परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे

गेल्या तीस चाळीस वर्षांत महाराष्ट्रात अनेक कर्ते पुरूष होऊन गेले. त्यांमध्ये श्री. विठ्ठलराव शिंदे ह्यांची प्रामुख्याने गणना केली पाहिजे. त्यांनी आपल्या कर्तबगारीने ज्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला चालना दिली व अविश्रांत परिश्रमाने तो सोडविण्याचा मार्ग सुकर केला तो अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अद्यापि जरी पूर्णपणे सुटलेला नाही तरी त्याची न्याय्यता आता सर्वांना मान्य झाली आहे. अस्पृश्यतेचा प्रश्न चुटकीसारखा सुटेल व अस्पृश्य मानलेला जनसमूह अल्पावधीत समता अनुभवू लागेल अशी विठ्ठलरावांची अटकळ नव्हती. परंतु त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने जर नेटाने कार्य चालू राहिले असते व कर्तव्य व सेवाबुद्धीने त्याच्या सोडवणुकीचा प्रयत्न झाला असता, तर ह्या पस्तीस वर्षात हा प्रश्न खास सुटला असता. विठ्ठलराव हे अव्वल दर्जाचे सामाजिक व धर्मसुधारक होते. राजकीय सुधारणा हे त्यांचे क्षेत्र नव्हते. पण ते उद्योगी असल्यामुळे त्या क्षेत्रातही त्यांनी उडी घेतली. त्याचा परिणाम असा झाला की हातून काहीही भरीव कार्य न होता त्यांना कारागृहवास सोसाव लागला, तेव्हापासून त्यांची नेहमीची सुदृढ प्रकृती बिघडली व ती दिवसानुदिवस क्षीण होत जाऊन त्यांचे ता. २ जानेवारी रोजी पुणे येथे त्यांच्या रहात्या घरी देहावसान झाले.

विठ्ठलरावांचा जन्म ता. २३ एप्रिल १८७३ रोजी झाला. त्यांचे घराणे त्यांच्या जन्माच्यावेळी बरेच मातब्बर होते. परंतु पुढे त्याला गरिबी आली. त्यामुळे विठ्ठलरावांचे शिक्षण हालअपेष्टेतच झाले. त्यांचे इंग्रजी शालेय शिक्षण जमखंडी हायस्कुलात झाले व उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याचा रस्ता धरला. कष्टाने द्रव्यसाहाय्य मिळवून त्यांनी फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. ची डिग्री घेतली. बाळपणी ते कर्मठ मूर्तिपूजक होते. पुढे त्यांच्या धर्मविषयक मतात परिवर्तन होऊन ते पूर्ण नास्तिक बनले. प्रार्थनासमाजातील मंडळीशी संबंध आल्यामुळे त्यांचा एकेश्वरी धर्माकडे कल झुकला व ते समाजाचे सभासद झाले, इतकेच नव्हे तर बी. ए. झाल्यावर एलएल. बी. च्या अभ्यासाला केलेली सुरूवात मध्येच थांबवून धर्माचे प्रचारक होण्याच्या हेतूने तुलनात्मक धर्म-शिक्षण घेण्यासाठी ते ऑक्सफोर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात दाखल झाले. तेथे दोन वर्षे अभ्यास करून ते १९०३ मध्ये स्वदेशी परत आले. ते परत येताच त्यांनी आपले प्रचारक व्हावे म्हणून मुंबई प्रार्थनासमाजाने सर्व तयारी करून ठेविली होती. त्यांच्या आगमनाबरोबर त्यांची प्रचारक म्हणून करण्यात आली. तेव्हापासून सात वर्षे म्हणजे १९१० पर्यंत त्यांनी मुंबईच्या समाजाच्या विद्यमाने धर्मप्रसाराचे कार्य केले. अनेक ठिकाणी दौरे काढून, जागोजाग नवीन समाजांची व प्रार्थना व भजन मंडळांची स्थापना केली व आपल्या वक्तृत्वाने, कर्तबगारीने व अनुष्ठानाने त्यांनी सर्व देशभर व विशेषत: मुंबई इलाख्यात सर्वत्र धर्मजागृती केली.

अशा प्रकारच्या कार्याने त्यांच्या कर्तृत्वाला जरी वाव मिळावा होता तरी त्यात त्यांची तृप्ती नव्हती. विलायतेत असताना, दारिद्र्याने गांजलेल्या लोकांच्या स्थितीचे व ती सुधारण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी प्रत्यक्ष अवलोकन केले होते. तशाच, किंबहुना त्याहूनही अवनत स्थितीत जीवन कंठणा-या अस्पृश्यांच्या अत्यंत अनुकंपनीय स्थितीने त्यांच्या अंत:कणाची पकड घेतली.

१९०६ च्या होळीच्या सणाच्या दिवशी त्यांनी मला आपल्याबरोबर अस्पृश्यांच्या स्थितीचे अवलोकन करण्याकरिता एलफिस्टनरोड स्टेशनाजवळच्या अस्पृश्यांच्या वस्तीत नेले. त्या ठिकाणी आम्ही जो देखावा पाहिला तो त्यांच्या स्मृतीतून केव्हाही नाहीसा झाला नसेल व माझ्याही स्मृतीतून नाहीसा होणे शक्य नाही. लहानशा खोल्यात आठ आठ, दहा दहा माणसे चिकार दारू प्याल्यामुळे बेहोष होऊन अश्लील गान व नृत्य करीत होती. त्यांच्या स्थितीची कल्पना येण्याला हे चित्र पुरेसे होते. ब-याच खोल्यांचे बारकाईने निरीक्षण करून आम्ही एका मोठ्या चाळीत शिरलो. त्या चाळीला लागूनच एक उघडे गटार वाहात होते. भयंकर दुर्गंधी सुटली होती. दर एक खोलीत दारू प्यालेले दहावीस पुरूष अंगावर रंग उडवून पत्ते खेळत बसलेले होते.

आम्हांला पाहून त्यांतील एकजण बाहेर आला व त्याने होळीसारख्या दिवशी तेथे आम्ही कशासाठी आलो, अशी पृच्छा केली. त्याला आमचा तेथे जाण्याचा हेतू समजताच फार आनंद झाला पण त्याने आम्हांला एक प्रेमाची सूचना केली की, आम्ही आल्यापायी मागे जावे व पुन्हा केव्हा तरी फुरसतीच्या वेळी चाळीला अवश्य भेट द्यावी. हेच गृहस्थ शिवरामबुवा जमादार. त्यांनी सैन्यात नौकरी केली होती व आता सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही मागे पाय घेतला व ट्रेन गाठून स्वस्थानी गेलो. विठ्ठलरावानी त्याचवेळी मंडळाच्या स्थापनेच्या निश्चय केला. खानेसुमारीच्या अहवालावरून अस्पृश्यांविषयी शक्य तितकी माहिती मिळविली व लवकरच त्यांनी ती बाँबे प्रेसिडन्सी सोशल रिर्फार्म असोसिएशनपुढे मांडली. मंडळी स्थापण्याचे ठरून शेट दामोदरदासांनी कार्य सुरूवातीला एक हजार रूपयांची देणगी दिली. १९०६ च्या बलिप्रतिपदेच्या सुमुहूर्तावर मंडळीच्या पहिल्या शाळेचा उदघाटन समारंभ झाला. सर नारायण चंदावरकर अध्यक्ष होते. विद्यार्थ्यांना मुळाक्षरे घालून देताना त्यांनी एका अमोलिक तत्त्वाचे प्रतिपादन केले. ते तत्त्व म्हणजे अस्पृश्यांचा उद्धार करताना आम्ही आपलाच उद्धार करीत आहो हे होय. हे पुढे मंडळीचे ब्रीदवाक्य झाले. ह्याप्रकारे सुमुहूर्तावर अस्पृश्यता निवारण्याच्या प्रश्नाला हात घालण्यात आला.

ह्यानंतर विठ्ठलरावांनी प्रार्थनासमाजाचे प्रचारक व अस्पृश्यता निवारक मंडळीचे चिटणीस ह्या नात्याने हिंदुस्थानभर लहान मोठे दौरे काढले, जागोजाग मंडळीच्या शाखा स्थापन केल्या. स्थानिक सहानुभूती मिळविली. अनेक ठिकाणी निरपेक्ष बुद्धीने कामाला सुरूवात केली. मंडळीला हळूहळू धनिकांचा, राजेरजवाड्यांचा व प्रत्यक्ष सरकारचाही आश्रय मिळू लागला व अस्पृश्यता निवारमाच्या प्रश्नाने बरीच उचल खाल्ली. १९१६ च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या सभेने ह्या प्रश्नासंबंधी ठराव पास करवून त्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले.

१९२० पासून अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न डिप्रेस्ड क्लासेस मिशन शिवाय दुस-या संस्थांनी नावापुरता तरी आपलासा केला आहे. पण त्यांच्या सोडवणुकीकरिता त्यांच्याकडून म्हणण्यासारखा प्रयत्न होत असलेला दिसत नाही. विठ्ठलरावांनी ह्या प्रश्नाकडे जरी केव्हीही दुर्लक्ष केले नाही तरी गेली काही वर्षे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते विशेष कामगिरी करू शकले नाहीत.

विठ्ठलरावांचा व प्रार्थनासमाजाचा संबंध अत्यंत जिव्हाळ्याचा, समाजातील मंडळी त्यांची मदतगार, मार्गदर्शक व सल्लामसलत देणारी, त्यांनी स्थापिलेल्या मंडळीच्या कमिटीचे बहुतेक सभासद प्रार्थनासमाजाचे सभासद. आरंभी अशी परिस्थिती असणे अपरिहार्य होते. त्यांनी विलायतेहून आल्याबरोबर जोराने कामाला सुरूवात केली. पुढे पुढे मिशनचे कार्य जरी त्यांनी सोडून दिले, तरी समाजाचे काम ते करीतच होते. विठ्ठलरावांना संसारात अनेक अडचणी आल्या. अनेक आपत्तीशी त्यांना झगडावे लागले. शारीरिक सामर्थ्य कमी कमी होऊ लागले, दृष्टी मंदावली, तरी त्यांच्या ठिकाणच्या विश्वासाला, धर्मप्रेमाला व परमेश्वर-निष्ठेला केव्हाही ओहोटी लागली नाही. उलट संकटपरंपरेने त्यांची वाढच झाली. विठ्ठलराव हे एक श्रेष्ठ दर्जाचे कार्यकर्ते होते. कर्मवीर ही पदवी त्यांना साजत होती. त्यांचा त्याग अलोट होता. ते एक उत्तम वक्ते होते, कल्पक होते, कीर्तनकार होते. सर्वतोपरी बिकट अशा परिस्थितीत त्यांनी जनसेवेचे कार्य केले. त्यांचा स्वभाव विनोदी बिकट अशा परिस्थितीत त्यांनी जनसेवेचे कार्य केले. त्यांचा स्वभाव विनोदी होता व आपल्या कर्तबगारीने ते दुस-यावर सहज छाप बसवू शकत. गेली तीन-चार वर्षे शारीरिक आरोग्याच्या अभावी ते घरातून फारसे बाहेर जात नसत. त्यांच्या निधनाने ब्राह्मसमाजाचा एक श्रेष्ठ कार्यकर्ता, प्रचारक व नि:स्वार्थी समाजसेवक नाहीसा झाला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सदा उन्नतिपथी ठेवो.