1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मँचेस्टर कॉलेज

११ ऑक्टोबर १९०१ रोजी सायंकाळी चार वाजता विठ्ठल रामजी शिंदे यांनी ऑक्सफर्ड रेल्वेस्टेशनच्या फलाटावर पाय ठेवला आणि खोलगट भागात दिसणा-या ऑक्सफर्ड शहराचे आणि विद्यापीठाचे दर्शन घेतले व त्यांचे अंतःकरण अननुभूत आनंदाने भरून आले. हिंदुस्थानातील जमखंडीसारख्या गावातील आपल्यासारखा खेडवळ मुलगा जगातील नावाजलेल्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येऊ शकला ही धन्यतेची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि तेही ज्या धर्मशिक्षणाची आपल्याला ओढ लागली होती ते घेण्याची संधी प्राप्त झाली याचे समाधान त्यांना वाटत होते. आपले जुने इतिहासकालीन भारदस्त स्वरूप टिकवून ठेवलेल्या ह्या ऑक्सफर्ड नगरीचे निरुंद रस्ते व बोळ ओलांडीत ते मॅन्सफील्ड रोडवरील मँचेस्टर कॉलेजच्या भव्य इमारतीसमोर आले. दारावार सुंदर व सुवाच्य शिलालेख कोरलेला त्यांना दिसला. ‘सत्य, स्वातंत्र्य व धर्म ह्यांस वाहिलेले’. मँचेस्टर कॉलेजची भव्य इमारत आणि शिलालेखात कोरलेले बाणेदार ब्रीद पाहून त्यांचे अंतःकरण अतीव आदराने भरून आले. देवडीवाल्याने त्यांना आत नेले. थोड्याच वेळाने “वयाने व त्याहून अधिक विद्येने वाकलेली एक लहानगी आकृती त्यांचेपुढे आली. ती होती कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. ड्रमंडसाहेब.” प्रिन्सिपॉलसाहेबांनी ह्या परकीय विद्यार्थ्याचे इतक्या कळकळीने स्वागत केले की, जणू त्यांची ह्यांच्याशी फार दिवसांची ओळख होती. प्रिन्सिपॉल ड्रमंडसाहेबांच्या या पहिल्या भेटीतच त्यांच्या मनातील परकेपणाची भावना नाहीशी होऊन आपण जणू काय कुटुंबातच आलो आहोत अशी भावना त्यांच्या मनात उदित झाली. त्यांची भेट विठ्ठल रामजी शिंदे यांना फार आश्वासक व आनंददायक वाटली. दुस-या दिवशी १२ ऑक्टोबर १९०१ रोजी सकाळी ते कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याची नोंद असलेल्या भल्या मोठ्या रजिस्टरमध्ये त्यांनी स्वतःबद्दलच्या सगळ्या नोंदी पूर्ण करून सही केली व ते मँचेस्टर कॉलेजचे रीतसर विद्यार्थी बनले.

भारतातून विद्यार्थ्याने मँचेस्टर कॉलेजात येऊन धर्म का शिकावा? आणि धर्म तो काय शिकणार? ह्या प्रश्नाचे आणि शंकेचे उत्तर डॉ. भांडारकरांनी दिलेले होतेच. या बाबतीत विठ्ठल रामजींची कल्पना सुस्पष्ट होती. त्यांच्या मते, धर्म ही बाब मुळी पढीक शिक्षणाची नव्हेच. येथे परमेश्वरच गुरू, विश्व हीच शाळा आणि सृष्टी हेच पुस्तक. मनुष्य काय मनुष्यास धर्म देणार? धार्मिक कर्मकांड तर ह्या कॉलेजात मुळीच शिवकविले जाणार नव्हते. विठ्ठल रामजींच्या मनात आले धर्माची देणगी देवाने माणसास आधीच देऊन ठेवली आहे व हल्लीही हरघडी तो देत आहे. पण ह्या बीजरूपी देणगीची लागवड करणे हे माणसाचे काम आहे. ह्या शुद्ध बुद्धीच्या काळात श्रद्धेची बाजू उदार धर्माने बरीच राखली आहे आणि शुद्ध बुद्धीच्या पायावर धर्मशिक्षण देण्याचे काम हे कॉलेज करते. इतिहास, तत्त्वज्ञान, श्रुतिग्रंथ, तुलनात्मक टीका, धर्मोपदेश आणि शुद्ध खासगी वर्तन इत्यादी अनेक द्वारा धर्मशिक्षणाचे काम हे कॉलेज निःपक्षपाताने, कळकळीने, दक्षतेने आणि शांतपणे बजावीत आहे.

धर्मशिक्षणासाठी हिंदुस्थानातून येथे आलेले विठ्ठल रामजी शिंदे हे चौथे विद्यार्थी. त्यांच्या आधी बंगालमधून प्रमथलाल सेन (१८९६) बिपीनचंद्र पाल (१८९८) व हेमचंद्र सरकार (१८९८) हे तीन विद्यार्थी आलेले होते.१ ह्या वर्षी जपानमधून टोयोसाकी हा विद्यार्थी ह्या कॉलेजात धर्मशिक्षणासाठी दाखल झाला होता. विद्यार्थी कोणत्याही वंशाचा असो, कोणत्याही देशातील असो ह्या कॉलेजची दारे सर्वांनाच सारखी उघडी असतात.

धर्मशिक्षण देणा-या ह्या कॉलेजचा वेगळेपणा व वैशिष्ट्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे.२ “धर्माच्या इतर कॉलेजातील अध्यापकांस व विद्यार्थांसही ख्रिस्ती शकाच्या तिस-या व चौथ्या शतकात मतांचे जे एकदा जुने नमुने ठरून गेले आहेत त्याप्रमाणे आपला विश्वास आहे अशी उघडपणे प्रतिज्ञा घ्यावी लागते.” असल्या फार्सात ह्या कॉलेजास काही करमणूक वाटत नसल्यामुळे ते येथे घडत नाही. शिंदे यांनी म्हटले आहे, “ह्याचा बहाणा अट्टल सुधारकी असल्यामुळे कोणत्याही बुढ्ढ्या युनिव्हर्सिटीस ह्याचा संसर्ग सोसत नाही. आणि ह्या कॉलेजासही त्याविषयी पर्वा नाही. म्हणून अर्थात कॉलेजातील अध्ययनाचा युनिव्हर्सिटीच्या परीक्षांशी कसलाही संबंध नाही. सुधारकी धर्मविचाराचे संबंध युरोपात मँचेस्टर हे एकच एक कॉलेज आहे. तथापि, धर्मसुधारणेचा रेटा असा तीव्र आहे की, ह्या कॉलेजची उदार मते नकळत इंग्लंडच्या सा-या चर्चमधून झिरपत असतात. आधुनिक शास्त्रास व तत्त्वज्ञानास पटेल अशा प्रकारचे धर्माचे उदार मत उघडपणे प्रतिपादणे व समाजाच्या सर्व थरांत ते पसरविणे यासाठी दरवर्षी ताज्या दमाचे तरुण उपदेशक तयार करण्याचे काम केवळ ह्या कॉलेजात होते.”

अठराव्या शतकात युरोपात आधुनिक शास्त्र ज्या वेळेला नव्यानेच उदयाला येऊ लागले तेव्हा जुना धर्म नवे शास्त्र ह्यामध्ये मोठा संघर्ष सुरू झाला. अशा आणीबाणीच्या प्रसंगी १७५७ मध्ये निघालेल्या वॉरिंग्टन अकॅडमी या संस्थेने आपल्या संस्थेचे रूपांतर करून १७८६ मध्ये मँचेस्टर कॉलेज काढले. १८८२ मध्ये युनिटेरियन समाजाच्या प्रतिनिधींची मिळून त्रैवार्षिक युनिटेरियन परिषदेची स्थापना करण्यात आली. ह्या परिषदेने घेतलेल्या एका निर्णयानुसार मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड येथे आणण्यात आले. ह्या कॉलेजच्या संस्थापकांचा धर्म व शास्त्र ह्या दोहोंवरही सारखाच विश्वास होता. म्हणजे ह्यांचा धर्म शास्त्रीय होता व ह्यांचे शास्त्र धार्मिक होते. वॉरिंग्टन अकॅडमीतील धर्मशास्त्राचे पहिले अध्यापक डॉ. जॉन टेलर (१७५७ ते १७६१) हे वर्षाच्या आरंभी आपले व्याख्यान सुरू करण्यापूर्वी चार तत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवत असत.

१.    सत्यदेवतेच्या नावाने मी तुम्हांस बजावितो की, तुम्ही आताच्या व पुढच्या धर्माध्ययनात, श्रुतिग्रंथातील साधकबाधक प्रमाणे आणि तुमची स्वतःची सदसद्विवेकबुद्धी ह्या दोहींकडे दक्षतेने, निःपक्षपाताने व कसोशीने नेहमी लक्ष पुरवा; कल्पनेचा झपाटा आणि निराधार तर्क ह्यासंबंधी सावध असा.
२.    मी प्रस्थापिलेले कोणतेही तत्त्व अगर विचार ह्यांचा जो भाग तुम्हांस सप्रमाण दिसेल, त्यापेक्षा अधिक मुळीच पत्करू नका.
३.    मी हल्ली शिकविलेले व तुम्ही मानलेले कोणतेही तत्त्व तुम्हांस पुढे कच्चे अगर खोटे दिसेल, तर शंका बाळगा किंवा ते मुळीच टाकून द्या.
४.    आपले मन नेहमी मोकळे ठेवा, दुराग्रह व पक्षाभिमान ह्यांस थारा देऊ नका, इतर ख्रिस्ती बंधूशी प्रेमाने व सलोख्याने राहण्याचे साधन करा, स्वतः विचार करून स्वतः निवाडा करण्याचा जो तुम्हांस जन्मतः हक्क आहे, त्याच्या आड दुस-यास येऊ देऊ नका आणि दुस-याच्या हक्काच्या आड तुम्ही जाऊ नका.
डॉ. मार्टिनो हेही विवेकबुद्धीला महत्त्व देण्याची, नव्या विचारांचे स्वागत करण्याची भूमिका प्रतिपादीत असत. धर्माच्या जोडीनेच सत्य आणि स्वातंत्र्य हे ब्रीद केवळ बोधवाक्यातच न ठेवता अमलात आणण्याची परंपरा असलेले हे एकमेव आणि नमुनेदार कॉलेज होते.

प्रा. जॉन टेलर (१७५७ ते ६१), डॉ. मार्टिनो (१८२७-१८९७) यांसारखे निष्ठावंत, प्रांजळ व कळकळीचे अध्यापक असण्याची परंपरा पुढील काळातही चालू होती. विठ्ठल रामजींनी प्रवेश घेतला त्या वर्षी जेम्स ड्रमंड हे प्रिन्सिपॉल होते. ते विद्येने, श्रद्धेने आणि शीलाने फार मोठे गृहस्थ होते. आपल्या आध्यात्मिक तेजोबलाने सुधारक-सनातनी, नवे-जुने ह्या विशेषणांच्या पलीकडे असणारे डॉ. ड्रमंड यांना पाहून विठ्ठल रामजींना आदरणीय अशा डॉ. भांडारकरांची आठवण झाली. कॉलेजात पाच कायमचे व दोन हंगामी अध्यापक या वेळी होते. कायमच्या पाचांपैकी रेव्ह. ऍडिस हे जुन्या मताचे होते की, ते युनिटेरियन आहेत की नाहीत अशी शंका यावी. मात्र ह्यांना कॉलेजमधून कोणताही उपसर्ग पोहोचत नाही. उलटपक्षी तत्त्वज्ञानाचे प्रो. सी. बी. ऍप्टन, तुलनात्मक धर्म व पाली भाषा शिकविणारे प्रो. जे. ई. कार्पेंटर हे अगदी बावनकशी होते. प्रो. आर. बी. ऑजर्स ख्रिस्तीसंघाचा इतिहास शिकवीत असत. ‘हिबर्ट जर्नल’चे संस्थापक व संचालक असणारे प्रो. जॅक्स हे समाजशास्त्र शिकवीत. प्रो. ड्रमंड हे बायबल आणि धर्मशास्त्र शिकवीत. सगळेच अध्यापक हे त्यांच्या त्यांच्या विषयाचे जाडे पंडित होते. प्रो. कार्पेंटर हे विठ्ठल रामजींच्या तुलनात्मक धर्म ह्या ऐच्छिक विषयाचे विशेष गुरू होते. त्यांच्याजवळ त्यांनी पाली भाषा आणि बुद्ध धर्म ह्या विषयाचा विशेष अभ्यास करावयास प्रारंभ केला.

कॉलेजमधील अध्यापकांची विविध विषयांवरील व्याख्याने मन लावून ऐकणे, नेमलेल्या विषयांचा अभ्यास करणे, पंधरवड्याला निबंध लिहिणे असा त्यांचा कॉलेजचा अभ्यास नियमितपणे चालला होताच. त्याशिवाय त्यांचे अवांतर वाचन, धर्मसाधन चालले होते. पाश्चात्त्यांची जीवनरहाटी, सामाजिक संस्थांची कार्यपद्धती हीही ते निरखीत होते. एका नव्या संस्कृतीचा त्यांना जवळून परिचय घडत होता.

संर्दभ
१.    मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड येथील नोंदवही.
२.    सुबोधपत्रिका, २७ ऑगस्ट १९०२.

भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबई येथील समाजाचे काम विविध प्रकारे जोरदारपणे चालविले त्याचप्रमाणे मुंबईबाहेरील अनेक स्थानिक प्रार्थनासमाजाच्या कामाला चालना देण्याचा प्रयत्न केला. परंतु एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांचे लक्ष ब्राह्मधर्माच्या विश्वव्यापक तत्त्वाकडे आणि त्या उच्च अधिष्ठानावरून ब्राह्मधर्माच्या भारतीय कार्याकडे नेहमी लागून राहिलेले असे. ह्या कार्याचा मुख्य भाग एकेश्वरी धर्मपरिषद हा होता.

१८८५ मध्ये हिंदू राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले. त्यात न्या. रानडे ह्यांचा अप्रत्यक्ष पुढाकार होता. त्यांच्या डोळ्यांसमोर समग्रपणे भारताची भवितव्यता होती. राष्ट्रसभेद्वारा सामाजिक सुधारणेचे कार्य त्यांनी सामाजिक परिषदेच्या द्वारे करविले. अलाहाबादच्या चौथ्या अधिवेशनापासून राष्ट्रीय कार्याला उदार धर्माचा पाठिंबा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अलाहाबाद येथील राष्ट्रसभेच्या १८८८च्या अधिवेशनाच्या वेळेपासून उदार धर्मपरिषदेचे अधिवेशन भरविण्याचे त्यांनी निश्चित केले होते. न्या. रानडे हे ह्या धर्मपरिषदेचे अध्यक्ष होते व पंडित शिवनाथ शास्त्री ह्यांना सेक्रेटरी म्हणून नेमले.

ब्राह्मसंघ : खरे तर ह्या प्रकारच्या कामाला १८८९ पासून प्रारंभ झाला होता. मुंबईला थीइस्ट्स युनियन (ब्राह्मसंघ) ह्या नावाची एक मध्यवर्ती संस्था स्थापन झाली. ब्राह्म समाजाच्या निरनिराळ्या पक्षाच्या एकत्र उपासना व संमेलने व्हावीत, प्रचारासाठी एकत्र प्रयत्न व्हावा, वगैरे गोष्टी ठरविण्यात आल्या होत्या. नवीनचंद्र राय ह्यांना ह्या संघाचे सेक्रेटरी नेमले. कलकत्त्यास आदि ब्राह्मसमाज, नविधान व साधारण ब्राह्मसमाज असे निरनिराळे पक्ष पडून ब्राह्मसमाजाच्या कामात फूट पडली होती. ह्या नवीन संघामुळे ही फूट भरून निघण्याचा संभव होता. न्या. रानडे ह्यांनीच ह्या कामी पुढाकार घेतला होता. १८९५ मध्ये पुण्याच्या काँग्रेसच्या वेळी पुणे प्रार्थनामंदिरात ही बैठक झाली. त्या वेळी अमेरिकेचे युनिटेरियन धर्माचे प्रसिद्ध प्रचारक रेव्ह. जे. टी. संडरलँड हे उपस्थित होते. १९०३ पर्यंत जरी ह्या परिषदेच्या बैठकी भरल्या तरी तिचे काम मंदावले होते. १९०३च्या नाताळात ह्या परिषदेची स्थिती विस्कळीत झाली आहे हे शिंदे ह्यांच्या मनात विशेषत्वाने भरले व पुढील साली म्हणजे मुंबईला झालेल्या राष्ट्रीय सभेच्या वेळी ही धर्मपरिषद चांगल्या प्रकारे संघटित करून बोलावण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे एक-दोन अधिवेशने सोडू कराचीत भरलेल्या १९१३ सालच्या अखेरच्या बैठकीपर्यंत सेक्रेटरी म्हणून ह्या सर्व कामाचा भार शिंदे ह्यांनी स्वेच्छेने पत्करला व तळमळीने पार पाडला. धर्मपरिषदेच्या कामाची कल्पना पुढे दिलेल्या तक्त्यावरून येऊ शकते.

तक्ता (तक्ता वाचण्यासाठी इथे क्लीक करावे )

१९०३ सालच्या अखेरीस मद्रास, बंगालच्या सफरीमुळे शिंदे ह्यांना हिंदुस्थानातील ब्राह्मसमाजाची बरीच माहिती प्रत्यक्ष स्वरूपात झाली होती. १९०४ साली मुंबई येथील एकेश्वरी धर्मपरिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर होते, तर सेक्रेटरी शिंदे. मुंबईच्या ह्या धर्मपरिषदेत निरनिराळ्या प्रांतांतील प्रमुख पुढा-यांचा शिंदे ह्यांच्याशी परिचय झाला. कलकत्त्याच्या खालोखाल मुंबई प्रार्थनासमाजाचे महत्त्व असल्याने धर्मपरिषदेच्या कामात मुंबईच्या प्रचारकाने पुढाकार घेणे हे योग्यच होते. मुंबई येथील १९०४च्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाच्या वेळी होणा-या सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे भूषविणार होते. तेव्हा ह्याच वेळी भरणा-या धर्मपरिषदेमध्ये श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्यांना सहभागी करून घेण्यासाठी निमंत्रित करावे ही कल्पना शिंदे ह्यांना सुचली. धर्मपरिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर हे होते व स्वागताध्यक्ष सर नारायण चंदावरकर हे होते. त्यामुळे धर्मपरिषदेचे काम उत्तम प्रकारे झाले.

प्रार्थनासमाजाच्या निमंत्रणानुसार सयाजीराव गायकवाड हे एकत्रित भोजनासाठीही उपस्थित राहिले. आर्यसमाजाच्या मंडळीने भोजनाला येण्याचे कबूल केले होते. परंतु काही मुसलमान गृहस्थांना प्रार्थनासमाजाची दीक्षा दिलेली आहे हे कळल्याबरोबर त्यांनी भोजनाला उपस्थित राहण्याचा बेत रहित केला व प्रत्यक्ष कृतीच्या वेळी मंडळी माघार कशी घेतात ह्याचा नमुना दाखविला. आर्यसमाजी मंडळीमध्ये गुजराथी लोकांचाच मोठ्या प्रमाणात भरणि होता. श्रीमंत सयाजीरावांनी मात्र ह्या भोजनास उपस्थित राहून उच्च धर्मनिष्ठ वर्तनाचा एक आदर्श दाखवून दिला. पुढील वर्षाची परिषद वाराणसी येथे काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भरणार होती. अशा परिषदांच्या जनरल सेक्रेटरीचे काम विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनीच पाहावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

पुढच्या वर्षीची म्हणजे १९०५ सालची धर्मपरिषद पंडित शिवनाथशास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली वाराणासी येथे भरली. सेक्रेटरी शिंदेच होते. काशी येथे स्थानिक ब्राह्मसमाज नव्हता व गाव जुन्या मताचा आणि क्षेत्राचा. त्यामुळे शिंदे ह्यांना स्वागतमंडळ स्थापन करणे जड गेले. मात्र ह्या परिषदेचे महत्त्व प्रांतोप्रांतीच्या पुढा-यांना कळले असल्याने शिंदे ह्यांनी काढलेल्या परिपत्रकाला उत्तेजनपर उत्तरे आली व वर्गणीच्या रकमाही आल्या. पंडित शिवनाथशास्त्री हे वाराणसी येथील परिषदेचे अध्यक्ष होते व त्यांनी अध्यक्ष म्हणून उत्तम प्रकारे काम चालविले. परिषदेचे काम एखाद्या स्थानिक समाजाच्या वार्षिक उत्सवाप्रमाणे २४ डिसेंबरपासून ३१ तारखेपर्यंत मोठ्या सोहळ्याने पार पडले. उपासना, भजने व्याख्याने, नामसंकीर्तने व शेवटी प्रीतिभोजन इत्यादी कार्यक्रम निर्वेधपणे पार पडले. निरनिराळ्या प्रांतांतून सुमारे ७५ ठिकाणांहून ब्राह्मसमाजाचे प्रतिनिधी आले होते. ह्या ब्राह्मधर्माच्या परिषदेसाठी लंडन ख्रिश्चन मिशनच्या प्रशस्त हायस्कुलाशिवाय काशी ह्या क्षेत्रस्थानी दुसरीकडे कोठेही जागा मिळाली नाही ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. दोन-तीन वर्षांच्या अनुभवामुळे हिंदुस्थान ह्या खंडप्राय देशातील ब्राह्मसमाजाची सर्व प्रकारची माहिती मिळवून त्यांची एक सूची (डिरेक्टरी) तयार करण्याची आवश्यकता शिंदे ह्यांना भासू लागली होती. त्यांच्यासारख्या समाजकार्यासाठी भ्रमंती करणा-या माणसाच्या लक्षात ही उणीव विशेषत्वाने आली. वाराणसी येथील परिषदेने ब्राह्मधर्मसूचिग्रंथ शिंदे ह्यांनी तयार करून प्रसिद्ध करावा असा ठराव एकमताने मंजूर केला.

तारीख ३० हा परिषदेचा मुख्य दिवस होता. बाबू प्रथमलाल सेन ह्यांनी प्रातःकाळची उपासना उत्तम प्रकारे चालविली. “खरी प्रार्थना म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही देवावर प्रीती करतो त्याचप्रमाणे सर्व मनुष्यजातीवर प्रेम करणे, हीच ईश्वराची खरी भक्ती आणि उपासना. ईश्वराविषयी हे प्रेम मनात पूर्ण बाणले म्हणजे आत्म्याचा पालट होतो आणि जणू काय आम्ही पुनर्जन्म पावतो,” असे त्यांनी प्रतिपादन केले.१

परिषदेसाठी अनेक मान्यवर प्रतिष्ठित मंडळी आली होती. न्या. चंदावरकर, बाबू सत्येंद्रनाथ टागोर, मि. नटराजन, प्रो. रुचिराम सहानी, बाबू हेमचंद्र सरकार इत्यादी मंडळी त्यामध्ये होती. शिंदे ह्यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी सांगितले, गेल्या वर्षी परिषद भरली तेव्हा फक्त ६० समाजाची नावे ठाऊक होती. आज १५० समाजांचा पत्ता लागला आहे. गेल्या वर्षी जो पत्रव्यवहार होता तेव्हा १०० पत्रे लिहावयास लागली. यंदा सुमारे ५०० पत्रे लिहिली गेली. ४७ समाजांकडून खर्चासाठी ३४३ रुपये मिळाले आहेत. सुमारे १०० प्रतिनिधींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. शिंदे ह्यांच्या प्रास्ताविकावरून धर्मपरिषद आयोजित करण्यापाठीमागे असणारा त्यांचा हेतू, प्रचाराची तळमळ व त्यांचा कामाचा उरक ह्यांची कल्पना येऊ शकते.

अध्यक्ष पंडित शिवनाथशास्त्री ह्यांचे परिषदेत मोठे उद्बोधक भाषण झाले. धर्म अबाधित राहण्यासाठी मनुष्यास स्वातंत्र्य, सयुक्तिकता, सार्वत्रिकता आणि आध्यात्मिकता अथवा सात्विकभाव ह्या चार गोष्टींची आवश्यकता असते असे त्यांनी सांगितले. ब्राह्मधर्म आणि भक्तिपंथ हे एकच आहेत. फरक कायतो मूर्तिपूजा व जातिबंधन ह्या दोन गोष्टींत आहे. प्रचारातील धर्माचा विचार केला असता त्याला ‘आध्यात्मिक धर्म’ हे नाव देण्यापेक्षा ‘सामाजिक धर्म’ हे नाव शोभते. ह्या प्रकारचे प्रतिपादन केल्यानंतर त्यांनी ब्राह्मधर्माला सनातनी मंडळी विरोध का करतात, ह्यासंबंधी वस्तुनिष्ठ विवेचन केले.

सबजेक्ट कमिटीच्या बैठकीमध्ये विविध ठरावासंबंधी निर्णय झाला. त्यमध्ये एका ठरावामुळे परिषदेच्या कमिटीमध्ये शिंदे ह्यांचा समावेश करण्यात आला व दुस-या एका ठरावामुळे हिंदुस्थानातील सर्व समाजांच्या संक्षिप्त माहितीचे एक पुस्तक (डिरेक्टरी) तयार करून प्रसिद्ध करण्याचे काम शिंदे ह्यांनी आपल्याकडे घ्यावे अशी परिषदेने विनंती केली.

ब्राह्मधर्माचा प्रसार वाढविण्याच्या आवश्यकतेसंबंधी न्या. चंदावरकर ह्यांचे प्रभावी भाषण झाले. ब्राह्मधर्माचा प्रसार स्त्रियांमध्ये होणे आवश्यक आहे ह्या सूचनेसंबंधी सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्यांनी फार कळकळीने भाषण केले. दुस-या एका गृहस्थाने शिंदे ह्यांना एका विद्यार्थ्याचे पत्र आले आहे व त्यांनी विद्यार्थ्यांसाठी धर्मविषयक वृत्तपत्र चालवावे असे सुचविले असल्याचा उल्लेख केला.२

एकंदरीत वाराणसी येथील धर्मपरिषदेचे हे अधिवेशन यशस्वीपणे पार पडले. हे अधिवेशन आयोजित करण्यात शिंदे ह्यांनी फार कष्ट घेतले हे जसे दिसून येते त्याचप्रमाणे त्यांची दूरदृष्टी व संघटनाकौशल्य ह्यांचाही प्रभाव ह्या अधिवेशनात पडल्याचे स्पष्टपणे जाणवते.
 
वाराणसी येथील परिषदेत बंगालमधील तीनही ब्राह्मसमाजाची परस्पर सहानुभूती बरीच वाढली. निरनिराळ्या प्रांतातील ब्राह्मांचा स्नेह झाला. ह्या परिषदेचा हितकारक व उत्साहवर्धक वृत्तान्त अन्यत्र सांगावा; मुंबई प्रार्थनासमाजाची माहिती दूरदूरच्या समाजास कळावी; काही प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करवून घ्यावी; मुख्य मुख्य स्थानिक समाज पाहावे असा हेतू धरून शिंदे ह्यांनी बंगाल, बिहार, आसाम ह्या प्रांतातून एक मोठा विस्तृत दौरा काढला. ब्राह्मसमाजाची अखिल भारतीय पातळीवर संघटना होण्याच्या दृष्टीने व त्यांची कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीने असा दौरा काढणे शिंदे ह्यांना आवश्यक वाटले.

प्रथमतः बिहार प्रांताची राजधानी बांकीपूर येथे ते २ जानेवारी १९०६ रोजी गेले. मुख्य ब्राह्मसमाज नवविधान मताचा होता व भाई प्रकाशचंद्र राय हे त्यांचे पुढारी होते. साधारण ब्राह्मसमाजाची तेथे एक राममोहन रॉय सेमिनरी नावाची शाळा होती व साधारण ब्राह्मसमाजाची उपासना तेथेच होत असे. तारीख ४ रोजी शिंदे ह्यांनी प्रमुख मंडळी जमवून मुंबईकडची हकिकत सांगितली. उत्सवात ब्राह्मसमाजाच्या दोन्ही पक्षांनी मिळून कार्यक्रम ठरवावा, एकमेकांच्या उपासनेस पाळीपाळीने जावे असे ठरले. ह्या दोन पक्षांमध्ये सामंजस्य निर्माण व्हावे असा शिंदे ह्यांचा हेतू होता. बॅ. दास ह्यांच्या घरी ता. ५ रोजी दोन्ही पक्षांच्या स्त्रियांची सभा भरली. पोस्टल मिशन, डोमेस्टिक मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामे स्त्रियांनी कशी करावयाची हे शिंदे ह्यांनी सांगितले. काशी परिषदेस आलेल्या सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्या सिल्हेटहून मुद्दाम आल्या होत्या. त्यांनी हिंदीमधून भाषण केले. ब्राह्मधर्माच्या प्रचारकार्यात स्त्रियांना सहभागी करून घ्यावे असा शिंदे ह्यांचा विचार व प्रयत्न नेहमीच होता.

बांकीपूरनंतर शिंदे यांनी मोंघीरला एक दिवसाची भेट दिली व दुस-या दिवशी जानेवारी ७ला शिंदे भागलपूरला गेले. तेथील समाजात बडी बडी प्रमुख व वृद्ध मंडळी थोड्या प्रमाणात होती. सुमारे ५-६ तरुण पदवीधर ब्राह्ममंडळींपुढे मुंबईच्या तरुण ब्राह्ममंडळाचे छापील नियम शिंदे ह्यांनी वाचून दाखविले व तेथील पूर्वीच्या तरुणांची संस्था पुन्हा स्थापन करावी असे आवाहन केले.

काठीहर येथे समाजमंदिराचे बांधकाम अर्धवट स्थितीत असलेले शिंदे ह्यांनी पाहिले. तेथे समाज मात्र अस्तित्वात नव्हता. पूर्णिया येथे आल्यावर तेथील वजनदार मंडळींच्या सहकार्याने काठीहारमधील इमारत पूर्ण व्हावी व तेथे समाज चालू व्हावा असा प्रयत्न शिंदे ह्यांनी केला. पूर्णिया भेटीनंतरची कुचबिहारची भेट समाजकार्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची होती.

भूतान संस्थानच्या हद्दीस लागून कुचबिहार हे संस्थान आहे. तेथील मूळचे रहिवासी कुचकोल नावाचे जंगली लोक आहेत. तेथील राजघराणे ह्याच जंगली जातीचे आहे. फक्त अधिकारीवर्ग मात्र बंगाली लोकांचा होता. येथे एम. ए. पर्यंत पूर्ण दर्जाचे एक कॉलेज होते. “सुधारणेची ही थोडी चिन्हे सोडून दिल्यास कुचबिहार नगरावर व तेथील अस्सल प्रजेवर अद्यापि हिमालयाचेच पुरातन वन्य साम्राज्य चालू आहे. राजमहाल, चार बड्या लोकांची घरे आणि काही सरकारी इमारती सोडून दिल्यास बाकी सर्व लहानमोठ्यांची घरे अक्षरशः झोपड्याच! गावाकडे नजर फेकल्यास असे वाटते की, केळी व पोफळी ह्यांच्या सुंदर बनात एकांत जागा पाहून आधुनिक सुधारणेच्या प्लेगला कंटाळून जणू एक सेग्रिगेशन कँपच बांधला आहे, “असे कुचबिहारचे वर्णन शिंदे ह्यांनी केले आहे.३

बंगालमधील ब्राह्मसमाजात दुफळी निर्माण होण्यास हा कोप-यातील कुचबिहार कारणीभूत झाला होता. १८७८ मध्ये केशवचंद्र ह्यांच्या थोरल्या मुलीचा विवाह कुचबिहारचे राजे नृपेंद्रनारायण यांच्याशी झाला. त्या वेळी केशवचंद्रांच्या कन्येचे वय १४ वर्षांहून कमी होते. म्हणून केशवचंद्रांच्या नवविधान समाजात दुफळी पडून नवा साधारण ब्राह्मसमाज निर्माण झाला. शिंदे तेथे गेले त्या वेळी नवविधान समाजाची ११ आनुष्ठानिक कुटुंबे होती. त्यात एकंदर ७० मुले-माणसे होती. शिवाय ४० हितचिंतक होते. स्वतः राजे समाजाचे अध्यक्ष होते. मात्र सर्व व्यवस्था राणीसाहेब म्हणजेच केशवचंद्र सेन यांची कन्या पाहत होती.

“इतके सुंदर ब्राह्ममंदिर निदान माझ्यातरी पाहाण्यात कुठे आले नाही”, असे शिंदे ह्यांनी कुचबिहार येथील ब्राह्ममंदिराबद्दल म्हटले आहे. रविवारी त्यांची तेथे उपासना झाली व तारीख १३ रोजी टाऊन हॉलमध्ये ‘रिलिजन अँड दि बेसिस ऑफ लाईफ’ (धर्म हा जीवनाचा पाया) ह्या विषयावर इंग्रजीमध्ये त्यांचे व्याख्यान झाले. शिंदे कुचबिहार येथे असताना कॉलेजकुमारांनी जी जिज्ञासा, तत्परता व उत्सुकता दाखविली, ती शिंदे ह्यांना उत्साहवर्धक वाटली. ती पाहून शिंदे ह्यांच्या मनात असा विचार आला की, कुचबिहार येथे एखाद्या ताज्या दमाचा प्रचारक पाठविला तर पुष्कळ काम होण्याजोगे आहे. पण लगेच समाजांतर्गत असलेल्या राजकारणामुळे ते शक्य होणार नाही ह्याचीही खात्री पटली. तेथील कार्यक्रम आटोपून १५ जानेवारीस ब्रह्मपुत्रेच्या काठी असलेल्या डुब्री ह्या गावी ते दाखल झाले.

आसाम प्रांतातील डुब्री ह्या ब्रह्मपुत्रा नदीने कवटाळलेल्या गावी नदीच्या तीरावर शिंदे उभे होते. सोबत बाबू उपेंद्रनाथ बोस हे ब्राह्मसमाजाचे वजनदार पुरस्कर्ते उपस्थित होते. सनातन ब्राह्मसमाजाचा शुभमहिमा शिंदे यांच्या मनाला जाणवत होता. भोवतालच्या शांत गंभीर देखाव्याचे व साक्षात ब्रह्मपुत्रेचे विराट दर्शन त्यांना घडले. त्याक्षणी त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, “ब्राह्मधर्माचा प्रचारक होण्यात मला जी धन्यता व सुख वाटत आहे त्यापुढे राजसुखही तुच्छ होय.” हा विराट गंभीर देखावा बघितल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे हे चिंतनामध्ये काही क्षण मग्न झाले.

येथील समाजामध्ये मंडळींची एकजूट व एकमेकांविषयी कळकळ दिसून आली. ती पाहून शिंदे ह्यांना फार आनंद झाला. विशेषकरून स्त्रियांमध्ये उपासनेविषयी विशेष उत्कंठा दिसून आली. त्यांच्यासाठी शिंदे ह्यांनी हिंदीमध्ये उपासना केली. दुस-या दिवशी सायंकाळी समाजामध्ये ‘आधुनिक भारतासाठी काही आदर्श’ ह्या विषयावर इंग्रजीत व्याख्यान दिले. आजूबाजूचा आल्हाददायक निसर्ग, ब्रह्मपुत्रेचे विराट दर्शन आणि ब्राह्मबंधूंमध्ये असलेला प्रेमभाव व ब्राह्मभगिनींची कळकळ ही सारी बघावयास व अनुभवास मिळाल्यामुळे शिंदे ह्यांचा डुब्री येथील मुक्काम फारच आनंददायक झाला.

डुब्रीवरून निघून तारीख १८ रोजी शिंदे मैमनसिंग ह्या गावी आले. नवविधानसमाज व साधारणसमाज अशा दोन्ही समाजातील माणसे तेथे होती. मैमनसिंगचा विशेष असा की, साधारणसमाजाचे आचार्य श्रीनाथ चंदा ह्यांनी गावाबाहेर बरीच जागा घेऊन तेथे ब्राह्म लोकांचे एक खेडे वसविले होते.

पूर्व बंगालची राजधानी असलेल्या डाक्का येथील समाज कलत्त्याच्या खालोखाल महत्त्वाचा गणला जात होता. आतापर्यंतच्या प्रवासाचा परिणाम शिंदे यांना डाक्का येथे विशेषत्वाने जाणवला. बंगालमधील गोड अन्न व मोहरीच्या तेलाचा वापर यांचा वीट आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला. मँचेस्टर कॉलेजमधून उच्च धर्मशिक्षण घेऊन आलेल्या धर्मप्रचारक तरुणाचे व्याख्यान आहे असे समजल्याने शिंदे ह्यांच्या व्याख्यानाला तेथील समाजात अलोट गर्दी जमली होती. शिंदे ह्यांनी इंग्रजीत दहा-पंधरा मिनिटे भाषण केल्यावर त्यांना भोवळ आली व ते खुर्चीत गळून पडले. सभेचा मोठा विरस झाला. दोन दिवस विश्रांती घेऊन ब्रह्मपुत्रा नदीवरील बोटीने ते बारीसाल येथे पोहोचले. ह्या जलप्रवासाने प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. बारीसालमध्ये त्यांचे व्याख्यानही परिणामकारक झाले. व्याख्यान आटोपून शिंदे व्यासपीठावरून खाली उतरल्याबरोबर त्यांच्या हातात पूर्वी उल्लेखिलेली तातडीची तार देण्यात आली. मुंबई येथे त्यांची पत्नी फार आजारी आहे व अहमदनगरास बहीण चंद्राक्का अत्यवस्थ आहे असा तारेतील मजकूर होता. त्यामुळे पुढचा दौरा तसाच टाकून शिंदे यांना मुंबईस परत यावे लागले. मात्र ह्या दौ-याने बंगाल, बिहार, आसाम, या प्रांतांमध्ये ब्राह्मसमाजाची स्थिती कशी आहे; स्थानिक स्वरूपाचे कोणते प्रश्न तेथे आहेत; ब्राह्मसमाजाची पुनर्घटना करण्याची शक्यता कितपत आहे वगैरेबद्दलची प्रत्यक्ष माहिती त्यांना मिळाली व समाजातील अनेक वजनदार पुढा-यांचा प्रत्यक्ष परिचय झाला. अखिल भारतीय पातळीवर धर्मपरिषदेचे काम करण्याच्या दृष्टीने हा त्यांचा लाभच होता.

Read more: भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद

ब्राह्मधर्मसूची ग्रंथ

ब्राह्मधर्मासंबंधी अखिल भारतीय पातळीवर शिंदे ह्यांनी केलेले आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे थीइस्टिक डिरेक्टरी (ब्राह्मधर्मसूची ग्रंथ) ह्या ग्रंथाची रचना होय. मुंबई प्रार्थनासमाजाचे कार्य करावयास लागल्यापासून शिंदे ह्यांना अशा प्रकारच्या ग्रंथाची उणीव जाणवत होती. अशा प्रकारचा ग्रंथ तयार होणे आवश्यक आहे हे शिंदे ह्यांनी इतरांच्या मनावर ठसविले. भारतीय निरनिराळ्या ब्राह्मसमाजांच्या कार्याची आणि प्रगतीची माहिती दरवर्षी जमा करून प्रसिद्ध करण्याचे काम प्रतापचंद्र मुझुमदार ह्यांनी प्रथम १८७२च्या सुमारास सुरू केले. पुढे ७-८ वर्षानंतर मिस् एस्. डी. कॉलेट ह्या उत्साही इंग्रज स्त्रीने १८७६ ते ८७ पर्यंत ब्राह्मो इयर बुक ह्या नावाने हे काम पद्धतशीरपणे चालविले. मात्र एवढ्या झालेल्या कामाने देशांमधील विविध ठिकाणच्या ब्रह्मसमाजाची एकत्रित माहिती मिळू शकत नव्हती. इंग्लंडमध्ये लंडनमधील एसेक्स स्ट्रीटवर असलेल्या युनिटेरियन पंथाच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्व प्रकारची युनिटेरियन पंथाबद्दलची माहिती उपलब्ध होऊ शकते. त्या मध्यवर्ती संस्थेने अशा प्रकारचे साहित्य प्रसिद्ध केलेले आहे ह्याची शिंदे ह्यांना माहिती होती. ह्या प्रकारच्या कामाची हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशात तर अधिकच आवश्यकता होती. म्हणून १९०५ सालच्या काशी येथील अधिवेशनात ह्या संबंधीचा ठराव संमत झाला. हिंदुस्थानातील ब्राह्म व प्रार्थनासमाजाची माहिती असणारे पुस्तक शिंदे ह्यांनी तयार करावे असा ठराव परिषदेन संमत करून त्या कामाची जबाबदारी शिंदे ह्यांच्यावर सोपविली.

त्या परिषदेनंतरच विविध ब्राह्मसमाजांची माहिती मिळविण्यासाठी शिंदे ह्यांनी बंगाल, आसामची सफर काढली. ह्यासाठी जाहीर परिपत्रके काढली. पत्रव्यवहार केला तरीही समाधानकारक माहिती न मिळाल्यामुळे हा प्रयत्न सोडून द्यावा असे त्यांनी दोनदा ठरविले. १९१२ साली पुन्हा त्यांनी जोरदार प्रयत्न केला. ह्या कामाचे महत्त्व ध्यानात घेऊन हे काम तडीस नेणे आवश्यक असल्याचे त्यांना जाणवत होते. काही स्थानिक समाजांची माहिती त्यांना मिळालीही होती. म्हणून ब्राह्मसमाजाचे कार्य करणा-या कार्यकर्त्यांना मिळालेले अपयश हेदेखील उद्बोधक ठरण्यासारखे वाटत होते. परदेशात असलेल्या त्यांच्या परिचितांनी व मित्रांनी महत्त्वी माहिती त्यांच्या त्यांच्या एकेश्वरी धर्मासंबंधी लिहून पाठविली. म्हणून १९१२ साली अखेरचा नेटाचा प्रयत्न करून शिंदे ह्यांनी ३०० पानांचा हा ग्रंथ पूर्णतेस नेला व १९१२च्या डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला. सर नारायण चंदावरकर ह्यांनी ह्या पुस्तकाला विवेचक अशी महत्त्वपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. तीमध्ये त्यांनी म्हटले आहे, “भारतखंडात ब्राह्म आणि प्रार्थनासमाजांनी चालविलेल्या एकेश्वरी धर्माची एकत्रित माहिती ह्या समजाच्या सभासदांना व हितचिंतकांनाच नव्हे तर ज्या कोणाला ह्या चळवळीकडे चिकित्सक दृष्टीने पाहावयाचे असेल अशा बाहेरच्यांनादेखील अत्यंत उपयोगी ठरेल. आधुनिक सुशिक्षित हिंदू लोक धर्माच्या बाबतीत अत्यंत उदासीन आहेत, असा आक्षेप वरचेवर करण्यात येतो, पण तो सर्वांशी खरा नाही. हिंदू महामंडळ, आर्यसमाज, थिऑसफी आणि इतर धर्मांच्या चळवळी यांचे कोणी निरीक्षण केल्यास नवीन चैतन्याची साक्ष सहज पटण्यासारखी आहे. आधुनिक विचारी जगात दोन भिन्न प्रमुख शक्तींचे कार्य चालू आहे. एक धर्मकारण व दुसरे अर्थकारण. ह्या दोन शक्ती सर्व सुधारलेल्या जगास हालवून सोडीत आहेत. नुसत्या अर्थाच्या मागे लागलेला मनुष्य अथवा संस्था असणे शक्य नाही. जसजशी श्रीमंती वाढते तसतसा कंगालपणाही त्याचबरोबर वाढतो आणि त्याच्या मागोमाग युद्ध हे ठरलेले. दुसरे सत्य हे की, मतमतांतरांचा गलबला चालला असता त्यातूनच एक मूलभूत सामान्य तत्त्व बाहेर डोकावते. बंगालकडील राममोहन रॉय, महर्षी देवेंद्रनाथ, ब्रह्मानंद केशवचंद्र आणि आमचेकडील सर रामकृष्णपंत भांडारकर यांनी या सामान्य तत्त्वाचा स्वीकार केला असून त्याचा पुकार ते आधुनिक जगात करीत आहेत. त्यांची जबाबदारी किती मोठी आहे हे हा सूचिग्रंथ दाखवीत आहे. ह्या ग्रंथात वर्णिलेली परिस्थिती वाचून नेहमी आनंदच होईल असे नाही. तथापि, ब्राह्मधर्माचा प्रचार अधिक नेटाने करणे कसे अवश्य आहे हे पटते आणि ब्राह्म धर्मानुयायी होणे हे सुखातले मोठे सुख आणि भाग्यातले मोठे भाग्य आहे याची खात्री पटते.”१

ह्या ग्रंथाचा उद्देश प्रामुख्याने हिंदुस्थानातील वेगवेगळ्या प्रांतांतील स्थानिक ब्राह्मसमाजाची माहिती देणारी सूची करणे असा असला तरी पुस्तकाचे स्वरूप आणखी वाढवून त्याला उपयुक्ततेच्या जोडीने अधिक मौलिकता प्राप्त करून द्यावे असे शिंदे ह्यांना वाटले. म्हणून पुस्तकाच्या एका भागामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील उदार धर्मविषयक विचार व त्यांचे कार्य ह्या संबंधीचे लेख समाविष्ट करावे असे वाटले. म्हणून ह्या ग्रंथाच्या नावातच ‘ब्राह्मधर्मसूची’ ह्या मुख्य नावापुढे ‘आणि सुधारलेल्या जगातील उदार धर्माचे विचार आणि कार्य ह्यांचा आढावा’ असे शीर्षक वाढविण्यात आले. त्यामुळे स्वाभाविकपणे उदार धर्मविषयक भूमिकेचे जागतिक पातळीवरील स्वरूप काय, ह्याचे चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहू शकते. ह्या हेतूनेच शिंदे यांनी ह्या पुस्तकाचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात भारतातील आणि जगातील उदार धर्माच्या निरनिराळ्या पंथांचे कार्य ह्या संबंधीचे लेख समाविष्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे भारतामधील ह्या उदार धर्मपंथांनी जी परोपकारी कामे चालविली आहेत त्यासंबंधीचे लेख समाविष्ट केलेले आहेत. ह्या पहिल्या भागातील ब्राह्मसमाजाच्या संबंधीचा लेख पं. शिवनाथशास्त्री ह्यांनी स्वतः लिहिला. जपानमधील उदार धर्म हे प्रकरण शिंदे ह्यांचे मँचेस्टर कॉलेजमधील सहाध्यायी झेनो सुके टोयोसाकी ह्यांनी लिहून पाठविला. पंजाबमधील ब्राह्मसमाज हा लेख लाला रघुनाथ सहानी ह्यांनी, तर दक्षिण भारतातील ब्राह्मसमाज हे टिपण व्ही. पद्मराज नायडू ह्यांनी लिहून पाठविले. मात्र पहिल्या भागातील बरीच मुख्य प्रकरणे स्वतः शिंदे ह्यांनीच लिहिली. पश्चिम हिंदुस्थानातील प्रार्थनासमाजाची चळवळ, एकेश्वरी धर्मपरिषद, भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी, इराणातील बहाई धर्माची चळवळ, युरोपातील व अमेरिकेतील युनिटेरियन आणि युनिव्हर्स्यालिस्ट समाज ही प्रकरणे शिंदे ह्यांनी स्वतः लिहिलेली आहेत. हिंदुस्थानातील आणि जगातील उदार धर्मविषयक चळवळीचा इतिहास डोळ्यांसमोर यावा ह्या हेतूने पहिल्या भागातील प्रकरणे तयार केली आहेत.

प्रस्तुत ग्रंथाच्या दुस-या भागामध्ये प्रत्यक्ष गावोगावी असलेल्या समाजाची माहिती नमूद केली आहे. त्यामध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसा ह्या प्रांतांतील एकशे अकरा ब्राह्मसमाज, मद्रास प्रांतातील ३२ ब्राह्मसमाज, मुंबई प्रांतातील १६ प्रार्थनासमाज, पंजाब आणि संयुक्त प्रांतातील १८ ब्राह्मसमाज व त्याशिवाय लंडन येथील रे. चार्ल्स व्हायसे ह्यांचे थीइस्टिक चर्च अशा एकूण १६८ संस्थांची तपशीलवार माहिती आणि सविस्तर इतिहास आला आहे. प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक समाजाच्या सेक्रेटरीचे नाव व पत्ता, सभासदांची संख्या, ह्यांपैकी आनुष्ठानिक किती व हितचिंतक किती ह्यांचा निर्देश; आठवड्यातून सभा कितीवेळा भरते; पोटसंस्थांचा तपशील; स्वतंत्र मंदिर आहे की नाही; मुखपत्र म्हणून वर्तमानपत्रे, मासिके कोणती आहेत; प्रचाराची व्यवस्था कोणती; समाजाच्या वतीने चालविणा-या संस्था कोणत्या, ह्याबद्दलची माहिती अत्यंत कसोशीने गोळा करून ह्या ग्रंथात समाविष्ट केली आहे. एकंदरीत हे पुस्तक समाजाचे प्रचारकार्य करणा-यास, त्याचप्रमाणे अभ्यासकास आणि सामान्य जिज्ञासूस अत्यंत उपयुक्त झालेले आहे.

पुस्तक तयार करण्यासाठी आणि छपाईसाठी आलेला खर्च ब्राह्मो पोस्टल मिशन व बनारस येथील परिषदेच्या शिलकेतून भागविण्यात आला. कोणत्याही स्थानिक समाजावर खर्चाचा भार पडला नाही. एवढ्या परिश्रमाने तयार केलेल्या पुस्तकाबद्दल एक खंत मात्र शिंदे ह्यांच्या मनात कायम राहून गेली. ‘ही पुस्तके ब्राह्मधर्मप्रचारकांना फुकट वाटण्यात येतील, टपालदेखील पडणार नाही. फक्त त्यांनी मागणी करावी’ असे वेळोवेळी जाहीर करूनही कोणा एकाकडूनदेखील मागणी आली नाही. ह्या प्रकारच्या पुस्तकासंबंधी ब्राह्मधर्मप्रचारकांचीच असलेली ही अनास्था शिंदे ह्यांना स्वाभाविकपणेच उद्वेगकारक वाटली. पाश्चात्त्य जगातील कार्यकर्त्यांना मात्र हे पुस्तक फार महत्त्वाचे वाटून त्यांनी त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ह्या पुस्तकाच्या शेकडो प्रती मुंबई प्रार्थनासमाजात धूळ खात पडल्या होत्या हे आठवून शिंदे ह्यांनी म्हटले आहे, “ब्राह्मधर्म ही प्रार्थना करणारी संस्था आहे, प्रयत्न करणारी नव्हे, असे केव्हा केव्हा विनोदाने सांगण्यात येते. त्यात सत्याचा अंश बराच आहे, असे हा ग्रंथ जोराने पुकारीत आहे.”२

संदर्भ
१.    व्ही. आर. शिंदे, दि थीइस्टिक डिरेक्टरी अँण्ड रिव्हू ऑफ दि लिबरल रिलिजस थॉट अँण्ड वर्क इन दि सिव्हिलाइज्ड वर्ल्ड, मुंबई, १९१२.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २०६.

ब्रह्मदेशाची यात्रा

मंगलोरहून परत आल्यानंतर १९२५-२६ साली विठ्ठल रामजी शिंदे यांनी बौद्ध धर्मासंबंधी विशेष अभ्यास केला. डी.सी. मिशनपासून वियुक्त होण्याचा प्रसंग व त्यानंतर मंगलोर येथे ब्राह्मधर्माचे आचार्य म्हणून गेल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर तेथूनही पुण्यास परत यावे लागण्याची घटना, यामुळे त्यांच्या मनाला एक प्रकारची अशांतता जाणवत होती. म्हणून पुण्यास आल्यानंतर बौद्ध धर्माचाच त्यांनी विशेष अभ्यास सुरु केला. विशेषतः पाली भाषेतील धम्मपद हा ग्रंथ प्रो. चिं.वि.जोशी यांच्याजवळ वाचल्यापासून मनाला शांती वाटू लागली, असा अनुभव त्यांना आला. याचा वेळेला आपण ब्रह्मदेशाला जावे व तेथील बौद्ध धर्मातील जीवन प्रत्यक्ष पाहावे आणि स्वतः अनुभवावे हा विचार त्यांच्या मनात बळावत चालला. बौद्ध धर्माच्या जिज्ञासेबरोबर ब्रह्मदेशाबद्दल दुसरी एक जिज्ञासा विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात होती. ती म्हणजे तेथील सामाजिक स्थितीचे स्वरुप न्याहाळावे. ब्रह्मदेशातील सामाजिक व कौटुंबिक स्थितीबद्दल त्यांना कुतूहल वाटत होते. ब्रह्मदेशात तर जातिभेद नाही, स्त्री-पुरुषांत समानतेचे नाते आहे, किंबहुना स्त्रियांचा वरचष्मा आहे असे त्यांनी ऐकले होते. या दुहेरी कुतूहलापोटी शिंदे यांनी ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचे ठरविले. बौद्ध धर्माचे जीवन पाहावे, विशेषतः एकांत विहारात राहून त्या धर्माचे रहस्य अनुभवावे असाही विचार त्यांनी पक्का केला  ते ब्रह्मदेशाच्या यात्रेसाठी निघाले.


१९२७ सालच्या २४ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत कलकत्त्याला ब्राह्मसमाजाचा वार्षिकोत्सव म्हणजे माघोत्सव होता. या उत्सवाला उपस्थित राहून मग कलकत्त्याहून पुढे रंगूनला जावे असे त्यांनी योजिले. माघोत्सवामध्ये ब्राह्मधर्माच्या प्रचारकांची ऊर्फ मिशनरींची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भाषण करीत असताना शिंदे यांनी 'मी बौद्ध आहे' हे विधान केले. त्यांचे हे विधान ऐकून ब्राह्म मिशनरी बंधू चमकले. अनेकांना त्यांचे हे विधान ऐकून आश्चर्य वाटले, तर काहींना त्यांचे हे विधान रुचले नाही. याबाबतीत शिंदे यांची भूमिका स्वच्छ होती. १९०१ ते ०३ पर्यंत ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षण घेत असताना प्रो. कार्पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पाली भाषा व बौद्ध धर्म यांचा विशेष अभ्यास केला होता. धर्माच्या अभ्यासासंदर्भात एक प्रकारची ऐतिहासिक दृष्टी त्यांना प्राप्त झाली होती. १९१० साली पुण्यास 'बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार' या विषयावर व्याख्यान देताना त्यांनी बौद्ध धर्म हा आमचा बिनमोल वरसा आहे असे सांगितले होते. आपल्या हल्लीच्या धार्मिक व सामाजिक जीवनाचा बौद्ध धर्म हा एक मोठा घटक आहे, अशी त्यांची धारणा होती. आपल्या हल्लीच्या धार्मिक व सामाजिक जीवनाचा बौद्ध धर्म हा एक मोठा घटक आहे, अशी त्यांची धारणा होती. बौद्ध धर्म हा प्रत्यक्षार्थवादी (पॉझिटिव्हिस्ट), व्यवहारवादी आणि प्रागतिक आहे ह्या धारणेमुळे बौद्ध धर्माकडे त्यांचा ओढा होता. शिवाय ब्राह्याला तत्त्वत: कोणताच धर्म परका नव्हता. म्हणून ब्राह्म मिशनरीच्या सभेमध्ये त्यांनी वरील प्रकारचे उद्गार काढले. आमच्या ब्राह्मसमाजात जर वेगवेगळ्या धर्मातून माणसे येतात, तर मी बौद्ध धर्मातून आलो असलो तर त्याच वावगे काय? आज जर गौत्मबुद्ध जिवंत होऊन आले तर त्यांना तुम्ही ब्राह्मसमाजात घेणार नाही काय? या प्रकारे शिंदे यांना ह्या वादंगामध्ये युक्तिवाद करावा लागला. अध्यक्षस्थानी गुरुदास चक्रवर्ती हे बौद्ध प्रचारक होते. या विषयावर वाद माजू लागला आहे हे पाहून त्यांनी उठून सांगितले, "श्रीयुत शिंदे यांचा आध्यात्मिक भाव मनात आणा. शब्दावर वाद नको. ब्राह्मसमाज सर्वसंग्राहक आहे आणि शिंदे हे त्याचे नमुनेदार उदाहरण होय. आता ते लवकरच ब्रह्मदेशात बौद्ध धर्म पहावयास जाणार आहेत. त्यांच्या ब्राह्मधर्माचा उदारभाव पाहून तेथील मंडळींचा, त्याप्रमाणे ब्राह्मसमाजाचा फायदाच होईल."


८ फेब्रुवारी १९२७ रोजी रात्रौ शिंदे रंगूनला पोहोचले. रंगून येथील डॉ. पी. के. मुजुमदार यांच्या घरी पाहुणा म्हणून ते राहिले. ब्रह्मदेशात आल्यानंतर धर्मविचाराची देवाणघेवाण करणे हाही त्यांनी आपला एक उद्देश ठेवला होता. ११ फेब्रुवारीला रंगून येथील ब्राह्ममंदिरात त्यांनी 'धर्माचा आत्मा" ( दि सोल ऑफ रिलिजन) या विषयावर व्याख्यान दिले व १२ तारखेस उपासना चालविली. स्थानिक ब्राह्मांच्या मेळाव्यामध्ये शिंदे यांनी 'ब्राह्मबंधूंमध्ये जास्तीजास्त सहकार्य व ऐक्य निर्माण होण्याची आवश्यकता' या विषयावर भाषण दिले आणि ब्रह्मदेशात ब्राह्मधर्माचा प्रसार करण्याच्या चळवळीची आवश्यकता यासंबंधीही प्रतिपादन केले. १३ तारखेस रविवारी रंगून येथील ब्राह्मसमाज मंदिरात इंग्रजीमध्ये त्यांनी उपासना चालविली. रंगून ब्राह्मसमाजाने शिंदे यांच्या गौरवार्थ तारीख १९ रोजी बेगॉल अॅकॅडेमीमध्ये चहापार्टी दिली. दुस-या दिवसापासून त्यांनी आपल्या प्रवासाला प्रारंभ केला.१ दक्षिण ब्रह्मदेशात पाश्चात्त्य सुधारणेचे संस्कार विशेष प्रमाणात झाले होते. शिक्षण, व्यापार, राजकारण यांमध्ये ते संस्कार दिसून येत होते. तर उत्तर ब्रह्मदेशात जुने वळण प्राधान्याने प्रचलित होते. प्रथमत: दक्षिण ब्रह्मदेशामध्ये यात्रा करण्यास विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवात केली.


२० फेब्रुवारीला सकाळी रंगूनहून निघून ते मेलोमनला पोहोचले. तेथील मुख्य पॅगोडे पाहून एका वृद्ध फोंजीला(भिक्षूला) भेटून त्याचा मठ पाहिला. नंतर थाईन या इतिहासप्रसिद्ध गावी शिंदे गेले. तेथे एक हजार फूट उंचीवर टेकडीवर असलेला म्या दबे नावाचा रमणीय पॅगोडा पाहिला. ह्या निर्जन आणि एकांतस्थळी शिंदे यांची ध्यानधारणा चांगल्या प्रकारे झाली. तेथील एक विहारात उ कोडन्ना नावाच्या फोंजीला ते भेटले. ते पूर्वाश्रमीचे डेप्युटी कलेक्टर होते. कोणाही प्रांपंचिक गृहस्थास काही काळ बुद्ध भिक्षूची दीक्षा घेऊन परत गृहस्थाश्रमास जाण्याला मुभा असते. ह्या सवलतीला अनुसरून उ कोडन्ना यांनी विश्रांतीसाठी आणि अध्ययनासाठी हा चतुर्थ आश्रम स्वीकारला होता. कोडन्ना यांची भेट शिंदे यांच्या मनाला फार समाधान देणारी वाटली. त्यांच्या भेटीने शांती आणि गंभीरपणा ह्याचा परिणाम त्यांच्या मनावर झाला. त्या विहाराचे वातावरणही आध्यात्मिक भावनांनी भारलेले होते. ह्या वातावरणाचा परिणाम होऊन विठ्ठल रामजी शिंदे यांना वाटले की, आपणही काही काळ बौद्ध धर्माची उपसंपदा (दीक्षा) घ्यावी. उ कोडन्ना हे विचारात अगदी नवीन वाटले. शिंदे यांनी त्यांना विचारले, "बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, ही तीन शरण्यरत्ने आहेत खरी. पण बुद्धालाच तेवढे शरण जाऊन माझा बौद्ध धर्मात प्रवेश होऊ शकणार नाही काय? आणि तुम्ही मला दीक्षा देऊ शकाल काय?" शिंदे यांच्या प्रश्नावर त्यांनी स्मितपूर्वक उत्तर दिले, "तुमचा आध्यात्मिक भाव पाहून मला आनंद वाटतो. तुम्हाला बाह्म उपसंपदेची जरूरी तरी काय उरली? शिवाय दीक्षा देण्याचा अधिकार मला नाही. तो मठाधिपतीकडे असतो. मी अद्यापि साधकच आहे.

एकंदरीत तुमच्या भेटीमुळे मला मोठे समाधान झाले." बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची प्रबळ उर्मी अण्णासाहेबांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तिचा आविष्कार अशा प्रकारे झाला.


२४ फेब्रुवारीला ते पेगूला गेले. तेथे श्वे थ याँ बुद्ध ( उजव्या हातावर मान टेकून निजलेला मोठा पुतळा) पाहिला. मोलेमन, थाटन आणि पेगू अशी स्थळे पाहून २५ ला सायंकाळी ते रंगूनला परत आले व मुजुमदार यांचे पाहुणे म्हणून राहिले. तारीख २६ ला रामदासनवमी होती. त्याचप्रमाणे तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथीही त्याच दिवशी होती. या निमित्ताने सायंकाळी महाराष्ट्र मंडळाच्या विद्यमाने अण्णासाहेबांनी मयेकर यांच्या घरी 'महाराष्ट्र धर्म' या विषयावर कीर्तन केले. ह्या कीर्तनासाठी त्यांनी मुद्दाम पुढील पद तयार कले. हे पद तयार करताना तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आहे, ही गोष्ट त्यांनी मनात वागविली.

महाराष्ट्र धर्म


बंधु हो भवाचा किल्ला    सर करणे आम्हा सकला ।।धृ।।
सिंहगड तो एकची नोहे    महाराष्ट्रामधला साचा ।।
तान्हाजि नव्हे एकुलता    शेलार मामाचा भाचा ।।
श्री शिवाजी होऊनि गेला   कधी काळी इतिहासाचा ।।


अशी गोष्ट न बोला कधीहि ।।
जीवन ये युद्धहि पाही ।।
दिनरात अंतरी बाहीं ।।


मग काहो स्वस्थसे बसला? ।।१।। बंधुहो...
संत आजवरी जे झाले ते संत नव्हत शिपाई ।।
भव-रणांगणा माझारी झुंझती ते ठाईठाई ।।
येरयेरा देती हाक या म्हणती आम्हालाहि ।।


आम्ही पहा कसे हे भ्रांत ।।
ठेवुनि कपाळी हात ।।
करितसे स्वत:चा घात ।।
चला उठा लागू कामाला ।।२।। बंधुहो...


जग नव्हे मराठ्यापुरते, पसरे ते अनाद्यनंती
राहणीचे जे जे साधे स्वार्थाबहिर जे पाहती ।।
सत्याची भूक जयांना अन्याया जे ना सहती ।।


ते सर्वची अस्सल मराठे ।।
कालदेश केव्हा कोठे ।।
सोडा हे विचार झूट ।।
महाराष्ट्र धर्म अपुला ।।३।। बंधुहो...


रामदास स्वर्गातुनिया ऐकुनि हे आनंदेल ।।
तान्हाजि शिवाचा कलिजा राखेतुनि पुन: उठेल ।।
तुक्याची म-हाटी वाणी कानीमनीं गुंजेल ।।


मग मी-तुपणाचे वारे ।।
निवारुनि जाईल सारे ।।
जगि उठा तुम्ही बारे ।।
महाराष्ट्र । जय जय बोला ।।४।। बंधुहो...


शिंदे यांनी या प्रसंगी गायिलेल्या प्रस्तुत पदावरुन त्यांनी भाषणात केलेल्या प्रतिपादनाची कल्पना येऊ शकते. आपले संत म्हणजे संत नसून संसाररुपी युद्धभूमीवर रात्रंदिवस लढणारे शूर शिपाई होत. सत्यासाठी, नैतिक आचरणासाठी त्यांचा सदैव लढा चाललेला असे ही भूमिका ते विशद करतात. त्याचप्रमाणे मराठा म्हणजे कोण ह्याबद्दलची व्यापक कल्पना ते मांडतात. ज्यांची ज्यांची राहणी साधी आहे; जे स्वार्थाच्या पलीकडे बघतात; ज्यांना सत्याची भूक आहे व ज्यांना अन्याय असह्म वाटतो, ते सर्व अस्सल मराठे होत. मग ते कोणत्याही काळातील व कोणत्याही देशातील असोत. अशा मराठ्यांचा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म होय असे व्यापक स्वरुपाचे प्रतिपादन त्यांनी केलेले दिसते.

 

महाराष्ट्रापासून दूर ब्रह्मदेशासारख्या ठिकाणी असणा-या वेगवेगळ्या जातीच्या मराठी भाषिक मंडळींना त्यांचे हे प्रतिपादन आणि उन्नत विचार स्वाभाविकपणे आवडले असणार.
ब्रह्मदेशातील आपल्या ह्या मुक्कामात विठ्टल रामजी शिंदे विविध महत्त्वपूर्ण विषयांवर श्रोत्यांच्या स्वरुपानुसार भाषणे देत होते. २ मार्चला मिसेस मुजुमदार यांनी आपल्या घरी काही बायकांना बोलावले होते. ह्या स्त्रियांच्या पुढे त्यांनी 'महाराष्ट्रातील बायकांची कामे' ह्या विषयावर भाषण केले. आपल्या कुटुंबव्यवस्थेत स्त्रियांची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते याचे शिंदे यांनी वेळोवेळी आपल्या लेखनातून तसेच भाषणातून प्रतिपादन केलेले आहे.


मुख्यत: कौटुंबिक पातळीवरील महत्त्वाचे निर्णय घेणे व मुलांवर योग्य संस्कार करणे हे मौलिक स्वरुपाचे काम आपल्याकडील स्त्रिया करीत आलेल्या आहेत व जिजाबाईंसारख्या स्त्री-रत्नांची परंपरा महाराष्ट्रात पूर्वीपासून आहे असे त्यांचे मत होते. या स्वरुपाचे स्त्रियांना रुचेल असे व अमलात आणता येऊ शकेल अशा प्रकारचे प्रतिपादन विठ्ठल सामजी शिंदे यांनी केले असावे. तारीख ५ मार्च रोजी लक्ष्मीनारायण धर्मशाळेत 'बृहद् हिंदू धर्म आणि जनतेचा उद्धार' या विषयावर इंग्रजीत भाषण केले.


६ मार्च १९२७ रोजी अण्णासाहेबांनी 'महाराष्ट्र मित्रमंडळी'च्या वार्षिक सभेत अध्यक्ष या नात्याने भाषण केले. त्यांच्या भाषणाचा विषय 'हिंदू धर्माची जागृती' हा असावा असे उपलब्ध टिपणावरुन दिसून येते.२ अण्णासाहेबांनी 'हिंदू धर्माची जागृती' ह्या विषयावर दिलेल्या व्याख्यानात ऐतिहासिक दृष्टिकोणातून हिंदुस्थानात झालेल्या धर्मविषयक उलाढालींचा वेध घेत मौलिक स्वरुपाचे विचार मांडले. ह्या टिपणात हिंदू धर्माचे विशेष नोंदविले आहेत, ते अस: १) अनैतिहासिक २) व्यापक ३) संग्राहक ४) म्हातारा धर्म आणि ५) झोपाळू. टिपणात पुढे त्यांनी नमूद केले आहे की, हिंदू, ख्रिस्ती, मुसलमान, चिनी, बौद्ध, जैन वगैरे भिन्न धर्म नाहीत. धर्म एक; पंथ निराळे.


मोक्षधर्म आणि व्यवहारधर्म असा भेद कल्पून त्यांनी म्हटले आहे. मोक्षधर्म सर्वत्र एकच. तरी व्यवहारधर्मामुळे पंथ निराळे. एकं सत् विप्रा: बहुधा वदंति.


मोक्षाची बाजू सनातन असल्याने तिला झोप नाही व ती असामान्य ऋषिप्रणीत आहे. पण व्यावहारिक बाजूत मात्र झोप व जागृती असे हेलकावे (दिसतात.)


धर्माची सुधारणा म्हणून जी आहे ती ह्या व्यावहारिक ऊर्फ युगधर्मातच आहे. इतर धर्मपंथ जन्मण्यापूर्वी म्हणजे बुद्धकालीच हिंदू धर्मपंथाला म्हातारपण आले. बौद्ध व जैन धर्म ही पहिली सुधारणा ऊर्फ जागृती. बौद्ध सुधारणा ही जुनी झाल्यावर भागवत धर्माची दुसरी जागृती. हल्लीच्या (प्रार्थना) समाजधर्माच्या हेटाळणीप्रमाणेच सर्व पूर्व जागृतीचीही (हेटाळणी) झाली. झोपाळू मनुष्य झटकन न उठता आळेपिळे देतो तशीच ही हेटाळणी आहे. एक जागा झाला म्हणजे दुस-या झोपाळूची थट्टा करतो.


शंभर वर्षांत ह्या समाजाने जी कामगिरी केली ती आज म्हातारा हिंदू धर्म आता कबूल करीत आहे. ७ मार्च रोजी ते उत्तर ब्रह्मदेश पाहण्यासाठी मंडालेला निघाले. ८ मार्च रोजी मंडालेला पोहोचल्यानंतर दत्तात्रय सखाराम नागवंशे यांच्याकडे त्यांनी मुक्काम केला. नागवंशे हे मंडाले-मदाया रेल्वेत उपविभागीय अधिकारी होते. अहमदाबादचे डॉ. पायगुडे हे त्यांना भेटले. तारीख १० ला मंडाले येथील टेकडीवर श्वे या दो बुद्धाचा २५ फूट उंचीचा हात वर करुन उभा असलेला पुतळा पाहिला. मंडाले येथील मुख्य देवळातील महात्मा मुनीचा (बुद्धाचा) भव्य पितळी पुतळा तारीख ११ रोजी पाहिला. ह्या देवळामध्ये भाविकांची सतत गर्दी असे. बाहेरच्या अंगणात असलेल्या स्वच्छ तळ्यातून जिवंत मासे धरून काही लोक विक्रीस ठेवीत, आपण ते विकत घेऊन पुन्हा पाण्यात सोडल्यास पुण्य लागते अशी भाविक लोकांची समजूत असे. शिंदे यांनी म्हटले आहे, "पुन्हा पुन्हा तेच तेच मासे धरल्याने ते इतके माणसाळून गेले होते की, ते आपोआप टोपलीत येऊन पडत."


मंडाले येथील मुक्कामात शिंदे यांनी जुन्या राजाचा वाडा पाहिला. टिळकांना जेथे ठेवले होते तो राजकीय तुरुंगही पाहिला. अण्णासाहेब शिंदे जेथे जातील-मग ते पॅरिस असो की मंडाले असो-तेथील समाजशास्त्रज्ञांची आवर्जून भेट घेत असत व त्यांच्याकडून नवी माहिती मिळविण्याचा व आपले कुतूहल पूर्ण करुन घेण्याचा प्रयत्न करीत असत. मंडालेहून काही अंतरावर मेमियो हे हवा खाण्याचे सुमारे ३५०० फूट उंचीवर वसलेले ठिकाण आहे. तेथे टॉ सिन को या नावाच्या वास्तुशास्त्रज्ञाकडे एक दिवस त्यांनी पाहुणा म्हणून व्यतीत केला. हे विद्वान त्यांना ब्रह्मदेशाचे डॉ. भांडारकरच वाटले. त्यांच्याशी ब्रह्मी पुरातत्त्व वास्तुविषयासंबंधी शिंदे यांनी विचारविनिमय केला. शिंदे यांची फकिरीवृत्ती दिसत असूनही त्यांच्या ठिकाणी असलेली शोधक बुद्धी पाहून त्यांना आश्चर्य वाटले व तसे त्यांनी बोलून दाखविले. हे विद्वान गृहस्थ युरोपियन थाटात राहत असत. टेबलावर जेवीत असताना शिंदे यांनी एका चमत्कारिक विषयाबद्दलची पृच्छा केली. ब्रह्मी लोक मृतमांस खातात असे त्यांनी ऐकले होते. परंतु अधिकारवाणीने कोणी उलगडा अद्यापि त्यांच्याजवळ केलेला नव्हता म्हणून हा विषयमोठ्या नम्रपणे टॉसाहेबांकडे काढला. ब्रह्मी माणसे मृतमांस खातात हे त्यांनी कबूल करुन सगळीच माणसे मेलेल्या जनावराचेच मांस खातात, मग तो प्राणी मेलेला असो की मारलेला असो, असे एक प्रकारच्या आक्रमकपणाने सांगितले. खाते वेळी त्या प्राण्याचे मांस शुद्ध असणे महत्त्वाचे होय असे त्यांनी सांगितले.

Read more: ब्रह्मदेशाची यात्रा

बालपण

हायस्कूलचे शिक्षण
विठ्ठल रामजींच्या लहापणीच त्यांच्या घराची सुबत्ता जाऊन ते दुर्धर दारिद्र्याच्या फेर्‍यात सापडले होते.  असे असले तरी ह्या दारिद्र्याचे सावट त्यांच्या बाल्यावर पडले नाही.  ह्याचे प्रमुख कारण म्हणजे आईचे प्रेमळपणाने ओतप्रोत भरलेले अंतःकरण व तिची स्वाभाविक आनंदी वृत्ती याचा अखंड अनुभव त्यांना मिळत होता.  त्याचप्रमाणे, दुसरे कारण म्हणजे दारिद्र्याच्या प्रतिकूल स्थितीतही त्यांच्या वडिलांची टिकून राहिलेली उदार मनोवृत्ती व त्यांनी शाबूत ठेवलेला प्रतिष्ठितपणा.  आई-वडिलांच्या प्रेमळ, उदार सहवासात लहानग्या विठूचे बालपण गेले व त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध अंगांचे पोषण झाले.

विठ्ठलाचे वय पाच-सात वर्षांचे असताना त्याचे आजोबा बसवंतराव वारले.  तेव्हापासून अकरा वर्षांचे वय होईपर्यंतची म्हणजे इ. स. १८७९ पासनू १८८४ पर्यंतची पाच वर्षे ही त्याच्या प्राथमिक शिक्षणाची होती.  वडिलांनी लहानग्या विठूच्या शिक्षणाच्या आरंभाचा एक लहानसा विधी साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एका शुभमुहूर्तावर करविला.  त्यासाठी त्यांनी रा. बाळा काणे नावाच्या शिक्षकांना बोलाविले.  त्यांनी 'श्रीगणेशाय नमः' हा धडा लहानग्या विठूचा हात धरून गिरविला.  प्राथमिक शाळेत लहान वयामुळे स्वाभाविकपणेच त्याचे फारसे लक्ष लागले नाही.  मराठी शाळेत चौथीनंतरही पाचवीचे एक वर्ष त्याला घालवावे लागले.  त्यामुळे मराठी कवितेत आणि गणितात त्या वेळच्या मानाने त्याची बरीच प्रगती झाली.  मोरोपंतांच्या आर्यांचा अर्थ आणि व्याकरण त्याला चांगले कळत असे.  कुणी शाळा पाहावयास आले म्हणजे त्याच्याकडून पंतोजी कविता म्हणून घेत असत व लहानगा विठू त्या चांगल्या सुरावर व ऐटीत म्हणत असे.

विठूच्या आयुष्यातील १८८५ ते १८९१ अखेरची सात वर्षे महत्त्वाची होती.  हा त्याच्या हायस्कूल शिक्षणाचा काळ.  विठूच्या वृत्तीत फरक पडावा अशी एक घटना १८८५ च्या पावसाळ्याच्या आरंभी घडली.  ती म्हणजे त्याचा वडील भाऊ परशुराम ह्याचा अकाली झालेला मृत्यू.  त्यामुळे विठूच भावंडांमध्ये वडील झाला आणि त्याचा बालपणाचा हूडपणा कमी होऊन तो गंभीर, विचारी व अभ्यासी बनला.  त्या वेळी त्याला नुकतेच अकरावे वर्ष संपून बारावे वर्ष लागले होते.

विठ्ठलाने हायस्कुलात प्रवेश केला त्या वेळी श्री. त्रिंबकराव खांडेकर यांना पुण्याहून हेडमास्तरांच्या जागेवर आणले होते.  त्यांचा स्वभाव सुशील, नेमस्त, गंभीर आणि करारी होता.  त्यामुळे गावात व दरबारात त्यांचा एक प्रकारचा दबदबा होता.  शाळेला हायस्कूलचा पूर्ण दर्जा मिळाल्यानंतर श्री. वासुदेवराव चिरमुले बी.ए. हे पहिले पदवीधर शिक्षक शाळेला लाभले.  हायस्कूलमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिले वर्ष विठ्ठलाला जड गेले.  दुसर्‍या वर्षांपासून मात्र इंग्रजी भाषेची व इतर सर्वसामान्य विषयांची त्याला गोडी लागली.  शिक्षक सहानुभूतीने शिकविणारे होते.  विठ्ठलाची हुशारी पाहून ते त्याचे कौतुक करू लागले.  मराठी शाळेहून हायस्कूलमधील वातावरण वेगळे असल्याने व शिक्षकवर्गाकडून कौतुक होत असल्यामुळे त्याचे मन शाळेच्या अभ्यासात आणि वातावरणात चांगलेच रमले.

इंग्रजीच्या अभ्यासामुळे एक नवेच विश्व विठ्ठलाच्या ग्रहणशील मनासमोर खुले झाले.  तिसर्‍या इयत्तेपासून इंग्रजी राहणीचे धडे त्याला वाचायला मिळत.  इंग्रजी शेताचे वर्णन, इंग्रजी झाडाझुडपांची नावे, इंग्रजी खेडी, इंग्रजी कुंपणावरील निरनिराळ्या जंगली वेली, फुले वगैरे नवीन देखावे वेगळ्या प्रकारचा आनंद त्याच्या मनाला देऊ लागले.  श्री. आप्पा काळे हे रसिकतेने शिकवीत व विठ्ठल समरसून शिकत असे.  इंग्रजी चौथ्या इयत्तेवर त्याचे आवडते शिक्षक श्री. आप्पा काळे हे पुन्हा आले.  सँडफर्ड ऍंड मर्टन  हे अभ्यासक्रमातील पुस्तक त्यांना फार आवडे.  त्यामधील नवीन व उदार विचार, बाळबोध भाषा, इंग्रजी पोशाखाची, राहणीची व वनश्रीची शब्दचित्रे यांमुळे इंग्रजी राहाणीविषयी त्याचे कुतूहल दिवसेंदिवस वाढू लागले.  योगायोगाने तरुणपणी विठ्ठल रामजी हे इंग्लंडातील उत्तमोत्तम अशा ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात दोन वर्षे राहिले.  तेव्हा तेथील खेड्यापाड्यांत जाऊन शेतात, कुंपणात फिरून त्यांनी जे देखावे पाहिले त्याची पूर्वस्वप्नेच जणू काय जमखंडीसारख्या खेडवळ शाळेतील क्रमिक पुस्तके वाचत असताना पडत होती.  पाचव्या इयत्तेत लँबस् टेल्स  या पुस्तकाद्वारा त्यांची कविकुलगुरू शेक्सपियरची भेट झाली.  सहाव्या इयत्तेत रीडिंग्ज फ्रॉम द स्पेक्टेक्टर  हे पुस्तक श्री. चिरमुले यांनी त्यांना शिकविले; यात ऍडिसनच्या खर्‍या बाळबोध इंग्रजीचा व ताज्या विचारांचा नमुना त्याला कळाला.  अशा तर्‍हेने ग्रहणशील वयातच त्याच्या हृदयावर इंग्रजी भाषेचाच नव्हे तर इंग्रजी संस्कृतीचा अनुकूल असा परिणाम झाला.

एखादा विद्यार्थी शालेय अभ्यासक्रमातून उत्कट स्वरूपाचा आनंद घेऊ शकतो ही गोष्ट दुर्मीळच म्हणावी लागेल.  विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ठिकाणी त्या वयातही असणारी तरल संवेदनशीलता व तीव्र ग्रहणशीलता यांमुळे ह्या हायस्कूलमधील अभ्यासक्रमातून ते अपूर्व असा आनंद घेऊ शकत होते.  त्यांनीच या अनुभवाचे वर्णन केलेले आहे.  ''पाचव्या इयत्तेत संस्कृत, बीजगणित आणि भूमिती आणि सहावीत रसायन, यंत्रशास्त्र, भूगोल, खगोल इत्यादी आधुनिक शास्त्रांची मूलतत्त्वे ह्यांचा उपक्रम झाला.  एखाद्या मनोर्‍यावर चढत असताना प्रत्येक मजल्याभोवतालचे क्षितिज अधिकाधिक विस्तीर्ण होऊन ज्याप्रमाणे जास्त प्रदेश दृष्टीच्या टापूत येतो व आनंद वाटतो त्याप्रमाणे माझा हा हायसकूलमधील अभ्यासक्रम मला फार चित्तवेधक व बोधकारक झाला.  त्यामुळे माझ्या घरातील भयानक दारिद्र्याच्या वेदना मला कधीच भासल्या नाहीत, की माझ्या शिशुदशेच्या सहजानंदात कधी खंड म्हणून पडला नाही.  ह्या माझ्या सदानंदी उत्साहामुळे माझ्या आईबाबांचे दुःखही हलके झाले.''१

इंग्रजीचा प्रभाव जरी विठ्ठलावर उत्कट स्वरूपात पडला असला तरी तो मराठी भाषेला व संस्कृत साहित्याला मुळीच पारखा झाला नाही.  त्याच्या रसिकतेत पक्षपातीपणा नव्हता.  उलट व्यापकता होती.  रघुनाथ पंडितांच्या नलदमयंती आख्यानाचा आणि नवनीतातील अन्य कवितांचा ठसा त्याच्या मनावर उमटला.  त्यामधील कविता तो आपल्या आईला व बहिणींना म्हणून दाखवून मोठ्या रसिकतेने अर्थ सांगे.  मराठीवरील अकृत्रिम प्रेम वाढण्यास अधिक साधने घरीच होती असे विठ्ठल रामजी नमूद करतात.  श्रीधर, महिपती, तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे मराठी कवींच्या आणि संतांच्या ग्रंथांचे पारायण स्वतः त्यांचे बाबा करीत असत.  ते वाचून इतरांस पुराणिकांप्रमाणे अर्थ सांगत असत.  विठ्ठलही आपल्या वडिलांचे अनुकरण करून हरिविजय-पांडवप्रतापासारखे ग्रंथ चौथ्या-पाचव्या इयत्तेतच वाचून आपल्या वर्गातील मुलांना त्याचा अर्थ सांगत असे.

सहाव्या इयत्तेत संस्कृतचा त्याचा परिचय झाला.  श्री. गणेशशास्त्री जोशी या नावाचे जुने शास्त्री त्यांना संस्कृत वाङ्‌मय शिकवीत असत.  अधिक वाचन करण्याच्या हेतूने शास्त्रीबुवांच्या घरी इतर विद्यार्थ्यांसमवेत विठ्ठल जात असे.  शास्त्रीबुवा गोठ्यात गाईचे शेण काढीत असताना तोंडात तंबाखूचा बार भरून, त्याच्या मधून मधून पिचकार्‍या मारीत, इतके तिकडे फिरत या मुलांना रघुवंशातील श्लोक सांगत.  बाणभट्टाची कादंबरी  आणि अन्य वाङ्‌मय गणेशशात्र्यांनी अत्यंत रसिकतेने या विद्यार्थ्यांना शिकविले.  आपण जातीने मराठी म्हणून शास्त्रीबुवांनी कधीही भेदभाव दाखविला नाही असे विठ्ठल रामजींनी आवर्जून नमूद केले आहे.

हायस्कूलमध्ये विठ्ठल रामजींनी अभ्यासात जी गती दाखविली तिचे श्रेय ते आपल्या रसिकतेला देतात; बुद्धिमत्तेला नव्हे.  त्यांनी म्हटले आहे की, ''गणित असो वा शास्त्र असो, भाषा असो वा व्याकरण असो, परकीय इंग्रजी असो वा मृत संस्कृत असो की मातृभाषा चालू मराठी असो, माझी गती सारखीच अकुंठितपणे चाले.  सर्व हायस्कूलच्या अभ्यासक्रमात मला अभ्यासाचे श्रम म्हणून कधी भासलेच नाहीत.  ह्याचे कारण माझ्या बुद्धीचे तेज नसून (मी बुद्धीने साधारणच आहे) केवळ माझ्या हृदयाची निर्मळ रसिकताच होय, हे मला येथे नमूद करावयाचे आहे.  ही रसिकता मला शाळेपेक्षा घरातच अधिक, गुरूपेक्षा माझ्या आईबापांकडूनच जास्त मिळाली हे खास.  माझ्या घरी जातिभेद नव्हता, तसा माझ्या हृदयात संस्कृतिभेदाचा किंवा पक्षपाताचा कृत्रिमपणाही नव्हता.  सौंदर्य जेथे भेटेल तेथे ऊर्ध्वहस्ताने स्वीकारण्यास मी लहानपणापासूनच एका पायावर तयार आहे.  मग ते इंग्लंडातले असो की स्वदेशातले असो, शहरातले असो की खेड्यातले असो, संस्कृत असो की प्राकृत असो, ते सहज व स्वाभाविक असले की पुरे.  मी त्याला बिलगलोच म्हणून समजावे.''२

सोबती व खेळ
इंग्रजी पहिल्या इयत्तेत असताना विठ्ठलाचा वडील भाऊ परशुराम हा अकाली मृत्यू पावला हा त्याच्या मनावर मोठाच आघात होता.  जोपर्यंत हा वडील भाऊ जिवंत होता तोपर्यंत त्याच्या मागे मागेच दुय्यमाप्रमाणे लहान विठ्ठल वागत असे. आपल्याला सांभाळून घेणारा शांत स्वभावाचा वडील भाऊ परशुराम वारल्यानंतर विठ्ठलाला एकाएकी उघडा पडल्यासारखे वाटले.  भाऊ होता तोपर्यंत भावंडे हेच त्याचे मित्रमंडळ होते.  दुसर्‍या इयत्तेत गेल्यानंतर व अभ्यासात प्रगती दिसू लागल्यानंतर, वर्गात कायमचा पहिला नंबर पटकावीत राहिल्यानंतर विठ्ठलाभोवती सोबत्यांचा घोळका कायम जमू लागला.  सुरुवातीला त्याच्या मित्रमंडळात मराठा, लिंगायत, न्हावी, मुसलमान अशी मुले असायची.  तो वरच्या वर्गात जाऊ लागल्यानंतर ब्राह्मणेतर मित्रमंडळी मागे पडून ब्राह्मण मुलांची मित्रमंडळात संख्या वाढली.  विठ्ठल रामजींचा वाडा एकीकडे निवांत होता.  अभ्यासाला बसावयाला जागा पुष्कळ होती.  पुस्तकांचा साठा भरपूर.  अभ्यासात अडचण आली तर सांगायची विठ्ठलाची सदैव तयारी.  सोबत्यांवर अकृत्रिम प्रेम करणारे आईबाप, यामुळे विठ्ठलाच्या भोवती सदैव सोबत्यांचा गराडा असायचा.  अभ्यास करीत करीत खेळ आणि खेळत खेळत अभ्यास असा ह्या मुलांचा कार्यक्रम असायचा.  तिसर्‍या इयत्तेपासून सातवीअखेर पाच वर्षांपर्यंत त्यांचा वाडा म्हणजे एक अनरजिस्टर्ड शाळा, एक मोफत वाचनालय, एक मुक्तद्वार विद्यार्थी वसतिगृह, एक धांगडधिंग्याचा जिमखाना होता असे त्यांनी वर्णन केले आहे.  त्यांच्या मित्रमंडळात तिसर्‍या-चौथ्या इयत्तेत दामू रानडे, सखाराम गोखले, वामन घारे यांची भर पडली.  तर पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून विष्णू देशपांडे, हणमंत कुलकर्णी, रामू पाटील, अंतू हनगंडी इत्यादिकांची भर पडली.  मुधोळच्या शाळेतून आलेली ही सर्व मुले देशस्थ ब्राह्मणांची होती.  त्यांच्या आईबापांनी एका घरी जेवणा-राहण्याची त्यांची सोय करून दिली होती.  ती सर्व विठ्ठल रामजींच्या घरी त्यांच्या भावंडांप्रमाणे नेहमी पडून असत.  सातव्या इयत्तेत कुंदगोळाहून जनार्दन सखाराम करंदीकर हे जमखंडीच्या शाळेत आले.  पुढे ते व विठ्ठल रामजी बी. ए. पर्यंत बरोबर शिकत असत.  अखेरपर्यंत ते त्यांचे स्नेही होते.  तेरदाळचे विष्णुपंत देशपांडे हे तर विठ्ठल रामजींचे आयुष्यभराचे जिवलग मित्र राहिले.  या हायस्कूलच्या काळातच ह्या मित्रमंडळींच्या सहवासात विठ्ठल रामजींच्या ठिकाणी असणारी  पुढारपणाची क्षमता दिसून येते.  त्यांची अनेकांना बरोबर घेऊन जाण्याची तयारीही याच काळात झाली असे जाणवते.

खेळ
विठ्ठलाचा स्वभाव आणि शील बनण्यात सोबत्यांच्या सहवासाचा त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबरच्या खेळाचा मोठा भाग होता.  एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात जमखंडी गाव खेडेवजाच होते.  खेळायला मोठमोठी क्रीडांगणे व खेळ शिकविणारे शिक्षकही होते.  पण खेड्यांतील संस्कृतीमध्ये साधनांवर अवलंबून असणारे खेळ खेळता येत नसले तरी साधनाशिवायचे खेळ नैसर्गिक वातावरणात मनसोक्त खेळले जात.  विठ्ठलाचे बाबा स्वतः फारसे बैठे खेळ खेळत नसले तरी त्यांनी गंजीफा, बुद्धिबळे, सोंगट्यांचे हस्तिदंती फासे वगैरे खेळांची साधने घरी करून ठेवली होती.  लहानपणी विठ्ठल बैठा खेळ खेळायचा तो म्हणजे सोंगट्यांचा.  त्याचा वडील भाऊ होता तेव्हा दिवाळीच्या सणात सोंगट्यांच्या खेळाची धमाल चालू असे.  हा खेळ मोठ्या ईर्षेचा.  चिडून भांडल्याशिवाय या खेळाची समाप्‍ती व्हायची नाही.  एका एका बाजूला दहा-बारा गडी बसलेले असायचे.  खेळ संध्याकाळी चालू होऊन उजाडेपर्यंत चालायचा.  भांडण केव्हा केव्हा हातघाईवरही यावयाचे.  त्यांचा आलगूरचा मामा वडील भावापेक्षा एक-दोन वर्षांनी मोठा होता.  तो विरुद्ध बाजूला असे.  मामा फार विनोदी, रडी खेळणारा, चिडखोरांना अधिक चिडवून मजा बघणारा आणि पट्टीचा पहिलवान, दुसर्‍याला चिडवून स्वतः मात्र कधीच चिडत नसे.  भांडण हातघाईवर आल्यावर गलिव्हरच्या अंगावरील लिलिपुटाप्रमाणे विठ्ठल आणि परशुराम हे दोघे बंधू मामाच्या पाठीवर चढून लाथा-बुक्क्यांचा मारा करीत आणि मामा मात्र खाली वाकून त्यांना अधिकच खिजवीत असे.  स्वयंपाकघरातून आई येऊन आपल्या भावालाच नावे ठेवीत हे गमतीचे भांडण सोडवीत असे.  मोकळ्या जागेत खेळावयाचे मैदानी खेळ म्हणजे आट्यापाट्या, हुतुतू, खो-खो हे खेळही मुले खेळत असत.  त्याशिवाय किर्र नावाचा आडदांडपणाचा खेळही खेळायचे.  त्याशिवाय सूरपारंब्या, सूरपाट्या हे खेळ हमखास दुखापती करून देणारे, कपडे फाटणारे खेळ मोठ्या हिरिरीने खेळत असत.  ह्या खेळणार्‍या मुलांच्या टोळीचा मुख्य नायक म्हणजे विठ्ठल.  गावचे लोक, विशेषतः शिक्षक मंडळी, ह्या मुलांच्या खेळाचे कौतुक करीत असत.  विठ्ठल हा खेळगड्यांचा कंपू घेऊन दरसाल उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कुठेतरी नदीच्या काठी किंवा डोंगराच्या दरीत वनभोजनाला जात असे.  त्यांच्यात लिंगायत, मराठे, ब्राह्मण, मुसलमान वगैरे सर्व जातींचे विद्यार्थी असत.  जातिभेद त्यांच्या गावी नव्हता.  सोवळी पोरे ह्या कंपूच्या वार्‍यालाही उभी राहत नसत.  जनुभाऊ करंदीकर असल्या सोवळ्याचा होता.  विठ्ठलाच्या वाड्यात हा कंपू रात्रंदिवस पडलेला असे.  मोठ्या अंगणापासून आत स्वयंपाकघरापर्यंत व देवघरापर्यंत त्यांचा धुडगूस चाले.  विठ्ठलाच्या दोन बहिणी जनाक्का व तान्याक्का ह्या लहान अल्लड असत.  त्याही मुलांच्या धांगडधिंग्यात सामील होत.  विठ्ठलाच्या आईला कोणीच भीत नसत.  तिला सर्व आपलीच पिले वाटत.  कित्येक वेळा स्वयंपाकघरातील खाण्याच्या पदार्थावर हल्ला होई.  त्यांचे गरिबीतील शिळे तुकडे तेरदाळचा विष्णू आणि जमखंडीचा सिनू ही श्रीमंतांची मुले मिटक्या मरीत खात.  मग विठ्ठलाच्या आईला अपरंपार प्रेम वाटणे स्वाभाविक होते.  विठ्ठल रामजींच्या भावी चरित्राची, समाजसुधारणेची ही पूर्वचिन्हेच होती.  त्याचे चरित्र असे अंगणातल्या जिवंत धांगडधिंग्यात आणि समानशील सवंगड्यांच्या धसमुसळेपणाच्या जिव्हाळ्यात जन्म पावत होते.

लहान विठ्ठलाच्या वर्तनातील वेगळेपणा, धाडशीपणा व विक्षिप्‍तपणा त्याच्या लहानसहान खोड्यांतून दिसून येत असे.  (जमखंडीचे श्रीमंत अप्पासाहेब यांनी रामतीर्थ ह्या डोंगरावर आपली वस्ती मांडली व बसवन्ना या लिंगायत देवाची यात्रा रामतीर्थ लोकप्रिय करण्यासाठी वर डोंगरात आपल्या राहण्याच्या जागी नेली.).  रामतीर्थास जाण्यासाठी एक वरची डोंगराची व दुसरी खालची सपाट, गाड्या वगैरे जाण्यासाठी, अशा दोन वाटा असत.  ह्या दोन्ही वाटा सोडून अगदी डोंगराच्या माथ्यावरून मेलगिरी लिंगाप्पाच्या देवळामागून रामेश्वराच्या देवळाला जाण्याची नवी टूम विठ्ठलाने काढली.  ह्याचे कारण पावसाळ्यात डोंगरावरची व भोवतालच्या दूरवर मैदानी प्रदेशातील शोभा फार सुंदर दिसत असे.

विठ्ठलाच्या लहानपणीच्या वागण्यात धाडशीपणा आणि अर्कटपणा कधी कधी डोकावत असे.  रामतीर्थ डोंगरावर विषारी काळे विंचू अथवा इंगळ्या भरपूर असत.  ह्या इंगळ्यांनी नांगी मारली की प्राणांतिक वेदना होत असत.  हे विंचू धरून त्यांची लांबलचक माळ करण्याची खोड या मित्रमंडळाला लागली होती.  विठ्ठल विंचू धरण्यात धीट आणि पटाईत होता.  विंचवाच्या नांगीतले विष काढून त्याला अगदी तळहातावर घेऊन इतर मुलांना चकित करीत असे.  विंचू नजरेस पडला तर तो आपली नांगी प्रथम वर करतो.  विठ्ठल मोठ्या शिताफीने ती नांगी चिमटीत घट्ट पकडत असे.  मग नखावर त्याच्या नांगीचे टोक घासले म्हणजे विषाचा एक बिंदू बाहेर निघे.  मग विंचू निस्तेज होऊन आपोआप नांगी खाली टाकी.  मग त्याला हातावर घेण्यात कोणताच धोका नसे.  तरीही इतर मुले हे धाडस दाखवीत नसत.  विठ्ठल मात्र हे धाडस दाखवून हातावर विंचू घेऊन फुशारकी मारीत असे.  घरात किंवा शाळेत विंचू निघाला तर तो पकडण्याचे काम विठ्ठलाचे.  एखादे वेळी गडबडीत विंचू चावला तरी अभिमानास पेटून विठ्ठल त्या वेदना मुकाट्याने सहन करायचा.

दुखणे आले अथवा जबर इजा झाली तरी विठ्ठल विव्हळत नसे.  स्वस्थ घुमेपणाने पडून राही.  ''विठ्या, तू काय बेरड आहेस रे'' असे आई उद्‍गारी.  ही स्पार्टन सहिष्णुता आपल्यात जन्मजात नसून ती मानीपणाने आणल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  शाळेत शिक्षकाकडून छडी खाण्याचा प्रसंग विठ्ठलावर येत नसे.  पण केवळ आपल्या अंगी सहनशीलता बाणावी यासाठी एखाद्या मुलाला आपल्या हातावर जोराने छडी मारावयास तो सांगत असे.  तळहात काळा-निळा झाला तरी त्याच्या तोंडातून हूं की चूं निघत नसे.  या प्रकारची सहनशीलता त्याने आपल्या ठिकाणी जाणीवपूर्वक बाणवली होती.  आपली सहनशीलता अजमावण्यासाठी सहाव्या-सातव्या इयत्तेत असताना विठूने एक भयंकरच प्रकार करून घेतला.  अपण किती वेदना सहन करू शकतो हे अजमावण्यासाठी नेहमीचे मित्रमंडळ बसले असता व्यंकू कुलकर्णीला आपल्या उजव्या हाताच्या पंजाच्या मागील भागावर एक जळती उदकाडी ठेऊ दिली.  विठ्ठलाच्या तोंडातून वेदनेचा एखादा शब्दही उमटला नाही, की चेहर्‍यावरून अथवा डोळ्यावरून वेदनेचे कोणतेही चिन्ह दिसले नाही.  उदकाडीच विझू लागली.  विठूच्या आईने इतक्यात अकस्मात येऊन पाहिले.  ती खूप रागे भरली.  त्यांच्या उजव्या हाताच्या मागे लहानसा व्रण अखेरपर्यंत होता.  धाडसाची आणि विक्षिप्‍तपणाची लकेर त्यांच्या पुढच्या आयुष्यातही अनेकदा चमकून जाताना दिसते.  १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना पन्हाळगड, विशाळगडाची सफर त्यांनी केली.  तेव्हा किल्ल्याच्या अवघड जागी चढून जाऊन बसणे त्यांना आवडायचे.  पुढे इंग्लंडला गेल्यावर लेक डिस्ट्रिक्ट्समधील 'लीथ्स कॉटेज' ह्या प्रो. कार्पेंटर यांच्या घरी इतर सहाध्यायांसमवेत ते सुटी घालविण्यासाठी प्रोफेसरांच्या निमंत्रणावरून गेले होते.  सूर्योदय पाहण्यासाठी रात्री उठून डोंगराच्या शिखरावर जावयाचे ठरले होते.  भल्या पहाटे अंधाराच्या वेळी डोंगराची काही वाट चढल्यानंतर पाऊस पडला.  बाकीची सारी मंडळी परतली.  परंतु विठ्ठल रामजी मात्र एकटेच पुढे निघाले. खूप पाऊस आल्यामुळे त्यांना डोंगरातील एका छोट्या गुहेत उजाडेपर्यंत भुतासारखी रात्र काढावी लागली.  ह्याच सुटीमध्ये सगळ्या मंडळींसमवेत ते वनभोजनास गेले असता मंडळी स्वच्छंदपणे हिंडत होती.  एका उंच झाडावर चढण्याची विठ्ठल रामजींना हुक्की आली व ते पायात बूट असताना कसेतरी चढले; परंतु बूट घसरू लागल्यामुळे उतरणे त्यांना जमेना.  मंडळीत बूट कोढणेही अशिष्टपणाचे वाटले.  अखेर एका फांदीच्या वर जाऊन ती वाकवून त्यांनी खाली उडी घेतली त्या वेळी तर मिसेस् कार्पेंटरनी किंकाळीच फोडली.  पुन्हा असला प्रकार करू नकोस म्हणून त्यांनी गंभीरपणाने त्यांना बजावले.  स्कॉटलंडातील सरोवर प्रांतात रोज वीस-पंचवीस मैल चालत जाऊन उंच डोंगराच्या शिखरावर ते एकटेच तासनतास बसत.  रॉवरडेनॉन नावाच्या खेड्यात ते एका गरीब कुटुंबात उतरले होते.  तेथील लहान मुलांना घेऊन ते लॉख लोमंड सरोवरावर एकदा फिरायला गेले.  सरोवरात पोहोण्याची त्यांना लहर आली.  कपडे काढून उडी घेतली.  जरी उन्हाळ, होता तरी सरोवराचे पाणी इतके थंड होते की पाण्यात पडल्याबरोबर ते गारठले.  हातापायांत गोळे येऊ लागले.  मोठ्या प्रयासाने ते काठाला लागले.  लहान मुले घाबरून गेली.  सुदैवाने जिवावरचा हा प्रसंग टळला.

खोडकर स्वभावामुळे जमखंडीस विठ्ठलावर आणि मित्रमंडळावर खोड मोडावी असा एक बिकट प्रसंग आला होता.  शिमग्याच्या दिवसात बाबांचा डोळा चुकवून ही मुले उनाडक्या करीत फिरत असत.  त्याचा अतिरेक म्हणजे वेश्यांच्या आळीत बदफैली लोकांच्या नावाने शिमग्यातल्या अचकट बिचकट म्हणी म्हणत, अभद्र ध्वनी काढीत मध्यरात्र उलटून जाईपर्यंत हिंडत.  एकदा विठ्ठल काही मुलांबरोबर एका वेश्येच्या घराजवळ वाईट गाणी म्हणत, शंखध्वनी करीत गेला व मुलांच्या नादी लागून तिच्या दाराशी दंगामस्ती करू लागला.  आतून बाळा काणे नावाचा एक तरुण ब्राह्मण त्रासून आला व त्याने विठ्ठलालाच पकडले.  याच शिक्षकाने विठूला शाळेत घालण्याचा प्रथम मुहूर्त करण्याचा धडा घालून दिला होता.  हा शिक्षक फार रागीट, दांडगा व शाळेत मुलांना गुरासारखा झोडपणारा होता.  संतापून त्याने विठूचे डोके धरले.  त्याच्या हातात विठूचा रुमाल राहिला व त्याने सुंबाल्या केला.  बाळा काण्यांच्या हातून आपण सुटलो खरे पण रुमालाशिवाय घरात बाबांपुढे कसे जाणार अशी फिकीर त्याला पडली.  शेवटी वडील भाऊ परशुराम काण्यांकडे गेला.  विठू, परशुराम रामजीबुवांचे मुलगे असे कळल्यावर त्याचीच भीतीने गाळण उडाली.  रुमाल परत देऊन झालेली गोष्ट बाबांना कळवू नको अशी विठूच्या भावाचीच तो गयावया करू लागला.  व्यक्तिगत आणि सामुदायिक खोड्यांचे आणि व्रात्यपणाचे कितीतरी प्रकार विठ्ठल रामजींनी केले होते.  ह्या त्यांच्या खोड्यांतून काहीतरी वेगळे करण्याचा धाडशीपणा दिसून येतो, त्याचप्रमाणे त्यांची विलक्षण सहनशीलताही दिसून येते.

Read more: बालपण
  1. प्रार्थनासमाजाची दीक्षा
  2. प्रार्थनासमाज
  3. प्रस्तावना
  4. प्रवासातील अनुभव
  • 113
  • 114
  • 115
  • 116
  • 117
  • 118
  • 119
  • 120
  • 121
  • 122
Page 118 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी