1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे

गेल्या तीस चाळीस वर्षांत महाराष्ट्रात अनेक कर्ते पुरूष होऊन गेले. त्यांमध्ये श्री. विठ्ठलराव शिंदे ह्यांची प्रामुख्याने गणना केली पाहिजे. त्यांनी आपल्या कर्तबगारीने ज्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला चालना दिली व अविश्रांत परिश्रमाने तो सोडविण्याचा मार्ग सुकर केला तो अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अद्यापि जरी पूर्णपणे सुटलेला नाही तरी त्याची न्याय्यता आता सर्वांना मान्य झाली आहे. अस्पृश्यतेचा प्रश्न चुटकीसारखा सुटेल व अस्पृश्य मानलेला जनसमूह अल्पावधीत समता अनुभवू लागेल अशी विठ्ठलरावांची अटकळ नव्हती. परंतु त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने जर नेटाने कार्य चालू राहिले असते व कर्तव्य व सेवाबुद्धीने त्याच्या सोडवणुकीचा प्रयत्न झाला असता, तर ह्या पस्तीस वर्षात हा प्रश्न खास सुटला असता. विठ्ठलराव हे अव्वल दर्जाचे सामाजिक व धर्मसुधारक होते. राजकीय सुधारणा हे त्यांचे क्षेत्र नव्हते. पण ते उद्योगी असल्यामुळे त्या क्षेत्रातही त्यांनी उडी घेतली. त्याचा परिणाम असा झाला की हातून काहीही भरीव कार्य न होता त्यांना कारागृहवास सोसाव लागला, तेव्हापासून त्यांची नेहमीची सुदृढ प्रकृती बिघडली व ती दिवसानुदिवस क्षीण होत जाऊन त्यांचे ता. २ जानेवारी रोजी पुणे येथे त्यांच्या रहात्या घरी देहावसान झाले.

विठ्ठलरावांचा जन्म ता. २३ एप्रिल १८७३ रोजी झाला. त्यांचे घराणे त्यांच्या जन्माच्यावेळी बरेच मातब्बर होते. परंतु पुढे त्याला गरिबी आली. त्यामुळे विठ्ठलरावांचे शिक्षण हालअपेष्टेतच झाले. त्यांचे इंग्रजी शालेय शिक्षण जमखंडी हायस्कुलात झाले व उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याचा रस्ता धरला. कष्टाने द्रव्यसाहाय्य मिळवून त्यांनी फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. ची डिग्री घेतली. बाळपणी ते कर्मठ मूर्तिपूजक होते. पुढे त्यांच्या धर्मविषयक मतात परिवर्तन होऊन ते पूर्ण नास्तिक बनले. प्रार्थनासमाजातील मंडळीशी संबंध आल्यामुळे त्यांचा एकेश्वरी धर्माकडे कल झुकला व ते समाजाचे सभासद झाले, इतकेच नव्हे तर बी. ए. झाल्यावर एलएल. बी. च्या अभ्यासाला केलेली सुरूवात मध्येच थांबवून धर्माचे प्रचारक होण्याच्या हेतूने तुलनात्मक धर्म-शिक्षण घेण्यासाठी ते ऑक्सफोर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात दाखल झाले. तेथे दोन वर्षे अभ्यास करून ते १९०३ मध्ये स्वदेशी परत आले. ते परत येताच त्यांनी आपले प्रचारक व्हावे म्हणून मुंबई प्रार्थनासमाजाने सर्व तयारी करून ठेविली होती. त्यांच्या आगमनाबरोबर त्यांची प्रचारक म्हणून करण्यात आली. तेव्हापासून सात वर्षे म्हणजे १९१० पर्यंत त्यांनी मुंबईच्या समाजाच्या विद्यमाने धर्मप्रसाराचे कार्य केले. अनेक ठिकाणी दौरे काढून, जागोजाग नवीन समाजांची व प्रार्थना व भजन मंडळांची स्थापना केली व आपल्या वक्तृत्वाने, कर्तबगारीने व अनुष्ठानाने त्यांनी सर्व देशभर व विशेषत: मुंबई इलाख्यात सर्वत्र धर्मजागृती केली.

अशा प्रकारच्या कार्याने त्यांच्या कर्तृत्वाला जरी वाव मिळावा होता तरी त्यात त्यांची तृप्ती नव्हती. विलायतेत असताना, दारिद्र्याने गांजलेल्या लोकांच्या स्थितीचे व ती सुधारण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी प्रत्यक्ष अवलोकन केले होते. तशाच, किंबहुना त्याहूनही अवनत स्थितीत जीवन कंठणा-या अस्पृश्यांच्या अत्यंत अनुकंपनीय स्थितीने त्यांच्या अंत:कणाची पकड घेतली.

१९०६ च्या होळीच्या सणाच्या दिवशी त्यांनी मला आपल्याबरोबर अस्पृश्यांच्या स्थितीचे अवलोकन करण्याकरिता एलफिस्टनरोड स्टेशनाजवळच्या अस्पृश्यांच्या वस्तीत नेले. त्या ठिकाणी आम्ही जो देखावा पाहिला तो त्यांच्या स्मृतीतून केव्हाही नाहीसा झाला नसेल व माझ्याही स्मृतीतून नाहीसा होणे शक्य नाही. लहानशा खोल्यात आठ आठ, दहा दहा माणसे चिकार दारू प्याल्यामुळे बेहोष होऊन अश्लील गान व नृत्य करीत होती. त्यांच्या स्थितीची कल्पना येण्याला हे चित्र पुरेसे होते. ब-याच खोल्यांचे बारकाईने निरीक्षण करून आम्ही एका मोठ्या चाळीत शिरलो. त्या चाळीला लागूनच एक उघडे गटार वाहात होते. भयंकर दुर्गंधी सुटली होती. दर एक खोलीत दारू प्यालेले दहावीस पुरूष अंगावर रंग उडवून पत्ते खेळत बसलेले होते.

आम्हांला पाहून त्यांतील एकजण बाहेर आला व त्याने होळीसारख्या दिवशी तेथे आम्ही कशासाठी आलो, अशी पृच्छा केली. त्याला आमचा तेथे जाण्याचा हेतू समजताच फार आनंद झाला पण त्याने आम्हांला एक प्रेमाची सूचना केली की, आम्ही आल्यापायी मागे जावे व पुन्हा केव्हा तरी फुरसतीच्या वेळी चाळीला अवश्य भेट द्यावी. हेच गृहस्थ शिवरामबुवा जमादार. त्यांनी सैन्यात नौकरी केली होती व आता सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही मागे पाय घेतला व ट्रेन गाठून स्वस्थानी गेलो. विठ्ठलरावानी त्याचवेळी मंडळाच्या स्थापनेच्या निश्चय केला. खानेसुमारीच्या अहवालावरून अस्पृश्यांविषयी शक्य तितकी माहिती मिळविली व लवकरच त्यांनी ती बाँबे प्रेसिडन्सी सोशल रिर्फार्म असोसिएशनपुढे मांडली. मंडळी स्थापण्याचे ठरून शेट दामोदरदासांनी कार्य सुरूवातीला एक हजार रूपयांची देणगी दिली. १९०६ च्या बलिप्रतिपदेच्या सुमुहूर्तावर मंडळीच्या पहिल्या शाळेचा उदघाटन समारंभ झाला. सर नारायण चंदावरकर अध्यक्ष होते. विद्यार्थ्यांना मुळाक्षरे घालून देताना त्यांनी एका अमोलिक तत्त्वाचे प्रतिपादन केले. ते तत्त्व म्हणजे अस्पृश्यांचा उद्धार करताना आम्ही आपलाच उद्धार करीत आहो हे होय. हे पुढे मंडळीचे ब्रीदवाक्य झाले. ह्याप्रकारे सुमुहूर्तावर अस्पृश्यता निवारण्याच्या प्रश्नाला हात घालण्यात आला.

ह्यानंतर विठ्ठलरावांनी प्रार्थनासमाजाचे प्रचारक व अस्पृश्यता निवारक मंडळीचे चिटणीस ह्या नात्याने हिंदुस्थानभर लहान मोठे दौरे काढले, जागोजाग मंडळीच्या शाखा स्थापन केल्या. स्थानिक सहानुभूती मिळविली. अनेक ठिकाणी निरपेक्ष बुद्धीने कामाला सुरूवात केली. मंडळीला हळूहळू धनिकांचा, राजेरजवाड्यांचा व प्रत्यक्ष सरकारचाही आश्रय मिळू लागला व अस्पृश्यता निवारमाच्या प्रश्नाने बरीच उचल खाल्ली. १९१६ च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या सभेने ह्या प्रश्नासंबंधी ठराव पास करवून त्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले.

१९२० पासून अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न डिप्रेस्ड क्लासेस मिशन शिवाय दुस-या संस्थांनी नावापुरता तरी आपलासा केला आहे. पण त्यांच्या सोडवणुकीकरिता त्यांच्याकडून म्हणण्यासारखा प्रयत्न होत असलेला दिसत नाही. विठ्ठलरावांनी ह्या प्रश्नाकडे जरी केव्हीही दुर्लक्ष केले नाही तरी गेली काही वर्षे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते विशेष कामगिरी करू शकले नाहीत.

विठ्ठलरावांचा व प्रार्थनासमाजाचा संबंध अत्यंत जिव्हाळ्याचा, समाजातील मंडळी त्यांची मदतगार, मार्गदर्शक व सल्लामसलत देणारी, त्यांनी स्थापिलेल्या मंडळीच्या कमिटीचे बहुतेक सभासद प्रार्थनासमाजाचे सभासद. आरंभी अशी परिस्थिती असणे अपरिहार्य होते. त्यांनी विलायतेहून आल्याबरोबर जोराने कामाला सुरूवात केली. पुढे पुढे मिशनचे कार्य जरी त्यांनी सोडून दिले, तरी समाजाचे काम ते करीतच होते. विठ्ठलरावांना संसारात अनेक अडचणी आल्या. अनेक आपत्तीशी त्यांना झगडावे लागले. शारीरिक सामर्थ्य कमी कमी होऊ लागले, दृष्टी मंदावली, तरी त्यांच्या ठिकाणच्या विश्वासाला, धर्मप्रेमाला व परमेश्वर-निष्ठेला केव्हाही ओहोटी लागली नाही. उलट संकटपरंपरेने त्यांची वाढच झाली. विठ्ठलराव हे एक श्रेष्ठ दर्जाचे कार्यकर्ते होते. कर्मवीर ही पदवी त्यांना साजत होती. त्यांचा त्याग अलोट होता. ते एक उत्तम वक्ते होते, कल्पक होते, कीर्तनकार होते. सर्वतोपरी बिकट अशा परिस्थितीत त्यांनी जनसेवेचे कार्य केले. त्यांचा स्वभाव विनोदी बिकट अशा परिस्थितीत त्यांनी जनसेवेचे कार्य केले. त्यांचा स्वभाव विनोदी होता व आपल्या कर्तबगारीने ते दुस-यावर सहज छाप बसवू शकत. गेली तीन-चार वर्षे शारीरिक आरोग्याच्या अभावी ते घरातून फारसे बाहेर जात नसत. त्यांच्या निधनाने ब्राह्मसमाजाचा एक श्रेष्ठ कार्यकर्ता, प्रचारक व नि:स्वार्थी समाजसेवक नाहीसा झाला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सदा उन्नतिपथी ठेवो.

परमार्थाची प्रापंचिक साधने-५

येउनि नरदेहा झाकितील डोळे| बळेंचि अंधळे होती लोक||
उजेडा सरशी न चलती वाट| पुढील बोभाट जाणोनिया||
तुका म्हणे जाऊ सादवीत वाट| भेटे तरी भेटो कोणी तरी||

मागे चार वेळां ईश्वरावरील श्रद्धा, भक्ती, त्याची उपासना आणि तद्वारा आपली मुक्ती ह्या चार परमार्थांची, अनुक्रमे मनुष्यमात्रासंबंधी आदरभाव, स्नेह, सेवा आणि मनाची प्रसन्नता ही चार प्रापंचिक साधने कशी आहेत, ह्याचा विचार केला. ह्याचा उद्देश प्रपंच आणि परमार्थ ह्यांची एकवाक्यता करणे हा होता. आता त्याच गोष्टीचा सामान्य विचार करू.

पुष्कळांना परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीने करणे आवडत नाही. जुन्या लोकांना तर तो नास्तिकपणा वाटतो. आणि काही अहंमन्य लोकांना त्यात जडवाद दिसतो. तुकारामाच्या समकालीन साधूंचाही कल परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीने करण्याच्या विरूद्ध असे. तुकारामाने मात्र काही अभंगांत परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीने केला आहे. त्यापैकी वर लिहिलेला अभंग होय. त्याचा अर्थ ह्या जन्मामध्ये सर्व गोष्टी साधता येतात. प्रत्यक्ष प्रकाश ह्या नरदेहातच दिसतो. असा लाभ पुनरपि मिळणे शक्य नाही. पुष्कळ वळसे घेतल्यानंतर आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. आपण ह्या मार्गाने जात आहे हे लोकांना कळविण्याकरिता सादवीत म्हणजे आरोळ्या मारीत जाऊ. कोणी येवोत वा न येवोत. ‘संवसाराते तुझी आले हो आईका| तुटीचे ते नका केणे भरू||’ ह्याही अभंगात तुकाराम म्हणतात, ह्या संसाररूपी बाजारात खोटा जिन्नस भरू नका. खरे खोटे सांगणा-यांची मदत घ्या. वर वर चांगला दिसणारा माल साठवू नका. विसार देऊन उधार घेऊ नका. ह्या जन्माचा विचार पुढल्या जन्मी करू, असे म्हणू नका. रोख ठोक व्यापार करा. हे दोन आणि असे इतर काही थोडेसे तुकारामाचे अभंग अपवादादाखलच असल्यासारखे आहेत. एरवी त्यांनीही तत्कालीन ओघाला अनुसरून वेळोवेळी उद्गार आढले आहेत. ते एका अभंगात म्हणतात:

प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही| एकही निदानी न घडे त्यासी||
दोन्ही पेवांवरी ठेवू जाता हात| शेवटी अपघात शरीराचा||
तुका म्हणे तया दोन्हीकडे धका| शेवटी तो नरकामाजी पडे||
संसारसंगे परमार्थ जोडे| ऐसे काय घडे जाणते नो||

ह्याही अभंगात तुकाराम म्हणतात: गुरांनी खाऊन टाकलेल्या चिपाडामध्ये गोडी नसते किंवा ढेकणांनी भरलेल्या बाजेवर झोप येत नाही. त्याप्रमाणे ह्या संसारात राहून परमार्थ साधता येत नाही. संसारातून काखा वर करा, म्हणजे परमार्थाच्या गोष्टी समजतील. तुकारामाचाच काय, तर सर्व देशांतील सर्वकालीन धार्मिक लोकांचाही साधारण समज असाच असतो. पण साधू, भोंदू, साव, चोर ह्या सर्वांमागे संसार हा लागलेलाच आहे. माशाला पाण्याबाहेर रहाणे कदाचित शक्य होईल, पण मनुष्याला संसाराबाहेर राहता येणार नाही. म्हणून परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीनेच करणे हे अत्यंत जरूर आहे. ह्या प्रापंचिक दृष्टीच्या उलट असणा-या लोकांचे तीन प्रकार आहेत.

पहिला प्रकार विज्ञानवादी लोकांचा. ह्या लोकांना कोणत्याही गोष्टीचा विचा साध्या व्यावहारिक दृष्टीने करण्यात मोठा हलकेपणा वाटतो. एकदा एका मनुष्याने झाडाच्या एका बुंध्यावर बसलेली खार पाहिली. ती लगेच बुंध्याआड झाली म्हणून तिला पुन: पाहण्यासाठी तो बुंध्याभोवती वळसे घेऊ लागला. भीतीमुळे ती खारही बुंध्याला वळसे घालू लागली. ह्याप्रमाणे दोघांनीही झाडाभोवती कितीही फेरे केले, तरी त्या मनुष्याला ती खार काही दिसेना. हा प्रकार चालला असता त्या ठिकाणी चार विज्ञानवादी शहाणे जमले. आणि त्या मनुष्याची त्या खारीभोवती प्रदक्षिणा झाली किंवा नाही, ह्याविषयी त्यांच्यामध्ये मोठ्या कडाक्याने वाद सुरू झाला. एक पक्ष म्हणे ज्यअर्थी एकदा दिसलेली खार त्या बुंध्यावर फिरत होती आणि मनुष्य हा बुंध्याभोवती घिरट्या घालीत होता, त्याअर्थी एकदाच काय पण पुष्कळ वेळां त्याच्या तिच्याभोवती प्रदक्षिणा झाल्या. अशा रीतीने वाद मिटणे काय पण पुष्कळ वेळां त्याच्या तिच्याभोवती प्रदक्षिणा झाल्या. अशा रीतीने वाद मिटणे अशक्य झाले. कारण दोघांचीही दृष्टी व्यावहारिक नव्हती हे होय. प्रदक्षिणा ह्या शब्दाचा अर्थ खार स्थिर असताना तिच्या पूर्व, उत्तर, पश्चिम, दक्षिण बाजूने जाणे असा घेतला तर त्या माणसाची प्रदक्षिणा झालीच नाही. पण तिने व्यापलेल्या प्रदेशाच्या भोवती जाणे ह्या अर्थाने पाहता प्रदक्षिणा पुष्कळ झाल्या. ह्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा निर्णय करण्याला तिच्यापासून आपल्यास व्यावहारिक कोणता फायदा, गैरफायदा व्हावयाचा आहे ह्याकडे लक्ष पुरवावयास पाहिजे. जेथे हे धोरण नसते आणि केवळ मोघम सत्य स्थापित करण्याची सवय लागलेली असते, तेथे निर्णय होत नाही. किंबहुना निर्णयाची खरोखर जरूरीच नसते, अशा प्रकारच्या अव्यवहार्य विज्ञानवादाने फुरसतीच्या वेळी मानवी मनास केव्हा केव्हा व्यायाम आणि एक प्रकारचे सुखही होते. पण व्यावहारिक रीतीने आणि व्यावहारिक सत्य शोधून काढण्याच्या कामी ह्या व्यायामाचा आणि सुखाचा काहीच उपयोग होत नाही. युरोप, अमेरिका इत्यादी सुधारलेल्या पाश्चात्य देशांमध्ये प्रो. जेम्स आणि शिलरप्रभृती तत्त्वज्ञ लोकांनी ह्या अव्यवहारी विज्ञानवादावर अलीकडे मोठा जोराचा हल्ला चालविलेला आहे. हा मोघम विज्ञानवाद खोटा आणि निरूपयोगी आहे, संसारातील सर्व गोष्टींचा साधकबाधक दृष्टीनेच विचार करावा आणि सत्याचाही शोध ह्याच मार्गाने लागेल, अशा अर्थाचे निनिराळ्या भाषेमध्ये त्यांचे मोठमोठाले सुंदर ग्रंथ प्रसिद्ध होत आहेत. ह्या नवीन दर्शनाची “Progmatism, Humanism” इ. नावे आहेत. ईश्वरावर विश्वास ठेविल्याने मनाला तात्काळ शांती मिळते. व्यावहारिक फायद्याकडे पोहोचविण्यात कोणत्याही प्रकारचा हलकेपणा नाही. उलट, “ब्रह्मज्ञान्याघरी भक्तीचा दुष्काळ| शब्दांचा सुकाळ खटाटोप|” ह्या वचनामध्ये तुकारामानेही आपला कल व्यावहारिक दृष्टीकडेच दाखविला आहे. मोठमोठे शब्द आणि कल्पनाही शून्याहीपेक्षा कमी आहेत. विज्ञानाच्या भपक्याने आमचे व्यावहारिक हितसंबंध निस्तेज झाले आहेत, ते पुन: सतेज केले पाहिजेत. दूरच्या गोष्टींचा मोघम विचार करणा-यांच्या हातून हिसकावून घेऊन, ते आमचे हितसंबंध व्यावहारिक दृष्टीने विचार करणा-यांच्या हाती दिले पाहिजेत. धर्मगुरू आणि मठाधिपती हे आपल्या मतलबासाठी ह्याच्या आड येतील पण त्यांना जुमानू नये. आम्ही प्रापंचिकांनी विज्ञानाला कायमचा नमस्कार ठोकला तरी बरेच.

दुसरा प्रकार दैववादी लोकांचा. ह्यांना स्वत्वाची किंवा व्यक्तिस्वातंत्र्याची चाड नसते. पराधीनपणात त्यांना सुख आणि समाधान वाटते, आणि आपल्यावरील कर्तव्य-जबाबदारीचा बोजा उतरला असे वाटते. हरी असेल तर देईल म्हणून ते खाटल्यावर स्वस्थ बसलेले असतात. जणू काय आपले अस्तित्व स्थापन करण्याची जबाबदारी राखण्यासाठी ह्या परपुष्ट लोकांना खुष ठेवणे हरीलाच जरूर आहे. दैववादी नुसते आळशीच असतात असे नाही, तर काही अगदी भोळे असतात. त्यांना आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणे म्हणजे ईश्वराचे अपार सामर्थ्य न ओळखून त्याचा एक अपराध करणेच आहे असे वाटते पण ही मोठी चूक आहे.

कसरतीच्या खेळामध्ये एकादा डोंबारी आपण उताणा पडून आपल्या हातापायांवर दोघाचौघांना सावरून धरून त्यांच्या खांद्यावर दोन-चार मुले देऊन एक मनुष्यप्राण्याची अजब इमारत आपल्या अंगावर तोलून धरलेली अशी दाखवितो. पण ती माणसे सर्वांचे खाली पडलेल्या डोंबा-याच्या आधीन असतात. एकादा इंजिनियर दगडाची एक मोठी इमारत रचून आपण वेगळा झालेला असतो. एकदा कळाशी साधल्यावर ते दगड इंजिनियरवर अवलंबून नसतात. ह्यावरून त्याच्यामध्ये डोंबा-याच्या हातापायांवर उभे राहिलेल्या माणसांहून अधिक स्वाधानता असते. एकदा माळी लहानमोठ्या झाडांची एकदी सुंदर बाग निर्माण करतो. पाणी घालून एकदा वाढवून दिल्यावर ती झाडे पुढे आपल्याच वाढीने वाढू लागतात, म्हणून त्यांच्यामध्ये वरील इमारतीच्या दगडांहूनही अधिक स्वाधीनता असते. एकाद्या गुरूकुलामध्ये अनेक शिष्य काही काळपर्यंत गुरूच्या हाताखाली शिकून तयार होऊन पुढे ते पूर्ण स्वाधीन सदगृहस्थ बनतात. ह्या चार उदाहरणांवरून आपल्या आश्रितांना स्वाधीनता देण्यामध्ये
डोंबा-याहून इंजिनियर श्रेष्ठ, त्याहून माळी श्रेष्ठ आणि सर्वांहून गुरू श्रेष्ठ हे उघड होते. आता सर्व गुरूंचा जो आदि गुरू अखिल विश्व चालविणारा विश्वेश्वर तो ह्या डोंबा-याहून कनिष्ठ किंवा ह्या गुरूहून श्रेष्ठ म्हणावयाचा? आम्ही सर्वस्वी पराधीन व्हावे अशी त्याची इच्छा असल्यास तो डोंबा-याहून कनिष्ठ आणि अंती आम्ही स्वतंत्र अथवा मुक्त व्हावे अशी त्याची इच्छा आणि धोरण असल्यास-आणि ते तसेच खास आहे-तर तो सर्वांहून अनंतपटीने श्रेष्ठ असा आहे.

तिस-या प्रकारचे लोक वैतागी असतात. गृहकलह, देशकलह, राष्ट्रकलह, यशापयश, अनेक खासगी आणि सार्वजनिक निराशा आणि अपमान इत्यादिकांमुळे त्यांची मने भंडावून गेलेली असतात, आणि त्यांची आयुषअयात अरूची झालेली असते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार मिरविणे म्हणजे त्यांच्या दु:खावर डाग देण्यासारखे त्यांना होते. तथापि ही त्यांची वृत्ती सत्याची खूण नव्हे. ती आमच्या स्वाभाविक स्थितीचे द्योतक नव्हे. संसारात कितीही हालअपेष्टा आल्या तरी आपल्यामध्ये जी एक साहजिक विनोदवृत्ती असते, तिला बाधा येऊ देऊ नये. लहान मुलांमध्ये उचंबळणारा आनंद, त्यांचा कौतुकी स्वभाव आणि साहजिक सहनशक्ती आपण होता होईतो कायम ठेवीत गेले पाहिजे. निदान आपल्या व्यक्तिविषयक वैतागाच्या पायावर आपले तत्त्वज्ञान रचू नये, आणि कोणी तसे ते रचल्यास इतरांनी त्यास का उगाच बळी पडावे?

आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून आम्ही ज्या प्रपंचामध्ये वावरत आहो, त्याची थोरवी आणि पवित्रता ध्यानात येईल. प्रपंच म्हणजे बेडी किंवा बंदिवास नव्हे. प्रथमपासून शेवटपर्यंत गर्भवासाच्या पूर्वापासून स्मशानयात्रेच्या पलीकडे हा अनंतमार्गाचा प्रपंच म्हणजे आमच्यापुढे ईश्वरानेच आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उभारलेली एक शिडी आहे. तिच्यातील कोणत्याही पायरीची अवहेलना करणे म्हणजे ईश्वरी योजनेसंबंधाने आक्षेप घेणे होय, मग सर्वच शिडीविषयी तिरस्कार दाखविणे म्हणजे धर्माच्या नावावर धर्मलंडपणा माजविणे होय. प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नाही. ती शब्दांनी मात्र भिन्न, पण वस्तुत: एकच व अभेद्य आहेत. ही द्वंद्वाची भाषाच आमच्या तोंडातून निघून गेली पाहिजे. धार्मिकांनी आपला सोवळेपणा टाकला पाहिजे. बाह्य सृष्टीभोवतालचा संसार, आणि आपले मन ही सर्व ईश्वरमय आहेत, ईश्वराच्या वस्तीने ती क्षणोक्षणी पवित्र होत आहेत असे जाणून आम्ही सदा नम्र आणि सुखी असले पाहिजे.

प. वा. अण्णासाहेब शिंदे

रविवार ता. २ रोजी पहाटे गुरूवर्य विठ्ठल रामजी शिंदे शिवाजी नगरातील आपल्या राहत्या घरी परलोकवासी झाले. अण्णासाहेबांच्या निधनाची दु:खद वार्ता सकाळी सर्व शहरभर पसरली. त्यांची स्मशानयात्रा दुपारी १ वाजता निघून ती शहरातील प्रमुख रस्त्याने ३ च्या सुमारास स्मशानभूमीत येऊन पोहोचली. त्या ठिकाणी डॉ. सर रघुनाथराव परांजपे, प्रि. कानिटकर श्री. शंकरराव चव्हाण, श्री. र. के. खाडीलकर, डॉ. नवले, प्रा. माटे, दिवाणबहादूर बी. पी. जगताप वगैरे मंडळीची अण्णासाहेबांच्या कार्यासंबंधी माहिती देणारी व गुणवर्मनपर अशी भाषणे झाली. त्यानंतर चारच्या सुमारास अण्णासाहेबांच्या पार्थिव देहाला अग्निसंस्कार देण्यात आला. व त्या ठिकाणी जमलेली वेगवेगळ्या पक्षांतील व जमातींतील ६००-७०० मंडळी दु:खद अंत:करणाने आपापल्या घरी परतली.

गेली ४-५ वर्षे अण्णासाहेबांची प्रकृती जशी निकोप असावयास हवी होती तशी काही नव्हती. मागील ७-८ दिवसांत तर त्यांच्या प्रकृतीत विशेष बिघाड होऊन वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचा शेवटी अंत झाला. अण्णासाहेब मूळचे जमखिंडी संस्थानातील रहाणारे. घरची अत्यंत गरिबी. परंतु अशा बिकट परिस्थितीतून मार्ग काढीत काढीत ते १८९८ साली बी. ए. झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ कायद्याचाही अभ्यास केला. परंतु विश्वविद्यालयीन शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी करून द्रव्यार्जन करण्याकरिता करावयाचा अशा प्रकारची अण्णासाहेबांची वृत्ती नसल्याकारणाने त्यांनी साहजिकच समाज सेवेकडे ओढा ठेवून त्या दिशेने आपल्या भावी आयुष्याची रूपरेषा आखली. ते स्वभावत: धार्मिक प्रवृत्तीचे असल्याकारणाने त्यांचा कल साहजिकच प्रार्थना समाजाकडे झुकला. याच समाजामार्फत ते धार्मिक क्षेत्रात उच्च शिक्षण मिळविण्याकरिता विलायतेस गेले व तेथून परत आल्यानंतर त्याच समाजामार्फत दलितोद्धाराचे कार्य त्यांनी हाती घेतले.

अण्णासाहेबांच्या आयुष्यातील मुख्य कामगिरी म्हणजे हरिजनोद्धार होय हे सांगण्याची आवश्यकता नाही. वस्तुत: त्यांनी आपले वास्तव्य खुद्द “महारवाड्यात” करून तेथेच त्यांनी त्यांच्या उद्धाराची कामगिरी केली व सारे आयुष्य त्या प्रीत्यर्थ वेचले, यात तिळमात्र शंका नाही. भरतखंडातील दलितबंधूंचा ज्या वेळी इतिहास लिहिला जाईल, त्यावेली गुरूवर्य आण्णासाहेब शिंदे यांच्या कार्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल यात मुळीच शंका नाही.

अण्णासाहेबांची सामाजिक क्षेत्रात जशी जहाल मते होती, तशीच राजकीय क्षेत्रातही होती. महाराष्ट्रातील बहुसंख्या मराठा समाज राजकारणात मागासलेला राहू नये म्हणून त्यांनी १९१७ साली “राष्ट्रीय मराठा पक्ष” स्थापन करून लोकमान्य टिळकांच्या बरोबर राजकीय क्षेत्रात सहकार्य केले.

लोकमान्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहालपणात यत्किंचितही कमीपणा आला नाही. १९३० साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सत्त्याग्रहाच्या लढ्यात वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी भाग घेतला व त्याबद्दल त्यांना ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षाही झाली.

अण्णासाहेबांच्या जीवनकार्याचा अशा प्रकारचा धावता आढावा घेतल्याने त्यांच्या कार्याची पूर्ण कल्पना दिल्यासारखे होणार नाही. परंतु तसे करण्याची आज आवश्यकताही नाही. अण्णासाहेबांनी माझ्या आठवणी व अनुभव म्हणून स्वत:चे चरित्र पुस्तक त्याने प्रसिद्ध केले असून त्याचा दुसरा भाग हस्तलिखित स्वरूपात तयार असल्याचे कळते. इतर काही मंडळीनीही त्यांची चरित्रे लिहून काढली आहेत. दलितोद्धाराच्या कार्याची माहिती देणारा ग्रंथ ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा त्यांनी स्वत:च लिहीला असल्यामुळे त्यांच्या कार्याचा परिचय कोणासही करून घेता येण्यासारखा आहे.

ही सर्व माहिती एकत्र केली तरी त्यावरून अण्णासाहेबांच्या स्वभावाचीकल्पना नीटशी येणे शक्य नाही. जुन्या पिढीत जी काही १०-५ अत्यंत बुद्धिवान व कर्तृत्ववान अशी माणसे महाराष्ट्रात निपजली त्यांत अण्णासाहेबांची गणना करावी लागेल. ते स्वभावाचे अत्यंत प्रेमळ गृहस्थ होते. अण्णासाहेबांकडे कोणीही मनुष्य गेल्यानंतर त्याला नि:स्पृह सडेतोड पण आपुलकीचा सल्ला मिळावयाचा हे अगदी ठरल्यासारखे होते. गेली ४-५ वर्षे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते घरीच असत. त्यांच्या कार्याचा त्या काळात ज्याप्रमाणे गौरव व्हावयास पाहिजे होता त्या प्रमाणात झाला नाही. एवढेच नव्हे तर त्यांची उपेक्षा झाली हे कटु सत्य येथे नमूद केल्याशिवाय आम्हाला राहवत नाही. ज्या मराठा समाजात त्यांचा जन्म झाला. त्या समाजातील लोकांनी देखील अण्णासाहेबांच्या संबंधी आपली लेखणी व जिव्हा विटाळली हे आम्हास ठाऊक आहे. परंतु हा एक महाराष्ट्रात फार मोठा दुर्गूण आहे असे म्हणून त्याकडे कानाडोळा करणेच सर्वात उत्तम. अण्णासाहेबांनी स्वार्थलोलूप होऊन जर सरकारी नोकरी स्वीकारली असती तर ते आपल्या उतार वयात आज अनेक सेवानिवृत्तांप्रमाणे सुखासमाधानाने वावरताना दिसले असते. परंतु तो मार्ग अजिबात सोडून देऊन त्यांनी उभे आयुष्य दलितांच्या सेवेत घातले मग त्याबद्दल महाराष्ट्रीय जनता त्यांच्या पदरात कोमतेही माप घालो. त्याची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. मराठा समाजात एवढा त्यागी व कर्तृत्ववान पुरूष गेया कैक पिढ्यात जन्मला नाही आणि तो पुढे लवकरच जन्मास येईल किंवा नाही याची जबरदस्त शंका वाटते. फावल्या वेळात बहुजन समाजाच्या उद्धाराच्या बाता झोकरणा-यांनी अण्णांसाहेबांचे चरित्र आपल्या डोळ्यांपुढे ठेवावे आणि त्यानुसार कार्यप्रवण बनावे अशी आमची त्यांना सूचना आहे. अण्णासाहेबांनी केलेल्या समाजकार्याचे ऋण फेडण्याचा हा एकमेव मार्ग असून ते किती प्रमाणात फेडले जाते यावरच बहुजन समाजाची प्रगती अवलंबून असून त्यामुळेच अण्णासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे.

नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते पाहून सुचलेले विचार

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. २९-११-१९०१

पुण्यात जशी पर्वती, मुंबईत जसा बाबुलनाथ, तसे हे वरील नावाचे देऊळ मार्सेय येथे आहे. ह्या फ्रेंच नावाचा मराठीत अर्थ ‘आमची रक्षक माता’ असा होतो. ही माता म्हणजे श्री येशू ख्रिस्ताची आई कुमारी मेरी ही होय. हीच ह्या देवळातील मुख्य आराध्य-दैवत आहे.शहराला लागूनच आग्नेय बाजूस एक उंच टेकडी आहे. तिच्या माथ्यावर हे सुंदर देऊळ बांधले आहे. टेकडी चढून वर जाईपर्यंत थकवा येतो. टेकडीच्या पायथ्यापासून तो माथ्यावर देवळाच्या दारापर्यंत लिफ्टने प्रेक्षकजनांस वर उचलून नेण्याची योजना केली आहे, असे आम्हांस वर गेल्यावर कळून आले. ही टेकडी समुद्राच्या काठावर असल्याने येथून एका बाजूस अनंत महासागराचा व दुस-या बाजूस चित्रविचित्र मार्सेय शहराचा देखावा एकाच वेळी दिसत होता. माथ्यावर पोहोचल्यावर देवळाचा दगडी घाट लागला. आजूबाजूस आतबाहेर चहूकडे झाडून साफ केले असल्यामुळे, मनाला फार निर्मळ वाटले. तसेच या उंच एकांत पवित्र स्थळी माणसाची फारशी चाहूल नव्हती. म्हणून येथे लवकरच मन नि:शंक होऊन खेळू लागले. देऊळ भक्कम दगडांचे बांधळे असून काम साधे, सफाईदार व सुबक झाले आहे. तळमजल्याचे दार झाकले होते व आत अंधार दिसत होता. देवळाचा मुख्य भाग दुस-या मजल्यात होता म्हणून आम्ही वर गेलो. आम्ही हिंदुस्थानचे लोक परकीय यवनांस आमच्या पवित्र देवळात येऊ देत नाही, तसेच ह्या देवळातही आम्हा हिंदजनांस जाऊ देतील की नाही ही अपवित्र शंका आमच्या मनांत येऊन आम्ही सगळे दारातच घुटमळू लागलो. इतक्यात एका वृद्ध मनुष्याने आत जाण्यास खूण केली.

देवळात शिरलो, तेव्हा १२ चा अम्मल होता. चोहीकडे शांत व गंभीर देखावा दिसत होता. विरळा एकादा प्रेक्षक अगर उपासक पावलांचा आवाज न करता जपून पाहून अगर प्रार्थना करून नकळत जात असे. आत गेल्याबरोबर दोन्ही बाजूंस दोन मोठ्या ७-८ फूट उंच पितळेच्या लखलखीत ठाणवया दिसल्या.

त्यांवर २-३ फूट लांब बारीक मोठ्या शेकडो मेणबत्त्या जळत होत्या. हे ख्रिस्ती नंदादीप पाहिल्यावर कॅथालिक धर्माचे साक्षात् स्वरूप पुढे दिसू लागले. खालपासून वरती गाभा-यापर्यंत विशाल भिंतीवरून पौराणिक चित्रे टांगली आहेत. कोठे येशू मुलांस खेळवीत आहे, कोठे दु:खितांचे अश्रू पुशीत आहे, कोठे आजा-यांस बरे करीत आहे तर दुसरीकडे कोठे स्वत: येशूचीच छळणा चालली आहे, कोठे त्यास सुळावर खिळून टाकले आहे, अशी नानात-हेची चित्रे हुबेहुब रेखिली होती. शिवाय कोप-यांत, कोनाड्यंत, चौकात चौरंगावर निरनिराळ्या धातूंचे ओतलेले व दगडांचे घडविलेले येशूचे व त्याच्या शिष्यांचे पुतळे बसविले होते व त्यापुढे धूप, दीप पुष्पादिकांचा थाट सजला होता. ही दिव्य शोभा पहात पहात आम्ही शिखराखालच्या मुख्य गाभा-यात उच्च स्थानी दैदिप्यमान् देव्हा-यावर उभी असलेली कुमारी मरीआमा हिच्यापुढे आलो. ही उंचीने वीस वर्षांच्या कुमारीइतकी होती. रंग सावळा, पोसाक अगदी साधा व पायघोळ आणि चेहरा उदात्त पण सचिंत आणि उदास दिसत होता. हिने डाव्या कडेवर लहानग्या येशूस घेतले होते. ह्या उतावळ्या अर्भकाचे वय केवळ १|| वर्षाचे असून तो काही केल्या आईच्या बगलेत ठरत नव्हता, ती आई तशीच बालकाकडे अर्धवट दुर्लक्ष करून, त्याचे पुढे कसे होईल ह्याच विवंचनेत तटस्थ उभी होती. इकडे पोरालाही आईच्या चिंतेची पर्वा मुळीच नसून उलट त्याच्या गुबगुबीत गालावर हास्याचे कमल फुलले होते!! त्याच्या डोईवर काट्यांचा सोनेरी मुकुट लकाकत होता. दीनोद्धारासाठीच जणू ह्या अचाट कीर्तीच्या लहान मूर्तीने आईच्या कडेवरून पुढे झेप टाकिली होती. ह्या मया-लेकरांच्या दोन्ही बाजूंस नंदादीपाच्या तेजाची हजारो कारंजी सतत वाहात होती! अशा प्रकारे ह्या दैवी गुणांचे हे मंगल प्रदर्शन पाहून मन आपल्या स्वाभाविक धर्मास अनुसरून सर्व मंगल गुणांचे जे मूळ त्यास आळवू लागले! क्षणमात्र सात्विक वृत्तीच्या उच्च वातावरणात विहार करून पु: मानवी कृतीचे कौतुक करण्यास ते खाली उतरले. इतक्यात १२ चा ठोका पडून चर्चमधील मध्यान्ह-घंटा दणदणू लागली. आम्हांला इतर ठिकाणे पहावयाची घाई होती म्हणून आम्ही देवळाच्या दुस-या बाजूची चित्रे व पुतळे लगबगीने पाहून बाहेर पडलो.

तुळजापुरची भवानी, सौंदत्तीची यल्लमा, कोल्हापूरची महालक्ष्मी इत्यादी जी जी काही पुरातन हिंदू देवस्थाने पाहिली आहेत त्यांची सहजच आठवण होऊन मार्सेयच्या मरीआमाच्या देवळाचे त्यांच्याशी साम्यभेद काय आहेत. ह्याविषयी मनात विचार येऊ लागले. साम्य हे की हिंदू उपासकांस बारमाही आणि आठी प्रहर आपल्या देवळात मोठमोठ्या दिव्यांची आवश्यकता वाटते, तशीच येथेही ख्रिस्ती उपासकांस वाटत आहे. हिंदू आपल्या देवळांतील भिंतीवर रामरावणाची व कौरव पांडवांची चित्रे काढितो तर ख्रिस्त्यानेही येथे आपल्या भिंती, चित्रविचित्र केल्या आहेत. हिंदू आपल्या देवळात मुख्य स्थानी झगमगीत देव्हा-यावर पार्थिव मूर्तीची स्थापना करितो, तशी येथे ख्रिस्त्यानेही आपल्या उपास्य देवतेची मूर्ती उ केली आहे. येथेपर्यंत दोघांचे केवळ साम्य आहे. ख्रिस्त्याने हिंदूस हीदन, ऑयडॉलेटर (मूर्तिपूजक) इ. नावे ठेवून कितीही हिणविले तरी त्याने येथे आपली आकारप्रियता पूर्ण व्यक्त केली आहे. ही उणीव  एकाद्या विशिष्ट धर्मपंथाची अगर मनुष्यवर्गाची नव्हे, तर हिचे मूळ मानवी स्वभावातच आहे. म्हण आहे की, वाघ्याचा पाग्या बनला तरी त्याचा यळकोट जात नाही! त्याचप्रमाणे तिकडे पौरस्त्याने आपल्यास पूर्ण ब्रह्मज्ञानी, अद्वैती इ. इ. जाड्या संज्ञा देऊनही त्याच्या पाठीची लिंगपूजा अद्यापि सुटली नाही, आणि इकडे पाश्चात्य पॅगनचा ख्रिस्ती झाला तरी मूर्तीपूजा आणि विभूतिपूजा यांनी कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने त्यास घेरले आहेच.

असो, मला येथे मूर्तिपूजेच्या युक्तायुक्ततेबद्दल विचार मुळीच कर्तव्य नाही, उलट बाह्य देखावा व आकृती ह्यांच्या साह्याने ईश्वराकडे मन जास्त लवकर लागते, निदान साधारण मनुष्यास तर हाच मार्ग योग्य आहे, हा जो मूर्तिपूजेच्या अभिमान्यांचा मोठा मुद्दा आहे तो मी तूर्त येथे गृहीत धरून चालतो! आणि मी वर जे हिंदू व ख्रिस्ती देवळांमध्ये साम्य दाखविले आहे त्यावरूनही वरील मुद्यालाच बळकटी येते, पण पुढे ह्या दोन्ही देवळांत भेद काय आहे तो पहा. देवळात मुख्य स्थानी ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असते त्याविषयी विचार केला तर बराच भेद दिसून येतो. कित्येक ठिकाणी मारूतीच्या, कित्येक ठिकाणी गणपतीच्या, कित्येक ठिकाणी भयंकर देवीच्या मूर्ती असतात. काही ठिकाणी शेंदूर आणि तेल ह्यांच्या थराखाली व काही ठिकाणी बेढब वस्त्रालंकारांसाठी मूर्तीच्या मूळच्या रूपाचा लोप झालेला असतो. देवळाच्या भिंतीवरील चित्राकडे लक्ष गेलेच तर तेथे गावठी जिनगराचे कौशल्य झळकत असते. चित्रातील विषय पाहू गेल्यास कोठे मारूतीने कुभकर्णाच्या डोक्यावर गदा मारिली आहे, तर कोठे कृष्णाने राधेस कवटाळले आहे, कोठे महिषासुरवध तर कोठे रासक्रीडा इत्यादी प्रकार चाललेले असतात.

धर्मसाधनाचे बाबतीत चित्रकार व शिल्पकार ह्यांची मदत अगदी अवश्यच वाटल्यास वाटो; पण ती घ्यावयाची झाल्यास सौंदर्यशास्त्री आणि नीतिशास्त्री ह्यांच्या सल्ल्याने तरी ती घ्यावयाला पाहिजे ना? विशेषत: जेथे केवळ साधारण जनसमूहाच्याच फायद्यासाठी मूर्तीची योजना झालेली असते, तेथे तर अधिक काळजी घ्यावयाला पाहिजे. एकाद्या ति-हाईताने इकडची देवळे व त्यांतील मूर्ती पाहिल्या तर तो मूळचा निराकारवादी असला, तरी कदाचित मूर्तिपूजक होण्याची इच्छा करील. पण त्याच ति-हाईतास आमच्या एका देवळात नेले आणि त्याच्यापुढे मूर्तिपूजेवर कितीही लांब व्याख्यान दिले, तरी तो विषय त्याच्या मनात नीटसा भरणार नाही. इतका मोठा भेद पडण्याचे कारण काय असावे बरे? आमच्यांत कलाकौशल्य कमी आहे काय? आम्ही नीतीने कमी आहो काय? का आमच्या पुराणांत, दंतकथांतून व इतिहासातून उदात्त विषयांची वाण आहे? छे, ह्यांपैकी एकही गोष्ट वरील भेदाचे कारण असावे असे आमच्या शत्रूसही वाटणार नाही. श्री ख्रिस्ताच्या चरित्रातील देखाव्याचे इकडे जसे प्रदर्शन केले जात आहे, तसे तिकडेही श्रीकृष्णाच्या काही कृत्यांचे प्रदर्शन करता येणार नाही काय? आपल्या भक्तांचे घोडे धुणे, उष्टी काढणे, आपल्या भक्ताची जी दासी तिची वेणी घालणे, तिला दळू लागणे, इत्यादी पवित्र प्रेमाचे मासले ज्या विभूतीसंबंधान ऐकतो, तिचीच विडंबना जागोजागी व वेळोवेळी काव्यांतून व चित्रांतून होत आहे आणि ती धर्माभिमान्यास खपत आहे! गौतमबुद्धाचा स्वार्थत्याग, बाबा नानकाची सुधारणा, कबीराची सत्यप्रीती आणि तुकोबाची भक्ती इ. अनेक सुबोधपर विषयांची निवडणूक करून रविवर्म्यासारख्या मार्मिक चित्रकारांनी त्यावर आपले चातुर्य खर्चिले, तर आमच्या देवळांच्या सौंदर्यात व पावित्र्यात किती भर पडेल बरे! पण अलीकडे जे नवीन नवीन धर्माच्या नावाने उत्सव निघू लागले आहेत आणि त्यांत ज्या मूर्तींचे व चित्रांचे प्रदर्शन होत आहे, त्यावरून पाहता आमच्याकडील मूर्तिपूजकांचे लक्ष ह्या गोष्टीकडे लागेल, ह्याचा काही संभव दिसत नाही.

नैराश्यवाद

भक्त देवाजीचे भोळे| त्यांचे पायी ज्ञान लोळे||
भक्तीवीण शद्वज्ञान| व्यर्थ अवघे ते जाण||
नाही ज्याचे चित्ती भक्ति| जळो तयाची व्यत्पत्ति||
नामा म्हणे ऐसे जाण| नाही भक्तीसी बंधन||

दे भोळे लोक असतात त्यांच्या पायी ज्ञान लोळत असते. जे भक्त नाहीत त्यांचे शब्दज्ञान व्यर्थ होय. जे भक्त ते मुक्त होत. त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. प्रेमाच्या महत्त्वाबद्दल अशाच प्रकारचा दुसरा एक उल्लेख आहे. (सेन्टपालचे कारेथकरास पहिले पत्र) तो असा:- (१) मनुष्याचे व देवदूतांचे वक्तृत्व माझ्या ठायी असले परंतु मजमध्ये प्रेम नाही तर नाद करणा-या पितळेच्या भांड्याची किंवा वाजवावयाच्या झांजेची व माझी योग्यता सारखीच. (२) मला धर्मज्ञानाची प्रेरणा होत असली, सर्व गूढ गोष्टी व विद्या अवगत असल्या आणि श्रद्धेच्या जोरावर डोंगर हालविण्याची शक्ती मजमध्ये असली, परंतु मजमध्ये प्रेम नाही तर मी काहीच नाही. (३) आणि मी आपली सर्व संपत्ती गरिबांना अन्नदान करण्यात खर्च केली, किंबहुना आपले शरीर जिवंत जाळण्यासाठी देऊन टाकिले, परंतु मजमध्ये प्रेम नाही तर मला काही लाभ नाही. (४) प्रीती आहे तेथे सहनशीलता नांदते, द्या नांदते, तेथे हेवा राहत नाही, तेथे अहंकार नाही, डौल नाही, स्वार्थ रहात नाही, चीड येत नाही, अपकार ध्यानात येत नाही. (५) असदाचरणाचा कंटाळा येतो, सत्यात आनंद वाटतो. (६) सर्व काही चालते, सर्वांचा विश्वास वाटतो, सर्वांची आशा वाटते, सर्व सहन करता येते. (७) प्रीती कधी हताश होत नाही.

मानवी संसाराकडे पाहिले तर हा संसार सुखमय आहे का दु:खमय आहे ह्याबद्दल मनुष्याची त्रेधा उडते. निराशावादी लोक संसाराचे अंध:कारमय चित्र रेखाटतात. विनोदी लोकांच्या लेखामध्ये देखील निराशेचे विष कालविलेले असते. मार्क टवेनसारख्या विनोदी माणसांनी देखील एके ठिकाणी निराशा उत्पन्न करणारे उद्गार काढिले आहेत ते असे: “ज्याने संसारामध्ये अनुभव येण्याइतके बरेचसे दिवस काढिले आहेत त्याला मूळ पुरूष जो आदम त्याचे आपण किती ऋणी आहो हे समजते. त्याने मनुष्यजातीवर कोमता उपकार केला म्हणाल तर त्याच्यामुळे जगात प्रतम मरम आले हा होय.” “जन्म झाला असता आनंद व मृत्यूमुळे मनुष्य दु:खी होतो तो का? कारण तो प्रसंग आपणावर नसतो म्हणून.” येणेप्रमाणे संसारात दु:ख आहे, एवढेच नव्हे तर सर्वांत श्रेष्ठ प्राणी जो मनुष्य तो सर्वांत नीच कसा आहे ह्याविषयी खालील वचने दिली आहेत:- (पर्शियन कवी सादी म्हणतो) “मनुष्य हा कुत्र्यापेक्षाही कृतघ्न आहे. कुत्र्याला शंभर खडे मारून एक भाकरीचा तुकडा त्याच्या पुढे टाकिला तर तो त्या खड्यांचे दु:ख विसरून जाऊन भाकरी देणाराचे आभार मानतो. पण मनुष्यावर शंभर उपकार केले व एक अपशब्द बोलल्यास तो ते शंभर उपकार विसरून तेवढा अपशब्दच ध्यानात ठेवील.” अशा प्रकारचे  मनुष्यस्वाभावाविषयी सादीचे मत आहे.

विकास पावलेल्या अमेरिका देशातील मार्क टवेननेसुद्धा सादीवर ह्या बाबतीत वरचढ केली आहे. तो म्हणतो- “भूकेने मरत पडलेल्या कुत्र्याला तुम्ही उचलून जर त्याला उत्तम प्रकारे पुष्ट केले तर तो तुम्हांला चावणार नाही. असा हा मनुष्य व कुत्रा ह्यांत फरक आहे”. अगदी रानटी देशापासून तो अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातील विनोदी मनुष्याकडूनही असे प्रतिपादिले आहे. असा हा संदेश जर निराशावादी आहे तर उल्हासप्राप्तीकरिता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहावे? तत्त्वज्ञान्यांकडे जावे तर ते गंभीर, दु:खी व उदासी असतात, कवींकडे जावे तर त्यांची काव्ये इतकी काळ्या रंगाची दिसतात की ती आपणांस नकोशी वाटतात. मार्ग टवेनसारख्या विनोदवाद्याकडे गेलो तरी सुद्धा आमची निराशाच होते. तर संसार खरोखरच दु:खमय आहे की काय ह्याचा विचार केल्यास दु:खापेक्षा सुखच जास्त आहे हे आपणांस कळून येईल. सुखापेक्षा दु:ख जास्त वाटते ह्याचे कारण आपल्या अं:तकरणात प्रीती किंवा भक्ती नसते व त्यामुळे आपणांस सर्वत्र निराशा वाटते. भक्ती हेच एक सत्त्व आहे. संसाराशिवाय जर आपली सुटका नाही तर आपली दु:खावस्था का होते? हे आपण पाहू. संसार दु:खमय वाटण्यास पहिले कारण की, आपल्या भोवतालची परिस्थिती सदोष असते. परिस्थितीच्या दोषामुळेच जे शहर खेड्यापेक्षा सुखमय व्हावे, त्या शहरामध्ये मनुष्यास अनेक व्याधी जडतात. अशाच प्रकारची सदोष परिस्थिती मार्क ट्वेनची झाली. लहानपणी खोड्या व उनाडक्या करीत त्याचे दिवस सुखाचे गेले, पण पुढे त्याची परिस्थिती बदलली म्हणजे यशापयशामध्ये तो पडला. त्याची बायको मेली. दोन तरूण मुली मेल्या. व त्यामुळे त्यास संसार दु:खमय वाटू लागला. त्याच्या परिस्थितीमुळे त्याला संसार दु:खमय वाटला म्हणून आपणांसही तो तसा का वाटावा? नदीचे पाणी अस्वच्छ नसते. पण ज्या पात्रातून ते येते त्या पाण्याच्या परिस्थितीमुळे आलेला गढूळपणा ते पाणी शुद्ध करून काढून टाकिला पाहिजे. संसार दु:खमय वाटण्यास दुसरे कारण म्हटले म्हणजे स्वदोष हे होय. परिस्थिती चांगली आहे, पण सुसंधी दवडल्यामुळे जाणूनबुजून किंवा आळसाने त्याच्या हातून अन्याय होतात. अशा मनुष्याच्या दोषामुळेच त्याला जी हळहळ वाटते व संसार दु:खमय वाटतो त्याच्या बोलण्याकडे आपण लक्ष देऊन निराशावादी काय म्हणून व्हावे? तिसरे कारण मनुष्याचा मूळचाच दूषित स्वभाव हे होय. परिस्थिती चांगली असते. हातून काही दोष घडलेले नसतात, पण स्वभावच दूषित असतो. एकाद्या बाजाची सर्वांगे योग्य प्रमाणात असतात, पण त्याचे (Timber) लाकूड चांगले नसले तर जसा त्या बाजातून चांगला आवाज निघत नाही; त्याप्रमाणे जन्मत:च दु:खी स्वभाव असल्यामुळे त्याला सर्व संसारच दु:खमय वाटू लागतो. (१) परिस्थिती, (२) स्वदोष, (३) स्वभाव अशा तीन प्रकारच्या कारणांमुळे विशिष्ट व्यक्तींना संसार दु:खमय वाटत असतो. पण त्यांच्या सांगण्यावरून आपणही संसार दु:खमय आहे असे म्हणू नये. बंधुभगिनींनो, आपली तशी परिस्थिती आहे का? स्वदोष आहेत का? व आपला स्वभाव तसा आहे का? ह्याचा पूर्ण विचार करून दोष असतील ते काढून टाकण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आपली मूळ स्थिती सुखरूपच आहे हे कळून येईल. जे दु:खी लोक दुस-याचे दु:ख ऐकतात त्यांची तर संसार दु:खमय आहे अशी बालंबाल खात्री झालेली असते. ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ त्यांना त्याच्या विरूद्ध कितीही सांगितले तरी ह्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. मग संसारच जर दु:खमय तर देव कोठला असे त्यांना वाटू लागते. पण ज्यांच्यावर असा प्रसंग आला नाही त्यांनी खरे कारण शोधून काढून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. लहान मुलाला स्वभावाची जाणीव नसते म्हणून ते उल्हासी असते.

सुदैवाने तशीच स्थिती राहिली तर बरे, पण दुर्दैवाने परिस्थितीमुळे एकादा दोष जडला तर तो आपण काढून टाकिला पाहिजे. जगत् जर दु:खी तर त्यात आम्ही राहणारे दु:खीच होणार, सुखी कोठून होणार अशी भ्रामक समजूत कोणी करून घेऊ नये. बुद्धाचेसुद्धा हेच सांगणे आहे. ते म्हणतात ‘दु:ख दु:ख म्हणून जे आहे ते काल्पनिक नव्हे, खरोखरीचे आहे, पण त्यास कारण आहे. ते निवार्य आहे, अनिवार्य नाही, तुम्ही स्वयंभू आहा, दु:ख स्वयंभू नाही. तुमच्या ठिकाणचे दोष काढून टाका. सुखदु:खाची वजाबाकी केली तर सुखच जास्त आहे हे तुम्हांस कळेल. ‘निराशेचे जेव्हा वारे सुटते तेव्हा आपणांस सुखाची विस्मृती होते. ह्याकरिता हा संसार सुखमय वाटण्यास शिरोभागी दिलेल्या नामदेवाच्या अभंगात सांगितल्याप्रमाणे आपण जर भोळी भक्ती कायम ठेविली तर आपल्या ठिकाणी सर्व ज्ञान येईल.

  1. नीती-३
  2. नीती-१
  3. नीती -२
  4. निष्ठा व नास्तिक्य
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
Page 22 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी