर अस्पृश्यांचे मूळ कमी दर्जाचे असेल असे मुळीच माझे म्हणणे नाही. अस्पृश्य हेच महाराष्ट्र ऊर्फ दंडकारण्याचे मूळ मालक. मराठे हे केवळ उपरे. मूळ मालक तो आज केवळ पहिल्या नंबरचा बलुतेदार झाला आहे. जमिनीच्या शिवेचा तटा लागल्यास महारांचा निकाल पूर्वी शेवटला समजत असत. कोकणात अद्यापि गावकरी महारांना पागोटे बांधून त्यांच्या मूळ हक्काची दरसाल आठवण करून देत असतात. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्यात दुर्भेद्य एकी करून जमिनीवरील आपली गेलेली सत्ता पुन: मिळविली पाहिजे. सरकारजवळ अजूनही पडीक जमीन पुष्कळ पडलेली आहे. लहान लहान प्रमाणावर ह्या जमिनीचे तुकडे नांगराखाली आणून तुम्ही स्वतंत्र रयत झाल्यास तुमचा, सरकारचा व सर्व देशाचाही फायदाच होणार आहे.

महर्षी शिंदे ह्यांनी वर केलेले विवेचन आजही महाराष्ट्रालाच नव्हे तर सर्व देशाला उद्बोधक व मार्गदर्शक ठरणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशात आज स्पृश्य-अस्पृश्य अगर वेगवेगळ्या जाती-जमातींमध्ये जे संघर्ष अधून मधून निर्माण होत आहेत त्यावर महर्षींचे वरील विचार झणझणीत अंजन ठरणारे आहेत.

सातारा येथील प्रांतिक सामाजिक परिषदेत अध्यक्षीय भाषण करितानाही महर्षींनी कुळाभिमान बाळगणा-या समाजातील विशिष्ट वर्गास अंतिम इषारा दिला आहे. महर्षी म्हणतात, “आमचा जन्म अमूक कुळात झाला आहे म्हणून आम्हाला अमूक हक्क मिळायला पाहिजेत असे म्हणण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. प्रत्येक समाजसुधारकाचे हे अवश्य कर्तव्य आहे की, ज्याच्यामुळे जाती-जातींत वैमनस्य होण्याचा संभव आहे, अशा सर्व जन्मजात हक्कांना मूठमाती मिळेल; निदान त्या हक्काचे स्वरूप पुष्कळच बदलेल असे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.” महर्षी शिंदे ह्यांचे वरील विचार आजही अनेकांना अंतर्मुख करतील यात मला शंकाच वाटत नाही.

महाराष्ट्र शासनाने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन घडविणा-या थोर विचारवंतांचे, समाजसुधारकांचे किंवा संत महात्म्यांचे साहित्य प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील वैचारिक क्रांतीला हातभार लागावा हाच ह्या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या परंपरेला साजेल असेच हे कार्य आहे. महर्षी विठ्ठल रामजी ऊर्फ अण्णासाहेब शिंदे ह्यांच्या साहित्याचा दुसरा खंड महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रसिद्ध होत आहे त्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. संपादक मंडळाने या कामी घेतलेल्या परिश्रमाबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो.

-आपला,
(अर्जुनराव कस्तुरे)
समाज कल्याण व आदीवासी कल्याण मंत्री

पुण्यातील मानपत्रास उत्तर

“मनुष्याच्य चरित्रात ज्या कित्येक आपत्ती येतात त्यातील आपली झालेली अकटोविकट स्तुती, आपल्याच कानाने ऐकणे ही होय. जेव्हा जेव्हा असे दुर्धर प्रसंग माझ्यावर येतात तेव्हा ते सहन करण्याच्या एकच तोडगा माझ्याजवळ आहे. तो हा की, इतर वेळा माझी जी निंदा व अपमान झालेला असतो त्याची मी आठवण करितो आणि या स्तुतीनिंदेचे ओझे ब्रह्मांर्पण करून मी माझ्या कार्यास मोकळा होतो, विठ्ठल रामजी शिंदे आणि मानपत्र| आणि तेही पुण्यासारख्या शहरात! हा प्रकार विचित्र खरा. नेहमी जाच करून घेण्याची एखाद्या गाढवाला सवय असावी, त्याला एखाद्याने कुरवाळून झूल घातली तर ती त्यास जशी असह्य होईल तद्वतच आजचे मानपत्र मला झाले आहे. ज्या मला देणग्या मिळाल्या आहेत त्या दंड वा कंमडलूच्या रूपाने माझ्या आयुष्यात रहस्य सांगत आहेत, शिक्षकांच्या आणि स्नेह्याच्या पक्षपाताची चिन्हे म्हणून मी त्या संग्रही ठेवीत आहे. मानपत्रामध्ये माझ्या पुढील कर्तव्याच्या काही दिशा सुचविल्या गेल्या आहेत. शेतकरी व कामगार वर्गाची संघटना आणि इतिहास लेखन त्याविषयी यथाशक्ती प्रयत्न करीन. इतिहासलेखन हा माझा खरोखरच आवडीचा विषय असून त्यासंबंधी काहीतरी व्हावे अशी माझी उत्कट इच्छा आहे. मी स्वत:, माझी पत्नी, भगिनी व इतर मंडळी ह्यांचा जो तुम्ही गौरव केला त्याबद्दल मी मन:पूर्वक आभार मानून आपली रजा घेतो.

पितृशासन

तारीख ७ ऑगस्ट रोजी शासनयोगाविषयी विचार करीत असताना पितृशासन, गुरूशान, आणि राजशासन असे शासनाचे तीन भाग आपण केले होते, त्यांपैकी आज पितृशासनाविषयी थोडासा विचार करू. प्राचीन काळी मनुष्यसमाजाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये पितृशासनाचेच प्राबल्य सर्वस्वी आढळून येत असे. आर्यांची वेदकालीन सुधारणा होईपर्यंतही त्यांच्यात पिता म्हणजे कुटुंबाचा पती, गुरू, उपाध्याय आणि राजा हे सर्वच अधिकार चालविणारी व्यक्ती असे. रोमन लोकांच्याही जुन्या कायद्यात पित्याला कुलपतीची सर्व अनियंत्रित सत्ता गाजवावयास मिळत असे. मुलाच्या मालमत्तेवरच नव्हे तर त्याच्या प्राणावरही त्याची सत्ता चालत असे. पुढे समाज जसजसा विकसित होत गेला तसतसा ज्ञानदानाचा अधिकार गुरूकडे आणि नागरिकशासनाचा अधिकार राजाकडे अशी विभागणी होत गेली. पण शासनाचे मूळ म्हणजे पितृत्व हेच होय आणि गुरू अथवा राजा हा परंपरेने एक प्रकारे पिताच होय.

मनुष्य मनुष्यावर जे शासन चालवीत असतो त्याचा विचार करीत असता सकृद्दर्शनी मनुष्यातील हे शासन आणि मनुष्याचे स्वत्व (अथवा व्यक्तित्व) ह्यांमध्ये विरोध असावा असा भास होतो. मनुष्यसमाजात आढळून येणारे रूढीचे अवार्य प्राबल्य, अल्पसंख्येचा बहुसंख्येवर किंवा बहुसंख्येचा अल्पसंख्येवर चालणारा जुलूम, परंपरागत चालत आलेल्या तत्त्वज्ञानाचे, हटवादाचे, सांकेतिक आणि प्रासंगित नीतीचे, शिष्टसंप्रदाचे इत्यादी अनेक प्रकारची दडपणे, ही सर्व लक्षात आणिता मनुष्य हा एक पारतंत्र्याखाली स्वत:स सतत चिरडून घेणारा स्वत्वशून्य प्राणी असावा असे वाटते. ह्या दृष्टीने पाहता इतर सर्व खालील प्राणी पुष्कळ स्वतंत्र आणि स्वावलंबी आहेत हे पाहून त्यांची धन्यता वाटू लागते. पण हा अगदी वरवरचा विचार होय. किंचित खोल विचार केल्यास ह्याच्या अगदी उलट प्रकार दिसून येऊन, “धन्य धन्य हा नरदेहो| येथील अपूर्वता पहा हो| जो जो कीजे परमार्थ लाहो| तो तो दावे सिद्धीते|” हा रामदासांनी काढलेला उद्गार अगदी यथार्थ आहे अशी खात्री पटते. सूज्ञ, समर्थ आणि आत्मनिष्ठ माणसाची स्वतंत्रता कोणीकडे? पशू शरीराने कितीही बळकट असला तरी निसर्गाचा केवळ दास आहे. पण ज्या मनुष्याची ब्राह्मी स्थिती-

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं|समुद्रमाप:प्रविशंति यद्वत्|
तद्वस्कामा यं प्रविशंति सर्वे| स शांतिमाप्नोति न कामकामी||

ह्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे भगवद्गीताकारांनी वर्णिले आहे, त्याचा निसर्गच उलट दास आहे.

पण एवढे मोठे स्वत्व आणि व्यक्तित्व अंगी येण्याच्या पूर्वी मनुष्यास अगोदर शासनाच्या तीव्र मुशीतून बाहेर निघावे लागते. शासन व स्वत्व ह्यांच्यामध्ये विरोध नसून शासन हे स्वत्वाची अपरिहार्य पूर्वतयारीच आहे असे समजावे. पशू आणि मनुष्य ह्यांची तुलना करून पाहता इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्याची बाल्यावस्था इतकी दीर्घकालीन का असावी ह्याचे इंगितही वरील शासनाच्या आवश्यकतेमध्येच आढळून येते. जनावरांची पिले थोड्या आठवड्यांनी किंवा महिन्यांनी आपल्या पायांवर उभी राहून आपल्या आईबापांपासून सडसडीत मोकळी होतात. पण सबंध बारा वर्षांचे एक तपही मनुष्याच्या बाल्यावस्थेस पुरेसे होत नाही. ह्याचे कारण त्याला पुढे जे तेजस्वी पौरूष्य मिळावयाचे असते ते होय. ते पौरूष्य प्राप्त होण्याच्यापूर्वी त्याला खाली सांगितल्याप्रमाणे बाळपणाच्या पाय-या पितरांच्या शासन छत्राखली चढाव्या लागतात:

कौमारं पंचमाब्दांतं पोगंडं दशमावधि|
कैशोरमा पंचदशाद्यौवनं हि तत:परम्||

पाच वर्षाचा होईपर्यंत कुमार, दहापर्यंत पौगंड, पंधरापर्यंत किशोर आणि त्यानंतर पंधरा वर्षे तारूण्याची गेल्यानंतर पुरूषास पोक्तपणा येतो. ह्या पंधरा वर्षांच्या बाल्यावस्थेत त्याला ज्या प्रकारचे शासन मिळेल त्यावर त्याचे भावी स्वत्व अवलंबून राहणार हे उघड आहे. म्हणूनच मनुष्यास पशूपेक्षा दीर्घकाल पितृशासनाखाली रहावे लागते. पशूचा पालक केवळ त्याची माता असते म्हणजे आपल्या अपत्याच्या शारीरिक दुबळेपणाच्य अवस्थेत त्याचे कसेबसे पोषण करून थोड्याच काळानंतर पशूची माता त्याला अफाट जीवनकलहाच्या लाटांवर लोटून देते. पण मनुष्याचे ह्याप्रमाणे एकाच पालकाच्या मदतीने भागत नाही. कुमारदशेची पाच वर्षे आईच्या संगोपनाखाली काढल्यावर पुढे पौगंड आणि किशोरदशेची दहा वर्षे मुलाला आपल्या बापाच्या पालकत्वाखाली घालवावी लागतात. म्हणून पशूला नुसती आई तर मनुष्याला आई आणि बाप अशा दोन पितरांची नैसर्गिक योजना झाली आहे.

ह्याप्रमाणे आपल्या अपत्यास स्वत्वाचे अथवा मनुष्यत्वाचे प्रदान करण्यासाठीच जर पितृशासन हे आहे तर स्वत्वाची पूर्ण तयारी होण्यापूर्वी कोणाही व्यक्तीस पितृत्वाची अवस्था प्राप्त होणे हे अत्यंत अनिष्ट आहे हे निराळे सांगावयास नकोच. स्वत:चीच किसोरदशेतून सुटका होते न होते तोच ज्यांच्यावर पितृत्वाची पाळी येते, त्यांच्याकडून होणा-या पितृशासनाची महती गावी तितकी थोडीच. ह्या न्यायाने पाहू गेले असता जे राष्ट्र पिढ्यानपिढ्या आज कित्येक सहस्त्र वर्षे हे भ्रृण हत्येचे पातक करीत आले, इतकेच नव्हे तर त्याने त्या पातकास आपल्या शास्त्रातही भरपूर आधार करून ठेविला आहे, ते राष्ट्र कायमचे स्वत्वहीन बनले तर त्यात नवल ते काय?

पितरांनी आपल्या अंगी पूर्ण व्यक्तित्व संपादन केल्यानंतर पुढे आपल्यास जे शासन द्यावयाचे तेही त्याचे ठिकाणी जे काही बीजभूत व्यक्तित्व असेल त्याचाच पूर्ण परिपाक व्हावा एवढ्याकरिताच; केवळ आढ्यता मिळविण्याकरिता नव्हे. शासनाच्या अतिरेकामुळे किंवा दुरूपयोगामुळे अपत्यातील व्यक्तित्वाची बीजे करपून जाणार नाहीत किंवा चिरडून जाणार नाहीत अशी सतत खबरदारी पितरांनी घ्यावी. इतकेच नव्हे तर त्या बीजांची वाढ झपाट्याने व्हावी म्हणून सर्व वाटा पदोपदी कुशलतेने मोकळ्या ठेवणे ह्याकडेही नजर दिली पाहिजे. अपत्याच्या इच्छेवर शासनाचे जे काय दडपण टाकावयाचे असेल ते त्यास पुढे प्रौढपणी आत्मसंयमन करण्याची संवय व्हावी एवढ्याचसाठी. ह्यापरते अधिक दडपण शासनक्रियेत मुळीच असता कामा नये. शासन म्हणजे दडपम अशी शिशूची भावना सहसा होऊ न देता उलट शासन म्हणजे एक प्रकारचे उत्तेजन आहे अशी भावना जो शास्ता शिशूंच्या ठायी करीत राहील तोच खरा कुशल, आणि पूज्यपादारविंद पिता होय.

ह्यावरून पितृत्वाची जबाबदारी किती थोर; किती कठीण आणि किती पवित्र आहे, हे दिसून येईल. अपत्ये म्हणजे देवाने आपणांस दिलेली खेळणी नव्हेत, किंवा आपल्या निपुत्रिक मित्रापुढे दिमाखाने दाखविण्याचे दागिने नव्हेत किंवा(आपण मरून गेल्यावर) मागे तिळांजळीच्याद्वारे स्वर्गात आपणांस जीवन पोहोचविणारे गुमास्ते नव्हेत, किंवा आपल्यामागे काही तरी लागलेली लिगाडे नव्हेत, तर अत्यंत मंगल ईश्वरी नियमाप्रमाणे ती आपल्यामागे उरणारी आपली किर्ती होत, आपले खरे अमृतत्व होत, ‘स्त्रिया पोरे वंचक चोरे’ या रानटी वचनात काव्य नाही ते नाहीच, उलट अडाणीपणा मात्र भरलेला आहे. कारण पोरे बापडी कधीच चोरे असू शकणार नाहीत. ती, आम्ही चोर आहो की साव आहो, हे कसोटीस लावून दाखविणारे देवदूत आहेत:

तू माझी माउली मी वो तुझा तान्हा| पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे||
तू माझी माउली मी तुझे वासरू| नको पान्हा चोरू पांडुरंगे||
तू माझी हरिणी मी तुझे पाडस| तोडी भवपाश पांडुरंगे||
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज| चारा घाली मज पांडुरंगे||
नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ| मागे पुढे उभा सांभाळिसी||

ही नामदेवाची प्रेमळ प्रार्थना आम्ही ईश्वराजवळ किती सहज रीतीने करू बरे? पण ईश्वरास प्रेमाचा पान्हा मागण्यापूर्वी आम्ही आपल्या तान्हुल्यांना स्वत्वाचा पान्हा दिला आहे की नाही, हे पहावयाला नको का? नुसते लाड, कोडकौतुक आणि फुकट मिळालेल्या धनाचा वारसा दिल्याने आम्ही अपत्यांना स्वत्वाचा पान्हा दिला असे होत नाही. तो देण्यास चुकून, पु: ईश्वरास प्रेमपान्हा आम्ही कोणत्या तोंडाने मागावा? ईश्वरापुढे आम्ही प्रेमपान्हा मागत असू, वा नसू आमच्या पुढे आमची अपत्ये तो नित्य मागत असतात ह्यात संशय नाही. किशोरदशा संपेतोपर्यंत अपत्यांना स्वत्वाचा पानहा मातापित्यांनी स्वत: देऊन पुढे त्याला तरूणदशा प्राप्त झाल्यावर गुरूगृही गुरूशासनासाठी धाडावयाचे असते. त्यापूर्वी उपनयन होऊ शकत नाही. ह्यानंतर गुरूने आपली जबाबदारी कशी पाळावी आणि पुढे पोक्त आणि पौरूषशाली व्यक्तीस राजदरबारी पाठविल्यावर तेथे त्यास तिसरे शासन कसे मिळावे ह्याचा विचार पुढे क्रमाक्रमाने करू.

  1. परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
  2. परमार्थाची प्रापंचिक साधने-५
  3. प. वा. अण्णासाहेब शिंदे
  4. नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते पाहून सुचलेले विचार
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
Page 21 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी